ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० मार्च – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  २० मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाळ  सीताराम मर्ढेकर बाळ सीताराम मर्ढेकर (१ दिसंबर १९०९ – २० मार्च १९५६) 

मराठी नवकवितेचे आद्य प्रवर्तक असे ज्यांना संबोधले जाते त्या बा.सी.मर्ढेकर यांचा आज स्मृतीदिन.कवी केशवसुतांनंतरचे  युगप्रवर्तक कवी म्हणून मर्ढेकरांचे नाव घेतले जाते.जोष,ठसठशीतपणा,

निर्भिडपणा,आशयसंपन्न नव्या प्रतिमा,धक्का देणा-या दोन विभिन्न कल्पनांची घातलेली सांगड ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यावर त्यानी काही दिवस टाईम्स ऑफ इंडिया मध्ये संपादकीय विभागात व नंतर अध्यापक म्हणून नोकरी केली.त्यानंतर ते आकाशवाणीत रूजू झाले.

इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी तेथील वांड्मयीन चळवळीळीचा अभ्यास केला.अनेक श्रेष्ठ साहित्यिक व समीक्षक यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.बदलते सामाजिक जीवन,ताणतणाव,जीवनाची तीव्र गतीमानता,सर्वसामान्य माणसाची अगतिकता त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबीत झालेले दिसतात.

शिशिरागम हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.त्यानंतर काही कविता  , व आणखी काही कविता हे दोन संग्रह आले.तांबडी माती,रात्रीचा दिवस,पाणी या कादंब-यांचे लेखन त्यांनी केले.कर्ण नावाची संगितिका व नटश्रेष्ठ नावाचे नाटकही त्यांनी लिहिले.पण काव्यलेखनातच त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.

काव्याबरोबरच त्यांनी साहित्य समीक्षाही केली आहे.सौंदर्य आणि साहित्य,वाड्मयीन महात्मा,आर्टस् अॅन्ड मॅन हे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

20मार्च 1956 रोजी त्यांचे निधन झाले.त्यांचे स्मृतीस अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : मराठीसृष्टी, विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १८ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दिनकर नीलकंठ देशपांडे

दिनकर नीलकंठ देशपांडे (17 जुलै 1933 – 18 मार्च 2011) हे मराठीतील पत्रकार व साहित्यिक.

त्यांचे शालेय शिक्षण जबलपूर व वर्ध्याला झाले. शालेय जीवनात ते ‘उत्कृष्ट विद्यार्थी’ म्हणून नावाजले गेले.

नंतर ते ग्रामसेवक म्हणून नोकरी करू लागले. तेव्हाच त्यांना लिहिण्याचा छंद लागला.

1951 मध्ये ते नागपूरला परत आले व त्यांनी ‘अशोक प्रकाशन’ व ‘उद्यम प्रकाशन’ मध्ये नोकरी केली. नंतर ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’, ‘दैनिक महाराष्ट्र’ या वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली.

स्वतःच्या नावाला ‘राव’ हा शब्द जाणीवपूर्वक लावून ते तो खास वैदर्भी ठसक्यात उच्चारायचे. त्यांचा स्वभाव मोकळा, उमदा व मिश्किल होता.

त्यांनी ‘बहरले सोन्याचे झाड’, ‘हं हं आणि हं हं हं’ वगैरे शंभराहून अधिक बालनाट्ये लिहिली. त्यापैकी बहुसंख्य नाटके सुधा करमरकर यांच्या ‘लिटिल थिएटर’ने सादर केली व गाजवली.दिनकररावांनी नागपूरला अभिनयाची नाट्यशाळा चालवली.

याशिवाय त्यांनी मोठ्यांसाठी विनोदी लेखसंग्रह, कथासंग्रह, दोन कादंबऱ्या व अन्य बालसाहित्यही लिहिले.

ठाणे येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली. बालनाट्यलेखनासाठी राज्यशासनातर्फे देण्यात येणारा ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ दोनदा मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक आहेत.

त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन. ??

