मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली… आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! “हाय ! मी भोपळे !” ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता… इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या  काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली… माझी उत्कंठा ताणली गेली.. “हे काय आहे ?” “ही जीपीएस मशीन्स आहेत … डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?” 

माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! “येस, आय नो… पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?” हसत हसत ते म्हणाले “मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे ” असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले – “हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !” असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली … ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !

भोपळे म्हणाले “चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात…” असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो… उघड्या आकाशाखाली…  कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !

भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?

मी : “९० तरी असेल.”

भोपळे : “गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?”

मी : “तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.”

भोपळे: “करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !”

असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८… नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !

भोपळे :” मी जगभरातील अनेक देश फिरलोय… सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते”. आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो – “भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?”

“तीच तर गंमत आहे!” भोपळे हसत हसत म्हणाले – “इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !”

मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !

“डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !” असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले. 

भोपळे : “वर पहा, किती आकाश आहे ?”

मी :” ७० अंश तरी आहेच आहे.”

भोपळे :” मग किती उपग्रह दिसावेत ?”

मी : निदान २०-२५ ?

भोपळे : “करेक्ट, नाऊ लेट्स चेक…” असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली … आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !

भोपळे म्हणाले “पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !” …. आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्रकन स्मरल्या !

…. ‘ विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! ‘                                      

विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार ! …. म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !

अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या… भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला… समर्थांच्या पायावर लोटांगण घातले… आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती… अधिक गंभीर होती… अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !

आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !

दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल … तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !

!! जय जय रघुवीर समर्थ !! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सद् रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग

अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे — बलिदान दिवस १९ एप्रिल,१९१०

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे,कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तिघांनी मिळून नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध दिनांक २१ डिसेंबर,१९०९ रोजी केला.

वध आणि खून दोन्हीचा शेवट मृत्यू असला तरी “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणून जी हत्या केली जाते तिला वध असे म्हटले जाते आणि वाईट प्रवृत्ती जेंव्हा हत्या करतात तेंव्हा खून केला असे म्हटले जाते.

तिघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक होते . १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत ‘ या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते . नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरूण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. फाशी दिली त्या वेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते.

गोल्फच्या बॉल ला हात लावला म्हणून जॅक्सनने नेटिव्ह माणसाला बेदम मारले त्या मध्ये त्यात त्याचा मृत्यू झाला,दुसऱ्या एका घटनेमध्ये वंदेमातरम म्हणणाऱ्या लोकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पकडले होते,त्यांची वकिली करण्यासाठी बाबासाहेब खरे यांनी वकीलपत्र घेतले ,तर त्यांची सनदच रद्द केली आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांना कैदेत टाकले.

बाबाराव सावरकर सातत्याने इंग्रज सरकारच्या विरोधात लिखाण प्रसिद्ध करत होते कवी गोविंद यांच्या रचना असलेले पुस्तक बाबाराव सावरकरांनी छापले, जॅक्सनने त्यांना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला,आणि त्यांनासुद्धा कैदेत टाकून त्यांची अंदमानात रवानगी केली.या सर्व घटनांची चीड येऊन या तिघांनी जॅक्सनला संपवायचे नक्की केले.

सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याना कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अश्या समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिले , त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च, १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल, १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

“१९०९” या नावाने त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवला होता, तो २०१३ साली प्रदर्शित झाला. त्याचा टिझर मला यु ट्युब वर मिळाला, त्याची लिंक देत आहे

ठाण्याच्या तुरुंगात त्यांचे स्मारक केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील धगधगलेल्या यज्ञकुंडात तिघांची आहुती पडली आणि स्वातंत्र्य क्रांती पुढे वाट चालू लागली.

या तिन्ही थोर क्रांतिकारकांच्या स्मृतीला सादर प्रणाम … 

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंदिर स्थळांचे रहस्य — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मंदिर स्थळांचे रहस्य — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

तुम्ही अंदाज लावू शकता का की या प्रमुख मंदिरांमध्ये काय सामान्य आहे:

  1. केदारनाथ,
  2. कलहष्टी,
  3. एकंबरनाथ- कांची,
  4. तिरुवनमलाई,
  5. तिरुवनाइकावल,
  6. चिदंबरम नटराज,
  7. रामेश्वरम,
  8. कलेश्वरम.

 ” सर्व शिवमंदिरे आहेत ” असे तुमचे उत्तर असेल, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.  प्रत्यक्षात ही मंदिरे ज्या रेखांशात आहेत.

 ” ते सर्व 79 ° रेखांशांमध्ये स्थित आहेत.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरांच्या अनेक शेकडो किलोमीटरच्या वास्तुविशारदांनी जीपीएस शिवाय ही अचूक स्थाने कशी तयार केली.

  1. केदारनाथ 79.0669°
  2. कलहष्टी ७९.७०३७°
  3. एकंबरनाथ- कांची 79.7036°
  4.  ४. तिरुवनमलाई ७९.०७४७°
  5. तिरुवनैकवल 78.7108°
  6.  ६. चिदंबरम नटराज ७९.६९५४°
  7.  ७. रामेश्वरम ७९.३१२९°
  8. कलेश्वरम 79.9067°

नकाशा पहा. सर्व सरळ रेषेत आहेत.  

“केदारनाथ ते रामेश्वरम पर्यंत” सरळ रेषेत बांधलेली शिव मंदिरे भारतात आहेत.

ही मंदिरे 4000 वर्षांपूर्वी बांधली गेली होती.  मग, पाच मंदिरे इतक्या अचूकपणे कशी स्थापन झाली?    फक्त देवच जाणे.

केदारनाथ आणि रामेश्वरममध्ये 2383 किमी अंतर आहे.

ही सर्व मंदिरे 5 तत्वांची अभिव्यक्ती दर्शवतात, पंच तत्व (पांच तत्व), म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि अवकाश.

श्री कलाहस्ती मधील चमकणारा दिवा हा आकाशवाणी घटकाचे प्रतिनिधित्व करतो थिरुवनिक्काच्या आतील पठारातील वॉटर स्प्रिंग हे पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते.

अन्नामलाई टेकडीवरील मोठा दिवा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो.

कांचीपुरम येथील सँड्सचे स्वयंभू लिंग पृथ्वीचे घटक दाखवते.

चिदंबरम यांचे निराकार (निराकार) राज्य हे देवाच्या स्वर्ग (आकाश) घटकाचे प्रतिनिधित्व करत आहे.

आपल्या प्राचीन ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा.  असे मानले जाते की ही केवळ 5 मंदिरे नाहीत तर “शिव-शक्ती अक्ष रेखा” या ओळीत अनेक आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महाकालचे देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगांशी नाते आहे.

ज्योतिर्लिंगाचे अंतर आहे:

* उज्जैन ते सोमनाथ- 777 किमी

* उज्जैन ते ओंकारेश्वर – 111 किमी

* उज्जैन ते भीमाशंकर- 666 किमी

* उज्जैन ते काशी विश्वनाथ- 888 किमी

* उज्जैन ते मल्लिकार्जुन – 888 किमी

* उज्जैन ते केदारनाथ- 1111 किमी

* उज्जैन ते त्र्यंबकेश्वर – 555 किमी

*उज्जैन ते बैद्यनाथ- 1399 किमी

* उज्जैन ते रामेश्वरम- 1999 किमी

“उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले जाते.”  हिंदू धर्मामध्ये विनाकारण काहीही नव्हते.

