मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पीड लिमिट… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ स्पीड लिमिट… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

माने हवालदार, एका गुन्ह्याच्या तपासासाठी, इन्स्पेक्टर भोसले यांना घेऊन पुणे शहराबाहेर दौंडच्या दिशेने गेले होते. काम संपवून दोघे पुन्हा त्यांच्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीजवळील फरासखाना पोलीस स्टेशनला परतत होते.

अचानक एक लाल रंगाची 2 सीटर मर्सिडीज गाडी वाऱ्याच्या वेगाने त्यांना ओव्हरटेक करून झपकन पुढे निघून गेली. आज भोसल्यांकडे वाहतूक शाखेतल्या त्यांच्या एका मित्राची स्पीड गन होती. त्यांनी सहज त्या मर्सिडीजचा स्पीड तपासला, आलेला आकडा पाहून त्यांचे डोळे विस्फारले.

“साहेब, स्पीड बघितला का त्याचा ? घ्यायचा का याला खोपच्यात ?” ॲक्सीलरेटरवर पाय दाबत माने विचारते झाले.

“माने, खरंतर, तीन कारणांनी आपल्याला असं काही करता येणार नाही. एक म्हणजे आपण वाहतूक पोलीस नाही, दुसरं म्हणजे सकाळी येताना मी पाहिलं होतं, यवतपासून दौंडपर्यंत, महामार्गाच्या दोन्ही बाजूला वेग मर्यादा दाखवणारे फलक नाहीत, किंवा असले तरी पडलेले आहेत.

आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे, त्याला पकडण्यासाठी, आपण त्याला गाठणार कसं ?” भोसले.

आपल्या प्रश्र्नातील फोलपणा मान्यांच्या लक्षात आला, ते मुकाट्याने गाडी चालवू लागले. पण ते एक दोन किलोमीटर गेले असतील, नसतील, त्यांचं लक्ष डावीकडच्या “कांचन” हॉटेलकडे गेलं, आणि त्यांचे डोळे लकाकले.

ती लाल मर्सिडीज तिथे उभी होती.

“साहेब, चान्स आहे. सोडू नकोया. ” भोसले काही बोलायच्या आत मान्यांनी गाडी मर्सिडीजच्या मागे थांबवलीच.

बाकी काही नाही तर केवळ ती सुंदर तितकीच पॉवरफुल गाडी जवळून बघण्यासाठी भोसले खाली उतरले.

“माने, मर्सिडीजची AMG GT आहे ही. जवळजवळ ४ लिटरचे इंजिन आहे. आपल्या स्कॉर्पिओच्या साधारण दुप्पट ताकदीचे. ० ते १०० किलोमीटर स्पीड ३ सेकंदात घेते हे गाडी, आहेस कुठे ?”

“कितीला भेटते हो, साहेब ? आणि average काय आहे हिचा ?”

“माने, काय पुढच्या पगारात दोन चार विकत घेताय की काय ? दोन कोटींच्यावर किंमत आहे गाडीची. एका लिटरला बारा किलोमीटरचा average देते, पण जो दोन कोटींची गाडी घेतो, तो असले हिशेब करत असेल, असं वाटत नाही.”

त्यांचं हे बोलणं चाललं होतं, तेवढ्यात एक अठरा एकोणीस वर्षांचा पोरगेलासा तरुण साधारण त्याच्याच वयाच्या, फॅशनेबल तोकडे कपडे घातलेल्या, त्याच्या मैत्रिणीसोबत आला. गाडीजवळ पोलीस पाहून तो हसला, “काय मामा, काय झालं ? स्पीड लिमिट तुटली का ?” थोड्याशा उर्मटपणे विचारत, तो बोलू लागला.

“हो, गाडी खूपच भरधाव चालली होती. ” भोसले.

“तरी किती ? १५० होता का स्पीड ?”

“नाही, १४६ होता. “

“श्या. लास्ट टाईम १५० क्रॉस केला होता आपण. बेब, तू असलीस ना की गाडी चालवण्यावर लक्ष नाही रहात माझं. ” तिला कोपरखळी मारत, या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या हिरोची टकळी सुरू होती.

“गाडीचं RC Book, तुझं लायसन्स पाहू. ” भोसले.

त्याने बेफिकिरीने ती दोन्ही कार्ड्स भोसल्यांकडे दिली.

मान्यांना वाटलं की RC book पाहून भोसल्यांच्या चेहऱ्यावर अस्फुट स्मित उमटलं, का तो भास होता ?

“एक काम करा सर, तुम्ही आता. तुम्ही आता आमच्या गाडी मागोमाग तुमची गाडी घ्या. आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. ओव्हरटेक करून भरधाव गाडी चालवू नका आणि मध्येच कुठे कलटी मारू नका. असं केलंत, तरी, तुमची तुमच्या घरी भेट होईपर्यंत मी तुमच्या घरी थांबणार आहे, एवढं लक्षात ठेवा. “

“Whatever. तुला माहित असेलच की तू माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवू शकत नाहीस, एकतर तू ट्रॅफिक पोलीस नाहीस आणि दुसरं म्हणजे या स्ट्रेचला कुठेच स्पीड लिमिटचा बोर्ड नाही. मी कायद्याने सज्ञान आहे आणि कोणतेही नशापाणी न करता गाडी चालवत आहे. ” तो बेफिकिरीने बोलत होता, “आणि गाडी स्लो नेली तर मला तेवढाच जास्त वेळ बेबला देता येईल. “

भोसल्यांचा एकेरी उल्लेख ऐकून मान्यांचा पारा चढू लागला होता, भोसल्यांनी खुणेनेच त्यांना शांत केलं.

“आपला कायद्याचा अभ्यास कौतुकास्पद आहे, सर. या आता आमच्या मागोमाग. ” भोसल्यांनी विषयावर पडदा टाकला.

रमतगमत माने आणि त्यांच्या मागे ती मर्सिडीज, यांची वरात, सदाशिव पेठ, पुणे – ३० इथे एका बंगल्यासमोर थांबली. गाडी जशी बंगल्याजवळ येऊ लागली, तशी भोसल्यांच्या सांगण्यावरून, मान्यांनी गाडीचा सायरन, लाइट्स सुरू केले होते.

बंगल्याबाहेरील नावाची पाटी बघून माने चपापले. ” साहेब, हा तर हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश मॅडमचा बंगला आहे. ” सायरन बंद करण्यासाठी हात पुढे करत माने म्हणाले.

भोसल्यांनी त्यांना थांबवलं, सायरन चालूच ठेवला. सदाशिव पेठेच्या नीरव शांततेत तो आणखीनच भेदक वाटत होता. मर्सिडीजमधून उतरून तो तरुण सायरन बंद करायला सांगत होता.

आवाज चालूच राहिल्याने काय गडबड आहे ते पाहायला आजूबाजूच्या बंगल्यातील लोक दारात येऊ लागले होते. अखेर न्यायाधीश महोदया यांनी दार उघडलं आणि त्या बंगल्याच्या दरवाज्यात आल्या.

भोसल्यांनी सायरन बंद केला, आणि विनम्रतेने तो तरुण आणि ती मुलगी यांना एस्कॉर्ट करत ते न्यायाधीश मॅडमपर्यंत पोचले. मॅडमना कडक सॅल्युट ठोकला.

“ऑफिसर, काय तमाशा आहे हा ?”

“नाही, काही नाही, मॅम. ” तो तरुण काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे आणि विशेषत: तोकड्या कपड्यातल्या त्या तरुणीकडे जळजळीत कटाक्ष टाकून मॅडमने त्याला गप्प केलं. आणि प्रश्नार्थक नजर भोसल्यांकडे वळवली.

“मॅडम, तमाशा काही नाही. सर गाडी खूप वेगात चालवत होते, मी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करू शकत नाही, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं, मॅडम. त्यांना सुरक्षित घरी सोडावं, केवळ म्हणून त्यांच्याबरोबर आलो, मॅडम. ” भोसले निवांतपणे सांगत होते. आणि मॅडमचा चेहरा लाल पिवळा होत होता, बहुधा गाडी बेफाम चालवण्याची त्याची ही पहिली खेप नव्हती.

“तुला फार कायदा कळतो का रे ?” त्या मुलाला उद्देशून विचारत होत्या, आणि मुलगा त्यांची नजर चुकवत होता. “गाडी माझ्या नावावर आहे. माझी परवानगी घेतली होती का ? गाडी चोरीला गेली म्हणून तक्रार केली मी तर काय होईल कल्पना आहे का ?” 

आपण तिऱ्हाईतासमोर आपल्या मुलाशी बोलत आहोत याचं भान त्यांना आलं आणि त्या थांबल्या. “ऑफिसर, तुम्ही जा आता. तुम्ही अतिशय योग्य काम केलं आहेत.” 

भोसल्यांनी पुन्हा कडक सॅल्युट ठोकला, आणि ते बाहेर जाऊ लागले. “सर, हे माझं कार्ड ठेवा. कधीही काही अडचण आली तर आवर्जून फोन करा. तुमच्यासारख्या सज्जनांच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, सर. “

हसत हसत भोसले बंगल्याबाहेर पडले, आणि तो तरुण न्यायाधीश आईच्या कचाट्यात सापडला.

स्पीड लिमिट तोडणे तर दूरच, पण आता कित्येक दिवस ती मर्सिडीज त्याच्या हाती लागणंही आता कठीण दिसत होतं.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “टिश्यू पेपर…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “टिश्यू पेपर…” ☆ श्री मंगेश मधुकर 

घरात आल्यावर भाजीची पिशवी आईकडं देऊन खोलीत गेलेला रघू हाक ऐकून बाहेर आला. 

“भाजी आणली.आता काय??”

“थोडं बोलायचं होतं.’

“कशाबद्दल”

“नेहमीचा विषय.”

“आज नको”

“मग कधी? अरे,मी काय आयुष्यभर पुरणार नाही. चाळीशीला आलास आता तरी…”

“एकटाय तेच बरयं. जाऊ दे ना.”

“आता कोणाची वाट बघतोयेस.”

“ कोणी सांगितलं.काहीही काय ”

“ मला सगळं कळतं. अजून मालती परत येईल अशी आशा आहे ना ”

“ एकदम मालतीची आठवण?” रघूनं आश्चर्यानं विचारलं. 

“ मुद्दामच ”

“ भेटली होती का?.”

“ खूप दिवसात भेट नाही आणि फोन पण नाही ”

“ बघ,मी सांगत होते तसंच झालं. परिस्थिती बदलली अन ही बयासुद्धा..”

“ जाऊ दे. यावर बऱ्याचदा बोललोय.”

“ पण काही उपयोग झाला का?सगळं पालथ्या घड्यावर पाणी !!”

“ आई!!” रघू वैतागला. 

“ माझ्यावर कशाला ओरडतो. तिला खडसावून विचारायचं तेव्हा मूग गिळून गप्प बसलास.”

“ आता काय तिचं थोबाड फोडू म्हणजे तुझं समाधान होईल.”

“ शक्य आहे का?.”

“ अजूनही ती माझा मान ठेवते ”

“ इतक्या दिवसात साधी विचारपूस केली नाही.यावरूनच कळलं.”

“ तोंडाला येईल ते बोलू नकोस.”

“ अजून तिच्याबद्दल पुळका आहे.”

“ तू समजतीस तितकी वाईट नाहीये. आमच्यात काही गैरसमज झाले म्हणून.” 

“ कसला बोडक्याचा गैरसमज !! गरज संपली म्हणून सोडून गेली.”

“ असं काही नाही. आमची मैत्री होती, आहे आणि पुढेही राहणार ”

“ रघ्या,अगदी भोळा सांब आहेस रे !!”

“असू दे ”

“ मला वाटलं त्यापेक्षा ती जास्त चलाख निघाली. फसलेला प्रेमविवाह, तुटलेलं माहेर आणि घटस्फोट अशा पाठोपाठच्या घटनांमुळे एकटी होती. अशावेळी नेमका तू भेटलास, आणि तिला हवा असलेला आधार मिळाला.”

“ मग त्यात वाईट काय झालं ? ”

“ तिच्या बाजूनं म्हणशील तर काहीच नाही. तुझ्यामुळे ती सावरली. आत्मविश्वास परत मिळाला.आयुष्य मार्गी लागलं. हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर मोठया कंपनीत ऑफिसर झाली.”

“ चांगलंच झालं ना ”

“ हो ..  पण तू जिथं होतास तिथंच राहिलास. नुकसान तर तुझंच झालंय.”

“ नोकरी, स्वतःचं घर, खाऊन पिऊन सुखी. अजून काय पाहिजे “ 

“ यापलीकडे सुद्धा आयुष्य असतं. परिस्थिती, वस्तुस्थिती आणि मालती सगळं बदललं. तू नाहीस.  अजून  किती दिवस असा कुढणार.? ”आई चिडली.

“ मागचं विसरायचा प्रयत्न करतोय. तूच पुन्हा विषय काढलास ”

“ तुमची जोडी छान होती, परंतु मनात धास्ती होती.”

“ कसली ? ”

“ ती कधीही सोडून जाईल याची.”

“ असं वाटायचं कारण?” 

“ दोघांचे टोकाचे स्वभाव !! तू हळवा तर ती व्यवहारी. तू चटकन भावूक होणारा तर ती फटकळ, नको इतकी स्पष्ट बोलणारी. तू आहे त्यात समाधान मानणारा तर ती प्रचंड महत्वकांक्षी .”

“ तरीही आम्ही एकमेकांना समजून, सांभाळून घेतलंच ना. आमचं छान नातं होतं. ”

“ डोंबलाच नातं !! एकमेकांच्या प्रेमात होतात .”

“ आधी होतो..  पण स्वभावातला फरक लक्षात आल्यावर सावरलो. नंतर फक्त मैत्री होती.”

“ आता तर ती सुद्धा राहिली नाही. तुमचे मार्ग वेगवेगळे आहेत. तू अजूनही झुरतोयेस. ती मात्र आयुष्यात स्थिरावली. आता ती थांबणार नाही. पुन्हा लग्न करून मोकळी होईल ”

“ माहितेय ”

“ आणि तू काय असाच दुसऱ्याला मदत करण्यात आयुष्य घालवणार? अजून किती दिवस भलेपणाची मशाल घेऊन फिरणारेस ? ”

“ शक्य होईल ती मदत करत रहायचं.”

“ म्हणजे लोकांना स्वतःला वापरायला द्यायचं.असंच ना.”

“ तुझ्या मनात मालतीविषयी पहिल्यापासूनच अढी होती. कामाच्या व्यापात आमच्या भेटीगाठी, बोलणं कमी झाल्या. एवढंच, बाकी काही नाही. नोकरीत स्थिरावल्यावर मालती जास्तच फटकळ,आक्रमक झाली हे देखील मान्यय.”

“ याविषयी सावध केलं होतं..  पण तू लक्ष दिलं नाही.”

“ जे झालं ते झालं.आता त्यावर चर्चा करून काय उपयोग !! तिच्याविषयी राग नाही. अडचणींवर मात करत तिनं मिळवलेल्या यशात खारीचा वाटा आहे याचाच आनंद आहे.”

“ त्याच खारीच्या वाट्याची किंमत पाठवलीय. हे घे ”

“ म्हणजे? ” आईनं पाकीट रघूच्या हातात दिलं. पन्नास हजाराचा चेक पाहून रघूला मोठा धक्का बसला. प्रचंड राग आला. मनात खूप खोलवर जखम झाली. 

“ तुझ्या मदतीची चांगली परतफेड केलीय.” आई. 

“ काय बोलू !! तू तिला बरोबर ओळखलं मीच तिला समजून घ्यायला चुकलो. तुझा विरोध डावलून भाड्यानं खोली घेऊन दिली. लोक काय म्हणतील याची पर्वा केली नाही. आमच्याविषयीचे टोमणे, शेरेबाजी सगळं सगळं सहन केलं, पण तिची साथ सोडली नाही. त्याचं हे फळ मिळालं.” .. रघू.

“ आता काय करणायेस ? ”

“ हा भिकेचा चेक परत पाठवणार. ”

“ शाबास !! आवर्जून तिला सांग की सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या नसतात. काही नाती ही व्यवहारा-पलिकडची असतात. ”.

“ हा चेक म्हणजे आमच्या नात्याचा पूर्णविराम.” 

“ दुनियदारीत बऱ्याचदा स्वार्थ हा भावनेपेक्षा मोठा ठरतो. चेष्टा होईल इतकंही माणसानं चांगलं वागू नये.” .. .. आई 

“ खरंय !! आतापर्यंत ऐकलं होतं की माणसं गरजेपुरती वापरली जातात आणि गरज संपली की??? माझ्या बाबतीत तेच घडलं. एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की मालतीला खूप जवळचं, हक्काचं माणूस समजत होतो पण तिच्यासाठी मी फक्त एक टिश्यू पेपर…….” .. भरून आल्यानं रघू पुढे बोलू शकला नाही.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आक्रित — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ आक्रित ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आज सकाळी मंजिरी बँकेत, ऑफिसला पोहचली, तर ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता. धनश्री परांजपेंनी, म्हणजे असिस्टंट मॅनेजरने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिलाय, तोही आगाऊ नोटीस न देता, लगेच स्वेच्छानिवृत्ती हवीय. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. काय कारण असेल यावर तर्क – वितर्क आणि चर्चा सुरू झाली होती. शेवटी चीफ मॅनेजरने केबिनमधून बाहेर येऊन, ‘आता कामाला लागा’, अशी आज्ञावजा सूचना केली, तशी प्रत्येकजण आपापल्या जागेवर गेला. काम करता-करताही एकीकडे कुजबुज चालू होतीच या विषयावर ! 

धनश्री मॅडम म्हणजे मूर्तिमंत उत्साह ! परांजपे आडनावाला शोभणारा केतकी वर्ण, किंचित तपकिरी झाक असलेले घारे पण चमकदार डोळे, अगदी चाफेकळी नाही, पण चेहऱ्याला शोभणारं सरळ नाक, एकूण चेहऱ्यातच गोडवा होता त्यांच्या. कमरेपर्यंत लांब केस, बऱ्याचदा फक्त छोट्या पिनेत अडकवलेले असायचे. वय पंचावन्नच्या आसपास, उंची साडेपाच फूट आणि सुखवस्तूपणा दर्शवणारा पण आटोपशीर बांधा. साडी/ड्रेस साधाच पण नीटनेटका आणि फेसपावडर व्यतिरिक्त कोणतंही प्रसाधन त्या वापरत नसत. 

नेहमी हसतमुख आणि सगळ्यांशी मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव. हं पण कामात हयगय केलेली नाही चालायची अजिबात ! मग एकदम दुर्गावतार धारण करायच्या त्या ! पण हे फारच क्वचित घडायचं. शक्यतो गोड बोलून, समजावून काम करण्याची त्यांची पद्धत होती आणि स्वतः कोणतंही काम करायची तयारी असायची. एकदम झोकून देऊन काम करणार ! यामुळे सगळा स्टाफ त्यांच्या प्रेमात असला तरी आदरयुक्त धाकही होता त्यांचा ! त्यांचे यजमान एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी होते. सासू – सासरे कधी पुण्यात मोठ्या दिरांकडे तर कधी अमरावतीला या मुलाकडे असायचे. 

त्यांची दोन्ही मुलंसुद्धा एकदम हुशार ! मुलगी तनया एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला, मुंबईत हाॅस्टेलला होती. मुलगा सोहम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर… नुकतंच इन्फोसिसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि तो मैसूरला नोकरीवर रुजू होणार होता. धनश्री मॅडम रोज ऑफिसला कारनेच यायच्या. म्हणतात ना एखाद्याला देव छप्पर फाड के देतो, अगदी तस्सच धनश्री मॅडमच्या बाबतीत होतं. 

घरात स्वैपाकाला बाई होती. पण यांना स्वतःला पण काही ना काही पदार्थ बनवायची भारी हौस होती. आणि मग ऑफिसला येताना तो पदार्थ मोठ्या डब्यात भरून आणायचा आणि सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालायच्या. करणंही एकदम टकाटक असायचं, एकदा खाल्लेल्या पदार्थाची चव कित्येक दिवस रेंगाळत राहायची सगळ्यांच्या मुखी. 

ऑफिसच्या कामात तर अव्वल होत्याच त्या. पण पिकनिक असो, हळदीकुंकू असो, कुठलाही विशेष दिवस साजरा करणं असो, सगळ्या उपक्रमातही तेवढ्याच उत्साहाने त्या सहभागी व्हायच्या. त्यांच्या हाताखाली जवळजवळ तीसेक कर्मचारी होते. पण कोणाला काय चांगलं जमतं, कोण काय काम करू शकतं याबाबत त्यांचं निरीक्षण आणि अंदाज अगदी अचूक असायचा. त्यामुळे या ब्रँचचा आणि मॅडमच्या नावाचा हेड ऑफिसमध्येही दबदबा होता. चीफ मॅनेजरना कधी प्रशासनिक कामांमध्ये दखल द्यायची वेळच यायची नाही धनश्री मॅडमच्या कर्तबगारीमुळे ! त्यामुळेच कोणाला काही न सांगता – सवरता त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज का केला हे सगळ्यांना कोडंच पडलं होतं.

मंजिरी धनश्री मॅडमच्या हाताखालची क्लासवन ऑफिसर. आता मॅडम नसल्याने सगळी जबाबदारी आत्तातरी तिलाच सांभाळावी लागणार होती. ती फ्रेश होऊन जागेवर आली आणि चीफ मॅनेजरनी इंटरकॉम करून तिला केबिनमध्ये बोलावलंच. त्यांनी जे सांगितलं त्यावर तिचा विश्वासच बसेना. पण चीफना ही माहिती हेड ऑफिसमधून स्वतः पर्सनल मॅनेजरनी फोन करून सांगितली होती आणि पर्सनल मॅनेजरना धनश्री मॅडमचे पती आणि मुलगी यांनी, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं भागच होतं. पण या प्रकाराची वाच्यता ती कोणाकडेच करणार नव्हती. मॅडमच्या आजवरच्या प्रतिमेला धक्का लागू नये याची काळजी ती नक्कीच घेणार होती. कोणावर कधी कशी वेळ येईल काय सांगावं? 

धनश्री मॅडमचा मुलगा पुढच्या आठवड्यात मैसूरला नोकरीवर रूजू होणार होता. त्यासाठीच मॅडमनी पंधरा दिवस रजा घेतली होती. त्याला भेटण्यासाठी त्यांची मुलगीदेखील मुंबईहून आली होती. आठ दिवसांपूर्वी संध्याकाळी आई आणि दोन्ही मुलं काही खरेदी करण्यासाठी माॅलमध्ये गेले होते. खरेदी करून पेमेंट करून बाहेर पडताना सिक्युरिटीने नेहमीप्रमाणे त्यांच्या बॅग, पर्स तपासल्या आणि.. आणि… त्यांना बाहेर पडायला मनाई केली… ..  

… धनश्री मॅडमच्या हातातल्या छोट्या पर्समध्ये चार-पाच वस्तू अशा सापडल्या होत्या, की ज्या त्यांनी बिलिंग काउंटरवर दाखवल्या नव्हत्या आणि त्याचे पैसे दिले नव्हते. बरं वस्तू तरी काय? तर नेलपेंट, कंगवा, कॅडबरीसारखं एक चाॅकलेट, की-चेन, रंगीत खोडरबर अशा, की ज्याची किंमत जेमतेम शंभर-दीडशे रुपये झाली असती. पण त्या सर्व वस्तूंवर माॅलचा टॅग तर होताच. मॅडमच्या त्या पर्समध्ये सात हजार कॅश, दोन ए. टी. एम. कार्ड सुद्धा होती. ती बघून तो सिक्युरिटीसुद्धा गोंधळात पडला, की ही बाई अशा फालतू वस्तू का चोरेल? 

धनश्री मॅडमनी पण आश्चर्य व्यक्त केलं की या वस्तू माझ्या पर्समध्ये कशा आल्या? तनया आणि सोहम एकदम चकितच झाले. पण त्यांनी आईचा काहीतरी गोंधळ झाला असावा असं म्हणून बाजू सावरून घेतली. काउंटरवर जाऊन साॅरी म्हणून त्या वस्तू परत केल्या. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईच्या कपाटात इस्त्रीचे कपडे ठेवताना, तनयाला एक प्लॅस्टिकची हँडबॅग दिसली. उत्सुकता म्हणून सहज तिनं बघितलं तर लहान – मोठ्या अनेक वस्तूंचा खजिनाच तिच्या हाती लागला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यात चष्मा, लिपस्टिक, फेसवाॅश, छोटी कार, मनीपर्स अशा ज्या वस्तू सापडल्या त्या तिची आई वापरणं शक्यच नव्हतं.

ती आईला बोलावून विचारणारच होती, हे कोणाचं सामान आहे म्हणून. पण तेवढ्यात तिला त्या बॅगेत तिच्याच मैत्रिणीनं वाढदिवसाला दिलेला एक शो पीस सुद्धा दिसला. जो दुसर्‍याच दिवशी तिच्या खोलीतून गायब झाला होता आणि सगळीकडे शोधून सापडला नाही म्हणून तिनं घर डोक्यावर घेतलं होतं. 

तनया वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. हे काही तरी वेगळं आहे. कालचा माॅलमधला प्रसंग तर ताजाच होता. तिनं ती बॅग गुपचूप तशीच जागेवर ठेवून दिली. मग तिनं सोहमला आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. ती दोघं मग कालच्या माॅलमध्ये गेली. तिथल्या मुख्य व्यवस्थापकाशी बोलून त्यांनी काल संध्याकाळचं सी. सी. टि. व्ही. फूटेज दाखवण्यासाठी त्यांना विनंती केली. आणि ते खरेदी करत असतानाचं चित्रीकरण बघताना, आपल्याला आलेली शंका रास्त आहे, याबद्दल तनयाची खात्रीच पटली. कॅमेऱ्यात धनश्रीनेच त्या वस्तू आपल्या पर्समध्ये टाकल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिनं समजावून सांगितल्यावर सोहमही तिच्याशी सहमत झाला. 

तनयानं तिच्या मैत्रिणीच्या आईशी संपर्क साधला, जी मानसोपचार तज्ज्ञ होती. तिनं हा क्लॅप्टोमेनिया नावाचा आजार असू शकतो असं सांगितलं. हा एक आवेग नियंत्रण विकार आहे. या आजारात व्यक्तीमध्ये कोणतीही वस्तू चोरण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मग ती वस्तू तिच्या उपयोगाची असो किंवा तिला त्या वस्तूचे काही महत्त्व असो नसो. ही व्यक्ती चोरी करण्यापूर्वी तणावात असते आणि चोरीनंतर तिला आनंद, समाधान मिळते. अशा व्यक्तींना चोरी करण्याची इच्छा किंवा आवेग इतका तीव्र असतो, की त्या स्वतःला थांबवूच शकत नाही. या व्यक्ती सहसा सार्वजनिक जागा म्हणजे दुकानं, सुपरमार्केट, ऑफिस अशा ठिकाणी चोरी करतात. काही वेळा ओळखीच्या किंवा मित्रांकडील समारंभातही चोरी करतात. या चोरीतून त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नसतो. या व्यक्तींना आपण पकडले जाऊ, आपल्यावर चोर असा शिक्का लागेल  अशी जाणीवही अनेकदा असते, पण त्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. 

क्लॅप्टोमेनिया होण्याचं निश्चित कारण अजून ज्ञात नाही. त्यावर संशोधन चालू आहे. हा आजार कोणत्याही वयात आणि कोणालाही होऊ शकतो. मेंदूतील सेरोटोनिन या संप्रेरकाची खालावलेली पातळी हे त्याचं एक कारण असू शकतं. कारण हे सेरोटोनिन आपल्या भावना आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. आतापर्यंत या रोगावर ठोस, सुयोग्य उपचार नाहीत. पण मानसिक आरोग्याशी निगडित उपचार घेणे आवश्यक आहे. आणि या उपचारांचा कालावधी निश्चित सांगता येत नाही. म्हणूनच धनश्री मॅडमच्या घरच्या मंडळींनी विचार – विमर्श करून आणि त्यांचं समुपदेशन करून, स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायला त्यांना तयार केलं होतं. त्यामुळे योग्य उपचारासाठी त्यांना वेळ मिळणार होता. ऑफिससारख्या ठिकाणी अनुचित प्रकार होऊन त्यांची मानहानी होऊ नये हाही उद्देश होताच. 

दोन-तीन दिवसात मॅडमच्या जागी कोणाचीतरी नियुक्ती करण्यात येणारच होती. कारण ऑफिसच्या कामाच्या दृष्टीने हे जबाबदारीचं पद रिकामं ठेवता येणार नव्हतं. मॅडमचं टेबल नवीन येणाऱ्या मॅनेजरसाठी व्यवस्थित आवरून ठेवण्याची जबाबदारी चीफनी मंजिरीवर टाकली होती. संध्याकाळी काम आवरून आणि बहुतेक सगळे जण गेल्यावरच तिनं ते करायला घेतलं. त्या टेबलच्या उजव्या बाजूच्या खालच्या ड्राॅवरमध्ये मंजिरीला कर्मचाऱ्यांच्या अनेक वस्तू आढळल्या, ज्या नजीकच्या काळात हरवल्या होत्या. छत्री, लंचबाॅक्स, पंचिग मशीन, स्टॅपलर, पेपरवेट ज्यावर वस्तू कोणाची हे ओळखू येण्यासाठी कर्मचारी आपलं नाव कोरून अथवा काही तरी खूण करून ठेवत. पण त्याचं मूल्य किरकोळ असल्याने त्याचा फारसा गाजावाजा कोणी केला नव्हता. मॅडम रजेवर गेल्या काय आणि आता अशा प्रकारे स्वेच्छा निवृत्ती घेतात काय, मंजिरीला सारंच अतर्क्य वाटत होतं. —- 

 — आता धनश्री मॅडमवर मानसोपचार सुरू आहेत व त्यातून त्या बऱ्या होतील याकडे कुटुंबातील सर्वांचंच लक्ष आहे. 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपाण पाहिले –  भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व. अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला. ता इथून पुढे)

आयुष्याच्या ओघात तसे बदलही  खूप झाले. आई गेली तेव्हा दुःख झालेच, पण जेव्हा वासूचे अकस्मात निधन झाले तेव्हां डीव्ही पार कोसळले.  एक अंग गळून पडल्यासारखं त्यांना वाटलं.  डीव्ही  हे नावच त्यांना तुटल्यासारखं वाटलं.  स्वस्तिक म्हणजे दोन रेषा, एक आडवी एक उभी.  एक रेषा जणूं पुसली.  हा आघात खूप मोठा होता.  पण हळूहळू त्यातूनही सारं काही सावरलं गेलं. आयुष्य पुढे जातच.  जावं लागतं.

स्वस्तिकचा पसारा वाढतच होता.  आता वयात आलेली त्यांची उच्चशिक्षित तरुण  मुलं आणि सुनाही हळूहळू प्रवेशत होत्या.  नाविन्य येत होतं. आधुनिकतेतनं रूप पालटत होतं.  अधिक मोठं, त्याहून मोठं! अधिक वेगळं, दैदीप्यमान, जे आजपर्यंत नव्हतं ते आता प्रथमच, या भव्यतेत,  दिव्यतेत डोळे दिपवून टाकणाऱ्या स्वप्नांच्या प्रदेशात, एक एक पाऊल पुढे जात असताना नक्की काय झाले कळलेच नाही.  वाटेतच काही गणितं चुकली.  आराखडे चुकले.  अंदाज खोटे ठरले.  आश्वासनं  पोकळ ठरली. फसवणूक झाली की झेपच पेलवली नाही?  कित्येक कोटींच्या ड्रीमलँड प्रोजेक्टमध्ये इन्वेस्टरची पंधरा टक्के गुंतवणूक झालेलीच होती. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झालेल्या असतानाही काही परदेशी बँकांनी मंजूर केलेली कर्जे ऐनवेळी देण्यास नकार दिला.  आणि सगळी उलथापालथ  झाली.  आधी घेतलेली स्थानिक बँकांतील कर्जे, त्यांचे हप्ते, कॅश क्रेडिट चे अकाउंट्स, स्टॉक अकाउंट्स  सर्वांच्या हिशोबात प्रचंड गडबड झाली. नोटिसांवर नोटीसा येऊ लागल्या.  वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या उलट सुलट बातम्यांमुळे चालू प्रोजेक्ट्सना खिळ बसू लागली. आणि या सगळ्यांमध्ये गुंतवलेला पैशांचा धबधबा एकदम कोसळला.  संपूर्ण आयुष्य डेबिट झालं. प्रचंड उणे.  मायनस.

” अहो माझं ऐकून तरी घ्या!”  या विनवण्यांना कायद्यामध्ये सहानुभूती नसते.  गुन्हेगारीच्या चक्रात डीव्ही पार अडकले.

” माणसं दिसतात तशी नसतात,  अखेर पैसाच माणसाला विचलित करतो.  वाममार्गाला नेतो.”

” काय गरज होती यांना? हे असे फसवणुकीचे धंदे करण्याची? ”

” लोक केवळ यांच्या नावावर भुलले आणि यांनी काय केलं स्वतःच्या झोळ्या भरल्या. भोगा आता.”

“विश्वासघातकी,भ्रष्टाचारी, चोर”

अशा अनेक तलवारींनी डीव्हींच्या काळजावर अक्षरशः वार केले.  प्रॉपर्टीज सील होत होत्या.  अटक सत्रं चालू होती.  मुलं, सुना कुठे कुठे दूर देशी नातेवाईकांकडे निघून गेले. काही हितचिंतकांनी डीव्हींनाही पळून जाण्याचा सल्ला दिला.  त्यातले काही राजकीय वर्तुळातलेही होते.

पण डीव्ही. शांत होते. अविचलित होते.  पलायनवाद त्यांना मान्य  नव्हता. चूक झाली होती. शिक्षा भोगायला हवी. त्यांना अजून अटक झालेली  नव्हती.  तत्पूर्वी न्यायालयीन चौकशी समिती समोर होणाऱ्या चौकशीला ते सामोरे जाणार होते.

ते सकाळी उठले.  नित्य नियमाप्रमाणे सर्व अटपून त्यांनी मनोभावे पूजा केली.   त्यांच्या पत्नीने, सावित्रीने पूजेची सर्व तयारी साग्रसंगीत केलेलीच होती.  सुरेख सजवलेल्या रांगोळीत स्वस्तिक रेखाटलेला होता.

डीव्ही ध्यानस्थ बसले.

स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि:|

स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु||

ॐ शांती: शांती: शांती :

घरातून निघताना पत्नीने हातावर दहिसाखर ठेवले. म्हणाली,

” तुम्ही नक्की यातून बाहेर याल.  माझी खात्री आहे. काळजी नसावी. जाणून-बुजून न केलेली घटना गुन्हा ठरू शकत नाही.  काहीतरी मार्ग नक्कीच निघेल.”

सदाशिव बॅग घेण्यासाठी आत आला. तेव्हा ते त्याला म्हणाले,

” आज गाडी काढू नकोस.  मी रिक्षाने जाणार आहे.”

कोर्टात रिक्षातून बाहेर उतरणाऱ्या डीव्हींना पाहून पत्रकार, चॅनल्स वाले यांची धावाधाव झाली.

” काय हो डीव्ही? आज रिक्षातून? तुमच्याकडे अठ्ठावीस गाड्या आहेत ना ? सगळ्या जप्त?”

“मग नेमकं काय वाटते तुम्हाला?  आज तुम्हाला अटक झाली तर?”

” तुम्ही हे सारं करताना तुमच्या प्रतिमांचाही विचार केला नाही का?”

गर्दीतून वाट काढत काढत डीव्ही चौकशी दालनात पोहोचले. अॅड. झुनझुनवाला  त्यांच्या सहकारी वकीला सोबत थोड्यावेळाने आले.  त्यांनी डीव्हींना नजरेनेच इशारा केला.

चौकशी समितीत  मोठ्या टेबलासमोर, उंच खुर्च्यांवर चार दिग्गज न्यायाधीश स्थानापन्न होते.  डीव्ही त्यांच्यासमोर शांत बसले होते.  वातावरणात कमालीची सभ्यता होती.  सहानुभूतीपूर्वक आदरही होता.

हळूहळू चौकशी प्रक्रिया उलगडत गेली.  डीव्हींनी गळ्यातल्या स्वस्तिकास स्पर्श केला.   आज ते शुभ्र, पांढऱ्या कुर्ता पायजम्यात होते. त्यांच्या गोऱ्या गळ्यात सोन्याचा स्वस्तिक चमकत होता.

विषयाला सुरुवात झाली. शपथेचं  सत्र संपलं.

“मिस्टर दिनकर भास्कर वसिष्ठ,  तुमच्या ड्रीमलँड प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही एकूण तीन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे.  असा तुमच्यावर आरोप आहे तो तुम्हाला मान्य आहे का?”

” नाही. माझ्या हातून चूक झालेली आहे हे खरं आहे. माझे हिशोब चुकलेत, अंदाज चुकलेत गणित चुकलंय. फसवणुकीचा कुठलाही माझा उद्देश नव्हता.  आणि मी या सर्व रकमेची परतफेड करण्याची हमी आपणास देतो. मला फक्त थोडा वेळ द्यावा एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे”

” पण कशी परतफेड करणार?  इतकी मोठी रक्कम तुम्ही कशी उभी करणार? ”

” माझे वकील माझ्या स्थावर जंगम ,रोख मालमत्तेचे स्टेटमेंट  देतील त्यासाठी मी आपणास विनंती करतो की माझ्या वकिलांना आपण परवानगी द्यावी.”

पुढील सर्व कायदेशीर बाबी अॅडवोकेट झुनझुनवालांनी अतिशय कुशलतेने पार पडल्या.  आणि शेवटी ते कोर्टाला उद्देशून म्हणाले,

” युवर ऑनर, माझे अशील  एक प्रतिष्ठित, नामांकित, धार्मिक वृत्तीची व्यक्ती आहे.  आजपर्यंत त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.  कुणाची फसवणूक केलेली नाही.  त्यांचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. आणि या व्यवसायात ते गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत. अनेक सामाजिक प्रतिष्ठानांवर ते पदाधिकारी आहेत. आणि डीव्ही एक दानशूर व्यक्तिमत्व आहे.  ते कुणाची जाणून-बुजून फसवणूक का करतील?  कायद्याप्रमाणे जरी हा गुन्हा असला तरी ही एक निव्वळ चूक आहे.  म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक संधी द्यावी.  त्यांची सील केलेली सर्व मालमत्ता मोकळी करावी.  त्यांना अटक करू नये म्हणजे त्यांना त्यांच्या मालमत्तेचा योग्य विनियोग करून रक्कम उभी करता येईल व परतफेड करणे त्यांना शक्य होईल.  कोर्टाने तसा पुरेसा वेळही त्यांना द्यावा.एव्हढीच माझ्या अशिलातर्फे मागणी आहे.”

आरोपी, गुन्ह्याचे स्वरूप, आरोपीचे सामाजिक स्थान, कायदा, कायद्यातील तरतुदी, मर्यादा, चौकटी आणि त्या बजावणाऱ्यांची मानसिकता याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण कोर्टाकडून डीव्हींना एक संधी देण्यात आली.  हा एक ऐतिहासिक निर्णय होता.  पण ते न्यायदानाच्या प्रक्रियेत घडलं.  त्यांची सर्व मालमत्ता मोकळी करण्यात आली.  त्यांना तूर्त तरी अटक झाली नाही.  वेळेची मर्यादा त्यांना देण्यात आली. त्या क्षणी तरी हा डीव्हींचा अंशतः विजयच होता.

इतिहासात,पुराणात असे घडले आहे. राजा हरिश्चंद्राला राज्य सोडावे लागले. शिवरायांचे सर्व गड ,किल्ले एका तहात त्यांना द्यावे लागले. रामाला,पांडवांना वनवास घडला. यादवीत युगंधराचाही अंत झाला. नियती, कालचक्र..

डीव्हींनी दिलेला शब्द पाळला.  त्यांच्या चारित्र्याला लागलेला फसवणुकीचा, अनैतिकतेचा कलंक पुसला गेला. एक राज्य गेलं. एक साम्राज्य संपलं .पण एक व्यक्ती उरली. शुभ्र निष्कलंक .कदाचित पुन्हा नव्याने राज्य उभं करण्यासाठी त्यांना यातूनही सामर्थ्य मिळेल. श्रद्धेनं जपलेली आपली प्रतिकंच आपल्याला शक्ती देतात. नियतीचं आवाहन पेलण्याचं बळ देतात. कुठल्याही परिस्थीतीत तटस्थ ठेवतात.

गळ्यातल्या स्वस्तिकाला निरखत डीव्ही.हळूच पुटपुटले

कल्याणमस्तु।।

– समाप्त – 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काल रात्री डीव्ही  पाणी प्यायला उठले आणि त्यांच्या लक्षात आले की गळ्यातला ताईत  पडलाय.  ते थोडेसे विचलित झाले, काहीसे भयभीतही झाले. पाणी पिऊन पटकन बेडपाशी आले तेव्हां उशीवर  त्यांना त्यांचा ताईत दिसला.  त्या अंधुक प्रकाशात त्यातले सोन्याचा सुरेख कमनीय स्वस्तिक चमकले.  डीव्हींना एकदम हायसं वाटलं.  त्यांनी तो पटकन उचलला आणि पुन्हा गळ्यात घातला.

अजून रात्र बरीच बाकी होती.  त्यांनी डोळे मिटले आणि झोपण्याचा प्रयत्न केला.  शेजारी सावित्री— त्यांची पत्नी शांत झोपली होती.  त्यांनी पुन्हा गळ्यातल्या स्वस्तिकाला स्पर्श केला. 

तेव्हां आई म्हणाली होती,

” दिन्या! आज मी गुरुजींकडे गेले होते. त्यांना तुझी पत्रिका दाखवली. बराच वेळ ते निरखत होते.  लांबलचक आकडेवारी लिहीत होते.  म्हणाले,” माई छान आहे  पत्रिका. तुझा दिन्या नाव कमावणार.  खूप मोठा होणार. यशस्वी, कीर्तीवंत! स्वतःचे एक साम्राज्य उभं करणार तो. पण पत्रिकेत स्पष्ट दिसतंय की पनवतीचे काही टप्पे अवघड आहेत.  मी  एक ताईत देतो. यात एक स्वस्तिक आहे तो त्याचं सदैव रक्षण करेल.  आयुष्यभर त्यांनी तो गळ्यात ठेवावा.”

तेव्हांपासून आजतागायत तो गळ्यात आहे. कधीच काढला नाही. पण दिन्या ते डीव्ही या आयुष्याच्या एका दिमाखदार प्रवासात गळ्यातल्या या स्वस्तिकाने कशी काय साथ दिली याचाही कधी विचार मनात आला नाही. कित्येक वेळा तो आपल्या गळ्यात आहे याचाही विसर पडला असेल.  मात्र एक, आई असताना आणि ती गेल्यानंतरही आजपर्यंत डीव्हींनी कधीही तो काढला नाही.

जेव्हां जेव्हां डीव्ही आईला भेटायला जात, तेव्हां तेव्हां आई त्या स्वस्तिकाकडे बघूनच म्हणायची,

” मोठा झालास. नाव कमावलंस, खूप मोठी ओळख स्वतःची मिळवलीस, राज्य उभं केलंस.  आज कितीतरी लोकांची कुटुंबं तुझ्यावर अवलंबून आहेत, पण लक्षात ठेव यात आपलं काही नसतं बरं! सारं तो करतो! त्याला विसरू नकोस. सदैव जमिनीवर राहा.  आयुष्यात वाटा खूप असतात रे!  पण सरळ वाटेवर चालत रहा.”

डीव्हींनी कूस बदलली. पहाट व्हायची ते वाट बघत होते. उद्या सकाळी अकरा वाजता कोर्टात अंतिम सुनावणी आहे. न्यायालयीन चौकशी समोर त्यांना सामोरे जायचं आहे.अॅडव्होकेट झुनझुनवालांचा रात्रीच फोन आला होता.

” डीव्ही, तशी आपली बाजू भक्कम आहे. तुमच्याकडून मुद्दामहून  गुन्हा झालेला नाही.  फसवणूक करण्याचा तुमचा हेतूही नाही.  तुम्ही फक्त एका अचानक आलेल्या वादळात अडकलात आणि मग एक एक पाऊल निसटत गेलं .हे सर्व आपल्याला खंडपीठांसमोर नीट विश्वासार्ह पद्धतीने मांडायचं आहे.  निर्णय काय लागेल ते आत्ताच सांगू शकणार नाही. पण प्रयत्न करूच.  आणि अपेक्षित प्रश्नांना कसे सामोरे जायचे, काय उत्तर द्यायचे याची पूर्वकल्पना मी तुम्हाला दिलेलीच आहे.  तेव्हां धीर ठेवा, सावध राहा.   लेट अस होप पॉझिटिव्ह!”

वास्तविक या व्यवसायात येण्याचं कुठलंही स्वप्न डीव्हींनी कधीच पाहिलं नव्हतं.  दिन्या नावाचा एक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातला माणूस काय स्वप्न बघणार? एक पदवी, एक नोकरी, एक घर, समंजस पत्नी, गुणी मुलं, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ आणि अखेर एक समाधानी निवृत्ती!  पण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असूनही कुठेही नोकरी मिळत नव्हती.  प्रचंड नैराश्य आलं होतं.  अजूनही आपण कुटुंबाचा आधार बनू शकत नाही या भावनेने जगताना निरुपयोगी असल्यासारखं वाटत होतं.  अगदी आत्मघाताचेही विचार मनात घोळत होते.  आत्मविश्वास पार डळमळला होता  त्याचवेळी गळ्यातल्या स्वस्तिकाला सहजपणे केलेला तो स्पर्श एकाएकी खूप आश्वासक वाटला होता.  त्याही क्षणी क्षणभर मनात आलं होतं,’ खरंच असं काही असतं का? तर्कबुद्धीच्या पलीकडे या संकेतांना नक्की काय अर्थ असतो?’

पण योगायोगाने वासू भेटला.  एका इराण्याच्या हॉटेलात. दिन्या  चहा पीत होता.  वासूनेच जोरात हाक मारली,

“अरे दिनकर?”

दिन्या निराशच होता.  नुकतीच नोकरीसाठी एक मुलाखत देऊन तो आला होता.  आणि अपयशाचीच शंभर टक्के खात्री होती.  त्यामुळे चेहरा उदास, पडलेला, निराश.

“अरे दिनकर? दिनेश स्कॉलर? काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काय करतोस? कुठे असतोस? “

दिन्या शांतपणे म्हणाला होता,

“काहीही नाही.”

आणि मग दिन्याने जे आहे ते सारं वासूला सांगितलं.

भरदार अंगाच्या, धष्टपुष्ट, उंच ताड वासुने दिन्याच्या हातावर जोरात टाळी मारली.  आणि तो म्हणाला,

“अरे भावड्या!  हे बघ माझ्याकडे सॉल्लिड प्लॅन्स आहेत. या गावकूसाच्या बाहेर,  माझ्या नावावर आजोबांनी ठेवलेली एक जमीन आहे.  तो भाग पुढच्या दहा वर्षात प्रचंड गजबजणार आहे.  काही वर्षांनी ती उद्योगनगरीच होणार आहे.  सोन्याचा तुकडा आहे बघ.  आपण ती डेव्हलप करूया.”

“म्हणजे नेमकं काय ?”

“म्हणजे आपण एक प्रोजेक्ट करूया.  एक स्वयंपूर्ण नगरच बसवूया.  सदनिका, रो हाऊसेस, सर्व प्रकारची दुकानं,  मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी सुविधा, शिक्षण, आरोग्य याचा परिपूर्ण विचार करून थाटलेलं एक संपूर्ण नगर!”

वासुने जणू एक स्वप्नच दिन्याच्या हातात ठेवलं.

“हे बघ , जमीन माझी डोकं तुझं.  आजपासून तुझी आणि माझी टीम.  काय भावड्या जमतंय् का?”

“हो पण माझ्याकडे काहीच भांडवल नाहीय “

“त्याची काळजी तू करू नकोस.  तू कामाला लाग.  असा पॅव्हलीन  मध्येच आऊट होऊ नकोस.  मैदानात ये.  खेळ जमव. आपण साइटवर जाऊ आणि ठरवू  पुढचं.”

दिन्या काही बोलणार तोच त्याचं लक्ष वासूच्या गळ्यातलल्या ताईताकडे गेलं. अगदी हुबेहूब.  काळा दोरा आणि सोन्याचा सुरेख नक्षीदार स्वस्तिक. सहजच एक तार जुळली. प्रवाहाला प्रवाह मिळाला. आणि सुरुवात झाली.

आयुष्यात असही काही घडू शकत यावर विश्वास बसत नव्हता. पण ते घडलं. या पहिल्याच  स्वस्तिक प्रोजेक्टला उदंड प्रतिसाद मिळाला.  वासूने कायदेशीर बाबी, जाहिराततंत्र,  बुकिंग, सेल्स, पैशाचे नियोजन, बँकांचे व्यवहार सर्व काही अत्यंत कौशल्याने सांभाळलं.  आणि दिन्याने बौद्धिक, कल्पक, तांत्रिक, वेगवेगळे शास्त्रोक्त आराखडे, एलेवेशन्स, व्हिजीयुलायझेशनची सारी तंत्र चोख पाळली. यशाची एक वाट नव्हे, महावाटच सुरू झाली.  स्वस्तिक बिल्डर्स हे नाव प्रचंड गजबजलं. पेपरात फोटो, मुलाखती, पुढच्या प्रोजेक्टचे विचार वगैरे वगैरे सर्व काही विनासायास प्रवाहाबरोबर घडतच गेलं. 

“शहरात प्रथमच, ईको फ्रेंडली,निसर्गाच्या सान्निध्यात आगळे वेगळे आपलं घर!”अशी होर्डींग्ज झळकू लागली.

दिन्याचा डीव्ही झाला.  वास्तविक डीवी म्हणजे दिनकर आणि वासू. आणि दोघांचे मिळून स्वस्तिक, पण व्यावसायिक विश्वात, परिसरात, समाजात, देशात,  विदेशात डीव्ही याच नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली. दिनकर एक दिवस वासूला म्हणालाही होता,

“आपण दोघे म्हणजे वन सोल ईन टु बॉडीज् दोन रेषा,एका बिंदुतल्या.”

आणि नकळत दोघांनी आपले गळ्यातले स्वस्तिक असलेले ताईत सहज आनंदाने उचलले.

सगळं आयुष्यच बदलून गेलं.  राहणीमान, जीवन पद्धती, सारं सारं बदललं.  एका टिंबापासून झालेल्या सुरुवातीनं आख्खा पृथ्वी गोलच जणू पादाक्रांत केला.  देश विदेशात स्वस्तिक प्रोजेक्ट्स उभारले गेले.  पन्नास मजली टॉवर्स,  फिरती पंचतारांकित हॉटेल्स,  आरकेड्स,  हॉल्स, बँक्वेट्स हॉस्पिटल्स, आणि त्याचबरोबर इनसाईड आऊटसाईड मधले गुळगुळीत फोटो. 

दिन्या नावाचं मिटलेलं कमळ डीव्हींच्या रूपात उमलत गेलं.

कुटुंब आणि परिवाराबरोबरच एक व्यावसायिक आणि सामाजिक चेहरा दिन्याला प्राप्त झाला. काही हजारांचे कित्येक हजार कोटी झाले. 

एक दिवस डीव्ही असेच, नदीकिनारी असलेल्या त्यांच्या आलिशान बंगल्याच्या पॅटीओमध्ये शांत बसले होते. समोरच्या भिंतीवरचे म्युरल ते पाहत होते.  वास्तविक ते म्युरल म्हणजे त्यांच्या व्यवसायाचा लोगोच होता. एक सुरेख स्वस्तिक.  सूर्य, चंद्र, वायु, पृथ्वी,  लक्ष्मी,  विष्णु ब्रह्मदेव,  शिवपार्वती,  श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असणारं, शांती, समृद्धी आणि मांगल्यांचं  प्रतीक स्वस्तिक!  एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा पुढे जाऊन विरुद्ध दिशेला वळलेल्या.

“स्वस्तिक क्षेम कायति इति स्वस्तिक:”

कुशलक्षेम, कल्याणाचे प्रतिक.

डीव्हींच्या आत, आईचा दिन्या अजूनही होता.  त्या दिन्याने मात्र समाजाभिमुख अनेक कामेही केली. लोकाभिमुख संस्थांना आर्थिक योगदान  दिले.  कितीतरी लाचार ओंजळी त्याने भरल्या.  कला, क्रीडा, धर्म, संस्कृती सर्व क्षेत्रात त्यांनी अर्थदान केले.  

भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व.  अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला.

  स्वस्तिक   क्रमश: भाग १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीची माया… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.) इथून पुढे —

दुपारची वामकुक्षी घेऊन संध्याकाळी सगळेच जण हॉलमध्ये चहाला एकत्र जमले. अनसूया एका टोकाला तर प्रियंवदा दुसऱ्या टोकाला बसते हे सरस्वतीच्या केव्हाच लक्षात आलं होतं. सगळेचजण गुपचूप बसले होते.

अनसूयेचा मुलगा चिन्मय लहानपणापासून भारी चुणचुणीत आणि चौकस. तो कुणालाही बोलकं करायचा. त्यानं सरस्वतीला विचारलं, “आज्जी, तुझी आणि आजोबांची भेट पहिल्यांदा कुठं झाली होती ग?” त्याचा हा प्रश्न अगदी अनपेक्षितच होता.

“तू कधीही काहीही विचारतोस रे? काय करणार आहेस ते ऐकून?” सरस्वतीनं दटावलं.

त्यानं हसतहसत सांगितलं, “अगं आता लवकरच माझं वधू संशोधन सुरू होईल ना! मग थोरामोठ्यांचा अनुभव नको का ऐकायला?” सगळ्याच मुलांनी सरस्वतीचा पिच्छा पुरवला.

सरस्वतीच्या डोळ्यांसमोर पंचावन्न वर्षापूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. ती म्हणाली, “आमच्या घराजवळच आमच्या दोन्ही कुटुंबियांचे परिचित असलेले एक शिक्षक दांपत्य राहत होते. पहिल्यांदा तुमचे आजोबा मला त्यांच्या घरीच पाहायला आले होते.

सुरूवातीची ओळखपरेड म्हणून त्या सरांनी उभयतांना नाव, शिक्षण आणि नोकरी याविषयी विचारून घेतलं. अर्थात त्यांनी आधीच एकमेकांविषयी ती जुजबी माहिती दिलेलीच होती.

 त्यानंतर सरांनी आम्हा दोघांना पेन आणि दोन चिठ्ठ्या दिल्या आणि ‘एका ओळीत तुमचा सर्वात चांगला गुण कोणता ते लिहून द्या’ असं म्हणाले.

तुमच्या आजोबांनी लिहिलं होतं, ‘मला कधीच कुणाविषयी असूया वाटत नाही कारण मी कधीच कुणाशी तुलना करत नाही. ’ आणि मी लिहिलं होतं, ‘माझ्याशी कुणीही कितीही वाईट वागलं तरी मी मनात काही न ठेवता त्यांच्याशी गोडच वागते, बोलते. ’ 

झालं, सर आनंदाने म्हणाले, ‘संसारात एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी ह्यापेक्षा आणखी कसले गुण हवेत सांगा? छत्तीस गुणाने कुंडली जुळलीय, असंच समजायचं. ‘ त्यानंतर थेट लवकरच लग्नाची बोलणी झाली आणि लग्न ठरलं!” 

“वॉव, आजी तुझी स्टोरी खूप सिंपल आहे पण इंटरेस्टिंग आहे. मामांच्याविषयी, माझी आई आणि मावशीबद्दल काहीतरी सांग ना ग. ”

“आमचं लग्न झाल्यावर, तुझ्या मामांचा जन्म झाला. ‘आयुष्यात कसल्याही प्रसंगात न डगमगता धीर एकवटून राहणारा पुरुष यशस्वी होतो’, असं सांगत त्यांनी बाळाचं नामकरण सुधीर असं केलं. मामाने केलेली धडपड, कष्ट आणि त्याची प्रगती सगळ्यांच्या समोरच आहे. तुमचे आजोबा गेल्यानंतर तो किती धीराने आणि ठामपणे उभा राहिला. आज त्यानं त्याच्या कर्तबगारीवर आम्हा सर्वांना सुस्थितीत आणून ठेवलं आहे.

सुधीरच्या नंतर तुझ्या आईचा जन्म झाला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही चिठ्ठीत लिहिलेला सदगुण आठवतोय का? तेच नाव हिला देऊ या. कुणाविषयी असूया वाटत नाही अशी ती ‘अनसूया’.

त्यानंतर दोन वर्षाने तुझ्या मावशीचा जन्म झाला. यावेळी त्यांनी सुचवलं, ‘सरस्वती, ह्यावेळी तू चिठ्ठीत लिहिलेल्या सदगुणावर हिचं नाव ठेवू या. कुणीही कितीही वाईट वागलं तरी मनात काही न ठेवता त्यांच्याशी गोड वागणारी, बोलणारी अशी ती ‘प्रियंवदा’.

आता आणखी काय सांगू? तुम्ही मुलं सूज्ञ आणि संस्कारी आहात. नेमकं काय घडतंय ते तुमच्या पुढ्यातच आहे. माझं कोण ऐकतो आता? जशी ईश्वरेच्छा!” सरस्वतीने सुस्कारा टाकला.

चिन्मयनं सांगितलं, “आजी, तुला एक सिक्रेट सांगू? अगं, आम्ही सगळीच मुलं एकमेकांच्या सतत संपर्कात आहोत. अधूनमधून फोनवरून बोलत असतो. आम्हा सगळ्यांना सरस्वती आज्जींच्या मायेच्या घट्ट धाग्याने बांधून ठेवलंय. तो सहजासहजी नाही तुटणार. ” 

सरस्वतीनं चिन्मयच्या गालावरनं हात फिरवून कानशिलावर कडाकडा बोटं मोडली. “किती गुणी आहेस रे राजा. माझी सगळीच नातवंडं गुणी आहेत, संस्कारी आहेत. कुणाला काहीही वाटो. मला खात्री होती. माझी नातवंडं मार्कांच्या पलीकडे जाऊन आपलं स्वत:चं स्थान निर्माण करतील म्हणून. ” तणावाचं वातावरण थोडंसं निवळलं.

इतका वेळ दुसऱ्या टोकाला बसलेली प्रियंवदा उठून अचानक अनसूयेसमोर हात जोडून उभी राहिली आणि भरल्या डोळ्यांने पुटपुटली “ताई, मला माफ कर, माझी चूक झाली. ” 

अनसूया प्रियंवदेला मिठीत घेत म्हणाली, “वेडाबाई, चूक माझीच आहे. मीच तुझी माफी मागते. ” सगळ्या मुलांना हे अनपेक्षित होतं. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

तितक्यात सुजाता ट्रे घेऊन बाहेर आली. गरम गरम लापशीचा घमघमाट सुटला होता. बाऊलमधला पहिला घास घेताच, प्रियंवदेचा मुलगा अभिराम बोलून गेला, “आजी, इतक्या वर्षानंतरदेखील तुझ्या हातच्या लापशीच्या चवीत काहीच फरक पडलेला नाही. व्वाह, मजा आ गया. थॅंक्स. ” 

 “तुझ्या मामीला थॅंक्स सांग. ती मला स्वयंपाकघरात पाऊलही टाकायला देत नाही. ” 

खरंतर, मामाची बायको सुजाता मामी सुगरण तर होतीच पण ती रोज रोज पोळी शिकरण करायची नाही. ती रोज वेगवेगळे पदार्थ करायची. महाराष्ट्रीयन पुरणपोळीपासून साऊथ इंडियन, गुजराती, पंजाबी, चायनीज असे एक ना अनेक पदार्थ बनवायची. 

मागच्या इतक्या वर्षात पडलेला गॅप विसरून मुलं एकमेकांच्या सहवासात रंगून गेली. कॅरम बोर्ड बाहेर निघाला. आता मामांनी खास मिनि-थिएटरच बनवून घेतलं होतं. अनेक वाहिन्यांवर अनेक चित्रपट हारीने मांडून ठेवलेले असतात. रोज एक दोन सिनेमे, कॅरम, पत्ते कुटणं ह्यात तीन दिवस भुर्र्कन उडून गेले. सुधीर आणि दोघ्या बहिणी पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात मश्गुल होते.

दुधात साखर म्हटल्यासारखं, कार्यक्रमाच्या दिवशी दोन्ही जावईही येऊन दाखल झाले. घर मंगल तोरणांनी, पताकांनी सजवलेलं होतं. सनईचे मंद सूर आसमंतात विरत होते. सरस्वती आसनावर बसताच “शतमानं भवति शतायु:.. ” असा धीर गंभीर मंत्रध्वनी होत असताना उपस्थितांनी तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांची बरसात केली. त्यानंतर सरस्वतीनं भला मोठा केक कापला. सगळ्याच नातवंडांनी मिळून ‘तुम जियो हजारो साल’ या गाण्यांवर नाचत धमाल उडवून दिली.

वसंतरावांच्या आठवणीने सरस्वती क्षणभर हळवी झाली. ‘सरस्वती, आपण भाग्यवान आहोत. आपली मुलं गुणी आहेत. महत्वाचं म्हणजे वडिलधाऱ्यांचा आदर करणारी आहेत. ’ त्यांचे हे शब्द तिच्या कानांत घुमत होते. दिवाणखान्यातल्या वसंतरावांच्या तसबिरीकडे पाहून तिने आपसूकच दोन्ही हात जोडले तेव्हा वसंतरावांचा आधीच हसरा चेहरा आणखीनच उजळून गेला होता.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“आई, येत्या सत्तावीस एप्रिलला अनु आणि प्रिया विथ फॅमिली आपल्याकडे येणार आहेत!” सुधीरनं मोठ्या उत्साहात सांगितलं. 

“गेल्या कित्येक वर्षात त्या एकत्र कधीच फिरकल्या नाहीत. तर आताच दोघींना एकाचवेळी यायचं कसं सुचलं? तेहि असं अचानक?” सरस्वती खिन्न मनाने बोलली.

“अगं असं काय करतेस? येत्या तीस एप्रिलला तुझी पंचाहत्तरी साजरी करायचीय आहे ना?”

“माझी पंचाहत्तरी साजरी करायची काही आवश्यकता नाही. मी वयाने वाढले आहे, त्यात माझं काय कर्तृत्व आलंय? तो काळाचा नियम आहे, त्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.” सरस्वती अनिच्छेनेच बोलली.

“आई तू म्हणतेस ते खरं आहे. अगं कृतज्ञतेचा म्हणून एक भाग असतो. आई वडिलांची पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन असे कौतुकसोहळे प्रियजनांना साजरे करावेसे वाटतात. आई, हे सगळं या दोघी बहिणींनी मिळून हे ठरवलंय. त्या दोघींचं ह्या निमित्ताने मनमिलाप झालं असेल तर मी कसं नाही म्हणू?” सुधीरनं सांगितलं. पण सरस्वतीला ते खरं वाटलं नाही. ती काहीच बोलली नाही.           

सुधीरनं लगेच अनुला फोन लावला. “अनु, तुम्ही सहकुटुंब सत्तावीस एप्रिलला इथे हजर असणार आहात. मी कसलीही सबब ऐकून घेणार नाही. येत्या तीस एप्रिलला आईची पंचाहत्तरी साजरी करायचीय. अनु आणि प्रिया या दोघींनीच हा कार्यक्रम आखला आहे म्हणून मी आईला पटवून सांगितलंय. ती किती खूश झाली, हे तुला कसं सांगू? तुम्ही दोघी आता एकत्र येणार नसाल तर कधी येणार आहात गं, आई गेल्यावर?.. खूप झालं तुमचं नाटक. तुम्हा सगळ्यांची रेल्वेची तिकीटं मी उद्या बुक करतोय. समजलं?” अनु काही बोलायच्या आतच सुधीरनं फोन ठेवून दिला. प्रियाला फोन लावून त्यानं तेच संभाषण रिपीट केलं.             

कित्येक वर्षानंतर, नागपूरहून अनसूया आणि नाशिकहून प्रियवंदा त्यांच्या मुलांच्या सोबत एकाच दिवशी माहेरात येऊन पोहोचल्या. दोन्ही लेकी, चारी नातवंडांना पाहून सरस्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रसन्न चांदणं पसरलं. कधीकाळी उन्हाळ्याच्या सुटीत ही मंडळी दरवर्षी न चुकता यायची आणि जाताना एकाच दिवशी जायची.

नातवंडांनी भरलेलं गोकुळ पाहून सरस्वतीला काय करू, काय नको असं व्हायचं. कुठल्या दिवशी काय बेत करायचा ते सरस्वती आधीच ठरवायची. त्यानुसार सून सुजाता कामाला लागायची. 

त्या मेनूत सरस्वती एकदा तरी न्याहरीला गव्हाची गूळ घालून केलेली लापशी स्वत:च्या हातानं बनवायचीच. त्यात काजू बदामाचे तुकडे पेरलेले असायचे, त्यावर तुपाची धार पडताच खमंग वास सुटायचा. सुरूवातीला एका बाऊलमधे  लापशी घेऊन सरस्वती आपल्या मऊशार सायीसारख्या हातानं ती सगळ्या नातवांना प्रेमानं एक एक घास भरवायची. दोन्ही मुलींची चार आणि सुधीरची दोन मुलं अशी एकंदरीत सहा नातवंडे डायनिंग टेबलवर पाहून सरस्वतीचा जीव आनंदाने भरून जायचा. 

सरस्वतीच्या तिन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी ह्याचं वरदान लाभलेलं होतं. सगळी मुलं एकाच वयाची होती. फार तर दोन तीन वर्षाचं अंतर. सरस्वतीला मुद्दलाचा विसर पडला होता, ती व्याज पाहूनच हरखून जायची.   

सुधीरमामा तालेवार नसला तरी मोठा दिलदार माणूस. आणि भाचरांवर जीव ओवाळून टाकणारा. उन्हाळा म्हटलं की आंब्याचेच दिवस. भाचरं यायच्या आधीच हापूस आंब्यांच्या पेट्या आणून ठेवायचा. सुधीरमामाला आंब्याची छान पारख होती. आमरसासाठी हापूस तर कापून खायला केशर, बदाम, लालबाग, लंगडा, तोतापुरी घेऊन यायचा. प्रत्येक आंब्याची वेगळीच चव असायची. आंब्यांचा घमघमीत सुवास सर्वत्र दरवळत असायचा. सगळी मुलं एकत्र बसून हसतखेळत कधी आमरस पुरी तर कधी आमरस धिरडं आणि त्या सोबत कुरडया, पापड्या, मिरची भजी, मसालेभात हादडायचे. वामकुक्षी म्हणत मुलं तासभर झोप काढायचे. कधी त्यांचे पत्त्यांचे डाव रंगत असत तर कधी कॅरम बोर्ड लागायचा. 

संध्याकाळ झाली की सगळी मुलं आजीबरोबर शुभंकरोती म्हणायचे. आजी-आजोबा चांदण्याच्या आकाशाखाली बसून रामायण महाभारतातल्या कितीतरी गोष्टी सांगायचे. मामा व्हीसीआर सोबत एकाद्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट भाड्याने घेऊन यायचा. सिनेमा पाहून झाला की रात्रीच्या जेवणाची वेळ व्हायची. कुणालाच तशी जास्त भूक नसायची. कधी पावभाजी तर कधी साधी खिचडी किंवा थालीपीठ खाल्लं की भागायचं. 

गच्चीवर संध्याकाळी पाईपने पाणी मारून ठेवल्याने सगळी मुलं रात्री झोपायला ते गच्चीवरच जात असत. तोवर गच्ची थंड झालेली असायची. त्यावर मस्त गाद्या पसरून मुलं ठिय्या मांडत असत. गप्पा गोष्टी करत, रेडिओवर विविध भारतीची गाणी ऐकत पडायचे. थंड हवेच्या झुळकीने झोप अनावर झाली की आकाशातले नक्षत्र, तारे मोजत हळूहळू डोळे मिटत मस्त झोपायचे. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडल्यावरच उठायचे. कुणीही उठवायला यायचा नाही.

सर्व मुलांच्या दरम्यान एक अतूट स्नेहाचा घट्ट धागा होता. दोघा बहिणींचं अतिशय घट्ट सख्य होतं. प्रियंवदेची मुलं अभ्यासात खूप हुशार होती. प्रियंवदा मोठ्या उत्साहाने तिच्या मुलांची प्रगती अनसूयेला सांगायची. बघता बघता मुलांच्यातल्या निरोगी स्पर्धेचं रूपांतर कधी असूयेत झालं हे कुणाला कळलंच नाही. दोघा बहिणींच्या नात्यात खोल दरी निर्माण होत गेली. मुलांचं आजोळी येणं बंद झालं. 

संस्कार वर्ग, पोहण्याचे क्लासेस, गिटार क्लासेस, व्हेकेशन बॅचेस, त्यासाठी एक ना अनेक कारणं होती. त्यामागचं खरं कारण वेगळं होतं हे कळायला सरस्वतीला वेळ लागला नाही. अनसूयेच्या मनात असूयेनं स्थान मिळवलं. ताईला माझ्या मुलांची प्रगती पाहवत नाही हे प्रियंवदेच्या मनात घर करून राहिलं. 

मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.     

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एक दिवस आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून.) इथून पुढे – 

मी दहावीची परीक्षा दिली होती. मी मामाकडे आले. त्याच्या संसारात मी जडच होते त्यांना ! मामा म्हणाला, “ बकुळ,आपण लग्न करूया तुझं ! “ पण बाई, हे असले किळसवाणे अनुभव घेऊन मला पुरुष देहाबद्दल प्रचंड तिटकारा वाटायला लागला होता..मी  मामाला सांगितलं, “ मी जन्मात नाही लग्न करणार. तू जर माझं लग्न बळजबरीने लावलंस तर मी जीव देईन.”  त्यांना दोघांना मी घडलेली हकीकत सांगितल्यावर तर रडूच आलं त्यांना. मी गावाकडे केली बारीकसारीक कामं, पण तिथे कोण देणार एवढा पैसा? मग मला एका बाईंनी पुण्याला आणलं. त्या मावशींनी छान  काम दिलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं पण मिळाली. बाई, मी कायम राहीन तुमच्याकडे. मला आता दुसरीकडे नका ना पाठवू. “ 

देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. “ बकुळ, तू फार गुणी आणि हुशार आहेस. तू असं आयुष्य वाया नको घालवू ग. पुढे शीक, असं काहीतरी शिक्षण घे की तुला सन्मानाने जगता येईल. मी शिकवीन, सगळी मदत करीन तुला. शिकशील का पुढे? बघ ! किती मार्क होते तुला दहावीला? “ बकुळ म्हणाली “ ऐशी टक्के “     “अग वेडे, मग तर तू घरकाम नाहीच करायचं. आपण तुला डी एड ला घेऊया प्रवेश. करशील ना? दोन वर्षे शिकावे लागेल पण जन्माचं कल्याण होईल ग बाळा तुझं !” 

“ बाई,मी नक्की करीन तुम्ही म्हणताय तर ! तुम्हाला अपयश देणार नाही मी .आणि तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन मी! “ 

“ वेडे, ते बघू नंतर. मला काय कमी आहे बकुळ? तू फक्त  वीस वर्षाची आहेस जेमतेम. बघूया काय  करता येतं ते.” एका प्रख्यात कॉलेजमध्ये बकुळला डी एड ला सहज प्रवेश मिळाला. बकुळ लवकर उठून जमेल तेवढं काम करून कॉलेजला जायची. राहीने आनंदाने बकुळला आपली सायकल दिली. तिने नवीन टू व्हीलर घेतल्याने सायकल पडूनच होती तिची.  बघता बघता बकुळच्या डीएडचं पहिलं वर्ष संपलं. बकुळला खूप सुंदर मार्क्स मिळाले. आता ती त्या कॉलेजमध्ये रुळून गेली. तिला काही वेळा वाटायचं, आपण काम करणारी मुलगी आहोत, आणि दिवसभर हा कोर्स करत असल्याने आपला घराला पूर्वीसारखा उपयोग होत नाही. ही  खंत ती बोलून दाखवायची देवकीला. देवकी तिला म्हणायची, “असं नको म्हणू. माझी मुलं लहान असताना तू खूप मदत केली आहेस बकुळ ! आता निवांत शीक, लक्ष लावून अभ्यास कर बेटा. सगळं छान होईल तुझं बघ.” बकुळ चांगल्या मार्कानी डीएड झाली. तिला एका शाळेत नोकरीची ऑफर सुद्धा आली.

.बकुळ पेढे घेऊन आली आणि तिने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ अग वेडे, हे काय करतेस? “ देवकीने तिला पोटाशी धरलं. “ नाही हो बाई, मी बघते ना, आमच्या डी एड कॉलेजमध्ये कुठून कुठून मुली येतात हो ! त्या किती कष्ट करून शिकतात, कोणी पहाटे मेसमध्ये दोनशे पोळ्या करून येतात, तर कोणी चाकणहून रोज अपडाऊन करतात. किती हाल आहेत बाई बाहेर ! कोणाचे वडील दारुडे तर कोणाची आईच अपंग ! किती किती सोसतात हो मुली बाहेरच्या जगात !” बकुळच्या डोळ्यात पाणी होतं हे सांगताना. “ बाई,एक मुलगी तर पोलिओ झालेली आहे पण किती जिद्दीने शिकतेय. मी तर किती भाग्यवान आहे हो, तुमच्या घरी सुरक्षित राहून शिकले आहे. मुलीसारखी मानता मला तुम्ही. बाई, हे बघा ना माझं  लेटर. मला पंधरा हजार पगार देणार आहेत सुरुवातीला. मी करू ना ही नोकरी? “ 

“ अग जरूर कर बकुळ ! खूप खूप अभिनंदन तुझं ग !” 

“ बाई,”  संकोचून बकुळ म्हणाली.. “ मी आता इथे किती दिवस रहाणार? मी डी एड कॉलेजच्या वसतिगृहात राहीन आता. मला ते कमी खर्चात तिकडे राहू देणार आहेत. आता आणखी नका लाजवू.  जाऊ द्या मला आता बाई !” बकुळ रडायला लागली. सगळं घर तिच्याभोवती जमलं.आजींना सुद्धा गहिवरून आलं… “ जा तू बकुळ. अशीच स्वतःच्या पायावर उभी रहा.” आजींनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले. “ सुट्टीच्या दिवशी येत जा हो रहायला हक्काने!” त्या म्हणाल्या.

देवकीने बकुळला छानशी बॅग दिली, छान साड्या घेऊन दिल्या. बकुळ होस्टेलवर राहायला गेली. तिने देवकीशी कायम संपर्क ठेवला. बकुळ आता पर्मनंट झाली नोकरीत.  मग तिचं फारसं  येणं जाणं होऊ शकेना देवकीकडे. देवकीची मुलं मोठी झाली. रोहन राही पुढचं शिकायला अमेरिकेला गेले आणि घरात देवकी आणि तिचा नवरा एवढेच उरले. आजीही मध्यंतरी कालवश झाल्या.

आज अचानक खूप वर्षांनी बकुळ देवकीला भेटायला आली. “ बाई, कशा आहात? “ म्हणून तिने मिठीच मारली देवकीला. “  बाई मी आता एका शाळेत सुपरवायझर झाले, आणि मी त्या शाळेच्या हॉस्टेलची मेट्रन म्हणून पण काम करते. मला शाळेने रहायला क्वार्टर्स पण दिले आहे बाई ! तुमची कृपा सगळी … “ बकुळच्या डोळ्यात अश्रू होते. “ बाई, मला लग्न कधीच नाही करावंसं वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाहीये. मी आता अशीच मस्त राहीन. नको वाटतो तो अनुभव मला. आणि खूप मिळवतेय की मी ! बाई तुमचे उपकार कसे फेडू? नाही तर ही बकुळ अशीच घरकाम करत, कदाचित अशीच मरूनही गेली असती. तुम्ही देवमाणसं आहात बाई ! “ बकुळने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ बाई डोळे मिटा ना जरा….”   बकुळ हसत म्हणाली.

देवकीने हसत डोळे मिटले. बकुळने तिच्या हातावर काय ठेवले हे बघायला डोळे उघडले तर हातात सोन्याचे चांगलेच जड नाणे होते. “ बाई, तुम्ही माझ्यासारख्या दगडातून सोनं घडवलं म्हणून हे माझी आठवण म्हणून तुम्हाला ! नाही म्हणू नका  ना ! तुम्ही केलंत ना, त्यापेक्षा याची किंमत कमीच आहे, पण आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला घडवणाऱ्या पहिल्या गुरूला ही गुरुदक्षिणा ! ” 

देवकीने बकुळला जवळ घेतले आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “आनंदाश्रू आहेत हे बकुळ… नको पुसू !” देवकी म्हणाली आणि आत चहा करायला वळली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

दारावरची बेल वाजली. आत्ता दुपारी कोण आलं असेल म्हणून देवकी जरा वैतागूनच दार उघडायला गेली. . . दार उघडलं तर दारात बकुळ उभी.

जवळजवळ सात आठ वर्षांनी देवकी बकुळला बघत होती. पहिल्यांदा तर तिने बकुळला ओळखलंच नाही. केवढा बदल झाला होता बकुळ मध्ये ! छानसं पोनीटेल, एका हातात घड्याळ आणि गळ्यात सोन्याची चेन. अंगावर सुंदर साडी आणि प्रसन्न हसतमुख चेहरा !

कुठे पूर्वीची कामवाली बकुळ !  शेपटा वळलेला, मोठं कुंकू आणि  हातभर बांगड्या. बकुळ देवकीकडे दिवसभर कामाला होती. देवकी होती भूल देणारी डॉक्टर. चोवीस तास तिला केव्हाही कॉल यायचे. देवकीची मुलं लहान होती आणि देवकीला चोवीस तास रहाणाऱ्या बाईची अत्यंत गरज होती. तिचे सासू-सासरे होते म्हणा, पण देवकीच्या सासरचा गोतावळा खूप होता. सतत पाहुणे, माणसांचे येणे जाणे असायचं आणि मग सासूबाईंना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ व्हायचा नाही. देवकीचा नवरा होता डोळ्यांचा डॉक्टर ! तोही दिवसभर घरी नसायचा.

देवकीने हजार लोकांना बाईबद्दल सांगून ठेवले होते. अशात कोणीतरी ही बकुळ पाठवली. आली तेव्हा बकुळ असेल सोळा सतरा वर्षाचीच. पहाता क्षणीच देवकीला आवडली ही मुलगी. मोठे डोळे, पण विलक्षण चमकदार ! 

देवकी म्हणाली, “ काय ग नाव तुझं? किती शिकली आहेस? कोणी पाठवलं तुला? “ 

“ बाई, मी बकुळ ! तुमच्या मैत्रीण नाहीत का उषाताई, त्यांनी पाठवलं मला. मी काम करत होते त्या मावशी मुलाकडे गेल्या कायमच्या. मला राहून असलेलं काम हवंय म्हणून मला उषाताईंनी पाठवलं. मी दहावी शिकले बाई, पण पुढं नाही शिकता आलं. मला. आईवडील नाहीत, मामाने वाढवलं आणि आता मामी नको म्हणती मला रहायला. रोज रोज भांडण करण्यापेक्षा मीच मग चोवीस तासांचं काम बघतेय “. . एका दमात बकुळने आपली माहिती सांगितली.

देवकीला अत्यंत गरज होती अशा बाईची ! ती म्हणाली  “ मी बघते तुला ठेवून घेऊन महिनाभर ! आवडलं, आपलं पटलं तर मग बघूया. मी कधीही केव्हाही बाहेर जाते. आजी आहेत कुरकुऱ्या, तुला पटवून घ्यावे लागेल हं ! “ बकुळ हसली आणि म्हणाली, “ बाई, उद्यापासून येऊ ना? “ देवकीला फार आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बकुळ हजर झाली. नीट नेटकी साधी साडी, जाड केसांचा शेपटा, त्यावर गजरा !देवकीचा बंगला मोठा होता, त्यामुळे बकुळला ठेवून घेण्यात देवकीला अडचण नव्हती. आल्याआल्या पदर बांधून देवकी म्हणाली, “ बाई, घर दाखवा ना आपलं ! स्वयंपाकघरात गेल्यावर आजींना तिनं खाली वाकून नमस्कार केला. आजींनी प्रश्नार्थक मुद्रेने देवकीकडे बघितलं.

“ आजी, ही बकुळ. आपल्याकडे राहून काम करणार आहे. तुमच्या हाताखाली ही मदत करील तुम्हाला स्वयंपाक घरात ! “ 

आजी म्हणाल्या, “ हो का? आत्तापर्यंत सतरा जणी आल्या, आता हिचा काय उजेड पडतो बघूया. ”  देवकीने बकुळकडे पाहिलं. बोलू नकोस अशी खूण केली आणि तिला तिची खोली दाखवली. देवकीने तिला काम समजावून सांगितलं. मुलांची ओळख करून दिली. तेवढ्यात फोन वाजलाच ! डॉ मराठ्यांकडे तिला लगेचच कॉल होता.

देवकी म्हणाली, “ बकुळ मी जातेय ! जमेल तसं कर. आले की बाकीचे सांगेन मी !” त्या दिवशी देवकीला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. एक मिनिट फुरसत मिळाली नाही तिला. घरी आता काय काय झालं असेल म्हणतच देवकी घरी आली. हॉलमध्ये  देवकीची मुलं राही आणि रोहन बकुळ जवळ बसले होते आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती आणि आजी सुद्धा ऐकत होत्या, मन लावून ! देवकीने सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवात तरी चांगली झाली म्हणायची… देवकी हसून मनाशी म्हणाली. हळूहळू बकुळ घरी रुळायला लागली. देवकीच्या फोनजवळ डायरी असायची आणि त्यात सगळे तिचे कॉल्स वेळ, तारीख नोट केलेले असायचे. बकुळ हळूहळू हे करायला शिकली. आता देवकीला कोणताही फोन आला की बकुळ म्हणायची, “ एक मिनिट हं सर ! बाईंची डायरी बघून सांगते. मी ! उद्या आठ वाजता नाहीये कुठे कॉल. मी लिहून ठेवते तुमचा कॉल आणि बाई आल्या की मग करतीलच तुम्हाला कॉल. ! “ बाकीच्या डॉक्टरांना बकुळचे कौतुकच वाटायचे. ‘ देवकी, तुझ्या बकुळने फिक्स केलाय बरं कॉल ! मस्त तयार झाली ग तुझी ही असिस्टंट ! “ इतर डॉक्टरणी देवकीला हेव्याने म्हणायच्या. बकुळ हळूहळू उजवा हात झाली देवकीचा. घरात तर ती सगळ्यांची आवडती झालीच ! रोहन राहीला तर एक क्षण करमत नसे बकुळताई शिवाय, आणि आजीही खूष होत्या तिच्यावर ! देवकीला खूप लळा लागला बकुळचा. ती आता घरातलीच सदस्य नव्हती का झाली? मुलं मोठी व्हायला लागली. आता तर त्यांना सांभाळायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची तशी गरजही उरली नाही. देवकी एक दिवस लवकर घरी आली होती. बकुळचे सगळे काम संपले होते. देवकीने तिला विचारलं, “ बकुळ, खूप दिवस तुला विचारीन म्हणते, पण मी तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही चौकशी केली नाही ग ! तू अशी लोकांकडे कामं करत किती वर्षे रहाणार बाळा? किती गुणी आहेस तू. काय ठरवलं आहेस तुझ्या पुढच्या आयुष्याचं बेटा? “ 

बकुळच्या डोळ्यात पाणी आलं. “ बाई, काय सांगू तुम्हाला ! फार हाल काढलेत हो मी ! माझे आई वडील खूप लवकर गेले आणि मी एकटीच मुलगी त्यांना. मग मामा मामीनं थोडे दिवस संभाळलं. त्यांनाही त्यांची मुलंबाळं होतीच आणि गरीबीही होतीच की पाचवीला पुजलेली. नाईलाजानं त्यांनी मला अनाथाश्रमात ठेवलं. पण मामी नेहमी यायची मला भेटायला, थोडे पैसे द्यायची, कपडे घ्यायची. ती तरी आणखी काय करणार होती? मी होते त्या आश्रमात मुलं मुली दोन्ही होती. मी आश्रमाच्या शाळेतच जात होते. हे सुंदर रूप सगळीकडे आड यायला लागलं हो बाई. एका रात्री एका मुलानं बळजबरी केली माझ्यावर ! मी आरडाओरडा केला. पण काही दिवसांनी हे वारंवार घडत गेलं. कोणाकडे दाद मागणार मी? एक दिवस तर आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून….

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा.) — इथून पुढे – 

त्याच्या गावामध्ये त्याचे गुरु राहुल देव बर्मन यांच्याकडे वादक होते. आता ते मुंबई सोडून त्याच्या गावी स्थायीक झाले होते. स्वर, ताल, आलापी सर्व काही व्यवस्थित समजवत होते. त्यानी सर्व ज्ञान केदारला दिले होते. विश्वास मनात म्हणायचा, मी जशी राजापूरच्या खेड्यातून इतपर्यंत मजल मारली तसाच केदार. —शहरातील मुलं खूप नशिबवान. त्यांना हवी ती वाद्ये सहज उपलब्ध होतात. नाहीतर पालक वाद्य विकत घेऊन देतात किंवा आजूबाजूला हवे तेवढे क्लासेस आहेतच. शहरातील मुलांना इच्छा असेल तर मार्ग सहज मिळतो. आपल्याला हार्मोनियमवर बोटे फिरवायला वयाची १२ वर्षे लागली. त्यानंतर विविध राग. आणि तबला पेटी सोडून इतर वाद्ये फक्त लांबून बघायची. मुंबईत येऊन गुरु चरणदास यांच्या गुरुकूलमध्ये मात्र सगळी वाद्य सतार, संतुर, व्हायोलीन, बासरी, इलेक्ट्रीक गिटार, सिंथेसायझर हवी ती वाद्ये हात जोडून उभी होती. विश्वासला आपले रत्नागिरीतील गुरु ताम्हणकर बुवा आठवले. एकदा राजापूरात कीर्तन करायला आलेले. पेटीच्या साथीला कोणी नाही म्हणून आपण साथीला बसलो. लहान वयातील आपली बोटे स्वर बरोबर काढतात हे पाहून त्यांना आनंद वाटला. आपल्या वडिलांशी बोलून ते शनिवार रविवार रत्नागिरीत शिकवू लागले. वडिलांना एसटीचे भाडे देणे कठिण म्हणून आपण एसटीचे भाडे देऊ लागले. विश्वासच्या डोळ्यासमोर ताम्हणकर बुवा आले. असे गुरु अजून जगात आहेत म्हणून विद्यादान गरीबांना मिळते. 

विश्वासने आपला अंतिम रिझल्ट लिहायला घेतला. एवढ्यात केबिनचे दार उघडून सरदेसाई आत आला. या हिंदी चॅनेलवर सारे हिंदी भाषीक. फक्त रखवालदार मनोहर आणि या प्रोग्रॅमचा मॅनेजर सरदेसाई तेवढे मराठी बोलणारे. 

‘‘गुड मॉर्निंग जाधव’’

‘‘यस गुड मॉर्निंग सरदेसाई. अंतिम रिझल्ट पाच मिनिटात देतो. ’’

‘‘जाधव, त्यासंबंधातच मी बोलायला आलोय.’’

‘‘बोला.’’

सरदेसाईंनी केबिनचे दार आतून बंद केले आणि जाधव समोरच्या खुर्चीवर बसला.

‘‘जाधव, चॅनेलची इच्छा आहे, या स्पर्धेत निकिता पहिली यावी.’’

‘‘व्हॉट नॉनसेन्स, अरे निकिता माझ्याकडे सर्वात शेवटी आहे. तिचा स्कोअर ऐंशीच्या खाली आहे.’’

‘‘असू दे, अंतिम पाच मध्ये आलेला कोणीही विजेता किंवा विजेती होऊ शकतो.’’

‘‘बरोबर, पण गेल्या एक महिन्याचे मार्क निकिताला सर्वात कमी आहेत. आणि पहिल्या नंबरवर….’’

‘‘कोणीही असू दे, निकिताच विजेती होणार असे चॅनेलचे म्हणणे आहे.’’

जाधव ओरडला – ‘‘अरे का पण ? केदारवर हा अन्याय आहे.’’

‘‘याचे कारण, एन चॅनेलला दक्षिण भारतात विशेषतः ओरीसा, आंध्रप्रदेश या भागात हातपाय पसरायचे आहेत आणि निकिता ही ओरीसाची आहे. या स्पर्धेत ती विजेती झाली म्हणजे त्या भागातील लोक एन चॅनेल घरोघरी घेतली. आणि हा अंतिम फेरीचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील. 

‘‘चॅनेलच्या धंद्यासाठी खर्‍या गायकावर अन्याय? मग स्पर्धा घेता कशाला ? आणि परिक्षक हवे कशाला ? चॅनेलला वाटेल त्याला बक्षिसे देऊन मोकळं व्हायचं.’’

‘‘असे कार्यक्रम असले तरच टिआरपी जास्त मिळतो. लोक तहान भूक विसरुन टिव्ही पाहत राहतात. आम्हाला पण अशाच कार्यक्रमांना प्रायोजक मिळतात. विशेषतः लहान मुलांच्या स्पर्धेत लोक जास्त इमोशनल होऊन कार्यक्रम पाहतात. चॅनेल घरोघरी पोहचते. चॅनेलला खूप पैसे मिळतात. आणि परिक्षकांना पण मिळतात. ’’

‘‘अशा पैशांवर थुंकतो मी. मी पण कोकणातून गरीब घराण्यातून आलोय. दुर्गम भागात विद्या मिळवायची याला किती त्रास असतो ते मला माहिती आहे. मी केदारला ९० टक्केपेक्षा जास्त मार्क दिलेत. आणि निकिता ऐंशी टक्केच्या खाली आहे. माझ्या मार्कलिस्टवर केदारच पहिला येणार.’’

जाधवने पुन्हा मार्कलिस्ट समोर घेतली आणि तो अंतिम रिझल्ट तयार करु लागला. 

‘‘जाधव एक मिनिट थांब, हे फोटो पहा. मी पाच मिनिटांनी येतो. मग बोलू आपण.’’ त्याच्या समोर फोटोचे इनव्हलप ठेवून सरदेसाई केबिन उघडून बाहेर गेला. जाधवने इनव्हलप हातात घेतले आणि एका बाजूने उघडले. आतमधून चार फोटो बाहेर पडले. कसले फोटो म्हणून जाधव पाहू लागला आणि तो चमकला, त्याचे आणि एका कॉलगर्लचे एकामेकाच्या मिठीतले फोटो होते. त्याच्या लक्षात आले गेल्यावर्षी एक अल्बम लाँच व्हायचा होता त्यावेळी अलिबागच्या हॉटेलमध्ये पार्टी होती. पार्टीनंतर त्याच मध्ये हॉटेलमध्ये रहायचे होते. तो पार्टी संपवून त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्याच्या रुममध्ये ही कॉलगर्ल आधीपासून हजर होती. त्याला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडत होती. पण त्याने तिला ढकलले. हा ‘‘हनीट्रॅप’’ आहे आणि यापासून लांब रहायला हवे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने आरडाओरड करुन इतरांना बोलावले. ती कॉलगर्ल चडफडत पळाली. तसे आपण पोलीसात कळविणार होतो पण अल्बमची मंडळी हात जोडू लागली. तसेच त्या हॉटेलची माणसेपण आमचे नाव खराब होईल पुन्हा येथे कोण येणार नाही तेव्हा पोलीसांना बोलवू नये म्हणून आग्रह करु लागली म्हणून आपण गप्प बसलो. पण हे फोटो या चॅनेलकडे कसे आले? की, गेल्यावर्षीपासून या चॅनेलचे आपल्यावर लक्ष होते ? आपल्याला परिक्षक बनवायचे आणि हवा तसा रिझल्ट नाही दिला तर हनीट्रॅपमध्ये अडकवायचे. जाधवने पुन्हा फोटो पाहिले. प्रत्येक फोटोत ती कॉलगर्ल त्याच्या हातावर पडलेली दिसत होती. जाधवला वाटलं आपण त्याच वेळी पोलीस कंम्पलेंट करायला हवी होती. आता असे फोटो पाहून आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्याला त्याची पत्नी अनिताची आठवण झाली. तिला पण हा प्रसंग सांगायला हवा होता. पण ठिक आहे. अनिताचा आपल्यावर विश्वास आहे. अशा फोटोंवर विश्वास ठेवणारी ती नाही. या झगमगत्या दुनियेत अशा गोष्टी नेहमीच्याच. विश्वास ने मनात म्हटले, ‘ सरदेसाई असल्या फोटोनी माझा रिझल्ट बदलणार नाही. मी तुझ्या चॅनेलला पुरुन उतरेन. ‘ 

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print