मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आदरांजली… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आदरांजली… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

चिखलगावच्या चिखलामध्ये

कमल उगवले नितांत सुंदर 

गंगाधरसुत बाळ टिळक हा 

किर्ती जयाची गेली दिगंतर

*

नरशार्दूल तो गर्जून उठला

शासन इंग्रजी थरथरले

 घणाघाती शब्दांच्या मधुनी 

सत्तेला आव्हान दिले

*

स्वराज्य हा तर  हक्कच माझा 

तो मी अवश्य मिळवीन

 खुशाल द्या मज घोर यातना 

मी त्या हासत सोशीन

*

द्रोही ठरवून त्यास धाडिले 

कारागृही मंडालेला

 गीतारहस्य ग्रंथ पूजनीय

 बंदिवान असूनी लिहला

*

लोकमान्य स्पर्शाने अवघी 

भूमि पावन झाली इथे 

त्या लढवय्या वीरापुढती 

मस्तक हे माझे झुकते

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “अप्सरा आssली” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “अप्सरा आsss ली…” ☆ सुश्री शीला पतकी 

सुंदरा कुठे अवतरली मनामध्ये शिरली

 हृदयात कशी पाझरली  जणु मधात ती विरघळली

*

केश कमान झाकती भव्य कपाळ 

त्या कोरीव भुवया तलवारीचा जाळ 

ते शराब डोळे पापण्यांचा पेलती भार

मन पुसे मनास हि कोण असे हो नार

*

ती सरळ नासिका चाफेकळी जणू

 नथनीचा तो भार

 ते अधर मुलायम गर्द गुलाबी

 पाहता होई मग कहर

*

त्या गौर लालसर कानावर

 ती नाजूक कांचन वेल

 कानाचा पाळीत झोके घेती

 ते रत्नजडित ग फुल

 घालती भूल

 सखे ग मजला

*

ती उंच मान कमनीय जणू

 डोकावून शोधते नजर

 ते गाल गुलाबी  रंग केतकी

  त्या बटा वदन पहारेदार

*

ते उरोज चोळीस करिती तंग 

पाहता झालो मी दंग 

ती कमर कमनीय सुडोल बांधा

आव्हान देई मज उघडा खांदा

*

ते नाजूक करकमल

 मेहंदीचा हात नक्षीदार

 ते कांकण किण किण 

कानास नाद सुमधुर

*

ती पाऊले देखणी 

रंगली लाल अळत्यात 

ते पैंजण नाजूक करती नाद तो खुळा

 जीव हा झाला हो बावळा

*

ती किंचित वळली हृदयाचा चुकला ठोका 

तो काळा केशसंभार आहा मोकळा

 मी गुरफटलो बांधलो केशकलपात  

 हरवलो तिच्या डोळ्यात अडकलो पुरता

*

ती रंभा उर्वशी कोण आप्सरा 

मजसाठी धरेवर आली अन्

सवे तिच्या हो मलाच घेऊन गेली

*

 मी जागा झालो स्वप्न भंगले 

डोळ्यावर झापडं  होती

 कुठे उर्वशी कुठे न रंभा 

ती भार्या उठवीत होती

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल, तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘ते निर्विघ्नपणे पार पडेल ना?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला. मग पूर्ण प्रवासात ते कसं साध्य करायचं याच्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅण्ड कधी आलं ते समजलंच नाही. सगळं सामान एका हातात कसंबसं घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी धरलेली छत्री सावरत मी बसच्या पायऱ्या उतरु लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो. कारण समोर माझ्या स्वागताला विकट हास्य केल्यागत प्रपातासारखा कोसळणारा अखंड पाऊस माझी वाट अडवून ओसंडत होता! माझ्याइतकीच हतबल झालेली हातातली छत्री न् सामान जमेल तसं सावरत मी त्या भयावह, धुवांधार प्रपाताला सामोरं गेलो ते मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरूनच!)

बसमधून उतरून धावत स्टॅंडवर  आत आडोशाला जाऊन थांबेपर्यंतच मी चिंब भिजून गेलो होतो.त्याच अवस्थेत हात करुन टॅक्सी बोलावली.आधी मेन रोडवरचं जवळचं लाॅज गाठलं आणि मग पुढचे सगळे सोपस्कार!

आयुष्यातलं माझं हे पहिलंच ‘महाबळेश्वरदर्शन’! पण ते स्वप्नवत वगैरे नव्हे तर असं भयावह होतं!!तिथं बऱ्यापैकी सावरण्यातच पहिले दहा दिवस सरले ते पावलोपावली येणाऱ्या नित्यनव्या तडजोडी नाईलाजाने जमेल तितक्या अंगी मुरवतच. त्याही परिस्थितीत मी बऱ्यापैकी सावरु शकलो ते ब्रॅंचजवळच पाहिलेली दोन रुम्सची तात्पुरती छोटीशी भाड्याची जागा,घरगुती जेवणाची सोय आणि ब्रॅंचमधले माझे चांगले सहकारी यामुळेच!

रिपोर्टींगच्या पहिल्याच दिवशी श्री.रांजणे,आमचे हेडकॅशिअर यांनी आपुलकीने मला दिलेल्या आग्रहपूर्वक सल्ल्यामुळे त्यांनाच सोबत घेऊन मी आधी जवळच्याच दुकानातून रेनकोट,फुल स्वेटर आणि गमबूट यांची तातडीने खरेदी केली.या वस्तू ही तिथली दोन वेळच्या जेवणाइतकीच जीवनावश्यक गरज होती याबाबत तोवर मी अनभिज्ञच होतो.त्या नव्या पेहरावात मी प्रथम आरशात पाहिलं तेव्हा मी स्वत:लाच ओळखता न येण्याइतका  कुणीतरी ति-हाईतच वाटलो होतो!

या जीवननाट्यातल्या माझ्या या नव्या भूमिकेचा सराव माझ्यासाठी खूप त्रासदायकच नाही तर आव्हानात्मकही  होता.प्रतिकूल परिस्थितीतल्या अखंड व्यवधानांमुळे माझा होम सिकनेस मलूल होऊन मनातल्या एका कोपऱ्यात मान वर न करता पडून असायचा.घरगुती जेवणाची सोय घरापासून एरवी पाच मिनिटं चालत जाता येईल एवढ्याच अंतरावर.त्या काकूही स्वैपाक सुग्रास करायच्या,आग्रहानं वाढायच्या, पण कडकडीत भूक लागलेली असूनही घराबाहेर पडायलाच नको असं वाटायचं. कारण गमबूटाचं ओझं घेऊन छत्री सावरत चालताना भर दिवसाही पावसाच्या प्रचंड संततधारेत समोरचं कणभरही दिसायचं नाही.दोन वेळचं जेवण हे या अर्थानेही यज्ञकर्मच वाटायचं.थकून भागून रात्री अंथरुणावर पाठ टेकली की पहिला विचार यायचा तो जुलै महिन्याची पौर्णिमा जवळ येत असल्याचाच.अर्थात बदलीनंतर तिथं रिपोर्ट केल्यानंतर आम्हाला आठवडाभराची ट्रान्झिटलिव्ह मिळायची. कोल्हापूर रिजनल आॅफिसकडून पौर्णिमेच्या दरम्यानची आठ दिवसांची ती रजा मी नुकतीच मंजूरही करुन घेतली होती. त्यामुळे चारसहा दिवसांच्या घरपणाबरोबरच या पौर्णिमेचं नृ.वाडीचं दत्तदर्शनही विनाविघ्न होणार होतं हे खरं,पण त्यानंतरचं काय हा प्रश्न होताच. सगळंच अस्थिर, अशुध्द न् अवघडच वाटत राहिलं. महाबळेश्वरपासून  नृ.वाडीपर्यंत जातायेता पंधरा तास जर लागणार असतील तर पौर्णिमेला जायचा अट्टाहास चालणार कसा? प्रत्येक पोर्णिमा काही रविवारीच नसणाराय.नसू दे. कांही झालं तरी यात खंड पडू द्यायचा नाही हे पक्कं ठरवूनच टाकलं. मग ते कसं जमवायचं याचे विचार सुरू झाले. त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं हा निर्धार पक्का झाला. त्यासाठी वर्षातल्या बारा कॅज्युअल लिव्हज् दर पौर्णिमेसाठीच राखून ठेवायच्या हे ठरलं.पण इथला हा धुवांधार पाऊस आणि नंतर लगेचच येणाऱ्या हिवाळ्यातली कडक थंडी यांचं काय ? तब्येत बिघडली,आजारपण आलं,ते रेंगाळलं तर? हा विचार मनात येताक्षणीच झटकून टाकला.’आपण कांहीही झालं तरी आजारी पडून रजा फुकट घालवायची नाही’ हे मनाला बजावून सांगितलं. प्रश्न मलाच पडत होते आणि त्याची अशी ठाम उत्तरंही मीच मला देत होतो.पण तरीही  ‘दत्तमहाराज आपल्या श्रद्धेची कसोटी पहातात’ असं आईबाबा नेहमी म्हणायचे ती ‘कसोटी’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय मलाही येणार होताच. त्याला खऱ्या अर्थाने निमित्त ठरलं ते माझं हे महाबळेश्वरचं पोस्टींगच. कारण महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटतं रहायचं.कारण छत्री, रेनकोट, गमबूट हे सगळं असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅन्ड गाठेपर्यंतही मी चिंब भिजृन जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले  तरी नृ.वाडीला पोचल्यानंतरही त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचाच.

या सगळ्या कसोट्या पार करीत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरु राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्यावेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ’ वासून उभे राहायचे…!!

क्रमश:.. (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गजु ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ गजु ☆ श्री सुनील शिरवाडकर

आठ दहा वर्षाचा गजु.. आमच्या शेजारीच रहायचा. एकदा तो त्याच्या बाबांच्या मागेच लागला. मला पण तुमच्या बरोबर यायचं.. दुकानात.. मी त्रास नाही देणार.. नुसता बसुन राहीन.

गजुचे बाबा एका चहाच्या दुकानात काम करायचे. चहाच्या दुकानात म्हणजे चहा पावडर विकणाऱ्या दुकानात. तेथे ते सेल्समन होते. ते घरी आले तरी त्यांच्या शर्टला चहाचा वास यायचा. गजुला तो वास खुप आवडायचा.

तो वासच आवडायचा असं नाही, तर गजुला बाबांचा तो शर्ट पण आवडायचा. जाड पिवळ्या कापडाचा तो शर्ट.. खिशावर त्या दुकानाचा लोगो. एकदा तर गजुने घरात कुणी नसताना तो शर्ट घालुनही पाहीला होता.

खुपच मागे लागल्याने बाबांनी ठरवलं.. आज गजुला दुकानात घेऊन जायचं. तसं दुकान जवळच होतं. दुपारी त्याचे बाबा जेवायला घरीच यायचे. बाबांनी खुप सगळ्या सूचना केल्या. हे बघ.. दुपारी दोन पर्यंत  तुला दुकानात थांबावं लागेल.. माझ्या बाजुला शांतपणे बसायचं.. इकडे तिकडे हात लावायचा नाही.

गजुने मान डोलावली. बाबांसोबत तो दुकानात आला. दुकानाची साफसफाई झाली. बाबांनी काऊंटरवरून फडकं फिरवलं. उदबत्ती लावली. बाजुच्या खुर्चीत कॅशियर बसला. काऊंटरच्या आत एक स्टुल होता. गजु त्याच्यावर उभा राहिला.

तेवढ्यात एक गिऱ्हाईक आलं. त्यांना अर्धा किलो चहा हवा होता. काऊंटरच्या खाली तीन चार ड्रॉवर्स होते. त्यात वेगवेगळी चहा पत्ती होती. दार्जिलींग.. ममरी.. अशी नावे त्यावर लिहीलेली होती. बाबांनी या ड्रॉवर मधून थोडी.. त्या ड्रॉवर मधुन थोडी अशी चहा पत्ती घेतली.. स्टीलच्या डावाने हलवली. सगळं मिश्रण छान एकत्र झालं.

दुकानचं नाव असलेली एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली. त्यात एक स्टीलचा चकचकीत शिबलं ठेवलं. वरुन ती चहाची पावडर ओतली.. स्टेपलरनी दोन पिना मारल्या.. कस्टमरच्या हातात दिली. पैसै देऊन तो माणूस निघुन गेला.

