(फोटो ओळ : ‘संजीवन’ शाळेत अनोखे उपक्रम राबवले जातात. सोबतच्या फोटोमध्ये मुली झाडाला राखी बांधत असल्याचा संग्रहित फोटो. फोटोत शशीताई ठकार, अनघादेवी, प्राचार्य धनंजय शिरूर आदी.)
☆ “जगावेगळी ‘संजीवन’ शाळा” ☆ श्री संदीप काळे ☆
विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आय. पी. एस. अधिकारी मनोजकुमार शर्माजी यांची वाट बघत थांबलो होतो. गेटच्या समोर असणाऱ्या गाडीकडे माझी सहज नजर गेली. पाहतो तर काय ? माझ्या समोरच्या गाडीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले महाराज एकटेच कुणाची तरी वाट पाहत थांबले होते. महाराजांचे लक्ष मोबाईलमध्ये होते. मी जाऊन जोरात ‘नमस्कार महाराज’ म्हणेपर्यंत महाराज मोबाईलमध्येच पाहत होते. आमच्या गप्पा झाल्यावर मी महाराजांना नम्रपणे म्हणालो, ‘महाराज, तुम्हाला व्हॉटसॲप पाहायला वेळ मिळतो का ?’
त्यावर महाराज हसून म्हणाले, ‘नाही, अजिबात नाही. आता एक आमदार माझ्यासोबत येत आहेत. त्यांची वाट बघत थांबलो होतो. व्हॉटसॲपमध्ये काही ग्रूप आहेत, ते मी पाहतो. त्यात मी शिकलेल्या पाचगणीच्या संजीवन शाळेचाही एक ग्रूप आहे, त्या ग्रूपमध्ये गेलो की, शाळेची आठवण येते. नवीन माहिती, फोटो मी पाहत असतो. ‘
महाराज अधिक उत्साहाने मला संजीवन शाळेविषयी सांगत होते, ‘मी ज्या संजीवन शाळेत शिकलो, त्या शाळेच्या खूप आठवणी आहेत. ‘ महाराज एक-एक करून त्या शाळेच्या आठवणी सांगत होते आणि मी ऐकत होतो. महाराजांकडून पाचगणीच्या संजीवन शाळेचे कौतुक सुरू होते. महाराज ज्यांची वाट पाहत थांबले होते, ते आमदार आले आणि महाराज निघून गेले. शर्माजी आले, त्यांची भेट झाली, तेही निघून गेले.
त्या दिवशी विधान भवनामध्ये अनेकांच्या भेटी झाल्या. अनेकांशी बोलणे झाले, पण त्या सर्वांमध्ये बोलण्याची आठवण राहिली ती महाराजांच्या संजीवनी शाळेच्या प्रेमाविषयी.
मी माझ्या नरिमन पॉईंट येथील आंबेसी सेंटर मधील कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात गेल्यावर पहिल्यांदा पाचगणीची संजीवन शाळा नेमकी आहे तरी कशी, हे गुगलवर सर्च केले. शाळेची माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी मनोमन ठरवले की, शक्य तितक्या लवकर संजीवन शाळेला भेट देण्यासाठी जायचे.
पुढच्या आठवड्यात त्या शाळेला भेट देण्याचा दिवस उजाडला. पाचगणीमध्ये प्रवेश केल्यावर महाबळेश्वर रोडवर भीमनगरमध्ये संजीवन चौक आहे, तिथेच संजीवन विद्यालय ट्रस्टची संजीवन शाळा आहे. पाचगणी आणि संजीवन शाळेभोवती असणारे नैसर्गिक सौंदर्य जगाच्या पाठीवर फार कमी ठिकाणी असेल.
मी शाळेत पोहोचलो. ‘संजीवन’चे प्राचार्य धनंजय शिरूर सर यांच्याशी माझे आधीच फोनवर बोलणे झाले होते. त्यांना भेटण्यासाठी मी शाळेतल्या शिपायाला निरोप दिला. शिपाई मला म्हणाला, ‘सरांची बैठक सुरू आहे. आपण थोडा वेळ बसा. ‘ मी ‘हो’ म्हणून बाहेर बसलो.
माझ्या लक्षात आले, शिरूर सर यांना वेळ लागणार आहे, म्हणून मी फेरफटका मारावा या उद्देशाने बाहेर पडलो. शाळेच्या परिसरात जे सौंदर्य होते, ते फारच मोहक होते. मला माहित होते की, याच भागात ‘तारे जमींन पर’ हा चित्रपट तयार झाला होता.
एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, शाळेतल्या काही मुली एका ज्येष्ठ महिलेसोबत कसली तरी तयारी करत होत्या. एक मोठा केक आणला होता. टाळ्यांच्या गजरात तो केक कापला गेला. त्या मुली अगदी भावूक होऊन तो केक त्या महिलेला भरवत होत्या. त्या महिला तिथे असणाऱ्या मुलींना म्हणत होत्या, ‘काय गं, घरी गेल्यावर मला विसरणार तर नाही ना.. ?’ काही बोलण्याच्या आधी त्या मुली भावनिक होऊन त्या महिलेच्या गळ्यात पडल्या. ते सारे भावनिक चित्र मन हेलावून सोडणारे होते.
माझ्या बाजूला बसून संगणक गेम खेळणाऱ्या मुलाला मी विचारले, ‘या महिला कोण आहेत?’
त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘त्या आमच्या शशी मॅम आहेत. ‘
मी पुन्हा त्यांना विचारले, ‘तुमच्या शिक्षिका आहेत काय ?’
त्याने कपाळावर हात मारत मला सांगितले, ‘अहो, या शाळेच्या प्रमुख आहेत. ‘
मी म्हणालो, ‘अरे, मला नव्हते माहीत. ‘
मी त्यांच्या जवळ जाऊन माझा परिचय देत त्यांना वाकून नमस्कार केला. आमचे बोलणे सुरू झाले आणि गप्पांमधून त्या मॅमनी त्या शाळेविषयी मला जे काही सांगितले, त्यातून मी अवाक् तर झालोच, शिवाय शशी मॅमची शाळा अवघ्या ‘जगात’ वेगळी कशी आहे हेही मी पाहिले. जे मंत्री महोदयांनी मला विधान भवनाच्या गेटवर सांगितले होते, ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर होते.
मूळचे बडोदा येथील असणारे कृष्णराव पंडित आणि रावसाहेब पंडित या दोघांनी १९२२ ला भारतीय संस्कृती जपणारी शाळा उभी करायची, असे स्वप्न पाहिले होते. पाचगणी आणि परिसरात ख्रिश्चन धर्माशी निगडित अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. हिंदू संस्कृती प्रामुख्याने जपली जावी, खेळाला प्राधान्य देऊन प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडावेत, या हेतूने संजीवन संस्थेची निर्मिती झाली.
पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज शशी मॅम ज्या मुलींना निरोप देत होत्या, त्या मुली पन्नास हजारावा आकडा पार करीत होत्या. प्रगतीचे हे शिखर गाठत असताना या संस्थेने मागे वळून कधी पाहिलेच नाही.
प्राचार्य धनंजय शिरूर सर (7798881662) हे संजीवनचे ११ वे प्राचार्य आहेत. शिरूर सर आधीपासून याच संजीवन शाळेत शिक्षक होते. मग ते व्यवस्थापनाच्या भूमिकेत आले, आणि नंतर प्राचार्य झाले. २००३पासून आजपर्यंत शिरूर सर यांनी शाळेसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे.
मी शशीताई यांच्याकडून जे काही शाळेविषयी ऐकत होतो, ते सारे काही अद्भुत असेच होते. पण मी जेव्हा शशीताईकडून शाळेशी संबंधित असलेला विषय ऐकला, तेव्हा मी शशीताई यांच्यापुढे अधिकच नतमस्तक झालो.
शशीताई ठकार शिक्षणासाठी ८वीला असताना ग्वालियरमधून पाचगणीला आल्या. सर्व विषयांत त्या अतिशय हुशार. राज्य आणि देशपातळीवर त्यांनी खेळात शाळेचे नाव केले. एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडायच्या वयात शशीताई संजीवन शाळेच्या प्रेमात पडल्या. शशीताई संजीवनमध्ये शिक्षक झाल्या, प्राचार्य झाल्या, संचालक झाल्या आणि आता त्या शाळेच्या चेअरमन आहेत. वय वर्ष ९३च्या शशीताई आजही या वयात शाळेसाठी सर्व कामे अगदी नेटाने करतात. संजीवन शाळा, कॉलेजचे रूपांतर स्किल आणि स्पोर्ट विद्यापीठात करायचे खूप मोठे स्वप्न शशीताईंनी उराशी बाळगले आहे.
शशीताई यांनी ना लग्न केले, ना कुणासोबत संसार, ना कुण्या नातेवाईकांसोबत नाते ठेवले. शाळा हेच त्यांच्यासाठी ‘जग’ ठरले आणि त्या शाळेला जागतिक असा अमूल्य दागिना बनवण्याचे काम शशीताईनी केले. शाळेच्या भिंती आणि मोठे मस्टर लिहिण्यासाठी कमी पडतील इतके मोठे विद्यार्थी घडवण्याचे काम झाले आहे. फोर्स मोटर्सचे सीईओ प्रसन्न फिरोदिया, संगीतकार ललित पंडित, मृण्मयी लागू, अमित देशमुख, रीतेश देशमुख, विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज अशी कितीतरी नावे घेता येतील. किती आयपीएस झाले, किती आयएएस झाले, किती वैज्ञानिक झाले, कित्येकांनी मोठ्या पदांवर जात सामाजिक कीर्ती मिळवली, याचा आकडा फार मोठा होता. ही शाळा नाही तर उज्ज्वल इतिहास घडवणारे चालते बोलते विद्यापीठ आहे.
मी शशीताईंना विचारले, ‘जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते?’
शशीताई शांतपणे म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर पिढ्या घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजून पुढे करतच राहणार. ‘ थोड्या काळजीच्या स्वरात ताई म्हणाल्या, ‘कोविडमुळे आम्ही खूप अडचणीत सापडलो. आमच्या शाळेविषयी शासन स्तरावर सतत अनास्था असते. पूर्वी मदत करणारी माणसे खूप होती, पण आता फारसे लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ ओढायचा कसा, हा प्रश्न आहे. ‘
आमचे बोलणे चालू होते, तेव्हढ्यात मला शोधत प्राचार्य शिरूर सर तिथे आले. शशीताई म्हणाल्या, ‘तुम्ही संपूर्ण शाळा फिरून या. मी तुमची घरी वाट पहाते. ‘ ताई निघाल्या. रस्त्याने जाताना प्रत्येक मुलगा ताईला जणू त्या त्यांच्या आईच आहेत, असेच बोलत होत्या.
मी शिरूर सर यांना म्हणालो, ‘या वयात काय उत्साह! काय काम करण्याची ताकद! बापरे! किती कमाल आहे! ‘
शिरूर सर म्हणाले, ‘ताई म्हणजे अजब आणि अद्भुत रसायन आहेत. वय वर्ष ४० असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची त्यांना नावे तोंडपाठ आहेत. शिरूर सर जे जे बोलत होते, ते सारेच कमालीचे होते. शिरूर सरांनी मला त्या शाळेत जे जे दाखवले ते सारे शिक्षण आणि सामाजिकता दृढ करणारे होते. सर्व प्रकारचे खेळ, संगीत, चित्रकला, सर्व प्रकारच्या अकादमींची पूर्व तयारी, या सर्व क्षेत्रांत जागतिक पातळीपर्यंत सहभागी झालेली मुले तिथे होती. पहिली ते बारावीपर्यंत कुणालाच नव्वद टक्केच्या खाली मार्क्स वाले कुणी आहेत का ? नाही, असा प्रश्न मला त्या शाळेच्या यशाचा आलेख पाहून बघायला मिळत होता. स्कीलिंगवर संस्थेचा खूप भर होता. केवळ नोकरी नाही तर स्कीलिंगच्या माध्यमातून मुले उभी राहिली पाहिजे, स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरू केला पाहिजे, यासाठी वीसपेक्षा जास्त स्कीलिंगचे कोर्स येथे चालवले जातात.
शिरूर सर म्हणाले, ‘संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आसपासच्या सर्व गावांत मोबाईल वाचनालय सुरू केले आहेत. पाच हजारांहून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. अनेक भागांतून गरिबांची मुले शासनाच्या माध्यमातून येथे मोफत शिकण्यासाठी येतात. ही शाळा म्हणजे दुसरं घर आहे. शैक्षणिक जडणघडणी सोबत मानसिक आधार, जीवनाची पायाभरणी हे इथले वैशिष्ट्य आहे.
मुलांकडून इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळणे, सतत फास्ट फूड खाणे टाळणे, बेशिस्तपणा दूर करणे, आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन थांबवणे. आमच्या शाळेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणून भारत भरातून आमच्याकडे प्रवेश असतात. आमच्याकडच्या माजी विद्यार्थांनी अनेक गरीब विद्यार्थी येथे घडावेत यासाठी त्यांच्याकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून अनेक विद्यार्थी शिकतात. ‘
शिरूर सर जे जे सांगत होते त्याचा डेमोही दाखवत होते. एकीकडे आमचे बोलणे सुरू होते, तर दुसरीकडे वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला शिरूर सर काहीतरी सांगत होते. कुणी पोहत होते, कुणी क्रिकेट खेळत होते, तर कुणी अनेक वैज्ञानिक प्रयोग करीत होते. जसे ‘तारे जमींन पर’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांत लहान मुले जे जे प्रयोग करीत होते, ते ते सारे प्रयोग या ‘जगा’वेगळ्या संजीवन शाळेत मी माझ्या डोळ्याने पाहत होतो.
खेळाच्या एका शिक्षकाची ओळख करून देताना शिरूर सर म्हणाले, “हे सचिन कांबळे सर, सर्व देशी, विदेशी खेळात विशेषतः क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये यांनी संजीवन शाळेचे नाव सातासमुद्रापार नेले आहे”.
हसतमुख, अत्यंत उत्साही कांबळे सर यांच्याशी खेळाचे सारे यश समजून घेताना कधी वेळ गेला ते कळलेच नाही. आख्खा दिवस त्या शाळेत गेला.
मला निघायचे होते. आम्ही शशीताईंकडे गेलो. त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले जेवण वाढले होते. जेवल्यावर त्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग मला दिले. त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या कन्या, संस्थेच्या संचालक अनघा देवी (9049919912) यांची मला त्यांनी ओळख करून दिली. तेव्हढ्या मोठाल्या पायऱ्या उतरून ताई मला निरोप देण्यासाठी खाली आल्या. ताईंच्या पायावर डोके ठेवून मी गाडीत बसलो.
आपल्या राज्यात शाळा या विषयाला घेऊन असाही प्रयोग होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसत नव्हता. गाडी बरीच पुढे गेल्यावर मी मागे नजर टाकली. शशीताईंचा हात अनघादेवी ताईंच्या हातात होता. अनघादेवी ताईंच्या मागे प्राचार्य शिरूर सर जात होते, आणि शिरूर सरांच्या मागे सचिन कांबळे सर होते. शशी ताईने पुढे शाळेचा कारभार सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी कार्यक्षम माणसे तयार केली होती. शाळेच्या भविष्याला पुढे नेणारी दुसरी पिढी शशी ताईंनी तयार केली होती.
मला या शाळेला भेट देऊन आल्यावर अवघे ‘जग’ फिरून आलो असे वाटत होते. आज याच ‘जगात’ वेगळ्या असणाऱ्या ‘संजीवन’ आणि तुमच्या आसपास असणाऱ्या त्या प्रत्येक चांगल्या शाळेला तुमची गरज आहे, ती तुमच्या आमच्या मदतीची. या शाळा टिकल्या तर आमची संस्कृती, आमचा भारत देश टिकेल ? बरोबर ना. करणार मग अशा शाळेला मदत ? नक्कीकरा.
☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी☆
(हा रिव्ह्यू नाही)
(पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.) – इथून पुढे —
Adolescence मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे समीकरण होते. पाच एक वर्षापूर्वी मुंबई उपनगरात एक घटना झाली होती, ज्यात अठरा मुले (बारा ते तेरा वयोगट) आणि दोन मुलगे असे समीकरण होतेब. दोन महिने या मुलांनी शाळा संपल्यावर दुपारी, एक मुलाच्या इमारतीच्या गच्चीत दोन मुलांना sodomise केले होते.
सुरुवातीला कुतूहल, नंतर व्हिडिओ करून ब्लॅकमेल.
एक मुलगा आत्महत्या करून सुटला.. दुसऱ्याने प्रयत्न केला तो वाचला आणि हे बाहेर आले.
सगळ्यांचे पालक उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय.
ते दोषी होते का? त्यांचे संस्कार या बाबतीत मला माहीत नाही पण नवल आहे, दोन महिने ही अठरा मुले अनैसर्गिक कृत्ये करत आहेत. त्यांच्या मनात काही तरी असेल, अपराधीपण, भीती, excitement, आपण पकडले जाऊ ह्याची धास्ती, अनैसर्गिक आनंद, ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या मनातली खळबळ, वेदना.. दोन महिन्यात ही लक्षात सुद्धा येऊ नये! एका ही कुटुंबात.. ही गोष्ट मला जास्त अस्वस्थ करून गेली. आपल्या मुलांचे मार्क्स, रूप रंग, भविष्यातही त्याची प्रगती, खेळ कला यातील यश अपयश हे सगळे आपण आवर्जून पाहतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, यशस्वी होण्यासाठी दबाव घालतो पण आपल्याला मुलांचे मन वाचता येत नाही, आणि मुलांना आपला आधार वाटत नाही!
मग आपण आई वडील का होत आहोत असा विचार करायची वेळ आली आहे.
Adolescence मध्ये त्या मुलावर sexually तो attractive आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.. आताचे जग हे क्रूड आहे. त्यामुळे ते डायरेक्ट मुद्द्यावर येते.
आमच्यावेळी शाळेत पहिला दुसरा नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व, कला किंवा खेळ यात प्राधान्य असणाऱ्या मुलांकडे/ मुलींकडे, मुलींचे/ मुलांचे लक्ष असायचे. जोड्या तेव्हाही जमायच्या आणि ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशी मुलं मुली तेव्हाही असायची. नकार, दुर्लक्ष, स्वतःच्या आयुष्याची काळजी, आपण कुणालाही आवडत नाही म्हणून येणारा एकाकीपणा, न्यूनगंड यातून अनेक जण जात असतील.
अशा लोकांच्या मनातले नैराश्य आणि त्यातून स्वतःला सावरणे, यात कोण पूल बनत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर याचे उत्तर मिळाले तर कदाचित ह्या मुलांच्या समस्यांच्या गुंत्याचे टोक आपल्याला सापडू शकते.
ही सिरीज बघत असताना मला माझा भाऊ आठवला. अभ्यासात हुशार पण रंगाने सावळा. त्यात बाहेर उनाडायचा खूप. त्यामुळे काळा दिसायचा. आपल्याकडे अनेकांना बोलण्याची पद्धत नसते.. त्याच्यावर प्रेम असणारी अम्माच म्हणायची, अरे रामोशी कसा दिसतो.
पुढे जसजसा मोठा झाला तसा बाहेरच्या जगात सुद्धा वजनावरून वरून टर, रंगावरून चेष्टा सुरू झाल्या.. मुले खूप vicious असतात. बिल्डिंग च्या भिंतीवर त्याचे कार्टून काढणे, त्याला हसणे, काहीही नावे ठेवणे असायचे.
पुढे वयात आल्यावर सुद्धा नकोसे वाटणारे अनेक अनुभव आले असतील, असणार.
तेव्हाचा रागीट स्वभाव, उर्मट वर्तन. नको असलेल्या घटकांशी सामना करण्याचे ते मार्ग होते.
आयुष्य त्याचे सोपे नव्हते.
घरात उगाच बाजू घेणे नव्हतेच. चुकले असेल तर ओरडा खायचा तो पण अनेकदा तो down असेल तर त्याच्या केसातून हात फिरवत ” एका तळ्यात होती ” म्हणणारी आई मला अजून आठवते. राजहंस एक असे म्हणताना आमचे आवाज सुद्धा त्यात मिसळायचे आणि मग आम्ही हसायचो… तो ही हसायचा.
आता exactly आम्ही त्याला कसे समजून घेतले हे नाही सांगता येणार पण त्याच्या मागे आम्ही होतो. We all shared a very close bond he knew we would be there for him always.
त्यामुळे असेल, बाह्य जगात वावरताना सुद्धा आपल्यासाठी कुणी आहे ही जाणीव त्याला सावरत होती.
त्याच्याबद्दल लिहावे असे खूप आहे आणि ते अत्यंत प्रेरणादायक आहे. अनपेक्षित भोग त्यानेही अंगावर घेऊन जिरवले. FB वर तो नाही आणि स्वतःबद्दल लिहिलेले त्याला आवडत नाही पण
पुढे शिक्षण, नोकरी… उत्तम भविष्य घडवले त्याने, खूप लहान वयात. मोठ्या कंपनीत डायरेक्टर, स्वतःचे मोठे फ्लॅट्स, मर्सिडीज.. आणि बरेच. त्याच्या कंपनीतून गेली अकरा वर्षे उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून अठ्ठावीस देशातून त्याची निवड केली जात आहे. या सारखी अनेक जण माहिती आहेत. घरातील तणाव, व्यसने, रूप रंग, व्यंग यामुळे झालेला मानसिक त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे झालेला अपमान आणि या साऱ्यातून तावून सुलाखून वर आलेले अनेकजण.
सूड घेण्याकडे अनेकांकडे कारणे असतील पण त्यांनी ते केलेले नाही.
या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. पाठीशी असलेला हात आणि विश्वासाची माणसे आणि त्याला समजून घेण्यासाठी दिलेला वेळ.
“मी राजहंस आहे” हे पटवून द्यायला त्यांच्याकडे त्यांची माणसे होती आणि ती आहेत ह्याचा त्यांना विश्वास होता.
हा सिरीजचा रिव्ह्यू नाही. असे काही घडण्याची शक्यता असू शकते म्हणून सिरीज पहायला हरकत नाही
पण नव्वद टक्के गोष्टी या खरेतर हातात असतात आणि आईवडील, आजीआजोबा यांनी आपल्याला घडवले असल्याने अंगात सुद्धा मुरलेल्या असतात.
आपल्यासाठी भरपूर माणसे आहेत असा भास सोशल मिडिया मुळे होऊ शकतो. इथे खरच तुमच्यावर प्रेम करणारी माणसे असतात.. ती प्रेम करतात ते ही निखळ असू शकते कारण तुमची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर नसते. You don’t owe anything to them nor they owe to you.. त्यामुळे असेल, त्या मर्यादित वेळेत ते तुमचे कौतुक करतात. अनेकवेळा ते खरे असते. ह्यात आपली माणसे, ज्यांच्याशी आपली आर्थिक, सामाजिक, कायदेशीर बांधिलकी असू शकते ती रुक्ष वाटू शकतात. होते असे म्हणून तर सोशल मिडिया लोकप्रिय आहे. काहीही प्रत्यक्ष न करता केल्याचा आभास इथे निर्माण होतो. आपली माणसे नक्की कोण असतात?
माझ्या सासूबाई आजारी होत्या. माझ्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते. कधीतरी लक्षात आले असावे त्यांच्या की हे आपले शेवटचे दिवस आहेत. माझा हात धरून त्या म्हणाल्या, जगू आणि बाबांना जप. खरेतर दोन्ही माझेही. नवरा, सासरे पण त्यांच्या प्रति आईंची जी जबाबदारी होती ती त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली.
गेल्या आठवड्यात अचानक हॉस्पिटल मध्ये मला जावे लागले. खरेतर सगळे पूर्ववत होत असताना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला आणि झाले ते काही तासांत, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये emergency मध्ये दाखल झाल्यावर ना मला नीट बसता येत होते, ना बोलता, जीभ जड आणि ऐकू येत असलेले नीट पोचत नाही अशा स्थितीत मी जवळ उभ्या असलेल्या नवऱ्याला म्हटले, take care of Amarjeet.. मुलगा लांब उभा होता म्हणून मनातल्या मनात त्याला पपाला पाहायला सांगितले. खरेतर काही तासापूर्वी किती काय काय करायचे होते, कुणाकुणाशी बोलायचे होते, pending कामे आठवत होती.. पण त्या क्षणाला लक्षात आले…let go असे करता येत नाही.
माझ्या जबाबदाऱ्या अशा टाकून कशी जाणार.. I have to handover..
आतापर्यंत माझा जो बांधिलकीचा वाटा होता तो दुसरे कोण घेणार!
वारसा म्हणजे फक्त पैसे घर, मालमत्ता याहीपेक्षा असतो ते आपण स्वतः..
आपली ओळख ज्या व्यक्ती मार्फत उरणार ती आपला वारसदार असते. आपल्याला हवी असलेली आपली ओळख, आपल्या नंतर रहावी असे वाटत असेल तर आपल्या मुलाला तसे बनवणे हेच आपल्या हातात असते. तेवढा प्रयत्न जरी प्रत्येकाने स्वतःपुरता केला तर adolescence ही सिरीज प्रत्यक्षात न येता एक फिक्शन म्हणून उरेल.
— समाप्त —
लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई
प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी
संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
अथातो भक्तिं व्याख्यास्यामः
साधन चतुष्ट्य
भक्त म्हणजे भगवंतापासून जो विभक्त नाही तो. भक्त होण्यासाठी काय पात्रता लागते, तर असे अमुक अमुक सांगता येणं अवघड आहे. पण भक्ताने कसे असावे, किंवा आदर्श भक्त कसा असतो ते सांगता येईल….. ! उत्तम भक्ताची लक्षणे अनेक ग्रंथात आलेली आढळतील.
जेव्हा आपण भक्ति चा शास्त्र म्हणून अभ्यास करतो, तेव्हा त्याला काही सूत्रे जोडावी लागतात, पटतंय ना ?
त्यातील प्रमुख चार सूत्रे खालील प्रमाणे आहेत.
१. नित्यानित्यविवेक म्हणजे जगात नित्य म्हणजे शाश्वत काय आहे आणि अनित्य म्हणजे अशाश्वत काय आहे हे जाणणे.
२. नित्य आणि अनित्य जाणल्यानंतर त्यांचा यथासंभव त्याग करणे.
३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे.
४. मुमुक्षता
कोणत्याही शास्त्राची, विषयाची पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी किमान पात्रता असणे अनिवार्य ठरते. एखाद्याला वैद्यकीय पदवी घ्यायची असेल तर बारावीला नुसते उत्तीर्ण होऊन चालत नाही तर सर्वोत्तम गुण असावे लागतात. त्या अनुषंगाने भक्तिशास्त्र शिकण्यासाठी, भक्तीचा लाभ होण्यासाठी आंतरिक व्याकुळता खूप महत्वाची ठरते. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, त्याप्रमाणे मनात जोपर्यंत वासनेचा जोर आहे तो पर्यंत भक्तीचा उगम होणे कठीण आहे. परंतु मनुष्याचे सुकृत उदयास आले आणि त्याचवेळी सद्गुरूकृपा झाली तर मात्र भक्ति देवता त्याच्यावर कृपा करते असे सर्व संत सांगतात. याच सूत्रानुसार ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन चतुष्ट अत्यावश्यक सांगितले गेले आहे.
आपण एकेक मुद्दा पाहू.
१. नित्य आणि अनित्य :~ मी नसताना भगवंत होता, मी असताना भगवंत आहे आणि उद्या कदाचित मी नसेल तेव्हाही भगवंत असेल…, अर्थात तो नित्य आहे. तसेच मी अनित्य आहे, या नश्वर जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य अर्थात कधीतरी नष्ट होणारी आहे. माउली म्हणतात,
“उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥”
(ज्ञानेश्वरी २. १५९)
२. ईश्वर सर्व चराचरात भरून राहिला असल्याने तो माझ्यामध्ये ही आहे. त्याला ओळखणे म्हणजेच भगवंताची ओळख करून घेणे असल्याने, येथील अनित्य गोष्टीत न रमता त्यांचा त्याग करायला शिकणे.
३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे. हे सहा गुण आहेत. प्रत्येक साधकाने नव्हे तर प्रत्येक मनुष्याने त्याचा अंगिकार करायला हवा.
शम.
म्हणजे मनाचा निग्रह, अर्थात स्वतःच्या बाबतीत कठोर आणि दुसऱ्याच्या बाबतीत मृदु. सामान्य मनुष्य नेहमी याच्या उलट करीत असतो.
दम.
इंद्रियांचा निग्रह. एखाद्याने शुभ्र पांढरा कपडा परिधान केलेला असेल तर मनुष्य त्या कपड्याकडे न पाहता त्यावर कुठे एखादा डाग दिसतो का ते पाहतो… , त्याची नजर चांगल्या गोष्टींकडे न जाता, वाईट गोष्टीकडे जाते. इथे इंद्रियांचा निग्रह महत्त्वाचा ठरतो.
श्रद्धा
सद्गुरूंवर, त्यांच्या वचनावर दृढ श्रद्धा. आईने घास भरवायला तोंडाशी आणला की बाळ अगदी सहज तोंड उघडते, त्याची त्याच्या आईवर आत्यंतिक श्रद्धा असते. त्याच्या मनात असे कधीही येत नाही की आई या घासात मला विष घालेल…. ! अशी श्रद्धा असलेला कल्याण नावाचा शिष्य समर्थांनी कल्याणा, माझी छाटी… असे म्हटले की क्षणाचाही विलंब न करता थेट कड्यावरून उडी मारतो…
उपरम
सर्व कर्माचा त्याग करणे, अर्थात इथे मनाने त्याग अभिप्रेत आहे. कारण कर्म केल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही….
तितिक्षा
मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग येत जात असतात. सुख आले की मनुष्य खुश असतो पण दुःख येऊच नये असे त्याला वाटत असते. जो मनुष्य सुखदुःखात समतोल रहातो, तोच खरा अधिकारी ठरतो. त्याची कसलीच तक्रार नसते. “तू ठेवशील तसा राहीन….. !” इतकेच त्याला कळते…
समाधान
मनुष्य अनेक इच्छा मनात धरून असतो. कधी त्या पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात. समाधानी व्हायचे असेल तर पुढील सूत्र उपयोगी पडू शकेल.
इच्छा पूर्ण झाली तर देवाची कृपा समजावी आणि इच्छा अपूर्ण राहिली तर देवाची इच्छा समजावी. आपण आनंदात असावे.
४. मुमुक्षता
जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे हे प्रत्येक मानव देह प्राप्त केलेल्या जीवाचे आद्य कर्तव्य आहे. हे मनुष्याचे प्रमुख दीर्घकालीन ध्येय असले पाहिजे. त्यासाठी अन्य छोटी छोटी ध्येय जरूर असावीत, पण त्यामुळे आपल्या दीर्घ कालीन ध्येयाकडे डोळेझाक होऊ देऊ नये.
☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी☆
(हा रिव्ह्यू नाही)
(तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.) इथून पुढे —
आता ज्यांच्या घरात शक्यतो दुसऱ्यांबद्दल निदान उघड वाईट बोलायचे संस्कार नव्हते त्या घरातील मुले असे गॉसिपिंग करत असतील तिथे आजची परिस्थिती पहा.
इथे ट्रोलिंग च्या नावाखाली कोणालाही जे काही बोलतात, especially राजकीय नेते, त्यांचे कुटुंब, अभिनेते, अनंत अंबानीला सुद्धा.. काहीही संबंध नसताना. त्यांचाच जियो वापरून शिव्या देतात, रेवडी उडवतात…
अशा काळात आपली मुले मोठी होतायत, आपले निरीक्षण करत आहेत, ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या पुढे आपले स्थान कस्पटासमान आहे अशांना सुद्धा अर्वाच्च भाषेत बोलताना रोज पाहत आहेत आणि हेच बाळकडू पुढच्या पिढीला पोचत आहे असेही वाटले.
आपण उत्तम आईवडील आहोत असे समजणारे, कुणाचा पुरुषार्थ काढतात, कुणाला टरबूज म्हणतात, xxxxx, व्येश्या म्हणतात. त्या प्रतिक्रिया सहज, अगदी उत्स्फूर्त असतात. असे ट्रोल करणे आपल्याहून लहान मुले बघत असतात.
ते तरी आईबाबांना कुठे ट्रोल करतात, ते ही दुसऱ्यांना करतात.
ट्रोल करणे सहज असते, मजा असते, धमाल असते हे पाहताना, ट्रोल स्वतः झालो तरी ती मजा म्हणून घ्यायची एवढे मात्र ते शिकू शकत नाहीत. लहान असतात आणि त्यामुळे अपघात होतात. कुणाला मारले जाते, कुणी आत्महत्या करतात.. कुणी नैराश्यात जातात, व्यसनात जातात..
आता यावर काय उपाय आहे तर निदान आपण आपल्यापुरते सभ्य वागणे, ते शक्य नसेल तर हे जंगल आहे आणि त्या जंगलात वावरायला शिकले पाहिजे हे लहान मुलांना शिकवणे.
ह्यात अस्वस्थ होत असाल तर सगळ्यांनीच आरशासमोर उभं राहायची गरज आहे.
अपेक्षांचे ओझे आणि नकार या चक्रात अडकलेली आणि बहकलेली पिढी प्रत्येक काळात होती आणि बहकण्याचे मार्ग सुद्धा आधीच्या पिढीसाठी न समजणारे होते. आपले कुठे चुकले हे विचार करणारी पिढीही प्रत्येक काळात होती. कदाचित कुटुंब मोठे होते म्हणून असेल, एवढ्या मोठ्या कुटुंबात वाट चुकलेले एखादे मूल तसेच सामावले गेले. त्याचा फार गाजावाजा झाला नाही.
आता लहान कुटुंबात, यश आणि अपयश magnifying glass मधून बघण्याची सवय झाली आहे. साधे KG पास होणे टोप्या उडवून साजरे केलं जाते, तशाच चुका सुद्धा तेवढ्याच वाईट पद्धतीने मांडल्या जातात.
आपण यशस्वी आहोत हे सिद्ध करण्याचे फार कमी मार्ग माझ्या आधीच्या पिढीकडे होते.
शिक्षण, चांगली नोकरी, घर, जमले तर गाडी, बायकोच्या अंगावरील ठळक दागिने आणि स्वतःचा संसार करण्यास योग्य ठरलेली मुले.. बस.
हे झाले की बहुतांशी लोक समाधानात जगायची. निदान आयुष्याचा स्विकार असायचा. आता ह्या गोष्टी असायलाच हव्या, granted धरल्या जातात. अर्थात ह्या गोष्टी काही जन्माबरोबर येत नाहीत ना! त्यासाठी वेळ, मेहनत आणि “बांधिलकी” अपेक्षित असते.
प्रचंड स्पर्धा, मोठी महत्त्वाकांक्षा, मोठी स्वप्ने यामुळे मेहनत प्रचंड लागते, वेळ कमी पडतो, कुटुंबासाठी द्यायचा वेळ जो पूर्वी असायचा तो काढणे खरच कठीण झाला आहे. म्हणून असेल, “बांधिलकी outsource करण्याचे प्रमाण वाढले आहे. ”
साधेच बघा, पैसे मोजून आवडीने घेतलेल्या घरात. इंटेरियर करायला आर्किटेक्ट असतो, अनेकवेळा तुमच्या घरावर तुमच्या आवडीची खूण नसतेच…ट्रेंड जसा तसे घर असते. घरात घालवायचा वेळ सुद्धा अत्यंत कमी झाल्याने ते मेन्टेन करण्यासाठी सुद्धा नेमलेला स्टाफ असतो. आपल्या घराला कधीतरी प्रेमाने आपला स्पर्श होतो? त्यात सुट्टी पडली की एवढ्या लाडा कौतुकाने सजवलेले घर सोडून आपण out station जातो.
तक्रार नाही ही. हे घरा घरातील वास्तव आहे. घर तरी मानले तर व्यक्ती.. नाहीतर दगडाच्या भिंती.
मुलांची गोष्टच वेगळी असते. अगदी आवर्जून जन्माला घातलेले बाळ किती वर्ष बिलगुन असते!
स्पर्धेला प्राधान्य देणारे हे जग आहे. दोन वर्षापासून त्याला सगळ्या विषयात प्रवीण करायला शिक्षक असतात, सांभाळायला आया असतात.
त्याचे जीन्स पिढीजात आले असतील पण विचार, आचार, सवयी ह्या नक्की कोणाच्या असतात?
ऑफिस, करिअर आणि मिळाला वेळ तर सोशल लाईफ ह्यात मूल पालकांकडून काही उचलेल अशी संस्कार घडवणारी सोबत मिळते का मुलांना ?
मौज मजा, लाड आणि अभ्यास सोडून म्हणते आहे मी. संस्कार म्हणजे पालकांच्या वर्तनाचा मुलावर उमटणारा ठसा.
दैनंदिन आचरण, यात पालकांचे आईवडिलांशी, भावंडांशी असलेले संबंध, मित्रांबरोबर असताना वर्तन, घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर असलेले वागणे, पार्टनर बरोबर असलेला बंध, सोशल मीडियावर असलेले तुमचे वर्तन, ह्या सर्व गोष्टी मूल indirectly न्याहाळत असतात. ते बघून मूल आपोआप घडत जाते. आपण नाही का म्हणत, अरे हा बाबासारखा नम्र आहे, आईसारखा हुशार आहे, आजोबांसारखा लाघवी आहे..
केवळ पेशी व्यक्तिमत्व घडवू शकत नाहीत. उदा. हुशारी आनुवंशिक असेल पण मेहेनत करणे हे मुलानी शिकण्यासाठी समोर उदाहरण असावे लागते. मूल घडवण्याचा पाया त्याचे घर असते.
तो बंध जर निर्माण झाला नसेल तर अचानक काही वर्षांनी लक्षात येते की अरे हे एवढे वेगळे का वागते, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी निवडी, त्याची स्वप्ने, त्याची व्यसने.. ह्यात कुठेच आमचा प्रभाव का नाही ?
कारण ते पालकांबरोबर खऱ्या अर्थाने वाढतच नाही. एकाच घरी राहणे हे पुरेसे नसते त्यासाठी. मूल तुमचे उरतच नाही. उरतात ती त्यांनी केलेली कर्मे आणि ती निस्तारण्याची, कायद्यानं पालकांवर टाकलेली जबाबदारी.
ती आऊटसोर्स करता येत नाही. चुकून जर काही भलते झाले तर पालक म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर येतेच.
ती टाळू शकत नाही म्हणून पालक जास्त खचत जातात. आपण अयशस्वी आहोत हा अपमान जास्त त्रास देतो.
मुलं वाढवणे आणि एक चांगला नागरिक म्हणून त्याला समाजात वावरायला मदत करणे ही स्वतःहून स्विकारलेली गोष्ट असते. ती गृहित धरलेली कमिटमेंट असते. ती outsource पैशाने होऊ शकत नाही.
कितीही आदर्श वागायचा प्रयत्न केला म्हणून दगडातून मूर्ती घडतेच असे मला म्हणायचे नाही. काही केसेस आपल्या हाताच्या बाहेर असतात पण निदान वाट चुकलेल्या बोटीला आसरा मिळायला बंदर आहे एवढा विश्वास देण्याचा प्रयत्न मनापासून व्हायला हवा. गरज पडली तर त्याचे आयुष्य सावरण्यासाठी आयुष्याच्या स्वप्नाची सुद्धा तडजोड करण्याचा निर्धार हवा.
लहान मुलांचे जग छोटे असते त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी काय आहोत त्याही पेक्षा काय नाही आहोत ते त्यांना लगेच समजते. मूल एकदा घरापासून, मनातून तुटले की ती भेग सांधली जात नाही.
आईवडिलांचा अपमान करणे, त्यांना न भेटणे, त्यांच्याशी तुटक वागणे हे सौम्य प्रकार. मुलगा सुज्ञ असेल तर तो स्वतःचा विकास घडवून आईवडिलांवर बहिष्कार टाकतो, नसेल तर गरज असलेल्या सोबतीच्या शोधात मूल असे हरवले जाते.
Adolescence मध्ये हे वरकरणी दिसत नाही पण अशाही केसेस दिसतात. कुणाबरोबर पळून जाणे, ड्रग्स, व्यसने …आजूबाजूला माणसे असूनही मनात भरून उरलेला एकाकीपणा हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे.
पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.
– क्रमशः भाग दुसरा
लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई
प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी
संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
आधी याविषयी काही..….
महर्षी नारद… यांना देवर्षी नारद असेही संबोधले जाते. उत्तम भक्त, तसेच ऋषी वाल्मिकी, महर्षी व्यास, भक्त प्रल्हाद आदि महान ऋषींचे, भक्तांचे गुरू असलेले नारद आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचा विशेष गुणांमुळे ते कळीचे नारद म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची #कळ# ही कळकळींची (जनहितार्थ) होती असे आपल्या लक्षात येईल. त्यांचा #कळी# मुळे कोणाचाही बळी न जाता सर्वसामान्य मनुष्याला जगण्याचे बळ मिळत असे….. !
त्यांनी भक्तीमार्गाचे अनुसरण करून भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि अनेकांना भक्तिमार्गात आणले. “आपल्यासारखे करिती तात्काळ” असे संतांचे वर्णन केले जाते. नारदांसाठी हे वर्णन तंतोतंत लागू होते. पण त्यांची भक्ती सूत्रे सोडली तर महर्षी नारदांचे अन्य साहित्य उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत तरी नाही. त्यामुळे “ नारद भक्तिसूत्रे “ हीच त्यांची खरी ओळख आहे असे म्हणावेसे वाटते.
संत एकनाथ महाराज देवर्षी नारदांचा गौरव पुढील प्रमाणे करतात.
“धन्य धन्य तो नारदु, । ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदु ।
सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदू सदोदित ॥
जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।
ज्याचेनि संगे तत्त्वतां | नित्यमुक्ततां जडजीवा ॥
– (संदर्भ: एकनाथी भागवत २-३७, ३८)
भक्ति हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. शास्त्र म्हटले की त्याचे नियम असणे स्वाभाविकच आहे. महर्षी नारद आपल्याला या ८४ श्लोकांमध्ये भक्तीचे समर्पक दर्शन घडवतात… या लेखमालेच्या माध्यमातून आपण त्यातील काही प्रमुख सूत्रं पाहणार आहोत. भक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भक्त, भगवंत आणि भगवंताला प्राप्त करून घेण्याचे साधन समजून घ्यायचे आहे. त्याआधी नारदमुनीचे संक्षिप्त चरित्र आपण पाहू.
भागवत प्रथम स्कंध अध्याय पाचमध्ये स्वतः नारदांनी आपले चरित्र व्यासांना सांगितले आहे. नारद म्हणतात, “ हे महामुने ! मी पूर्वकाली एक दासीपुत्र होतो. एक वेळी वर्षाऋतूत चातुर्मासाच्या निमित्ताने आमच्या गावी बरेच योगी संतमहात्मे आले. त्यावेळी मी लहान बालक होतो. माझ्या मातेने मला त्या महापुरुषांच्या सेवेकडे सोपवून दिले. मी जरी लहान होतो तरी मी जितेंद्रिय होतो. त्या महात्म्यांपुढे मी मुळीच खोडकरपणा करीत नव्हतो. शांतीने, संयमाने मी त्यांच्याजवळ बसून राही व ते सांगतील ते काम करीत असे. यामुळे ते समदृष्टी होते तरी माझेवर विशेष प्रसन्न राहात होते, व कृपा करीत होते. त्या मुनींच्या आज्ञेने मी त्यांच्या पात्रातील उच्छिष्ट खात असे. त्या प्रभावाने माझे सर्व किल्मिष दूर झाले. असे करीत असता काही काळाने माझे चित्त शुद्ध झाले. ज्यामुळे त्यांनी कथन केलेल्या भागवत धर्मात मला गोडी निर्माण झाली. ते लोक नित्य श्रीकृष्णकथा गात होते व मी त्या संतांच्या अनुग्रहाने त्या मनोहर कथांचे श्रद्धेने श्रवण करीत होतो. यामुळे भगवंताचे ठिकाणी माझी बुद्धी जडली. “
सांगणारा कोण आहे यावर त्या सांगण्याचे मूल्य ठरत असते. इथे भक्तिशास्त्र सांगणारे देवर्षी नारद आहेत, त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण श्रद्धेने या सूत्रांकडे पाहाल असा मला विश्वास आहे.
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचें। परंतु येथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।
– समर्थ रामदास (दासबोध 20. 04. 26)
*****
सूत्र क्रमांक ०१ / १
अथातो भक्तिं व्याख्यास्यामः
अर्थ : अथ (आता) अत: (यापुढे) भक्ति (भक्तीचे) व्याख्यास्यामः (आम्ही व्याख्या करीत आहोत)
विवरण:
आपण भक्ति सूत्रे अभ्यासणार आहोत, अर्थात भक्ति शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. शास्त्राचा अभ्यास करताना काही गृहितके पाळणे गरजेचे ठरते, त्यामुळे विषय समजायला मदत होऊ शकते.
१. मी आहे.
२. जगत् आहे
३. ईश्वर आहे
४. माझा व जगाचा संबंध आहे.
५. ईश्वराचा जगाशी संबंध आहे.
६. ईश्वराचा माझ्याशीही संबंध आहे.
७. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, तर मी अल्पशक्ती आहे.
८. ईश्वर ज्ञानी आहे तर मी अज्ञानी आहे.
९. ईश्वर सर्वशक्तिमान आहे तर मी अल्पकर्ता आहे.
१०. ईश्वराचा असलेला संबंध माझ्या बाजूने जिवंत ठेवण्यासाठी ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा झाली पाहिजे.
अथ म्हणजे आता… !
#आता# या शब्दात आधी काही तरी घडले आहे, काहीतरी कृती केली आहे असे भासते. आता या शब्दाचे अर्थ आपण अनेक प्रकारे लावू शकतो. “मागण्याचा अधिकार प्राप्त झाल्यावर”, “आता तू इतके कर* या अर्थाने, असे अनेक अर्थ काढता येतील, फक्त ते समष्टीच्या अर्थाने घ्यायला हवेत. पुढे अत: हा शब्द आहे. त्याचा अर्थ या पुढे असा आहे.
श्रीसमर्थांनी दासबोधात या नऊ भक्तींचे अत्यंत मार्मिकपणे वर्णन केलेले आढळते. भक्तिमार्गातील या नऊ वाटा आहेत असे म्हणता येईल. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कोणतीही वाट शेवटी चंद्रभागेला जाऊन मिळते. तसे या मार्गांपैकी कोणत्याही वाटेने गेले तरी भगवंतांच्या चरणाशी पोहोचणार यात बिल्कुल संदेह नसावा.
भक्तीचे नऊ प्रकार सांगण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. भक्तीच्या या प्रत्येक प्रकारामध्ये श्रेष्ठ भक्तही होऊन गेले आहेत. श्रवण-परीक्षित, कीर्तन-शुकाचार्य, स्मरण-प्रल्हाद, पादसेवन-लक्ष्मी, अर्चन-पृथू राजा, वंदन-अक्रूर, दास्य-हनुमान, सख्य-अर्जुन, आत्मनिवेदन-बली असे ते श्रेष्ठ भक्त होऊन गेले. या नऊ प्रकारांना नवविधा भक्ती म्हणतात. पहिले तीन प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास सहाय्यक ठरतात. पुढचे तीन हे भगवंताच्या सगुण रुपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे. भगवंताच्या यश, गुण, महात्म्य इत्यादी गोष्टी सश्रद्ध मनाने ऐकणे ही श्रवणभक्ती होय. श्रवणानंतर स्मरण आणि कीर्तन संभवते. कीर्तनात नृत्य, गीत व वाद्य या तिहींचाही समावेश होतो. संगीताच्या साथीवर होणाऱ्या कीर्तनात जे वातावरण निर्माण होते, त्यात भावविवशता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते. बरेचसे भक्ती साहित्य गेय पदांच्या रुपानेच निर्माण झाले आहे. यात मग्न राहणे म्हणजेच स्मरणभक्ती होय. पादसेवन भक्ती ही मूर्तिपूजा, गुरुपूजा, भगवत् भक्तांची पूजा यास्वरुपात होऊ शकते. श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चनभक्ती म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की, मूर्ती, सद्गुरू आणि भक्त यांच्या ठिकाणी भगवान वास करतो. भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्याचे अंतरात ध्यान करीत, त्याची स्तुती करणे याला वंदनभक्ती म्हणतात. श्रीहरी हाच माझा मायबाप आहे, प्रभू सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, अशा भावनेने भक्ती करणे हिला दास्यभक्ती म्हणतात. परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा भावनेने भक्ती करणे, याला सख्यभक्ती म्हणतात. आत्मनिवेदन ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. यामध्ये सर्वस्वी शरण जाणे होय. आपला सर्व भार प्रभूवर टाकणे, याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते, की तेथून त्याला सर्व विश्व ईश्वरमय दिसू लागते.
ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्टेचा अनुराग म्हणजे भक्ती अशी भक्तीची सुलभ व्याख्या करता येईल.
भगवंताच्या ठिकाणी अत्यंत अनुरक्ती ठेवणे आणि त्या अवस्थेत आनंदानुभव घेणे, ही भक्तीची साध्यविषयक बाजू आहे. भक्ती केल्याने मनुष्याचे मन आनंदी राहते, शांत राहते आणि असे अनेक लौकिक आणि अलौकिक लाभ होत असतात. सात्विक, राजस आणि तामस असे भक्तीचे तीन भेदही सांगण्यात आले आहेत. ‘सगुण भक्ती’ आणि ‘निर्गुण भक्ती’ असेही भक्तीचे मार्ग आहेत.
सध्या समाज खूप बदलला आहे. प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे. समाजात असुरक्षितता वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येकाला कमी श्रमात मोठे यश मिळवावेसे वाटतं आहे. महागाई वाढत आहे. पैसा हेच सर्वस्व असल्याचे वाटू लागले आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनू पाहत आहे. अशा परिस्थितीत माणसाचा स्वत:च्या कर्तृत्वावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. शरीरसुखाच्या भौतिक साधनांत वाढ होत आहे. नवनवीन संशोधनामुळे निर्माण होणाऱ्या औषधांमुळे आयुर्मयादा वाढली आहे. असे असले तरी या विज्ञानयुगातही बरीच माणसे भगवंतांकडे /भक्तिमार्गाकडे झुकू लागली आहेत, स्वतःला समजेल तशी ईश्वरभक्ती करू लागली आहेत हे एक चांगले लक्षण आहे. परंतु मनुष्य करीत असलेली भक्ति ही शुद्ध असावी, यासाठी भक्तीमार्गांचा वस्तुनिष्ठ अभ्यास असणे अत्यावश्यक आहे. ‘भक्ती’ म्हणजे नेमके काय ?
भक्तीची एक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल….
‘दुसऱ्यावर अकारण, निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे भक्ति.’
(सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक १७५३, धार्मिक प्रकाशन संस्था)
मनात, अर्थात मनाच्या प्रत्येक भावात जर भगवंत सामावला गेला तर भगवंत दूर नाही असे सर्व संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत.
भक्ति सूत्रे अभ्यासण्यासाठी काहीतरी पात्रता असणे गरजेचे ठरते. (अर्थात कोणतेही शास्त्र/शस्त्र शिकण्यासाठी किमान अर्हता अपेक्षित असतेच)
इथे तर भक्ति शास्त्र शिकून मनुष्याला, साधकाला भगवतांची प्राप्ति करून घ्यायची आहे. त्यामुळे साधकाने साधन, आपण त्यास उपासना म्हणू शकतो, त्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. त्यास साधन चातुष्ट्य असे म्हटले जाते. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.
☆ “नोंदी…” भाग – १ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी☆
(हा रिव्ह्यू नाही)
वीस एक वर्ष झाली असतील.
तेव्हा माझी मैत्रीण एका एनजीओ साठी काम करत होती. प्रोजेक्टच्या अनुषंगाने रिमांड होम मधील मुलांना समुपदेशन हा तिच्या कामाचा भाग होता. माझ्या घराच्या जवळ ही शाळा असल्याने आठवड्यातून एक दिवस मुलांना गणित शिकवायला येशील का असे तिने विचारले. यातली तीन मुले अतिशय हुशार होती आणि स्कॉलरशिप परीक्षेला त्यांना बसवायचे ठरवले होते.
अर्थात हा सुद्धा एक प्रयोग होता. आठवड्यातून एकदाच असल्याने मी हो म्हटले.
मुलांशी बोलणे हा माझ्या कामाचा विषय नव्हता. त्यांना गणितातील काही विषय शिकवणे आणि पेपर सोडवून घेणे इथपर्यंत माझी सीमा होती.
इथल्या मुलांवर चोरीपासून खुनापर्यंत आरोप होते. बहुतेक मुलं अतिशय निम्नस्तरीय वर्गातून आलेली असल्याने घरातून प्रेम, संरक्षण हा मुद्दा गृहीत धरण्यासारखा नव्हता. अनेकजण त्यामुळे निर्ढावलेले असतात.
यातल्या एका मुलाने आपल्या वडिलांचे लिंग कापले होते. त्यांच्या रखेलीला (मला याच शब्दात त्याचा अपराध सांगितला होता) भाजून मारायचा प्रयत्न केला होता. आईला सतत मारहाण बघून आधीच डोके सरकलेले आणि त्यात एक दिवशी वडील या बाईला घरीच घेऊन आले म्हंटल्यावर त्याचा संयम संपला.
तेरा/ चौदा वर्षाचा होता तो. बऱ्यापैकी शार्प होता. समज होती आणि शिकण्याची आवड होती.
“त्याने जे काही केलेआणि का केले ते पाहता त्या बाबतीत वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण ते तुझ्या वागण्यातून दिसता कामा नये. दोन गोष्टी आहेत. एक त्याचा चुकीचा भूतकाळ आणि एक त्याचा बरोबर होऊ शकेल असा भविष्यकाळ.
त्याने का केलं हे कितीही दुःखदायक असेल तरी ते चुकीचेच आहे आणि सहानुभूतीने तू त्याला वागवायला जाशील तर आपण केलं ते बरोबरच असे त्याच्या मनात राहील. हे नको व्हायला. आपण केलं ते चूक हे त्याला पटलच पाहिजे तर तो यातून काहीतरी शिकेल. महत्त्वाचे आहे ते मनावर संयम ठेवून, आपला भविष्यकाळ घडवणे. दुसऱ्यांना शिक्षा देणे, हा जगण्याचा हेतू नसावा. ”
ह्या सूचना मिळाल्याने असेल, आमचे संबंध शिक्षक आणि विद्यार्थी एवढेच मर्यादित असूनही, त्या मर्यादेत चांगले राहिले. त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही पण बाहत्तर टक्के मिळून तो पास झाला. नंतर माझा संपर्क तुटला.
त्या मुलाची परिस्थिती आणि त्याचा सामाजिक वर्ग वेगळा होता तरीही “Adolescence” सिरीज बद्दल होणाऱ्या चर्चा आणि प्रतिक्रिया यामुळे हा मुलगा आठवला.
Adolescence सिरीज पाहिली. मुलगा आणि त्याच्याच वयाच्या काही मुलांबरोबर बसून पाहिली. सिरीज खूप आवडली. अभिनय उत्तम आणि जिथे पालक आणि मूल यात अंतर पडत जाणे हे अपरिहार्य होत जाणार आहे अशा काळात प्रत्येक पालकांनी पहावी.
पाहताना भीती वाटली, अस्वस्थ वाटले तर नाही…
हे प्रत्येक काळात घडत असते. मुलांचा अपमान करणे, चिडवणे, वाळीत टाकणं आणि त्या अनुषंगाने होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक काळात तेवढेच वाईट असतात. मजा म्हणजे त्यांचे जे वर्तन असते ते आधीच्या पिढीसाठी आक्षेपार्ह, धक्काजनक असेच असते.
मुलगा तिशी ओलांडून गेला असल्याने, त्याला यातले काही शब्द माहिती आहेत, काही नाही पण त्याच्या काळात, ऑर्कुट हा प्लॅटफॉर्म होता. ओळखीची, अनोळखी सुद्धा मुले असायची आणि तेव्हा सुद्धा एक कोड language होती.
पुरुषार्थ काय याच्या चाचण्या होत्या, मुलींचे boobs कमी असतील तर मुलींना complex असायचा.. त्यावरून नावे ठेवली जायची आणि त्त्या वयात ते vicious असायचे/ वाटायचे.
मुलगा पाचवीत मी त्याची शाळा बदलली होती. नवीन शाळा, नवीन मुलं, त्यात हा स्कॉलरशिप मिळून गेलेला, शिवाय उत्तम तबला वाजवायचा, गायचा. दिसायला सुद्धा गोड. पटकन मित्र झाले.. आता हे खटकणारी मुले सुद्धा असतात. एक मुलगा त्याला सारखा कडकू, पडवळ.. आणि असलच काही, चिडवायचा. नेहेमी हसत जाणारा मुलगा गप्प गप्प असतो हे लक्षात लगेच आले पण हा काही सांगेना.
आता शाळेत जायचेच म्हणून मी ठरवले त्याच्याच आदल्या दिवशी घरी आला तर तोंड लाल, पायावर वळ.. रडून लाल झालेलं डोळे..
“अरे, काय झाले?” तर सांगेना.
शेवटी मित्राला फोन करते तर म्हणाला, “मी मारले त्याला. मला सारखा चिडवत होता म्हणून मी मारले. “
आता हा बेदम मार खाऊन आलाय ते कळत होते पण त्याचाही सेल्फ रिस्पेक्ट रहावा म्हणून म्हटले, “अरे, लागले नाही ना त्याला ? “
“He is thick skinned. He is hippo.. तुला त्याचीच दया.. वाईट आहेस.. (मुसमुसणे)
त्याला काय लागणार. मी उद्या कंपास घेऊन हातात घुसवणार त्याच्या. (आता डोळे लाल आणि चमकायला लागले)
पोटात धस झाले..
त्याला ओरडून उपयोग नव्हता. आई म्हणजे आधार असे त्या वयात वाटते त्याला तडा जायला नको म्हणून त्या मित्राच्या आईला फोन करून, मारामारी झाली त्याबद्दल विचारले. सॉरी म्हटले. त्या मुलाने आपले वर्जन दिलेले.. सुदैवाने ती सुद्धा मुलाला ओळखणारी आई होती.
दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. दोघांना एकत्र बसून समजावले. माझ्या मुलाने वर्गातल्या वीस मुलांना वाढदिवसाला घरी बोलावून त्याला वगळले याचा राग होता, तो तुला मी आता बोलावेन पुढच्या वर्षी म्हणून काढून टाकला.
आता ही सिरीज पाहिल्यावर वाटले, एक पोटेन्शियल खून किंवा डोळे बिळे फुटणे टळले.
ही चेष्टा नाही.. it could have gone either way… खून वगैरे नाही पण काहीतरी भलत्या जागी लागणे सुद्धा ओरखडा उमटवून गेले असते. दोघांच्या आई सजग होत्या असे म्हणेन मी.
सिरीज मधले आईवडील सुद्धा अतिशय चांगले होते मग असे का घडले..
मुळात माझ्या मुलाला सुद्धा एकदम कंपास का आठवला.. आम्ही दोघेही हिंसक नाही..
तर मी आता डॉ स्वाती केळकर यांनी लिहिलेले “द ब्रेन” वाचते आहे. त्यात असे म्हटले आहे, मानवी मेंदू अनुभवांनी, परिस्थितीने बदलतो. तो अनुभव ग्रहण करतो आणि त्यानुसार स्वतःला adapt करतो.. आई वडील, शेजारचा भवताल, शाळेतील मित्र, बघितलेले सिनेमा, नाटक, कार्टून सगळ्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो आणि आताच्या जगात ही गोष्ट टाळता येत नाही. फार तर मी असे म्हणू शकते, मुलात घडलेला बदल टिपण्याची नजर, वेळ आणि जाणीव माझ्यात होती.
मुलगा तरी आताचा. माझ्या वेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी एक जाड्या मुलाला आम्ही आमच्या भाषेत पी स्क्वेअर म्हणायचो. पर्मनंट प्रेग्नंट.
ए, पी स्क्वेअर आला बघ. बिचारा चुपचाप जायचो.. बरे त्याची गरज नव्हती पण मजा. एक मुलगी खूपच उफाड्याची होती. ती ताठ उभी राहिली ना आम्हा किरकोळ मुलींना ते कायतरीच वाटायचे. त्या वरून असल्या वाह्यात कोट्या केल्या होत्या कधीतरी. आता हे आठवले आणि मलाच काटा आला अंगावर. अत्यंत अभ्यासू आणि शांत म्हणून ओळखायचे पण तुमच्या ग्रुप मध्ये अशा आगावू गोष्टी होतात.
तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई
प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी
संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जिथे जाहला तुझा जीवनान्त!”☆ श्री संभाजी बबन गायके☆
…. शत्रूच्या मातीत चिरनिद्रा घेत असलेला वायूवीर!
पाकिस्तानातल्या पिंडी भटीया तहसीलमधल्या कोट नाका नावाच्या कोणत्या एका गावातल्या कोण्या एका शेतात आपला एक वीर वायुवीर चिरनिद्रा घेत पहुडला आहे… त्याचा देह मातीच्या स्वाधीन झाला ती जागाही आता विस्मृतीत गेली आहे.. पण त्याच्या स्मृती गेल्या काही वर्षांत पुन्हा स्मरणाच्या पटलावर आल्या! हा वीर मातीच्या कुशीत विसावला त्या घटनेला आज सुमारे साडे एकोणसाठ वर्षे होत आहेत. पण भारताला त्याचे बलिदान समजायला दुर्दैवाने खूप कालावधी लागला… ७ सप्टेंबर, १९६५ रोजी वायूवीर अज्जामदा बोपय्या देवय्या (Squadron Leader A B ‘Tubby’ Devayya) हे जग सोडून गेले.. हे आपल्याला कळायला १९८५ वर्ष उजाडले.. म्हणजे सुमारे वीस वर्षे! तोवर युद्धात बेपत्ता झालेले पायलट एवढीच त्यांची ओळख होती!
१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. इथपर्यंत विमानांचा युद्धातला सहभाग तसा कमी होता, असे म्हणता येईल. पण पुढे पाकिस्तानला अमेरिकची अत्याधुनिक लढाऊ विमाने लाभली आणि त्यांची उड्डाणे वाढली… इतकी की त्यांनी ६ सप्टेंबर, १९६५ रोजी भारतीय वायूसेना तळांवर बेफाम हल्ला चढवला. आधी हल्ला न करण्याचे भारताचे धोरण त्यांनी त्यांच्या लाभासाठी अशाप्रकारे वापरून घेतले. याचा करारा जबाब देणे भारतीय वायूसेनेसाठी अनिवार्य होते. भारताकडे फ्रांसमध्ये बनलेली Dassault Mystere नावाची अमेरिकेच्या विमानांच्या अर्थात supersonic F-104 Star-Fightersच्या तुलनेत कमी ताकदीची लढाऊ विमाने होती. आपल्या विमानांच्या कमाल वेगात आणि त्यांच्या विमानांच्या कमाल वेगात १००० कि. मी. प्रतितास इतके मोठे अंतर होते. पण शस्त्रापेक्षा ते शस्त्र धारण करणारे मनगट बलशाली असावे लागते… आणि भारतीय सैन्य यासाठी तर जगभरात प्रसिद्ध आहे! ठरले… दुस-याच दिवशी पाकिस्तानी विमानतळावर मोठा हल्ला करण्याची योजना आखली गेली. Group Captain Om Prakash Taneja (Veer Chakra) यांच्या नेतृत्वात आपली 12 विमाने पहाटेच्या काळोखात पाकिस्तानात अगदी त्या देशाच्या मध्यभागी (आणि त्यामुळे भारतीय सीमेपासून खूपच दूर) असलेल्या सरगोधा विमानतळाकडे झेपावली. इथपर्यंत पोहोचायचे, हल्ला करायचा आणि सुरक्षित परत यायचे यात खूप इंधन खर्च होणार होते. Dassault Mystere विमानांची इंधनसाठवण क्षमता तशी जेमतेमच होती. थोडा वेळ जरी अधिक पाकिस्तानी सीमेत राहिले तर भारतात परतणे अशक्य होणार होते… कारण पाकिस्तानी वायुसेना तोपर्यंत जागी होणार होती… पण धोका पत्करणे आवश्यक होते… कारण त्याशिवाय युद्धात काही हाती लागत नाही!
ठरल्यानुसार बारा विमाने सज्ज झाली.. पहाटेच्या अंधारात ५. २८ मिनिटांनी विमाने झेपावणार होती…. सुमारे पावणेपाचशे किलोमीटर्सचे अंतर कापायचे होते. ठरवलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एकच संधी मिळणार होती. योजनेचा एक भाग म्हणून या 12 विमानांच्या जोडीला दोन आणखी विमाने राखीव म्हणून ठेवण्यात आली होती…. आणि नेमक्या या दोन पैकी एकाचे वैमानिक होते…. युद्धाची प्रचंड जिगीषा असलेले आपले देवय्या साहेब! त्यांना हे राखीवपण चांगलेच डाचत असावे. हे मूळचे वैमानिक विद्या शिकवणारे शिक्षक. पण ऐन युद्धाच्या धामधुमीत एक कुशल वैमानिक हाताशी असावा म्हणून त्यांना ऐनवेळी बोलावून घेतले गेले होते.
अंधार होताच. त्यात धुके पसरले. आधीच्या दिवशी झालेल्या हवाई हल्ल्याने धावपट्टी तशी चांगल्या स्थितीत नव्हती. आपली विमाने दिवसाउजेडी उडण्याच्या क्षमतेची होती… रात्री अंधारात त्यांना उड्डाण करणे म्हणजे अंधा-या विहिरीत उडी घेण्यासारखे होते. चार चारच्या गटांनी उड्डाणे करण्याची योजना होती. मोहिमेच्या गुप्ततेसाठी काही वेळ एकमेकांशी रेडीओ संपर्क न ठेवण्याचे ठरले होते… पहिला गट व्यवस्थित हवाई मार्गस्थ झाला. दुसरा गटही बहुधा त्याच मार्गावर असावा. पण काहीतरी गडबड झाली म्हणा किंवा अन्य काही.. पण देवय्या साहेबांनी आपले विमान चक्क या दुस-या तुकडीच्या पुढे काढले… आणि जवळजवळ दुस-या विमानाला धडकले असते अशा अंतरावरून ते आभाळात झेपावले…. शत्रूला नेस्तनाबूत करायला! तोपर्यंत पहिली तुकडी लक्ष्यावर पोहोचली होती. त्यांनी अचूक हल्ला केला आणि पाकिस्तानची धांदल उडाली. इतक्या लांब भारतीय विमाने पोहोचणार नाही, या त्यांच्या समजुतीला हा मोठा धक्का होता. दुस-या तुकडीला तनेजा साहेबांनी लक्ष्य सांगितले… पण अंधारच इतका होता की त्यांना ते लक्ष्य दिसलेच नाही…. पाकिस्तानची बरीच अमेरिकन विमाने यामुळे बचावली. पण आपल्या या दुस-या तुकडीने मग लक्ष्य बदलले आणि तुफान हल्ला चढवला… आणि त्यांचे भरपूर नुकसान करीत आपली विमाने भारतीय हद्दीकडे माघारी वळाली… पण या तुकडीच्या मागे असलेले देवय्या साहेब आता येताना सर्वांत मागे राहिले… तोवर पाकिस्तानचे एक supersonic F-104 Star-Fighter आपल्या विमानांच्या पाठलागावर निघाले होते. देवय्या साहेबांकडे जेमतेम परत येण्याएवढे इंधन शिल्लक होते. त्यांना माघारी येणे शक्य असतानाही ते या पाकिस्तानी विमानाला सामोरे गेले… अन्यथा पाकिस्तानी विमानाने आपल्या माघारी फिरणा-या विमानांचा जीवघेणा पाठलाग केला असता आणि आपले भरपूर नुकसान झाले असते… कारण पाकिस्तानी विमान आपल्यापेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक हत्यारांनी सज्ज होते…. त्याचा वैमानिक होता.. फ्लाईट लेफ्टनंट अहमद हुसैन… त्यांचा उत्तम पायलट…. त्याने पाहिले की एक साधारण विमान आपल्या रोखाने येते आहे… त्याने देवय्या यांच्या विमानावर त्याचे अग्निअस्त्र डागले…. उष्णतेचा मागोवा घेत विमानाचा पाठलाग करीत त्याला उध्वस्त करणारे ते अस्त्र… ते कधीच अपयशी ठरले नव्हते तो पर्यंत… त्यामुळे हुसेन निश्चिंत होता… त्याला वाटले की हे विमान पाडले की भारतीय हद्दीकडे जाणा-या विमानांचा फडशा पाडू! पण देवय्या साहेबांचे इरादे हिमालयाएवढे उंच. त्यांनी अशी काही शक्कल लढवली की ते अग्निअस्त्र ब भरकटले…. भारतीय वैमानिकाच्या कौशल्यापुढे अमेरिकन तंत्रज्ञान उघडे पडले होते….. पुढे वेगाने येत हुसेन ने देवय्या साहेबांच्या विमानावर जोरदार गोळीबार केला… विमान जोरात हादरले… पण तरीही देवय्या साहेबांनी विमानावर ताबा मिळवला… त्यांचे उड्डाण कौशल्य अतिशय उच्च दर्जाचे होते… जो अभ्यासक्रम हुसेन शिकला असेल त्या अभ्यासक्रमाचे देवय्या साहेब म्हणजे जणू हेडमास्तरच होते! ते अजिबात डगमगले नाहीत… पाकिस्तानच्या आकाशात आता एक प्रचंड उत्कंठावर्धक हवाई युद्ध आरंभले गेले होते… खरं तर पाकिस्तानी विमान क्षणार्धात जिंकायला हवे होते… पण देवय्या साहेब त्याला भारी पडले. हुसेनने सात हजार फुटांची उंची गाठली… देवय्या साहेबांनी तोही धोका पत्करला आणि ते सुद्धा तेवढ्याच उंचीवर जाण्याच्या प्रयत्नात राहिले… हुसेन वेगाने त्यांच्या रोखाने आला… साहेबांनी अलगद हुलकावणी दिली… एखादे रानडुक्कर कसे थांबता न आल्याने पुढे धावत राहते… तशी हुसेनची गत झाली…. त्यांनी हुसेन याला आभाळभर फिरव फिरव फिरवले… एका बेसावध क्षणी हुसेनला गाठून त्याच्या विमानावर होत्या तेवढ्या शस्त्रांनी हल्ला चढवला… आता देवय्या माघारी जाण्याच्या स्थितीत अजिबात नव्हते… आणि त्यांना माघारी जायचेही नव्हते! पण एका क्षणी या दोन्हे विमानांची आभाळातच धडक झाली…. दोघेही वेगाने जमिनीकडे कोसळू लागले…. हुसेनच्या विमानात उत्तम दर्जाची बाहेर पडण्याची यंत्रणा होती… तो यशस्वीरीत्या विमानातून eject झाला… आणि जमिनीवर सुखारूप उतरला…. देवय्या साहेब मात्र याबाबत कमनशीबी ठरले… त्यांनीही विमानातून बाहेर उडी ठोकली होती… पण.. त्यांचा देह विमानापासून काही अंतरावर सापडला…. पण ते फारसे जखमी झालेले नव्हते! पण त्यांचे प्राण भारतमातेच्या संरक्षणार्थ खर्ची पडले होते.. आणि त्याचा त्यांना अभिमान होता. आपली पत्नी आणि दोन मुली यांना ते कायमचे पोरके करून त्यांच्या आत्म्याने परलोकी उड्डाण केले होते.
वायुसेनेच्या भाषेत दोन लढाऊ विमानांच्या अशा प्रकारच्या संघर्षाला Dog Fight अशी संज्ञा आहे… पाकिस्तानी पायलटचे माहीत नाही… मात्र लढणारा आपला वैमानिक वाघ होता… वाघासारखा लढला आणि धारातीर्थी पडला!
सरगोधा मोहिमेवर गेलेली सर्व विमाने सुखरूप भारतीय हद्दीत परतली… पण देवय्या साहेबांविषयी तनेजा साहेबांना ते त्यांच्या विमानातून खाली उतरल्यावरच समजले! देवय्या साहेबांची काहीच खबर मिळाली नाही… कालांतराने त्यांना युद्धात बेपत्ता झालेले सैनिक असा दर्जा दिला गेला. साहेबांच्या पत्नी श्रीमती सुंदरी देवय्या आणि कन्या स्मिता आणि प्रीता यांचा पुढे प्रचंड मोठा झालेला प्रतीक्षा कालावधी सुरु झाला… त्यांना सुमारे तेरा वर्षांनी देवय्या साहेबांची खबर समजणार होती…. ते हयात नाहीत ही ती खबर!
भारत पाक युद्ध थांबले. पाकिस्तानचा पराभव झाला होता… पण ते उताणे पडले तर नाक वरच आहे असे म्हणत राहतात नेहमी. त्यांनी त्यांच्या वायुदलाच्या तथाकथित पराक्रमाबाबत लेखन करण्यासाठी एक इंग्रजी माणूस नेमला…. John Fricker त्याचे नाव. त्याने Battle for Pakistan: The Air War of 1965 ही एक प्रकारची बखरच लिहिली… त्यात अर्थात पाकिस्तानची स्तुती पानोपानी होती. पण कसे कोणास ठाऊक त्याने देवय्य्या साहेब आणि हुसेनच्या लढाईचा उल्लेख केला… देवय्या साहेबांचे नाव तोपर्यंत त्यालाही ठाऊक नव्हते… जिथे देवय्या साहेब धारातीर्थी पडले होते.. त्याच शेतात त्यांना तिथल्या लोकांनी दफन केले होते. ही बाब पाकिस्तान सैन्याने खरे तर भारताला कळवायला हवी होती! असो.
तर हे पाकिस्तान धार्जिणे पुस्तक कालांतराने म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी भारतात पोहोचले… आणि त्यातील मजकूर तनेजा साहेबांच्या नजरेस पडला…. आणि सुरु झाला एक शोध…. एका हुतात्मा वायूवीराचा शोध. त्याला न्याय देण्यासाठीचा संघर्ष… कारण सरगोधा मोहिमेत भाग घेतलेल्या सर्व वैमानिकांना पदके मिळाली होती… पण आपला कथानायक पाकिस्तानातल्या मातीत हरवून गेला होता… आपण जणू त्यांना विसरलो होतो! पण दैवयोगाने तपासाची चक्रे फिरत राहिली… तेवीस वर्षे… आणि १९८८ मध्ये Squadron Leader Ajjamada Boppayya Devayya No. 1 Squadron IAF यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय वायूसेनेतल्या लढाऊ वैमानिकास प्रदान केले गेलेले हे आजपर्यंतचे एकमेव महावीर चक्र ठरले आहे. देवय्या साहेबांच्या पत्नी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन्ही मुलींना वाढवले… साहेब कधी न कधी तरी परत येईल या आशेवर त्यांनी दिवस काढले… त्यांच्या पराक्रमाची योग्य कदर केली गेल्यानंतरच त्यांच्या कष्टी काळजाला थोडा दिलासा लाभला. त्या आता नव्वद वर्षांच्या आहेत. देवय्या साहेबांना दफन केलेली जागा स्वत: हुसेन यांनीच शोधून काढली असे बोलले जाते. परंतु आता ती नेमकी जागा विस्मरणात गेली आहे… खरे तर देवय्या साहेबांचे अवशेष भारतात परत आणण्याचे प्रयत्न व्हायला हवे होती… पण अनाम वीरांच्या नशिबी …
‘स्तंभ तिथे न कुणी बांधला… पेटली न वात! ‘ अशी स्थिती असते.
धगधगता समराच्या ज्वाला.. या देशाकाशी…
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी…
– – हे शब्द किती खरे ठरतात ना?
देवय्या साहेब देशासाठी हुतात्मा झाले हे आता सिद्ध झाले आहे. पण त्यांच्याविषयी बरीच माहिती तशी सर्वसामान्य जनतेपासून लांबच राहिली, असे दिसते. जानेवारी, २०२५ मध्ये अक्षय कुमार यांची भूमिका असलेला स्काय फोर्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या मध्ये ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला… पण नावे, कथा, तपशील यात कमालीचा बदल करण्यात आला आहे…. हे मात्र अत्यंत दुर्दैवाचे आहे! एका ख-या वीराची कथा आपण त्याच्या ख-या नावासह सांगू शकत नाही… याला काय म्हणावे.. कारणे काहीही असोत. पण ही कथा पडद्यावर आणल्याबद्दल संबंधित निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांचे आभारही मानावेत तेवढे कमी आहेत.. कारण हल्ली वाचन नाही केले जात. सैन्यविषयक पुस्तके बरीचशी इंग्रजीमध्ये असतात… आणि जनता हल्ली चित्रपटात इतिहास शोधते आहे.. त्यामुळे चित्रपट त्यांच्या दोषांसह स्वीकारावे लागतात, हेही खरे आहे. खरे आभार मानले पाहिजेत ते ग्रुप कॅप्टन ओम प्रकाश तनेजा या वीर चक्र विजेत्या जिगरबाज वायुसेना अधिकारी वीराचे. देवय्या साहेबांचे शौर्य प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट खूप कौतुकास्पद आहेत.
मी आज संध्याकाळी स्काय फोर्स हा चित्रपट पाहिला. दर रविवारी एक सैन्य कथा प्रकाशित करण्यचा प्रयत्न करीत असतो. निवृत्त वायूसैनिक श्री. मेघश्याम सोनावणे साहेब माझ्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात. यानिमित्ताने आपल्याच वीरांच्या आपल्या विस्मृतीत गेलेल्या कथा पुन्हा सांगितल्या जातील.. जय हिंद.