सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आजकाल खरोखरीच खूप जास्त अच्छे दिन आलेले आहेत . महागाईच्या नावाने ओरडत ओरडत प्रत्येक जण आपले सगळे सणसमारंभ, सोहळे धूमधडाक्यात पार पाडतोय. ऐच्छिक गोष्टी केव्हा आवश्यक सदरातून अत्यावश्यक सदरात शिफ्ट झाल्यात ते आपले आपल्यालाही कळलेच नाहीं.पूर्वीची कुठल्या गोष्टीसाठी किती पैसा द्यायचा असतो ही गणितच मुळी हौस ह्या सदराखाली संपूर्णपणे बदलल्या गेली आहेत. फक्त हे करतांना ह्या ऐच्छिक गोष्टी प्रघात बनून कुणाची गैरसोय बनू नये ही इच्छा.

मध्यंतरी एक बातमी वाचनात आली आणि मन खरचं खूप सुन्न झालं.एक शाळकरी मुलाने त्याच्या आईबाबांनी वाढदिवस आजच्या पध्दतीनुसार साजरा करु दिला नाही म्हणून आत्महत्या केली. सगळ्यां करीताच विचारात पाडणारी दुःखद घटना आणि त्या पालकांच्या सांत्वनासाठी शब्दही सुचेना.

हल्ली  जग बरचसं आभासी झालयं. सोशल मिडीया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करताय ह्यावर ते फायदेशीर की नुकसानकारक हे ठरणार आहे. जे मोठमोठे इव्हेंट सहज साजरे होताना मोठया स्क्रीनवर बघितल्या जातात ते प्रत्यक्षात अमलात आणणं खूप कठिण असतं हे कुठेतरी सगळ्यांना कळायला हवे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस ही खरोखरच कुटूंबातील आनंददायी घटना.या प्रसंगातून सगळेजण एकमेकांच्या मनाशी जोडल्या जातात.असे कुटुंबातील छोटेछोटे समारंभ आनंद देतात, एक प्रकारचे चैतन्य निर्माण करतात.

पण दुर्दैवाने ह्याचे स्वरुप, त्याचा अतिरेक हा समाजासाठी खरोखरच डोकेदुखी ठरला आहे.प्रेम म्हणजे मनाशी मनाचे जुळलेले नाते,त्याग ह्या संकल्पना सोडून वरपांगी दिखाऊ प्रदर्शनीय बाब होऊ घातलीय.

हे अवर्णनीय आनंद देणारे कौटुंबिक प्रसंग ज्यांना आम्ही मराठी मध्ये “समारंभ”किंवा “सोहळे” म्हणतो त्याचे रुपांतर आभासी,दिखाऊ अशा “इव्हेंट” मध्ये झालेय.आणि खरोखरच हे “इव्हेंटचे भूत” सर्वसामान्य माणसाच्या अक्षरशः बोकांडी बसलयं

फेसबुक किंवा व्हाट्सएपवर वाढदिवसाचे किंवा लग्नाच्या वाढदिवसाचे केक कापतांनाचे फोटो एकदा आपलोड केले की जणू आपल्या सुखी जीवनाचा पुरावा सादर केल्यासारखी भूमिका काही लोक सादर करतात. कुठल्याही इव्हेंट मध्ये जाणे,तिथे सेल्फी काढून ते भराभर अपलोड करणे, खरचं ही सुखाची परिभाषा आहे का हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस, प्रीवेडींग शूट हे ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी उत्तमचं . पण ह्या सगळ्या गोष्टींचा पायंडा पडतोय हे खूप घातक.ह्या आभासी सुखामुळे,ह्या पायंड्यामुळे कितीतरी मुलं नैराश्येच्या खाईत लोटल्या जातात आहे हे पालकांना समजूनच यायला मुळी खूप ऊशीर होतोय.

ह्याची सुरवात होतांनाच पालकांनी जागरूकतेने ह्याबद्दल मुलांना नीट समजावून दिले तर ती सगळ्यांसाठीच खूप फायद्याचे ठरेल पण त्यासाठी आधी पालकांनी आधी या “सो काँल्ड आधुनिकतेला” आळा घालणं गरजेचं आहे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments