श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “टिश्यू पेपर…” ☆ श्री मंगेश मधुकर 

घरात आल्यावर भाजीची पिशवी आईकडं देऊन खोलीत गेलेला रघू हाक ऐकून बाहेर आला. 

“भाजी आणली.आता काय??”

“थोडं बोलायचं होतं.’

“कशाबद्दल”

“नेहमीचा विषय.”

“आज नको”

“मग कधी? अरे,मी काय आयुष्यभर पुरणार नाही. चाळीशीला आलास आता तरी…”

“एकटाय तेच बरयं. जाऊ दे ना.”

“आता कोणाची वाट बघतोयेस.”

“ कोणी सांगितलं.काहीही काय ”

“ मला सगळं कळतं. अजून मालती परत येईल अशी आशा आहे ना ”

“ एकदम मालतीची आठवण?” रघूनं आश्चर्यानं विचारलं. 

“ मुद्दामच ”

“ भेटली होती का?.”

“ खूप दिवसात भेट नाही आणि फोन पण नाही ”

“ बघ,मी सांगत होते तसंच झालं. परिस्थिती बदलली अन ही बयासुद्धा..”

“ जाऊ दे. यावर बऱ्याचदा बोललोय.”

“ पण काही उपयोग झाला का?सगळं पालथ्या घड्यावर पाणी !!”

“ आई!!” रघू वैतागला. 

“ माझ्यावर कशाला ओरडतो. तिला खडसावून विचारायचं तेव्हा मूग गिळून गप्प बसलास.”

“ आता काय तिचं थोबाड फोडू म्हणजे तुझं समाधान होईल.”

“ शक्य आहे का?.”

“ अजूनही ती माझा मान ठेवते ”

“ इतक्या दिवसात साधी विचारपूस केली नाही.यावरूनच कळलं.”

“ तोंडाला येईल ते बोलू नकोस.”

“ अजून तिच्याबद्दल पुळका आहे.”

“ तू समजतीस तितकी वाईट नाहीये. आमच्यात काही गैरसमज झाले म्हणून.” 

“ कसला बोडक्याचा गैरसमज !! गरज संपली म्हणून सोडून गेली.”

“ असं काही नाही. आमची मैत्री होती, आहे आणि पुढेही राहणार ”

“ रघ्या,अगदी भोळा सांब आहेस रे !!”

“असू दे ”

“ मला वाटलं त्यापेक्षा ती जास्त चलाख निघाली. फसलेला प्रेमविवाह, तुटलेलं माहेर आणि घटस्फोट अशा पाठोपाठच्या घटनांमुळे एकटी होती. अशावेळी नेमका तू भेटलास, आणि तिला हवा असलेला आधार मिळाला.”

“ मग त्यात वाईट काय झालं ? ”

“ तिच्या बाजूनं म्हणशील तर काहीच नाही. तुझ्यामुळे ती सावरली. आत्मविश्वास परत मिळाला.आयुष्य मार्गी लागलं. हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर मोठया कंपनीत ऑफिसर झाली.”

“ चांगलंच झालं ना ”

“ हो ..  पण तू जिथं होतास तिथंच राहिलास. नुकसान तर तुझंच झालंय.”

“ नोकरी, स्वतःचं घर, खाऊन पिऊन सुखी. अजून काय पाहिजे “ 

“ यापलीकडे सुद्धा आयुष्य असतं. परिस्थिती, वस्तुस्थिती आणि मालती सगळं बदललं. तू नाहीस.  अजून  किती दिवस असा कुढणार.? ”आई चिडली.

“ मागचं विसरायचा प्रयत्न करतोय. तूच पुन्हा विषय काढलास ”

“ तुमची जोडी छान होती, परंतु मनात धास्ती होती.”

“ कसली ? ”

“ ती कधीही सोडून जाईल याची.”

“ असं वाटायचं कारण?” 

“ दोघांचे टोकाचे स्वभाव !! तू हळवा तर ती व्यवहारी. तू चटकन भावूक होणारा तर ती फटकळ, नको इतकी स्पष्ट बोलणारी. तू आहे त्यात समाधान मानणारा तर ती प्रचंड महत्वकांक्षी .”

“ तरीही आम्ही एकमेकांना समजून, सांभाळून घेतलंच ना. आमचं छान नातं होतं. ”

“ डोंबलाच नातं !! एकमेकांच्या प्रेमात होतात .”

“ आधी होतो..  पण स्वभावातला फरक लक्षात आल्यावर सावरलो. नंतर फक्त मैत्री होती.”

“ आता तर ती सुद्धा राहिली नाही. तुमचे मार्ग वेगवेगळे आहेत. तू अजूनही झुरतोयेस. ती मात्र आयुष्यात स्थिरावली. आता ती थांबणार नाही. पुन्हा लग्न करून मोकळी होईल ”

“ माहितेय ”

“ आणि तू काय असाच दुसऱ्याला मदत करण्यात आयुष्य घालवणार? अजून किती दिवस भलेपणाची मशाल घेऊन फिरणारेस ? ”

“ शक्य होईल ती मदत करत रहायचं.”

“ म्हणजे लोकांना स्वतःला वापरायला द्यायचं.असंच ना.”

“ तुझ्या मनात मालतीविषयी पहिल्यापासूनच अढी होती. कामाच्या व्यापात आमच्या भेटीगाठी, बोलणं कमी झाल्या. एवढंच, बाकी काही नाही. नोकरीत स्थिरावल्यावर मालती जास्तच फटकळ,आक्रमक झाली हे देखील मान्यय.”

“ याविषयी सावध केलं होतं..  पण तू लक्ष दिलं नाही.”

“ जे झालं ते झालं.आता त्यावर चर्चा करून काय उपयोग !! तिच्याविषयी राग नाही. अडचणींवर मात करत तिनं मिळवलेल्या यशात खारीचा वाटा आहे याचाच आनंद आहे.”

“ त्याच खारीच्या वाट्याची किंमत पाठवलीय. हे घे ”

“ म्हणजे? ” आईनं पाकीट रघूच्या हातात दिलं. पन्नास हजाराचा चेक पाहून रघूला मोठा धक्का बसला. प्रचंड राग आला. मनात खूप खोलवर जखम झाली. 

“ तुझ्या मदतीची चांगली परतफेड केलीय.” आई. 

“ काय बोलू !! तू तिला बरोबर ओळखलं मीच तिला समजून घ्यायला चुकलो. तुझा विरोध डावलून भाड्यानं खोली घेऊन दिली. लोक काय म्हणतील याची पर्वा केली नाही. आमच्याविषयीचे टोमणे, शेरेबाजी सगळं सगळं सहन केलं, पण तिची साथ सोडली नाही. त्याचं हे फळ मिळालं.” .. रघू.

“ आता काय करणायेस ? ”

“ हा भिकेचा चेक परत पाठवणार. ”

“ शाबास !! आवर्जून तिला सांग की सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या नसतात. काही नाती ही व्यवहारा-पलिकडची असतात. ”.

“ हा चेक म्हणजे आमच्या नात्याचा पूर्णविराम.” 

“ दुनियदारीत बऱ्याचदा स्वार्थ हा भावनेपेक्षा मोठा ठरतो. चेष्टा होईल इतकंही माणसानं चांगलं वागू नये.” .. .. आई 

“ खरंय !! आतापर्यंत ऐकलं होतं की माणसं गरजेपुरती वापरली जातात आणि गरज संपली की??? माझ्या बाबतीत तेच घडलं. एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की मालतीला खूप जवळचं, हक्काचं माणूस समजत होतो पण तिच्यासाठी मी फक्त एक टिश्यू पेपर…….” .. भरून आल्यानं रघू पुढे बोलू शकला नाही.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments