मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

।। परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ।। 

ज्येष्ठ अर्धा सरलाय ,आकाशात ढगांची जमवाजमव सुरु झालीय ..या दिवसात आकाशात मळभ दाटून येतं पण मराठी मन मात्र मरगळ झटकून एका निराळ्याच चैतन्ययात्रेची वाट पहात असतं.त्याला आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं असतं.शतकानुशतकं ही चैतन्यदायी परंपरा मराठी माणसानं जिवंत ठेवली .

कदाचित पंढरपूरची वाट चालून आमची पावलं प्रत्यक्ष मळणार नाहीत ,पण मनं अबीर गुलालानं रंगल्याशिवाय कशी रहातील ? मग वाटतं की पांडुरंगाच्या भेटीकरता निदान मानसवारी करु ! मनाच्या वाटेवर ओव्यांचं शिंपण घालू ,कवितांच्या रांगोळ्यांनी नटवू ,आरत्यांचे दीप लावू , चित्रगीतांच्या पताका उभारु आणि लोकगीतांनी ती वाट दुमदुमवून टाकू ! 

या वाटेवरुनच पोचायचं मनगाभार्‍यात आणि तिथं विराजत असलेल्या त्या श्रीमूर्तीचं दर्शन घ्यायचं अंतःचक्षूंनी ..तो आपली वाट पहातोच आहे ..

अनेक संतांनी विठ्ठलाच्या योगमूर्तीचं वर्णन करणाऱ्या सुंदर रचना केल्यात.

ही परंपरा किती जुनी? सातव्या आठव्या शतकात भारतभ्रमण करताना आदि शंकराचार्य भीमेच्या तटावर आले असतील.. या भूमीवर आल्यावर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर महायोगपीठ असल्याची जाणीव त्यांना झाली असेल..आणि मग त्या योगिराजाचं सगुण दर्शन झाल्यावर त्याचं वर्णन करणारं हे नितांतसुंदर पांडुरंगाष्टक त्यांच्या अमृतवाणीतून झरलं असेल..

॥ परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ॥

महायोगपीठे तटे भीमरथ्या        

वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।        

समागत्य निष्ठन्तमानंदकंदं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥        

 

तटिद्वाससं नीलमेघावभासं        

रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।        

वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥

 

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां        

नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।        

विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥

 

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे        

श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।        

शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥

 

शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं        

लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।        

जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥

 

किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं        

सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।        

त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥

 

विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं        

स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।        

गवां बृन्दकानन्ददं चारुहासं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ७ ॥

 

अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं        

परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।        

प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ८ ॥

 

स्तवं पाण्डुरंगस्य वै पुण्यदं ये        

पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।        

भवांभोनिधिं ते वितीर्त्वान्तकाले        

हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

 

भीमेच्या तीरावर आहे ते पंढरीचं महायोगपीठ ! 

तिथं पुंडलिकाच्या भेटीकरता तो आनंदकंद युगानुयुगं उभाच आहे ! त्या भक्तवत्सलास नमस्कार ! 

सजल श्यामवर्णी मेघातून वीज चमकावी तसं त्याचं तेज , रमेच्या हृदयात विराजमान होणारं त्याचं चित्तप्रसादक रुप ,त्याचे नेटके समचरण ,यानं जे नेत्रसुख होतं ,त्यापुढं स्वर्गही फिका पडेल ! त्या राजस सुकुमार मदनपुळ्यास वंदन ! 

तो कमरेवर हात ठेवून सांगतो आहे ,बघ जीवनाचा सागर माझ्या कमरेइतकाच खोल आहे ! माझ्या भक्ताला मी सहज त्यापार पोचवतो ..अन् तिथून केवळ चार बोटांवर ब्रह्मलोक ,असं नाभीकडे बोटं करुन सहज दाखवतो आहे, त्या दयानिधीस नमन ! 

कंठात झळाळता कौस्तुभमणी ,भुजांवर केयूरबंध ,शिरी धरलेलं शिवलिंग नि हृदयात लक्ष्मीचा वास असं हे रमणीय रूप ! शारदीय पौर्णिमेसारख्या तेजाळ सुहास्य मुखचंद्रावर कुंडलांची रत्नप्रभा फांकलेली, सूर्यबिंबासम रक्तवर्णी असलेल्या जास्वंदीसारखे त्याचे अधर ,आणि ते आकर्ण कमलनयन ! 

त्याच्या हिर्‍याचा झळाळत्या मुकुटानं आसमंत तेजाळला आहे ,त्याला पुजण्याला देवही हाती रत्नमाला घेऊन उभे आहेत .तीन जागी वाकून उभा राहिल्यानं अन गळ्यात वनमाळा नि मुकुटात मोरपीस ल्यायल्यामुळं तो बाळकृष्णच शोभतो आहे ..

ह‍ाच लीलानाटकी सर्वसंचारी गोपालक .. हाच वेणूचा नाद ,हाच वादक .गोपगोपींना मोहक हास्यानं वेड लावणारा हाच ! याला ना आदि ना अंत,

हा अजन्मा -अजर -अमर -अनुपम -अद्वितीय !

हा दीनबंधू ,हा कृपासिंधू . हे रुक्मिणीचे चित्सुखधाम ,हा जगताचा विश्राम .

याच्या केवळ दर्शनानंच मोक्षाचा लाभ होतो .

या परब्रह्मलिंगाच्या उपासनेचं हे स्तोत्र  आपल्या वाणीवर कानावर आणि मनावर संस्कार करतं.शक्य तर हे मुखोद्गत करावं, निदान काही निमित्ताने ठरवून ऐकावं आणि अपार प्रसन्नतेची अनुभूती घ्यावी!

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

बारा-चौदा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इंदौरमधल्या एका नामवंत शाळेत, आठवड्याभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेने मुंबईला परत निघाले होते. 

एसी २-टियरच्या डब्यात, पॅसेजमधला खालचा बर्थ मला मिळाला होता. सूटकेस बर्थखाली ठेवून आणि हँडबॅग खुंटीला लटकावून, हुश्श म्हणत मी बसले. रात्रभराच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती.

आतील बाजूच्या कूपेमधले चारही प्रवासी आधीच आलेले होते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया. एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती. त्या दोन पुरुषांपैकी, वयाने लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूने वाकडा आणि ओबडधोबड होता. केसही अगदी बारीक कापलेले होते. एकंदरीत, तो दिसायला जरा विचित्रच होता. पण त्याच्याकडे फार काळ रोखून पाहणे वाईट दिसेल, म्हणून मी नजर वळवली. 

एकदाची गाडीत बसून स्थिरावल्यावर, मी मोबाईल बाहेर काढला. नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला, माझी हालहवाल, (म्हणजे नौदलाच्या भाषेत, SITREP किंवा Situation Report) कळवणे आवश्यक होते. माझे वडील, सासरे, आणि नवरा अशा तीन ‘फौजी’ लोकांसोबत अनेक वर्षे राहिल्यामुळे, सैन्यदलात वापरले जाणारे कित्येक शब्द माझ्या बोलण्यात आपसूकच येतात!

मी फोनवर बोलत असताना, दणकट शरीरयष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता-विचारता खुशाल माझ्या बर्थवर बसले. नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगून मी त्या तरुणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यांच्यापैकी एकाने वरच्या बर्थकडे बोट करून, तो बर्थ त्याचा असल्याचे मला खुणेनेच सांगितले. तात्पुरते समाधान झाल्याने मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले. 

त्या तिघांनी, आपसात गप्पा आणि हास्यविनोद करत-करत, हळू-हळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली. अंग चोरून बसता-बसता, शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझे मुटकुळे झाले. मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितले की मला आडवे पडायचे असल्याने त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावे. त्यांच्यापैकी एकाने, बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि म्हणाला, “रात्री नऊनंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो. तोपर्यंत त्यावर बसूनच राहावे असा नियम आहे.”

त्याला चांगले खरमरीत उत्तर मी देणारच होते. पण कुणाला काही कळायच्या आत, कूपेमधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कमालीच्या थंड नजरेने त्या तिघांकडे पाहत, अतिशय मृदू आवाजात, व सौम्य शब्दात, त्याने त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जाण्यास सांगितले. त्यांपैकी एकजण उलटून त्याला काही बोलण्याच्या तयारीत होता. पण माझ्या त्या ‘रक्षणकर्त्या’ च्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली असावी. तिघेही मुकाट्याने उठून चालते झाले. 

मी “थँक यू” म्हणताक्षणी त्याच्या तोंडून आलेल्या, “Not at all, Ma’am” या वाक्यामुळे, तो फौजी असणार हे मी बरोबर ताडले. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, “तुम्ही सैन्यदलात आहात का?” 

“होय, मॅडम. मी इन्फन्ट्री ऑफिसर आहे.  महूला एका छोट्या ट्रेनिंग कोर्सकरिता आलो होतो.”

“अच्छा. माझे मिस्टर नौदलात आहेत. माझे वडील आणि सासरे आर्मीमध्ये होते.”

सहजपणे आमच्या गप्पा सुरु झाल्या. देशातील एकंदर वातावरण, आणि विशेषतः काश्मीरमधल्या परिस्थितीकडे आपसूकच बोलण्याचा ओघ वळला. एक-एक करीत इतर सहप्रवासीदेखील आमच्या गप्पात सहभागी झाले. त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेले नसल्याने, माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातील ‘आँखोंदेखी’ ऐकण्यात अधिक रस होता. पुढचे दोन-तीन तास, अक्षरशः आपापल्या जागेवर खिळून, आम्ही त्या मेजरचे एकेक थरारक अनुभव ऐकत राहिलो. (त्या मेजरचे नाव मी सांगू इच्छित नाही). 

ट्रेनिंग संपवून ज्या दिवशी तो युनिटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाला, त्याच दिवशी त्याच्या हातून एक मनुष्य (अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी) मारला गेला होता, आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावरून! 

ती कारवाई संपल्यानंतर मात्र, जेमतेम २०-२२ वर्षांच्या त्या तरुण अधिकाऱ्याचे मन अक्षरशः सैरभैर होऊन गेले होते. युनिटमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखून, त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली. एक सेनाधिकारी म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडताना, त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला जाणीव करून दिली. जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले! 

युनिटमधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाखमोलाचा असतो हे त्या मेजरने आम्हाला आवर्जून सांगितले. कारण, याच  भावना आणि हेच  घनिष्ट  परस्परसंबंध, अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून उभे राहतात!

मला जाणवले की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता. “सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चला पंढरीला जाऊ…!!!” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “चला पंढरीला जाऊ…!!!” ☆ सौ राधिका भांडारकर 

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्त दर्शनासाठी पंढरपूरास पायी जातात. पंढरपूरची वारी करणारे ते वारकरी आणि त्यांचा ‘वारकरी’ हा संप्रदाय. या संप्रदायात वर्ण जात धर्म याचा भेद नाही. सर्वसमावेशक असा हा संप्रदाय. आणि पंढरपूरच्या या पदयात्रेत भक्तगणांचा ऊत्स्फूर्त सहभाग असतो. ऊन, पाऊस, वारा, कशाचीही पर्वा न करता या आनंद सोहळ्यात, लहानथोर, रंकराव, सारे एकात्म भावनेने सामील होतात. कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीमाळ, हरिपाठाचे पूजन,सात्विक आहार, ही वारकर्‍यांची ओळख. 

वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडीलांपासून आहे. पुढे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानेश्वरांनी समाजसंघटनेचा पाया रचला आणि संत तुकाराम, नामदेव यांनी ती धुरा वाहिली.

पंढरपूर हे वारकर्‍यांचे तीर्थस्थान. भीमा तीरावरचे पावन क्षेत्र. आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका असलेली पालखी, आणि देहूहून संत तुकारामाची पालखी, दिंड्या पताकासहीत पंढरपूरास  पायी चालणार्‍या प्रचंड जनसमुदायासवे येतात. विठोबाच्या दर्शनाचा एक अपूर्व ,लोभसवाणा सोहळा घडतो. दुथडी भरून वाहणार्‍या चंद्रभागेत स्नानाचे महात्म्यही अपार..

पावसाच्या अमृतधारांत ,ग्यानबा तुकारामाच्या गजरात, टाळ मुृदुंगाच्या वाद्यवृंदात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन चाललेली बाया बापड्यांची ,भक्तीरसात नाहून निघालेली वारी एखाद्या पांगळ्या पायात सुद्धा शक्ती निर्माण करते. या वारीत ,रिंगण, झिम्मा ,फुगड्या असे ऊर्जादायी खेळही असतात. ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संघटना वारकर्‍यांच्या सुविधासाठी झटतात.

श्रद्धा आणि धार्मिकता म्हणजे परंपरा. पण पंढरीची वारी-परंपरा सांकेतिक आहे. समाजाचं एकत्रीकरण हा ध्यास आहे. विषमता निवारण हा सारांश आहे. पांडुरंग ही अशी सगुण शक्ती आहे की जी भेदाभेदाची मुळे उखडते…..  परब्रह्माला घेउन विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे वारी…पायी वारी..

वारी वारी जन्म मरणाते वारी

हारी पडलो आता संकट निवारी..

     विठ्ठला मायबापा, तुझ्या दर्शनासी आतुरलो

     भेट घडण्या पंढरपुरी आलो,,,,

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  इंद्रधनुष्य ☆ काही दुर्लक्षित चमत्कार… लेखक – श्री रॉबर्ट विल्यम ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ काही दुर्लक्षित चमत्कार… लेखक – श्री रॉबर्ट विल्यम ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री रॉबर्ट विल्यम हे युरोपियन प्रवासी लिहीतात —

१) अंगकोर वाटचे विष्णू मंदिर व्हॅटिकन सिटीच्या ४ पट आहे !! मंदिर पूर्ण बघायला आठवडा लागतो !!

    ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

२) एलोराचे कैलाशनाथ मंदिर आणि तिथली इतर मंदिरे शतकानुशतके अवाढव्य दगडात कोरलेली आहेत !!

   ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

३) कुंभकोणम येथील ऐरावतेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या प्रत्येक इंचावर कोरीवकाम आहे !!

    ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

४) तंजावरमधील बृहदेश्वर मंदिरामध्ये १२० टन वजनाचे गोपुरम ६० किमीच्या उतारावर आहे !!  मंदिर किचकट कोरीव कामांनी भरलेले आहे !!

    ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

५) कोणार्कचे सूर्यमंदिर क्लिष्ट डिझाइन केलेली २४ चाके, त्यावर १२ फूट व्यासाचे जे घोडे काढलेले दिसतात. हे सात घोडे आठवड्याचे प्रतिनिधित्व करतात, चाके १२ महिने उभी असतात, तर दिवसाचे चक्र चाकांमधील आठ स्पोकद्वारे दर्शवले जाते. आणि हे संपूर्ण चित्रण सांगते की वेळ सूर्याद्वारे कशी नियंत्रित केली जाते !!

— ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

६) राणी का वाव हे त्याच्या प्रकारातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठे उदाहरण आहे आणि पाण्याचे पावित्र्य   अधोरेखित करणारे उलटे मंदिर म्हणून डिझाइन केलेले आहे. ही पायरी विहीर शिल्पकलेच्या फलकांसह पायऱ्यांच्या सात स्तरांमध्ये विभागलेली आहे.. भगवान विष्णूची ५०० हून अधिक प्रमुख शिल्पे आणि १००० हून अधिक किरकोळ शिल्पे धार्मिक आणि पौराणिक प्रतिमा एकत्र करतात  !!

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

७) फक्त हंपीच्या अवशेषांमध्ये टेकड्या आणि दऱ्यांमध्ये पसरलेली ५०० हून अधिक स्मारके आहेत.  यामध्ये आकर्षक मंदिरे, राजवाड्यांचे अवशेष, राजेशाही मंडप, बुरुज, ऐतिहासिक खजिना, जलीय संरचनांचे पुरातत्व अवशेष आणि प्राचीन बाजारपेठांचा समावेश आहे.

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

८) मोढेरा सूर्य मंदिर हा एक उत्कृष्ट कोरीवकाम केलेला  मंदिर परिसर आणि तेथील भव्य शिल्प कुंड हे सोलंकी काळातील गवंडी कलेतील दागिने आहेत, ज्याला गुजरातचे सुवर्णयुग म्हणूनही ओळखले जात होते. मंदिराचे डिझाइन घटक वास्तू – शिल्पाच्या तत्त्वांचे पालन करतात. कुंड (जलाशय) आणि प्रवेशद्वार पूर्वेकडे सूर्याच्या किरणांचे स्वागत करत आहे आणि संपूर्ण रचना सूर्यदेवाला अभिषेक म्हणून फुलांच्या कमळासारखी दिसणारी मंडपावर तरंगते. मुख्य संकुल तीन भागात विभागले गेले आहे. प्रवेशद्वार म्हणजे ‘सभा मंडप’, ‘अंतरा’ ला जोडणारा रस्ता आणि ‘ गर्भगृह.’

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

९) पट्टडकल हे केवळ चालुक्यकालीन वास्तुशिल्पीय कार्यांसाठीच लोकप्रिय नव्हते, तर ‘पट्टदाकीसुवोलाल’ या शाही राज्याभिषेकासाठी एक पवित्र स्थान देखील होते. येथील मंदिरे रेखा, नगारा, प्रसाद आणि द्रविड विमान शैलीचे मंदिर वास्तुकलेचे परिपूर्ण मिश्रण आहेत. पट्टाडकल येथील सर्वात जुने मंदिर हे विजयादित्य सत्याश्रयाने बांधलेले संगमेश्वर आहे (इ.स. ६९७-७३३).

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

१०) रत्नेश्वर मंदिर, वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाजवळ वसलेले, सुमारे ९ अंशांनी झुकते, तर पिसाचा झुकणारा टॉवर सुमारे ४ अंशांनी झुकतो. काही अहवालांनुसार, मंदिराची उंची ७४ मीटर आहे, जी पिसा टॉवरपेक्षा सुमारे 20 मीटर उंच आहे. ऐतिहासिक रत्नेश्वर मंदिर शतकानुशतके जुने आहे आणि वाराणसीमधील सर्व छायाचित्रित मंदिरांपैकी एक आहे.

मग हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक का नाही?

या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच :— *कारण आपल्याला कळण्याचीही पर्वा नसते !!

इतरांना * त्यांच्या स्थापत्यकलेचा चमत्कार दाखवण्यात विशेष अभिमान वाटतो; तर हे चमत्कार अस्तित्वात आहेत हे देखील आम्हाला माहीत नाही.

सर्व भारतीयांनी भारताचा हा भव्य इतिहास आणि अद्भुत म्हणावीत अशी वारसा स्थळे जाणून घ्यायलाच  हवीत —

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-2 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-2 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

(माझी बुद्धी,तर्क आणि संवेदना याच्याचकडे धाव घेत आहेत.मी आता माझा निर्णय बदलणार नाही.राहिले दैव,तर मी क्षात्रकन्या आहे.मी जीवनाशीच काय, मृत्यूशीही झुंजेन! माझ्यावर विश्वास ठेवा .) इथून पुढे —

राजा राणीने कन्येच्या इच्छेचा मान ठेवला.तिच्यावर टाकलेला विश्वास,तिला दिलेला स्वयंनिर्णयाचा अधिकार त्यांनी काढून घेतला नाही. तातडीने वनात जाऊन तिचा विवाह सत्यावानाशी करून दिला.सावित्री वनात राहू लागली.सीतेप्रमाणे सर्व राजवस्त्रे,सुविधा , सवयी यांचा त्याग करून ती आश्रमीय जीवनात समरसून गेली.

अखेर तो दिवस आला.सत्यवान सावित्री वनात गेले होते.झाडावर चढलेला सत्यवान अचानक खाली कोसळला.त्याचे प्राण न्यायला यमदेव आले.

आपला प्राणप्रिय सहचर आपल्याला सोडून जात आहे हे समोर दिसत असूनही सावित्री डगमगली नाही.तिनं यमाशी संवाद केला.त्याला प्रश्न विचारले.मानवाचे प्रयत्न,त्याची अभीप्सा,त्याचं जीवनध्येय याच्याशी काही संबंध नसलेल्या यमाशी आणि आपल्या हातात मृत्यू आहे म्हणजे आपणच सर्वश्रेष्ठ या त्याच्या अहंकाराशी ती लढली.

मृत्यूपूर्वी येऊन माणसाला भ्रमित करणाऱ्या भय,अविश्वास,संभ्रम, अज्ञान, मोह या यमदूतांना तिनं ओळखलं.त्यांच्या आक्रमणामुळे तिनं आपली सकारात्मकता,जीवनेच्छा त्यागली नाही. प्रयत्न सोडले नाहीत.मनुष्याने जीवनाला योग्य रीतीनं समजून घेतलं,मृत्यूचे डावपेच ओळखून वेळीच पावलं उचलली तर मनुष्य दीर्घायुषी होऊ शकतो हे तिनं सिध्द केलं.मन शांत ठेवून विचार केला आणि संवाद सुरु ठेवला तर समस्या सोडवता येतात हे तिनं दाखवलं .

सावित्रीची कथा भाकडकथा नाही.

अश्व म्हणजे इंद्रिये. त्यांना वश केलेला राजाअश्वपती.सूर्य म्हणजे साक्षात, अखंड उर्जा व जीवनाचे प्रतीक.

त्याच्या उपासनेतून झालेली त्याची कन्या सावित्री.दृष्टी असूनही अंध झालेला व त्यामुळे राज्य गमावलेला राजा द्युमत्सेन आणि सत्याचा अविरत ध्यास घेतलेला सामान्य मानव सत्यवान.ही नावेही किती सूचक आहेत!

प्रथम इंद्रिय सुखांवर विजय मिळवा,व्यक्तिगत सुख व स्वार्थापलिकडे जाऊन विशाल अशी विश्वकल्याणाची मनीषा करा,

त्याकरता समाजाचे सहकार्य घेऊन अविरत प्रयत्न करा हे ‘राजा’ अश्वपती सांगतो.’पिता’ अश्वपती त्याच्याही पुढे जाऊन व्यवहारात कसं वागायला हवं हे शिकवतो.पुत्राऐवजी कन्या मिळाली म्हणून निराश न होता तो तिला समर्थ बनवतो.तुझा जन्म केवळ वंशवृद्धी करता नाही तर तुला मानवी जीवनाला काही नवा अर्थ द्यायचा आहे हे तिच्या मनात रुजवतो.

