मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कीर्तिवान! पुण्यवान…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “कीर्तिवान! पुण्यवान…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

परवा नाशिकला गेल्यावर मुक्त विद्यापीठाच्या परिसरात जेवायला गेलो होतो. साध्या झोपडीत एका चुलीवर एक बाई ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलमधील स्वयंपाकाला लाजवेल, असा स्वयंपाक करीत होती. त्या महिलेच्या दोन जुळ्या मुली मला आणि माझा मित्र गणेशला जेवायला वाढत होत्या.

जेवण झाल्यावर माझा ‘सारथी’ विजय, त्या बाईच्या घरभर फिरून ती स्वयंपाकासाठी काय काय साधनसामुग्री वापरते, हे पाहण्यामध्ये मग्न झाला होता. घरात एकूण आठ भांडे होते. त्यातल्या चार भांड्यांत सारी औषधे, गोळ्या होत्या आणि चार भांड्यात जेवण बनवायचे साहित्य.

माझा सारथी एकदम बडबड्या, हसी-मजाक करणारा. आम्ही दोघं बाहेर जेवत होतो.

माझा सारथी बाहेर आला आणि म्हणाला, “संदीप सर, ह्या मावशी जेवणात मसाल्याऐवजी औषधाच्या गोळ्या टाकतात, असं मला वाटतं. ” त्यावर मी त्यांच्याकडे गंभीरपणे पाहिलं. तेव्हा तो तितकाच गंभीर होऊन मला म्हणाला, “अहो सर, किचनमध्ये असलेल्या बऱ्याच डब्यांमध्ये गोळ्या आणि औषधे आहेत. मला दिसते, म्हणून मी तसं म्हणालो. “

मी थोडीशी ‘स्माईल’ विजयला दिली आणि पुन्हा शांतपणे जेवण करत होतो. विजय बोलता बोलता गंमतीत बोलून गेला.

या महिलेच्या घरात एवढ्या गोळ्या, औषधे का? असा प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होता. जेवणानंतर मी त्या महिलेला त्या गोळ्या आणि औषधांबद्दल विचारल्यावर ती काहीच बोलत नव्हती. एकदम शांत असलेल्या महिलेने गोळ्या औषधाचे नाव काढल्यावर दोन्ही मुलींकडे गंभीरपणे कटाक्ष टाकला. माझ्या लक्षात आलं की, काहीतरी गंभीर विषय असणार. खूप खोदून, खोदून विचारल्यावर ती महिला ‘आजारी आहोत, काहीतरी झालंय’, असं सांगत होती.

स्वयंपाक करणाऱ्या त्या महिलेच्या पतीचा फोटो घरामध्ये दर्शनी भागात लावला होता. त्या फोटोला घातलेल्या हारामुळे त्यांचं अलीकडच्या काळामध्येच निधन झाल्याचं लक्षात येत होतं.

आता गणेश आणि विजय दोघेही बाहेर गेले होते. आता एकान्त आहे हे लक्षात घेऊन हळूच सांगितलं, ‘कारभारी आणि मला दोघांनाही मोठा आजार झाला होता. त्यात कारभारी जात राहिले. तो आजार माझ्या दोन्ही मुलींनाही झाला. कुणाचा तरी आधार मिळाला आणि या आजारातून आम्ही तूर्तास तरी सगळे विसरून कामाला लागलो’. त्या महिलेने मागच्या अनेक वर्षांपासूनच आजारामुळे त्रासून गेलेले जीवन माझ्यासमोर ठेवले.

‘त्या’ महिलेसोबत काम करणारी दुसरी एक महिला, तिनेही जे काही घडलं ते मध्ये मध्ये सांगायला सुरुवात केली. काय-काय खाचखळग्यांनी भरलेलं एखाद्याचं आयुष्य असतं! ज्या आयुष्याला वाट काढता काढता नाकी नऊ येऊ लागतात. त्यातच असं कोणीतरी भेटतं, जो आधार देतो. आणि मग आयुष्य जगण्याचा पुन्हा लळा लागतो, असंच काहीसं या कुटुंबाच्या बाबतीत झालं होतं.

मी ज्या महिलेशी बोलत होतो, त्या महिलेचे नाव रत्नमाला सूर्यवंशी. रत्नमाला सूर्यवंशी हिचे पती, त्र्यंबक सूर्यवंशी यांचे एच आय व्ही संसर्गाने निधन झाले. रत्नमालासह तिच्या दोन्ही मुली एच. आय. व्ही. बाधित आहेत. रत्नमालाकडे काम करणारी गीताबाई नावाची महिला ‘कॅन्सरग्रस्त’ आहे. तिने मुंबईमध्ये एका डॉक्टरच्या मदतीने कॅन्सरचे मोफत उपचार घेतले. ज्या मुंबईच्या डॉक्टरने त्या महिलेला खूप मदत केली, त्याच डॉक्टरांचा संदर्भ घेऊन रत्नमाला उपचारासाठी मुंबईला गेली. योग्य वेळी योग्य ते उपचार न झाल्यामुळे रत्नमालाचे पती त्रिंबक यांचे निधन झालं होतं.

रत्नमाला आणि तिच्या दोन्ही मुलींना त्याच मदत करणाऱ्या डॉक्टरांनी समुपदेशनच्या माध्यमातून बाहेर काढलंच काढलं. त्यांच्यावर होणारा पूर्ण औषधाचा खर्च, त्यांचा येण्याजाण्याचा खर्च, सर्व काही डॉक्टरांनी स्वतः करून दिले. रत्नमाला, गीताबाई आणि जाई-जुई ह्या चौघीजणीही त्या मुंबईच्या डॉक्टरांचे अफाट कौतुक करत होत्या.

गीताबाई म्हणाली, ‘आमच्या परिसरातील अनेकांना त्या डॉक्टरांनी देवदूत बनून मदत केली आहे. माझ्या गावातील एका माणसाच्या सांगण्यावरून मी त्या डॉक्टरांकडे गेले आणि माझा जीव वाचला’. असं गीताबाई सांगत होत्या.

‘ते’ डॉक्टर कोण? ‘ते’ कुठे राहतात? त्यांचा पत्ता काय आहे? त्यांचा संपर्क नंबर काय आहे? त्यांची संस्था कुठली? अशी माहिती मी रत्नमाला यांच्याकडून घेतली आणि परत मुंबईकडे जायला निघालो.

मी बाहेर पडणार, इतक्यात रत्नमालाची मुलगी जुई मला म्हणाली, ‘आमच्याकडे परत जेवायला येणार ना भाऊ? ‘ 

मी लगेच म्हणालो, ‘हो येणार ना. का नाही येणार? ‘ 

त्यावर जुई म्हणाली, ‘जेव्हा आम्हाला मोठा आजार आहे हे लोकांना कळतं, तेव्हा ‘ती’ माणसं आमच्याकडे जेवायला येणं बंद होतं. आणि ‘ती’ माणसे जेवायला येणं बंद झालं की, उदरनिर्वाहाचे सगळे मार्ग बंद होतात.’

तिचं ते बोलणं ऐकून माझं मन एकदम सुन्न झालं. तिला काय बोलावं, हे मला कळत नव्हतं. मी तिला हळूच म्हणालो, ‘तुम्हाला जो आजार झाला आहे, तो आजार तुमच्या सहवासात कुणीही आलं तरी त्याला होत नाही. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. जी माणसं अडाणी आहेत, त्यांना काहीच कळत नाही. ते अशा प्रकारचा दुरावा करीत असतील. मी खिशामध्ये हात घातला खिशात थोडेबहुत पैसे होते, ते त्या मुलीच्या हाती ठेवले आणि मी माझा परतीच्या मार्गाला लागलो.

मुंबईच्या ‘त्या’ डॉक्टरांनी ‘त्या’ महिलेचे तिच्या कुटुंबीयांचे प्राण का वाचवले असतील? त्या सर्वांसाठी स्वतः खर्च का केला असेल? त्या डॉक्टरांनी अनेकांना का मदत केली असेल? असे अनेक प्रश्न मला पडले होते. मी अधिकचा विलंब न लावता त्या डॉक्टरांना फोन केला. त्यांच्याशी माझं प्राथमिक स्वरूपात बोलणं झालं. मुंबईमध्ये गेल्यावर भेटण्यासाठी त्यांची वेळही घेतली.

ज्या दिवशी भेटीची वेळ ठरली होती, त्याच दिवशी सकाळी डॉक्टर फोन करून मला म्हणाले, ‘मी रात्री मुरबाड जवळच्या एका आदिवासी पाड्यावर तपासणीसाठी गेलो होतो. तिथे आसपासचे अनेक रुग्ण आले होते. त्यामुळे रात्री खूप उशीर झाला. सकाळी त्याच भागात दुसरीकडे एका ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबीर लावले होते. म्हणून तिकडेच थांबलो. मी दिलेल्या पत्त्यावर, तुम्ही आदिवासी पाड्यावर येऊ शकाल का? ‘

क्षणाचाही विलंब न लावता मी ‘हो’ म्हणालो. आदिवासी पाड्यावर सकाळी सकाळी जाऊन पोहोचलो. तिथे महिलांची प्रचंड गर्दी होती. छान ड्रेसमध्ये चष्मा, टोपी घालून डॉक्टर सगळ्यांना तपासत होते. ‘बस बेटा, जा बेटा, ये बेटा, बेटा, बेटा, बेटा’ हाच शब्द डॉक्टरांच्या तोंडी होता. डोळ्यांची तपासणी, रक्ताची तपासणी, तिथेच रिपोर्ट, तिथेच औषधे, सगळ्या प्रकारच्या रोगांवर उपचार आणि औषध एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था डॉक्टरांनी केली होती.

मी नमस्कार करून डॉक्टरांना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘आता एवढे पेशंट झाले की, आपण गप्पा मारत बसू. ‘

मी आसपास असणाऱ्या अनेक लोकांना ‘हे डॉक्टर कोण आहेत? ते कधीपासून येत आहेत? ‘ हे विचारत होतो. तसे डॉक्टरांचे काम शहरातल्या लोकांसाठी असते, पण या डॉक्टरांना मात्र आदिवासी पाड्यांवर किंवा ग्रामीण भागामध्ये भेटण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी यावं वाटते. ही डॉक्टरांची खासियत होती.

डॉक्टर त्यांच्या तंद्रीत रुग्ण तपासण्यामध्ये गर्क झाले होते. मग आमचं बोलणं सुरू झालं. लोक भेटायला येत होते. आम्ही जेवण केलं. तिथल्या परिसरात फेरफटका मारला, तरी आमचं विषयाला धरून बोलणं सुरूच होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘भोपाळची “हिरकणी”…’  – लेखक : श्री मिलिंद वेर्लेकर ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

‘भोपाळची “हिरकणी”…’  – लेखक : श्री मिलिंद वेर्लेकर ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी, भोपाळची “हिरकणी”…

तब्बल गेली २० वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय… स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून.

या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे….

योगिता आणि तिचे पती, राजबहादूर रघुवंशी, त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले. पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच लग्न झालेल्या योगिता यांनी मोठ्या मनाने नवऱ्याला माफ करून नेटाने आणि धीराने संसार सुरु केला.

एक दिवशी ट्रकबरोबर काही कामासाठी गेलेल्या त्यांच्या पतींचा त्यांच्याच ट्रकच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अस्मानी धक्क्यातून सावरत असणाऱ्या योगिता यांच्यावर अश्याच दुसऱ्या दुर्दैवी बातमीची कुऱ्हाड पाठोपाठ कोसळली.. त्यांचा भाऊसुद्धा नवऱ्याच्या दिवसांसाठी येत असताना एका अपघातात मृत्यू पावला.

पदरी दोन मुले, मोठी मुलगी १० वर्षांची येषिका आणि धाकला मुलगा ४ वर्षांचा अश्विन… पती आणि सख्खा भाऊ नुकतेच अपघातात मृत्यू पावलेले, सगे सोयरे कुणी नाही, मुलांचे सगळे व्हायचे असताना बेताचीच परिस्थिती असताना त्यांना रोजचे खायला काय घालायचे हा सुद्धा प्रश्न होता. पतींचा व्यवसाय सुद्धा यथातथाच सुरु असल्याने अश्या अवस्थेत योगिता यांनी नेटाने दिवंगत पतींचा व्यवसाय घरूनच कसाबसा सुरु ठेवला. त्या सोबतच दु:ख बाजूला सारून कंबर कसून योगिता यांनी एका ज्येष्ठ वकिलांकडे असिस्ट करण्याचा प्रयत्न केला, पण वकिलीच्या कामांत खूप वेळ जाऊ लागला आणि पैसेही पुरेसे मिळेनात.

पैसे तर कमवायला लागणारच होते, ब्युटीशियनचा कोर्स झाला होता, एका ब्युटी पार्लरमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पण तिथेही पैसे लगेच आणि नेमके मिळेनात.

आणि याच भयंकर अडचणीच्या प्रसंगी ‘तो’ प्रसंग घडला..

आभाळ फाटले असतानाच जोडीला भयंकर भूकंप सुद्धा झाला….

त्यांच्या तीन ट्रक्सपैकी एक ट्रक जो हैद्राबादला भाडे घेऊन गेला होता त्याच्या ड्रायव्हरने तो ट्रक शेतात घुसवला आणि मोठा अपघात झाला, ट्रकचे आणि मालाचे भयंकर नुकसान झाले, ड्रायव्हर पळून गेला…

मुलांना शेजारच्या लोकांच्या भरवशावर ठेऊन योगिता यांनी एका हेल्पर आणि मेकॅनीकला घेऊन हैद्राबाद गाठले. रस्त्याच्या शेजारी ४ दिवस उभे राहून मेकॅनीक कडून ट्रक दुरुस्त करून रस्त्यावर आणला आणि हेल्परच्या मदतीने अनेक अडचणींचा सामना करत करत कसाबसा भोपाळला आणला.

हेल्परला ट्रक नीट चालवता येत नव्हता, अपघातग्रस्त ट्रक म्हणून रस्त्यात झालेला पोलिसांचा त्रास, ढाब्यांवर ढाबे मालक आणि अन्य ट्रक चालकांकडून होणारा त्रास, नैसर्गिक विधींना महिलांना रस्त्यांत होणार्या अडचणी आणि या सगळ्यात पोटची दोन मुले शेजाऱ्याकडे ठेऊन आलेली असल्याने उराची होणारी घालमेल….

… या एकाहून एक भयंकर अनुभवांनी डगमगून न जाता वर याच अनुभवांनी समृद्ध होत या सगळ्यांनी मिळून व्यवस्थित शिक्षित आणि विचारी योगीतांना या प्रवासात पैलू पाडले आणि साध्या काचेच्या खड्याची ही “हिरकणी” झाली…

भोपाळला परतल्यावर योगिता यांनी पहिले काय केले असेल तर, पतींना प्रिय असणारा आणि नीट चालवला तर बरे पैसे देणारा हा धंदा नीट चालवायचा असेल तर स्वतःला ट्रक नीट चालवता आला पाहिजे या खमक्या विचाराने “लोक काय म्हणतील, या पुरुषबहुल क्षेत्रात आपला कसा निभाव लागणार? ” वगैरे वगैरे सर्व विचारांना मनात अजिबात थारा न देता पूर्ण विचारांती आणि धैर्याने ट्रक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातले आणि सर्व शारीरिक, सामाजिक, आर्थिक, व्यावहारीक अडचणींचा एक एक करत सामना करत धैर्याने ट्रक ड्रायव्हिंग आणि रस्त्यावर उपयोगी पडेल असे जुजबी ट्रक रिपेरिंग सुद्धा शिकून घेतले.

मूळ उत्तर प्रदेशाची असलेल्या योगिता त्यांच्या लहानपणी महाराष्ट्रात राहत होत्या आणि इथेच त्यांनी रायगडावरल्या मुलांसाठी अवघड कडा उतरून गेलेल्या हिरकणीची गोष्ट ऐकली होती. त्याचं जिद्दीने आता त्यांनी पोटच्या मुलांसाठी ट्रक ड्रायव्हिंग शिकून घेतले आणि ट्रक चालक म्हणून स्वतःच्याच ट्रकवर काम सुरु सुद्धा केले.

आज गेली तब्बल २० वर्षे योगिता सूर्यवंशी ट्रकचालक म्हणून काम करत आहेत. एकेकाळी ट्रकड्रायव्हर महिला म्हणून त्यांची चेष्टा करणारे लोक आज त्यांच्या कामाचे, धैर्याचे, चिकाटीचे, नेटाचे आणि हिरकणी स्पिरीटचे दाखले देताहेत. योगीतांची दोन्ही मुले आज कॉलेजात उच्चशिक्षण घेत आहेत आणि त्यांना त्यांच्या आईचा अभिमान आहे.

योगिता देशातल्या केवळ पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर आहेत इतकेच नव्हे, त्या देशातल्या जवळपास सर्व मोठ्या हायवेजवर ट्रक चालवून देशभरातल्या सर्व राज्यात ट्रक चालवलेल्या महिला आहेत असे नव्हे, तर त्या देशातल्या सर्वात जास्त शिकलेल्या ट्रक ड्रायव्हर आहेत. हिंदी सोबतच त्यांना मराठी, गुजराती आणि तमिळ भाषा सुद्धा छान बोलता आणि लिहिता येतात.

योगिता म्हणतात की ट्रक ड्रायव्हरच्या व्यवसायात त्यांना कधीच धोका वा भीती वाटली नाही पण तरीही त्यांना नेहमीच जागरूक राहून येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिकता ठेवावी लागते जेणेकरून खास महिला असल्याने काही अवघड प्रसंग निर्माण होणार नाही. आजपर्यंत एकदाच संध्याकाळी रस्त्यावर शेजारी ट्रक थांबवून जेवण करत असताना तिघा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता पण त्याही अवस्थेत त्यांनी या तिघांना पिटाळून लावले आणि तेवढ्यात रस्त्यावर इतरांनी ट्रक थांबवून यांना मदत केली.

योगिता ट्रक चालवतांना पुरुष ट्रक ड्रायव्हर्सचे सर्व नियम काटेकोरपणे पाळतात, सहकारी ट्रक ड्रायव्हर आणि कर्मचारी यांना नितांत आदराने वागवतात, अन्य ट्रक ड्रायव्हर सुद्धा योगीतांचे खूप कौतुक करतात आणि त्यांना वाट्टेल ती मदत करतात.

योगिता आपले स्वतःचे जेवण ट्रक संध्याकाळी उभा राहिल्यावर जिथे असतील तिथे करतात, सर्वसामान्य ट्रक ड्रायव्हरप्रमाणेच सर्व ढाब्यांवर असणारी टॉयलेट्स वापरतात, ट्रकमध्येच रात्री सर्व आवश्यक ती काळजी घेऊन झोपतात, भल्यामोठ्या ट्रकचे टायर यदाकदाचित पंक्चर झाले तर सहकाऱ्याच्या मदतीने टायरसुद्धा बदलतात. पुरुष ट्रकड्रायव्हर प्रमाणेच व्यवस्थित आवश्यक असतील तश्या शिफ्टस करून ट्रक चालवून वेळेवर माल पोहोचवतात, माल उतरवणे, चढवणे या कामात सुद्धा सहकाऱ्यांना मदत करतात. ट्रक घेऊन बाहेरगावी गेलेल्या असताना देखील आपला ट्रक्सचा व्यवसाय प्रोफेशनली सांभाळतात, आपले ट्विटर हँडल सुद्धा सांभाळतात…

… आणि महत्वाचे म्हणजे आता कालौघात १२ गावाचे पाणी पिऊन तयार झालेल्या योगिता अजूनही स्वतःला नम्रपणे एक साधी भारतीय महिला म्हणवून घेतात…

“हम भारतकी नारी है, फ़ुल नहीं चिंगारी है’ हा वास्तव पथदर्शी अनुभव देशभरातल्या महिलांसाठी तयार करणाऱ्या भारताच्या या रणरागिणीला, योगिता रघुवंशी यांना सन्मानपुर्वक साष्टांग नमस्कार…

*******

लेखक : श्री मिलिंद वेर्लेकर

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दुधाई! दुग्धदात्री!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“दुधाई! दुग्धदात्री!! ☆ श्री संभाजी बबन गायके 

भयाण अंधार आणि अगदीच जंगली श्वापदांचा नसला तर भटक्या कुत्र्यांचा तर निश्चित वावर असलेला परिसर… कुणाचाही पायरव नाही…. थरथरणा-या पानांना रातकिड्यांची साथ! कुठं लपू मी? कशी लपू मी? ती घायाळ हरिणी भांबावून गेलेली होतीच… पण गेल्या काही तासांपूर्वी ती सर्व भयापासून मुक्तही झाली होती…. भय जीव असलेल्या देहाला वाटते… मृतदेह कुणाला घाबरेल? मृतदेह बघून जग भयभीत होतं! पण… तिचं पाडस मात्र तिला सोडायला राजी नव्हतं! पाडसाला भूक आणि तहान या दोन्ही गरजा भागवू शकणारा तिच्या तनूतील एक अवयव नैसर्गिक प्रेरणेने आणि गेल्या नऊ महिन्यांच्या सरावाने ठाऊक झालेला होता! पाडसाने तिच्या देहावरचं आधीच काहीसं फाटलेलं प्रावरण भुकेचा जोर लावून जरुरीपुरतं फाडण्यात यश मिळवलं होतं…. आणि त्या पाडसाची जगण्याची धडपड सुरू होती… रात्रीने डोळे मिटून जणू काहीच घडत नाहीये असं भासवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता…. उगवलेल्या सूर्यानं रात्रीची त्या अवघडलेपणातून सुटका केली!

जग जागं झालं…. आणि तिथं माणसांचा वावर सुरु झाला…. एकाने पाहून दुस-याला सांगितलं…. अंतर राखत गर्दी उभी राहिली… दबक्या आवाजात चर्चा आणि हळहळ हा नेहमीचा सोपस्कार गर्दीला सरावाने छान जमून गेला आहे… त्या हरिणीचं पाडस खरं तर रात्रभर खूप दमून गेलं होतं… पण भूक भागेस्तोवर डोळा लागणार तरी कसा? आज आईच्या उरातला स्निग्ध स्राव असा आटत आटत का बरं गेला असावा? रागावली की काय गाय… वासरू मनात स्वत:लाच प्रश्न विचारत असावं… कारण त्याचं रडणं तिला पान्हा फोडत नव्हतं… पूर्वी असं त्याच्या अनुभवास नव्हतं आलेलं कधी. त्यात वासराच्या पायाला काहीतरी बोचलं होतं…. रक्तही वाहत असावं बहुदा… पण वेदनेशिवाय त्याला काहीही व्यक्त करता येत नव्हतं… बाळाचं रडू प्रत्येक वेळी वेगळं असतं…. पण हे जाणणारं तिथं कुणी नव्हतं!

गर्दीतील कुणीतरी कर्तव्य भावनेने पोलिस यंत्रणेस खबर दिली…. एक स्त्री निपचित पडलेली आहे… तिच्या कुशीमधलं बाळ… हालचाल करीत नाही… म्हणजे ते सुद्धा….? पोलिसांनी मग लगबगीने एका आईला फोन केला….. लगोलग येते म्हणाली! बेवारस प्रेतं, पैशांअभावी अडून राहिलेले गरीबांचे मृतदेह… यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी तिने स्वत:हून खांद्यावर घेतलेली होती. एरव्ही तिरडीला पुरूषच खांदे देतात…. हिने मात्र एकटीने एका अर्थाने सबंध तिरडीच खांद्यावर वाहण्याचा चंग बांधलेला आहे.. आजवर शेकडो तिरड्यांना तिने खांदा दिलाय! अर्थात तिच्या मदतीला काही सुहृद माणसांचे हात असतातच!

ती अवघ्या दहा मिनिटांत तिथे हजर झाली…. देहाचं निरीक्षण केलं… बहुदा त्या मातेने स्वत:ला संपवलं असावं… कायदेशीर प्रक्रियेत काय ते समजेलच….. पण जवळ जाऊन पाहताच तिचे हात पाय लटपटले…. मृतदेहाच्या स्थितीने नव्हे… तशी तिला सवय होती… आकार गमावलेले मानवी देह पाहण्याची… पण त्या मृतदेहाच्या छातीशी एक आठ-नऊ महिन्यांचं लेकरू घट्ट बिलगून होतं… आणि श्वास घेत होतं…. स्त्री जातीचं लेकरू!

…. ‘हाय अबला तेरी यह कहानी, आंचल में दूध और आंखो में पानी! ‘ कुण्या हिंदी कवीने लिहून ठेवलेल्या या ओळी…. तिच्या आंचल मध्ये दूधही नव्हतं… आणि डोळ्यांतले अश्रू आता सुकून गेले होते… अश्रूंना सुद्धा वाहण्यासाठी काळजात जीवाचा झरा लागतो!

…. ती अबला होतीच… म्हणजे तिला अबला होण्यासाठी परिस्थिती, मन:स्थितीने बाध्य केलं असावं… अन्यथा कोण कशाला स्वत:चा जीव स्वत:च देईल? जीव देण्याच्या प्रयत्नात अगदी निकराच्या, अखेरच्या क्षणाला (इथं क्षण हे कालमापनाचं एककही तसे खूप मोठे असते त्याक्षणी! ) जगण्याची धडपड प्रत्येक जीव करीत असतोच! तिने सुद्धा निश्चित केला असावा…. पण तिच्या कृतीने तिला मागे टाकलं होतं.. आता काहीही होणार नव्हतं… जगाच्या धुळीत उमटलेली दोन पावलं आता कायमची पुसली गेली होती… मरणाच्या वावटळीमुळे!

तिने पटकन पुढे होत त्या देहाच्या कुशीतून ती बालिका आपल्या हाती घेतली… छातीपासून दूर केलं जात असल्याची जाणीव होताच त्या बालिकेने नकाराचा सूर लावला…. तिने तिथल्या तिथं.. भर गर्दीत… कसलाही आडोसा घेण्यात वेळ न दवडता… न जाणो बाळ किती वेळापासून उपवाशी असेल…. कोणताही क्षण त्याच्यासाठी अखेरचा ठरू शकतो… या विचाराने आपल्या छातीवरचा कपडा दूर केला…. आणि बाळ एका जिवंत देहातून वाहणारा मायेचा प्रवाह त्याच्या देहात उतरवू लागलं… जगातलं सर्वांत सुंदर दृश्य तिथं प्रत्यक्षात साकारलं जात होतं…. ते दृश्य कुणाला कसं दिसत असेल, कुणाच्या नजरेत काय झिरपत असेल.. याचा त्या आईने जराही विचार केला नाही…. बाळासाठी देवानं बाईच्या देहाला हे अलौकिक लेणं दिलं आहे…. त्यावेळी ती आणि ते बाळ… या दोघांच्यात दुसरं काहीही नव्हतं… केवळ एक यज्ञकर्म सुरु होतं! आणि दुसऱ्या कुणाच्या मनात काय असेल याचं तिला सोयरसुतक नव्हतं! तिने अशा अनेक बाळांना आजवर स्वतःचं दूध पाजलं आहे… अनेक मातांना दुग्धदानाचा वसा दिला आहे!

त्यानंतर पुढचे कित्येक तास ती पोर तिच्या या नव्या आईपासून क्षणभर दूर व्हायला राजी नव्हती!

थोड्यावेळाने त्या पोरीचा चार वर्षांचा थोरला भाऊही पोलिसांना त्या जागेपासून काही दूर अंतरावर आढळून आला… त्या बाईने दोन पोरांना कायमचे पोरके केले होते! का? तिच्याच जीवाला ठाऊक!

… हीच ती अमरावतीची दुधाऊ.. गुंजन ताई गोळे (८३ ७९ ८५ ८७ ६५).

 (गुंजन ताई गोळे यांच्या फेसबुक पोस्टवर आधारित मुक्तलेखन. आपल्यापैकी काही जणांना हे नाव आणि त्यांचे कार्य निश्चित माहित असेलच. ज्यांना नाही आणि जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी इंटरनेटवर गुंजन गोळे या नावाने जरूर शोध घ्यावा! यातून काही जाणीव जागृत व्हावी म्हणून मी वरील लेखन केले आहे. त्यांनी प्रकाशित केलेले छायाचित्र वापरलेलं आहे.. गैरसमज नसावा!!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सम्यक अष्टमार्ग ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

सम्यक अष्टमार्ग ☆  डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

आज बुद्ध जयंती निमित्त तथागत गौतम बुद्धांनी शिकवण दिलेली चार आर्यसत्ये आणि सम्यक अष्टांगिक मार्ग विशद करणारा अभंग सादर करीत आहे.

☆ सम्यक अष्टमार्ग ☆

तृष्णे पोटी दुःख | पदरी ना सुख ||

वासनेची राख | करा मनी ||१||

*

चार आर्यसत्य | जाणून घ्यावीत ||

दुःखांचा तो स्रोत | ज्ञात होई ||२||

*

आयुष्याची गोष्ट | क्लेश दुःख कष्ट ||

करावाया इष्ट | अष्टमार्ग ||३||

*

सम्यक ती दृष्टी | ज्ञानाची हो वृष्टी |

शांतिपूर्ण सृष्टी | जोपासावी ||४||

*

संकल्प करावे | सम्यक असावे ||

दुजा रिझवावे | स्वार्थ नको ||५||

*

नच दुखवावे | मधुर बोलावे ||

मित ते वदावे | सम्यक वाचा ||६||

*

सम्यक कर्मांत | ना गुंती मोहात||

परक्याचे त्यात | चित्त नको ||७||

*

नको कुविचार | लावा त्यांसी घोर ||

नवे दुर्विचार | जन्मो नये ||८||

*

सुविचारा जोम | द्यावा नव्या जन्म ||

सम्यक व्यायाम | मनासाठी ||९|| 

*

आजीव सम्यक | समाजाशी एक |

हिताची ही भाक | मोडो नये ||१०||

*

जाणावे देहासी | दुःखासी, सुखासी |

ओळखी चित्तासी | स्वच्छ दृष्टी ||११||

*

हाव इंद्रियांना | विषय बंधना ||

नाहीसे करण्या | स्मृती सम्यक ||१२||

*

सम्यक समाधी | करुणेची वृत्ती ||

पंचमहाभूती | चित्ती असो ||१३||

*

तथागत येती | अवतार घेती ||

भूतलावरती | देती ज्ञान ||१४||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “माध्यमांचे वर्तन योग्य आहे का?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “माध्यमांचे वर्तन योग्य आहे का?☆ श्री जगदीश काबरे ☆

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या निर्घृण हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले, आणि देशभरात संतापाची लाट उसळली. अशावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ करून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करून दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होतेच. पण या पार्श्वभूमीवर जनतेला सत्य माहिती, संयम आणि वस्तुनिष्ठतेची गरज असताना, अनेक इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी मात्र केवळ भावनांवर स्वार होऊन चुकीच्या, अतिरंजीत आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांचा मारा सुरू केला. ही केवळ पत्रकारितेची चूक नाही, तर सरळसरळ राष्ट्रीय सुरक्षेला सुरुंग लावणारी घोर बेजबाबदार कृती आहे.

हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच अनेक वाहिन्यांनी भारतीय ‘नौदलाकडून कराची उध्वस्त. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीर मुनीर तुर्कीला पळून गेले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी राजीनामा दिला. इस्लामाबाद, लाहोर, कराची, रावळपिंडी, सियालकोट ही शहरे बघताबघता भारताच्या हाती पडली. लष्कर, हवाई दल, नौदल अशा तिन्ही दलांनी पाकिस्तानला नेस्तनाभूत केले’, अशा प्रकारच्या उत्तेजक मथळ्यांनी प्रेक्षकांना तापवायला सुरुवात केली. प्रत्यक्षात सरकारकडून, संरक्षण मंत्रालयाकडून किंवा लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसताना अशा अफवांना खतपाणी घालण्यात काही वाहिन्या आघाडीवर होत्या. शेवटी संरक्षण मंत्रालयाला एक निवेदन प्रसिद्ध करावे लागले की, अशा अफवा पसरवणाऱ्या वावदूक बातम्या देऊ नयेत. कारण युद्धासारख्या गंभीर विषयावर चुकीची माहिती देणे हे केवळ असंवेदनशीलच नव्हे तर अतिशय धोकादायक आहे. कोणत्याही देशाच्या लष्करी कारवाईच्या गुप्त माहितीचा बिनबुडाच्या चर्चांनी उघडपणे उल्लेख करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या यंत्रणांना अडचणीत आणणे होय. यातून जनतेत अनाठायी उत्साह, द्वेष आणि परस्परद्वेष्ट्या भावनांना खतपाणी घातले जाते. म्हणून युद्धसदृश वातावरणात वाहिन्यांनी संयमित, तथ्याधारित आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे अपेक्षित असते. पण येथे टीआरपीच्या हव्यासापोटी माध्यमांनी संयम न राखता पत्रकारितेच्या नीतीला बगल दिली. स्टुडिओंमध्ये तथाकथित ‘सुरक्षा तज्ज्ञ’ बोलावून अर्धवट माहितीच्या आधारे ‘थरारक’ चर्चा रंगवण्यात आल्या. या चर्चांचा उद्देश लोकांच्या भावना भडकवणे आणि व्यूहात्मक माहितीचा बाजार मांडणे इतकाच होता. अशा चर्चांमध्ये शिस्तबद्ध लष्करी कारवाईचे खरे स्वरूप व गुप्तता यांचा पुरता विसर पडला.

सामान्य नागरिक हा अशा घटनांमध्ये भावनिकदृष्ट्या कमकुवत असतो. देशभक्तीच्या उर्मीत तो माध्यमांवर विश्वास ठेवतो. त्याचाच गैरफायदा घेऊन युद्धखोर वृत्तवाहिन्या जनतेची दिशाभूल करतात. यामुळे सीमा भागातील जनतेमध्ये घबराट, तर शहरी भागात असंतोष आणि उथळ राष्ट्रवादाचा प्रक्षोभ वाढतो. चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांमुळे केवळ देशांतर्गत गोंधळच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या नीतीला हानी पोहोचते. लष्करी कारवाईचे अनुमान, युद्धाच्या तयारीचे सूतोवाच किंवा पाकिस्तानवर तात्काळ कारवाईचे खोटे दावे हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही भारताला अडचणीत आणू शकतात. या वाहिन्यांनी हे जाणूनबुजून केले की अज्ञानातून हा प्रश्न न पडताही, परिणाम मात्र गंभीरच असतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना केवळ माईक, कॅमेरा आणि स्टुडिओपुरता नव्हे तर राष्ट्रहिताचा व्यापक विचार करणे भाग आहे. अन्यथा माध्यमे ही जनतेचे मार्गदर्शक न राहता अफवांचे आगार बनण्याचा धोका वाढेल.

युद्धाचा निर्णय सरकार व लष्कर घेते, वाहिन्या नाहीत. युद्ध हे राजकारण, भावनांचे किंवा टीआरपीचे साधन नसून राष्ट्राच्या सुरक्षेचा गंभीर विषय आहे. त्यामुळे अशा काळात माध्यमांनी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी. भडक मथळे टाळावेत. अफवा आणि गुप्त माहितीचा बेजबाबदार उल्लेख टाळावा. लष्करी गुप्ततेचा आदर करावा. संयमित भाषा आणि राष्ट्रहिताचा विचार करावा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहिन्यांनी दाखवलेल्या बेजबाबदार वर्तनाने हे स्पष्ट झाले आहे की, आज पत्रकारितेत नीतीमत्ता आणि जबाबदारी यांचा गंभीर अभाव आहे. युद्धाच्या नावाखाली भावनांचे राजकारण करणे आणि टीआरपीचा हव्यास हा लोकशाही व राष्ट्रीय सुरक्षा या दोन्ही पातळ्यांवर घातक आहे. यामुळे यावर कठोर कायदेशीर निर्बंध आणि प्रसारमाध्यमांची जबाबदारी ठरवणे आता अत्यावश्यक झाले आहे. सरकारला स्पष्टपणे प्रश्न विचारणारे यूट्यूब चैनल तात्काळ बंद करणारे केंद्रशासन आता अशा खोट्या बातम्या देणाऱ्या न्यूज चैनलवर तेवढ्यात तात्परतेने बंदी आणेल काय?

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हे योगेंद्र पुराणिक…”  – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “हे योगेंद्र पुराणिक…”  – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

काल मी आणि माझी फॅमिली जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एका मराठी अवलियाला भेटायला गेलो. पुण्यात शनिवार पेठेत जुनी पोलीस चौकी येथे त्यांचा वाडा होता. तो माणूस आता १९९५ ला जपान ची स्कॉलरशिप घेऊन जपान ला येतो काय आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो. आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी पर्यंत व सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंट चालवते. हा माणूस स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो व सम्पूर्ण घर मराठी पुस्तकं व तसेच मराठी भाषा शिकवण्याचे कलासेस व सर्व जपानी शाळांना आग्रह धरणारा व जपान मध्ये भारतीय माणूस नंतर तिथं आमदार होतो. अजून बरंच काही आहे. सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन आणला व ८ मार्च २५ ला उभारला सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे ३०० महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे. त्यांनी आम्हाला सर्व घर दाखवून सुमारे २ तास आमच्याशी गप्पा मारल्या आणि एक अंकल्पित दिवस साजरा झाला.

… त्या माणसाचं नाव आहे योगेंद्र पुराणिक.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी ऐकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली.

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती.

पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता.

मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या “त्र्यंबक बापूजी ठोंबरे” यांची ही गोष्ट आहे.

जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस ५ मे रोजी संपन्न झाला.

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहिली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही.

आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला

मत्सर गेला

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, वा. रा. कांत, ग. ल. ठोकळ, ग. ह. पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा. भ. बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे.

त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते.

त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०४ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.. !!.. 🙏

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री श्रीकांत उमरीकर

 जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर,

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री लक्ष्मी नृसिंह सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र॥ – रचना : श्री शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

 

☆ ॥ श्री लक्ष्मी नृसिंह सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र॥ – रचना : श्री शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज श्री नृसिंह जयंती आहे . — त्यानिमित्ताने सादर.) 

देवकार्य सिध्यर्थं सभस्तंभं समुद् भवम ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*

लक्ष्म्यालिन्गितं वामांगं, भक्ताम्ना वरदायकं ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
अन्त्रांलादरं शंखं, गदाचक्रयुध धरम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
स्मरणात् सर्व पापघ्नं वरदं मनोवाञ्छितं ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
सिहंनादेनाहतं, दारिद्र्यं बंद मोचनं ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
प्रल्हाद वरदं श्रीशं, धनः कोषः परिपुर्तये ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
क्रूरग्रह पीडा नाशं, कुरुते मंगलं शुभम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
वेदवेदांगं यद्न्येशं, रुद्र ब्रम्हादि वंदितम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
व्याधी दुखं परिहारं, समूल शत्रु निखंदनम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
विद्या विजय दायकं, पुत्र पोत्रादि वर्धनम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
भुक्ति मुक्ति प्रदायकं, सर्व सिद्धिकर नृणां ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तम् सर्वतोमुखं ।

नृसिंह भीषणं भद्रं मृत्य मृत्युं नमाम्यहम॥

*
य: पठेत् इंदं नित्यं संकट मुक्तये ।

अरुणि विजयी नित्यं, धनं शीघ्रं माप्नुयात् ॥

*

॥ श्री शंकराचार्य विरचित सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र संपूर्णम्॥

*

— मराठी भावानुवाद  —

*

देवकार्यास्तव अर्णवोद्भव सर्व जीवसृष्टी 

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥१॥

*
लक्ष्मी अलिंगन वामबाजू भक्ता वरदायी

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥२॥

*
उदरी शंख गदा चक्र आयुधे धारी हस्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥३॥

*

स्मरणाने पापहारी वरदायी मनोवांच्छिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥४॥

*
करुनीया शार्दूलगर्जना दारिद्र्यातुन मुक्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥५॥

*

प्रल्हाद वरदा विष्णो करी धन कोष भुक्ती 

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥६॥

*

सदैव शुभ मंगलकारी क्रूरग्रहपीडामुक्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥७॥

*

यज्ञेश वेद वेदांगांचा रुद्र ब्रह्मादि पूजिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥८॥

*
व्याधीदुःखहारक समूळ शत्रू निर्दाळिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥९॥

*

विद्या-विजयदायी पुत्रपौत्र वर्धन करिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥१०॥

*
मानवा सर्वसिद्धी देई प्रदान भुक्ती मुक्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥११॥

*

उग्र वीर महाविष्णु तेजोमय व्याप्ती सर्वत्र 

नमन नृसिंहा मंगल भयाण मृत्यूसी मारत ॥१२॥

*

करिता नित्य पठण स्तोत्राचे होई आपदामुक्ती

पूजन विष्णूचे प्रभाते नित्य शीघ्र होई धनप्राप्ती ॥१३॥

*
॥ श्री शंकराचार्य विरचित निशिकान्त भावानुवादित सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र संपूर्णं ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

मध्यंतरी माझा एका पालकांशी वाद झाला. त्यांची अशी फार प्रबळ इच्छा होती की, त्यांच्या मुलानं सीए व्हावं. पण त्या मुलाच्या एकूण बुद्धिमत्ता आणि क्षमतांचा अंदाज घेता ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. मी त्यांना माझं मत सांगितलं. त्यावर ते उसळून म्हणाले, “रिक्षावाल्याची मुलगी सीए होऊ शकते तर हा का होऊ शकत नाही?” एका उच्चशिक्षित पालकांचा दृष्टीकोन असा असू शकतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं.

सीए हे केवळ एक उदाहरण आहे. पण अनेक क्षेत्रांच्या बाबतीतही पालकांचे हेच दृष्टीकोन पहायला मिळतात. पुण्यात शिकायला ठेवलं, मोठमोठे महागडे क्लासेस लावले, ट्यूशन्स लावल्या म्हणजे हवं ते यश मिळतंच, अशा गोड भ्रमात पालक आणि मुलं मस्त डुंबत असतात.

मी त्यांना विचारलं, “मग ह्याच न्यायानं एका गरीब सामान्य नावाड्याचा मुलगा जर जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ बनू शकतो तर अन्य मुलं का बनू शकत नाहीत?” माझ्या प्रश्नाचा त्यांना राग आला. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतच होतं.

“तुम्ही ‘स्लमडाॅग मिलेनिअर’ हा सिनेमा पाहिलाय का?” मी विचारलं.

“हो. मी पाहिलाय. ” ते म्हणाले.

“झोपडपट्टीत राहणारा, कधीही शाळेत न गेलेला, आणि कंपनीत ऑफिसबाॅयचं काम करणारा मुलगा करोडपती कसा काय बनला?” मी विचारलं.

“कसा काय म्हणजे? समोरच्या व्यक्तीनं त्याला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं त्यानं अगदी अचूक दिली. म्हणूनच तो करोडपती झाला. यात न समजण्यासारखं काय आहे?” ते विजयाच्या सुरात म्हणाले.

“बरोब्बर. आता माझा एक साधा प्रश्न आहे. जर तो अडाणी, गरीब मुलगा १५-२० प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी रूपये मिळवू शकतो, मग तुम्ही तर उच्चशिक्षित आहात. त्याच कार्यक्रमामधून एक कोटी रूपये मिळवणं तुम्हाला अजिबातच अवघड नाहीय. ” मी असं म्हटल्यावर त्यांचा नूरच पालटला. ते खूप अस्वस्थ झाले.

“ह्याच न्यायानं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलानं त्यात भाग घेऊन दणादण एकेक कोटी रूपये कमवायला हवे होते ना? दहावी किंवा बारावी पर्यंत शिकलेल्या कुणालाही यात भाग घेऊन ही रक्कम जिंकता आली असती. पण तसं घडलं का?” मी आणखी एक पिल्लू सोडलं. ते गप्प झाले.

स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करणारी मुलं तर दिवसरात्र अभ्यास करत असतात. मग त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या शोज् मध्ये भाग घेणं आणि भरपूर पैसे कमावणं मुळीच अशक्य नाही. एक मिनिटही अभ्यास न केलेला एक मुलगा एक कोटी रूपये जिंकतो आणि वर्षानुवर्षं दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षा पास होता येत नाहीत, ही काय भानगड आहे? 

“तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा. त्या मुलानं कार्यक्रमासाठी कसलाही विशेष अभ्यास केला नव्हता. तयारी केली नव्हती. साधं चहावालं पोरगं होतं ते. रोजचा पेपरसुद्धा वाचत नसेल. तर मग जनरल नाॅलेज च्या पुस्तकांचा तर संबंधच येत नाही. ” मी म्हटलं.

“हो ना. पण अशा परिस्थितीतही तो करोडपती झालाच ना?” ते.

“इथंच तर तुम्ही चुकताय. त्याला जे जे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न सुशिक्षितांच्या दृष्टीने कठीण होते. पण, तो अशिक्षित मुलगा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कारण, त्यातले प्रश्न त्याच्या रोजच्या जगण्यावागण्याशी निगडीतच होते. त्या प्रत्येक प्रश्नाशी त्याची एकेक आठवण जोडली गेली होती. केवळ तेवढ्याच बळावर तो प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कोणताही विशेष अभ्यास न करता! ” मी म्हटलं.

“मी हा विचारच केला नव्हता! ” ते आश्चर्यानं म्हणाले.

“तेच मी म्हणतोय. गरीब अडाणी माणूस केवळ अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं काय देतो आणि चक्क करोडपती काय होतो! यात कष्टांचा किंवा अभ्यासाचा संबंधच कुठं आला? म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच होता ना?” मी विचारलं.

“हा जुगारच म्हटला पाहिजे. ” त्यांचं उत्तर.

“बिनअभ्यासाचे कुणी एक कोटी रूपये का देईल का?” माझा सरळ प्रश्न.

“खरं आहे. ” ते.

“हेच माझं म्हणणं आहे. आपण नुसत्या दिसण्यावर जाऊ नये. खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. खातरजमा केली पाहिजे. आपण यातलं काहीच न करता मोठी जोखीम पत्करतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. ” 

“मग आता काय करावं?” ते.

“माश्यानं पाण्याबाहेर सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्याला लोक मूर्ख म्हणतात. कारण, काल्पनिक भराऱ्या मारून करिअर होत नाही. त्याला वास्तविकतेचा आधार असलाच पाहिजे. तुम्ही मुलांच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करणार आणि नको त्या रेसमध्ये त्यांना पळवणार, हे खरोखरच आवश्यक आहे का? प्रत्येक स्लमडाॅग हा मिलेनिअर होऊ शकत नाही आणि प्रत्येक मिलेनिअर हा स्लमडाॅगच असतो असाही नियम नाही. अपवादांनाच सिद्धांत समजण्याची चूक आपण कधीही करू नये. ” मी.

पालक आणि मुलं ‘मला नेमकं काय जमेल?’ याहीपेक्षा ‘मला काय जमू शकेल?’ याचाच विचार अधिक करतात. म्हणूनच, ज्या गोष्टींचा भरवसा नाही आणि ज्यांच्याविषयी धड माहितीही नाही, असेच निर्णय मोठ्या आशेने आणि धाडसाने घेतले जातात. खरं तर अशी विचित्र रिस्क आपण कधीच घेत नाही. पण शिक्षण आणि करिअर निवडीमध्ये मात्र ती घेतली जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आपण आपल्या सोयीनं नेमके अपवादच शोधतो आणि त्यांनाच सिद्धांत समजण्याची चूक करतो. ही फार मोठी चूक आहे.

आपण आणि आपल्या मुलांनी फॅन्टसीमध्ये जगणं सोडायला हवं. निदान करिअरच्या बाबतीत तरी..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ W F H…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ W F H… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

एक विनोदी पण कटू सत्य 

कोरोना जाता जाता आपल्याला Work from home हा एक नवीनच रोग देऊन गेला

…. फार पूर्वी प्रत्येक घरात एक बाळंतीण रूम असायची, just like that आताही बऱ्याच घरी ती रूम असते, तेथे एक आय टी इंजिनिअर दिवाणावर वाकडा तिकडा पडलेला असतो, फक्त बाळाऐवजी लॅपटॉप असतो.

 

कहर म्हणजे बरेचसे जस्ट मॅरीड पोट्टे रात्री दोन पर्यंत लॅपटॉपशी झुंजत असतात, आता त्या घरातील आजीच्या मांडीवर नातू कसा आणि कधी खेळेल?

रिटायर्ड माणूस घरात जड होतो, पण ही बाळंतीण आय टी वाली जड नाही कारण मोठे पॅकेज असते ना आणि घरातील म्हाताऱ्या लोकांना कधीतरी कार मध्ये फिरवतो.

घरात चहा, नाश्ता तयार झाला की अगोदर ह्या आय टी बाळंतिणीला मिळाला पाहिजे, फक्त शेक, शेगडी आणि अळीवाची खीर तेवढी बाकी राहते, डिंक लाडू सुद्धा माऊली तयार ठेवते कारण तिच्या नवऱ्याने एवढे मोठे पॅकेज कधी तिला दिलेले नसते ना

काही असे आय टी वाले तर दिवाळीत नवे कपडे म्हणून ओन्ली बनियन आणि बर्मुडा घेतात म्हणे.

Work from home ही कॉन्सेप्ट आमच्या पुण्यात नवीन न्हाय, लै वर्षापूर्वी विडी कामगारांना विडीची पाने आणि तंबाखू मोजून दिली जायची आणि ते घरून विड्या करून आणायचे.

बऱ्याच ठिकाणी नवरा घरून काम करतो आणि बायको ऑफिसला जाते कार घेऊन, आणि येताना कोथींबिर घेऊन येते.

ही अशी दिवाणवरची दिवाणी मंडळी मग वीकेंड ला जवळच्या एखाद्या वागळीवर जाऊन, वडा पाव खाऊन येतात आणि नायगारा फॉल्स ला गेल्यासारखे बडेजाव करतात

ही आय टी वाली मंडळी लाँग टूर म्हणून कधी कधी सासुरवाडीला निघतात, U S वरून इंडिया ला निघाल्यासारखे आणि मग धुतलेले, इस्त्री केलेले कपडे शोधत बसतात.

कायम स्वरुपी ह्यांना W F H दिले तर पुण्याचे फ्लॅट रेट तरी कमी होतील, एवढेसे खुराडे एक कोटीला म्हणे पुण्यात, कशाला रहायचंय पुण्यात? चितळ्यांची बाकरवडी आणि जोशीचा वडा पाव खायला?

ह्या आय टी वाल्यांना आत्ताच बॅक पेन, मणके, कंबरदुखी, eyesight weak होणे असे प्रॉब्लेम सुरू झालेत, मोठे पॅकेज आणखी पाच दहा वर्षांनी ट्रीटमेंला लागणारच आहे म्हणा

आय टी वाल्याला महिना दोन लाख पगार असतो, पण सोसायटी मध्ये पण कोणी ओळखत नाही आणि सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्याला पन्नास हजार पगार पण अर्धी सिटी त्याला ओळखते आणि त्याचे कुठले काम अडत नाही, हा फरक आहे.

पूर्वी इंग्रजांची वेठबिगारी केली आणि आता अमेरिकेची वेठबिगारी,

काय होणार आहे पुढच्या पिढ्यांचे देव जाणे……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares