मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी 

सदा दिवसभर पायाला भिंगरी लावल्यासारखा रखमाचा शोध घेत फिरत होता.. सगळ्या पाहुण्या-पै कडे,  परिचितांकडे चौकशी करून झाली.. रखमाच्या माहेरी चौकशी करताच तिची आई आणि भाऊ लगोलग घरी आले होते.  फिरून फिरून दमला – भागलेला सदा हताश होऊन घरी परतला तेव्हा दारात सगळी गल्ली गोळा झालेली होती.. प्रत्येकजण दुसऱ्याजवळ  कुजबुजत होता.. सदाने दारात पाऊल टाकले तशी त्याची सासु रडत ओरडत त्याच्याकडे धावली.. ‘ या मुडद्यानंच माझ्या लेकीचं कायतरी बरं वाईट केलं असणार.. माझी गुणाची ती लेक.. ह्येनं.. ह्येनंच मारली असणार तिला.. ‘  बायजा तिला अडवायला, थांबवायला  पुढे सरसावली तोवर रखमाचा भाऊ पुढं झाला होता आणि त्याने आईला थोपवायचे सोडून तिचीच वाक्ये म्हणत सदाला बडवायला सुरवात केली होती.. सदा आधीच रखमाच्या अचानक गायब होण्याने गांगरून गेला होता.. त्याला नेमकं कोण काय म्हणतेय ते ही समजत नव्हते.. या अचानक हल्ल्याने  तो पुरता गोंधळून गेला होता.. बायजाने सदाच्या सासूला मागे ओढली.. गल्लीतलेच कुणीतरी मध्ये पडून रखमाच्या भावाला सदापासून दूर नेऊन सदाची सुटका केली होती.

” काय बोलतायसा पावनीबाय ? त्यो कशाला करील आसं ?.. अवो, त्यो गेलावता रातपाळीला.. सकाळच्या पारी घरला आला तवा त्येला समाजलं.. रखमा न्हाई ती. “

बायजा रखमाच्या आईची समजूत काढू लागली होती. वातावरण एकदमच बिघडून गेलं होते.. बाहेर चर्चेला वेगवेगळे धुमारे फुटायला लागले होते. लोकांना चघळायला आणखी एक विषय मिळाला होता..

 ” व्हय रे सदाने मारली आसंल रखमाला ? मला तर  ही काय पटत न्हाय बाबा ..”

 ” तेच्यात न पटण्याजोगं काय हाय ? “

 ” आरे, सदा गरीब हाय.. मुंगीबी मारायचा न्हाय कवा.. आन वाईच सदाकडं बग तरी… रखमा सकाळधरनं न्हाय तर पार कोलमडून गेलाय ? “

” आरं, ही समदं दाखवायचं दात असत्यात..  आरं, रखमीची आयच म्हंतीया.. भाव बी म्हंतुय म्हंजी कायतरीं आतली धुसफूस ठावं असणारच त्यासनी.. उगा कोनबी जावाय पावण्याला असे म्हनल का चार लोकांत..? “

” आरं पर त्यो तर रातपाळीला कामाव हुता न्हवका  ? “

” आरं तकडं हजरीं लावून मदनंच येऊन मारलं आसंल..बॉडी कुटंतरी दिली आसंल टाकून..आन गेला आसंल पुन्यांदा कामाव.. आरं, पोलीसांस्नी अशी लय घावल्यात.. कामाव असूनबी खून केल्याली..मी तर म्हंतो,  तसंच असणार .. न्हायतर मला सांगा सदा आजूनबी पोलिसात का ग्येला न्हाई ? “

” आरं, पर कशापायी मारंल त्यो ? कवा भांडान बी न्हाई ऐकू आले तेच्यातलं.. आरं, त्येंचा तर लय जीव हुता एकमेकाव.. छया s छयाss उगा आसलं कायबी बोलण्यात अर्थ न्हाय..”

रखमा गेली कुठं ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या मनानुसार आखाडे बांधून शोधत होता.. आपल्याला वाटतंय तेच खरं आहे असे वाटून दुसऱ्याला ठासून सांगून पटवण्याचा प्रयत्न करत होता.. तेच वाक्य मीठ-मिरची लावून एकाकडून दुसऱ्याकडे जात होते..  चर्चेचे, अंदाजांचे, अफवांचे पेव फुटले होते. त्यातल्या कुणालाच रखमाच्या जाण्याचे दुःख नव्हते की सदाबद्दल, त्याच्या लेकराबद्दल दया, आपुलकी नव्हती.  सदाची सासरची मंडळी पण तशीच.. सदाला दोष देऊन रिकामी झाली होती.. सदा हताश झाला होता.. फक्त बायजा म्हातारी एकीकडे पोराला सांभाळत होती.. दुसरीकडे सदाला धीर देत होती.. त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती.. रात्र झाली तरी रखमाचा पत्ता नव्हता..ती आलीही नव्हती आणि तिचा कुठे मागमूसही लागला नव्हता.. सदा पार कोलमडून गेला होता.. नेमके काय झाले असावे..? काहीच समजत नव्हते. तर्क-वितर्क सुरूच होते.. निरागस पोर दूध पिऊन झोपले होते. सदा शून्यात नजर लावून बसून होता.. बायजाने आग्रह करूनही त्याने दोन घास खाल्ले नव्हते.  थकलेली बायजा तिथंच पोराजवळ कलंडली पण मनात प्रश्न खदखदत होते..’रखमा अशी अचानक गायब कशी आणि का झाली असेल ? तिच्याबाबतीत नेमकं काय झाले असावे ? ती कुठं असेल ? कशी असेल ? तिला कुणी कशी आणि का नेली आसंल ?’

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

बायजा म्हातारी एकीकडे पोराच्या मायेने भिजत होती, दुसरीकडे भाजी विकायचा खोळंबा झाल्याने मनातल्या मनात चरफडत होती. मधूनच तिला रखमाचा, सदाचा राग येत होता तर कधी मनात त्यांच्याबद्दल नाना शंका-कुशंका येऊन काळीज कुरतडून निघत होते. ती पोराजवळ बसून त्याला थोपटत असली तरी तिची नजर दारातून बाहेर दूरपर्यंत रेंगाळत होती .. दूरवर कुणी दिसले की तो सदाच असणार किंवा रखमाच असणार असे वाटून  मनात आशा पल्लवित होत होत्या.. दुसऱ्याच क्षणी ते दुसरेच कुणीतरी आहे याची जाणीव झाली की मन कोंबडीवानी खुडूक होत होते. तिची नजर रस्त्यावरून वळून पोराकडे जात होती अन तिथेच थबकत होती.