डोळसपणे वाढवलेल्या तरुण,देखण्या लेकीला पूर्ण विश्वासाने प्रवासाला पाठवतो आणि वरसंशोधनात पूर्ण मोकळीक देतो.तिच्या निवडीनंतरही सत्यवान धनिक नाही,राजगृहात रहात नाही या कारणांचा उल्लेखही करत नाही.लेकीचा संसार सुखाचा व्हावा या एकमात्र अपेक्षेलाही तो त्यागतो आणि तिच्या आत्मविश्वासपूर्ण निर्णयाच्या पाठीशी उभा रहातो.

राणीही आपल्या मातृसुलभ मोहाला आवरते.तिची पाठवणी करताना धनधान्य-सेवक-वस्त्रालंकार-राजवाडे-राज्य असं काहीही न देता तिचा व तिच्या कुटुंबाचा स्वाभिमान ते जपतात,तिच्या प्रयत्नवादावर पूर्ण विश्वास ठेवतात.

सावित्रीनं सत्यवानाचे प्राणच नाही तर सासरे द्युमत्सेन यांची गेलेली दृष्टी, गमावलेले राज्य परत मिळवले असे कथा सांगते.या करता सावित्रीने वर्षभर किती प्रयत्न केले असतील!

तिनं स्वतःचं ध्येय निश्चित केलं असेल त्याकरता स्नायुबल, देहबल, मनोबल, बुद्धिबल, आत्मबल एकवटलं असेल ..कदाचित तिने वनातल्या लोकांचे सहाय्य घेतले असेल तिथल्या ऋषी मुनींचे आशीर्वाद,त्यांचे ज्ञान याचे पाठबळ तिला मिळाले असेल..

चिरंजीवित्वाचे प्रतीक असलेल्या ,आपले खोड नाहीसे झाले तरी आपल्या पारंब्या मातीत घट्ट रुजवत राहिलो तर आपण अमर होतो हे तिला सांगणाऱ्या वटवृक्षाला तिनं आपलं प्रेरणास्थान मानलं असेल ..वडाच्या औषधी गुणधर्माचा तिनं वापर केला असेल .. मृत्यूवर मात या कल्पनेकडेही कितीतरी अर्थांनी पाहता येते..

सावित्रीनं जे केलं ते कोणत्याही प्रेमिकेनं केलं नसेल.या कथेद्वारे सावित्री आपल्याला आजच्या काळासाठीही उपयुक्त असं खूप काही सांगते आहे.

तिनं ईश्वर निर्मित जीवसृष्टी,मानवी जीवन व मृत्यूचा खरा अर्थ समजून घेतला असेल, निसर्गाशी साहचर्य हेच जीवन हे ती आपल्याला सांगू पाहत असेल.. 

मुलीला वाढवताना आधी तिच्या मनात तिच्या जीवन ध्येयाची पेरणी करायची आणि मग त्याला अनुकूल असे पुढचे जीवन व जोडीदार तिला निवडू द्यायचा हे ती सांगत असेल..

आईवडिलांनी ज्ञान,सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दिलं तर त्याचा वापर कसा करायचा,आणि  ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी मृत्यूशीही भांडायला कचरायचं नाही,आपल्या स्वप्नाचा पाठलाग सोडायचा नाही हे ती सांगू पहात असेल ..

‘योग’ यमाने दिला आहे असं मानतात.सावित्रीनं माणसाला दीर्घायुषी करणारा योग यमाच्या संवादातून आणला असेल..

द्युम्त्सेनाला तिनं योग्य ‘जीवनदृष्टी’ दिली असेल ..

तीव्र इच्छाशक्ती,शुध्द हेतू,परिपूर्ण प्रयत्न केले आणि त्याला ईश्वरी श्रद्धेची जोड दिली तर चमत्कार वाटावे असे परिवर्तन शक्य आहे, हे ती आपल्याला सांगू पाहत असेल..

पुराणकथांना नाकारणे,त्यांची थट्टा करणे,उपहास करणे सोपे आहे.त्यांना प्रतिकात गुंडाळून त्यातली प्रेरणा घुसमटून टाकणे हेही सोपेच आहे.पण नव्या दृष्टीने त्यांच्याकडे पहिले त्याचे कालसुसंगत अर्थ लावले तर या कथा आताच्या समाजाला कितीतरी बळ पुरवतात .

सावित्री केवळ पतीच्या मागे जाणारी त्याचे अनुसरण करणारी ‘प्रति’गामी नाही .पती ज्या जीवनरेषेशी थांबला,जीवनविन्मुख झाला त्या मर्यादेला ओलांडून पुढे जाणारी व त्याला पुन्हा जीवनसन्मुख करणारी,आपल्या जीवनध्येयाच्या मागे यायला लावणारी,नेतृत्व करणारी ‘पुरो’गामिनी आहे !

सावित्रीचे व्रत म्हणजे केवळ उपवास नाही. उपहास तर मुळीच नाही!

सावित्रीच्या उपवासातून मिळवायचे आत्मबल .शिकायचा संयम.वडाच्या पूजनातून घ्यायची चिवट जिजीविषा.

जपायचं निसर्गाशी असलेलं नातं.

धागा तुटू द्यायचा नाही,पर्यावरण आणि समृद्धी यातल्या संतुलनाचा.

सात जन्म ही सोबत संपूच नये असं वाटावं असं साहचर्य,असं माधुर्य सहजीवानात निर्माण करायचं,अर्थात दोघांनी !

दैववादाच्या क्षीण धाग्यात गुंडाळून ठेवलेली सावित्रीची कथा सोडवायची आणि प्रयत्नवादाच्या भक्कम वटवृक्षाच्या रूपात रुजवून घ्यायची!

– समाप्त –

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-13… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-13…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

मजकरवी गुरूमाऊली निवृत्तीने

न केवळ तुज उपदेशिले प्रेमाने

मजला ही दिधलासे आत्मानंद

स्वानुभवाच्या खाऊचा परमानंद॥६१॥

 

आता या कारणे आत्मज्ञान मिळता

डोळसपणे आपण परस्परा पाहता

दोघांमधला भेदाभेद न उरला

शाश्वत भेटी आत्मानंद पावला॥६२॥

 

ज्ञानामृत या पासष्ट ओव्यामधले

ज्याने त्यां दर्पण करुनि चाखिले

निश्चये पावेल शाश्वत आत्मसुख

सोडुनि देता अशाश्वत इंद्रियसुख॥६३॥

 

दिसते ते नसते, कारण ते नष्टते

नसते ते असते, परि नच दिसते

आत्मस्वरूपा त्या पाहण्या

गुरूपदेश घ्यावा ज्ञान वेचण्या॥६४॥

 

जाण तू निद्रेपलिकडे जे झोपणे

समजुनि जागृती पलिकडे जागणे

तुर्यावस्थेमध्ये या ओव्या रचणे

घडले गुरूकृपे ज्ञानदेव म्हणे॥६५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

निवेदन- आज याबरोबरच चांगदेव पासष्टी हे सदर संपत आहे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-1 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-1 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

एक होता राजा.अश्वपती त्याचं नाव.                                                                

काळ ? महाभारताच्या पूर्वीचा.

राज्य ? मद्र देश.— म्हणजे सध्याचं जम्मू काश्मीर. 

— या प्रदेशाला भारताचं मस्तक उगीच नाही म्हटलं जात. कश्यप ऋषींच्या तपश्चर्येची ही भूमी– पांडित्याची परंपरा असलेला प्रदेश. देशभरातून साधक ,तत्वचिंतक या प्रदेशात आले आणि हिमालयाच्या विशाल, प्रशांत पार्श्वभूमीवर त्यांनी जीवनविषयक चिंतन केले, सिद्धांत मांडले. ज्ञान विज्ञान कला साहित्य इथे बहरले.

आदि शंकराचार्यांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत थोर विभूतींनी इथे चिंतन केले.

त्या काळातील ज्ञानाच्या परंपरेला साजेसा राजा अश्वपती.वैयक्तिक सुखापेक्षा समाज,लोकहित याला प्राधान्य देणारा.राज्याच्या वैभवाला, सुख समृद्धीला आधार होता ते मद्रप्रदेशातील विख्यात, सुलक्षणी, ताकदवान अश्वांचा.मद्र देश उत्तम व प्रशिक्षित अश्व अन्य राज्यांना युद्धाकरता पुरवत असे.या वैभवाला कोंदण होते ते सत्शील व धर्मपरायण अश्वपतीच्या पराक्रमाचे.

पण राजा होता निपुत्रिक.त्या काळच्या पद्धतीनुसार म्हणा किंवा त्या परिभाषेनुसार म्हणा,त्यानं पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. इथे आपण कुचेष्टेने हसतो !यज्ञाने का कुठे मुलं होतात, म्हणून.

पण यज्ञ म्हणजे तरी काय ? एखादे ध्येय साध्य करण्या करता केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा.दिवसरात्र त्या ध्येयाचा ध्यास आणि त्या करता शक्य ते सर्व करणे.आहुती द्यायची आपल्या कष्टांची,त्या ध्येयप्राप्तीकरता त्यागाव्या लागणाऱ्या सुखांची.मन एकाग्र करायचं त्या एकाच विचारावर, आणि त्या करता मदत घ्यायची एखाद्या मंत्राची.मानवी प्रयत्न अपुरे असतात याची नम्र जाणीव ठेवून विश्वातल्या चैतन्याला आवाहन करायचं .

अश्वपतीने तेच केलं.विश्वातील शाश्वत सत्य म्हणजे सूर्य.त्याची आराधना करायची.त्याकरता त्यानं गायत्री मंत्राचं अनुष्ठान मांडलं.दररोज एक लाख मंत्र जपायचा.आता हे एकट्यानं शक्य आहे का ? तर नाही .पण त्या करता त्यानं अन्य सत्प्रवृत्त लोकांची मदत घेतली.राजा स्वतः कठोर बंधने पाळत असे.तीन दिवसातून एकदा अन्न ग्रहण करे.असं किती काळ ? अठरा वर्षं केलं.राजाचं देहबल,मनोबल,तपोबल आणि इच्छाबळ किती वाढलं असेल ! 

अखेर या साधनेचं फळ मिळायची वेळ आली.त्याला विश्वमाता प्रसन्न झाली.पण ती म्हणाली, तुझ्या भाग्यात ब्रह्मदेवानं पुत्रयोग लिहिलेला नाही.तुला कन्या होऊ शकते. अश्वपती म्हणाला, तर मग तूच माझ्या पोटी जन्माला ये.राजाचं अजून एक वेगळेपण हे की त्याला अशा संतानाची इच्छा होती जो मानववंशाला सत्याचा मार्ग दाखवेल.तो दिव्य संतान मागत होता ते विश्वकल्याणाची कामना धरून.

आणि मग अशा कठोर प्रयत्नांच्या आणि विशाल हेतूच्या पोटी जन्मली सावित्री!तिला जन्म दिला अश्वपतीची देखणी आणि समंजस राणी मालवी हिनं.राजा राणीनं तिला अत्यंत मुक्त, निर्भर वातावरणात वाढवली.

तिचं उपनयन करून तिला गुरूगृही पाठवली.तिला सर्व प्रकारच्या विद्या,

कला यात पारंगत केली.अत्यंत देखणी,अतिशय बुद्धिमान,कलासक्त, विलक्षण तेजस्वी मनस्वी अशी ही कन्या.हिचं बुद्धिवैभव आणि स्व-तंत्र विचार पेलणारा कुणी युवक राजाला मिळेना.तिच्या विवाहाची चिंता त्याला लागली..

राजानं एक अतिशय धाडसी पाऊल उचललं.सावित्रीला एक सुसज्ज रथ दिला आणि सांगितलं की जा,आणि तुला सुयोग्य असा पती तूच शोध.सावित्री निघाली.किती सुंदर असेल तिचा हा प्रवास !हे काही पर्यटन नव्हते.राजाने विचारपूर्वक दिलेले स्वातंत्र्य,दिलेली संधी होती.सावित्रीच्या वर संशोधना आधी तिला या प्रवासात आत्मशोध घ्यायचा होता.आपण कोण आहोत,जगात काय चालू आहे,आपल्याला भावी आयुष्यात काय साध्य करायचं आहे आणि त्या करता आपल्याला कसा जोडीदार हवा याचं चिंतन तिनं केलं.

ती आसपासच्या राज्यांत गेली.

राजवाड्यांत गेली.तिच्या रूपानं मोहित होणारे देखणे, बलदंड पण अहंकारी राजपुत्र तिला भेटले.तिच्या संपन्न पार्श्वभूमीवर भाळलेले आणि तिच्याकडून निव्वळ देहिक सुखाच्या अपेक्षा करणारे राजपुत्र तिनं पहिले.काही सत्शील पण क्षात्र तेजाचा अभाव असलेले तर काही इतके सत्वहीन की हिच्या दृष्टीला दृष्टीही भिडवू शकले नाहीत.

ती गावात गेली. राबणारे श्रमसाधक तिनं पाहिले,ती आश्रमांत गेली तिथे तिनं अनेक ज्ञान साधक पहिले..तिला आस होती ती सर्वगुणसंपन्न परिपूर्ण पुरुषाची.जो बुद्धी, बळ, ज्ञान, रूप, गुणसंपन्न असेल.. आपलं कर्तृत्व आणि पुरुषार्थ यांसह तिची स्वप्नं जपणारा तिला समान आदर देणारा असेल..जो जीवनाचा अर्थ जाणत असेल, या विश्वनाट्यातील आपली भूमिका समजून निसर्ग आणि भौतिक सुखाचं संतुलन करणारा असेल, जो स्पर्धा, युध्द यापेक्षा संवाद,सहयोग यावर विश्वास ठेवत असेल, जो मनुष्यत्वाला, साहचर्याला, सहजीवनाला पुढच्या पायरीवर नेईल असा जोडीदार..

अश्वपतीचीच लेक ती ! प्रयत्न थोडेच सोडणार !

कुठेही असा परिपूर्ण युवक तिला भेटला नाही म्हणून ती थेट अरण्यात गेली.जिथे तिचे वनबांधव रहात,

जिथल्या जटिल रानातल्या एकाकी स्थानांवर ऋषी तपश्चर्या करत, अशा वनात.तिथे तिला तो भेटला .तिच्या मनातला पुरुषोत्तम,सत्यवान.शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याचा एकुलता..देखणा-तेजस्वी-बलदंड पण हळुवार अन सच्च्या मनाचा. वनासारखा निर्मळ, शांत, निष्पाप.अहंकारविहीन,नम्र सौम्य बोलणारा.पढतपोपट नाही तर अनुभवश्रीमंत असणारा.वल्कले नेसून वनातील आश्रमात आपल्या मातापित्या सोबत रहाणारा.दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.एकमेकांशी बोलले,एकमेकांना सर्वार्थानं जाणून घेतलं, सावित्रीला सत्यवान त्याच्या आश्रमीय जीवनशैलीसह आवडला. तिनं त्याला मनोमन वरलं. दोघांनी गांधर्व विवाह केला आणि मग सावित्री परतली,आपल्या पित्याला हे सांगायला, की मला माझा जीवनसाथी मिळाला आहे.

ती आनंदाने, उत्साहाने परत आली तेव्हा अश्वपती-मालवी दोघे नारदमुनींशी बोलत बसले होते.तिचा चेहरा पाहूनच सर्वांनी काय ते ओळखले! तिनं सत्यवानाविषयी भरभरून सांगितलं. राज्यातून निष्कासित झालेला शाल्वराज द्युमत्सेन आणि शैब्या यांचा सद्गुणी पुत्र सत्यवान.. अश्वांचे जिवंत पुतळे  बनवणारा सत्यवान.. देखणा व आरोग्यसंपन्न सत्यवान ..

राजा राणी ने सहज नारदमुनींना विचारले की हा युवक तुम्हाला सावित्रीच्या योग्य वाटतो का ? तुम्ही याला ओळखता का? याच्यासोबत आमच्या गुणवती पण मनस्वी कन्येचा संसार सुखाचा होईल का ?

नारद म्हणाले की याच्यासारखा जामात तुम्हाला त्रिभुवन शोधूनही मिळणार नाही.मात्र याच्यात एकच वैगुण्य आहे ते म्हणजे याचे आयुर्मान केवळ एक वर्ष इतकेच उरले आहे.

राजाराणीने सावित्रीला समजावले की याचा मोह सोड आणि पुन्हा वरसंशोधनास जा.पण सावित्री ठाम होती .ती म्हणाली, मी याला तन-मन-अंतःकरणपूर्वक निवडला आहे. माझी बुद्धी, तर्क आणि संवेदना याच्याचकडे धाव घेत आहेत. मी आता माझा निर्णय बदलणार नाही. राहिले दैव, तर मी क्षात्रकन्या आहे. मी जीवनाशीच काय, मृत्यूशीही झुंजेन ! माझ्यावर विश्वास ठेवा .

— क्रमशः भाग पहिला 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

माउलींनी पसायदानात ‘ जे खळांची व्यंकटी सांडो ‘ असे का म्हटले आहे, वाचा ही गोष्ट !

एक कीर्तनकार महाराज तीर्थाटनाला निघाले. वाटेत एका गावात मुक्कामी थांबले. ईश्वरसेवा म्हणून तेथील मंदिरात कीर्तन करू लागले. गावकऱ्यांना त्यांचे कीर्तन खूप आवडले. महाराजांची कीर्ती पसरू लागली. पंचक्रोशीतून त्यांना कीर्तनासाठी बोलावणे येऊ लागले. त्यांच्या कीर्तनात पांडुरंगाच्या दर्शनाची  भाविकांना अनुभूती येत असे. 

ही गोष्ट बादशहाच्या कानापर्यंत गेली, तेव्हा त्याने महाराजांना आपल्या राजदरबारात बोलावले आणि विचारले, “ तुम्ही मोठे कीर्तनकार आणि पांडुरंगाचे भक्त अशी तुमची कीर्ती ऐकली. तुमच्याशी देव बोलतो, तुमचे ऐकतो असे लोकांकडून  समजले. तुम्हाला मी इथे बोलावले आहे, ते तुमची भक्ती सिद्ध करण्यासाठी. समजा, मी जर एक गाय मारली, तर तुम्ही ती जिवंत केली पाहिजे. नाहीतर ढोंगी बनून तुम्ही माझ्या प्रजेची दिशाभूल केल्याबद्दल मी तुम्हारा ठार मारीन.” 

कीर्तनकार महाराज म्हणाले,  “ माझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी गायीने आपला जीव का गमवायचा? तुम्ही खुशाल तिच्या जीवावर उदार झालात. तुम्हाला तिच्या जीवाची किंमत नाही. मी परीक्षा द्यायला तयार आहे. परंतु तुम्ही गायीऐवजी तुमच्या जवळच्या कोणा व्यक्तीचा बळी द्यायला तयार असाल तर सांगा.”

बादशहा चक्रावला. महाराजांकडून अशा प्रश्नाची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून महाराज म्हणाले,  “ तुम्ही तुमच्या राजपुत्राचा बळी देता का? मी माझ्या पांडुरंगाला सांगून त्याला पुन्हा जिवंत करून दाखवतो.”

बादशहा स्वत:च्याच बोलण्यात अडकला. गायीच्या जागी आपल्या स्वत:च्या मुलाचा जीव घेण्याच्या कल्पनेनेही त्याचे हात थरथरू लागले. तो महाराजांना म्हणाला, “ तुमच्या भक्तीची परीक्षा घ्यायला मी माझ्या मुलाचा बळी देऊ शकत नाही. मात्र, तुम्ही आता तुमची कीर्तन प्रवचन सेवा थांबवा आणि तुमचा मुक्काम इथून हलवा.”

यावर महाराज म्हणाले,  “ बादशहा, तुम्हाला माझ्या भक्तीचा त्रास झाला की तुमच्या विकृत मानसिकतेचा? आपण गायीचा जीव घ्यायला तयार होतात, परंतु मुलाच्या जीवाचा प्रश्न आल्यावर आपण आपला विचार बदललात. याउपर आपण जरी राजपुत्राचा जीव घेण्याची तयारी दर्शवली असती, तरी मी आपल्याला नक्कीच अडवले असते. कारण, कोणाच्याही जीवापेक्षा आमचा पांडुरंग मोठा नाही. नव्हे, तर प्रत्येक जीवात आमचा पांडुरंग आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या भक्तीची परीक्षा बघू नका.  तुम्ही म्हणालात तर मी गाव सोडून जाईनही ! पण आपण परत कधी अशी कोणाची परीक्षा घेऊ नका एवढी विनंती करतो.”

महाराजांचे बोल ऐकून बादशला वरमला. त्याने महाराजांची क्षमा मागितली. त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, “ महाराज, तुमच्या पांडुरंगानेच माझ्या मुलाचे प्राण वाचवले, अन्यथा माझ्या अहंकारापोटी मी त्याचे प्राण घ्यायलाही बधलो नसतो. परंतु, तुम्ही मला भगवंताच्या अस्तित्वाची ओळख करून दिलीत. आजवर गावकऱ्यांकडून ऐकले होते, की तुमच्या कीर्तनात पांडुरंग भेटतो, तो आज मला तुमच्यात दिसला.”

महाराज म्हणाले, “ बादशहा, याचे श्रेय मला नाही, तर संतांना आहे. त्यांनी आमच्यावर घातलेले हे संस्कार आहेत. माऊली म्हणते, ‘ जे खळांची व्यंकटी सांडो ‘ – अर्थात, कोणतीही व्यक्ती वाईट नसते, तिच्यातील व्यंकटी अर्थात वाईट वृत्ती बाजूला केली, तर चांगली व्यक्ती शिल्लक राहते. तुम्हीदेखील तुमचे वाईट विचार दूर सारलेत,म्हणून तुम्हाला ईश्वराचे अस्तित्त्व जाणवले. तुमच्याप्रमाणे प्रत्येकाने वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा त्याग केला, तर हे ईश्वरनिर्मित जग किती सुंदर होईल नाही? “

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद : मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) : ऋचा ६ ते १० — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) : ऋचा ६ ते १० — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) – ऋचा ६ ते १०

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – अग्नि

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सव्विसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अग्नी देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे.  आज मी आपल्यासाठी अग्निदेवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

यच्चि॒द्धि शश्व॑ता॒ तना॑ दे॒वंदे॑वं॒ यजा॑महे । त्वे इद्धू॑यते ह॒विः ॥ ६ ॥

भिन्न देवता तरीही त्यांच्यासाठी एक हवी

अर्पण केला त्या सर्वांना भक्तीने हा हवी

तुम्हासाठी घेऊनी आलो प्रेमाने हा हवी

संतोषा पावावे आता स्वीकारुनिया हवी ||६|| 

प्रि॒यो नो॑ अस्तु वि॒श्पति॒र्होता॑ म॒न्द्रो वरे॑ण्यः । प्रि॒याः स्व॒ग्नयो॑ व॒यम् ॥ ७ ॥

शुभदायी पंचाग्नीचे करितो प्रेमे पूजन

त्यांच्याठायी लुब्ध जाहले भक्ती भरले मन

आम्हालाही प्रीती द्यावी हे अग्निदेवा

नृपती तू तर देवांना अमुचा हा हवि पोचवा  ||७||

स्व॒ग्नयो॒ हि वार्यं॑ दे॒वासो॑ दधि॒रे च॑ नः । स्व॒ग्नयो॑ मनामहे ॥ ८ ॥

शुभदायक अग्नीचे असती स्नेही थोर देव

सामर्थ्याने उभारले स्तुतिपात्राचे वैभव

हितकर्त्या अनलाचे भक्त आम्ही निस्सीम

सदैव त्याचे चिंतन करितो होउन निष्काम ||८||

अथा॑ न उ॒भये॑षा॒ममृ॑त॒ मर्त्या॑नाम् । मि॒थः स॑न्तु॒ प्रश॑स्तयः ॥ ९ ॥

ऐका अमुची आर्त प्रार्थना अमर अशा देवा

होतृ ऋत्विज यांच्या मध्ये सुसंवाद ठेवा

होमकुंड हे जागृत केले पुण्यसंचयाला

समर्थ तुम्ही यज्ञाला संपन्न करायला ||९||

विश्वे॑भिरग्ने अ॒ग्निभि॑रि॒मं य॒ज्ञमि॒दं वचः॑ । चनो॑ धाः सहसो यहो ॥ १० ॥

समस्त विश्वा सर्व ज्ञात तुमचे सामर्थ्य

यज्ञासाठी तुमची अर्चना सर्वार्थाने सार्थ

पंचाग्निसह येउनी अनला यज्ञा साक्ष करा

या यज्ञावर या स्त्रोत्रावर उदंड प्रेम करा ||१०||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/eAAKZ4eDAU0

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 26 Rucha 6-10

Rugved Mandal 1 Sukta 26 Rucha 6-10

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

रणी जो सहकारी माझा…. तो प्राणांहूनी प्रिय मजला ! अर्थात Leave nobody behind… Leave no buddy behind! 

भारतीय सेना…. नाईक अमोल तानाजी गोरे या पॅरा कमांडो ची दृढ हिम्मत व बलिदानाची सत्यकथा.

“साहेब, मी जाऊ का?… माझा जोडीदार तिथे जखमी होऊन पडलाय… मी त्याला इथं सुरक्षित घेऊन येतो !” जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आग्रहाच्या स्वरात परवानगी मागितली… आणि परवानगी नाही मिळाली तरी तो जाणारच होता असं स्पष्ट दिसत होतं. 

साहेब म्हणाले, “ तू जाऊ शकतोस तुला हवं असेल तर. पण तू तर पाहतोयस… तुफान गोळीबार सुरू आहे. आपल्या सैनिकांचे मृतदेह चहूबाजूला विखुरलेले दिसताहेत. आणि तुझा तो जोडीदार तर इतका जखमी आहे की तो जिवंत असेल अशी शक्यता नाही. कशाला जीव धोक्यात घालतोयस ? ” 

साहेबांनी उच्चारलेलं “ तू जाऊ शकतोस….!” हे एवढंच वाक्य प्रमाण मानून तो जवान मोकळ्या मैदानात धावत निघाला… 

चहु बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मोकळ्या मैदानातलं लक्ष्य टिपणं शत्रूच्या बंदुकांना काही फार अवघड नव्हतं. पण याच वायुवेगानं धावणं आणि धावता धावता फैरी झाडणं यामुळे शत्रूलाही थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले होते. पण गडी जबर जखमी व्हायचा तो झालाच…आगीत उडी घेतल्यावर दुसरं होणार तरी काय म्हणा?”

यानेही जमेल त्या दिशेला फायरिंग सुरू ठेवलं आणि पळणंही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकारी सैनिकाला त्याने पटकन खांद्यावर उचलून घेतलं आणि जीवाच्या आकांताने तो खंदकात परत आला ! 

“ मी तुला म्हटलं होतं ना बेटा… तू सुद्धा जखमी होशील… तसंच झालं ना? अरे हा तर केंव्हाच खलास झालाय आणि तूही जगणार नाहीस….! ” साहेबांनी कापऱ्या आवाजात म्हटलं ! 

“ साहेब, मी पोहोचलो… तेव्हा याचे श्वास सुरू होते ! ‘ मला माहित होतं… तू  माझ्यासाठी जरूर येशील ! ‘ हे त्याचे शब्द होते साहेब… शेवटचे ! माझ्या खांद्यावरच प्राण सोडला त्याने… ‘ येतो मित्रा !’ म्हणत ! मी मित्राप्रती असलेलं माझं कर्तव्य निभावलं साहेब ! त्याच्या जागी मी असतो ना तर त्यानेही माझ्यासारखंच केलं असतं साहेब ! हेच तर शिकवलं आहे ना फौजेनं आपल्याला ! ” असं म्हणून या जवानानेही डोळे मिटले… कायमचे ! त्याचा मित्र मरणाच्या वाटेवर फार पुढं नसेल गेला… तोवर हाही निघालाच त्याच्या मागे. 

युद्धात कुणाचं तरी मरण अपरिहार्यच असते. सगळा शिल्लक श्वासांचा खेळ. किती श्वास शिल्लक आहेत हे देहाला ठाऊक नाही आणि मनालाही. असे अनेक देह झुंजत असतात देश नावाच्या देवाच्या रक्षणार्थ. या देवाचे भक्त एकमेकांच्या विश्वासावरच तर चालून जातात मरणावर… मारता मारता झुंजतात.

…  क्षणभरापूर्वी सोबत असलेला आपलाच सहकारी सैनिक देहाच्या ठिकऱ्या उडालेल्या अवस्थेत पाहताना फार वेळ त्याच्याकडे पहात बसायला, शोक व्यक्त करायला शत्रू उसंत देत नाही ! जखमी झालेल्या, वेदनेने विव्हल झालेल्या आणि प्रियजनांच्या आठवाने व्याकूळ झालेल्या जोडीदाराला आपल्या बाहूंच्या बिछान्यावर घडीभर तरी निजवावे अशी इच्छा असते त्याच्या जोडीदाराची… त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा हात सोडू नये अशी अनिवार इच्छा असते… तो जाणारच आहे हे दिसत असतानाही ‘ सगळं ठीक होईल !’ असं सांगत राहण्याची हिंमतही असावी लागते म्हणा !

पण हेच जातिवंत सैनिकांचं वैशिष्टय. खांद्याला खांदा लावून लढायचं… जोडीदाराच्या दिशेने येणाऱ्या मृत्यूला आपल्या जीवाचा पत्ता सांगायचा… कुणी पडला तर त्याला खांद्यावर वाहून आणायचं… नाहीच तो श्वासांचा पैलतीर गाठू शकला तर ओल्या डोळ्यांनी त्याची शवपेटी खांद्यावर घेऊन चालायचंही ! डोळ्यांतील दु:खाची आसवं आटताच त्याच डोळ्यांत प्रतिशोधाचा अंगार पेटवायचा आणि शत्रूवर दुप्पट वेगाने तुटून पडायचं… हेच सैनिकी कर्तव्य आणि सैनिकी जीवनाचं अविभाज्य अंग ! नाम-नमक-निशान  लढायचं आणि प्रसंगी मरायचं ते पलटणीच्या नावासाठी… देशानं भरवलेल्या घासातल्या चिमुटभर मिठाला जागण्यासाठी रक्ताचं शिंपण करायचं आणि पलटणीचा झेंडा गगनात अखंड फडकावत ठेवायचा… ही आपली भारतीय सेना ! 

अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचत असेल तर आपल्या एकट्याच्या जीवाचं काय एवढं मोल? म्हणत मरणाला सामोरं जाणाऱ्या सैनिकांच्या कथांनी तर आपल्या भारतीय सेनेचा इतिहास ओतप्रोत भरलाय. 

१४ एप्रिल २०२३ रोजीचा प्रसंग. शत्रू सतत आपल्या सीमेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असतो म्हणून सीमेवर गस्त घालत राहणं अत्यावश्यकच. राजकीय करारामुळे शत्रू सीमेपलीकडून गोळ्या नाही झाडत सध्या, पण हवामान नावाचा छुपा शत्रूही सतत डोळे वटारून असतो चीन सीमेवर. बर्फाच्या कड्यांना,नद्यांच्या जीवघेण्या वेगाला देशांच्या सीमा ठाऊक नाहीत.

… त्यादिवशी नाईक अमोल तान्हाजी गोरे आपल्या सहकारी जवानांसोबत बर्फातून वाट काढत काढत अत्यंत सावधानतेने गस्त घालीत होते. आणि… अचानक भयावह वेगाने वारा वाहू लागला, आभाळातल्या काळ्या ढगांनी उरात साठवून ठेवलेला जलसागर एकदमच ओतून दिला. नद्यांमध्ये हे पाणी मावणार तरी कसे? आधीच बर्फ, त्यातून हा वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. उधाणाच्या भरतीला समुद्रात उसळते तशी एक मोठी लाट उसळली नदीत… आता नदी आणि तिचा काठ यात काहीही फरक उरला नव्हता… पाण्यासोबत दगड-गोटे वेगाने वाहात येत होते. 

नाईक अमोल साहेबांचे दोन मित्र कधी नदीच्या प्रवाहात ओढले गेले ते समजले सुद्धा नाही क्षणभर. नाईक अमोल साहेब पट्टीचे पोहणारे. पॅरा कमांडो आणि पोहण्यात विशेष प्रशिक्षण घेतलेले. अंगापिंडानं एखाद्या खडकासारखा मजबूत.  त्याने दुसऱ्याच क्षणाला त्या प्रपातामध्ये झेप घेतली. शरीरातली सर्व शक्ती आणि अत्यंत कठोर परिस्थितीत घेतलेलं कमांडो प्रशिक्षण पणाला लावलं! दोन्ही दोस्त हाती लागले…  Leave no man behind ! अर्थात जोडीदाराला सोडून जायचं नाही.. प्रसंगी प्राणांवर बेतलं तरी बेहत्तर ! हे शिकले होते अमोलसाहेब. आणि सैन्यात शिकलेलं आता अंमलात नाही आणायचं तर कधी? उद्या ही वेळ आपल्यावरही येऊच शकते की ! 

सैन्यात सहकाऱ्यास ‘बडी’ म्हणजे सवंगडी-मित्र-दोस्त म्हणतात.. एकमेकांनी एकमेकांचा जीव वाचवायचा… त्यासाठी जीव द्यायचा किंवा घ्यायचाही ! कर्तव्यापुढे स्वत:च्या ‘अमोल’ जीवाचं मूल्य शून्य ! 

…. हाडं गोठवणारं थंड, वेगवान पाणी अमोल साहेबांना रोखू शकत नव्हतं. पण नदीच्या वरच्या उंचावरून गडगडत आलेला एक मोठा पत्थर… मानवी शिराचा त्याच्या प्रहारापुढे काय निभाव लागणार? त्या दोघा जीवाभावाच्या बांधवांना काठावर आणताना अमोल साहेबांना आपल्या डोक्यावरचा हा प्राणांतिक आघात लक्षातही आला नसावा… वाहत्या पाण्यासवे त्यांचं रुधिरही वेगानं वहात गेलं… त्या लाल रक्तानं त्या पाण्यालाही आपल्या लाल रंगात रंगवून टाकलं… पण रक्ताशिवाय प्राण कसा श्वास घेत राहणार? 

नाईक अमोल तान्हाजी गोरे साहेब दोन जीव वाचवून हुतात्मा झाले ! भारतीय सैन्याची उच्चतम परंपरा त्यांनीही पाळलीच. 

 

        २४ एप्रिल २०२३ रोजी, म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी ते घरी सुट्टीवर येणारच होते… आपल्या चार वर्षांच्या मुलाला, पत्नीला, आई-वडीलांना आणि सवंगड्यांना भेटायला…..  आणखी बरीच वर्षे देशसेवा करायची होती. पण अरूणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग मधल्या त्या नदीच्या पाण्याला अमोल साहेबांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं… कायमचं ! —  

— एक देखणं, तरूण, शूर, शरीरानं आणि मनानं कणखर परोपकारी आयुष्य असं थांबलं !  पण दोन जीव वाचवून आणि आपला जीव गमावून… एकाच्या बदल्यात दोन आयुष्यांची कमाई करून दिली अमोल साहेबांनी ! 

नियतीचा असा हा तोट्याचा सौदा सैनिक हसत हसत मान्य करतात… हीच तर आपली सैनिकी परंपरा. अशाच सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे…

जयहिंद! 🇮🇳

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सोनखस या गावातील सैनिक १४ एप्रिल,२०२३ रोजी चीन सीमेवर गस्त घालताना झालेल्या दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या चितेच्या ज्वाळा अजून पुरत्या विझल्याही नसतील. आपण आपल्या या वीरासाठी आपल्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करूयात… त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा प्रचंड आघात सहन करण्याची शक्ती मिळो ! त्यांच्या चार वर्षांच्या बाळासाठी आशीर्वाद मागूयात. 

हुतात्मा नाईक अमोल तान्हाजी गोरे…..अमर राहोत !

🇮🇳 जयहिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

(मला जमलं तसं लिहिलं ! अशा बातम्या वृत्तपत्रे, वाहिन्या आठ-दहा वाक्यांत उरकतात. एखाद्या रस्ते अपघाताची बातमी द्यावी तसं सांगतात.. लिहितात. त्यामुळे बरेचदा सैनिकांचे शौर्य जनमानसापर्यंत पोहोचू शकत नाही, असं मला वाटतं, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिले. तांत्रिक बाबींमध्ये काही तफावत असूही शकते. उद्देश फक्त एकच… हौतात्म्याचं स्मरण व्हावं, त्यांच्या नावाचं उच्चारण व्हावं !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print