सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “समाजभूषण २” – लेखिका – सौ. रश्मी उल्हास हेडे ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

समाजभूषण २ (व्यक्ती परिचय)

लेखिका :सौ. रश्मी उल्हास हेडे

प्रकाशक: सौ. अलका देवेंद्र भुजबळ(न्यूज स्टोरी टुडे)

पृष्ठे:१६८

सामान्यातलं  असामान्यत्व म्हणजे काय असतं याची प्रचिती मला समाजभूषण २ हे  सौ.रश्मी हेडे यांचे पुस्तक वाचताना आली. समाजभूषण १  हे पुस्तक मी वाचलेले होते. त्यावर लिहिलेही  होते.  त्यामुळे अर्थातच समाजभूषण २  हाही लेखसंग्रह वाचण्याची खूपच उत्सुकता होती. प्रकाशक  सौ. अलका देवेंद्र भुजबळ( न्यूज स्टोरी टुडे) यांनी हे पुस्तक प्रकाशित करून खरोखरच समाजापुढे यशाची व्याख्या, यशाचे मार्ग आणि यश मिळवण्यासाठी असावी लागणारी मानसिकता याचा एक सुंदर वस्तू पाठच सादर केला आहे.

या पुस्तकात ३७  जणांच्या जीवनकथा आहेत.  प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन रश्मी हेडे यांनी त्यांच्या जीवनातले नेमके मर्म ओळखून हा लेखन प्रपंच केलेला आहे.  आणि तोही एक निश्चित सकारात्मक दृष्टिकोन ठेवून.

कासार समाजाला भूषण ठरलेली ही सर्वच मंडळी म्हणजे तेजोमय रत्नासारखीच आहेत.  प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास जरी वेगवेगळा असला तरी या सर्व व्यक्तींमध्ये गुणात्मक साम्य आहे.  साधारणपणे ४० ते ६० वयोगटातल्या या व्यक्ती आहेत.  एखाद दुसरा अपवाद सोडल्यास याच वयोगटातली ही उल्लेखनीय मंडळी आहेत. शिवाय  हे पुस्तक वाचताना आणखी एक लक्षात येते की सर्वसाधारण आर्थिक स्तरातल्या या व्यक्ती आहेत.  कोणीही मुखात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत.  अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी जीवनाचे यशाकडे नेणारे मार्ग खणून काढले आहेत. कुणाचे जन्मस्थान, कुणाचे आई-वडिलांचे छत्र लहान वयातच हरवलेले, रितभात, परंपरा  श्रद्धा, अंधश्रद्धा यात अडकलेला कुणाचा परिवार, शिक्षणाविषयीची अनास्था, नाही तर पुरेशी शिक्षण व्यवस्थाच नसलेल्या ठिकाणचे वास्तव्य, अशा अनेक नकारात्मक वातावरणात शोधक वृत्तीने जगणारी ही माणसं आहेत. यांनी यशाचे शिखर कसे गाठले याच्या अक्षरशः थक्क करून सोडणाऱ्या आणि मनाला खिळवून टाकणाऱ्या या व्यक्तिकथा आहेत.

यांच्यात प्रामुख्याने आढळणारे गुण म्हणजे दृढ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोबल, आधुनिक विचारधारा, धाडसी निर्णय क्षमता आणि त्याचबरोबर प्रचंड मेहनत करण्याची तयारी अन् सदैव बाळगलेला नम्रपणा हे दुर्मिळ गुण या सर्वच ३७ जणांच्या ठायी आढळून येतात.  म्हणूनच उंच भरारी घेऊनही  यांचे चरण भूमीवर आहेत.आणखी एक म्हणजे कोणत्याही यशाने ते हुरळून गेलेले नाहीत. जगताना सामाजिक बांधीलकी,समाजाचे ॠण याचे भान त्यांनी  ठेवलेले आहे. सामाजिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी,अधिक समृद्ध, सुखदायी ,प्रगत करण्यासाठी त्यांची धडपड आहे.”आधी केले मग सांगितले,” किंवा “ केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे ” ही वृत्तीही आहे.

हे केवळ पुस्तक नाही ही यशाची गाथा आहे.  एक प्रेरणादायी दरवाजा आहे.  विविध क्षेत्रांमध्ये डौलाने वावरणारी ही यशस्वी माणसे वाचताना उर अभिमानाने भरून जातो.  जगी अशक्य काही नाही याचाच अनुभव येतो.  इम्पॉसिबल हा शब्दच या व्यक्तींच्या शब्दकोशात नाही.

…. “ जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, 

तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे “ …(ऋतुजा इंदापुरे)

 ….” मनुष्याची खरी ओळख त्याच्या नावावरून नव्हे तर त्याच्या कामावरून होते ” …(कर्नल महेंद्र सासवडे)

…. “ आयुष्यातील संघर्षमय परिस्थिती आपल्याला कणखर बनवते, शिकवून जाते. शिवाय एकमेकांच्या गुणांचा आदर करणारी नाती महत्त्वाची असतात.”….( प्रांजली बारस्कर)

…. ” मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है

पंख से कुछ नही होता, हौसलों से उडान होती है “…( मोहित कोकीळ)

…. ” जसा काळ तशी वेळ व त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून जो पुढे जातो तोच जिंकतो.  ज्या समाजात युवकांचा मोठा सहभाग असतो तेथे समाजाची प्रगती होते, कामाला गती मिळते.”    ( प्रकाश तवटे)

…. ” प्रत्येकाने आपले कुटुंब, समाज, जिल्हा व्यसनमुक्त ठेवावा म्हणजे कुटुंब उध्वस्त होणार नाही.  समाज आनंदी राहील.”…( ज्योत्स्ना शेटे )

…. “परमेश्वर त्यांनाच संकटे देतो ज्यांच्यात संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य असते. ते कष्टांना घाबरत नाहीत, त्यांच्यासाठी कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते.”… (निशिकांत धुमाळ)

….  “मोठे झाड लगेच दृष्टीस पडते, मात्र त्याचे प्रथम बी रुजावे लागते, खत पाणी द्यावे लागते, तेव्हा त्याचे एक सुंदर झाडात रूपांतर होते.  मूळ घट्ट रोवलेले असेल तर वादळातही झाड मोडत नाही, तुटत नाही “ …..( रवींद्र सासवडे)

…. ” हळद खाऊन केशर खात असल्याचा आव आणणारी आनंदी, सदा हसतमुख  अशी माझी नणंद माझा आदर्श आहे.”…( सुरेखा तिवाटणे)

…. ” हरलो तरी थांबायचे नसते, खिलाडू वृत्तीने अपयशही पचवायचे असते.।…( हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे)

…. ” लढा, पुढे चला व जिंकून दाखवा. अशक्य काहीच नाही.” (डॉक्टर सुनील अंदुरे )

…. ” जोडीदार निवडताना श्रीमंत— गरीब, शिक्षित —उच्चशिक्षित या तफावती बघू नका. स्वकर्तुत्वावर यशस्वी वाटचाल करा,” ( सुभाष साळवी)

…. ” शिक्षणाला संस्काराची जोड असली तर चमत्कार होतात.”…( डॉक्टर ज्ञानदेव कासार)

असे अनेक अनमोल संदेश या पुस्तकातून या व्यक्तींकडून, त्यांच्या जीवन कहाण्या वाचताना वाचकाला मिळतात. हे नुसतेच संदेश अथवा सुविचार नव्हेत तर त्या जगण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स आहेत.  वाचकाला त्या प्रेरणा देतातच.  मार्ग दाखवतात, दिलासा देतात, आशावादी बनवतात, मरगळ उतरवतात आणि तमाकडून प्रकाशाकडे नेतात.

ही अशी पुस्तके एकदाच वाचायची नसतात.  ती पोथीसारखी मनाच्या देव्हाऱ्यात जपायची असतात.  त्यांची पारायणं करायची असतात.

हे पुस्तक वाचताना मनात आणखी एक विचार येतो की यश म्हणजे काय? यशाची व्याख्या काय? पैसा,गाडी, बंगला ही भौतिकता की अजून काही वेगळे? यश म्हणजे स्वप्नपूर्ती. यश म्हणजे जीवनातले रचनात्मक बदल, ही सर्व उत्तरे या पुस्तकात मिळतात. यशाची वेगवेगळी परिमाणे इथे अनुभवायला मिळतात.

कोण हो ही माणसं?  ज्यांचं नाव माहीत नाही, ज्यांना झगमगीत वलय नाही, ज्यांचे फोटो नाहीत, बातम्या नाहीत पण तरीही वाचनीय, आदर्शवत ,प्रेरणादायी अशी ही माणसे !  कोळशातले हिरे, चिखलातली कमळं ! समाज यांच्यामुळे घडतो, सावरतो.

या पुस्तकात जरी एका विशिष्ट समाजातल्या व्यक्तींच्या यशाचा विचार केलेला असला तरी हे पुस्तक जातीयवादी नाही, तर ते प्रातिनिधिक स्वरूपात लिहिलं गेलं आहे हे विशेष.

 ” रश्मीताई ! तुमच्या अप्रतिम कामगिरीला माझा मानाचा मुजरा ! यातल्या काही व्यक्तींविषयींचे, श्री देवेंद्र भुजबळ यांनी संपादन केलेले आहे त्यांनाही दंडवत ! आणि अलकाताई, तुम्ही या लेखन प्रपंचाची दखल घेतली म्हणून तुम्हालाही सलाम ! अशीच दर्जेदार, समाजाला घडवणारी, समाजभूषण पुस्तके आपण प्रकाशित करावीत… त्यासाठी खूप खूप शुभेच्छा !” 

जाता जाता एक अजून सांगावसं वाटतं ते या पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या अगोदरच्या पानाविषयी. त्यावरचं चित्र मला अतिशय बोलकं वाटलं.  शिखरावर पोहोचलेली एक व्यक्ती प्रयत्नपूर्वक चढाव चढणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे करते …  वाह ! क्या बात है ! कृष्णधवल छटांमधल्या  या दोन सावल्या जीवनाचं मर्मच सांगून जातात…

….  एकमेका सहाय्य करू।

      अवघे धरू सुपंथ।।

परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments