मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे.

इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती.

सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की,  शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी घातलेली कमला धीटपणे ,शांत पण ठाम  स्वरात म्हणाली,

‘सर, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बी. एससी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे. इथल्या प्रवेशाचा निकष पूर्ण केला आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर इथे शिकू इच्छिणाऱ्या इतर मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार. तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’

सर रामन यांनी या मुलीतले वेगळेपण ओळखले. कमलाला इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षासाठी प्रोबेशनरी स्टुडन्ट म्हणून प्रवेश मिळाला. साधीसुधी दिसणारी ही मराठी मुलगी, श्रीनिवासय्या या तिच्या गुरूंनी घेतलेल्या अनेक कठोर परीक्षांमध्ये  उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १८ तास बौद्धिक व शारीरिक काम त्यांना करावे लागे. संध्याकाळचे दोन तास  कमलाबाईंना त्यांचे आवडते टेनिस खेळण्यासाठी मिळत.  पार्टनर म्हणून  त्या तिथल्या मदतनीसाबरोबरच खेळत असत .

नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचून त्या टिपणे काढीत.  शंका निरसनासाठी त्या परदेशी  शास्त्रज्ञांना पत्र लिहून प्रश्न विचारत. एखाद्या मित्राला समजवावे अशा पद्धतीने या शास्त्रज्ञांनी त्यांचे शंकानिरसन केले.  कमलाच्या अभ्यासातली तळमळ त्यांना जाणवली होती. शंभराहून अधिक सायन्स रिसर्च पेपर्स कमलाबाई यांच्या नावावर आहेत.

कमलाबाईंचे कर्तृत्व पाहून सर रामन यांनी कमलाबाईंजवळ मोकळेपणाने कबूल केले की,’आता मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थीनींसाठी नेहमी खुले राहतील.’ शिवाय ते स्वतः कमलाबाईंबरोबर टेनिसचे दोन- चार सेट्स खेळू लागले. 

पुढे केंब्रिजमध्ये अध्ययन करून कमलाबाईंनी पीएच. डी मिळविली. तिथेच राहून काम करण्याची संधी  नाकारून त्या भारतात परतल्या.

बंगलोरला असताना त्यांनी, ज्या बालकांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी गाढविणीच्या दुधाचा विशिष्ट घटक विशिष्ट प्रमाणात मिळवून पोषणमूल्य असलेल्या  दुधाचा शोध लावला . कडधान्य व त्यातील प्रथिने यावर संशोधन केले. कुन्नूर येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये त्यांनी ब समूहातील जीवनसत्वावर काम केले. नीरा या नैसर्गिक रुचकर पेयातील तसेच ताडगूळातील पोषक घटक शोधला. १९६७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पदक मिळाले .महाराष्ट्र सरकारच्या आरे मिल्क डेअरी प्रकल्पासाठी त्यांनी एकही पैसा मानधन न घेता संपूर्ण मार्गदर्शन केले. दुधाची प्रत व गुरांचे आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

कमलाबाईंनी मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये जीव रसायनशास्त्र विभाग नव्याने उघडला तिथे १९४९ ते १९६९ अशी वीस वर्षे संशोधन व अध्यापन केले. एमएससी पीएच.डीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कमलाबाई व दुर्गाबाई या सख्या बहिणी. लहानपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या दोघींच्यातला जिव्हाळा मैत्रिणीसारखा होता. आणि बुद्धी तेजस्वी होती.

दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सुवर्ण महोत्सवात त्यांचा सत्कार करून  मानपत्र व पारितोषिक देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना,  ‘शास्त्रीय संशोधनाचा देशासाठी पूर्ण उपयोग करा. ते लोकांच्या व्यवहारात आणा’ असे त्यांनी तळमळीने सांगितले. नंतर तिथल्या चहापानापूर्वीच कमलाबाई अकस्मात कोसळल्या आणि तिथेच वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या . कमला नावाच्या ज्ञानदेवीला सरस्वतीच्या दरबारात भाग्याचे मरण आले.

भारतात कमलाबाईंमुळे शास्त्रीय संशोधन क्षेत्राचे दरवाजे स्त्रियांसाठी उघडले गेले. जगभर अनेक  स्त्रिया शास्त्रीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे काम  करीत आहेत. परंतु या क्षेत्रात महिलांना कमी महत्त्व मिळते. त्यांनी सिद्ध केलेले स्थानसुद्धा त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे.

१९३३ साली आपल्या बुद्धिमान लेकीच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या इच्छाशक्तीला सक्रिय पाठिंबा देणारे, विश्वासाने तिला एकटीला  इन्स्टिट्यूटच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हवाली करून रातोरात मुंबईला परतणारे नारायणराव भागवत, पिता म्हणून नक्कीच आदरास पात्र आहेत.

लेखक – सुश्री वसुमती धुरू 

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगुस नवमी ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंगूस नवमी .. ☆ सुश्री समिधा ययाती गांधी

श्रावणात अनेक सण असतात. काही रुढी परंपरा पिढ्यानपिढ्या जपल्या गेल्या आहेत. आम्ही मूळचे गुजराथी. वाळासिंदोर नजिकच्या मोडासा आणि वाडोसा गावच्या आमच्या पूर्वजांना शिवाजी महाराज त्यांनी सुरतेवर स्वारी केली होती तेव्हा आपल्याबरोबर रायगडावर घेऊन आले. रायगडाच्या पायथ्याशी महाड, बिरवाडी, पोलादपूर, खेड, दापोली या गावांत आमच्या पूर्वजांना बस्तान बसवून दिले. आपल्या मराठी लोकांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहाता यांच्याकडून दुकानदारी, व्यवहार शिकावे अशी महाराजांची इच्छा असावी. असो. तर आमचे पूर्वज काही शे वर्षापूर्वी महाराष्ट्रात आले आणि मराठीच झाले. तरीही काही विधी, सण पूर्वीच्या परंपरेनुसार होतात. त्यातलाच एक आहे मुंगूस नवमी.

महाराष्ट्रात जशी नागपंचमी असते तशी आमच्या समाजात मुंगुसाची पूजा करतात. त्यामागे एक कथा आहे. मुंगूस एका माणसाच्या मुलाचे सापापासून रक्षण करतो आणि सापाशी केलेल्या झटापटीत जखमी होऊन त्याचे तोंड रक्ताने माखते. घरी परत आलेल्या माणसाला घराबाहेर रक्ताने माखलेला मुंगूस दिसतो. त्याला वाटते की मुंगुसाने त्याच्या बाळालाच काही इजा केली असावी. असे वाटून काहीही विचार न करता तो त्या मुंगुसाला ठार मारतो. त्या आवाजाने त्याची पत्नी बाळासह बाहेर येते. तिला आपल्या नवऱ्याने आपल्याला मदत करणाऱ्या मुंगुसाला मारले याचे फार वाईट वाटते. ती दरवर्षी त्या दिवशी उपास करून मातीच्या मुंगुसाची पूजा करते….. ही या मागची कथा !!

तर या दिवशी मातीचा मुंगूस करून त्याची मनोभावे पुजा केली जाते. सापकिरडू यांपासून आपल्या मुलाबाळांचे रक्षण करण्याची विनंती घरातली स्त्री मुंगुसाला करते. माठाची भाजी, मेथी, उडीदडाळ घातलेले वडे व शिरा, वरण भात याचा नैवेद्य गायीला देऊन मग घरातल्या स्त्रिया प्रसादाचे सेवन करतात.

नागपंचमी प्रमाणे आजच्या दिवशी काही चिरत, कापत नाहीत.

तर अशी ही श्रावण शुद्ध नवमी, मुंगूस नवमी

© सुश्री समिधा ययाती गांधी

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवीइतकाच मातीचा सुगंधही इथे महत्वाचा आहे. तसंच, हा पूर्णतः ‘तालमीचा राग’ आहे. यूट्यूब वर बघून हा येऊ शकत नाही. आई, आज्जी, आत्या अशा कुणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते.

आपल्याकडे बाजारात उकडीचा मोदक बनवायचे ‘साचे’ मिळतात. ही ‘चीटिंग’ आहे. हे म्हणजे ऑटोट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवैयाला असा ‘ साचेबद्ध ’पणा रुचत नाही.

मोदक हा व्हीआयपी पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल-खुर्चीवर बसून नाही, तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी-भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतः सुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर ‘निवग्री’ नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच.

तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्यावर साजूक तुपाची धार पडते, आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता, त्या वेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संतसज्जनांनी ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ असं म्हणलेलं आहे. यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले मोदक मोजणं म्हणजे रियाजाचे ‘घंटे’ मोजण्यासारखं आहे. त्याला फारसं महत्व नाही. ‘समाधान’ हेच खरं इप्सित.

बरं, भरपूर मोदक केवळ खाऊन झाले म्हणजे झालं, असं नाही. त्यानंतर संपूर्ण दुपार झोपण्यासाठी राखीव ठेवावी लागते. मुळात, मला ‘सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ?’ असं कुणी विचारलं तर मी तत्क्षणी सांगीन, ‘दुपारची झोप’!

‘रात्रीची झोप’ हे धर्मकर्तव्य आहे, तर ‘दुपारची झोप’ हा रम्य सोहळा. डोअरबेल बंद, फोन सायलेंटवर, पूर्ण अंधार, डोक्यावर पंखा अशा स्थितीत जाड पांघरुणात शिरून तो साजरा करायचा असतो. आणि हा सोहळा जर मोदकाच्या आगमनाने सुफळ झाला तर अजून काय हवं ? सुमारे ३ तास निद्रादेवीच्या सान्निध्यात घालावल्यावर जड डोळ्यांनी चहाचा पहिला घोट घेतल्यावरच मोदकाची इतिकर्तव्यता पूर्ण होते.

अशा या उकडीच्या मोदकाचा आपण आस्वाद घेऊया. 

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक : अज्ञात 

लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

उधमपूर रेल्वे स्टेशन.. कश्मिर !

येथूनच तरणाबांड तुषार पुण्याला निघाला असताना त्याचे आई-बाबा, भाऊ त्याला निरोप द्यायला आले होते काहीच वर्षांपूर्वी! त्यांच्या विरोधाला न जुमानता पोरगं नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये सैन्य अधिकारी व्हायला निघालं होतं. बालहट्टापुढे काही चालतं का आईबापाचं? आणि आज त्याच स्टेशनवर ते त्याला घ्यायला आलेले आहेत… अखेरचे! तो आलाय… तिरंग्यात स्वत:ला गुंडाळून घेऊन… त्याचं स्वप्न साकार करून ! 

उधमपूर मध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचार्य देव राज यांचा हा धाकटा मुलगा. जन्म २० एप्रिल, १९८९ चा. थोरला मुलगा इंजिनिअर व्हायचं म्हणत होता. पण तुषार मात्र अगदी लहानपणापासून म्हणायचा… मला लष्करात जायचंय आणि अतिरेक्यांना ठार मारायचंय…. शाळेतल्या निबंधातही तुषार हेच लिहायचा ! त्याने कश्मिरातील अतिरेकी कारवाया आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. देशाच्या दुश्मनांना आपण यमसदनी पाठवावे, असे त्याला मनातून सतत वाटे. 

भगवंताला अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताचे एक वैशिष्ट्य सांगताना माऊली ज्ञानोबारायांनी म्हणून ठेवलं आहे…” तैसा मी वाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं। मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें “

॥ ३३६ ॥ – याला माझ्यावाचून अन्य काहीच गोमटे, चांगले वाटत नाही. याने त्याच्या आयुष्याला माझेच नाव दिलेले असते. मी म्हणजेच तो ! इथे देव म्हणजे देश आणि भक्त म्हणजे तुषार महाजन. आपल्या संपूर्ण जीवनाला तुषारने जणू देशाचेच नाव दिले होते.

अत्यंत परिश्रमपूर्वक शिक्षण पूर्ण करून तुषार २००६ मध्ये एन. डी. ए. मध्ये दाखल झाले. नंतर पुढील उच्च लष्करी शिक्षणासाठी त्यांनी २००९ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि तुषार महाजन लष्करी अधिकारी झाले… अतिरेक्यांना ठार मारण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांचे मनसुबे आता प्रत्यक्षात उतरणार होते —- त्यांना लगेचच त्यांच्या आवडीचं काम मिळालं. जम्मू-कश्मिरमध्ये अतिरेकी विरोधी अभियानात ते नेमाने सहभागी होऊ लागले. 

२० फेब्रुवारी, २०१६. पंपोर येथून सी.आर.पी.एफ. चे जवान अशीच एक अतिरेकी विरोधी मोहिम फत्ते करून तळावर परतत होते. इतक्यात त्यांच्या वाहनांवर अतिरेक्यांनी तुफान हल्ला चढवला. अकरा जवान गंभीर जखमी झाले! आपल्या सैन्याने अतिरेक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेच. पण ते चार अतिरेकी भर गर्दीतल्या एका बहुमजली इमारतीत आश्रयाला गेले. तिथे कित्येक लोक होते, त्यांच्या जीवाला मोठा धोका होता.—- जवानांनी त्या इमारतीला वेढा दिला. आतून अतिरेक्यांकडून अत्याधुनिक शस्त्रांनी तुफान गोळीबार होत होता. आपल्या जवानांनी जीव धोक्यात घालून इमारतीतून शंभरेक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. पण तोपर्यंत अतिरेक्यांच्या गोळीबारात स्पेशल फोर्सचे कॅप्टन पवन कुमार साहेब हुतात्मा झाले…. फार मोठी हानी होती ही.. अर्थात चार पैकी एक अतिरेकीही टिपला होता पवन कुमार साहेबांनी मरता मरता.

दिवस पुढे सरकत होता. आतून गोळीबार कमी होण्याची चिन्हे नव्हती. स्पेशल फोर्सची तुकडी पाठवून इमारतीवर रात्री हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. ह्या हल्ल्यात सर्वांत पुढे असणार होते…. स्पेशल फोर्स कमांडो बनलेले कॅप्टन तुषार महाजन. 

रात्र पडली… त्यांचे कमांडो पथक गोळ्या अंगावर झेलत इमारतीत घुसले… त्यांच्यापुढे अतिरेक्यांना टिकाव धरता येईना… ते सर्व अतिरेकी इमारतीच्या आणखी आतील भागाकडे पळून गेले. तुषार साहेब त्यांच्या मागावर राहिले… त्यांनी अगदी समोरासमोर जाऊन त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला….. ती इमारत आगीने वेढली गेली… अतिरेक्यांनी आयईडीचे स्फोट घडवून आणले. आणि या भयावह लढाईत महाजन साहेबांनी स्वत:च्या छातीवर चार गोळ्या झेलल्या… जीवघेण्या जखमा करीत गोळ्या शरीरात घुसल्या…. अतिरेकी यमसदनी पोहोचले होते… पण कॅप्टन तुषार महाजन साहेब अमरत्वाची वाट चालू लागले होते… वैद्यकीय उपचार सुरू असताना कॅप्टन साहेब हे जग सोडून गेले ! त्यांच्या सोबत असलेले लान्स नायक ओम प्रकाश हे सुद्धा हुतात्मा झाले — भारतीय लष्कराने नंतर निकराचा हल्ला चढवत उरलेले तिन्ही अतिरेकी ठार मारले !.. पण आपण आपले तीन वाघ गमावले होते !

मुलाची शवपेटी पाहताच कॅप्टन तुषार साहेबांच्या वडिलांनी– प्राचार्य देव राय यांनी सॅल्यूटसाठी हात उभारला… लेकाला मानवंदना म्हणून. पोराने आपले स्वप्न खरे करून दाखवले होते. 

आधीच्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर स्टेटस ठेवलं होतं आणि म्हटलं होतं… “ सो जायेंगे कल लिपटकर तिरंगे के साथ ! “ 

गोकुळ अष्टमी ! आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस– या दिवशी उधमपूर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे ! शहीदांच्या स्मृती अशाच जागत्या ठेवायला पाहिजेत…! 

हुतात्मा कॅप्टन तुषार महाजन साहेब… अमर रहें ! जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक १ ते १० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक १ ते १० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

धृतराष्ट्र उवाच — 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।

मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।।१।।

दृष्टवा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।

आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥२॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌।

व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि।

युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥४॥

धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।

पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङवः ॥५॥

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।

सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥६॥

भावानुवाद 

धर्माधिष्ठित कुरुक्षेत्रावर समरोत्सुक, संजय ।

अनुज पाण्डुचे माझे पुत्र सांग करिती काय ॥ १ ।।

व्यूहात पाहुनी पांडव सेना उठला दुर्योधन

समिप जाउनी आचार्यांच्या कथिता झाला वचन ॥२॥

आचार्य पहावी विराट सेना पांडुपुत्रांची

धृष्टद्युम्नाने रचिलेल्या कुशल व्यूहाची ॥३॥

भीमार्जुन हे श्रेष्ठ योद्धे युद्धसिद्ध जाहले 

सात्यकी विराट महारथी द्रुपद येउनी मिळाले ॥४॥

धृष्टद्युम्न चेकितान काशीराज च योद्धे वीर

कुंतिभोज पुरुजितासवे शैब्य पुंगवनर ॥५॥

युधामन्यु पराक्रमी उत्तरमौजा शक्तीमान

महारथी सौभद्रासवे द्रौपदीचे पंच सुत ॥६॥

संस्कृत श्लोक 

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम।

नायका मम सैन्यस्य सञ्ज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः।

अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥८॥

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः।

नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥९॥

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌।

पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥१०॥

— श्रीमद्भगवद्गीता : अध्याय पहिला

भावानुवाद 

आचार्य कथितो मुख्य सेनानायक आपुले

आपुल्या ज्ञानास्तव नामे सांगणे म्या योजिले ॥७॥

आपुल्या सवे भीष्म विजयी कृप तथा कर्ण 

अश्वत्थामा सोमदत्तसुत भूरिश्रवा तथा विकर्ण ॥८॥

बहूत शस्त्रधारी योद्धे रणांगणी युद्धसज्ज

प्राण घेऊनिया हाती साथ देती सदा मज ॥९॥

भीष्मरक्षित सैन्य अपुले आहे प्रचंड अगणित

भीमरक्षित शत्रुसैन्य संख्येने मात्र मर्यादित ॥१०॥

– क्रमशः भाग पहिला 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बिब्बा/बिबवा… ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ बिब्बा/बिबवा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

पूर्वीच्या गावगाड्यातील प्रत्येक घरा-घरात आढळणारा हा औषधी गुणधर्म असलेला बिब्बा घरातील गाडग्या-मडक्यात हमखास पहायला मिळत असे. आज्जीबाईच्या बटव्यात तर याला मानाचे स्थान होते. असा हा बिब्बा अलीकडच्या काळात बऱ्याच जणांच्या खिजगणतीतही नसावा. याचे आश्चर्य वाटते. 

कोकण पट्ट्यातील डोंगररांगा आणि मला माहित असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर तसेच कराड तालुक्यातील दक्षिण भागातील डोंगररांगा आणि इतर पडीक मोकळ्या रानात या बिब्ब्याची झाडे पहावयास मिळतात.

जंगल संपत्ती असल्याने आदिवासी किंवा स्थानिक लोकांना बिबव्याची फळे चार पैश्याचा आधार देऊन जातात. साधारण बिबव्याच्या झाडाची फळे ही दिवाळीच्या वेळेला पिकायला सुरुवात होते. काजूसारखी येणारी पिवळसर केशरी बोंडे असलेल्या फळाचे काळसर बिब्बे काढून त्या फळाच्या माळा तयार करून ते खुंटीला वाळवण्यासाठी अडकवून ठेवतात. मग अश्या वाळलेल्या फळांच्या माळा जवळपासच्या आठवडी बाजारात किंवा शहरात विकावयास येतात. चवीला तुरट आणि रुचकर असणारे हे फळ पिष्ठमय असते. कच्चे पिवळसर फळ खाल्ले तर घश्यात खवखव सुरू होते. त्यामुळे  पिकल्यानंतरच खाणे योग्य होते. 

माझा आणि या बिब्ब्याचा खूप जवळचा संबंध आहे. पूर्वी दिवस उगवायला डोक्यावर पाट्या घेऊन गळयात धोतर किंवा लुगड्याचा धडपा   बांधून त्यात झोपलेल्या तान्हया बाळाला पाठीवर टाकून सुया-पोती विकणाऱ्या नऊवारी लुगड्याला ‘दंड’ घालून कासुटा घातलेल्या कोकणी बायका, ” ये काकू ? ये मावश्ये ? ” अश्या मोठमोठ्याने हळ्या मारत वेशीतून वाड्या-वस्त्यांवर प्रवेश करायच्या, तेव्हा प्रथम त्यांचे स्वागत हे पाळीव कुत्री करायची. मग त्या बायकांच्या हळ्या आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा कालवा ऐकून सगळ्या आळीची पोरं-पोरी जागी व्हायची, आणि डोळे चोळतच कालव्याच्या दिशेने पळत सुटायची. ” ओ, आमच्या आयनं बोलावलंय? ओ आमच्या आळीला चला? ओ आमच्या अंगणात बसा? ओ आमच्या सोप्यात बसा? ” म्हणून त्या बायकांच्या विनवण्या करत असायची. त्या बायकांच्या टोपलीत सुई, दाबन, तोडे, वाळे, मनगट्या, लबरी कडे, वगैरे वगैरे साहित्याबरोबरच या बिब्याचा ही मुख्यता समावेश असायचा.

तर अश्या या कोकणी बायकाकडून आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्याकी त्यात चार-पाच बिब्यांचा ही समावेश असायचा. मग त्या बायकांना कालवण असेल तर कालवण नसेल तर चटणी भाकरी देऊन पाठवले जाई. असे ही बिब्बे शेतकऱ्यांना कधी आणि केव्हा लागतील याचा नेम नसायचा. म्हणून ते बिब्बे करंड्यात, बारक्या गाडग्यात किंवा घराबाहेर असणारया भिंतीच्या देवळीत सुरक्षित ठेवले जात. याचे ही कारण असे की लहान मुलांच्या हाती हा बिब्बा चुकून लागू नये. कारण चुकून बिब्बा लहान मुलाने तोंडात घातला तर बिब्ब्याच्या तेलाने त्या मुलाचे तोंड उतू जाते. त्यालाच ‘बिब्बा उतला’ असे म्हटले जायचे.

असा हा बिब्बा पूर्वी खूप उपयोगी होता. जनावरांना एखाद्याची नजर लागू नये . तसेच जनावराला ‘बाहेरवाश्याचे’ होऊ नये म्हणून, बैलांच्या गळ्यातील कंडयात तसेच गाई, म्हैस, शेळी व्यायला झाली म्हणजे तिच्या गळ्यातील कंडयात हा बिब्बा मानाने विराजमान व्हायचा. 

पूर्वी आजच्या सारख्या प्रत्येकाच्या पायात चपला नसायच्या. घरातील कर्ती माणसं सोडली तर बाकीच्या सदस्यांना चपला ह्या दुर्मिळच असायच्या. एकतर लोकांना रानामाळात, काट्याकुटयात अनवाणी पायाने भटकावे लागत. अशावेळी नजर चुकीने एखाद्याचा बाभळीच्या फांदीवर पाय पडून पायात काटा मोडला तर ती व्यक्ती दिडपायावर चालायची. जवळ कोणी बाई माणूस असेल तर तिच्या हातातील बांगड्यामध्ये असणारी पिन घेऊन किंवा बाभळी, बोरीच्या काट्यानेच काटा टोकरुन काढला जायचा. परंतु एखादा काटा खोलवर घुसून मोडला असेल तर तो या वरील उपचारांना दाद  द्यायचा नाही. मग टोकरलेल्या जागेवर रुईचा चीक लावून संध्याकाळ व्हायची  वाट पहावी लागे.

दिवस मावळताना घरी जाऊन हातातले काम बाजूला टाकून तो काटा सुईच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला जाई. किंवा एखाद्या जाणकार वयक्तीकडून तो काटा काढला जाई. मग काटा काढलेल्या जागी बिब्बा घेऊन त्याला वाकळेच्या सुईने किंवा दाबनाने टोकरून त्यात दाबन खुपसून ते पेटत्या दिव्यावर धरले जाई. जोपर्यंत बिब्ब्यातून चरचर असा आवाज घरत तेल गळत नाही, तोवर बिब्बा त्या दिव्याच्या ज्योतीवर धरला जाई. एकदा का बिब्ब्यातून गरम गरम तेल गळायला लागले की लगेच तो बिब्बा काटा काढलेल्या जागी पटकन दाबून धरला जाई. यालाच चरका किंवा चटका देने म्हणतात. चरका दिल्याबरोबर पायात काटा मोडलेली वयक्ती “आयो” म्हणून जी बॉंब ठोकायची, ती सगळ्या आळीला त्याचा पत्ता लागायचा. एवढी कळ बिब्ब्याचा चटका दिल्यावर त्या वयक्तीला सोसावी लागायची…! चटका दिल्यावर त्या ठिकाणी पाणी किंवा ‘पु’ होत नसे. पण एक व्हायचे एकदा का असा चरका दिला की दिड पायावर चालणारी वयक्ती सकाळी उठून दोन पायावर चालू लागे…! आणि आपले रोजचे काम त्याच जोमाने करे…!

पावसाळ्यात पायाला चिखल्या पडल्या, भेगा पडल्या, सांधे दुखणे, अर्ध शिशी यावर बिब्बा घालणे हा जालीम उपाय होता. 

ते सुगीचे दिवस होते. खळ्यात मळणीचे काम चालू होते. कडक उन्हामुळे का आणखी काही कारणाने माझ्या आज्जीचे डोके खूप दुखत होते. ते काही केल्या राहत नवहते. आम्ही त्यावेळी खळ्यावर काम करत होतो, तश्या ही परिस्थितीमध्ये आज्जी डोक्याला धडपा बांधून काम करत होती. एकदाचा सूर्य मावळला.धारा-पाणी करून आम्ही घरी आलो. घरी आल्या-आल्या मी आज्जीची चुलत जाऊ जिजीला बोलवून आणले. जिजी ‘बिब्बा घालण्यात पटाईत’ होती. आज्जीचे तिला सविस्तर सांगितले. मग मी डब्यातला बिब्बा अन दाबन काढून जिजीला दिले. आज्जी दुखण्याने कण्हत होती. मग चुलीत दाबनाचे टोक गरम करून जिजीने आज्जीच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि भुवयांच्या कडेला डोळ्याच्यावर तीन- तीन कडक चटके दिले. आज्जींने ती कळ कशी सोसली हे तिलाच माहीत.पण त्या चटक्याची कळ आज्जीपेक्षा मलाच जास्त बसली. मला घामच फुटला होता. मग त्यावर जिजीने चुलीतली राख घेतली आणि डोळ्यात जाणार नाही अश्या रीतीने जळलेल्या भागावर ती पसरली. आणि वरून फुंकर मारली….! काही दिवसातच आज्जी डोकेदुखीतुन बरी झाली.

असंच एकदा आमच्या पिराच्या पट्टीच्या बंधावरची बाभळ धनगरांनी ‘सवाळली’ होती. मी शहाणपणा करून त्या काट्याच्या फेसात विटी-दांडू काढायला गेलो. सोबत माझा मित्र संभा नलवडे ही होता. एक लाकूड हेरुन आम्ही लाकडाला हात घातला. आणि बाहेर ओढताना माझा हात निसटून मी मागे चार पावले फेकलो जाऊन काट्याच्या फांजरीत पडलो. माझ्या टाचेत कचकन काटा मोडला. “आज्जे” म्हणून मी मोठयाने किंचाळलो. संभाला काहीच कळेना. मी त्याला पायात मोडलेला काटा दाखवला. मग लगेच संभाने माझा पाय त्याच्या गुडघ्यावर धरून काटा मोडलेल्या ठिकाणी थुंकी लावून टाच स्वच्छ केली. आणि मला कानात बोटे घालायला लावून तो काट्याने काटा काढू लागला. बऱ्याच वेळाने त्याने काटा काढण्यात यश आले. मग आम्ही विठी-दांडू घेऊन घरी आलो. आज्जी-बाबांना न सांगताच आम्ही काटा लागलेल्या जागी चरका दिला. पण आमच्याकडून एक चूक झाली. चरका दिल्या जागी आम्ही चुलीतल्या राखे ऐवजी मातीचा फुफाटा लावला. आणि देवळाकडे खेळायला पळालो…!

मी सकाळी दात घासत नसे. अंघोळ ही करत नसे. मग नेहमीप्रमाणे उठलो. सकाळची सर्व कामे आटोपली, आणि चहा प्यायला घरी आलो. कसेतरी तोंड धुतले, आणि पायावर पाणी घेऊन पाय धुऊ लागलो. तर माझ्या पायाच्या डाव्या गोळ्याला अंड्याच्या आकाराचा फोड आलेला होता, त्यात माझे बोट घुसले. मी जोरात बॉंबलो. त्याबरोबर आज्जी बाहेर अंगणात आली अन, “काय झालं ? “म्हणून मला ओरडायला लागली. मग घडलेली सारी कहाणी तिला सांगितली. मग तर तिने मला, “किरड्या, मुडद्या…!”, म्हणून शिव्याचा भडिमारच केला…! त्याचे झाले होते असे.  आज्जी मारील म्हणून आम्ही घराऐवजी गुरांच्या गोठ्यातच चरका देण्याचे काम केले होते. त्यावर मातीच्या फुफाट्याऐवजी राख टाकायला हवी होती. कारण राख मऊ असलयाने ती ओलसरपणा लगेच खेचून घेते. आणि नेमकी तीच चूक आमच्या हातून झाली होती. रात्री जेवायला बसल्यावर माझ्या टाचेवर  डाव्या पायाच्या गोळ्याचा भार पडल्यामुळे बिब्ब्याचे तेल गोळयाला लागल्यामुळे तेथे बिब्बा उतला होता. त्याचा डाग आज हि माझ्या डाव्या पायाच्या गोळ्याला आहे.

बिब्ब्याचा आणखी एक काम मला माहित आहे, ते म्हणजे मी लहान असताना आज्जीने औंधच्या बाजारातुन कोंबड्याची अंडी ठेवण्यासाठी एक कळकाची करंडी विकत आणली होती. मग तिने एका जर्मनच्या तोंडफाटक्या गडूमध्ये दहा-,बारा  बिब्बे दाबनाने दुःखवून टाकले. तो गडू  जाळावर धरून ते चांगले रटारटा शिजविले. त्यातील बिब्ब्याचे सर्व तेल काढले आणि ते त्या नव्या कळकाच्या सर्व कांब्यांना आतून बाहेरून लावले. काय विशेष असेल ते असेल आज्जीलाच माहीत. पण ती करंडी आज ही  आमच्या गणेशवाडीच्या घरी सुस्थितीत आहे.

लेखक : आनंदराव रामचंद्र पवार(औंध)

जैतापूर – सातारा – मो.नं.9881791877

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी मातीतलं शिल्पगीतरामायण ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी मातीतलं शिल्पगीतरामायण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ग.दि.मां.नी शब्दांचं रामायण बाबुजी सुधीर फडके यांच्या स्वरांतून अमर करून ठेवलं. हे शब्द जोवर मराठी माणूस या जगतात असेल तोवर नादब्रम्हांडात गुंजत राहतील. आधुनिक वाल्मिकी म्हणून कीर्ती प्राप्त झालेले ग.दि.मा.मराठी मातीत होऊन गेले याचा मराठी माणूस म्हणून अभिमान वाटतो. 

शब्दांना भाषेच्या मर्यादा पडतात हे प्रभूंना ठाऊक असावे म्हणून त्यांनी चित्रांना, शिल्पांना, सूरांना, रंगांना शब्दांपेक्षा अधिक पटीने व्यापक बनवले! पाषाणात,मृत्तिकेत आकाराला आलेली शिल्पं तर जणू सहस्रवदनांनी आपली कथा ऐकवत असतात आणि जणू दाखवतही असतात. 

तुलना करणं मोठ्या धाडसाचं असलं तरी गदिमांनंतर प्रभू रामचंद्रांची कथा मराठीत आणि गाण्यात  सांगण्याचं भाग्य कित्येक वर्षांनंतर एका मराठी माणसाला लाभावं हा मोठा योगायोग…! 

पण यावेळी कथा शब्दांतून नव्हे तर शिल्पांतून मूर्तीमंत समोर उभी राहणार आहे. चित्रांतून प्रतिमा उभ्या राहतील, त्या चित्रांवर आधारित शिल्पं मातीतून घडतील आणि या शिल्पांचे साचे तयार होतील आणि या साच्यांबरहुकूम पाषाणांतून मूर्ती उभ्या राहतील….रामललांच्या, प्रभु श्री रामचंद्रांच्या भव्यदिव्य जन्मस्थान मंदिराभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गावर ! प्रभुंसह सीतामाई,बंधू लक्ष्मणजी,भरतजी,भक्तश्रेष्ठ हनुमानजी यांचे   दर्शन घेऊन भाविक मंदिर प्रदक्षिणा करायला निघतील तेव्हा ते प्रत्यक्ष रामायण अनुभवत, बघत पुढे पुढे जात राहतील आणि पुन्हा फिरून त्या रघुरायाच्या सामोरे उभे राहतील.

प्रभुंचा जन्म ते त्यांनी वनवास संपवून अयोध्येत परत येणे ह्या दरम्यानची सर्व कथा सुमारे शंभर शिल्पस्वरूपात सादर करणे ही कल्पनाच मुळात मोठी सुरेख आहे. मंदिर प्रदक्षिणा ही दर्शनाएवढीच महत्त्वाची मानली जाते. एका अर्थाने भक्त देवाला आपल्या तनमनात साठवून घेत घेत त्याच्या राऊळाभोवतीचं चैतन्य देहात साठवून घेत असतो आणि ते घेऊन आपल्या जीवनप्रवासात रममाण होत असतो. यासाठी ही शिल्पं घडवणारे हातही तेवढेच तोलामोलाचे पाहिजेत…म्हणून श्री राम मंदिर निर्माण करणा-या ज्येष्ठ-श्रेष्ठांनी देशभरातून हजारभर कलाकारांना आमंत्रित केले. प्रसिद्ध चित्रकार श्री.वासुदेव कामत यांनी ही शंभर चित्रे काढून तयार ठेवली आहेत. या चित्रांवरून हुबेहुब त्रिमिती मॉडेल्स तयार करायची आणि या मॉडेल्सबरहुकूम पाषाणांतून सर्व शिल्प घडवून घ्यायची अशी योजना होती. सर्वच कलाकारांनी देवाची सेवा म्हणून अक्षरश: जीव ओतून काम केले. पण प्रभुंचा प्रसाद यापैकी कुणा एकालाच मिळायचा होता… त्यासाठी प्रभुंनी मराठी मातीतल्या, मातीतून सृष्टी निर्माण करण्याची अदभूत कला अंगी असणा-या एका नम्र मराठी कलाकाराची निवड केली… प्रमोद दत्तात्रय कांबळे हे या दैववंताचे नाव… मुक्काम अहमदनगर ! 

गावाच्या नावाप्रमाणेच वागण्यात,बोलण्यात कोणतेही कानामात्रे, उकार, वेलांट्या,अनुस्वार नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद कांबळे. वडील दत्तात्रय कलाशिक्षक आणि दत्तभक्तानुग्रहित. प्रमोद कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या स्थितीतून पुढे येत मायानगरी मुंबईत चित्रकलेची-शिल्पकलेची जादू दाखवली. पुढे कर्मभूमी अहमदनगर मध्ये परतून कलाविश्व निर्माण केलं. प्रभू रामचंद्रांचं पूर्णाकृती चित्र असं जिवंत केलं  होतं की प्रभुंच्या चित्रातील त्यांच्या गळ्यातील यज्ञोपवीतातला धागा चिमण्या तोडून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. प्रमोदजींचा कलाप्रवास हा स्वतंत्र लेखनाचा आणि चर्चेचा विषय आहे.   

नानाजी देशमुख आणि तत्कालीन राष्ट्रपती महोदय अब्दुल कलाम साहेबांची शाबासकीची थाप पाठीवर पडलेला कलाकार काही सामान्य असेल काय? भारतीय लष्कराचा पहिल्या पसंतीचा शिल्पकार असणंही काही कमी महत्त्वाचं नाही. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा आवडीचा मूर्तीकार असणं, आंतराराष्ट्रीय किर्ती मिळवत शेकडो हातांना काम आणि नवोदित कलाकारांना घडवणं हेही सोपे काम नाही. आयुष्यभर कमावलेले सारे कलावैभव स्टुडिओला लागलेल्या भयावह आगीत डोळ्यांसमोर जळून राख होताना पाहूनही पुन्हा त्या राखेतून ताकदीनं उभा राहणारा हा कलाकार… प्रमोद कांबळे. यांच्या हातातील मातीतून आपल्या प्रभुंचा जीवनालेख पाषाणातील शिल्पांमधून सगुण साकार होणार आहे.. याचा तमाम मराठीजनांना अभिमान वाटेलच आणि प्रभुरामचंद्रांप्रतीच्या भक्तिभावाने भरलेली आणि भारलेली हृदयं प्रमोदजी कांबळेंना आशीर्वाद आणि शुभेच्छा देतीलच, यात शंका नाही. पुढील वर्षी प्रभुंचे मंदिर दर्शनासाठी उघडेल… कोटयवधी भक्त प्रदक्षिणा मार्गावर चालत असतील…एका मराठी कलाकाराच्या कलाविष्कारातून साकारलेली रामकथा… शिल्पांतून ऐकू येत असलेलं गीतरामायण… ते डोळ्यांत साठवत साठवत पुढे जाताना म्हणतील..जय श्री राम… राम प्रभु की सभ्यता, दिव्यता का ध्यान करिये ! 

(अहमदनगर येथील सुप्रसिद्ध चित्र-शिल्पकार श्री प्रमोद दत्तात्र्य कांबळे यांना अयोध्येतील श्री राममंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येणार असलेल्या पाषाण-शिल्पांच्या मातीतल्या थ्रीडी मॉडेल्स बनवून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अनेक दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. हा लेख मी सहज परंतू मराठी माणसाच्या अभिमानाने लिहिला आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंत्रपुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ मंत्रपुष्पांजली— मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक 

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|

ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे

स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|

कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति

साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी

स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

भावानुवाद :-

यज्ञासहित करुन आद्यविधी उपासनेचे

पूजन केले देवे यागरूपी त्या प्रजापतीचे 

यज्ञाचरणे देवताधामा केले त्यांनी प्राप्त 

याची कर्मे महानता झाली त्यांना अर्जित 

अनुकूल सकला असे तुझे कर्म

मनीच्या कामनांची पूर्ती तुझा धर्म 

अमुच्या इच्छा समस्त पूर्ण करा

नमन राजाधिराजा वैश्रवणा कुबेरा

कल्याणकारक असावे राज्य  

भोग्य परिपूर्ण असे साम्राज्य

लोभमोहविरहित लोकराज्य 

अधिपत्य अमुचे असो महाराज्य

क्षितीजसीमेपर्यंत अमुचे राज्य सुखरूप असो

सागरमर्यादेचे अमुचे राज्य दीर्घ आयुचे असो

राज्य आमुचे सृष्टी आहे तोवर संरक्षीत असो

आयु या राज्याची परार्ध वर्षे सुरक्षित असो

असे राज्य कीर्तीमानसे व्हावे

म्हणोनी या  श्लोकास आम्ही गावे

अविक्षीत पुत्रांनी मरुद्गणांनी

परिवेष्टिले राज्य आम्हासि लाभो

(मराठी मंत्रपुष्पांजली गायलेली असून तिचा व्हिडिओ खालील लिंकवर पहाता / ऐकता येईल.  https://youtu.be/1Sx5OFugEHQ ) 

Attachments area

Preview YouTube video मंत्रपुष्पांजली मराठी / Mantrapushpanjali Marathi

मंत्रपुष्पांजली मराठी / Mantrapushpanjali Marathi

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिंदू म्हणजे काय हो ?… – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ हिंदू म्हणजे काय हो ?… – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आपण हिन्दू आहोत हे खरे आहे परंतु, हिंदू म्हणजे काय हो???

सांगाल का???

तर मंडळी वाचा आणि एखाद्याने विचारले की हिंदू म्हणजे  काय, तर, चट्दिशी सांगता आले पाहिजे…!!!

“हिंदू” शब्द ‘सिंधु’ शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे, असे आपल्याला आतापर्यंत सांगितले गेले आहे, पण, खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशाभूल करणारे आहे, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

“हिंदू” हा शब्द “हीनं दुष्यति इति|

हिन्दु: म्हणजे- ‘जो अज्ञान *आणि हीनतेचा त्याग करतो’ त्याला हिन्दू म्हणतात’.

‘हिन्दू’ हा शब्द अनन्त वर्षांपासून असलेला प्राचीन मूळ संस्कृत शब्द आहे.

या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय *आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते, की, ‘सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू’ हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला. खरे म्हणजे ‘हिन्दू’ या शब्दाची उत्पत्ती ‘वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे, म्हणून, हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, हे अवश्य जाणून घेऊयात, आपल्या वेद आणि पुराणातही ‘हिन्दू’ या शब्दाचा उल्लेख सापडतो.

आज आपण ‘हिन्दू’ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ते पाहूयात… 

‘बृहस्पति अग्यम’ (ऋग्वेद) मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे. “हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l” 

म्हणजेच … 

‘हिमालयापासून इन्दू सरोवरा (हिन्दी महासागर) पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान (‘हिन्दूं’ चे स्थान) होय.

केवळ ‘वेदांत’ च नव्हे, पण, ‘शैव’ ग्रंथातही ‘हिन्दू’ शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो, “हीनं च दूष्यते एव्, हिन्दुरित्युच्चते प्रिये।”

म्हणजेच- “जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय.”

कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक ‘कल्पद्रुमा’तही आढळतो- “हीनं दुष्यति इति हिन्दु:।” म्हणजे- “जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते.”

“पारिजात हरण” या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-

“हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्ट.

हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुरभिधीयते।।”

.. म्हणजे,”जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय.”

“माधव दिग्विजय,”मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय- “ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन् गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।”

.. म्हणजे- “जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो, तो हिन्दू आहे.”

केवळ एव्हढेच नव्हे, तर, आपल्या ऋग्वेदात (८:२:४१) विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे, ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि ‘ऋग्वेद मंडला’तही त्याचा उल्लेख येतो.

“हिनस्तु दुरिताम्।” … ‘वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच आहेत.’

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गोष्ट माणुसकीची… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

गोष्ट माणुसकीची… ☆ श्री सुनील देशपांडे

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.

माणुसकी नावाचा एक माणूस, खरोखरी माणूस असणारा माणूस राहत होता. त्याची पत्नी नीती. 

दोघांचा संसार अत्यंत सुखाचा आणि चांगला चालला होता. त्यानंतर त्यांना मुले झाली प्रत्येक मुलाचे नाव त्यांनी धर्म असे ठेवले.  फक्त ओळखू यावा म्हणून त्याला धर्म एक, धर्म दोन, धर्म तीन … अशा क्रमाने नावे दिली.  हे धर्म काही दिवसांनी आपापली वेगवेगळी घरे बांधून आपापल्या घरात राहू लागली.  त्यानंतर त्यांची ही कालांतराने लग्ने झाली.  त्यांनाही ज्या पत्नी मिळाल्या त्यांचीही नावे श्रद्धा१, श्रद्धा२,. … अशी होती. हे वेगवेगळे धर्म आपापल्या घरामध्ये थोड्याफार कुरबुरी असल्या तरी बऱ्यापैकी सुखाने नांदत होते. परंतु काही काळानंतर त्यांना त्यांनाही मुले झाली आणि ती मुले धर्मपंथ एक, धर्मपंथ दोन, धर्मपंथ तीन … अशा नावाने संबोधले जाऊ लागले. कालांतराने त्यांची लग्ने झाली आणि त्यांना मिळालेल्या पत्नींची नावे अशीच अंधश्रद्धा एक, अंधश्रद्धा दोन, अंधश्रद्धा तीन, … अशी झाली.

अशी प्रत्येक धर्माची वंशावळ वाढू लागली आणि पंथ व अंधश्रद्धा यांची मुले पुन्हा वेगळ्या पद्धतीने विभागून एकमेकात भांडू लागली एकमेकांमध्ये भांडत असताना एकमेकांचे जीव घ्यायलाही कमी करत नव्हती.  भांडता भांडता एकमेकां पासून मनाने दूर दूर जाऊ लागली.  धर्म दोन आणि धर्म तीन …..  मध्ये सुद्धा अनुक्रमे असेच होऊ लागले.  मग कुठल्यातरी धर्मपंथाचा  कुठल्यातरी दुसर्‍या धर्मपंथाच्या वंशजाला म्हणू लागला तू माझ्याकडे ये.  महत्वाचे म्हणजे आपल्या पंथाचे वर्चस्व वाढवण्यासाठी त्याला आपले समर्थक वाढवायचे होते.  त्यामुळे प्रत्येक पंथाचे वंशज वेगवेगळ्या धर्माच्या वंशजांकडे वळून त्या धर्माच्या वंशजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागले.  हे पाहिल्यानंतर काही जण तात्पुरते आपापल्या पंथातल्या मारामाऱ्या थांबवून दुसऱ्या धर्मांच्या बाबत आक्रमक बनू लागले.  अशा तऱ्हेने या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सगळीकडे मारामाऱ्या आणि हिंसाचाराचा उद्रेक झाला.  प्रत्येक पंथाचा व त्या पंथातील प्रत्येकाचा स्वार्थ आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्याची स्पर्धा यामुळे हे  धर्मातले म्हणा किंवा पंथातले म्हणा किंवा त्यांच्या वंशजातले म्हणा आक्रमक होऊन भांडू लागले.  याचे स्वरुप इतके क्लिष्ट होत गेले की नक्की कोण कोणाला मारतो आहे कोण कुणाचा खून करतो आहे काहीच समजेनासे झाले.  

माणुसकी आणि नीती दोघेही बिचारे प्रचंड म्हातारे झाले होते त्यांना हे सगळे आवरता येणे शक्य होईना त्यांनी ठरवले की हा सर्व विनाश आपल्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा आत्महत्या  करणे चांगले परंतु माणुसकी आणि नीती या दोन गोष्टींमुळे आत्महत्या करण्यासाठी त्यांचे मन धजेना.  

कालांतराने  त्यांच्या वंशजातील काही लोकांनी या आपल्या सर्व भांडणाचे  मूळ कारण आपला मूळ पुरुष आहे असा निष्कर्ष काढून त्यांच्यावरच ते चाल करून गेले. माणुसकी आणि नीतीचा खून करू लागले. 

परंतु दुर्दैवाने त्या दोघांनाही इच्छामरणाचा शाप असल्यामुळे त्यांना मरणही येईना आणि जखमा आणि वेदनांमुळे त्यांना जगता ही येईना.  अशीही दुर्दैवी कहाणी माणूसकी आणि नीती यांची केव्हा व कशी संपेल कोण जाणे ?

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print