पोराकडे पाहिले की मनातले सारे विचार क्षणकाळासाठी का होईना गळून पडत होते आणि मुलावरची माया मन भरून टाकत होती.. मायेने पोराला थोपटत असतानाच अचानक तिची नजर दरवाज्यातून बाहेर गेली.. दूरवर सदासारखाच कुणीतरी येताना दिसला..  तिची नजर त्याच व्यक्तीवर खिळून राहिली होती.. ती व्यक्ती काही अंतर पुढे आल्यावर तिला तो सदाच असल्याची खात्रीं पटताच बायजाची नजर त्याच्या अवतीभवती रखमाला शोधू लागली.. रखमा काही दिसेना..

‘ संगं रखमा न्हाई.. सदा एकलाच हाय..काय झालंय पोरीला कुणाला ठावं.. ? आजारली आसंल म्हणून दवाखान्यात तर ठेवली नसंल..? पर तसं आसतं तर पोराला एकल्याला घरात सोडून नसती गेली दवाखान्यात.. संगती नेलं असतं.. दवाखान्यात न्हाय तर मग रखमा हाय कुठं ?.. ‘ मनात नाना विचार येऊन गेले..

सदा दारात आला. हातात जेवणाच्या डब्याची पिशवी पाहून बायजा काहीशी चक्रावलीच.. ‘ म्हंजी.. सदा रातपाळी करून आलाय कामावनं..  मग रखमा कुठं हाय ? ‘ 

” बायजाज्जी तू ? येरवाळचा बाजार सोडून तू कशी इथं ?   पोराला बरं न्हाय काय ? आन रखमा कुठं गेलीया .. औशिद आणाय गेलीया व्हय ? काय झालंय पोराला.. सांच्यापारी तर ब्येस खेळत हुता.”

बायजाला बाजार सोडून पोराजवळ थांबलेलं बघून काळजी वाटून सदाने विचारले.. पटकन हातातली डब्याची पिशवी तिथंच खिळ्याला अडकवून  तो  पोराजवळ बसला. बायजाला काय उत्तर द्यायचं आणि कसे उत्तर द्यायचं ते क्षणभर समजेचना..

” उगा नगं काळजी करू.. पोरगं बरं हाय .  थांब वाईच पाणी आणून देते. हातपाय तोंड धू… “

तिने आतून पाण्याची कासांडी आणून दिली.

” पर रखमा हाय कुठं ?”

त्याच्या प्रश्नाला उत्तर न देताच ती झटकन आत गेली आणि तिने चहाचे आदण ठेवले. सदाला पिण्यासाठी तांब्याभर पाणी आणून बाहेर ठेवले. आणि चांगला कप कपभर चहा घेऊन बाहेर आली. 

  ” आज्जे , पर रखमा …?

” च्या पे आदी.. गार हुईल ?”

 चहा पिऊन झाल्यावर तिने विचारले,

” सदा, काल तुझं न तिचं भांडान झालंवंतं काय रं ? “

” न्हाय.. पर अशी का ईचारतीयास ? “

“आरं, येरवाळच्यानं रखमा घरात न्हाई.. मी बाजारला जाया निघालेवते, पोराचं रडणं ऐकाय आलं.. रखमाला दोनचार हाळ्या मारल्या.. एक न्हाय न दोन न्हाय.. इवून बघतीया तर दार निस्तं फुड केलेलं…”

बायजाने सदाला सुरवातीपासूनचे सगळे सांगितले तसे त्याला रखमाची जास्त काळजी वाटू लागली. विचार करकरून डोके फुटायची वेळ आली. मनात येणारा एकेक विचार मनच रद्द करीत होते.. एवढ्याशा पोराला घरात एकटे टाकून कोणतीही माऊली कुठे जाईलच कशी ?  मग रखमा कुठे गेली ? कशी गेली ?कधी गेली ? आणि सर्वात महत्वाचे का गेली ? सारे निरुत्तर करणारे प्रश्न.. मनात खदखदत असताना, कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसताना बायजाच्या मनात प्रश्न आला.. ‘ रखमाला कुणी पळवून तर न्हेलं नसंल न्हवं ? ‘ 

मनात प्रश्न आला आणि बायजा अस्वस्थ झाली. मनातली शंका सदाजवळ व्यक्त करावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली. तिचे मन स्वतःशीच मनातील कुशंका पडताळून पाहू लागले. रखमा तरुण होती, देखणी होती.. पण एका तान्हुल्याची आई होती.. पण एखादा नजर ठेवून पळवून न्हेणारा असेल तर.. त्याला तान्हुल्याशी काय देणं घेणं असणार म्हणा.. पण कुणी पळवून नेत असताना रखमाने आरडा-ओरडा केला असता .. सगळी गल्ली गोळा केली असती.. मग ती स्वतःहूनच गेली असेल काय ?  बायजाच्या मनात आलेली, ‘ ती स्वतःहून पळून जाण्याची शंका’  तिने स्वतःच धुडकावून लावली. ती रखमाला चांगलेच ओळखत होती… मनात नाना शंका – कुशंका येत होत्या आणि त्या चुकीच्या वाटून रद्दही होत होत्या.. पण एक अनुत्तरित प्रश्न मात्र मन पोखरत होता, मग नेमके तिचे झालंय काय ?

बायजा स्वतःच्या विचारांच्या नादात असतानाच अचानक तिचे सदाकडे लक्ष गेले..  तो काहीच न सुचून,  गुडघ्यात तोंड खुपसून हताश होऊन रडत होता. बायजा उठली . त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देत म्हणाली,

” आरं , असे बसून कसे चालंल.. रखमाचा तपास कराय नगं..? ती कायतरी कारणाने म्हायेराला गेली हाय का ते बगाय पायजेल.. उठ..  असा बसून नगं ऱ्हाऊस.. मी हाय पोरापाशी “

माहेरी जाण्याचा मुद्दा बायजाला स्वतःलाच पटला नव्हता तरी तिने त्याला हताशपणातून बाहेर काढण्यासाठी उगाचच त्याला सांगितला होता…

त्याच्या मनात आशेचा काजवा टिमटीमला असावा.. तो झटक्यात उठला आणि बाहेर पडला.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

बायजा म्हातारी सकाळीच हातगाड्यावर भाजीची पहिली पाटी ठेवत असतानाच तिला सदाच्या घरातून त्याच्या पोराच्या रडण्याचा आवाज आला पण सगळ्या पाट्या ठेवून हातगाडी सकाळी लवकरच मंडईच्या कोपऱ्यावर उभी केली तरच भाजीचा खप चांगला होत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले . शिवाय लहान पोर झोपेतून उठल्यावर जवळ आई नाही म्हणल्यावर रडायचंच ,असाही तिने विचार केला होता. ,घरातल्या बाईची सकाळी किती तारांबळ उडते हे तिला ठाऊकच होते.. आणि रखमा, सदाची बायको त्याच तारांबळीत असणार हे ही ती जाणून होती.

हातगाडीवर भाजीच्या सगळ्या पाट्या, कोथिंबिरीचं पोतं, वजनकाटा सारं व्यवस्थित ठेवेपर्यंत नाही म्हणलं तरी अर्ध्या तासाहून जास्त वेळ गेलाच.. त्या गडबडीत पोराचं रडणे थांबले – नाही थांबले याकडे तिचे लक्षही नव्हते पण जसे सारे आवरले आणि मंडईत जाण्यासाठी ती हातगाडी ढकलणार इतक्यात सदाचं पोर अजूनही रडत असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला आश्चर्य वाटले. तिने हातगाडी ढकलायची म्हणून काढून हातगाडीवरच ठेवलेली चाकाची घूण्याची दगडे परत चाकांना लावली आणि ‘ रखमा s ए रखमा ss !’ अशी हाळी मारत सदाच्या घराकडे निघाली. पुढे लोटलेले दार उघडून ती आत आली तर वाकळंवर पोर रडत होते. घरात कुणाचीच चाहूल लागेना. तिने बाहेर येऊन रखमाला हाका मारल्या..  सदालाही हाका मारल्या. पण कुणाचेच प्रत्युत्तर आले नाही तशी  बायजा म्हातारी परत घरात गेली. पोराला उचलले. पोर भुकेलेलं आहे हे जाणवताच तिने चुलीकडे पाहिले. चुलीपुढे निखाऱ्यावर दुधाचे पातेले होते. अजून दूध जरासे कोमटच आहे हे लक्षात येताच तिने वाटीत दूध काढले आणि पोराला मांडीवर घेऊन चमच्याने पाजायला सुरवात केली. दूध पोटात जाऊ लागले तसे पोर रडायचे थांबले. तिने त्याला पोटभर दूध पाजताच पोर पूर्ण शांत झाले.. तिने त्याला परत वाकळंवर ठेवताच पोर हातपाय हलवत खेळू लागले. तिने वाटी-चमचा चुलीजवळ ठेवला. पोर शांत झाले तसे तिच्या मनात परत रखमाचा, सदाचा विचार आला..

‘ येवढ्याशा पोराला घरात ठिवून दोगंबी कुणीकडं गेलं आस्तिली ? ‘

तिच्या मनात प्रश्नाचे, विचारांचे आणि काळजीचं वादळ उगाचंच भिरभिरु लागले होते.  तिने पोराकडे नजर टाकली. पोर आपल्याच नादात खेळत होते. ती दाराशी आली अन तिची नजर तिच्या भाजीच्या गाड्याकडे गेली तशी तिच्या काळजीत आणखीनच भर पडली. ‘आधीच भाजी विकायला जायला उशीर झाला होता.. आणखी उशीर झाला तर भाजी विकली जाणार नव्हती.. पालेभाजी नाशवंत माल.. विकली गेली नाही तर त्याचे पैसे अंगावर पडणार होते.  आधीच भाजी विकून कशीतरी हाता-तोंडाची गाठ पडत होती.. त्यात भाजीचे पैसे अंगावर पडले तर मग काही बोलायलाच नको.. ‘ तिच्या मनात विचार आला. तिला भाजी विकायला जावेच लागणार होते पण पोराला एकटं टाकून ती जाऊ शकत नव्हती..  त्यात रखमाचा, सदाचा पत्ताच नव्हता.. पोराला असे एकटं टाकून तिचा पायच निघाला नसता. वस्तीतील शेजारपाजारच्या घरातील बाया-माणसे येरवाळीच कामाला जात असल्याने घरांना कुलपंच होती.. एखादं -दुसरे पोर गल्लीत खेळत असले तरी पोरा-ठोरांच्या ताब्यात इवल्याशा पोराला देऊन ती जाऊ शकत नव्हती..गल्लीत टोकाच्या घरात एक म्हातारा होता पण तो स्वतःलाच सांभाळू शकत नव्हता. तो त्या इवल्याशा पोराला काय सांभाळणार ?

मनातल्या मनात ती वस्तीतल्या सगळ्या घरातून डोकावून, घर न् घर पाहून आली होती. काय करावे ते तिला सुचेनासे झाले होते.. ‘ आत्ता रखमा येईल, सदा येईल ,ते आले की आपण जाऊ.. भाजी कमी विकली जाईल पण जेवढी विकली जाईल तेवढंच नुकसान कमी..तेवढाच डोईवरला बोजा कमी.. ‘ असा विचार तिच्या मनात येत होता.. ती आतुरतेने रखमाची, सदाची वाट पहात होती. हळूहळू तिची सहनशक्ती कमी होत चालली होती..

” येवढ्या येरवाळचं कुनीकडं उलथलीत दोगंबी..? येवंडंसं प्वार घरात ठेवलंय..आय-बा हायती का कोण ? आसं कोण प्वार घरात ठिवून जातं व्हय ? कुणीकडं जायाचं हुतं तर पोराला संगं न्ह्याचं.. “

बायजा म्हातारी स्वतःशीच बडबडत अस्वस्थतेने आत-बाहेर फेऱ्या घालत होती. खेळता खेळता पोर परत झोपी गेले होते..

‘प्वार झोपलंय, दार वडून घिऊन जावं का बाजारात ? ‘

तिच्या मनात विचार आला..

‘ बायजे, येवड्याश्या पोराला येकलं टाकून जायाचा इचार करतीस, माणूस हायस का कोन ? प्वार पुन्यानदा उठलं म्हंजी ? ‘

‘आगं, पर आज भाजी न्हाय इकली तर नासुन जाईल, त्येचा पैसा अंगावं पडंल.. समदी नुक्सानीच की..’

‘ व्हय पर माणुसकी हाय का न्हाय काय ? आन तशीबी दोन दिस उपाशी ऱ्हायलीस तर काय मरत न्हाईस .. ‘

ती अस्वस्थतेत स्वतःशीच बोलत होती.. इतक्यात पोराची झोप चाळवल्याचे तिला जाणवले.

” प्वार उठतंय का काय ? “

ती पोराजवळ वाकळंवर येऊन बसली.. आणि त्याला थोपटू लागली..

‘ रखमा-सदाचं काय वाईट-वंगाळ तर झालं नसंल न्हवका ? ‘

पोराला थोपटता थोपटता मनात आलेल्या विचाराने ती दचकली.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 6 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 6 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आईच्या अगदी विरुद्ध टोकाचे विचार आहेत लेकीचे. काय काय ऐकायला आणि पाहायला मिळणार देव जाणे! बघता बघता तन्वीची परीक्षा संपली आणि घरामध्ये ट्रीपचे वातावरण तयार झाले. कपड्यांची बॅग, खाण्याची बास्केट, पाण्याचा कॅन, थोडीफार औषधं. नाही नाही म्हणता दोन मोठ्या बॅग्ज झाल्याच. शिवाय तिघींच्या पर्सेस. तन्वीच्या आईनं प्रवासाची चोख व्यवस्था केली होती. संपूर्ण ए.सी.चे रिझर्वेशन असल्यामुळे आरामच आराम होता. प्रवासात तन्वीचा चिवचिवाट सुरूच होता. मोठ्या मजेमध्ये आणि आनंदात प्रवास सुरू होता. तिघीजणी प्रसन्न होतो. दक्षिण भारतातली मोठीमोठी मंदिरं, अथांग समुद्रकिनारे, मोठमोठाली प्राणी संग्रहालयं, हिरव्यागार बागा बघून हरकून गेलो होतो. कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंदांचे स्मारक बघून मला आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले होते. लेकीवर असलेली नाराजी समुद्राच्या लाटांबरोबर केव्हाच मागे पडली होती. तिघींची मनं आनंदानं तृप्त झाली होती..

आता परतीचा प्रवास सुरु झाला होता. प्रवासाचा शीण आला होता. थोडाफार थकवाही आला होता. पण त्या रम्य आठवणी मनामध्ये सतत रुंजी घालत होत्या. समुद्राच्या लाटा, त्यांचा मखमली स्पर्श, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे अलौकिक सौंदर्य, काय पाहिजे आता आयुष्यात?

कुठल्याशा एका स्टेशन वर त्यांच्या बोगीमध्ये तन्वी एवढाच एक मुलगा आणि त्याचे बहुदा वडील असावेत ते आले. झालं तन्वीला ओळख करून घ्यायला काही वेळच लागला नाही. ती सफाईदारपणे इंग्रजी बोलत असल्यामुळे भाषेचा अडसरच आला नाही. हिची आई आणि त्याचे बाबा लॅपटॉप वर आपले काम करण्यात गुंग होऊन गेले. आजी आपल्या नाती वर लक्ष ठेवून होत्या. नुसतेच लक्ष नाही तर करडी नजर ठेवून होत्या.

कार्टी किती मोकळेपणाने बोलतेय त्याच्याशी, ओळख ना पाळख. पण अगदी हातावर टाळी देऊन काय हसायचे? छे! हल्लीची मुलं फारच थिल्लरपणाने वागतात. दोघांनी आपापले फोन नंबर्स एकमेकांना दिले. नंबर सेव्ह करून झाल्यावर रिंग होते का चेक करून झालं. काय बोलत होते कोण जाणे? पण अखंड टकळी चालू होती दोघांची. आजी मात्र दोघांवर करडी नजर ठेवून होत्या.

बहुदा तो आणि त्याचे वडील उतरणार होते. त्याच्या वडिलांनी लॅपटॉप बंद केला. त्या मुलांनीही आपल्या पाठीवर सॅक अडकवली.

“बाय तन्वी, सी यू. वुई विल मीट ऑनलाइन, अँड बाय मोबाईल ओके? आय एम व्हेरी ग्लॅड टुडे. आय थँक गॉड फाॅर गिविंग मी अ व्हेरी स्वीट सिस्टर लाईक यू. बाय!” असं म्हणत हातानं बाय बाय करीत तो खाली उतरला.

मी तन्वीकडे पाहिलं. ती पण हलक्या हातांनी आणि भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देत होती. पटकन उठून माझ्याजवळ आली.

” आजी, काय छान भाऊ मिळाला बघ मला या प्रवासात. अगं तो के. प्रसाद त्याला पण ना, मला बघितल्यावर बहिण असावी तर अशीच, असंच वाटलं. त्यालाही खूप फ्रेंड्स आहेत पण बहीण नाही. किती छान ना! आता आम्ही भेटणार सारखं नेटवर. फोनही करणार. आजी, मी पण आज खूप आनंदात आहे.”

उमललेल्या टवटवीत फुलासारखी स्वच्छंदी आणि आनंदी तन्वीला बघून आजीच मन भरून आलं. अजून सगळीकडे वाळवंट झालं नाही. अशी हिरवळ कुठेतरी उगवते आहे. नात्यांची गुंफण अजूनही फुलते आहे. वरवर रुक्षपणा जाणवत असला तरी आत कुठेतरी ओलावा आहे. आपल्या नकळत तो झिरपतो आहे. महिला राज्याचा गर्व किती जरी महिलांना वाटत असला तरी हा भावनिक आधारही तिला हवा आहे. हे नातं पूर्ण जळून खाक झालं नाहीये. कुठेतरी धुकधुक आहे. आपल्यासारख्यांनीच त्यावर फुंकर घालायला पाहिजे. त्याची जपणूक करायला पाहिजे. त्याचा ओलावा टिकवून ठेवला पाहिजे. त्याला प्रेमाचं पाणी घालायला पाहिजे.

तन्वीचा हात थोपटत आजीनं मनाशी निर्धार केला.

समाप्त 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 3 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 3 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

ट्रीपला जायच्या आनंदात तन्वी आवरुन पटकन झोपली सुद्धा. तन्वी ची आई आपल्या खोलीत तन्वी पलीकडच्या कॉटवर. आजीला काही झोप येईना. काय म्हणावं या पोरीला? आता माझी मुलगी म्हणून पोरीला म्हणायचं नाहीतर चाळिशीला आलेली बाईच की ही. सगळं आपलं आपणच ठरवते आणि अंमलातही आणते. विचारणं नाही, परवानगी मागणं दूरच. आपलीच मुलगी पण आपल्यातला बुजरेपणा थोडासा ही तिच्यात नाही. नाहीतर लहानपणापासून ही धीटच. कशाला म्हणून घाबरायचं नाही. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तिच्या या स्वच्छंदी स्वभावाला खतपाणी मिळालं. मुलगी म्हणून मार्दव काही नाहीच. कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्ट मुलांच्या बरोबरीने करायची. इतकं बिनधास्त वागणं तर मला आवडायचं नाही. पण मला विचारतच होती कुठं ती? उलट मलाच ती सुनवायची, “आई, का गं सहन करीत बसतेस? आजी काही बोलते तुला? किती काम करून घेते तुझ्याकडून. करणार नाही म्हणून ठासून सांगत जा ना. बाबा सुद्धा किती गृहीत धरतात तुला. कशाला ऐकतेस सगळ्यांचं?” धाड धाड तोफेतून गोळे सुटल्यासारखी बोलायची. आता कसं समजवायचं हिला? अगं यालाच तर संसार म्हणतात. आजी कामे सांगते पण त्यामुळे तर आपलं घर व्यवस्थित चालतं ना?.. बाबांचं म्हणशील तर त्यांना बाहेर काम करायचं असतं. तिथं काहीतरी मनाविरुद्ध घडलं तर त्याचा राग थोडा वेळ माझ्यावर काढतात. बस्स इतकंच. एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं? पण ही नवी पिढी पुरुषांच्या बरोबर नाही; त्यांच्यापुढे चार पावले टाकण्यात धन्यता मानणारी, इतरांना तुच्छ लेखणारी. कसं व्हायचं हिचं? मला काळजीच होती.

