मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

आई-वडिलांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याकाठी गेलेला श्रावणबाळ परतलाच नाही. मृगयेसाठी पाणवठ्याजवळच्या वृक्षावर अंधारात दबा धरून बसलेल्या राजा दशरथांच्या मरणबाणाला माणूस आणि जनावर यांतील भेद समजण्याचं काही कारण नव्हतं.  पाण्यात बुचकाळल्या गेलेल्या घागरीचा आवाज दशरथांना हरिणाचा आवाज भासला आणि त्यांच्या प्रत्यंचेवरून बाण निघाला….आणि थेट श्रावणाच्या काळजात घुसला तो मृत्यूचा वैशाखवणवा घेऊनच. लाडक्या पुत्राला डोळ्यांनी कधी बघूही न शकलेल्या त्या म्हाता-या काळजांनी महाराज दशरथांना पुत्रविरहाचा शाप अगदी हृदयापासून दिला. आणि मग कर्मधर्मसंयोगाने महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांच्या हृदयाकाशातील राम’चंद्र’ वनवासाच्या काळोखात लुप्त झाला…चौदा वर्षांसाठी….ही दीर्घ अमावस्याच म्हणावी!

महाराज दशरथ पुत्रविरहाच्या वेदनेच्या वाटेवर चालताना लवकरच थकले आणि त्यांची मृत्यूनेच सुटका केली….ईहलोकात रामनाम घेत प्राण सोडणा-यांमध्ये दशरथ सर्वप्रथम ठरले. परंतू महाराणी कौसल्या पुत्रमुख पुन्हा पाहण्यात सुदैवी ठरल्या….त्यांचे पुत्र श्रीराम परतले आणि त्यांच्या सोबतीला गेलेले राणी सुमित्रा आणि दशरथ महाराजांचे सुपुत्र लक्ष्मण सुद्धा!

पण कलियुगातील एका सुमित्रेचे राम परतलेच नाहीत….हिच्यापोटी एक नव्हे तर दोन दोन राम जन्मले होते!

रामयाणात कौसल्येचे श्री राम आणि सुमित्रेचे श्री लक्ष्मण अशी जोडी. पण या सुमित्रेच्या पोटी जणू राम-लक्ष्मण एकापाठोपाठ जन्मले. फरक इतकाच की एक राम आणि दुसरा शरद म्हणून ओळखला जात होता. त्यांना एका भविष्यवेत्त्याने सांगितले होते की तुम्हांला चार मुलगे होतील. अत्यंत भाविक असलेल्या या दांमप्त्याने त्यांच्या या होणार असलेल्या मुलग्यांची नांवे आधीच ठरवून ठेवली होती….राजा दशरथांचे चार पुत्र…..राम,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न! त्यांना पहिला मुलगा झाला…त्याचे नामकरण अर्थातच राम…दुसरा लक्ष्मण! पण तिसरी मुलगी झाली..पौर्णिमा!  म्हणून मग लक्ष्मणाचे नाव बदलून शरद ठेवण्यात आले.

त्रेता युगात यज्ञांना संरक्षण देण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी श्रीराम आणि श्रीलक्ष्मण या दोघाही कुमारांची मागणी केली होती. कलियुगात काळाने अनेक मातां-पित्यांकडे श्रीरामाच्या सुटकेसाठी पुत्रांची मागणी केली.

वर्ष १९९0. महिना ऑक्टोबरचा. दिवाळीच्या आसपासचे दिवस. म्हणजे आजपासून साधारण तेहतीस वर्षांपूर्वीचा काळ. राजस्थानातील बिकानेरमधून कोलकात्यात व्यापारामध्ये आपले नशीब आजमावयला आलेल्या हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्या पोटी जन्मलेले दोन मुलगे असेच रामकार्यासाठी मागितले गेले आणि त्यांनी ते दिलेही. वीस बावीस वर्षांचे हे सुकुमार. १२ डिसेंबरला बहिणीचे लग्न होणार होते. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना या सुकुमारांनी आधी लगीन अयोध्येचे असा चंग बांधला. त्यांनी आई-वडिलांची परवानगी मिळवली. कारसेवा म्हणजे अयोध्येत जाऊन श्रीराम रायाची सेवा अशीच त्या जन्मदात्यांची कल्पना होती. कारण तोवर अयोध्येत असा रक्तरंजित संघर्ष पेटेल याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवाय हे कारसेवक प्रभु श्री रामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांच्यासारखे हाती धनुष्यबाण घेऊन निघालेले नव्हते. यांच्या हाती असणार होते फक्त भगवे ध्वज. हजारो वर्षांपूर्वी ज्या जागी प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला होता, ते पवित्र स्थळ १५२८ मध्ये परकीय आक्रमक बाबरच्या एका सरदाराने, मीर बाकीने नष्ट करून त्यावर मस्जिद उभारली होती…त्याजागी पुन्हा मूळचे राममंदिर उभारण्यासाठी सेवा करायची होती…!

प्रवासादरम्यान दररोज एक पत्र लिहाल अशी अट हीरालाल आणि सुमित्रा यांनी आपल्या या पोरांना घातली. आणि ती त्यांना मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. पोरांनी पळतच जाऊन दुकानातून पोस्ट कार्ड्स आणली आणि त्यावर पत्ते लिहिले…..प्रति,मा.श्री.हिरालालजी कोठारी….बडा बाजार…कोलकाता! काम आटोपून दहा बारा दिवसांत तर परतायचे होते.

दिवाळी संपून चार दिवस झाले होते…दिनांक २२ ऑक्टोबर,१९९०….कोलकात्यातील साथीदारांचे नेतृत्व करीत थोरले रामकुमार आणि धाकटे शरदकुमार अयोध्येकडे प्रस्थान करते झाले. संध्याकाळी सातची रेल्वेगाडी होती….उत्तर प्रदेशातील त्यावेळी मुघल सराय असे नाव असणा-या स्टेशनपर्यंत जाणारी. पण ही गाडी रद्द करण्यात आली. पण हे कारसेवक त्याच रेल्वेस्टेशनवर बसून राहिले….आणि प्रशासनाने रात्री दहा वाजता गुपचूप ती रेल्वे रवाना केली. मुलं पळतच त्या गाडीत शिरली आणि पहाटे मुघल सरायमध्ये पोहचली. तिथून त्यांना खाजगी वाहनातून अयोध्येत नेले जाणार होते.

यांच्या मस्तकात कारसेवा होती आणि मस्तकावर बांधलेल्या पट्टीवर कपाळावर शब्द दिसत होती जय श्री राम! कारसेवकांचा हा जत्था त्या दिवशी रात्री उशिरा रायबरेलीजवळच्या लालगंजपर्यंत पोहोचला. पण इथून पुढे वाहनव्यवस्था उपलब्ध नव्हती. कारण प्रशासनाने प्रवासाची सरकारी साधने रोखून धरली होती. मग एका खाजगी टॅक्सीने हे दोघे आणि त्यांचे एक सहकारी राजेश अग्रवाल आझमगडच्या फुलपूर कसब्यात पोहोचले. येथून पुढे तर रस्ताच बंद केला गेला होता. मग ही जोडगोळी २५ ऑक्टोबरला इतर कारसेवकांसोबत चक्क शेतांतून लपतछपत पायीच अयोध्येकडे निघाली…बहुतांश प्रवास रात्रीच उरकायचा…वाटेत गावकरी देतील ते अन्न स्विकारायचे असा क्रम होता. तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चोख्याची महारी… (संत सोयराबाई) – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

चोख्याची महारी… (संत सोयराबाई) – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते. त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.वारीत पंढरीच्या वाटेनं लाखो पावलं पांडुरंगाच्या भेटीला जातात.  पंढरी जवळ येतेय तसतसा पावलांचा वेग वाढतो. टाळ मृदुंगाच्या नादामधून विठूभेटीची आस पाझरते. अभंगांचे सूर टिपेला पोहचलेले असतात. जातीपंथाचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेनं चालत राहतात. गेली सात-आठशे वर्ष याच वाटेवरून ही पावलं जाताहेत. तेराव्या शतकात सतरा वर्षांच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्माण्याच्या लोखंडी पडद्याआडचं ज्ञान भावार्थ दीपिकेमधून सामान्यजनांच्या भाषेत रसाळपणे मांडलं आणि तो या समतेच्या क्रांतीचा ‘माऊली’ ठरला.

समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यांत नामदेव शिम्पी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती…पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटुंब !तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जातिव्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्याची बायको. निर्मळा त्याची बहीण.

बंका

बंका महार त्याचा मेहुणा आणि कर्ममेळा त्याचा मुलगा. हे अख्खं कुटुंबच जातिव्यवस्थेला प्रश्न् विचारणारं आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण असं की आपला सवतासुभा न मांडता सगळ्यांच्यासोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. म्हणूनच आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते.आधीच महार आणि त्यात बाई, म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली! नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान अचंबित करतं.अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या रायाअसा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईचं स्थान तात्कालिन संतांहून तसूभरही कमी नाही. सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख चोख्याची महारी असा करते.

चोखोबाची बायको

असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. सोयराबाईच्या अभंगांमधून डोकावणारं तत्त्वज्ञान सोपं आहे. त्यात जड शब्द नाहीत. भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे. अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी.. आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा तिचा प्रवास आहे. शुदांच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचिर्भूत होत तो काळ….एक शूद स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वत:च त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. स्वत:शी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत्धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.

सातशे वर्षांपूवीर् सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ‘ब्र’ काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्न्च विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

देहासी विटाळ म्हणती सकळ

आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध

देहीचा विटाळ देहीच जन्मला

सोवळा तो झाला कवण धर्म

सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं. मारही खाल्ला. सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दाशब्दांमधून ठिबकत राहते…

संत सोयराबाई

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले

परी म्या धरिले पदरी तुमच्या

आता मोकलिता नव्हे नित बरी

थोरा साजे थोरी थोरपणे

विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तरं झाली…चामडी लोळवली. हा बहाद्दर पायरीशी उभा राहून थेट विठोबाला ‘जोहर मायबाप जोहार’ म्हणत सवाल करता झाला, सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले.

आमची तो दशा विपरित झाली

कोण आम्हा घाली पोटामध्ये

आमचं पालन करील बा कोण

तुजविण जाण दुजे आता

देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महारांचे स्थान पायरीशी. परमेश्वरही ‘बहुतांचा’ ! पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयरसुतक त्याला कुठे? त्याला दीनांची चाड नाही. हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते.

कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले

आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि

घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे

ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी

सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं.

सुखात हजार वाटेकरी असतात दु:ख तुमचं एकट्याचं असतं, हे तिनं फार साजऱ्या शब्दांत सांगितलंय

अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप

आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.

सुखाचे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी…

हा प्रसिद्ध अभंगही तिचाच.

आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी रांधणारी, घर-संसार सांभाळणारी गृहिणी आहे

अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे

नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे.

साक्षात विठोबाला ती जेवायचं आवतण देते.

विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गावकुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे.

सोयरा- चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. अपत्यप्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते.

आमच्या कुळी नाही वो संतान

तेणे वाटे शीण माझ्या मना..

असं सांगताना उदास असलेली सोयराबाई कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून आली आहे की ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते.                      

धन्य त्या संत सोयराबाई आणि त्यांची अमीट भक्ती … 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बातमी…अशीही…तशीही… (एक कल्पनाविलास) – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ बातमी…अशीही…तशीही… (एक कल्पनाविलास) – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

बातमी…अशीही…तशीही… (एक कल्पनाविलास) 

“दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.” …… 

… जर ही बातमी वेगवेगळ्या लेखकांना लिहायला सांगितली तर ते कशा प्रकारे लिहीतील याची उदाहरणे….. एक कल्पनाविलास 

***

नवकथा

मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.

***

नवकविता

स्टेशनसमोरची रंगहीन टपरी 

पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी 

अंग चोरून पडलेली 

वडे तळणाऱ्या माणसाच्या 

कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब 

ठिबकतायत 

पुढ्यातल्या कढईत 

टप टप टप 

येतोय आवाज 

चुरर्र चुर्र 

ही खरी घामाची कमाई 

पुढ्यातल्या 

टवका गेलेल्या बशीतला 

वडा-पाव खाताना 

त्याच्या मनात येउन गेलं 

उगाचच

***

ललित

दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.

‘वडा-पाव द्या हो एक’ मी म्हटलं.

‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!

***

शामची आई व्हर्जन

‘शाम, बाळ खा हो तो वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!’

***

जी. ए. कुलकर्णी व्हर्जन

रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.

***

गो. नि. दांडेकर व्हर्जन

हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?

***

ग्रेस व्हर्जन

विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा !

मूळ लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अधिकमास म्हणजे काय? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अधिकमास म्हणजे काय? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

अधिक मासाविषयी…

अधिकमास  म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?

सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा  उत्तम असा मेळ घातलेला  आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे “अधिक मास” व कमी झालेला  जो महिना असतो  त्याला “क्षयमास” असे म्हटले जाते. 

सूर्य एका राशीमधे असताना.  जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना  जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा 

निजमास असतो. 

ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास . 

या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.

अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध  काय?

तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात. 

आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.

म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे. 

आता प्रत्येक वर्षात  ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी होतात.

आणि ३३ तिथी  ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या  महिन्यालाच

अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात. 

दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त 

३४ महिने अंतर असते. 

आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?

तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत  म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.

अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?

याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते. 

या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे  या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी

झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला

व आपली निराशा सांगितली

श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.

श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे  “पुरुषोत्तम मास”

असे नांव ठेवले. आणि  सांगितले  हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व  त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल. 

म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.

अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा. 

(अनारसे, बत्तासे, मेसूर)

वेदकालातही 

“न पूयते विशीयंति” इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.

गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे “अनरसा” 

अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.

विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार  करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.  

म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.

किती महिने अधिक येतात?

सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात. 

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे  ९ महिने अधिक येतात. 

मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.

राहिला उर्वरीत माघ महिना.  हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.

आता क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.  

आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.

संदर्भ–  श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४— ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः । 

शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌ ॥ ४-२१ ॥ 

*

संयम ज्याचा चित्तेंद्रियांवर त्याग सकल भोगांचा

कर्म करितो सांख्ययोगी नाही  धनी पापाचा ॥२१॥

*

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः । 

समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥ 

*

प्राप्त त्यावरी संतुष्ट भावद्वंद्वाच्या पार अभाव ईर्षेचा

सिद्धावसिद्ध समान कर्मयोगी बंध त्यास ना कर्मांचा ॥२२॥

*

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । 

यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥ 

*

मुक्त आसक्ती नष्ट देहबुद्धी यज्ञास्तव केवळ कर्म 

जीवनात आचरले तरीही विलीन होते त्याचे कर्म ॥२३॥

*

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्‌ । 

ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥ 

*

यज्ञी ज्या यजमान ब्रह्मरूप अर्पण ब्रह्म हवि ब्रह्म  

ब्रह्मकर्मस्थित योग्यासी अशा  फलप्राप्ती केवळ ब्रह्म ॥२४॥

*

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते । 

ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥ 

*

देवतापूजनास  काही योगी यज्ञ जाणती

तयात करुनी अनुष्ठान उत्तम यज्ञ करिती 

अभेददर्शन परमात्म्याचे कोणा होई अग्नीत 

आत्मारूप यज्ञाचे  ते यज्ञाद्वारे हवन करित ॥२५॥

*

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति । 

शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥ 

*

हवन करिती कर्णेंद्रियांचे संयमाच्या यज्ञात

शब्दादी विषयांचे हवन इंद्रियरूपी यज्ञात ॥२६॥

*

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे । 

आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥ 

*

कोणी होउन ज्ञानप्रकाशे इंद्रिय-प्राण कर्मांच्या 

हवन करिती अग्नीत आत्मसंयमरूपी योगाच्या ॥२७॥

*

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे । 

स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥ 

*

मनी धरून द्रव्य लालसा कोणी करिती यज्ञ

काही सात्विक भाव समर्पित करीत तपोयज्ञ

अन्य योगी  योगाचरती करिती योगरूपी यज्ञ

व्रत आचरुनी स्वाध्याने काही  करिती ज्ञानयज्ञ  ॥२८॥

*

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे । 

प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥ 

*

अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति । 

सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥ 

*

कोणी योगी प्राणवायुचे हवन करिती अपानवायूत

अन्य तथापि अपानवायू हवन करिती प्राणवायूत

आहार नियमित ते करिती निरोध प्राणापानाचे

त्यांच्या करवी हवन होते प्राणामध्ये प्राणाचे

समस्त योगी असती साधक अधिकारी ते यज्ञाचे 

पुण्याचे अधिकारी सारे उच्चाटन करिती पापांचे ॥२९-३०॥

– क्रमशः भाग ४ 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ✹ Teachers… ✹ ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ✹ Teachers… ✹ ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतोय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.

त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.

तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God..Another is Teacher! ते दोघेही खोटं बोलत नसतात.. मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन…” अशी अॅपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.

प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले. तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा? जाने दो उसे…’ वऱ्हाडकरांचे टीचर नावाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.

कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना.

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी. – लेखक : श्री नितीन पालकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी. – लेखक : श्री नितीन पालकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी.

  • एक दगडी खांब (एडवर्ड पिलर).
  • एक अपूर्ण नकाशा.
  • एक प्राचीन ग्रंथ (स्कंद पुराण).
  • आणि एक दैवी योगायोग.

१९०२, अयोध्या

फक्त ‘एडवर्ड’ नावाचा ब्रिटीश अधिकारी स्कंद पुराणावर आधारित अयोध्येतील सर्व १४८ तीर्थस्थानांचे सर्वेक्षण करतो. प्रत्येक तीर्थ स्थानामध्ये क्रमांकासह दगडी पाट्या (स्तंभ) उभारून तो त्याच्या संरक्षणाची सूचना देतो.

“हे खांब कोणी हटवल्यास 3000 रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा दिली जाईल.”

११७ वर्षांनंतर हे स्तंभ भारताच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावतील याची कोणाला कल्पनाही नव्हती.

२००५, लखनौ

वकील पी.एन.मिश्रा हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यासोबत लखनौहून कलकत्त्याला कारने जात होते. ते  रस्ता चुकतात आणि अयोध्येला पोहोचतात.

अयोध्येत, त्यांना एका साधू भेटतो आणि संभाषणाच्या दरम्यान, ते अयोध्येत किती तीर्थस्थळे आहेत हे विचारतात.

साधू उत्तर देतात – अयोध्येत १४८  तीर्थस्थळे आहेत.

पी.एन.मिश्रा साधूला विचारतात की त्यांना अचूक संख्या कशी माहित आहे. साधू त्यांना सांगतो की १९०२ मध्ये एडवर्ड नावाच्या एका ब्रिटिशाने या सर्व १४८ ठिकाणी खांब उभारले होते. मग साधू पुढे सांगतात की १९८० मध्ये हंस बकर नावाचा इतिहासकार अयोध्येत कसा आला, त्याने सर्वेक्षण केले, शहराबद्दल एक पुस्तक लिहिले आणि अयोध्येचे ५ नकाशे तयार केले.

आश्चर्यचकित झालेले पी.एन.मिश्रा त्यांना एडवर्डने उभारलेले ते दगडी पाट्या (स्तंभ) दाखवायला सांगतात. तिथे त्यांना एक मनोरंजक ‘स्टोनबोर्ड’ दिसला –

Pillar #100.

Pillar #100 हा गणपतीच्या मूर्तीसह ८ फूट खोल विहिरीत होता .

स्तंभ पाहिल्यानंतर पी.एन.मिश्रा कलकत्त्याला रवाना झाले.

२०१९, भारताचे सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी खटल्याची कार्यवाही सुरू आहे. भगवान रामाच्या जन्माचे नेमके स्थान सिद्ध करण्यासाठी हिंदूंना अडचण येत आहे.

बाबरी मशिदीच्या खाली १२व्या शतकातील मंदिर असल्याचे  The Archaeological Survey of India (ASI) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अहवालात सिद्ध झाले, परंतु ते भगवान राम यांचे नेमके जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्यात अहवाल अपयशी ठरला.

भारताच्या सरन्यायाधीशांनी  विचारले,  “रामाच्या जन्माचे नेमके स्थान सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का?”. 

पी.एन.मिश्रा, जे ‘संत समाजा’चे वकील आहेत त्यांनी उत्तर दिले “होय, स्कंद पुराणात तसे पुरावे उपलब्ध आहेत.”

स्कंद पुराण हा प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे. हा प्राचीन दस्तऐवज आहे ज्यामध्ये हिंदू तीर्थक्षेत्रांच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती आहे. येथे सर्व हिंदू तीर्थ स्थानांची भौगोलिक स्थाने आहेत.

भगवान रामाच्या जन्मस्थानाचे नेमके स्थान वैष्णव खंड / अयोध्या महात्म्यामध्ये नमूद केले आहे.

त्यात म्हटले आहे “सरयू नदीच्या पश्चिमेस विघ्नेश्वर आहे, या स्थानाच्या ईशान्येस भगवान रामाचे जन्मस्थान आहे – ते विघ्नेश्वराच्या पूर्वेस, वसिष्ठाच्या उत्तरेस व लौमासाच्या पश्चिमेस आहे”

सरन्यायाधीश म्हणाले,   “स्कंद पुराणात वापरलेली भाषा आम्हाला समजू शकत नाही. आम्हाला समजू शकेल असा काही नकाशा तुमच्याकडे आहे का?

पी.एन.मिश्रा:  “होय. इतिहासकार हंस बकर यांचे एक पुस्तक आहे ज्यामध्ये नकाशे आहेत जे एडवर्ड स्टोनबोर्ड्स (स्तंभ) च्या आधारे तयार केले गेले होते, जे स्कंद पुराणाच्या आधारावर बन ले गेले होते.

सरन्यायाधीशांनी पी.एन.मिश्रा यांना ताबडतोब नकाशासह पुस्तक जमा करण्यास सांगितले.

या नव्या पुराव्यामुळे कोर्टात खळबळ उडाली. 

  • स्कंद पुराणममध्ये जन्मस्थानाच्या अचूक स्थानाचा उल्लेख आहे.
  • एडवर्डने स्कंद पुराणाच्या आधारे १४८ दगडी पाट्या उभारल्या.
  • हंस बेकरने त्या १४८Stone Bords (दगडी पाट्यां)च्या आधारे नकाशा तयार केला.

त्यामुळे हे दोन्ही पूर्ण परस्परसंबंधी  होते… पण एक अडचण होती…

स्कंद पुराणात भगवान रामाचे नेमके जन्मस्थान विघ्नेशच्या ईशान्येला आहे हे लिहिले आहे, परंतु हंस बेकरने जो नकाशा तयार केला होता त्यावर फार स्पष्टपणे चिन्हांकित केलेले नाही. त्यामुळे त्या नकाशावरून भगवान रामाच्या जन्मस्थानाचे स्थान तंतोतंत जुळत नव्हते.

आणि मग या खटल्यातील स्टार साक्षीदार – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांसाग प्रवेश झाला.

पी.एन.मिश्रा यांनी शंकराचार्यांना बोलावून हे गूढ उकलण्यास सांगितले.

शंकराचार्यांनी अयोध्येला भेट देऊन  हे गूढ उकलले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे  साक्षीदार  क्रमांक वादीचा साक्षीदार २०/०२ (Defense Witness 20/02) होते. स्कंदपुराणममध्ये नमूद केलेले ‘विघ्नेश’ हे हंस बकर यांच्या नकाशात दाखवलेले विघ्नेश्‍वर मंदिर नाही, अशी माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

त्याऐवजी, विघ्नेश हा स्तंभ क्रमांक १०० आहे जेथे विहिरीच्या आत गणेशाची मूर्ती (ज्याला विघ्नेश असेही म्हणतात) आहे.

जेव्हा आपण स्तंभ #१०० विघ्नेश म्हणून घेतो तेव्हा गूढ उकलले जाते.

स्तंभ #१०० ची ईशान्य तीच जागा आहे जिथे हिंदूंचा दावा आहे की भगवान राम यांचा जन्म झाला; आणि ते स्थान इतर सर्व ओळख निकषांना/खुणांना  देखील पूर्ण करते.

न्यायमूर्ती चंद्रचूड हसले आणि म्हणाले, “या लोकांनी राम जन्माचे अचूक स्थान सिद्ध केले आहे.”

अविमुक्तेश्वरानंद यांच्या साक्षीने केस बदलली आणि मुस्लिमांना लक्षात आले ते केस हरले आहेत.  त्यांची केस वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शंकराचार्यांची साक्ष चुकीची असल्याचे सिद्ध करणे.

मुस्लिमांच्या वकिलांनी  शंकराचार्यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी मागितली.

मुस्लिमांचे १५  वकील पुढील १०  दिवस अविमुक्तेश्वरानंद यांची उलटतपासणी घेत होते.  शंकराचार्यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक आणि चोख उत्तरे दिली. पाचही न्यायाधीश त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक  ऐकत होते.

१०  दिवसांनंतर, मुस्लिमांच्या वकिलांनी  प्रतिवाद संपवला. 

अशा प्रकारे, स्कंद पुराण, एडवर्डचे स्टोनबोर्ड (पिलर्स), हंस बेकर नकाशा आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या साक्षीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला!

के.के. मुहम्मद यांच्या ASI अहवालामुळेच आपल्याला राम मंदिर मिळाले असे बहुसंख्य हिंदूंना वाटते. The Archaeological Survey of India (एएसआय) च्या अहवालाने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी या प्रकरणातील निर्णायक टप्पा, प्राचीन ग्रंथ – स्कंद पुराण आणि आपले  धार्मिक गुरु, ज्यांनी या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यातील सत्याची उकल केली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात ‘स्कंद पुराण’ हे नाव ७७ वेळा आले आहे.

२००९ पर्यंत हिंदू न्यायालयात खटला हरत होते. त्यानंतर शंकराचार्यांनी २००९  मध्ये वकील पी.एन.मिश्रा यांची नियुक्ती केली.

पी.एन.मिश्रा म्हणाले की, जर ते २००५ मध्ये रस्ता चुकले नसते  आणि जर तो साधू भेटला नसता, तर ते कोर्टात भगवान रामाचे जन्मस्थान कदाचित  सिद्ध करू शकले नसते.

मला खात्री आहे की हा एक  दैवी योगायोग होता.

जय श्री राम !!! 

आधार :

https://en.wikipedia.org/wiki/Hans_T._Bakker#:~:text=Bakker%20(born%201948)%20is%20a,%2C%20Language%20and%20the%20State%22  

हंस बेकर (जन्म 1948) हे एक सांस्कृतिक इतिहासकार आणि भारतशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी ग्रोनिंगेन विद्यापीठात हिंदू धर्माच्या इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी ब्रिटिश म्युझियममध्ये “Beyond Boundries: Religion, Region, Language and the State” या प्रकल्पात संशोधक म्हणूनही  काम केले आहे.

लेखक : श्री नितीन पालकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जो लौट के घर ना आए… – लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

जो लौट के घर ना आए… – लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

गेल्या महिन्यात आम्ही दीव-सोमनाथ-द्वारका अशी सहल करून आलो. कोणत्याही सहलीपूर्वी त्या-त्या ठिकाणांची थोडीफार माहिती वाचूनच आम्ही निघतो. त्यामुळे, दीवमध्ये भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. खुकरी या जहाजाचे स्मारक असल्याची माहिती मला नव्यानेच समजली. 

डिसेंबर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ‘आय.एन.एस. खुकरी’ हे जहाज बुडाले होते. त्या वेळी मी सातारा सैनिक शाळेत शिकत होतो. एके दिवशी, सकाळच्या असेंब्लीमध्ये आमचे प्राचार्य, लेफ्टनंट कर्नल पुरी यांनी आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी, सबलेफ्टनंट अशोक पाटील याला श्रद्धांजली वाहिली होती. ‘आय. एन.एस. खुकरी’ सोबतच जलसमाधी मिळून तो हुतात्मा झाल्याची कथा आमच्या एका सरांनी नंतर आम्हाला सांगितली होती. यंदाच्या सहलीनिमित्ताने या दुःखद घटनांची उजळणी तर झालीच, पण त्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावी असेही मला वाटले. 

१९५९ साली, भारतीय नौदलाने इंग्लंडकडून तीन पाणबुडीप्रतिरोधक ‘फ्रिगेट’ जहाजे विकत घेतली होती. खुकरी, कृपाण, आणि कुठार अशी नावे त्या जहाजांना देण्यात आली. शत्रूच्या पाणबुडीचा माग काढण्यासाठी वापरली जाणारी ‘सोनार’ यंत्रणा त्या जहाजांमध्ये बसवलेली होती. त्यामुळे, अडीच किलोमीटर परिघाच्या आत असलेल्या शत्रूच्या एखाद्या पाणबुडीचे नेमके ठिकाण निश्चित करून तिला उडवणे शक्य होते. पण त्या ‘सोनार’ यंत्रणेची २५०० मीटर ही क्षमता खूपच कमी होती. त्या काळी त्याहून अधिक पल्ल्याच्या ‘सोनार’ यंत्रणा उपलब्ध होत्या. भारताने इंग्लंडला विनंती केलीही होती की किमान मध्यम पल्ल्याची ‘सोनार’ यंत्रणा तरी आम्हाला दिली जावी. परंतु, इंग्लंडने साफ नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की फक्त नाटो करार केलेल्या देशांनाच ती यंत्रणा ते देऊ शकत होते. भारत तटस्थ राष्ट्र असल्याने भारताला ती मिळू शकणार नव्हती. संरक्षण साधनांच्या बाबतीत आत्मनिर्भर असण्याचे महत्व तत्कालीन राज्यकर्त्यांना समजले असेल, किंवा नसेलही. परंतु, पुढे डिसेंबर १९७१ मध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने ते ठळकपणे अधोरेखित झाले.  

२३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने आणीबाणीची घोषणा केल्यानंतर भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागले. भारताची सशस्त्र दले तेंव्हापासूनच संपूर्णपणे सज्ज होती. पाकिस्तानी नौदलाचे मुख्यालय आणि पुष्कळशा युद्धनौका कराची बंदरामध्ये होत्या. त्यामुळे तिथे पाकिस्तानने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दीवजवळच्या ओखा बंदरापासून कराची बंदर खूप जवळ होते. तेथूनच कराची बंदरात होणाऱ्या सर्व हालचालींवर भारतीय नौदलाची बारीक नजर होती.  

३ डिसेंबर १९७१ च्या संध्याकाळी पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले. भारतीय नौदलानेही तातडीने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ ही पूर्वनियोजित मोहीम हाती घेतली. ‘निःपात’, ‘निर्घात’ आणि ‘वीर’ नावाच्या तीन मिसाईल बोटी, सोबत ‘किलतान’ व ‘कच्छल’ नावाच्या दोन पाणबुडीप्रतिरोधक ‘कॉर्वेट’ बोटी, आणि ‘पोषाक’ नावाचे एक तेलवाहू जहाज, अशा सहा जहाजांच्या गटाने ४ डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर जबरदस्त हल्ला चढवला. पाकिस्तानी नौदलाची तीन मोठी जहाजे, व एक मालवाहू जहाज बुडाले आणि कराची बंदरात असलेला संपूर्ण तेलसाठा नष्ट झाला. 

‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवणाऱ्या सहा बोटींच्या पाठीशी भारतीय नौदलाच्या पश्चिमी कमांडचे संपूर्ण आरमार समुद्रात सज्ज होते. परंतु, पाकिस्तानी नौदलाची ‘हंगोर’ नावाची एक पाणबुडी अरबी समुद्रात गुपचूप संचार करत होती. खरे पाहता, भारतीय जहाजांच्या हालचालींचा सुगावा लागताच ‘हंगोर’ ने पाकिस्तानी नौदलाला रेडिओवरून त्याची माहिती दिली होती. परंतु, त्या माहितीचा काहीही उपयोग होण्याच्या आतच भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ यशस्वीपणे राबवले होते. 

पाकिस्तानी नौदलाच्या ‘हंगोर’ पाणबुडीने घाईघाईत पाठवलेला तो रेडिओ संदेश भारतीय नौदलानेही टिपला होता. त्यामुळे हे समजले होते की भारतीय किनाऱ्याजवळ शत्रूची एक पाणबुडी कार्यरत आहे. त्या पाणबुडीला शोधून नष्ट करण्यासाठी आय.एन.एस. ‘खुकरी’ व आय.एन.एस. ‘कृपाण’ ही जहाजे अरबी समुद्रात फिरत होती. 

पाकिस्तानी नौदलाने १९६९ च्या सुमारास फ्रेंचांकडून तीन पाणबुड्या विकत घेतल्या होत्या. ‘हंगोर’ ही त्यापैकीच एक. ‘डॅफने’ क्लासच्या त्या अत्याधुनिक पाणबुड्यांमधील ‘सोनार’ यंत्रणेचा पल्ला होता २५००० मीटर, म्हणजेच ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ जहाजांमधल्या सोनार यंत्रणेच्या दहा पट! त्यामुळे, ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ जेंव्हा ‘हंगोर’च्या मागावर निघाल्या तेंव्हाच दैवाचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली होती. ‘हंगोर’ ची शिकार करायला आलेली आपली दोन जहाजे नकळतपणे स्वतःच ‘हंगोर’ चे सावज बनलेली होती. 

९ डिसेंबर १९७१च्या त्या काळरात्री, दोन्ही जहाजांच्या हालचाली शांतपणे टिपत ‘हंगोर’ पाण्याखाली दबा धरून बसलेली होती! 

आपल्या दिशेने येत असलेली दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या युद्धनौकाच असल्याची खात्री पटताच, ‘हंगोर’ने त्यांच्या दिशेने एकापाठोपाठ एक असे तीन टॉर्पेडो (पाण्याखालून मारा करणारे बॉम्ब) सोडले. पहिला टॉर्पेडो  ‘कृपाण’च्या खालून निघून गेला, पण तो फुटलाच नाही. 

आपल्या दिशेने कुठूनतरी टॉर्पेडो मारला गेल्याचे ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ च्या कप्तानांना समजले. परंतु, तो हल्ला करणाऱ्या पाणबुडीचे नेमके ठिकाण त्यांना कळायच्या आतच दुसऱ्या टॉर्पेडोने ‘खुकरी’च्या दारुगोळ्याच्या कोठाराचा वेध घेतला. एक जबरदस्त स्फोट होऊन ‘खुकरी’ दुभंगली. तिसरा टॉर्पेडो ‘कृपाण’ च्या दिशेने येत होता. परंतु, ‘कृपाण’ ने अचानक दिशा बदलून वेग वाढवल्यामुळे तिचे फारसे नुकसान झाले नाही. 

‘खुकरी’ फुटताच, तिच्यासोबत आपल्या अनेक शूर सैनिकांना जलसमाधी मिळणार याचा अंदाज, ‘खुकरी’ चे सर्वेसर्वा, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना आला. अवघ्या काही मिनिटांचाच अवधी हातात होता. बोटीच्या आत कार्यरत असलेल्या अधिकारी व नौसैनिकांना आपला जीव वाचवण्यासाठी तो अवधी अत्यंत अपुरा होता. कॅप्टन मुल्ला जहाजाच्या सर्वात वरच्या भागात, म्हणजे ‘ब्रिज’वर होते. त्या कठीण परिस्थितीत धीरानेच, परंतु अतिशय तत्परतेने, जहाज सोडण्याचा आदेश ते रेडिओद्वारे सर्वांना देत होते. “जाओ, जाओ” हे त्यांचे रेडिओवरचे शब्द ‘हंगोर’च्या पाकिस्तानी रेडिओ ऑपरेटरने टिपले होते, असे पाकिस्तानी युद्ध अहवालातसुद्धा नमूद केलेले आहे. 

जहाजाच्या ब्रिजवर असलेले दोन अधिकारी, लेफ्टनंट कुंदन मल आणि लेफ्टनंट मनू शर्मा यांच्या हाती स्वतः लाईफ जॅकेट कोंबून, कॅप्टन मुल्लांनी त्यांना अक्षरशः बाहेर ढकलले. कॅप्टन मुल्लांनीही त्यांच्यासोबत पाण्यात उडी घ्यावी असे लेफ्टनंट मनू शर्मा वारंवार सुचवत होते, परंतु कॅप्टन मुल्लांनी स्पष्ट नकार दिला. 

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, तत्कालीन लेफ्टनंट मनू शर्मा यांनी ‘खुकरी’ च्या अखेरच्या दृश्याचे वर्णन केले आहे. आपण ते दृश्य जर आज डोळ्यासमोर आणले तर निश्चित आपल्या डोळ्यात पाणी उभे राहील, पण त्याचबरोबर आपली छाती अभिमानाने भरूनही येईल !

हळूहळू पाण्याखाली जात चाललेल्या ‘खुकरी’ च्या ब्रिजवर कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला शांतपणे उभे होते! 

‘हाताखालचा शेवटचा नौसैनिक जोवर सुखरूप बाहेर पडत नाही तोवर कप्तानाने जहाज सोडायचे नाही’ हे नौदलाचे ब्रीद, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला शब्दशः ‘जगले’ होते!

भारत सरकारने मरणोपरांत महावीर चक्र देऊन, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचा यथोचित सन्मान केला. आपल्या कप्तानाचा शेवटचा आदेश ऐकून ज्यांनी समुद्रात उडी घेतली असे ६७ जीव वाचले. कित्येकांना तो आदेश पाळण्याइतकीही सवड मिळाली नाही. 

‘आय.एन.एस. खुकरी’ आणि कॅप्टन मुल्लांसोबत जलसमाधी घेतलेल्या १८ अधिकारी व १७६  नौसैनिकांची नावे दीव येथील ‘खुकरी  स्मारका’वर सुवर्णाक्षरात लिहिलेली आहेत. त्यातच आमच्या शाळेचा सुपुत्र, सबलेफ्टनंट अशोक गुलाबराव पाटील याचेही नाव आहे. त्या सर्व वीरांना सलामी देऊनच मी धन्य झालो. 

तुम्हीही कधी दीवला गेलात तर त्या वीरांपुढे नतमस्तक व्हायला विसरू नका !

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री राममूर्ती प्रतिष्ठापना… ☆ सौ. राधिका गोपीनाथ पंडित ☆

सौ. राधिका गोपीनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री राममूर्ती प्रतिष्ठापना… ☆ सौ. राधिका गोपीनाथ पंडित 

कुरूकवाडे…. कुलकर्णी, पंडित परिवारात रामराज्य सुरू झाले…… 

धुळे जिल्ह्यातील कुरुकवाडे येथील श्रीराम मंदिरात आणि समाधी मंदिरात पाऊल ठेवलं. अतिशय रेखीव, अप्रतिम पंचायतन मूर्ती बघून डोळ्यांचे पारणं फिटलं. डोळ्यात आनंदाश्रूनी गर्दी केली. समस्त कुरुकवाडेकर, पंडित, कुलकर्णी परिवाराची श्रद्धा, भक्ती, सढळ हाताने निर्मळ मनाने दिलेली देणगी, फळाला आली आणि राम दरबार सजला. मनात आलं उत्कट श्रद्धेचं रामराज्य यापेक्षा वेगळे ते काय असणार ? सासरच्या मूळ गावाचा, मूळ पुरुषाचा, कुलस्वामिनीचा अभिमान मनात दाटून आला.

कार्यक्रमाला सुरुवात झाली दिनांक 19 -8 -2023 पासून कलशात सप्त नद्यांचे पाणी घेऊन 11 जोड्या समस्त गावकऱ्यांसह सुवासिनींसह अनवाणी पायाने खेड्यातील दगड धोंडे ओलांडत धमणे वेशीपासून भक्ती-भावानी  मिरवणुकीसह निघाल्या. मनात अहिल्येची श्रद्धा, शबरीची भक्ती मावत नव्हती. रथयात्रा पुढे पुढे चालली होती. गावातल्या सुवसिनी सजल्या होत्या. रथमार्गावर सडा, रांगोळी, प्रत्येक घरावर गुढ्या तोरणं पताका लहरत होत्या. आसमंतात एकच निनाद निनादत होता… “श्रीराम जय राम जय जय राम.”

कुरूकवाडे मंदिरात श्री विष्णू श्रीराम सीता आले. लक्ष्मण हनुमानाचे आगमन झाले.. मूर्ती मंदिरात प्रवेशत्या झाल्या. 3 होम कुंडाची, होमहवनाची  जय्यत तयारी झाली होती.

एक नवीन माहिती मिळाली. जयपुरला छिन्नीद्वारे आघात करून मूर्ती आकाराला आणतांना शस्त्र वापरावी लागतात. त्यासाठी प्रतिष्ठापनेआधी कुटीरयाग होम करावा लागतो. तो प्रथम साग्रसंगीत करण्यात आला. 

नंतर प्रथम संस्कार झाला तो धान्य-संस्कार. हा संस्कार करतांना गावकऱ्यांनी यथामती, यथाशक्ती धान्य आणून दिलें. हां हां म्हणता म्हणता धान्याच्या राशी जमल्या. श्रीराम, सीता, लक्ष्मण तांदुळात विराजमान झाले. तर श्रीगणेश, श्री विष्णू, पादुका गव्हात स्थानापन्न झाले. धान्याचा प्रत्येक दाणा दाणा श्री पंचायतनाच्या पदस्पर्शाने पावन झाला. 

कौतुकाची गोष्ट म्हणजे आमचा बराचसा पंडित परिवार, अत्यन्त श्रद्धेने दिनांक 27 रोजी कुरुकवाडे येथे हजर झाला होता. मीनाताईंनी मला त्या धांन्यातल्या पवित्र अक्षता दिल्यावर मी  समस्त पंडित परिवाराला त्या वाटून दिल्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, श्रद्धा, भक्ती बघून खूप समाधान वाटले.

धान्य यागानंतर झाला जलनिवास. 108 जडीबुटींनी सप्त नद्यांच्या जल संचयाने यथासांग स्नान घालून मूर्ती  पाण्यामध्ये ठेवल्या गेल्या.

त्यानंतर झाला शयन-याग. मूर्ती फुलांच्या बिछान्यावर मऊ गालीच्या वर झोपवण्यात आल्या. अतिशय नयनरम्य सोहळा होता तो. धान्य याग, जलस्नान, शयनयाग झाल्यानंतर होमहवनानंतर यथासांग प्राणप्रतिष्ठा झाली. आणि त्यानंतर अतिशय नयनरम्य, आनंदाने अंगावर रोमांच उभे राहतील असा पंधरावा, अत्यंत पवित्र असा संस्कार साजरा झाला आणि तो म्हणजे लग्न संस्कार. विवाह सोहळा, अंतरपाट मंगलाष्टकांनी, मंगल वाद्यांनी हा रम्य संस्कार गावकऱ्यांनी जल्लोषात धूमधडाक्यात साजरा केला. गदिमांचे गीतस्वर उमटले, ” स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे.”… नंतर झाली पूर्णाहुती, आरती.

रोज भजन, कीर्तन, रामायण चालू असताना हौशी कलाकार श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या वेशात एन्ट्री करत होते. राम भक्त हनुमानाचा रोल केलेला उत्साही कलाकार ही मागे नव्हता. त्यामुळे सुरस रामायणाला सुरम्य शोभा आली होती. सळसळत्या उत्साहाने नाचत असलेले कुरूकवाडेकर श्रीराममय झाले होते. आनंदाने नाचत म्हणत होते ” सीतावर रामचंद्र की जय.”

28 रोजी कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता झाली. श्री आप्पा कुलकर्णी व भगिनी परिवारांनी श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या मूर्तीवर छत्री चढवली.  मूर्तीच्या चेहऱ्यावरची सात्विकतेची तेजोवलये आणखीनच विकसित झाली.

या सोहळ्यासाठी सगळ्या लोकांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यात श्री आप्पाच्या भगिनींचा  पण फार मोठ्ठा हातभार होता. महाप्रसादाचा लाभ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही समस्त पंडित परिवार कुरवाडेकर व कुलकर्णी परिवाराचे अत्यंत आभारी आहोत.

कुरूकवाडे, पंडित व कुलकर्णी परिवारांचा मुख्य सूत्रधार व आमचा प्रतिनिधी म्हणून श्री. अप्पा कुलकर्णी यांचा ह्यात फार मोठ्ठा आणि अत्यंत मोलाचा असा सिंहाचा वाटा आहे.

मोठ्या मनाचे आणि पडद्यामागचे कलाकार असलेले श्री अप्पा कुलकर्णी मोकळ्या मनाने गावकऱ्यांना मोठेपणा देऊन म्हणतात, “मी काहीच केलं नाही, हे सगळं गावकऱ्यांमुळे झालं.”

कार्याचे सूत्र, नेतृत्व, योग्य दिशा दाखवण्याचं मोठं काम श्री आप्पांनीच केलं आहे हे मान्य करावेच लागेल. एवढा मोठा पवित्र सोहळा पार पडतांना श्री आप्पांना त्यांच्या धर्मपत्नी व आमच्या सूनबाईने सौ. अलकाने उत्तम साथ दिली. शांत हसतमुख, सोज्वळ  चेहरा, आल्या गेल्यांचे स्वागत करतांनाचं अगत्य पाहून ती साक्षात अन्नपूर्णाच भासत होती.

क्षमस्व. जागेअभावी सगळ्यांची नावे मी नाही लिहू शकले. पण सगळ्यांचेच हातभार लागले आणि  सगळ्यांचेच आम्ही अत्यंत आभारी आहोत. कारण, ‘याची देही याची डोळा.’ असा हा सुंदर सोहळा तुमच्या सगळ्यांमुळेच आम्हाला लाभला आहे.

मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जयपूरला मूर्ती आणण्यासाठी गेलेली मंडळी सांगतात, जयपूरहून मूर्ती आणतांना त्यात जडत्व जाणवत होतं. दोन-चार जणांना हातभार लावावा लागला होता. पण त्याच मूर्ती प्रतिष्ठापना करताना अत्यन्त हलक्या भासल्या. इतकं त्यात दैवत्व आलं होतं की एका माणसाने सहज त्या उचलल्या. या भाग्यवान मंडळींना माझा मनापासून दंडवत..

आमचे कनिष्ठ चिरंजीव प्रसाद गोपीनाथ पंडित याच्यामुळेच आप्पा आणि आमच्यात ओळख होऊन कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला. आणि समस्त पंडित परिवाराचा धागा कुरुकवाडे कुलकर्णींशी जोडला गेला. चि. प्रसादला तुमच्या कडून शुभेच्छा शुभचिंतन शुभाशीर्वाद मिळावा ही श्रीरामा जवळ कुलस्वामिनी जवळ आणि तुमच्याकडे प्रार्थना. 

इतर पंडित परिवाराने कुठलाही किंतु मनात न ठेवता सढळ हाताने निरपेक्ष मनाने श्री.अप्पाकडे देणग्या पाठवल्या ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

© सौ. राधिका गोपीनाथ पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुझी राख धुंडाळताना !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तुझी राख धुंडाळताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्यादिवशी रडता नाही आलं,राजा ! माझं बापाचं काळीज देहाच्या आत होतं… क्षत विक्षत. आणि माझा देह जबाबदारीच्या वस्त्रांनी पुरता झाकलेला होता. डोळ्यांवर कातडं नाही ओढून घेता येत. डोळ्यांना पहावंच लागलं तुझ्याकडे. आणि मी पहात राहिलोही एकटक…. आणखी काही क्षणानंतर हे पाहणंही थांबणार होतं.

तुझ्या पलटणीचा मी प्रमुख. पलटणीतील सारेच माझे बच्चे. माझ्या एका इशाऱ्यासरशी मरणावर झेप घेणारे सिंहाचे छावे… वाघाचे बछडे. तू तर माझ्या रक्ताचा अंश. माझ्याच पावलांवर हट्टाने पाऊल टाकीत टाकीत थेट माझ्याच पंखांखाली आला होतास. कोणतीही मोहिम असू देत… तुला कधी मागे रेंगाळताना पाहिलं नाही. उलट पलटणीच्या म्होरक्याचा पोरगा म्हणून तू पुढेच सरसावयचा सर्वांआधी… बापाला कुणी नावे ठेवू नये म्हणून. 

आतापर्यंत तू प्रत्येकवेळी परत आला होतास दुश्मनांना यमसदनी धाडून. एखाद्या मोहिमेत आपल्यातलं कुणी कामी आल्याची बातमी यायची तेंव्हा धस्स व्हायचं काळजात. गोळी काही नातं विचारून शिरत नाही शरीरात. असे अनेक प्रसंग आले आयुष्यात जेंव्हा सैनिकांच्या मृतदेहांवर पुष्पचक्र अर्पण करावे लागले…. पूर्ण गणवेशात ! तूही असायचास की मागच्या एखाद्या रांगेत. तुझ्याच एखाद्या साथीदाराच्या शवपेटीला तुलाही खांदा द्यावा लागायचा. 

मी समोर आलो की तू  मला अधिक त्वेषाने सॅल्यूट ठोकायचा…. आणि मला ‘सर’ म्हणायचा. तुझ्या तोंडून ‘पपा’ अशी हाक ऐकल्याला खूप वर्षे उलटून गेली होती. लहानपणी तुझा सहवास नाही मिळाला तसा… मी सतत सीमेवर असायचो आणि तू तुझ्या आईसोबत दूरच्या गावी. बढती झाली आणि पलटणीत कुटूंब आणायची मुभा मिळाली तर तू सैनिक व्हायला निघून गेलास. परत आलास ते रुबाबदार अधिकारी होऊनच. तुझ्याकडे पाहताना मी माझं मलाच आरशात न्याहाळतो आहे, असं वाटायचं. 

‘पपा, तुमच्याच पलटणीत पोस्टेड होतोय…’ तुझा निरोप आला आणि पाठोपाठ ” सेकंड लेफ्टनंट गुरदीप सिंग सलरिया रिपोर्टींग सर ! ” म्हणत तू  पुढ्यात हजर झालास. वाटलं पुढं होऊन तुला घट्ट मिठी मारावी. पण तुझ्यात आणि माझ्यात गणवेश होता…. वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यास पाऊलभर दूर उभं राहायला लावणारा. मात्र घट्ट हस्तांदोलन मात्र केलं मी. तू जन्मलास तेंव्हा तुझा एवलासा हात हाती घेतला होता… ते आठवलं. तोच हात आता सामर्थ्यशाली झाला आहे, या हातात आता अधिकार आलेला आहे… हे जाणवलं. मी म्हटलं होतं, ” वेलकम ऑफिसर ! ” यावर तुझ्या डोळ्यांत चमक दिसली होती. आज तुझे डोळे मिटलेत… ती चमक आता या म्हाताऱ्या होत चाललेल्या डोळ्यांना दिसणार नाही…. आणि आयुष्याच्या सायंकाळी मी कुणाच्या नजरेनं पाहणार? 

त्या दिवशीही तू नेहमीप्रमाणे मोहिमेवर गेला होतास. माझं सगळं लक्ष असायचं. पलटणीतली सारी पोरं माझीच तर होती. आणि तू त्यांच्यासोबत होतास, त्यामुळे तर ही भावना अधिकच तीव्र व्हायची. खरं तर तुझी इथली पोस्टींग आता जवळजवळ संपत आली होती. दुसऱ्या एखाद्या शांत ठिकाणी गेला असतास कदचित फार लवकर… तू गेलास खरा… पण कायमच्या शांत ठिकाणी. 

निरोप आला ! निघायला पाहिजे. सर्व तयारी झाली आहे. गाडी उभी आहे. मला तयार व्हायला पाहिजे. पूर्ण लष्करी गणवेश परिधान करायलाच पाहिजे… सैनिकाला अंतिम निरोप द्यायचा आहे. 

पण आज स्वत:चा मुलगा गेल्याची बातमी स्वत:तल्या बापाला सांगावी तरी कशी? एक कमांडिंग ऑफिसर म्हणून मुलाच्या आईला कसं सांगावं की तुझा मुलगा शहीद झालाय? आणि नवरा म्हणून बायकोला काय सांगावं? एवढा मोठा हल्ला तर कोणत्याही लढाईत झाला नव्हता माझ्यावर.

नेहमीच्या सफाईने आवरलं सगळं. तू फुलांच्या गालिच्यात पहुडलेला होतास. देहावर तिरंगा लपेटून. खरं तर तुझ्या जागी मी असायला हवं होतं. मीही मोहिमा गाजवल्या तरूणपणी. पण माझ्या वाटची गोळी नव्हती दुश्मनाच्या बंदुकीत. आणि असलीच तर तू आता तुझं नाव माझ्या नावाच्या आधी जोडलं होतं… गोळीला आपलं काम माहित होतं… ज्याचं नाव त्याच्यात देहात सामावून जायचं. 

छातीवर गोळ्या झेलल्याचं समजलं तुझ्या सोबत्यांकडून.. जे बचावले होते दुश्मनांच्या हल्ल्यातून. त्याआधी तू कित्येक दुश्मन उडवले असंही म्हणताहेत ही पोरं. छातीवर गोळी म्हणजे मानाचं मरण आपल्यात. इथं होणारी जखम जीवघेणी खरी पण जास्त शोभून दिसणारी. 

दोघा जवानांनी तालबद्ध पावलं टाकीत पुष्पचक्र पुढे नेलं. मी ठरलेल्या सवयीनुसार पावलं टाकीत तुझ्या देहाजवळ पोहोचलो. सर्वत्र शांतता… दूरवरच्या झाडांवर पाखरं काहीतरी सांगत होती एकमेकांना. कदाचित मोठं पाखरू लहान पाखराला… दूर कुठं जाऊ नकोस फार ! असं सांगत असावं…  हे मला आता तुला सांगता येणार नव्हतं.. तू श्रवणाच्या पल्याड जाऊन पोहोचला होतास… बेटा ! 

खाली वाकून ते पुष्पचक्र मी तुला अर्पण केलं… काळजीपूर्वक. एक पाऊल मागे सरकलो आणि खाडकन तुला सॅल्यूट बजावला… अखेरचा ! तुझ्या शवाला खांदा दिला. किती जड होतं ओझं म्हणून सांगू… साऱ्या पृथ्वीचा भार एकाच खांद्यावर आलेला. आणि मला खांदा द्यायला तू नसणार याची दुखरी जाणीव तर आणखीनच जड. 

पुढचं काही आठवत नाही. तुझ्या चितेच्या भगव्या ज्वाळांनी डोळे दिपून गेले… अमर रहेच्या घोषणांनी कान तुडुंब भरून गेलेले होते. आसवांना आज किमान सर्वांसमोर प्रकट व्हायला मनाई होती…. आसवं सुद्धा हुकुमाची ताबेदार. त्यांना माहित होतं एकांतात मी त्यांना काही अडवणार नव्हतो ! 

सकाळी तुझ्या राखेपाशी गेलो. एवढा देह आणि एवढीशी राख. मरण सर्व गोष्टी अशा लहान करून टाकते. अलगद हात ठेवला तुझ्या राखेवर…. अजूनही धग होती थोडीशी. असं वाटलं तुझ्या छातीवर तळवा ठेवलाय मी. असं वाटलं माझ्या या तळव्यावर तुझा हात आहे….. त्या मऊ राखेत माझा हात खोलवर गेला आपसूक… आणि हाताला काहीतरी लागलं ! 

तुझं काळीज भेदून गेलेली गोळी…. काळी ठिक्कर पडलेली आणि अजूनही तिच्यातली आग शाबूत असलेली. जणू पुन्हा एखादं हृदय भेदून जाईल अशी. तशीच मूठ बंद केली…. गोळीसह. 

तुला वीरचक्र मिळणार होतंच… आणि ते स्विकारायला मलाच जावं लागणार होतं.. तसा मी गेलोही. तुझ्या पलटणीचा प्रमुख म्हणून नव्हे तर तुझा बाप म्हणून. तोवर भरपूर रडून झालं होतं एकांतात… तुझी आई होतीच सोबतीला. शौर्यचक्र स्विकारताना हात किचिंत थरथरले पण सावरावं लागलं स्वत:ला. अनेक डोळे माझ्याकडे लागलेले होते…. सेकंड लेफ्टनंट गुरदीप सिंग सलारिया यांचे वडील त्यांना मरणोत्तर दिले गेलेले शौर्यचक्र स्विकारताना रडले असते तर पुढे ज्यांना सैन्यात जाऊन मर्दुमकी गाजवायची आहे… त्यांची पावलं नाही का अडखळणार? आणि माझ्या गुरूदीपलाही हे रुचलं नसतं ! 

आजही ते शौर्यचक्र आणि ती गोळी मी जपून ठेवली आहे… त्याची आठवण म्हणून. माझ्या पोराने निधड्या छातीनं दुश्मनांचा मुकाबला केलेला होता…. ती गोळी म्हणजे त्याच्या पराक्रमाची गाथा सांगणारा एक दस्तऐवज… तो जपून ठेवलाच पाहिजे ! 

(दहा जानेवारी, १९९६. पंजाब रेजिमेंटच्या जम्मू कश्मिरमध्ये तैनात असलेल्या तेविसाव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्ट.कर्नल एस. एस. अर्थात सागर सिंग सलारिया साहेब आणि त्याच बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते त्यांचे सुपुत्र गुरदीप सिंग सलारिया साहेब….. एकविसाव्या वर्षी सेनेत आले आणि तेविसाव्या वर्षी देशाच्या कामी आले. एका धाड्सी अतिरेकीविरोधी कारवाईत गुरदीप साहेबांनी प्राणपणाने लढून तीन अतिरेक्यांना टिपले परंतू दुसऱ्या एका अतिरेक्याने अगदी नेम धरून झाडलेली गोळी छातीत घुसून गुरदीपसिंग साहेब कोसळले आणि अमर झाले. त्यांना मरणोत्त्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. या शौर्यचक्रालाच ही गोळी बांधून ठेवलेली आहे साहेबांनी…..   सेनेतून निवृत्त झालेले लेफ़्ट. कर्नल सागर सिंग सलारिया आता मुलाच्या आठवणीत जीवन जगत आहेत. गुरदीप सिंग साहेबांच्या मातोश्री तृप्ता २०२१ मध्ये स्वर्गवासी झाल्या. त्यांची ही कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपणासाठी जमेल तशी मांडली. इतरांना सांगावीशी वाटली तर जरूर सांगा.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print