सनातन धर्माचे 1000 वर्षांचे केंद्र म्हणून, उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित साधन सुमारे 2050 वर्षांपूर्वी बांधले गेले होते

आणि, जेव्हा पृथ्वीवरील काल्पनिक रेषा सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटीश शास्त्रज्ञाने तयार केली, तेव्हा तिचा मध्य भाग उज्जैन होता. आजही उज्जैनमध्ये सूर्य आणि अवकाशाची माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक येतात.

आपल्या शिव मंदिराविषयी ही खूप छान शास्त्रीय माहिती आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता.लंडनमध्ये रहायचा. असाच एकदा अमेरिकेत गेला होता. न्युयॉर्कमध्ये.

रस्ता ओलांडत होता..आणि त्याला एका गाडीची धडक बसली.

एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमीट केलं.ही बातमी सगळीकडे पसरली.वेगवेगळ्या दैनिकाचे..मॅगझिन्सचे रिपोर्टर हॉस्पिटल बाहेर जमले‌.

पण कोणाशीही बोलण्यास त्याने नकार दिला.आपल्या या अपघातामध्ये बाहेर किती औत्सुक्य आहे हे त्याला उमगलं.त्याने ठरवलं.यावर आपणच लिहायचं.मग त्यानं त्यावर एक लेख तयार केला.’कॉलिअर्स’ या दैनिकाने तो तिथल्या तिथे विकत घेतला.चक्क तीन हजार डॉलर्सला.

ही गोष्ट शंभर वर्षापुर्वीची.त्याचं सगळं आयुष्यच भन्नाट.सुरुवातीच्या काळात लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यानं ठरवलं.. यापुढे आजन्म उपजीविका करायची ती फक्त लेखनावरच.

लेखनासाठी शांतता लाभावी म्हणून त्यानं चक्क पाचशे एकर जमीन खरेदी केली.त्यात एक गढी उभारली.एक सुसज्ज अभ्यासिका बनवली.

त्याचा दिनक्रम विलक्षणच.सकाळी आठ वाजता उठल्यावर तासभर तो दैनिकांचं वाचन करत असे.त्यानं एक उभं डेस्क बनवलं होतं.तिथे उभं राहून तो तोंडी मजकूर सांगायचा.तो जरी लेखक होता,तरी आयुष्यात त्याने हातात लेखणी धरली नाही.त्यानं सांगितलेला मजकुर दोन टायपिस्ट उतरुन घेत.सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात साधारण अडीच हजार शब्दांचं लेखन झालं पाहिजे हा त्यांचा दंडक.

दुपारी दोन ही त्याची स्नानाची वेळ.तो एक उत्तम वक्ता देखील होता.स्नानाच्या वेळी तो मोठ्या आवाजात भाषणाचा सराव करत असे.यावेळी कधी त्याला उत्तम वाक्य सुचायची.तो ती मोठ्या आवाजात उच्चारायचा.त्याच्या टायपिस्ट बाहेर उभ्याच असतं.लगेचच त्या ती वाक्ये टिपून घेत.

त्यानंतर मग भोजन.जेवणाच्या आधी आणि जेवण करताना उत्तम मद्याचे प्याले त्याच्या टेबलवर असत.व्यवस्थित तब्बेतीत मद्यपान..साग्रसंगीत भोजन..आणि मग वामकुक्षी.

वामकुक्षीबद्दल त्याचे विचार अफलातून होते. तो म्हणतो… 

“एक तासाच्या शांत वामकुक्षी मुळे आपण एका दिवसाचे दोन प्रसन्न दिवस करु शकतो.डुलकी काढल्यानंतर चित्त कसं टवटवीत होतं.ज्याला आयुष्यात वेळ वाचवुन मोठं काम करायचं आहे..त्यानं वामकुक्षीची सुखद सवय लावून घ्यावी “.

दुपारी चार ते रात्री दहापर्यंत तो लेखनाची संबंध नसलेलं राजकीय काम करत असे.रात्री दहा ते पहाटे तीन ही वेळ लिहीण्याची.. म्हणजे मजकूर सांगण्याची.दोन टायपिस्ट पुन्हा एकदा त्याच्या मुखातून येणारे शब्द टिपुन घेण्यासाठी सरसावुन बसत.

वयाच्या पन्नाशीत असतांना त्याला आपल्यातल्या एका वेगळ्या गुणांचा शोध लागला.आपल्या मुलाला चित्रकला शिकवत होता तो.त्याच्या लक्षात आलं..आपण चित्रही छान काढु शकतो.

मग त्यासाठी एक नवा स्टुडिओ उभा केला.त्याच्या कुंचल्यातून शेकडो रंगीत अप्रतिम चित्रे अवतरली.

साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारा तो एकमेव राजकीय नेता होता.जगातील सत्तावीस विद्यापिठांनी त्याला सन्माननीय पदव्या अर्पण केल्या.त्याच्या भाषणांच्या रेकॉर्डस् निघाल्या.रॉयल ॲकेडमीचा चित्रकार म्हणून कलावंतांच्या जगातला सर्वोच्च सन्मान त्याला मिळाला.उत्तमोत्तम मद्याचे महासागर त्याच्या घशाखाली उतरले.लाखो चिरुटांची त्यानं राख केली.

पुर्वायुष्यात त्यानं लष्करी शिक्षण घेतलं होतं.एक जिगरबाज योद्धा म्हणुनही त्याची ती कारकीर्द गाजली.सतत साठ वर्षे तो इंग्लंडच्या संसदेत होता.. आणि तरीही नीतीवान होता‌.. काठोकाठ चारित्र्य संपन्न होता.आजन्म त्याने सरस्वतीची साधना केली.

आपल्या कुटुंबावर अपार प्रेम करणारा..लखलखीत जीवन जगणारा तो म्हणजे …. 

इंग्लंडचे महाप्रतापी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग

१६ एप्रिल,१८५३ रोजी मुंबई ते ठाणे या ३४ किलोमीटर  मार्गावर १४ डब्यांची पहिली रेल्वे गाडी चालवली गेली. आणि भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरवात झाली. 

ही गाडी ओढण्यासाठी साहिब, सिंध आणि सुलतान या नावाची तीन वाफेची इंजिने जोडली होती.या गाडीच्या पहिल्या वहिल्या प्रवासासाठी अख्ख्या भारतातून ४०० मान्यवर मुंबईला आले होते. या गाडीला मानवंदना देण्यासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.

सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या  ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना १८४३ साली केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला.तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.

१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या दिवसासाठी मोठमोठे साहेब, स्थानिक लोक उपस्थित होते. १४ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद लोकांना मिळाला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली,जज्ज चार्लस् जॅक्सन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती.  

आणि दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे दिसत  होते. काळे पोषाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क पुढे जाऊ लागली. लोक बोलू लागले की, आपण पुराणकाळातल्या अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रज म्हणजे देवाचा अवतार,अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग,शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच,पण गायी, बैल भेदरले आणि कुत्री पिसाळल्यासारखी  भुंकू लागली .एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा लोकांना चमत्कार  वाटत होता.

सामान्य माणसे आगगाडीमध्ये बसायला घाबरायची.त्यांची भीती घालवण्यासाठी सामान्य नागरीकांनी प्रवास करावा म्हणून  प्रवास करणाऱ्याला १ रु. बक्षीस देण्यात येईल हे जाहीर केले आणि लोक रेल्वेप्रवास करू लागले.

बोरीबंदर ते-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि दुपारी ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्या काळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटांनी गाडी पुन्हा बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली.

असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला देवत्व  बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, ‘चाक्या म्हसोबा’. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.

काळ बदलला तसे रेल्वेचे रूप बदलत गेले. एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्याचे साधन असलेल्या रेल्वेने  ऐश आराम  करण्यासाठी सुद्धा रेल्वे सुरु केल्या. सध्या भारतात अश्या ७  खास गाड्या चालवल्या जातात

१) महाराजा एक्सप्रेस

२) पॅलेस ऑन व्हील्स

३) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स

४) दि  गोल्डन  चॅरिओट

५) डेक्कन ओडिसी  

६.रॉयल ओरियंत ट्रेन

*७.फेयरी क्वीन एक्सप्रेस

स्वप्नवत वाटणारा जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग  हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.

आता सुपर फास्ट रेल्वेचा जमाना आला. त्यातूनच राजधानी एक्सप्रेस,शताब्दी एक्सप्रेस या सुपरफास्ट गाड्या सुरु झाल्या. आता वंदे भारत या संपूर्ण भारतीय बनावटीच्या आधुनिक रेल्वे  विविध मार्गावरून धावू लागल्या आहेत. कोलकात्यात हुगळी नदीखालून बोगदा निर्माण करून पाण्याखालून देखील भारतीय रेल्वे धावू लागली आहे. येत्या काही काळात बुलेट ट्रेन देखील सुरु होत आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना  देखील या रेल्वेची भुरळ पडली, त्यांचे निरीक्षण देखील अफलातून, त्यातून त्यांनी ‘ काही अप्स आणि काही डाऊन ‘ ही भन्नाट गोष्ट लिहिली.

रेल्वे सुरु झाली आणि त्याची मोहिनी नंतर सुरु झालेल्या चित्रपट सृष्टीला पडली नसती तर नवलच.कितीतरी चित्रपटांच्या कथा रेल्वेला जोडल्या गेल्या. असंख्य गाणी रेल्वेवर लिहिली गेली .

मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न उरी बाळगले होते , त्यासाठी त्याचा पाठपुरावा करत होते आणि शेवटी सगळ्या आडचणींवर मात करत कोकण रेल्वे सुरु झाली आणि या  कोकण गाडीवर गाणे देखील लिहिले गेले.

आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी 

भारतीय रेल्वेने त्यांचे गाणे तयार केले, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे.

१७० वर्षाच्या इतिहासात दिवसेंदिवस रूप बदलणाऱ्या भारतीय रेल्वेच्या महाकाय जाळ्याला  सलाम ,सलाम,सलाम !!  .

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयस्पर्शी भाग-२ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ हृदयस्पर्शी भाग – २ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

प्रास्ताविक करताना नर्मदालय काय आहे हे स्वतः भारती ताईंनी सांगितले. सुरुवात कशी झाली, घटनाक्रम कसा होत गेला, आज काय आहे आणि भविष्यातील उद्दिष्टे काय डोळ्यासमोर आहेत हे मितभाषी ताईंनी अगदी नेमक्या शब्दात जरी सांगितले तरी प्रत्यक्ष तिथे असल्यामुळे तो प्रचंड आवाका मला जाणवत गेला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या मुलीला आजूबाजूचे लोक पाहत होतेच पण एका नागा साधूने ताईंच्या कामाची विशेष दखल घेतली . स्वतः हुन या साधुबाबा नी आपली पाच गुंठे जमीन दान केली. नवल वाटून ताई म्हणाल्या ,” मला नाही गरज,” तेव्हा साधू म्हणाले ,” तुला नाहीच देत मी जमीन, ज्या छोट्या मुलांसाठी तू काम करते आहेस त्यांच्यासाठी देतोय.” एक महान काम उभे राहायची ती सुरुवात होती. खडबडीत जमिनीवर झोपडीत ही राहणाऱ्या ताईंनी कष्ट सुरू केले. ते पाहून लोकाश्रय मिळाला. आजवर कोणतीही सरकारी मदत न घेणाऱ्या या संस्थेने महान काम करून दाखवले ते केवळ कष्ट, तळमळ, प्रामाणिक व्यवहार या जोरावर. समविचारी लोक मदतीला उभे राहिले. आज चार मोठ्या इमारती उभ्या आहेत, पाचवी तयार होते आहे. शिक्षणाची वेगवेगळी दालने त्यातून सज्ज झाली आहेत. सरकारी अभ्यासक्रम तर आहेच पण स्वावलंबी करणारे शिक्षण प्रामुख्याने दिले जाते आहे. छोट्या छोट्या मुलांची जबाबदारी घेणारी ही एक भगव्या कफनीतील तपस्विनी किती विलक्षण खंबीर आहे हे मला आत कळत गेले. एका जंगलात राहून असंख्य अडचणीला तोंड देणारी, छोट्या मुलांना उराशी कवटाळून त्यांना सुरक्षित आयुष्य देणारी ही स्त्री मनाने किती हळवी आहे हे त्यांचे मनोगत ऐकताना प्रकर्षाने जाणवले. त्यांचा दिग्विजय, गोलू, शंकर, जितेन अशी मुले काय काय करतात हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले. लहान लहान सात आठ वर्षांची ही मुले ताईंना मिळाली. आज विशी बाविशितील ही मुले हे चमत्कार आहेत. गोलू तेरा चौदा वर्षाच्या मुलांना मदतीला घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या मंडळींचे नाश्ता, जेवण तयार करत होता. ही मुले गोशाळा सांभाळतात, दैनंदिन व्यवहारात संपूर्ण मदत करतात, छोट्या मुलांची सगळी जबाबदारी पेलतात. एव्हढे काहीच नाही तर नवीन इमारतीतील तेवीस टॉयलेट्स या मुलांनी स्वतः केली. टाइल्स बसवल्या प्लंबिंग पूर्ण केले. . सायन्स मधील वेगवेगळी आव्हाने मुले स्वीकारत आहेत. टाटा, बी ए आर सी , व्ही एन आय टी सारख्या संस्थांनी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या संस्थेसोबत affiliation आनंदाने दिले आहे. रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यातून अनेक नवीन प्रशिक्षणे सुरू आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षण कसं असावं ते ताईंनी प्रत्यक्षात आणले आहे. आज ही मुले निश्चित पायावर खंबीर उभी होत आहेत.

 हे सगळे सांगत असताना गेल्यावर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 ला आलेल्या पुरात या आठ दहा मुलांनी अतुलनीय साहस दाखवून जे काम केले ते सांगताना भरती ताई सद्गदीत झाल्या. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांची सर्व व्यवस्था हे झालेच परंतु लेपा पासून आठ दहा किमी वर भट्ट्याण येथे आणखी एक आश्रम शाळा तिथल्या मुलांसाठी सुरू केली आहे. निवासी मुलं नाहीत तिथे तरी जवळपास एकशे सत्तर मुलं शिकायला येतात. ती शाळा नदीच्या पात्रापेक्षा भरपूर उंचीवर असूनही अतिरेकी पावसाने धोक्यात आली. एखादा फूट अजून चारी बाजूंनी माती ढासळली असती तरी शाळा धाराशायी झाली असती. मुलांना तिथे पाठवणे अजिबातच सुरक्षित नव्हते. ही शाळा वाचवण्यासाठी या लहान मुलांनी स्वतः च्या जीवावर उदार होवून पंधरा दिवसरात्र जे काम यशस्वी पणे करून दाखवले त्याबद्दल बोलताना ताईंनी प्रयासाने हुंदका आवरला. हे सारे ऐकताना आधी एका बोटाने डोळ्यातले पाणी थोपवणारे आम्ही अनावर होऊन डोळ्यांना रुमाल लावून बसलो. या मुलांना सर्वांच्या साक्षीने शौर्य पुरस्कार दिले. किती कौतुक करावं हो, शब्द थिटे आहेत.

 कोणताही क्लास, शिकवण्या न लावता 92 @% मार्कस मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक झाले. धनश्री ताई ऑनलाईन संस्कृत शिकवत होत्या . त्याचे चीज 99 मार्क या विषयात मिळवून मुलांनी करून दाखवले. एक मुलगा तर फक्त संस्कृत विषयात पास झाला.हे ऐकून तर फारच विशेष वाटले. एखादा शिक्षक आवडला तर काय आश्चर्य घडू शकते त्याचे हे द्योतक आहे. मला स्वतः ला एक सत्कार विशेष हृद्य वाटला. एक सातवी मधील मुलगा . त्याला मंचावर बोलावले. ताई म्हणाल्या हा माझा विशेष आवडता मुलगा. एका दूरवरच्या खेडेगावात डोंगरावर याचे एकट्याचे घर आहे. कमालीची गरिबी. ताईंजवळ असतो. अभ्यासात अजिबात गती नाही . तो आपणहून गोशाळेत कामाला पळायचा. दिवस दिवस तिथेच. त्याच्या शिक्षकांवर ताई नाराज झाल्या , की आधीच तो अभ्यासात बरा नाही त्याला कशाला तिकडे पाठवता? ते सगळे म्हणाले आम्ही नाही duty दिली तो आपणच जातो. गोशाळा आणि स्वयंपाकघर ही त्याची आवडीची ठिकाणे . इथेच तो रमतो. हे जाणून ठीक आहे, हे कर तू, पण अभ्यास ही करायला हवास हे ताईंनी ठसविले मनात . आणि यंदा हा मुलगा सर्व विषयात 42/43 % मिळवून पास झाला. बेस्ट स्टुडंट चे पारितोषिक त्याला दिले. त्याच्याकडे बघून वाटले की इतक्या सर्वांसमोर माझा सर्वात आवडता मुलगा असं ताई म्हणाल्या, यापेक्षा इथून पुढे सर्वोत्तम होण्यास बळ मिळायला काय हवे ? 42 टक्के ही सन्मानाचे असू शकतात हा अनुभव श्रोत्यांना ही धडा होता.

 नर्मदालयातील मुले उत्तम गातात, त्यांचा वाद्यवृंद आहे. त्यांनाही सुयोग्य व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना भिडायचे, यश मिळवायचे, आनंद घ्यायचा, द्यायचा किती किती गोष्टी सहज कृतीतून मुलं शिकत आहेत. शाळेतील सर्वात लहान मुले भारती ताईंच्या जवळ राहायला असतात. थोडी मोठी झाली की मोठे भय्या त्यांना सांभाळतात. एकही मूल केविलवाणे नाही. जशी आपली घरातील मुले तशी उत्साहाने निथळणारी, आनंदी मुलं. माझ्या नातवाशी फोनवर बोलायला बोलावले मी जवळ . खूप आनंदाने प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. नंतर मलाही बिलगली ती . त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना इतके छान वाटले. छान तेल लावून भांग पाडलेली, तयार होऊन आली होती. जी ताई, जी ताई करून प्रेमानी आदराने बोलणारी ही मुले आमच्या मुलांनी, नातवंडांनीही पाहायला हवीत असं वाटले.

 त्यांच्या दिग्विजयची दोन छोटी मुलं जन्मापासून तिथे आहेत. धाकटे पिल्लू सुध्दा मीठ वाढायला आले तर भरून आले एकदम. मोठा अभ्युदय ढोलकी वाजवतो. ढोलकी पेक्षा मूर्ती लहान आहे. पण त्या गाणाऱ्या चमूत आहे. सगळे बसलेत, भारती ताई एकेकाशी बोलत आहेत , मध्येच दिग्विजयचे शेंडेफळ जवळून दौडत जाते, सहज ताई प्रेमाने ओढून जवळ, मांडीवर घेतात. तेही पिल्लू आरामात त्यांच्या वक्षावर टेकून हातपाय उडविण्याचा आपला कार्यक्रम सुरू ठेवते हे माझ्या मनावर कोरले गेलेले दृश्य आहे, जे कधीही विस्मरणात जाणार नाही.

– समाप्त –

लेखिका : वर्षा कुवळेकर 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयस्पर्शी भाग-१ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ हृदयस्पर्शी भाग-१ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

एका शहरात लहानाची मोठी झालेली, सुसंस्कृत, सुशिक्षित, सधन घरातील एक मुलगी होती. सुयोग्य शिक्षण झाले आणि सरकारी नोकरीत छान स्थिरावली, बढती घेत मोठी झाली, सर्वार्थाने. पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, सामाजिक काही उपक्रम आवडीने जोपासत होती. सख्यांसह त्याचा आनंद उपभोगत होती. पारमार्थिक बैठक निश्चित असावी आतून, ती तोवर दृगोचर झाली नव्हती. एकदा दोन जिवाभावाच्या मैत्रिणींसह नर्मदा परिक्रमेला जायचे ठरवते. संपूर्ण चालत प्रदक्षिणा. नेत्रचक्षू आणि अंतर्चक्षू दोन्ही सजग ठेवून परिक्रमा करताना, मैयाचा भक्तिभाव मनात असताना तिच्या लक्षात येते आजूबाजूची वास्तविकता. परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करणारे सामान्य जन, त्यांचा सेवाभाव, प्रचंड गरिबी, अभावातील त्यांचे जगणे पाहताना या मुलीच्या मनाला चटका लावून गेले ते तेथील मुलांचे भविष्याचे विचार. एकतर शाळेत जातच नसणारी आणि जात असली तरी अक्षर ओळखही नसणारी ही मुले. यांचे भविष्य काय असेल? कशी जगतील ही? प्रश्न तर मोठेच पडले. साधारणपणे परिक्रमा, यात्रा वगैरे करताना असे विचार बरेच जण करत असतील. परंतु स्मशान वैराग्य जसे अल्पकालीन असते तसे हे विचारही आपल्या आपल्या पूर्वायुष्यात आल्यावर सहज उडून जातात. हा स्वानुभव ही आहे.

ही मुलगी याला अपवाद ठरली. उचललेली परिक्रमा पूर्ण करून आपल्या शहरात परत येईपर्यंत एक निश्चित विचार हिच्या मनात तयार झाला होता. आल्यावर आधी नोकरीचा राजीनामा दिला. त्याची सर्व नियमानुसार पूर्तता केली. बाकी घरची व्यवस्था लावली आणि दोन कपडे आणि अगदीच आवश्यक गोष्टी बॅगेत टाकून ही मुलगी मध्यप्रदेश मधील लेपा मध्ये येऊन पोहोचली. कोणतीही पूर्व यथायोग्य व्यवस्था नव्हती, कोणी खंबीर आधार नव्हता केवळ आणि केवळ अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन ती इथे आली.

अतिशय लहानसे खेडे, तिथे राहून काय काय या मुलीने केले, स्थानिक लोकांच्या मनात स्वतः बद्दल कसा विश्वास निर्माण केला, किती काय कसे प्रयत्न केले हे सगळे प्रत्येकाने निदान जाणून घ्यावे, वाचावे एव्हढे नक्की. तर या अथक प्रयत्नातून उभे राहिले “नर्मदालय”.

आज दीडशे मुले तिथे राहत आहेत. त्यांचे संगोपन ही मुलगी करते आहे. या जगावेगळ्या मुलीचे नाव आहे पूर्वाश्रमीची भारती ठाकूर आणि संन्यास स्वीकारल्यानंतर “परिव्राजिका विशुध्दानंदा”.

या नर्मदालयात फेब्रुवारी महिन्यात नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा महोत्सव असतो. भारती ताईची पुस्तके वाचल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष जावे अशी इच्छा मनात जागी झाली होती. या कारणाने तिकडे जायचे ठरवले. प्रख्यात विदुषी धनश्री ताई लेले यांच्याशी एक स्निग्ध नाते जुळले आणि त्यांच्या निमित्ताने छान सुहृद मंडळी आयुष्यात आली. माझे आजवरचे जगणे एका वेगळ्याच टप्प्यावर गेले असे मी आनंदाने म्हणेन. अशा पंधरा सोळा जणांच्या गोतावळ्यासोबत प्रस्थान ठेवले.

जरी पुस्तक वाचले होते तरी येणाऱ्या दोनतीनशे पाहुण्यांची व्यवस्था कशी काय होईल याबाबत मन साशंक होतेच. नर्मदालयात रोज राहणारे दीडशे आणि हे पाहुणे. पाहू आता जे जसे होईल तसे चालवू, असाच विचार करून आले मी. रात्री नऊच्या नंतर आम्ही बसने पोहोचलो. व्यवस्थित रजिस्ट्रेशन काउंटर होता. तिथे नोंदणी करून सुरुवात होणार होती, पण चला आता आधी गरम जेवा, मग करा हे काम असा प्रेमळ आग्रह झाला. भव्य मंडपात ओळीने भोजनाची सुरेख व्यवस्था होती. टेबल खुर्च्या, स्वच्छ मांडणी आणि साधे स्वादिष्ट जेवण. सलामीच अशी दणदणीत झाली. आजूबाजूला आपोआप बघत होतो. मंडपा समोर सुरेख इमारत. त्याच्या अंगणात खुर्चीवर भारतीताई खुद्द जातीने व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. आलेले सर्वच त्यांना भेटायला जात होते. आपुलकीने चौकशी होत होती. प्रत्येकजण भारावून जाताना पुढील चार दिवस मी रोज पाहिला. चारही दिवस तिन्ही त्रिकाळ खानपान व्यवस्था उत्तम होती.

रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक अभ्यागताला बिल्डिंग आणि खोली नंबर दिला गेला. ओळखपत्र मिळाले. आमच्या खोलीत पोहोचल्यावर पंधरा जणांची छान सोय दिसली. प्रत्येकी कॉट, गादी, उशी आणि मध्यप्रदेशच्या थंडीत निभाव लागेल अशी ब्लँकेटस, चार्जिंग पॉइंट्स, पंखे अगदी विचारपूर्वक केलेली व्यवस्था. इतकी खरंच अपेक्षाच केली नव्हती. शेजारी स्वच्छ बाथरूमस्.

दुसऱ्या दिवशी पासून असणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक रूम बाहेर दर्शनी होते. कुठेही गोंधळ नाही. नाश्ता करून सत्र सुरू होत. तीनही दिवस धनश्री ताई लेले, शरद पोंक्षे, उदय निरगुडकर, ऐवज भांडारे अशा मातब्बर व्यक्तींची भाषणे/ कीर्तन होते. आपापल्या विषयातील उत्तम अनुभव त्यांनी आम्हाला घडवला. घडवला असेच म्हणेन कारण उदाहरणार्थ सांगायचे झाले तर नामदेव यांच्याविषयी धनश्री ताई अशा समरसून बोलल्या की खरंच मुक्ताबाई सूनावते आहे त्यांना आणि नामदेव विठ्ठलाच्या पायाशी जाऊन बसलेत, दिसूच लागले जणू. चांगदेव महाराजांना, ” अजून गेलाच नाही का रे भेद तुझ्या मनातला?” विचारणारी धिटुकली, ज्ञानी मुक्ती भिडलीच आम्हाला. हे सगळे होतेच तिथे. त्याचा सर्वोत्तम आनंद घेतलाच पण त्याशिवाय जे मिळाले ते शब्दात पकडण्याचा प्रयत्न करते आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : वर्षा कुवळेकर 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।

धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।।११।।

*

काम आसक्ती विरहित बल बलवंतांचे मी

भरतश्रेष्ठा जीवसृष्टीचा धर्मानुकुल काम मी ॥११॥

*

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।

मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ।।१२।।

*

सात्विक राजस तामस भाव उद्भव माझ्यापासून 

त्यांच्यामध्ये नाही मी ना वसती माझ्यात ते जाण ॥१२॥

*

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।

मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ।।१३।।

*

त्रिगुणांनी  मोहविले आहे सर्वस्वी या  जगताला 

तयापार ना जाणत कोणी मजला या अव्ययाला॥१३॥

*

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।।१४।।

*

मम माया ही त्रिगुणांची दुस्तर तथा महाकठिण  

भक्त मम उल्लंघुन माया जाती भवसागरा तरून ॥१४॥

*

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।

माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।१५।।

*

मायाग्रस्त अज्ञानी नराधम करिती दुष्कर्म 

ना भजती मजला मूढ त्यांसि ठाउक ना धर्म ॥१५॥

*

चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।

आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।१६।।

*

चतुर्विध पुण्यशील अर्जुना मज भजणार

आर्त पीडित अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानातूर ॥१६॥

*

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।१७।।

*

तयातील ज्ञानी मज ठायी एकरूप नित्य 

अनन्य माझ्या भक्तीत  तोच श्रेष्ठ भक्त 

प्रज्ञेने माझिया तत्वा जाणे तयास मी बहु प्रिय 

ऐसा ज्ञानी भक्त मज असे हृदयी अत्यंत प्रिय ॥१७॥

*

उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ।।१८।।

*

निःसंशय जे मजला भजती थोर सकल भक्त

ज्ञानी भक्त जो माझा जाणतो ममस्वरूप साक्षात

मनबुद्धीचा मत्परायण ज्ञानी उत्तम गतिस्वरूप

मम ठायी तो सदैव असतो आत्मरूप सुस्थित ॥१८॥

*

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ।।१९।।

*

बहुजन्मांनंतर ज्या झाले प्राप्त ज्ञान पूर्णतत्व

दुर्लभ ऐसा महात्मा जया वासुदेव विश्व समस्त ॥१९॥

*

कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ।।२०।।

*

भोगकामात हरपता ज्ञान स्वस्वभावे होवोनी प्रेरित 

धारण करुनी नियम तदनुसार भिन्न देवतांना पूजित ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्या भावाला माझी माया कळू दे ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ माझ्या भावाला माझी माया कळू दे ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एक गाणारं तळं होतं आणि त्यात राजहंसांची पाच सुरेख पिलं होती. पण दुर्दैवानं यातलं एक पिलू काहीसं अधू होतं शरीरानं. तळ्यातल्या पाण्यात विहार करायचा तर पाय तर पाहिजेत ना भक्कम? पण नेमके हेच तर शल्य होतं त्या राजहंसाच्या तनमनाचं! या पिलांचे आई-बाबा स्वत:च प्रपंचाच्या लाटांचे तडाखे साहीत कसेबसे तरंगत होते जीवनाच्या या पाण्याच्या पृष्ठभागावर….त्यांच्या पायांतील आणि पंखांतील शक्ती क्षीणक्षीण होत जाणारी! यातला वडील राजहंस तर अकालीच उडून गेला! आई पक्षिणीसह सारेच राजहंस केविलवाणे झाले. कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबाचा वंश पुढे चालवणारा राजहंस पायांनी चालू शकत नव्हता आणि आई पक्षिणी करून करून करणार तरी किती?….त्यावेळी ती स्वत:हून पुढे झाली आणि त्या पिलाची जणू आईच झाली. 

जागृती,स्वप्नी सुषुप्ति या तिन्ही अवस्थांमध्ये भगवदभक्त जसा देवाच्या सान्निध्यात असतो तशी ती त्याला आपल्या अंगाखांद्यावर वागवू लागली….पाऊलं थकली तरी तिला तिच्या कडेवरचं हे पिलू कधी ओझं नाही वाटलं. गाय जसं आपलं वशिंड सहज वागवते तशी ती या बाळाला मिरवत होती. 

बाकी सारं घर स्वरांच्या साधनेत मग्न असताना ती मात्र प्रपंच्याच्या व्यवहारात आपलं गाणं शोधत असे. अस्सल गवय्याची लेक…गळा असा सुनासुना राहीलच कसा? पण एकाजागी बसून गाणं शिकावं,ऐकावं आणि सादर करावं असं तिचं काही नसायचं. घर,अंगण झाडून काढताना,भांडी घासताना आणि अगदी कपडे धुवत असतानाही बाळ तिच्या अंगाशीच असायचा. बघणाराला यांच्याकडे पाहून चित्रातल्या गाय-वासराची आठवण व्हावी! बाळाच्या दुधासाठी भराभरा चरणारी गाय आणि तिच्या पायांत घुटमळत चालणारं वासरू….पण हे वासरू मात्र स्वत: चालू शकत नसायचं त्यावेळी. 

दोन-चार मैलांवरच्या नदीपात्रात कपडे धुवुन येताना तिच्या एका हातात ओल्या कपड्यांचं ओझं असायचं आणि कडेवर बाळ. पायांखाली फुफाटा…तापलेला. रस्त्यावर सावली नावाची पुसटशी रेघही नाही. वाटेच्या सोबतील दुसरं कुणीही नाही. पडक्या आसमंताची साथ आणि ही दोन पावलं दूरवरच्या घराकडे निघालीत…आपल्याच धुंदीत. कडेवरच्या बाळाच्या पायांपासून तापल्या धुळीची धग एक हात दूर. चालणारी जेमतेम दहा वर्षांची तर कडेवरचं बालक पाचेक वर्षांचं. त्याची पावलं तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारी आणि त्यामुळे चालणं तसं मंदगतीनं. पोटात भूकेचं काहूर माजलेलं आणि  तिची पावलं थकलेली…तरी कडेवरचं ओझं हे ओझं नव्हतं वाटत तिला….तिचा जीवलग होता तो. 

ती अजूनही तशी अल्लड वयातच होती. त्यात सावली धरणारा राजहंस परलोकी निघून गेल्यानं या आयुष्याकडे कटाक्षानं पाहणारंही कुणी नव्हतं तसं…थोरल्या बहिणीशिवाय. ती सुद्धा बालपणातच कपाळावर पोक्तपणाचा गंध लेवून सगळ्यांची आई झालेली पोर. फाटलेलं आभाळ सांधता सांधता तिच्याही हातून एखादा धागा चुकून निसटून गेला असावा. दिवस मागे पडले आणि या पिलांची आभाळं बदलत गेली. बाळ आता थोडा स्वतंत्र उभा राहू शकत होता,चालू शकत होता. त्याच्या पायांत तिनेच बळ भरले होते बहुदा. 

तो अजूनही तिच्यासोबतच चालत होता…पण एका वळणावरून ती अचानक दिसेनाशी झाली. तिच्या भावविश्वातल्या एका लुभावणा-या पायवाटेनं तिला जणू मंत्र टाकून आत खोल वनात ओढून नेलं होतं. आता बाळ तसा आधाराविना राहिला होता आणि मग त्यालाही मोठेपणाचा अंगरखा चढवावा लागलाच. आयत्यावेळी कुणी आधी ठरलेला नट आलाच नाही तर घरातल्याच कुणीतरी ती भूमिका वठवायची असं कित्येकवेळा झालेलं होतं त्यांच्या नाट्यप्रयोगांमध्ये. हा तर प्रत्यक्ष आयुष्याचा मंच…इथं घरचाच पुरूष असायला पाहिजे! 

तिचं असं अचानक निघून जाणं कुणालाच झेपलं नाही. पण कुणीही तिच्या आठवणींशिवाय झोपलं नाही कधी बिनघोर. ठेच लागलेलं पायाचं बोट जसं चालताना एकदा तरी ठेचकाळतंच…आंधळं बोट म्हणतात त्याला ते काही उगाच? दूर वनातून तिने हाक दिली आणि बाळ तिच्यासाठी धावत गेला…त्याच्या पायांत आता जबाबदारीची ताकद आली होतीच. ती संसाराच्या चटक्यांनी हैराण झालेली होती आणि त्या वणव्यातून निसटू पहात होती. फक्त तिला कुणीतरी हात देणारं पाहिजे होतं. फसलेल्या पायवाटेवरून ती पुन्हा हमरस्त्यावर आली आणि तिला सावली गवसली. 

माहेरी गाणं कानांमागे टाकणारी ती आता गाण्यानेच जगाचे कान तृप्त करीत होती. गीतकार जणू तिचेच शब्द तिलाच गायला लावत होते…आणि ती भान विसरून गातही होती….गाण्यांमधून ती जशी जगली तशी दिसू लागली होती….अल्लड,खोडकर,नीडर….तर कधी दुखावलेली,दुरावलेली आणि काही तरी गमावलेली! ती नेमकी कशी हे ताडणं कुणालाही कधीही न जमलेलं.

अब के बरस भेज भैय्या को बाबूल…सावन में लीजो बुलाय रे! बाबा…या श्रावणात तरी दादाला पाठवा ना मला माहेरी घेऊन यायला! माझ्या मैत्रिणी येतील मला भेटायला…आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातील…श्रावणसरी बरसतील…..आपल्या घरच्या आठवणींनी मी व्याकुळ झाले आहे….यौवनानं बालपण चोरलं माझं….माझी बाहुली हरवून टाकली….तुमची किती लाडकी होते ना मी…मग? किती दिवस झाले…नव्हे जणू युगं उलटलीत….दादाला पाठवा! 

माई,दादा आणि सर्व भावंडं या सासुरवाशीनीच्या मागे उभी राहिली. ती बाळच्या आयुष्यात परतली आणि त्याचेही सूर त्याला गवसले. बाळला आता कडेवर बसण्याची गरज नव्हती….पण तिने त्याचे सूर तिच्या कडेवर अंगा खांद्यावर घेतले.  त्याने सुरांना तिचा आवाज मागितला आणि इतरांना दुर्बोध वाटणारे शब्द तिच्या कंठातून सुगम होऊ लागले. 

लहानपणी तिने त्याला कधी दटावलेले असेल की नाही माहित नाही पण आता हा मोठा झालेला बाळ शिकवताना कठोरपणाची छडी हाती घेऊन तिच्या मागे उभा. तिनंही ते सारं निभावून नेलं. तिच्या जीवलगा….राहिले रे दूर घर माझे…. म्हणण्यात प्रत्येकाला आपला जीवलग भेटू लागला. तिच्या स्वरांच्या आवर्तनांमध्ये रात्री उलटून गेल्याचं अगदी पहाटेपर्यंत लक्षातही आलं नाही. चालींच्या मधाळपणात कुणी स्वत:ला हरवून बसले तर काहीचं आभाळ अगदी अंगणात उतरू आलं. प्राणाची तळमळ सागराच्याही काळजात उतरली…पिकलेल्या जांभळांचा सडा कुणाच्या ओट्यांमध्ये पडला तर कुठे समईच्या शुभ्र कळ्या…..देवघरात उमलल्या!

लतादीदी जर गोड आरोह असतील तर आशाताई मुलायम अवरोह म्हणूयात. गायनी कळा धन्य करणा-या या भावंडांनी संगीत विश्वाला मोहिनी घातली ते अविनाशी आहे. यात आशाताईंचं आयुष्य म्हणजे एक दीर्घ काव्य…जी वाचणं सोपं पण भोगणं कठीण. हृदयनाथांबरोबरचं आशताईंचं नातं म्हणजे भावा-बहिणीतल्या नात्याचं एक विलोभनीय चित्र. बालपणी स्वत:च्या पायांनी ‘चाल’ अशक्य असणारे हृदयनाथ पुढे गाण्यांच्या ‘चालीं’नी रसिकांच्या श्रवणाचा मार्ग प्रशस्त आणि श्रीमंत करीत गेले. आणि ते स्वत:च्य हिंमतीवर ते केवळ चाललेच नाहीत तर दीनानाथांच्या संगीत परंपरेच्या वारशाचे भक्कम आधारही झाले.

माझ्या भावाला माझी माया कळू दे असं आशाताई एका गाण्यात म्हणाल्यात…. आई बाबांची सावली सरं…छाया भावाची डोईवर उरं! आशाताईंनी त्यांच्या ‘बाळा’च्या डोईवर धरलेल्या छायेबद्द्ल ह्र्दयनाथ यांनी लिहिलेलं वाचताना असं वाटतं की….त्यांना बहिणीची माया खरंच कळली आहे. 

(आजच्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील सप्तरंग पुरवणीत ह्र्दयनाथ मंगेशकरांनी आशाताईंविषयी जे काही लिहिलं आहे ते अगदी हृदयाच्या तळापासूनचं आहे..त्यामुळेच ते अस्सल आहे. ते वाचून हे मी माझ्या शब्दांत मांडलं आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका शूरवीराचे शब्द !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एका शूरवीराचे शब्द ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एका शूरवीराचे शब्द ! 

अर्थात… शूर नायक…कर्नल वसंथा वेणुगोपाल ! 

आसमंतात धुकं नुसतं भरून राहिलंय. माझ्या जवानांनी मस्तपैकी शेकोटी पेटवून ठेवलीये माझ्या खोलीतल्या शेकोटीच्या जागेत….छान ऊब मिळतीये काश्मिरातल्या त्या नाजूक लाकडांतून उठणा-या सडपातळ ज्वाळांची. मी अंगावर रजई पांघरूण पडलो आहे निवांत भिंतीला गुडघे टेकवून. सारं कसं धुंद आहे….आपण प्रेमात असतो ना तेंव्हा वाटतं तसं…सगळं मधाळ. केनेथ ब्रुस गोरलिक ज्याला सर्वजण केनी जी म्हणतात…त्याचं स्मूद जॅझ सॅक्सोफोन कानांवर हलकेच पडतं आहे….द मोमेंट वाजवतो आहे केनी. 

पण खोलीच्या बाहेर रात्रीच्या अंधारात इकडून तिकडे सतत येरझारा घालणारा प्रकाशझोत आहे आणि त्याचा उजेड थोड्याथोड्या वेळाने खोलीत येऊन जातोय…..हा प्रकाश डोंगरावर काहीतरी शोधतो आहे डोळ्यांत तेल घालून. माझी एके-४७ माझ्या हाताशीच आहे….या शस्त्राचा तो थंड स्पर्श! यातून सुटणारा आगीचा लोळ क्षणार्धात समोरचा देह कायमचा थंड करणारा…..आणि म्हणूनच या सुंदर वातावरणात वास्तवाचं भान सुटता सुटत नाही. आणि ते सोडून चालणार नाही. मी इथं जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सुट्टीवर आलेलो नाहीये. आपल्या सीमेत कुणीतरी घुसण्याच्या प्रयत्नांत आहे….शत्रू! आणि त्याला थोपवण्यासाठी,संपवण्यासाठी या जीवघेण्या थंडीतही अंगात ऊब टिकवून ठेवायला पाहिजे…..मी जागाच आहे. 

आज पहाटे दोन वाजताच आम्ही शत्रूच्या मागावर निघालो होतो….सात वाजेपर्यंत चालू होता आजचा खेळ. आम्ही दबा धरून बसलो होतो….प्रचंड साचलेल्या बर्फात….अंगातील हाड न हाड गोठून चाललेलं….सर्वांच्या हातातील एके-४७ रायफल्स….एखाद्या बाळाला जसं हातांवर अलगद झुलवत रहावं तसं या रायफल्स खेळवत,सांभाळत सर्व सज्ज होतो! आम्ही त्यांची वाट पहात होतो….शिकार रायफल्सच्या टप्प्यात येण्याची वाट पहात बर्फात निजलेलो होतो….कसलाही आवाज न करता…आमच्या श्वासांचाही आवाज बहुदा होत नसावा…श्वासांना वेळकाळ समजते! 

पण आज त्यांची शंभरी भरलेली नसावी बहुदा….आम्ही आयोजित केलेल्या या स्वागतसमारंभाकडे मंडळी फिरकलीच नाहीत….त्यांना बहुदा आमचा अंदाज आलेला असावा. किंवा मिळालेली गुप्त माहिती अपुरी असावी! असं होतं कित्येकदा. पण बेसावध राहून चालत नाही! आम्ही परत आलो आहोत! पण लवकरच त्या आगंतुक पाहुण्यांची गाठ पडणार हे निश्चित! 

हे शब्द आहेत एका नीडर आणि तरीही मनाने अत्यंत कोवळ्या असलेल्या एका सैन्याधिका-याचे….आपल्या प्रिय पत्नीला सुभाषिणीला लिहिलेल्या एका पत्रातील. अशी चारशेपेक्षा अधिक पत्रं संग्रही आहेत वीरनारी सुभाषिणी वेणुगोपाल यांच्याकडे. आणि या पत्रांचे लेखक आहेत कर्नल वसंथा वेणुगोपाल. 

वेणुगोपाल साहेब १९८९ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘घातक नववी’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नवव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यांची सैन्य कारकीर्द तब्बल १८ वर्षे बहरत राहिली. २००६ मध्ये वेणुगोपाल साहेबांना याच नवव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली….कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात यावेळी ही बटालियन जम्मू-काश्मिरातील उरी येथे कर्तव्यावर होती. आणि बटालियनच्या प्रत्येक अतिरेकी विरोधी अभियानात कर्नल साहेब जातीने पुढे असत. एकदा त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना विचारले होते….कर्नल दर्जाच्या अधिका-यास असं प्रत्येक वेळी प्रत्येक कामात पुढं असावंच लागतं का? त्यावर साहेबांनी मातोश्रींना हसत हसत सांगितलं होतं…अम्मा….माझी माणसं जिथं तिथं मी! जवानाचं नेतृत्व असं अग्रभागी राहूनच करावं असं मला वाटतं! 

आजही असंच केलं साहेबांनी. ३०  जुलै २००७…पाकिस्तानातून अतिरेक्यांचा एक मोठा गट उरीमध्ये घुसण्याच्या तयारीने सीमा पार करून आपल्याकडे घुसलेला आहे….ही खबर पक्की होती. साहेबांनी आपले कमांडो सज्ज केले आणि स्वत: पुढे निघाले. अतिरेक्यांसाठी भरभक्कम सापळा रचला. अतिरेकी रात्रभर बर्फाच्या कड्यांच्या आडोशाने लपत छ्पत पुढे येत होते….गुहांमध्ये लपत होते. पण आपल्या जवानांनी त्यांना नजरेने टिपलेच… 

कर्नल साहेबांनी आता मात्र त्यांना चारी बाजूंनी घेरलं…त्यांना आपल्याकडे घुसू तर द्यायचेच नाही पण परत पाकिस्तानी सीमेत जिवंतही पळून जाऊ द्यायचे नाही….हा प्रत्येकाचाच निर्धार होता. प्रचंड बर्फ होतं…..वीस-तीस फुटांच्या घळी होत्या वाटेत. त्यांच्या निमुळत्या जागांमध्ये आडवे झोपून अतिरेक्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागत होतं. वेणुगोपाल साहेबांना आपला वेढा करकचून आवळत आणला. साहेबांसोबत रेडिओ ऑपरेटर लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव नावाचा मर्दमराठा शूर गडी सावलीसारखा होता. 

३१ जुलै,२००७ची सकाळ उजाडली होती…काही तासांपूर्वी तुफान गोळीबार करीत राहणारे अतिरेकी आता एकाएकी शांत झाल्याचे वाटले. म्हणून शशिकांत यांनी अर्धवट उभे राहून गुहेच्या दिशेने पाहिले तर तिकडून एके-४७ ची मोठी फैर शशिकांत साहेबांच्या छातीत घुसली….पण कोसळता कोसळता या पठ्ठ्याने समोरच्या अतिरेक्याला अचूक टिपून वरती पाठवले. आता मात्र वेणुगोपाल साहेब चवताळून पुढे सरसावले. अतिरेक्यांसमोर त्यांचा साक्षात मृत्यूच उभा ठाकला होता..

साहेबांनी एकाला तर अगदी समोरासमोर उडवला….पण इतर अतिरेक्यांनीही नेम साधले आणि साहेब गंभीर जखमी झाले आणि वीस फूट खाली कोसळले…जवानांनी त्यांना पुन्हा वर आणले व सुरक्षित जागी निजवले…पण तशाही स्थितीत साहेबांनी सूचना,नेतृत्व आणि स्वत: गोळीबार जारी ठेवला…रक्तस्राव सुरू असतानाही. वैद्यकीय मदत मिळायला अवकाश होता….! साहेबांनी अशाही स्थितीत आणखी दोन शत्रू टिपले….घातक नववी मराठा बटालियन आता अतिरेक्यांवर आवेशाने तुटून पडली….एकूण आठ अतिरेकी होते….कर्नल साहेब, शशिकांत साहेब आणि उर्वरीत कमांडोज यांनी मिळून हे आठ राक्षस निर्दाळले होते. 

पण लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव जागीच वीरगतीस प्राप्त झाले होते तर कर्नल वसंथा वेणुगोपाल साहेब रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत स्वत:चे प्राण राखू शकले नाही….प्रचंड जखमी झाल्याने त्यांच्या श्वासांचाही नाईलाज होता! 

कर्नल साहेबांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान दिला गेला. लान्स नायक शशिकांत बच्छाव यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. २५ मार्च ही कर्नल साहेबांची जन्मतिथी. आज ते ५५ वर्षांचे असते आणि त्यांच्या आंतरीक इच्छेनुसार निवांत जीवन जगत असलेले असते…पण…असो. भावपूर्ण श्रद्धांजली…साहेब. 

शहीद कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या पत्नी श्रीमती सुभाषिणी वेणुगोपाल पती गमावल्यानंतरच्या अवघ्या तीनच महिन्यांत निश्चयाने उभ्या राहिल्या…त्यांनी सैनिकांसाठी काम सुरू केले आणि हे काम अतिशय उत्तम सुरू आहे. 

कर्नल साहेबांच्या दोन्ही मुलींनी मिळून फॉरएव्हर फोर्टी नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कर्नल साहेबांनी कुटुंबियांना लिहिलेल्या चारशेच्या वर पत्रांचा उल्लेख,संदर्भ आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे. पुस्तक मागवले आहे. लवकरच त्याबाबतीत कार्यवाही सुरू करीन. कारण ही शूर आयुष्यं आणि त्यांच्या धीरोदात्त कुटुंबियांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजेत…असं वाटत राहतं. 

(वरील छायाचित्रात डाव्या बाजूला कर्नल साहेब आणि उभे असलेले लान्स नायक शशिकांत साहेब दिसत आहेत.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print