गजु हे सगळं बघत होता. त्याला हे सगळं खुपचं आवडलं. दोन तीन तास तो दुकानात बसला.. अगदी शहाण्या मुलासारखा.. चहाच्या त्या मंद सुगंधानी त्याचं मन वेडावलं.

गजुचं चहाचं वेड अजुनच वाढलं. मी मोठा झाल्यावर चहावाला होणार असं तो आता सांगु लागला. त्याच्या वयाच्या मुलानी असं भविष्य रंगवणं चुकीचंच होतं. त्याचे आईबाबा पण त्याला ओरडायचे. चांगलं शिकुन मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची.. तर हा असं काय बडबडतोय म्हणून वेड्यात काढायचे.

अशीही काही वर्ष गेली. आम्हीही ती जागा सोडली. कधीमधी ऐकु यायचं.. गजु कॉलेज मध्ये जाऊ लागला. त्याच्या डोक्यात असलेलं ते चहावाल्याचं वेड आता कदाचित निघुन गेलं असावं.. मी ही त्याला.. त्याच्या फॅमिलीला विसरून गेलो.

आणि अचानक एक दिवस गजु दिसला. इतक्या वर्षांनंतर पण मी त्याला ओळखलं.

झालं काय.. एका रविवारी मी एका मित्राच्या दुकानात बसलो होतो. अधुनमधुन आम्ही मित्र जमायचो तेथे. मित्रानी फोनवरून चहा सांगितला. थोड्या वेळाने चहावाला आला.. हो तो चहावाला म्हणजे गजुच होता.

दोन्ही गुडघ्यावर फाटलेली विटकी जीन.. पिवळा धमक घट्ट टी शर्ट.. केस तेल लावून चापुन चोपुन बसवलेले.. आणि तोंडांत गुटखा. त्याच्या एका हातात काळा थर्मास होता. दुसर्या हातात पेपर ग्लास.

दुकानाच्या पायरीवर त्याने थर्मास ठेवला. एक कागदी कप घेतला.. तो थर्मासच्या कॉकखाली धरला. दुसर्या हाताने त्याने थर्मासचं झाकण दाबलं. चहाची बारीक धार कपमध्ये आली. कप भरला.. त्याने माझ्यापुढे धरला.

क्षणभर आमची नजरानजर झाली.. त्याने ओळखलं की नाही.. माहीत नाही.. पण मी एका नजरेत ओळखलं.. हा गजुच.. आपल्या शेजारचा गजु.. चहावाला गजु.

मग मी एकदा मुद्दाम गजुचा शोध घेतला. जवळच्याच एका चौकात त्याची चहाची गाडी आहे असं समजलं. मी तिथं गेलो तेव्हा गजु नव्हता. थर्मास घेऊन तिथेच कुठे आजूबाजूला गेला होता. गाडीपाशी त्याचे वडील होते. इतक्या वर्षांनंतर सुध्दा मी त्यांना ओळखलं. ती अगदी टिपीकल चहाची गाडी होती. गॅसवर दोन पितळी पातेली होती. एकात दुध होतं.. दुसऱ्या पातेल्यात चहा उकळत होता. गजुचे वडील एका डावानं तो हलवत होते.. गाडीवर चहा साखरेचे डबे होते.. स्टीलच्या पिंपात पाणी होतं.. प्लास्टिकचा जग होता.. ॲल्युमिनियमची किटली होती.. ओलं फडकं होतं.. ट्रे मध्ये काचेचे पाच सहा ग्लास होते..

तेवढ्यात घाईघाईने गजु आला. त्याचे वडील बाजूला झाले. एक छोटा पितळी खलबत्ता होता.. गजुने त्यात आल्याचे दोन तुकडे टाकले. बत्त्याने ठेचले.. दोन बोटाने तो आल्याचा चोथा पातेल्यात टाकला. किटलीचं झाकण उघडलं. चहा गाळण्यासाठी एक पातळ फडकं होतं. ते किटलीवर ठेवलं. पातेल्यातला चहा किटलीत गाळला.. झाकण लावलं.

चहाच्या त्या नुसत्या सुगंधानेच मला तरतरी आली. मी यायच्या आधीपासून कुणीतरी गिर्हाईक चहाचं पार्सल घ्यायला आलं होतं. गजुनं विचारलं.. किती चहा हवेत. मग मागच्या खिशातुन प्लास्टिकची छोटी पिशवी काढली. किटलीतुन त्यात अंदाजाने चहा ओतला.. पिशवीला गाठ मारली.. ते गिर्हाईक पैसे देऊन निघुन गेलं.

मी पण एक चहा सांगितला. त्यानं एका कागदी कपात तो मला दिला. मी मागच्या एका खुर्चीत जाऊन बसलो. त्याचे वडीलही तेथेच बसले होते. मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.. जुनी ओळख दिली.

ते जरा संकोचले.. पण मग मोकळे होऊन बोलायला लागले.

“गजु दहावी झाला.. कॉलेज मध्ये पण गेला.. पण त्याला अभ्यास झेपला नाही. दोन तीन वर्ष कशीबशी काढली.. मग शिक्षणाला रामराम ठोकला. वर्ष दोन वर्ष अशीच कुठे कुठे नोकरी केली. “

मग ही गाडी कधी सुरु केली? डोक्यात कसं आलं.. हा व्यवसाय करायचं?”

गजुचे वडील म्हणाले..

“मी रिटायर्ड झालो.. आमच्या मालकांनीच सुचवलं हे.. थोडेफार पैसे मिळाले होते.. मग सुरु केली चहाची गाडी.. तसं गजुलाही वेड होतंच चहाचं.. “

एकंदरीत मला ते समाधानी वाटले. गजुनं मेहनतीनं.. गोड बोलण्यानं‌. ‌आणि मुख्य म्हणजे चहाच्या उत्तम दर्जानं व्यवसाय चांगलाच वाढवला होता. त्याची व्यवसायाबद्दलची निष्ठा बघत होतो.. त्याची धावपळ बघत होतो. नकळत माझ्या डोळ्यासमोर जुनं दृश्य आलं.. त्याचे वडील वजन काट्यातील चहा डावाने एकत्र करत आहे.. प्लास्टिकच्या पिशवीत ओतत आहेत.. आज गजुही तेच करत होता.. पितळी पातेल्यात उकळणारा चहा डावाने हलवत होता.. किटलीतुन कॅरीबॅगमध्ये ओतत होता..

पण तरीही एक मोठ्ठा फरक होता.. त्याचे वडील नोकरी करत होते.. गजु आज मालक होता.. आपला स्वतःचा व्यवसाय असणं किती अभिमानाचीच गोष्ट असते ना.. आणि तेच सुख.. तेच समाधान दोघा बापलेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते..

मला ते पाहुन व. पुं. चे वाक्य आठवले..

‘पार्टनर’ मध्ये व. पु. म्हणतात..

मालकी हक्काची भावना हेच खरे सुख.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार.” एक 27-28 वर्षाची नवविवाहित तरुणी मला स्पष्टपणे म्हणाली. तशी ती कूल होती, नम्रही होती पण ठाम होती.

मी म्हंटल, “नको करू.तुझी इच्छा.पण सगळे हौशीने करायला तयार आहेत, तर तुला का नाही करायची मंगळागौर??”

त्यावर ती उस्फुर्तपणे म्हणाली, “मला ना हे सगळं Illogical आणि Wastage of time वाटतं.”

“तू करूच नको मंगळागौर.पण मंगळागौर म्हणजे नक्की काय, त्यात काय-काय करतात, माहिती आहे का तुला ?” मी तिला विचारलं.

“नाही हो.मंगळागौर म्हणजे दिवसभर पुजा करतात एवढंच माहीत आहे.”

“अगं, दिवसभर कसं कोणी ‘फक्त पुजा’ करेल? ” मी तिला हसतहसत विचारलं.

ऐक, मी सांगते तुला,

“मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची पुजा.नवीन लग्न झालेल्या मुली, श्रावणतल्या मंगळवारी ही पुजा करतात.तसा हा सोहळा संपूर्ण दिवसभर असतो. पण पुजा फक्त एकदीड तास.फार फार तर दोन तास.

पुढे दिवसभर गप्पा-गोष्टी, खाणेपिणे, नाचगाणे आणि खेळही असतात.मंगळागौरीसाठी माहेरची माणसं येतात, तसेच तुझ्या सासरचे नातेवाईक पण येतात .सगळे दिवसभर एकत्र राहिले की आपोआप नवीन ओळखी होतात, सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. आणि नकळत आपल्यातलं बॉण्डिंग वाढत.

तुझ्यासोबत पुजा करायला आणखीन 5 मुली येतात. त्यांचं लग्न सुद्धा अलीकडेच झालेलं असतं. त्या निमित्याने तुझ्याच वयाचं एक friend circle आपसूकच तुला मिळतं . सगळ्यांचे वय सारखे म्हणजे तुमचे बोलायचे विषय सारखे आणि प्रश्नही सारखेच. तेव्हा मैत्री व्हायलाही सोप्प जातं आणि Wave length पण पटकन जुळते.नाही का?

नवी नवरी दुसऱ्या गावावरून आलेली असते, तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी मिळाव्यात, सुख दुःखाच्या चार गोष्टी बोलायला कोणी असावं, ह्यासाठीच तर ह्या मुली बोलावतात..

संध्याकाळी हळदीकुंकू करतात , त्यात शेजारीपाजारी, इतर ओळखीचे लोक आपण बोलावतो. आपले स्नेही,शेजारी ह्या सगळ्यांची तुला माहिती व्हावी. ह्यासाठी हा सगळा खटाटोप…

थोडक्यात सांगू का, मंगळागौर म्हणजे नव्या नवरीसाठी एक Induction Program च असतो बघ.. 

आणखीन एक गम्मत आहे.मंगळगौरीच्या जेवणाच्या मेनूची.सकाळी पुरणपोळी, कटाची आमटी,चटणी, कोशिंबीर. Full protein rich आणि फायबरयुक्त जेवण.

रात्रीच जेवण तर आणखीन भारी..

भाजणीचे वडे.जे बाजरीचे आणि ज्वारीचे असतात.अगं, Gluten free.ते सगळं भाजलेले असतं म्हणजे पून्हा पंचायला हलकं. सोबत मटकीची उसळ.ऊसळी, कडधान्य म्हणजे प्रोटीन आलंच की.

आणखीन जेवणात असतं ते टोमॅटो सार. श्रावण महिना म्हणजे पावसाळाच.त्या थंड वातावरणात गरमागरम,आंबटगोड टोमॅटो सॉस.. 

आणखीन एक शेवटचं, पण महत्वाचं.. कोणीतरी खूपच Health Conscious, Calorie मोजून जेवणारे किंवा daily gym hit करणारे असतील तर त्यांना सुद्धा Workout आहे..संध्याकाळी जे मंगळागौर खेळ असतात ना ते मस्त Physical Exercise आहेत. सोबत मजबूत Calories burn करणारे आहेत.”

“उत्तम आरोग्य हाच खरा दागिना.” असं म्हणणाऱ्या आपल्या जुन्या लोकांना, “मनातल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आपलं हक्काचं माणूस लागतं ” हेही चांगलं माहिती होतं.

केवळ Mental piece, stress buster, healthy lifestyle अशा चकचकित टर्म त्यांनी वापरल्या नाहीत म्हणून ते direct Illogical होतात का ?”

सगळं ऐकून झाल्यावर तिला मंगळागौर चांगलीच समजली होती,उमजली पण होती..

तिने मंगळागौर बुक केली.

जाता जाता मला म्हणाली, ” तुम्ही management चा अभ्यास केला का हो? “

छानसं हसून मी तिला उत्तर दिलं,”मी आपल्या पारंपरिक सणांचा अभ्यास केला.. “

लेखिका : सुश्री  दीपा देशपांडे कस्तुरे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

 

 ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

मांडी घालून जेवतांना अजब टेकू –…!!

भारतात पूर्वींपासून चालत आलेल्या भोजन पद्धती आणि जेवणासाठी वापरली जाणारी  वैशिष्ट्यपूर्ण भांडी, स्वयंपाकघरातील वेगळ्या वस्तू आणि अनेक प्रथा, आताशा लुप्त होत चालल्या आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार ..!! म्हणूनच आपण तिला ‘भारतीय बैठक’ म्हणतो ..!! 

मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे, दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी,गुडघ्यातील वेदना, ‘नी रिप्लेसमेंट’ असल्या  गोष्टी लांब राहत असत. कांही अपवाद वगळता भोजनासाठी, न्याहारीसाठी जमिनीवर, पाटावर,आसनावर बसण्याची पद्धत होती ..!! 

खरेतर, माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते ..!! 

मांडी घालून बसल्यावर,अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या  अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ‘ढिंचणिया’ म्हणजे ढोपर टेकू ..!! 

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्ही गुढघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्त वेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. अशा अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ‘ढिंचणिया’ ..!! हा एक ढिंचणिया साधारणत: डमरूसारखा, ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे ..!! मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे पितळ आणि कांशापासून बनविले जात असत. तत्कालीन कारागिर त्यावर खूप चांगली नक्षी कोरत असत. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे  ढिंचणिया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले  ढिंचणिया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात (विशेषतः सौराष्ट्र) आणि राजस्थान ह्या भागांमध्ये हे ढिंचणिया वापरले जात असत ..!! अगदी खेडेगावात जेथे ढिंचणिया उपलब्ध नसतील तेथे, एखादा धातूचा डबा, लाकडी ठोकळा, कापडाचा बोळा अशा वस्तूही वापरल्या जात असत ..!!  

आपण एक हस्तटेकूही पहिला असेल. आसनावर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. ह्याच्या आत स्व-संरक्षणासाठी शस्त्रही लपविले जात असे ..!! 

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही ‘मॉडर्न’ होत चालली आहेत. आता या ढिंचणियांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही होत आहेत ..!!  अजून निदान त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या ‘अज्ञात वस्तू’ म्हणून तेथे शिल्लक राहतील ..!! 

लेखक : मकरंद करंदीकर 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? इंद्रधनुष्य ?

☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

श्रावण जवळ येत आहे , शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते, अनेकांना माहितीही नाही हे काय असते, त्यासाठी हा प्रपंच। 

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगततेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती.

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा…

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

म्हणजेच…

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच…

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका –

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती –

बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …म्हणजेच जिवती पुजन.  

तुम्हाला पूजण्याची ईच्छा असेल पण बाजारात जीवतीचा कागद मिळत नसेल तर याचाच प्रिंटआउट घ्या पूजन करा, गंध-पुष्प-धूप-दीप- दुधसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दुधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा (श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे, श्रावणा नंतर मुलांना दिसता कामा नये).

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधी माणूस म्हणून जगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

आधी माणूस म्हणून जगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटू अबेल मुताई ऑलम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंडमध्ये धावताना अंतिम रेषेपासून फक्त काही मीटर दूर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते.सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते.सर्व प्रेक्षक त्याच्या नावाचा जल्लोष करीत होते.एवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मीटर आधीच थांबला.

त्याच्या मागून येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्यामुळे तो थांबला आहे.त्याने ओरडून अबेलला पुढे जाण्यास सांगितले. पण अबेलला स्पॅनिश समजलं नसल्याने तो जागचा हलला नाही. शेवटी इव्हानने त्याला ढकलून अंतिम रेषेपर्यंत पोहचविले.त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.

पत्रकारांनी इव्हानला विचारले, ” तू असे का केलेस? तुला संधी असताना तू पहिला क्रमांक का घालवलास?”

“इव्हानने सांगितले- माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू,जी एकमेकांना मदत करेल आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.”

रिपोर्टर पुन्हा म्हणाला, “पण तु केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलेस?”

यावर इव्हान म्हणाला,”तो पहिला आलेलाच होता. ही रेस त्याचीच होती!”

रिपोर्टर पुन्हा म्हणाला,”तरी पण….”

 “त्या जिंकण्याला काय अर्थ होता?माझ्या मेडलला मान मिळाला नसता!माझी आई काय म्हणाली असती? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे जात असतात.मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते?दुसऱ्याच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईने दिली आहे.”

धन्य ती माऊली आणि धन्य ते लेकरु!

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एक… काव्ये दोन – (1) पाऊस तो आला आला – सौ. गौरी गाडेकर (2) नज़र – श्री प्रमोद वामन वर्तक ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ चित्र एक… काव्ये दोन – (1) पाऊस तो आला आला – सौ. गौरी गाडेकर (2) नज़र – श्री प्रमोद वामन वर्तक

सौ. गौरी गाडेकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ (1) पाऊस तो आला आला – सौ. गौरी गाडेकर
 

पाऊस तो आला आला 

मला भेटण्याला 

*

बालपणी केली मस्ती 

तारुण्यात झाली दोस्ती 

प्रौढपणी पाऊस येता 

मोद येई उधाणाला 

*

आता मात्र मी जर्जर 

खिळलेले बाजेवर

पावसाचे फोटो बघुनी 

शांतवते मी मनाला 

*

आणि आज अक्रीत घडले

 गवाक्षही   सुखावले 

स्वतः बालमित्र आला 

स्नेहभेट घ्यावयाला 

*

पाऊस तो आला आला 

मला भेटण्याला ……… 

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104. फोन नं. 9820206306

☆ ☆ ☆ ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ☆ (2) नज़र – श्री प्रमोद वामन वर्तक  ☆

डोळे रोखून मजवर 

काल पावसाने पहिले 

अंग अंग माझे सारे 

त्या नजरेने शहारले

*

भाव पाहून नयनातले 

थांग तयांचा लागेना 

काय भरला अर्थ त्यात 

मज काही उमगेना

*

दिली नजर नजरेला 

धीर करून एकदाचा 

हळूच उलगडला अर्थ 

डबडबलेल्या डोळ्यांचा

*

“आयुष्य जरी क्षणिक

खंत ना कसली मनी

फुलवून साऱ्या चरचरा

होतो समाधानाचा धनी

होतो समाधानाचा धनी'”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #241 – कविता – ☆ मछलियों को तैरना सिखला रहे हैं… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता मछलियों को तैरना सिखला रहे हैं…” ।)

☆ तन्मय साहित्य  #241 ☆

☆ मछलियों को तैरना सिखला रहे हैं… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

आजकल वे सेमिनारों में, हुनर दिखला रहे हैं

मछलियों को कायदे से, तैरना सिखला रहे हैं।

 

अकर्मण्य उछाल भरते मेंढकों से

जम्प कैसे लें इसे सब जान लें

और कछुओं से रहे अंतर्मुखी तो

आहटें खतरों की, तब पहचान ले,

मगरमच्छ नृशंस, लक्षित प्राणियों को मार कर

हर्षित हृदय से निडर हो, जो खा रहे हैं

मछलियों को कायदे से तैरना सिखला रहे हैं।

 

वे सतह पर, अंगवश्त्रों से सुसज्जित

किंतु गहरे में, रहे बिन आवरण है

वे बगूलों से, सफेदी में छिपाए 

कालिखें-कल्मष, कुटेवी आचरण है,

साधनों के बीच में, लेकर हिलोरें झूमते वे

 साधना औ” सादगी के भक्ति गान सुना रहे हैं

मछलियों को कायदे से तैरना सिखला रहे हैं।

 

कर रहे हैं मंत्रणा, मक्कार मिलकर

हवा-पानी पेड़-पौधे, खेत फसलें

हो नियंत्रण में सभी, उनके रहम पर

बेबसी लाचारियों से, ग्रसित नस्लें,

योजनाएँ योजनों है दूर, अंतिम आदमी से

चोर अब आयोजनों में नीति शास्त्र पढ़ा रहे हैं

मछलियों को कायदे से तैरना सिखला रहे हैं।

 

ये करोड़ीमल कथित सेवक

बिना ही बीज के पनपे कहाँ से

दाँव पर है देश की जनता

शकुनि से रोज चलते कुटिल पाँसे,

मिटाने रेखा गरीबी की, अमीरी के सपन

ये कागजी आयोग अंकों से हमें बहला रहे हैं।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares