? मनमंजुषेतून ?

☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

” हे बघा आई , मी बिझी आहे , उद्या मला मिटींग्स आहेत . एवढा काही वेळ नाही मला , मी कुमारिकेच्या घरी 

अथर्वबरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईल ” सायली म्हणाली .

“अगं संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला . नीट पूजा करू , तुझ्या वेळेनुसार बोलवू ” सासूबाई म्हणाल्या .

“आई , अहो भाव महत्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय….संध्याकाळी कंटाळा येतो खूप ” सायलीने चप्पल घालता घालता म्हंटलं .

“सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता ? ” 

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला . सासूबाई म्हणाल्या , ” शिरीष तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव भाव ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य विसरतोय असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही , शिरिषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही. पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हंटलं की तुम्हाला वेळ नसतो, थकलेले असतात . घरच्या आरतीलाही चार वेळा या रे म्हणावं लागतं . कुठलाही उपास म्हंटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही असं म्हणून मोकळे होता, पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…” 

 सायली म्हणाली , ” आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय “

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे उपास तापास, देव धर्म म्हणजे स्वतःच्या मनाला, शरीराला लावून घेतलेलं बंधन. हे unproductive आहे असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय. आहेत, बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली तुला म्हंटलं आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल, तू म्हणालीस भाव महत्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन. अगं दे ना तू दान, पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील आजोबांना नमस्कार कर, तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील, तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत , त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला ‘भाव महत्वाचा’ ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो. उद्या अथर्व तुला, मला, शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला. परवाचंच घे, घरी भजन आहे म्हंटल्यावर तू नाक मुरडलं , वेळ नाही म्हणालीस. पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं त्यात रंगून गेलीस . फेरदेखील धरलास आमच्याबरोबर , हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो, हे मात्र खरं आई . इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच ! ” सायली म्हणाली .

” हो ना ? तू रे शिरीष, नाही सोवळं पण निदान आंघोळ करून आरती कर म्हंटलं की हेच– भाव महत्वाचा. अरे त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते, आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं. एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही, मग गोंधळ घालायचा का विचारलं की आई, ‘भाव महत्वाचा’ , ‘देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला. अरे देव-देवी काहीच म्हणत नाही, हे सगळं आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आहे. एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना प्रथा जपा रे . हे बघ नेहेमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या तेवढं नाही करू शकले आणि सायली तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे. तरीही सारासार विचार करून जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्वाचा– पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते . हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात. मनाचे डाएट म्हणा ना. ते किती जास्त प्रमाणात करायचं ते ज्याचं त्याने ठरवावं पण करावं असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं . आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो, पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून, मेकप करून आपण जातो. दांडिया खेळू नये असं नाही. पण आपलीही संस्कृती , परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्वाचं, तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना? मग श्रद्धा, अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू. सारखं ‘भाव महत्वाचा’ म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी…. उद्या असेन मी, नसेन मी …..” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते. असे शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

—— असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments