मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा” – लेखक : श्री हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “अय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा” – लेखक : श्री हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

(आयुष्यभर लॉजच्या खोलीत राहून उरलेला पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार्‍या एका प्राध्यापकाची ही कहाणी)

*रूम नंबर २०२*

*श्रीकृष्ण रेस्टार्ंट बारामती.*

*प्रवासी मुक्कामाला आला आणि त्याने चेक आऊट ३५ वर्षांनी केलयं …..*

*शेवटची ओळ नाही ना समजली ? नाहीच समजणार. कारण ती आहेच अगम्य.*

*याचा अर्थ त्या हॉटेलात राहायला आलेला प्रवासी एकाच खोलीत ३५ वर्षे राहिला. ८ बाय १० च्या इवल्याश्या खोलीत. आणि आयुष्यभर फिरत होता सायकलवर.*

*का ? परिस्थिती गरीब होती म्हणून का ?*

*मुळीच नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते प्राध्यापक होते. होय. गोंधळ उडावा असंच हे प्रकरण आहे. के.एस.अय्यर. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सेवा केलेले आणि नुकतेच ५ महीन्यापूर्वी निधन पावलेले.*

*पूर्वी एकदा कवीमित्र संतोष पवार यांनी पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकीरी वृत्तीने जगणारा एक प्राध्यापक असल्याचे सांगितले होते. मात्र सर गेल्यावर तपशीलवार माहिती कळली आणि या माणसाला आपण का शोधले नाही, याची जन्मभर व्यापून उरणारी अपराधी बोचणी लागली.*

*नुकताच बारामतीला शारदा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला गेल्यावर आवर्जून सरांनी ज्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात काम केले तिथे गेलो. तिथल्या उपप्राचार्य नेमाडे मॅडम, संजय खिलारे सर, कार्यालय प्रमुख महामुनी, दिपक भुसे हे सारे अय्यर सरांविषयी भरभरून बोलत होते. आपल्याकडे माणूस जिथे राहतो, नोकरी करतो, तिथे त्याच्याविषयी चांगले बोलण्याची प्रथा नाही… पण अय्यर सरांनी सर्वांचे टोकाचे प्रेम आणि आदर मिळवला होता. माझ्यासोबत तिथे आलेल्या मार्तंड जोरी या अभ्यासू शिक्षक मित्राने नंतर मग सरांची माहिती जमवायला मला खूप परिश्रमपूर्वक मदत केली.*

*आज प्राध्यापकांचे वाढते पगार त्यातून येत चाललेली सुखासीनता, त्यातून कमी होत जाणारी ज्ञानलालसा, मिळणार्‍या पैशातून बदलत जाणारी जीवनशैली आणि कमी होणारे सामाजिक भान… यामुळे अपवाद वगळता प्राध्यापक वर्गाविषयी नाराजी व्यक्त होत असते. अशा काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादाने अविवाहित राहतो, केरळ मधून महाराष्ट्रात येतो, आपल्या इंग्रजी अध्यापनाने विद्यार्थ्यांना वेड लावतो, आणि माणूस किती कमी गरजांत राहू शकतो, याचा वस्तूपाठ जगून दाखवतो, हे अविश्वसनीय वाटावे असेच आहे.* 

*इतके मोठे वेतन असूनही लॉजच्या ८ बाय १० च्या खोलीत एक कॉट. मोजकेच कपडे, एक कपाट आणि त्यात पुस्तके पुस्तके आणि पुस्तके एवढाच या माणसाचा संसार होता. आयुष्यभर सायकल वापरली. गरजा खूपच कमी. मार्तंड जोरी त्या लॉजच्या वेटरला भेटले, तेव्हा सर केवळ एकवेळ जेवत व एक ते दीड पोळी खात असे सांगितले. त्या वेटरला सुद्धा ते अहो जाहो म्हणून आदराने वागवत. इतक्या फकीरीत राहताना मग वेतन आयोग लागू झाल्यावर या माणसाने पगारवाढ देवू नका मला गरज नाही असे म्हणायचे. मग सहकारी चिडायचे. संघर्षाचा स्वभाव नाही. सर शांतपणे सर्वांचा आग्रह म्हणून पगार नाइलाजाने स्वीकारत.*

 *पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी ते नाइलाजाने स्वीकारताना सरांनी फरकाच्या ५०००० रुपये रकमेतून पुस्तके स्वीकारण्याची महाविद्यालयाला उलटी अट घातली. ही निस्पृहता होती.*

 *सरांचा जन्म १९३३ साली केरळात झाला. वडील सैन्यात होते. शिक्षण राजस्थान बंगालमध्ये झाले. सुरवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली. कुटुंबातील सर्वजण सुखवस्तू आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून १९६८ साली शिक्षक झाले. कराडला नोकरी केली. नंतर बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अखेरपर्यंत राहिले.*

 *त्यांच्यात हा साधेपणा व ध्येयवाद कशातून आला याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की, हा गांधींचा प्रभाव आहे. महात्मा गांधींना लहानपणी ते भेटले होते. त्यातून गांधींचा खूप अभ्यास केला. गांधीवादी मूल्य नकळत जगण्यात उतरली. सर आंबेडकरांना आणि गाडगेबाबाबांना भेटले होते. आंबेडकरांची अनेक भाषणे त्यांनी ऐकली होती. त्यातून अभ्यासाची प्रेरणा जागली असावी. स्वातंत्रपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचे हे सारे साधेपण ध्येयवाद आला होता.*

 *केवळ साधेपणासाठी कौतुक करावे असेही नव्हते, तर सरांचे इंग्रजी विषयाचे अध्यापन हे अत्यंत प्रभावी होते. सर समजा अगदी गाडी वापरुन बंगल्यात राहिले असते, तरी केवळ इंग्रजी शिक्षणासाठी त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना लक्षात ठेवले असते. त्यांच्या विद्यार्थांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली, तेव्हा सरांची काही शिक्षक म्हणून वैशिष्ट्ये लक्षात आली. सर इंग्रजी साहित्यातील नाटक, कविता, समीक्षा सारख्याच सामर्थ्याने शिकवू शकत. विशेषत: समीक्षेवर खूपच प्रभुत्व होते. सलग घडयाळी 3 तास ते शिकवत. घडयाळी ८ तास शिकवण्याचेही रेकॉर्ड केले. इतकी नोकरी होऊनही प्रत्येकवेळी वाचन करून नोट्स काढूनच वर्गात जात. त्या नोट्स च्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना फुकट वाटत.*

 *सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून शिकवत नसत. १९९५ नंतर निवृत्तींनंतर त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले पुण्यात ३ दिवस ते अध्यापन करीत व ३ दिवस बारामतीत अध्यापन. मृत्यू झाला त्या महिन्यात ही ८३ व्या वर्षीही ते तास घेत होते. याची तुलना रविंद्रनाथांशीच फक्त होऊ शकते. असा आजन्म शिक्षक म्हणून राहिलेला आणि कधीह निवृत्त न झालेला हा शिक्षक होता. शेकडो PhD चे प्रबंध त्यांनी तपासून दिले. नेट सेट सुरू झाल्यावर मोफत मार्गदर्शन सुरू केले. इंग्रजीसोबत त्यांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, खेळ याविषयात विलक्षण गती होती.*

 *क्रिकेट चे तर १० वर्षापूर्वीचे तपशील ते अगदी सहज सांगत. सर रिकाम्या वेळेत सतत वाचन करीत. अगदी बँकेत, दवाखान्यात प्रतिक्षा करावी लागे, तेव्हा तिथेही ते पुस्तक वाचत बसत. त्यांच्या लहानशी खोली फक्त पुस्तकांनीच भरली होती. त्यांनी मृत्यूनंतर ही पुस्तके विविध महाविद्यालयांना द्यायला सांगितली होती. सरांनी इंग्रजीत दोन पुस्तके व अनेक संशोधकीय पेपर्स लिहिले.*

 *विद्यार्थ्यांवरचे प्रेम पुत्रवत होते. एम.ए.च्या प्रत्येक बॅच नंतर ते हॉटेलात निरोप समारंभ आयोजित करीत. मुलांना जेवण देत. नंतर ग्रुप फोटो काढून तो फ्रेम करून स्वत:च्या खर्चाने प्रत्येक मुलाला देत. महाविद्यालयात असताना त्यांना निरोपसमारंभात भाग घेता आला नव्हता हे त्यांना शल्य होते. या माणसाचे विद्यार्थी हाच त्यांचा संसार. पगारातील उरलेली सर्व रक्क्म पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या फीसाठी ते खर्च करीत. सरांच्या मदतीमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले, असे सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत. त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय स्वरूपाची मदत केली, हे त्यांच्या निस्पृह स्वभावामुळे कुणालाच कळले नाही. पण ती संख्या प्रचंड होती.*

 *मला अय्यर सरांचे मोठेपण भारतीय गुरुपरंपरेशी जोडावेसे वाटते. या देशातील ऋषींच्या आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला असायचे, पण ऋषीच्या जगण्यात फकीरी होती. ज्ञान हीच त्यांची ओळख असायची. कुठेतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्याने दीपवणारी ही भारतीय गुरूपरंपरा होती. अय्यर सर हे या परंपरेचे पाईक होते. भारतीय मनाला ही फकीरी भावते. महात्मा गांधी पासून राम मनोहर लोहिया, मेधा पाटकर अण्णा हजारेंपर्यंत भारतीय मन या फकीरीतल्या श्रीमंतीपुढे झुकते. अय्यर सरांनी पुन्हा ही परंपरा जिवंत केली, जगून दाखवली.*

 *या माणसाने आपल्या या फकिरीच्या बीजावर प्रसिद्धीच पीक काढलं नाही. निष्कांचन, अनामिक राहून देवघरातील नंदादीपासारखा हा माणूस तेवत राहिला आणि एक दिवस विझून गेला. आपल्या आयुष्याच्या सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची कोणतीच अपेक्षा नव्हती. या त्यागातून मिळालेल्या नैतिक अधिकारातून आजच्या चंगळवादी समाजाला किंवा बांधिलकी विसरत चाललेल्या शिक्षणक्षेत्रावर कोरडे ओढण्याचा अधिकार मिळूनही त्यांनी तो वापरला नाही. स्वत:च्या जीवन तत्वज्ञानावर लेख लिहिले नाहीत की भाषणे केली नाहीत. ते फक्त जगत राहिले. त्यांच्या आदर्श बापुजींच्या भाषेत ‘मेरा जीवन मेरा संदेश ‘ पण समाज, शासन, विद्यापीठ म्हणून आपण या माणसाची नोंद घेतली नाही.*

 *अय्यर सर गेले. ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या ८३ व्या वर्षीपर्यन्त त्यांनी शिकविले. त्या विद्यापीठाने किमान या अनामिक जगलेल्या आणि तन मन आणि धनसुद्धा विद्यार्थ्यांना अर्पण केलेल्या या दधीचि ऋषीचे चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक प्राध्यापक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे आणि ही प्रेरणा संक्रमित करावी. अन्यथा आइनस्टाईन म्हणाला होता तसे ‘असा हाडामांसाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही.’*

लेखक : हेरंब कुलकर्णी.

मो. 8208589195

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सातारचे ‘कंदी’ पेढे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सातारचे ‘कंदी’ पेढे –  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का – सातारच्या पेढ्यांना “कंदी पेढे” असंच का म्हणतात?

गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची.

भारतात ब्रिटिश राजवट होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटिश रिजंट बसविण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.

सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्या काळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी, म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दुध जवळचं मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना “करंडी” म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला “कँडी” म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं सातारकरांनी “कंदी” केलं.

साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसविलं होतं. त्यांनी बनविलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच “लाटकर” असे ओळखलं जाऊ लागलं.

कंदी पेढ्याला युरोप मध्ये नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.

त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला.

आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊन देखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र  कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊ पणा वाढतो. म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.

भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जातं.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंतलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व इतर खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.

सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल म्हणजे खरपूस भाजलेले, आणि तुपात परतलेले आहेत. हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा “स्वॅग” मिक्स झालाय.

या सगळ्यामुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात प्रसिद्ध झाला.

माहिती प्रस्तुती : अनंत केळकर 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधुराधिपती !!! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मधुराधिपती !!! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मधमाशांनी फुलांच्या हृदयातून जणू अमृतच शोषलं आणि त्यांच्या जगण्यासाठी एकत्रित करून ठेवलं. मानवाला हा पदार्थ चाखायला मिळाला आणि त्याची चव त्याला क्षुधेच्या कल्लोळातही परमोच्च सुखाची अनुभूती देऊन गेली. या पदार्थाची गोडी शब्दाने वर्णन करणं खूप कठीण होतं. पण त्याला नाव तर दिलंच पाहिजे…मध !  हा मध म्हणजेच मधु…मूळच्या मेलिट शब्दापासून सुरूवात करून नंतर मेलिस आणि मेल आणि नंतर संस्कृतात मधु नाव प्राप्त झालेला पदार्थ. यापासून मधुर आणि माधुर्य शब्द ओघळले…मधाच्या पोळ्यातून गोडवा पाझरावा तसे ……  

गोडी केवळ जिभेलाच कळते असं नाही….गोडवा सबंध देहालाही तृप्तीचा अनुभव देऊ शकतो ! पण गोडवा, माधुर्य देणारा हा पदार्थ सर्वांगानं गोड असावा मात्र लागतो ! असं मधासारखं सर्वांगानं मधुर असणारं सबंध जगात कोण आहे? ……  

…. श्री वल्लभाचार्यांना श्रीकृष्ण तसे दिसले… मधासारखे …. नव्हे त्यांच्या आत्म्याच्या जिव्हेने श्रीकृष्ण भगवंताच्या सगुण साकार रुपाची गोडी अगदी सर्वांगानं भोगली…आणि त्यांचे शब्दही मधुर झाले !!!! 

आणि लेखणीतून उतरले एक सुंदर मधुराष्टकम् ……

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥

*

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

*

वेणुर्मधुरो रेणुर्मधुर: पाणिर्मधुर: पादौ मधुरौ ।

नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

*

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।

रुपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

*

रणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

*

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।

सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

*

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥

*

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥

*

इति श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं सम्पूर्णम् ।

…… सगुण भक्तीचा गोडवा हाच की आपल्याला देह देणा-या देवाचा देह त्याला गोड भासतो…देवाच्या प्रत्येक कृतीत असणारा  माधुर्याचा दरवळ त्याला भावविभोर करतो. 

ज्याचं वर्णन करू पाहतो आहे ते स्वत:च माधुर्याचे जन्मदाते…निर्माते…स्वामी अर्थात अधिपती आहेत…मधुराधिपती ! 

ओठ ! .. कमळाच्या दोन पाकळ्या एकमेकींपासून विलग होण्यापूर्वी जशा एकमेकींवर अलगद स्थिरावलेल्या असतात ना अगदी तसेच ओठ…मधुर ! हे ओठ जेंव्हा त्या बासरीवर विसावतात ना तेंव्हा त्यातून निघणारा उच्छवासाचा हुंकार अतिगोड…कानांना पुरतं तृप्त करून पुढे शरीरभर पसरत जाणारा. .. …. आणि हे ओठ ज्या मुखकमलावर विराजमान आहेत ते मुख तर मधुर आहेच….किती गोडवा आहे त्या सबंध मुखावर ! …. आणि या मुखावरचे ते दोन नेत्रद्वय….मधुर आहेत…अपार माया स्रवणारे…पाहणा-याच्या डोळ्यांत नवी सृष्टी जागवणारे. सगळंच मधुरच आहे की माझ्या या देवाचं ! 

आणि ओठ,डोळे एकमेकांच्या हातात हात घालून त्या मुखावर ज्याची गोड पखरण करतात ते हास्य तर माधुर्याची परिसीमाच ! 

मग हृदय ते कसं असेल….मधुरच असणार ना? देवकीच्या गर्भात आकाराला आलेल्या आणि यशोदा नावाच्या प्रेमाच्या झाडाखाली वयाचा उंबरठा ओलांडून वाढत असलेल्या या कृष्णदेहातलं हृदय तर जणू मधाचं पोळं..गाभाच मधुर !   

या माधवाचं ..  या मधुसूदनाचं चालणं आणि त्या चालण्याची गती किती गोड आहे…या गतीमध्ये एक मार्दव भरून उरलं आहे…त्याच्या चरणांखालची माती कस्तुरीचं लेणं लेऊन मंद घमघमत असावी….भक्त हीच माती कपाळी रेखातात ती काय विनाकारण? 

मधुर ओठांतून शब्दांच्या मोगरकळ्या वातावरणात अवतरतात त्या अर्थातच गोडव्याची शाल पांघरून.. . देवाचं चरित्र तर काय वर्णावं…भगवंतांच्या जगण्यातला एकेक क्षण मधुर चरित्र आणि चारित्र्याचं मुर्तिमंत दर्शन… त्यांनी देहावर पांघरलेल्या वस्त्रातील धागे किती दैववान असतील. त्या धाग्यांनी त्या पीतरंगी वस्त्राला..पीतांबराला जणू गोडव्यात न्हाऊ घातलं आहे. 

भगवंतांनी कोणतीही हालचाल केली तरी ती गोडच भासते, त्यांचं चालणं आणि पावलं उमटवीत विहार करणं मधुर आहे. स्वरांच्या आवर्तनात स्वत:च गुरफटून जाणारी बांसुरी मधुर असण्यात आश्चर्य ते काय? 

…. देवाचे पाय पाहिलेत? त्यांवर कपाळ टेकवताना जवळून पहा…गोड आहेत. आणि हात? हा गोड हात आपल्या मस्तकावर असावा असं स्वप्न असतं साधकांचं…गोड आशीर्वाद देण्यासाठी उभारलेले ते हात…मधुर आहेत. 

श्रीकृष्ण नर्तन करतात तेंव्हा धरा मोहरून जाते …  त्या नर्तनातील तालावर गोडपणा डोलत असतो. या देवाशी जन्मजन्मांतरीचं नातं जोडलं तर…तो आपला सखा झाला तर….ते सख्य अतिमधुर ठरतं.

देवकीनंदनाच्या गळ्यातून उमटणारे सूर अतिशय तृप्त करणारे आहेत..मधुर आहेत….त्यांचं पेय प्राशन करणं, खाद्य ग्रहण करणं मधुर…जगाच्या दृष्टीनं निद्रेच्या मांडीवर मस्तक ठेवून डोळे अलगद मिटून घेणं गोड आहे…म्हणूनच त्याचं रूप असलेली आणि गाढ झोपी गेलेली बालकं गोड दिसतात…देवाची निद्रा मधुरच भासते. 

कान्होबाचं रूप अलौकिक गोड, त्यांच्या कपाळी असलेला तिलकही गोड दिसतो. देवानं काहीही करू देत ते मधुरच असते…त्यांचा जलविहार,त्यांचं तुमचं चित्त हरण करणं, त्याचं भक्ताचं दु:ख,दोष,पाप दूर करणं याला तर मधुरतेची सीमा म्हणावं. 

हरीचं स्मरण करावं म्हणतात…एकदा का या स्मरणाची गोडी लागली की ती सुटत नाही. त्यांच्या बोलण्यात माधुर्य आहेच पण ते जेंव्हा मौन धारण करतात ते मौन कोरडं नसतं वाळवंटासारखं…मधुबनासारखं गोड असतं….ही मौनातील मधुर शांतता आत्म्याला लाभते.

ज्याने हे जग सुंदर केलं त्याच्या गळ्यात शोभायला अनेक अलंकार आतुरलेलं असतात…पण गोपगड्यांनी आणून दिलेल्या गुंजाच्या बियांची माला आणि अर्थातच त्या गुंजा गोड दिसतात नजरेला. 

जिच्या काठावर मुकुंद बागडतात…जिच्या अंतरंगात शिरून जलक्रीडा करतात ती यमुना तरी माधुर्यात कशी मागे राहील? तिच्यात उठणारे तरंग, तिचं जल मधुरच ! गोकुळातल्या सरोवरांमध्ये फुलणारी कमळं मधुर आहेत…श्रोते हो ! बालकृष्णाच्या सावलीसारखं वावरणा-या गोपी त्याच्यासारख्याच की. 

या कृष्णसखयाचं सारं आयुष्य अगाध लीलांनी भरलेलं आणि भारलेलं आहे…गोड आहे. त्याच्याशी झालेला आत्मिक संयोग,सात्विक भोग हे भौतिक, शारीर चवीचे कसे बरे असतील?….या सर्वाला माधुर्याचा स्पर्श असतोच. या देवाचं जगाकडे बारकाईनं पाहणं आणि त्याचा शिष्टाचार अतिशय संयत आणि गोड !  

कृष्णाला ‘ क्लिशना ‘ अशी बोबडी पण गोड हाक मारणारा पेंद्या आणि त्याच्यासोबतचे सारे गोपगण म्हणजे गोडव्याच्या झाडाला लगडलेली गोड फळंच जणू. ज्यांना प्रत्यक्ष कृष्णपरमात्म्याच्या पाव्यातून त्याच्या 

‘चला, परत फिरा गोकुळकडे ’ या हाका ऐकू आल्या त्या कपिला सुद्धा गोडच आहेत. देवाला गायींना सांभाळण्यासाठी कधी काठीचा आधार नाही घ्यावा लागला…पण ही छडी गोड आहे…अगदी हिचा प्रसाद घ्यावा एवढी ! 

यानं निर्माण केलेली एकूण सृष्टीच मधुर आहे. देव आणि आपण वेगळे आहोत ही भावना म्हणजे प्रथमदर्शनी द्वैतसुद्धा मधुर आणि भगवंत भक्तांच्या हाती सोपवतात ती प्रेमफलं मधुर आहेत. एखाद्या अनुचित कर्माचं फल म्हणून दिलेला दंडही मधुरच असतो अंती. या देवाचं आपल्यासारख्या पामरांना लाभणं तर माधुर्याचा गाभाच…हे लाभणं केवळ गोड नसतं…आपण अंतर्बाह्य मधुर होऊन जातो ! सर्वांगसुंदर….तसं सर्वांगमधुर ! जय श्रीकृष्ण ! 

वल्लभाचार्यांचं मन किती गोड असेल नाही ! शब्द इतके गोड असू शकतात ! मूळ संस्कृतात असलेले हे शब्द सर्वांना समजण्यासारखे आहेत. पण अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे मधुराष्टक कान देऊन ऐकलं ना की श्रवणेंद्रियांचं श्रवण मधुर होऊन जातं…गाण्यातील बासरी खूप अर्थपूर्ण भासते…आणि आपण गाऊ लागतो…. ‘ मधुराधिपतेरखिलं मधुरं..’  हे माधुर्याच्या जन्मदात्या….तुझं सारंच किती मधुर आहे रे ! 

…. .. या शब्दांतील गोडवा तुम्हांलाही भावला तर किती गोड होईल ! शब्द वल्लभाचार्यांचे आहेत…त्यांचा अर्थ लावण्याचं धारिष्ट्य करावं असं वाटलं…गोड मानून घ्यावे. 

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलस्य मूलं विज्ञानं’ …युवा प्रताप ☆ माहिती संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलस्य मूलं विज्ञानं’ …युवा प्रताप ☆ माहिती संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.

फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे.

मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला.

आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि ‘डी आर डी ओ’ मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.

या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग :-

कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत. 

याला बालपणापासूनच ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले की त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही.

प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लस प्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्टपासून ड्रोन बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशीवेळच्या  खटपटींनंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग :-

आय आय टी दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने दुसरे पारितोषक पटकावले.

त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा.

जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते.

हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते.

प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता.  निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा… आणि घोषणा झाली ‘ आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे ‘ … त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले. 

त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. 

आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ)  “रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन”  मध्ये त्याला सामावून घेतले आहे

…भारतीय ‘बलस्य मूलं विज्ञानं’ चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी…

माहिती प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते २९) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते २९) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।

स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।२१।।

*

आसक्ती ना विषयसुखांची अंतर्यामी सुखानंद 

ध्यान तयाचे परब्रह्मी  निरंतर समाधानानंद  ॥२१॥

*

ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।

आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।२२।।

*

सुखदायी जरी भासती गात्रविषय भोग

दुःखदायी ते खचित असती तू त्यांना त्याग

क्षणात ते भंगुनिया जाती अनित्य ते अर्जुना

प्रज्ञावान विवेक ठेवी रुची त्यांच्यातुनी  ना ॥२२॥

*

शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।२३।।

*

अधीन केले षड्रिपुविकार याची देही इहलोकी

जाणावे त्या योगी म्हणुनी तोच खरा या जगी सुखी ॥२३॥

*

योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य: ।

स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।२४।।

*

अंतरात्म्यात सुखी रत  आत्म्यात ज्ञानतेज जया प्राप्त 

योगी अद्वैत परमात्म्याशी शांत ब्रह्म तयासी  प्राप्त  ॥२४॥

*

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।

छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।२५।।

*

पापाचे ज्याच्या होत विमोचन  तमकिल्मिष नष्ट प्रकाश ज्ञान

सर्वभूत हितात रत मन परमात्मे स्थित ब्रह्मवेत्त्या परब्रह्म प्राप्त ॥२५॥

*

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।

अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।२६।।

*

कामक्रोधापासून अलिप्त वश जया चित्त

परब्रह्म त्या साक्षात्कार परमात्मा हो सर्वत्र ॥२६॥

*

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।२७।।

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।

विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।२८।।

*

वैराग्य मनी रुजवुन । अलिप्त विषयांपासुन ॥

पंचेंद्रिय बुद्धी मन । सदा अपुल्या स्वाधिन ॥ 

भ्रूमध्यात दृष्टी स्थिर । प्राणापानासी रोखून ॥

ऐक्य हो सुषुम्नेतुन । ध्यानातुनी राही मग्न ॥

भयक्रोधेच्छा समस्त ।  नष्ट करूनी त्यागत ॥

वास्तव्य जरी देहात । मोक्षपरायण  मुक्त ॥२७-२८॥

*

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।२९।।

*

मला जाणतो माझा भक्त यज्ञ तपांचा भोक्ता

सर्वलोक महेश्वर मी सुहृद म्हणोनी  सर्वभूता

प्रेमळ दयाळू निःस्वार्थी मी त्रिकाल आहे पार्थ

जाणीतो मनी हे तत्त्व  तयास शांती हो प्राप्त  ॥२९॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्याय: ।।५।।

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मसंन्यासयोग नामे निशिकान्त भावानुवादित पंचमोऽध्याय संपूर्ण ॥५॥

— अध्याय पाचवा समाप्त —

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

– श्री क्षेत्र सोमनथळी 

फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’

चला आपल्या फलटणबद्दल थोडेसे जाणून घेऊयात

राम रावणाच्या युद्धानंतर जेव्हा राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने रामाला सीतेचा त्याग करावा लागला. त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की सीतेला दूर कुठेतरी नेउन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडलं आणि तो अयोध्येला निघून गेला…

लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडलं होतं ते ठिकाण आपल्या फलटणच्या शेजारी आजही ‘ सीतामातेचा डोंगर ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. आजही हजारो स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी सीतामातेला वाणवसा घ्यायला जातात…

याच आपल्या पावन भूमीत लव-कुश यांचा जन्म झाला. रामाने ज्यावेळी अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी या यज्ञाप्रसंगी जो घोडा सोडलेला होता तो लव-कुशने पकडला… त्यानंतर लव-कुश यांच्याबरोबर लक्ष्मण, शत्रुघ्न, भारत, सुग्रीव यांनी युद्ध केलं.. मारुतीही या युद्धाच्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांना समजलं की ही दोन्ही मुले रामाचीच आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धात सहभाग घेतला नाही. लव-कुशने हनुमंताला एका अस्त्राने एका लिंबाच्या झाडाला बांधून टाकलं …

हे युद्ध ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाचा उल्लेख रामायणमध्ये ” फलपठठनपूर ” असा केलेला आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण फलटण या नावाने ओळखल जातं … 

रामायणामध्ये असा उल्लेख आहे कि लव-कुशने हनुमंताला ‘सम्स्थलि’ बांधलेले…

‘सम्स्थळ’ म्हणजे समान जागा, जिथे चढ-उतार जास्त नाहीत अशी…

त्या ‘समस्थळचा’ अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण ‘सोमन्थलि’ या नावाने प्रसिद्ध आहे.

खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी एका स्त्रीला एका लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या गाईच्या गोवरीमध्ये हनुमानाचे दर्शन झाले… ती बेशुद्ध होऊन पडली… काही लोक तिला पाहायला गेले तर त्यांनाही हनुमंताचे दर्शन मिळाले. ही वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली… त्या काळच्या एका प्रसिद्ध ब्राह्मणाकडून याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यावेळी हे तेच ठिकाण निघालं जेथे हनुमानाला बांधलेलं होत…मग लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचे झाड आहे. असे म्हणतात की हे लिंबाचे झाड मोठे होऊन जेव्हा मरून जातं तेव्हा त्याच ठिकाणी नवीन झाड उगवते. मारुतीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या या झाडाला मिठी मारून दर्शन घेण्याची पद्धत आहे. नवसाला पावणारा हा मारुती दक्षिणमुखी आहे….चैत्र शुद्ध पौर्णिमेला सोमंथळी मध्ये मोठी यात्रा भरते… मित्रानो समर्थ रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली हे सर्वाना माहित आहे… मात्र हा मारुती स्वयंभू आहे. याची स्थापना केली गेली नाही… सोमंथळी मध्ये तो स्वतः: प्रगट झाला आहे…

” श्री स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर, श्री क्षेत्र सोमंथळी ” या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू याचबरोबर इतरही अनेक राज्यातून लोक येथे दर्शनाला येतात…

मात्र याच मातीतल्या बऱ्याच लोकांना या ठिकाणाची माहिती नाही… कारण आपण रामायणाची पारायणे करतो .. मात्र मनापासून कधी वाचत नाही.

एव्हढा पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठिकाणी आपण वावरतोय याचा थोडा तरी अभिमान असू द्या…

|| जय श्री राम ||

|| जय हनुमान ||

माहिती प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’… ☆ माहिती-प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ ☆ माहिती-प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर ☆

अवघ्या ६५ वर्षांची विद्यार्थिनी — श्रीमती विनया नागराज 

2018 च्या सप्टेंबर महिन्यात पुण्यातल्या सहकारनगर जवळच्या ICWA चॅप्टर क्लासमध्ये 64 वर्षांच्या एक आज्जीबाई एका वर्गात शिरल्या. तेव्हा वर्ग सुरू झाला होता. आणि समोर 20-21 वर्षांची मुलं त्यांच्या शिक्षिका आणि फळ्याकडे बघत होती. अचानक आज्जी दिसल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या मुलीला वाटलं, शिक्षिकेची आई किंवा नातेवाईक आली आहे. त्यांनी शिकवण्यात गुंग झालेल्या शिक्षिकेला तसं सांगितलंही. पण, आज्जीबाई उडालेली गंमत बघत शांतपणे त्या मुलीच्या शेजारी रिक्त असलेल्या बाकावर बसल्या. जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.

आता 65 वर्षांच्या झालेल्या त्या आजी श्रीमती विनया नागराज यांनी काही तासांपूर्वीच मला तो सांगितला. विशेष म्हणजे या आजीनी गेल्याच आठवड्यात ICWAचा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णही करून दाखवला आहे.

या अभ्यासक्रमाची यशस्वीतेची टक्केवारी 15 ते 20 इतकी असते. म्हणजे शंभरामध्ये फक्त 15 ते 20 मुलं परीक्षा पास होतात. सीएच्या खालोखाल कठीण अभ्यासक्रम तो मानला जातो. आणि त्यात विनया नागराज यांनी 59% गुण मिळवून बाजी मारली आहे.

‘मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. नातू आता समजदार झाला आहे. मग अशावेळी फक्त टीव्ही बघत का वेळ घालवायचा. त्यापेक्षा कॉलेजनंतर जे करता आलं नाही ते स्वप्न का पूर्ण करू नये,’ असं म्हणत विनया यांनी आपला मागच्या दोन वर्षांचा काळ सत्कारणी लावला आहे.

‘मुलगी सीए असेल तर मुलगा मिळणार नाही’

विनया यांचं बालपण आधी कोल्हापूर आणि पुढे मुंबईत विले पार्ल्याला गेलं आहे. माध्यमिक शिक्षणक्रम म्हणजे तेव्हाची अकरावी त्यांनी उपजत हुशारीमुळे 14व्या वर्षीच पूर्ण केली. त्यानंतर बीकॉमही त्या मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमधून 18 व्या वर्षी झाल्या.

— पण, ते वर्षं होतं 1974 मुंबई सारख्या ठिकाणीही मुली फारशा बाहेर दिसायच्या नाहीत. आणि कॉलेजमध्ये सुद्धा एखादी मुलींची रांग सोडली तर बाकी अख्खा वर्ग मुलांनीच भरलेला असायचा, असं विनया सांगतात. अशा परिस्थितीत मुलीला सीए व्हायचंय ही गोष्ट वडिलांना आणि घरी रुचणारी नव्हती. सीएच नाही तर मुलीने नोकरी करण्यालाही घरून विरोध होता. त्यामुळे विनया यांचं हे स्वप्न तेव्हा अपूर्णच राहिलं. पुढे काही कारणांनी एमकॉमची परीक्षाही त्यांना देता आली नाही.

तेवढ्यात लग्न झालं आणि दोन मुलांबरोबर प्रापंचिक जबाबदाऱ्याही वाढल्या. या धबडग्यात सीए व्हायचंय हे ही विनया विसरून गेल्या. त्यांची त्याबद्दल तक्रारही नव्हती. सासरच्या सहकार्याने त्यांनी बँक ऑफ बडोद्यात नोकरी मात्र मिळवली. आणि घर-संसार सांभाळत स्केल-टू ऑफिसर पर्यंत बढती मिळवली. अर्थात, या सगळ्यांत घरच्या ज्या जबाबदाऱ्या येत होत्या – घरची आजारपणं, कुणाचं दुखणं-खुपणं हीच त्यांच्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. अगदी घरातली गरज पाहून 2001 मध्ये त्यांनी या नोकरीतूनही स्वेच्छा निवृत्ती घेतली. बँकेत आणि घरातंही त्यांचं काम चोख होतं. करत असलेल्या कामात त्याही समाधानी होत्या.

पण, 2017 मध्ये त्यांचे पती वारले. दोन्ही मुलं सुमेध आणि सुकृत त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आणि संसारात रमली होती. नातू नऊ वर्षांचा म्हणजे जाणत्या वयाचा होता. अशा वेळी निवृत्त माणसाने काय करावं? — असा विचार जेव्हा विनया यांनी केला तेव्हा त्यांना आठवलं, त्यांचं एकेकाळचं स्वप्न सीए होण्याचं. त्यांनी चौकशी केली वयोमर्यादा आणि आणि आताच्या अभ्यासक्रमाची. मग कळलं इतक्या वर्षांनी आर्टिकलशिप शिवाय सीए शक्य होणार नाही. पण, आयसीडब्ल्यूए म्हणजे सीएमए शक्य होईल आणि ते झाल्यावर सीए साठीही अर्ज करता येईल.

…. झालं. 64 व्या वर्षी विनया नागराज यांचं ध्येय निश्चित झालं. सीएमए करायचं.

…. 65 व्या वर्षी अभ्यास आणि ऑनलाईन परीक्षा

अभ्यास आणि त्यासाठी लागणारं व्यवस्थापन हे विनया यांच्या अंगातच आहे. मानसिक तयारीही होती. पण, 1974 मध्ये सोडलेलं शिक्षण 2018मध्ये पुन्हा सुरू करायचं हे थोडीच सोपं होतं. काळ बदलला होता, अभ्यासक्रम बदलला होता, अभ्यासाची तंत्रं बदलली होती बरोबरचे विद्यार्थी बदललेले होते. सगळं नवंच होतं. पण, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, ही काही फक्त म्हण नाही आहे. ती प्रत्यक्षातही उतरवता येते, असा विश्वास त्यांनी बाळगला.

नवीन अभ्यासक्रमात संगणकाविषयी ज्ञान अत्यावश्यक होतं. एक अख्खा पेपरच त्यावर होता. विनया यांनी बँकेच्या नोकरीतही कधी फारसा संगणक वापरला नव्हता. जो वापरला तो लॅन नेटवर्कवर… लेजर बुकशी त्यांची दोस्ती. म्हणजे आता संगणक शिकणं आलं. आणि मग त्या बरोबरी सगळेच नवीन असलेले विषय प्रत्येक कोर्सला चार याप्रमाणे..

नवीन जगात तरुण मुलं अभ्यासासाठी कुठली साधनं वापरतात, कोणती नवीन पुस्तकं उपलब्ध आहेत, क्लासेस नेमके कसे भरतात, यातल्या कशाचाही गंध नव्हता. पण, प्रयत्न सोडायचे नव्हते.

अभ्यास सुरू केला. आणि आयसीडब्ल्यूए संस्थेकडून पुस्तकंही आली, त्यांच्याकडूनही एक एक माहिती कळत गेली. संगणक कोर्सचं प्रशिक्षणही संस्थेकडूनच आयोजित केलं जातं हे कळलं. अभ्यासक्रमाचे क्लासेस भरतात ही माहिती मिळाली. त्याप्रमाणे संगणक आणि चॅप्टर क्लास दोन्हीची सुरुवात झाली.

सुरुवातीला सांगितलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या या सीएमए चॅप्टर क्लासचा पहिला दिवस.

क्लासची चौकशी करण्यासाठी त्या आपल्या सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेल्या होत्या.

कारण, आताही सीएमए करतोय म्हणजे घर चालवण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतोय, अशा अभिनिवेश नव्हताच त्यांचा. घर सांभाळून अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळणं जमेल एवढाच त्यांचा आत्मविश्वास होता.

बँकेच्या नोकरीत आणि एरवी चार-चौघात वावरतानाही फारशा न बोलणाऱ्या विनया आता मात्र क्लासमधल्या लहान मुलं आणि शिक्षकांमध्ये चांगल्या बोलू लागल्या होत्या. शंका विचारत होत्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही देत होत्या. मुलं जी गणितं कुलकुलेटर करत तीच त्यांच्याही आधी या तोंडी सोडवत. अभ्यासातही क्लासमधील 20 वर्षांच्या मुलांपेक्षा त्या काकणभर सरसच आहेत ही गोष्ट हळुहळू इतरांच्या लक्षात आली. आणि क्लासमधली सगळी मुलं त्यांची मित्र झाली. संगणक शिकवायला या मुलांची आणि घरी सून दिशा यांची मदत झाली.

सुरुवातीला दर सहामाहीला एकच कोर्स घेणाऱ्या विनया यांनी जानेवारी 2021 मध्ये उर्वरित दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्रच दिली. कोव्हिडमुळे 2020 साली परीक्षाच होऊ शकली नव्हती. परीक्षा एकत्र देण्याचा विश्वास त्यांना त्यांचे पुणे चॅप्टर क्लासचे शिक्षक आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे सुरुवातील संगणकावर बसायला घाबरणाऱ्या विनया यांनी शेवटची परीक्षा कोव्हिड मुळे ऑनलाईन म्हणजे पूर्णपणे संगणकावर दिली. आणि फायनलला त्यांना 59% गुण मिळाले.

आता त्यांनी सीए साठीही प्रवेश घेतला आहे.

‘अनंत अमुची ध्येयासक्ती’.. 

मानसोपचारतज्ज्ञ शैलेश उमाटे यांना विनया नागराज यांचं उदाहरण समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करणारं वाटतं. “अनेकदा आयुष्याच्या पूर्वार्धात अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे मनुष्य उत्तरार्धात आसवं तरी गाळतो. किंवा आपलं स्वप्न मुलं पूर्ण करतील असं म्हणत स्वप्न दुसऱ्यांवर लादतो. पण, विनया यांनी निवडलेला मार्ग आगळा वेगळा आहे,” शैलेश उमाटे यांनी सांगितलं.

त्यांनी निवडलेल्या स्वकर्तृत्वाच्या मार्गामुळे विनया यांचं जगणं मानसशास्त्रातल्या परिपूर्णता (MATURITY) किंवा ज्ञानदायी (WISDOM) अवस्थेकडे जातं. आणि या जगण्यातून त्यांना आणि कुटुंबीयांनाही समाधान मिळतं, असं वर्णन उमाटे यांनी केलं आहे.

शिवाय 65व्या वर्षी शिक्षण घेतल्यानंतर आपलं ज्ञान इतरांमध्ये वाटण्याची उर्मीही विनया यांच्याकडे आहे याविषयीही शैलेश उमाटे यांनी बोट दाखवलं आहे.

“स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं. ते पूर्ण केलं. पण, त्याच बरोबरीने इतरांना शिकवण्याची तयारी दाखवून त्यांनी आपलं ध्येयही व्यापक केलं आहे. त्यामुळे त्यांना मिळणारी सकारात्मक उर्जा खूप वरची आहे,” असं उमाटे यांनी बोलून दाखवलं.

माहिती प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेल्या दोन दिवसांपासून आमचं कुटुंब एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. हे फार गंभीर आहे आणि तुमच्या सोबत हे घडू नये म्हणून हे इथं मांडतोय… २९ तारखेला दुपारी ३.२० वाजता माझ्या बायकोच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला ! 

मी ड्युटीवर होतो म्हणून डिटेल्स काही न सांगता ती एवढंच म्हणाली की, ‘ लवकर घरी या फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’ चार वाजता घरी आलो तर तिने रडायला सुरुवात केली. आधी तिला समजावून सांगितले, शांत केलं आणि काय झालं आहे याबद्दल स्पष्ट विचारलं तेव्हा जे समजलं ते मलाही शॉकिंग होतं. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तिला पैशाच्या मागणीसाठी मेसेज आला होता,  ज्यामध्ये —  

‘तुमचा आठशे रुपयांचा EMI बाकी आहे आणि तो भरा अन्यथा तुमचा फोटो व्हायरल करु’ अशी धमकी होती. 

आधी बायकोला पैसे मागितले तेव्हा त्यात काही वाटलं नाही पण समोरच्या व्यक्तीने एक मॉर्फ केलेला फोटो पाठवला. तेव्हा मात्र तिने एका सेकंदात तो फोटो डिलीट केला आणि तो नंबर ब्लॉक करून डिलीट केला.

पॅनिक न होता हे प्रकरण हाताळणं आवश्यक होतं, तिला धीर देणं त्याक्षणी सर्वात महत्वाची गोष्ट होती. समाधानाची गोष्ट हीच होती की, घाबरून जाऊन बायकोने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले नव्हते!

आम्ही सायबर क्राईम ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली. तसेच एक कंप्लेंट जवळच्या पोलिस स्टेशनलाही केली. तसं पाहिलं तर पोलिसांसोबत संपर्क रोजचाच पण आजचं कारण वेगळं होतं. त्यांनी फार शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि समजावून सांगितल्या. काहीही झालं तरी पॅनिक व्हायचं नाही आणि कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत हे सांगितले… अर्थात आम्ही तेवढे स्ट्रॉंग होतोच! 

काल दुपारी आणखी एका नंबरवरून साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच ‘तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला फोन/मेसेज करून पैसे मागू’ अशी धमकी दिली. तो नंबर आणि डिटेल्सही पोलिसांना पाठवले. आणखी आठ दहा दिवस हे होतच राहणार आहे. बायकोने याबद्दल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं आणि संपर्कातील जवळपास सर्वांना स्वतः सांगितलं जेणेकरून त्यांनाही याबाबत कळावं, त्यांना काही अडचण येऊ नये. 

तिने कोणतंही लोन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्की की, मोबाईल वापरतेवेळी तिच्याकडून कुठेतरी चूक झाली होती, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक झालेलं असणार आहे.

आम्हाला हेही माहीत नाही की, समोरील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री! बिहार, झारखंड या भागातील लोक असावेत. पोलिसांनी सांगितलं की दिवसाला किमान चार ते पाच केस आपल्याकडं अशा दाखल होत आहेत. सध्या याचं खूप प्रमाण वाढत आहे.

या प्रकरातून एक गोष्ट तर समजली आहे की, ते लोक माईंड गेम खेळत असतात. आपलं घाबरून जाणं हे त्यांचं भांडवल असतं. आपला मेंदू या गोष्टींसाठी तयार नसतो, बदनामीची भीती असते. हे लोक याच गोष्टींचा फायदा घेतात. जे लोक कोणाला याबाबत बोलत नाहीत, गोष्ट लपवून ठेवतात ते आणखी अडकत जातात. एका पोलिस मित्राच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत सुद्धा पोहोचली आहेत. 

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलेलं बघून माझ्याच ओळखीच्या दोघांनी त्यांच्याबद्दल घडलेले असेच किस्से सांगितले. त्यापैकी एका मुलीने एका मेसेज मुळे घाबरून जाऊन पंचवीस हजार रुपये समोरच्याला दिले होते.

हे सर्व इथं का लिहितोय तर त्याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमचा संदर्भ देऊन कोणी पैसे मागत असेल, धमकी देत असेल तर कोणी लक्ष देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणासोबत असं घडू नये आणि समजा घडलंच तर त्या जाळ्यात अडकू नये!

‘जमतारा’ ही वेब सीरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहीत असेलच हे सर्व. सीरीजच्या नावातच त्यांनी लिहिलं आहे… सबका नंबर आयेगा ! आपल्या मोबाईलमधली माहिती सुरक्षित नाही. कोणतंही ऍप्लिकेशन घेताना, काहीच न वाचता आपण ‘I Agree’ करतो. कोणत्याही लिंक नकळत उघडतो आणि हे चक्र सुरू होतं. 

आज आमचा नंबर आहे उद्या कोणाचाही असू शकतो… so be careful!

लेखक : डॉ.प्रकाश कोयाडे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलो होतो..

विषय अर्थातच पाण्याचा होता, गप्पा चालू होत्या, विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक observe करत होतो, अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबल वर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे.

मनाला काहीतरी खटकत होतं.

मिटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेल मध्ये घुसलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्ध ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं?

तो म्हटला ज्या वेटरने टेबल क्लिअर केला असेल त्याने ते पाणी बेसिन मधे ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.!

 म्हटलं विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील?

तो म्हटला, नाही म्हटलं तरी 15 ते 20 जण सरासरी. दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.

म्हटलं. म्हणजे 10 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं तर साधारण सरासरी 250 जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार!

म्हणजे सरासरी रोज 350 जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे 100 लिटर पाणी बेसिन मधे “रोज वाया”.

म्हणजे एक हॉटेल कमीतकमी 100 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेज मधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं.

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून 6000 च्या वर हॉटेल्स आहेत. 

म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर,

 म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला.

हे झालं एका दिवसाचं , असं आठवड्याचं म्हटलं तर 42 लाख लिटर अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे एका शहराचं, अशी महाराष्ट्रात कमीत कमी 15 मोठी शहरं आहेत . मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वगैरे वगैरे कित्येक.

बर हे कोणत्या देशात, कोणत्या राज्यात घडतंय?? तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार जर 4 तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरिया सारख्या रोगाने मरतोय त्या राज्या देशात. म्हणजे एका बाजूला लोक पाण्यावाचून तडपून मरतायत अन दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

बरं हे पाणी येतं कुठून..तर आपल्या आसपासच्या dams मधून. पुण्याच्या आसपास 7 dams आहेत, पुण्याला दरवर्षी साधारण 13 TMC पाणी लागतं, अन यावर्षी उपलब्ध पाणी आहे 17 TMC,  उरलेलं 4 TMC पाणी शेतीला. 

यावर्षी मात्र पाऊस कमी झाल्याने अन पुण्याची लोकसंख्या सतत वाढत असल्याने शेवटी राज्य सरकारने आदेश दिलेत की 17 TMC पाणी हे पुण्याला देण्यात यावं  म्हणजे शेतीला उन्हाळी आवर्तनासाठी पाणी जवळ-जवळ नाहीच!!. म्हणजे आपण जे वाया घालवतोय ते या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे. “उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय”… हा क्रूर विरोधाभास आहे!

पण हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी.. मोजून दोन… 

इथून पुढं कधीही वेटर समोर तुमच्या ग्लास मधे पाणी ओतत असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा … अर्धा ग्लास!! 

याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल, हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

फार छोटी गोष्टय,  फक्त दोन शब्द उच्चारायचेत पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात…

लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय,, त्याच मानवजातीला अजून पर्यंत ‘पाणी’ मात्र निर्माण करता आलेलं नाहीये..

मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी की… तेही आपल्याच माणसांसाठी…!! 

सो इथून पुढं हॉटेल मध्ये असलो की …. “अर्धाच ग्लास पाणी..!!!”

— ( हे फक्त पुण्यातच घडतं असं समजुन दुर्लक्ष करु नका…. पोस्ट गरजेची म्हणून पाठवली, साभार : डी डी कट्टा ग्रुप)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आमचे काका ति स्वः दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मितल्या,ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या  शूरवीरांच्या कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता- ऐकतांना प्रसंग डोळ्या समोर  उभा राहयचा.लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली,  अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे; श्री कर्णिकांची.  पुण्यातल्या श्री तांबडी जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता,..थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडुशेट   गणपती   मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे नां ! तोचं तो रस्ता.  त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दिपस्तंभ अजूनही कित्येक वर्षाचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे. आणि त्यावर नांव कोरलय” –भास्कर दा.कर्णिक.–   कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठ बलिदान केलंआहे . पण=पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावांची ही निशाणी?      श्री कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श -त्यांचं बलिदान, त्यांच नांव आपण मनांत जागवूया. श्री.भास्कर दा.कर्णिक ऑडिनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व . त्या काळचे १९४० -४२ सालचे उच्च पदवी विभूषित  असलेले हे धडाडीचे तरुण,देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनांत विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तिथलीच  सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब   तयार केले.    थोडे  थोडके नाहीं तर अर्धा ट्रॅक भरून बॉम्बची सज्जता  झाली. आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना  देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांव सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे श्री दिक्षित श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय देवीच्या मंदिरातही हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबतं होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले.  पण — पण हाय रे देवा ! कसा   कोण जाणे! दुर्देवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारासह श्री कर्णिक पकडले गेले.      फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं, आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे नां ?तीच ती जागा!.पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण.. पण श्री कर्णिक, मुख्य आरोपी म्हणून, डाव फसलयामूळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं .. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजुला गेले. क्षणार्धात… क्षणार्धात.. खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते,.. ते कोसळले…. आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग -केला.  तर मंडळी असा  आहे त्या पायरीचा इतिहास…..  मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी,हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय.   मध्यंतरी बराच काळ गेला  आहे .भास्कर दा.  कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत.त्यामुळे आतां – -हया हुताम्याचाही दुर्देवाने  पुणेकरांना विसर पडलाय.    संपली श्री भास्कर दा. कर्णिक  यांची  कहाणी . ज्यांना ही कथा माहित आहे. ते दगडूशेठ गणपती मंदिरातून बाहेर पडतात. डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात. क्षणभर विसावतात. आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. 

कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तू सध्या उपेक्षित ठरलीय.  कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.  स्तंभावरील अक्षरे पण  पुसट झाली आहेत. तरीपण आपण श्री कर्णिकांच्या शौर्याला स्मरून,ह्या हुतात्म्याची आठवण म्हणून, स्तंभापुढे नतमस्तक होऊयात का ?      

धन्यवाद ..       

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print