मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ज्या क्षणी पाहिले तिला

होकार गृहीतच धरला

मी तुला आवडलो का?

तिला विचारलंच नाही

 

सप्तपदी चालताना

घुटमळली पाऊले तिची

हुरहुर कसली होती?

तिला विचारलंच नाही

 

माप ओलांडताना उंबरठ्याचं

मी आलो सहज आत

तुलाही यावंसं वाटतंय का?

तिला विचारलंच नाही

 

झाली पहिली भेट

किती आतुर होतो मी

ओढ तुलाही आहे का?

तिला विचारलंच नाही

 

वंशाला दिवाच हवा

सांगून मोकळा झालो

पण आई व्हायचंय का?

तिला विचारलंच नाही

 

संगोपन करतांना मुलांचं

कसरत होत होती तिची

गरज माझीही लागेल का?

तिला विचारलंच नाही

 

आयुष्यभर दिली साथ

झाली सुख दु:खाची सोबती

कधी मन तिचं दुखलं का?

तिला विचारलंच नाही

 

न मागताच तिच्याकडून

घेतलं मी सारं काही

तुलाही काही हवं का?

तिला विचारलंच नाही

 

खरंच किती स्वार्थी झालो

गृहीतच धरलं मत तिचं

तिचं मन काय म्हणतं?

तिला विचारलंच नाही

 

आत्ता विचारलं तिला

सांग काय हवंय तुला?

वय तिचं केव्हा झालं?

समजलेच नाही समजलेच नाही

 

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वयाच्या पंचेचाळीशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे…. emotional independance… म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे…

प्रेम द्यावं, care घ्यावी… पण मला कुणी प्रेम द्या, तर मी खूश, मला कुणी काही बोलाल तर मी रडणार, मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटं feel करणार, कुणी नीट बोललं नाही, की माझं मन वरखाली होणार आणि मी विचार करत बसणार की काय झालं असेल?… हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे…हे थांबवायला हवं…

आपल्या खूश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो … तो आपण लावतो.. बेसिकली, जग इकडचं तिकडे होवो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला manange करत राहणार… हा एक निश्चय असतो, तो करायला शिकलं पाहिजे….

याने काय होईल?

1)लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.

2) गॉसिप पासून आपण लांब राहतो.

3) आपल्याला खूश करण्यासाठी wrong कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो.

4) कुणी कसंही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते.

5) मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते.

6) आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय, हे आपण मनातून ठरवतो.

7) यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात, स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात.

8) कुणी कसही वागो, ती जबाबदारी त्यांची असते. त्यापायी आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो.

9)मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त active आणि creative होतो, आनंदी राहून काम करतो.

10)एकटे आलो, एकटेच जाणार आहोत, या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो…        

कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही detachment  जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो(mostly).मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं. त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात ढवळाढवळ कमी करावी….

सगळ्यात महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं.

यासाठी emotionally independent असणं हे फायद्याचं ठरतं…. देवाघरी जाण्याआधी मन साफ करत जावं. ती process या वयात सुरू करावी… आपण स्वतःला माफ करावं, इतरांना माफ करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं…. मदतीला तयार राहावं मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदृढ बनवावं मन आणि शरीराने…

याचा फायदा हा की चाळीशीपर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका… किमान त्या नंतर आपण करणार नाही आणि एक stable शांत आणि समाधानी life जगण्यात एक पाऊल पुढे जाईल.

लेखिका :श्रीमती मृदुल मृदू

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हे साले मित्र सगळे असेच असतात,

चिडवून

सतावून

जीव 

नकोसा करतात,

तरीही नेहमी

हवेसेच

वाटतात….

 

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

‘आयटम सही है’

म्हणून

चिडवतात,

लग्नानंतर

तिलाच

आदराने

‘वहिनी’

अशी हाक मारतात.

हे साले मित्र सगळे असेच असतात….

 

जेवताना एकमेकांच्या डब्यांवर

सगळ्यांचीच

नजर असते,

खास पदार्थ

सर्वांना पुरेल ,

याची मात्र

खात्री नसते.

पण…

एखाद्या दिवशी डबा नाही आणला,

तरी आपलंच ताट

इतरांपेक्षा जास्त भरतं .

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

नाक्यावरती गप्पा मारताना..

तीन में पाँच –

बिस्किट & चहाची अशी ऑर्डर सुटते,

बिल भरण्याची वेळ

आली की सर्वांचीच

पांगापांग

होते.

 

मात्र

अचानक

कधी बाबांना admit करावे

लागते,

“आहोत आम्ही पाठीशी,” म्हणत

advance

नकळत भरला जातो.

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

अवचित

एखादा प्रसंग ओढवला तर,

सख्खे

नातेवाईकही

पाठ

फिरवतात,

अशावेळी,

छळणारे हेच

मित्र

पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,

रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते

श्रेष्ठ ठरवितात.

हे साले मित्र सगळे असेच असतात!

चिडवून

सतावून जीव

नकोसा करतात.

तरीही नेहमी हवेसेच

वाटतात…..

 

जी गोष्ट

आई वडिलांना

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

शिक्षकांना

माहीत नसते

ती मित्राला

 माहीत असते..

 

जी गोष्ट

 गर्ल फ्रेंडला

माहीत नसते

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

बायकोला

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

आई-वडिलांचं,

 एवढंच काय पण बायकोचंसुद्धा

 उष्टं खाताना

कधी कधी मन संकोच करतं

पण मित्राचं उष्टं मात्र बिनधास्त चालतं …

 

मित्रांवर जळलो असेल मनातून.

खरं आहे,

पण …

 

माझ्या पिंडीला

 कावळा कसा शिवेल,

 हे फक्त

मित्रालाच

 माहीत असतं.

 

 

शेवटी कोणी रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे

डोळ्यात पाणी काढेल,

 हे नक्की.

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बरेच ज्येष्ठ नागरिक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा  बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना त्यांनी कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक- सिनेमा सुद्धा वर्षातून दोन- तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असतील तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.

परिणाम काय झाले?  तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले, जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे.  कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी, सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्यवसाय नसून धंदा या दृष्टीने पाहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हींमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत. इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा  उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही. मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र त्यांना इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक- दीड महिन्याची रजा मिळते.  हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणातदेखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस- पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.

हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.

नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काहीही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजेनुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले , कमी पडत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. आपण गरीब आहोत, की मध्यमवर्गीय, हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कारने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला- परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला.आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे, अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहिक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!

वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये, असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.

ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे,तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे.

आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे, q की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा.

जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषपणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून.पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहिलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!

साठ- पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा. समजा, तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस- पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल.पुरे झाले आता इतरांसाठी जगणे. “आता आपले काय राहिलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबूनराहत काढावी लागतील, हे लक्षात ठेवा.

दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ.शशी नाडकर्णी – नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वंगण…” – लेखिका: श्रीमती मनस्वी समीक्षा ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “वंगण…” – लेखिका: श्रीमती मनस्वी समीक्षा ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्राँली बाहेर ओढताना अडकली.

धड ना आत धड ना बाहेर.

वैतागच!

नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले!

आतल्याआत चडफड नुसती. आता सुतार बोलवावा लागणार.

एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार. नाहीतर बजेट वाढवून

या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार. ‘आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय. माझी इकडे कामं आणि तिकडं कामं… ‘ सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.

जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने.

लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर. सरकेल. तात्पुरते तरी निभावेल.

चांगली आयडिया! मी पटकन तेलाचं बोट फिरवलं.

दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली. कसलं भारी काम झालं एकदम!

मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हटलं, ” बरं झालं बाई वेळेत आलीस. नाहीतर

चहा पावडर विकत आणावी लागली असती. “

ती हसली, “वंगण लागतंय, ताई. थेंबभर पुरतं. पण लागतं कधीमधी. ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात!”

खरंच. वंगण लागतं!

फक्त मशीन, वस्तूंनाच नाही, तर माणसालाही.

 त्याच्या देहाइतकंच मनालाही. अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.

चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा-भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं!

की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येउन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पुर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.

लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची.

प्यायचं म्हणजे प्यायचं.

कितीही आदळाआपट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट- आतड्याचं ते वंगणच आहे. महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं. आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे.

कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुधलीभर कोमट तेल शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला.

रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची. शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.

खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं.

आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.

जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण, गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.

हा (स्व)भावच आहे वंगणाचा!

क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळुवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याच्याशी शांतपणे बोलणं, हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.

वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं.

जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल.

आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होउन जातं!त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे आणि प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे.

निर्जीव मशीनसामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं तिथं तुमच्याआमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे. त्याचं जतन केलंच पाहिजे.

तरच जगणं लयीत, सुसह्य होत राहील! हो ना?

लेखिका : श्रीमती मनस्वी समीक्षा

प्रस्तुती :श्रीमती राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वप्न जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वप्न जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

साल 2004.माझे पती योगेश.नोकरी निमित्त इंग्लडमध्ये रहात असताना मीही काही महिने त्याच्यासोबत तिथे होते.  माझे वय तेव्हा साधारण 25 च्या आसपास असावे. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. पॅटचा जोडीदार एरिक आणि अजून एक इंग्रज जोडी असे आम्ही सहाजण या छोट्याशा पार्टीसाठी एकत्र आलो होतो

टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारलं, “तू काय काम करतोस ?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणलं . तो म्हणाला, “मी स्टेशनवर झेंडा दाखवतो.” मी आणि योगेश नि:शब्द. कारण पॅट योगेशची उच्चपदस्थ अधिकारी.

 माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा मला शांत राहू देईना. मी पुढे परत विचारले, “सुरवातीपासून तिथेच आहेस का?” योगेश थोडा अस्वस्थ झाला आणि त्याने माझ्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. मी थोडं दुर्लक्ष केलं. तो qम्हणाला, “Nope, चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत मीही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अधिकारी होतो.  20 ते 40 या वीस वर्षात खूप काम केलं. प्रचंड पैसे साठवले. फिक्स केले. आणि आता.. आता मी माझं जुनं स्वप्न जगतोय.” “स्वप्न म्हणजे?” मी विचारलं.

“मी लहानपणी जेव्हा जेव्हा माझ्या माॅमबरोबर स्टेशनवर जायचो,तेव्हा मला हा सिग्नलमॅन खूप भुरळ घालायचा. वाटायचं,किती लकी आहे हा! अख्खी ट्रेन थांबवू शकतो. आणि त्याच्या हातातले ते दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग जसजसा मोठा होत गेलो, तसं हा सिग्नलमॅन मागे राहिला. मीही चारचौघांसारखा खूप शिकलो.  एक्झिकेटिव्ह पोस्टवर आलो आणि रुटीनमधे अडकलो. पण..

माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले. आता या बिग मॅन एरिकने स्मॉल किड एरीकचे स्वप्न पूर्ण करायचं . आणि  दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो. ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे.”

एरीक मस्त छोट्या एरीकसारखा हसला. आणि मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.पार्टी संपली.

हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देऊन गेला. आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात, काही ना काही देऊन जातात.पॅटने त्यादिवशी.. चाळीशीतही कसं मस्त तरुण आयुष्य जगायचं, आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत कसं जगायचं हे शिकवलं. ही जोडी विलक्षण आवडली मला.

मी आणि योगेश घरी आलो तेव्हा आम्ही दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो.

भूतकाळात मागे टाकलेले, हरवलेले, विसरलेले आपापले हिरवे, लाल झेंडे आठवले. माझी डायरीत राहिलेली कविता, अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणं, योगेशची एखादे वाद्य शिकण्याची अपूर्ण इच्छा, असं……. बरंच काही…

 मीही माझ्या चाळीसाव्या वाढदिवसाला आवडता झेंडा हातात घेतलाय. कवितेचा,गाण्याचा, जगण्याचा.

आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला.

1.पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी.

2.महत्त्वाकांक्षा, पैसा यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी.

3.चाळीशीनंतर आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी.

मित्रांनो,एरिकने जे चाळीशीत केलं,ते आपण किमान साठीत करू शकणार नाही का?वयाचा टप्पा कोणताही असो. स्वतःसाठी जगणं कधीपासून सुरु करायचं, याची एक क्रॉस लाईन आपण ठरवून घ्यायलाच हवी. अगदी चाळीशीमध्ये शक्य नसलं तरी,  किमान पन्नाशीनंतरच आयुष्य आपण आपल्या स्वतःसाठी जगायला हवं.

आपण आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल – अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक धावत असतात.  पन्नाशी , साठी , सत्तरी गाठली, तरीही त्यांचं धावणं कमी होत नाही.वयानुसार शरीराला, मनाला, बुद्धीला, विश्रांती दिली नाही, तर एक दिवस धावता धावताच आपण जगाचा निरोप घेणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

मित्रांनो,जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोवरच शोधायला हवा आपण आपला आवडता झेंडा!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील, हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.

अशीच एक सिरीयल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून, शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती.

मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यातपण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेतसुद्धा सुरू असेल.

तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली, पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए, तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस. तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही.”

यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही. कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं.

आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते. मुलांनी भरलेलं घर हे पसारायुक्तच असणार. चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला. पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहाससुद्धा नव्हता. त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा.”

पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.

का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?

जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळीसुद्धा तरतरीत आणि केससुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्याऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात.

ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे.मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही. चित्रातल्यासारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं.

स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की पंचविसावा. नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?.

तब्येत सांभाळावी हे ठीक, पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक, पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे, हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात. टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्‍या हाय हील कशासाठी. टाच महत्वाची आहे की फोटो?

मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?

ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडियाला नेमके का आणि कधी दिले?

एक माणूस दुसर्‍या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?

करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम. होऊ देत घराचं गोकुळ. अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्‍याशी. मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा. सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो, त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात,तसा आईला खिसा का नसतो?शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिशातून काढून फीसाठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिशातलं पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो? आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो? आईला विचारलं तर ती फक्त हसायची. “तुला भूक लागली असेल ना?” असं म्हणून पदर खोचून शिऱ्यासाठी रवा भाजायला घ्यायची .  रवा भाजण्याच्या त्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटनच्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम तिने पुसून काढली आणि  कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारखं मलम माझ्या जखमेवर लावलं.

मला रात्री लवकर झोप यायची, तेव्हा घरातली कामं लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने  त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर मांडायची आणि मला त्या साडीसारखीच अगदी तलम निद्रा यायची.

कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना- केसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्याबरोबर बाबांच्या खिशाकडे असायचं.

मोठा झाल्यावर मीसुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार, हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत. अशा वेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया- दोन रुपये काढून देत असे आणि वर रुपया देऊन “उन्ह फार आहे. पेपरमिंट खा चघळायला,” म्हणून सांगत असे. मित्र म्हणत, ” तुझी आई खूप छान आहे रे!” तेव्हा कॉलर टाईट होत असे.

आईकडे खिसा नसताना बाबांपेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कशा, हा प्रश्न मला  थोडा मोठा  होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो. आणि त्या खिशाला चौकट नसते. तो आईचा पदर असतो, जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही  रिक्त न होणारा खिसा असतो .

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हाताचे ठसे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हाताचे ठसे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

बाबा भिंतीला धरून (भिंतीला हात लावून )चालत रहायचे .ते जसे जसे भिंतीला हात लावत, त्या त्या ठिकाणाचे रंग पुसट होत जात व मळकट होत.

ते पाहून माझ्या बायकोच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो .

त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते  आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने  हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत .आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली .मला पण काय झालं होतं, कुणास  ठाऊक!  मी तडक  बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो, “बाबा, तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का ?” माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखं मला वाटलं .८०वर्षाचे  माझे बाबा. त्यांनी माझ्याकडे बघितले . एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी, असा चेहरा करतो, तसा बाबांचा झाला होता . मान खाली घालून ते गप्प बसले .

‘छे!हे मी काय केलं?मी असं म्हणायला नको होतं,’

असं मलाच वाटायला लागलं .

माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन  झाले आणि त्यांनी भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले .

पुढे दोन-चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले .आणि  त्यांनी अंथरुणच धरलं .पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली इहलोक यात्रा संपवली .

भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्यासारखं वाटत राहिलं.

दिवस ,दिवस पुढे उलटत राहिले .माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे, असे वाटू लागले .

रंगविणारे आलेसुद्धा.

आमच्या जितूला आपले आजोबा म्हणजे प्राण प्रिय .भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून रंगविण्याचा हट्टच धरला .

शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, “सर, तुम्ही काही काळजी करू नका  त्या ठशाच्या भोवतीने गोल करून छान पैकी डिझाईन करून देतो .ते तुम्हालाही आवडेल .शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही.

पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिलं.

पेंटरची  आयडिया सर्वांनाच आवडली .घरी येणारे पाहुणे , मित्रमंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करू लागले. आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले, तेव्हा तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवती डिझाईन बनविलं जाऊ लागलं.

सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो, तरी आमचाही व्यामोह वाढत गेला .

दिवस , महिने, वर्ष पुढे सरकत चालले .जितू मोठा झाला.त्याचं लग्न झालं.  तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो .बाबांच्या एवढा नसलो, तरी सत्तरीला येऊ लागलो होतो .

मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं, असं होऊ लागलं.

पण मला तेव्हाचं आठवलं. किती चिडून बोललो होतो बाबांना! म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो .

त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार, तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचे जाणवलं.”अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना ? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला. ” मुलाचे वाक्य कानावर पडले .

मी  जितूच्या मुखाकडे पाहत राहिलो . त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. पण द्वेष नव्हता .

तिथेच जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले .

माझ्या डोळ्यांसमोर बाबांचं चित्र उभं राहिलं.

त्या दिवशी मी  ओरडून बोललो  नसतो, तर बाबा अजून जगले असते, असं वाटू लागलं .आपोआप डोळ्यात पाणी साचू लागलं.तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली 8 वर्षाची नात  श्रिया धावत आली.

“आजोबा , आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला,”म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली .

हॉलमधील सोफ्यावर बसलो .लगेच नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवलं , “आजोबा, आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली.मला फर्स्ट प्राईझ मिळालं.” 

“हो का ? अरे व्वा!  दाखव बघू. कोणतं ड्रॉईंग आहे ते?”म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखविलं.

आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे, तसंच काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती.

आणि म्हणाली ,”टीचरनी विचारलं,हे काय आहे ? म्हणून. मी सांगितले, हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे.आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय .

टीचर म्हणाल्या , मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात. भिंतभर रेघोटे,हाता पायाचे चित्र काढत राहतात .मुलांच्या आईवडलांना त्यांचं कौतुक वाटतं .त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं .टीचर आणखी म्हणाल्या आपण पण आपल्या वयस्क आई- वडिलांवर ,आजी- आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे . मला व्हेरी गुड श्रिया असे म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं

असं श्रिया गोड गोड बोलत राहिली.  तेव्हा  मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे, असं वाटू लागलं .

मी माझ्या रूममध्ये आलो .दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे येऊन “मला क्षमा करा. बाबा, मला क्षमा करा,” असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडून  घेतलं  आणि वरचेवर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

कुठे..?

केव्हा..?

कसे थांबावे..?

ही एक कला आहे.

ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.

माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही…!’

विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…!,’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही.’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली…! आता पुढे भेट शक्य नाही.’

‘परदेशी चाललाय का…?’ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला…!’

ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत…! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

समतया वसुवृष्टि विसर्जनै

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो…

हे विसर्जन…!!!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी  हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच…!!!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही…!!!!

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