शिक्षण झाल्यावर धडपड धडपड करून कुठलासा कोर्स केला, परीक्षा दिली आणि मनासारखी नोकरी सुद्धा लागली. म्हटलं, “हुश्श, आता हिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. मी माझ्या परीने हालचाल सुरू केली. मात्र हिनेच आमच्या समोर बाॅम्बस्फोट केला.”

“आई, बाबा, तुम्ही माझ्या लग्नाची खटपट करताय; पण माझा निर्णय मी घेतलाय. मी लग्न करणारच नाहीये. मला तो विचारच पटत नाही. इतकी वर्ष तुमच्याबरोबर राहिले का म्हणून आता दुसऱ्याच्या घरी जाऊ? मला अजिबात मान्य नाही ते. मी तुमच्याबरोबर राहणार, तुमची सेवा करणार. सारखा सारखा लग्नाचा विषय काढला तर मी दुसऱ्या गावाला बदली करून घेईन आणि तिकडे राहीन.” असं तिनं सांगितलं आणि खरोखरच सहा महिन्यांनी तिनं आपली बदली करून घेतली. एकटीच तिकडे जाऊन राहायला लागली.

एकटीच राहते म्हणून कसं व्हायचं हीचं? ही काळजी करण्याचं कारणच नव्हतं. हिच्यामुळं कुणाला त्रास होणार नाही ना? असंच मला वाटायचं. शनिवार-रविवार घरी यायची. आम्हा दोघांना काय काय आणायची. बाबांना बी.पी.चा त्रास सुरू झाला म्हणून बी.पी. चेक करायचे मशीनच घेऊन आली. मला भारीपैकी स्वेटर काय, शेकायची पिशवी काय, काही विचारू नका. एकदा भारीपैकी मोबाईल आणून दिला आम्हाला. त्यावर स्वतःचा नंबर, काही पाहुण्यांचे, ओळखीच्यांचे नंबर फीड करून दिले. तो वापरायचा कसा ते आम्हाला शिकवलं. एक मुलगा काय करेल; तसं आमचं ती करत होती, इतकंच समाधान होतं. पण रुखरुख होतीच होती. आता ठीक आहे. आमच्या माघारी कोण जीव लावणार हिला? लग्न म्हणजे फक्त बंधनच वाटतं हिला? त्या बंधनात सुद्धा आपुलकी असते, चांगली भावना असते हे कसं कळत नाही? याबाबतीत कधी शहाणी होणार? ऑफिसमध्ये कुणी भेटला तर बरं होईल. मला आपली वेडी आशा वाटत होती.

क्रमशः…. 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 2 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 2 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

लग्न करून नवऱ्याबरोबर संसार करणे हा बुरसटलेला विचार ठरला होता. नवऱ्याच्या घरी राहणे कर्तृत्ववान स्त्रीला कमीपणाचे वाटत होते. वयाच्या 35-37 वर्षानंतर लग्न करावे का असा विचार प्रौढा करायला लागली होती. लहानपणापासून स्त्री स्वातंत्र्याचे बाळकडू मुलीला मिळत होते. लग्नाच्या बंधनात अडकायला ती तयार नव्हती. कशासाठी लग्न? ते बंधन? आयुष्यभर एकाच घरी राहायचे? लोकांच्या मर्जी प्रमाणे वागायचे? स्वतःला त्यांच्याप्रमाणे बदलवायचे? छे! छे! तो जमाना कधीच मागे पडला होता. लग्न करायचे की नाही ते मुलगीच ठरवत होती. शिक्षण, मनासारखी नोकरी, आवडते करिअर, भरपूर पैसा आणि मुख्य म्हणजे मनासारखे स्वातंत्र्य! हे सगळे इतक्या सहजासहजी मिळत होते की, लग्नाचे कुंपण काटेरी वाटायला लागले होते. लग्नाशिवाय सहजीवन ही संकल्पना मोठमोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे दिसून येत होती. आपल्या आयुष्य, आपले तरुणपण कसे उपभोगायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तरुणवर्ग बेदरकार बनला होता. पटले तर ठीक आहे; एकत्र राहायचे! नाही तर तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा. अशा राहणीमानामुळे घराचे घरपण फार थोड्या घरांमध्ये दिसून येत होते. माझं घर, त्याची स्वच्छता, तिथला माणसांप्रमाणेच वस्तूंवरचं प्रेम पातळ होत चाललं होतं. एखाद्या लॉजवर राहिल्याप्रमाणं विश्रांती पुरतं घर राहिलं होतं.

आदिती अपार्टमेंट मध्ये बरीचशी कुटुंब तशीच राहत होती. कुटुंब तरी कसं म्हणायचं त्यांना? जमतंय का पाहायचं. पटलं तर एकत्र राहायचं; नाही तर तुझा तु अन माझी मी. अशाच वातावरणात तन्वी लहानाची मोठी झाली होती. तिच्या घरी ती, तिच्या आई आणि आजी अशा तिघीच राहायच्या. तिला आठवतंय तसं तिच्या आईचं आणि आजीचं फारसं पटत नव्हतं. पण आजीचा नाईलाज होता. तन्वीचे आजोबा गेल्यामुळे तिला मुलीकडचे यावं लागलं होतं.

तन्वी ची आई कर्तृत्वानं हुशार आणि कर्तबगार होती. एका ऑफिसमध्ये अधिकारी होती. भरपूर पगार होता. ऑफिसला आपली गाडी घेऊन जात होती. संध्याकाळी घरी आल्यावर दमलेली नसायची. त्यानंतर पोहायला आणि खेळायला जायची. येताना तिघांसाठी जेवणासाठी पोळी-भाजी किंवा आणखी काहीतरी घेऊन यायची. आजी संध्याकाळी दैवाच्या फोटो पुढे दिवा लावायची, उदबत्ती लावायची. तन्वीला ते वातावरण खूप आवडायचं. देवाला नमस्कार करीत आजी रोज काहीतरी म्हणायची. तन्वी डोळे मोठे करून आजीचा सात्विक चेहरा निरखत ते मन लावून ऐकायची. आजीला त्यासाठी कॉम्प्युटर लागायचा नाही की पुस्तक लागायचं नाही. कसं काय येतं आजीला हे? हे किती छान वाटतं आजीजवळ. आपल्या मला असलं काही येत नाही. तन्वीची मॉम खेळून आली की आंघोळ करायची फ्रेश होऊन डिश मध्ये जेवण घेऊन टीव्हीसमोर बातम्या बघायची आणि नंतर आपल्या खोलीत जाऊन कॉम्प्युटरवर ऑफिसचे काम करत बसायची. आणि केव्हातरी झोपायची. आजी मात्र तन्वी साठी वरण-भात, कोशिंबीर करायची. मॉम टीव्हीसमोर बसून असली तरी या दोघी आजी आणि नात स्वयंपाक घरात डायनिंग टेबल वर गप्पा मारत जेवण करायच्या. कॉलेजला जायला लागल्यापासून तन्वीच्या गप्पा जरा जास्तच वाढल्या होत्या. प्रत्येक गोष्ट आजीला आवर्जून सांगायची. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून चिवचिव सुरू होती. “अगं आजी, आमच्या क्लासमध्ये ना आम्ही पंच्याहत्तर मुली आणि ओन्ली फोर्टी फाईव्ह, पंचेचाळीस मुलं आहेत. आजी आमच्या प्रिन्सिपल मॅडम मस्त आहेत. त्यांचा डायना कट त्यांना शोभून दिसतो. त्यांच्या कानात ना खऱ्या हिऱ्याचे टॉप्स आहेत. आमच्या वेलकम पार्टीला ना त्या मस्त ग्रीन पैठणी नेसून आल्या होत्या. एरवी त्या कॉटनचे ड्रेस घालतात; पण त्यादिवशी त्यात सगळ्यात उठून दिसत होत्या. अगं आजी, आमचे इंग्लिश चे सर काय क्युऽट आहेतऽऽऽ!

“तन्वी, अगं तू शिकायला जातेस का मॅडमचे ड्रेस, सरांची ब्युटी बघायला?”

“आजी, असं काय ग? ऐक तरी.”

“बर बाई! सांग.” आजीची पूर्णतः शरणागती.

” तनुऽऽ, काय बडबड चाललीय गं? आई तु सुद्धा ना तनुचे जास्त लाड करतीस हं! बरं ते जाऊ दे. मला तुम्हा दोघींना एक गंमत सांगायचीय. तनुची परीक्षा झाली ना की आपण दक्षिण भारतच्या टूरवर जायचंय. आई, अगदी कन्याकुमारीला. मी मस्त प्लॅन केलाय.” एवढं सांगून ही बया गेली सुद्धा आपल्या रूम मध्ये.

“वाॅव! आजी काय धमाल आहे ना. आई म्हणजे ग्रेटच आहे बघ. उगीच तू कधीकधी वाद घालतीस बघ तिच्याशी. मस्त एन्जॉय करूया आपण. मला कधी एकदा फ्रेंड्स ना सांगेन असं झालंय बघ.”

क्रमशः ….

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

या दिवशी जागतिक महिला दिन जरा जास्तच दणक्यात साजरा झाला. अर्थातच कारण होत तसं. यावर्षी सगळ्या प्रमुख पदावर स्त्रियांचाच राज्य होतं. देशाचे राष्ट्रपती अर्थात राष्ट्रपत्नी महिला, पंतप्रधान महिला उपराष्ट्रपती, सभापत्नी सगळ्या खात्यांचे मंत्रिपदे महिला भूषवीत होत्या. सर्व ऑफिसेस मधून अधिकारी म्हणून महिलाच.. विद्यापीठाच्या कुलगुरू महिला, सर्व प्राध्यापक वर्ग महिला, पोलीस प्रमुख पदी ही महिलाच, जिकडे पाहावे तिकडे महिला राज्य..

सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता. सगळ्या प्रमुख इमारती फुलांच्या माळांनी सुशोभित केल्या होत्या. झगमगत्या दिव्यांची रोषणाई केली होती. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम निश्चित झाला होता. साठ-सत्तर वर्षांपूर्वी असणारे चित्र आता पार पालटून गेले होते. त्यावेळची अबला आता खऱ्या अर्थाने सबला बनली होती. यात सहलेने अवघ्या पुरुष वर्गाला नामोहरम केले होते. समाजात मान वर करून ताठ मानेने हिंडण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. पुरुष प्रधान संस्कृती पूर्णतः लोप पावली होती. संपूर्ण समाज बदलून गेला होता. पूर्वीची जातिव्यवस्था संपून गेली होती. फक्त दोनच जातींची दखल घेतली जात होती; ती म्हणजे स्त्री जात आणि दुसरी पुरुष जात. विशेष म्हणजे या दोन्ही पैकी स्त्री वर्गाचे सगळीकडे वर्चस्व होते. अर्थात हे तिला सहजासहजी मिळाले नव्हते. हा बदल, हे परिवर्तन घडवण्यासाठी अनेक पिढ्यांनी निकराची झुंज दिली होती. यामुळेच हा जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होत होता.

या उलथापालथीमध्ये राज्यांच्या नावावर पण हल्ला झाला होता. महाराष्ट्राचे नामकरण ‘माय-मराठी’ असे झाले होते. मुंबई मुंबईच राहिली होती. ते पुणे बदलून ती ‘पुण्यनगरी’ झाली होती. सोलापूरचे सोलापूर नाव हद्दपार होऊन त्याऐवजी ‘साली सिटी’ अशी नवी ओळख झाली होती. सांगलीचे नाव बदलायची जरूर नव्हती. आई जगदंबेचे कोल्हापूर; ते ही तसेच राहिले होते. काही महिला संघटनांना कोल्हापूर हेच नाव बरोबर वाटत होत तर काहींच्या मते ‘ते कोल्हापूर’ असा उच्चार होत असल्याने ते योग्य वाटत नव्हते. महिलांच्या बहुमताप्रमाणे ‘करवीरनगरी’ असेच नाव त्यांना हवे होते. त्यांच्यामते जेथे करवीर निवासिनी राहते, वसते ती; हो हो: ती करवीर नगरी! हो-ना करता करता अखेर ‘करवीर नगरी’ या नावावर शिक्कामोर्तब झाले. अजूनही कराड, सातारा, नागपूर, चंद्रपूर अशा अनेक गावांचा नावांच्या नावांचा बदल करण्याचा विचार सुरू होता. दूरचित्रवाणीच्या अनेक महिला चॅनल वर यासंदर्भात चर्चा सुरू होती. पुण्यनगरी मध्ये रस्त्यांची नावे सुद्धा बदलली होती. प्रसिद्ध बाजीराव रस्ता आता मस्तानी रस्ता झाला होता. ऐतिहासिक सदाशिव पेठ आता सदाशिव पेठ राहिली नव्हती. ती पार्वती पेठ झाली होती. जिथेजिथे स्त्रीवर्गाचा झेंडा फडकणे शक्य होते तिथे तिथे तो फडकत होता.

सगळा समाज ढवळून निघाला होता. महिलाराज असल्यामुळे खून, दरोडे, चोऱ्या यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. पण साध्या साध्या गोष्टींवरुन भांडणे, रुसवेफुगवे यांना ऊत आला होता. राज्यसभेत साड्याचे, हेअर स्टाईल असे विषयही भांडणांना पुरेसे ठरत होते. सगळ्या आमदाराणींना चारचाकी गाड्या मिळाल्या होत्या. सगळ्यांनी आपापल्या गाडीवर आपल्याच पतिराजांना चालक पदावर नेमले होते. वरवर सगळे सुस्थितीत चालले असले तरी ते काही खरे नव्हते. पुरुष वर्गाची विलक्षण कुचंबणा होत होती. त्यांच्या अस्तित्वाला काही महत्त्वच उरले नव्हते. विज्ञान तंत्रज्ञान आणि मेडिकल सायन्स इतके पराकोटीचे पुढारलेले होते की गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा पुरुषाची गरज स्त्रीला भासत नव्हती. बायोटेक्नॉलॉजी च्या नवनवीन शोधांमुळे टिशू कल्चर, स्टेम सेल्स यांच्या वापरामुळे मिलना शिवाय जीव तयार करण्याचे तंत्र विकसित झाले होते. बहुतांश स्त्रियांना हाच पर्याय सोपा वाटत होता.

 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेम – भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(श्रीधरने नोकरी सोडली .गावी आलो….आता पुढे)

एक दिवस आईनं आपणहून बोलावलं. तेलपीठ लावून न्हाऊ घातलं. पायात सोन्याची जोडवी चढवली. खीर पुरणाचा स्वयंपाक केला. या मायेनं शरीर कातरलं. मन भरलं. थोपवलेले अश्रु वाह्यले.

आण्णा काही बोलले नाहीत पण नमस्कारासाठी वाकले तेव्हां त्यांचा थरथरता हात पाठीवरुन फिरला. .

श्रीधरने अनेक ऊद्योग केले.

शेतीचे प्रयोग झाले. अनेक व्यापारी एजन्सीज घेतल्या.

कारखाना ऊभारण्याची स्वप्नं पाहिली . मित्राबरोबर भागीदारीत कंत्राटदारी केली. पण अपुरा अनुभव आणि अपुरं भांडवल . . यामुळे हाती धुपाटणंच आलं. .

निवडणुका आल्या तेव्हां अनेक ऊठाठेवी करून ऊमेदवारी मिळवली. पण जातीयवादाने ऊचल खाल्ली अन् हाथी  खुळखुळाच आला. .

आणि या सार्‍यात मी कुठेच नव्हते. मला त्याने कधीच विचारले नाही.

वेळोवेळी एव्हढच म्हणायचा,

“एकदा मला यात यश मिळू दे.. तुला सोन्याने मढवेन. मग आण्णा पाहतील.. !!”

मला त्याची दयाही यायची. त्याला सांगावसं वाटायचं”अरे आण्णा तसे नाहीत. तू धरसोडपणा सोड. खरंच  काहीतरी करून दाखव, आण्णा स्वत: तुला जवळ करतील. “एकीकडे आण्णांनाही सांगावसं वाटायचं,”

“श्रीधर महत्वाकांक्षी आहे. पण तुम्ही कोणीतरी त्याच्या पाठीशी ऊभे राह्यलात तर त्याला यश मिळेलही..”

पण मी ना इथली ना तिथली. प्रेमापायी चाललेली ही ओढाताण… त्यात तुटलेली माझी स्वप्नं.. आणि हरवलेली मी….

मी माझ्याच विचारांत हरवले. कितीतरी वेळ.. खोल खोल बुडाले.. नीरजने मागुन येऊन गळ्यात हात टाकले, तेव्हां भानावर आले.

“आई आज्जी आली….”

अगबाई!!

मी पटापट पदरानच तोंड पुसलं. केस गुंडाळले अन् आईला हसतमुखाने सामोरी गेले.

“काय ग आई..? येना. बैस. तू कशाला आलीस इतके जीने चढून..?

मी आईला बसायला पाट दिला. पण आई काॅटवरच बसली.

“बाळ, रागावलीस माझ्यावर? दोन दिवस पाहतेय् तोंड फिरवून आहेस!.”

“नाही ग आई.. तुला ऊगीच असं वाटतंय्.. तुझ्यावर कशाला रागावू? हे बघ मी आता निघालेच होते. आला का हलवाई..?”

“ते राहू दे! हे बघ बैस मजजवळ..”

मला क्षणभर काहीच सुचेना. मनात काहुर माजलं.

काआली आई..?

“हे बघ. काल माझं आण्णांशी खूप भांडण झालं. मी त्यांना म्हटलं, जे झालं ते झालं. शेवटी आपलीच पोर आहे. तिची ही ओढाताण तुम्हाला कशी पाहवते? जन्मभर ही अशी काठीच घेऊन बसणार आहात का तिच्यासाठी?.. बाळ. आण्णांना तु ओळखत नाहीस का? किती माया आहे त्यांची तुझ्यावर…? शिस्तीचे करडे, व्यवहाराला पक्के असले तरी माया मऊ असते.. मी खूप बोल लावले तेव्हां त्यांनी मला सगळी कागद पत्रे दाखवली.”

“अग! सारं काही देणार आहेत तुला! सुरेखाला दिलं नाही त्याहुन तुला देणार आहेत. पण त्यांना ऊतावळेपणा आवडत नाही तू श्रीधरला……”

मग मी आईला थांबवले.

“नको आई. मला काहीच नको. मी कधी मागितलं का..? तो अधिकार मी केव्हांच गमावलाय्. . आणि तुम्हाला वाटतं तसं नाहीय्. . मी सुखी आहे. मला पैसे नको. मालमत्ता नको. तुझी माया आशिर्वाद हेच माझ्यासाठी मोलाचे. . आण्णांनाही हेच सांग. . मी त्यांचीच मुलगी आहे. त्यांचेच संस्कार आहेत मजवर.. माझं मन का इतकं कच्चं आहे..?”

मग मीच आईला समजावले.  नकळत माझ्या दु:खावर वेदनेवर आघात करणारी, काटे टोचणारी आई.. अन् माझ्याचसाठी आण्णांशी भांडणारी माझी आई..

मी नीरजला पटकन् कडेवर घेतलं. त्याचे खूप पापे घेतले.

मी खूप आनंदले. हरवलेलं खूप काहीतरी गवसलं होतं…

“आई तू हो पुढे. मी आलेच. तू आज काहीच करु नकोस. मी सगळ्यांचा डबा घेउन तुझ्याकडेच येते. आण्णांच्या आवडीच्या सुरळीच्या वड्या केल्या आहेत.. छान जमल्यात..”

नीरजला कडेवर ऊचलून काळोख्या जीन्यातून सावकाश पायर्‍या ऊतरणारी, माझी ती वय होत चाललेली आई…

माझ्या डोळ्यातले मोती पटापट ओघळले……

समाप्त

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेम – भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

 (घरच्यांचा विरोधाला न जुमानता  आम्ही लग्न केले… आता पुढे..) 

आमचा संसार सुरू झाला.

मजा हुरहुर  …चॅलेंजिंग वाटायचं.

श्रीधर कामावर जायचा. घरी मी एकटीच.

मला आमचा दुमजली वाडा आठवायचा.

अंगणातल्या वृंदावनापाशी दिवा लावणारी आई, बैठकीत हिशोब लिहीत बसलेले आण्णा, सुरेखा आठवायचे..

त्यांच्या लहानशा जीवनात आपण केव्हढं वादळ निर्माण केलं….??

श्रीधरला कधी म्हटलं, “घरी लवकर येत जा की…”

तो म्हणायचा, “तु ओळखी वाढव..मंडळात जा कुठल्या तरी..”

त्याच्या शब्दातला कोरडेपणा बोचायचा..

याच्यासाठी का मी सगळ्यांना सोडून आले…??

नीरजचा जन्म वर्षातच झाला..

श्रीधरच्या आणि माझ्या नात्यांत वेळोवेळी पोकळ्याच निर्माण होत गेल्या.

आण्णा अजुनही कणखरच होते..

नीरजच्या जन्मानंतर आई औपचारिकपणे येउन गेली.

माझा एका खोलीतला बेताचा संसार बघून डोळे गाळले…

 

क्रमश:——

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेम – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सकाळपासून आईचा हा तिसरा निरोप.

“आज हलवाई येणार आहे ,लाडु बांधायला जरा मदतीला ये..”

सुरेखाचं लग्न आहे .आता काय, पाच सहा दिवसच ऊरले आहेत.सुरेखाचं लग्न ठरल्यापासुन आईची धांदल ऊडाली आहे. लग्नाची खरेदी, मानकरणींच्या याद्या, आमंत्रण पत्रिका, एक ना अनेक. मी समोरच रहात असल्यामुळे माझ्याकडुन हरघडी मदतीची अपेक्षा करणं हे आईच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे..

आईचा ऊत्साह अगदी ऊतु चालला आहे.येणार्‍या जाणार्‍यांना सुरेखाचं अन् सुरेखाच्या भावी पतीचं कौतुक किती करू न किती नको असं झालय् तिला!?

माणसं अगदी हौशी आणि प्रेमळ आहेत..सुधारलेल्या मतांची आहेत.जावईबापूंचा स्वभावही अगदी मोकळा, खेळकर आहे. नशीब काढलं लेकीनं.

तिच्या या कौतुक करण्यावर माझा आक्षेप मुळीच नाही. सुरेखा तर माझी लाडकी बहीण. तिच्या सुखात मलाही तितकाच आनंद आहे, पण त्या दिवशी, देशमुख काकू आल्या होत्या. आईच्या त्या खास जवळच्या… बोलता बोलता आई त्यांना म्हणाली,

“खरं म्हणजे सुमनच्या लग्नाची माझी सगळी हौस बाकी राहिली. पोरीनं ऐकलच नाही. आता पश्चात्ताप करून काय ऊपयोग? आण्णा तर नुसते विषण्ण झाले होते. त्यांच्या प्रकृतीवरही तेव्हांपासुन किती परिणाम झाला.. पण आता हे लग्न ठरल्यापासून मनावरचं सावट जरा दूर झालंय्…”

आईनं कमीत कमी ,मी तिथेच असताना,मला काय वाटेल याचा विचार करायचा होता… तेव्हढंही भान तिने ठेऊ नये…??

आईकडून संध्याकाळी घरी परतले ती एक वेदना घेऊनच.हजारवेळा मनाला बजावलं,

“आईचं बोलणं ते…इतकं काय मनावर घ्यायचं?

शिवाय आपल्या आईचा स्वभावच आहे तो!

बोल बोल बोलण्याचा.मागाहून तिलाच वाईट वाटेल.. पण नाहीच. त्यादिवशी मनावर घावच बसला होता.

आणि कळत नकळत हे सतत जाणवत होतं की सुरेखाचं लग्न जमल्यापासून आपल्या मनाचा कुणीच विचार करत नाहीय् .आपण स्वत:चं म्हणून जे काही जपत असतो त्यावरच प्रहार होताहेत्….

मी श्रीधरशी लग्न केलं ते आईवडीलांच्या कडक विरोधाला डावलून.. विरोधाला विवीध कारणे होती.

जातीचं कारण दुय्यम असलं तरी रुढीप्रिय मनाला खटकणारं होतच.

श्रीधरची कौटुंबिक पार्श्वभूमी. श्रीधरच्या वडीलांविषयी आण्णांच्या मनात खोलवर रुजलेला अनादर, आकस होता. श्रीधरच्या वडीलांची गावात, एक चमत्कारिक लहरी व्यक्ती म्हणून ख्याती होती. या माणसाने आयुष्यभर नुसत्या बढाया केल्या. वाडवडीलांच्या इस्टेटीवर रूबाब केला.. त्यांच्या ऐदीपणावर आण्णांचा राग होता आणि तशा घरात मी सून म्हणून जावं हे मूळातच त्यांना पसंत नव्हतं… पण श्रीधर आणि मी तारुण्यसुलभ प्रीतीने बांधले गेलो होतो.

माझ्यात आणि श्रीधरच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.. धाकदपटशा.. घराबाहेर पडायची बंदी .. वगेरे अनेक.. पण एक दिवस संधी साधून श्रीधरने मला सांगितले,

“आहे त्या स्थितीत, जशी असशील तशी, माझ्याबरोबर येण्याची तयारी असेल तर चल. आपण लग्न करु. मी तुला अंतर देणार नाही……”

श्रीधरच आणि माझं एक भावविश्व होतं संसाराचे मनोरे आम्ही बांधले होते.

आम्ही वेळ, संकेतस्थळ ठरवून कुणाला नसांगता घराबाहेर पडून लग्न केलं… शिस्तीत संस्कारात वाढलेली मी… कसं केलं हे धाडस…

श्रीधरच्या नोकरीच्या गावी एका खोलीत संसार थाटला.. श्रीधरने आई आण्णांना एक जुजबी पत्र टाकलं.

आशिर्वाद मागण्यासाठी. पण माघारी ऊत्तर आले नाही.. आमचा संसार सुरू झाला.

 

क्रमश:——

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print