मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ – डाॅ. विजयकुमार माने ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ – डाॅ. विजयकुमार माने ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव : काळजातल्या जाणिवांची सोनोग्राफी

कवी:              : डाॅ. विजयकुमार माने

प्रकाशक         : अक्षरदीप प्रकाशन

मूल्य               : रू.150/.

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना ,डोळ्यांना किंवा कोणत्याही उपकरणाना न दिसणा-या मनातील जाणीवांचा शोध घेऊन त्या शब्दबद्ध करणा-या डाॅ. विजयकुमार माने यांचा ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.भोवतालचा समाज,निसर्ग,वास्तव या सगळ्याचे भान ठेवून त्याच्या नोंदी मनात करता करता त्याना शब्दामध्ये उतरवून आपल्यासमोर ठेवताना विजयकुमार माने यांच्यातील एक डाॅक्टर आणि संवेदनशील माणूस या दोघांचेही दर्शन होते.हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.काव्यक्षेत्रातील त्यांचे हे दुसरे पाऊल अधिक दमदारपणे पडले आहे यात शंकाच नाही.

विषयांची विविधता हे या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.समाज, देश, निसर्ग, प्रेम, स्त्री, अशा विविध विषयांवर कविता आहेतच पण त्याशिवाय अभंग, गझल, देशभक्ती, वैचारिक, लावणी असे विविध प्रकारही त्यांच्या काव्यातून वाचायला मिळतात. अशा या  विविधांगी संग्रहाचा थोडासा परिचय.

कविता संग्रहातील पहिली कविता काळजातल्या जाणीवा व पुढे आलेल्या मूळ,बाप किंवा गुरू या कविता श्री.माने यांना गझल रचनेची वाट सापडली आहे हे दाखवून देतात.पहिल्या कवितेच्या शेवटी ते म्हणतात”माणसाला वाचण्याचा,लेखणीला वाव आहे”. म्हणूनच त्यांच्या लेखणीला कसा वाव मिळत गेला हे पाहण्याची उत्सुकता निर्माण होते आणि आपण संग्रह पुढे वाचत जातो.

आस, गुरुकृपा आणि रमाई माऊली या कविता मध्ये अभंग रचनेचा प्रयोग केला आहे व तो यशस्वी झाला आहे. पांडुरंग, गुरू, आणि रमामाता आंबेडकर या तिघांविषयी  त्यांना असलेला आदर व प्रेम  या काव्यातून व्यक्त होतो.

गृहिणीची कैफियत, साऊ, स्वतःशी बोल या त्यांच्या कविता स्त्री प्रश्नांना वाचा फोडणा-या आहेत.

विशेषतः ‘स्वतःशी बोल ‘ या कवितेत त्यांनी  स्त्रीला तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करून दिली आहे हे विशेष महत्त्वाचे.

अशाच त्यांच्या काही आशावादी विचार मांडणा-या कवितांचा विचार करता येईल.नैराश्य,आशा,लढा शत्रूंशी या कवितांतील आशावाद जगण्याची उमेद देणारा आहे.

त्याच वेळेला परस्पर प्रेम, नातेसंबंध, बंधुभाव यांची जपणूक करणा-या कविताही वाचायला मिळतांत. विशेषतः प्रेम, राख, ती, कधी कळणार तुला, पाऊस खेळत होता, भरलेला रिकामा वाडा, प्रेमानं जपलयं या कविता वाचनीय आहेत.

या भावनांबरोबरच कविने वैचारिक किंवा काही संदेश देणा- या रचना ही लिहील्या आहेत.दान या कवितेतून त्यानी नेत्रदान,अवयवदान,देहदान यांचे महत्त्व पटवून देऊन आपल्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी दाखवून दिली आहे.आभाळमाया,माणूस व्हायचं ठरलयं,अस्तित्वाचा शोध,तुरुंग या कविता यासाठी वाचल्या पाहिजेत.’माणसं वाचता वाचता माणूस व्हायचं ठरलयं’ आणि पुढे देवमाणूस व्हायचं ठरलयं अस ते म्हणतात.त्यानी हे जे ठरवलंय ते आजच्या  काळात खरोखरच लाख मोलाचं आहे.

वास्तवाची जाणीव असणं हे तर साहित्यिकाचं मुख्य लक्षण! ही जाणीव माने यांच्या कवितेतूनही दिसून येते.महापुराची त्यांनी घेतलेली नोंद,भाडोत्री आई ही सेरोगेट मदर या विषयावरील कविता,मानवी दुग्धपेढी,चिमणी,गणपती पुरातला ,सैनिक,समाज आणि एकता या सर्वच कविता आजच्या समस्या आणि वास्तव याची नोंद घेणा-या आहेत.महापुरात सांगली नगर वाचनालयवर आलेल्या  संकटाने ते अस्वस्थ होतात आणि त्याच्या पुनर्उभारणीचे चित्र ही ते रंगवतात.

नोकरी, देवाची क्षमा मागून, कवायत, पानगळ, पायवाट, या त्यांच्या कवितांतून वेगळा विचार मांडलेला दिसतो, तर तिरंगा, बापू, बाबासाहेब या कविता त्यांच्या मनातील आदरभाव व्यक्त करणा-या आहेत. मी पाऊस,नदीच्या काठावर यासारख्या कवितांतून निसर्गाचे विलोभनीय दर्शन घडते. कंबर, शेकोटी, नजरेचा बाण, झाडावरचे पोळे अशा कवितांच्या निमित्ताने ते आपल्या शृंगारीक कल्पनांचे पोळे आपल्यासमोर रिकामे करतात. याच्या जोडीलाच हास्यधन, शर्विलक या कविता हसत हसत 

मानवी गुणदोषांविषयी बोलून जातात.

त्यांच्या काही काव्यपंक्तिंचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

    सूर माझा कोकिळेचा, अंतराला छेडणारा

    गोडबोल्या पोपटांना,आज येथे भाव आहे. किंवा

                       *

    आज चिमण्या शोधतो आहे

    उद्या झाडे शोधावी लागतील

    काॅन्क्रीटच्या जंगलात घरटी

    प्लॅस्टिकचीच बांधावी लागतील.

                       *

    सापडेना राम कोठे वानप्रस्थी शोधताना

    मारलेल्या श्रावणाच्या कावडीचा शाप आहे .

                       *

    कल्पनेच्या लेखणीत, प्रपाताची शाई

    काळ्या धरतीवर, लिहिते ही वनराई

    शब्दांचा सुटला वारा, कविराजा तू डोल

यासारख्या अनेक ओळींचा उल्लेख करावासा वाटतो.पण शब्दमर्यादा लक्षात घेता ते शक्य होत नाही.

वेगवेगळ्या औषधांची मात्रा देऊन डाॅक्टरने  पेशंटला ठणठणीत बरे करावे  त्याप्रमाणे 

डाॅ.विजयकुमार माने यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या काव्यरचना करून वाचकाचे मन निरोगी व प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी अशा पद्धतीची सोनोग्राफी करून आम्हाला ‘ट्रीटमेंट’ देत रहावे , एवढीच अपेक्षा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.      

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकाबद्दल बोलू काही ☆ वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर

? पुस्तकाबद्दल बोलू काही  ?

☆ वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

लेखक : Damien Brown
मराठी अनुवाद : मंजुषा मुळे 
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस 
पृष्ठ संख्या : 462
मूल्य : 595 रु  
ISBN13: 9789392482458

नववर्षाच्या आगमनाबरोबरच एक सुवार्ता ऐकायला मिळाली. ई- भिव्यक्तीच्या संपादिका मंजुषा मुळे यांचे नवे पुस्तक, वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर हे पुस्तक प्रकाशित झाले. हा एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असून पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केले आहे. मंजुषा मुळे यांचे हे बारावे पुस्तक. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर डॅमियन ब्राऊन यांच्या ‘Band-Aid For A broken Leg ’ या पुस्तकाचा हा अनुवाद. हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मकथन आहे. पण हे काही परिपूर्ण आत्मकथन नाही. जीवनाचा एक तुकडा इथे प्रकाशीत  झालाय. मेडिसिन्स सान्स फ्रॉंटिअर्स या सेवाभावी सस्थेमार्फत डॅमियन ब्राऊन हा ऑस्ट्रेलियन डॉक्टर स्वयंसेवक म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेत पोचतो. त्याची नेमणूक एका दूर, चहूबाजूंनी भू-सुरुंग पेरलेल्या, सर्वत्र निव्वळ मातीच्या झोपड्या असलेल्या शहरात, माविंगा येथे झालेली असते. या नव्या डॉक्टरांसाठी सगळीच परिस्थिती अपरिचित असते. अंगोलन वॉरचा प्रत्यक्ष अनुभव असणारे, त्याच्या दुप्पट वयाचे, इंग्लिश बोलू न शकणारे आणि पाहिल्याच दिवसापासून वितंडवाड घालणारे आरोग्यसेवक त्याच्या सोबत असतात.

श्रीमती उज्ज्वला केळकर

डॅमियन तिथल्या सर्व आव्हानांना तोंड देतो. तीन स्वयंसेवकांच्या मदतीने तिथल्या समाजातला असमंजस, तर्कविसंगतता अशा गोष्टींशी लढत राहतो. कधी चित्त्याच्या  हल्ल्यात जखमी होणारी माणसं, कधी भू – सुरुगाचा स्फोट, तर कधी चुलीवर हत्यारं उकळून कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रिया  अशी आव्हाने सतत त्याच्या पुढ्यात असतात. तरी स्थानिकांशी मैत्री जुळवत तो परिस्थितीवर मात करतो. तिथली परिस्थिती आणि तिथले अनुभव एवढ्यापुरतेच हे आत्मकथन आहे.

 अंगोला, मोझॅंबिक आणि दक्षिण सुदान इथल्या वैद्यकीय दुरावस्थेवर प्रकाश टाकणारे प्रभावशाली असे हे पुस्तक आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट आणि त्यांच्यासाठी काम करणारी विक्षिप्त, पण असामान्य अशी माणसं, यांच्याबद्दलची प्रामाणिक मते लेखकाने  इथे मांडली आहेत.

लेखकाच्या आठवणी आणि अनुभव यावर हे पुस्तक आधारेले आहे. लेखक म्हणतो, ’अतिशय कठीण परिस्थिती आणि त्या परिस्थितीत राहणारे लोक याबद्दल लोकांना माहिती व्हावी, एवढाच हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे. ‘

लेखन करणारा आणि अनुभव सांगणारा डॉक्टरच आहे. म्हणून पुस्तकाचे शीर्षक वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर  हे काही योग्य वाटत नाही. त्या ऐवजी वेगळ्या वाटेने चालताना हे शीर्षक अधीक समर्पक वाटलं असतं. वेगळ्या वाटेने चालताना आलेले अनुभव आणि आठवणी डॉक्टरांनी कथन केल्या आहेत. कुणी तिसर्‍या व्यक्तीने त्यांच्याबद्दल लिहिले असते, तर हे शीर्षक योग्य ठरले असते.

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पुनर्जन्म” …डाॅ.प.वि.वर्तक☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “पुनर्जन्म” …डाॅ.प.वि.वर्तक☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी 

पुस्तकाचे नाव : पुनर्जन्म 

लेखक – डॉक्टर प. वि. वर्तक

प्रकाशक : डॉ. प.वि.वर्तक 

पुनर्जन्म असं म्हटलं की लगेच अंधश्रद्धा, अज्ञान, अडाणीपणा अशा दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि याला कारण आहे ते पुनर्जन्म या संकल्पनेची आतापर्यंत करण्यात आलेली मांडणी. चित्रपट, नाटक किंवा आणखीन कोणत्याही साहित्यकृती असोत या सगळ्यांमध्ये पुनर्जन्म हा विषय मांडला गेला आहे‌ तो पूर्णतः काल्पनिक आणि अशास्त्रीय दृष्टिकोनातून. त्यामुळे या संकल्पनेची हेटाळणीच जास्त प्रमाणात झाली. पाश्चात्यानुकरण करणाऱ्यांनी तर या संकल्पनेला उडवूनच लावले. निरनिराळ्या साधुसंतांनी सांगितलं असूनसुद्धा या संकल्पनेची साधी दखल घ्यावी असंही आपल्या समाजाला वाटू नये यासारखी खेदाची गोष्ट नाही, अशी खंत डॉक्टर वर्तक यांनी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी पाश्चात्य लोकांना या कल्पनेत काहीतरी तथ्यता जाणवली, त्यांनी अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याकडच्या लोकांना त्यामध्ये खरोखरच तथ्य आहे असं दिसू लागलं. 

तत्पूर्वी पुनर्जन्म या सिद्धांताचा व्यवस्थित अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिकदृष्ट्या करून डॉक्टर वर्तक यांनी बरंच कार्य केलं. त्यांच्यापाशी सांगण्याजोगे अनेक अनुभव जमा झाले.  आणि लिहिण्याएवढा अभ्यास झाल्यावर, अधिकार प्राप्त झाल्यावर डॉक्टर वर्तकांनी हे पुस्तक लिहिलं.

या पुस्तकाच्या मनोगतातच ‘ पुनर्जन्मासारख्या विषयावर मी का लिहितो आहे? ‘ हा हेतू डॉक्टरांनी स्पष्ट केला आहे. 42 वर्षं वैद्यकीयक्षेत्रात असल्यामुळे जन्म आणि मृत्यू या घटना अगदी जवळूनच त्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे पुनर्जन्म संकल्पनेसाठी आवश्यक गोष्टी म्हणजे जन्म आणि मृत्यू हे त्यांच्या नित्याच्या अभ्यासाचेच विषय होते. आणि त्यामुळेच या संकल्पनेची सत्यासत्यता पडताळून बघताना जन्म म्हणजे नेमकं काय आणि मृत्यू म्हणजे नेमकं काय याचाही ऊहापोह या पुस्तकात केला आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून या घटना कशा घडतात ते सर्वसामान्य माणसाला समजेल, उमजेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत आणि क्रमवार सांगितलेले आहे. 

पुनर्जन्म ही संकल्पना मानणारे आपल्याकडील संतमहंत, विचारवंत, काही शास्त्रज्ञ यांचे दाखले दिले आहेत. तसंच आता काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनीदेखील या संकल्पनेचा अभ्यास करून ही संकल्पना खरी असल्याचं मान्य केलं आहे. 

अति विज्ञाननिष्ठ आणि अश्रद्ध माणसांना कदाचित या गोष्टी तरीही पटणार नाहीत, त्या न पटोत. पण या संकल्पनेचा प्रभावी उपयोग माणसाच्या सद्यस्थितीतल्या वर्तनावर कसा होऊ शकतो हे मात्र विचार करण्याजोगं आहे. या पुस्तकातला हा विचार मला जास्त महत्त्वाचा वाटला. 

असं अनेकदा घडतं की एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याशी वाईट वर्तन करते किंवा संकट प्रसंगी आपोआप आपल्याला मदत करते. अशा दोन्ही वेळी जर आपण तटस्थपणे या गोष्टींचा विचार केला तर जाणवतं, की या व्यक्तीशी माझा पूर्वी कधीही संबंध आला नसताना तिने माझ्याशी असं वर्तन करण्यामागे नक्की काय कारण असावं आणि आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कर्माचा सिद्धांत म्हणजेच पुनर्जन्म देऊ शकतं.

घडून गेलेल्या अनेक घटनांचा कार्यकारणभाव आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं, तर पुनर्जन्म ही संकल्पना अधिकाधिक पटत जाते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानदेखील कोणतीही गोष्ट कार्यकारणभाव असल्याशिवाय घडत नाही, या गोष्टीला अनुमती देते. 

फक्त एक गोष्ट ठराविक प्रयोग करून सर्वसामान्यांसाठी सिद्ध करता येते… तर दुसरी गोष्ट ही एका विशिष्ट पातळीवरील ज्ञान प्राप्त झाल्यावर अनुभवास येते. बहिणाबाईंनी मरतेसमयी आपल्या बारा पुनर्जन्मांचं कथन केलेलं आहे. अकबराचा पुनर्जन्म आणि त्याचं वर्तन, बिरबलाचा पुनर्जन्म आणि त्याचं वर्तन… याच प्रमाणे पांडव, ज्ञानेश्वर भावंडं, सावरकर बंधू या सगळ्यांचे पुनर्जन्म यात सांगितले आहेत. आणि त्यात त्या जन्मात त्यांनी केलेली कार्यं यांचा सविस्तर अभ्यास करून ही सत्यता मांडली आहे. 

मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाने जर आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम, मग तो चांगला असो वा वाईट, आपल्याला भोगावा लागणार आहे हे जर जाणलं तर त्याच्या कर्मामध्ये आपोआपच शुद्धता आणि सत्यता येईल. वाईट कर्म करण्याची त्याची प्रवृत्ती ही आपोआपच नियंत्रित होईल. आणि ज्याचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी नक्कीच होईल. हे कसं घडेल यासाठी सर्वसामान्य व्यक्तींच्या पुनर्जन्माची काही उदाहरणं आणि त्यांची कर्मफलं आणि त्यातून त्यांना मिळणारे परिणाम हे लेखकांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे. 

अल्पवयात अचाट, अफाट पराक्रम करणारी मुलं असोत, किंवा विशिष्ट व्यंग घेऊन जन्माला आलेली बालकं असोत– ही सारी उदाहरणे विज्ञानाच्या पातळीवर पूर्णतः सिद्ध होत नाहीत. फार फार तर यातील व्यंगाचे कारण समजू शकते.  परंतु ते घडण्यामागचे कार्यकारण भाव मात्र विज्ञानही स्पष्ट करू शकत नाही आणि त्याच्यावर पूर्णतः उपचारही शोधू शकत नाही. गुणांच्या बाबतीतही, अचंबित होण्यापलीकडे विज्ञान त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असं असताना पुनर्जन्म ही संकल्पना नाकारण्यामागे केवळ हटवादीपणा तर नाही ना, हे सगळ्यांनी पडताळून पाहायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून या संकल्पनेचा अधिकाधिक अभ्यास व्हायला हवा हे या पुस्तकानं अधोरेखित केलं आहे.

किमान एकदा तरी वाचावं असं‌ पुस्तक.

 

तळटीप – पुस्तकात याव्यतिरिक्तही खूप काही आहे पण ते वाचूनच समजून घ्यावं. 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लिंकन ऑफ लिडरशीप”…अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “लिंकन ऑन लीडरशिप” – अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक  ☆ 

पुस्तकाचे नाव:  लिंकन ऑन  लीडरशिप

मूळ लेखक : डॉनल्ड टी. फिलिप्स

मराठी अनुवाद : सौ गौरी गाडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठे       :160

किंमत :रु.220/-फक्त

  

सौ गौरी गाडेकर

‘लिंकन ऑन लीडरशिप’ हे पुस्तक डॉनल्ड टी.फिलिप्स यांचे असून त्याचा मराठी अनुवाद  सौ. गौरी गाडेकर यांनी आपल्या मराठी बांधवांसाठी त्यांच्या सोप्या, सुटसुटीत, मनोरंजक भाषेत केलेला आहे.

हल्लीच्या पिढीला काय वाचावं हा मोठा प्रश्न. म्हणून असं नक्की म्हणावसं वाटतं की गाडेकरांचं हे सोप्या ,सुटसुटीत मराठी भाषेतील पुस्तक म्हणजे मेजवानीच आहे. 

ह्या पुस्तकाचा विषय खूप उपयोगी, महत्वाचा पण किचकट आहे. ‘खडतर काळासाठी एक्झिक्यूटिव्ह  डावपेच ‘ म्हणजे मनोरंजनासाठी वाचण्यासारखे  हे पुस्तक आहे का?–असे कोणालाही वाटेल. पण गाडेकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने इतका छान अनुवाद केलेला 

आहे ! एकदा हे पुस्तक वाचायला घेतले की पुढे पुढे वाचतच रहावेसे वाटते. ज्याप्रमाणे लहान मुलांना हसत खेळत गणित, भाषा, त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचताना वाटते. आणि म्हणूनच लिंकन ह्यांची तत्वे आपल्याला  वाचताना पटतात. कंटाळवाणे होत नाही.

हे पुस्तक म्हणजे 1860 च्या काळातले  ‘ एक्झिक्यूटिव्ह डावपेच ‘ असले, तरी आजच्या काळात पण ते तितकेच उपयोगी,मार्गदर्शक आहेत.

लिंकन ह्यांचा नेतृत्व हा गुण खूपच वाखाणण्यासारखा होता. 1861 मध्ये त्यांचा शपथविधी झाला होता. बिघडलेल्या परिस्थितीत अल्पसंख्यांकांच्या लोकप्रिय मतांनी निवडून आलेल्या लिंकनना,   नेतृत्वाचा अनुभव नसलेला, अडाणी, खेडवळ वकील, असे त्यांचे सल्लागारच समजत होते.  तेच लिंकन पुढे आदरणीय, पूज्य राष्ट्राध्यक्ष कसे बनले, हेच ह्या पुस्तकात सांगितले आहे. एखादे राज्य, संस्था चालवायला आजच्या पिढीला हे मार्गदर्शक ठरणार आहे. सर्वाना प्रेरणादायक आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतीत लिंकन आपल्या हाताखालच्या माणसांवर विश्वास दाखवायचे. कोण, किती, कशात प्रवीण आहे, कोणाचीआपल्या कामावर किती निष्ठा आहे,  कोण किती कार्यक्षम आहे, हे ओळखून त्याच्यावर  जबाबदारी टाकत. त्यांनी ती पूर्ण केली तर त्यांची वाहवा, योग्य मोबदला देत आणि जर तसे केले नाही तर योग्य वेळ बघून त्यांना पदावरून दूर करीत. कारण लिंकनना हाताखालची  माणसे आणि राष्ट्र दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. त्यांना यशस्वीरित्या नेतृत्व करायचे होते. आपल्या बरोबरच सगळ्यांना पुढे घेऊन जायचे होते आणि  ते पण  त्यांची मने  जिंकूनच. आपली मते कोणावर लादायला त्यांना आवडत नसे. ती मते  त्यांना पटवून देण्यावर  त्यांचा भर होता. तसेच समोरच्याच्या चुका त्याला दर्शवून अपमान करण्यापेक्षा,  छोट्या उदाहरणाने, चुटक्यांनी चूक त्याच्या निदर्शनास आणीत. हुकूम सोडण्यापेक्षा विनंती करण्याचे मोल लिंकन जाणून होते.

मानवाच्या स्वभावाची उपजत जाण नसेल तर त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. कर्मचारी ही संस्थेची मालमत्ता असते.  त्यांची मते, समस्या जाणून, त्याच्यावर थोडा वेळ, पैसा,  खर्च केला पाहिजे. यशस्वी स्नेहसंबंध निर्माण केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं–  ‘दुभंगलेल्या पायावर घर कधीच उभे राहू शकत नाही. तसेच प्रामाणिकपणा, सचोटी नसेल तर संस्थेची इमारत कोसळू शकते.’ असे त्यांचे मत होते. 

असे नेतृत्वाला गरजेचे आणि रोजच्या दिनक्रमाला पदोपदी उपयोगी  पडणारे लिंकन यांचे मार्गदर्शक गुण या पुस्तकात वाचायला मिळतात.

अशीच बोधप्रद,मनोरंजक पुस्तके, अनुवाद करून गौरी गाडेकरांनी आमच्यापर्यंत पोचवावीत.

ह्याच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा.

 

  –  सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “बारोमास” – सदानंद देशमुख ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बारोमास” – सदानंद देशमुख ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆ 

पुस्तकाचे नाव : बारोमास 

लेखक : सदानंद देशमुख

प्रकाशक : कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे 

सदानंद देशमुखांची एक अंतर्मुख करणारी अन जीवाला चटका लावणारी कादंबरी मी २००९  ला वाचली .या पुस्तकाला साहित्य अकादमीचा प्रथम पुरस्कारही मिळालाय .

अशी ही लोकप्रिय कादंबरी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी अन एकंदरीतच सामाजिक जीवनाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम चित्रित करणारी. शहरी जीवन, व शहरी संस्कार,  ग्रामीण जीवन व ग्रामीण संस्कारांची छापही वैयक्तिक जीवनावर कसा प्रभाव टाकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारोमास !

शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाची हृदयद्रावक कथा ,तसेच योग्य वेळेस निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने कादंबरी नायकाला अंतिमतः फक्त दुःख न दुःखच पदरात येते ,घोर निराशा अन अंध:कार !

एकनाथ एका शेतकरी कुटुंबातील एम. ए. झालेला विवाहित तरुण नोकरीच्या शोधात आहे.त्याची पत्नीही उच्चशिक्षित. पण ग्रामीण संस्कार खोलवर रुजलेल्या एकनाथच्या लाजाळू व बुजऱ्या स्वभावामुळं तो मनात असूनदेखील बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. पत्नीकडूनच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही म्हणून आतून नाराज, तर नवऱ्याच्या असल्या मिळमिळीत स्वभावावर पत्नी नाराज. शहरी संस्कार पूर्णपणे भिनलेली ती पतीला समजावते, बाहेर पडण्याची विनंती करते.  पण स्वतःवर विश्वास डळमळीत असल्याने अन कुटुंबावर प्रेम असल्याने एकनाथ तिथंही नापासच होतो .

नोकरीसाठी पैशांची गरज असते आणि हा पैसा उपलब्ध होण्यासाठी शेतजमिनीचा एक तुकडा विकून नोकरी धरावी व नोकरीच्या पैशातून पुन्हा जमीन घ्यावी अशी बिल्कुल सरळ इच्छा बाळगून सुखी जीवनाचे चित्र तो रेखाटतो ,पण घरचे प्रचंड विरोध करतात. दिवस असेच निघून जातात वय वाढू लागते .

कादंबरीची सुरुवात गावाच्या वेशीपासून होते.गावाची ओळख ,सर्रास दिसणारे ग्रामीण चित्र,  थोडे मागास- थोडे आधुनिक, आणि एकनाथच्या घराचा ठिकाणा,अगदी बोळातील रस्ता आणि आजूबाजूचा परिसर एकनाथच्या सामाजिक स्थितीची ओळख करून देतो .आई वडील व एक धाकटा बंधू अन पत्नी असे पंचकोनी कुटुंब. एकनाथ एम ए शिकलेला, विचार आचाराने सुशिक्षित नोकरीच्या शोधात आहे. नोकरीची खात्रीशीर संधी आहे, पण पैसे वशिला हवाय ,वशिला नाही पण पैशांचे काय ? कर्ज काढावे तर व्याज, शिवाय नेहमीचा दुष्काळ पाचवीला पुजलेला ! शेतीचा तुकडा विकावा का ? हा विचार मनात येताच दुसरा विचार येतो ,वडीलोपार्जीत जमीन विकण्यास कदापि पालक तयार होणार नाहीत.अतिशय सरळमार्गी मृदुभाषी एकनाथचे पात्र.  याच्या अगदी उलट भाऊ– पक्का व्यवहारज्ञानी ,समाजातील ,राजकारणातील खाचाखोचाशी ज्ञात ,गावातील टपोऱ्या पोरात ऊठबस असणारा ,आई थोडीशी धाडसी अन वडील माळकरी– अशी ही एकनाथची कौटुंबिक पार्श्वभूमी .आई -पत्नी, अशिक्षित- शिक्षित आणि जनरेशन गॅप, यामुळे खटके -धुसपूस असायचीच ! त्यातच नवरा बेरोजगार, त्यामुळं पत्नीची होणारी घुसमट दोघांतील वादात बाहेर पडायची ! स्त्रीसुलभ भावनांचा कोंडमारा ,परिस्थितीमुळं मूलही जन्माला न घालण्याची खन्त,  अन मग सतत माहेरी जाणे.  यामुळे एकनाथला सर्वच बाजूनी आलेला एकटेपणा आपलेही काळीज पिळवटून टाकतो .या सर्व स्थितीचे अतिशय सुरेख चित्रण आपल्या मनात उतरत राहते अन आपल्यात एकनाथ झिरपत रहातो. एकनाथच्या सर्व सुखदुःखात कुठेतरी सामाजिक प्रश्नांचे मूळ आपल्यालाही अस्वस्थ करत रहाते.

मध्यभागात अवकाळी पाऊस ,शेतीमालाचे नुकसान अन भाव पडणे यामुळे व्यथित- हतबल,  कर्जबाजारी शेतकरी याचे हुबेहूब चित्रण डोळ्यासमोर लेखक उभे करतो. तसेच गावातील राजकारण ,पैशामुळं मिळणारी नोकरी व ट्युशन -क्लास मुळे वाढणारे मार्क, अन पुन्हा चांगल्या मार्कांमुळे मिळणारी नोकरीची चांगली संधी– यामुळं व्यथित एकनाथ म्हणतो, ‘ पैसा हेच सर्व दुःखाचे मूळ आहे.पैसे असतील तर सर्वच गोष्टी मनासारख्या होतात आणि सतत प्रगती होते. ‘

कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथच्या शेतीचा तुकडा विकला जातो. यातील आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन शहरात जाऊन झेरॉक्स सेन्टर काढू व तिथेच स्थायिक होऊ असे पत्नी सुचवते.  पण एकनाथकडून तेही होत नाही. ते पैसे धाकट्या भावासाठी असतात, अन पैशांची चोरी होईल म्हणून घरदार त्या पैशांची काळजी करते आणि सर्वांची झोप उडते .

सततच्या परावलंबित्वाला अन एकनाथच्या स्वभावाला कंटाळून पत्नी माहेरी जाते .एकनाथ पत्नी वियोगात कष्टी होतो. पत्नीला सासरच्या सर्व परिस्थितीचा एवढा उबग येतो की तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ती आतून धास्तावते की एकनाथ परत आपल्याला सासरी नेईल. म्हणून ती स्वतःस लपवू पहाते .एक प्रसंग असा वर्णिला आहे की मेहुणी अन पत्नी एकनाथला शहरात दिसतात.    चुकूनच सर्वांची दृष्टादृष्ट होते.  पण त्या दोघी रिक्षात बसतात अन एकनाथला टाळतात. या प्रसंगात खरेच मन विव्हळ झाल्याशिवाय राहत नाही, कारण शरीरापेक्षा मनाने पती- पत्नी खूप दूर गेलीत तिथून एकत्र येण्याचा कोणताच धागा वाचकास दिसत नाही. विमनस्क एकनाथ घरी येतो .

ज्यासाठी शेत विकले होते तो हेतू सफल न झाल्याने आई एकनाथला म्हणते–’ हे पैसे घे व नोकरीसाठी भर.’ या वाक्याने  आतून तुटलेला एकनाथ खूप दुखावतो. कारण नोकरीची संधी तेव्हाच गेलेली असते जेव्हा पैसे भरलेले नसतात. ती जागा भरलेली असते. पुन्हा लवकर नोकरीची आशा नसते आणि जगण्यासाठीचा आशेचा किरण संपतो. संसार कधीच मोडलेला होता अन जीवन अंधःकारमय ! दोन्ही कडून एकनाथ पिचला गेला अन अशा रीतीने एक सुशिक्षित बेरोजगाराच्या वाट्याला वैफल्यग्रस्त जीवन येते अन कादंबरी संपते. पण बऱ्याच प्रश्नांचा गुंता आपल्याभोवती सोडून जाते—

एकनाथच्या दुःखास खरे कारणीभूत कोण?आर्थिक परिस्थिती,सामाजिक ,कौटुंबिक परिस्थिती की स्वतः एकनाथचा बुजरा ,निर्णय न घेता येणार स्वभाव ? पालकांचा पाल्याच्या क्षमतेवरचा अविश्वास की स्वत:वरचा डळमळीत आत्मविश्वास ? 

” माणूस स्वतःच्या दुःखास स्वतःच कारणीभूत असतो ” हे शेक्सपिअरचे प्रसिद्ध वाक्य काही अंशी पटते ,कारण  कोणत्याही परिस्थितीत हतबल न होता परिस्थितीस शरण जाऊन स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवता कोणताच ठाम निर्णय न घेता येणे, ही आजच्या सुशिक्षित तरुणांची कमजोर बाजू आहे .व्यवहारात कसे वागावे याचे धडे कुठेच न मिळालेला एकनाथसारखा प्रत्येक तरुण नात्यात अन कुटुंबात पुरता गोंधळून जातो. नात्यातील संवाद जेव्हा संपतो, तेव्हा नाती कोरडी होतात व तुटतात हे विदारक सत्य, केवळ एकनाथला भावना व व्यवहार यांची उत्तम सांगड न घालता आल्याने पचवावे लागते. एकनाथ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरतो, असे मला तरी वाटते .

सदानंद देशमुखांच्या या कादंबरीला बक्षीस मिळाले असले तरी यात वर्णन केलेली सामाजिक,  राजकीय स्थिती अजूनही तशीच आहे. एकनाथसारखे निष्पाप जीव अजूनही भरडले जात आहेत—-

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जन्मठेप” – गिरिजा कीर  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “जन्मठेप” – गिरिजा कीर  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव…..जन्मठेप

लेखिका …………गिरिजा कीर

प्रकाशन              मेहता पब्लिशिंग हाउस

पृष्ठे                     १६०

किंमत               रु. १५०/—

या पुस्तकाविषयी काही लिहिण्यापूर्वी काही सांगावसं वाटतय् .या पुस्तकाचे प्रकाशन येरवडा जेल पुणे येथे झाले. आणि त्या सोहळ्यास मी गिरिजा कीर यांच्याबरोबर गेले होते. तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या सोहळ्यात उपस्थिती होती कैद्यांची– असे कैदी की ज्यांच्यावर खूनाचे आरोप सिद्ध झालेत आणि जे जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. हे वातावरण अपरिचित होतं आणि मी थोडी भयभीत आणि गोंधळले होते. हे सर्व कैदी त्यावेळी मुक्त होते. कुठल्याही बेड्या त्यांच्या हातात नव्हत्या…सर्व कैद्यांनीच हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. सूत्रसंचालनापासून ते समारोपापर्यंतचा सर्व भार कैद्यांनी उचललेला होता.. मनोगते कैद्यांचीच होती.पुस्तकाचे प्रकाशनही त्यांनीच केले. आणि  व्यासपीठावर बसलेल्या गिरिजा कीर यांना ते सर्व “आमची माउली “म्हणून संबोधत होते. हा अनुभव खूप वेगळा होता…

मुळात ‘ जन्मठेप ‘ हे पुस्तक गुन्हेगारी जगतातील सत्यं उलगडणारे आहे.

गिरिजा कीर यांचे ‘ लावण्यखुणा ‘ हे पुस्तक वाचून प्रेरित झालेल्या सुहास जोशी यांनी गजाआडून त्यांना लिहिलेल्या पत्रामुळे या पुस्तकलेखनाचा प्रारंभ झाला…

दहा वर्षे त्या जन्मठेपेच्या कैद्यांच्या संपर्कात राहिल्या. हा एक संशोधनात्मक प्रकल्प होता. कल्पना सुस्पष्ट होत्या. आराखडा तयार होता.

या पुस्तकातून गुन्हेगारी जगताशी केलेला संवाद आहे. त्यांच्या व गजाआड शिक्षा भोगणार्‍यांचा बाहेर असलेला परिवार, कुटुंबीय याच्या वेदनांना केलेला स्पर्श आहे.

गुन्ह्यांचं समर्थन नसलं, तरी त्यामागच्या कारणांचा, त्या मानसिकतेचा आपुलकीने घेतलेला शोध आहे. चिंतन आहे. गिरिजा कीर सृजनात्मक लेखिका होत्या .त्या या विषयात इतक्या गुंतल्या की त्यांच्यासाठी हा विषय केवळ संशोधनात्मक न राहता मन विस्कटून टाकणारा एक विषय ठरला. 

या पुस्तकात त्यांनी कनिष्ठ व मध्यम वर्गीय सुशिक्षित गुन्हेगारीचा गट निवडला. कारण ही मुलं पापभीरु ,चांगल्या संस्कारातली असतात. केवळ अविवेकी कृत्याने ती गुन्हेगार ठरतात.

कुठली आमिषं, कुठली आकर्षणं त्यांना प्रवृत्त करतात.?? त्यांची मनं दुबळी का होतात ?   वडीलधार्‍यांचे दडपण, कुसंगती, दहशत, पैसा, स्पर्धा ,भोवतालचा समाज, या सर्व प्रश्नांचा शोध या पुस्तकात प्रत्यक्ष संवादातून घेतलेला आहे.

या पुस्तकांतून गुन्हेगारांच्या पुनर्वसनाचा विचार नसून, ज्यांचा सूर्य मावळला आहे ,त्यांना फक्त जगण्याचे सामर्थ्य देण्याची खटपट आहे…

“कुणी नाही का म्हणता? मी आहे ना ! तुमचं एक छान जग निर्माण करा. प्रेम द्या एकमेकांना…”

असे त्या भेटीत सांगत…

या पुस्तक प्रकल्पात त्यांना अनेक अनुभव आले .कैद्यांना भेटण्यासाठी काढाव्या लागणार्‍या परवानग्या..त्यातल्या अडचणी…कायद्यातल्या त्रुटी…

काहींना गुन्हा नसतांनाही झालेल्या शिक्षा आणि विस्कटलेली उध्वस्त जीवनं…पुस्तक वाचतांना अंगावर सरसरुन काटा उभा राहतो…

मात्र हे पुस्तक एका नकारात्मक जीवनाला आशेचा आकार देते…लेखिकेच्या या प्रयत्नांतून मिळालेलं तीर्थ हेच की—अंधारातून ते प्रकाशाचा शोध घेत आहेत.  स्वत:ची दिवली घेऊन मार्ग काढत आहेत. शिक्षा भोगून तावून सुलाखून निघालेले हे तरुण मनातल्या श्रद्धांना झळ पोहचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय  —आपण फक्त आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे—-

पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर हा विचार मनात येतो..हेच या पुस्तकाचे यश, साफल्य, सार्थक —–

(प्रकाशन सोहळा संपल्यानंतर ,कैद्यांनी आमच्यासाठी रुचकर जेवण बनवले होते. त्यांनी स्वत: वाढले.आणि सर्व कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या सेलमधे निघूनही गेले. स्वत:च सेलचे भरभक्कम दार लावून घेतले..त्या अंधारात गुडुप झाले. आणि जेलरने त्यांचे सेल लाॅक केले. हे मी प्रत्यक्ष पाहिलं आणि काय माझ्या मनाची अवस्था झाली ते कसं सांगू….?? पुस्तकातल्या माणसांना मी प्रत्यक्ष पहात होते…)

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ शब्द  माझ्या सोबतीला (कविता संग्रह)… श्री. सुहास र. पंडित ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ शब्द  माझ्या सोबतीला (कविता संग्रह)… श्री. सुहास र. पंडित ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

पुस्तकाचे नाव : शब्द माझ्या सोबतीला 

कवी : श्री. सुहास र. पंडित 

प्रकाशक : प्रसाद वितरण ग्रंथदालन, सांगली.  

‘शब्द माझ्या सोबतीला’ हा सुहास पंडित यांचा पहिला कवितासंग्रह. संग्रहाचे नाव अगदी अर्थपूर्ण आहे.  शब्दाच्या माध्यमातून आशय उलगडत जातो. त्याला अर्थ प्राप्त होतो. कविता, कथा, कादंबरी, लेख, चरित्र,- आत्मचरित्र , समीक्षा,सगळ्याच वाङ्मय प्रकाराचे इमले शब्दांनीच रचले जातात. शब्दांशिवाय वाङ्मयाचे सृजन असंभव. कवीला शब्दसामर्थ्याची जाणीव आहे. पण ते शब्दांना ‘मागुते या’ असा आदेश देत नाहीत. ते अतिशय ऋजुपणे, आत्मीयतेने, कृतार्थतेने आणि काहीशा कृतज्ञतेनेही म्हणतात, ‘शब्द माझ्या सोबतीला’.

कविता साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमनाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्‍या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. विद्रोही, किंवा आक्रोशी नाही. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन, वृत्तात बद्ध होऊन. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्या जातकुळीची वाटते.

कविता संग्रहाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,           

शब्द आमुचे खेळ आहे, कागदाचे अंगण 

ना वयाचे, ना दिशांचे ना कशाचे बंधन

रंगवितो खेळ आम्ही, कल्पनांच्या संगती 

हार नाही, जीत नाही, फक्त आहे अनुभूती 

हार-जीत नसली, तरी या खेळाचा आनंद आहेच. कवीला स्वत:चीच कविता वाचताना जसा आनंद होतो, तसा आनंद, कविता वाचताना वाचकांनाही व्हावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. 

आपल्या कविता- लेखनाला तरुण वयात सुरुवात झाली, असं ते म्हणतात. बहुतेक कवींच्या काव्यलेखनाला त्या वयातच सुरुवात होते. कॉलेजच्या रोमॅंटिक विश्वात शिरला की बहुतेकांना कवितेची बाधा होते. ही बाधा काहींना तात्पुरती होते, तर काहींच्या ती  कायमची मानगुटीला बसते.  ही बाधा सुहास पंडित यांच्या कायमची मानगुटीला बसली. 

तरुण वयात प्रेम भावनेचे प्राबल्य अधिक. अनेकदा तर प्रत्यक्ष प्रेमापेक्षा ‘प्रेमाच्या कल्पनेवर’च या बहाद्दरांचं प्रेम असतं. मग सफल-विफल प्रेमाच्या कविता लिहिल्या जातात. पंडितांच्या प्रेमकवितेतही प्रेमाच्या विविध रंगछ्टा विखुरल्या आहेत. त्यांची सखी, प्रेयसी आणि पत्नी एकच आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सफल प्रेमाची गीते होऊन येतात. इथे पुन्हा एकदा भा.रा. तांबे यांची आठवण होते. 

निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. चंद्र-चांदण्या, त्यांचे चांदणे, घमघमणारी चमेली,  मोगरा , रातराणी या वातावरणात त्यांच्या शृंगाराला बहर येतो. प्रेयसीशी एकरूप होण्याची उत्कट असोशी ‘आता नाही दुजेपण’ या कवितेत व्यक्त झालीय. त्यांची शब्दकळा लावण्यमयी आहेच, पण या कवितेत ती विशेष वैभवाने प्रकट झाली आहे . म्हंटलं तर यातील कल्पना, रूपके पारंपारिकच, पण त्यातून एक देखणा आविष्कार त्यांनी प्रकट केलाय. ते म्हणतात, तुझ्यासवे बोलताना कधी पहाट होऊच नये आणि पुढे लिहितात, 

गालातील गुलाबाचा  रक्तिमा फुटावा 

डाळिंबाच्या ओठातील मध हळूच टिपावा

चंद्र लपावा ढगात, मुखचंद्रमा हातात 

माझ्या गळ्यात पडावे, तुझे सोनियाचे हात 

ऋतुराजाचे वैभव सारे खुलावे कायेत

माझ्या मनाचा मयूर सुखे  नाचेल छायेत 

आणि मग चांगली कल्पना येते –

तुझ्या देहाच्या चंद्राचे माझ्या मनात चांदणे 

आता नाही दुजेपण सारे एकरूप होणे 

 स्वप्नवेल, प्रीत बरसते, सर येण्याआधी, फुलवीत आपुली प्रीत (संवाद), नातं ,प्रतीक्षा अशा अनेक सुंदर कविता इथे वाचायला मिळतात. 

पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्‍यांना स्पर्शून जाते. घन गर्जत आले, घन बरसला सावळा, श्रावणमास, रवी आला क्षितिजावर, च्ंद्रोत्सव, मानसमेघ, जंतर मंतर अशा कितीतरी कविता निसर्गाचे लावण्यरूप घेऊन येतात. त्यातही गरजणारा, बरसणारा, वसुंधरेच्या गात्रांमध्ये नवजीवनरस  शिंपत जाणारा, चैतन्याची पेरणी करून अवघी अवनी सजवून टाकणारा पाऊसकाळ त्यांना विशेष प्रिय दिसतो. गुलमोहरा’चे शब्दचित्रही त्यांनी अतिशय सुरेख रेखाटले आहे. 

‘हे मृत्यो’ या कवितेत ते म्हणतात, मृत्यूपूर्वी फक्त एकदाच मला हिमशिखरांच्या उत्तुंग राशी, गगनाचे इंद्रधनुष्यी तोरण, हिरवी राने, नभातील रंगपंचमी पाहू दे. निर्झर संगीत ऐकू दे. शिशिरातील पहाटवारा अंगावर घेऊ दे, चंद्राची रेशीमवस्त्रे लेवू दे. , मातीच्या कुशीत शिरून राबू दे. आणि फक्त एकदाच या सृष्टीतला ईश्वर पाहू दे. या कवितेचा शेवट मोठा मजेशीर आहे. ‘फक्त एकदा मला मरू दे इथले जिणे संपल्यावर’  

निसर्गात रमून जाणे हा कवीचा स्थायीभाव असला, तरी त्याचे सद्य: स्थितीकडे बारीक लक्ष आहे. पूर्वी सुवर्णभूमी असलेला आपला देश स्वार्थांध भ्रष्टाचार्‍यांनी आता स्मशानभूमी बनवला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ‘घे धाव रामराया’ अशी ते आळवणी करतात.  

संग्रहात काही चांगली शब्दचित्रे आहेत. ‘माझा गाव’ वेंगरूळ ‘घर खेड्यातले’ ‘कापूर ‘( हे त्यांच्या आईचे शब्दचित्र आहे.)    

पंडित म्हणतात, हा संग्रह म्हणजे आपल्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रवास काट्याकुट्याचा असला तरी पुढे ताटवा लागेल, याची त्यांना खात्री आहे. या पुढच्या प्रवासात त्यांना या मार्गावर नव्या नवलाईच्या खुणा दिसोत.. विविध अनुभवांची समृद्धी मांडणारा, या अर्थाने पुढचा प्रवास त्यांना सुखकारक होवो.  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘एस्. आर्.’ … एक निस्पृह कामगार नेते –  सुश्री ललिता बापट ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘एस्. आर्.’ … एक निस्पृह कामगार नेते –  सुश्री ललिता बापट ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव : एस. आर.

लेखिका : ललिता बापट

प्रकाशक : बी. मोहनराव चिटणीस

प्रकाशन वर्ष : १९८७.

एस.आर…. भारतीय कामगार चळवळीतील झुंजार नेतृत्व— एक निस्पृह कामगार नेते.

श्री.एस.आर कुलकर्णी यांचे हे चरित्र लेखन म्हणजे एक प्रकारे भारतीय गोदी आणि बंदर कामगारांच्या, इतकचं काय पण कामगार चळवळीच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडातील प्रेरणादायी प्रवास..

कामगार चळवळीला एस.आर. हे नेते लाभले तो आजवरचा महत्वपूर्ण कालखंड…अनेक वादळे, अनेक चढउतार घडामोडी यांनी भरलेला—

एस.आर. यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व, त्यांचा पोलादी निर्धार यांचे एक उत्तुंग दर्शन हे पुस्तक वाचताना घडत जाते. त्याचप्रमाणे उदात्त, सुसंस्कारित, मानवतावादी व निर्भय नेतृत्वाच्या साहचर्याचा पुनःप्रत्यय देणारा, सहसंवेदना निर्माण करणारा व भारतीय कामगार चळवळीतील सुवर्ण काळाविषयीची अधिक ओढ, जिज्ञासा उत्पन्न करणारा अनुभव वाचकाला हे पुस्तक वाचताना येतो.

या पुस्तकात जन्म आणि बालपण ते राष्ट्रवादी एस.आर. असे अनेक टप्पे वाचावयास मिळतात. तसेच अनेक बोलकी छायाचित्रेही पहावयास मिळतात. या दीर्घ कालावधीत एस.आर. साहेबांनी कामगार हितासाठी केलेले आणि घडवून आणलेले करार, कामगारांना मिळवून दिलेली पगारवाढ आणि असे अनेक अभिमानाने उजळवून टाकणारे प्रसंग, घटना यांचा उल्लेख तर आहेच, आणि  त्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या कामगारसेवेच्या व्रताला आकार देणा-या पी.डिमेलो यांच्या स्मृतीने भावविवश होणारे एस.आर कुलकर्णी– हेही इथे भेटतात.

“एकमेवाद्वितीय एस.आर” या लेखात तर १९७१ साली बांगलादेश मुक्तीयुद्धाचे दिवस होते. पाकिस्तानसाठी युद्धसाहित्य घेऊन आलेल्या पाच बोटींवरील शस्त्रास्त्रसाठा आणि भारत विरोधी रसद एस.आर च्या आदेशानुसार मुंबई बंदरात उतरवून घेऊन त्या बोटींवरील बांगलादेशीय खलाशांना, कर्मचा-यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्याच दरम्यान दिवाळीचा सण ..एस आर यांनी बोटींवरील ताब्यात घेतलेल्या सर्व खलाशांना, कर्मचा-यांना ताजमहल हाॅटेलमध्ये स्वतःच्या खर्चाने जेवण दिले. यावरून त्यांची कामगारांसाठी जीव ओवाळून टाकण्याची वृत्ती लक्षात येते. तसेच आणखी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, एस.आर. आणि पी. डिमेलो आणि त्यांचे आणखी काही जिवलग सहकारी यांना ठार मारण्याचे दोनदा प्रयत्न करण्यात आले होते. पण दोन्ही प्रयत्न  निष्फळ ठरले.. फाझलच्या मनात सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाली. फाझलने क्षमायाचना केल्यानंतर पी. डिमेलो यांच्या कडे एस.आर. यांनी रदबदली केली आणि क्षमा करण्यासाठी शिफारसही केली. मात्र मोरारजी देसाई यांनी त्या फाझलला मुंबईतून कायमचे तडीपार करण्याचा हुकूम दिला. आज कित्येक तपे उलटून गेल्यानंतरही कलकत्याहून फाझल प्रतिवर्षी खास सण व अन्य निमित्ताने शुभेच्छा पाठवतो, संपर्क ठेवतो.. यावरून त्यांची निर्भयता, चारित्र्य आणि कामगार हिताची प्रामाणिक तळमळ व त्यासाठी केलेले संपूर्ण समर्पण..वाचकांच्या  लक्षात येते..

“वादळी जीवनातील चढउतार” यात तर आपल्याच सहका-यांमधील, कर्मचा-यांमधील गुणीजनांचे गुण आणि नेतृत्व- विशेष ओळखून, त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्यावर जबाबदारी सोपवून, नवे नेतृत्व घडविणारे त्यांच्यातले शिल्पकार दिसून येतात .तसेच ते आपल्या यशाचे वारस आपल्या सहका-यांना व सहभाग आणि साथ देणा-या कामगारांनाच मानतात.आणि  त्यांच्या यात त्यांच्या   विनम्रतेचे दर्शन वाचताना घडत जाते..

भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गोदी आणि बंदर कामगारांच्या अग्रगण्य पुढा-यांच्या मालिकेतील कौस्तुभरत्न– एकाच वेळी कामगारांच्या अनेक संघटनांच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले एस.आर.— कामगारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास, कामगारांच्या हितासाठी समर्पित झालेले एस.आर.– ” समर्पित नेतृत्व “—हा लेख वाचताना त्यांच्या कार्याचा सारा तपशील न सांगताच आपल्या अंतर्मनासमोर उभा राहतो..

कामगार चळवळींची मुहूर्तमेढ, ट्रान्स्पोर्ट अँड डाॅक वर्कर्स युनियनची स्थापना, समर्पित नेतृत्व, समानधर्मा सोबती आणि स्नेही, शक्तिशाली कामगार चळवळ,  वटवृक्षाची छाया, एस.आर.– एक विश्वस्त, असे या पुस्तकातील अनेक लेख वाचनीय आणि अभिमानाने उजळवून टाकणारे—

अश्या गुणसमुच्चयाचे एस आर कुलकर्णी—-

कामगारांना प्रकाशाकडे नेण्याच्या आपल्या व्रताला साठ उन्हाळे- पावसाळे पूर्ण करून पुढे पुढे चालत जाणारे एस.आर कुलकर्णी आपल्याला इथे वाचावयास मिळतात… नकळतच आपण त्यांच्या या उत्तुंग कर्तृत्वापुढे नतमस्तक होतो.

त्यांना उद्देशून ” जीवेत शरदः शतम ” चा घोष अनेक कामगारांच्या अंतःकरणात, मनामनात निनादत आहे, हीच त्यांच्या उत्तुंग कार्याची पावती आहे..

