लहानपणी आईने अ, आ, ई शिकवलं. अवघडच होते ते गिरवणं. पाटीवर पेन्सिल टेकवून लिहायचं. वेडंवाकडं निघायचं. कधी कधी आई रागवायची मात्र बऱ्याचवेळा हाताला हात धरून वळण लावायची. मग पाटीवर अक्षरे निघू लागली वळणदार. तरीही मी अक्षरांबाबतीत तसा कच्चाच राहिलो. आजपर्यंत ते सुधरलंच नाही. माझं अक्षर वाईट याचं वैषम्य अधूनमधून वाटत राहतं. पण ते सुधरवून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही. असं सांगतात की ज्याचं अक्षर चांगलं तो चांगला चित्रकारही होऊ शकतो. मात्र असंही आढळून आलंय की बडी बडी माणसं जी असतात त्यांचं अक्षर हस्ताक्षर वाईटच असतं. मी दुसऱ्या कॅटेगरीतला अशी साधीभोळी समजूत मी स्वतःला घालत असतो.
आईचं गिरवून झाल्यावर पाठीशी लागली ती शाळा. शाळा कुणाला चुकलीय. असं तर बऱ्याचदा ऐकिवात आलंय की चौथी वा सातवी आठवीला शाळा सोडून माणसं मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, थोर नेते बनलेत. माझ्या नशिबी तो योग नव्हता. शाळा काही सुटली नाही. पाटी काही फुटली नाही. मात्र शालेय जीवन होय जीवनच मस्तपैकी जगलो. गळ्यात गळा घालणारे मित्र मिळाले. हातावर छडी देणारे मास्तरही भेटले. पोटात चिमटा काढणे वा कान उपटणे, उठाबशा काढायला लावणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं असायचं. ते मारायचे व माया ही करायचे. त्यातून मात्र घडत गेलो. बाबा ही शाळेत शिक्षक होते त्यामुळे निदान माझी शिक्षा द्विगुणित व्हायची. वरच्या कक्षांमधे गेलो तसे चुका कमी व्हायला लागल्या. शिक्षणाची गोडी लागली. मग शाळेचे दिवस, रम्य ते दिवस होऊ लागले. मास्तरही आवडायला लागले. शिकणं झालं, खेळणं झालं, गेदरिंगमधे नाट्य नाटिका केल्या. जास्तीतजास्त मार्कं मिळवण्याची चढाओढ ही केली. वार्षिक परिक्षेचा रिझल्ट लागण्याचा दिवस अतिमोलाचा ठरू लागला. पहिला दुसरा नंबर आला तर कोण आनंद व्हायचा. जरी पहिल्या पाचामधे आलो तरी आनंद व्हायचा. मग सर्वांना रिझल्ट दाखवायची खुमखुमी यायची. नववीत असताना सायन्सच्या पेपरला तेरा सप्लिमेंट जोडल्या होत्या. सर्वात जास्त मार्क मिळाले. त्यापेक्षाही आमच्या शिक्षिकेने माझी संपूर्ण उत्तरपत्रिका नोटिसबॉर्डावर लावली होती. आदर्श उत्तरे कशी लिहावीत याचं प्रात्यक्षिक म्हणून. बरेच दिवस कॉलर टाईट होती. अकरावीची परिक्षा आली अन् गेली. त्या अगोदर सेंडॉफ झालेला. शाळा सुटल्याचं दुःख अपरिमित. काहीजण तर चक्क रडलेच.
शाळा सोडून कॉलेजचे दिवस सुरू झाले. ते मोरपंखी का काय ते !! खरंतर ती गद्धेपंचविशीच होती. अभ्यासापेक्षा इतर उद्योगच जास्त व्हायला लागले. कविता काय, कथा काय भलतं भलतंच सुचू लागलं. त्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आंतरमहाविद्यालयीन दिवाळी अंक कथास्पर्धेत बक्षिस मिळालं तसं आमचा रथ दोन बोटं वरच धावू लागला. परिक्षा आली की अभ्यासाला लागायचं तेव्हढ्यापुरतं जमिनीवर. आणखीन मित्र भेटत गेले. धमाली घडू लागल्या. सहली घडू लागल्या. अरेतुरेची लज्जत यायला लागली. सगळं काही घडत होतं. नासिक काय पुणे काय, पुणे येथे तर काय उणे. सांस्कृतिक राजधानीच. उधाण न आलं तरच नवल. मन भरून जगलो ते दिवस, मन लावून अभ्यासही केला. चारवर्षात डिग्रीधारक झालो. सगळ्या परिक्षा पास झालो.
आता खरी परिक्षा सुरू झाली आयुष्याची. मध्यंतरी लग्न झालं हे ओळखलंच असेल बहुतेकांनी. काही दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुडा होता. त्याला शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक ही म्हटले. वरतून म्हटलं, परिक्षेच्या अगोदर बेस्ट ऑफ लक म्हणतात ना तसं!! तर तो दोन मिनिटं माझ्यासमोर पहातच राहिला. मग त्याला समजवलं, त्याचं असं असतं की प्रश्नपत्रिकेत जसं सांगतात ना की, एका ओळीत उत्तर द्या, आन्सर इन वन सेन्टेन्स, थोडक्यात लिहा, बी ब्रीफ, कोण कोणाला काय म्हणाले हू सेड टु हूम. जोड्या जुळवा, मॅच द पेअर, समानार्थी शब्द द्या, हे प्रकरण तसं अवघड, विरुद्धार्थी शब्द द्या, हे तसं सोपं. वरतून पत्रलेखन, निबंध, आत्मचरित्र, हे जसं परिक्षेत असतं तसं सगळं आयुष्यात ही असतं. तेव्हा तयार रहा, बी प्रीपेर्ड. तो होतकरू मुलगा खो खो हसायला लागला. मीही. खरंतर हे माझे अनुभवाचे बोल.
किती परिक्षा दिल्यात? तसं तर पदोपदी परिक्षाच. एक पेपर सोडवून झाला की दुसरा हजर. रसायन शास्त्रासारखे इक्वेशन्स, इतिहासात असतात तशा लढाया त्या रक्तरंजित नसतात तरी जीवघेण्या नक्कीच. समाजशास्त्र मात्र इथे वेगळंच. सर्वात अवघड गणिताचाच पेपर आयुष्यातही. सोपे गणित लवकर सुटतं. कूटप्रश्न मात्र अनुत्तरित राहणारे. सोडूनच द्यावी लागतात. इथे हुशारी फारशी चालत नाही. कस लागतो तो समंजसपणाचा. सुपरवायझर वरती बसलेला. अनेक जटिल प्रश्न व समस्या नव्या कोऱ्या प्रश्नपत्रिकेसारख्या. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो की हुश्श वाटणारं. अधिक मार्कांचा अट्टाहास इथे चालत नाही. बऱ्याचवेळा स्वतःला हरवत इतरांना जिंकू देत पास होता येते आयुष्याची परिक्षा. पण एकूणच पाहिलं तर वाटतं आतापर्यंतचं जगणं पाहून, पेपर तसा सोपा होता.
☆ डायरी माझी सखी… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाचे वेध लागतात .नवीन वर्ष म्हटलं की आठवते ती डायरी…..
दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत सटर फटर असं मी काहीतरी लिहायची.
वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची बाकीची डायरी कोरीच असायची ….
त्या कोऱ्या पानांचा काय करायच हे कळायचं नाही. ठेऊन तरी काय करू…
असा विचार करून मी जुनी डायरी फेकून द्यायची …
नवीन वर्ष नवीन डायरी …असं माझं वर्षानुवर्ष चाललं होतं…
काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा… काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.
आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांना कायमसाठी साथ करणाऱ्या कवितांसाठी त्यांनी ‘ सखे….’
ही फार सुरेख कविता लिहिली आहे. ती माझ्या वाचनात आली.
मनात आलं ही आपल्याला परत वाचावीशी वाटली तर लिहिलेली असावी….ते म्हणतात..
सखे..
तू दिलेलं चांदणं
माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे…..
आपल्यालाही अमाप आनंद कुसुमाग्रजांनी दिलेला आहे…..
… आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.
आपल्याला जे आवडेल ते डायरीत लिहायचं असं ठरवलं..
वाटलं असं साहित्य आपल्याला कुठे मिळणार?
नंतर गंमत अशी झाली की डायरीत लिहावं असं सतत कुठे ना कुठे वाचायला मिळालं.
मासिकात ,पुस्तकात ,एवढेच काय अगदी रोजच्या वर्तमानपत्रात सुद्धा…
मग ते मी डायरीत लिहायला सुरुवात केली…
एकदा वाटलं आपण जे वाचतोय तेच डायरीत लिहितोय ..नंतर परत ते वाचण्यात काय गंमत वाटणार?
… जरा विचार केल्यानंतर लक्षात आले की कित्येक गोष्टी जुन्या होत नाहीत. काही वाचल्यावर लगेच समजत नाहीत. परत शांतपणे वाचल्यावर त्यातला गर्भित अर्थ समजतो..
काही गोष्टी चांगल्या असूनही आठवणीत राहत नाहीत ..त्यामुळे पुन: प्रत्ययात त्याचा आनंद निश्चित मिळेल.
हा नाद लागल्यावर डायरीत काही काही लिहीत गेले….. बघता बघता डायरी भरली.
माझंच मला खरं वाटेना. हातात घेऊन चाळायला लागले ..
डायरीत सलग असं काही लिहिलेलं नव्हतं .कुठेही काहीही होतं.
सहज म्हणून सुरुवात केली होती आणि आता डायरीत खूप काही जमा झालं होतं.
अनेक कविता डायरीत लिहिल्या आहेत. वाचून वाचून पाठ झाल्या आहेत .
एकदा मैत्रिणी घरी आल्या तेव्हा त्यातल्या काही कविता वाचल्या. मैत्रिणींना काही कविता आठवल्या. त्या डायरीत लिहून घेतल्या…. तो दिवस कवितांचा झाला अनपेक्षितपणे खूप आनंद देऊन गेला.
हिणाबाई एका कवितेत म्हणतात ….
