मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री गणपति तालम् स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्री गणपति तालम् स्तोत्रम् ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

विकटोत्कटसुंदरदंतिमुखं

भुजगेंद्रसुसर्पगदाभरणम् ।

गजनीलगजेंद्र गणाधिपतिं

प्रणतोऽस्मि विनायक हस्तिमुखम् ॥ १॥

सुर सुर गणपति सुंदरकेशं

ऋषि ऋषि गणपति यज्ञसमानम् ।

भव भव गणपति पद्मशरीरं

जय जय गणपति दिव्यनमस्ते ॥ २॥

 *

गजमुखवक्त्रं गिरिजापुत्रं

गणगुणमित्रं गणपतिमीशप्रियम् ॥ ३ ॥

 *

करधृतपरशुं कंकणपाणिं

कबलितपद्मरुचिम् ।

सुरपतिवंद्यं सुंदरनृत्तं

सुरचितमणिमकुटम् ॥ ४ ॥

 *

प्रणमत देवं प्रकटित तालं

षड्गिरि तालमिदम् ।

तत्तत तो षड्गिरि तालमिदं

तत्तत षड्गिरि तालमिदम् ॥ ५ ॥

 *

लंबोदरवर कुंजासुरकृत कुंकुमवर्णधरम् ।

श्वेतसशृंगं मोदकहस्तं प्रीतिसपनसफलम् ॥ ६ ॥

 *

नयनत्रयवर नागविभूषित नानागणपतिदं तत्तत्

नयनत्रयवर नागविभूषित नानागणपतिदं तत्तत्

नानागणपति तं तत्तत् नानागणपतिदम् ॥ ७॥

 *

धवलित जलधरधवलित चंद्रं

फणिमणिकिरणविभूषित खड्गम् ।

तनुतनुविषहर शूलकपालं

हर हर शिव शिव गणपतिमभयम् ॥ ८ ॥

 *

कटतट विगलितमदजल जलधित-

गणपतिवाद्यमिदं

कटतट विगलितमदजल जलधित-

गणपतिवाद्यमिदं

तत्तत् गणपतिवाद्यमिदं

तत्तत् गणपतिवाद्यमिदम् ॥ ९ ॥

 *

तत्तदिं नं तरिकु तरिजणकु कुकु तद्दि

कुकु तकिट डिंडिंगु डिगुण कुकु तद्दि

तत्त झं झं तरित

त झं झं तरित

तकत झं झं तरित

त झं झं तरित

तरिदणत दणजणुत जणुदिमित

किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों ताम् ॥ १० ॥

 *

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

शशिकलित शशिकलित मौलिनं शूलिनम् ।

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

विमलशुभकमलजलपादुकं पाणिनम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

प्रमथगणगुणकथितशोभनं शोभितम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

पृथुलभुजसरसिज विषाणकं पोषणम् ।

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

पनसफलकदलिफलमोदनं मोदकम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

प्रणतगुरु शिवतनय गणपति तालनम् ।

गणपति तालनं गणपति तालनम् ॥ ११ ॥

 *

☆ मराठी भावानुवाद ☆

 *

विशाल बलवंत चारुदंतआनन

गदा सर्पराज भूषण धारण

गजनील गजराज गणाधिपती

गजमुख विनायक करितो नमन ॥१॥

 *

सुकुंतला सुर सुर देव गणपती

यज्ञसमान ऋषी ऋषी गणपती

कमलदेही भव भव गणपती

दिव्यप्रणाम जय जय गणपती ॥२॥

 *

गजवक्रतुंड गिरिजापुत्र

शिवप्रिय गणपती गणगुणमित्र ॥३॥

 *

प्रभा कमलासम हाती परशु करावरी कंकण

सुरपती वंद्य किरिट रत्नजडित मोहक नर्तन ॥४॥

 *

प्रणाम इशा प्रकटे ताल 

षट्गिरींचा वाजे ताल 

तोचि तो षट्गिरी ताल 

तोचि तो ऐसा षट्गिरी ताल ॥५॥

 *

सिंदूर वर्णी लंबोदरा कुंजासुरद्वारा पूजित 

हाती मोदक श्वेत मूषक प्रीति-स्नेहाने भजित ॥६॥

 *

नानागणपती त्रिनेत्री नागविभूषित तोचि तो 

नानागणपती त्रिनेत्री नागविभूषित तोचि तो 

नानागणपती तोचि तो नानागणपती तोचि तो ॥७॥

 *

श्वेतवर्ण मेघासम श्वेतवर्ण सोमासम

तेज खड्गधारी फणिमणिकिरणासम

विषहारी देह शूलकपालधारी

हर हर शिव शिव अभयद गणपती ॥८॥

 *

सागरतटी लाटांचा गाज गणपती वादन बाज 

सागरतटी लाटांचा गाज गणपती वादन बाज 

तोचि जणू गणपती वादन बाज 

तोचि जणू गणपती वादन बाज ॥९॥

 *

तत्तदिं नं तरिकु तरिजणकु कुकु तद्दि

कुकु तकिट डिंडिंगु डिगुण कुकु तद्दि

तत्त झं झं तरित

त झं झं तरित

तकत झं झं तरित

त झं झं तरित

तरिदणत दणजणुत जणुदिमित

किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों ताम् ॥ १०॥

 *

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

शिरावरी शोभतो शशी हाती शूल धारण

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

चरण कमलासम, हस्त जयाचे पावन

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

सुशोभित वर्णित प्रशंसित जैसे प्रमथ गण

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

शंखधारी विशाल बाहु पालक पद्मसमान 

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

रंभापर्णावरी मोदक मोदभरे ते भोजन

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

तालदेवता शिवपुत्र गणपती गुरूसिया पूजन

गणपति ताल गणपति तालन॥ 11 ॥

 *

☆ ॥ इति निशिकान्त भावानुवादित श्री गणपति ताल स्तोत्र संपूर्ण ॥ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

जागतिक कीर्तीचे प्रख्यात शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि फलज्योतिष्याच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी सकाळी कळली आणि त्यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणीने मन उचंबळून आले. त्यांनी त्यांचे गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत ‘स्थिर-स्थिती विश्वाचे’ समर्थन करणारा ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ मांडला होता. तसेच त्यांनी मराठी भाषेत विज्ञान साहित्याचे दालन खुले केले. हे त्यांचे खूपच मोठे काम होते.

मी जेव्हा मराठीतून विज्ञान प्रसार करण्यासाठी लेखक म्हणून लिहिता झालो होतो, त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्या ‘कथा ही रक्ताची’ — रक्ताबद्दल वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. तेव्हा त्यांनी मी नवखा असूनही माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे आठवते. एवढे मोठे शास्त्रज्ञ असूनही ते एवढ्या मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते की, मी अचंबित होऊन गेलो. त्यानंतर ‘ज्योतिष शास्त्रावर प्रकाशझोत’ हे माझे पुस्तक मी त्यांना अभिप्रयार्थ पाठवले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रचंड कामाच्या व्यापातूनही तत्परतेने ते पुस्तक वाचून त्यावर त्यांच्या हस्ताक्षरात मला अभिप्राय पाठवला होता. (छायाचित्रात तेच पत्र आहे.) माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे. तो मी मरेपर्यंत जपून ठेवणार आहे. त्यांच्या या प्रोत्साहनपर अभिप्रायामुळेच पुढे मी लिहिता राहिलो.

त्यांच्याबरोबर माझ्या अशा अधून-मधून भेटी होत राहिल्या आणि मी समृद्ध होत गेलो. अशी व्यक्ती आयुष्यातून निघून जाणे म्हणजे आपल्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होणे असते. पण अर्थातच त्यांच्या साहित्यामुळे ती पोकळी भरून निघेल याची मला खात्री आहे आणि ते कायम आपल्या सोबत असतील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धीरे से आजा रे अखियन में… –  लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ धीरे से आजा रे अखियन में… –  लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

संगीतकार सी. रामचंद्र 

” धीरे से आजा रे अखियन में “….

अनेक वर्षांपूर्वीची पण विसरता न येणारी ही हकीकत आहे — 

“बाळ रडतंय? ग्राईप वॉटर दे त्याला” अशी माझी परिस्थिती झाली होती. संध्याकाळी मी ऑफीस मधून घरी आले तेव्हा मस्त खेळत असलेला माझा तान्हा मुलगा अचानक खूप रडू लागला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये लहान बाळ म्हणून त्याचे लाड होत असत. कौतुक होत असे. संध्याकाळी त्याच्याशी खेळायला आजूबाजूची लहान मुलं येत असत. तसेच बिल्डींग मधल्या शेजार्‍यांची जा – ये त्याच्यासाठी आमच्या घरी असे. त्याचं रडणं थांबवण्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून बघितले, उपाय सुचवले. पण ते व्यर्थच. असा इतका, तो कधीच रडत नसे. मी मनातून धास्तावले होते.

या काळात, शिवाजी पार्कला आमच्या शेजारच्या गल्लीत राहणारे सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर यांच्याशी नुकताच परिचय झाला होता. आमच्या शेजार्‍यांचे ते मित्र होते. नेमके त्याच वेळी ते रात्री गप्पा मारायला म्हणून तिथे आले. आमच्या मजल्यावरच्या चारही ब्लॉक्समधील सगळी मंडळी आमच्या घरात, आणि “बाळ रडतंय” चा गोंधळ बघत ते थोडा वेळ शांतपणे आमच्या दाराच्या चौकाटीत उभे राहिले.

काही मिनिटांनंतर ते पुढे आले आणि मला म्हणाले,

“दे त्याला माझ्याकडे! ” 

साशंक मनाने मी बाळाला त्यांच्या हातात दिलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि किंचित हसून मला म्हणाले, “अगं मुली, त्याचं काही दुखत नाही. त्याला कंटाळा आलाय. तुमची औषधं, तुमच्या नजरेतील भिती, तेच तेच चुटक्या वाजवणं हे सगळं त्याला नको आहे. शांत रहा आता जरा मी बघतो”.

ते सोफावर छान मांडी घालून बसले. बाळाशी हंसले, त्याला मांडीवर घेऊन थोपटू लागले. बाळाचं रडण कमी झालं. आम्ही सगळे चकित होऊन बघत होतो. तोंडावर बोट ठेवून त्यांनी आम्हा सगळ्यांना शांत रहाण्याची खूण केली.

-एखाद मिनीट गेलं असेल…. आणि आमच्या घराच्या भिंती जणू झंकारल्या. खुद्द सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर माझ्या मुलासाठी लोरी म्हणत होते”.

“धीरेसे आजा रे अंखियन मे, निंदिया आजा रे आजा.. “

आणि बाळ मजेत त्यांचं बोट मुठीत धरुन हसत होतं.

आम्ही सगळे स्तब्ध. एक इतकं मोठं नामवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत असं संगीतातलं व्यक्तिमत्त्व, आमच्या घरात केवळ एक लहान बाळ रडतय् म्हणून ही लोरी, जी लता मंगेशकरांच्या आवाजात देशातल्या घराघरात पोचली आहे. ती म्हणतांना ऐकणं, बघणं हा एक शब्दातीत अनुभव होता. मुख्य म्हणजे ते स्वत: त्या लोरीत इतके रमले होते की गाणं पूर्ण होतांना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझा मुलगा त्यांच्या मांडीवर गाढ झोपला होता.

मला योगायोगाने भेटलेल्या प्रतिभावंतांच्या भेटी संबंधीच्या आठवणीतील ही एक मनावर कोरली, नव्हे, गोंदली गेलेली आठवण आहे.

नंतरही ते अधून मधून येत राहिले. गप्पांच्या ओघात कधी ते विविध चाली ऐकवत असत, कधी एखाद्या गाण्यामागची आठवण सांगत असत. ते गप्पात रमून जायचे आणि इतरांनाही मजा आणायचे.

एखादा गायक, कलाकार, लेखक, कवी यांना सर्वसामान्य माणसं त्यांच्यातील प्रतिभेमुळे ओळखत असतात, त्यांच्या कलेवर प्रेम करत असतात. हेच प्रतिभावंत जेव्हा एखाद्या क्षणी स्वत:चं समाजातलं मोठेपण विसरुन, नकळत, सहजगत्या आपला स्वभाव, माणूसपण दाखवतात तेव्हा ती एक स्मृती बनून मनात घर करुन रहाते.

सी. रामचंद्र या नावापुढे एक संगीत रसिक म्हणून तर पूर्वी माझे हात जुळायचेच पण वर दिलेल्या घटनेनंतर त्यांच्या नावाच्या उल्लेखाने एक “आई ” म्हणूनही माझे हात आपोआप जुळतात. कोणत्याही वाद्याशिवाय, कोणतीही साथ नसतांनाचा त्यांचा निखळ आवाज, ती तल्लीनता आणि चेहर्‍यावरचे लहान बाळा प्रतीचे वत्सल भाव आठवतांना मला आजही गहिवरुन येतं.

मंदिरातल्या घंटा नादासारखा त्यांचा आवाज या गाण्याच्या संदर्भात मला आश्वासक वाटला. कोणत्याही अस्वस्थ क्षणी तद्रूप होऊन त्यांनी गायलेले लोरीचे शब्द आठवत रहातात आणि डोळे झोपेच्या आधीन होतात.

“धीरे से आजा रे अँखियन में

निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा

छोटे से नैनन की 

बगियन में

निन्दिया आजा रे आजा,

धीरे से आजा

लेकर सुहाने सपनों की कलियाँ

आके बसा दे पलकों 

की गलियाँ,

पलकों की छोटी सी 

गलियन में

निन्दिया आजा रे आजा,

धीरे से आजा. “

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यर्थ न हो बलिदान…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यर्थ न हो बलिदान…☆ सुश्री शोभा जोशी ☆

९ जून हा भगवान बिरसा मुण्डा यांचा बलिदान दिवस. माणूस जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या मृत्युची तारीख ठरलेली असते असं म्हणतात. जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. त्यावर माणसांची सत्ता नाही. पण जन्म आणि मृत्यु या मधल्या काळावर मात्र माणसाची सत्ता असते. तो काळ तुम्ही कसा व्यतीत करता यावर तुमच्या जन्माचे सार्थक अवलंबून असते.

इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांचे जीवन सार्थकी लागले. जनजातीतील अशा हुतात्म्यांमध्ये बिरसा मुण्डा यांचे नाव अग्रणी आहे. आपला धर्म, आदिवासी परंपरा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न, लोकांनी ख्रिश्र्चन पाद्र्यांच्या जाळ्यात अडकून आपला धर्म बदलू नये म्हणून केलेले प्रयत्न आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूध्द दिलेला लढा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

बिरसांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ह्या दिवशी, वडिल सुगाना मुण्डा आणि आई कर्मी यांच्या पोटी झारखंड मधील उलिहातू गावी झाला. हे मुण्डा कुटुंब अत्यंत गरीब होते. गावोगावी जाऊन मोलमजूरी करून पोट भरत असे.

परिस्थिती वशात मुण्डा कुटुंबाने ख्रिश्र्चन धर्म स्वीकारला आणि बिरसाला ख्रिश्र्चन मिशनर्‍यांच्या शाळेत घातले. तिथे जेवणात दिले जाणारे गायीचे मांस आणि त्याला शेंडी कापण्यासाठी केलेली सक्ती, याविध्द बिरसांनी बंड पुकारले. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

इथूनच बिरसांच्या इंग्रजांविरूध्दच्या संघर्षाला सुरूवात झाली. ते दोन पातळ्यांवर इंग्रजांशी संघर्ष करीत होते. एक म्हणजे आपल्या हिंदू धर्मावर ख्रिश्र्चन धर्माचे आक्रमण होऊ नये म्हणून आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे. बिरसांची आनंद पांडे यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याकडून ते खूप गोष्टी शिकले.

हिंदू धर्माचे रक्षण. . . आनंद पांडे यांच्याकडे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. आपल्या रामायण, महाभारत, गीता इ. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. ख्रिश्र्चन पाद्री, जनजाती समाजाला निरनिराळी प्रलोभने दाखवून ख्रिश्र्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. पण बिरसाने लोकांना पटवून दिले की. . .

धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम।न तत्सेवेत मेधावी न हि तध्दितमुच्यते।।

धर्मास सोडून असलेले कर्म जरी महाफलदायी असलेतरी बुध्दिमानाने ते करू नये कारण ते हितकारक आहे असे कोठेही सांगितलेले नाही. असा उपदेश करून अनेक लोकांना त्यांनी ख्रिश्र्चन होण्यापासून परावृत्त केले.

त्यांनी बिरसाईयत पंथाची स्थापना करून काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. भगवान बिरसा मुण्डा हे आदिवासींची धार्मिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा, अस्तित्व वअस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणू लागले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष. . . . बिरसांचा लोकांवरील वाढता प्रभाव बघून ख्रिश्र्चन पाद्र्यांनी इंग्रज अधिकार्‍याकडे तक्रार केली की, बिरसा हा हिंदू सन्यासी, आदिवासींचा राजा होऊ पाहातो आहे तो ब्रिटिशांविरूध्द जनतेला भडकावतो आहे. या तक्रारीवरून बिरसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले. पण ग्रामस्थांनी सक्त विरोध करून बिरसांना पकडायला आलेल्या सशस्र पोलिसांशी तीव्र लढा दिला व त्यांना परत पाठवले. पण शेवटी छल कपटाने २५ आॅगस्ट १८९५ रोजी पोलिसांनी

अटक करून बिरसांना हजारीबाग तुरूंगात ठेवले.

३० नोव्हेंबर१८९७ रोजी बिरसा तुरूंगातून मुक्त झाले. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या हजारो लोकांची त्यांनी शिस्तबध्द संघटना बांधली आणि त्यांना इंग्रजांविरूध्द उठाव करण्यास प्रेरित केले. त्याला उलगुलान (क्रांती) नाव देण्यात आले. २४ डिसेंबर १८९९ यादिवशी उठाव करण्याचे निश्र्चित केले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पोलिस चौक्या, शासकीय कार्यालये, गोदामे यांच्यावर हल्ले करण्यात आले. इंग्रज शासक, ख्रिश्र्चन पाद्री, आणि आमचे शोषण करणारे आमचेच लोक (उदा. जमीनदार, सावकार इ. )यांना त्यांनी प्रमुख शत्रू म्हणून घोषित केले.

९ जानेवारी १९०० रोजी बिरसांनी जोजोहातूच्या जवळील डोमबारी टेकड्यांवर एक सभा आयोजित केली या सभेत हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले होते. तेथील आयुक्त स्ट्रीटफिल्ड यांना ही बातमी समजताच त्यांनी संपूर्ण डोंगराला आपल्या सैन्याचा वेढा दिला. आणि लोकांवर बेछूट गोळीबार केला.

इंग्रजांच्या बंदुकांपुढे बिरसांच्या सेनेच्या, धन्युष्यबाण, भाले यांचा निभाव लागला नाही. हजारो बायका, मुले, पुरूष मृत्युमुखी पडले.

बिरसा तिथून कसेतरी निसटलेआणि जंगलात लपून राहिले व तिथून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणार्‍यास ५००/-रू. चं बक्षीस जाहिर केलं. पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. पण बिरसा हाती लागले नाहीत.

“कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ “अशी आपल्याकडे म्हण आहे. शेवटी फंदफितुरी झाली आणि ३ फेब्रु. १९०० रोजी पोलिसांनी बिरसांना अटक केली. त्यांना रांचीच्या तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. शेवटी ९ जून १९०० या दिवशी रक्ताची उलटी होऊन त्यांची प्राण ज्योत मालवली, त्यांना विष देऊन मारण्यात आले असाही संशय व्यक्त करण्यात येतो.

त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. . . . बिरसांच्या मृत्युनंतर त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून छोटा नागपूर क्षेत्रात सरकारने जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. त्यांच्या उपदेशामुळे मुण्डांच्या समाज जीवनात अमुलाग्र बदल झाला. अनेक क्षेत्रात मुण्डा आजही चमकदार कामगिरी करताना दिसतात. बिरसांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. जनजातीतील ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ रांची विमानतळाला त्यांचे नाव दिले आहे. १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘ जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

बिरसांनी भारतीय संस्कृती, परंपरा, स्वधर्माचे रक्षण करत स्वातंत्र्य लढ्यात कर्तव्याच्या रणभूमीवर मृत्युला आलिंगन दिले.

९ जून या त्यांच्या बलिदान दिनी आमचे त्यांना शतशः प्रणाम.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’सचखंड एक्स्प्रेस‘ मधील अनोखा आणि अविश्वसनीय उपक्रम!” – (अनुवादित लेख) अनुवाद : सुश्री प्रकाश चांदे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य 

☆ “’सचखंड एक्स्प्रेस‘ मधील अनोखा आणि अविश्वसनीय उपक्रम!” – (अनुवादित लेख) अनुवाद : सुश्री प्रकाश चांदे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

रेल्वेच्या भारतात दररोज सुमारे तेरा हजार गाड्या धावतात. या गाड्यांतून 2 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. पण या तेरा हजार गाड्यांत फक्त एकच गाडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचं वैशिष्ट्य वेग, आरामदायी सुखसोयी अथवा आधुनिक तंत्रज्ञान नाही; तर त्या गाडीत मिळणारी दयाळू, माणुसकीची वागणूक!

या गाडीचं नाव ‘ सचखंड एक्स्प्रेस ‘!

अख्ख्या भारतात सलग 35 तास आणि 2, 000 कि. मी. प्रवास करणारी आणि महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना जोडणारी ही एकच अशी गाडी आहे की जिच्यातील प्रवाशांना दररोज सकाळची न्याहरी, दुपारचं भोजन आणि सायंकाळचं भोजन मोफत मिळतं.

‘सचखंड एक्प्रेस‘ (नं. 12715) ही गाडी महाराष्ट्रातील नांदेड आणि पंजाब राज्यांतील अमृतसर या शिखांच्या दोन पवित्र शहरांदरम्यान धावते.

या गाडीनं प्रवास करणाऱ्यांना ताजं घरगुती भोजन, एकही रुपया न आकारता, मोफत दिलं जातं. कढी भात, भाजी, आणि ताज्या पोळ्या या हसतमुखानं दिल्या जातात.

हे अन्न गाडीतील भटारखान्यात शिजवलं जात नाही; तर वाटेतील ज्या ज्या गावी गुरुद्वारा असतील त्या त्या गावांत शिजवलं जातं आणि त्या त्या गावातील स्वयंसेवक ते गाडीवर आणून प्रवाशांना देतात.

शिखांच्या ‘ लंगर ‘ मध्ये दररोज कुणाही गरीब, श्रीमंत, स्थानिक, अनोळखी किंवा बाहेरगावच्या व्यक्तीला त्या वेळचं अन्न मानानं दिलं जातं; त्या प्रथेला अनुसरूनच या गाडीत हे अन्न दररोज सर्व प्रवाशांना दिलं जातं.

हा अनोखा, अद्भुत आणि माणुसकी जागवणारा उपक्रम 1995 पासून सुरु झाला; आणि गेली 30 वर्षे तो अव्याहतपणे चालू आहे! ही सेवा एकाच गावी पुरवली जात नाही. वाटेत लागणाऱ्या वेगवेगळ्या गावी ही सेवा पुरवली जाते.

या गावांची अधिकृत यादी अशी नाही; पण वाटेत लागणाऱ्या छ. संभाजी महाराज नगर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, दिल्ली आणि लुधियाना अशा शहरांत ही सेवा पुरवली जाते. ही सेवा रेल्वेच्या उपाहारगृहांतर्फे चालवली जात नसल्यामुळे हे अन्न घेणाऱ्यांना स्वत:ची थाळी, प्लेट, खाण्याचा डबा स्वतः बरोबर असणं आवश्यक आहे.

ही सेवा करणारे स्वयंसेवक एक तर फलाटांवर चालत असतात अथवा डब्यांत शिरून, ज्यांना हवं आहे त्यांना, हे ताजं अन्न देत असतात.

आजकालच्या देणा — घेण्याच्या व्यवहारी जगात, हजारो किलो मीटरवर माणुसकी जागवणारी ही सेवा एक वेगळंच दर्शन घडवते. शिखांनी त्यांची माणुसकीची परंपरा जागवणारी ही सेवा चालू केली आणि आज ती या गाडीचं अभिमानास्पद भूषण आणि ओळख बनली आहे!

या पुढे कुठल्याही व्यक्ती भारतीय रेल्वेविषयी बोलत असतील तर त्यांना प्रवासापेक्षा जास्त माणुसकीचं अनोखं, अद्भुत दर्शन घडवणाऱ्या सेवेबद्दल आवर्जून सांगायला विसरू नका.

औदार्य, विश्वास आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी ही सेवा हा चमत्कार आहे.

अनुवाद : श्री प्रकाश चान्दे

प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

काही उदाहरणं सांगता येतील की, काय काय प्रकारचे नियम आपण ठेवू शकतो. एक तर रात्री एक वेळ ठरवायची आठ-नऊ जी ठरवली असेल त्या नंतर कोणीच कुठलाच स्क्रीन वापरायचा नाही… टीव्ही असो लॅपटॉप असो की फोन. अवघड वाटतं ना कधी कधी ऐकायला! तर कोणीच स्क्रीन वापरायचा नाही, हे करता येईल. याचा फायदा असा होतो की, झोप शांत लागते. आपण स्क्रीनकडे बघत राहिलो ना तर आपल्या मेंदूला संदेशच जात नाही की आता रात्र झालीय. आता झोप यायला पाहिजे. कारण सतत आपण प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो. जेव्हा अंधार होतो तेव्हा मेंदूला संदेश जातो की रात्र झाली आता झोप यायला पाहिजे. तर रात्री किती वाजता फोन बंद करायचा याचा एक नियम घरी ठरवता येईल. मग त्याच्यानंतरचा जो वेळ असेल तो आपण सगळे मिळून एकत्र गप्पा मारू शकतो, एखादा गेम खेळू शकतो वा असंचं काहीतरी… अभ्यास, वाचन या सगळ्या गोष्टी करता येतील. अजून एक नियम असा करता येईल की आपण जिथे झोपतो त्याच्या शेजारी फोन ठेवायचा नाही. बहुतेकांना सवय असते फोनवर गजर लावायची. समजा रात्रीबेरात्री जर का जाग आली तर आपण बघतो की काही मेसेज आलाय का वगैरे. झोपेतून जाग येऊन प्रकाशाकडे परत बघणं हे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी ती खूप घातक गोष्ट असते. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती नसते की या सगळ्यांमध्ये त्यातून निघणारी रेडिएशन्स शरीरासाठी घातक असतात. म्हणून अशाप्रकारे फोन सतत आपल्या जवळ असणारे चुकीचे आहे. रात्री तर लांबच ठेवायला पाहिजे. म्हणून आम्ही कित्येक वेळा असं पालक सभेत सांगतो की, गजराचं घड्याळ होतं ना पूर्वी तसं आणा सगळ्यांनी आणि आता ते घड्याळ वापरायला लागा. अजून एक नियम की संध्याकाळी मुलांनी मैदानी खेळ खेळायला जायला हवे. मुलांचे व्हिडिओ गेम वगैरे काही असेल ते खेळायला एक आपण टाईम लिमिट ठेवू शकतो. मुलं कोणते गेम खेळतात त्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. कारण हे गेम प्रचंड एडीक्टिंग असतात. त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. मुलं जे गेम खेळतात त्याच्यात मारणं, रक्तपात या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये या गोष्टी विषयी काही वाटेनासे होते. आणि म्हणूनच मित्रांमध्ये थोडे जरी मतभेद झाले, भांडण झाले तरी एखाद्याचा ते प्रत्यक्ष खूनही करतात. या सगळ्यांचे प्रमाण खूप वाढत जाते. त्यांना गेम जिंकण्याचंही त्यांना व्यसन लागतं. त्यामुळे गेमसाठी एक टाइम लिमिट पाहिजे. आपली मुलं कुठला गेम खेळतात त्याच्यावरती पालकांचे लक्ष पाहिजे. असे अनेक प्रकारचे नियम आम्ही आजकाल पालकांना सांगत असतो.

शेवटी मला जे लोक नेहमी विचारत असतात की, कोणी व्यसनाकडे वळूच नये म्हणून त्यासाठी एकूणच तुम्ही काय उपाय सांगू शकता? आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुटुंबात आपण सर्वांनी रात्रीचे जेवण जर का एकत्र केलं तर खूप छान संवाद होऊ शकतो. अर्थातच तेव्हा पालकांना मला एक वेगळी सूचना द्यायला लागते की, जेवताना मुलांचे मार्क, अभ्यास हा विषय काढू नका. आज दिवसभर मी काय केलं, आज माझ्या ऑफिसमध्ये किंवा दिवसभरामध्ये खूप छान गोष्ट काय झाली असा पालकांनी संवाद साधायला सुरुवात केली की मग मुलांना पण ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे काही घरांमध्ये एटिट्युड बदलते. मुलं मग आज काय झालं, त्याच्याबद्दल मला कृतज्ञता कशी वाटते, असं खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी बोलतात. त्याच्यामुळे संवाद चांगला होऊ शकतो. टेकडीवर जाणं, एकत्र व्यायाम करणे, या गोष्टींनी एक संवाद चांगला होऊ शकतो. मुलं जे प्रश्न विचारतात त्यांना योग्य उत्तर देणं महत्वाचा असतो अन्यथा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

याबाबतीतली आमच्याकडे आलेली एक केस सांगते. आमच्याकडे आलेला एक मुलगा आठवीपर्यंत अगदी छान गुड बॉय प्रकारचा म्हणतात असा होता. एकदा तो शाळेतून घरी येत होता. आठवीत असताना त्यांनी बघितलं की, त्याच्या शाळेतली काही मोठी मुलं होती ती सिगरेट ओढत होती. त्याला पण उत्सुकता निर्माण झाली. घरी आल्यावर अगदी इनोसंटली त्यानं आईला विचारलं की, ‘आई माझ्या शाळेतली मुलं सिगरेट ओढत होती. मी पण ओढून बघू कसं वाटतं सिगरेट ओढल्यावर ते? ‘ 

हे ऐकल्यावर आई एवढी भडकली आणि त्याला एवढी रागवली की विचारता सोय नाही. पण मुलाची उत्सुकता काही शमली नाही. आईच्या चिडण्यामुळे तो प्रश्न त्याच्या मनात तसाच राहिला. दुसऱ्या दिवशीच सिगरेट ओढणाऱ्या त्या मुलांना त्याने तो प्रश्न विचारला. तर ती मुलं म्हणाली, ‘ तू आता मोठा झाला आहेस तेव्हा ओढायलाच पाहिजे सिगरेट. ‘ असं म्हणून त्याला सिगारेट ओढायला दिली. ती त्याच्या व्यसनाची सुरुवात होती. जनरली कुठलाही व्यसनाची सुरुवात ही सिगरेट, तंबाखूपासून होते. तशी त्या मुलाची झाली आणि मग पुढे त्याच्या आयुष्यामध्ये इतर व्यसनंसुद्धा त्याला लागली. खरं तर त्याची आई त्याला समजेल अशा भाषेत छान उत्तर देऊ शकली असती आणि त्याने ऐकलंही असतं. खूप निरागसपणे तो हा प्रश्न विचारत होता. आईने त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगितले असते तर त्याला व्यसन लागले नसते. समजा तिला उत्तर येत नसेल तर ती डॉक्टरकडे किंवा एखाद्या एक्सपर्टकडे मुलाला घेऊन जाऊ शकली असती. त्याचे काय काय दुष्परिणाम होतात त्यांच्याकडून त्याला कळले असते. पण तिने संवादाची खूप छान संधी गमावली. सांगायचा मुद्दा हा की, मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा कुठलाही प्रकारच्या व्यसनाबाबत योग्य उत्तर देणे, योग्य माहिती मुलांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे.

दुसरी गोष्ट आपल्या प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपण आनंदी राहावं. पण त्यासाठी नशा करायला हवीच असे नाही. आनंद हा काही फक्त वाईट गोष्टीतूनच मिळवायला पाहिजे असं नाही आणि तो काही खरा आनंद नसतोच. कारण नशेतून जो आनंद मिळतो तो खूप क्षणिक आनंद असतो. पण त्याची व्यसनाधीन माणसाला खूप मोठी किंमत द्यायला लागते. आनंद मिळवण्यासाठी खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत. वेगवेगळे छंद आहेत, वाचन आहे, वेगवेगळे खेळ, व्यायाम, संगीत अशा कितीतरी गोष्टी असू शकतात. तर अशा प्रकारे कुठल्यातरी छंदांमध्ये मुलांना आपण गुंतवू शकतो. आपण स्वतःही अशा प्रकारे आनंद घेऊ शकतो. तुम्ही माझ्या बाबाची पुस्तके वाचली असतील तर त्यातून तुम्हाला कळले असेलच की, बाबांना खूप वेगवेगळे छंद होते. बासरी वाजवायचा, चित्र काढायचा, ओरिगामी, लेखन वगैरे तर होतंच. अनेकदा घरी पण बाबा नेहमी असं म्हणायचे की, माझी सिगरेट कुठली तर माझी बासरी हीच माझी सिगरेट आहे! मग सकाळी बाबांच्या असा ठरलेला डायलॉग असायचा… आता मी तिचा एक झुरका मारतो आणि मग बासरी वाजवायचे. मग किती चांगला धूर यायचा ना त्या बासरीतून सुरांचा! काही नुकसान होत नाही अशा नशेतून, उलट आनंदच मिळतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, नशा अशा गोष्टीतनं आली पाहिजे ज्याच्यामुळे आपलं नुकसान व्हायला नको आणि इतरांचही नाही. आनंदामध्ये सर्वांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. व्यायाम केल्यामुळे पण एक प्रकारे नशा आल्याचा आपल्याला फिल येतो. अशा प्रकारे जेव्हा चांगल्या पर्यायी नशा मिळतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात किती चांगले बदल घडू शकतात याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, राहुल जाधव त्याचं नाव. काही वर्षांपूर्वी राहुल आमच्याकडे झाला तेव्हा त्यांना दारू बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचं सुद्धा व्यसन होतं. तो मुंबईचा होता… डोंबिवलीला रहाणारा होता. मुंबईच्या गॅंगवॉरबद्दल ऐकलं असेल तर त्या तो गॅंग मध्ये होता. गणपती वगैरे आले की त्यामुळे जी काही नोकरी मिळेल ती पण त्याची नोकरी जायची. फ्रस्ट्रेशन प्रचंड वाढत होतं, चिडचिड वाढत होती. राहुल म्हणाला की, ‘मी एवढ्या जोरात पळतो पोलीस कायम माझ्या मागे असले तरी मी धूम ठोकायचो. ‘ त्या त्याच्या पाळण्याच्या गुणामुळेच फुल मॅरेथॉन मध्ये पळायचं त्याचं एक स्वप्न होतं. जेव्हा त्यानं ती पूर्ण केली आणि तो त्या पोलीस स्टेशनला गेला, जिथे त्याला कायम हजेरी द्यायला जायला लागायचं आणि अपमान वगैरे केले जायचा. तिथे तो ते मेडल आणि फोटो घेऊन जेव्हा गेला तेव्हा त्या पोलिसांनी त्याला सॅल्यूट ठोकला. तेव्हा राहुल खूप बरं वाटलं, आनंद झाला. रोज तो 50 किलोमीटर पेक्षा जास्त पळत असतो. कोविडच्या आधीच्या वर्षांमध्ये मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते थेट दिल्लीच्या इंडिया गेट पर्यंतचे अंतर त्याने 21 दिवसांमध्ये कापलं. मुंबई ते दिल्ली पळताना तो वाटेतल्या सर्व गावांमधील व्यसनमुक्ती केंद्रांना भेट देत गेला. तिथे त्याने मोटिवेशनल लेक्चर्स दिली. आता राहुल आमच्याकडेच काम करतो. त्याचे लग्न झालेय. राहुलवर आता एक वेब सिरीज येणारेय. आमच्याकडे अशी हजारो उदाहरणे आहेत की व्यसन सोडल्यानंतर त्यांचं आयुष्य किती चांगलं बदललंय. एवढेच करायला लागतं की त्यांना काहीतरी दुसरं एक चांगलं काम करण्याच्या मार्गाची ओळख करून द्यायला लागते. त्याची ओळख झाल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून जातं.

असं असलं तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यसनाधीनता हा प्रश्न तर वाढतो आहे. पण आपण त्याचा प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन कसं करायचं याचे उपाय सुद्धा आपल्या हातात आहेत. आपण पालक म्हणून, कोणी शिक्षक असा, तुमच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असाल, आपल्या प्रत्येकाला जे जे शक्य आहे असा प्रत्येकजण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. जे आपल्या सहवासात येतात त्यांच्याशी संवाद साधून त्यांना व्यसनातून बाहेर पडायला आपण मदत नक्कीच करू शकतो. आज मला खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाला या भागातले खूपसे :मुक्तांगण मित्र’ सुद्धा इथे उपस्थित आहेत. इथे सांगली भागामध्ये कोणालाही असं वाटलं की कोणाला व्यसनाची समस्या आहे तर इथल्या मित्रांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मला खूप छान वाटतंय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण खूप छान आणि शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. हा माझा खूप मोठा सन्मान आहे की हा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.

— समाप्त —

संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-३ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-३ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

आपल्याला वाटते की फक्त पुरुषांमध्ये व्यसनाचा प्रॉब्लेम असतो. पण आता असं राहिलेलं नाहीये. आता महिलांमध्येसुद्धा हा प्रश्न खूप वाढायला लागलेला आहे. मी जेव्हा मुक्तांगण मध्ये काम करायला लागले… 1994 साली छोट्या छोट्या कामाची माझ्या आईने माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्यात एक जबाबदारी अशी दिली होती की, जे विद्यार्थी येतात त्यांना दारू आणि ड्रग्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सगळी माहिती द्यायची. त्यांच्याशी बोलायचं, त्यांना कम्फर्टेबल करायचं, वगैरे. आमच्याकडे तेव्हा स्वीडनहून काही विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आलेले होते. मी त्यांना सगळं दाखवलं. त्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की, ‘आत्ता जे तू सगळं दाखवलं तर ह्याच्यात आम्हाला सगळे पुरुष पेशंट दिसले. बायका कुठे आहेत? बायकांना तुम्ही कुठे ठेवता? ‘ तर 94 साली मला या प्रश्नाचं एकदमच आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की, ‘नाही आमच्या देशात बायका व्यसन करत नाहीत. म्हणून फक्त पुरुषच आमच्याकडे असतात. तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं; पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. आमच्याकडे महिलासुद्धा रुग्ण म्हणून हळूहळू यायला लागल्या. मग 2009 साली आम्हाला एक वेगळं काम महिलांसाठी सुरू करायला लागलं. तेव्हा असं झालं की, जेव्हा पेपरमध्ये आलं की मुक्तांगणमध्ये असं महिलांसाठीच केंद्र सुरू होतंय तर खूप लोकांनी लगेच अभिनंदनाचे फोन केले. आम्ही तेव्हा सांगितलं की, ‘प्लीज, आमचा अभिनंदन करू नका. आम्हाला खूप वाईट वाटतंय की आपल्याला महिलांसाठी असं काहीतरी काम… व्यसनमुक्तीचं काम सुरू करायची वेळ येतेय. ‘ एकंदरीत काय तर महिलांमध्येसुद्धा हा प्रॉब्लेम वाढतोय. महिलांमध्ये झोपेच्या औषधांचं खूप प्रमाण आहे. पेन किलरच्या गोळ्या खाणं तर सगळ्या वयोगटांमध्ये दिसतेय. लहान मुलींमध्ये जर का बघितलं तर दारूचं व्यसन आहे. झोपेची औषधं हे जे दुसरं कारण आहे ते महिलांच्या बदलत्या मानसिकतेमध्ये आहे. पूर्वी एखाद्या महिलेला समजा काहीतरी खूप निराश वाटतंय, दुःख होतंय, तर ती काय करायची की रडून मन मोकळं करायची. कोणाकडे तरी जाऊन बोलायची. बोललं की बरं वाटायचं. रडलं की बरं वाटायचं. पण आम्ही आमच्या रुग्णमैत्रिणींशी जेव्हा बोलतो तेव्हा असं दिसतं की, आता रडता कामा नये. मी आता स्ट्रॉंग आहे, तर मी रडता कामा नये किंवा माझे दुःख मी दोन लोकांशी बोलले तर लोकांना काय वाटेल आणि म्हणून ते बोललं जात नाही. आपले प्रॉब्लेम्स हे मनातच साठवून ठेवले जातात. मग जेव्हा ते मोठ्या प्रमाणात मनात साठवले जातात तेव्हा त्याचा खूप कोंडमारा होतो. परिणामी व्यसन करणे वगैरे अशा चुकीच्या गोष्टी सुरू होतात. म्हणून जेव्हा महिलांसाठी खास करून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतो, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगते की जेव्हा काही प्रॉब्लेम येईल तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलून मोकळ्या व्हा. इथेही मला सगळ्यांना सांगायचे आहे की, जेव्हा आपल्याला काही टेन्शन येतं तेव्हा पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे तर कोणाला तरी विश्वासात घेऊन ते सांगितलं पाहिजे, रडलं पाहिजे. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अधून मधून रडणं खूप चांगली गोष्ट आहे.

आधुनिक व्यसनामध्ये आणखी एक वाईट गोष्ट वाढीस लागली आहे ती म्हणजे ऑनलाईन जुगार. त्याचबरोबर पॉर्नोग्राफीचं व्यसनही आजकाल खूप वाढतंय. व्हिडीओ गेम्स खेळले जातात. सोशल मीडियामधील वर्तनात्मक व्यसनाचं प्रमाण आता लोकांमध्ये खूप वाढते. सुरुवातीला आम्ही बघायचो की हे प्रमाण तरुण मुलामुलींमध्ये जास्ती असायचं. पण अलीकडे सगळं सर्व वयोगटांमध्ये हे व्यसन वाढायला लागले आहे. याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा असं झालं… 2009-10 च्या आसपासची गोष्ट असेल. एक वडील आमच्याकडे आले आणि ते म्हणाले, ‘माझ्या मुलाला ऍडमिट करा. त्याला व्यसन लागले आहे. ‘ मग आम्ही विचारले की कसलं? तर ते म्हणाले की, त्याला कम्प्युटरचे व्यसन लागलेय. त्यावर आम्ही म्हटलं की, ‘तो काही दारू पीत नाहीये, सिगरेट ओढत नाही की तंबाखूही खात नाही. यापैकी तो काहीच करत नाहीये. कॉम्प्युटर वगैरे असं काही व्यसन नसतं. म्हणून त्यावर आम्ही उपचार वगैरे करत नाही. ‘ पण त्या वडिलांनी आम्हाला जेव्हा तपशीलात जाऊन तो काय करतो याची हकीकत सांगितली तेव्हा आमच्या लक्षात आलं की, होss, याला पण व्यसनच म्हणायला हवे. पुढे ते असं म्हणाले की, ‘त्याला टेक्नॉलॉजीची खूप आवड होती. म्हणून कॉलेजमध्ये गेल्यावर कम्प्युटर घेऊन दिला. मग त्याला तेच वेड लागलं. सारखं तो तेच करत बसायचा. रात्रंदिवस त्याचं ते चालायचं. ज्युनिअर कॉलेजमध्ये असतांना त्यांना कॉलेजमध्ये बोलावण्यात आलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तो परीक्षेला जात नाही. कारण अभ्यासच करत नाहीये. लेक्चर्स अटेंड करत नाहीये. सारखं त्याचं तेच कॉम्प्युटर कॉम्प्युटर चाललेलं आहे. मग आमच्याही लक्षात आलं की, जसं दारू किंवा ड्रगचं व्यसन असतं तसंच कॉम्प्युटरचंही. व्यसनी व्यक्तीला दारू किंवा ड्रग्ज मिळाले नाही तर त्या व्यक्तीला त्रास होतो. तसेच या मुलाच्या बाबतीत पण होत होतं. आई-वडिलांनी ते त्याच्याकडून काढून घेऊन सगळं बंद केलं. पण असं जेव्हा केलं तेव्हा त्याने प्रचंड थयथयाट केला. तो अगदी अस्वस्थ झाला. झोप न येण्याचा त्याला प्रचंड त्रास सुरू झाला. याला मानसिक आजार म्हणायचं. कारण जसं व्यसन मिळालं नाही तर सतत त्याची तल्लफ येते, क्रेविंग येत राहते, तसंच या मुलाला कॉम्प्युटरचं तीव्र आकर्षण निर्माण झालं होतं.

एवढं सगळं आमच्या लक्षात आल्यावर आम्ही त्या मुलाला ऍडमिट केलं. ती आमची पहिली केस होती… म्हणजे ‘इंटरनेट एडिक्शन डिसऑर्डर’ची… IAD ची. मी जेव्हा याचा अभ्यास केला. आम्ही इंटरनेटवर त्याची माहिती घेऊ लागलो. तेव्हा आम्ही सगळे सहकारी एकमेकांना चिडवायचो की, एका इंटरनेट एडिक्शनच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच इंटरनेटवरनं त्याची माहिती घ्यावी लागतेय. आमच्या लक्षात आलं की अमेरिका, चीन, कोरियामध्ये हे व्यसन खूप पसरलेलं आहे. आम्ही त्याच्यासंबंधी अशा अनेक केसेस वाचल्या. खरं तर तेव्हा मला असं वाटलं होतं की आपल्या देशात एवढ्या टोकाला नाही जाणार. पण बऱ्यापैकी टोकाला जाणाऱ्या केसेस आम्ही बघत असतो. दरम्यान एक आई-वडील आमच्याकडे आले. ते प्रचंड घाबरलेले होते. ‘आमच्या मुलाला लगेच तुम्ही ऍडमिट करून घ्या. ‘ त्यांनी असं सांगितलं की त्यांचा मुलगा आई-बाबा रात्री झोपायला गेले की, तो मुलगा कम्प्युटरवर टक लावून बघत गेम खेळत बसायचा. आपण सगळेच झोपताना मुलांना सांगतो ना की झोपा आता, जास्ती वेळ कॉम्प्युटरवर गेम खेळत बसू नका, तसं त्यांनी त्याला सूचना दिल्या आणि झोपायला गेले. सकाळी जेव्हा आईबाबा उठले आणि मुलाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी बघितलं की, अजूनही तो मुलगा असच कॉम्प्युटरकडे टक लावून लावून बघतोय आणि गेम खेळतोय. त्या मुलाने युरीन पास केलीये, हे त्या मुलाला कळलं पण नाहीये, इतका तो त्याच्यामध्ये गुंतला गेला होता. ते पाहून त्याचे आई-वडील इतके घाबरले की ते लगेच आमच्या मागे लागले…. आमच्या मुलाला लगेच तुम्ही ऍडमिट करून घ्या.

तसंच ऑनलाईन जुगारबद्दल. आयपीएलच्या वेळेला वाचत असाल तुम्ही ते ड्रीम इलेव्हन आणि काय काय! ऑनलाइन रमी आणि काय काय वेगवेगळे प्रकार असतात. एक उदाहरण सांगते, गरीब घरातला 21 वर्षांचा एक मुलगा आमच्याकडे आला होता. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा होता. त्याने ऑनलाईन जुगारात 67 लाख रुपये घालवले होते. मी नेहमी सगळ्यांना सांगते की, आपणच आपल्याला तपासून बघायचं की आपण व्यसनाधीन बनण्याच्या मार्गावरती आहोत का नाही ते… तुम्ही सगळ्यांनी घरी गेल्यानंतर गुगलवर एक टेस्ट शोधा. तिचे नाव आहे… IAT (इंटरनेट एडिक्शन टेस्ट) 20 प्रश्न आहेत फक्त. ते प्रश्न सोडवा आणि उत्तरावरून तुम्हालाच कळेल की तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आहारी किती गेला आहात ते.

इंटरनेट आहे म्हणून आपल्याला भरपूर माहिती मिळते. शॉपिंगपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करणे आपल्याला शक्य झालं. त्याचा वापर आपण किती करायचा हे जर कळलं नाही तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. आम्ही पालक सभेमध्ये वगैरे बोलतो किंवा पालक आणि मुलं एकत्र येतात तेव्हा याचं व्यसन लागू नये म्हणून आम्ही सगळ्यांनाच सुचवतो की, प्रत्येक घराने इंटरनेट वापराचे किंवा फोन वापरण्याचे नियम करायचे आणि ते नियम सगळ्यांनी पाळायचे. जे नियम मुलांना तेचं पालकांनासुद्धा आहेत. कारण काही पालकांच्या बाबतीत दिसून येते की ते मुलांना जे सांगतात तसे ते मात्र वागत नाहीत. त्याचं एक उदाहरण सांगते, एका आठ-नऊ वर्षाच्या मुलीला तिची आई घेऊन आली होती. ती मुलगी खूप फोन वगैरे वापरत होती. तर मी तिच्याशी जेव्हा बोलत होते तेव्हा मुलगी मला म्हणाली की, ‘तुम्ही आधी माझ्या आईला सांगा की ती रोज ऑफिसमधून आल्यानंतर टीव्ही बघत बसणार नाही. माझ्याशी बोलेल, खेळेल. संध्याकाळी मला सांगते की खाली खेळायला जा, पण ती मात्र मोबाईल घेऊन बघत बसलेली असते. तिला पण तुम्ही सांगा की, मी जर मोबाईल बघायचा नसेल तर तिने पण मोबाईल बघायला नको. ‘ म्हणून आम्ही आवर्जून सगळ्या पालकांना पण सांगतो की, तुम्ही पण हे नियम पाळायचे.

– भाग तिसरा.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-२ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-२ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

आता मी थोडं आजच्या विषयाकडे वळते. नव्या नवीन काळाची काय आवाहन आहेत? मगाशी म्हटलं तसं की प्रश्नांमध्ये सतत काही ना काही तरी बदल होत असतो कारण समाजही सतत बदलत असतो. तर सध्या एकूणच नव्या बदलत्या या प्रवाहाबद्दलच्या व्यसनाधीनतेच्या प्रश्नाच्या बाबतीत मला थोडं तुम्हाला आता सांगायचंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाधीनतेचा जो वयोगट आहे तो आता थोडा कमी व्हायला लागलाय. लहान वयातच आता मुलांना व्यसन लागायला लागले आहे. पूर्वी साधारण प्रौढ लोक म्हणजे 25-30 च्या पुढचे असे रुग्ण आमच्याकडे यायचे. त्यांचीच संख्या जास्ती असायची. पण अलीकडे आम्ही बघतो आहोत की, 14-15 वर्षापासूनच्या सुद्धा मुलांमध्ये हा प्रॉब्लेम वाढायला लागलाय. त्यात सर्व प्रकारची व्यसनं आहेत. ड्रग्स आहे, दारू पण आहे आणि ज्याला आपण वर्तनात्मक व्यसन म्हणतो तेसुद्धा या वयोगटांमध्ये वाढायला लागले आहे. म्हणजे फोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स वगैरे, या गोष्टींमध्ये.

बरोबर एक वर्षांपूर्वी मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये एक पुण्यामध्ये घडलेली घटना सगळ्यांनी नक्की पेपरमध्ये वाचली असेल… पोर्षे कारचं जे प्रकरण झालं त्यात एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन जोरात गाडी चालवली आणि एक्सीडेंट झाला. त्यात दोनजणांचा मृत्यू पण झाला. अगदी परवाच त्याला या घटनेला एक वर्ष झालं. नंतर त्या मुलाशी बोलणं करण्याची आमच्यावर ती जबाबदारी आली. त्या घटनेबद्दल थोड्या लोकांना थोडासा धक्का बसल्यासारखं झालं. एवढ्या लहान वयात सुद्धा मुलांमध्ये व्यसनाधीनता कशी वाढते? आमच्याकडे खूप अशा घटना आम्ही बघतोय. लोकांच्या मनात असा प्रश्न नेहमी येतो की, असं काय होतंय की लहान वयामध्ये मुलं व्यसनाकडे वळताहेत? याचे कारण असं सांगता येईल की, *कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं याला आता एक समाजामध्ये प्रतिष्ठा यायला लागलेली आहे. * 

माझे बाबा एका खूप छोट्या गावात गावातले. त्यांच्या गावांमध्ये एकच असा माणूस होता की जो बाबा लहान असताना दारू प्यायचा आणि त्याला एकदम असं तोंड लपवून गावात फिरायला लागायचं. कारण त्याला खूप लाज वाटायची की तो दारू पितो. आता मात्र उलट झाले आहे. हल्ली लहान गावांमध्ये सुद्धा बार असतात. पार्ट्या करणं याला एक प्रकारची खूप प्रतिष्ठा आलेली आहे. पूर्वी कोणी नवीन घर बांधलं तर ‘आम्ही कसं देवघर केलं’ हे लोकांना अभिमानाने दाखवलं जायचं. आता ‘आम्ही हॉलमध्ये कसा बार केलाय’ हे दाखवलं जातं. दुसरं म्हणजे हिंदी पिक्चरचा खूप प्रभाव असतो. हे जे टीनेजर असतात त्यांच्या दृष्टीने असे काही आदर्श असतात ते जास्ती करून फिल्मस्टार वगैरे. ते जे करतात त्यांचा अनुकरण करायची प्रवृत्ती या मुलांमध्ये खूप दिसते. एक असाच मुलगा आमच्याकडे आला होता. त्याला लहान वयातच व्यसन लागलं आणि त्याने असं आम्हाला सांगितलं की, ‘शाहरुख खान हा माझा आदर्श आहे. त्याची फॅशन, बोलण्याची स्टाईल, या सगळ्याचे तो अनुकरण करत होता. त्याने असं बघितलं होतं की पिक्चरमध्ये तो कसा पितो, त्याने वाचलं होतं की शाहरुख खान चेन स्मोकर आहे आणि मग तो त्याचं तस्संच अनुकरण करायला लागलेला होता. तर हा एक खूप प्रभाव दिसतो हल्ली मुलांवर. तुम्ही अलीकडचे कुठलेही पिक्चर बघा त्याच्यामध्ये हिरोच नाहीतर हिरोईनसुद्धा त्यांना जर का काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्या दारू पिताना दाखवतात. पूर्वी फक्त हिरोलाचं दारू पिताना दाखवायचे, पण अलीकडच्या काळात हिरोईनना सुद्धा काही प्रॉब्लेम आला तरी दारू पिताना दाखवतात. इव्हन त्यांना काही एन्जॉय करायचंय तर पार्टीत दारू पिताना दाखवतात. हे सगळं बघून मुलांना संदेश काय मिळतो की, तुम्हाला दुःख झालंय, टेन्शन आलंय ना तर तुम्ही दारू प्या, म्हणजे तुमचं टेन्शन जाईल किंवा तुम्हाला सेलिब्रेट करायचंय ना, तुम्हाला एन्जॉय करायचाय ना, तर तुम्ही दारू प्या. हे दोन अतिशय चुकीचे संदेश मुलांपर्यंत अशा गोष्टीतनं मिळत असतात. ते लहानपणापासूनच मुलं बघत असतात.

… तर हे खूप मोठं सामाजिक कारण आहे की लहान वयात आता एकूणच व्यसनाधीनतेचे प्रमाण का वाढतय त्याचं. याला समाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे त्याला एक प्रकारचं ग्लॅमर यायला लागलेलं आहे. मुलं हे जसं पिक्चर्स मध्ये बघतायेत तसं घरीसुद्धा बघतात. याबाबतीतलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते आमच्याकडच्याच एका मुलाचं. एकदा असं झालं की एक वडील त्यांच्या तेरा वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्याकडे आले होते. मुलगा आणि ते बरोबरच बसले होते. ते सांगायला लागले की, “माझा मुलगा तेरा वर्षाचा आहे आणि तो सिगरेट ओढायला लागलाय. मला त्याच्या तोंडात सिगरेटचा वास आला म्हणून मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो आहे. ” 

मी मुलाला म्हटलं की, “तू थोडं बाहेर बस. मी आधी तुझ्या वडिलांशी बोलते. ” तो बाहेर गेल्यानंतर मी वडिलांना पहिलाच प्रश्न विचारला, “तुम्ही सिगरेट ओढता का? ” तर वडील म्हणाले, “हो, मी ओढतो. ” मुलगा ते लहानपणापासून बघतच होता की, वडील पण सिगरेट ओढतात. म्हणून मी त्यांना म्हटलं की, “तुम्ही आधी सिगरेट सोडा. म्हणजे मुलगाही सिगरेट पिणार नाही. ” तर त्यांचं यावर म्हणणं होतं की, ‘एवढ्या लहान वयात त्याने सिगरेट पिऊ नये. मी मोठा झाल्यावर सिगरेट प्यायला लागलो. ” आता बोला!!! 

आपण जे सांगतो ना ते मुलं ऐकत असतात. आपण जसे वागतो तसे मुलं वागण्याचा प्रयत्न करत असतात. पण आजकाल ना या सगळ्या मुलांच्या कामांमध्ये मला एक गोष्ट मुलांच्या बाबतीत खूप दिसून येते की, मुलांमध्ये ना एक वेगळीच दैवी देणगी असते. आपण जसे डोळे बंद करतो ना तसे मुलांना कानपण बंद करता येतात! आपण पालक त्यांना लेक्चर द्यायला लागतो तेव्हा त्यांचे कान एकदम बंद होतात. त्यांचं लक्षच नसतं, आपण काय सांगतोय याच्याकडे. पालक म्हणून खूप काही गोष्टी त्यांना सांगतात, लेक्चर देतात, पण मुलांचं लक्ष आपण काय सांगतोय त्याच्याकडे अजिबातच नसतं. आपल्या वागण्याकडे मात्र मुलांचं लक्ष असतं. त्यामुळे पेरेंटिंगच्या बाबतीत मी पालकांना एक वाक्य नेहमी सांगते… माझं ते अतिशय आवडतं वाक्य आहे. *पालक म्हणून आपल्याला जे वाटतं की आपल्या मुलांनी करावं ते आधी आपण करायला पाहिजे तरच ती मुलं करतील. आपल्याला वाटतं ना मुलांनी रोज व्यायाम करावा, मग आपण आधी करायचा. आपल्याला वाटतं की, मुलांनी कुठलंच व्यसन करू नये, मग आपणही करू नये. मगच मुलं आपलं अनुकरण करतील.* 

आत्ताही जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की स्वतः वडील सिगरेट ओढत होते आणि त्यांच्या मुलाला ते घेऊन आले होते. मग अर्थातच आम्हाला बरीच सेशन्स वडील आणि मुलाची घ्यायला लागली. असंसुद्धा कित्येक वेळा होतं की मुलं सांगतात, ‘लहानपणापासून मी बघतोय की माझे वडील रोज संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आल्यावर दारू पितात. मी लहान असताना एकदा विचारलं की, ‘बाबा तुम्ही हे रोज काय पिता? ‘ तर बाबा म्हणाले की, ‘मी ना औषध पितोय. मला ऑफिसच्या कामाचा खूप स्ट्रेस असतो, टेन्शन असतं आणि म्हणून हे माझं औषध आहे. ते घेतलं की मी रिलॅक्स होतो. ‘ मुलाने हे लक्षात ठेवलं की टेन्शन आलं की त्यातून मुक्त व्हायला हे चांगलं औषध आहे. मुलगा बारावीत गेला. त्याला पण अभ्यासाचं, करिअरचं, पुढं काय करायचं याचं, एक्झामचं अशी अनेक टेन्शन्स सुरू झाली. मग काय! वडिलांचा घरात बार होताच. त्याच्यातनं त्याने दारू प्यायला सुरुवात केली. पौगंडावस्थेतल्या मुलांना व्यसनं खूप पटकन लागतात. हा मुलगा अल्कोहोलिक झाला आणि एवढंच नाही तर पुढे त्याला कॉलेजमध्ये इतरही व्यसनं लागली. यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, पालक मुलांना काय सांगतात हे खूप खूप महत्त्वाचे आहे. चुकीचे संदेश दिले तर त्याचा मुलांवरती दुष्परिणाम होऊ शकतो. हे खूप मोठं आव्हान आहे. आताशा लहान वयामध्ये मुलांना व्यसन का लागायला लागले आहे त्यामागे पालकांचं वागणं हे एक कारण आहे. लहान वयात जेव्हा व्यसन लागतं तेव्हा त्यांचं करिअर, त्यांचं आरोग्य… शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात.

या वयातल्या मुलांमध्ये आता गांजाचे पण व्यसन खूप वाढते आहे. गांजाच्या बाबतीत मुलांच्या मनात खूप गैरसमज असतात. कुठे कुठे वाचलेलं असतं सगळ्यांनी. त्यांच्याशी आम्ही काहीही बोलायला लागलो की, आमच्यापेक्षा भरपूर जास्त माहिती त्यांनी गुगलवरती वगैरे गोळा केलेली असते. त्यामुळे आम्हाला सतत आमचं ज्ञान अपडेट करत राहायला लागतं. कारण त्यांच्यासमोर आम्हाला असं निरुत्तर होऊन वगैरे चालत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की, मुलांनी गांजाच्या बाबतीमध्ये माहिती गोळा केलेली असते… अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये गांजा लीगल आहे, तिथे त्याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे मग काय होतं ते घेतलं तर? तेव्हा आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं की, आपल्या देशात हे कायदेशीर नाही… गांजा बेकायदेशीर आहे. त्यांची जी काही वेगळी कारणं आहेत ती त्यांना समजावून सांगायला लागतात. आपल्या देशाला ते परवडणार नाही त्याला कायदेशीर मान्यता देणं. दुसरं एक मुलांनी वाचलेलं असतं की, गांजा सेवन हे कधीतरी आपण करू शकतो. जसं सोशल ड्रिंकिंग म्हणतात ना, कधीतरी पार्टीत पिता येते दारू वगैरे तसं गांजापण कधीतरी घेता येतो. त्याचं व्यसन लागत नाही. यावर कुठेतरी त्यांनी रिसर्च वाचलेला असतो की गांजात औषधी गुणधर्म आहेत म्हणून. मग आम्हाला त्यांना दुसरे रिसर्च दाखवायला लागतात की, नाही त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तर हेही सांगायला लागतं की, प्रत्येक औषधी गोष्ट स्वतः घ्यायलाच पाहिजे असं नाही. त्यातले काही घटक काढून औषधांमध्ये वापरले जातात. पण एकूणच गांजाचा व्यसन आता मुलांमध्ये वाढताना दिसतंय. त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. शारीरिक तर आहेत, पण गांजाच्या बाबतीत आम्ही बघतो की, मेंदूवरती त्याचा खूप परिणाम होतो. अतिशय जास्ती चिडचिड वाढते, त्याच्यामुळे मेमरी लॉस होतो, असे अनेक दुष्परिणाम गांजाच्या व्यसनामुळे होत असतात. हा एक ज्वलंत प्रश्न आता बनत चाललेला आहे.

– क्रमशः भाग दुसरा

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१  (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

सगळ्यांना नमस्कार, आज मला या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी आधी सर्व संयोजकांचे आभार मानते. मला हा खूप मोठा माझा एक सन्मान वाटतोय. हा एक खूप छान योग माझ्यासाठी आहे. एकतर माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट यांचं अनेक वर्षांपूर्वी याच व्याख्यानमालेमध्ये भाषण झालं होतं. त्यामुळे ती पण एक माझ्यावरती जबाबदारी आहे. दुसरं म्हणजे या मुक्तांगणच्या खालीच मी मुक्ता इथे बोलतीये. या मुक्तांगणलासुद्धा पु ल देशपांडे यांनी देणगी दिली होती आणि माझं जे पुण्यातील मुक्तांगण आहे ते सुद्धा पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून सुरू झालं. त्यामुळे मला आजच्या या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद वाटतोय.

आज मला बोलायचं की, आजच्या काळात व्यसनमुक्तीची आव्हाने कशी वाढली आहेत त्याबद्दल. त्याविषयीच्या बातम्या टीव्हीमध्ये आपण ऐकत असतो. कोणाला तरी कसं व्यसन लागलं, त्यामुळे त्यांचं जीवन कसं बहकलं, आपल्या ओळखीत कुणी असतं. पेपरमध्ये आपण वाचत असतो की, दारू पिऊन एखाद्या माणसाच्या हातून काय कृत्य झालं. व्यसनामुळे किती प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना असते. अलीकडे असं दिसून येत की, वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी व्यसनाधीनता हा प्रश्नसुद्धा कारणीभूत असतो. असे खूप मनातील सामाजिक बोलायचे ठरवले आहे. बेरोजगारी असेल, गरिबी असेल, डोमेस्टिक व्हायलन्स, असे कितीतरी सामाजिक प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्या मनात येतील आणि त्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी कारणीभूत अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे हा व्यसनाधीनतेचा खूप मोठा एक सामाजिक प्रश्न आहे. याच्या बाबतीत आपण काही करू, असे माझी आई म्हणजे डॉ. अनिता अवचट हीला वाटत होते. ती एक मानसोपचार तज्ञ होती. तेव्हा ती पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होती. सुरुवातीला अगदी असं व्हायचं… म्हणजे अगदी 80 सालाच्याही आधी ती 70 च्या दशकामध्ये काम करायला तिने सुरुवात केली, तेव्हा ज्यांना दारूच्या व्यसनाची समस्या आहे ते पेशंट तिच्याकडे हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी यायचे. कारण मानसोपचारासाठी त्याकाळी वेगळी अशी महाराष्ट्रामध्ये कुठली सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे मग मनोरुग्णालयामध्येच अशा व्यसनाधीन रुग्णांवरती तेव्हा उपचार केले जायचे. तेव्हा साधारण 1983-84 मध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट पूर्ण जगामध्ये खूप मोठी लाट तेव्हा आली. ब्राऊन शुगर हा शब्द खरंतर तेव्हा आपण ऐकलेला होता आणि तेव्हासुद्धा सुरुवातीला असं वाटायचं की श्रीमंतांच्या अति लाडावलेल्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. आपल्या याच्याशी काय संबंध? अशीच साधारण लोकांची प्रतिक्रिया असायची.

तर असं झालं की, माझ्या आई-बाबांच्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. होस्टेलला तो राहायचा आणि त्याला हे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. या मुलाला त्याचे आई-बाबा आमच्याच घरी घेऊन आले. त्याला माझ्या आई-बाबांनी घरीच उपचार दिले आणि या मुलाशी बोलत असताना बाबांना म्हणजे डॉ. अनिल अवचट यांच्या असं लक्षात आलं की, हा प्रश्न आता खूप वाढत चाललेला आहे. मग बाबांनी असं ठरवलं की ह्याच्यावरती काहीतरी माहिती घ्यायची आधी. तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला काम करत होते याच्या बाबतीत. तिथे माझे बाबा गेले, तिथे राहिले. अनेक व्यसनाधीन लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या कुटुंबीयांना भेटले आणि ‘गर्दच्या जाळ्यात’ नावाची एक लेखमाला तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये लिहिली. मग पुढे त्याचं ‘गर्द’ नावाचे पुस्तक प्रकाशित झालं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या आई-बाबांना बोलवून घेतलं आणि ते असं म्हणाले की, “आम्ही जर का काही आर्थिक मदत देऊ केली तर तुम्ही काही याच्यावरती काम कराल का? ”

हे काम करायला पाहिजे याची गरज आई-बाबांच्या लक्षात आलीच होती. कारण ते सगळं लेख वगैरे वाचल्यानंतर खूप लोक आमच्याकडे विचारायला लागले होते की, आमच्या मुलाला व्यसन आहे, आमच्या ओळखीत कोणाला तरी व्यसनी झाला आहे, त्यांच्यावर तुम्ही उपचार करा. एकदा तर असं झालं होतं की, एक वडील एकदा आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाची कुठली तरी एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणून ते मुलांना पुण्यात घेऊन आले आणि त्या मुलाने त्यांना आत्ताच सांगितलं की, ‘मला अमुकअमुक ड्रगचं व्यसन आहे आणि आत्ता मला विड्रॉवल सिम्प्टमचा त्रास होतोय. आता मला हे ड्रग मिळाले नाही तर मी ती एंट्रन्स एक्झाम कशी देऊ? ‘ तर ते वडील आमच्या घरी आई-बाबांना असं विचारायला आले होते की, त्यांना हे ड्रग कुठे मिळेल? म्हणजे ते विकत घेतील आणि या मुलाला देतील. मग तो त्या परीक्षेला ते जाईल. हे सगळं ऐकून माझ्या आई-बाबांना धक्के बसत होते. या प्रसंगावरून त्यांनी पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी जी मदत देऊ केली त्यांच्या देणगीतूनच तेव्हा 29 ऑगस्ट 1986 या दिवशी हॉस्पिटलमधल्याच एका बिल्डिंगमध्ये मुक्तांगणाची स्थापना झाली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये पु ल तेव्हा असं म्हणाले होते की, ‘आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय. तर या केंद्राची भरभराट होवो, अशा शुभेच्छा देणं योग्य होणार नाही? कारण व्यसनमुक्ती केंद्राची भरभराट होणे ही काही चांगली गोष्ट नाहीये. तर मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की, इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. मग या ठीकाणी आपण एक संस्कृतीक केंद्र निर्माण करूया. ‘ खरंच, किती मोठ्या शुभेच्छा होत्या त्या! तेव्हा खरं तर मी कॉलेजमध्ये शिकत होते. मी हा कार्यक्रम एक विद्यार्थिनी म्हणूनच अटेंड करत होते. जी नवीन टीम तयार होत होती त्या सर्वांनाच एक प्रेरणा देण्याचं काम या पू लं च्या शुभेच्छांनी तेव्हा घडत होतं. अशा तऱ्हेने मुक्तांगणची सुरुवात झाली.

मी म्हटलं तसं की तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. त्यामुळे माझ्या आई-बाबांनी तेव्हा असं ठरवलं की इथे उपचार घेण्यासाठी जे लोक येतील आपण त्यांच्याकडूनच शिकून इथली जी उपचार पद्धती आहे ती तयार करूया आणि मग तेव्हा जे रुग्ण यायला लागले त्यांच्याशी माझे आई-बाबा चर्चा करायचे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे उपचार इथे मिळाले तर तुम्हाला बरं वाटेल, तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? अशा पद्धतीने काम करत गेल्यामुळे या सगळ्याचाच एक वेगळाच फायदा झाला. त्यामुळे मुक्तांगणमध्ये आम्ही कुठल्याही बाहेरच्या देशातल्या उपचार पद्धतीचं अनुकरण केलेलं नाहीये, तर मुक्तांगण मधले जे उपचार आहेत ते पूर्णपणे आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. इथे येणाऱ्या पेशंटना आम्ही रुग्णमित्र म्हणतो. त्यामुळे इथे जे रुग्णमित्र येतात त्यांना खूप आपलेपणा वाटतो. मुक्तांगणमध्ये खूप बरं वाटतं सगळ्यांना. इथे जे उपचार केले जातात ते आम्ही कुठल्यानाकुठल्या पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित ठेवतो. सर्व धर्मांचे सण साजरे करतो, पण कुठल्याही धर्माचा बडेजाव वगैरे किंवा मूर्तिपूजा या गोष्टी मुक्तांगणामध्ये केल्या जात नाही. पण सण मात्र सर्व धर्मांचे साजरे केले जातात. त्यांची आम्ही संस्कृतीशी अशी काहीतरी सांगड घालतो की व्यसनमुक्तीचा संदेश त्यातून देता येईल. समजा दसरा असेल तर आम्ही व्यसनाच्या रावणाचे दहन करतो, वगैरे. असं काही ना काही तरी संस्कृतीशी रिलेटेड केलं जातं. अशा पद्धतीने मुक्तांगण हे जवळजवळ 38-39 वर्षांपासून कार्यरत आहे.

मुक्तांगणमध्ये साधारणपणे चार पातळ्यांवरती काम केलं जातं. सर्वात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे ज्यांना व्यसनाची समस्या आहे अशा लोकांना उपचार देण्यासाठी आम्ही 30 दिवस म्हणजे एक महिनाभर ऍडमिट करून घेतो. पूर्णपणे स्ट्रक्चरर्ड अशी एक उपचार पद्धती त्यांच्यासाठी तयार केली आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक… हो, कुटुंबालाही सहभागी करून घेतलं जातं. अशा प्रकारे ज्याला आपण होलिसस्टिक म्हणतो तसे परिपूर्ण असे उपचार त्यांच्यामध्ये दिले जातात. तीस दिवसात खरंच त्याला बरं वाटतं का? काहींना वाटतं काहींना वाटत नाही त्यांच्यासाठी तीस दिवसानंतरसुद्धा पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. काही लोकांच्या बाबतीत असं असतं की, ते कुटुंबातनं बाहेर पडलेले असतात किंवा नोकरी गेलेली असते. कोणीच त्यांना विचारत नसतं. तर असे जे आमचे रुग्णमित्र आहेत ते दीर्घकाळसुद्धा राहू शकतात. मुक्तांगणमध्ये राहून तिथे काम करतात किंवा बाहेर नोकरी बघतात आणि परत रहायला येतात. अशाप्रकारे उपचारानंतरसुद्धा ते आमच्या संपर्कात असतात. त्यासाठी महाराष्ट्रात 24 ठिकाणी मुक्तांगणांची संपर्क केंद्र आहेत, पाठपुरावा केंद्र आहेत. म्हणजे डिस्चार्ज नंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पुनर्वसनाला मदत केली जाते. पुनर्वसनानंतरचं आमचं तिसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे समाजामध्ये जनजागृती करणे. सगळ्यांनाच एक वाक्य माहिती आहे की, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ एखादा आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा सोपं आहे की तो आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. म्हणून मग वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, कारखाने अशा ठीकठिकाणी आमची एक टीमच आहे की ती तिथे जाऊन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीचं काम करते. व्यसन लागू नये म्हणून काय करायचं याबाबतीत मुलांशी संवाद साधला जातो, पालकांशी संवाद साधला जातो. चौथं महत्त्वाचं काम म्हणजे ज्यांना या विषयात काम करायचे आहे अशा लोकांना प्रशिक्षण देणं. त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रेनिंग सेंटर पण आहे. तर *उपचार, पुनर्वसन, जनजागृती आणि प्रशिक्षण या चार पातळ्यांवरती मुक्तांगणमध्ये काम केलं जातं. *

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इन्द्रधनुष्य ☆ टॉकीज – सिनेमा… लेखक – भावविभोर चंदू ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ टॉकीज – सिनेमा… लेखक – भावविभोर चंदू ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

 

 टॉकीज – सिनेमा

सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमा हा प्रसिद्धीच्या चरम सीमेवर पोचला होता. त्या काळी एकल पडदा चित्रपटगृहे होती. त्यांची क्षमता साधारण दोनशे ते सातशे आठशे प्रेक्षक बसतील एवढी असायची.

शहराच्या लोकसंख्येनुसार त्या क्षमतेची चित्रपटगृहे बनविली जात. त्या काळी चित्रपटगृहाला “टॉकीज” म्हणत असत. खरं म्हणजे सिनेमा बोलका झाला तेव्हा त्याला टॉकी (Talky) म्हणजे बोलणारा सिनेमा

म्हणू लागले आणि त्याचाच अपभ्रंश पुढे टॉकीज असा झाला. बोलताना लोक अमक्या टॉकीजला हा सिनेमा लागला, तमक्या टॉकीजला तो सिनेमा लागला असे बोलत असत. चित्रपट हा साधारण सर्वच कुटुंबांचा जिव्हाळ्याचा विषय होता. करमणुकीची इतर साधने उपलब्ध नसताना चित्रपट माध्यमाला अनन्य साधारण महत्व होते.

त्याकाळी सिनेमा बघणे हा एक उत्सव होता. आधीपासूनच त्याची तयारी करावी लागायची. मोठ्या शहरांमध्ये आगाऊ तिकीट विक्री (Advance booking) होत असे परंतु मध्यम किंवा छोट्या शहरांमध्ये ती सोय नव्हती. त्यामुळे एक दीड तास आधीच टॉकीजवर जाऊन तिकिटासाठी रांग लावावी लागायची.

त्या रांगेत चेंगराचेंगरी व्हायची, एवढं करूनही तिकीट मिळेलच याची खात्री नसायची. तिकीट मिळालं तर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. बरीचशी तिकिटे ही काळा बाजार करणाऱ्यांना आधीच दिली जायची.

मग तिकिटे संपली की हे लोकं “दो का पॉंच” “दो का पॉंच” असं हलक्या आवाजात म्हणत गर्दीत फिरायचे, त्यांना पोलिसांची भीती असे. ज्यांना ब्लॅकचे तिकीट घ्यायचे असे, त्या व्यक्तीला तो माणूस लांब आडबाजूला घेऊन जाई आणि गुपचूप तिकीट देऊन पैसे घेई. काही वेळेला पोलीस येऊन या ब्लॅक करणाऱ्यांना

पकडत असत. त्यांच्या जवळची सर्व तिकिटे काढून घेऊन तिथेच त्यांना यथेच्छ चोप देत असत. हा तमाशा बघायला प्रचंड गर्दी होत असे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याने मार खाल्लेला असे तोच दुसऱ्या दिवशी

पुन्हा तिथेच ब्लॅक करताना दिसे. टॉकीजच्या बाहेरील ही गडबड, गोंधळ, प्रचंड मोठी गर्दी, धावपळ हे वातावरण सिनेमा सुरू होण्याआधी तास दोन तास असे. एकदा सर्व लोक आत निघून गेले की, बाहेर सारं कसं शांत शांत होई.

आतला माहौल हा आणखी वेगळा असायचा. आपल्या नंबरच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो की, राजदरबाराच्या सिंहासनावर बसल्याचा “फील” यायचा. अंधार झाला की आपण आपलं अस्तित्वच विसरून जायचो. प्रत्येकजण आपली दुःख, विवंचना बाहेर सोडून आलेला असायचा, त्यामुळे पुढील तीन तास तो फक्त आनंदात डुंबत रहायचा. समोर चालू असलेल्या चित्रपटात तो इतका मग्न व्हायचा की, आपलं घर दार, नातेवाईक हे सगळं विसरून तो त्या चित्रपटाचा एक भाग बनून जायचा.

उशिरा आलेल्या प्रेक्षकांची अंधारात सीट शोधताना गडबड व्हायची. तिकीट चेकर बॅटरी मारून सीट दाखवायचा, पण तिथपर्यंत जाताना कोणाच्या पायावर पाय पडायचा, कोणाच्या डोक्यावर तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवून सीटपर्यंत जावे लागायचे. पण कोणी तक्रार करीत नसत, कारण सर्वजण एकाच वारीचे

वारकरी असत. आपल्या आवडत्या कलाकाराचा सिनेमा बघताना सर्वांचेच भान हरपून जात असे. विशेषतः गाणे चालू असताना वातावरण पूर्णपणे बदलून जात असे. कोणी मोठ्याने गाणं म्हणतंय, कोणी पडद्यावर पैसे फेकतय, काहीजण ग्रुप करून पडद्यासमोर नाचतायत. असं भारावलेलं वातावरण तयार होत असे.

याच पद्धतीने एखादा भावोत्कट प्रसंग सुरू झाला की स्त्री प्रेक्षकांना रडू येत असे, आणि मग ते बघून मुलंही रडायला सुरुवात करत. पुरुषांचे देखील डोळे भरून येत असत. इतके सर्व प्रेक्षक मानसिकरित्या त्या प्रसंगाशी एकरूप होऊन जात असत.

चित्रपटगृहा मध्ये “पिटातला प्रेक्षक” नावाचा एक समूह असे. पडद्यासमोरील पाच सहा रांगांमध्ये ही मंडळी बसत. हे लोक साधारण कमी शिकलेले, मजुरी किंवा तत्सम कामे करणारे थोडेसे असभ्य, बोलण्याचा पोच नसणारे असे असत. चित्रपट चालू असताना विविध कॉमेंट्स करणे, असभ्य भाषेत बोलणे, विनोद झाल्यास मोठ्याने खदाखदा हसणे. असे प्रकार हे लोक करत. तरी देखील हा समूह प्रेक्षकांचा अविभाज्य भाग असे. कारण आपला “सो कॉल्ड” सभ्य आणि पापभिरू प्रेक्षक मनात असूनही काही गोष्टी केवळ आपल्या संस्कारांमुळे बोलू शकत नसे, त्या गोष्टी हा पिटातला प्रेक्षक अगदी उघडपणे बोलत असे. जसे की,

हाणामारीच्या प्रसंगांमध्ये नायक खलनायकाला शोधत येई, खलनायक टेबल खाली बसलेला असे. लगेच आपला पिटातला प्रेक्षक मोठ्याने ओरडे “अरे, तो बघ टेबलाखाली बसलाय, ओढ बाहेर आणि हाण त्याला, तिच्या मायला! “.. हे ऐकल्यावर संपूर्ण प्रेक्षागृह हसत असे. एखाद्या रोमँटिक प्रसंगामध्ये नायक नायिकेला

प्रेमाने जवळ ओढू लागतो त्या बरोबर खालून दोन तीन आवाज “ए, सोड, सोड तिला सगळे बघतायत. ” पुन्हा भला मोठा हशा. अशी सगळी गंमत चाललेली असे.

मध्यंतरामध्ये भाजलेल्या शेंगा, खारे शेंगदाणे, निंबु, मसाला सोडा, चहा इ. गोष्टी थिएटरच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध असत. काही लोक घरून येतानाच खाण्या पिण्याच्या गोष्टी सोबत घेऊन येत. मध्यंतरानंतर सिनेमा सुरू झाला की, शेंगा फोडताना येणारा टरफलांचा आवाज आणि खाणाऱ्या लोकांच्या तोंडाचा आवाज, हे दोन आवाज थिएटरमधील शांततेचा भंग करीत असत.

चित्रपट संपला तरी काही वेळ प्रेक्षकांवर एक प्रकारचा कैफ चढलेला असे. थिएटरमधील सांडलेली शेंगांची टरफल तुडवीत चालताना, एखादी लढाई जिंकून आल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे. बाहेरील

उजेडात आल्यानंतर हळू हळू तो नॉर्मल होत असे.

टी व्ही आणि मोबाईलचे युग आल्यानंतर हा स्वर्गीय आनंद मिळण्याचे दिवस संपले. कारण एकल पडदा थिएटर किंवा टॉकीज हळूहळू बंद पडू लागल्या आणि मल्टिप्लेक्सचा जमाना आला. पण त्या कृत्रिम वातावरणात माझ्या पिढीचा प्रेक्षक रमला नाही. आणि हे सुख हा आनंद त्याच्या हातातून निसटून गेला. आपल्या आयुष्यातील अंधार थिएटरच्या अंधारात मिसळून दोन घटका मनाला आनंद आणि समाधान

मिळवण्याचं सुख आता मिळणार नाही.

शेवटचे एकल पडदा थिएटर धारातीर्थी पडून देखील आता अनेक वर्षे झाली. थिएटरच्या जागी आता

भल्या मोठ्या बिल्डिंग आणि मॉल तयार झालेत. काही थिएटर आजही खंडहर झालेल्या अवस्थेत शेवटच्या घटका मोजतायत. मल्टिप्लेक्स, टी व्ही आणि मोबाईलने आमच्या आख्ख्या पिढीचं सुख आणि समाधान ओरबाडून घेतलंय. आता फक्त जुन्या आठवणी जागवायच्या.

काळ बदललाय हे मान्य आहे.

पण तो जरा जास्तच बदललाय…. असं नाही का वाटत आपल्याला?

लेखक : …भावविभोर, चंदू

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares