(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता ‘माँ…’।)
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# कलम#”)
विश्व योग दर्शन केंद्र, मिरज या संस्थेतर्फे आयोजित योग निबंध स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सौ.पुष्पा प्रभुदेसाई यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
💐 ई-अभिव्यक्ती समुहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आजी होणे किंवा आजोबा होणे या इतके परम सुखाचे क्षण मनुष्य जीवनात कोणते असू शकतील?
नातवंडे म्हणजे आजी आजोबांच्या डोळ्यात चमकणाऱ्या दागिन्यांसारखी असतात.
नातवंडं असणे म्हणजे जणू काही जगाचे मालक होणे.
तो असा एक खजिना आहे की त्याचे मूल्य म्हणजे फक्त हृदयातील प्रेम.
नातवंड म्हणजे मुखवटा घालून आलेला देवदूतच.
तुमच्या हृदयापर्यंत, हसण्याचा, तुमचे जीवन आनंदाने भरण्याचा आणि तुमचे जग प्रेमाने भरुन टाकण्याचा देवाचाच मार्ग.
घरात नातीचा जन्म झाला आहे आणि आजोबांचं मन आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. या आनंद भावनांचं हे आनंद गीत आगमन कवी आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध काव्यसंग्रहातून)
☆ – आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆☆☆☆☆
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली
आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली ।ध्रु।।
*
नाजूक जिवणी हळूच हंसली मुग्ध कलीका दरवळली
इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली
आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगागातुन मोहरली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १
*
प्रतिक्षेमध्ये तुझाच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली
तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली
ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २
*
खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली
स्त्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविले
संपुनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३
– डॉ. निशिकांत श्रोत्री
अतिशय हळुवार मनातलं, वात्सल्य जागं करणारं हे भावुक गीत. “आजोबा’ या नव्या पदवीने बहरून गेलेलं कवीचं मन गातंय.
मावळतीच्या क्षितिजावरती उदयाची जाणीव झाली
आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली।ध्रु।
खरं म्हणजे जीवनातलं हे संध्यापर्व. मावळतीच्या रंगानं रंगत असणारं. पण जीवनाच्या या टप्प्यावर नव्या आशा पल्लवित करुन स्नेहा तुझे आगमन झाले आणि या संध्येच्या क्षितिजावर नव्या उदयाचीच जाणीव झाली. जणू काही मागे गेलेली अनेक वर्षे पुन्हा एकदा तुझ्या जन्माने नव्याने बहरली.
नाजूक जिवणी हळूच हसली मुग्ध कलीका दरवळली
इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली
आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगांगातून मोहरली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १
गोड गुलाबी कोवळ्या ओठातलं तुझं हास्य जणू काही मूक कळीतून दरवळणाऱ्या सुगंधासारखंच. तुझ्या इवल्याशा चिमुकल्या हाताने माझ्यात कशी नवस्फूर्ती,नवचैतन्य उसळवलं. तुझी ती इवल्याशा डोळ्यातली निष्पाप नजर प्रेमाचा एक वेगळाच रंग घेऊन माझ्या अंगा अंगातून मोहरली. खरोखरच या उतार वयात माझ्या जीवनात पडलेल्या तुझ्या पावलाने माझाही जणू नवजन्मच झाला.
प्रतिक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली
तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली
ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २
किती वाट पाह्यला लावलीस ग बाळे? तुझ्या प्रतीक्षेत घालवलेली ती वर्षे किती कठीण गेली आणि कशी सहन केली ते तुला कसं कळेल! मुलांची लग्न झाली की आता नातवंड कधी मांडीवर खेळेल याची स्वाभाविक उत्सुकता आईवडीलांना असते.पण बर्याच वेळा आपली विवाहित मुले मुल होऊ देण्याचा विचार पुढे ढकलत असतात. त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी ते बालरुप दिसावे याची आर्तता उत्कट होत असते.
पण आज मात्र तुझी पावलं जीवनांगणी उमटली आणि स्वप्न पूर्ण झालं. जणू सारं काही भरून पावलं. आयुष्याचे सार्थक झाले. आता या क्षणी माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की’” त्या भास्कराचं तेज तुला मिळो! आणि सर्वांच्या वाटा तू या दिव्य प्रकाशाने उजळवून टाकाव्यात.
खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली
स्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविली
संपूनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३
वाटलं होतं आयुष्य आता सरत आलं. पण तुझ्या जन्मानं या देहातली विझत चाललेली प्राण्याजोत जणूं काही पुन्हा नव्याने चेतवली गेली. पुन्हा नव्याने जगण्याची आशा पालवली. पुन्हा जगण्यात रंग भरले गेले. तुझ्या जन्माच्या रूपाने जणू काही अमरत्वाचा स्त्रोत वाहतो आहे असं वाटू लागलं. अंतर्यामी सुकलेले झरे पुन:श्च आनंदाने बरसू लागले आहेत. मी आता निवृत्तीच्या वाटेवर असताना माझी कर्मवारसारूपी वीणा तुझ्याच हाती सोपवत आहे. म्हणजे पुन्हा सूर सजतील. संपत आलेली मैफल पुन्हा एकदा नादमय होईल. नवे रस, नवे गंध, नवे रंग या माझ्या मावळतीच्या क्षितिजावर पुन्हा एकदा आनंदाने फेर धरतील.
खरोखरच डॉक्टर श्रोत्री यांचं हे गीत म्हणजे वात्सल्य रसाचा अमृतमय झराच. वाचक हो! श्रोतेहो! प्रत्येकाच्या आनंद अनुभवाला जोड देणारं हे ममत्त्व गीत. भावभावनांचा, प्रेमाचा अमृत स्पर्श देणारा, अंतरंगातून सहजपणे वाहणाऱ्या ममतेच्या स्त्रोताची जाणीव करून देणारा अत्यंत कोमल, हळुवार आणि सहज शब्दांचा या गीतातला साज केवळ आनंददायी आहे आणि त्यासाठी कवीला माझा त्रिवार सलाम!
तसं पाहिलं तर साधी सरळ भाषा. अलंकारांचा डोईजडपणा नाही. काव्यपंक्तींमध्ये कुठलेही अवघड वळण नाही.भावनांचा प्रवाह वाचकांच्या मनाशी थेट मिळणारा असा शब्दवेध. सहज जुळलेली यमके, गीत वाचताना मनात एक माधुर्याचा ठेका धरतात.
या गीतामध्ये एक वत्सल दृश्य आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ,कापसासारखी मुलायम तनु. नाजूक जिवणी, चिमुकले हात पाय, निर्मळ, निष्पाप नजर आणि या साऱ्या विशेषणांतून जाणवणारं एक दैवी, स्वर्गीय निरागसत्व अंतःकरणात मायेचे तरंग उमटवतं.
प्रतीक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली या ओळीतला पिल्ला हा शब्द तर मनाला इतका बिलगतो. खरंच बाळा, लेकरा, चिमण्या या शब्दांमध्ये पाझरतं ते फक्त आणि फक्त अंतरातलं वात्सल्य, दाट प्रेम!
पीजे हार्वे यांनी म्हटलं आहे कोणते गाणे प्रेमाबद्दल नाही? मग ते प्रेम पुरुषाकडून स्त्रीवर असो, आई वडिलांकडून मुलांपर्यंत असो किंवा पुढे नातवंडांपर्यंत असो.. ते पुढे जातच असते.
या भाष्याचा अर्थ डॉक्टर श्रोत्रींच्या या गीतात जाणवतो.
आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालवली ही ध्रुवपदातील ओळ खूपच बोलकी आहे. स्नेहा हे विशेष नाम असू शकते अथवा स्नेहरुपा या अर्थानेही असू शकते. पण यातून जाणवतो तो नातीच्या जन्माचा कवीला झालेला आनंद. नातीचं बाळरूप पाहता क्षणीच त्यांच्या अंतरात सुखाचा फुलोरा फुलतो. आणि सहजपणे ते उद्गारतात ज्योतिर्मयी हो कवीच्या मनातली ही उत्स्फूर्त संवेदना जाणून माझ्या मनात खरोखरच असंख्य मुग्ध कळ्या सुगंध घेऊन दरवळल्या.
या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते.
संपुनी जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली या ओळीतल्या वीणा हाती सोपवणे या वाक्प्रचाराला एक संदर्भ आहे. प्रवचनकार निवृत्त होताना आपल्या वारसाला वीणेच्या रुपात प्रवचनाचा वारसा देतात. या इथे कवीने आपल्या नातीला आपला वारसा मानून जे काही त्यांचं आहे ते तिला देऊन टाकले आहे.
एकंदरच कवीच्या मनातली स्पंदनं या गीतात इतकी सजीवपणे जाणवतात की त्यासाठी डॉक्टर श्रोत्रींना पुन्हा एकदा सलाम.
विषयांतर असूच शकतं पण जाता जाता सहज सुचलं म्हणून लिहिते, डॉ. श्रोत्री हे स्त्रीरोगतज्ञ. व्यवसायाच्या निमीत्ताने त्यांनी अनेक जन्मलेली मुले हाती घेतली असतीलच. तोही अर्थातच व्यावसायिक असला तरी भावनिक सोहळाच. पण जेव्हा स्वत:ची नात जन्माला येते तेव्हां फक्त आणि फक्त “आज मी आजोबा झालो!”
हेच सुख. तेव्हा त्यांच्यातल्या वैद्याचा कवी कसा होतो याचा अनुभव आगमन या गीतात होतो. आणि त्याचीही गंमत वाटते.
☆ ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(प्रथम पुरस्कार प्राप्त लेख)
योग शिबिर चालू होते. गुरुजींनी पहिलाच प्रश्न विचारला. आपण आनंदी समाधानी आहात का? दुसरा प्रश्न– पूर्वीचे लोक जास्त सुखी होते की, आताचे जास्त सुखी आहेत? विचार सुरू झाले. खरंच भौतिक प्रगती इतकी झाली. कष्ट कमी झाले. तरीही पूर्वीचा माणूस जास्त सुखी होता. अशी उत्तरे आली .का बरं असं असेल?
आज समाजाचं चित्र पाहिलं तर, अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येक जण ताण-तणावात जगतोय असं दिसतं. नुसत्याच बाह्य उपचारांनी आणि पाश्चात्य वैद्यक शास्त्राच्या उपायांनी सुद्धा खरं आरोग्य राखता येत नाही. त्यासाठी आपली जीवनदृष्टी आणि जीवनशैली बदलायला हवी. ही गोष्ट आता पाश्चात्यांनाही कळून चुकली आहे. त्यामुळे ते लोक आता भारतीय अध्यात्म योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत . मग ही योग साधना काय आहे बरं? उपनिषदांमध्ये तसेच भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात तर भगवंतांनी अर्जुनाला ‘ध्यान योग’ सांगितला आहे .पतंजलीनी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल शास्त्रीय दृष्ट्या योगदर्शन लिहिले आहे. मानवी मन आणि सत्याची त्यांना पुरेपूर माहिती होती त्यामुळेच त्यांनी योगशास्त्र लिहिले.
‘ योग ‘ म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध , अशी पतंजलीनी व्याख्या केली आहे. कसे जगावे? ती एक कला म्हणून कशी अंगी करावी? याबद्दल पतंजलीनी आपल्या ग्रंथात अत्यंत महत्त्वाचा असा अष्टांग योग सांगितला आहे . “ध्यान ” या अंगाचा विचार करत असताना, त्यापूर्वीची पाच अंगे, (बाह्यांगे )म्हणजे साधनपादाची थोडक्यात माहिती घ्यायला हवी. १) यम — (सत्य ,अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य ,अपरिग्रह ) २) नियम– ( शुद्धी , संतोष , तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणिधान ) ३) आसन– शरीर निश्चल राहून सुख वाटते ती स्थिती . ४) प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा प्राणाला दिशा देणे. मन एकाग्र होऊन शारीरिक शक्ती वाढते . ५) प्रत्याहार — इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच प्रत्याहार. त्यासाठी खूप निग्रह करावा लागतो. पुढील तीन महत्त्वाची आंतर अंगे म्हणजे विभूतीपाद. ६) धारणा — एखाद्या गोष्टीवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा. वरील सहा पायऱ्या चढून गेल्यानंतरची महत्त्वाची पायरी म्हणजे ” ध्यान”. ७) ध्यान — ध्यै — विचार करणे, हा धातू आहे .चिंतन किंवा विचार हे धारणे संबंधित असतील तरच त्याला ध्यान म्हणता येईल. नुसतेच अर्धा तास बसणे म्हणजे ध्यान नव्हे. चित्त धारणेच्या विषयावर स्थिरावल्यानंतर, त्यापासून जो प्रत्यय येत असतो, त्याच्याशी एकतानता साधणे या क्रियेलाच ध्यान म्हणतात. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळी नेत्र पटलावर प्रतिबिंब उमटते. त्या तेजाने नसा चेतविल्या जाऊन ,संवेदना मेंदूकडे जातात. मेंदू कडून त्याचा अर्थ लावला की त्याचे ज्ञान होते. म्हणजेच प्रत्यय आला, असे आपण म्हणतो. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की, निर्णय शक्ती चांगली प्राप्त होते. आणि एखादा प्रश्न चटकन सुटू शकतो. जप करणे हेही ध्यान होऊ शकते. कोणत्या ना कोणत्या मूर्त रूपाचा आधार घेऊन विचार करणे, हा आपला स्वभाव असतो. ईश्वराचे चिंतन करताना ,कोणते ना कोणते मूर्त रूप समोर येईल. कारण विचार आणि रूप अविच्छेद्य आहेत. पंचेंद्रिय आणि मन त्यावर गुंतून ठेवून ,स्थिर करून, ध्यानाच्या अभ्यासाने मनाची संपूर्ण एकाग्रता साध्य होते. जप नुसत्या जिभेवर न ठेवता मनातून केला पाहिजे . सुरुवातीला जप मोठ्याने करावा. म्हणजे तो ठसतो . जप करताना दुसरे विचार आले तरी ते विचार संपले की जप पुन्हा सुरू करावा. मन थकलेले असेल तर ध्यानामुळे बळकट होते .सोन्याची चीप असेल तर, ती धारणेचा विषय. आणि सोन्याची तार म्हणजे धारणा. ही तार कुठेही तुटता कामा नये, असे चिंतन म्हणजे ध्यान. झोपेत स्वतःचे अस्तित्व विसरतो .आवडी नावडी, गरीब श्रीमंती अशा भावनिक पातळ्या सोडल्या की शांत झोप लागते. ती निष्क्रियता हेच ध्यान. झोपेचे ज्ञान आपल्याला जागृती कडे किंवा सत्याकडे नेते.
ध्यान करताना काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. ध्यान करताना शांत जागा निवडावी. खूप भूक लागली असेल तर ध्यान लागणार नाही. तसेच पोट गच्च भरले असेल तर ध्यान न होता झोपच लागून जाईल. ध्यान करण्यापूर्वी घरातली कॉल बेल बंद करावी. तसेच घरातल्या प्राणिमात्रांना जवळ घेऊ नये. मनात सर्वात जास्त प्रलोभने डोळे निर्माण करतात, त्यामुळे ध्यान करताना डोळे बंद करून ,श्वासावर लक्ष केंद्रित करून ,नंतर दीर्घ श्वास घ्यावेत. त्यामुळे ताण कमी होतो. 90 दिवस सलग ध्यान केले तर, कुटुंबातील इतर व्यक्तींनाही सकारात्मक परिणाम दिसतो. अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर, योग साधनेसाठी सूर्योदयापूर्वीची सर्वोत्तम वेळ. त्याचप्रमाणे संध्यासमयी ४–३० ते पाच नंतर. कारण त्यावेळी आपली मर्यादा ओलांडण्याची क्षमता उत्तम असते. पृथ्वीच्या ऊर्जा संक्रमणातून जात असतात. आणि शरीर प्रणातील संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी झालेला असतो. शारीरिक प्रणाली पृथ्वीच्या जीवनप्रणालीशी संलग्न झाली की ,आपोआप जाग येते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणात योगाचा विकास झाल्याने सगळे योगाभ्यास सकाळी किंवा संध्याकाळी करावेत.
ध्यानाचे फायदे किती सांगावे तितके कमीच ! वीस मिनिटाच्या ध्यानाने चार ते पाच तासांच्या झोपे इतकी विश्रांती मिळते. ध्यान मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. विश्रांती, जागरूकता आणि एकाग्रता येते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ध्यानानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून येणारी ऊर्जा डोळ्याला स्पर्श करावी. व हळुवार डोळे उघडावे. जेव्हा शंभर लोक एकत्र ध्यान करतात, तेव्हा त्याच्या लहरी पाच कि.मी. पर्यंत पसरतात. आणि नकारात्मकता नष्ट करतात. हॉवर्ड येथील ‘ सारा लाझर ‘ हिच्या टीमला कळून आले की,, ” माईंड फुलनेस मेडिटेशन” खरोखरच मेंदूची रचना बदलू शकतो. आठ आठवडे माइंड फुलनेस आधारित “स्ट्रेस रिडक्शन हिप्पो कॅम्पस” मध्ये कॉर्टीकल जाडी वाढवते. जे शिकणे आणि स्मरणशक्ती नियंत्रित करते. .मेंदूच्या अभ्यासाने अहवाल दिला आहे की व्यक्तीनिष्ठ चिंता आणि नैराश्याच्या पातळीपासून मुक्त होण्यास एकूणच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. दर आठवड्यास नवीन अभ्यास समोर येत आहेत. काही प्राचीन फायदे जे आत्ताच एफ. एम .आर. आय .किंवा इ.ई.जी. सह पुष्टी होत आहे. खरोखरच ध्यान आपल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांमध्ये मोजता येण्याजोगे बदल घडवून आणते.ऐलिन लुडर्स यांनी आणखी एक संशोधन करून सांगितले की, ध्यानामुळे मेंदूतील करड्या द्रवामध्ये वाढ होते. जे विचारक्षमतेचे मुख्य स्रोत असते.एम्मा सेप्पाला या प्रसिद्ध वैज्ञानिक आणि कॅलिफोर्निया स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय येथील संशोधिका यांनी सांगितले की, ध्यानाने स्मरणशक्तीत वाढ होते व बौद्धिक पातळी उंचावते. सृजनशीलता वाढते. मनाची साफसफाई होते याची शक्ती आपल्या गुलामी आणि प्रकृती यांचा प्रतिकार करण्यास समर्थ होऊन आनंदात पोहोचवते. भावनिक स्थिरता वाढते तसेच वैचारिक आणि भावनिक केंद्रशांत राहतात ध्यानाने अमिग्डालाचा आकार कमी होतो जो ताणतणावाने वाढतो.
अंधशाळेतले मुलं स्वतःमध्ये स्थिर राहून भजन किंवा कविता म्हणतात .योग साधना कोण करू शकतो? तर युवा, वृद्धो वा अतिवृद्धो वा, व्याधीतो दुर्बलोपिवा / अभ्यासात सिद्धि- माप्नोती , सर्व योगेष्वतंद्रितः//
अष्टांग योगातील पाच बाह्यंगे आणि धारणा ,ध्यान ही अंतरंगे साध्य झाली की, शेवटची समाधी या पायरी पर्यंत जाता येते. समाधीत ज्ञानग्रहण होते. अनेकांना सिद्धीही प्राप्त होतात. समर्थ रामदास ,ज्ञानेश्वर माऊली, आणि अनेक संतांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर ,पुणे येथील डॉक्टर प. वि. वर्तकांनी समाधी स्थितीत ‘ मंगळ ‘ ग्रहावरील वर्णन पाहिले. आणि तेथे लाख वर्षांपूर्वी पाणी आणि शेवाळ होते असे 1975 साली सांगितले .त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे खरे असल्याच्या बातमी नुसार 1986 साली, त्यांचे विवेकज्ञान सत्य असल्याचे सायन्सच्या संशोधनानी सिद्ध झाले. नंतर त्यानी ‘ गुरु ‘ ग्रहाचेही वर्णन सांगितले. अमेरिकेतील डॉक्टर दीपक चोप्रा यांनी लिहिलेले “क्वांटम हीलिंग “
हे पुस्तक बेस्ट सेलर बुकच्या यादीत आलेले आहे. त्यात त्यांनी योगाचा अभ्यास वैद्यकीय उपचारांनाही कसा पूरक ठरतो,, तसेच ज्ञानाच्या माध्यमातून खोल मनापर्यंत पोचून, अडचणी समजून घेऊन ,मनातला गुंता सोडविता येतो . तसेच ध्यानाच्या माध्यमातून आजार बरे करण्यास कशी मदत होते, हे सविस्तर पुस्तकात सांगितले आहे.
श्री. श्री .रविशंकर यांच्या “आर्ट ऑफ लिविंग ” च्या ऍडव्हान्स मेडिटेशनच्या कोर्समध्ये आम्ही कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकलो. पंचकोष, ओरा, ओँकार, चंद्र, (पौर्णिमेचा), सूर्य ,शरीरातील षटचक्रांवरचे हरी ओम, असे कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकून खूप आनंद मिळवला. दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये लोक हे ज्ञान आत्मसात करत आहेत. रामदेव बाबांचीही शिबिरे चालू आहेत. योगाचे अनेक शिक्षकही तयार झाले आहेत. शालेय पातळीपासून अभ्यास व्हायला हवा. जागोजागी स्पर्धा, ताण-तणाव दिसत आहेत .अशा वेळी स्वच्छ , निर्मळ, आणि निरामय आरोग्यासाठी योग साधनेचीच गरज आहे .आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 21 जून हा ‘जागतिक योग दिवस,’ आणि 21 मे हा ‘जागतिक ध्यान दिवस ‘ असे म्हणून अधिष्ठान दिले आहे. त्याचा परिणाम ही जाणवू लागला आहे .सर्वजण मिळून सर्वांसाठी प्रार्थना करूया.
☆ “हे दान देऊ कसं ?” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
(पण भिकारी? नको रे देवा ! पण आयुष्य थांबलं नाही…वीस वर्षे निघून गेली.) इथून पुढे —
“आत ये!” तिने त्याला विनवलं. “नाही येता यायचं…घरात!” त्याने निर्धारानं सांगितलं. “तु फक्त भिक्षा दे झोळीत…निघायचं आहे पुढच्या गावाला.” त्याच्या आवाजात कोरडेपणा होता कमालीचा. संन्यस्त धर्म स्विकारल्यावर जन्माचं नाव आणि गाव,घर त्यागावं लागतं.
“मी नाही देणार तुला भिक्षा तु घरात आल्याशिवाय.!” ती म्हणत राहिली. त्याच्यामागे उभा असलेला म्हातारा संन्यासी पुढे झाला आणि म्हणाला,”माई,आईनं भिक्षा दिल्याशिवाय संन्यासदीक्षा पूर्ण होत नाही संन्याशाची! नको अडवू याची वाट!” “आमच्या मेळ्यात कसा पोहोचला माहित नाही हा पोरगा…पण म्हणाला बैरागी व्हायचंय तुमच्यासारखं!” “आम्ही म्हणालो, विचार कर. सोपा नाही हा मार्ग. सारंकाही सोडावं लागेल. तर म्हणाला, सोडण्यासारखं सोबत नाहीच आहे काही!” मग आमचाही नाईलाज झाला. आला तेंव्हा मिसरूडही फुटलं नव्हतं नीटसं. आमच्यासोबत राहिला,सेवा केली आमची. पण नाव,गाव सांगत नव्हता. आठवत नाही म्हणाला” म्हातारा बैरागी सांगत होता.
तो तरूण आणि तो म्हातारा मग घरासमोरच्या पारावर जाऊन बसले. शेजारच्या गावात खबर पोहोचली आणि त्याची मोठी बहिणही धावत आली…भावाला पाहायला. ती त्याच्या गळ्यात पडली तसं त्याने तिला दूर सारलं…”दूर रहा,माई!” तो म्हणाला! बघणा-या महिलांनी डोळ्यांना पदर लावले. पुरूषांनी सुस्कारे सोडले आणि ते स्तब्ध उभे राहून नुसते पहात राहिले. त्यांना माहित होते की आता उशीर झालाय…हा आता परत येणार नाही संसारात.
आई म्हणत राहिली…इथंच रहा…तुला हवं ते कर देवाचं. मी आडवी येणार नाही…फक्त माझ्या नजरेसमोर रहा….माझे डोळे मिटून जाईपर्यंत !
त्याने हातातलं सारंगी वाद्य पुढे घेतलं आणि तारा छेडल्या…एक दीर्घ आलाप घेतला. तिनेही हे गाणं शेकडोवेळा ऐकलं होतंच…पण आज त्यातला अर्थ तिला उमगता उमगता टोचणी लावून जात होता. राजा गोपीचंद…विशाल स्नानकक्षात प्रात:स्नानासाठी सोन्याच्या चौरंगावर बसलेला आहे. त्याच्या अनेक पत्नी,दासी मंगलस्नानाची तयारी करताहेत. तरूण,सुंदर,रूबाबदार गोपीचंद…त्याची आई मैनावती राजप्रासादाच्या एक मजल्यावरून खालचे हे दृश्य पहात उभी होती. तिचा पती अगदी असाच दिसायचा…पण अकाली मृत्यूने त्याला खाल्लं होतं. गोपीचंदही असाच संसारसुखात रममाण होत होत एकेदिवशी मरणाचा उंबरठा ओलांडून जाईल…काही अर्थ नाही या उपभोगांमध्ये! त्यापेक्षा यातून लवकरात लवकर विरक्त झालेलं बरं. मैनावती गुरू गोरखनाथांचा उपदेश आठवत आठवत गोपीचंदाकडे पहात होती. तिच्या डोळ्यांतून टपकलेले गरम अश्रू तिच्या गालांवरून ओघळून नेमके खाली पडले ते गोपीचंदाच्या अंगावर. तो चमकला. त्याने मैनावतीचे मनोगत जाणून घेतले. आणि संन्यासधर्म स्विकारण्याचा पक्का निर्धार केला. हे इतरांसाठी प्रचंड धक्कादायक असंच होतं. गुरू गोरक्षनाथांनी गोपीचंदला दीक्षा देताना अट घातली की स्वत:च्या घरून भिक्षा मागून आण तरच तु संन्यासी होऊ शकशील….त्याने ती अट पाळली आणि वैराग्याची वाट चालू लागला!
पण मी तर मैनावती नाहीये ना? मला माझा मुलगा हवाय…त्याचा संसार बघायचाय…नातवंडं मांडीवर खेळवायचीयेत…मी नाही ना याला भिक्षा देऊन संन्यासी होऊ देणार! गाण्यातल्या भर्तृहरी आणि गोपीचंदाच्या कथा ऐकता ऐकता ती मनाशी झुंजत होती….पण ती जिंकू शकली नाही!
“माई,तु नाही भिक्षा घातलीस तर माझं जीवन अपुरं राहील. मी आधी तुझ्या एकटीचाच मुलगा होता..आता हे सारं जगच माझं आई झालं आहे..नको अडवूस मला” तो म्हणत राहिला…गर्दी वाढत गेली..वेळ पुढे सरकत राहिली. “उशीर होईल पुढच्या मुक्कामाला पोहोचायला…आणि अजून झोळी रिकामीच आहे..माई!” त्याने निर्वाणीचं सांगितलं!
तिने थरथरत्या हातांनी त्याच्या झोळी दाणे घातले आणि त्याच्या पायांवर कोसळली…”पुन्हा या स्वामीजी…यापुढे भिक्षेला नाही म्हणणार नाही!” ती म्हणाली. त्याने उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला आणि तो पुढे निघाला….ती त्याच्या मागे चार पावलं चालून थबकली…आपण तर काही या मार्गावर जाऊ शकणार नाही!…तो वळणावर दृष्टीआड होईपर्यंत ती हात जोडून उभी होती…तिला तिच्या संसारात पुन्हा परतावंच लागणार होतं!
(ही नुकतीच घडलेली सत्यकथा. वीस वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असा अचानक आईसमोर संन्यासी बनून उभा राहिला तेंव्हा त्या आईच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल? पण असे झाले खरे. आणि असे अनेकवेळा घडलेलेही आहे. खाऊन, पिऊन घ्या, मजा करा कारण आपण उद्या मरणार आहोत! असा काहीसा पाश्चात्य विचार. तर हे खाणं, पिणं, मजा एक ना एक दिवस संपून जाणार आहे, यात गुंतून राहून कल्याणाचा मार्ग विसरून जाऊ नका…आपण कधीही मरून जाऊ शकतो.. त्याआधी अध्यात्माचा विचार करा,वैराग्याचा विचार करा असं काहीसं सांगू पाहणारी आपली संस्कृती. अर्थात हा ज्याचा त्याचा विचार. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असणारे जैन तरूण तरूणी का बरं सर्वसंगपरित्याग करून साधुत्वाचा मार्ग अनुसरत असतील? का बरं सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून काहीजण वैराग्याचा मार्ग जवळ करत असतील? जगाला मायाजाळ म्हणावे की मायाजळ? असो. जे भावलं ते मांडलं शब्दांत.
रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते.उगीचच उदास वाटतं.आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही.मोबईलचा कंटाळा आला.काय करावं सुचत नव्हतं.एकदम ब्लॅंक झालो.टेरेसवर जाण्याची लहर आली.सौंना आश्चर्य वाटलं.तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो.दोन मजले चढून टेरेसवर आलो.आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे,कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं.टेरेसवर शांतता होती.कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो.बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते.इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला…..
“ए,काल संध्याकाळी काय झालं.”
“काही नाही”
“बोल की,येस की नो”
“अजून मी फायनल सांगितलं नाही.”
“लवकर सांग.आधीच उशीर झालाय.”
“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.
“उगाच भाव खाऊ नकोस.मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”
“फुकट केलं नाहीस.दोघांकडून गिफ्ट घेतलय.तेव्हा जास्त उडू नकोस.”
“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”
“मार खाशील.गप बस.ममीचा मोबाईल आणलाय.तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”
“लवकर फोन लाव.स्पीकरवर टाक”
“गावजेवण नाहीये.कुणी ऐकलं तर..कान इकडं कर.दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता.फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं.
“आता पार्टी पाहिजे”
“कशाबद्दल”
“बॉयफ्रेंड मिळाला”
“तो तर मिळणारच होता.बघितलं ना कसला पागल झालाय.नुसता बघत रहायचा.”
“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”
“जळतेस का?”
“माझा ही आहेच की..”
“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच …”
“माझं मी बघेन.जास्त शायनिंग मारू नकोस.बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे.लक्षात ठेव.”
“ए गपयं.सेंटी मारू नको.”
“अजून काय म्हणाला सांग ना”
“तुला कशाला सांगू.आमचं सिक्रेट आहे”
“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही.आता सांगतेस की ………..”
“तो फार अडव्हान्स आहे”
“असं काय केलं”
“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”
“मग नुसती पोपटपंची”
“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”
“मामला अंगापर्यंत पोचला.लकी आहेस”
“सालं,माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो.आमचं नीट बोलणं होत नाही.”
“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”
“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे.मागितला तर आधी किस दे म्हणाला”
“अय्यो..”खी खी हसण्याचा आवाज आला.तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही.दोघी धावत खाली गेल्या.टेरेसवर मी एकटाच होतो.खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही.नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट असेल असं वाटलं नाही.जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत.
नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं.ते लहानपण म्हणजे मित्र,मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं.भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं.‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची.एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची.तिच्यावरून चिडवणं,त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा.कृती काही नाही.लपून छ्पून बघणं चालायचं.खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती.मुलींशी बोलताना भीती वाटायची.तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट.त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.वडीलधारे,शिक्षकांचा धाक,दरारा होता.मार पडेल याची भीती वाटायची.आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.
“काय झालं” तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.
“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय.घर घर की कहानी.थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”
“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.”
“कारट्यांना,अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.