हे पुस्तक वाचताना मला एस. आर कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाची ओळख परत नव्याने झाली…

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आकाशवीणा – सौ वीणा आशुतोष रारावीकर ☆ परिचय – सौ.गौरी गाडेकर

सौ.गौरी गाडेकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  आकाशवीणा – सौ वीणा आशुतोष रारावीकर ☆ परिचय – सौ.गौरी गाडेकर ☆ 

पुस्तकाचे नाव : आकाशवीणा  

लेखिका : वीणा आशुतोष रारावीकर 

प्रकाशक :ग्रंथाली प्रकाशन 

किंमत :₹100/-

पदार्थविज्ञान, संगणक तंत्रज्ञान व व्यवस्थापन या विषयांत उच्च शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, विविध देशांत काम करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या वीणा आशुतोष रारावीकर यांचा ‘आकाशवीणा’ हा स्फुट लेखसंग्रह आहे.

या पुस्तकाचं वैशिष्ट्य त्याच्या नावापासूनच सुरू होतं. आकाशवाणीवर वीणा यांनी साधलेला संवाद म्हणजे आकाशवीणा.   कारण खरं तर, मुळात हे लेख नसून ‘ रेडिओ विश्वास ‘ वरून प्रसारित झालेल्या ‘ वीणेचे झंकार ‘, या वीणा यांनी सादर केलेल्या भाषणमालेतील भाषणं आहेत.

यात वीणांनी  हाताळलेल्या विषयांतील वैविध्य  वाचकाला  थक्क करून टाकतं.

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

‘कहानी टिफिन की’ या मातेच्या मनाला भिडणाऱ्या विषयापासून ते ‘सफर दिल्लीची’, ‘गोष्ट मुंबईची’ वगैरे त्या त्या शहराचं वैशिष्ट्य सांगणारे लेख यात आहेत.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरू केलेल्या ‘चांगुलपणाच्या चळवळी’वर दोन भाग आहेतच, शिवाय चांगुलपणाशी निगडित असणारे ‘मातृदिन ‘, ‘जन्म एका विशेष मुलाचा ‘, ‘दानयज्ञ’ वगैरे इतर लेखही आहेत. त्याचप्रमाणे, ‘आरशात पाहताना’, ‘आयुष्य जगण्याचा दुसरा चान्स मिळतो तेव्हा’चे तीन भाग,’ गीत माझ्या मनीचे ‘, ‘ ‘च’ची भाषा ‘, ‘ काळजी आणि अपराध’, ‘ रागाला निरोप देताना’, ‘ न्यायाधीश’, ‘स्पेस’ वगैरे लेख ताणतणावांचं नियोजन कसं करावं, याचं उत्तम मार्गदर्शन करतात. ‘चालढकल’ सारखा टाईम मॅनेजमेंटवरील लेखही यात आहे.

काही वेळा विषय थोडक्यात आटोपल्याची चुटपुट लागते. पण मुळात हे रेडिओवरील कार्यक्रम असल्यामुळे यात शब्द आणि वेळ  यांचं उत्तम गणित अपेक्षितच आहे.

लेख छोटेखानी असल्यामुळे व भाषा सुलभ,सुंदर, संवाद साधल्यासारखी असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून होतं.

हे पुस्तक वाचनीय तर आहेच, शिवाय मनोरंजनाबरोबरच विचार करायला व त्यानुसार आचार करायला लावण्याचं सामर्थ्यही त्यात आहे. हे वाचत असताना एखाद्या गोष्टीकडे वेगळ्याच नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.

मोठ्यांप्रमाणेच संस्कारक्षम वयाच्या विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक आवडेल. त्यांच्या मूल्यवर्धनास या संग्रहाचा नक्कीच हातभार लागेल.

अशाच प्रकारची आणखीही पुस्तकं वीणांनी लिहावीत, या शुभेच्छा.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ यशपुष्प….डाॅ.आशुतोष रारावीकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे

श्री विकास मधुसूदन भावे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ यशपुष्प….डाॅ.आशुतोष रारावीकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे  

पुस्तकाचे नाव – यशपुष्प

लेखक — डाँ आशुतोष रारावीकर

प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन

किंमत –  २०० रुपये 

कधीकधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सहज गप्पा मारत बसलेले असतो त्यावेळेस कोणीतरी मित्र किंवा मैत्रिण असं काही एखादं वाक्य बोलून जातात कि लगेचच त्या वाक्याला दाद देत आपण म्हणतो “आत्ता माझ्याकडे पेन आणि कागद असता ना तर ताबडतोब तुझं हे वाक्या मी टिपून घेतलं असतं”. आपल्या बोलण्याला आणखी दोन तीन मित्रांचा दुजोरा मिळतो आणि नंतर आपण तो प्रसंग आणि ते वाक्य दोन्हीही विसरून जातो.

मित्रहो, मी जर तुम्हाला सांगितलं की आयुष्याला वळण लावणा-या, क्वचितप्रसंगी आपलं कुठे काय चुकतंय हे सांगणा-या अशा वाक्यांचा समुच्चय असलेलं पुस्तक माझ्या वाचनात आलं आहे तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. “यशस्वी जीवनासाठी विचारपुष्पांचा खजिना” असं अधोरखित केलेलं वाक्य असलेलं “यशपुष्प” हे त्या पुस्तकाचं नाव आहे. डाँ आशुतोष रारावीकर यांनी हा वाक्य समुच्चय या पुस्तकाद्वारे रसिक वाचकांच्या हाती दिला आहे.

“यशपुष्प” या पुस्तकाचे लेखक डाँ आशुतोष रारावीकर यांच्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा! या दोन नावांचा समर्पक उपयोग करून डाँ आशुतोष रारावीकर यांनी या पुस्तकाचं नाव “यशपुष्प” असं ठेवलं आहे. डाँ रारावीकर यांचे वडील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ  होते तर आई संस्कृततज्ञ आणि साहित्यिक होती. स्वत: डाँ रारावीकर यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समृध्द आहे.

या पुस्तकात समाविष्ट केलेली काहीकाही वाक्यं आपलं कुठे चुकतंय ते सांगतात. आता हेच वाक्य पहा “शर्यतीत पुढे जाण्यासाठी दुस-याला पाडायचं नसतं ….. आपण आपला वोग वाढवायचा असतो” किंवा “पुढे जाताना कधी आणि कुठे थांबायचं हेही कळायला हवं. कधीतरी दोन पावलं मागे येणं हे सुध्दा दहा पावलं पुढे जाण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग असू शकतो” आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्या लक्षात येतं कि कधीकधी आपणही हे समजून न घेता बरोब्बर याच्या विरूध्द कृती आपल्याकडून केली जाते. “प्रयत्न हे आनंदाचं साधन नसून पूर्ती आहे …. ही अनुभूती .येते तेंव्हा जीवनात आनंदाशिवाय काहीच उरत नाही”. मित्रहो, हा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न कधीच अर्ध्यावर सोडायचे नसतात, पण आपण नेहेमीच ते अर्ध्यावर सोडून देतो त्यामुळे या वाक्याचा अर्थ आपल्याला कधीच गवसत नाही. उदाहरणादाखल दिलेली अशी काही वाक्यं या पुस्तकात विखुरलेली आहेत. यशस्वी जीवनासाठी या पुस्तकाचा गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आयुष्यात येणा-या निरनिरीळया प्रसंगी कसं वागावं किंवा कसं वागू नये हे या पुस्तकातली ही वाक्यं गंभीरपणे घेतली तर नक्कीच लक्षात येईल.

“गंध अंतरिक्षाचा, “स्मित लहरी”,  “लाँकडाऊनच्या वेळेत” आणि “पुष्पांजली परमेशाला” अशा चार भागात या पुस्तकातील विचारलहरी विखुरलेल्या आहेत.

सकाळ समूह, नाशिकचे माजी संचालक-संपादक आणि २०१० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून ग्रंथाली प्रकाशनातर्फे या पुस्तकाची तिसरी विस्तारीत आवृत्ती २० सप्टेंबर २०२१ला प्रकाशित झाली आहे.

© श्री विकास मधुसूदन भावे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