☆ व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
(नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त)
महर्षी व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे
नाना कथा रुपे भारती
प्रकटली असे त्रिजगती
आविष्करौनी महामती
व्यासाचिये
म्हणूनच आपण सगळे रोज त्यांना प्रातःवंदना देताना म्हणतो
अश्वत्थामा बलिर्व्यासो
हनुमानश्च बिभीषण:
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरंजीविन:
सप्तैतान् स्मरेनित्यम्
सर्वव्याधिविवर्जितम्
या सात चिरंजीवांचे स्मरण जो करेल तो निरोगी असेल. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात “महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरुमणी आहेत”. त्यांनी भरपूर ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे मूळ नाव द्वैपायन .वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेद व्यास असे म्हणतात. पूर्वी एकच वेद होता. पण तो मोठा असल्यामुळे लोक वाचू शकत नव्हते. त्यातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे या तळमळीने व्यासांनी त्याचे चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद. एके दिवशी नैमिषारण्यात निमंत्रितांसाठी धर्मसभा भरली. धौम्य ऋषी म्हणाले, वेदांचा अमूल्य ज्ञाननिधी आता सुरक्षित झाला. द्वैपायनाच्या या कार्याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक गौरव करतो. आणि आजपासून त्याला या युगाचा व्यास निर्धारित करतो. त्याचप्रमाणे ज्या पीठावरून त्याने सर्वांच्या शंकांचं समाधान केलं ते पीठ यापुढे “व्यासपीठ” म्हणून संबोधित करण्यात येईल. यापुढे महत्त्वाच्या सभांमध्ये देखील ज्ञानी वक्त्यांसाठी किंवा पारंपारिक विषयांच्या सभांमध्ये निर्माण केलेल्या पीठालाही व्यासपीठ हीच अधिकृत संज्ञा असेल. सामान्य विषयांच्या चर्चेसाठी उपयोगात आणले जाणारे पीठ मंच असतील. (उदाहरणार्थ, राजकीय मंच, काव्य मंच वगैरे ).आणि अभिनयासाठी असलेले ते रंगमंच. अशा भिन्नपीठांसाठी विविध संज्ञांचा प्रयोग करावा. ब्रम्हर्षी वशिष्ठ हे व्यासांचे पणजोबा. त्यांनी आपल्या पणतवाला हृदयाशी कवटाळले. आनंदाश्रूंचा अभिषेक केला. त्यांच्या खांद्यावर व्यासपदाचा सन्मान असलेलं वस्त्र पांघरले. द्वैपायन आता व्यास झाले. हा अनुपम सोहळा अनुभवताना सारे सभागृह आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. ते मूळ व्यासपीठ म्हणजेच व्यास गद्दी नैमिषारण्यात अजूनही सुस्थितीत आहे.
पण वेदातील तत्त्वज्ञान सुद्धा लोकांना समजेना. अशा लोकांसाठी त्यांनी पुराणे लिहिली. सर्वांना कथा आवडतात .पुराणांमध्ये विश्वातल्या प्रत्येक विषयावर त्यांनी लिहिलं. त्यांनी अठरा पुराणे रचली. उपनिषदे लिहिली.
परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्
अष्टादश पुराणानि व्यासस्य वचन द्वयं
त्यानंतर त्यांनी महाभारत रचले. त्यावेळी त्यांनी 18 पर्व आणि 18 अध्याय यांचा प्रयोग केला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युद्धाच्या वेळी 18 औक्षहिणी सैन्य होते .दोन्ही बाजूंनी फक्त अठरा महारथी होते. जेव्हा महाभारत युद्ध संपले त्यावेळी सर्व लोक मारले गेले .फक्त 18 लोक शिल्लक होते. गीतेचे अध्याय देखील अठराच आहेत. महाभारताला पाचवा वेद असेही म्हणतात.
आपला अंध पुत्र धृतराष्ट्र याला महाभारत युद्ध पाहता यावे म्हणून संजयला दिव्यदृष्टी देऊन महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद ऐकवला. तीच भगवद्गीता. विश्व साहित्यात तिचे निर्विवाद उच्च स्थान आहे. गीतेचा पाठ करण्यापूर्वी खालील श्लोक म्हणतात
ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता
नारायणेन स्वयम्,|
व्यासेन प्रथितां पुराणमुनिना
मध्ये महाभारतम् ||
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्
अष्टादशाध्यायिनीम्ब|
त्वामनुसंदधामी भगवद्गीते
भगवद्वेषिणीम्||
याचा अर्थ:- भगवान नारायणांनी स्वतः पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगितली होती आणि जी महाभारतात प्राचीन ऋषी व्यासांनी रचली होती, हे देवी माते, पुनर्जन्माचा नाश करणारी ,अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी आणि अठरा प्रवचनांनी युक्त अशा या गीतामाते,मी तुझ्यावर ध्यान करतो. आणि त्यानंतर महर्षी व्यासांना नमस्कार करण्यासाठी खालील श्लोक म्हणायचा असतो.
नमोस्तुते व्यास विशालबुद्धे
फुल्लारवींदयातपत्रनेत्र
येन त्वया भारतातैलपूर्ण:
प्रज्वलितो जनमय: प्रदीप:
याचा अर्थ :- हे व्यास, व्यापक बुद्धीच्या आणि फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या डोळ्यांनी ज्यांच्या हातून महाभारताच्या तेलाने भरलेला ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला आहे अशा तुला नमस्कार असो.
“व्यासो$च्छिस्टं जगत्सर्वम्” असे म्हणतात. व्यासांना सर्व विषयांचे ज्ञान होते. संपूर्ण जगात एकही गोष्ट अशी नाही की जिला व्यासांनी स्पर्श केलेला नाही. ते अलौकिक मानसशास्त्रज्ञ होते.
अखेर ते थकले. त्यांना मुक्त व्हावे असे वाटू लागले. ते गंगेच्या तिरावर आले. त्यांचे गुरु देवर्षी नारद मुनी त्यांना भेटायला आले. ते म्हणाले ,”मी भगवंताचा निरोप सांगण्यासाठी आलो आहे. तुमची स्थिती भगवंतांनी ओळखली. आता त्यांचा निरोप आहे. जोपर्यंत भगवंत आज्ञा देत नाहीत तोपर्यंत आपण पृथ्वीवरच राहावं.” महर्षी व्यास मनापासून हसले. ते म्हणाले, भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य. मी इथेच राहीन. माझं एकच ध्येय आहे, लोककल्याण आणि भगवंतांचं सतत नामस्मरण.
अचतुर्वदनो ब्रह्मा,द्विबाहूरपरो हरि:,
अभाललोचन: शंभुर्भगवान् बादरायण:
त्यांना चार मुखे नाहीत पण ते ब्रह्मा आहेत. दोन बाहू असले तरी हरी आहेत. कपाळावर तिसरा डोळा नाही पण शंकर आहेत. असे हे बादरायण आहेत. अशा या वंदनीय महर्षी व्यासमुनी यांना कोटी कोटी नमन.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(आजची कथा सुश्री हर्षदा बोरकर यांची आहे. त्या लेखिका, नृत्य-नाट्य दिग्दर्शिका कीर्तनकार, समाजसेविका आहेत.)
जीवनरंग
☆ ‘‘आयडेंटिटी ‘…’ ☆ सुश्री हर्षदा बोरकर ☆
पुस्तक : गुंफियेला शेला – कथा ४: आयडेंटिटी – सुश्री हर्षदा बोरकर
“आयडेंटिटी कार्ड प्लिज!?”
एअरपोर्टवरच्या बोर्डिंगपास देणाऱ्या कर्मचाऱ्यानी मागणी करताच हातात तयारच ठेवलेलं आयकार्ड नीट निरखून,हसून स्टेलानं पुढे केलं. तपासणी प्रक्रिया पूर्ण होऊन स्टेलाचा ‘प्रवास’ सुरू झाला……
नऊ वर्षापूर्वी आरशात पाहताना जेव्हा कपाळावर ,केसांजवळ पांढरा डाग दिसला तेव्हा हादरून गेलेली स्टेला आज निर्धास्तपणे विमानातल्या बिझनेस क्लासमधल्या खूर्चीवर सेफ्टीबेल्ट लावून खिडकीबाहेरचं जग काचेतून न्याहाळत होती.
…..
“कोड…!”
….कपाळावरचा डाग जसा जसा पसरू लागला तसा स्टेलाचं तारुण्यसुलभ मन व्यापू लागला. गोऱ्यारंगाच्या त्या डागासोबत काळी काळजी तिच्या व्यक्तिमत्वाला घेरून टाकू लागली आणि स्वत:ला लपवू लागली स्टेला रंगबिरंगी दुनियेपासून.
पण जसा जसा तो पांढऱ्या रंगाचा डाग चेहराभर पसरला आणि स्वत:चच अर्धगोरं आणि अर्धकाळं शरीर तिला दिसलं तसा एक विलक्षण विचार तिच्या मनात चमकून गेला.
…. … मनमिळाऊ शाळकरी स्टेला स्मिथला जेव्हा मित्र-मैत्रिणी ,शेजारीपाजारी ब्लॅकस्मिथ म्हणून हिणवू लागले होते तेव्हा आपल्याच काळोख्या कोषात गुरफटून राहू लागली स्टेला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या, कुशल आणि महत्वाकांक्षी वृत्तीच्या स्टेलाला पदवी प्राप्त झाल्यावर नोकरी-व्यवसायात डावलले गेले होते ते केवळ ती कृष्णवर्णीय असल्यामुळेच..! कायमच क्षमता पातळीच्या खालच्या दर्जाची कामे स्वीकारावी लागली तिला…
…..
आता मात्र, गोऱ्या रंगाचा डाग शरीरभर पसरत जात असताना एका अनोख्या नियोजनाचा पाठपुरावा करू लागली स्टेला. स्वत:ची छोटेखानी नोकरी सांभाळत, ह्या डागाळलेल्या नऊ वर्षात , तिने अनेक अवघड परिक्षा प्रयत्नांनी व अक्कलहुशारीने पूर्ण करत नव्या पदव्या मिळवून स्वत:चा सीव्ही तगडा बनवला . रंगपरिवर्तन करणारं कोड तिने सकारात्मकतेनी पसरवून घेतलं अंगभर..!!
वकिलामार्फत ॲफेडेव्हीट नावाच्या कागदानी बदलून घेतलं स्वत:चं नाव आणि अस्तित्व! आता नव्या नावानी आणि नव्या रुपानी परदेशातील तिच्या गुणांलायक नोकरीसाठी अर्ज भरू लागली *’मेरी फिनिक्स’*!!
शरीरभर पसरलेलं हे कोड स्टेलासाठी कात टाकणं होतं. वर्ण-रंगावरून माणूस जोखणाऱ्या जगाला स्वत:चा खरा रंग दाखवायला सज्ज झाली मेरी फिनिक्स!!
विमान आकाशात झेपावलं होतं कॅनडाच्या दिशेनी, जिथे नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी त्यांच्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या स्वागतासाठी उत्सुक होती. पहाटेच्या वेळी विमानाच्या छोट्या खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं चराचर उजळवून टाकताना मेरी पहात होती, एअर होस्टेस अदबीनं विचारत होती,” विच कॉफी यू विल प्रिफर मॅम?”
मेरी हसून म्हणाली,”ब्लॅक, प्लिज!”
❤ ❤ ❤ ❤ ❤
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.
काल पुण्यात पालखीचं आगमन झालं. वाहतूक काही वेळासाठी थांबली होती. लोक ती सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मीही रहदारीचा अंदाज घेत होते. इतक्यात मला काही वारकरी लोकं गर्दीतून वाट काढत चालत जाताना दिसली. त्यांच्या सोबत हातात झेंडा घेतलेली दोन छोटी मुलंही होती. मोठ्या उत्साहात आणि आनंदात ती इतक्या गर्दीतूनही अनवाणी चालत होती. ते पाहून मला माझ्या शाळेतली दिंडी आठवली.
इयत्ता पहिली ते चौथी मी नवसह्याद्रीमधल्या ज्ञानदा प्रशालेत शिकत होते. त्यावेळीस आमच्या शाळेची दिंडी निघायची. शाळेपासून ते आजच्या राजारामपुलाच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जायची. आजही निघतेच म्हणा. त्या दिंडीची आठवण झाली. आषाढी एकादशीला सकाळी सात वाजता आमच्या दिंडीला सुरुवात व्हायची. स्वच्छ धुतलेला गणवेश, हातात टाळ, झांजा, फुलं, तुळशीची रोपं, रामकृष्ण हरी असे लिहिलेले फलक असे आपल्याला हवं ते घेऊन दिंडीत सहभागी व्हायचो. शाळेत मोठ्या वर्गातल्या मुलांनी आणि शिक्षकांनी पालखी फुलांनी सजवून ठेवलेली असायची. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतमंडळींचे फोटो असायचे. शाळेत छान रांगोळी काढली जायची. फुलांचा आणि उदबत्तीचा मंद वास दरवळत असायचा. सगळे जमले की कोणी तरी शिक्षक जोरात म्हणायचे, “बोला पुंडलिक वर देव ! हारी विठ्ठल ! श्रीनामदेव तुकाराम ! पंढरीनाथ महाराज की जय ! टाळ, झांजा जोरात वाजू लागल्या की आम्ही चालायला सुरुवात करायचो. पावसाची रिपरिप, मधेच उन्हाची तिरीप आजूबाजूला आम्हा सर्वांचा हरिनामाचा गजर, मधूनच दरवळणारा मातीचा वास, झांजांचे, लेझीमचे खेळ, नाच सुरु व्हायचे. त्यावेळी आजच्या सारखा गाजावाजा करण्याची पद्धत नव्हती त्यामुळे शाळेच्या आसपासच्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि मंदिराच्या जवळच्या लोकांनाच या दिंडीची माहिती असायची. रस्त्यावरच्या गर्दीतून, वाहतूकीचा खोळंबा न करता वाजतगाजत ही दिंडी चालायची. मग अनवाणी चालताना मऊमऊ माती पायाला लागायची, तर कधी छोटे दगडही टोचायचे पण तेव्हा त्याचं काहीच वाटायचं नाही. रस्त्यावरून झेंडा फडकवत, टाळ, झांजा, लेझीमच्या गजरात ‘ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम’ असा गजर करत आम्ही अक्षरशः नाचत-गात जायचो.
मध्येच एखाद्या घरातून पालखीतल्या माउलींच औक्षण केलं जायचं. लोकं नमस्कार करायचे. आमच्या हातावर प्रसाद दिला जायचा. तहान लागली असेल म्हणून पाणी दिलं जायचं. तेव्हा बिसलेरी वैगरे प्रकार नव्हते आणि गरजही. अगदी गरज लागली तर ऐनवेळी आमच्यासाठी एखाद्या घरातलं स्वच्छतागृह देखील वापरायची सोय केली जायची. पण रस्त्यात कोठेही कसलाही कचरा किंवा घाण करायला सक्त मनाई असायची. आम्ही सारेजण ती शिस्त आवर्जून पाळायचो. एकमेकांचे हात हातात धरून एकसाथ एकसुरात विठ्ठल नामाचा गजर करताना एक वेगळाच उत्साह जाणवायचा. आम्हाला त्यावेळी ना विठ्ठल भक्तीची ओढ होती, ना कसलं मागणं होतं, ना या साऱ्यातलं काही कळत होतं. विठठलाच्या ताला-सुरात निरपेक्षपणे पावलं चालायची.
आता वाटतं तीच खरी भक्ती. जिथं काहीतरी मागायचं म्हणून सेवा नव्हती. केवळ आनंद होता एकमेकांसह चालण्याचा, गणवेशामुळं एक सारखे भासायचोच पण एकत्र चालणं, एकमुखानं गजर करणं, एकच अन्न वाटून खाणं आणि मुख्यत्वे दिंडीत जो कोणी सहभागी असेल त्याला आपला मानणं. लहानमुलं मोठ्या मुलाचं ऐकायचे, मोठी मुलं लहानांची काळजी घ्यायची. त्यांना चालताना, नाचताना मार्गदर्शनही करायची. कोणाला काही दुखलंखुपलं तर हे ताई-दादा काळजी घ्यायचे. अगदीच अडचण झाली तरच शिक्षक मध्ये पडायचे. ही एकी, हे प्रेम, हे नातं चार भिंतींपलीकडचं होतं. इथं जातपात, हुशारी, श्रेष्ठत्व काही काही नव्हतं. मला या दिंडीत सहभागी व्हायचं आहे हीच फक्त भावना होती आमचीही आणि आम्हाला साथ देणाऱ्या माणसांचीही.
आम्ही सगळे मंदिरात पोहोचलो की विठ्ठलाशी गाठभेट व्हायची मग आरती, भजन आणि प्रसाद असं भरगच्च कार्यक्रम असायचा आणि मग आम्ही आपापल्या घरी परतायचो ते विठठल विठ्ठल म्हणतंच. विठ्ठल देव आहे म्हणून नाही… तर आनंद मिळतो म्हणून… आमच्यासाठी विठ्ठल आहे तर दिंडी आहे… दिंडी आहे तर आजचा आनंदाचा दिवस आहे… हीच भावना मनात ठेवून…
आज या गोष्टींचा अर्थ वेगळाच वाटतो. आज विठ्ठलाचं स्मरण हेतुपूर्वक केलं जातं म्हणूनच कदाचित तो आनंद मिळत नसावा. विठ्ठलाची किंवा त्याहीपेक्षा म्हणा साध्यासाध्या गोष्टींतून आनंद मिळवण्याची वृत्ती आमच्यात रुजली ती मात्र या दिंडीमुळेच.
☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-1 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो. आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत ‘कडक’ अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते.
जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे.
पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.
आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, ‘इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स’ (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते.
एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM) सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते.
गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ ‘सह्याजीराव’ बनून काम करणे मला मान्य नव्हते.
मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता.
ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.
CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले.
त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते.
“Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल” असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी.
आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, “चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला ‘बेपत्ता किंवा मृत’ घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ.”
सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा ‘भगोडा’ शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई केली जाणार होती!
ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला.
“सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, ‘कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये’.”
माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.
– क्रमशः भाग पहिला
मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)
मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माधव आणि मधुरा घरी आल्यापासून एकदम चकित झाले होते. खरं तर न्यूझीलंडहून इन्नीअप्पांकडे हट्टानं येण्याचा निर्णय दोघांनी का घेतला होता? तर इन्नी आणि अप्पांना उतारवयात एकटं वाटू नये म्हणून! पण… इथे तर त्यांनाच एकटं पडण्याची पाळी आली होती. कशी? पाहा ना! इन्नी आणि अप्पांकडे त्या आधीच गोपाळराव आणि राधिकाबाई भिडे यांचा ठिय्या मुक्काम होता. “या राधिकाबाई भिडे. आपल्या कुटुंबसखी.” इन्नीनं ओळख करून दिली. “माझी ओळख नव्हती झाली कधी यांच्याशी.” माधव इन्नीला म्हणाला. “अरे, गेली सात वर्षे तुम्ही न्यूझीलंडला आहात. इथे आम्ही दोघं निवृत्त झाल्यावर आम्ही एक क्लब स्थापन केला. क्लबचं नावच मुळी ‘चंगळ’ क्लब. अटी तीन. एक- तुम्ही निवृत्त असायला हवेत; दोन- सुखवस्तू सांपत्तिक स्थिती असावी आणि तीन- मौज, उपभोग यात भरपूर रस असावा. तर तुला सांगते माधव, चंगळ क्लबचे नळ्याण्णव सदस्य झालेत. यात पंचेचाळीस जोड्या आहेत आणि नऊ सदस्य एकेकटे, लाईफ पार्टनर गमावलेले; पण तरीही आयुष्य आहे ते रडत जगण्यापेक्षा मजेने जगावं अशा इच्छेने आपल्यात सामील झालेले आहेत.” इन्नी म्हणाली. “मी जेव्हा इन्नींची ही जाहिरात केबल टीव्हीवर बघितली ना, तेव्हा लगेच फोन केला त्यांना. आम्ही दोघं ताबडतोब मेंबर झालो चंगळ क्लबचे. आमचा मुलगा देवर्षी अमेरिकेत आहे. कन्या सुप्रिया लग्न होऊन सध्या सिलोनला राहते. म्हणजे आपल्या आताच्या श्रीलंकेत! आम्ही दोघं अधूनमधून जातो मुलाकडे-मुलीकडे, पण करमत नाही परक्या देशात. इथेच बरं वाटतं. चंगळ क्लब सुरू झाल्यापास्नं तर इथेच उत्तम वाटतं बघ.” राधिकाबाई म्हणाल्या. माधवनं निरखून राधिकाबाई आणि आपली आई इन्नी यांच्याकडे बघितले. खरंच की, दोघी कशा तजेलदार आणि टुकटुकीत दिसत होत्या. निरामय आनंदी! समाधानी आणि संतुष्ट वाटत होत्या. “त्याचं काय आहे माधव, प्रत्येक वय हे मौजमजा एनकॅश करण्याचं असतं असं तुझ्या अप्पांचं आणि माझं स्पष्ट मत आहे. लोकलला लोंबकळून आम्ही मुलुंड ते सीएसटी तीस तीस वर्ष सर्व्हिस केली दोघांनी. पण त्यातही मजा होती. कारण दोघांनी कमावलं म्हणून तुला राजासारखं ठेवता आलं. बारावीला अपेक्षित पसेंटेज मिळाले नाही तरी प्रायव्हेटला डोनेशन देऊन शिकविता आलं. सो? नो रिग्रेट्स! पण निवृत्तीनंतर दोघांचं मस्त पेन्शन येतंय. घरदार आहेच! तू आर्थिकदृष्टीने स्वतंत्र झालायस. नो जबाबदारी! मग आता मौजच मौज का बरं करू नये? म्हणून केबलवर अँड दिली. आम्हाला ठाऊकच नव्हतं की नुसत्या मुलुंडमध्ये यवढी माणसं चंगळ’ करायला इच्छुक आहेत!” माधव आणि मधुरा यांना ते सारं ऐकून चकित व्हायला न झालं तरच नवल होतं! त्याचबरोबर इन्नी आणि अप्पांना एकटं वाटत असेल ही अपराधीपणाची टोचणीही कमी झाली होती. आपण उगाचच टेन्शनमध्ये आलो होतो हेही जाणवलं दोघांना. नंतर जेवणं फार सुखात झाली. “रोजच्या जेवणाला कुसाताई येतात स्वयंपाक करायला, पण चार माणसं येणार असली घरात की आम्ही त्यांना सांगून ठेवतो अगोदर. त्या मैनाताई म्हणून मदतनीस घेऊन येतात बरोबर. त्यांना आम्ही दिवसाचे शंभर एक्स्ट्रा देतो. खुशीनं येतात अगदी.” अप्पा सांगत होते. “आमचे मेंबर जसे वाढायला लागले तसे आम्ही ‘बिल्व’ नावाचे समविचारी लोकांचे ग्रुप तयार केले बरं का गं मधुरा. म्हणजे अगं कुणाला वाचायला आवडतं. कुणाला खादडायला आवडतं. कोणी पिक्चर, नाटक यांचं शौकीन असतं. कोणी रमीत रमतं तर कोणी मद्याचे घुटके घेत ‘एक जाम एक शाम’ करतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आम्ही काही माणसं भटकंतीवाली पण आहोत. ‘बिल्व’मध्ये समआवडींची तीनच कुटुंब एकत्र येतात. आपल्यात आम्ही, भिडे पतिपत्नी आणि शिंदे पतिपत्नी एकत्र आहेत. शिंदे सध्या बेंगलोरला मुलीच्या बाळंतपणास गेलेत दोघं. सेवेत मग्न! पण आमचे फोन चालू असतात.” इन्नीनं सांगितलं. “महिन्यातून एकदा आम्ही एकेकाकडे चार दिवस जमतो. रात्री झोपायला घरी. दिवसभर साथ साथ. आता ऑक्टोबरमध्ये आम्ही सहाही जणं कोकणात जाणारोत. डॉल्फिन शो बघायला. अगदी चंगळ आहे बघ!” अप्पा म्हणाले. “माझ्या मनात एक अभिनव कल्पना आहे.” श्रीयुत गोपाळराव भिडे म्हणाले. “हल्ली काऊन्सेलिंगचा बराच सुकाळ आहे. मॅरेजच्या आधी काऊन्सेलिंग, मरेजनंतरही प्रॉब्लेम येतात तेव्हा समुपदेशन… मुलांच्या समस्यांचं समुपदेशन, करियर कौन्सेलिंग! आता मी सुरू करतोय ‘निवृत्ती निरूपण’ यात आठ कलमी कार्यक्रम असेल. निवृत्तीआधी तीन कलम. एक – आपल्याला मिळणाऱ्या पैशांचा अंदाज घ्या. दोन- गुंतवणूक करण्यासाठी उत्कृष्ट सल्ला घ्या. तीन- आपला राहून गेलेला छंद तपासा. निवृत्तीनंतरची दोन पथ्ये- एक- घरातल्यांना न छळणे. दोन- आपल्या पार्टनरचे मन जपणे. आणि तीन गोष्टी आनंदाच्या. एक- आपल्या पैशाचा स्वतः उपभोग घ्या. दोन- समवयस्कांबरोबर ओळखी वाढवा आणि तीन- तिसरी घंटा वाजली मित्रांनो! आता मस्त चंगळ करा! चंगळ!… लाईफ इज टू शॉर्ट नाऊ!…” माधव आणि मधुरा, गोपाळराव भिडे यांच्या निवृत्ती निरूपणावर बेहद्द खूश झाले. माधव म्हणाला, “आम्हाला फार गिल्टी वाटत होतं. मी एकुलता मुलगा! इन्नी नि अप्पांना एकटं करून तिकडे दूर देशी राहतोय.” “आता काळजी करू नकोस तरुण मित्रा. चंगळ क्लब समर्थ आहे एकमेकांची काळजी घ्यायला.” भिडेकाका म्हणाले. तुम्हाला सुरू करायचा का आपल्या उपनगरात चंगळ क्लब? बघा बुवा! तिसरी घंटा वाजलीय… एन्जॉय नाऊ. ‘ऑर नेव्हर!’ म्हणायची वेळ कुणावर येऊ नये.
‘ तिसरी घंटा’
लेखिका – डाॅ. विजया वाड
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “रमाई…” — लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक) ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆
पुस्तक : रमाई
लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक)
प्रकाशन : विनिमय पब्लिकेशन मुंबई
पाने : २९५ .
२७ मे, रमाईमातेचा स्मृतिदिन.रमाईंच्या स्मृतिदिनी त्यांच्या कर्तृत्वाचा जागर मांडताना त्यांच्याविषयीच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय मांडावा ,असा मानस होता.माझ्या जवळ उपलब्ध असलेल्या रमाई नावाच्याच चार पुस्तकांपैकी बंधु माधव यांचे रमाई पुस्तक परिचयासाठी निवडले.पुस्तकाचे लेखक आज हयात नाहीत पण हे भूलोक सोडण्यापूर्वी त्यांनी रमाईबाबत विपुल लेखन केलेले आहे ,शिवाय याच कादंबरीचे आकाशवाणीवरून नभोना#e-abhivyaktiट्य सादर केलेले आहे.सदर पुस्तकाची भाषा रसाळ आहे.डॉ.बाबासाहेबांसाठी चंदनासारख्या झिजलेल्या रमाईची कथा वाचताना डोळ्याच्या कडा ओलावतात.रमाई हे पुस्तक सुरस ,सुगंधी ,सुंदर आहे की नाही ते वाचकाने ठरवायचे आहे पण लेखक व माझ्या मते रमाई म्हणजे सोशिकता,सात्विकतेचा महामेरू आहे.फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस धडपडत असतं.लोकांना ते फुललेलं फूल तेवढं दिसतं .वर्षानुवर्षे झाडानं त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही.विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब हे कोट्यावधी दलितांच्या हृदयातलं फूल असतील ,तर ते फूल फुलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेलं झाड म्हणजे रमाई होय.
रमाई कादंबरीची सुरूवात रमाईच्या जन्म प्रसंगापासूनच सुरू होते.तिच्या रडण्याचा ट्याँ ट्याँ हा कादंबरीचा पहिला शब्द व रमाईने सोडलेला शेवटचा श्वास म्हणजे कादंबरीचा शेवटचा शब्द.तिच्या रडण्याचा पहिल्या पानावरचा पहिला शब्द ते 295 पानांवर जगणं थांबल्याचा तिचा शेवटचा शब्द …. असा रमाई कादंबरीचा प्रवास.प्रत्येक पानावर रमाई भेटते ,अगदी पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत ;पुस्तक संपल्यावर ती पुस्तकातून बाहेर येते व वाचकाशी बोलत राहते.रमाई वाचून संपत नाही ,तर ती वाचून सुरू होते.
दापोली जवळचं वणंद,एक छोटं गाव हे रमाईचं जन्मगाव.गावकुसाबाहेरील पाचपंचवीस महारांच्या झोपडीपैकी एक झोपडी भिकू – रुक्मिणी या सालस कष्टाळू जोडप्याची.अंग मेहनतीचं काम करायचं अन् पोटाला पोटभर खायचं हा त्यांचा नित्यक्रम.शेजारी असलेला समुद्र यांना कधी उपाशी मरू देणार नव्हता.भजनी मंडळात दंग असलेला भिकू धोत्रे मासेमारी व्यवसायाकडे माशाचे टोपले उचलण्याचे काम करत असे.पोटाला काहीतरी देणारा ,संसाराला हातभार लावणारा रुक्मिणीचा बिन भांडवली उद्योग होता. तो उद्योग म्हणजे रस्त्यावरचं शेण गोळा करून शेणी (गवरी) लावणं व त्या शेण्या विकणं.सारं काही खूप मजेत नसलं तरी चंद्रमौळी झोपडीत पसाभर सुख नांदावं ,असा त्यांचा संसार होता.रमाईच्या जन्माआगोदर रूक्मिनीची कुस प्रसव झालेली होती.आक्काच्या रूपानं एक कन्या चंद्रमौळी झोपडीच्या अंगणात खेळत होतीच.आता रूक्मिन दुस-यांदा बाळंत होणार होती.परंपरेचा पगडा म्हणून मुलगाच व्हावा ,हा मानस कळा देताना रूक्मिनीचा व अंगणात बसलेल्या भिकूचाही ,पण पदरात पडली रमाई.मुलगी झाली म्हणून भिकू-रूक्मिनीची थोडी नाराजीच व्हायला हवी होती पण पदरात पडलेली मुलगी नक्षत्रावाणी गोड होती.गावातल्या अनुभवी नाणु सुईनीचं म्हणणं होतं की असलं राजबिंड गोड रूप म्या कंदी कंदी पायिलं नाही.महार गल्लीत आनंदीआनंद झाला.गावभटानं पचांग पाहून मुलीचं भविष्य सांगितलं पोरगी मायबापाचं नाव काढणार.राजाची राणी होणार. रमा वाढत होती ,अन् भिकू-रूक्मिनीला गावभटाची सुखावह भविष्यवाणी आठवत होती.चंद्राची कोरीप्रमाणे ही चंद्रकोर वाढत होती.रमानंतर भिकू-रूक्मिनीला गौरी व शंकर ही दोन अपत्य झाली.कायमचं शारीरिक कष्ट व एकापाठोपाठची एक अशी चार बाळंतपणं …………. रखमा खंगत चालली होती.तिच्या अशक्त देहाला आता मरण दिसू लागलं होतं.नव-याची व लेकरांची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती पण प्राणानं तिचा देह सोडण्याचा निर्णय घेतला होता.मरताना तिला एकाच गोष्टीचं समाधान होतं ते म्हणजे लेक रमा … पाच सात वर्षाचंच पोर खूप समजंस होतं … ते पोर तान्हया लेकरांची व बाप भिकूचीही आई व्हायला समर्थ होतं.बस्स एवढाच विश्वास शेवटच्या नजरेत ठेऊन ,एके रात्री तिन्ही लेकरांची जेवणं झाली की रख्माईनं प्राण सोडला.सात वर्षाची पोर रमा आईला पोरकी झाली.नियतीनं पायाखालची धरती अलगद काढून घेतली होती.काही दिवस जातात, न जातात तोच खंगलेला भिकूही धरणीमाईवर आडवा होतो ,तो कायमचाच.रमाईची धरणीमाय आधीच गेली होती अन् आता आभाळही हललं होतं.आभाळाखाली उघडी पडलेली ही तीन्ही लेकरं मामानं मुंबईला आणली.रमाईचे सख्खे मामा-मामी व चुलत मामा-मामीसहित चाळीतले सगळेच शेजारी पाजारी भिकू-रुक्मिणीच्या अनाथ अंशाला काही कमी पडू देत नव्हते.
सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे महारांसाठी भूषण नाव. भजन ,कीर्तन ,देवपुजेतलं एक सात्विक संस्कारी नाव .विद्येची आराधना ,कबीराची प्रार्थना करणारा कडक शिस्तीचा भोक्ता पण कमालीचा कुटुंब वत्सल माणुस म्हणजे सुभेदार.सुभेदाराचा भिवा/ भीमा मॕट्रिकीत शिकत होता.तो काळ बालविवाहाचा असल्यामुळे शिक्षण चालू असलं तरी लग्न टाळण्याचा नव्हता.भीमासाठी रमा सुभेदारांच्या मनात निश्चित झाली.महारातला उच्च शिक्षित – बुद्धीमानतेचं शिखर भीमा व अडाणी निरक्षर रमा यांचा विवाह फक्त शिक्षणात अजोड होता पण संस्कार ,कष्ट ,नम्रता याबाबत रमाच्या तोडीचं कोणी नव्हतं.हे सुभेदार जाणून होते.भीमाचा विश्ववंद्य बाबासाहेब झाला ,याला कारण माता रमाई आहे.
मातापित्याचे छत्र हरवलेल्या दुर्दैवी रमाईच्या नशिबी नातलगांचे मृत्यू पाहणं जणू विधिलिखितच होतं. सासरे रामजीबाबांच्या रूपाने तिला पून्हा पितृछत्र मिळालं होत. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. वृद्धापकाळानं सुभेदारांची सुभेदारी खारिज केली. एका जावेचा मृत्यू ,सासुबाईंचा मृत्यू ,आनंदरावांचा मृत्यू हे दुःख रमाईसाठी आभाळ ओझ्याचं होतं पण नियतीला ते कमी वाटलं असावं, म्हणून लेक गंगाधर ,रमेश व मुलगी इंदू या पोटच्या लेकरांचा मृत्यू रमाईच्या मांडीवरच नियतीने घडवून आणला. लाडक्या राजरत्नचा घासही नियतीने एके दिवशी गिळलाच. पदराच्या कपडात गुंडाळून ,लेकराच्या कलेवरावर माती ढकलताना आईच्या हृदयाच्या किती चिंधड्या चिंधड्या होत असतील ? नाही का ?
बाबासाहेबांनी स्वतःला अस्पृश्य उद्धाराच्या कार्यात झोकून दिलेलं होतं. सुरूवातीच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक अवस्था दैन्याची होती. त्यातच त्यांचे उच्च शिक्षण चालू होते. खूप खूप मोठ्या माणसाची बायको आहे ;हे समाधान रमाईसाठी आभाळभर ओझ्याचं कष्ट पेलण्याची ताकद देणारं होतं. बाबासाहेबांच्या संसारासाठी भावी बॕरिस्टरच्या बायकोने खूप कष्ट सोसले. दादर – वरळीपर्यंत पायी हिंडून गोव-या गोळा केल्या. त्या विकून अर्धपोटी संसार चालविला पण परदेशात शिकत असलेल्या नव-याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्या पत्रात सतत इकडची खुशालीच कळवत राहिल्या. वराळे मामांच्या वसतिगृहात धारवाड मुक्कामी असताना ,अनुदानाच्या विलंबामुळे मुलांची उपासमार होत असल्याचे लक्षात येताच ,क्षणाचाही विलंब न लावता ,स्वतःजवळचं तुटपुंज सोनं गहाण ठेऊन ,आलेल्या पैशातून त्या मुलांना जेऊ घालतात. आईपण हे काही फक्त लेकरास जन्म देऊन साधता येतं असं नाही तर ते घास भरवूनही साधता येतं. म्हणूनच बाबासाहेब हे दलितांसाठी पिढी उद्धारक पितृतुल्य बाबा होते तर रमाई या आईसाहेब होत्या. बाबांचा व रमाईंचा पत्रव्यवहार वाचताना ,वाचकाचा जीव तीळतीळ तुटतो. पेपरातला बाबांचा फोटो पाहून रमाईचं काळीज मोठं व्हायचं पण त्याच पेपरात बाबाच्या जीवाला धोका असल्याची बातमी वाचून रमाईचं काळीज तुटायचं. गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉ.बाबासाहेब लंडनला जायला निघतात ,तेव्हा निरोपासाठी जमलेला जनसागर पाहून रमा मनाशी म्हणते ….. गावभटानं सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरलीय. एवढ्या मोठ्या प्रजेच्या राजाची मी राणी हाय बरं.होय… मी राजाची राणी हाय.
पुरूषांना गगनभरारी कीर्ती मिळविण्याचं वेड असतं हे खरे आहे, पण गगनभरारीच्या पंखातलं बळ त्याची स्त्री असते.हे इतिहासानं वारंवार सिद्ध केलेलं आहे. बाबांसाठी रमा म्हणजे पंखातलं बळ होतं ,घरटं जतन करणारं प्रेमकाव्य होतं. रमाईच्या खडतर ,सोशिक आयुष्याचा प्रवास वाचनीय आहे. रमाईच्या लहानपणी आई रुक्मिणीनं रमाईला बिनामरणाचा नवरा नावाची गोष्ट सांगितलेली असते. या गोष्टीतल्या पार्वतीला मरण नसलेला नवरा असतो. त्यासाठी ती खडतर तपश्चर्या करते व महादेवाला मिळविते. बाळबोध रमा ,तेव्हा आईला म्हणते “आई,मलाही मिळेल का गं बिनमरणाचा नवरा ?” तेव्हा रख्मा रमाईला पोटाशी कवटाळते व म्हणते नव-यासाठी कष्ट उपसशील तर माझ्या राणीला मिळेल ना बिनमरणाचा नवरा. रमाईच्या आईची वाणी खरी ठरली. डॉ.बाबासाहेब या नावाला कधीही मरण येणार नाही. भयावह कष्ट सोसून ,शील – करूणेचा साज अलंकारून रमाई मातेने बाबांचा संसार राखला ,फुलविला. आयुष्यभर झालेल्या अविश्रांत दगदगीने वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी रमाईला नियतीने स्वतःच्या कुशीत चिरनिद्रा दिली. पण बिनमरणाच्या नव-याची बायको होऊन ,शुद्र म्हणून हिणवलेल्या जातीत जन्माला येऊनही राजा बाबासाहेबांची ती राणी झाली होती. करोडो दलितांची आई म्हणून रमाईच जिंकलेली होती. लोकदिलातला राजा राजर्षी शाहू महाराज ,बडोदा नरेश सयाजीराव महाराज ,विदेशातल्या विद्वान बुद्धिवंतांनी गौरविलेल्या बुद्धीच्या शिखराची ,रमाई मजबुत पायाभरणी होती. शेवटच्या क्षणी डोळे झाकताना ती कृतकृत्य होती कारण आता तिचे भीमराव — बाबासाहेब झालेले होते.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – भुतैली काली रातें हैं…।)