मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-……”माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही.ते विरुनही जाऊ शकतात.तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे.”

अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं पण गुंता अधिकच वाढला.)

” मे आय कम इन सर?”

“ये अश्विनी.हॅव अ सीट”

“सर,तुम्ही बोलावलं होतंत?”

“हो.हे तुझं ऑफर लेटर. ही अॅकनॉलेजमेंट कॉपी साईन कर प्लीज”

सही करतानाही अश्विनी अस्वस्थच होती.

“तुला आनंद नाही झाला?”

“नाही तसं नाही सर पण ही असाइनमेंट स्वीकारावी की नाही याचा मी विचार करतेय.”

“का? काही प्रॉब्लेम?”

अश्विनी क्षणभर विचारात पडली. मग कसेबसे शब्द जुळवू लागली.

“सर, मला वाटतं, अगदी मनापासून वाटतं की समीर इस द राईट पर्सन फोर धीस पोस्ट.नॉट आय.”

“या पोस्टला कोण योग्य आहे हे ठरवायचा अधिकार माझा आहे अश्विनी. आणि ऑफर स्वीकारायची की नाही हे ठरवण्याचा तुझा. पण एक गोष्ट मीच सांगायला हवी म्हणून सांगतो.नीट लक्ष देऊन ऐक. या क्षणी तू कुणासाठी तरी सॅक्रिफाइस करण्याच्या विचारात आहेस.जरूर कर.पण ज्याच्यासाठी तू हा सॅक्रिफाइस करणार आहेस त्यासाठी ती व्यक्ती योग्य आहे कां हेही एकदा तपासून बघ. तुझा एक्सेप्टन्स द्यायला तीन दिवसांची मुदत आहे.तेव्हा विचारपूर्वक निर्णय घे”

सौरभ खरा कोणता हेच अश्विनीला समजेना. हा समोरचा की अभी,समीरच्या मनातला? आणि समीर तरी ? मित्र आहे तो आपला. इतकी वर्षे आपण त्याला ओळखतो. आणि तरीही सरांनी त्याच्याबद्दल असा संशय का बरं व्यक्त करावा?

समीर, अभी आणि सौरभ ! वेगवेगळे मुखवटे घातलेला तिघांचा चेहरा आपल्याला सारखाच का भासतोय अश्विनीला समजेचना.आणि तिला संभ्रमातही  रहायचं नव्हतं. विचारांच्या गुंत्यात अडकून पडायला तिच्याकडे वेळ होताच कुठे ? ‘बोलले तर आत्ताच, नाही तर कधीच नाही.’ तिने विचार केला.

“थँक्स सर.माझा निर्णय तुम्हाला योग्य वेळेत मी नक्कीच कळवेन.पण त्यापूर्वी केवळ उत्सुकता म्हणून स्वतःच्या समाधानासाठी एक गोष्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायचीय”

“कोणती गोष्ट?”

” या पोस्टसाठी समीर माझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना तुम्ही मलाच कां प्रेफर केलंत?”अश्विनीच्या नजरेला आणि शब्दांनाही विलक्षण धार होती.सौरभने चमकून तिच्याकडे पाहिलं.

“तुला काय वाटतं? मी तुला कां प्रेफर केलं असेल?”  त्याने गंभीरपणे विचारलं.

“तेच तर मी तुम्हाला विचारतेय सर”

आता उत्तर देण्यावाचून गत्यंतर नाही हे सौरभला जाणवलं. त्याने आपली नजरेची, शब्दांची सगळीच शस्त्रे म्यान केली. तो स्वतःशीच हसला.

“आय एम अॅन्सरेबल टू माय बॉस आय नो .आय ॲम अॅन्सरेबल टू माय सबॉर्डिनेटस् आॅल्सो आय डिडन्ट नो. तुला कदाचित माहीत नसेल, पण हाच प्रश्न काल मला समीरनेही विचारला होता.”

“समीरने..?” तिने अविश्वासाने विचारलं.

“हो. आई आजारी असूनही समीर काल इतक्या तातडीने इकडे कां आला होता असं तुला वाटतं?”

“कां म्हणजे? नेक्स्ट वीक तुम्ही स्टेटस् ला जाणार आहात म्हणून भेटायला आला होता तो तुम्हाला “

“इज इट?” सौरभ तिची किंव केल्यासारखा हसला. “तो आला होता तुझं प्रमोशन थोपवायची मला गळ घालायला. “

“सर..?” अश्विनी अविश्वासाने पहातच राहिली.

“हे प्रमोशन त्यालाच मिळणार हे त्याने गृहीतच धरलं होतं. त्याचा मित्र म्हणून त्याने मलाही गृहीत धरलं असावं. तुझ्या प्रमोशनची न्यूज त्याला समजली आणि तो बिथरला. खूप गळ घातली त्याने मला. बट अॅज अ चेअरपर्सन आय स्टीक्ड् अप टू माय डिसिजन “

संतापातिरेकाने अश्विनीचे डोळे भरून आले.

“रहाता राहिला प्रश्न मी तुला प्रेफर कां केलं हा.आज तू हा प्रश्न शांतपणे विचारलास. काल समीरने हाच प्रश्न मला चिडून-संतापून विचारला होता. तुला इम्प्रेस करायला मी त्याला डावललं असा त्याने माझ्यावर आरोप केलान. ‘ओपन सेशनमध्ये हाच आरोप तू माझ्यावर कर, मी तिथं सर्वांसमक्षच या आरोपाला उत्तर देईन ‘ असं बजावून मी त्याला इथून हाकलून दिलं. माझा स्वतःवरचा ताबाच गेला होता. पण आज तसं होणार नाही. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे अश्विनी. समीर माझा मित्र आहे.तो मला आवडायचा. मित्र म्हणून आणि हुशार न्  सिन्सिअर म्हणूनही. तो खरंच बेस्ट परफॉर्मर होता. पण तुझा परफॉर्मन्सही कमी प्रतीचा नव्हता. तूही हुशार होतीस. तू सुद्धा त्याच्या इतकीच सिन्सिअर होतीस. प्रमोशनचा विचार करायचा तर तुम्ही दोघेही समान पातळीवर होतात. बैठकीतला मित्र म्हणून कोणीही समीरलाच वेटेज दिलं असतं,बट आय डिडण्ट डू दॅट.मी ते वेटेज तुला दिलं. समीरचा आरोप आहे की एक स्त्री म्हणून तुला इंप्रेस करण्यासाठी मी हे केलं.असं कुणाला इम्प्रेस करायला अशा कुबड्यांची मला गरज नाही. पण तरीही एक स्त्री म्हणून मी तुला प्रेफर केलं हे मात्र खरं आहे. कारण एक स्त्री असूनही तू स्पर्धेत कुठेही कमी पडलेली नाहीयस.तू त्याच्याच तोडीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड केलायस हे मला मोलाचं वाटलं. तुला त्यासाठी माझ्यासारख्या बाॅसवर इंप्रेशन मारायची गरज वाटली नाही. स्त्रीत्त्वाच्या बुरख्याआड लपून तू कधी माझ्याकडून कसली कन्सेशन्स उकळली नाहीस. समीरला फक्त ऑफिसमधे वर्कलोड होतं आणि तुला मात्र ऑफिस आणि घर या दोन्ही आघाड्यांवर.ती सगळी शारीरिक, मानसिक,भावनिक कुतरओढ मॅनेज करून तू त्याच्या तोडीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड केलास त्याचा एक ग्रेस मार्क मी तुला दिला. बस्स..बाकी कांही नाही.एक रिस्पॉन्सिबल टीम लीडर म्हणून मी हेच करायला हवं होतं ना अश्विनी ?” अश्विनी थक्क होऊन ऐकत राहिली. ‘सौरभ सरांचा हा असा ऍप्रोच खूप रेअर आहे आणि माझ्यासाठी एंकरेजींग सुद्धा.’ तिला मनापासून वाटलं.तिला सौरभसर या क्षणी खूप मोठे वाटले.

“हे सगळं माझं शहाणपण नाहीये अश्विनी.मी माझ्या आईकडे पाहून हे शिकलो.शी वाॅज विडो अॅंड वर्किंग वुमन टू. जिद्दीनं करियर करणाऱ्या मुलींना पाहिलं की मला तेव्हाची ती आणि तिची घुसमट आठवते. म्हणून असेल माझे निर्णय कधीच चुकत नाहीत.” तो स्वतःतच हरवला….!

“थँक्स सर. अॅंड साॅरी फाॅर एवरीथिंग”

“आणखी एक. बोललो, ते स्वतःजवळच ठेव.त्याची चर्चा नको. आणखी एक. समीरला झटकून टाकू नकोस प्लीज.जस्ट फरगीव अॅंड एंकरेज हिम. या मनस्थितीत त्याला तुझ्या सॅक्रिफाईसची नाही तर सपोर्टची गरज आहे “

ती विचारात पडली. पण विचार करायला तिला वेळच मिळाला नाही. कारण केबिनबाहेर समीर तिचीच वाट पहात उभा होता. त्याला पाहिलं आणि एक विलक्षण कोरडेपण अश्विनीच्या मनात भरून राहिलं.पण तिनं जाणीवपूर्वक स्वतःला सावरलं.

“हाय समीर” ती हसली.

” हाय ” समीरच्या जीव भांड्यात पडला.

” चल, चहा घेऊया.” ती आग्रहाने म्हणाली. त्याला तेच हवं होतं.

“आज आलं अरे प्रमोशन लेटर. सौरभसरांनी त्यासाठीच तर बोलावलं होतं.” ती उसन्या उत्साहाने सांगू लागली.

“तू काल बोललीस अभिशी?”

” हो”

“काय म्हणाला तो?”

” हा तुझा प्रश्न आहे.तो तू सोडव असं म्हणाला.तू माझ्यासारखी आणि समीरसारखी अॅंबिशिअस असशील तर प्रमोशन घे आणि नसशील तर सोडून दे असं म्हणाला “

” मग? तू काय ठरवलंयस”

“मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ठरवलंय”

“थँक्स अश्विनी.”

“हो, पण ते माझ्या पद्धतीने “

” म्हणजे?”

“सांगते.पण त्या आधी नीट विचार करुन तू मला अगदी खरं सांग.तुझ्या समोरचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?”

“काल मी सगळं सविस्तर सांगितलंय ना तुला?”

” तेवढंच की आणखीही काही?” तो गप्प. मग थोडी वाट पाहून तीच बोलू लागली,

“आईच्या ट्रीटमेंटचा अवाढव्य खर्च..एवढंच ना?”

“हो”

“देन डोन्ट वरी. समीर, तुझी आई मलाही कुणी परकी नाहीये. आय ऑल्सो ओ समथिंग टू हर फाॅर लव्हिंग ट्रीटमेंट शी गेव्ह मी इन अवर कॉलेज डेज.सोs मी माझा शब्द नक्की पाळेन.त्यांच्या संपूर्ण ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन. आय प्रॉमिस”

“भिक घालणारायस मला?  भिकारी आहे कां मी ? ” समीर संतापाने बेभान होत ओरडला. अश्विनी शांतपणे त्याला न्याहाळत राहिली.

“समीर,प्लीज. शांत हो. तू तुझा म्हणून जो प्रॉब्लेम सांगितलायस तो सोडवायचा हाच एक योग्य मार्ग आहे असं मला वाटतं. खरा प्रॉब्लेम आणखी काही वेगळा असेल तर मोकळेपणाने बोल माझ्याशी.मी तोही सोडवेन. तू आईच्या आजारानं खचलायस कीं अपेक्षेप्रमाणे तुला प्रमोशन न मिळता ते मला मिळालं म्हणून दुखावलायस? तुझं ते दुःख हलकं करायला माझं प्रमोशन रिफ्यूज करून ते मी तुला मिळवून द्यावं अशी अपेक्षा आहे का तुझी? तसं असेल तर आज तुझ्याऐवजी अभि माझ्याशी असं वागला असता तर मी त्याला जे सांगितलं असतं तेच तुला सांगते. होs,मी तुझ्यासाठी प्रमोशन रिफ्यूज करेन. तुझं दुःख तुला हवं त्या पद्धतीने हलकं करेन.पण एका  अटीवर.अटच म्हणशील तर अगदी साधी आहे. माझ्या फक्त एका प्रश्नाचं मला पटेल असं उत्तर तुला द्यावं लागेल. प्रश्नही अगदी साधा आहे. समीर, तुझी अॅंबिशन आणि माझी अॅंबिशन अशी तफावत कां करावीशी वाटली  तुला? विचार करून अगदी खरं सांग. तुला स्वत्त्वातला ‘स्व’ जपायचाय की स्वार्थातला ‘स्व’ हे तरी समजू दे मला.सौरभसरांनी निर्णयासाठी मला तीन दिवस दिलेत. मी  वाट पाहीन मी विचारलेल्या प्रश्नाच्या तुझ्या खऱ्या उत्तराची!”

समीर दिङमूढ होऊन ऐकत होता. हव्यासाच्या निसरड्या वाटेवर हरवू पहाणारा त्याचा ‘आतला आवाज’ क्षीणपणे कण्हतोय असं जाणवताच तो दचकून भानावर आला. पण… अश्विनी तिथे नव्हतीच. ती केव्हाच निघून गेली होती..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-इथे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियरची पोस्ट क्रिएट होणाराय हे सौरभनं मला पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स चांगले होते.टीमलिडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहित धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी.पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळे…” बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पाहत राहिली.)

“….. तुला माहित आहे अश्विनी, माझ्या दादा-वहिनीनी स्वतः काटकसरीत राहून माझं शिक्षण केलेय. बाबा हयात नसल्याची उणीव दोघांनीही मला कधीच भासून दिली नव्हती.पण मग माझं म्हणून कांही कर्तव्य आहेच ना? अगं,इथं आग्रहानं मला माझ्यासाठी फ्लॅट बुक करायला लावताना सुरुवातीच्या रकमेची मदत दादाने स्वतः कर्ज काढून केलीय. स्वतः मात्र अजून ते सर्वजण भाड्याच्या तुटपुंज्या घरातच रहात आहेत. या अशा परिस्थितीत आईच्या ट्रीटमेंटचा खर्च ते कुठून करणार ? कांहीही झालं तरी तो मीच करायला हवा ना? या क्षणी तू मघाशी म्हणालीस तसं ‘ हे प्रमोशन इज अ रुटीन मॅटर फाॅर यू. ‘ पण माझ्यासाठी ते तसं नाहीय.ती आज माझी निकडीची गरज आहे. प्रमोशन नंतरच्या हायर पॅकेजमधून मी आईच्या ट्रीटमेंटचा खर्च भागवू शकेन. आणि म्हणूनच खूप आॅकवर्ड वाटत असूनही मी तुला ही रिक्वेस्ट करतोय.आणि तसंही माझ्या प्रमोशननंतर तू माझ्या टीममधेच असशील आणि त्यामुळे तुमच्या संसारातल्या अडचणींसाठी तुला लागणारी कन्सेशनस् मी तुला सहजपणे देऊ शकेन.सो इट्स अ प्रॅक्टिकल डील फाॅर यू ऑल्सो..”

समीरचं सगळंच बोलणं कन्व्हिन्सिंग होतं पण शेवटच्या ‘डील’ या शब्दातली लालूच अश्विनीला रूचणारी नव्हती.

“तू हे सौरभसरांना बोललायस सगळं?”

“त्याचा काय संबंध?” समीर उखडलाच.”प्रमोशन स्वीकारणारी किंवा नाकारणारी तूच आहेस ना? सौरभला विचारण्याचा प्रश्न येतोच कुठं? सेकंड प्रायाॅरिटीवर माझंच नांव आहे हे सौरभनंच मला सांगितलंय. सो यू नीड नाॅट वरी फाॅर दॅट..”

समीरचं बोलणं खटकलं तरी अश्विनी शांत राहिली.या परिस्थितीत समीरच्या मन:स्थितीचा विचार करता त्याला सगळं माफ होतं तिच्या दृष्टीनं.ती गप्प बसलेली पाहून समीर बावचळला.

“अश्विनी,माझ्या या व्यक्तिगत अडचणीत तू आणि अभिखेरीज मला कुणाचेही उपकार नकोयत. होय. अगदी सौरभचेसुद्धा.ही इज एक बीग फ्रॉड…!”

” शट अप समीर. तू काय बोलतोयस समजतंय कां तुला?”

“होs मी खरं तेच बोलतोय. मी चांगलाच ओळखून आहे त्याला. तू एरवी दाद देत नाहीस ना म्हणून तुला पटवायला हे प्रमोशनचं गाजर त्यानं तुझ्या पारड्यात टाकलंय. तू सरळ स्वभावाची आहेस गं, पण सगळं जग तसं नसतं हे लक्षात ठेव..”

“बास समीर. इनफ. सौरभ सर काय विचार करत असतील ते त्यांचं त्यांच्याबरोबर. पण निदान हे मला ऐकवताना तरी तू दहादा विचार करायला हवा होतास. हे सगळं बोलून तू माझाही अपमान केलायस समीर..” अश्विनीचे डोळे भरूनच आले एकदम.

“हे बघ अश्विनी, तू शांत हो. माझी गरज म्हणून मी तुला प्रमोशन नाकारायची गळ घातली होती. मला गरज नसती तरीही सौरभबद्दल मी हे तुला सांगितलंच असतं. एक मित्र म्हणून तुला जागं करणं हे माझं कर्तव्यच होतं. प्रमोशन नाकारणं किंवा स्वीकारणं हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल अश्विनी. आणि तो मला मान्य करावाच लागेल. तुझं सहकार्य असो किंवा नसो यापुढची माझी लढाई मलाच लढावी लागेल आणि मी ती अखेरपर्यंत लढेन. मी हार मानणार नाही हे नक्की.”

तो बोलला आणि ताडकन् उठून निघून गेला. अश्विनी सून्न होऊन बसून राहिली कितीतरी वेळ.तिला कुणाचा तरी आधार हवा होता… आणि त्यासाठी तिचं वेड मन अर्थातच अभिकडे धाव घेत होतं…..!

————

“अभिs…”

” हं “

“ऐक ना. आज समीर म्हणत होता….”

टीव्हीवरुन लक्ष काढून घेत अभि तिच्याकडे पहात राहिला.

“काय म्हणालीस?”

“तू टीव्ही म्यूट कर बघू आधी. मला शांतपणाने बोलायचंय तुझ्याशी.”

“ठीक आहे.बोल.”

“मी काय करू रे प्रमोशनचं?”

“कमाल आहे. हे तू मला का विचारतेस? तुला झेपणार नाही असं वाटतंय कां? तसं असेल तर घेऊ नकोस ना..”

अश्विनी उघडलीच एकदम.

“न झोपायला काय झालं? पण…समीर..”

“समीरचं काय?”

“त्याने त्याच्या फिनान्शियल प्रॉब्लेमसाठी मला प्रमोशन रिफ्यूज करायची गळ घातलीय. आणि…”

“आय नो.समीर बोललाय माझ्याशी”

“तुझ्याशी ? कधी ?”

“दुपारी तुमचं बोलणं झालं त्यानंतर लगेच त्याचा फोन आला होता”

अश्विनी सावध झाली.

“आणखी काय सांगितलंय त्यानं ?”

” आणखी काहीच नाही. हे एवढंच. खरंतर मीही तेव्हा खूप बिझी होतो. तसं त्याला सांगितलं तर म्हणाला,अश्विनी तुझ्याशी बोलेल सगळं. आणि तिने प्रमोशन रिफ्यूज नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही दोघं माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका असं म्हणाला.”

“अभि, मला खरंच वाटतंय, त्यानंं कधी नव्हे ते माझ्याकडे कांही मागितलं आणि मी नाही म्हंटलं असं नको ना व्हायला ?अभि, माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस?”

अभि हसलाच एकदम. आणि एकाएकी गंभीर झाला.

“तुझ्या जागी मी असतो तर समीरनं मला हे असं विचारलंच नसतं “

“कां?”

“कां काय? कारण त्याच्या इतकाच मीही अॅंबिशिअस आहे हे त्याला ठाऊक आहे”

“आणि मी ? मी नाहीये?”

“आहेस ना? मग विचारात कां पडलीयस? निर्णय घे आणि मोकळी हो.”

“हो.मला निर्णय घ्यावाच लागेल. पण तूही त्यासाठी मदत कर ना मला. तू या प्रश्नापासून इतका अलिप्त कां रहातोयस?”

अश्विनी काकुळतीनं म्हणाली. अभिने तिला थोपटलं. तिने मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं.

“अश्विनी, हा प्रश्न तुझा आहे. तो तूच सोडवायला हवा “

“अभि…?तू..तू बोलतोयस हे? अरे, आपल्या संसारात असा एखादा प्रश्न फक्त माझा किंवा तुझा असूच कसा शकतो? तो आपलाच असायला हवा ना ? “

अभि स्वतःशीच हसला.

“बरोबर आहे तुझं. पण हा प्रश्न आपल्या संसारातला नाहीये. तो तुझ्या ऑफिसमधला आणि फक्त तुझ्याशीच संबंधित आहे. आणि म्हणूनच त्याचे उत्तरही तूच शोधायला हवं असं मला वाटतं”

त्या एका क्षणापुरतं का होईना तिला वाटलं,अभिनं आपल्याला एकटं सोडलंय. दुसर्‍याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती जागची उठली.

“अश्विनी..”ती थबकली. तिचे डोळे भरून आले एकदम.

“बैस अशी” तो गंभीर होता. अलगद डोळे पुसत ती अंग चोरून बसली.

“तू कधी विचार केलायस?…म्हणजे या प्रमोशनसाठी सौरभने तुलाच एवढं स्ट्राॅंग रेकमेंड का केलं असावं याचा?”

“हे असे प्रश्न तुला आणि समीरलाच पडू शकतात.मला नाही. कारण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे‌”

“प्रश्न विश्वासाचा नाहीये. विश्वास तर माझाही तुझ्यावर आहेच. पण मला सांग, समीर तुझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना आणि तो सौरभचा खास मित्र असतानाही समीरला डावलून त्यानं तुलाच रेकमेंड करावं याचं आश्चर्य नाही वाटत तुला?”

“तुला नेमकं काय म्हणायचंय अभि?”

“मला काहीच म्हणायचं नाहीये.तुझ्या समोरच्या प्रश्‍नाचा तू एकांगी विचार करतेयस. म्हणून प्रत्येक प्रश्नाला इतरही अनेक कंगोरे असू शकतात हे फक्त तुला सुचवावं असं वाटतं.”

“सौरभ सर तसे नाहीयेत अभि.इतके दिवस मी त्यांच्याबरोबर काम करतेय. ही बीहेव्ज व्हेरी डीसेंटली”

“मे बी यू आर ट्रू. कॅन बी अदरवाइज आॅल्सो. डिसेन्सी ही एखाद्याची बिव्हेविंग-स्ट्रॅटेजीही असू शकते. माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही. ते विरूनही जाऊ शकतात. तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे. तेव्हा तुझी गृहितं तू एकदा नीट तपासून बघ. तरच पुढची गणितं बरोबर येतील.”

अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं. पण गुंता अधिकच वाढला. 

क्रमशः……

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अभि, समीर आणि अश्विनी कॉलेजपासूनचे खास मित्र. कॅम्पसमधून तिघेही कॅंम्बेमधे सिलेक्ट झाले आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या करियर मधे त्यांनी पहिले पाऊल टाकले.

अभि आणि अश्विनी मनानं खूप जवळ असल्याचं परस्परांना जाणवत होतंच पण त्यांच्या ‘आणाभाका’ झाल्या त्या पुण्यात ते एकाच कंपनीत जॉईन झाल्यानंतरच.

सौरभ हा या सर्वांचा कॅंम्बे मधला बॉस. त्यांच्यापेक्षा वयाने थोडासाच सीनियर पण तसा बरोबरीचाच. हसरा, तरतरीत, मनमोकळा आणि प्रसन्न ! सौरभ म्हणजे सुगंध. त्याच्या नावातच जसा सुगंध होता तसा तो त्याच्या व्यक्तिमत्त्वातही भरून राहिलेला होता.समीरचा तो खास मित्र झाला. पण अभिला मात्र तो फ्लर्ट वाटायचा. ऑफिसमधे मुलींबरोबरची त्याची उठबस अभिला वेगळी वाटायची. पण स्वतःचं हे मत त्याने कुठंच व्यक्त केलेलं नव्हतं. अश्विनी मात्र या सगळ्यापासून चार हात दूरच असायची.

समीर अजून सडाफटिंगच होता आणि कदाचित त्यामुळेच होमसिकसुद्धा.सौरभ बरोबरच्या ड्रिंक पार्टीजचा अपवाद वगळता बहुतेक विकेंडसना तो घरी पळायचाच.

अभि-अश्विनीचं लग्न ठरलं आणि अभिने कॅम्बेतून एक्झिट घेऊन बेटर प्राॅस्पेक्ट्स् साठी कॉग्निझंट जॉईन केली. त्यावेळी समीर,अश्विनीलाही तो ऑप्शन होताच पण अश्विनी धरसोड वृत्तीची नव्हती. त्यामुळे ती तिथेच राहिली.समीरची मात्र थोडी चलबिचल सुरू होती. पण अखेर ‘कॅम्बे सोडण्यापेक्षा सौरभला सोडून येणं माझ्या जीवावर येतंय यार..’ असं म्हणत तोही तिथेच राहिला. आणि ते खरंही होतं. त्याची आणि सौरभची छान मैत्री जमली होती. आणि प्रोजेक्टस् डेव्हलपमेंटच्या दरम्यान त्यांचं ट्युनिंगही चांगलं जमायचं.

एका वीकेंडला गावी गेलेला समीर सोमवारी नेहमीसारखं परत येणं अपेक्षित होतं. पण ऑफिसला निघण्याच्या तयारीच्या गडबडीत असताना अश्विनीला त्याचा मेसेज आला.

‘डिटेन्ट फॉर इमर्जन्सी मॅटर. कमींग ऑन वेनस्डे.प्लीज इन्फाॅर्म सौरभ’ हा त्याचा निरोप द्यायला अश्विनी सौरभच्या केबिनमधे गेली तेव्हा सौरभला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या क्षणी तो तिलाच बोलवून घ्यायचा विचार करीत होता. नेहमीप्रमाणे प्रसन्न हसत त्याने अश्विनीला हे सांगितलं तेव्हा अश्विनीही गोंधळून गेली क्षणभर.

“का? काही महत्त्वाची असाइनमेंट आहे कां?” तिने विचारलं.

“नाही “तो म्हणाला,” पण एक खास गुड न्यूज आहे तुझ्यासाठी.या स्टेजला स्ट्रीक्टली कॉन्फिडन्शीअल पण लवकरच ऑफिशियल डिक्लेअर होईल.”

न्यूज तिच्या प्रमोशनची होती ! ऐकताच क्षणी अश्विनीला आनंदाश्‍चर्याचा सुखद धक्का बसला खरा पण सौरभसमोर मात्र अश्विनीने तो क्षण खूप शांतपणे स्वीकारला. घरी आली ते या आनंदलहरींवर तरंगतच. इतका वेळ हा आनंद अभिशी शेअर करायचा मोह तिने आवरला होता. पण आता मात्र तिला रहावेना. पर्समधून गडबडीने ती मोबाईल काढणार एवढ्यात डायल टोन सुरू झाला. हा अभिचाच असणार असं मनाशी म्हणत तिने उत्साहाने नंबर पाहिला तर तो अभिचा नव्हता. समीरचा होता. तरीही तिचा विरस झाला नाही कारण ही गुड न्यूज आवर्जून शेअर करावी एवढा समीर खास मित्र होताच की.

“हाय समीर” ती म्हणाली. पण तिकडून मिळालेला समीरचा रिस्पॉन्स तिला कांहीसा गंभीर वाटला. त्याचा आवाज थोडा भरून आल्यासारखा जाणवला.

“समीर, काय झालं रे? तब्येत बरी आहे ना ?”

“हो.माझी बरी आहे.. पण आई… ” त्याला पुढे बोलवेचना.

“आईचं काय ? काय झालंय त्यांना.. बोल ना समीर “

तो कसंबसं बोलू लागला पण त्याने सांगितलं ते ऐकता ऐकता अश्विनीच अस्वस्थ झाली. तिच्या घशाशी हुंदका दाटून आला. तिने तो महत्प्रयासाने आवरला. स्वतःला सावरलं. पण समीरला मात्र आपला भावनावेग थोपवता येईना.

” समीर, हे काय लहान मुलासारखं ?सावर स्वतःला.हे बघ आईंना सांभाळ.त्यांना तू धीर देशील की स्वतःच खचून जाशील ? होईल अरे सगळं व्यवस्थित. आणखी एक.रहावत नाहीय म्हणून सांगते. अभि आणि मी दोघेही आहोत तुझ्याबरोबर. कसलीही मदत लागली तर कळव नक्की.तू खचून जाऊ नकोस. ओके? अरे,प्रोजेक्टची कसली काळजी करतोस? आम्ही सर्वजण मिळून करू मॅनेज.डोन्ट वरी. टेक केअर.”

सगळं ऐकलं आणि अश्विनीचा मूडच गेला एकदम. क्षणापूर्वीचा मनातला आनंद पाऱ्यासारखा उडून गेला.तिला कॉलेजचे दिवस आठवले. मोकळ्या वेळेत कॉलेजपासून जवळचं घर म्हणून सर्वांचा राबता समीरच्या घरीच असायचा.तिला तेव्हाची समीरची आई आठवली.या साऱ्यांची ऊठबस ती किती उत्साहाने करायची. त्यांच्या वयाची होऊन त्यांच्या हास्यविनोदात रमून जायची. आणि आज हे असं अचानक?

अभिलाही ही बातमी ऐकून धक्काच बसला. त्याने लगोलग समीरला फोन केला.कितीतरी वेळ त्याच्याशी बोलत त्याला धीर देत राहिला. पण स्वतः मात्र स्वतःचीच आई संकटात असल्यासारखा हळवा होऊन गेला..!

तो आनंदाचं शिंपण करीत उगवलेला दिवस आनंद करपून गेल्यासारखा असा मावळला..!

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेल्या अश्विनीनं लिफ्टमधे पाऊल ठेवलं तर समोर समीर..!

” समीर,.. तू ? ” तो कसनुसा हसला.”  तू इथे कसा?आई कशा आहेत? ”  तो गंभीरच झाला एकदम.पण लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि शेकहॅंडसाठी हात पुढे केला.

“अश्विनी, काँग्रॅटस् “

“कशाबद्दल?”

मनाच्या या अस्वस्थतेत कालची गुड न्यूज ती पार विसरूनच गेली होती..!

” फाॅर गेटिंग प्रमोशन.यू डिझर्व इट अश्विनी”

अश्विनीला काय बोलावं समजेचना.तिला खरंतर हा विषय नकोसाच वाटू लागला.

“समीर,त्याचं काय एवढं?इटस् स्टील अ रूमर. मे बी रॉंग ऑल्सो.आणि तसंही इट् वोण्ट मेक एनी डिफरन्स फॉर मी”

” का?तुला नकोय प्रमोशन?”

“सहज मिळेल ते मला सगळं  हवंय.अट्टाहासाने कांहीच नकोय.एकच सांगते. या विषयाचा मला आत्ता त्रास होतोय. आत्ता या क्षणी आय ॲम वरीड फाॅर यू. आई कशा आहेत? डॉक्टर काय म्हणतायत?”

“टेस्ट रिपोर्टस् आज संध्याकाळी येतील. मगच लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरेल.”

“हो पण मग तू कां आलायस इथं? प्रोजेक्टची काळजी करू नको असं म्हटलं होतं ना मी?

“हो पण नेक्स्ट वीक सौरभ स्टेटस् ला चाललाय. पुन्हा लवकर भेटायचा नाही.म्हणून मग..”

“म्हणून आलायस इथं?डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तू.. तू जा बघू परत.”

“खरं सांगू अश्विनी? मी तिथं नाही थांबू शकत. म्हणून आलोय. आई काय गं.. शी इज ब्रेव्ह इनफ. बट आय अॅम नॉट. शिवाय तिथं दादा-वहिनी आहेतच. आईची ट्रीटमेंट मार्गी लागेपर्यंत मी इथंच कम्फर्टेबल असेन.” बोलला आणि तडक सौरभच्या केबिनच्या दिशेने निघून गेला. अश्विनीचे मग कामात लक्षच लागेना.

                  ————

” अश्विनी,चल.चहा घेऊ “

“आत्ता? इतक्या लवकर?”

” मला बोलायचंय तुझ्याशी‌. प्लीज “

त्याला नाही म्हणणं तिच्या जीवावर आलं. काही न बोलता ती जागची उठली.

समोरच्या वाफाळलेल्या चहाकडे समीरचं लक्षच नव्हतं. तो शून्यात नजर लावून कुठेतरी हरवून गेलेला होता.

” समीर…समीsर “

“अं ?..काय?” तो दचकून भानावर आला.

“बोल. काय झालं? काय म्हणाले सौरभ सर?”

“कशाबद्दल?”

“कशाबद्दल काय? त्यांना भेटायला गेला होतास ना तू? मग? काय म्हणाले ते? तुझ्या  रजेबद्दल त्यांना प्रॉब्लेम नाहीये ना कांही?”

“प्रॉब्लेम त्याला कां असेल?प्राॅब्लेम मलाच आहे.पर्सनल.”

“कसला प्रॉब्लेम?”

“अश्विनी, रागावणार नसशील तर एक विचारु?” 

“रागवायचं काय त्यात? विचार.”

“एक फेवर करशील माझ्यावर?”

“फेवर काय रे? वेडा आहेस का तू? मी करू शकेन असं कांहीही सांग. मी नक्की करेन “

“तू माझ्यासाठी तुझं प्रमोशन रिफ्यूज करशील?”

“त्याचं आत्ताच काय?”

“कां? मनात आणलं तर तूच करू शकशील असं नाहीये कां हे?”

“अरे, पण जे अजून ऑफरच झालेलं नाहीय ते रिफ्यूज करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि हे असं अचानक कसं काय आलं तुझ्या डोक्यांत?”

समीरला वाटलं होतं ती पटकन् हो म्हणेल. पण तसं झालं नव्हतं.आता हिला कां ते सांगायलाच हवं. तो कसेबसे शब्द जुळवत राहिला.

“तुला मी पूर्वी कधी बोललो नव्हतो अश्विनी.पण आज सांगतो. नवीन सुरू होणाऱ्या प्रोजेक्टस्साठी इथे ‘सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर’ ची पोस्ट क्रिएट होणाराय हे मला सौरभनं पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स् चांगले होते. टीम लीडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहीत धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी. पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळं……”

बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पहात राहिली…

क्रमशः……

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जमीन…! (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ जमीन…! (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

शहरातून जेव्हा जेव्हा नातवाचं पत्र येतं, तेव्हा आजी ते दाखवत गवभर फिरते. मग कधी तरी गुपचुप पोस्टात जाऊन मनीऑर्डर करून येते. तिला आपल्या नातवाबद्दल खूप गर्व आहे आणि का असाणार नाही? गावातून डॉक्टर होण्यासाठी शिकायला गेलेला तो एकमेव मुलगा होता.

मुलगा एम.बी.बी.एस. होईपर्यंत आजीची तीस एकर जमीन विकली गेली. ’आजी मी डॉक्टर झालो’ अशी चिठ्ठी जेव्हा आली. तेव्हा आजीला जसे पंख फुटले.  घरोघरी फिरत ती सांगत राहिली, ‘आता माझा नातू कधीही येईल आणि माला शहरात घेऊन जाईल.’ पण नातवाऐवजी, पोस्टमनच एक दिवस, एक पत्र घेऊन आला. ‘आपला नातू लग्न करतोय. त्यासाठी त्याने पैसे मागवले आहेत.’ पोस्टमनने पत्रातला मजकूर सांगितला. पत्राच्या उत्तरादाखल आजीने आपले घर विकून टाकले आणि ती धर्मशाळेत शिफ्ट झाली. म्हणू लागली ‘आता बायकोला घेऊन येईलच आणि मला गाठोड्यासारखं उचलून घेऊन जाईल.

नातू काही आला नाही, मात्र एक दिवस पुन्हा एक पत्र आलं. लिहीलं होतं, ’परदेशात जायचं आहे. त्यासाठी पैसे पाहिजेत. प्रत्येक चिठ्ठीचं उत्तर मानीऑर्डरने देणार्‍या आजीने, यावेळी पहिल्यांदाच पोस्टमनकडून लिहून पाठवलं, बेटा, सगळं विकून झालंय. आता विकण्यासारखा बाकी काही उरलेलं नाही.’ ती चिठ्ठी आणि आजचा दिवस यात दहा वर्षाचं अंतर आहे. लोक आजीला विचारतात, ‘आजी, नतवाची काही चिठ्ठी…’

आजी उत्तर देते, ‘नाही बेटा, नाही आली.’

‘का काय झालं?’

‘काही नाही रे, माझी जमीन कमी पडली!’

 

मूळ हिंदी  कथा – ‘जमीन ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.) इथून पुढे —–

घराचं कुलूप काढत होते तेवढ्यात समोरच्या श्रीवास्तवभाभी ने टोकले .(श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव मी नेमप्लेटवर वाचलेले होते.) “कहाँ होके आई?”- “घर मालिक के यहाँ.!”  माझ्या उत्तरावर ती खुदुखुदू हसू लागली. म्हणाली, “घरमालिक मतलब तुम्हारा हजबंड ! मकान मालिक कहो.”

अशा तऱ्हेने माझ्या बोलण्यातील गमती जमती दोन-तीन महिने तरी इतरांचे मनोरंजन करीत राहिल्या…. आणि मला कळलं की माझी ‘हिंदी’ पुस्तकी आहे… शब्द संख्या खूप मर्यादित आहे… त्यामुळे मला हिंदीवर खूप अभ्यास करावा लागेल.

हिंदीतलं वर्तमानपत्र (अखबार )वाचायला सुरुवात केली. मासिकं ,साप्ताहिकं यांचं वाचन सुरू झालं. पण खूपसे शब्द डोक्यावरूनच जायचे. बोलीभाषा तर मला चक्रावून टाकायची. एकदा तर जमादारनी (सफाई कर्मचारी) तिचा काहीतरी गैरसमज झाल्यानं माझ्याशी दबंगाई करून,  खेडवळ हिंदीत भांडू लागली. शेजारीपाजारी कोणीच दिसले नाही .भांडण आणि तेसुद्धा हिंदीतनं…बापरे मला काहीच सुचेना .बावीस वर्षाचं लहान वय. कधी अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं… मी घाबरून रडायलाच सुरुवात केली. नवऱ्याला साफ सांगून टाकलं.”इथं नाही राहणार मी. ह्या हिंदी लोकांपुढे माझा नाही टिकाव लागणार.”

हे शक्य नाही हे मलाही माहीत होतं. त्यामुळे मी हिंदीवर थोडं वर्चस्व मिळवायचा प्रयत्न करु लागले…आणि दोन महिन्यानंतर जेव्हा आमचा मुंबईला जाण्याचा योग आला, तेव्हा मी हिंदीतून मराठी आणि मराठीतून हिंदी असे शब्दकोष विकत घेतले. (ते अजूनही माझ्याकडे आहेत.)

माझं हिंदी वाचन जोरात सुरू झालं. दिल्ली पब्लिक लायब्ररीत नाव घातलं अन् तूर्तास नोकरी करणार नसल्याने मी घरची पी.आर्.ओ. व्हायचं ठरवलं ….आणि ओळखी-पाळखी वाढवायला सुरुवात केली. (रिझर्व रहाणं तसंही मला आवडायचं नाही.) शेजारीपाजारी , पार्कमध्ये, वाचनालयात सगळीकडेच. व मग संक्रांतीच्या हळदी कुंकवा साठी खूप जणींना बोलावून घेतलं … त्यामुळे हळूहळू सगळ्यांशी माझ्या गप्पा -शप्पा सुरू झाल्या. आणि मी ‘पुस्तकी’ हिंदी वरून ‘बोलचाल की हिन्दी’ वर पोहोचले. अन् मला हळूहळू पंजाबी, हरियाणवी ,राजस्थानी, बिहारी हिंदी सुद्धा समजू लागली. स्वतःला हम आणि समोरच्याला (आप नही) तुम म्हणत बोलणाऱ्या यूपीवाल्यांचा नखरा पण समजला.

त्या ‘आप’वरून एक मजेदार प्रसंगच घडला. वरच्या मजल्यावर राहणारी मिसेस कपूर मला तिच्या घराची किल्ली देऊन गेली होती. अर्ध्या तासात तिचा नवरा आल्यावर त्याला ती द्यायची होती. त्याप्रमाणे मिस्टर कपूर आले. “मिसेज़ गॅडरे, चाबी.” ते म्हणाले. मी किल्ली त्यांना दिली. आणि त्यांच्याशी हिंदीत थोडं बोलले. परत जायला निघालेले ते एकदम थांबले.

” एक बात बताऊ..” असं म्हणत ते एकदम नाराजीच्या स्वरात बोलू लागले,” मैं आपसे इतना बडा हूँ, फिर भी आप से आप कहके बात कर रहा हूँ… और आप हैं कि मुझे ‘तुम’ कह रही है.” बापरे… म्हणजे झालीच पुन्हा चूक!  मग मी माझी बाजू सावरून घेतली. ” सॉरी… थोडा लैंग्वेज प्रोब्लेम…. बुरा मत मानना….अंग्रेजी में जैसे you–तू , तुम, आप सब कव्हर करता है, वैसे थोडासा मराठी में भी है. तुम्ही में तुम और आप दोनो आते है..” आणखी पण असंच काहीसं सांगितलं. मग जेव्हा त्यांची समजूत पटली, तेव्हा लगेहात मी त्यांना हेही सांगायला विसरले नाही, “भाईसाब नॉट गॅडरे…गद्रे है हमारा सरनेम… लैंग्वेज प्रॉब्लेम… आपके साथ  भी…”. ते हसले आणि निघून गेले. पण त्यानंतर मी तुम आणि आप च्या बाबतीत खूप सजग झाले.

हिंदी उच्चारांची पद्धत पण मी आत्मसात केली. मैं, है, ऐसा, वैसा, औरत, और म्हणताना मॅ, हॅ, ॲसा, वॅसा, ऑरत, ऑर–आणि बरीच वेगळी उच्चार पद्धती मला जमू लागली. अन् मग सगळे सोपे झाले. हिंदीभाषिकांकडून  “आपकी हिंदी बहूत अच्छी है” असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इव्हेंट.. ☆ सुश्री स्वप्ना मुळे

? जीवनरंग ?

☆ इव्हेंट.. ☆ सुश्री स्वप्ना मुळे  

“नले काय कमाल झाली ग तुझी?? ह्या वयात तू ही त्या पोरांसोबत खुशाल गाण्यावर थिरकली काय,.. परवा त्या मेहंदीच्या कार्यक्रमात हाताभर मेंदी काढलीस,..शोभत का आपल्याला ह्या वयात आणि काल तर नातू म्हणतोय आजी अशी पोज दे तर लगेच त्याच्या मैत्रिणींसोबत काढलास तसा तोंड माकडासारखे करून फोटो कमाल आहे हं तुझी,म्हणत सुशीने नेहमी प्रमाणे नलीला सुनावलंच,..पण या वेळी नेहमी प्रमाणे नली गप्प नव्हती,..तिने सुशीला हात धरत कालच्या टेरेसवर नेलं,….जिथं काल मेंदी प्रोग्रॅम रंगला होता,..तिथं नलीने बनवलेल्या लोकरीपासून बनवलेले लटकन सगळीकडे वाऱ्यावर डोलत होते,..त्यात अडकवलेल्या बारीक घंटा वाऱ्याने किणकिण करत होत्या,….नलीच्या माहेरचं ताब्यांच जड घंगाळ लक्ख करून त्यात दिवे सोडलेले होते पाण्यावरचे,..भोवती मोगऱ्याची टपोरी फुल त्या मिणमिणत्या प्रकाशासोबत मंद सुगंध पसरवत होती,..नलीने सुशीला त्या घंगाळजवळ बसवलं आपला थरथरता हात त्यावर फिरवत म्हणाली,..”तुला आठवतं हे आईने हट्ट करून मला रुखवंतात दिलं होतं,..काही दिवस ते सासरी मिरवलं हळूहळू काळवंडायला लागलं,.. तसं सासुबाई त्याला घासण्यासाठी माझ्या मागे लागायच्या,..सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की एक दिवस त्याला तासभर घासत बसावं लागायचं,.. जीव चिडायचा वाटायचं कशाला दिलं आईने हे त्रासदायक घंगाळ मला,..??पुढं लेकरं बाळ आयुष्यात आली,.. हळूहळू त्या घंगाळाला माळ्यावर टाकलं कधी तरी डोळ्यासमोर दिसलं की वाटायचं मोडीत घालू मग परत आई आठवायची हट्टाने ते घेणारी,..मग स्टील, प्लास्टिक असं काय काय येत राहिलं,..तरी त्याच महत्व मनात होतं कायम पण त्याच्या स्वछतेपायी त्याला दूरच ठेवलं,..सुनबाई म्हणाली,” नकोच त्या हमाल्या..” म्हंटल नको तर राहू दे आपल्यालाच नाही जमलं तर ह्यांना कुठे बळजबरी करता,..

नलीला मध्येच अडवत सुशी म्हणाली,”अग मी तुला दोन दिवसांपासून तू इतकी ह्या पिढीसोबत मोकळी ढाकळी वागलीस त्याबद्दल विचारलं तर तू हे काय इतिहास सांगत आहेस मला,..?”

नली हसून म्हणाली,”अग तेच सांगते,….वर्षानुवर्षे माळ्यावर अडगळ होऊन पडलेलं घंगाळ ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली पोरगी घेऊ का? म्हणून मला विचारायला आली,.. मी हो म्हणताच ते खाली काढून तिने त्याला स्वच्छ करून नकली फुलांची माळ गुंडाळली त्यात पाणी सोडलं आणि हे कमळाचे दिवे हि मोगऱ्याची फुलं,.. मला म्हणाली,”आजी जून असलं तरी नव्याने त्याला जगू देऊ या,..माझ्या टेबलावर पडलेल्या लोकरीच्या फुलांची माळ तिने ह्या रिकाम्या कागदाच्या ग्लासात अडकवली,..मला म्हणाली,” जगणं तेच फक्त त्याला लूक नवा दयायचा म्हणजे आंनद मिळतो..मी सहज ते सगळे लटकन बघितले तर खरंच माझीच लोकरीची फुलं इतक्या दिवसांपासून त्या कोपऱ्यात पडून राहिलेली आज मस्त वाऱ्यावर डुलत होती जणू मोकळा श्वासच घेत होती,..हे हल्ली इव्हेंट इव्हेंट म्हणतात ते फार काही दुसरं नाही ग तर आहे तो कार्यक्रम आनंदाने साजरा करणं त्यासाठी हि सजावट पडीत वस्तूतूनही किती छान करता येते हे त्या मॅनेजमेंट वालीने दाखवलं आणि मग मनात वाटलं,..आपण सुद्धा आयुष्याचा इव्हेंट करायला हवा,..आनंदी मॅनेजमेंटने,..आपण नाही वापरलं ते घंगाळ,.. ती फुलं तशीच तशीच तर पडून आहेत,….मनातल्या उत्साहाची फुलं देखील तशीच पडू दिली आपण नाही वाऱ्यावर डोललो कधी,..मोकळेपणाने आणि अजूनही नाही तर मग कधी?आयुष्य तर असंच गंजून जाईल त्या माळ्यावर पडलेल्या घंगाळा सारखं कोणी येईल आणि लक्ख करेल ही वाट कशाला बघायची ?आपल्या आयुष्याचा इव्हेंट मॅनेज आपणच करावा,..हे नाही आलं आजपर्यंत लक्षात पण हि पिढी शिकवतीये ना मग घेऊ या शिकून,..त्याक्षणी जगून घेणं,..तो क्षण आठवणीत राहील असा साजरा करणं,..

सुशे तुलाआपले लग्नकार्य भांडण आणि रुसण्याशिवाय काय आठवतं ग?? ह्या उलट काल आमच्या मेंदीत लेक आणि सून मला मध्ये घेऊन फोटोसाठी उभे राहिले तेंव्हा नातू म्हणाला ,” आजीला जवळ घ्या बाबा,.. आणि लेकांन मला जवळ घेतलं तेंव्हा काय सांगू काय भरून आलं ग एरवी आपल्याला बोलायला वेळ नसणारी माणसं ह्या इव्हेंट ने एकमेकांना स्पर्श करताहेत ग,..सुनेनी नातवानी जवळ घेऊन भरपूर फोटो काढले तेंव्हा वाटलं आपणही कधीच आपल्या सासूला असा हात लावला नव्हता,..लेकीने तरी कुठे ग असे गळ्यात प्रेमाने हात टाकले,..फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं आणि मग मनातही मोगरा फुलला,..क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..म्हणून मी आता ठरवलं आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी..”

सुशी नुसतीच हसली कारण नलीच्या वाक्यावर वरची लटकणारी फुलच डोलत आपल्या किणकिण घंट्या वाजवत ह्या सगळ्या बोलण्याला दुजोरा देत होती?

 

©️ स्वप्ना मुळे (मायी)

औरंगाबाद

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बुद्धिजीवी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ बुद्धिजीवी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

“ यावेळच्या  निवडणुकीच्या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे यार .” 

“ बोल– काय करूयात ?” 

“ अरे आपल्या इथून जो कोणी निवडून येतो, तो फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर करून घेतो. नंतर सामान्य जनतेसाठी काही काम करणं तर लांबच, पुढची काही वर्षं त्या माणसाचं तोंडही दिसत नाही आपल्याला. “

 “बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आपण करून करून काय करू शकू शकणार आहोत ? “

 “ आपण खूप काही करू शकतो रे. आपल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या सभा आयोजित करून लोकांना याविषयी जागृत करू शकतो. त्यांना समजावून सांगू शकतो की, ‘ नेते मंडळी आपल्याला मोठमोठ्या वचनांचे आमिष दाखवून आपली मते मिळवतात. पण निवडून आल्यानंतर मात्र आपल्या भागाच्या विकासासाठी कधीच काहीच करत नाहीत. आणि सगळ्यांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून, एकमताने आता असा निर्णय घ्यायला पाहिजे की, यावेळी आपण अशाच उमेदवाराला मत द्यायचं, जो आपल्याला असं वचन देईल की, निवडून आल्यानंतर तो आपल्या या भागाचा विकास आणि प्रगती करण्यासाठी अतिशय मनापासून, निष्ठेने, आणि पूर्ण इमानदारीने प्रयत्न करेल. – आणि तो जर त्याचं हे वचन निभावू शकला नाही, तर त्याला राजीनामा द्यावा लागेल.’ “ 

 “ हे सगळं अगदी बरोबर आहे बाबा, पण अशा सभांचा खर्च करण्यासाठी तेवढे पैसेही हवेत ना ? “

 “ हे बघ, पैसे गोळा करणं काही फारसं अवघड नाहीये. आपण लोकांना आव्हान करू, आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करू. शेवटी कुणालातरी पुढाकार घ्यायलाच पाहिजे ना— नुसतं वाटतंय , म्हणून आपोआप काहीच होणार नाही. “ 

 “ ठीक आहे. मग कधीपासून सुरुवात करू या ? “

 “ तू म्हणशील तेव्हापासून–”

बोलत बोलत हे दोघे बुद्धिजीवी बसस्टॉपवर पोहोचले. त्यांची चर्चा सुरूच होती. —- इतक्यात बस आली. पळत जाऊन बसमध्ये चढता-चढता पहिल्या बुद्धिजीवीने दुसऱ्याला सांगितलं – “ चल रे— बाय. मी जातो. तुझ्या बसचीही वेळ झालीच आहे. “ 

 “ बाय — पण या विषयी आणखी चर्चा करण्यासाठी पुन्हा कधी भेटूयात ? “

 “ अरे सोड ना यार. बसची वाट बघत थांबावं लागतं, तो वेळ घालवण्यापुरता हा विषय ठीक आहे. तसंही आपण पडलो बुद्धिजीवी — त्या राजकारणाशी आपलं काय देणंघेणं आहे ? “

हे उत्तर ऐकून त्या दुसऱ्यालाही ‘ आपण बुद्धिजीवी आहोत ‘ हे एकदम आठवलं, आणि तो गुपचूप त्याच्या बसच्या रांगेत जाऊन उभा राहिला.  

 

मूळ हिंदी  कथा – ‘बुद्धिजीवी’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टाईमपास ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

?जीवनरंग ?

☆ टाईमपास ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.

“जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?”

जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. 

“तुला कालचीच गोष्ट सांगतो,” काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. “मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा – हातात पावतीपुस्तक.

आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो – “बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे.” 

तशी तो म्हणू लागला, “सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही.”

“तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा.”

“लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता,  कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी.”

” ‘त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?’ माझा निरागस प्रश्न” – जोशी काका सांगत होते.” तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार.”— 

“ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही.”

“असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ?  सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून.”

माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला. 

“अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता.” हवालदाराने रौद्र रूप धारण केले.

आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे “ – तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.

हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं -” तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.”

ती त्याला म्हणाली, “अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये.”

पण आता तो हवालदार काहीही  ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. 

“नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी.”

मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता.” जोशी काका सांगत होते.

“अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?” – मित्राची पृच्छा.

“मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो.” 

“आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?” मित्राला काहीच उमगेना.

“काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो—

तू मला विचारलंस – मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो. आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते – आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी ! “

जोशीकाका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले——

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लायकी दाखवण्याचे दिवस ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

?जीवनरंग ?

☆ लायकी दाखवण्याचे दिवस ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

गवार वीस रुपये… 

कलिंगडं शंभरला तीन !

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डोलावली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. तोपर्यंत दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

“ दादा, तांब्याभर पाणी मिळंल का? “ दादानं तोंड वाकडं करत, “समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पी .” असा सल्ला दिला.

“ एवढ्या सकाळी तहान कशी लागते रे तुला? “ दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं. तसा तो पोऱ्या म्हणाला, “ पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, ती बी संपली. म्हणून म्हणालो.” 

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, “ वाह रे वाह शहाणा? म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना असला  तर तो आम्हाला देऊन जाणार.”– ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं. 

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्यागैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. ‘आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात,’ अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. 

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्चविद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. “ उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या.” असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला. आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, “त्यांच्याकडं कामाला आहेस का रे तू भैय्या? “  पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला,” ते वडील होते माझे.” 

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, “ घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकत  हिंडतोय होय? “  गवार तोलत भैय्या म्हणाला, “ घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबी आहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळे आहेत. —-

पण तात्या म्हणत्यात, “आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे . आत्ताच्या काळात गरीबाबरोबर  लोक जेवढं वाईट वागत्यात, तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.” 

त्याचं वाक्‍य संपलं, तसे पटापट त्याच्या हातावर पैसे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता—–

संग्राहक :– कालिंदी नवाथे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिळ्या कढीला ऊत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

?जीवनरंग ?

☆ शिळ्या कढीला ऊत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

सून फोनवर आईशी बोलत होती, “आई मी काय सांगू, आजकाल शिळ्या कढीला पण ऊत आलाय ! सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून, दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात. आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी ! अजूनही स्वतःला पंचविशीतलेच समजतात.” 

तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या. त्यांनी हे सर्व ऐकले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला. नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं. पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.

पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता. त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची. आयुष्यभर त्यांनी फक्त मुलांसाठीच  खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी, ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.

अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर– हे अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल, जास्वंदी, चाफा, मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती. एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती. हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत. स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर, पुदिना, मेथी तिथलीच असायची !

पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही. पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे. खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं, म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती. पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपाळा  हवा होता तो त्यांनी आणला. आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.

आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते. त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या, तरीही सुनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं. अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.

त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे. एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.

“आपण मोठी कार का खरेदी करत नाही … नवीन ?”

“कल्पना चांगली आहे, पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे.” नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.

“जागा का नाही, ती बाग आहे ना ! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात !”

“तू जरा जास्तच बोलतेस !” म्हणत नवीनने तिला फटकारले खरे, पण त्यानेही याबाबत बाबांशी बोलायचे ठरवले होते.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला, “बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे.”

“पण बेटा, मोठी गाडी आधीच घरात आहे, मग तू ती ठेवणार कुठे?”

“या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी! सोनम काही बघणार नाही, आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल.”

प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं ! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले, “मला तुझ्या आईशी बोलावं लागेल, मला थोडा वेळ दे.”

“काय पप्पा … आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग?”, नवीन जरा चिडूनच म्हणाला. “तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता, चार लोकांचा विचार न करता इथे बसता. आता सोनम सुद्धा घरात आहे, लहान मुलंही आहेत. पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता.”

आतून सोनमची बडबड चालूच होती.

नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले. पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही. इच्छाच नव्हती कसली. दोघेही रात्रभर जागेच होते !

पण सकाळी त्याबद्दल विचार करताना, बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला. पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्यादिवशी झाडांना पाणी देण्यासाठीही  बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.

दिवसभर सर्वकाही सामान्य होते, पण संध्याकाळी, “ घर भाड्याने देणे आहे “असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले, “पप्पा, घर मोठे आहे हे मान्य, पण हे काय ?” 

” पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत, ते या घरात राहतील “, त्यांनी शांतपणे उत्तर दिले.

“पण कुठे?”

” तुमच्या भागात “, अशोकजींनी साध्या आवाजात उत्तर दिले.

“आणि आम्ही?”

” तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे. दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा, जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल ! आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू. तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेलं. आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं.”

“बाबा, मला असे म्हणायचे नव्हते,” नवीन हात जोडत म्हणाला.

“नाही बेटा, तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे. जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदित होऊ शकतो, तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो ? हे घर तुझ्या आईने बांधले आहे. ही झाडं , ही फुलं, तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत. म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही.”

“बाबा, तुम्ही गंभीर झालात “, नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.

“नाही बेटा … तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून, खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला. आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. म्हणूनच फक्त हा कोपराच नाही, संपूर्ण घर तिचे ऋणी आहे. तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे—-

—–आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या. पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नयेत ?” 

 

संग्राहक : – सुहास सोहोनी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print