इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.
प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे वर्णन लिहिले.
राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई…!”
मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.
मला एक “अशिक्षित” आई हवी आहे, जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्या बरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.
मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे. मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .
मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि माझे बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा “जास्त वेळ” असेल.
ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.
जेंव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.
आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.
मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.
इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका संपूर्ण वर्गात ऐकू आला.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्ग शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.
आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते मोबाईल च्या नादाला लागून हिरावून घेऊ नका! ते परत कधीच येणार नाही.
संग्राहिका – माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कर्मफळ आणि नियती….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
हजारो गाई जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते, तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणार्या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात मोठमोठ्या देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यु त्यांची ताटातूट करतो. सतीसावित्रींचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्य पद लाभूनही, सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्युसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतानी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितली, तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली. मृत्यू राजा-रंक, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा काहीही भेद करीत नाही. बुद्धिबळाच्या पटावर जरी राजा, वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरीत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते. हे सारे लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्में , भगवंतस्मरण, नामस्मरण ,दानपुण्य केलं पाहिजे, कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजा पर्यंत , नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह चितेपर्यंत सोबत करतात. बरोबर येतात ती कर्में,पुण्य, भगवंत नामाचे गाठोडे—-
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते.उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात,डाळपन्हं,आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.तेंव्हा खुशाल समजावं
ऋतु गाभुळतोय.
दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी..काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो,मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता…असाच दमुन जातो.भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो.गच्ची,दोरीवरच्या कपडे,गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..तेंव्हा खुशाल समजावं..ऋतु गाभुळतोय.
निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होऊन जातं,उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं ,वीज,गडगडाटानं.. रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..धावपळीची होते.
झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात.
☆ A for appreciation…☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆
‘A’ for Appreciation (अर्थात प्रशंसेचा प्रयत्न) 🤗
नुकत्याच एका मैत्रिणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच…” एव्हढं केलं मी हिचं , पण दोन शब्दांचं कौतुक नाही. ” वास्तविक त्या मैत्रिणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली… सासूला देखील ठाऊक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेने करत नाहीत, सून करते… अगदी प्रेमानं … …
गरज आहे ती आवर्जून बोलून दाखवायची.
नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..
कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो….
दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनाने, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो… जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते.
छान तयार होऊन भिशीला स्वागत करणाऱ्या मैत्रिणीकडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते. तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट- जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रिणीला आपण नटवी म्हणतो, तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरंतर समस्या बरेचदा हीच असते की, आपण काही म्हणतच नाही.
एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले… इतरांची प्रतिक्रिया– “मिळणार नाही तर काय? हिने दुसरं केलंच काय वर्षभर … मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीन.”
दुसरीच्या मुलीला 65% मिळाले. प्रतिक्रिया– “जरा लक्ष नाही दिलं हिने. सदा घराबाहेर..”
गम्मत आहे ना ! अहो सोपं आहे. दोघींकडेही जा. मनापासून अभिनंदन करा … आईचे कौतुक करा। काय लागतं हो याला … हां , मन मात्र जरासं मोठं लागतं.
.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रिण म्हणाली.. ” मला नाही बाई येत असं लगेच चांगलं म्हणता… जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते.”
“का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ?” 😆
क्षणभंगुर आयुष्य साधं सोपं असावं .. कशाला हव्यात या पट्ट्या आणि मोजमापं…
स्त्री स्त्रीची शत्रू असते की नाही माहित नाही . पण ही तारीफ न करण्याची वृत्ती मात्र स्त्रीची फार मोठी शत्रू आहे. एखादीच्या उत्साहाला, चैतन्याला, एव्हढेच काय पहाडासारख्या कर्तृत्वाला ही नामोहरम करते. 👊🏻
प्रशंसा म्हणजे लांगुलचालन किंवा चमचेगिरी निश्चित नाही … ती उत्स्फूर्तपणे हृदयातून व्यक्त होते .. काही स्त्रियांना दिसेल त्या मैत्रिणीला ” काय बारीक झालीस ग ! ” असे म्हणायची सवय असते. … ही प्रशंसा नव्हे… 😆
एखादीच्या कर्तृत्वाची .. गुणांची .. संघर्षाची दखल घ्यायला काय हरकत आहे? दूध पाण्यातूनही वेगळं करतो तो राजहंस … आणि सडलेलं कुजलेलं खातो तो गिधाड. स्वतःला विचारा एकदा काय व्हायला आवडेल?
आयुष्याच्या एकाच पटावर राहत असलो तरी आपण प्रतिस्पर्धी खचितच नाही . लक्षात घ्या… एखादीचे घर मस्त सुरेख नटवले म्हटले, की आपले कचराडेपो होत नाही. “छान वळण लावलेस ग मुलांना” असे दुसरीला म्हटले की आपली मुले काही उनाड होत नाहीत. एखादी झक्कास स्वयंपाक करते म्हणून मी काही कांदू होत नाही किंवा एखादी स्मार्ट म्हणून मी गबाळी असे होणे नाही.
प्रशंसेचे दोन शब्द मोठा चमत्कार करतात… आंतरिक प्रेरणा , जगण्याची नवी उमेद, चैतन्य देऊन जातात. प्रशंसेच्या दोन शब्दांची भूक दुसऱ्या कशाने भागत नाही. बघा एकदा करून ही जादू… त्यापेक्षा कित्येक पट positive energy तुमच्याकडे rebound होऊन येईल.. शंकाच नाही.
आपण स्त्री आहोत ..निसर्गाची सर्वश्रेष्ठ कलाकृती… जी स्वतःमधील सारे ओज तेज सगुणात साकारते अपत्यजन्माने.
वाणीवाटेही हाच सृजनाचा साक्षात्कार होऊ देत.
A = appreciation– हळूहळू सवय होऊ द्यात… आयुष्य सुरेख होइल… तुमच्या एकटीचं नाही, तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीचं. 👍🏻
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
…एकदा एक तरुण मुलगी एका संतमहात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”
का नाही…? नक्कीच येईन मी…” करुणासागर असलेले संत उद्गारले.
त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.
“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.
“नाही…नाही…तसं नाहीये.” वृद्ध व्यक्ती उद्गारली.
त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”
संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही…अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.”
“परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला.”
“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय.”
त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मे हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका.”
पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला…पण काल सकाळी ते देवाघरी गेले.”
“त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं…जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”
त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा.”
प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.
अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं ।
देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिं अचन्चलं ॥
हिंदू धर्मात असलेली ही प्रार्थना अत्यंत गहन आहे.
या प्रार्थनेद्वारे भक्तानं प्रभूकडे तीन इच्छा मागितल्या आहेतः-
१. कोणत्याही शारीरिक वेदनांविना मृत्यु
२. प्राथमिक आवश्यकतांची पूर्तता होईल असं साधं आयुष्य (महाल माड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया)
३. आणि कोणत्याही प्रसंगी डगमगणार नाही अशी प्रभूचरणांवर अढळ श्रद्धा
(एका इंग्रजी कथेचा स्वैरानुवाद – समीर अनिल थिटे)
संग्राहक : – सौ. अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज 7 मे.. विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा स्मृतिदिन! ..मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातील काही हृदयस्पर्शी आठवणी….
हिरवीकंच साडी, हिरवागार परीटघडीचा ब्लाऊज, मनाचा ठाव घेणारी नजर, ताठ बांधा, छोटासा गोंडस अंबाडा आणि त्यावर हौसेनं माळलेला घमघमीत मोगरीचा गजरा! अहाहा! काय तेजस्वी ते रूप आणि ओजस्वी ती वाणी! आणि तेही वयाच्या ८६व्या वर्षी! या रूपाला पाहण्यास आणि ही लख्ख वाणी ऐकण्यास पार्ल्यातील ‘दीनानाथ नाट्यगृह’ त्यादिवशी चोखंदळ साहित्यिक, संगीतज्ञ आणि रसिकांनी खचाखच ओसंडून वाहात होतं. प्रसंग होता – माझ्या पहिल्यावहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हा कॅसेटचा प्रकाशन सोहळा – या ज्ञानदेवीच्या शुभहस्ते! ही ज्ञानदेवी म्हणजे दुर्गादेवीचा आणि शांतादेवीचा सुरेख संगम! ती स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ होती! तिच्या येण्यानंच प्रत्येकाच्या मनात उत्साह, आनंद, कुतूहल आणि उत्सुकता भरून वाहात होती! गझल सम्राट जगजीत सिंह यांनाही तिच्या शेजारी बसण्याचं, मोठं अप्रूप वाटत होतं.
२६ मे, १९९६ हा तो दिवस! याच दिवशी सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘जागविला सुखांत एकांत’ हा ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटमधील प्रत्येक गाण्याचं, समर्पक रसग्रहण करणारा लेख लिहून, दुर्गाबाईंनी अनेकांना धक्काच दिला होता! प्रकाशनाच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या गुलाब पाकळ्यांच्या वर्षावानं, बाई आधीच मोहरून गेलेल्या! त्या बोलल्याही अप्रतिम! आणि पूर्व वयात विरघळून जाऊन चक्क ‘केदार’ रागातली बंदिशही लाजवाब गायल्या! कुठचाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता! दुर्गाबाई म्हणजे अर्वाचीन काळातली गार्गी – मैत्रेयीच! त्या केवळ साहित्य विदुषीच नव्हे तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्य सेनानीपासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! ज्या क्षेत्रात हात घातला, त्याचं सोनं केलं त्यांनी!
एकदा, बहीण कमला सोहोनींबरोबर त्या एक इंग्रजी चित्रपट पाहत होत्या. त्यातील नायिका, आपण नेहमी घालतो, त्यापेक्षा वेगळया पद्धतीने टाके घालून, स्वेटर विणत होती. हे बारकाईनं निरीक्षण करून, त्यांनी एका व्यक्तीचा एक स्वेटर एका दिवसात तयार होतो, हे स्वतः विणून सिद्ध केलं.. वयाच्या नव्वदीलाही त्यांची कुशाग्र बुद्धी तोंडात बोटंच घालायला लावी! या वयातही नवनवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा ध्यास पाहून आश्चर्य वाटे! त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला, त्यांनी मला भेट दिलेला, त्यांचा आवडता, निवृत्तीनाथांचा एक अभंग मी गायले. त्यावेळी बरीच जाणकार मंडळी तिथं होती. गाणं संपल्यावर, दुर्गा आज्जींनी या ‘नातीचा’ पापा घेतला आणि हातही हातात घेतला. माझे ‘थंडगार’ हात पाहून त्या गोड हसल्या आणि पट्कन म्हणाल्या, – “Cold from outside, Warm from inside… !”
बाईंनी अनेकांना घडवलं. प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. त्या अनेक भाग्यवंतांपैकी मीही एक आहे!
काही वर्षांपूर्वीची गोष्ट… मी इतरांच्या चालीत नवीन बसवलेल्या काही कविता, बाईंसमोर नेहमीप्रमाणं म्हणून दाखवायला गिरगांवात त्यांच्या घरी गेले त्यावेळी त्या म्हणाल्या, “अगं पद्मजा, फार बरं झालं तू आलीस. आज नवलच घडलं! आज शाकंभरी पौर्णिमा. पहाटे, चंद्रबिंब अस्त होताना, माझ्या वडिलांनी, त्यांच्या स्मृतिदिनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि ‘देहोपनिषद’ माझ्या पुढ्यात आले, ते असे…
|| देहोपनिषद ||
‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||
भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे ||२||
अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले ||३||
फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||
मरणा, तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||
पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||
सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले… ||७||
पुढे त्या म्हणाल्या, “आजवरच्या माझ्या कविता, मलाच न आवडल्यानं मी फाडून, जाळून फेकून दिल्या. ही माझी मला आवडलेली एकमेव कविता! याला तू चाल लाव, आणि उद्या माझी दूरदर्शनवर मुलाखत आहे, त्यात तू ते गा!”
मी प्रथम ते ‘देहोपनिषद’ वाचूनच भांबावले. परंतु दुर्गाआज्जीला नाही म्हणण्याची माझी प्राज्ञाच नसल्यामुळे मी आजवर, कधीही न केलेला संगीत दिग्दर्शनाचा प्रयत्न, परमेश्वरी कृपेनं सफल झाला. त्यांनीच संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी’ अंतर्ज्योत पेटवली!
दुसर्या दिवशी दुर्गाबाईंनी दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ माझी कविता सुंदर गाणार आहे,” असं म्हणून माझं मोठ्या मनानं कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मात्र मला आत्मविश्वास आला आणि मी जवळजवळ दीडशेहून अधिक कवितांना, अभंगांना धडाधड चाली लावत गेले. केवढी भव्य आणि सुंदर दृष्टी दिली मला दुर्गाबाईंनी!!
एकदा सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकरांना (त्यांच्या लहानपणी) ‘पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर’ यांच्या विषयी लेख लिहिण्यासाठी कुठेही माहिती मिळेना. तेव्हा दुर्गाबाईंना त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या भव्य ग्रंथालयात गाठलं आणि दुर्गाबाईंनी तात्काळ त्यांना अहल्याबाईंचे पन्नास एक संदर्भ पूर्ण माहितीसकट दिले. शिवाय, “ग्रंथालयाच्या एका कोपर्यात ‘होळकरांची बखर’ बांधून ठेवलीय, ती मुद्दाम वाच.” असंही सांगितलं. हे सर्व सांगण्यात कुठेही गर्वाचा, उपकाराचा लवलेशही नव्हता. उलट, कुणीही न निवडणारा, वेगळा आणि उत्तम विषय घेतल्याबद्दल छोट्या वंदनेचं अभिनंदन आणि कौतुकही केलं. शिवाय दुपारच्या उन्हातान्हातनं आलेल्या या मुलीला प्रेमानं, आपल्या डब्यातली रुचकर चटणी आणि थालीपीठ खाऊ घातलं! त्याची चव वंदनाबाईंच्या जिभेवर अखेरपर्यंत होती.
दुर्गाबाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्त्वचिंतनाचंही! तत्त्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळं बाईंचं त्यांच्यावर मनस्वी प्रेम! याच थोरोवर इंदिरा गांधींनी केलेली कविता वाचून बाईंनी इंदिरेच्या आतील ‘कलावंताला’ सलाम केला आणि इंदिरा गांधींमुळे आणीबाणीत भोगाव्या लागणार्या हालअपेष्टा विसरून, त्यांच्या अक्षम्य चुकाही माफ करून टाकल्या. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन दुर्गाबाईंचं! हाच प्रांजळपणा त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातही दिसतो, म्हणून त्यांचं लेखन हे बुद्धीला आणि अंतःकरणाला थेट भिडणारं वाटतं. ते वाचताना त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं.
त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी कधीच विसरणार नाही. एक म्हणजे – ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ आणि म्हणूनच मला वाटतं, इतक्या विविध विषयांवर त्या प्रभुत्व मिळवू शकल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ‘कुठलंही काम करताना, त्यात जीव ओतून केल्यास ते १०० टक्के यशस्वी होतं, त्यात उत्स्फूर्ता आणि उत्कटता मात्र हवी!’
७ मे, २००२… दुर्गाबाई निवर्तल्याची बातमी ऐकली आणि काळजात चर्र झालं. त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या सुनेनं – चारुताईनं मला ‘देहोपनिषद’ म्हणायला सुचवलं. शेवटी त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून, माझ्या या आज्जीच्या डोक्यावरून कुरवाळत कुरवाळत मी ‘देहोपनिषद’ गायले. त्याक्षणी ती नेहमीसारखीच प्रसन्न आणि तेजस्वी दिसली. जणू काही डोळे मिटून तिला आवडणारं देहोपनिषद, ती अत्यंत आनंदानं ऐकत होती..
‘देहोपनिषद सिद्ध झाले..’ हीच भावना तिच्या चेहर्यावर विलसत होती…
लेखिका – पद्मजा फेणाणी जोगळेकर
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