मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

(तो तिचा उत्साह निवळला —-इथून पुढे ) 

ती रडत रडतच मारूकडे गेली. मारूने तिला समजाविले, ” मुन्नी रडायचे नाही. आपण रोडवर राहतोय ना. आपल्याला घर नाही. आपल्याला रडायचा अजिबात हक्क नाही. जे व्यवस्थित घरात रहातात त्यांनाच फक्त रडायचा अधिकार असतो. आपण आपल्या वाटेला आलेल्या परिस्थितीला न घाबरता सामोरे जायचे असते. कुठच्याही आलेल्या कठीण परिस्थितीत आपण रडत न बसता, कोणाकडेही मदत न मागता त्यातून मार्ग काढायचा असतो आणि मला खात्री आहे यातूनही काहीतरी मार्ग निघेल. उद्या १५ ऑगस्ट आहे तू सकाळी लवकर उठून झेंडे घेऊन सिग्नलवर परत उभी रहा”. परिस्थितीने मारूला खूप लवकर समज दिली होती. मारूच्या त्या बोलण्याने मुन्नीलाही धीर मिळाला. संध्याकाळी मारूने एक छोटा बॅनर बनवून त्याला एक काठी लावून मुन्नीला दिला आणि काही कामाच्या गोष्टी तिला सांगून उद्या तो बॅनर घेऊन सिग्नलवर जायला सांगितले. 

१५ ऑगस्टचा दिवस उजाडला. मुन्नी सकाळी लवकर उठली. तीन हात नाक्यावरच मेट्रो रेल्वेचे काम चालू असल्याने पाण्याची कमतरता नव्हती. तिने काळोखातच तिची आंघोळ आटपली. ठेवणीतला धुतलेला एक स्वच्छ असा फ्रॉक घातला. मारूकडून दोन वेण्या घालून घेतल्या. त्या तिच्या केसांच्या शेपटाना तिरंगाच्या रंगाच्या रिबीन लावल्या. तोंडाला जरा पावडर लावून कपाळावर एक लाल रंगाची छोटी टिकली लावली. मुन्नीच्या नेहमीच्या उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावर आज एक वेगळया प्रकारचे तेज दिसत होते. जरा उजाडताच मुन्नी, मारूने बनविलेला बॅनर आणि सगळे झेंडे घेऊन तीन हात नाक्याच्या सिग्नलवर उभी राहिली. 

मुन्नीच्या हातातला तो बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधत होता. त्यावर लिहिले होते,

“मेरा भारत महान”

“झेंडा उंचा रहे हमारा”

ते वाचून एका गाडीतल्या माणसाने तिला जवळ बॊलवून एक झेंडा द्यायला सांगितला. मुन्नीने तो दिला. त्याने त्याचे पैसे किती विचारले. “साहब मैं तो फ्री में दे रही हूँ.  इसकी किंमत करना मुझे अच्छा नही लगता. अगर आप कुछ देना चाहते हो तो आपके हिसाबसे ये झेंडे की किंमत समझकर दे देना.  लेकिन इसको संभालके रखना. कचरेमें मत फेकना.”  मुन्नीने झेंड्याची किंमत न सांगता त्याच्या हातात तो झेंडा दिला आणि एक सॅल्यूट मारला. मुन्नीचे ते शब्द ऐकून आणि तिने मारलेल्या सॅल्यूटने तो माणूस खूप भारावला आणि जो झेंडा मुन्नी पाच रुपयाला विकत होती त्याचे तो दहा रुपये देऊन गेला. मुन्नी प्रत्येकाला असेच सांगत होती आणि प्रत्येकवेळी सॅल्यूट मारत होती, त्यामुळे प्रत्येकजण तिच्याकडून झेंडा घेत तिला जास्तच पैसे देऊन जात होते. कोणी दहा, कोणी वीस– काही जणांनी पन्नास, शंभरही दिले. प्रत्येकाला त्या झेंड्याचे मोल वेगळे होते. प्रत्येकाला त्या झेंडयाबद्दल आदर होता आणि विशेष म्हणजे मुन्नी तो सांभाळून ठेवायला सांगत होती. आणि त्याचे वेगळेपण प्रत्येकाला जाणवत होते. पंधरा ऑगस्टचा दिवस– आणि तो तीन हात नाका सिग्नल मुन्नीने गाजवला. आदल्या दिवशी प्लॅस्टिकचे झेंडे घेऊन आलेली ती तीन मुले मुन्नीच्या फुकट झेंडे वाटण्याकडे दिवसभर बघत बसली. 

माणूस जन्मतःच हुशार असतो,  पण कायम कोणावर तरी अवलंबून राहिला की कठीण परिस्थितीत माणसाला मार्ग मिळणे मुश्किल होते. मुन्नी आणि मारूसारखे अनेकजण आहेत,  जे आहे त्या परिस्थितीत आलेल्या कठीण वेळेला तोंड देऊन त्यातून नवीन मार्ग शोधतात,  आणि आपल्या  नशिबाचे दरवाजे हे उत्कर्षासाठी उघडे करतात. उत्कर्षाच्या गुहेचे दरवाजे उघडण्यासाठी ‘खुल जा सिम सिम’ हा मंत्र नव्हे, तर धीर आणि स्वतःवरचा विश्वास कामी येतो. 

दुसऱ्या दिवशी मुन्नी परत लवकर उठली आणि तिचा परिसर पूर्णपणे फिरून आली. असे ती दरवर्षी करत असे . रस्त्यावर पडलेले झेंडे ती उचलून गोळा करत असे. ह्यावर्षी तिला वेगळा अनुभव आला. खूप कमी झेंडे तिला रस्त्यावर कचऱ्यात मिळाले. एखाद दुसरा झेंडा रस्त्यावर पडलेला तिला मिळाला.  तो तिने उचलून स्वतःकडे ठेवला. तिने सांगितलेले ‘ झेंडे को संभालके रखना ‘ ह्याचा लोकांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. 

आजही तुम्हांला ही मुन्नी फक्त ठाण्याच्या तीन हात नाका ह्या  सिग्नलवर नव्हे,  तर सगळ्याच सिग्नलवर दिसेल,  फक्त तिचे नाव वेगळे असेल. अशा असंख्य मुन्नी, छोटी किंवा मुन्ना, छोटू ह्यांना आपल्या मदतीची अजिबात गरज नाही. त्यांच्या हिकमतीवर, त्यांच्या मेहनतीने ते त्यांच्या आयुष्यात १००% सफल होतील. बदल आपल्यात करायला लागणार आहेत. 

त्यांच्याकडे वरवर न बघता किंवा त्यांना नजरेआड न करता  आपली डोळस नजर त्यांच्यावर जायला हवी. ७४ वर्षांपूर्वी  मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याला स्मरून आपल्या  75 व्या स्वातंत्रदिनी आपला ‘झेंडा ऊंचा रहे हमारा’ आणि ‘मेरा भारत महान’ असे अभिमानाने बोलतांना आणि तो साजरा करताना त्यांचाही  विचार आपल्या मनात आला पाहिजे. 

जय हिंद , जय भारत 

—– समाप्त . 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

श्री उदय गोपीनाथ पोवळे

अल्पपरिचय

वय    :    ६० वर्षे

धंदा   : यश ज्वेलर्स (गोल्ड ज्वेलरी शॉप), ठाणे

आवड : मॅरेथॉन रनर

? जीवनरंग ❤️

☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

          नाव : मुन्नी              

संपूर्ण नाव : माहित नाही

        वय  : सात वर्षे 

    शिक्षण : १ ते १० आकडे लिहिता येतात 

        पत्ता : तीन हात नाका, पुलाच्या खाली, ठाणे 

मुन्नी गेले चार दिवस रोज सकाळपासून खूप काम करत होती. त्याला कारणही तसेच होते. तीन दिवसांनी तिच्या आयुष्यात दर वर्षांनी येणारा एक मोठा दिवस होता. दिवस कसला तिच्यासाठी तो मोठा सण होता.  

१५ ऑगस्ट. दरवर्षी १५ ऑगस्टच्या आधी एक आठवडा तिची मोठी बहीण मारू झेंडा प्रिंट केलेले कागद, बांबूच्या काड्या आणि काही रंगीत कागद आणायची आणि दोघी त्याचे झेंडे बनवायच्या . गेले तीन दिवस दोघींचे तेच काम चालू होते. बांबूच्या काड्यांना एका ठराविक साइजमध्ये कापून त्या पॉलिश पेपरने घासून त्यांना रंगीत चमकता कागद चिकटवून शेवटी छापिल झेंड्याचा कागद लावायचा. त्यांनी बनविलेले झेंडे खूपच आकर्षक दिसायचे. मारूच्या मार्गदर्शनाखाली मुन्नी ते काम शिकली होती. गेले दोन वर्षे त्या असे झेंडे बनवत होत्या , आणि ते हातोहात विकलेही जात होते. त्यामुळे मारू आणि मुन्नीला ह्यावर्षीही खूप हुरूप आला होता ते झेंडे बनवायला.

चार वर्षांपासून मुन्नी आणि मारू तीन हात नाका पुलाच्या खाली रहात आहेत. मुन्नीच्या जन्माच्या वेळी त्यांची आई वारली. नंतरची  तीन वर्षे गावाला त्यांच्या बापाने त्यांचा कसाबसा सांभाळ केला आणि नंतर एका बाईच्या नादी लागून ह्या दोघीना वाऱ्यावर सोडून तो ते गाव सोडून गेला. मारू आणि मुन्नीमध्ये पाच वर्षाचे अंतर होते. ८ वर्षाच्या मारूला तेंव्हा काय करावे ते कळत नव्हते पण त्या छोट्या गावात, गावाच्या बाहेर असलेल्या झोपडीत राहणे सुरक्षित नाही,  एवढे मात्र कळले आणि दोघी ते गाव सोडून कोण काही खायला देईल ते खात एका रेल्वे स्टेशनला आल्या. आलेल्या गाडीत मारूने मुन्नीसहित प्रवेश केला आणि थेट एका मोठ्या स्टेशनांत त्या दोघी उतरल्या.  त्या स्टेशनचे नाव होते ठाणे. 

त्याच दिवशी त्यांना एक भला माणूस भेटला. साठी पार केलेला फुगे विकणारा अबूचाचा. अबूचाचा हा भला मराठी माणूस.  पण त्याच्या वाढलेल्या दाढीमुळे त्याला सगळे चाचा बोलत आणि त्यामुळेच त्याचा सगळ्यांना जरा वचकही  होता. त्याच अबूचाचाने ह्या दोघींना खायला घालून त्यांना झोपायला एक चादर देऊन, त्यांची सोय तो रहात होता त्या तीन हात पुलाच्या खाली केली होती. तिथल्या सगळ्यांना अबूचाचाने ह्या माझ्याच मुली आहेत अशी ओळख करून दिल्याने कोणाचीही वाकडी नजर ह्या दोघींवर कधी पडली नाही. गेल्याच वर्षी एका गर्दुल्ल्याने मुन्नीची काही खोड काढून तिचा हात पकडला,  म्हणून आबुचाचाने रागाने त्याला त्याचा हात तुटेपर्यंत मारला.  पण त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून नेले, आणि  तो अबूचाचा आजपर्यंत काही परत आलेला नाही. अबूचाचा गेल्यानंतर मारूने स्वतः जवळ एक चांगला चाकू ठेवायला सुरवात केली आणि आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्यांना तो दाखवला– आणि तेंव्हापासून त्या दोघीही सुरक्षितपणे तेथे रहात आहेत. 

ह्याच वर्षापासून सिग्नल शाळा चालू झाल्याने मुन्नीला जरा अक्षरांची आणि आकड्यांची ओळख व्हायला सुरवात झाली आहे. सिग्नल शाळेमुळेच त्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे मार्गदर्शन केले जात होते. रोजच्या रोज होलसेल मार्केट मधून काहीना काही वस्तू आणून त्या संपेपर्यंत सिग्नलवर विकायच्या, आणि रोजच काहीना काही खाऊन, वर चार पैसे जमवायचे हे अबूचाचाने त्यांना शिकविले होते. सुरवातीला काही खेळणी आणून विकायला सुरवात केली.  पण नंतर लोकांना आवडतील अशा काही खास वस्तू मारू आणून देत असे आणि ते विकायचे काम मुन्नी करायची. त्याच धर्तीवर गेले दोन वर्षे झेंडे बनवून १५ ऑगस्टच्या आदल्या दिवशीपासून ते विकतांना मुन्नी तीन हात नाक्याच्या सिग्नलवर दिसत असे. 

पूर्वी ह्या झेंड्याचे महत्व मुन्नीला माहित नव्हते.  पण सिग्नल शाळेच्या शिकवणीमुळे,  आपला देश, आपला तिरंगा झेंडा, आपल्या झेंड्याला आपले सैनिक कसे मान देतात, ह्या सगळ्या गोष्टी तिला कळायला लागल्या. ते झेंडे आपण बनवून, सगळ्यांना विकून त्यांच्या गाडीत, घरी पाठवतो ह्याचे तिला एक वेगळेच आकर्षण वाटत होते. आपण झेंडे बनवून ते विकतो ह्याचा तिला अभिमान वाटत होता आणि त्यामुळेच गेले चार दिवस ती खूप मेहनत घेऊन झेंडे बनवायचे काम करत होती. 

१४ ऑगस्टला मुन्नीने सकाळी लवकर उठून आंघोळ करून झेंडे विकायला सुरवात केली. दरवर्षी त्यांच्या आकर्षक रंगीत कागद लावलेल्या झेंड्याना चांगला प्रतिसाद असायचा,  तसाच सुरवातीला तो मुन्नीला मिळाला. सुरवातीच्या दोन तासात तिचे तसे चांगले झेंडे विकले गेले.  पण नंतर सिग्नलवर तीन अनोळखी मुले आली आणि त्यांनी प्लास्टिकचे झेंडे विकायला सुरवात केली– तेही मुन्नी विकत होती त्यापेक्षा कमी पैशांमध्ये. त्या झेंड्यांपुढे मुन्नीचे झेंडे फिके दिसत होते आणि त्यामुळे लोक मुन्नीचे झेंडे खरेदी न करता ते प्लास्टिकचे झेंडे विकत घेत होते. दुपारपर्यंत मुन्नी झेंडे घेऊन फिरत होती, पण तिचे झेंडे काही कोणी खरेदी करत नसल्याने ती हिरमुसली. ज्या उत्साहाने तिने झेंडे विकायला सुरवात केली होती तो तिचा उत्साह निवळला—-

क्रमशः……

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -5 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

संचारबंदी उठवण्यात आली होती.

जमावबंदी शिथिल करण्यात आली होती.

जाळपोळ करण्यात आलेल्या ठिकाणी धूर ही विरून गेला होता.

दंगलीच्या खुणा काहीशा पुसट झाल्या होत्या.. काही ठिकाणी विखरून पडलेले काचांचे तुकडे, दगड, विटांचे तुकडे दंगलीच्या इतिहासाची साक्ष देत होते.

बंद झालेले व्यवहार सुरळीत चालू होऊ लागले होते.

मोर्च्या तर आठवणीतून कधीच पुसला गेला होता.

……  तरीही .. तरीही सर्वत्र पोलीस बंदोबस्त दिसत होता. वातावरणात नाही म्हणलं तरी तणाव जाणवत होताच.

कुणीतरी एखादं-दुसरा दबकत दबकत, अंदाज घेत घराबाहेर पडू लागला होता.

मारुती झोकांड्या देतच घरी परतत होता. गल्लीच्या तोंडाशीच एक कुत्रं मुटकुळ मारून झोपलं होतं. मारुतीने ते पाहिलं आणि  शिव्या घालत त्या कुत्र्याला लाथ मारली. कुत्रं केकाटत धडपडत उठलं आणि गल्लीत आतल्या बाजूला पळालं. अजूनही गल्लीला जाग आलेली दिसत नव्हती. मारुती घराच्या दारासमोर आला. दार बंद आहे हे पाहून चिडला.

” च्यायला हिच्या… आजून पासललिया..! “

बायकोला शिव्या देतच त्याने दारावर लाथ मारली. दार उघडलं नाही तसे त्याने दारालाही दोन-चार शिव्या हासडल्या. दात-ओठ खात त्याने पुन्हा दारावर लाथा हाणल्या. एकदाचं दार उघडलं आणि काही क्षण झुलत, थरथरत राहिलं. ‘ आयला , दारानबी वाईच घेतल्याली दिस्तीया..’ झुलत्या दाराकडे पाहत तो म्हणाला आणि हसला.

झुलत्या दाराला धरण्याचा प्रयत्न करीत तो झुलतच घरात आला. समोर चुलीजवळ, स्टोव्हजवळ त्याला बायको दिसली नाही.

” ए ss ! कुटं उलतलीस ? “

म्हणत तो घरात इकडं तिकडं पाहू लागला. समोर खाली पाहताच थबकला. क्षणात त्याची दारू उतरली.

समोर चार पावलावरच सखू पडली होती.  तिच्या शरीरावर माश्या घोंगावत होत्या. तिच्या छातीशी रडून झोपल्यासारखं पोरगं गाढ झोपलं होतं. झोपेतही त्या पोराच्या चेहऱ्यावरील भीती कमी झाली नव्हती.

 ….’ संचारबंदी ‘ उठल्याची जाणीव त्या ‘ तिघांनाही ‘ झाली नव्हती.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -4 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग – 4 ☆ श्री आनंदहरी

” अवो ss ! वाईच उठतायसा का ? “

शेजारची रखमा नवऱ्याला जागे करण्याचा प्रयत्न करत होती.

” गप झोप की..”

नवरा पांघरूण तोंडावर घेत झोपेतच त्रासिकपणे कावदारला.

” अवो, पर सखू आरडल्यावानी वाटली..”

”  मंग.. ? “

नवऱ्याने जास्तच त्रासिकपणाने विचारले.

” वाईच बगूया काय… ? “

” तेच्यात काय बगायचं हाय ..? मारत्या आला आसंल ढोसून.. दिलं आस्तील दोन-चार तडाखं ..तुमा बायकांस्नी सवंच आस्ती.. वाईच ब्वाट लागली का बोंबलायची..  गप झोप… आन मलाबी झोपुनदेल..”

रखमा काही क्षण गप्प झाली. नवरा म्हणाला ते संगळंच काही खोटं नव्हतं तरी पण तिला राहवेना..

थोड्या वेळाने ती परत नवऱ्याला जागं करत म्हणाली,

” अवो,पर…”

” गप झोपतीस का आता.. का तुला बी..?”

तो आणखीनच चिडून म्हणाला तशी ती गप्प झाली. तो बोलल्यासारखा दोन तडाखे द्यायला कमी करणार नाही याची तिला खात्री होतीच.. पण रखमाला काही चैन पडेना. नाही म्हणलं तरी इतक्या वर्षाचा शेजार होता. त्यात सखू प्रत्येक वेळेला अडी-नडीला उभा रहात होती. तिला ही सखूबद्दल आपलेंपणा वाटत होताच. थोडा वेळ ती तशीच अस्वस्थशी कानोसा घेत बसून होती. अधून-मधून सखूचा आवाज येतंच होता.

काहीतरी विचार करून ती उठली आणि दाराकडं जाऊ लागली.

नवरा जागाच होता.. त्याला तिची हालचाल जाणवली तसे त्याने चिडक्या आवाजात, जाब विचारावा तसे विचारले,

” कुटं निगलीस येवड्या रातचं ? “

” सखूकडं बगती जाऊन ..”

” येवड्या रातचं ? तुज्या बाचं काय गटूळं पुरलया व्हय ततं ? “

” गटुळं ततं कशापायी पुरंल माझा बा ? “

ती काहीशी चिडून म्हणाली.. लगेच पुढं समजावणीच्या सुरात म्हणाली,

” अवो, सखू पोटुशी हाय..”

तिच्या आवाजातील तिखटपणामुळे त्याच्या स्वरातील पुरुषी कडकपणा काहीसा कमी झाला.

” आगं, मारती आला आसंल ढोसून.. आन करफू हाय ती इसारलीस व्हय ? पोलिसांनी गोळी-बिळी घातली मजी .. ? “

नवऱ्यानं कर्फ्युची आठवण करून दिली तशी ती काहीशी घाबरली आणि थबकली.

” आगं, आन तसंच काय आसतं तर आगुदरच बोलीवलं नसतं का सखूनं तुला ? मारत्याच आला आसंल.. उगा कशापाय जीवाची जोखीम घ्याची ? “

‘ सखूनं बोलावले नसते का ?’ हा नवऱ्याचा मुद्दा तिला पटल्याचे जाणवलं. त्यात सखूचा आवाजही आधी येत होता तसा येत नव्हता. ती थबकली. ती थबकलेली पाहून तिचा नवरा म्हणाला,

” सकाळच्या पारी बगू काय ती.. करफु बी उठायचा हाय. तू बी झोप आता आन मलाबी झोपूदेल.. करफू उठतुया म्हनल्याव कामाव जाया नगं ? “

दाराकडे निघालेली रखमा परत फिरली होती.

‘आगं, सखू काय पयल्यांडाव पोटूशी ऱ्हायलीया व्हय ?  तिनं बोलवली नसतं व्हय तुला..? ‘ नवऱ्याचं हे सांगणंही तिला पटलं होतं. नवरा म्हणाला त्यात तथ्य होतंच. ती माघारी येऊन अंथरुणावर आडवी झाली.

  • ● ●        ●         ●         ●        ●

क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -3 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -3 ☆ श्री आनंदहरी ☆

अंथरुणावर आडवं झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने झोपेत पोराचे पाय पोटावर लागू नयेत म्हणून मध्ये अंतर ठेवले होते. नाही म्हणलं तरी पोराकडं जरा दुर्लक्षच होतंय हे तिला जाणवत होतंच.. तो विचार मनात येताच तिला आतून भरून आलं. शांत झोपलेल्या पोराकडे तिने मायेने पाहिलं. ती हात लांब करून पोराला उगाचच हळुवार थोपटू लागली. ‘ काहीही न कळण्याचे वय पण बरेच शहाण्यासारखे वागतंय ‘ असं तिच्या मनात आले..

घरात आणखी कुणी असतं तर बरे झाले असते.. आपले काम, त्यात हे दुसऱ्यांदा गरोदर राहणं.. कुणाची, कशाची फिकीर नसणारा बाप यात पोराची फार आबाळ होतेय ती तरी झाली नसती.., तिच्या मनात उगाचच पोराची काळजी दाटून आली. ..पण घरात दुसरं असणार कोण ? जवळच असे कुणी नव्हतंच.. जे कुणी होते त्यांच्याशी तिच्या नवऱ्याने संबंध ठेवले नव्हते.. आणि तिला मनातून कितीही वाटत असले तरी तिला ठेवू दिले नव्हते.. त्याच्या दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या सवयीमुळे शेजारी-पाजारीही  तिच्याशी नसले तरी त्याच्याशी तुटूनच होते.. पण तरीही तिने मात्र शेजारधर्म पाळला होता.. शेजार राखला होता.

तिला जरा आराम वाटत असला तरी हवी असूनही झोप काही येत नव्हती. उगाचच मनात काहीबाही विचार येत होते. तिला नवऱ्याची आठवण आली. ‘ कुठं असतील ? कसे असतील ? अजून का घरी आले नाहीत ? ‘ अशा प्रश्नांच्या वावटळीत तिचं मन भिरभिरु लागलं होतं, भरकटू लागलं होतं.तिला नवऱ्याची जास्तच आठवण येत होती. तो दारू पिऊन घरात आला की नुस्ता दंगा-धुडगूस घालायचा. तिला शिव्यांची लाखोली वाहायचा, मारहाण करायचा… तिला तो घरात आलाच नाही तर बरे होईल असे तेंव्हा वाटायचं.. पण आत्ता मात्र तो यायला हवा, घरात असायला हवा असे वाटत होतं पण  कर्फ्यु लागल्यापासून त्याचा पत्ताच नव्हता. खरंतर त्याच्या विचाराने  तिच्या डोळ्यांत दाटून आलेली झोप पाला-पाचोळ्यासारखी उडून गेली होती.

तिला अस्वस्थ वाटू लागले तशी ती हाताला रेटा देत उठून बसली. नकळत तिची नजर पोराकडे गेली. ते कुशी बदलून गाढ झोपलेले होते. आपल्या अवतीभवती काय घडतंय याची त्याला खबतबातही नव्हती. तिची अस्वस्थता वाढू लागली. पोटात कळा येऊ लागल्या. वेदना असह्य होऊ लागली. गात्रागात्रात फक्त वेदनेचीच जाणीव भरून राहिली. तिचा चेहरा कसानुसा होत होता..

” देवा ss माणकुबा ss! “

तशाही स्थितीत तिने हात जोडून देवाची करुणा भाकली.

” चार रोज थांब रं….आरं दिस उजडंस्तवर तरी थांब बाबा ..”

ती पुटपुटली.. त्यावेळी तिची नजर स्वतःच्या पोटाकडे होती.. ती एकाच वेळी देवाला आणि येणाऱ्या जीवाला विनवीत होती.

पोटातील कळा थांबण्याचं चिन्ह दिसेना. ‘ काहीतरी करायला पाहिजे… कुणालातरी बोलवायला हवं..कुणाला बोलावणार ?’  मनात विचार येताच तिची नजर झोपलेल्या पोराकडे गेली.

‘त्येला हाळी मारून उठवावं काय ? तर येवडंसं प्वार.. ती काय करंल ?  उलटं भेदरून जायाचं … त्येला नगंच ..’ ती उठून  उभारायचा प्रयत्न करू लागली. असह्य कळांमुळे तिला जमेना.. ती तशीच खुरडत, सरकत दाराकडे निघाली.. पुढेही सरकवेना.. ती शेजारणीला हाका मारू लागली पण समोरची काहीच चाहूल लागेना… जीव घाबराघूबरा झाला होता.. साऱ्या अंगातून त्राण निघून गेल्यासारखे वाटत होते. वेदनेचा आगडोंब साऱ्या शरीरात पसरला होता. ती ओरडू लागली..किंचाळू लागली.. आक्रन्दू लागली. तिचा जीव गुदमरू लागला.  वेदना वाढतच प्राणांतिक वेदनेने ती धडपडत राहिली.. तिचा आवाज, ओरडणे, किंचाळणे कमी झालं… थांबले….  रात्रीची असह्य शांतता पुन्हा भवतालात भरून राहिली.

क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -2 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -2 ☆ श्री आनंदहरी ☆

बराचवेळ ती तशीच बसून होती. अचानक तिला पोराच्या भुकेची जाणीव झाली. उठून बसकर झटकावे तशी मनातली नवऱ्याची काळजी झटकून ती उठली. स्टोव्ह पेटवला आणि त्यावर भाताचं भुगुनं चढवलं.

‘ कायबी झालं तरी पोराच्या पोटाला काय-बाय कराय पायजेलच..’

तिच्यातली आई तिला म्हणाली. तिला पोराचं ध्यान झालं .. तिची नजर कोपऱ्यात बसलेल्या पोराकडं गेली. तिच्या धपाट्यानं रडवेलं झालेलं पोर तिथंच कलंडलं होतं. तिनं पोराकडं पाहिलं तसं तिचं काळीज तुटायला लागलं.

‘ उगाच मारलं लेकराला..’ असं मनात येऊन तिला स्वतःचाच राग आला. वाईट वाटून नकळत डोळे पाणावले. पोरावरची माया उफाळून आली. ती पोराजवळ गेली.ती स्वतःला सावरत पोराला उचलून घेण्यासाठी हळूच वाकली. त्याचवेळी तिला पोटात कळ आल्यासारखी वाटली. कशीबशी ती हळूच खाली बसली. खाली बसताच तिला जरा बरं वाटलं.

स्वतःच्या पोटाकडे नजर जाताच, आलेली कळ आठवून तिच्या मनात वेगळीच काळजी धकधकू लागली.

‘ ..पर अजून लै दिस हायती.. या समद्या धकाधकीत दिस आगुदर भरायचं न्हायती न्हवं ? ‘

मनात आलेल्या या आशंकेनं तिच्याही नकळत मनात गणित मांडलं गेलं होतं. तिच्या हिशेबाप्रमाणे अजून बराच अवधी होता पण हे ध्यानात येऊनही तिच्या मनातली धाकधूक कमी झाली नाही.

‘ दिस आगुदरच भरलं न्हाईत म्हंजी बरं… करफू तरी उठाय पायजेल.. धनी बी घरात न्हाईत..:

नवरा घरात नाही ही जाणीव पुन्हा तीव्र झाली आणि त्याची चिंता पुन्हा सतावू लागली. काही क्षणापूर्वीचा त्यांच्याबद्दलचा त्रागा, राग मनात उरला नव्हता. उलट त्याच्या आठवणीने, विचाराने ती काहीशी हळवी झाली होती. काही क्षणापूर्वी आपण त्याच्याबद्दल काही-बाही बोललो याची आठवण येऊन तिला स्वतःचाच राग आला .

‘ माझं मेलीचं त्वांडच वंगाळ ..’ म्हणत ती स्वतःलाच शिव्या देऊ लागली, दोष देऊ लागली.

‘ देवा.. माणकुबा ss … माझं कुकू राख बाबा..’ म्हणत ती बसल्या जागेवरूनच माणकेश्वराच्या देवळाच्या दिशेने हात जोडून देवाला विनवू लागली. तेवढ्या क्षणात ती स्वतःची वेदना विसरून गेली होती.

तिने पोराला हळुवारपणे जागे केले पण तिला पाहताच तिने मारलेला धपाटा आठवून पोर भेदरून उठले आणि तिच्याकडे टकामका पाहू लागले. आईचा मायेचा स्पर्श त्याला जाणवला तशी त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि ते आईला बिलगले.

” उठ राजा, वाईच भात खाऊन घे चल..”

ती त्याच्या केसातून मायेने बोटं फिरवत म्हणाली.

बराचवेळ आईपासून दूर राहिलेलं ते पोर आईला आणखीनच घट्ट बिलगले. ती त्याला कुरवाळत म्हणाली,

” चल राजा, वाईच खाऊन झोप..”

ती पोराला बाजूला सारत भुईला हाताने रेटा देत हळूच उठली. थाळी आणि पाण्याचा तांब्या घेत स्टोव्हजवळ बसली. स्टोव्हवरचं भुगुनं खाली उतरून त्यातला थोडा गरम गरम भात तिने थाळीत वाढला. गरमागरम भाताच्या वासाने पोराची भूक चाळवली असावी. ते झटकन उठलं आणि आईजवळ येऊन तिच्या मांडीवर बसले तसे ती मांडीवरून खसकन खाली बसवत त्याला म्हणाली,

” वाईच खाली बस की… बगल तवा मांडीवर येतंय..”

आत्ता मायेनं बोलणाऱ्या आईला असे एकदम चिडायला काय झाले ते त्या पोराला समजेना. ते घाबरुन आईकडे पाहू लागले. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना कदाचित त्या पोराला समजली असावी. ते नुसतंच आईकडे पाहत गप्प बसून राहिले. तिला थोडे बरे वाटल्यावर तिने पुढे केलेल्या थाळीतील भात खाऊ लागले. पोरगा भात खाता खाताच पेंगु लागलंय हे तिच्या ध्यानात आले तसे तिने त्याला जरासं जवळ ओढले. त्यामुळे पेंगता पेंगता पोरगं दचकून जागं झालं. तिने त्याला थाळीतला भात भरवायला सुरवात केली. भात भरवून होताच तिने स्वतःचा आणि त्याचा हात थाळीतच धुतला, त्याच्या तोंडाला पाणी लावले. त्याला घोटभर पाणी प्यायला लावले आणि थाळी खंगाळून टाकली.

ती काळजी घेत हळूहळू उठली, जुनी वाकळ अंथरून पोराला त्यावर झोपायला लावले आणि स्वतः काळजी घेत त्याच्याजवळ कलंडली. आधीच झोपेला आलेले पोरगं लगेच झोपले.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -1 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -1 ☆ श्री आनंदहरी ☆

मोर्चा.. !

बंद…!

दंगल…!

जाळपोळ… !

जमावबंदी…!

संचारबंदी… !

  • ●    ●    ●     ●

” तुला रं मुडद्या रडाय काय झालं ? तुजी आय मेली का बा रं ? गप बस्तुस का ? “

चिडलेल्या तिनं पोराच्या पाठीत कावाकावानं धपाटा घालत विचारलं आणि पाटीतल्या भाजीची उलथा- पालथ करीत हताशपणे भाजीकडे पाहिले. भाजीची पाने पिवळी पडून भाजी कुजायला लागली होती. तिनं पाटीवर फडकं टाकून त्यावर पाण्याचा हबकारा मारला.

तिने मारलेल्या धपाट्याने  रडणारे पोर एकदम गप्प झाले होते.कधीही अंगाला हात न लावणाऱ्या, न मारणाऱ्या आईने धपाटा घातल्याने काहीसे आश्चर्याने, काहीसे भीतीने ते कोपऱ्यातूनच तिच्याकडे पहात होते. डोळ्यांच्या पापण्यात अजूनही पाणी होते, गालावर ओघळ होते पण त्याने ओठ मात्र घट्ट मिटून घेतले होते. हुंदका बाहेर पडला, भोकाड पसरले तर आपल्याला आणखी धपाटे बसतील, आईच्या हातचा मार खावा लागेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे भोकाड पसरणे तर दूरच मुसमुसण्याचा आवाजही बाहेर पडू नये म्हणून तो घाबरून तोंड दाबून बसला होता.

‘मला म्येलीला हाव सुटली..सस्तात भाजी घावल्याव दोन दोन पाट्या घेतल्या.. म्हनलं चार पैकं जास्तीचं हुतीली… पर वैशीच माझी.. समदंच गेलं.. चार दिस झालं करफू का काय म्हंत्यात त्यो हाय… भाजीबी सुकून, कुजून ग्येली आन त्या मुडद्या दलालाचं पैकंबी आंगाव …  त्यो चार रोज दम बी धरायचा न्हाय.. आन त्यात ह्यो मुडदाबी कुठंसं  उलातलाय कुणाला ठावं ? …’  ती स्वतःशीच पण मोठ्याने बडबडली. स्वतःच्याच बडबडीकडे तिचे लक्ष गेलं आणि बडबडीतलं शेवटचे वाक्य आठवून तिला काहींसं अपराधी वाटू लागलं. नवऱ्याची काळजी मनात ठसठसू लागली. या संचारबंदीच्या काळात नवरा कुठं असेल ?  हा प्रश्न तिला व्यथित करू लागला. कुणीसं म्हणालं होतं ‘ कर्फ्युत माणूस दिसला की गोळी घालतात..’ तिला ते वाक्य आठवलं आणि ती अधिकच बेचैन झाली.

 ‘कुठंसं आस्तिली ही.. ? चार दिस झालं…’

रोज रात्री नवटाक मारून तरंगत का होईना पण घरी येणारा नवरा दोन दिवस झाले परतला नव्हता. त्यात कर्फ्यु लागू झाला होता त्यामुळे तिच्या मनात शंका -कुशंका थैमान घालू लागल्या होत्या.

‘कुणाला ईचारावं बरं ..? .. कुणाला ईचारणार ? समदी खुडूक कोंबडीवानी आपापल्या घरातनीच तर हायती…’

तिच्या मनात प्रश्नापाठोपाठ उत्तरही आलं होतं पण तरीही तिला राहवेना

‘दारूच्या नशेमंदी त्यो रस्त्याव तर आला नसंल ?.. पोलिसांनी गोळी तर घातली नसंल नव्हका ?.. ‘  नसत्या शंका-कुशंका तिचं काळीज कुरतडू लागल्या होत्या. ती दाराशी आली… दार किलकीलं करत आजूबाजूचा कानोसा घेत समोर नजर टाकली.. त्याचवेळी दार अर्धवट उघडून बाहेरचा कानोसा घेऊ पाहणाऱ्या समोरच्या शेजाऱ्याला तिनं विचारलं ,

 ” व्हय वो भावजी, गावात समदं शांत हाय नव्हं ? “

 ” काय की.. कोण गेलंय बगाय ?…”

 ती उगाच काहीतरी काम सांगेल आणि शेजारधर्मामुळे ‘नाही’ म्हणता येणार नाही.. उगाच नसती झंझट नको असा विचार करत दार बंद करता करता शेजारी म्हणाला. त्याने दाराला आतून कडी लावल्याचा आवाज तिलाही ऐकू आला.

 दार पुढे लोटत  ती नवऱ्याच्या काळजीत भिजत हताशपणे बसून राहिली.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव साक्षीला होता – भाग-२ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता. त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!)

मान टाकल्यासारखा दिवस उजाडला, तसाच मावळूही लागला. रोजच्यासारखी दुपार तापलीच नाही. राख धरलेल्या निखाऱ्यासारखा सूर्य दिवसभर थंड आभाळांत पडून राहिला होता.तो विझून जावू लागला,  तसं आभाळ विव्हळू लागलं. सांज झाली, आणि आसूड ओढल्यासारख्या विजा कडाडू लागल्या. संकटाची दवंडी पिटत वारा घोंगावू लागला. स्वतःचा जीव वाचवीत धुळीचे लोट पळू लागले.

मातीत खेळणाऱ्या पोरांच्या दंडांना धरुन पळवत बायाबापड्यांनी घरं गाठली.

घरासमोरची आवराआवर करून दार पटाटा लावली.अंगात संचार व्हावा तशी झाडं घुमू लागली.

वानरांनी जीव मुठीत धरून फांद्यांना मिठ्या मारल्या. पक्षांचे पुंजके घरट्यात लपले. पानांबरोबर ती जड घरटीही झुलू लागली. ऐन मुहूर्ताला आभाळ उरी फुटून रडू लागलं.त्याच्या अश्रूंचा महापूर आल्यासारखं पाणी कोसळू लागलं. अख्खं गाव पाण्यानं चिंब झालं. महार वाड्यात पेटू लागलेली चुलाणी पेटण्यापूर्वीच विझू लागली. पावसाच्या सड्यानं सादळून गेली. पावसानं जोर आणखी वाढवला तशी जनी धास्तावली.

फडक्यात बांधून ठेवलेलं दोन भाकरींचं पीठ झाडून घेऊन त्या वेळी ती भाकरी थापत होती. भुकेने कासावीस होऊन शिन्यानं भोकाड पसरलं. त्याच्या पाठीत धपाटा घालायला उठण्यासाठी दात ओठ खात जनीनं जमिनीला रेटा दिला, तेव्हा मांडीवर झोपलेल्या झीप्रीची झोप उडून ती रडायला लागली. झपाटून पटापटा मुके घ्यावेत तसं काकणं वर सारून जनीनं झीप्रीच्या इवल्याशा पाठीत धपाटे हाणले, आणि तिला जमिनीवर भिरकावलं. शेकून झालेल्या धुरकट भाकरीचे दोन तुकडे थाळीत टाकून तिने थाळी शिन्यासमोर सरकवली. आणि हात लांब करून झीप्रीला पुन्हा कवटाळून घेतलं. झीप्रीचा घाबरलेला जीव पाणी शिंपडल्यासारखा शांत झाला.

जनीच्या पुढे आता फक्त कसंबसं एकाच भाकरीचं पीठ शिल्लक होतं. तिने भाकरी थापली. शेकली. भाकरीचा तो चंद्र दुरडीत अलगत उभा ठेवला.तिच्या दिवसभराच्या भुकेल्या पोटात त्याच्या खरपूस वासानं आगडोंब उसळला.तिने आवंढा गिळला. आणि ती चुलाणं विझवायला लागली.

‘आता बबन्या आला की आर्धी आर्धी भाकर दोघांनी संगट खायची ‘असा विचार तिच्या मनात आला, तेवढ्यात झोपडीबाहेर कुणाचीतरी पावलं वाजली.

‘बबन्याचअसनार …’ जनी हरकली. झिपरीला सावरत ती दाराशी आली. समोर सादळलेला मिट्ट काळोख होता. त्यात बबन्या दिसेचना. तिने डोळे फाडून पाहिले तेव्हा खूप वेळाने तिला त्या अंधारात अंधुक दिसू लागलं. …समोर बबन्या नव्हताच. शिरपा न् सदा उभे होते. आख्खे भिजलेले. गुडघ्यापर्यंत चिखल माखलेले…

“ह्ये न्हाईत. ह्यो पाऊस मुडदा कोसळतुय न्हवं का कवा ठावनं. कुटं आडकून पडल्यात द्येवालाच ठाव..”

शिरपा न् सदाला काय बोलावं सुचेचना. देवाच्या साक्षीनं घडून गेलेलं आक्रित आठवून शिरपा न् सदा अजूनही कासावीस होते. धीर गोळा करून मग शिरपाच बोलू लागला आणि व्हय व्हय करत सदा भेदरल्या अवस्थेत मान डोलवत राहिला. सगळं ऐकून जनी शक्तीच गेल्यासारखी मटकन् खालीच बसली. मनातल्या धुवांधार पावसानं तिचे डोळे चिंब भिजून वाहू लागले. पण आरडून ओरडून रडायचं भान न् त्राण तिच्या भुकेल्या शरीरात नव्हतंच. भाकरीचा तो चंद्रही आता वास हरवलेल्या अवस्थेत विझलेल्या चुलीपुढं दुरडीत मान टाकलेल्या बेवारशासारखा थंड पडला होता..! सकाळी जाताना मागं वळून हात हलवणारा बबन्या तिच्या ओल्या नजरेसमोर तरळत राहिला आणि बबन्यासाठी काकुळतीला आलेल्या जनीचं मन वेडंपीसं झालं. मघाशी भोकाड पसरून रडणाऱ्या त्या आभाळासारखं ते खदखदू लागलं. झिप्रीला तिथंच जमिनीवर टाकून देहभान विसरल्याअवस्थेत ती चिखलपाण्यातून धावत सुटली ..वेशीच्या दिशेने..!       

वेशीसमोर देवाच्याच साक्षीने आक्रित घडून गेलं होतं!!                                             

सांज झाली, तेव्हा आत्ता बबन्या येईल म्हणून जनी सादळलेल्या चुलीत जाळ लावून भाकरी थापत होती तेव्हा तिकडे पावसात अडकलेला बबन्या वेशीवरच्या झाडाखाली उभा होता. शिरपा आणि सदा त्याच्या बरोबरच होते. पावसाचा जोर वाढला आणि झाडाखालीही पाणी ठिबकायला लागलं तसं शिरपा न् सदानं शाळेच्या आडोशाला धाव घेतली. शाळेच्या आवारात पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बबन्या त्यांच्याबरोबर आलेलाच नाहीय. तो झाडाखालीही दिसेना. नजर लांब करून पहायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की वेशीवरच्या मारुतीच्या देवळात कसलीतरी झुंबड उडालीय. ऑपरेशन करून आलेल्या बबन्याला त्यांच्यामागे शाळेपर्यंत इतक्या लांब पळता येईना तेव्हा त्याने जवळच असलेल्या मारुतीच्या देवळाकडे धाव घेतली होती. पाऊस चुकवायला म्हणून देवळाच्या पायरीवरून तो थोडा वर सरकला आणि..आणि तिथं पावसामुळे आधीच देवळात आश्रयाला थांबलेले गावकरी भडकले. ‘हे म्हारडं देवळात आलंच कसं..’ म्हणून ओरडू लागले. आदल्या रात्रीपासून उपाशी असलेला आणि ऑपरेशनच्या वेदनांनी कळवळणारा बबन्या हात जोडून गयावया करीत होता.

“पान्यात भिजाय लावू नगा..’ म्हणत त्यांचे पाय धरायला तो पुढे झाला तसा गावकऱ्यांच्या गर्दीतला एक जण पुढे झेपावला. 

“या म्हारड्यानं द्येव बाटिवला” म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला लागला. ते पाहून बाकीच्यांचीही भीड चेपली. तेही एकामागोमाग एक करीत पुढे आले. बबन्याला धक्के देत त्यानी भर पावसात त्याला देवळापुढच्या चिखलात ढकलला. कुणीतरी जवळचा एक दगड उचलला आणि नवीन दिशा मिळाल्यासारखे एकेक करत सगळेच खाली वाकले. बबन्यावर दगडं बरसायला लागली. हातातल्या काठ्यांचे वार सुरू झाले. बबन्या गुरासारखा ओरडत होता. हातापाय आवळत मार चुकवायचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. रक्ताळलेल्या बबन्याचे मासांचे लगदे लोंबू लागले तसे गावकरी दमून थांबले. मोठ्ठं यज्ञकर्म पार पडल्याच्या समाधानात पांगून गेले. मग पाऊसही थकून थांबला. शाळेच्या  छपराखालून शिरपा न्  सदा वेशीपर्यंत आले तोवर रक्ताळलेला बबन्या मारुती समोर चिखला सारखाच थंड पडला होता..!

…..जनी धावत धापा टाकत वेशीपर्यंत आली तोवर तिथे बबन्याजवळ चिटपाखरूही नव्हतं.वेशीवरच्या देवळात नाही म्हणायला मारुती मात्र उभा होता…! 

जनी बबन्याला आणि त्या देवालाही जाग यावी म्हणूनच जणू  धाय मोकलून आक्रोश करीत राहिली…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ? 

☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे ☆  

जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट करतांना काय नेऊ, काय नको या द्विधा मनस्तितीतून जात होतो. देव्हारा हालवताना मन गलबललं.  देव्हाऱ्यातील सगळे देव एका जागी डब्यात ठेवून, खाली देव्हाराही हलवला.

दोघांचेही बाबा फोटोतून आमच्या हालचालीवर नजर ठेवून होते. तिचे बाबा, माझे बाबा. दोघेही जिगरी दोस्त.“ ते फोटो गावी नेऊ. राहू  देत तो पर्यन्त इथे.”  ही म्हणाली. मीही आग्रह नाही केला.

सामान सुमान आता व्यवस्थित लावून झालंय. देव्हारा पण छान सजलाय. लहानसा लामणी दिवा लटकताना खूपच शोभून दिसतोय. हा दिवा आणि विठ्ठल रखुमाईची ‘कटेवरी कर’ वाली मूर्ती पंढरपूरी खरेदी केलेली. सासरेबुवा महिंद्रातून रिटायर झाल्यावर आम्हा सर्वांना पंढरपूर यात्रा घडवली होती त्यांनी. स्वखर्चाने.

“अरे! विठोबा रखुमाई कुठाय? देव्हारी तर नाहीये. गेली कुठे. घेताना तर सर्व सान थोर देवताना एकत्र घेतलेलं. गेली कुठे?”——अचानक हिच्या गालावरून अश्रू ओघळले. जोरजोरात हुंदके देत हिला रडताना पाहून मीही हादरलो. रडू आवरून तिला बोलतं केलं—. “ आपल्या दोघांच्या वडिलांना मागे ठेऊन आलो आपण. त्याचीच ही परिणती. विठोबा रखुमाई दोघही रुसलीत आपल्यावर.”

——लागलीच जुन्या घरी जाऊन दोघांही बाबांना सम्मानपूर्वक नवीन घरी आणलं!

पुनः शोध. विठूरखुमाईचा. रखमाय रुसलेली ऐकलेलं. इथे तर दोघेही आमच्या दोघांवर रुसलेली. सहन होत नव्हतं. अस्वस्थता वाढत होती, आणि आज शेवटी त्या कटेवरी कर घेतलेल्या दोघांच दर्शन झालं एकदाचं. गणेशाच्या विश्वास बसणार नाही एवढ्या लहान तस्विरीच्या मागे लपले होते विठुराया, सहकुटुंब! आमच्या कन्या रत्नाचं आगमन होण्यासाठी थांबले होते जणू, प्रगट व्हायचे!

की दोघांच्याही जन्मदात्यांना मागे ठेऊन आल्यामुळे रुसलेले जगत्पिता!—-तो विठुरायच जाणो. 

पंढरीनाथ महाराज की जय

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

पाखरांची चिवचिव आणि कोंबड्यांचं आरवणं दोन्ही रोजच्या वेळेपेक्षा खूपच लांबलं होतं. अखेर सूर्य उगवला, पण तो कमनुसाच होता.आजारातून  उठल्यासारखा.अशक्त. थंड पडलेला.बबन्या इतका वेळ मेल्यासारखा पडून होता पण मग याची जाणीव होताच कोणाचीतरी झापड बसावी तसा झामदिशी उठला.जनी कुशीवर झोपलेलीच होती.टिचभर लांबीचं महारवाड्यातलं बोळकांडातलं  झोपडीवजा घर त्यांचं.तीन महिन्यांच्या झिप्रीनं रात्रभर तिच्या केकाटण्यानं सगळ्यांनाच जागवलं होतं.त्यामुळे कांबळं सोडताना त्याची पाठ कुरकुरली.

डोळ्यातली ओली झोप लोचट मांजरासारखी ठाण मांडून बसू लागली तशी बबन्या सावध झाला. त्याने अंगभर आळस दिला आणि कुणीतरी खेचावं तसं तो उठला.त्याने चूळ थुंकली. मडक्यातलं लोटीभर पाणी तो गटागटा प्याला.

“जने….जागी हायस न्हवं? जातुय म्या..” झीप्री पाळण्यात चिडीचूप झोपली होती. ती त्याच्या आवाजाने दचकली.दीड वर्षाच्या शिन्या जनीच्या उबेला घट्ट झोपला होता. त्याच्यामुळे जनीला आपली कूसही बदलता येईना.ती अलगद उठून दाराबाहेर आली तोपर्यंत बबन्या दहा हात लांब गेला होता.

“लवकर या परतून.ऊनं उतरायच्या आदी या .लई यळ लाऊ नगासा.भाकरी लावून म्या वाट बगते..”

जनीनं पारोश्या तोंडानेच आवाज दिला. बबन्याने वळून हात हलवला आणि तो झपापा चालत राहिला.बबन्या गेला. पण त्याच्याबरोबर जन्मापासून त्याला सावलीसारखं चिकटून बसलेलं त्याचं ‘वंगाळ’ नशीबही होतंच. त्यानंच सगळं होत्याचं नव्हतं  करून टाकलं.

त्याचीच ही चित्तरकथा.. देवासाठी आणि देवाच्या साक्षीने घडलेली..!!

तालुक्याच्या गावकुसाबाहेरचा हा महारवाडा.गावाने पिढ्यानपिढ्या दहा हात लांब ठेवलेला.पण गाव आता जवळ येऊ लागलं होतं. काम निघेल, असेल तेव्हा का होईना पण अंतर कमी होऊ लागलं होतं. सरपंचाची माणसे, कधीकधी सरपंच स्वतःसुद्धा  या वस्तीत डोकावून जायचा.खोटं का होईना पण मिठ्ठास बोलायचा. नेहमी कसलं कसलं इलेक्शन असायचंच.ते नसेल तेव्हा दुसरी कांहीबाही कामं तरी निघायचीच.

आजसुध्दा एवढ्या सकाळीच चूळ भरून बबन्या रस्त्याला लागला होता ते सरपंचाच्याच सांगण्यावरून. झिप्री झाली तेव्हा हो नाही करता करता जनीने ऑपरेशन करून घेतलं होतं.त्याला आता तीन महिने उलटून गेले.झिप्री तीन महिन्यांची आणि तिच्यावरचा शिन्या दीड वर्षाचा.

बबन्याचा आणि जनीचा संसार शहरातल्या माणसासारखा असा चौकोनी होता. पण हा चौकोन त्यांनी जाणीवपूर्वक आखलेला नव्हता. तीही देवाची करणीच म्हणायची. कारण त्यांची पहिली तीन पिल्लं साथीतल्या उंदरांसारखी पटापटा मेलेली होती.चौथ्या खेपेचा शिन्या होईपर्यंत भरल्या अंगाच्या जनीचा सगळा चोथाच होऊन गेला होता.तरीही शिन्याला पाठीशी बांधून जनी बबन्या बरोबर शेतावर मजुरीला जायची. उन्हांतान्हांत राबायची.एक वेळेला का होईना, दोघाना भाकरतुकडा मिळायचा.

शिन्यासाठी छातीला दोन थेंब दूध तरी यायचं. पण झिप्री झाली आणि  जनीचं कंबरडंच मोडलं.

तिची छाती कोरडी पडली.

दिवसभर आळीपाळीनं तिच्या छातीला झोंबणारी शिन्या आणि झीप्री, तोंड ओलं होईना, तशी पेकाट मोडल्यासारखी केकाटू लागायची.तिकडे सरपंचाला ऑपरेशनची एखादी केस हवी होती आणि इकडे या दोघांना पैसा.तीनशे रुपयांची  हाव धरून उपासमारीची झीट आलेली जनी अखेर ऑपरेशनला तयार झाली.

ऑपरेशन झालं, पण यांच्यापर्यंत येऊन पोहोचले फक्त शंभर रुपयेच!त्या शंभरचंही त्यांना खूप अप्रुप वाटलं होतं. पण ऑपरेशननंतर जनीनं अंथरूण धरलं ते अद्याप पुरतं सुटलं नव्हतं.

पैसे आले आणि गेले.घरात खायप्यायची आबाळ पांचवीला पुजल्यासारखी पुन्हा सुरू झाली. पण आता फाटक्या पदरांत दुधाच्या तोंडाची दोन कच्चीबच्ची होती. त्यांना सोडून आणि मोडकी कंबर घेऊन जनीला शेतावर राबणं झेपेना.अखेर त्यांना देवासारखी सरपंचाची आठवण झाली.बबन्यानं त्याचे पाय धरले. मदतीची याचना केली सरपंचाने,’तू  ऑपरेशन करून घेतोस का’ म्हणून विचारलं. नियमाप्रमाणे म्हटलं तर जनीचं

ऑपरेशन झालेलं असल्यामुळे बबन्याला ऑपरेशनचे पैसे मिळू शकणार नव्हते.पण  सरपंच ‘त्येचं मी बघतो’. म्हणाला.नाव बदलून दाखवायचं ठरलं. डॉक्टर सरपंचाच्या खिशातलाच होता. त्यालाही ऑपरेशनची एखादी केस हवीच होती.

बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून

जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता.त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!

क्रमशः —————-

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print