मराठी साहित्य – विविधा ☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट 🌹

तीन डिसेंबर ! जागतिक अपंग दिनानिमित्य माझ्या एका अविस्मरणीय भेटीचा अनुभव आपल्या समोर मांडते.

स्थळ- पुण्यनगरी नाशिक,

सरळ भेटण्याचा आणि पत्र व्यवहाराचा पत्ता-  श्री काशीनाथ देवराम महाजन, फ्लॅट नं १४, मधूसूदन अपार्टमेंट, त्रिवेणी पार्क, जेलरोड, नाशिक- पिनकोड – ४२२१०१, फोन नंबर – ८४५९३०००७६

माझी या स्थळी पोचण्याची सांजवेळ साधारण ५. मंडळी वरील नामनिर्देशित व्यक्ती प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी कैक जण त्यांना कविसंमेलनात भेटले असाल एक कवी, अध्यक्ष, निमंत्रित अन बरेच कांही. आमच्या भेटीचा योग्य मात्र अचानकच आला पण मी मात्र त्यांचे नाव आमचे मित्र महेंद्र महाजन (मुक्काम सटाणा) यांच्या स्वरातून ऐकले होते. पर्यावरण, सायकल, भाऊबीज अन अजून विषयांवर, स्वर महेंद्रचे अन कविता-गीत काशिनाथ महाजन. सटाणा येथे महेंद्रची भेट झाल्यावर मी   त्यांना माझी नुकतीच प्रकाशित पुस्तके भेट दिली आणि तसेच काशिनाथ सरांना देखील एक संच द्यायची विनंती केली. मात्र माझे भाग्य जोरावर नक्कीच होते. महेंद्रने मला नाशिकला त्यांना प्रत्यक्ष भेटून पुस्तके द्यावीत असा सल्ला दिला.

त्यानुसार मी   काशिनाथ सरांची भेटीकरता वेळ मागितली अन त्यांना भेटले. त्यांना अंध म्हणणे म्हणजे त्यांच्या दिव्यदृष्टीचा अपमानच होय असे जाणवले. त्यांच्या जीवनाच्या प्रखर जाणीवा त्यांच्या अनुभवातून आहेत की चैतन्यमय अनुभूतीतून आहेत हा मला पडलेला मूलभूत प्रश्न! त्यांनी मला भेटीची वेळ दिल्यावर त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख असलेला लेख मला अग्रेषित केला. तो माझ्या या या लेखासोबत अग्रेषित करीत आहे. त्यांनी अंधत्वामुळे आलेल्या अंधाराचे एक भव्य दिव्य प्रकाशज्योतीत रूपांतर कसे केले याचे मला नवल वाटते. लहानसहान अडचणींचा उदो उदो करणारे आपण वास्तविक परिस्थितील आशेच्या प्रकाशाच्या कवडश्याकडे कसे दुर्लक्ष करतो याचे प्रत्यंतर मला या भेटीत प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या सोबत घालवलेला अंदाजे दीड तास त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रकाशलेला होता. आपल्या दिव्य दृष्टीने माझ्याशी आनंदाने संपर्क साधत त्यांनी जणू संपूर्ण वातावरण भरून टाकले होते. ‘असा कुठलाच विषय नाही ज्यावर मी कविता रचली नाही’, हे मला तेव्हा अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटले, पण भेटीनंतरच्या त्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर मला सामील करून घेतल्यावर त्यांच्या कवितांचा जो ओघ सुरु आहे तो मला स्तिमित करून टाकणारा आहे. किंबहुना त्यांच्या संपूर्ण कविता वाचायचे म्हटले तरी आपले वाचन तसेच फास्ट हवे! या कवितांचे विषय विविध तर आहेतच, पण त्यांचे मन इतके संवेदनशील आहे की त्यातून उगम पावलेल्या आत्मानुभूतीच्या तीव्र आवेगातूनच त्यांच्या कविता उत्स्फूर्तपणे जन्मतात असे जाणवते. आपल्याला असलेल्या दृष्टी लाभामुळे आपले मन बऱ्याच ठिकाणी भरकटत असते, मात्र या दिव्यांग व्यक्तीचे मन भावानुभूतीत केंद्रित असते असे मला वाटते, म्हणूनच हा कवितांचा जलौघ सतत त्यांच्या दिव्यांग लेखणीतून प्रसवत असावा!

मंडळी त्यांच्या भेटीदरम्यान अनौपचारिक अन खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण अति लोभस होते. त्यांची काळजी घेणारा मुलगा, गोडगोजिरी नात, अन सर्वार्थाने त्यांची ‘पूर्णांगिनी’ शोभेल अशी सहचारिणी रेखा (त्यांची पूर्वाश्रमीची मामेबहीण) हिच्याविषयी मनात इतका आदर निर्माण झाला की, तो शब्दात मांडू शकत नाही. सौ रेखा ही काशिनाथ सरांची भाग्यरेखा म्हणून शोभत होती. रुचकर उपहारासोबत काशिनाथ सरांकडून त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीची माहिती देणे आणि जाणून घेणे सुरु होते. त्यांचा घरातील वावर आणि संवाद साधण्याचे कौशल्य बघून आणि ऐकून कुठेही भास होत नव्हता की त्यांना दिव्य चक्षूच मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच मी या महान कवीला नि:संकोचपणे एक कविता ऐकवण्याची विनंती केली. कसलेच आढेवेढे न घेता त्यांनी माझ्या विनंतीला लगेच मान्य करीत एक कविता ऐकवली. त्यासाठी ब्रेल लिपीच्या त्यांच्या संग्रहातून लगोलग स्वतः कविता शोधून, त्यांनी तालासुरात आणि भावपूर्ण स्वरात स्वतःची कविता ऐकवली. मंडळी त्यांच्या कविता अशाच गेय आहेत! महाराष्ट्रातील कैक व्यक्तींनी त्या कवितांना आवाज दिलाय. यू ट्यूब वर त्या उपलब्ध आहेत. सदर कविता होती ‘चैतन्य चक्षू’. अत्यंत प्रेरणादायी अशी ही कविता, तो अनुभव विडिओत रेकॉर्ड करून जपून ठेवलाय. या लेखासोबत सदर व्हिडिओची यू ट्यूब वरील लिंक शेअर करीत आहे. स्वतःचे जीवन समृद्ध असलेल्या या विलक्षण कवीचे कौटुंबिक जीवन देखील सुखमय आहे. मुले आयुष्यात स्थिरस्थावर झालेली, पत्नीची अखंड प्रेमपूर्ण साथ, हे सर्व मला या भेटीत अनुभवास येत होते या प्रेमळ कुटुंबासोबत फोटो काढणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती अन आठवणींचा खजिना देखील!

प्रसिद्ध लेखक विश्वास देशपांडे लिखित रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांचे मी हिंदी आणि इंग्रजीत केलेले अनुवाद त्यांना भेट दिले तेव्हा ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांनी मोठया अगत्याने मला भेट दिले. या भेटीतून मी किती अन कशी ऊर्जा घेतली याचा अनुभव शब्दातीत आहे. आयुष्यातील कैक वर्षे मागे गेल्याचा फील आला. जराजराश्या दुःखाने खचून जाणाऱ्या स्वतःच्या जीवनातील क्षण आठवून मनात अपराध बोध देखील जागृत झाला. या उलट दुःखाचे किंवा आपल्यातील न्यूनाचे भांडवल न करता सुखाने जगणाऱ्या या आनंदयात्री व्यक्तीला माझे या जागतिक अपंग दिनी कोटी कोटी प्रणाम! काशिनाथ सरांना अशीच अक्षय ऊर्जा मिळत राहो आणि त्यातून या सरस्वतीपुत्राच्या आधीच पाच कवितासंग्रहांनी समृद्ध असलेल्या साहित्यिक खजिन्यात दर दिवशी नवनवीन माणिक मोत्यांची भर पडो ही आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना!   

धन्यवाद!🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)

? विविधा ?

☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

बकुळ फुलांनो हळूच या,जुई माझी विसावलीय जरा!नका करू दंगा मस्ती,दुरूनच न्याहाळा तिच्या बंद पापण्यात विसावलेलं आकाश!  खरंच तिला तुम्ही अलवार जोजवा हं !थोडया विसाव्यानंतर ती नक्कीच टवटवीत होईल तिच्या नाजूक बहराला घेऊन,मादक सुगंधासह विहारण्यास वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आणि मग अवघा आसमंत एक होईल!तिच्या मादक गंधात दरवळून निघण्यासाठी!गंधात आत्ताच न्हाऊन आलीय ती! तिच्या मोहिनीने वेडावून तिमीर सुद्धा बघा कसा दाट होऊ पाहतोय…हवं तर खात्री करून घ्या,तिच्या गर्द कुंतलामधील मारव्याला हुंगुन!पण हळूच!स्पर्श केलाच आहे तिला तुम्ही

तर थोडं हितगूजही करून जा तिच्या गूढ भावनांशी,पण जरा सुद्धा धक्का लावू नका तिच्या हिरवाईने नटलेल्या स्वाभिमानरुपी देठाला कारण तिनं तिचा उभा जन्म साकारलाय तिच्या स्वप्नांना ओंजळीत सामावून घेण्यासाठी .मृदेतील प्रत्येक कणाशी मृदा बनून दोस्ती केलीय तिनं स्वतः फूल म्हणून जन्मण्यासाठी आणि ती जाणून ही आहे सूर्योदया पूर्वी पर्यंतच तिच्या क्षणभंगूर जगण्याच रहस्य.आणि बकुळफुलांनो तो बघा तो पवन कसा सावरत आहे तिच्या कुंतलाना हळुवार शीळ घालून, गात आहे अंगाई गीत, तिच्या निश्चिन्त निजेसाठी!कारण त्याला जाणीव आहे तिच्या निस्वार्थ जीवनप्रवासाची स्वतःला सिद्ध करणाऱ्या तिच्या अविरत कष्टाची!भाकरीचा चंद्र शोधून पिलांच्या ओढीन घरट्याकडे परतणारी पाखरे पण तिच्या जवळ येऊन पंखांची हलचाल स्थिरावून एक गिरकी घेऊन जात आहेत अंदाज घेऊन तिच्या निजेचा!

जरा धीर धरा बकुळ फुलांनो,तिच्याशी गप्पा मारायला. कारण सांजेला तिनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ती थोड्याच वेळात जागी होईल,नवा सुगंधी जन्म लेवून  आणि तिचा सगळा क्षिणवटा कुठल्या कुठे दूर पळून गेलेला असेल या छोट्या विसाव्याने!आणि गुंग होऊन जाईल ती मंद धुंद मारव्यासह गारव्याला साथीला घेऊन तुम्हा सख्यांशी हितगूज करण्यासाठी!

© सीमा ह. पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाचावी बहुतांची अंतरे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

वाचावी बहुतांची अंतरे…  ☆ श्री विश्वास देशपांडे

केवळ दोन वर्षांचा असलेला प्रणाद त्याच्या आईवडिलांसोबत एका पुस्तक महोत्सवात गेला. तेथील एका स्टॉलवर असणारे आकर्षक छोटे पुस्तक पाहून हे पुस्तक मला पाहिजेच म्हणून त्याने हट्ट धरला आणि मग त्याच्या आईबाबांना ते पुस्तक घ्यावेच लागले. त्या लहानग्याला वाचता येत नव्हते पण पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रांनी त्याला आकर्षित केले. माझ्या मते हा पुस्तकाचा सगळ्यात छोटा ग्राहक असावा आणि हेच पुणे येथे भरलेल्या पुस्तक महोत्सवाचे वेगळेपण आहे असे मला वाटते. आपल्या मुलांना अनेक ठिकाणे दाखवण्यासाठी आपण घेऊन जातो पण पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या पुस्तक महोत्सवाला जरूर जावे असे मला वाटते आणि अनेक सुज्ञ पालक तसा लाभ आपल्या मुलांना मिळवून देत आहेत.

आजच्या मोबाईलची क्रेझ असलेल्या जमान्यात आपल्या मुलांवर जर वाचनसंस्कार करायचा असेल तर असे हे पुस्तक महोत्सव त्यांना दाखवायलाच हवे. ही आधुनिक पर्यटनाची ठिकाणे समजावीत. अनेक शाळा देखील या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना हा पुस्तक महोत्सव दाखवण्यासाठी घेऊन येताहेत. या पुस्तक महोत्सवात येणाऱ्या रसिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. आल्याबरोबर त्याचा मोबाईल क्रमांक आणि नाव लिहून घेतले जाते आणि त्याला दोन सुंदर पुस्तकांची भेट दिली जाते. पुस्तक महोत्सवातून हा रसिक वाचक भलेही पुस्तक खरेदी करेल किंवा नाही हे सांगता येणार नाही, पण बाहेर पडताना आपल्या सोबत तो दोन पुस्तके मात्र नक्की घेऊन पडतो आणि सोबतच हृदयात साठवलेले पुस्तक महोत्सवाचे दृश्यही.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात भरलेल्या या महोत्सवात आल्याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपले स्वागत करतात आणि आपल्या हातात एक पुस्तक देऊन एक परिच्छेद वाचायची विनंती करतात. यातूनच एक नवा आणि चौथा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. तो म्हणजे ‘ लार्जेस्ट ऑनलाईन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्युरेशन ऑफ थर्टी सेकंड्स ‘ या अभियानाअंतर्गत तब्बल अकरा हजार पेक्षा जास्त लोकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद वाचला आणि हा एक अनोखा विश्वविक्रम या ठिकाणी नोंदवला गेला. या वाचनात मला सह्भाग देता आला त्याचा आनंद नक्कीच आहे. त्यासोबतच आणखीही तीन विश्वविक्रमांची नोंद या महोत्सवाच्या निमित्ताने झाली. आपल्या पाल्याला गोष्ट सांगण्याच्या उपक्रमात तब्बल ३०६६ पालक सहभागी झाले होते. दुसरा विश्वविक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या १५० विद्यार्थ्यांनी ७५०० पुस्तकांचा वापर करून ‘ भारत ‘ हा शब्द साकारला. आणि तिसरा विश्वविक्रम म्हणजे तब्बल १८ हजार ७६० पुस्तकांच्या साहाय्याने ‘ जयतु भारत ‘ हे प्रेरणादायी शब्द साकारण्यात आले.

साहित्य संमेलनात असतात तसेच अनेक मुलाखतीचे किंवा चर्चासत्राचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत. अनेक मान्यवर लेखक, शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते या महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत, संबोधित करीत आहेत. हा महोत्सव साकारण्यासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत आणि नियोजन केल्याचे सहजच लक्षात येते. येथे येणाऱ्या रसिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आयोजकांनी घेतल्याचे लक्षात येते. अनेक नामवंत प्रकाशन संस्था यात सहभागी झाल्या आहेत. अनेक मान्यवर संस्थांनी या महोत्सवाच्या आयोजनात सढळ हाताने मदत केली आहे. सर्वांच्या सहभागाचे आणि सहकार्याचे हे एकत्रित फळ आहे. अशा या महोत्सवांकडे केवळ एक उपक्रम म्हणून पाहून चालणार नाही. हा आपला ज्ञान आणि संस्कृतीचा महोत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही.

या पुस्तक महोत्सवाच्या काळात माझे काही कारणाने पुण्यात येणे झाले आणि पुण्यातील दोन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. त्यातील पहिली ऐतिहासिक गोष्ट म्हणजे पुण्यात १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर आणि वर उल्लेख केलेला पुस्तक महोत्सव. दुसरी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे अयोध्येत होणाऱ्या राममंदिरातील प्रभू रामचंद्रांसाठी ‘ दोन धागे रामासाठी ‘ हा सौदामिनी हॅन्डलूम येथे अनघा घैसास यांच्या प्रेरणेतून सुरु आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभे राहते आहे. या मंदिरातील मूर्तीसाठी दोन धागे आपणही विणावे, आपलाही खारीचा वाटा त्यात असावा असे प्रत्येकाला वाटल्यास नवल नाही. याच भावनेतून लाखो पुणेकर आणि अन्य प्रांतातील लोकही येथे एकत्र येऊन जाती, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन रामरायासाठी वस्त्र विणत आहेत. हे एक आगळेवेगळे राष्ट्रभक्तीचे, रामभक्तीचे उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे २०२३ या वर्षाचा डिसेंबर महिना यानिमित्ताने निश्चितच माझ्याच काय परंतु समस्त पुणेकर आणि पुस्तकप्रेमी मंडळींच्या लक्षात राहील.

आपण विविध महोत्सव साजरे करतो पण हा एकाच छताखाली साजरा होणारा हा पुस्तक महोत्सव अनेक दृष्टींनी आगळावेगळा आहे. या महोत्सवात पुस्तकांचे जवळपास २५० स्टॉल्स आहेत आणि १५ भाषांतील प्रकाशित पुस्तके या ठिकाणी वाचकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. धार्मिक पुस्तकांपासून तर वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकांपर्यंत आणि बालवाचकांपासून महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी सुमारे दोन लाख पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या, बघा, खरेदी करा आणि वाचा असं आवाहन जणू ते करीत आहेत. अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन दिल्लीत दरवर्षी होणाऱ्या पुस्तक मेळ्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आबालवृद्ध या महोत्सवाला भेट देत आहेत.

या महोत्सवामुळे अनेक लेखक, कवींची पुस्तके पाहण्याची, वाचण्याची आणि खरेदी करण्याची संधी वाचकांना मिळते आहे. वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर येथे येऊन ‘ वाचावी बहुतांची अंतरे ‘ असेच म्हणावे लागेल.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आजकाल खरोखरीच खूप जास्त अच्छे दिन आलेले आहेत . महागाईच्या नावाने ओरडत ओरडत प्रत्येक जण आपले सगळे सणसमारंभ, सोहळे धूमधडाक्यात पार पाडतोय. ऐच्छिक गोष्टी केव्हा आवश्यक सदरातून अत्यावश्यक सदरात शिफ्ट झाल्यात ते आपले आपल्यालाही कळलेच नाहीं.पूर्वीची कुठल्या गोष्टीसाठी किती पैसा द्यायचा असतो ही गणितच मुळी हौस ह्या सदराखाली संपूर्णपणे बदलल्या गेली आहेत. फक्त हे करतांना ह्या ऐच्छिक गोष्टी प्रघात बनून कुणाची गैरसोय बनू नये ही इच्छा.

मध्यंतरी एक बातमी वाचनात आली आणि मन खरचं खूप सुन्न झालं.एक शाळकरी मुलाने त्याच्या आईबाबांनी वाढदिवस आजच्या पध्दतीनुसार साजरा करु दिला नाही म्हणून आत्महत्या केली. सगळ्यां करीताच विचारात पाडणारी दुःखद घटना आणि त्या पालकांच्या सांत्वनासाठी शब्दही सुचेना.

हल्ली  जग बरचसं आभासी झालयं. सोशल मिडीया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करताय ह्यावर ते फायदेशीर की नुकसानकारक हे ठरणार आहे. जे मोठमोठे इव्हेंट सहज साजरे होताना मोठया स्क्रीनवर बघितल्या जातात ते प्रत्यक्षात अमलात आणणं खूप कठिण असतं हे कुठेतरी सगळ्यांना कळायला हवे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस ही खरोखरच कुटूंबातील आनंददायी घटना.या प्रसंगातून सगळेजण एकमेकांच्या मनाशी जोडल्या जातात.असे कुटुंबातील छोटेछोटे समारंभ आनंद देतात, एक प्रकारचे चैतन्य निर्माण करतात.

पण दुर्दैवाने ह्याचे स्वरुप, त्याचा अतिरेक हा समाजासाठी खरोखरच डोकेदुखी ठरला आहे.प्रेम म्हणजे मनाशी मनाचे जुळलेले नाते,त्याग ह्या संकल्पना सोडून वरपांगी दिखाऊ प्रदर्शनीय बाब होऊ घातलीय.

हे अवर्णनीय आनंद देणारे कौटुंबिक प्रसंग ज्यांना आम्ही मराठी मध्ये “समारंभ”किंवा “सोहळे” म्हणतो त्याचे रुपांतर आभासी,दिखाऊ अशा “इव्हेंट” मध्ये झालेय.आणि खरोखरच हे “इव्हेंटचे भूत” सर्वसामान्य माणसाच्या अक्षरशः बोकांडी बसलयं

फेसबुक किंवा व्हाट्सएपवर वाढदिवसाचे किंवा लग्नाच्या वाढदिवसाचे केक कापतांनाचे फोटो एकदा आपलोड केले की जणू आपल्या सुखी जीवनाचा पुरावा सादर केल्यासारखी भूमिका काही लोक सादर करतात. कुठल्याही इव्हेंट मध्ये जाणे,तिथे सेल्फी काढून ते भराभर अपलोड करणे, खरचं ही सुखाची परिभाषा आहे का हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस, प्रीवेडींग शूट हे ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी उत्तमचं . पण ह्या सगळ्या गोष्टींचा पायंडा पडतोय हे खूप घातक.ह्या आभासी सुखामुळे,ह्या पायंड्यामुळे कितीतरी मुलं नैराश्येच्या खाईत लोटल्या जातात आहे हे पालकांना समजूनच यायला मुळी खूप ऊशीर होतोय.

ह्याची सुरवात होतांनाच पालकांनी जागरूकतेने ह्याबद्दल मुलांना नीट समजावून दिले तर ती सगळ्यांसाठीच खूप फायद्याचे ठरेल पण त्यासाठी आधी पालकांनी आधी या “सो काँल्ड आधुनिकतेला” आळा घालणं गरजेचं आहे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

दोन दिवसापूर्वी एक वाक्य ऐकले आणि लगेच त्याचा प्रत्यय पण आला. ते वाक्य एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकले. ज्या वेळी प्रत्यक्ष कार्यक्रम म्हणजे लाईव्ह प्रोग्रॅम बघतो त्या वेळी असे अनुभव येतात. त्या कार्यक्रमात तबलजी इतका निष्णात होता. की त्याने लावणी पूर्वीची ढोलकी तबल्यावर वाजवली. ऐकायला फारच अप्रतिम! डोळे बंद  केल्यावर तर हा तबला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड होते. त्यातील निवेदकाने आधीच एक वाक्य वापरले होते, ते म्हणजे वेळेवर शिट्टी येऊ द्या. आणि ते वाक्य ऐकून हसू आले. कारण माझीच कायम अशी फजिती होते. लावणीला शिट्टी मारायची तयारी केली तर ती पुढच्या भक्तिगीताला तरी वाजते किंवा एखाद्या दुःखी गाण्यात तरी वाजते. मग असे होऊ नये म्हणून मी तो नादच सोडला आहे.

अजून एक प्रसंग आठवला एका अंत्य यात्रेत कोणाचा तरी फोन वाजला आणि रिंगटोन वर गाणे वाजले अकेले अकेले कहा जा रहे हो सोबतच्या लोकांना मोठाच पेच पडला, हसावे की रागवावे?

काही प्रसंग तर असे घडतात की आपण विचारात पडतो. एका लग्नात बँडवर गाणे वाजत होते छोड गये बालम आणि दिल का खिलौना टूट गया किंवा परदेसियो से ना आंखिया मिलाना ही तर जणू लग्नात वाजवण्याची फेवरेट गाणी.

आणि पूर्वीच्या लग्नाच्या पंक्तीत कायम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे श्लोक ऐकू यायचा. पूर्वी लग्न लागल्या नंतर नवरी वरपक्षाच्या खोलीत जायची. तिथे सगळे कौतुकाने तिच्याकडे बघत असायचे. कोणी चेष्टा करायचे,तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. अशाच एका प्रसंगाची नेहेमी आठवण येते. अशाच एका लग्नात त्या वधूला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. आणि तीने गाणे म्हंटले न जाओ सैया हे ऐकून काय प्रतिक्रिया आली असेल, कल्पनाच करु शकत नाही.

अशा गमती जमती पावलो पावली अनुभवायला मिळतात. मुले तर फार मजेशीर असतात. मुलांच्या व शाळेत अनुभवलेल्या गमती जमती पुन्हा केव्हातरी.

अशी गंमत फजिती कायम अनुभवायला येते. आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नाही.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चरैवती चरैवती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ चरैवती चरैवती…  ☆ श्री विश्वास देशपांडे

तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ‘ रामम रमेशम भजे ‘ असे शब्द यायचे. लहानपणी ‘ भजे ‘ म्हणजे भजणे किंवा आळवणे  हा अर्थ माहितीच नव्हता.  पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.

तसेच कधीतरी ‘ चरैवती चरैवती ‘ हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ‘ सारखा चरत असतोस ‘ त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ‘ चरैवती चरैवती ‘ शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता.

नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील ‘श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं

यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥’

यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका) अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध  सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला.

पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते.

झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ‘ दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ‘ चरत जा ‘ ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ‘ बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ‘ डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ‘ यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,’ अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ‘

मग काय पुन्हा ‘ चरैवती चरैवती ‘ आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू.

लेखक – श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक तास एक मिनिट… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

एक तास एक मिनिट… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सकाळी मेडिटेशन केल्याने त्याचे फायदे दिवसभर राहतात.परंतू इतर विचार,नकारात्मकता,अनुभव या मुळे एनर्जी हळूहळू कमी होते.या साठी आपण पुढील उपाय करु शकतो.

सकाळी जी सकारात्मक वाक्ये म्हणतो किंवा जे संकल्प करतो तिच वाक्ये रात्री झोपताना म्हणावीत.म्हणजे पुढील ६/७ तास तेच विचार मनात राहतात.व सकाळी  त्याचा परिणाम दिसतो.

ती वाक्ये पुढील प्रमाणे असावीत.

मी वैश्विक शक्तीचा पवित्र अंश आहे.

निसर्ग शक्ती माझ्यात पुरेपूर आहे.

मी आमच्या घरातील माणसे सुखी व आनंदी आहेत.

सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.

जर काही प्रॉब्लेम किंवा शरीरिक व्याधी असतील तर ते प्रॉब्लेम सकारात्मक पद्धतीने सुटलेले आहेत असे म्हणावे.व काही व्याधी,दुखणी स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाला असतील तर त्याची नावे ( आजाराची व संबंधित व्यक्तींची ) घेऊन ते व्याधी मुक्त झालेले आहेत असे म्हणावे.

जसे वाहनांचा गोंधळ कमी करून सर्वांना आपल्या इच्छीत ठिकाणी वेळेवर पोहोचता यावे म्हणून ठिकठिकाणी सिग्नल्स असतात त्या प्रमाणे आपणही करु शकतो.मना साठी सिग्नलची व्यवस्था करु शकतो.

जर आपले मन स्वच्छ  करायचे असेल किंवा गोंधळ कमी करायचे असतील तर एक तास एक मिनिट याचा अवलंब करावा.

दर एक तासाने एक मिनिट विश्रांती घ्यावी.तीन दीर्घ श्वास घ्यावेत.आणि डोळे बंद करुन वरील वाक्ये म्हणावीत.

या पद्धतीने भरकटणाऱ्या मनाला आवर घालू शकतो.व मनाला वारंवार त्या सूचना देऊ शकतो.मनाला त्या सूचना दिल्या की शरीर त्या प्रमाणे आपले कार्यक्रम ठरवते.

वरील संकल्पा साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळे – ऋतूंचे…भाग २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

(श्रावणातला प्रत्येक  दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचा असतो.सणावाराला रेलचेल असणारा ऋतू !)

चौथा ऋतु शरद! स्वच्छ निरभ्र आकाश, रात्रीचं टिपूर चांदणं, ते पिण्यासाठी आतुर चकोर, काव्याच्या चांदण्याची बरसात,’ चांदणे शिंपीत जाशी’, ‘ टिपूर चांदणे धरती हसते’, ‘चांदण्यात फिरताना’ ! सण म्हणाल तर शारदीय नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा! कोजागिरीला (शरद किंवा आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात) चंद्राची पूजा करायची, त्याला ओवाळायचं , चंद्र हा मातृकारक म्हणून मातृत्वाचा पहिला पाझर अनुभवण्याचं सुख दिलेल्या ज्येष्ठ अपत्याला ही ओवाळायचं, चंद्राच्या सर्वात प्रखर अशा चांदण्याची गुण शक्ती दुधाद्वारे प्राशन करायची, आनंदा बरोबर कृतज्ञता ही व्यक्त करायची. कुठे थिल्लरपणा नाही,सारं वैचारिक, जाणिवांचं नेणतेपण जपणारे सण! आणखी कोणता सण? विचारू नका. वर्णन संपणारच नाही. मी वर्णन करणार पण नाही.फक्त डोळ्यासमोर पणत्यांची आरास, आकाशदिवे, फराळाची ताटं आणा आणि कल्पनेतल्या आनंदात बुडून जा.

अर्थात दिवाळी हा सण मराठी महिन्याप्रमाणे येत असल्यामुळे कधी शरदात तर कधी हेमंतात  येतो.

पाचवा ऋतू हेमंत! गार बोचरा वारा, हुडहुडी भरणारी थंडी, गोधडीच्या उबेत शिरणारी, अगदी रविवारी तर दुपारी सुध्दा गोधडी घ्यायची, झोप लागली नाही तरी गुडूप पडण्यात मजा असते, मग उठल्यावर गरम भजी लागतेच. दारोदारी शेकोटीच्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या रंगतात.मग येतो धुंधूर मास, सूर्याचा धनू राशी प्रवेश!आरोग्य शास्त्र आणि भक्ती यांचा संगम! पहाटे विष्णू पूजन ( काकडा) मग सूर्य पूजन करून, नैवेद्य दाखवून सूर्योदयाला जेवणे महत्त्वाचे!खिचडी, बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, भाज्या, गाजर हा आहार असतो. ब्राह्म मुहूर्ताला आराधना, नामस्मरण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. सूर्याचा मकर राशी प्रवेश झाला की धनुर्मास संपतो.मग संक्रांत, तिळगुळ, हळदीकुंकू, नव्या वधूचा सण, लहान बाळाचं बोरन्हाण अशा सामुदायिक सणांची रेलचेल, भाज्यांची सम्राज्ञी शाकंभरी,तिचं नवरात्र, असा हा आरोग्यदायी ऋतु!

सहावा ऋतू शिशिर! सुरवातीला हेमंतासारखा, थंडी जरा आणखी वाढवणारा! दवबिंदुंनी नटलेली सृष्टी, पण पुष्पहीन झाल्यामुळे थोडासा उदास वाटणारा! जणू हा थकलेल्या सुष्टीला निजायला सांगतो, परत नव्या उत्साहानं वसंताचं स्वागत करण्यासाठी! तरी रंगीबेरंगी पानांचा सडा, गुलमोहरा सारखं सौंदर्य मनाला मोहून टाकतंच ! पडलेल्या पानांची होळी करून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगांची उधळण करूनआनंद साजरा करायचा,कारण वसंत येणार!

ऋतूंचे वर्णन आलं म्हणजे कालिदास आठवणारच. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ ऋतुसंहार ‘,यात सगळ्या ऋतूंचे क्रमाने वर्णन आहे. त्यांची सुरवात ग्रिष्माने तर शेवट वसंताने आहे. एकतर कालिदासाच्या सर्व रचना सुखांत आहेत म्हणून असेल किंवा अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात पहिला ऋतू म्हणून ग्रीष्म आहे, त्यामुळे असेल. कालिदासाच्या या ‘ ऋतुसंहार ‘ ची अगदीच एक दोन वाक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न!

ग्रीष्म ऋतूत शीतल चंद्र हवासा वाटतो, पण गारवा मिळवण्यासाठी कारंजाचा उल्लेख कवीने केला आहे आणि एरवी एकमेकाच्या जीवावर उठणारे प्राणी सुध्दा आता एकदिलाने जलपान करताहेत, असे वर्णन आहे.

वर्षा ऋतू राजाप्रमाणे वाजत गाजत येतो, स्त्रिया पाण्याने भरलेले घडे त्याच्या पायावर घालत आहेत, शृंगारलेले हत्ती, चौघडे पुढे चालले आहेत, कमळे नसल्याने भुंगे भ्रमित झाले आहेत, त्यामुळे ते मोराच्या पिसाऱ्यावर भाळले आहेत.

शरद ऋतू मधे कोजागिरीच्या चांदण रात्री धरती आणि आकाश दोन्हीकडे समृद्धीची भरती आली आहे. तळ्यात राजहंस फिरू लागले आणि आकाशात चंद्रमा! कवीला निसर्गाकडे पाहून स्त्रीचा शृंगार दिसतो तर स्त्री च्या शृंगारात निसर्ग सापडतो.

हेमंत ऋतू चे वर्णन करताना कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे अप्रतिम शिल्प आहे, त्याचा आधार घेऊन हेमंत ऋतूतील शृंगाराचे वर्णन केले आहे.

शिशिर ऋतू फारसा न आवडणारा असावा, कारण कवी हिमालय परिसरात राहणारा असल्यामुळे हिमवर्षाव, हिमांकित थंड रात्रीचे वर्णन आहे.शेवटच्या श्लोकात संक्रांत सणाचा उल्लेख आहे.

वसंत ऋतू खूपच आवडता!

शृंगार रसाची मनापासून आवड असल्यामुळे या ऋतूचे वर्णन फार सुंदर केले आहे. मदन जणू योद्धा बनून काम युद्ध जिंकण्यास निघाला आहे असे वर्णन केले आहे. आंब्याचे झाड, त्याचा आकार, सावली, त्याचा डौल, मोहराचा धुंद करणारा गंध, कोकिळेला फुटलेला कंठ, रस रंग व गंध यांचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असणारा आंबा यांचे रसाळ वर्णन कवीने केले आहे. वसंत म्हणजे फुलांनी नटलेली झाडे, रंगांची उधळण आहे, वसंत  हा ऋतूंचा राजा त्यामुळे त्याच्या डौलाचे भरभरून वर्णन केले आहे, वसंत पौर्णिमेचा ही उल्लेख आहे.

विरोधी प्रतिमा वापरण्याची शैली, अप्रतिम कल्पना विस्तार, उपमांची खाण कवीकडे आहे, शब्द सौंदर्याच्या बाबतीत तर कालिदासांचा हात कुणीच धरू शकत नाही. कारंज्याला ते जलयंत्र संबोधतात. पक्षी, प्राणी, फुलं, झाडं यांची इतकी विविध नावं वापरली आहेत की वाचणारा संभ्रमित होतो.उदा. प्राजक्ताला शेफालिका, जाई ला मल्लिका   आणि कितीतरी! आता पुष्कळ कवींनी कालिदासाच्या काव्यांचा मराठीत भावानुवाद  केला आहे त्यामुळं आपणही त्या काव्यांचा रसास्वाद घेऊ शकतो.

असे हे ऋतुचक्र, त्यातले ऋतु एकामागून एक त्याच क्रमाने येणारे, कधीही न थांबणारे, म्हणून अविनाशी ठरलेले, आपल्याही आयुष्यात बदल घडवून आणणारे, त्यामुळे आपलं आयुष्य सुसह्य करणारे!

मंगेश पाडगावकर यांच्या दोन सुंदर ओळी आठवतात —

सहा ऋतूंचे, सहा सोहळे, बघुनी भान हरावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

– समाप्त – 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

वेलींवर धुंद बहर यावा, निसर्गाने रंग आणि गंध यांची उधळण करावी, फुलपाखरांचे थवे पाहून नयन तृप्त व्हावेत, पक्ष्यांच्या मधुर कूजनाने आसमंत भारून जावा, हळू हळू चोचीत काड्या घेऊन पक्ष्यांचं विणकाम सुरू व्हावं, अशी जर निसर्गात आनंदाची बरसात असेल तर आपलं मन ही त्यात भिजून चिंब होतं. दिवस बदलत जातात, आणि एक दिवस पानगळ सुरू होते. पक्ष्यांचा आधारच नष्ट होतो. पण कुठे त्रागा नाही, कासाविशी नाही, फक्त वाट पहायची पुन्हा बहर येण्याची! निसर्गाची हीच शिकवण आहे, पुढे चालत रहायचं,फक्त चालत रहायचं! बोरकरांची ध्यासपंथे चालणारी ती देखणी पाऊले असतील तर, वाट कशी आहे याची काळजी करायचं कारणच नाही.

रोज उद्याची नव्यानं वाट पाहायची. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस वेगळा असणार आहे. त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ही मजा आणखी वाढविण्यासाठी निसर्गाने ऋतु निर्माण केले असावेत. ऋ म्हणजे गती, ऋत म्हणजे क्रमाने येणारी गती, ऋतु म्हणजे क्रमशः विशिष्ट गतीने पुन्हा पुन्हा येणारे. भारतात आपण सहा ऋतू मानतो त्यांची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर!प्रत्येक ऋतु सुखावह असो किंवा नसो त्या त्या वेळी वेगवेगळे सण साजरे करून आपण ते आनंदी करतो.

वसंताने आपले नववर्ष सुरू  होते आणि शिशिराने संपते. जणू नव्या पालवी बरोबर नव्या आकांक्षा, नवं ध्येय, नवा उत्साह वसंत देतो, म्हणून ही नव्या वर्षाची सुरवात! आपोआपच शेवट शिशिराने होतो. जसं पालवी बहरते, पाने, फुले, फळे, शाखा यांनी झाडाची वाढ होते. ही पाने वर्षभर नको असलेल्या गोष्टी काहीही त्रागा न करता साठवतात. वर्षाच्या शेवटी हा सगळा कचरा झाडं अलगद शरीरापासून वेगळा करतात. कारण त्याला माहीत असतं, नवी पालवी फुटणार आहे. आपलं पण असंच असावं, नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करायची. जे जे दुःख पदरी पडलं असेल ते हळूच मनाच्या एखाद्या कोपऱ्यात साठवावं अगदी कचरा समजून, आणि असंच मनापासून अलगद वेगळं करून टाकावं, परत नवी उमेद भरून घेण्यासाठी!

वास्तविक कललेली पृथ्वी, तिचे सूर्याभोवती (लंबवर्तुळाकार) व स्वतःभोवती भ्रमण यामुळे जलवायुचे भिन्न भिन्न कालावधी निर्माण होतात. त्यांना ऋतू म्हणतात. भारताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे त्यामुळे पावसाळा हा स्वतंत्र ऋतु असतो. सूर्य मृग नक्षत्रात आला की पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रात आला की संपतो.अशी नऊ नक्षत्रे पावसाची असतात.असे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचा हिशेब चार चार महिन्यांचा असतो. त्यातले बारीक फरक लक्षात घेऊन होतात सहा ऋतू, दोन दोन महिन्यांचे!

आपण जरी चैत्र,वैशाख महिन्यात वसंत आणि याप्रमाणे क्रमाने दोन दोन महिने एक एक ऋतु असं मानलं असलं तरी हे मराठी महिने अंदाजे ऋतू सांगतात कारण प्रत्यक्षात हे चांद्रमास आहेत, म्हणजे पौर्णिमा, अमावस्या यावर ठरणारे आणि ऋतु हे सूर्याभोवती च्या भ्रमणामुळे  होत असल्यामुळे त्यांचा आपल्या मराठी महिन्यांशी काही संबंध नसतो. म्हणून ऋतु आपले रंग त्या मराठी महिन्यात  दाखवेलच असे नाही.

आकाशातील तारका समुहावरून आपण २७ नक्षत्रे ठरवली आहेत. सव्वा दोन नक्षत्रांची एक रास होते. अशा बारा राशी आहेत. म्हणजे सूर्य  प्रत्येक महिन्यात एक रास ओलांडतो. त्याला सूर्य संक्रांत म्हणतात. (उदा.मकर संक्रांत,कर्क संक्रांत) सहा ऋतु मधे शिशिर, वसंत, ग्रीष्म हे उत्तरायणात होतात .२२ डिसेंबर,पासून उत्तरायण सुरू होते ,याचदिवशी शिशिर ऋतु सुरू होतो. पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ जवळ जाऊ लागते म्हणून तापमान हळू हळू वाढत जाते.  दिवस मोठे व्हायला सुरवात होते. तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनामुळे होतात. २१ जून ला दक्षिणायन सुरू होते,ह्याच दिवशी वर्षा ऋतू सुरू होतो.त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून लांब जाऊ लागते, म्हणजेच दिवस लहान होऊ लागतात. तापमान हळू हळू कमी होऊ लागते. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण ऋतूंचा अंदाज बांधू शकतो, मराठी महिन्याप्रमाणे  नाही.

तैत्तरीय संहिते प्रमाणे ऋतु —

तस्य ते (संवत्सरस्य) वसंता: शिर: || ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:|| वर्षा: पृच्छं||शरदुत्तर: पक्ष:|| हेमंतो मध्यं ||

म्हणजे संवत्सर ( वर्ष) हा काल्पनिक पक्षी आहे, त्याचे वसंत हे शिर, ग्रीष्म हा उजवा पंख, वर्षा ही शेपूट, शरद हा डावा पंख, व हेमंत हे उदर आहे.

आपला पहिला ऋतु वसंत! आंब्याच्या मोहराचा सुगंध, कोकिळेचं मधुर कूजन, बहरलेली झाडं, वेली, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली सृष्टी, किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. कविमनाला भुरळ घालणारा हा ऋतु! हा ऋतु साजरा करायला असतो चैत्र पाडवा, वसंतोत्सव,अक्षय्य तृतीया, चैत्रागौर! पन्हं,कैरीची डाळ देऊन हळदीकुंकू करायचं, चैत्रागौरीला आरास करायची, कलेला प्रोत्साहन देण्यासाठी! असं म्हणतात की, यौवन व संयम, आशा व सिध्दी, कल्पना व वास्तव, भक्ती व शक्ती यांचा समन्वय साधून जीवनात सौंदर्य, संगीत, स्नेह निर्माण करणारा तो वसंत!

दूसरा ग्रीष्म, अंगाची लाही लाही करणारा! मुलांना मनसोक्त पाण्यात डुंबण्याचं स्वर्गसुख देणारा! अगदीच सृष्टी रुक्ष वाटू नये म्हणून मोगऱ्याचा बहर देणारा! जेंव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो दिवस सर्वात उष्ण असतो. या नक्षत्रावर भात पेरणी करतात. या नक्षत्रात सूर्य नऊ दिवस असतो. जर हे नऊ दिवस तापमान वाढलेले राहिले तर भाताचे पीक चांगले येते. म्हणून रोहिणीचा पेरा अन् मोतियाचा तोरा अशी म्हण पडली आहे. ह्या नौतापात रोहिणी व्रत करतात. ह्या व्रतात चंदन व पाणी यांचे दान करतात, तसंच गरजूंना छत्री व चप्पल देणं पुण्याचं मानतात. किती विचार केला आहे नं, ह्या गोष्टी पाप पुण्याशी जोडून! बाकी हा ऋतु साजरा करण्यासाठी लागतं कैरीचं पन्हं, कलिंगड, आंब्याचा कोणताही प्रकार कोणत्याही प्रकारे स्वाहा करणं.

तिसरा ऋतु वर्षा! प्रियाविण उदास वाटे रात वाला! सृष्टी सौंदर्याचं आणि स्त्री सौंदर्याचं वर्णन करून कवी थकत नाहीत असा! प्रणयातील हुरहूर, अधीरता वाढवणारा! एकाच छत्रीतून, आधे गिले आधे सुखे वाला! चोच उघडून बसलेल्या चातकाचा! आषाढातला पाऊस आणि श्रावणातला पाऊस यांचं   वर्णन मी असं करते

आषाढाचा पाऊस म्हणजे, कुणीतरी याला रोका

श्रावणाचा पाऊस म्हणजे, आनंदाचा झोका

आषाढाचा पाऊस म्हणजे, धरतीवर आक्रमण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, धरतीचं औक्षण

आषाढाचा पाऊस, अखंड रिपरिप

श्रावणाचा …फक्त टिपटिप

आषाढाचा पाऊस देतो, काळोख आंदण

श्रावणाचा पाऊस करतो, पिवळ्या रंगाची शिंपण

आषाढाचा पाऊस म्हणजे, मातीच्या सुवासाची पखरण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, वृक्षवेलींवर रंगांची उधळण

आषाढाच्या पावसात, अंगणाच्या बंदरावर गर्दी नावांची

श्रावणाच्या पावसात,अंगणी झिम्मा-फुगडी चिमुरड्यांची

आषाढात सूर्य मारतो दडी

श्रावणात तोच होतो, लपाछपीचा गडी

आषाढाचा पाऊस म्हणजे, नंगा नाच पत्र्यांचा

श्रावणाचा पाऊस म्हणजे, प्रेमळ धाक आईचा

आषाढाच्या पावसासाठी, भरतो चातकांचा मेळा

श्रावणाचा पाऊस करतो, फुलपाखरे गोळा

पण त्याशिवाय काही प्रकारचे पाऊस, त्यांची गमतीदार नावे, म्हणी सांगणार आहे.

१.पडता हत्ती, कोसळती भिंती

२.सासूचा पडेल मघा, तर चुलीपुढे बसा (सतत मारा, घराबाहेर पडताच येत नाही)

३.म्हातारा पडेल पुख(पुष्य), तर चाकरीच्या गड्याला सुख( थांबून थांबून पडतो, पाऊस थांबला म्हणून कामाला सुरवात करावी तोवर पुन्हा पडायला लागतो, त्यामुळे गड्यांना हजेरी आणि विश्रांती दोन्ही मिळतं)

४.पडतील चित्रा तर भात न खाई कुत्रा (बेभरवशाचा, अन्नाची नासाडी करतो)

५.आला अर्दोडा, झाला गर्दोडा (आर्द्रा चा पाऊस चिखल करतो)

६.पडल्या मिरगा तर टिरी कडे बघा ( मृग पडला तर शेतीची कामे खोळंबतात)

७.आली लहर, केला कहर, गेला सरसर(आश्र्लेशाचा पाऊस म्हणजे थोड्या थोड्या भागावर जोरदार सरी येऊन जातात. एकाठीकाणी मोठ्ठा पाऊस लागावा आणि थोड पुढं गेलं की सगळं कोरडं ठणठणीत)

८. पूर्वा फाल्गुन हा सुनेचा (चंचल, कामचुकार)

९.पुनर्वसु चा तरणा पाऊस( शक्तिशाली)

वर्षा ऋतू म्हणजे भक्तीचा पूर!आषाढीवारी, गुरूपौर्णिमा, नारळी पौर्णिमा(रक्षाबंधन), नागपंचमी, कृष्ण जन्म, गोपाळकाला, श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचाच असतो. सणावारांची रेलचेल असणारा ऋतु!

क्रमशः…

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आईपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई जाउन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भाउक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्विाकारायला हवं ना? मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.

अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आई भोवती मन पिंगा घालू लागले. आई विषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.

तसेच आईचा महिमा सांगणार्‍या कितीतरी कविता आठवल्या

गदिमा, मभाचव्हाण, यशवंत अशा कितीतरी कविंसोबत अलिकडेच कवि अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.

मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं,सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने  ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.

म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.

सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे,चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे,जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते , लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.

मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो . पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्‍याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्‍या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.

फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.

तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्‍या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की!!

मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.

तरी देखील दुसर्‍यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.

ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो .

स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.

असे मातृत्व अर्थात आईपण जर सगळ्यांच्या हृदयी आले तर?•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print