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ मार्च – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १४ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर:

शिक्षण, लेखन, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता अशा विविध प्रांतात उल्लेखनीय कार्य करणा-या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची आज पुण्यतिथी!

पुणे येथे पूना काॅलेज व डेक्कन काॅलेज येथे आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.काही वर्षे त्यांनी रत्नागिरीत ही घालवली. त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, नीतीशास्त्र, इंग्रजी, संस्कृत व मराठीतील उत्तमोत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे वडिलही लेखक होते.वडिलांच्या ‘शालापत्रक’ या मासिकात त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली होती. मासिकातील लेखन हे तत्कालीन ब्रिटिश सरकारला न रूचल्यामुळे या मासिकावर बंदी घालण्यात आली. पण विष्णूशास्त्र्यांनी त्यापूर्वीच म्हणजे 1874 मध्ये ‘निबंधमाला’ चालू केले होते. त्यातून टिकात्मक व साहित्य विषयक लेखन होत असे. त्यांनी निबंधमाला आयुष्याच्या अखेरपर्यंत चालवली. याशिवाय इतिहास व काव्याभिरूची वाढावी या हेतूने ‘काव्येतिहास संग्रह’ हे मासिक सुरू केले.पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. मराठी साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ‘किताबखाना’ हे पुस्तकांचे दुकान सुरू केले. केसरी व मराठा या  वृत्तपत्रांची धुरा त्यांनीच  सांभाळली. तसेच पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने  लो. टिळकांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल च्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यांची काही ग्रंथसंपदा:

अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी –6 भाग

आमच्या देशाची स्थिती

इतिहास

संस्कृत कवीपंचक

केसरीतील लेख

कादंबरी..अनुवादित

कालिदासावरील निबंध

पद्य रत्नावली

विष्णूपदी…तीन खंड

संस्कृत कविता…..इ.इ.इ.

कामाची ही व्याप्ती अवघ्या बत्तिस वर्षांच्या आयुष्यातील आहे. 1882 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे  दुःखद निधन झाले.त्यांच्या कार्यास अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

काशिनाथ नारायण साने

विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या काव्येतिहास या मासिकाचे का.ना.साने हे संपादक होते. ते स्वतः इतिहाससंशोधक होते. भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष होते.

त्यांची ग्रंथ निर्मिती अशी:

विविध बखर लेखन

होळकरांची कैफियत

छ.संभाजी महाराज व थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र.

ऐतिहासिक पत्रे यादी श्रीमंत भाऊसाहेब यांची कैफियत इत्यादी.

का.ना.साने यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १६ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर

गणेश दामोदर ऊर्फ बाबाराव सावरकर (13 जून 1879 -16 मार्च 1945)हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हे सर्वांत मोठे बंधू.

घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांना मॅट्रिकपर्यंत जाता आले नाही. पण त्यांनी योगविद्या, वैद्यक, फलज्योतिष, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, वेदांत या शास्त्रांचा, त्याचप्रमाणे इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र,कला वगैरे अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला.

‘राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप’, ‘धर्म कशाला हवा?’, ‘हिंदुराष्ट्र -पूर्वी -आता – पुढे’, ‘ख्रिस्तपरिचय’ वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. ‘वीर बैरागी’ हा मूळ हिंदी भाषेतील पुस्तकाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. याशिवाय त्यांनी वेळोवेळी विविध विषयांवर लिहिलेले लेखही वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले.

1946साली त्यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’या पुस्तकात त्यांनी ‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू – विश्वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे,’असे विचार मांडले होते.26.02.2016 रोजी हे पुस्तक पुनःप्रकाशित करण्यात आले.’ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चन कौन्सिल’ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या क्रांतिकार्यामुळे त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची व सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.1911 ते 1921 या काळात त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या. 1921मध्ये त्यांची अंदमानहून सुटका होऊन त्यांना भारतातील विविध तुरुंगांत पाठवण्यात आले. त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने 1922 साली त्यांची शिक्षा संपवण्यात आली. पण नंतरही क्रांतिकार्य सुरू असतानाच 16 मार्च 1945 रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.

ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी

ऍडवोकेट ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी (13 जून 1930 -16 मार्च 2013) हे पुण्यातील एक नामवंत वकील, इतिहासाचे गाढे अभ्यासक असे विद्वान गृहस्थ होते.

‘A New Perspective To The Language Of Indus Script’,’रोमन आणि देवनागरी लिप्यांची जननी :सिंधू लिपी ‘, ‘सिंधू संस्कृती’, ‘हडप्पा संस्कृती? नव्हे, महाभारतकालीन हिंदू राज्येच!’ इत्यादी अनेक मराठी व इंग्रजी ऐतिहासिक पुस्तके, त्याचप्रमाणे ‘श्रीपाद श्रीवल्लभ ‘ हे दत्त संप्रदायावरील पुस्तक, तसेच ‘अजिंक्य’ हे 81 व्या वर्षीही असणाऱ्या स्वतःच्या सुदृढ प्रकृती चे रहस्य सांगणारे पुस्तक, तसंच ‘आकाशगंगा’ व ‘ ऋतुराज’ हे कालिदासाच्या ग्रंथांचे अनुवाद वगैरे विविध विषयांवरील विविध पुस्तके त्यांनी लिहिली.

16 मार्च 2013 रोजी त्यांचे निधन झाले. पण शेवटपर्यंत त्यांची वकिली चालू होती.

 

गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर आणि ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. ??

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ मार्च – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आदिमाया अंबाबाई, आला आला वारा, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?,  जरा विसावू या वळणावर, फिटे अंधाराचे जाळे, रात्रीस खेळ चाले, सांज ये गोकुळी सावळी सावळी या सारख्या सदाबहार गीतांनी श्रोत्यांच्या मनावर गारुड केलं, नव्हे अजूनही करताहेत, ती गीते सुधीर मोघे यांच्या लेखणीतून लिहिली गेली. कवी, गीत, चित्रपट गीत, पटकथा लेखन, ललित लेखन, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण, दिग्दर्शन या बहुविध माध्यमातून, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट इ. क्षेत्रात त्यांचा संचार झाला.

‘कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे ध्वनी –प्रकाश योजनेच्या सहाय्याने  आपल्या मराठी कविता, गीते सादर करत.

सुधीर मोघे यांचे कविता संग्रह –

१. आत्मरंग, २. गाण्याची वही, ३. पक्ष्यांचे ठसे, ४. शब्दधून, ५. स्वातंत्रते भगवती

सुधीर मोघे यांचे गद्य लेखन –

१. अनुबंध, २. कविता सखी, ३. गाणारी  वाट, ४. निरंकुशाची रोजनिशी

सुधीर मोघे यांनी ५०हून अधीक चित्रपटांसाठी गीतलेखन केले.

सुधीर मोघे- पुरस्कार आणि सन्मान –

१.    सर्वोत्कृष्ट गीतकार – अल्फा गौरव

२.    ग. दी. मा. प्रतिष्ठान – चैत्रबन

३.    महाराष्ट्र साहित्य परिषद – ना.घ. देशपांडे पुरस्कार.

४.    दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान – शांता शेळके पुरस्कार.

 

सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ चा. आज त्यांचा स्मृतीदिन. या प्रतिभासंपन्न कवी, गीतकार, लेखकाला शतश: वंदन.?

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ मार्च – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १४ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सुरेश भट

मी कसे थोपवू शब्द माझे?

हिंडती सूर आसपास किती.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

सांभाळतात सारे आपापली दुकाने

मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे

जीवना,तू तसा,मी असा

खेळलो खेळ झाला तसा

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्याना परंतु

तापल्या मातीत माझ्या

घाम मानाने गळू दे

असेच हे कसेबसे

कसेतरी जगायचे

कुठेतरी—कधीतरी

असायचे–नसायचे

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची

रणात आहेत झुंजणारे अजून काही

किती काव्यपंक्तींचा उल्लेख करावा ? काही ओळखीच्या,काही अनोळखी.एखाद्या झंझावाताने झपाटून टाकावे तशा कविता आणि नंतर झालेली त्यांची गीते.शब्दांच्या काफिल्याचा रंगच वेगळा.एकदा एल्गार पुकारल्यावर रसवंतीने मुजरा करावा अशा या सप्तरंगी कवितांचे जनक श्री.सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन.त्यांचे काव्य हीच त्यांची खरी ओळख.संगीताची आवड बालपणा पासून असलेल्या सुरेश भटांनी आपल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी स्वतःचे शरीर मजबूत बनवले.कोमल ,रसिक मन आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची वृत्ती यामुळेच की काय त्यांची कविताही कोमल आणि तितकीच सशक्त झाली.मराठीत गझल लेखनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून मराठी साहित्यात गझल लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांना ‘गझलसम्राट’ही पदवी मिळाली.गडचिरोली येथे झालेल्या एकोणचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .

हिंडणारा सूर्य या गद्य लेखना व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेल्या कवितांचे संग्रह असे:

एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग आणि सुरेश भट यांच्या निवडक कविता.

‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ असे त्यांनी लिहिले असले तरी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर’अजुनी सुगंध येई दुलईस मोग-याचा’ प्रमाणे त्यांच्या काव्य दरवळचा आस्वाद घेत त्यांच्या स्मृती जपूया.

 

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर:

काव्य वाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता गावोगावी पोचवून लोकप्रिय करणरे तीन कवी म्हणजे कविवर्य वसंत बापट,मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर.

आज विंदांची पुण्यतिथी. कोकणातील देवगड जवळील खेड्यात जन्मलेल्या या कवी लेखकाने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून मराठीला पुन्हा एकदा सन्मान मिळवून दिला. विंदा हे कवी तर होतेच पण अनुवादक, समीक्षक आणि बालसाहित्यिकही होते.वास्तववाद आणि प्रयोगशिलता हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते.त्यांचे बालसाहित्य वाचताना त्यांच्यातील खट्याळ स्वभावाचे दर्शन होते.’माझ्या मना बन दगड’ असे म्हणणारा हाच का तो कवी असा प्रश्न पडावा इतक्या मनोरंजनात्मक बालकविता त्यांनी लिहील्या आहेत.

‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी

त्याने स्वतःला जिंकणे,एवढे लक्षात ठेवा’

‘मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा

विझले तिथेच सारे,ते मागचे इशारे’

‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर’ किंवा

देणा-याने देत जावे, तेच ते अन् तेच ते, सब घोडे बारा टक्के,

यासारख्या कविता त्यांच्या प्रतिभेचे पैलू दाखवतात. राणीचा बाग, सशाचे कान, एकदा काय झाले, परी ग परी अशा बाल कविता थोरांनाही बालपणात घेऊन जातात.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या मते करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे,शैली वक्तृत्वपूर्ण आहे पण भाषणबाजी नाही.तर कविवर्य शंकर वैद्य म्हणतात की विंदांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धीवादी,पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे.

विंदांची साहित्यसंपदा:

काव्य – धृपद,विरूपिका, स्वेदगंगा,जातक,अष्टदर्शने,मृद्गंध

संकलित काव्य –  आदिमाया,संहिता विंदांच्या समग्र कविता.

प्राप्त पुरस्कार:

कबीर पुरस्कार, कवी कुसुमाग्रज, केशवसुत, कुमारन् आसन, कोणार्क, जनस्थान, महाराष्ट्र फौंडेशन, म.सा.प,डाॅ. लाभसेटवार,सोविएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार आणि अष्टदर्शन ला ज्ञानपीठ पुरस्कार.

ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला अर्पण केली व अमराठी साहित्य मराठीत अनुवादीत करण्यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव पुरस्कार सुरू केला.

अनेक विद्यापीठांनी त्यांना डी.लीट.ही पदवी बहाल केली आहे.

“वाचकांचे अनेक थर आहेत.यातला कोणताही थर वंचित ठेवणे हे पाप आहे.”असे मानणा- या विंदाना आदरपूर्वक प्रणाम.

 

इंदुमती शेवडे

इंदुमती शेवडे या विदर्भातील पत्रकार व लेखिका.तसेच त्या उत्तम चित्रकारही होत्या.मराठी कथेचा उद्गम आणि विकास या विषयावर त्यांनी पी.एच्.डी. केले होते. जी. डी. आर्टस् ही कलापदवी  प्राप्त केली होती.

तरूण भारत, नागपूर या दैनिकात पत्रकारिता करून ‘महिलांचे मनोगत’ हे सदर अनेक वर्षे चालवले होते. आकाशवाणी,नागपूर येथे सहायक कार्यक्रम निर्माता (मराठी भाषण) या पदावरही काम केले. बी.बी.सी.च्या प्रशिक्षण वर्गात त्यांचा सहभाग होता.नंतर त्यांना दिल्ली येथील यु.पी.एस्.सी. च्या मराठी विभागात काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला.तसेच मिर्झा गालीब यांचेविषयी माहिती घेऊन त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहीली. चौथे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन त्यांचे हस्ते पार पडले.

साहित्य निर्मिती:

इथे साहिबाचिये नगरी(प्रवासवर्णन)

पु.य.देशपांडे(चरित्र)

संत कवयित्री: पाच संत कवयित्रींचा वेगळ्या पद्धतीने विचार.

कथा एका शायराची (मिर्झा गालीब कादंबरी)

विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणा-या इंदुमती शेवडे यांना वंदन.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया व संबंधित कवींचे काव्यसंग्रह.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १३ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दत्तात्रय कोंडो घाटे

दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त (27 जून 1875 – 13 मार्च 1899). हे मूळचे श्रीगोंद्याचे. त्यांचे शालेय शिक्षण नगरमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई, इंदूर, कलकत्ता येथे झाले. नंतर ते पुण्याच्या नू. म. वि.मध्ये शिक्षक होते.

रेव्ह. ना. वा. टिळक, कविवर्य चंद्रशेखर  वि कवी दत्त या तिघांचे सख्य होते.

‘बा नीज गडे ‘ ही कवी दत्तांची लोकप्रिय कविता. त्यांनी 1897-98 मध्ये बहुसंख्य कविता लिहिल्या. त्या वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी 48 कवितांचा ‘दत्तांची कविता ‘हा संग्रह त्यांचे पुत्र शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक वि. द. घाटे यांनी 1922 साली प्रसिद्ध केला. डॉ. मा. गो. देशमुखसंपादित संग्रहात त्यांच्या सर्व म्हणजे 51 कविता आहेत.

आकाशानंद

आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (1933-13 मार्च 2014). आकाशानंद हे पूर्वी नागपूर नभोवाणी केंद्रात कार्यक्रम निर्माते होते. नंतर 1972 पासून मुंबई दूरदर्शन केंद्रात आले.1992 साली ते तिथे उपसंचालक पदावरून  निवृत्त झाले.

त्यांनी सादर केलेले ‘ऐसी अक्षरे ‘, ‘शालेय चित्रवाणी’  व ‘ज्ञानदीप ‘हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले.

1988मध्ये ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमावर बीबीसीच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी 45 मिनिटांचा लघुपट केला. याच कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली.

‘ज्ञानदीप’वर आधारित असलेले ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिक त्यांनी 25 वर्षे चालवले.

1992मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पहिल्या ‘ज्ञानदीप’ मंडळाची स्थापना केली. त्यांचा विस्तार होऊन राज्यात 1500 मंडळे स्थापन झाली.

त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ वगैरे  पाच पुस्तके व बालसाहित्यात 300 गोष्टीची पुस्तके लिहिली.

त्यांच्या ‘माध्यम चित्रवाणी’ या दूरचित्रवाणी या विषयावरील पहिल्या मराठी पुस्तकाला राज्यसरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला.

याशिवाय त्यांना गोंदियाभूषण व सेवाश्री पुरस्कारही मिळाले.

मालतीबाई किर्लोस्कर

मालतीबाई किर्लोस्कर या विख्यात मराठी संपादक व लेखक शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या.

त्या सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्या अतिशय सुंदर शिकवत असत.

पक्की वाङ्‌मयीन व वैचारिक बैठक, भारदस्त व्यक्तिमत्त्व व विपुल व्यासंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये. त्या परखड व स्पष्टवक्त्या होत्या.

त्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ मध्ये अधूनमधून लिहीत असत.

‘भावफुले’ व ‘फुलांची ओंजळ’ हे त्यांचे व्यक्तीचित्रसंग्रह प्रसिद्ध आहेत.

13 मार्च 2017 ला त्यांचे निधन झाले.

रमेश मुधोळकर

बालसाहित्यकार व चित्रकार रमेश मुधोळकर (19.07.1935 – 13.03.2016) यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे झाले.पुढे ते मुंबईला आले. तिथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले.

1972मध्ये त्यांचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध झाले.1974 मध्ये त्यांनी ‘शालापत्रक’ हे मासिक सुरू केले. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे 300 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यात ‘इसाप’, ‘गलिव्हरच्या गोष्टी’, ‘बिरबल आणि बादशहाच्या 175 गोष्टी’ यांचा समावेश आहे.

जयको पॉकेट बुक्स व अमर चित्रकथा तसंच एको बुक्स या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा मोठाच वाटा आहे.

देशोदेशीच्या रसाळ कथा, तसंच खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीत असे बरेच लेखन त्यांनी मराठी व इंग्रजीतून केले. त्याचप्रमाणे शंकरमहाराज व दिगंबरदास महाराज यांच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.

‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या संस्थेचे ते संस्थापक -सदस्य होते.

2009मध्ये त्यांच्या लेखनाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली.

13 मार्च 2016 मध्ये पुणे येथे त्यांचा देहांत झाला.

कवी दत्त, आकाशानंद, मालतीबाई किर्लोस्कर व रमेश मुधोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.  ??

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया, इंटरनेट. मराठीसृष्टी. कॉम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १० मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वि. वा. शिरवाडकर

विष्णू वामन शिरवाडकर (27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999) हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, कथाकार, नाटककार वगैरे होते. ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या.

त्यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होते.

सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती, शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वातील मानवी वृत्तीचा शोध घेतला. ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित केले आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायचा प्रयत्न केला.’पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या कवितेतून त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप प्रत्ययास येते. त्यांचे समृद्ध व प्रगल्भ व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.

 

त्यांची पुस्तके :

‘विशाखा’, ‘ वादळवेल’ इत्यादी 22कवितासंग्रह.

‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’ वगैरे 22 नाटके.

7 लघुनिबंध व इतर लेखनाचे संग्रह.

9 कथासंग्रह.

‘कल्पनेच्या तीरावर ‘ वगैरे 3 कादंबऱ्या.

‘वाटेवरच्या सावल्या’ हे आठवणीपर पुस्तक.

काही एकांकिका संग्रह.

याव्यतिरिक्त त्यांनी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत.

‘सती सुलोचना’ या धार्मिक चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले आहे.

सुरुवातीच्या काळात ते नियतकालिकात व वृत्तपत्रात संपादक होते.

याशिवाय ‘कुसुमाग्रजां’वर इतरांनी लिहिलेली सहा पुस्तके  व वि. वा. शिरवाडकरांवर लिहिलेली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही :

1991 साली साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांच्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि. स.  खांडेकर यांच्यानंतर  मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.

‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.

1986मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान केली.

अंतराळातील एका ताऱ्यास ‘कुसुमाग्रज’ हे नाव देण्यात आले.

त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

शिवाय त्यांच्या नावानेही अनेक पुरस्कार दिले जातात.

10 मार्च 1999 रोजी त्यांचे देहावसान झाले असले, तरी मराठी साहित्यात ते अमर आहेत.

त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे  सादर अभिवादन. ??

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ मार्च – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  मार्च –  संपादकीय  ? 

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी नाट्यसृष्टी’ असे शब्द उच्चारले, तरी एक नाव अपरिहार्यपणे डोळ्यापुढे येतं , ते म्हणजे वि. भा. देशपांडे अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे.  त्यांनी काही आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवली नाही. त्यांनी नाट्यसृष्टीबद्दल विपुल लेखन केलं. ते बराच काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. २०१५पर्यन्त त्यांनी एकूण ५१ पुस्तके लिहिली. त्यापैकी २५ पुस्तके नाट्यविषयक आहेत. मराठी नाट्यकोश हा १२०० पानी ग्रंथ लिहिला आणि कोश वाङमयात मोलाची भर टाकली.

नाटकातील माणसं, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, नाट्यभ्रमणगाथा, निवडक नाट्यप्रवेश ( पौराणिक ), वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा ही त्यांची गाजलेली काही पुस्तके.  नाटक, साहित्य, संगीत यावर त्यांनी नितांत प्रेम केले. आजवरच्या प्रवासात त्यांना भेटलेली माणसे, आणि त्यांचे आलेले अनुभव, म्हणजेच नाट्यभ्रमणगाथा हे त्यांचे पुस्तक. अनेक मोठमोठ्या नाट्यकलाकारांशी त्यांची ओळख झाली. स्नेह जुळले. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये, वि. भां. नी ओघवत्या शैलीत लिहिली. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना- प्रसंगही त्यातून उलगडले आहेत.

वि. भां.ना मिळालेले पुरस्कार 

  1. उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  2. कॉसमॉस
  3. नाट्यगौरव
  4. नाट्यदर्पण
  5. माधव मनोहर
  6. रंगत संगत
  7. राजा मंत्री
  8. वी.स. खांडेकर नाट्य समीक्षक म्हणून पुरस्कार
  9. पिंपरी-च्ंचवड महापालिकेने त्यांचा सन्मान करून गौरव केला.

वि. भां.चा जन्म ३१ मे १९३८ तर स्मृतिदिन ९ मार्च १९१७. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कार्याला मानाचा मुजरा. ?

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ मार्च – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ८ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आंतरराष्ट्रीय महिला दिन

एखादा विशिष्ट दिवस जेव्हा एखाद्या विशिष्ट नावाने ओळखला जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी इतिहास घडलेला असतो.आज आठ मार्च रोजी साज-या होणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचेही तसेच आहे.

08/03/1908 या दिवशी अमेरिकेत  न्यूयॉर्क येथे पंधरा हजार महिलांनी मोर्चा काढला. त्यांनी  कामाचे नियमित तास, चांगला पगार तसेच मतदानाचा हक्क या आपल्या मागण्या मांडल्या व त्या मान्य करून घेण्यासाठी लढा दिला.

रशियामध्ये 1917च्या शेवटच्या फेब्रुवारी महिलांनी असाच लढा दिला. ज्युलियन कॅलेंडर प्रमाणे तो फेब्रुवारीचा शेवट चा रविवार होता. पण ग्रेगेरीयन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख 08 मार्च होती.

त्यामुळे आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

जगातील अनेक देशांत 1921 पासून हा दिवस साजरा केला जातो. मात्र संयुक्त राष्ट्र संघाने जाहिर केल्यानंतर म्हणजे 1975 पासून भारतात हा दिवस साजरा होतो.

महिलांच्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेणे, महिलांचा सन्मान आणि प्रशंसा करणे, त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करणे, लिंगभेदाला विरोध करणे आणि महिलांना आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्ट्या जागृत व स्वयंपूर्ण करणे असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दिनाचे आयोजन केले आहे.

महिलांनी महिलांना व पुरूषांनी महिलांना समजून घेऊन सहकार्य केले तरच हे उद्देश सफल होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त महिला वर्गास हार्दिक शुभेच्छा!?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print