श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ चाल… ☆ श्री आशिष मुळे ☆
उगारलेल्या व्याघ्रसुळयाला अग्र भाल्याचे भिडले पाहिजे
शेकोटीच्या ज्वाळेमध्ये मुख सापाचे पोळले पाहिजे
माणसाने पुढे चाललेच पाहिजे।
पोटातल्या अग्नीलाही शेत हिरवे दिसले पाहिजे
अस्मानीच्या जळालाही छप्पर झोपडीचे अडले पाहिजे
माणसाने पुढे चाललेच पाहिजे।
अज्ञानाच्या अंधकारात निरांजन शब्दांचे लावले पाहिजे
ज्ञानाच्या प्रखर तेजात निःशब्द अंतर्मुख झाले पाहिजे
माणसाने पुढे चाललेच पाहिजे।
भोळ्याभाबड्या भक्तांना समज स्वत्वाची आली पाहिजे
परंपरेच्या पाईकांना बदलाची गरज कळली पाहिजे
माणसाने पुढे चाललेच पाहिजे।
दगड मार्गीचे मागच्यासाठी खडयासारखे सारीले पाहिजे
उद्याच्या लढाईसाठी बळ लहान्यांना वाटले पाहिजे
माणसाने पुढे चाललेच पाहिजे।
मनातल्या चातकाला अमृत कलेचे पाजले पाहिजे
थिजलेल्या हृदयाला चाल काव्याची दिली पाहिजे
माणसाने पुढे चाललेच पाहिजे।।
© आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