सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ डायरी माझी सखी…  ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाचे वेध लागतात .नवीन वर्ष म्हटलं की आठवते ती डायरी…..

दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत सटर फटर  असं मी काहीतरी लिहायची.

वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची बाकीची  डायरी कोरीच असायची ….

त्या कोऱ्या पानांचा काय करायच हे कळायचं नाही. ठेऊन तरी काय करू…

असा विचार करून मी जुनी डायरी  फेकून द्यायची …

नवीन वर्ष नवीन डायरी …असं माझं वर्षानुवर्ष चाललं होतं…

काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा… काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.

आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांना कायमसाठी साथ करणाऱ्या कवितांसाठी त्यांनी  ‘ सखे….’

ही फार सुरेख कविता लिहिली आहे. ती माझ्या वाचनात आली. 

मनात आलं ही आपल्याला परत वाचावीशी वाटली तर लिहिलेली असावी….ते म्हणतात..

सखे..

तू दिलेलं चांदणं  

माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे….. 

आपल्यालाही अमाप आनंद कुसुमाग्रजांनी दिलेला आहे….. 

… आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.

आपल्याला जे आवडेल ते डायरीत लिहायचं असं ठरवलं..

वाटलं असं साहित्य आपल्याला कुठे मिळणार?

नंतर गंमत अशी झाली की डायरीत लिहावं असं सतत कुठे ना कुठे वाचायला मिळालं.

मासिकात ,पुस्तकात ,एवढेच काय अगदी रोजच्या वर्तमानपत्रात सुद्धा…

मग ते मी डायरीत लिहायला सुरुवात केली…

एकदा वाटलं आपण जे वाचतोय तेच डायरीत लिहितोय ..नंतर परत ते वाचण्यात काय गंमत वाटणार?

…  जरा विचार केल्यानंतर लक्षात आले की  कित्येक गोष्टी जुन्या होत नाहीत. काही वाचल्यावर लगेच समजत नाहीत. परत शांतपणे वाचल्यावर त्यातला गर्भित अर्थ समजतो..

काही गोष्टी चांगल्या असूनही आठवणीत राहत नाहीत ..त्यामुळे पुन: प्रत्ययात त्याचा आनंद निश्चित मिळेल.

हा नाद लागल्यावर डायरीत काही काही लिहीत गेले…..  बघता बघता डायरी भरली.

माझंच मला खरं वाटेना.  हातात घेऊन चाळायला लागले ..

डायरीत सलग असं काही लिहिलेलं नव्हतं .कुठेही काहीही होतं.

सहज  म्हणून सुरुवात केली होती आणि आता डायरीत खूप काही जमा झालं होतं.

अनेक कविता डायरीत लिहिल्या आहेत. वाचून वाचून पाठ  झाल्या आहेत .

एकदा मैत्रिणी घरी आल्या तेव्हा  त्यातल्या काही कविता वाचल्या. मैत्रिणींना काही कविता आठवल्या. त्या डायरीत लिहून घेतल्या….  तो दिवस कवितांचा झाला अनपेक्षितपणे खूप आनंद देऊन गेला.

हिणाबाई एका कवितेत म्हणतात …. 

माझं सुख माझं सुख 

हंड्या झुंबर टांगलं 

माझं दुःख माझं दुःख

तयघरात कोंडलं ….. 

त्यानंतर खूप दिवसानंतरच्या एका पानावर होत …. 

“ माय जॉय इस पब्लिक प्राॅपर्टी बिटवीन मॅन अँड मॅन 

माय पेन इज प्रायव्हेट प्रॉपर्टी 

बिटवीन गाॅड अॅन्ड मी …. “

या ओळी कोणाच्या आहेत  हे मी  लिहिलेलं नाही .कुठून पाहून लिहिल्या हेही मला आठवत नाही.

पण जगाच्या दोन टोकाला राहणाऱ्या लेखकांच्या  विचारांमधला आशय किती मिळता जुळता आहे हे वाचून आश्चर्य वाटलं. 

आपल्या साध्या सुध्या बहिणाबाई विषयी आदर दाटून आला…

“ हु मुव्हड माय चीज “ ह्या पुस्तकाचं मराठीतील थोडंसं स्वैर भाषांतर मध्यंतरी मी वाचले होते. त्यातली काही वाक्य डायरीतल्या एका पानावर आहेत.

बदल घडतात

बदलाचा अंदाज घ्या 

बदलावर लक्ष ठेवा 

बदलाचा आनंद  घ्या

बदलाला तयार व्हा

हे वाचताना मी विचार करायला लागले… त्या पुस्तकातले अजून काही काही मला आठवायला लागले.

मनात आले रोजच्या जीवनात हे किती उपयुक्त आहे.

जे कृष्णमूर्ती, वामनराव पै, गोंदवलेकर महाराज, विनोबा भावे, निसर्ग दत्त महाराज यांची व अजूनही बऱ्याच जणांची सुंदर सुंदर वचने डायरीत मी कुठे कुठे लिहिली आहेत.

.. मनाला आधार देणारी उभारी देणारी अशी कित्येक वाक्य या डायरीमुळे आज हाताशी आहेत.

ही एकदा वाचून उपयोग नाही. ती वारंवार वाचली तरच मनात खोल शिरून तिचा परिणाम होईल .

अशी अर्थगर्भ अशी ती वाक्य आहेत…  अर्थात त्याचा रोजच्या  व्यवहारात उपयोग करून घेतला पाहिजे हे  पण समजते आहे.

डायरीत काही अभंग ,गौळणी, गाणी आहेत … 

पावनेर मायेला करू…. .  

सुखी नांदते संसारी बाई 

नाही मागणं आणि काही

काळी पोत ही जन्माची देई

तूच सांभाळ आई लेकरू…

या ओळी वाचताना डोळे भरून येतात… मन कातर हळवं होतं..

एके दिवशी गंमत झाली होती.  मी त्या दिवशी रागवले होते ..रुसले होते… कुणाला काही सांगावं कुणाशी काही बोलावं असं वाटत नव्हतं.

…  नंतर मीच माझ्याशी बोलले होते.. स्वसंवाद साधला होता .स्वतःची समजूत काढून सावरले होते. आज डायरी चाळताना ते मला आठवले… त्या दिवशी डायरीत होतं . 

चालायचंच 

जाऊ दे 

सोडून दे ना

टेक ईट ईझी 

….  आज हे वाचताना मस्त वाटलं…

सांकेतिक पण मला कळणारी अशी बरीच वाक्य डायरीत आहेत.. एका पानावर होतं

‘मी शहाणी कधी होईन..’ 

त्या दिवशी मी केलेला वेडेपणा

अहं..नाही हं तो नाही सांगणार…

त्या दिवशी खरंच माझ्या हातून चूक झाली होती. ती मला कळली होती त्यातून मी धडा घेणार होते. शिकणार होते . ती चूक  परत होऊ नये म्हणून दक्षता घेणार होते.

पुढे लिहिलं होतं …. 

भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर….

या क्षणी डायरी वाचताना मीही क्षणभर थांबले…

वर्षभर जसं वागले त्याचा थोडाफार ताळेबंद या डायरीत आहे .डायरीमुळे मी माझ्या मागच्या दिवसांकडे वळून बघू शकते आहे.

डायरी वाचताना आठवली ती खूप वर्षापूर्वीची कॉलेजची रंगीबेरंगी डायरी …त्यात शेर शायरी, हिंदी  मराठी गाणी, कादंबरीतले उतारे आणि बरंच काही होतं …

शेवटच्या पानावर तर काय काय होतं…

बहरण्याचे ..खुळावण्याचे… फुलण्याचे… ते दिवस होते….  ती डायरी वेगळीच होती. लग्नानंतर ती माहेरी राहिली… परत कधीतरी आणली आणि वाढणाऱ्या संसाराच्या पसाऱ्यात कधी आणि कुठे हरवली कळलच नाही ….

संसारात मी पण पार बुडून गेले. आता आयुष्याला थोडा निवांतपणा आला आहे.म्हणून डायरी लिहायला वेळ मिळत आहे. 

नंतर पुढच्या डायऱ्या थोड्या प्रौढ प्रगल्भ झाल्या आहेत… माझ्यासारख्या कदाचित…

नंतरच्या एका डायरीत असं लिहिलं आहे की..

“तुम्हाला असं मनात कितीदा वाटलं की मी फक्त एवढे बोललो असतो तर…….

हो हो  सगळे पटते.. पण पटतही नाही … असं कसं होऊ शकतं…  चलता है…

ही वाक्य आत्मनिरीक्षण करायला लावणारी आहेत. सहज सोपी शिकवण देणारी आहेत.

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे…

डायरीत खूप काही जमा झालं आहे. दोन-चार मैत्रिणींनाही हा नाद लागला आहे..

माझे  काय ..  तुझ्याजवळ काय याची चौकशी होत आहे..

एकमेकींना नवीन काही वाचून दाखवलं जात आहे..

तुमचं काय…

 तुम्हाला हा प्रयोग करावासा वाटतोय का ?

करून बघा ना …. काय हरकत आहे…

कदाचित तुमची डायरी पुढच्या वर्षी तुम्ही मला दाखवाल …

तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल… 

आपल्या दुसऱ्या मैत्रिणींनी अजून काही लिहिलं असेल..

 सगळ्यांचा मिळून एक  छानसा खजिना तयार होईल ..

घ्यायचा आहे का नवीन अनुभव.. करायची का सुरुवात..

आजकाल आपण हाताने फार  कमीच लिहितो…. मोबाईलवरपण बोलून टाईप होत…

लिहायला विसरत चाललो आहोत का?

पण एक सांगू का .. लिहून बघा.

आपण स्वतः लिहिले की शब्द लक्षात राहतात… आणि त्याचे अर्थ पण…

हे लिहिणं निखळ आनंद देतं…. असं लिखाण आपलं आपल्याला समृद्ध करतं …शहाणं करतं..

ही डायरी आता नुसती डायरी नाही राहिली… ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय…

तिच्याशी मी कधीही बोलू शकते…..  जिला मी मनातलं काही सांगू शकते …  अगदी कधीही ..

अशी ही डायरी माझी सखी झाली आहे… मैत्रीण झाली आहे…

बघा प्रयोग करून ….. तुम्हालाही तुमच्यातलं काहीतरी नवीन गवसेल….

आयुष्यभर पुरणारं ….साथ देणारं….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments