मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष  शुभेच्छा… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

नववर्ष  शुभेच्छा… ☆ सौ. गौरी गाडेकर

गत वर्षाने दिधले, नेले,

तरीही उरले हाती

आयुष्याच्या माळेमध्ये

 अनुभवांचे मोती

क्षणामागुनी क्षण धावती

 दिवसही येती जाती

दान म्हणुनी देती ओंजळीत

सोनसळी ती नाती

2024 साठी शुभेच्छा!

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावित्रीबाई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ सावित्रीबाई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

ज्योती ‘बा’ समान झाले

माय ही सावित्रीबाई

ज्योती झाली शिक्षणाची

जगी मोठी क्रांती होई ||

पद शिक्षण पथीचे

सोपे नव्हते कदापि

पद क्रांतीचे गायिले

महिलांनी हो तथापि ||

पुसा प्रश्न कोणालाही

तिचा त्याग धैर्य कळे

पुसा अज्ञानाचा शाप

चाखा स्त्री कर्तृत्व फळे ||

ठेव वर्तन संयमी

होईल ईप्सीत साध्य

ठेव मनात सावित्री

साई समान आराध्य ||

सावित्री ही ज्ञानगंगा

सर्व जगात वहाते

सावित्री नाव हे सार्थ

कृतीतूनच बोलते ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींची घडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आठवणींची घडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

घडी शब्द किती छोटासा. पण त्याच्या हिंदी व मराठी भाषेतील अर्थाच्या छटा मात्र विविध आहेत. या घडी शब्दाने माझ्या तर बऱ्याच आठवणी उलगडल्या. विशेषत: लहान पणीच्या घड्या जरा जास्तच मनात बसतात.

लहानपणी वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाऊन खूप आठवणी मनाच्या कप्प्यात जमा झाल्या आहेत. एक काका होते त्यांच्याकडे गेल्यावर भीतीच वाटायची.ते होते फार कडक शिस्तीचे. त्यांच्या घरात गेल्यावर चप्पल कुठे काढायची इथ पासून प्रश्न पडायचे. आपण चप्पल दारा बाहेर काढली तर ते म्हणणार हरवायची आहे का? घरात काढली की म्हणणार इथे काढतात का? काढून चप्पल स्टँड वर ठेवायची. स्टँड वर ठेवली की म्हणणार अशी ठेवतात का? मग ते स्वतःच्या हाताने नीट ठेवायचे. आणि माझ्या व त्यांच्या ठेवण्यात काय फरक आहे हेच मी शोधत  रहायची. घरात गेले की कुठे बसावे हा प्रश्न! पूर्वी सोफे वगैरे नसायचे. लोखंडी कॉट किंवा लाकडी पलंग असायचा. त्यावर बसावे तर त्यांच्या बेडशीटची घडी विस्कटेल याची भीती. आपण बसल्यावर ते आपल्या शेजारचे बेडशीट नीट करायचे. वस्तू तर अगदी जागेवरच असाव्यात असे त्यांचे म्हणणे असायचे. आणि माझ्या डोक्यात खूप गोंधळ व्हायचा. वस्तूंनी आपली जागाच सोडली नाही तर आपण जेवणार कसे? स्वयंपाक कसा करणार? आमच्या कडे पण शिस्त असायची पण वेळ प्रसंगी वस्तू जागा पण सोडायच्या आणि हिंडून फिरून शेजारच्याही घरात जाऊन परत यायच्या. रात्री मात्र सगळ्या वस्तू,माणसे आपल्या जागी येऊन स्थानापन्न व्हायची.

असेच अजून एक घर की तिथे शिस्तीला पर्यायी शब्द बावळट असतो असा माझ्या बाल मनाचा समज झाला होता. अंथरुण काढणे, अंथरुण पांघरुण यांच्या विशिष्ट पद्धतीने घड्या घालणे हा एक सोहळा असायचा. आणि बावळट हे विशेषण ऐकून घेण्या पेक्षा तो सोहळा मी हनुवटीवर हात ठेवून अचंबित नजरेने व थक्क चेहेऱ्याने बघत रहाणे पसंत करायची. सगळ्या घड्या विशिष्ठ पद्धतीने घालून झाल्या की त्या त्यांच्या आकारमानाने एकावर एक बसायच्या आणि सर्वात वर सुंदर चादर घालून त्यावर फ्लॉवर पॉट ठेवला जायचा. आणि तो ठेवला गेला की मी टाळ्या वाजवून उड्या मारायची. मग त्या काकांच्या कडून कौतुक मिळायचे आणि ते म्हणायचे “माझ्या कामाचे कौतुक फक्त या बाळाला आहे.”

त्या फ्लॉवर पॉट खाली रात्रीची झोपायची सोय आहे हे सांगूनही खरे वाटायचे नाही.

हीच कथा पिण्याचे पाणी घेताना असायची.

आपण पाण्याच्या भांड्यात तांब्या ( हो तेव्हा पितळी तांबे असायचे.जग ग्लास ही मंडळी नंतर आली.) बुडवून खाली ठेवला की ठेवणाऱ्या माणसाचा बावळट म्हणून उद्धार व्हायचा. का तर तो खालून न पुसता ठेवल्याने फरशीवर पाण्याचा गोल उमटणार.तो गोल ज्याच्या हाताने उमटेल त्याला पुढचे जेवण कसे आणि किती गोड लागणार? हीच परिस्थिती झाडून काढताना. त्या वेळी लंबे झाडू ( कुंचे ) नवीनच प्रविष्ट झाले होते. मग आपल्या उंचीचा झाडू बघून मला तर मोठीच गंमत वाटायची. आणि त्या घरातील कर्ता पुरुष खाली बसून तो लांब कुंचा आडवा धरून त्याच्या निम्म्या भागात पकडून पुढच्या शेंड्याने कसे झाडावे याचे प्रात्यक्षिक दाखवायचा. आणि ज्याला ते जमणार नाही त्याला बावळट ऐकावे लागायचे. नंतर त्यांचीच माझ्या वयाची मुलगी म्हणायची,  “तुम्हीच खूप छान झाडता तर तुम्हीच झाडून घ्या.”

या शिस्तीच्या घडीच्या छोट्या छोट्या आठवणी आहेत. अजून कपाट तर आवरायचेच राहिले आहे. ते नंतर असेच कधीतरी आवरु.

अतिशिस्त आणि बेशिस्त यांच्यातील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. गोष्टी व्यवस्थित करता येणे आवश्यकच मात्र अति सर्वत्र वर्ज्यते हे लक्षात ठेवले पाहिजे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतीच दिवाळी होऊन गेली  आणि दिवाळी निमित्ताने भारतात आलेली कीर्ती परत अमेरिकेत जायला निघाली.

आई- वडिल, सासू -सासरे इतर काही नातेवाईक यांच्या गोतावळ्यात बसलेली कीर्ती एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू घेऊन रमलेली होती. 

सगळे तुला जाताना हे हवे का? ते हवे का? विचारत होते. आई- सासूबाई वेगवेगळी पिठे लोणची ई. खायचे पदार्थ द्यायची तयारी करत होते. 

सहज कीर्ती म्हणाली किती सामानाची अदलाबदल करत असतो ना आपण••• लहानपणची भातुकली बाहुला बाहुली लग्नाचे वय झाले की सोडतो, लग्न झाले की माहेर , माहेरच्या काही गोष्टी सोडतो, लग्नानंतरही नवर्‍याची बदली, दुसरे घर बांधणे , ई काही कारणाने नेहमीच सामान बदलत रहातो. आणि मग बदल हा निसर्ग नियम आहे असे वाक्य कीर्तीला आठवले आणि आपण सतत सामान बदलतो आहे म्हणजे नैसर्गिक जीवन जगतो आहे असे वाटले.

आता सुद्धा भारतात यायचे म्हणून अमेरिकेहून काही सामान मुद्दाम ती घेऊन आली होती आणि जाताना ते सामान तिकडे मिळते म्हणून येथेच सोडून नव्याच सामानासह ती अमेरिकेला निघाली होती.

आपल्या माणसांचे प्रेम जिव्हाळा पाहून ती सुखावली असली तरी यांना सोडून जायचे म्हणून मन भरून येत होते.

कितीही निवांत सगळी तयारी केली, आठवून आठवून आवश्यक सामानाने तिची बॅग भरली तरी ऐनवेळी जाताना लगीन घाई होऊन कोणी ना कोणी अगं हे असू दे ते असू दे म्हणून तिच्या सामानात भर घालतच होते.

जाण्याचा दिवस आला आणि सगळे सामान  घेऊन ती बाहेर पडली आणि गोतावळा भरल्या अंत:करणाने तिला निरोप देत होते. बायबाय टाटा करत होते आणि अरे आपले खरे सामान म्हणजे हा गोतावळा आहे आणि तेच आपण येथे ठेऊन अमेरिकेत जात आहोत या विचाराने तिच्या काळजात चर्रर्रss झाले आणि ते भाव तिच्या डोळ्यातून गालावर नकळत वाहिले.

काही जण विमानतळापर्यंत तिला सोडायला आले होते. तेथेही पुन्हा यथोचित निरोप घेऊन कीर्ती एकटीच आत गेली. फ्लाईटला अजून उशीर असल्याने वेटिंगरूम मधे बसली आणि आपली मुले नवरा तिकडे अमेरिकेत वाट पहात आहेत. तिकडे आपले घर आहे आपल्याला त्यासाठी तिकडे जावेच लागणार••• नाईलाज आहे याची जाणिव होऊन कीर्ती सावरली. 

तरी तिच्या मनातून ईथले क्षण, इथला परिवार त्यांचे बोलणे हसणे वागणे हे जातच नव्हते. तिकडच्या आठवणींनी जबाबदारी तर इकडच्या आठवणीतून जपलेली आपुलकी माया प्रेम दोघांची सरमिसळ होऊन मन हेलकावू लागले असतानाच तिला तिचे कॉलेजचे दिवस पण आठवू लागले•••

ती आणि विजय एकाच कॉलेजमधे वेगवेगळ्या शाखांमधे शिकत असले तरी स्पर्धांच्या निमित्ताने एकत्र येत होते. दोघांचे विचार जुळले आणि नकळत ते प्रेमात गुंतले. पण लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्याघरून कडकडून विरोध झाला आणि विजयनेही तिला सॉरी म्हणून विसरून जा म्हटले. 

किती भावूक झाली होती ती••• त्यातून नकळत तिच्या तोंडून पूर्ण गाणेच बाहेर पडले होते•••

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

ओ ओ ओ ! सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं

और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है

वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

पतझड़ है कुछ … है ना ?

ओ ! पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट

कानों में एक बार पहन के लौट आई थी

पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है

वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे – २

आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी

गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! 

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल – २

गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ

झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ

सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

खरच असे कितीतरी सामान आपण आपल्या मनातही ठेवत असतो नाही का? पण परिस्थिती आली तर अवघड असूनही ते सामानही फेकून देता आले पाहिजे. आणि तेच कीर्तीने केले असल्याने ती नव्या माणसाचे नव्या घरातले सामान त्यामधे ठेऊ शकली होती.

मग अध्यात्माने तिचे मन नकळतच भरले आणि आपल्या मनाची सफाई जो नेमाने करतो त्याचे जीवन सौख्य शांती समाधानाने भरून पावते हे वाक्य आठवले. काही लोकांबद्दलचा राग, मत्सर, हेवा ई. अनेक विकारांचे सामान मनात साठले तर शांती समाधान सौख्य ठेवायला जागा उरत नाही म्हणून वेळीच हे नको असलेले सामान बाहेर फेकून दिले पाहिजे तरच सगळे व्यवस्थित होऊ शकते. याचा अनुभव तिने घेतलाच होता.

फ्लाईटची वेळ आली आणि ती सगळे सोपस्कार करून विमानात बसली मात्र, तिला जाणवले साधा प्रवास म्हटला तरी आपण किती सामान जमवतो? आधारकार्ड,पासपोर्ट,व्हिसा,एअर टिकेट••• प्रवास संपला तर टिकेट फेकून देतो पण इतर सामान जपूनच ठेवतो.

अमेरिकेत पोहोचायला २२ तासांचा अवधी होता. कीर्तीचे विचारचक्र चालूच होते.

तिच्या बाजूच्या सीटवरील व्यक्ती सांगत होती, त्या व्यक्तीचे वडील काही दिवसांपूर्वी वारले आणि त्यासाठी सगळी महत्वाची कामे सोडून त्या व्यक्तीला भारतात यावे लागले होते. 

आपल्याच विचारात गर्क असलेली कीर्ती अजून विचारात गढली गेली. जाणारी व्यक्ती निघून गेली पण तिने जमा केलेली माया मालमत्ता स्थावर जंगम हे सगळे इथेच सोडून गेली की••• हौसेने,जास्त हवे म्हणून, आवडले म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून, आपल्या माणसांना आवडते म्हणून आयुष्यभर माणूस कोणत्याना कोणत्या कारणाने सामान जमवतच जातो पण तो••• क्षण आला की सगळे सामान येथेच ठेऊन निघूनही जातो•••

तेवढ्यात तिला आठवले कोणीतरी सांगितले होते की परदेशात जायचे तर तिथली करंन्सी न्यायला लागते. मग इथले पुण्यकर्म हीच परलोकातील करन्सी असल्याने हे पुण्यकर्माचे सामानच जमवले पाहिजे. 

ती अमेरिकेत पोहोचली होती पण आता ती पुण्यकर्माचे आधारकार्ड, स्वर्गाचा व्हिसा आणि सुगुणांचा पासपोर्ट हे सामान जमवण्याच्या विचारातच …

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे

६ जानेवारी १९२४: रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानातून सुटून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य बारा तेरा वर्षे रत्नागिरी येथे पण नजर कैदेत होते.

आज ६ जानेवारी रोजी सावरकरांच्या सुटकेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यापूर्वी मी लिहिलेला  सावरकरांचा समाज सुधारक हा पैलू , प्रामुख्याने मला आवडलेला व त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी सर्व समाजापुढे मांडलेला आहे. याबाबतचा माझा लेख आज पुन्हा आठवला आणि आपल्यासमोर मांडतो आहे.

सावरकर आणि मी  –

 

त्यांची माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. याची देही याचि डोळा त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेही नाही. तरीसुद्धा त्यांची माझी पहिली भेट झाली ती मी एसएससीला म्हणजेच अकरावीला असताना १९६५-६६ मध्ये.

हो, ही भेट होती त्यांच्या एका निबंधातून झालेली. त्या निबंधाचे नाव होते ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हो तेच ते,  विनायक दामोदर सावरकर. अकरावीला असताना मराठीच्या पुस्तकात ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा आम्हाला धडा होता.  माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक जीवनाचा धडा होता. आमच्या मराठीच्या आपटेबाईंनी हा धडा जरी आम्हाला शिकवला होता, तरी तो माझ्या डोक्यात बसला तो माझ्या आईने मला शिकवला तेव्हा ! तसं पहायला गेलं तर माझी आई आणि सावरकर यांच्यात वैचारिक साम्य फार नव्हतं.  त्या धड्यामध्ये सावरकरांनी परमेश्वराची जी संकल्पना मांडली आणि जी माझ्या डोक्यात रुजली ती वस्तुतः आमच्या आईला मान्य असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरीही स्वतःची मतं लादण्यापेक्षा त्या धड्यामध्ये सांगितलेला विचार उत्तम प्रकाराने समजावून सांगणे ही हातोटी आमच्या आईमध्ये असल्याने, त्या निबंधाचे माझ्या मनामध्ये जे बीज पेरलं गेलं त्यातून माझ्या अनेक विचारांची जडणघडण होत गेली.

त्या निबंधाची मांडणी मला खूप आवडली. ज्या विषयाची आपल्याला मांडणी करायची आणि जी बाजू आपल्याला पटवून द्यायची आहे, त्याच्या विरोधी बाजू पूर्वार्धात पूर्णपणे पटवून द्यायची आणि उत्तरार्धात त्या सर्व पूर्वार्धातील मुद्द्यांचे खंडन करायचे. अशा पद्धतीचे त्या निबंधाचे लेखन माझ्यावर प्रभाव पाडून गेले.

ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करणे ही त्या वेळेला मला क्रांतिकारी कल्पना वाटली. कारण त्या वेळेपर्यंत ईश्वर आणि त्याचं अस्तित्व, हे लहानपणापासून झालेल्या संस्कारातून आपण गृहीतच धरलेलं असतं.  तसं मी ते गृहीतच धरलेलं होतं. सावरकरांनी माझं ते गृहित मुळापासूनच उखडून टाकलं प्रथमच.

सावरकरांच्या म्हणण्यानुसार मनुष्याचा देव म्हणजे,  देव प्रसन्न व्हावा म्हणून माणसे जी काही कर्मकांडं करतात, ती कर्मकांडं करण्यासाठी भाग पाडणारा देव. हा देव त्यांना सर्वथा अमान्य आहे. नवसाला पावणारा देव, भक्ताच्या हाकेला ओ देणारा देव, भक्ताच्या नैवेद्याने प्रसन्न होणारा देव, भक्ताच्या नामस्मरणाने.त्याच्या हाकेला धावून जाणारा देव, किंबहुना देव नावाचं कोणतंही अस्तित्वच त्यांना (आणि अर्थात मलाही) अमान्य आहे.  त्यामुळे ज्याला अस्तित्वच नाही अशा देवाला प्रसन्न करून घेण्याची कोणतीही कृती ही निरर्थक आहे या मतावर ते ठाम आहेत. देवाने मानवासाठी काहीही निर्माण केलेलं नाही आणि देव मानवासाठी काहीही करीत नाही. या विश्वामध्ये नैसर्गिक प्रक्रियेने जे काही निर्माण झालं आहे त्या निर्मितीचा उपयोग मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी, सुखासाठी आणि उपयोगासाठी करून घेत असतो. ही कृती करीत असताना तो स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो, विकास करतो आणि या निसर्गकृती मागील कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.  पुढील पिढ्यांसाठी संशोधनाचे विश्व अधिकाधिक विस्तारून ठेवतो.  या निसर्गाच्या अर्थात या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती मागे काही कार्यकारण भाव असेल काही सूत्रबद्धता आणि नियमबद्धता असेल आणि त्या सर्वांना बांधून ठेवणारी शक्ती  असेल व त्या शक्तीलाच जर आपल्याला देव समजायचं असेल तर, त्या विश्वाच्या देवाचीच पूजा केली गेली पाहिजे. मनुष्याच्या देवाला पूर्णपणे नाकारलं पाहिजे. हा निसर्ग काही विशिष्ट नियमाने बद्ध आहे त्या नियमांची माहिती करून घेणे त्याचं सर्वतोपरी ज्ञान मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे त्यासाठी संशोधन कार्यात रममाण होणे हीच त्या विश्वाच्या देवाची पूजा असं ते मानतात. म्हणूनच त्यांनी कोणतेही पूजा पाठ आणि कर्मकांडांचं समर्थन केलं नाही. पुरस्कारही केला नाही. उलट त्याचा विरोध केला. निषेध केला. ज्या कृती मागे निश्चित कार्यकारण भाव नाही नैतिक विचार नाही आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार नाही अशा सर्व गोष्टींना त्यांनी विरोध केला. मग त्या गोष्टी हिंदू धर्मात असोत वा दुसऱ्या कोणत्याही धर्मात असोत.  देवपूजेपासून देवतांचे स्तोम वाजवणाऱ्या मंदिरे, व्रतवैकल्ये, ज्योतिष शास्त्र, मुहूर्त, यात्रा, जत्रा, उत्सव या सर्वांना त्यांनी विरोध केला आहे. माणसा माणसांमध्ये भेदभाव करणाऱ्या चातुर्वर्ण्य, जातीयवाद अशा सर्व गोष्टींना कडाडून विरोध केला आहे. धर्मशास्त्राच्या आधारे समर्थन करत असलेल्या श्रृती आणि स्मृतींना त्यांनी नाकारलं आहे. त्यासाठी त्यांचे इतर बरेच साहित्य वाचले पाहिजे. किमान त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले पाहिजेत. त्यांचे क्ष किरणे नावाचे त्यांच्या निवडक लेखांचे निघालेले पुस्तक ते तरी वाचले पाहिजे. खरं म्हणजे या निबंधानंतर एसएससी नंतरच्या सुट्टीमध्ये मी झपाटल्यासारखा समग्र सावरकर वाङ्मय वाचत होतो. माझ्या आठवणी प्रमाणे त्यावेळी पाच-सहा खंड होते. ते मी वाचून काढले आणि त्यांच्यासारखाच मी निरीश्वरवादी झालो.  सावरकर व आगरकर या दोघांनी हिंदू धर्म हा भटाभिक्षुकांचा धर्म नाही हे पोट तिडकीने ठामपणाने व ओरडून ओरडून सांगितले. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. त्याला रूढी आणि कर्मकांडांच्या बंधनात जखडून त्याचा मूळ जीव घोटण्याचा प्रयत्न करून त्या जीवनशैलीचा धर्म बनवला गेला. तिथेच आपल्या संस्कृतीच्या, जीवनशैलीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. सावरकरांचा हिंदू धर्म म्हणजे तथाकथित धर्म मार्तंडांच्या पाशात जखडलेला हिंदू धर्म नव्हता असे माझे मत झाले आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे तथाकथित पारंपरिक सनातनी हिंदुत्ववादी लोकांच्या हिंदुत्वापेक्षा अत्यंत वेगळं होतं आणि ते तथाकथितांना पटण्यासारखं आणि पचण्यासारखं नव्हतं आणि नाही.  अर्थात या सर्वांचा विचार मांडण्यासाठी अजून एका लेखाचे प्रयोजन करावे लागेल असे मला वाटते. पण एकंदर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्यानंतर मला सुचलेल्या कवितेच्या ओळी पुढे देत आहे.

भावी काळ कसा असेल अपुला ठाऊक ना मानवा.

केंव्हा देव जगी करेल प्रलया माहीत नाही कुणा.

भूकंपातुन जीव आणिक किती जातील पृथ्वी तळी.

आगी आणिक वादळामधुनही जीवीतहानी किती.

देवा प्रार्थियले आम्ही जरि किती याहून नाही गती.

विश्वा वाचविण्या समर्थ जगती वैज्ञानिकाची मती.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

परवा व्हाट्सअपवर म्हातारपणावर एक सुंदर कविता आली होती आणि त्यात दोन अगदी छान ओळी होत्या..!