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख
तयघरात कोंडलं …..
त्यानंतर खूप दिवसानंतरच्या एका पानावर होत ….
“ माय जॉय इस पब्लिक प्राॅपर्टी बिटवीन मॅन अँड मॅन
माय पेन इज प्रायव्हेट प्रॉपर्टी
बिटवीन गाॅड अॅन्ड मी …. “
या ओळी कोणाच्या आहेत हे मी लिहिलेलं नाही .कुठून पाहून लिहिल्या हेही मला आठवत नाही.
पण जगाच्या दोन टोकाला राहणाऱ्या लेखकांच्या विचारांमधला आशय किती मिळता जुळता आहे हे वाचून आश्चर्य वाटलं.
आपल्या साध्या सुध्या बहिणाबाई विषयी आदर दाटून आला…
“ हु मुव्हड माय चीज “ ह्या पुस्तकाचं मराठीतील थोडंसं स्वैर भाषांतर मध्यंतरी मी वाचले होते. त्यातली काही वाक्य डायरीतल्या एका पानावर आहेत.
बदल घडतात
बदलाचा अंदाज घ्या
बदलावर लक्ष ठेवा
बदलाचा आनंद घ्या
बदलाला तयार व्हा
हे वाचताना मी विचार करायला लागले… त्या पुस्तकातले अजून काही काही मला आठवायला लागले.
मनात आले रोजच्या जीवनात हे किती उपयुक्त आहे.
जे कृष्णमूर्ती, वामनराव पै, गोंदवलेकर महाराज, विनोबा भावे, निसर्ग दत्त महाराज यांची व अजूनही बऱ्याच जणांची सुंदर सुंदर वचने डायरीत मी कुठे कुठे लिहिली आहेत.
.. मनाला आधार देणारी उभारी देणारी अशी कित्येक वाक्य या डायरीमुळे आज हाताशी आहेत.
ही एकदा वाचून उपयोग नाही. ती वारंवार वाचली तरच मनात खोल शिरून तिचा परिणाम होईल .
अशी अर्थगर्भ अशी ती वाक्य आहेत… अर्थात त्याचा रोजच्या व्यवहारात उपयोग करून घेतला पाहिजे हे पण समजते आहे.
डायरीत काही अभंग ,गौळणी, गाणी आहेत …
पावनेर मायेला करू…. .
सुखी नांदते संसारी बाई
नाही मागणं आणि काही
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू…
या ओळी वाचताना डोळे भरून येतात… मन कातर हळवं होतं..
एके दिवशी गंमत झाली होती. मी त्या दिवशी रागवले होते ..रुसले होते… कुणाला काही सांगावं कुणाशी काही बोलावं असं वाटत नव्हतं.
… नंतर मीच माझ्याशी बोलले होते.. स्वसंवाद साधला होता .स्वतःची समजूत काढून सावरले होते. आज डायरी चाळताना ते मला आठवले… त्या दिवशी डायरीत होतं .
चालायचंच
जाऊ दे
सोडून दे ना
टेक ईट ईझी
…. आज हे वाचताना मस्त वाटलं…
सांकेतिक पण मला कळणारी अशी बरीच वाक्य डायरीत आहेत.. एका पानावर होतं
‘मी शहाणी कधी होईन..’
त्या दिवशी मी केलेला वेडेपणा
अहं..नाही हं तो नाही सांगणार…
त्या दिवशी खरंच माझ्या हातून चूक झाली होती. ती मला कळली होती त्यातून मी धडा घेणार होते. शिकणार होते . ती चूक परत होऊ नये म्हणून दक्षता घेणार होते.
पुढे लिहिलं होतं ….
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर….
या क्षणी डायरी वाचताना मीही क्षणभर थांबले…
वर्षभर जसं वागले त्याचा थोडाफार ताळेबंद या डायरीत आहे .डायरीमुळे मी माझ्या मागच्या दिवसांकडे वळून बघू शकते आहे.
डायरी वाचताना आठवली ती खूप वर्षापूर्वीची कॉलेजची रंगीबेरंगी डायरी …त्यात शेर शायरी, हिंदी मराठी गाणी, कादंबरीतले उतारे आणि बरंच काही होतं …
शेवटच्या पानावर तर काय काय होतं…
बहरण्याचे ..खुळावण्याचे… फुलण्याचे… ते दिवस होते…. ती डायरी वेगळीच होती. लग्नानंतर ती माहेरी राहिली… परत कधीतरी आणली आणि वाढणाऱ्या संसाराच्या पसाऱ्यात कधी आणि कुठे हरवली कळलच नाही ….
संसारात मी पण पार बुडून गेले. आता आयुष्याला थोडा निवांतपणा आला आहे.म्हणून डायरी लिहायला वेळ मिळत आहे.
नंतर पुढच्या डायऱ्या थोड्या प्रौढ प्रगल्भ झाल्या आहेत… माझ्यासारख्या कदाचित…
नंतरच्या एका डायरीत असं लिहिलं आहे की..
“तुम्हाला असं मनात कितीदा वाटलं की मी फक्त एवढे बोललो असतो तर…….
हो हो सगळे पटते.. पण पटतही नाही … असं कसं होऊ शकतं… चलता है…
ही वाक्य आत्मनिरीक्षण करायला लावणारी आहेत. सहज सोपी शिकवण देणारी आहेत.
तर सांगायचं तात्पर्य म्हणजे…
डायरीत खूप काही जमा झालं आहे. दोन-चार मैत्रिणींनाही हा नाद लागला आहे..
माझे काय .. तुझ्याजवळ काय याची चौकशी होत आहे..
एकमेकींना नवीन काही वाचून दाखवलं जात आहे..
तुमचं काय…
तुम्हाला हा प्रयोग करावासा वाटतोय का ?
करून बघा ना …. काय हरकत आहे…
कदाचित तुमची डायरी पुढच्या वर्षी तुम्ही मला दाखवाल …
तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल…
आपल्या दुसऱ्या मैत्रिणींनी अजून काही लिहिलं असेल..
सगळ्यांचा मिळून एक छानसा खजिना तयार होईल ..
घ्यायचा आहे का नवीन अनुभव.. करायची का सुरुवात..
आजकाल आपण हाताने फार कमीच लिहितो…. मोबाईलवरपण बोलून टाईप होत…
लिहायला विसरत चाललो आहोत का?
पण एक सांगू का .. लिहून बघा.
आपण स्वतः लिहिले की शब्द लक्षात राहतात… आणि त्याचे अर्थ पण…
हे लिहिणं निखळ आनंद देतं…. असं लिखाण आपलं आपल्याला समृद्ध करतं …शहाणं करतं..
ही डायरी आता नुसती डायरी नाही राहिली… ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय…
तिच्याशी मी कधीही बोलू शकते….. जिला मी मनातलं काही सांगू शकते … अगदी कधीही ..
अशी ही डायरी माझी सखी झाली आहे… मैत्रीण झाली आहे…
बघा प्रयोग करून ….. तुम्हालाही तुमच्यातलं काहीतरी नवीन गवसेल….
दूर कुठे प्रवास करायचा तर जुनी गाणी ऐकत प्रवास करायला बहुतेकांना आवडते.
तसेच मी पण लांबच्या प्रवासात गाणी ऐकताना जावेद अख्तर यांचे जगजीत सिंह यांनी गायलेले
तुमको देखा तो ये खयाल आया । जिंदगी धूप तुम घना साया।
हे गाणे लागले होते. पळणारी झाडे घरे पहात हे गाणे ऐकताना विचारांनाही चाके लागली आणि त्यात मन रंगून गेले.
खरेच आयुष्य जगायचे म्हणजे त्यामधे कोणीतरी भक्कम साथ देणारे असावेच लागते. मग ती साथ जोडीदाराची , मित्र/मैत्रिणीची, आई-वडिल, मोठ्या व्यक्तींची, हितचिंतकांची असो. पण जीवनातील सुख दु:खे आपण कोणाबरोबर तरी वाटून घेतली तर जगण्याची मजा कितीतरी पटीने वाढते ना?
अशावेळी आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीचे स्थान अनन्यसाधारण होऊन जाते. ते किती अनमोल आहेत हे सांगायलाच आपल्या जोडीदाराला उद्देशून लिहिलेले जावेद अख्तरांचे हे शब्द.
जोडीदाराबद्दल जरी लिहिलेले शब्द असले तरी आपल्या आयुष्यात असलेल्या अनन्यसाधारण महत्वाच्या कोणत्याही व्यक्तीला हे शब्द अगदी लागू पडतात.
ज्याच्यामुळे आपले आयुष्य घडते, ज्याच्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो, ज्याच्यामुळे मनाला एक उमेद मिळते, त्याबद्दल असे विचार येतात. जेव्हा मन पोळलेलं असत, संकटांनी घेरलेलं असतं तेव्हा त्याला शीतलता देणारं, आशा दाखवून चांगली वाट दाखवणारं असतं तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा आदर वाढलेला असतो.
नवर्याच्या यशामागे भक्कमपणे उभी राहिलेली पत्नी, मुलांना मोठे करण्यासाठी दिवसभर राबून कौतूक करणारे आई-वडिल, होतकरू हुषार मुलाला चांगल्या शिक्षणासाठी मदत करणारे शिक्षक, संकटात सापडलेल्या मित्राला मदतीचा हात देऊन कायम त्याच्या बरोबर रहाणारा मित्र, कोणा चांगल्या मुलाला अनुभवाचे बोल सांगून त्याच्या मनाला उभारी देणार्या मोठ्या व्यक्ती, एखाद्याचे चांगले गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन देणारे हितचिंतक हे सगळे मग घना छाया होतात आणि ओठी शब्द येतात जिंदगी धूप तुम घना साया•••
पण याही पेक्षा मोठा अनुभवही आला. आमच्या समोरच रहाणार्या ८५ वर्षाच्या आजी. काही दिवसांपूर्वीच त्यांचे यजमान वारले. मुलगा परदेशातून येऊन काही दिवस राहिला. पण नंतर त्याला जावेच लागले. मुलगी पण सासरी गेली.
मुलगी म्हणाली चल माझ्या सोबत. मुलगा पण म्हणाला तुला तिकडे परदेशात नेतो. पण आजीचा हट्ट जो पर्यंत माझे हातपाय धड आहेत तो पर्यंत मी कुठेच येणार नाही. अगं पण तू एकटी कशी राहशील? मुलांनी काळजीपोटी ते पण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मी एकटी कुठे? माझ्या बरोबर तो तारणहार आहे ना . तो करेल सगळं नीट. आजपर्यंत माझे सगळे सुख दु:ख मी त्याला सांगत आले आणि कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यानेच तर माझी मदत केली.
यावेळी पण तो माझ्या सोबत आहे आणि इथून पुढेही राहील.
दूर कुठे तरी तेच गाणे लागले होते तुमको देखा तो ये खयाल आया••• आणि लगेच सगळ्यात श्रेष्ठ तो परमेश्वर आहे याची खात्री पटली आणि जिंदगी धूप तुम घना साया या गाण्याची प्रार्थना झाली.
☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆
पशूपक्षांनो एकदा भेटून जावा ..
काल फोन आला म्हणून वडाखाली थांबलो.फोन कट झाला म्हणून पुढे निघणार एवढ्यात जुनाट वटवृक्षाचा आवाज कानी आला.
“ आता माझा आसरा, विसरा. माणसाच्या विकासाचा रस्ता डोंगर सपाटीकरणातून व रस्ते रूंदीकरणातून जातो म्हणतात. रूंद दृष्टी नसलेल्या विकासकाला आधी खुपते झाडाचे अस्तित्व अन् सुरू होते झाडांची खुलेआम लंगडतोड, बेसुमार नृशंस हत्या.’
“ जंगल नावाच्या आमच्या आप्तातील जवळचे शेजारी भावकीतील लहानमोठी वड, सोयरे असलेले बाभुळ, लिंब धाराशयी झाले आहेत.यांत्रिक करवतीचे करकर आवाज माझ्या कानात घुमत आहेत. वर्षानुवर्षे वादळवारा ऊनपाऊस यांना समर्थपणे तोंड देणारे माझे भक्कम शरीर इवलुशा करवतीच्या करकरीने थरथर कापत आहे. पूर्वी कुऱ्हाडीने वृक्षतोड असल्यामुळे आमचा जीव जायला बराच वेळ लागायचा .घाव झेलत , कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणत ,दांड्याला नावं ठेवत कुऱ्हाड पात्याला व घाव घालणाऱ्या हाताला सहीसलामत सोडत मृत्यूशय्येवर काही दिवस तरी नक्कीच जायचे. आता तेजतर्रार कर्रकर्र करवतीच्या पापात दांडा म्हणून आमचा भाईबंद नाही. करवतीचा वेग व धार इतकी जलद आहे की शेकडो वर्षे लागलेलं, कमावलेलं वटलेलं आमचं शरीर क्षणात भुईसपाट होतं.करवतीच्या धारेमागे. माणसाचा वेगवान हैवानी दिमाख आहे हे कळल्यामुळे आता आम्ही आमच्या गोतास नाव ठेवत नाही व करवतीलाही दोष देत नाही. शेजारच्या मरणासन्न झाडाचं दुःख करायला सवडच नाही कारण वीज चमकण्याच्या अवकाशातच काही क्षणातच शेजारचे दुसरे झाडही लगेच धाराशयी.”
“ माझा शेंडा कॅमेरा बनून शेजारचा विध्वंस पाहतो आहे. पारंब्याला त्याने मरणाला तयार राहा म्हणून संदेश दिलाय. मृत्यूचे भय सर्वच सजीवाला असतं कारण मृत्यूचे दुसरं नाव अस्तित्व अंत आहे. वाटसरूंना ऊन्हात सावली दिली. पावसात आडोसा दिला. वादळात सहारा दिला. वाळलेल्या पानाआड किड्यामुंग्यांना घर दिले,अन्न दिले, जमिनीला कस दिला. पक्षांना घरटी दिली.अंडे पिल्ल्यांची राखण केली. भिरभिरत्या ढगांना थांबवलं.- मातीत रिचवलं .नदी ओढे तृप्त केले. पशूपक्षांनो माझे उरलेत दोनच दिवस ,या अन् भेटून जा. उगवतीवेळी व मावळतीवेळी जोरजोरात किलबिलाट करा. मला पक्षांचा आवाज ऐकत मरायचे आहे.”
“तुमच्या माणसातले महामानव क्रांतीसूर्य जोतिबा फुले म्हणायचे …
इंग्लंड मुक्कामात मी एक दिवस माझी पत्नी आणि मुलीबरोबर लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव पहायला गेलो होतो. दुपारचं जेवण आटोपल्यावर हिचीनवरून आम्ही ट्रेननं लंडनला निघालो. हवेत खूप गारठा होता. पाऊस येण्याचीही शक्यता होती. यादृष्टीने छत्री, स्वेटर, जर्कीन वगैरे
अगदी बंदोबस्तात निघालो. ऑनलाईन तिकीट काढताना पाहिलं, एका कोपर्यात एक मध्यमवयीन बाई एकटीच मोठ्याने बडबडत होती. मला ते विचित्र वाटलं. मी प्रश्नार्थक दृष्टीने मुलीकडे पाहिलं. ” ती खूप दारू पिऊन बडबडत असेल ” मुलगी म्हणाली. तिकीट काढून पुढं जाताना पत्नी म्हणाली, “काय इथल्या लोकांचं जीवन! एकाकी. कुणी बोलायला नाही ते असंच स्वतःशीच बोलत बसतात “.
काहीही असो, इथल्या गो-या लोकांच्या समाजजीवनातली एक काळी बाजू मला समजली.
आठवत नाही, कोणत्यातरी स्टेशनवर उतरून बसने लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळाच्या हाॅलमध्ये पोहोचलो. इंग्लंडमध्ये रहाणारी शेकडो मराठी माणसं भेटली. काहीजण इतर देशांतूनही आले होते. अनेक पुरूष सलवार, कुर्ता तर महिला साड्या परिधान करून आल्या होत्या . सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद, मनामनात उत्साह आणि सर्वत्र उत्सवाचे वातावरण भरले होते. त्यात काही जणांचे इंग्लंडमध्ये मोठमोठे उद्योग होते. कुणी नोकरी करत होते तर काही विद्यार्थी होते. काही मुलं आपल्या आईवडीलांसोबत, तर काही वयस्कर आईवडील आपल्या मुलांसोबत आले होते.
आपले भौगोलिक, उत्पन्नाचे , वयाचे आणि इतर भेद विसरून ‘ मराठी माणूस ‘ या समान मुद्द्यावर या उत्सवात सारेजण सहभागी झाले होते. एंथ्रोपोलॉजी मध्ये याला एथनिसीटी म्हणतात.
आम्ही पोहोचलो तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले होते. अनेकांनी विविध गीते, नृत्य, संगीत सादर केले. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होते. ‘ सैराट ‘चित्रपटातील झिंग झिंग झिगाट गाण्यावर सारे सभागृह बेभान होऊन नाचत राहिले. ज्यांना नाचणं जमत नव्हतं, ते टाळ्या वाजवून साथ होते.
रात्री दहाच्या सुमारास आम्ही परत जायला निघालो. एखाददुसरा माणूस सोडला तर रस्त्यावर कुणीच नव्हतं. त्यात बोचरी थंडी. काही बसचा प्रवास करून आम्ही पॅडिंग्टन स्टेशनवर पोहोचलो. एका प्लॅटफॉर्मवरून संगीताचे सुरेल सूर ऐकू येत होते. उत्सुकतेने जवळ जाऊन पाहिलं. रेल्वेचा तो बॅन्ड होता. रेल्वे स्टेशन म्हणजे, गाड्यांचा धडधडाट, इतर काही कर्णकर्कश आवाज, पॅसेंजरांच्या गोंगाटात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, यांची सवय असलेल्या मला हा आश्चर्याचा धक्का होता.
रेल्वेने हिचीन स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्र खूप झाली होती. कधी एकदाचं घरी पोहोचतो, आणि अंथरूणात शिरून झोपी जातो असं झालं होतं. चालता चालता वर पाहिलं. विस्तीर्ण आकाशात जिकडं पहावं तिकडं अगणित तारे आणि ग्रह. कल्पना चावलांच्या एका वाक्याची समर्पकता जाणवली ..
“आकाशात पाहिलं की,आपण एका भौगोलिक सीमेत बांधले जात नाही”.
☆ “चालले कोण तिकडच्या घरी–…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
‘निघाले आज तिकडच्या घरी ’ असे म्हणत शंभर वर्षांपूर्वी मुली स्वतःच्या वडिलांचे घर सोडून, सगळे नातेवाईक, आप्त, मित्र मैत्रिणी यांना सोडून स्वतःच्या सासरी जात असत. मग त्यांना एका बागेतले झाड उपटून दुसऱ्या बागेत पुन्हा लावण्याचा प्रयत्न होत आहे.. .. अशा पद्धतीची उपमा देऊन आणि त्यांच्या त्यागाची परिसीमा वर्णन करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याची स्पर्धा सर्व कवी आणि साहित्यिकांमध्ये लागलेली असे. अगदी नाटक सिनेमासह सगळीकडे या पद्धतीने स्त्रीने स्वतःचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, शिक्षण, छंद, या सगळ्यांचा त्याग करून सासरची मंडळी ही
देवासमान म्हणून त्यांचा छळ सहन करत आपले आयुष्य काढायचे. आपले जीवन सासरच्या घरास अर्पण करायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला असेलही. अनेकांवर अन्याय झालाही असेल. नव्हे तो झाला आहेच.
परंतु कालमान परिस्थिती बदलत गेली. नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाकडची माणसे शहरात येऊ लागली. लग्न झाल्यावर घरे अपुरी पडायला लागली. पुरेशी घरे असूनसुद्धा योग्य ती प्रायव्हसी न मिळाल्याने होणारी कुचंबणा. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राजा- राणीचा नवा संसार थाटून नवरा बायको नव्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागले. तरीही जुन्या काळचे त्याग जुन्या काळच्या त्या रोपटे उपटलेल्या उपमा यातून साहित्यिक तर नाहीच, पण व्हाट्सअपचे पोस्ट टाकणारे ट्रॉलर्स सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत. स्त्रीच्या त्या महान त्यागाची, व्हाट्सअपवर सुद्धा रकानेच्या रकाने भरून वर्णने अजून येत राहिली.
साधारणपणे आमच्या आधीच्या पिढीपासून नंतर आमची पिढी आणि पुढील पिढी तर नक्कीच लग्नानंतर स्वतःचे स्वतंत्र संसार थाटू लागले. त्यामुळे मुलीची परिस्थिती आणि मुलाची परिस्थिती काही वेगळी राहिली नाही. मुलगासुद्धा स्वतःच्या संसारासाठी स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मित्रमंडळी, स्वतःच्या संपूर्ण वातावरणाचा त्याग करून दोघेजण एकमेकांच्या परिस्थितीत समसमान त्याग करून आपापले सुखी संसार थाटू लागले. आमच्या पिढीतले अनेक आई-बाप सुद्धा शक्य होईल तसे मुलांच्या स्वतंत्र संसारासाठी तजवीजही करू लागले. मुलगा लग्न झाल्यावर वेगळा राहणार हे नक्की होऊन ते नवीन गृहीतक बनून गेले. तरीही अजून सर्व मुले त्याकाळच्या स्त्रीच्या त्यागापुढे फिकी पडत गेली.
कित्येक वर्षांपूर्वी याबाबतीत मी आमच्या आईशी वाद घातला होता. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये काहीच फरक नाही. दोघेही आपापले वातावरण सोडून एकत्र येऊन तिसऱ्या वातावरणात एकत्र राहतात. त्यामुळे त्यापैकी कोणी एक त्याग मूर्ती म्हणून मिरवण्याचे काही कारण नाही. हा विचार डोक्यात होताच, पण त्याबाबत काही लिहावं हे मात्र डोक्यात आलं नाही. परंतु कालच व्हाट्सअप वर एक कविता पाहिली आणि आपल्याच मनातले विचार कुणीतरी सांगतंय हे लक्षात आलं. खरं म्हणजे व्हाट्सअप वर कविता फॉरवर्ड करताना काही माणसे मूळ कवीचे नाव काढून का टाकतात हे मला अजून समजले नाही. काव्य करणाऱ्या कवीला त्याच्या हुशारीचे श्रेय द्यायलाच पाहिजे. परंतु खालील कवीला ते श्रेय नाकारून कुणीतरी ती फक्त कविताच मला फॉरवर्ड केली. अर्थात कोणाला त्या कवीचे नाव माहित असल्यास कृपया मला कळवावे … त्या कवीला शाबासकी देण्यासाठी.
ती कविता पुढे देत आहे. त्याला दाद मिळावी ही मनापासून इच्छा आणि अपेक्षा ….
— पण मुलंही जातात घर सोडून…!
मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून.
☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!
त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!
तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.
कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.
कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.
तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’
ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..
‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’
हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???
त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!
लेखक : श्री धनंजय देशपांडे
लातूर
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“मावशी,अगदी थोडं दुखेल हं म्हणत सुनंदाने मला इंजेक्शन दिलं मला रोज इंजेक्शनची सुई टोचवायची म्हणून तीच हळहळायची.
मी म्हटलं,”अगं तू इंजेक्शन देत्येस म्हणून तर मी बरी होत्ये ना.गेला महिनाभर तू माझी किती काळजी घेत्येस. या सुईने तर तुझं आणि माझं इतकं छान नातं जोडलंना गं बाई “.
तिने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली,
“मावशी तुम्ही आयुष्यभर या सुईसारखी किती प्रेमाने नाती जोडली आहेत ऐकतेय ना मी पण, तुम्हाला भेटायला येणार्या लोकांकडून”.
” हो गं बाई, मी आपली माणसं जोडण्याचं काम करत राहीले हेच माझ्या आवडीचं काम “.
“पण तुला गंमत सांगू का?”
“नाही,पण तुला वाटेल, काय म्हातारी बडबड करतेय, पण तू आहेस ना गं माझं ऐकायला म्हणून बोलावसं वाटतय “.
इतर वेळेस कोण असतं इथे ?कामापुरतं येतात निघून जातात.
सुनंदा म्हणाली,” नाही मावशी बोला ना मला आवडेल ऐकायला”
मग मी सरसावलेच,” अगं एकटीच असले ना की काही बाही सुचतं बघं. आत्ता तू सुईचा विषय काढलास ना तर मला नेहमी वाटतं माणसानेच तर सुई शोधली त्यात त्याचे गुण येणारच.
बघ ना….
घरात बाई सगळं जोडते शिवते बारिक सुईने अगदी बारीक दोरा घालून जसं कुणालाही न दुखवता ती घरातली नाती जपते आणि ती दृढ करते.
पण घरात सुद्धा सगळ्यांना एकच सुई चालत नाही आई बरोबर वेगळ्या सुया वापरते.
त्या सुईचा एक भाऊ असतो बघ दाभण नावाचा,जाड गोणपाट शिवायला वापरतात बघ.
जेव्हा दांड मुलं निबर तनामनाची असतात तेव्हा बारिक सुई नाही कामाची तिथे दाभणच पाहिजे दोन दणके धाकदपटशा लागतोच.
ते आईला बोबर ठाऊक असतं जे सगळ्यांना ताळ्यावर आणून एकसंध ठेवेल.
वाकळ गोधडी शिवताना बघ जरा लांब सुई लागते.
खूप अंगभर टाके घालायचे असतात ना.
जेव्हा सर्वांना एकत्र बांधून एकमेकांना एका बंधनात ठेवायचं तेव्हा अशी लांब सुई सगळ्यांना एकत्र बांधून एकमेकांना नात्यांची उब द्यायला शिकवते बघ.
आणि ती क्रोशाची सुई पाहीली आहेस का तू ?
अगं खूप काम केलं मी त्यावर.
त्या सुईला नेढं नसतं बरका नुसता थोडसं नाक वाकवून तो भास केलेला असतो पण धागा बरोबर अडकतो बघ त्यात अशी माणसं असतात बघ फार न गुंतता आपल्या जवळ हात धरुन ओढून पण छान सुबक जाळीदार काम करुन दाखवणारी पण चटकन वेगळी होणारी जेवढ्यास तेवढं वागणारी त्यांना सौंदर्य असतं पण नात्याची उब नसते.
फार गुंतत नाहीत ती कुठं.
आणि जरा कुठे एखादा धागा निघाला की पार सगळं कसं सहज उसवत जातं कळतच नाही.
आणि शेवटीss तुमच्याss विणकामाच्या सुयाss त्याना का सुया म्हणतात ?नाही नेढं नाही टोक. मला तर आजकाल event साजरे करणारे असतात किनई ते अश्या सुयांसारखे वाटतात.
अगदी कुणालाही न दुखवता सगळ्यांना पटापट हलवत राहतात एकमेकात गुंतून काम करत असतात तेव्हा असं वाटतं अगदी गळ्यात गळा वाटतो पण काम झालं की प्रत्येक जणं इतका वेगळा होतो की इथे थोड्या वेळापूर्वी अगदी एकमेकांजवळ येऊन काही छान प्रसंग उभा केला होता असं वाटतच नाही.
कुठेही गाठ नाही सुई टोचल्याची खूण नाही.
कर्तव्य म्हणून सारं काही.
जशी विणकामाच्या बाबतीत पण गंमत आहे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत उब.
दोन सुया दोन हातात नाचत नाचत धागे जोडत उब तर निर्माण करतात पण…पण सुईतून एक धागा ओढत गेलं की सगळं विणकाम उसवलं की तिथे काही दिसतच नाही काही विणलं होतं का नाही ते. अगदी तसच.
मध्ये कुठे नात्यांच्या गाठी बांधलेल्याच नसतात या सुयांनी पण खरी सुई कुणाची सांगू तुमच्या डॉक्टर लोकांची.
त्यांना साक्षात दंडवत बघ.
माणसाचं फाटलेलं शरीर जोडून परत एकसंध करणं सोपं नाही किती बारिक दोरा त्यांच्या चिकाटीचा,किती बारिक सुई त्यांच्या ज्ञानाची, अलगद हाताने टाके घालणं आणि परत ते आत विरघळून जातील असं पाहणं हे फक्त देवाचे हातच करु शकतात बघ.
त्यांची सुई पुनर्जन्म देते गं रुग्णाला आणि तुमच्यावरचा म्हणजेच देवावरचा आमचा विश्वास दृढ करते.
एकच वाईट वाटतं बघ इतक्या सुयांनी किती मदत केली आपल्याला…..
पण बाप्पाने, डोक्यावरच्या फाटक्या आभाळाखालचं एखाद्याचं फाटकं नशिब शिवायची सुई दिली नाही बघ माणसाला…….
“सुईबाई गं… तुलाही वाईट वाटत असेल ना मी इतकं सगळं शिवते मग मला असं नशिब का नाही शिवता येत?”
दुवा तरी मिळाला असता.
सुनंदाने पाहिलं मावशी आपल्याच तंद्रीत होत्या आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते
ते पाहून सुनंदालाही आपला कढ आवरावा लागला….
तिला वाटलं किती दुखण्यातूनही यांनी मन संवेदनशील राखलय.
असं जगावं आजूबाजूचं जग न्याहाळत त्यातील गंमती शोधत.
लेखिका : सौ. नीलिमा लेले.
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे.
असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना?
मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?
तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो.
मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते.
तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची
☆ ते माझे घर…. ☆
ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।
आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।
कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।
भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।
परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।
मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।
ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।
बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।
– श्रीराम बाळकृष्ण आठवले
आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती.
याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा.
तिने घरासाठी लागणार्या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला.
घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे.
त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.
आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे.
घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.
मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते.
दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?
आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते.
मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून?
मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?
घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?
शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्याला त्याची बाधा होणारच ना?
उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड, असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?
आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?
प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली.
घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••