मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून “ब्युनोस आयर्स” हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ बारा एकरांचे असून तेथे बारा हिंदू देवतांची देवळे बांधलेली आहेत. तितके अर्जेंटिअन लोक तेथे वास्तव्यास असतात.

त्यांमध्ये श्री गणेश, श्री कृष्ण, सूर्यदेव, श्री नारायण आणि शिव यांची अस्सल हिंदू पद्धतीची बारा देवळे असून, हस्तिनापूर नावाला शोभेल असे पांडवांचेही एक देऊळ आहे. हस्तिनापूर हे अक्षरश: देवांच्या राहण्यासाठीच बांधलेले स्थान वाटते. सर्वत्र स्वच्छ व आल्हाददायक वातावरण, रोजवूडची हिरवीगार झाडे, निर्मळ व शांत वातावरण. आवाज हा फक्त झाडांवरील घरट्यांत राहणार्‍या पक्षांच्या कूजनाचा ! भक्तगणांत मृदू व तालबद्ध भजनांचा आवाजही नियमित वेळी उमटत असतो. बगीच्यातील पांढर्‍या दगडांतील उभी गणेशाची मूर्ती, आपले चित्त आकृष्ट करून घेते.

देवळे अर्जेंटिअन लोकांनीच 1981चे सुमारास बांधली. ती हुबेहूब हिंदू देवळांप्रमाणे आहेत. तेथील हिंदू संप्रदायाची स्थापना ‘अल्डा अलब्रेच्ट’ (ALDA ALBRECHT) या साध्वीने केली. तिने हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रसार अर्जेंटिअन लोकांमधे केला व ती त्यांची ‘गुरू’ झाली. तिने पुष्कळ लिखाण केले असून वानगीदाखल ‘हिंदू संत आणि त्यांची शिकवण’ (The Saints and Teachings of India’), ‘हिमालयातील योग्यांची शिकवण’ ही त्‍यांची पुस्‍तके होत.

‘गुस्टाव कॅनझोब्रेट’ (Gustavo Conzober) हा तिचाच शिष्य होय. सांप्रत तो हस्तिनापूर कॉलेजचा डायरेक्टर आहे. त्याला वयाच्या सतराव्या वर्षांपासून हिंदू तत्त्वज्ञानाची गोडी लागली.  ब्युनोसआयर्स येथील भारतीय वकिलातीने नोव्हेंबर 2010 मध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते, त्यावेळी ‘दक्षिण भारतातील देवळांचे शिल्पशास्त्र’ या विषयावर त्याचे भाषण झाले. तो स्थानिक कंपनीचा मॅनेजर असून (चरितार्थ चालण्यापुरता) बाकी सर्व वेळ तो हस्तिनापूर संस्थेच्या कार्यास देतो. त्याला हिंदू वेद-उपनिषदे यांचे चौफेर ज्ञान असून तो ऑगस्ट 2011 मध्ये भारत भेटीवर आला होता. ती त्याची दुसरी भारतभेट होती.

देवळांची निगा राखणार्‍या आणि करणार्‍या बारा अर्जेंटिअन पुजार्‍यांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या शेवटी जवजवळ शंभर तरी अर्जेंटिअन लोक निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी येतात. म्हणूनच हस्तिनापूरला ‘आध्यात्मिक ज्ञानकेंद्रा’चे स्थान प्राप्त झाले आहे. लोक तेथे तत्त्वज्ञान शिकतात, ग्रंथालयात बसून विविध पुस्तकांचे वाचन करतात. ‘योगा’चे धडे देतात, ध्यानाचे धडे गिरवतात आणि भजने म्हणतात.

देवळांच्या आवारापलीकडे गायी चरत असतात. त्या अर्जेंटिनामध्ये असूनही निर्भय वाटतात; येवढेच नव्हे तर त्या मधून मधून देवळांकडे न्याहाळून पाहत आहेत असेही भासते ! त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत ! वास्तविक त्यांच्यामध्ये इंजिनीयर्स, प्रोफेसर्स आहेत, पण ते फावल्या वेळात संस्थेत येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात.

तेथे गौतम बुद्धाचे, कुमारी मेरीचे, डिमेटर (Demeter ) या ग्रीक देवाचे, आणि एक देऊळ ‘सर्व पंथांचे’ आहे. तेथे कोणत्याही विवक्षित धर्माचा प्रसार करण्यात येत नाही. येणार्‍या ‘भक्तांना स्वत:चा मार्ग’ निवडण्याची मुभा आहे. तेथे विविध कार्यशाळांचे, सेमिनार्सचे आयोजन करून एकांतवासाचे महत्त्व समजावले जाते. ‘गणेशचतुर्थी’ व ‘वैशाखी’ हे उत्सव साजरे केले जातात. रेडिओद्वारे येथील कार्यक्रमांचा प्रसार करण्याची योजना आहे.

हस्तिनापुरातील देवळात पुजारी (बडवे), दानाची पेटी इत्यादी गोष्टी नाहीत ! भक्त लोक येतात, मंत्रपठण करतात, भक्तिगीते गातात, ध्यान करतात. मेडिटेशन हॉल आहे. योगविद्येसाठी तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून, दर आठवड्यातून एकदाच शिकवले जाते. तेथे अडीच हजार विद्यार्थ्यांची सोय असून, शंभर शिक्षक भारतीय तत्त्वज्ञान आणि एकशेवीस शिक्षक ‘योग’साधना शिकवतात.

‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ तर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, भगवदगीता , योगसूत्रे , उपनिषदे, श्रीभागवत, भक्तिसूत्रे यांची भाषांतरे पण केली गेली आहेत.

अगदी अलिकडे ‘स्पॅनिश’ भाषेत ‘श्रीमहाभारता’ चे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. तीन भाग प्रसिद्ध झाले असून एकूण बारा भाग प्रसिद्ध करायचे ठरले आहे. प्रत्येक भाग अंदाजे पाचशे पृष्ठांचा असेल.

ब्युनोस आयर्स मध्ये ‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ची सोळा केंद्रे असून तीन इतरत्र आहेत. खेरीज उरुग्वे, बोलिव्हिया आणि कोलंबिया येथेही केंद्रे स्थापन केली गेली आहेत. (http://en.hastinapura.org.ar ) या वेबसाईटवर आधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

लेखक : ल. ग. पटवर्धन

पुणे 

दूरभाष – (020) 25384859,  इमेल : – [email protected]

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

७. आदित्य एल-१ वरील वैज्ञानिक अभिभार

सूर्याचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी या मोहिमेत सात अभिभारांच्या संचाचा समावेश करण्यात आला आहे.

अ )दृश्यमान उत्सर्जन रेषा किरिटालेख (Visible Emission Line Coronagraph- VELC) हा अभिभार प्रभामंडल आणि प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection- CME) गतीशीलतेचा अभ्यास करणार आहे.

ब ) सौर अतिनील प्रतिमाग्राहक दुर्बीण ( Solar Ultra-violet Imaging Telescope – SUIT)

हा अभिभार निकट अतिनील (near infra-red) वर्णपटात सूर्याच्या दीप्तीमंडल (photosphere) व वर्णमंडल (chromosphere) यांच्या प्रतिमा घेईल व निकट अतिनील वर्णपटातच सौर विकिरणाच्या  (solar irradiance)  फेरबदलांची मोजणी करेल.

क,ड ) आदित्य सौरवारे कण प्रयोग (Aditya Solar-wind Particle Experiment- ASPEX) आणि आदित्यसाठीचा प्लाविका विश्लेषक संच (Plasma Analyser Packge for Aditya- PAPA)

हे अभिभार सौर वारे व ऊर्जावान आयन्स (energetic ions) व त्यांचे वितरण (distribution) यांचा अभ्यास करतील.

इ, फ ) सौर निम्न ऊर्जा क्ष किरण वर्णपटमापक (Solar Low Energy X-ray Spectrometer – SoLEXS) आणि उच्च ऊर्जा एल-१ परिभ्रमणीय क्ष-किरण वर्णपटमापक (High Energy L1 Orbiting X-ray Spectroscope अर्थात HEL1OS)

हे अभिभार सूर्यापासून निघणाऱ्या क्ष किरणांच्या उद्रेकांचा विस्तृत क्ष-किरण ऊर्जा श्रेणीत अभ्यास करतील.

ग ) चुंबकीयक्षेत्रमापक (Magnetometer)

 हा अभिभार L-१ बिंदूच्या ठिकाणी अंतर्ग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजेल.

आदित्य एल – १ वरील सर्व अभिभार संपूर्णपणे स्वदेशी असून ते देशभरातील विविध प्रयोगशाळांद्वारा विकसित केले गेले आहेत. बेंगलोर स्थित भारतीय खगोल भौतिकी संस्थेने VELC उपकरण विकसित केले आहे. पुणे स्थित आंतर विद्यापीठ खागोलशास्त्र व खगोल भौतिकी केंद्राने SUIT हे उपकरण विकसित केले आहे. अहमदाबाद स्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेने ASPEX हे उपकरण विकसित केले आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरमच्या अंतराळ भौतिकी प्रयोगशाळेने PAPA हा अभिभार विकसित केला आहे. बेंगलोर स्थित यू. आर. राव उपग्रह केंद्राने SoLEXS व HEL1OS हे अभिभार विकसित केले आहेत. तर बेंगलोर स्थित इलेक्ट्रो ऑप्टिक्स प्रणाली प्रयोगशाळेने Magnetometer हा अभिभार विकसित केला आहे. हे सर्व अभिभार इस्रोच्या विविध केंद्राच्या निकट सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत.

लॅगरेंज बिंदू – 

दोन पिंडांच्या गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी लॅगरेंजबिंदू असे बिंदू आहेत जेथे एखादी लहान वस्तू ठेवल्यास ती तेथे स्थिर राहते. दोन पिंडांच्या प्रणालीसाठी, जसे की सूर्य व पृथ्वी, अंतराळातील हे बिंदू अंतराळयानाद्वारा कमीत कमी इंधन वापरून ते स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या लॅगरेंज बिंदूला दोन मोठ्या वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणीय बल हे लहान वस्तूला त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अपकेंद्रीय बलाशी तुल्यबळ असते. द्विपिंड गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी एकंदर पाच लॅगरेंज बिंदू असतात व ते एल १, एल २,एल ३, एल ४, एल ५ असे ओळखले जातात. एल १ हा लॅगरेंज बिंदू सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये, त्यांना जोडणाऱ्या रेषेवर असतो व त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतराच्या एक टक्का एवढे असते. 

९.आदित्य एल-१ चे प्रक्षेपण व त्याचे एल-१ पर्यंतचे मार्गक्रमण :

इस्त्रोद्वारा आदित्य एल -१ मोहिमेचे प्रक्षेपण पीएसएलव्ही प्रक्षेपका द्वारा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र -शार (SDSC-SHAR) श्रीहरीकोटा येथून ऑगस्ट २०२३ मध्ये केले जाईल. सुरुवातीला अंतराळयान पृथ्वी समीप कक्षेमध्ये (Low Earth Orbit-LEO) स्थित केले जाईल. नंतर कक्षा जास्त लंबवर्तुळाकार (elliptical) केली जाईल. त्यानंतर यानावर असणाऱ्या प्रणोदन प्रणालीचा (propulsion system) उपयोग करून त्याला एल-१ कडे प्रक्षेपत केले जाईल. जसजसे यान एल -१ कडे जात जाईल तसतसे ते पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून (Gravitational Sphere Of Influence) बाहेर पडेल. गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावा बाहेर पडल्यावर पर्यटन टप्पा (cruse stage) सुरू होईल व सरते शेवटी यान एल-१ भोवतालच्या मोठ्या आभासी कक्षेत अंत:क्षेपित केले जाईल प्रक्षेपणापासून ते एल-१ मध्ये अंत:क्षेपित केला जाण्याचा काळ हा चार महिन्यांचा असेल.

१०)अंतराळातून सूर्याचा अभ्यास का करायचा? 

सूर्य विविध तरंग लहरींमध्ये प्रकाश उत्सर्जित करीत असतो. त्याबरोबरच तो अनेक ऊर्जा भरीत कण व चुंबकीय क्षेत्र यांचेही उत्सर्जन करीत असतो. पृथ्वी भोवतालचे वातावरण त्याचप्रमाणे तिचे चुंबकीय क्षेत्र सूर्यापासून उत्सर्जित झालेल्या हानिकारक लांबींच्या तरंग लहरी, सौरकण व सौरचुंबकीय क्षेत्र यांसाठी ढाल म्हणून काम करतात. सूर्यापासून निघणारी प्रारणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे पृथ्वीवरील उपकरणांद्वारे त्या प्रारणांचा शोध घेता येणार नाही आणि या प्रारणांच्या मदतीने केला जाणारा सूर्याचा अभ्यास करता येणार नाही. परंतु पृथ्वीपासून दूर म्हणजे अंतराळातून निरीक्षण करून या प्रारणांच्या मदतीने सूर्याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे सौरवाऱ्याचे कण आणि सूर्यापासून प्रसारित होणारे चुंबकीय क्षेत्र आंतर्ग्रहीय अवकाशातून प्रसारित होताना त्याचे मोजमाप करण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होणार नाही अशा जागेची आवश्यकता भासते. यासाठी सूर्याचा अभ्यास अंतराळातून करणे श्रेयस्कर असते.

११)आदित्य एल-१ मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची परिपूर्ण मोहीम आहे का?

या प्रश्नाचे स्वाभाविक उत्तर ‘नाही’ असेच आहे. हे उत्तर फक्त आदित्य एल-१ साठीच खरे नाही तर इतर कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी ते तितकेच खरे आहे. याचे कारण अवकाशात वैज्ञानिक अभिभार वाहून नेणाऱ्या यानाला वस्तुमान, ऊर्जा व आकारमान यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे यानावर मर्यादित क्षमतेच्या मर्यादित उपकरणांचा संच पाठवता येतो. आदित्य एल-१ च्या बाबतीत सर्व निरीक्षणे लॅगरेंज बिंदू एल-१ या ठिकाणाहूनच केली जाणार आहेत. उदाहरणार्थ सूर्यापासून निघणारी प्रारणे, चुंबकीय क्षेत्र, सौरवारे आदि गोष्टी बहुदैशीक असतात.  त्यामुळे यांपासून सर्व बाजूंनी वितरित होणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप आदित्य एल-१ द्वारा करता येणार नाही.  आणखी एक लॅगरेंज बिंदू जो एल-५ म्हणून ओळखला जातो तो पृथ्वीकडे येणाऱ्या  प्रभामंडलीय वस्तुमान उत्सर्जन आणि अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासासाठी सुयोग्य बिंदू आहे. तसेच सूर्याच्या ध्रुवबिंदूंचा अभ्यास आपल्या तंत्रज्ञानातील मर्यादांमुळे म्हणावा तेवढा झालेला नाही. सूर्याच्या ध्रुव प्रदेशातील गतिशीलता व चुंबकीय क्षेत्र हे सौरघटनाचक्रे निर्माण होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे मानले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याच्या अंतरंगात व त्याच्याभोवती घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्यासाठी विविध तरंगलांबींमध्ये बाहेर पडणाऱ्या सौर प्रारणांच्या ध्रुवीकरणांची निरीक्षणे करणे आवश्यक आहे, जे आदित्य एल-१ करू शकणार नाही.