🌹  तुम्हीच सांगा छंद

     जोपासायला वयाचा संबंध असतो का ?…

     रिकामटेकडं घरात बंद

     माणूस आनंदी राहतो का ?” 🌹

छंद जोपासायला वयाचा संबंध असतो की नाही हे मला माहित नाही पण माझे काहीं म्हातारे मित्र आणि त्यांचे अफलातून छंद बघितल्यावर ‘रिकामटेकडेपणा बरा पण छंद आवर’ असं काहीसं मला  हल्ली वाटायला लागलंय..

आता  हेच बघा ना..!      

आमच्या सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहणारे कुंभकोणी काका..!

नेमकं मुलांच्या प्ले एरिया समोरचं त्यांचा फ्लॅट आणि मुलं सकाळ संध्याकाळ खेळायला आली की कुंभकोणी काका न चुकता गॅलरीत हजर..! किंबहुना गॅलरीत बसून मुलांवर डाफरत राहणे हा त्यांचा आवडता छंद..!!

“अरे किती आरडाओरडा करताय..खाली येऊन एकेकाला फटके दिले आणि बॉल ‘जप्त’ केला म्हणजे तुम्हाला समजेल..!”   

दिवसातून एकदा तरी हा डायलॉग सगळ्या सोसायटीला ऐकू येतोच.‌.

फिरायला जाणं अथवा सिनीयर कट्ट्यावर गप्पा मारत बसणं असल्या ‘टाईमपास’ गोष्टीत त्यांना इंटरेस्ट नव्हता..आयुष्य सगळं महापालिकेत ‘वसुली अधिकारी’ म्हणून गेल्यामुळे ‘जप्ती’ हा त्यांचा आवडता विषय..!

आणि चुकून एकदा कधीतरी बॉल त्यांच्या गॅलरीत येऊन पडला की कुंभकोणी काका तो बॉल घेऊन खाली जाईपर्यंत सगळी मुलं तेथून गायब झालेली असायची..!

पण कोणी बॉल मारलाय हे काकांच्या बरोबर लक्षात असायचं आणि मग त्याच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडीलांबरोबर कुंभकर्णी काकांची ‘ट्वेन्टी ट्वेन्टी’ सुरू व्हायची ती लवकर संपायची नाही..!

नाहीतरी कुंभकोणी काकांना सोसायटीची सगळी नियमावली तोंडपाठ असल्यामुळं त्यांच्याशी वाद घालणं अवघडचं..!

आणि मग तो बॉल ‘जप्त’  झालेला असायचा हे इथं सांगायला नकोच..!

(असे आत्तापर्यंत जप्त झालेले पंधरा वीस बॉल तरी कुंभकोणी काकांच्याकडे असतील.)

यंदा काहीं मोठ्या मुलांनी शेवटी चिडून त्यांचा दाराबाहेर ठेवलेला लाकडी शू-रॅक मध्यरात्री होळीत टाकायचं ठरवलं होतं..पण कुंभकोणी काकूंनी चार बॉल गुपचूप परत केल्यामुळें तो प्लॅन मुलांनी कॅन्सल केला..!!

धुमाळसाहेबांची मात्र वेगळीच तऱ्हा..! 

तहसीलदार या पदावरून ते निवृत्त झालेले.. त्यामुळे वरुन आणि (टेबल)खालून भरपूर कमावलेलं..त्यांनी तीन चार बॅंकेत एफ डी आणि सेव्हींग खाती उघडून ठेवली आहेत..

आणि रोज एका बॅंकेत जाऊन सेव्हींग खात्यात हजार दोन हजार भरणे किंवा काढणे हा त्यांचा आवडता छंद..!

एकदा मी त्यांना विचारलं..”कशाला रोज बॅंकेत जाता..एटीएम कार्डनं पैसे काढत जा..जाण्यायेण्याच्या त्रासपण होणार नाही.. आणि हल्ली ‘होम बॅंकींग’ची पण सोय आहे..!”

ते हसून म्हणाले ” अहो त्यात कसला आला त्रास.!

उलट तेवढाच माझा तास दोन तास छान वेळ जातो..!

एकदा कौंटरवर टोकन घेतलं की अर्धा पाऊण तास तिथं एसीमध्ये कोचवर बसून आराम करता येतो..काहीं बँकेत वाचायला पेपर पण ठेवलेला असतो.! 

आणि माझी मोठी डिपॉजीटस असल्यामुळे कधी कधी चहा पण मिळतो..! इथं घरी मुलगा व्यायाम करा, हे करा ते करा म्हणून सारखं मागे लागत असतो.!” (धुमाळ साहेबांनी जास्तीत जास्त वेळ बॅंकेत घालवता यावा म्हणून बॅंकासुद्धा जास्त गर्दी असलेल्या ‘सिलेक्ट’ केल्यायतं.!)

आता मला सांगा बॅंकांमधून कितीही एडव्हान्स टेक्नाॅलॉजी आली आणि  सर्व्हिस इंम्प्रुव्हमेंट झाली तरी धुमाळांच्या या ‘लॉजीक’पुढे तिचा काय उपयोग होणार..!

शेजारच्या वींगमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शेंडेकाकांची तर वेगळीच गोष्ट..! 

आईवडीलांना वरच्या फ्लोअरवर जायला यायला त्रास नको म्हणून मुलानं कौतुकानं ग्राऊंड फ्लोअरला फ्लॅट घेतलेला..! पण शेंडेकाकांना रोज सकाळी  कोवळ्या उन्हात बसून पेपर वाचण्याची (गावाकडची) सवय..! आणि  खाली ऊन येत नाही म्हणून शेंडेकाका रोज सकाळी पाच पन्नास 

पायऱ्या चढून टेरेसवर जाऊन पेपर वाचत बसतात..! (तेवढाच पायांना व्यायाम होतो हे त्यांच अ‍ॅडिशनल लॉजिक.!) 

आता ह्याला काय म्हणणार ..? 

आणि शेवटी जे व्हायचं ते झालंच.. मागच्या आठवड्यात खाली उतरताना एक पायरी चुकली आणि पंधरा दिवसासाठी शेंडेकाकांना प्लॅस्टर घालून घरात बसावं लागल..! 

माझा एक मित्र आहे.. बॅंकेतून रिटायर झाल्यापासून त्यानं वेळ घालवण्यासाठी एक छंद लावून घेतलाय..

रोज सकाळी उठलं की वॉटस्अपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मयतीचे शोकसंदेश देण्याचा.. आणि तेही कवितेत..!! 

(कवि होण्याचं त्याच स्वप्न  राहून गेल होतं.) 

आणि तेवढ्यासाठी मित्रांचे, नातेवाईकांचे.. त्यांच्या भाऊबंदाचे असे आठ दहा गृप जॉईन केलेत.!  

आणि मग एखाद्या गृपवर कुणाच्या वाढदिवसाचा मेसेज दिसला रे दिसला की  शुभसंदेश आणि  याची कविता तयार..! 

“तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळणारा झरा.. 

सळसळणारा शीतल वारा.. 

पिवळ्या उन्हातील

रिमझिमणाऱ्या श्रावणधारा..

तुला  खूप खूप शुभेच्छा..!” 

प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्याच्या काव्य प्रतिभेला असा नवीन नवीन बहर येत असतो.! 

आणि अगदीच कुणाचा वाढदिवस नसेल तर हा अमिताभ बच्चन ‘माधुरी दिक्षित मोदीजी अशा  सेलिब्रिटींचे वाढदिवस आपल्या मोबाईलवर उत्स्फूर्तपणे साजरा करत असतो..!! 

संध्याकाळी सोसायटी च्या सिनियर सिटिझन कट्ट्यावर येणाऱ्या आबा पवारांचा किरकिर आणि कुरकुर हा स्थायीभाव..! 

बायको असताना “आज भाजीच तिखट झाली.. चटणीचा भुगा झालाय, चहात साखर जास्त पडलीय” अशी सतत किरकिर करून सगळा संसार करपवलेला..! 

आणि आता कट्ट्यावर बसलं की  सुनेच्या तक्रारीचा पाढा वाचायला लागायचं.. (सूनेसमोर बोलण्याची काय बिशाद..?)   

“बर्वेकाका.. आजकालच्या सुनांना घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल अजिबात प्रेम आणि आपुलकी वाटत नाही.. तुला सांगतो आजपर्यंत एकही दिवस माझ्या सूनबाईनं मला समोर उभं राहून जेवायला वाढलं नाही.. डायनींग टेबलवर ताट वाढून ठेवलेलं असतं आणि ती कायम  बेडरूममध्ये बसून वॉटस्अपवर मेसेज बघत बसलेली असते..! सासऱ्याची अजिबात किंमत नाही..! “

“अरे तुझी सून निदान ताट वाढून तरी ठेवते.. इथं मला रोज सुनबाईचा जेवणाचा डबा डबेवाल्याकडे भरून द्यावा लागतो..! पण मी तुझ्यासारखं कुंथत नाही. 

मुलगा सून दोघही नोकरी करतात.. दिवसभर कष्ट करतात त्यामुळं हातपाय धड आहेत तोपर्यंत आणि आपल्याला जमेल तशी त्यांना मदत करायची..! आपलं ओझं होऊ द्यायचं नाही..म्हणून मी प्रेमानं ते करतो..! 

आणि हो.. तुझ्या सूनेची तरी काय चूक आहे..? ती समोर असली की तू तिच्या स्वयंपाकातलं अधिक उणं काढणार.. त्यापेक्षा समोर नसलेलं बरं..!” 

काकांनी आबा पवारांच्या वर्मावरच बोट ठेवलं.. 

बर्वेकाका म्हणजे तसे आनंदमुर्ती..! म्हातारपण कसं आनंदात जगावं वागावं याच प्रात्यक्षिकच..! 

पंचाहत्तरी ओलांडली तरी रोज सकाळी वॉकींग योगा.. त्यामुळं तब्बेत ठणठणीत..! घरची भाजी आणायला निघाले तरी सगळ्या शेजाऱ्यांना विचारत जायचे..”  बाजारात चाललोय.. कुणाला काहीं आणायचय कां..? येताना घेऊन येतो..” 

मागच्या महिन्यात त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं.. गृपवर त्यांनी मेसेज टाकला होता.. “मला नवीन गुडघे आले आहेत.. सगळे न विसरता बघायला आणि त्यानिमित्तानं चहाला या..!” 

तर अशी ही नाना  तऱ्हेची म्हातारी माणसं आणि त्यांच्या या अशा नाना तऱ्हा..!

पण त्यांचे हे असे तऱ्हेवाईकपणाचे  कंगोरे आपल्या नेहमीच्या सरळसोट आणि बोथट आयुष्यात एक सुखद टोचणी देत असतात आणि रोजच्या  जगण्यात नवनवीन रंग भरत असतात एवढं मात्र नक्की..!!

लेखक : कृष्णकेशव

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मृत्युपत्र हे संपत्तीची वाटणी करणारं असतं, मात्र वैद्यकीय इच्छापत्राद्वारा माझ्या शरीराचं काय करायचं, मला व्हेन्टिलेटरवर ठेवावं का? किती दिवस ठेवायचं? माझ्या आजारपणावर ०किती खर्च करायचा, शरीर वा अवयव दान करायचे का यांसारख्या इच्छा लिहून ठेवता येतात.

अठरा वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी   ‘बंध-अनुबंध’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका कमल पाध्ये एकटय़ाच राहत होत्या. डॉ. रोहिणी पटवर्धन आणि प्रमोदिनी वडके-कवळे त्यांची काळजी घेत असत. एक दिवस त्यांनी आपले डॉक्टर सुभाष काळे व या दोघींना घरी बोलावलं व सांगितले, ‘हे बघा डॉ. काळे माझ्यावर उपचार करतात. तुम्ही दोघी माझी काळजी घेता. इथून पुढे जर मी आजारी पडले आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन तर तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी तुम्हा सर्वासमक्ष स्वेच्छेने माझा निर्णय जाहीर करीत आहे!’ 

‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या संकल्पनेची मुळं वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या मनांत इथेच रुजली आणि पुढे त्यांनी त्यांच्या प्रसाराचं कार्य सुरू केलं. ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत प्रचलित असली तरी भारतात मात्र अजून म्हणावा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. पण बदलत्या काळानुसार आज ‘वैद्यकीय इच्छापत्रा’ची निकड भासू लागली आहे हे निश्चित! वस्तुत: ही संकल्पना अद्याप कायद्याच्या चौकटीत नसली तरी  ती एक विचारांची दिशा आहे. ‘माझे वा माझ्या शरीराचे हाल होऊ नयेत, माझ्या कुटुंबियांना निर्णय घेण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये. त्यांच्यावर महागडय़ा उपचारांचा ताण पडू नये,’ या भूमिकेतून वृद्ध आपली इच्छा या ‘लिव्हिंग विल’ द्वारे व्यक्त करू शकतात. 

आपलं शरीर व तब्येत हीसुद्धा एक प्रकारे आपली मालमत्ताच नसते का? मग त्यासंबंधी निर्णय निदान भविष्यकाळातील वैद्यकीय उपचारांबाबतचे आपले आपणच घ्यायला नको का? एखाद्याला बिछान्याला खिळून जगायचं नसेल किंवा कृत्रिम वैद्यकीय उपचार करून घेऊन जिवंत राहायचं नसेल, पण असे निर्णय घेण्यास तो समर्थ नसेल तर आपल्या प्रकृतीसंदर्भात कोणते उपचार केले जावेत वा जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ अर्थात ‘वैद्यकीय इच्छापत्र’! या ‘लिव्हिंग विल’मध्ये आयुर्मर्यादा वाढवणारे कोणतेही उपचार उदा. नळीने अन्न देणं, व्हेन्टिलेटरवर ठेवणं वगैरे करू नयेत असे स्पष्ट निर्देश करता येतात. तसेच देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान यांसारख्या इच्छांचाही उल्लेख करता येतो. मात्र आपले फॅमेली डॉक्टर आणि कुटुंबियांशी नीट चर्चा करूनच हे इच्छापत्र बनवायला हवे. इतकं सगळं करूनही रुग्णालयातील आपल्या आई वडिलांच्या बाबतीत काय करायचं, हा निर्णय शेवटी मुलांकडे रहातोच. वृद्धांसाठी आपली इच्छा व्यक्त करण्याचा फक्त हा एक मार्ग आहे.

आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचं ते ‘लिव्हिंग विल’ आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे असं लिहून त्यावर डॉक्टर सही करतात. त्याचबरोबर पती अथवा पत्नी तसंच मुलं व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सहय़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावं लागतं. हे नोटराईज केल्यामुळे ज्येष्ठांची तशी इच्छा होती हे स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर या इच्छापत्राच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या लागतात. फक्त हे इच्छापत्र करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाची चर्चा पती-पत्नी, मुलं, डॉक्टर व सुहृद यांच्याबरोबर अवश्य करावी. तरच या इच्छापत्रातील इच्छांची पूर्तता होण्याची खूप शक्यता असते. 

”अर्थात तरीसुद्धा अनेक वेळा समोर मृत्यू दिसू लागताच तोंडाने कितीही निरवानिरवीची भाषा केली तरी रुग्ण उपचार सुरू ठेवायला सांगतात. व जोपर्यंत रुग्ण आपली इच्छा व्यक्त करण्याच्या परिस्थितीत असतो तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसारच उपचार केले जातात. अनेक वेळा रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल तरी भावनेच्या भरात नातलगच रुग्णास उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरतात व ‘लिव्हिंग विल’ला विरोध करतात. एक डॉक्टर म्हणून नातलगांच्या मताचा आदर केला जातो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाही.’

अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर असणारे व ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करणारे            डॉ. दिलीप देवधर ‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती सांगतात. ‘लिव्हिंग विल’ अमलात आणताना एक डॉक्टर म्हणून आमचे काही निकष असतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचं वय ७५ च्या वर असेल तरच हा निर्णय घेतला जातो. त्यातही आम्ही डॉक्टर रुग्णावरील उपचार एकदम बंद करत नाही. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असेल तर साधारणपणे ७२ तासांत व जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसांत शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ लागतं. जर तसं झालं नाही तर रुग्णाचे जवळचे नातलग, फॅमिली डॉक्टर, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असे सर्व जण एकत्र बसून चर्चा करतात व त्यानंतरच रुग्णाने शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असा निर्णय घेतला जातो. अर्थात अशा वेळी रुग्णाने स्वत: जर असं वैद्यकीय इच्छापत्र केलं असेल तर सर्वानाच हा कठीण निर्णय घेणं सोपं जातं व जवळच्या नातलगांना अपराधीभाव येत नाहीत.

सर्वसाधारणपणे डॉक्टरांचा अनुभव असा आहे की मध्यमवर्गीय माणसं भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाच्या उपचारांसाठी भरमसाट खर्च करतात. वेळेला जमीनजुमला, दागदागिनेसुद्धा विकतात. भारी व्याजाने कर्ज उचलतात. त्यांची पुढची दहा-पंधरा र्वष कर्जफेडीतच जातात व ज्या रुग्णासाठी ते आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढतात तो रुग्णही हाताला लागत नाही व निराशा पदरी पडते. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर ते कुटुंब मोठय़ा संकटातून वाचू शकतं.

आज माणसाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे आर्थिक गणितं साफ बदलली आहेत. वैद्यकीय खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याने जबाबदारी घेऊन रुग्णाला त्याच्या परिस्थितीनुसार सल्ला देणारे डॉक्टर आता राहिले नाहीत. हल्लीची तरुण पिढी व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी असते. त्यामुळे परावलंबी रुग्णाला सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. बरेच वेळा अशा मृत्युशय्येवरील रुग्णाला ठरावीक मुदतीपुढे हॉस्पिटलही ठेवून घेत नाहीत. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर केवळ कृत्रिम यंत्रणांवर जिवंत असणाऱ्या रुग्णाच्या नातलगांना कटू निर्णय घेण्यासाठी ‘लिव्हिंग विल’ हा फार मोठा दिलासा ठरू शकतो.

परदेशस्थ मुलं तिथल्या नियमांप्रमाणे इथेही उपचारांची दिशा ठरवण्याचा आग्रह धरतात. त्यांना इथल्या अडचणी व मर्यादा लक्षात येत नाहीत व त्याचा इथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व जवळचे नातलग यांना खूप त्रास होतो. आई-वडील तब्येतीने धडधाकट असतानाच परदेशस्थ मुलं, इथे ज्येष्ठांची काळजी घेणारे दोन नातलग आणि डॉक्टर यांनी एकत्र बैठक घेऊन पुढील काळात ज्येष्ठ आजारी पडल्यास त्यांच्या उपचारांची दिशा, व्याप्ती व मर्यादा यांचा साकल्याने विचार करून असं ‘वैद्यकीय इच्छापत्र’ केलं तर ते सर्वानाच खूप सोयीचं होईल. अर्थात त्यासाठी निरोगी वृद्धांनी एखाद्या तरी डॉक्टरशी सतत संपर्कात राहून नियमित वैद्यकीय चाचण्या कराव्यात.

‘सनवर्ल्ड’वरील याच सदरातील लेखानंतर रोहिणी पटवर्धन त्यांना अनेक फोन आले. त्यांतील एका ज्येष्ठाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते सांगत होते, ”मी युद्धनीतितज्ज्ञ म्हणून नोकरीनिमित्त सतत फिरतीवर होतो. सतत बाहेरगावी राहिल्यामुळे नातलगांशी माझा संबंध नाही. मला मुलं नाहीत. पत्नी हयात नाही. मी एकटाच आहे. मी तुमच्याकडे रोख रक्कम जमा करेन. त्यांतून खर्च भागेल एवढेच वैद्यकीय उपचार तुम्ही माझ्यावर करा. मी हे लेखी स्वरूपात दिलं तर तुम्ही मला प्रवेश देणार की नाही?”

‘वैद्यकीय इच्छापत्र’ अशा एकटय़ा अविवाहित, विनापत्य, मुलं असूनही जवळ नाहीत वा ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही त्यांच्यासाठी वरदान आहे. तसंच असाध्य व्याधींनी पीडित ज्यावर औषध व उपचार उपलब्ध नाहीत अशांसाठीही ते उपयुक्त आहे. 

आयुष्यभर ज्या मुलांवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्यासाठी कष्ट उपसतो, त्यांच्यावर अनावश्यक उपचाराचं ओझं लादणं वा त्यांना अप्रिय निर्णय घ्यायला लावणं यापेक्षा व्यावहारिक विचार करून ‘लिव्हिंग विल’ चा पर्याय स्वीकारणं अधिक योग्य आहे नाही का?     

वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी  संपर्क साधा –                    

लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन 

मो – ९०२८६६४३३३   

प्रस्तुती  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असेही एक पत्र… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ असेही एक पत्र…  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल तोही स्मार्ट, आल्यामुळे “पत्र लेखन आणि वाचन” हे इतिहासजमा झाले आहे .

“गुरुदेव रानडे” ना त्यांच्या गुरुदेवांनी लिहिलेले पत्र वाचकाना नक्कीच विचार करायला लावेल .

बॉंबे रॉयल हिंच क्लब

१९ डिसें १९०७

प्रिय रानडे,

तुम्ही व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने तुमची निराशा झाली असणार . मला तुमच्या बद्दल खरोखर खूप सहानुभूती वाटते . याची तुम्हाला कल्पना आहेच .

तुमच्या उपजत बुद्धिमत्तेचा विचार करता परीक्षेतील गणना ही एक क्षुल्लक बाब आहे . माझ्यापुरते मी म्हणेन की परीक्षेतील निकालापेक्षा अगदी स्वतंत्रपणे तुम्ही आपली बुद्धिमत्ता इतरत्र कुठेही दाखवू शकाल . मला असे निश्चित वाटते की पहिल्या वर्गाचा मान जर कोणाला द्यायचा असेल तर तो तुम्हालाच दिला पाहिजे . केवळ दुर्दैव आड आले म्हणूनच तो तुम्हाला आत्ता मिळाला नाही .

मला तुमच्या लक्षात एवढेच आणून द्यावयाचे आहे की, तुम्हाला खरे जाणणारा प्रत्येक जण किंवा तुम्ही स्वतःही या तात्पुरत्या अपयशाची फिकीर करणार नाही व तुम्हाला कमी लेखणार नाही .

तुमच्या बद्दल माझ्या मनात प्रेम व आदर असल्याने तुमच्याबद्दल वाटेल ते करण्याची मी पराकाष्ठा करीन . मला तुम्ही आपला कायमचा मित्र समजा आणि जरूर तेव्हा वाटेल ती मदत करण्यास मी सिद्ध आहे, असा विश्वास बाळगा .

मानव म्हणून स्वतःचे जे काही कर्तव्य आहे, त्या एकाच खऱ्या परीक्षेत तुम्ही अगोदरच उत्तीर्ण झाला आहात . तुमच्या खऱ्या गुणवत्तेवर अवलंबून रहा . परीक्षेतील यश हे त्यापुढे काहीच नाही असे समजा …

प्रिय राम, शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की तुमचा मित्र म्हणवून घेण्याचा मान मला मिळाला, याचा मला अभिमान वाटतो . तुमच्याकरीता जे जे काही मला करता येईल ते ते मी आनंदाने करीन .

तुमचा खरा मित्र,

प्रो.ई. ए . वुडहाऊस .

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आकाशाशी जडले नाते… सुश्री विद्याताई माडगूळकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ आकाशाशी जडले नाते… सुश्री विद्याताई माडगूळकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

लेखिका : विद्याताई माडगूळकर

प्रकाशिका – सौ. शीतल श्रीधर माडगूळकर

गदिमा प्रकाशन, ‘पंचवटी’,११ पुणे -मुंबई रस्ता, पुणे. – ४११ ००३

—आत्मचरित्र कै. विद्याताई माडगूळकर, जन्म- 1925, मृत्यू- 1994.

हे आत्मचरित्र विद्याताई माडगूळकर यांनी लिहिले. परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर शितल माडगूळकर यांनी प्रसिद्ध केले हे पुस्तक 14 डिसेंबर 1996 रोजी प्रसिद्ध झाले. त्याबद्दल सौ. शीतल यांना खूप खेद वाटतो.

‘प्रिय कविराज…. तुम्ही आणि मी लावलेल्या वडाचा विस्तार आता खूपच फोफावला आहे…. अशी सुरुवात करून… शेवटी ‘तुमची मंदी’ या शब्दात पुस्तकाची सुरुवात होते.

सुरुवातीला विद्याताईंनी आपल्या माहेरच्या कुटुंबाविषयी माहिती दिली आहे. त्यांचे घराणे अस्सल कोकणातले! त्यांचे माहेरचे आडनाव पाटणकर असे होते.

पोटापाण्यासाठी हे कुटुंब सांगलीला येऊन हरिपूर येथे स्थिरावले. विद्याताईंचे वडील लहान असताना मामांबरोबर रत्नागिरीला गेले, नंतर ते कोल्हापूरला आले व तिथून पुढे सांगली जवळ हरिपूरला त्यांच्या स्वतःच्या घरी आले. ते जुने घर स्वच्छ करून ते तिथेच राहिले. त्यांचे लग्न कृष्णाबाई नातू यांच्याशी झाले व तीच पाटणकर यांची पत्नी ‘भागीरथी’ झाली. गदिमांच्या पत्नीचे माहेरचे नाव पद्मा पाटणकर असे होते.

एक डिसेंबर 1925 या दिवशी गदिमांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.

विद्या ताईंचा जन्म ही कोल्हापूर येथे झाला. त्यांचे बालपण कोल्हापूर मध्ये आनंदात गेले. या बालपणीच्या काळाचे खूप छान वर्णन विद्याताई म्हणजेच गदिमांच्या पत्नी, यांनी केले आहे. विद्याताईंनी सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व आठवणी शीतलताईंनी एकत्र करून हे आत्मचरित्र पर पुस्तक लिहिले आहे.

त्यामुळे विद्याताईंच्या शब्दातच ते पुस्तक लिहिले गेले आहे. विद्याताई म्हणतात,’ त्यांचा आवाज चांगला होता. त्या गाणे छान म्हणत असत. परंतु लग्नानंतर मात्र त्यांचे गाणे म्हणणे बंद झाले.’

१९४० साली त्यांची गदिमांशी ओळख झाली. ते औंध संस्थानातून आले होते. ही त्यांची पहिली भेट होती. पुढे रंकाळा तलावावर फिरताना त्यांच्यातील प्रेम कमळ फुलले आणि दोघांच्यातील प्रेम वाढीस लागले. इतक्या जुन्या काळातील या प्रेमप्रकरणाची माहिती पद्माताईंनी(नंतरच्या विद्याताई)खूप छान सांगितली आहे आणि शीतलताईंनी ते छान शब्दबद्ध केले आहे. देशस्थ -कोकणस्थ असा हा विवाह संबंध होता.

लग्नानंतर माडगूळ ला जाणे, तेथील गृहप्रवेश तसेच गदिमांच्या सर्व लहान भावांचा परिचय या गोष्टींची माहिती कळते. गदिमा गाणी लिहू लागल्यानंतर त्यांचे कोल्हापूर येथे जाणे- येणे वाढले. एकत्र कुटुंब होते पण माडगूळ ला जाऊन येऊन कविराज राहत असत. विद्याताई त्यांना “कविराज” म्हणत. कोल्हापूरला लता मंगेशकर, भालजी पेंढारकर या सर्वांशी त्यांचा परिचय होता. मध्यंतरीच्या काळात विद्याताईना मोठा आजारही झाला होता. तेव्हा गदिमांनी त्यांची खूप काळजी घेतली होती. नंतरच्या काळात विद्याताईंनी कोल्हापूर, मग मुंबई आणि नंतर पुणे अशा तीन ठिकाणी संसार मांडला होता.पुण्यातील ‘पंचवटी’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते.गदिमांच्या प्रत्येक चित्रकथा ते विद्याताईना प्रथम वाचून दाखवत असत. विद्याताईंवर त्यांचे खूप प्रेम होते. सुरुवातीच्या काळात विद्याताईना गदिमांच्या संसारात खूप हाल, कष्ट भोगावे लागले. गदिमांना माणसे गोळा करण्याची आवड होती. घरातील परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे विद्याताईना असेल त्या पैशांमध्येच घर संसार चालवावा लागत असे. तसेच माडगूळकरांचे कुटुंब ही मोठे होते, त्यामुळे शेती मध्ये मिळणाऱ्या उत्पन्नात माडगूळ येथील घर  चालवावे लागत असे.

नंतर बाबूजींबरोबर (सुधीर फडके)

गीत रामायणाचे कार्यक्रम सुरू झाले, तसेच चित्रपटामुळे थोडाफार पैसा हातात खेळू लागला आणि.त्यांना चांगले दिवस आले.विद्याताईंना बेबी, लता, श्रीधर, आनंद, शरद अशी मुले होती. पुण्यात आल्यावर मुलांना शिक्षणासाठी चांगली शाळा व कॉलेज मिळाले. 1951 साली प्रपंच तर वाढला पण कामे नाहीत अशी स्थिती होती. पण लवकरच पुन्हा लिखाण चालू झाले. महिन्यां मागून महिने, वर्षे जात होती. 1953 साली वाकडेवाडी जवळ स्वतःचे घर घेतले. पु.भा. भावे गदिमांचे जवळचे मित्र होते. दोघांचाही स्नेह कसा होता, याबद्दलही विद्याताईंनी खूप छान प्रसंग वर्णन केले आहेत.गीत रामायणाच्या काळात सर्व परिस्थिती सुधारली. पुस्तक वाचताना आपण त्यात इतके रंगून जातो की तो क्षण ,ते प्रसंग जगत असतो. एका थोर लेखकाच्या पत्नीचे हे आत्मकथन आहे. ते अतिशय साध्या शब्दात पण ओघवते मांडले आहे.गदिमांना भरपूर सन्मान मिळाले आणि कुटुंबाला चांगले दिवस आले.

त्यांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे ज्या पारखे कुटुंबात त्यांची मुलगी दिली होती, त्या कुटुंबातील तिघांचा एक्सीडेंट मध्ये झालेला मृत्यू! गदिमांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता! गदिमांचे एक मोठे ऑपरेशन झाले आणि त्यांचे एक फुफ्फुस काढले होते. 14 डिसेंबर 1977 या दिवशी संध्याकाळी गदिमांचा मृत्यू झाला.

जगाला आनंद देणारा ‘महाराष्ट्राचा वाल्मिकी’ काळाच्या पडद्याआड लोपला होता. आकाशाची जडलेले विद्याताईंचे नाते संपले होते.

विद्याताईचे दुःख खूपच मोठे होते.

मुले, सुना, नातवंडे यांच्या सहवासात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य शांतपणे घालवले.

या पुस्तकात गदिमांच्या आयुष्याचा पूर्ण आलेख उलगडला गेला आहे. विद्याताईंनी सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व आठवणींना एकत्र करून त्यांचे हे आत्मचरित्र शीतलताईंनी 1996 साली आपल्याला वाचनासाठी उपलब्ध करून दिले.. वाचनीय असे हे आत्मचरित्र आहे. गदिमां बद्दल आपल्याला असणारा आदर या पुस्तकाच्या वाचनाने अधिकच वाढतो.

परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #213 ☆ दस्तूर-ए-दुनिया… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख दस्तूर-ए-दुनिया…। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 213 ☆

☆ दस्तूर-ए-दुनिया

‘ता-उम्र किसी ने जीने की वजह न पूछी/ अंतिम दिन पूरा मोहल्ला पूछता है/ मरा कैसे?’ जी हां! यही है दस्तूर-ए-दुनिया और जीवन का कटु सत्य, क्योंकि संसार में सभी संबंध स्वार्थ के हैं। वैसे भी इंसान अपनी खुशी किसी से सांझी नहीं करना चाहता। वह अपने द्वीप में कैद रह कर उन खूबसूरत लम्हों को जी लेना चाहता है। सो! वह आत्मकेंद्रित हो जाता है। परंतु वह अपने दुख दूसरों से बांटना चाहता है, ताकि शह उनकी सहानुभूति बटोर सके। वैसे भी दु:ख बांटने से हल्का हो जाता है। अक्सर लोग गरीब व दुखी लोगों के निकट जाने से कतराते हैं, कहीं उनकी आफत उनके गले का फंदा न बन जाए। वे भयभीत रहते हैं कि कहीं उनकी खुशियों में खलल न पड़ जाए अर्थात् विक्षेप न पड़ जाए। परंतु वे लोग जिन्होंने आजीवन उनका हालचाल नहीं पूछा था, मृत्यु के पश्चात् अर्थात् अंतिम वेला में  वे लोग दुनियादारी के कारण उसका हाल जानना चाहते है।

जीवन एक रंगमंच है, जहाँ इंसान अपना-अपना क़िरदार निभाकर चल देता है। विलियम शेक्सपीयर ने ‘Seven Stages Of Man’ में  मानव की बचपन से लेकर वृद्धावस्था की सातों अवस्थाओं का बखूबी बयान किया है। ‘क्या बताएं लौट कर नौकरी से क्या लाए हैं/ गए थे घर से जवानी लेकर/ लौटकर बुढ़ापा लाए हैं’ में भी उक्त भाव प्रकट होता है। युवावस्था में इंसान आत्म-निर्भर होने के निमित्त नौकरी की तलाश में निकल पड़ता है, ताकि वह अपने परिवार का सहारा बन सके और विवाह-बंधन में बंध सृष्टि-संवर्द्धन में योगदान देकर अपना दायित्व वहन कर सके। सो! वह अपनी संतान की परवरिश में स्वयं को झोंक कर अपने अरमानों का खून कर देता है। उसके आत्मज भी अपनी गृहस्थी बसाते हैं और उससे दूर चले जाते हैं। दो से उन्होंने अपनी जीवन यात्रा प्रारंभ की थी और दो पर आकर यह समाप्त हो जाती है और सृष्टि चक्र निरंतर चलता रहता है।

अक्सर बच्चे माता-पिता के साथ रहना पसंद ही नहीं करते और रहते भी हैं, तो उनमें अजनबीपन का एहसास इस क़दर हावी रहता है कि सब अपने-अपने द्वीप में कैद रहते हैं। वैसे तो आजकल मोबाइल ने सबका साथी बन कर दिलों में दरारें नहीं, दीवारें उत्पन्न कर दी हैं। सो! एक छत के नीचे रहते हुए भी वे एकां त की त्रासदी झेलने को विवश रहते हैं और उनमें संवाद का सिलसिला प्रारंभ ही नहीं हो पाता।  घर के सभी प्राणी मोबाइल में इस प्रकार लिप्त रहते हैं कि वे सब अपना अधिकांश समय मोबाइल के साथ गुज़ारते हैं, क्योंकि गूगल बाबा के पास सभी प्रश्नों के उत्तर व सभी समस्याओं का समाधान उपलब्ध है। आजकल तो लोग प्रतियोगिता परीक्षा की तैयारी भी मोबाइल से करते हैं।

इस प्रकार इंसान आजीवन इतना व्यस्त रहता है कि उसे अपने बारे में सोचने का समय ही नहीं मिलता। परंतु बुढ़ापा एक समस्या है, क्योंकि इस अंतराल में मानव दुनिया के मायाजाल में उलझा रहता है। उसे अपने बारे में सोचने का समय ही नहीं मिलता। परंतु वृद्धावस्था एक समस्या है, क्योंकि इस काल में असंख्य रोग व चिंताएं इंसान को जकड़ लेती हैं और अंत काल में उसे प्रभु को दिए गये अपने वचन की याद आती है कि कब होता है कि मां के गर्भ में उल्टा लटके हुए उसने प्रार्थना की थी कि वह उसका नाम स्मरण करेगा। परंतु जीवन का प्रयोजन कैवल्य प्राप्ति को भूल जाता है। ‘यह किराए का मकान है/ कौन कब तक ठहरेगा। खाली हाथ तू आया है बंदे/ खाली हाथ जाएगा।’ अंतकाल में न संतान साथ देती है, न ही शरीर व मनोमस्तिष्क ही कार्य करते है। वह प्रभु से ग़ुहार लगाता है कि वह उसके सब अवगुण  माफ कर दे और उससे थोड़ी सी मोहलत दे दे। परंतु परिस्थितियों के अनुकूल होते ही वह दुनिया की रंगीनियों व बच्चों की संगति में अपनी सुधबुध खो बैठता है। इसलिए कहा जाता है कि इंसान युवावस्था में नौकरी के लिए निकलता है और वृद्धावस्था में सेवानिवृत्त होकर लौट आता है और शेष जीवन प्रायश्चित करता है कि उसने सारा जीवन व्यर्थ क्यों गंवा दिया है। मुझे स्मरण हो रही हैं स्वरचित  पंक्तियां ‘यह जीवन बड़ा अनमोल बंदे/ राम राम तू बोल’ यही है जीवन का सत्य। लोग बाह्य आंकड़ों में लिप्त रहते हैं तथा दिखावे के लिए परिवारजन भी चार दिन आंसू बहाते हैं, फिर वही ढाक के तीन पात। किसी ने बहुत सुंदर कहा है कि ‘इंसान बिना नहाए दुनिया में आता है और नहा कर चल देता है। लोग श्मशान तक कांधा देते हैं और अग्निदाह कर लौट आते हैं। सो। आगे का सफ़र उसे अकेले ही तय करना पड़ता है।  ‘जप ले हरि का नाम फिर पछताएगा/ जब छूटने लगेंगे प्राण फिर पछताएगा’ तथा ‘एक साचा तेरा नाम’ से भु यही स्पष्ट होता है कि केवल प्रभु नाम ही सत्य हैं और सत्य सदैव मंगलकारी होता है। इसलिए उसका सुंदर होना तो स्वाभाविक है तथा उसे जीवन में धारण करें, क्योंकि वही अंत तक साथ निभाएगा।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print