– समाप्त – 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

 १. सूर्य 

सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आणि सौरमंडलातील सर्वात मोठा गोलक आहे. त्याच्या अनेक नावांपैकी आदित्य हे एक नांव आहे. सूर्याचे वय ४.५ अब्ज वर्षे आहे. हा हायड्रोजन व हेलियम वायूंचा अति उष्ण व तेजस्वी अंतरिक्ष गोलक आहे. तो पृथ्वीपासून १५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून तो आपल्या सौरमंडळाचा ऊर्जा स्त्रोत आहे. आपणास माहीतच आहे की सौरशक्ती शिवाय पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व शक्य नाही. सूर्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यमालेतील सर्व वस्तूंना एकत्र ठेवते. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला गाभा (core) म्हणतात. तेथील तापमान अगदी १५ दशलक्ष अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचू शकते. या तापमानाला तेथे अण्विक संमिलन (nuclear fusion) नावाची प्रक्रिया घडते. या प्रक्रियेमुळे सूर्याला अव्याहत ऊर्जा मिळत असते. आपणास दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तीमंडल (photosphere) म्हणतात हा सापेक्षरित्या ‘थंड’ असतो. येथील तापमान ५५०० अंश सेंटीग्रेड एवढे असते.

.सूर्याचा अभ्यास कशासाठी?

सूर्य हा आपला सर्वात जवळचा तारा आहे. त्यामुळे इतर ताऱ्यांच्या तुलनेत त्याचा अभ्यास आपणास सांगोपांगपणे करता येतो. सूर्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांविषयी तसेच इतर विविध दीर्घिकांमधील  ताऱ्यांविषयी खूप अधिक माहिती मिळू शकते. सूर्य हा खूप चैतन्यशील तारा आहे. आपण पाहतो त्यापेक्षा त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याच्यावर सतत उद्रेक होत असतात, तसेच तो सौरमंडळात अमाप ऊर्जा उत्सर्जित करीत असतो. जर असे उद्रेक पृथ्वीच्या दिशेने घडत असतील तर त्यामुळे आपल्या भूमंडळावर (पृथ्वी जवळचे अंतरिक्ष) दुष्परिणाम होतात. अंतराळयाने आणि दूरसंवाद प्रणालींवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा उद्रेकांविषयी आगाऊ सूचना मिळणे श्रेयसस्कर असते. याशिवाय एखादा अंतराळवीर जर थेटपणे या उद्रेकात सापडला तर त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. सूर्यावर घडणाऱ्या औष्णिक व चुंबकीय घटना अगदी टोकाच्या असतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपण प्रयोगशाळेत शिकू शकत नाही त्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सूर्य ही एक नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.

.अंतरिक्ष वातावरण

आपल्या पृथ्वीवर सूर्य उत्सर्जन, उष्णता, सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांद्वारे सतत परिणाम करत असतो. सूर्याकडून सातत्याने येणाऱ्या सौरकणांना सौर वारे म्हणतात व ते प्रामुख्याने उच्च उर्जायुक्त प्रकाशकणांनी (photons) बनलेले असतात. आपल्या संपूर्ण सौरमंडळावर सौर वाऱ्यांचा परिणाम होतो. सौरवाऱ्यांबरोबरच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पण पूर्ण सौरमंडळावर परिणाम होतो. सौरवाऱ्यांसोबतच सूर्यावर होणाऱ्या उद्रेकांचाही सूर्याभोवतालच्या अंतराळावर परिणाम होतो. अशा घटनांच्या वेळी ग्रहांजवळील चुंबकीय क्षेत्र व भारीतकण यांच्या वातावरणात बदल घडतो. पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व अशा उद्रेकांनी वाहून आणलेले चुंबकीय क्षेत्र यांच्यातील अन्योन्यक्रियेमुळे पृथ्वीजवळ चुंबकीय अस्वस्थता (magnetic disturbance) निर्माण होते, त्यामुळे अंतरिक्ष मालमत्तांच्या (space assets) कामात विघ्न येऊ शकते.

पृथ्वी व इतर ग्रह यांच्या भोवतालच्या अंतरिक्षतील पर्यावरणाच्या स्थितीमधील सतत होणारे बदल म्हणजे अंतरिक्ष वातावरण होय. अंतरिक्ष वातावरण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण अंतराळात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. पृथ्वीनजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासामुळे आपणास इतर ग्रहांनाजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या वर्तनाचा अंदाज येईल. 

.आदित्य एल-१ संबंधी माहिती

आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी योजलेली अंतराळस्थित वेधशाळा वर्गाची पहिली भारतीय मोहीम आहे. हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या  लँग्रेजीयन बिंदू १ (एल-१) च्या आभासी कक्षेत (halo orbit) स्थित करण्यात येणार आहे.  हा बिंदू पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एल-१ भोवतालच्या आभासी कक्षेत यान स्थिर केल्यामुळे ते कोणतेही पिधान (occultation)  किंवा ग्रहण (eclips) यांचा अडथळा न येता सतत सूर्याभिमुख राहून  सातत्याने सूर्यावरील घडामोडींवर लक्ष ठेवू शकेल. या यानावर सात अभिभार आहेत. हे अभिभार विद्युतचुंबकीय आणि कणशोधक (electromagnetic and particle detectors) वापरून सूर्याचे दीप्तीमंडल (photophere), वर्णमंडल (chromosphere) आणि प्रभामंडल किंवा किरीट (corona) यांचा अभ्यास करतील. एल -१ या सोयस्कर बिंदूचा फायदा घेऊन चार अभिभार थेट सूर्याचा वेध घेतील व उरलेले तीन अभिभार एल -१ या लँग्रेज बिंदू जवळील सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करतील. आदित्य एल-१ वरील अभिभारांमुळे आपणास सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या थराचे म्हणजेच प्रभामंडल किंवा किरीट याचे (corona) अति तप्त होणे, प्रभामंडलामधील वस्तूमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection- CME), सौरज्वालांपूर्वीच्या व सौरज्वालांवेळच्या घडामोडी व त्यांची वैशिष्ट्ये , सूर्याभोवतालच्या वातावरणाची गतिशीलता (dynamics), सौर कणांचे व चुंबकीय क्षेत्रांचे ग्रहांदरम्यानच्या माध्यमातून प्रसारण (propagation)आदि गोष्टींची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल.

आदित्य एल-१ ची महत्वाची वैज्ञानिक उद्दिष्टे

अ ) सूर्याचा सर्वांत बाहेरचा थर (प्रभामंडल) अतीतप्त का होतो (coronal heating) याचा अभ्यास करणे.

ब ) सौर वाऱ्यांच्या (solar winds) प्रवेगाचा अभ्यास करणे.

क ) प्रभामंडलामधील वस्तुमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection-CME), सौर ज्वाला (solar flares) आणि पृथ्वीसमीप हवामानाचा (near earth space weather) अभ्यास करणे.

ड ) सौर वातावरणाची जोडणी (coupling) व गतीशीलता (dynamics) यांचा अभ्यास करणे.

इ ) सौर वाऱ्यांचे वितरण (distribution) आणि तापमानातील दिक् विषमता (anisotropy) यांचा अभ्यास करणे.

६. या मोहिमेची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये

अ ) यावेळी प्रथमच संपूर्ण सौर तबकडीचे अतिनील समीप (near ultra violate) वर्णपटात निरीक्षण.

ब ) सौर तबकडीच्या अगदी समीप जाऊन (साधारण १.०५ सौर त्रिज्या) प्रभामंडला मधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection-CME) गतीशीलतेचा अभ्यास करणे व त्यावरून CME च्या प्रवेगीय भागातील माहिती मिळविणे.

क ) यानावरील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा सूर्याचे इष्टतम (optimised) वेध घेऊन व इष्टतम विदासाठा (data volume) वापरून प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जन व सौरज्वाला यांचा शोध घेणे.

ड ) विविध दिशांना केलेल्या निरीक्षणांद्वारे सौर वाऱ्याच्या ऊर्जा दिक् -विषमतेचा अभ्यास करणे.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्वाचीन काळातील पंचकन्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्वाचीन  काळातील पंचकन्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आपण प्रातःकालीन प्रार्थनेमध्ये पंचकन्यांचा उल्लेख करतो. त्यामध्ये अहिल्या, तारा, द्रौपदी, सीता, मंदोदरी, या पुराणकालीन  स्त्रियांना वंदन करतो. या सर्वांचे ऐतिहासिक पौराणिक महत्त्व आपण जाणतो. इतिहासाचा विचार केला की अर्वाचीन काळातील जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच ताराराणी या पंचकन्या- पंचराण्या- मला आठवतात. या आदर्श असणाऱ्या स्त्रियांविषयी लिहावं असं मनात आलं, ते आज जिजाऊंची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने !

आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ललामभूत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिजाऊ या मातोश्री–आई कशी असावी याचे उत्तम उदाहरण इतिहासाने दिले आहे. शौर्य, धैर्य, सहनशीलता, मातृप्रेम या सर्व गुणांचा समुच्चय जिच्यात आढळतो ती जिजाऊ माउली ! तिने शिवबाला घडवलं ! रामायण, महाभारत डोळसपणे समजावून सांगितले. स्वधर्म, स्वराज्याचे बीज मनात रुजवले आणि सर्व संकटांना तोंड देऊन तिने आपल्या लाडक्या शिवबाला वाढवले. शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच जिजाऊ आईसाहेबांचे निधन झाले. त्यांच्या मनातील इप्सित कार्य पूर्ण झाले होते. शांतपणे त्या मृत्यूच्या स्वाधीन झाल्या. शिवरायांची आई ही महाराष्ट्राची कन्या, शहाजीराजांची पत्नी अशी लोकोत्तर स्त्री  इतिहासात अमर झाली !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही दुसरी आदर्श राणी  अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावा- -जवळील लहानशा खेड्यात शिंदे घराण्यात त्यांचा जन्म १७२५ साली झाला. मल्हारराव होळकरांनी त्यांना सून म्हणून पसंत केले आणि त्यांच्या मुलाशी, खंडेरावांशी त्यांचे लग्न करून दिले. परंतु लग्नानंतर काही काळातच  खंडेरावांचा  मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. परंतु मल्हाररावांनी त्यांना  सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर अहिल्याबाई लष्करी, मुलकी शिक्षण शिकल्या. मल्हाररावांचा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. पूर्व माळव्यातील जिल्हे त्यांच्या ताब्यात होते. पती, सासरे आणि मुलगा यांच्या निधनानंतर इंदोर सोडून त्यांनी महेश्वर येथे राजधानी हलवली. माळवा प्रांत सुखी समृद्ध कसा होईल याकडे लक्ष दिले. त्यांची न्यायव्यवस्था चोख होती. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली.  मोठ्या नद्यांवर घाट बांधले. धर्मशाळा उभ्या केल्या. पाण्याचे हौद, विहिरी यांची कामे तीर्थस्थळी करून दिली. होळकरांची दौलत सांभाळली.अशा ह्या पुण्यवान अहिल्याबाई होळकर यांचा १३ ऑगस्ट १७९५ रोजी  मृत्यू झाला..

पुण्यवान राणी म्हणून गणली जाणारी तिसरी राणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई ! एकोणिसाव्या शतकातील झाशी या संस्थानची लक्ष्मीबाई राणी होती. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्धच्या उठावात ती सहभागी होती. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता होती ! सातारा जिल्ह्यातील मोरोपंत तांबे यांची लाडकी मुलगी मनकर्णिका ही राणी लक्ष्मीबाई म्हणून आपल्याला  माहित आहे ! घोडेस्वारी करणे ही तिची आवड होती. युद्धशास्त्रामध्ये निपुण होती. थोर कर्तृत्व व नेतृत्व असणारी होती झाशीची राणी. पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने दुर्लक्षित करू नये म्हणून ती पुरुषी पोशाखात वावरत असे. दामोदर हा लक्ष्मीबाईंचा दत्तक मुलगा होता. त्याच्यासह प्रशासन, सैन्य, कल्याणकारी कामे यांची राणीने चांगली व्यवस्था लावली. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या सहकार्याने इंग्रजांशी युद्ध केले. अशी ही झाशीची राणी इंग्रजांशी युद्ध करताना मृत्युमुखी पडली.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही या पंचराण्यांमधील चौथी राणी ! ही हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. घोडे स्वारी, तलवारबाजी यामध्ये कुशल, असामान्य व्यक्तिमत्व असणारी,अशी ताराराणी ही   राजाराम महाराजांची पत्नी होती ! संभाजीच्या वधानंतर राजाराम महाराजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार ताराराणीच्या हाती सोपवला. काही काळ बंद असणारी वतनदारी पद्धत ताराराणी यांनी सुरू केली.लोकोपयोगी कामे केली. राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार त्या गुप्तपणे जिंजीला पोहोचल्या आणि राजारामांसह  महाराष्ट्रात आल्या. सततची दगदग, प्रवास यामुळे सिंहगडावर असताना राजारामाचा मृत्यू झाला. त्यानंतर ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला- शिवाजीला राज्याभिषेक करवला. सरदारांच्या मदतीने औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. शत्रूच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू राजांनी सातारा येथे स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर ची गादी सांभाळली.. माणसे जपली, नव्याने जोडली. ताराबाईंचे कार्य खूप महान होते ! दहा डिसेंबर १७६१ रोजी ताराबाईंचा मृत्यू झाला. कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त म्हणतात….. 

दिल्ली झाली दीनवाणी ! दिल्लीशाचे गेले पाणी , 

ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली !

अशी ही ताराराणी !

पंचराण्यांच्या मालिकेतील पाचवी राणी म्हणजे कित्तूरची राणी चन्नम्मा….

२३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव जिल्ह्यातील कापशी गावी, राणी चन्नम्मांचा जन्म झाला. लहानपणापासून तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारबाजी या मर्दानी खेळांची त्यांना आवड होती.. कित्तूरचे राजा मल्ल सज्जा देसाई यांच्याशी तिचा विवाह झाला. राजा आणि राजपुत्राच्या अकाली निधनानंतर तिच्या दत्तक पुत्राला तिने गादीवर बसवले. परंतु ब्रिटिशांनी हे  दत्तक पुत्र नामंजूर केले व कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या राणीने स्वतःचे मोठे सैन्य उभे केले आणि कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्रज कलेक्टर थॅकरला तिच्या सैन्याने मारले. पण हा लढा फार काळ चालला नाही. इंग्रजांनी तीन डिसेंबर १८२४ रोजी राणी चन्नम्माला  पकडले. ब्रिटिशांविरुद्ध आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या राणीचा २१ फेब्रुवारी १८२८ रोजी मृत्यू झाला. आपल्या इतिहासातील ही एक महत्त्वाची राणी होती, जिने  इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला !

अर्वाचीन काळाच्या इतिहासातील या पाच राण्या म्हणजे ‘ पंचकन्या ‘ आपल्याला नक्कीच गौरवास्पद आहेत !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छत्रपती शिवाजी महाराज — एक उत्तम “व्यवस्थापन गुरू” ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ छत्रपती शिवाजी महाराज — एक उत्तम “व्यवस्थापन गुरू” ☆ श्री राजीव गजानन पुजारी

“छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक शासक नव्हते तर तर ते उत्तम ‘ मॅनेजमेंट गुरु ‘ देखील होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून विविध योजना आखल्या. त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रातील मुद्दे खालील प्रमाणे आहेत :

१)कुशल कार्यबळ तयार करणे 

चांगले काम करणारे आणि कामासाठी कायम उत्सुक असणारे कर्मचारी तयार करणे हे कुठल्याही टीम लीडरसाठी एक कसब असते. त्याला स्वतःच्या कामातून स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी आदर्श घालून द्यावा लागतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये स्वराज्य स्थापनेची तीव्र इच्छा निर्माण केली. त्यांच्या मनात मातृभूमीविषयी आदर आणि प्रेम जागृत केले.

२) पायाभूत सुविधा उभारणे

कुठलाही उद्योग उभा करताना मूलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक असते. महाराजांनी त्या काळी सुद्धा पायाभूत सुविधा उभारण्याला खूप महत्व दिले.— स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या व कालवे अडवून धरणे बांधली, वाहतुकीसाठी घाटरस्ते बांधले, शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण करवले, शेतीमधून रोजगारनिर्मिती केली.

३) अर्थव्यवस्थापन

कुठल्याही व्यवसायासाठी आर्थिक भांडवल अतिशय आवश्यक असते. महाराजांनी त्यांच्या काळात उत्तम आर्थिक व्यवस्थापन करत मोठमोठ्या मोहीम यशस्वी केल्या. एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की ते लगेच गुंतवणूक करत असत. नवीन किल्ला बांधणे व तिथल्या आसपासच्या परिसराचा विकास करणे, मुलुखाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून तिथे पायाभूत सुविधा उभारणे, शेतीला उत्तेजन देणे तसेच इतर पूरक व्यवसायांना चालना देणे ह्यात ते गुंतवणूक करत असत. आपल्या स्वराज्यातील मुलुख विकसित झाला की स्वराज्याच्या महसुलात आपसूकच वाढ होणार आहे हे सूत्र त्यांना माहिती होते, आणि म्हणून ते योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करत असत.

४) सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी

कुठल्याही माणसाला जर प्रगती करायची असेल तर त्याने सतत जगाबरोबर चालणे आवश्यक असते. त्यामुळे सतत नवे काहीतरी शिकण्याची इच्छा असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे ह्यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतो. शिवाजी महाराज सुद्धा सतत नव्या युद्धनीतींबद्दल जाणून घेत असत आणि त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करत असत. ते वेळोवेळी विविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल जाणून घेत असत आणि त्यांच्या सैनिकांकडे चांगली व योग्य शस्त्रे असावीत ह्यावर त्यांचा कटाक्ष होता.

५)दूरदृष्टी

जवळजवळ संपूर्ण भारत मुघल आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेला असताना महाराजांनी भविष्याचा विचार करून स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि अखंड कष्ट करून ते स्वप्न पूर्ण केले. स्वतंत्र भारताचे स्वप्न बघून ते स्वप्न त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील रुजवले. तसेच त्यांच्या शासनकाळात मोक्याच्या ठिकाणी गड किल्ले बांधणे, परकीय शत्रूवर बारीक नजर ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ह्यासारखे गड बांधणे, आरमार उभारणे, परकीय लोकांशी डोळ्यात तेल घालून चर्चा आणि व्यवहार करणे ह्यासारखी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.

६) जल व्यवस्थापन

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती… म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती.

७) पर्यावरण व्यवस्थापन

पर्यावरण आणि माणूस ह्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व महाराजांनी ओळखले होते आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. त्यांच्या मुलुखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली गेली. तसेच गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा ह्या वृक्षांची लागवड केली होती. आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर केला जात असे.

८) रायगड एक सुनियोजित गांव 

रायगड ही नुसतीच स्वराज्याची राजधानी नव्हती. तर ते त्या काळात योजनाबद्ध रीतीने बांधण्यात आलेले सुनियोजित गांव होते. तसेच त्या ठिकाणचा बाजार म्हणजेच मार्केट देखील खूप मोठे होते व योग्य नियोजन करून बांधण्यात आले होते.

९)प्रशासकीय कौशल्ये

महाराजांच्या शासनकाळात करवसुली होत असे आणि कर गोळा करण्यासाठी त्यांनी माणसे नियुक्त केली होती. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज मिळत असे. त्यांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ असे, जे राज्यकारभार चालवत असे. शिवाय त्यांच्या दरबारात परराष्ट्र धोरण सांभाळण्यासाठी ‘ डबीर ‘ हे स्वतंत्र मंत्रिपद होते. तसेच त्यांचे स्वतःचे सक्षम गुप्तहेर खाते होते. ह्यातून महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची झलक बघायला मिळते.

१०) लोकशाही

महाराजांच्या काळात हुकूमशाहीची चलती होती. लोकशाहीचा विचार देखील कुणाच्या डोक्यात आला नव्हता. पण महाराजांनी त्यांचे सरकार जनतेच्या कल्याणासाठी चालवले. त्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली.

११)आरमार

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यांच्याकडे ३०० शिपयार्ड (जहाजे बांधणे व दुरुस्त करणे यासाठी असलेला कारखाना), अनेक जलदुर्ग, शेकडो लढाऊ नौका (गलबत) होत्या. जवळजवळ ३०० मैल सागरकिनाऱ्यावर त्यांचे बारीक लक्ष होते. म्हणूनच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते.

१२)गनिमी कावा

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी कावा शोधून काढला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा ‘ युद्धनीती ‘ म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

१३) बदलीचे धोरण

महाराजांच्या शासनकाळात किल्लेदार किंवा हवालदार ह्यांची दर तीन वर्षांनी, सरनौबत ह्यांची चार

वर्षांनी, कारखानीस ह्यांची पाच वर्षांनी, तसेच सबनीस ह्यांची चार वर्षांनी बदली होत असे. ह्यामुळे भ्रष्टाचार आणि इतर गैर कृत्यांना आळा बसत असे. तसेच देशमुख, पाटील , देशपांडे, कुलकर्णी, चौघुले ह्यांना जवळच्या किल्ल्यावर न ठेवता लांबच्या गावची वतनदारी दिली जात असे. हा सुद्धा त्यांच्या मॅनेजमेंटचाच एक भाग आहे.

१४) कामाचा मोबदला देण्याची पद्धत

मॅनेजमेंटमध्ये कामाचा मोबदला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महाराजांची कामाचा मोबदला देण्याची पद्धत सुद्धा विशिष्ट होती. सेवकांची वेतने ठरवल्याप्रमाणे होत असत. पण एखाद्याने बक्षीस मिळवण्यालायक काही महत्त्वाचे किंवा चांगले काम केले तर त्याला वेतनवाढ  दिली न जाता, काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जात असे.

१५) स्वच्छता व्यवस्थापन

महाराजांनी किल्ले बांधताना त्या काळात शौचकुपांची व्यवस्था केली होती. त्या काळी बांधलेली ड्रेनेज सिस्टीम बघून आश्चर्य वाटते. पहाऱ्यावर असणाऱ्या सैनिकांना नैसर्गिक विधींसाठी लांब जायला लागू

नये ,त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी चोख व्यवथा करून घेतली होती.

— वरील सर्व बाबींकडे बघून असे वाटते की महाराजांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्राचे जर आपण काटेकोरपणे पालन केले तर नक्कीच आपला देश सुजलाम् सुफलाम् होईल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची तिसरी चंद्रमोहीम – चंद्रयान ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

इस्रोची तिसरी चंद्रमोहीम – चंद्रयान ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. १५ ऑगस्ट १९६९ रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची कार्ये देशभरातील विविध केंद्रांमधून संचलीत होत असतात.

प्रत्येक मिशनला लागणाऱ्या संवेदकांचा विकास हा स्पेस एप्लीकेशन सेंटर अहमदाबाद येथे होत असतो तर  सॅटेलाईटची रचना, विकास, जुळणी आणि चाचण्या बंगलोर  येथील यु.आर. राव  उपग्रह केंद्रात केल्या जातात. प्रक्षेपकांचा विकास हा  विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरम् येथे केला जातो तसेच उपग्रहांचे प्रक्षेपण  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून केले जाते. बरीचशी महत्त्वाची प्रशासकीय कामे  व विदा व्यवस्थापनेची कामे  हसन, भोपाळ आणि हैदराबाद येथून केली जातात.

इस्रोने आजपर्यंत बऱ्याच अंतराळ यंत्रणा विकसीत केल्या असून, सर्वात महत्त्वाच्या INSAT प्रणालीचा (भारतीय राष्ट्रीय उपग्रह यंत्रणा) उपयोग मुख्यतः दूरसंचार, दूरदर्शन  प्रसारण, हवामानशास्त्र व नैसर्गिक आपत्ती बाबत पूर्व सूचना देण्यासाठी होतो.

  • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या सहकार्य ने आपला‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
  • 1980 साली पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानावर आधारितSLV-3 प्रक्षेपकाद्वारे‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. 
  • 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वीरित्या पार पडली
  • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि खूप कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  • २२जुलै २०१९ रोजी इस्रोने चंद्रयान-२ द्वारे चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ अवतरणाचा प्रयत्न केला, पण कांही तांत्रिक अडचणींमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही.—

— आता याच मोहिमेची अनुसरण मोहीम म्हणून इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर जुलै २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात LVM-3 या प्रक्षेपकाद्वारा सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले जाईल. ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात यान चंद्राच्या उत्तर ध्रुवानजीक उतरेल.

चंद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्युल (LM), प्रॉपल्शन मॉड्युल (PM) आणि रोव्हर यांचा समावेश आहे. प्रॉपल्शन मॉड्युलचे मुख्य काम म्हणजे लँडर मॉड्युलला अगदी प्रक्षेपकापासून विलग झाल्यापासून ते चंद्राभोवतीच्या १०० कि. मी. वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेपर्यंत नेणे हे आहे. त्यानंतर प्रॉपल्शन मॉड्युल लँडर मॉड्युलला स्वतःपासून विलग करेल. नंतर लँडर मॉड्युल थ्रस्टर्सच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर लँडर मॉड्युलपासून विलग होऊन १४ पृथ्वी दिवसांपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर विहार करून महत्वाची वैज्ञानिक माहिती गोळा करून ती पृथ्वीकडे पाठवेल. प्रॉपल्शन मॉड्युलमध्ये मूल्यवर्धनासाठी चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय(spectral) आणि ध्रुवमितीय (polarimeyric) मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) हा वैज्ञानिक अभिभार आहे, जो लँडर मॉड्युल विलग झाल्यावर कार्यान्वित केला जाईल. या मोहिमेचा उद्देश अंतर्ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचे प्रात्यक्षिक करणे हे आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ठ जागेवर हळुवार उतरण्याची (soft landing) व रोव्हरला चंद्रभूमीवर तैनात करण्याची क्षमता आहे. त्यानंतर रोव्हर त्याच्या वाटचालीदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे जागेवरच रासायनिक विश्लेषण करेल. 

लँडर व रोव्हरवर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक अभिभार आहेत. ते पुढील प्रमाणे :

अ) लँडर वरील अभिभार –

१) चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE)- हा अभिभार औष्मिक प्रवाहकता (thermal coductivity) व तापमान यांची मोजणी करेल.

२) इन्स्ट्रुमेंट फॉर ल्यूनार सेईस्मिक ऍक्टिविटी (ILSA)- हा अभिभार अवतरणाच्या जागेभोवतालची भूकंपशिलता (seismicity) मोजेल.

३)लँगमुईर प्रोब (LP)- हा प्लाविकाची (plasma) घनता व त्याच्यातील फेरफार यांचा अंदाज लावेल.

४)नासाकडून प्राप्त पॅसीव लेसर रेट्रोरिफ्लेक्टर ऍरे – हा अभिभार चंद्राचे लेसर श्रेणीय अध्ययन करेल.

ब ) रोव्हर वरील अभिभार – रोव्हर उतरलेल्या जागेची मुलद्रैविक संरचना प्राप्त करण्यासाठी रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेसर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रॉस्कोप हे दोन अभिभार आहेत.

चंद्रयान ३ मोहिमेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :

१)चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि हळुवार उतरण्याचे प्रात्यक्षिक करणे.

२)चंद्रावर रोव्हरच्या वाटचालीचे प्रात्यक्षिक करणे.

३)चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे.

ही उद्दिष्टे गाठण्यासाठी लँडरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जसे की… 

१)उर्ध्वतामापक (Altimeters)- लँडरवर लेसर व रेडिओवारंवारीता आधारीत उर्ध्वतामापक आहेत.

२)वेगमापक (velicitymeters)- लँडरवर लेसर डॉप्लर वेगमापक व लँडर क्षैतिज (horizontal) वेग छायाचित्रक (camera) आहेत.

३)जडत्व मापन (inertial measurement)- लँडरवर एकात्मिक लेसर घुर्णदर्शी आधारित (gyrobased) जडत्व संदर्भयन् आणि प्रवेगमापक (accelerometer) आहेत.

४)प्रणोदन प्रणाली (propulsion system)- लँडरवर ८०० N थ्रोटलेबल द्रव इंजिन, ५८ N ऍटीट्युड थ्रूस्टर्स आणि थ्रोटलेबल इंजिन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आहेत.

५)दिक् चलन, मार्गदर्शन व नियंत्रण (navigation, guidance and control)- लँडरवर समर्थित अवतरण विक्षेपमार्ग (powered descent trajectory) आराखडा आणि संबंधित सॉफ्टवेअर घटक आहेत.

६)धोका शोधणे आणि टाळणे (Hazard detection and avoidance)- लँडरवर धोका शोधक आणि वर्जक छायाचित्रक आणि प्रक्रिया अज्ञावली (processing algorithm) आहेत.

७)अवतरण पाद यंत्रणा (Landing leg mechanism) यामुळे हळुवार अवतरणाला मदत होते.

पृथ्वीच्या परिस्थितीत वर सांगितलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी लँडरच्या अनेक विशेष चाचण्या नियोजित करून यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्या म्हणजे …. 

१)एकात्मिक थंड परीक्षण (Integrated cold test)- एकात्मिक संवेदक आणि दिक् चलन कार्यक्षमता परीक्षणासाठी परीक्षण मंच म्हणून हेलिकॉप्टर वापरून ही चाचणी केली गेली.

२)एकात्मिक उष्ण परीक्षण (Integrated hot test)- संवेदक(sensors), प्रवर्तक (actuators) व NGC (navigation, guidance and control) यांसह बंद वळसा कार्यक्षमतेच्या परीक्षणासाठी (closed loop performance test) परीक्षण मंच म्हणून टॉवर क्रेनचा वापर करून ही चाचणी केली गेली.

३)अवतरण पाद यंत्रणा परीक्षण (landing leg mechanism test)- चंद्र सदृष्य पृष्ठभाग तयार करून विविध अवतरण परिस्थितीत ही परीक्षणे केली गेली.

चंद्रयानाचे वजन पुढीलप्रमाणे असणार आहे:…. 

१)प्रणोदन कक्ष (propulsion module)-२१४८ कि.ग्रॅ.

२)अवतरण कक्ष (lander module)-१७२६ कि.ग्रॅ.

३) बग्गी (rover)- २६ कि.ग्रॅ.

    लँडर व रोव्हरचे अपेक्षित आयुष्य १४ पृथ्वी दिवस असणार आहे.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

गेली काही वर्षे आपल्याकडेही वादळांना नावे देण्याचा आणि त्यांच्या ‘प्रवासा’चे निरीक्षण करण्याचा प्रघात पडला आहे. 

सध्या ‘बिपरजॉय’ या नावाचे वादळ अरबी समुद्रात तयार होऊन पश्चिम किनाऱ्यापाशी कच्छच्या दिशेने कूच करीत आहे.

याच्या ‘प्रवासा’चे वार्तांकन टेलिव्हिजनवरील वृत्तांमध्ये लक्षणीय मात्रेत होत आहे.

त्यामुळे  ‘बिपरजॉय’ हा शब्द वारंवार कानी पडला.

वृत्तनिवेदकांसाठी हा शब्द नेहमीचा नसल्याने प्रत्येकाने / प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने त्याचे उच्चारण केले – 

काहींनी त्याचा उच्चार ‘बीपर जॉय’ असा केला. त्यामुळेच की काय त्या नावाकडे लक्ष वेधले गेले.

चक्रीवादळाच्या नावात ‘जाॅय’ कसा काय? असा प्रश्नही पडला.

जरा लक्ष देऊन चक्रीवादळाचे वृत्त ऐकले, तेव्हा समजले की या नावाचे मूळ ‘बंगाली’ आहे. 

मग मात्र ‘ट्यूबलाईट’ पेटली आणि उलगडा झाला !  नाव समर्पक कसे तेही पटले !

तेच तुम्हांलाही सांगण्यासाठी हा प्रपंच.

या शब्दाचा प्रवास ‘संस्कृत –> बंगाली –> रोमन लिपी –> ‘बीपर जॉय असा झाला आहे.

या प्रवासात, मूळ शब्दातून जो अर्थ सहज समजू शकतो तो झाकला गेला, आणि ‘जॉय’ अवतरला ! 

मूळ संस्कृत शब्द आहे – विपर्यय !

बंगालीत ‘वि’चा ‘बि’ झाला.  

‘पाणिनि’ने म्हटलेच आहे – 

‘बवयोः अभेदः । 

(ब आणि व यांत भेद नाही. )

आणि शब्दाच्या शेवटी असलेल्या दोन ‘य’ पैकी पहिल्या ‘य’चा ‘ज’ आणि बंगाली धाटणीप्रमाणे ‘जॉ’ झाला.

अशा तऱ्हेने ‘विपर्यय’चा उच्चार ‘बीपर जॉय’ होऊन त्याचा अर्थविपर्यासही झाला !

‘विपर्यय’ शब्दाचे गीर्वाणलघुकोशात (रचयिते कै. ज.वि.ओक) जे अर्थ दिले आहेत, त्यांतील बरेच ‘चक्रीवादळास’ लागू पडणारे आहेत – जसे 

विरुद्ध, अडथळा, आपत्ती,प्रलयंकाळ…

हा विपर्यय शब्द किती प्राचीन आहे ? 

हा शब्द पतंजलिच्या ‘योगसूत्रां’तही येतो. 

विपर्ययोमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठितम् । (१-८)

म्हणजे हा अडीच हजार वर्षे तरी जुना आहे ! 

 

लेखक –  श्री प्रदीप देशपांडे

नाशिक

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) – ऋचा १ ते ९

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – १-४ इंद्र; ५-६ उलूखल; ७-८ उलूखल व मुसळ; ९ प्रजापति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अठ्ठाविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी विविध  देवतांना  आवाहन केलेले  असले तरी  हे मुख्यतः  सोमवल्लीला उद्देशून आहे. या सोमवल्लीपासूनच सोमरसाची निर्मिती केली जाते. हे सूक्त सोमसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

यत्र॒ ग्रावा॑ पृ॒थुबु॑ध्न ऊ॒र्ध्वः भव॑ति॒ सोत॑वे ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ १ ॥

 उखळामध्ये सोमवल्लीवर खलूनिया शक्तीने

जड विशालश्या वरवंट्याने रगडूनी जोराने

अर्पिण्यास तव केले सिद्ध सोमरसा भक्तीने

त्या स्वीकारी देवेंद्रा मोदाने प्रसन्नतेने ||१||

यत्र॒ द्वावि॑व ज॒घना॑धिषव॒ण्या कृ॒ता ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ २ ॥

जघनद्वयासम संनिध असती पाषाणाच्या तळी

सोमरसाला निर्मियले आम्ही त्यातुनी उखळी

उत्सुक होऊनिया शचिनाथा सोमरसा स्वीकारी

शिरावरी अमुच्या देवेंद्रा कृपाछत्र तू धरी ||२||

यत्र॒ नार्य॑पच्य॒वमु॑पच्य॒वं च॒ शिक्ष॑ते ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ३ ॥

 पुढे नि मागे हलवूनिया करा घुसळणे शिक्षा

नारीला मिळते या योगे कौशल्याची दीक्षा

उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस

स्वीकारुनि त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||३||

यत्र॒ मन्थां॑ विब॒ध्नते॑ र॒श्मीन्यमि॑त॒वा इ॑व ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ४ ॥

 कासऱ्यांनी बांधीयले रविला बंधन घालाया

सोमवल्लीला घुसळून उखळी सोमरसा काढाया

उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस

स्वीकारुनी त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||४||

यच्चि॒द्धि त्वं गृ॒हेगृ॑ह॒ उलू॑खलक यु॒ज्यसे॑ ।
इ॒ह द्यु॒मत्त॑मं वद॒ जय॑तामिव दुन्दु॒भिः ॥ ५ ॥

 सोमरसाच्या निर्मितीस्तव वापर तव उखळा

घरोघरी घुसळती सोमवल्ली तुझ्यात उखळा

करी गर्जना विजयदुंदुभीसम रे तू उखळा

सोमरसा तू देशी आम्हा गर्व तुझा उखळा ||५||

उ॒त स्म॑ ते वनस्पते॒ वातो॒ वि वा॒त्यग्र॒मित् ।
अथो॒ इंद्रा॑य॒ पात॑वे सु॒नु सोम॑मुलूखल ॥ ६ ॥

 मरूत शीतल मंद वाहतो येथे वनस्पते

देई आम्हाला विपूल उत्तमशा सोमरसाते

सोमपान होईल तयाने देवराज इंद्राचे

प्रसन्न होउनिया कल्याण करील तो अमुचे ||६||

आ॒य॒जी वा॑ज॒सात॑मा॒ ता ह्यु१च्चा वि॑जर्भृ॒तः ।
हरी॑ इ॒वान्धां॑सि॒ बप्स॑ता ॥ ७ ॥

 चर्वण करताना गवताचे अश्व करीती ध्वनी

रव करती ही उभय साधने सकलांच्या कानी

तया कारणे आम्हा होतो सामर्थ्याचा लाभ

यज्ञामध्ये त्यांचा आहे अतीव श्रेष्ठ आब ||७||

ता नो॑ अ॒द्य व॑नस्पती ऋ॒ष्वावृ॒ष्वेभिः॑ सो॒तृभिः॑ ।
इंद्रा॑य॒ मधु॑मत्सुतम् ॥ ८ ॥

काष्ठांच्या हे साधनद्वयी श्रेष्ठ तुम्ही हो किती

ऋत्विज कौशल्याने  करिती सोमाची निर्मिती

मधूर सोमरसाला अर्पू बलशाली  इंद्राला

प्रसन्न व्हावे त्याने आम्हा प्रसाद द्यायला ||८||

उच्छि॒ष्टं च॒म्वोर्भर॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
नि धे॑हि॒ गोरधि॑ त्व॒चि ॥ ९ ॥

 भूमीवरती सांडियलेला भरा हो सोमरस

त्यासी भरुनीया ठेवावे सज्ज दोन चमस

पवित्र दर्भातुनिया घेई त्यासी गाळून

चर्मावरती वृषभाच्या देई त्या ठेवून ||९||

(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/p79BQ7tsfg4

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 28

Rugved Mandal 1 Sukta 28

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-2— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-2 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.) इथून पुढे —

पुढच्या महिन्यात, नेहमीप्रमाणे गुरबचन सिंग युनिटमध्ये आला. रेशन व दारूचा कोटा घेतल्यानंतर तो माझ्याकडे आला तेंव्हा, EME सेंटरकडून समजलेल्या माहितीसंबंधी मी त्याला सांगितले. प्रथम त्याने साफ कानावर हात ठेवले. खरा ‘भगोडा’ तो स्वतः नसून, त्याचा जुळा भाऊ असल्याचा बनावही त्याने केला.

गुरबचन सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर, आमच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर आणि हवालदार मेजर त्याला घेऊन काही काळ ऑफिसबाहेर गेले. त्या दोघांनी त्याला खास ‘मिलिटरी खाक्या’चा एक डोस दिला असणार. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसात येऊन गुरबचन सिंगने, तो स्वतःच ‘भगोडा’ असल्याची कबुली दिली. 

लगेच, मेजर महंती यांनी माझ्यासह बसून, गुरबचन सिंगची चौकशी सुरु केली. त्याची इत्थंभूत कहाणी ऐकायला, आम्हा दोघांव्यतिरिक्त, CO साहेब व इतर अधिकारीही हजर होते. 

त्याने दिलेल्या जबानीप्रमाणे, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी अचानक चिनी हल्ला येताच, आपल्या सैन्याच्या सर्व तुकड्या इतस्ततः पांगल्या. ज्याने-त्याने आपापल्यापुरते पाहावे अशी स्थिती होती. तश्या विचित्र परिस्थितीत, गुरबचन सिंग कसाबसा जीव वाचवून, प्रथम भूतानमध्ये पळाला आणि नंतर कलकत्त्यात पोहोचला. खोटे नाव धारण करून त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी केली. 

आधी ट्रकचा क्लीनर, आणि नंतर ड्रायव्हर म्हणून, १९६३ ते १९६७ या काळात त्याने कलकत्ता-मुंबई मार्गावर अनेक फेऱ्या केल्या. अश्याच एका फेरीत, तो जमशेदपूर येथे थांबलेला असताना, त्याच्या एका मित्राने, टेल्कोमध्ये त्याची वर्णी लावून दिली.

अत्यंत निष्ठेने आणि उत्तम काम करीत असल्याने १९६८ पासून तो तेथेच नोकरीवर टिकला होता. मात्र, पाच वर्षांनंतर त्याच्या सर्व्हिस बुकाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने तो माझ्यापर्यंत पोहोचला होता.  

ही संपूर्ण कहाणी ऐकून, निवृत्त कर्नल ब्रार आणि टेल्कोचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अक्षरशः स्तिमित झाले.   

गुरबचन सिंगला आर्मीच्या पद्धतीप्रमाणे रीतसर अटक झाली आणि EME सेंटरमधून आलेल्या आरक्षी दलासोबत त्याची त्रिमुलगेरीला रवानगी झाली. तेथे आर्मी कोर्टासमोर चाललेल्या खटल्यात त्याला १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेल्याचे समजले. 

इकडे माझ्या कानात मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली. गुरबचन सिंग ‘भगोडा’ असल्याची वस्तुस्थिती प्रथमतः मीच उघडकीला आणली होती. त्यामुळे, एखाद्या हस्तकाकरवी, अथवा तुरुंगातून सुटल्यावर स्वतःच, गुरबचन सिंग माझ्यावर निश्चित सूड उगवणार हे भाकीत अनेकांनी वर्तवले. 

मी जेमतेम २३ वर्षांचा आणि अननुभवी अधिकारी होतो. मला भीती वाटणे स्वाभाविक होते. अविचाराने, आणि निष्कारणच आपण या फंदात पडलो असेही मला वाटू लागले. शेवटी, ‘जे जे होईल ते ते पाहावे’ असे स्वतःशी म्हणून, मी ते सर्व विचार बाजूला सारले. 

या घटनेपाठोपाठ आमच्या CO साहेबांनी, म्हणजेच लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंनी, गुरबचन सिंग ज्यांचा ड्रायव्हर होता त्या कर्नल ब्रार यांना विनंती करून, त्यांच्यापाशी काही मागण्या केल्या. पहिली मागणी अशी की, शिक्षा संपताच गुरबचन सिंगला पुन्हा टेल्कोमध्ये कामावर रुजू करून घेतले जावे. दुसरे असे की, गुरबचन सिंगची पत्नी आणि मुलांना सध्या टेल्कोच्या आवारातील घरातच राहू द्यावे, त्याच्या मुलांना टेल्कोच्या शाळेतच शिकू द्यावे, आणि टेल्कोतर्फे त्यांना घरखर्चासाठी दरमहा थोडासा भत्ताही दिला जावा. 

CO साहेबांच्या विनंतीला मान देऊन, कर्नल ब्रार यांनी, या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. टेल्कोच्या वाहन परीक्षण विभागाचे प्रमुख, निवृत्त मेजर डी. एन. अगरवाल यांचीही या कामी अतिशय मोलाची मदत झाली. मुख्य म्हणजे, चीन युद्धामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीचा बळी झालेल्या एक माजी सैनिकाचा, सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला! एखाद्या कर्मचाऱ्याचे हित जपण्याचे टाटा समूहाचे धोरण आणि एकंदर उदार मनोवृत्ती, याचे हे द्योतकच मानले पाहिजे! 

त्याउपर, CO साहेबांनी आम्हाला आदेश दिला की, गुरबचन सिंगच्या परिवाराला दरमहा रेशन आणि जीवनावश्यक वस्तू आमच्या रेजिमेंटच्या कॅन्टीनमधून घरपोच दिल्या जाव्यात. अर्थातच, CO साहेबांच्या या आदेशाची कसून अंमलबजावणी करण्यात मी कमी पडलो नाही. 

या घटनेनंतर लगेच, म्हणजे ऑक्टोबर १९७३ मध्ये लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंची आमच्या युनिटमधून दुसरीकडे बदली झाली. पण, त्यांच्या जागी आलेल्या, लेफ्ट. कर्नल एस. के. अब्रोल या नवीन CO साहेबांनीही या आदेशात काडीचाही बदल केला नाही. ज्या पद्धतीने आम्ही हे संपूर्ण प्रकरण हाताळले त्याबद्दल टेल्को आणि टिस्कोच्या अधिकाऱ्यांनीही आमचे वारेमाप कौतुक केले. 

१९७४-७५ मध्ये केंव्हातरी, सक्तमजुरीची शिक्षा भोगून गुरबचन सिंग जमशेदपूरला परतला. मी अजूनही आमच्या युनिटचा Adjutant  होतो, आणि अविवाहित असल्याने ऑफिसर्स मेसमधील एका खोलीत राहत होतो. 

गुरबचन सिंग परतल्याची आणि तो लगोलग मला भेटायला येत असल्याची खबर, निवृत्त कर्नल ब्रार यांच्याकडून समजताच मी तयारीला लागलो. गुरबचन सिंग व त्याच्या पत्नीसाठी चहा-नाश्ता आणि मुलांसाठी चॉकलेट मागवून मी एक छोटेखानी मेजवानीच आयोजित केली. आल्या-आल्या गुरबचन सिंग अक्षरशः माझ्या पायावर कोसळला आणि मनसोक्त रडला. मलाही माझ्या भावना काबूत ठेवणे अवघड झाले. 

या सर्व प्रकरणात, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे आणि टाटा समूहाचे कर्नल ब्रार व मेजर अगरवाल यांच्याकडून मी नकळतच एक मोलाचा धडा शिकलो. कायदा व नियमांच्या चौकटीत राहूनच, पण सहानुभूति आणि माणुसकी न विसरता आपण काम केले, तर अक्षरशः जादूची कांडी फिरल्यागत अकल्पित परिणाम साधता येतो.    

गुरबचन सिंगने कर्नल सहस्रबुद्धेंचे आणि माझे शतशः आभार मानले. त्याने मला प्रांजळपणाने सांगितले की, त्याला पकडून देण्यास जरी मी जबाबदार होतो तरीही, ११ वर्षे त्याच्या मनात डाचत असलेल्या अपराधी भावनेचा निचरा होण्यासाठीही मीच कारणीभूत झालो होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता. मुख्य म्हणजे, शिक्षा भोगून दोषमुक्त झाल्यावर, तो आता स्वच्छंदपणे आपले आयुष्य जगू शकणार होता ! 

– समाप्त – 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-1— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-1 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो. आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत ‘कडक’ अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. 

जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. 

पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.  

आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, ‘इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स’ (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. 

एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM) सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते. 

गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ ‘सह्याजीराव’ बनून काम करणे मला मान्य नव्हते. 

मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता. 

ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.  

CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले.

त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते. 

“Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल” असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी. 

आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, “चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला ‘बेपत्ता किंवा मृत’ घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ.”

सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा ‘भगोडा’ शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई केली जाणार होती!

ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला. 

“सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, ‘कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये’.” 

माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.  

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print