मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आयुष्याचं गणित’ (कवितासंग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘आयुष्याचं गणित’ (कवितासंग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

कवी : डॉ. मिलिंद विनोद. 

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली. 

अर्थवित्त क्षेत्रासारख्या रुक्ष कार्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ वाटचाल करतानाही जगण्याकडे पहाण्याची सजगदृष्टी अतिशय जाणीवपूर्वक जपणाऱ्या डाॅ .मिलिंद विनोद यांचा  ‘आयुष्याचं गणित ‘ हा विविध बाजाच्या, शैलीतल्या,

कधी मिष्किल तर कधी उपरोधिक भाष्य करत अंतर्मुख करणाऱ्या कवितांचा संग्रह.       

डाॅ. विनोद यांची कविता आजवर ‘कविता’ या साहित्यप्रकाराला अपेक्षित असणाऱ्या मापदंडांच्या बंधनात अडकून न पडता मोकळेपणाने व्यक्त होऊ पहाणारी कविता आहे. प्रत्येकीचा आशय, विषय, रुप, शैली सगळं वेगळं तरीही तिचं स्वरूप मात्र हे वैशिष्ट्य ल्यालेलंच.

आयुष्यात सहज जाताजाताही खुपणाऱ्या बोचणाऱ्या विसंगती कवितांच्या रूपात व्यक्त करतानाही मिष्किलता जपणाऱ्या, तरीही ती बोच बोथट होऊ न देणाऱ्या यातील कविता मनात रेंगाळत रहाणाऱ्या आहेत.

खुमासदार, गंमतीशीर, विषय-आशयाचे थेट अधोरेखन न करणाऱ्या, चटकन् अर्थबोधही न होणाऱ्या  शीर्षकांमागचं रहस्य जाणून घेण्यासाठी ती कविता वाचायला रसिकांना उद्युक्त करते, हे या काव्यसंग्रहाचं मला प्रथमदर्शनी जाणवलेलं खास वैशिष्ट्य ! ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड ‘, ‘ बत्ती गुल’, ‘शेखचिल्ली’,’आर आर आर चा पाढा ‘, ‘रम आणि राम’  ही अशा खुमासदार शीर्षकांची कांही प्रातिनिधिक उदाहरणे !

या संग्रहात मराठी आणि हिंदी अशा दोन विभागात एकूण सत्तर+ कविता आहेत. काही अल्पाक्षरी तर काही दीर्घ.

प्रारंभ होतो ‘हेरंब’ आणि ‘गणराया’ या गणेश-वंदनेच्या रूपातल्या श्री गणेशाला अर्पण केलेल्या दोन काव्यरूपी भावफुलांनी !

त्यानंतरचा एखाददुसरा अपवाद वगळता बाकी कविता मात्रांच्या हिशोबात स्वतःची ओढाताण करुन न घेणाऱ्या, तरीही आपली अंगभूत लय अलगदपणे जपणाऱ्या आहेत. अत्यावश्यक तिथेच आणि तेवढेच इंग्रजाळलेले शब्द पण तेही कवितेला आवश्यक म्हणून आलेले आणि तिला वेगळंच रुप बहाल करुन जाणारे. इतर सर्वच कविता न् शायरींमधे अनुक्रमे मराठी आणि हिंदी/उर्दू  भाषांवरील प्रभुत्त्व खास जाणवणारे ! प्रदीर्घकाळ परदेशात व्यतीत करूनही त्या वातावरणाचा कणभरही परिणाम होऊ न देता मराठी भाषेवरील प्रभुत्व अबाधित राखणं आवर्जून कौतुक करावं असंच आहे. याचं प्रत्यंतर सुरुवातीच्याच ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड’ ही कविता देते. मीठमोहरीचं पंचपाळं, मोहरीसारखं तडतडणं,नवऱ्याला कणकेसारखं तिंबणं, पोळीला सुटणारा छानसा पापुद्रा यासारख्या या कवितेला अभिप्रेत असणारं मराठमोळं वातावरण जपणाऱ्या  प्रतिमा, तसेच चपखल म्हणी आणि वाक्प्रचार यांचा या कवितेतील वापर हे सगळं आवर्जून दखल घ्यावी असंच.

यात  रेखाटलेले सासूसुनेचे नाते आणि त्या नात्यातले संबंध न् संघर्ष, ही कविता टोकदार होऊ  देत नाही तर ती त्यातील सामंजस्य जपू पहाते हे तिचे वेगळेपण !

‘माझ्या पोटच्या गोळ्याला कणकेसारखा तिंबून, पोळीला छानशा सुटलेल्या पापुद्रयाप्रमाणे

अलगद वेगळीही झालीस ‘ असं म्हणणाऱ्या सासूला ‘मायेच्या उबेत सतत जपलंत त्याला, आता सळो की पळो करून सोडलंय त्यानं मला’ असं म्हणत नवऱ्याच्या वागण्याचा दोष सासूलाच देणारी सून. या दोघींचे पुढचे सगळेच खरपूस संवाद मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ‘ मापट्याच्या पलीकडची तू सुपातली अन् मापट्याच्या अलीकडची मी– जात्यातली. भरडणं चुकलं नाहीये ते दोघींच्या कपाळी..’ हे सासूचे  शब्द सुनेला स्त्री म्हणून समजून घेताना तिला स्त्री जन्माच्या वास्तवाची वेळीच ओळख करून देतात. दोघींनीही नेहमीच फणा न काढता मायेचा गोफही  विणावा हे सांगणारी ही कविता आशयाला वेगळेच परिमाण देते.

यानंतर लगेचच येणारी ‘कार्टं ऑफ हॅविंग टू आर्ट ऑफ लव्हिंग ‘ ही कविता परस्परभिन्न जातकुळीतली.

‘आमच्या वेळी सर्रास होते मराठी माध्यम, कळलेच नाही केव्हा झाले त्याचे मराठी मिडियम ‘ अशी विषयाची थेट सुरुवात असणारी ही कविता.ती त्या विषयास आवश्यक अशा इ़ंग्राजळेल्या मराठी भाषेतली प्रदीर्घ कविता आहे.ही एकच कविताही कवीच्या अनुभवविश्वाच्या विस्तृत परिघाचा प्रत्यय देण्यास पुरेशी ठरावी.

बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत आणि एकंदरीत जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे होत गेलेली सर्वदूर पडझड ‘जनरेशन नेक्स्ट’, ‘आजचा सुविचार-मिली भगत’, ‘बत्तीगुल’ अशा अनेक कवितांमधून दृश्यरुप होते.

निसर्ग उद्ध्वस्त करीत विकासाची स्वप्ने पहाणाऱ्या माणसामुळे अस्वस्थ झालेल्या प्राण्यांच्या मनातली घुसमट त्यांना असह्य होते तेव्हा ते प्राणी माणसाला कसा धडा शिकवतात याचे प्रत्यंतर देणाऱ्या भयप्रद स्वप्नातून जाग येताच माणूस खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याचे अस्वस्थ कल्पनाचित्र रेखाटणारी ‘आर आर आर चा पाढा ‘ ही कविता या शीर्षकाचा अर्थ समजून घ्यायला मुळातूनच वाचायला हवी.

‘अक्कलखाते’ मधील माणसांचे विविध नमुनेही आवर्जून पहाण्यासारखे आहेत. ‘प्रिप्रे ते प्रप्र तत पप ते तप्त- प्रवास तीन तपांचा’ ही गंमतीशीर लांबलचक आणि चटकन् अर्थबोध न होणाऱ्या शीर्षकाची  मिष्किल,विनोदी शैलीतली कविता म्हणजे तीन तपातील प्रचंड बदल आणि पडझडी पचवलेल्या प्रदीर्घ प्रवासातील विविध स्क्रिनशाॅटस् म्हणता येतील.वाचताना हसवणारे न् हसवता हसवता नकळत फसवत वाचकांना स्वत:चं जगणंही एकदा तपासून पहायला प्रवृत्त करणारे! यातील ‘तोंडसुख’ या शब्दातील  श्लेषार्थ, तसेच इतरही अनेक शब्दांत लपलेल्या विविध छटांचा वेध हे सगळं वेगळ्या, अनोख्या शैलीने अधिकच सजलेलं!

‘पॉलिटिशिअन स्पीक्स् ‘ मधे माणसाची होत गेलेली अधोगती ‘स्फटिकासारखा स्वच्छ होता पांढरा माझा पैसा, कळलंच नाही कधी झाला काळा त्याचा कोळसा ‘ अशा थेट वास्तवाला भिडणाऱ्या कथनाद्वारे ठळकपणे अधोरेखित होते.

‘मिस्टर पर्सेंटेज’ ही कविता व्यवस्थेला लागलेली कीड रोखठोकपणे चव्हाट्यावर आणते.यातील भ्रष्टाचाराला लावलेली ‘एजन्सी हँडलिंग चार्जेस’ , ‘फास्टट्रॅक प्रोसेसिंग फीज ‘, यासारखी नवीन शिष्टसंमत लेबल्स त्या किडीचं पोखरणं किती सर्रास सराईतपणे सुरु आहे हे सांगण्यास पुरेशी आहेत.

आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ‘ सल ‘या कवितेचा! या संग्रहातील स्वतःच्या वेगळेपणामुळे उठून दिसणारी ही कविता मला विशेष भावली.

समुद्रकिनारा, लाटा, पायाखालची सरकणारी.. पावलाना गुदगुल्या करणारी वाळू, विशाल विस्तीर्ण क्षितिज, अशा प्रतिमांच्या विविध रंगांच्या शिडकाव्यांनी  धुंद होत गेलेल्या वातावरणाचाच एक भाग बनून गेलेली ‘ती’ आणि ‘तो’ यांच्या मनासारख्या कधीच न फुललेल्या नात्याची ‘सल’ ही अनोखी कविता! एखादी रूपक कथा अलगद उलगडत जावी तशी ही कविता उमलत जाते.त्याच्या विशीपासून जीर्ण, जर्जर,  विकारग्रस्त वृद्धापकाळपर्यंत त्याला सतत अस्वस्थ करीत राहिलेल्या तिच्या अलवार आठवणींनी व्याकुळ झालेला तो !आणि त्याच्या मनातील भावनांचा कोंडमारा व्यक्त करणाऱ्या या कवितेचा उलगडत गेलेला पट!

‘तो’ म्हणजे कवी पण ‘ती’ म्हणजे नेमकी कोण या प्रश्नाचं कवितेच्या आस्वादकांना गवसणारं उत्तर प्रत्येकाच्या विचारांच्या दिशेनुसार वेगवेगळे असू शकेल कदाचित, पण कवीच्या शब्दातून स्पष्टपणे व्यक्त न केलेली तिची ओळख मला अंधूक का होईना जाणवली ती ‘कवीची प्रतिभा’ या रुपातली! ही ओळख मनात जपत कविता पुन्हा वाचताना तिच्या पाऊलखुणा याच रुपात अधिक स्पष्ट होत गेल्या एवढं खरं!

‘शायरी’ विभागातील उर्दू मिश्रित हिंदी काव्यरचनाही आवर्जून दखल घ्याव्यात अशा आहेत. विषयवैविध्य, व्यंगात्मक शैली, थेट, रोखठोक आणि सुलभ रचनाकौशल्य ही वैशिष्ट्ये इथेही दिसून येतात.

प्रेम, विरह, सहजीवन या विषयांवरील बहुतांशी कवितांचा विषय तोच असला तरी त्या रचनांमधल्या वैविध्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात.या दृष्टीने परायी काया,एहसास-ए-रुह, गुस्ताखी माफ,शबनबी थी सारी राते, कब्र, जुनून-ए -मजनूॅं, खुदकुशी, जले शोले राख तले, अशा अनेक कवितांचे उल्लेख करता येतील.हिंदी-उर्दूच्या लहेजामुळे तर यातील आशय अधिक तीव्रतेने भिडतो.

वेगळ्या आशय- विषयांमुळे उठून दिसणाऱ्या काही खास कवितांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा.        पाण्याच्या एका थेंबाची पाऊस,अश्रू,घाम अशी विविध रुपांमधली भावना व्यक्त करणारी ‘बूॅंद’ ही कविता हे एक प्रातिनिधिक उदाहरण.

‘सत्ता संपत्ती संततीने बदले तेरे नूर,बनकर मगरूर तू हुआ अपनोंसे दूर’ हे ‘बुराई अच्छाई का राही ‘ या कवितेतील भरकटलेल्या माणसाचे वर्णन असो, की ‘मुजरा आणि मुशायरा’ मधे कवी आणि अदाकारा या शायरीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंची तुलना करताना ‘जवानी का ढलना मुजरेका मुरझाना, जवानी पलभर शब्द निरंतर’ हे वास्तव अधोरेखित करणारा निष्कर्ष असो, दोन्हीही त्या त्या कविता लक्षवेधी बनवतात.

जीवनाचं अस्वस्थ करणारं बोचरं सत्य व्यक्त करणाऱ्या ‘दो गज जमीन’, ‘शहादत की कुर्बानी’, ‘चादर ए आसमान’ या कविताही दीर्घकाळ मनात रेंगाळतील अशाच!

सहज जाणवलेला एक योगायोग म्हणजे यातील मराठी व हिंदी या दोन्ही विभागात असलेल्या ‘जनरेशन नेक्स्ट’ या एकाच शीर्षकाच्या दोन कविता ! विशेष हे की या दोन्ही कवितांचा आशय आणि विषय एकच असला तरी त्यांची मांडणी मात्र सर्वस्वी भिन्न तरीही भावणारी !

या कवितासंग्रहाचं मला जाणवलेलं वेगळपण ध्वनित करण्यापुरता वानगीदाखल घेतलेला त्यातील काही मोजक्या कवितांचा हा प्रातिनिधिक आढावा आहे.         

मा.लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे यातील बहुतेक सर्व दीर्घ कविता वाचनापेक्षाही त्यांचे मंचीय सादरीकरण अधिक परिणामकारक ठरेल अशा आहेत.

‘आयुष्याचं गणित’ या संग्रहातील कविता आयुष्याच्या गणितांची मांडणी, ती गणिते सोडवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी रीत, आणि हाती लागलेल्या उत्तरांची अचूकता ताळा करून पहाण्याची प्रेरणा, या तीनही अंगांनी आकाराला येताना आशय-विषयांनुरुप आपापले वेगळे रूप घेऊन व्यक्त होताना दिसतात. आणि त्यामुळेच त्या रसिकांना काव्यानंद देतानाच विचारप्रवृत्त करणाऱ्याही ठरतील असा विश्वास वाटतो.

पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “देव’ माणूस” – संकल्पना – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “देव’ माणूस” – संकल्पना – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – ‘देव’ माणूस

संकल्पना – सौ.ज्योत्स्ना तानवडे.

प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन

प्रकाशन – २९/०५/२०२२

सौ ज्योत्स्ना तानवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेलला  *’देव’माणूस हा स्मृति संग्रह नुकताच वाचनात आला आणि त्याविषयी आवर्जून लिहावं असं वाटलं म्हणून —

सौ. ज्योत्स्ना तानवडे  यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक भावनेने, त्यांचे  परमपूज्य वडील कै. श्री. बाळकृष्ण अनंत देव तथा श्री आप्पासाहेब देव, माळशिरस. यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या पुस्तक रूपाने एक आगळीवेगळी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली आहे.

‘देव’माणूस ही स्मरणपुस्तिका आहे आणि या पुस्तकात जवळजवळ ५८ हितसंबंधितांनी कै. आप्पासाहेब देव यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ही भावांजली वाचताना कै. आप्पासाहेब देव या महान, ऋषीतुल्य, समाजाभिमुख, लोकमान्य व्यक्तीचे अलौकिक दर्शन होते. वास्तविक तसे म्हटले तर ही स्मरणपुस्तिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांचा समस्त परिवार, नातेवाईक, स्नेही, मित्रमंडळी अथवा त्यांच्या संबंधितांतल्या व्यक्तींचा स्मृती ठेवा असला तरी माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तींसाठी सुद्धा हे पुस्तक जिव्हाळ्याचे ठरते हे विशेष आहे. अर्थातच त्याचे कारण म्हणजे या सर्वांच्या आठवणींच्या माध्यमातून झिरपणाऱ्या एका अलौकिक व्यक्तीच्या दिव्यत्वाच्या प्रचितीने खरोखरच आपलेही कर सहजपणे जुळले जातात. हा देवमाणूस सर्वांचाच होऊन जातो.

नित्य स्मरावा!

उरी जपावा !!

मनी पूजावा !!!

अशीच भावना वाचणाऱ्यांची होते.   म्हणूनच हे पुस्तक केवळ त्यांच्याच परिवाराचे न उरता ते सर्वांचेच होते.

नावातही देव आणि व्यक्तिमत्वातही देवच म्हणून हा ‘देव’माणूस!कै. बाळकृष्ण अनंत देव* तथा आप्पासाहेब देव  यांचा २९/०५/१९२२ ते १५/०२/१९८८ हा जीवन काल. त्यांचे बाळपण, वंशपरंपरा, शालेय जीवन, जडणघडण, सहजीवन, पारिवारिक, व्यावसायिक, सामाजिक जीवनाविषयीचा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि संबंधितांनी स्मृतिलेखनातून घेतलेला हा आढावा अतिशय वाचनीय, हृद्य आणि मनाला भारावून टाकणारा आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस या गावी स्थित राहून वकिलीचा पेशा सांभाळून स्वतःच्या समाजाभिमुख, कलाप्रेमी, धार्मिक वृत्तीने  गाव आणि गावकरी यांच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने झटणाऱ्या, धडपडणाऱ्या एका लोकप्रिय अनभिषिक्त राजाची, लोकनेत्याची एक सुंदर कहाणी,  निरनिराळ्या व्यक्तींनी सादर केलेल्या आठवणीतून साकार होत जाते.

सौ.ज्योत्स्ना तानवडे

वडिलांच्या आठवणीत रमलेली ज्योत्स्ना लिहिते, “…तुमचे व्यक्तिमत्व होतेच चतुरस्त्र! किती रुपे आठवावी तुमची! वकिली कोट घालून कोर्टात बाजू मांडणारे तुम्ही, शाळेत झेंडावंदन करणारे! सोवळे नेसून खणखणीत आवाजात महिम्न म्हणणारे तुम्ही, पांढरा पोषाख, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ घालून वारीत अभंग म्हणणारे तुम्ही,. मुलांनातवंडांच्या गराड्यात,चांदण्यात ओसरीवर पेटी वाजवणारे, कटाव गाणारे तुम्ही… तुमचे व्यक्तिमत्व खूपच खास होते…”

मोहिनी देव त्यांची सून सांगते,

” मला आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा अभिमान वाटला नाही. वाटला फक्त ती. आप्पासाहेब यांची सून म्हणवून घेण्याचा…”

आप्पासाहेब एक दुर्मिळ व्यक्तिमत्व, एक आधुनिक धर्मात्मा, एक देव माणूस, एक स्वयंभू व्यक्तिमत्व, एक ऊर्जा स्त्रोत, अनाथांची माऊली, अशी भावपूर्ण संबोधने देऊन  अनेकांनी त्यांना भावांजली अर्पण केली आहे.  ते वाचताना मन हरखून जाते.

मोहन पंचवाघ त्यांच्याबद्दल म्हणतात,

“… त्यांचा पहाडी आवाज, बुद्धिमत्ता, कोर्ट कामाची एकूणच पद्धती यामुळे अख्ख्या माळशिरस मध्ये त्यांचा दरारा, दबदबा, वचक होता. पण त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरयुक्त भावना होती.  त्यांच्याकडे समस्या घेऊन जाणारी व्यक्ती कधीही विन्मुख परत गेली नाही….”

मदन भास्करे म्हणतात,

” असंख्य पक्षकारांना धीर आणि न्याय देण्याचे महान पुण्य कर्म आप्पासाहेबांनी जीवनभर केले.  कित्येकांकडून त्यांनी एक पैसाही फी म्हणून घेतली नाही. उलट कोर्ट फी  सुद्धा वेळ आली तर ते स्वतःच भरत. असा हा महात्मा!….”

सर्वांच्या स्मृती लेखनामध्ये उत्स्फूर्तपणा जाणवतो. अत्यंत जिव्हाळ्यांने, आपलेपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त झालेली शुद्ध मने इथे आढळतात. म्हणून हे पुस्तक म्हणजे विचारांची, आचारांची, संस्कारांची चालती बोलती गाथाच वाटते.

या पुस्तकात एका आदर्श व्यक्तीची कहाणी वाचत असताना, अदृश्यपणे त्यांच्या पाठीशी सावलीसारखी वावरणारी एक दिव्य व्यक्ती म्हणजे कै. मालतीबाई देव— या लोकनायकाची सहचारिणी. एक सुंदर, हसतमुख, प्रसन्न, कलाप्रेमी, सुसंस्कृत, धार्मिक, पतीपरायण, सामाजिक जाणीवा जपणारी, सुगरण आणि सुगृहिणी. अनेक  भूमिकांतून व्यक्त होणारं, *सौ. मालतीबाई देव हे व्यक्तिमत्वही तितकच मनावर बिंबतं . आणि प्रत्येकाच्या आठवणीतून त्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहात नाही.एक शून्य पुढे टाकल्यानंतर संख्येची किंमत जशी वाढते तद्वतच *कै. मालतीबाई देव यांचं अस्तित्व कै. आप्पासो देव यांच्या जीवनात होतं.

हे पुस्तक वाचून झाल्यावर मी ज्योत्स्नाला म्हटले,

“ही स्मरणपुस्तिका केवळ तुमच्या पुरती नसून ती परिचित अपरिचित सर्वांसाठीच, आपली वाटणारी आहे”

हे स्मरण पुस्तक  प्रसिद्ध करण्यामागे ज्योत्स्नाची भूमिका, पुढच्या पिढीला या आदर्श व्यक्तिमत्त्वांची सदैव ओळख रहावी आणि त्यातून त्यांचीही मने संस्कारित व्हावीत ही तर आहेच. पण आज आपण  समाजातलं जे तुटलेपण, संवादाचं, नात्यांचं हरवलेपण अनुभवत आहोत त्यासाठीही अशा पुस्तकांचे  वाचन, माणसाला जीवनाविषयी, जगण्याविषयी विचार करायला लावणारं, मागे वळून पाहायला लावणारं, आपल्या संस्कृती, परंपरा याविषयीच्या  महानतेचा पुनर्विचार करायला लावणारं ठरतं.

आणि खरोखरच समारोपात जेव्हा ज्योत्स्ना म्हणते,

आठवताना स्मृती साऱ्या

कंठ पुन्हा दाटून येतो

त्यांच्या पोटी पुन्हा जन्म दे

 विठुरायाला विनवितो …

तेव्हा या ओळींवरच आपले श्रद्धांजली पूर्वक अश्रूही नकळत ओघळतात .

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कवितासंग्रह : “नाही उमगत ‘ती’ अजूनही“ – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ परिचय – डाॅ.स्वाती  पाटील ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆कवितासंग्रह : “नाही उमगत ‘ती’ अजूनही“ – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ परिचय – डाॅ.स्वाती  पाटील ☆ 

कवयित्री – डॉक्टर सोनिया कस्तुरे

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे. 

पृष्ठसंख्या – १६०

किंमत – रु. ३००/-

अतिशय सुंदर मुखपृष्ठ, ,,’ती ‘च्या स्वप्तरंगी मनोविश्वाचे जणु प्रतीकच, तिच्या भरारीच्या अपेक्षेत असणारे आभाळ आणि झेप घेणारी पाखरे, तिच्या मनात असणारे पंख लावून केव्हाच ती आकाशात स्वैर प्रवाहित होत आहे परंतु त्याचवेळी जमिनीवरील घट्ट बांधून ठेवणाऱ्या साखळ्या आणि पर्यायाने बेडीमध्येही तिने ‘ती’ चं अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अतिशय अर्थवाही असं हे या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ असून संग्रहाच्या नावाप्रमाणेच सखोल आणि विचार प्रवृत्त करायला लावणारे आहे.

अतिशय संवेदनशीलतेने  लिहिलेल्या या संग्रहाला प्रस्तावना ही तेवढीच वस्तुनिष्ठपणे, तरलतेने, आणि अतिशय अभ्यासपूर्ण व डोळसपणे लिहिलेली आहे ती प्राध्यापक आर्डे सरांनी.

डॉ सोनिया कस्तुरे

मनोगतामध्येच कवयित्री डॉक्टर सोनिया यांनी या कवितांची जडणघडण कशी झाली आहे हे सांगितले आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे सामाजिक मूल्य असणाऱ्या या कविता लिहिताना त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांचा, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा, तात्कालीक घटनांचा खूप उपयोग झाला आहे. तरीही कवयित्रीची मूळ संवेदनशील वृत्ती, समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि केवळ स्त्री म्हणून नाही तर एकूणच माणसांकडे पाहण्याची समदृष्टी ही जागोजागी आपल्याला ठळकपणे जाणवते. म्हणूनच केवळ स्त्रीवादी लाटांमध्ये आलेले आणखी एक साहित्य असे याचे स्वरूप न राहता यापेक्षा अतिशय दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण, उच्च सामाजिक मूल्य व अभिरुचीपूर्ण असा हा वेगळा कवितासंग्रह आहे. 

हा कवितासंग्रह जरी पहिला असला तरी तो पहिला वाटत नाही. प्रत्येक कवितेमागे असणारी विचारधारा ही गेली अनेक वर्ष मनात, विचारात ,असणारी वाटते. सजगतेचे भान प्रत्येकच कवितेला आहे, म्हणूनच त्यांच्यामध्ये फार अलंकारिकता नाही परंतु जिवंतपणा 100% आहे. या कविता वाचणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रियांना ती आपली वाटणारी आहे. कारण या सर्वच जणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत , ठरत आहेत आणि ही विषमता दूर झाली पाहिजे, समाजव्यवस्था बदलली पाहिजे, याचं भान जवळपास प्रत्येक कवितेत आहे. स्त्री आणि पुरुष यापलीकडे जाऊन व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघण्याची किती गरज आहे, हे हा कवितासंग्रह जाणवून देतो. स्त्रीवादी म्हणाव्या अशा या कविताच नाही, तर त्या आहेत एक उत्तम समाजव्यवस्था कशी असली पाहिजे. त्यामध्ये माणूस हा माणसाप्रमाणे वागला पाहिजे न की रुढी परंपरा, लिंगभिन्नता, दुय्यमतेच्या ओझ्याखाली वाकलेल्या, जातीपाती, धर्म अधर्म, सुंदर कुरुपतेच्या  स्वनिर्मित काचामध्ये अडकून स्वतःचे आणि इतरांचे जीवन असह्य बनवलेल्या  राक्षसाप्रमाणे– सुंदर कोण या कवितेत या सगळ्या जीवन मूल्यांचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अतिशय सोप्या, सुबोध आणि छोट्या शब्दांमध्ये सुंदर या शब्दाचा अर्थ सांगताना सध्या समाजात जे समज झाले आहेत सुंदरतेचे, त्यावर त्यांनी अचूकपणे भाष्य केले आहे आणि ते अगदी आपल्याला तंतोतंत पटतेही .

‘मिरवू लागले’, या कवितेत ‘पुरोगामी’ या आजकाल प्रत्येकाने स्वतःला लावून घेतलेल्या बिरुदाचा फोलपणा दर्शवून दिला आहे. प्रत्येक स्वतःला विसरलेल्या बाईने वाचलाच पाहिजे असा हा संग्रह आहे. ‘ती’च्या उपजत निसर्गदत्त शक्तीचे यथायोग्य वर्णन कोणत्या न कोणत्या स्वरूपात प्रत्येक कवितेत वाचायला मिळते. उदाहरणार्थ :-

एक वाट सुटली तिची तरी

दुसरी तिला मिळत राहते

तिच्या उपजत कौशल्याने

ती वळण घेईल नव्याने जिकडे

नवी वाट तयार होते तिकडे…!

समतेचे धडे शिकवण्याची तीव्र गरज या कविता व्यक्त करतात. ते ही अतिशय सौम्य शब्दात. स्त्री पुरुष समानता या विषयावर कोणीही हल्ली उठून सवंग लिहीत असतो परंतु मुळात हा विषय समजून एक उत्तम सहजीवन कसं असावं आणि त्यामध्ये पुरुषांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे ही शिकवणारी कविता म्हणजे,’ शब्दाबाहेर’ अर्थात ती तुम्ही स्वतःच वाचली पाहिजे. याबरोबरच तडजोड आणि स्वतःत बदल या दोन गोष्टीचे महत्त्व ही  ‘प्रपंच ‘ नावाच्या कवितेत व्यक्त करून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व त्या निर्विवादपणे स्वीकारतात. तिची आय. क्यु. टेस्ट कराल का? ही कविता तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय वाचून पूर्ण होतच नाही. कारण आपल्या भारतातली प्रत्येक बाई यातल्या कोणत्या आणि कोणत्या ओळीत स्वतःला पाहतेच. यापेक्षा अधिक संवेदनशीलता काय असते ?’आरसा ‘ही कविता तर सर्वांनाच डोळ्यात अंजन घालणारी आहे. समान हक्क आणि वागणूक न देता, सन्मानांच्या हाराखाली जखडून ठेवणारी ही समाजव्यवस्था कधी कधी ‘ती’च्याही लक्षात येत नाही आणि हे स्वभान जागवण्याचं काम ही कविता करते. म्हणूनच ‘माणूस ती’ या कवितेत त्या म्हणतात :–

लक्ष्मी ना सरस्वती। ना अन्नपूर्णा।

सावित्रीची लेक। माणूस ती ।

दुर्गा अंबिका। कालिका चंडिका।

देव्हारा नको। माणुस ती…

सावित्रीचे ऋणही त्यांनी अगदी चपखल शब्दात फेडले आहे. जनावरांपेक्षा हीन,दीन लाचार होतो माणूस, आम्ही झालो माई तुझ्यामुळे । –या शब्दांची ओळख करून देणाऱ्या माईला शब्दफुलांच्या ओंजळीने कृतज्ञता वाहिली आहे, आपल्या सर्वांच्याच वतीने.

‘जोडीदार’ या कवितेत तर प्रत्येक स्त्रीला हा माझ्याच मनातला सहचर आहे असे वाटावे इतपत हे वर्णन जमले आहे आणि शेवटी या कल्पनाविलासातून बाहेर येत  ‘हे सत्यात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहतो तो खरा जोडीदार’ असे सांगून एक आशादायक वास्तव शेवटी आपल्यापुढे मांडतात.

तर एका लेकीच्या नजरेत बाप कसा असावा हे बाप माणूस– हे तर मुळातूनच वाचण्यासारखं. अशी ही कवयित्री विठ्ठलाला सुद्धा जाब विचारायला घाबरत नाही. सर्व जनांचा, भक्तांचा कैवारी पण त्याला तरी जोडीदाराची खबर आहे का? खरंतर रूपकात्मकच ही कविता. ज्याने त्याने जाणून घ्यावी अशी. ‘मैत्री जोडीदाराशी’  या कवितेत सुद्धा एक खूप आशादायी चित्र त्या निर्माण करतात, जे खूप अशक्य नाही . क्षणाची पत्नी ही अनंत काळची मैत्रीण तसेच क्षणाचा नवरा हा अनंत काळचा मित्र झाला तर नाती शोधायला घराबाहेर जाण्याची गरजच पडणार नाही असं आदर्श सहजीवन त्या उभं करतात. आणि शेवटी अतिशय समर्पक असा शेवट करताना कवयित्री म्हणते—-

‘तिचं शिक्षण बुद्धिमत्ता शक्ती युक्तीचीच गाळ करून चुलीत कोंबले नसते ….

लग्नानंतर त्याच्या इतकं तिच्या करिअरचा विचार झाला असता…. वांझ म्हणून हिणवलं नसतं, विधवा म्हणून हेटाळलं नसतं… तिच्या योनीपावित्र्याचा बाऊ झाला नसता… तर कदाचित  मी कविता केली नसती.

हा कदाचित खरोखर अस्तित्वात येण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचे योगदान येथे गरजेचे आहे .आपल्या बरोबरीने जगणाऱ्या एका माणसाला केवळ समाजव्यवस्था म्हणून रूढी परंपरा, जाती व्यवस्था, इत्यादी विषमतेच्या जोखडाखाली चिरडून टाकून ‘पुरोगामी’ म्हणून शिक्का मारून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. किमान याचे भान जरी समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये अल्प प्रमाणात का होईना जागे करण्याचे बळ या संग्रहामध्ये आहे. त्याबरोबरच जिच्या पंखांना ताकद देण्याची गरज आहे , जिच्या पंखावरचे जड ओझे भिरकावून द्यायची गरज आहे, अशा सर्व ‘ती’ ना आणि  सर्व जगातल्या  ‘ती’च्यावर आईपण व बाईपण याचे ओझे वाटू देणाऱ्या व्यवस्थेवर लेखणीने प्रहार करणारा हा कविता संग्रह निश्चितच समाजमन जागे करणारा आणि मानवतेच्या सर्व मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देणारा आहे, असे थोडक्यात याचे वर्णन करता येईल. बऱ्याच दिवसातून काही आशयसंपन्न वाचल्याचे समाधान देणारा कवितासंग्रह.

मी अभिनंदन करते कवयित्रीच्या शब्दभानाचे,  सौम्यवृत्तीचे, माणूसपण जपणाऱ्या भावनेचे आणि विवेकपूर्ण संयमी विचाराचे.

© डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘सृजनवलय’ –  श्री अशोक भांबुरे ☆ परिचय – सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर ☆

सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘सृजनवलय’ –  श्री अशोक भांबुरे ☆ परिचय – सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर ☆ 

(हिन्दी राष्ट्रभाषा पंडित, उर्दू भाषा अभ्यासक, प्रोफेशनल फोटोग्राफर किंचित कवयित्री अशी स्वतःची ओळख देणाऱ्या सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर यांनी ‘सृजनवलय’ या पुस्तकाचा परिचय खालीलप्रमाणे करून दिला आहे.)

पुस्तक – सृजनवलय

भाषा – मराठी

लेखक – कवि अशोक भांबुरे

प्रकाशक – संवेदना प्रकाशन

किंमत – रु.150

पृष्ठसंख्या – 96

पुस्तक परिचय- सुश्री कांचन पाडळकर

कवी अशोक भांबुरे हे माझ्या साहित्यिक ग्रुपचे सदस्य आहेत. तसेच अनेक काव्य संमेलनांमध्ये मी त्यांच्या कविता आणि गझल ऐकत असते. त्यांच्या कविता आणि गझल ह्या नेहमीच मनाला भावतात. नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा तिसरा काव्यसंग्रह “सृजनवलय” वाचला आणि अपेक्षेप्रमाणे या काव्यसंग्रहाने काव्यरसाची तहान ही पूर्णतः भागवली.

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

कवी अशोक भांबुरे यांची कविता निसर्ग, प्रेम,  सामाजिक-राजकीय दरी,  सामाजिक रूढी, स्त्री,  जाती-धर्माच्या भिंती यावर भावनिक भाष्य करते. पुस्तकाचं पहिलं पान उलटलं आणि  त्यांची पहिली गझल आवडली.

वेदना सांभाळते माझी गझल

अन  व्यथा कुरवाळते माझी गझल

*

कोण कुठला जात नाही माहिती

माणसांवर भाळते माझी गझल

स्त्री स्वतः विषयी, तिच्या दुःखाविषयी, वेदने विषयी लिहिते. पण कवी किंवा लेखकाने जेव्हा स्त्रीची वेदना अधोरेखित  केलेली असते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कवीने, त्या लेखकाने आपल्या भावनिक पातळीवर त्या गोष्टींची अनुभूती घेतलेली असते.

या काळया बुरख्यामागे मी किती दडविले अश्रू

पुरुषांची मक्तेदारी  नडताही आहे आले नाही

स्त्री आयुष्यभर आपल्या घरादारासाठी संसारासाठी झटत असते. समर्पणाची भावना निसर्गाने स्त्रीला  जन्मताःच बहाल केलेली आहे. स्त्री घराबाहेर पडते, नोकरी करते, संसार सांभाळते. पण हल्ली नोकरी न करणाऱ्या स्त्रीबद्दल, ” ती काय घरीच असते”  अशी सामान्य विचारधारा समाजाची काही ठिकाणी दिसून येते.  तिचं घरासाठी, मुलांसाठी दिवसभर कामात बिझी असणं  याकडे कोणी लक्ष देत नाही. यावर भाष्य करणारे काही  काही शेर सुंदरपणे मांडले आहे…..

कामाला ती जात कुठेही नाही बहुदा

सातत्याने घरी स्वतःची हाडे दळते

*

 वेदनेतुनी प्रकाश देते कुणा कळेना

समई मधली वात जळावी तशीच जळते

कवीने स्त्री विषयी फक्त व्यथाच मांडलेली नाही,तर आशावादही व्यक्त केला आहे…

काळासोबत झुंजायाला तयार नारी

लेक लाडकी पुढे पुढे ही जावी म्हणतो

जाती-धर्माच्या भिंती आणि समाजातील रूढी, प्रथा, परंपरा  यावर लक्ष केंद्रित करणारे ही काही शेर आहेत.जसे…..

धर्माचे छप्पर होते, जातीच्या विशाल भिंती

मज सागरात प्रीतीच्या बुडता ही आले नाही

*

सारे पसंत तरीही फुटली न का सुपारी

नाकारताच हुंडा सारे उठून गेले

समाजात वावरणाऱ्या माणसाची वृत्ती आणि विरोधाभास यावरचा पुढील शेर वाचला आणि मला  अचानक काही लोकांची आठवण झाली.

ढोंगीपणा करूनी आयुष्य भोगतो जो

त्याचे म्हणे घराणे गावात थोर आहे

कवीचे मन फक्त माणूस आणि त्याच्या भावना इतकच फक्त सीमित नसतं. तर त्यामध्ये असते संवेदना. ती मग फुलांविषयी असेल, झाडांविषयी असेल, पक्षी-प्राण्यांविषयी असेल. हल्ली खरी   जंगलं नष्ट होऊन माणसाने जे सिमेंटची जंगलं उभारली आहेत  त्याचा वन्य जीवनावर  झालेल्या परिणामाबद्दल कवी  म्हणतात…

वस्तीत श्वापदांच्या वस्ती उभारतो अन्

मिळते जनावरांना शिक्षा कठोर आहे

या पुस्तकातली खूप आवडलेली एक  गझल, त्यातले काही शेर आपल्यासमोर मांडते…..

देखणेपणास गंध, शाप हाच वाटतो

फास देऊनी फुलास, माळतात माणसे

*

बाण लागला उरात, जखम चिघळली अशी

मीठ नेमके तिथेच चोळतात माणसे

*

घातपात, खून हेच कर्म मानतात जे

साळसुद ही स्वतःस समजतात माणसे

*

द्रौपदी पणास लाव डाव थांबवू नको

हा जुगार रोजचाच खेळतात माणसे

समाजात वावरणाऱ्या मानवरुपी दानवाचा विनाश होण्याची प्रार्थना ही कवी करतात. कवी म्हणतात की….

नटराजा तू पुन्हा एकदा कर रे तांडव

टाक चिरडूनी धरती वरचे सारे दानव

कवी अशोक भांबुरे यांची कविता प्रेरणेने भरलेली आहे. सामाजिक वैयक्तिक जीवनाचे दुःखच फक्त कुरवाळत न बसता  स्वतःच्या वर्तनाचा, कष्टाचा माणसाने वेध घ्यावा. आपला दृष्टिकोन विधायक असावा या विचाराचा कवी  आग्रह करताना दिसून येतं….

घमेंड नाही जीत ठेवली होती त्याने

ससा हरला आणि जिंकले येथे कासव

*

कष्टात राम आहे त्याला कसे कळावे

हा राम राम म्हणतो नुसताच खाटल्यावर

*

दगडात सावळ्या तू दिसतो जरी मनोहर

माहित हे मला ही तू सोसलेस रे घण

ईश्वराच्या सुंदर मूर्तीलाही पूजनीय होण्यासाठी अनेक घाव सोसून आकारलला यावं लागतं. तेव्हाच मूर्ती समोर सगळे नतमस्तक होतात.

वादळातही दोर प्रीतीचा तुटला नाही

भिरभिरणारा पतंग माझा कटला नाही

 प्रेमाचा प्रांत ही कवीने खूप सुंदररित्या रेखाटला आहे. सृजनवलया काव्यसंग्रहात एकूण 95  कविता आहेत. मुक्तछंदातल्या कविता गझल लावणी, गोंधळ जोगवा तसेच शिवराय आणि जिजाऊंच्या कर्तुत्वावर  केलेल्या रचनाही सुंदर आहेत. पुस्तकाला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना आहे.

साहित्याने पोट भरत नसतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काहीवेळा साहित्यिकाला येत असतात. व्यक्त होणे ही माणसात असलेली नैसर्गिक बाब आहे. साहित्याने पोट भरत नसलं तरी एका सुज्ञ आणि रसिक माणसाला साहित्यिक भूक असते. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याद्वारे विधायक बदल आपल्या जीवनात आणि समाजात व्हावे ही साहित्यिकाची अपेक्षा असते. असे विचार कवी अशोक भामरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे. काही शेर….

या तापसी युगाचा आता करूच अंत

हृदयात एक एक जागा करून संत

*

 देऊ प्रकाश स्वप्ने बदलून टाकू सर्व

 इतकेच स्वप्न माझे व्हावे इथे दिगंत

या पुस्तकातील सर्वच काव्य प्रकार छान आहेत. पण यातल्या गझल  मला विशेषतः खूप जास्त भावल्या.

ते माझं गजले वर मनस्वी प्रेम असल्यामुळे असेल बहुदा.

सुचल्या न चार ओळी हे रक्त आटल्यावर

आली बघा गझल ही काळीज फाटल्यावर

बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला उत्तम लेखक वावरत असतात, उत्तम कवी वावरत असतात पण आपल लक्ष फारसं त्यांच्याकडे जात नाही. प्रसिद्ध होण्याची हातोटी त्यांच्याकडे नसावी बहुतेक, अन् ना ही प्रसिद्धीची हाव असावी. तर  बऱ्याचदा काहींचं लिखाण मात्र जिमतेम असूनही प्रसिद्ध कसं व्हावं यांची कला अवगत असल्यामुळे ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतात. आपल्या आजूबाजूला जी माणसं साधी सरळ आहेत. ते लिखाणातनं व्यक्त होत असतात. लिखाणही उत्तम असतं.त्यांना कोणत्याही काही अपेक्षा नसतात  तरी ते रसिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे साहित्याची जाण असणाऱ्या आपण सर्व आणि साहित्यिकाची कदर करणारे आपण सर्व परिचित नसलेल्या पण चांगल्या साहित्यिकाची ओळख करून द्यावी म्हणून हा पुस्तक परिचय आपणापर्यंत पोहोचवते. चांगली माणसं चांगल्या माणसांपर्यंत पोहोचवावी आणि जुळावी असं मला मनापासून वाटतं.

© सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वप्नांचे पंख’ – सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वप्नांचे पंख’ – सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

लेखिका :  सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी

प्रकाशक: अरिहंत पब्लिकेशन, पुणे

पृष्ठसंख्या: १९२

किंमत: रू. 290/-

परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर.

साहित्यप्रेमींचा तसेच साहित्यिकांचा आवडता, नव्हे काहीसा जिव्हाळ्याचा साहित्यप्रकार म्हणजे कथा.

छोट्यामोठ्या,वेगवेगळ्या विषयावरच्या कथा वाचकांनाही आवडतात.

अशाच कथांचा समावेश असलेला कथासंग्रह म्हणुन स्वप्नांचे पंख या कथासंग्रहाचा उल्लेख करता येईल..

लेखिका आहेत कोथरुड,पुणे येथील शुभदा भास्कर कुलकर्णी.

त्यांचा भावफुले हा काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर हा कथासंग्रह.

या कथासंग्रहात लेखिकेने नुसतीच स्वप्ने दाखवली नाहीत तर त्यांची परिपूर्ती होण्यासाठी –उत्तुंग आकाशातून भरारी घेण्यासाठी  त्यांना पंखांचे बळ दिले. हे स्वप्नांचे पंख या नावावरुन दिसुन येते.

निळ्या प्रसन्न रंगातली मुखपृष्ठ आकर्षक आणि शिर्षकाला साजेसे आहे.

नाव, आशय-विषय, प्रसंग, व्यक्ती, स्थळ, काळ, भाषा या सर्वांची सहजसुंदर, मोहक गुंफण असेल तर कथा मनोवेधक होऊन वाचनाचा आनंद मिळतोच पण त्यातुन जीवनोपयोगी बोधपर संदेश मिळत असेल तर दर्जा अधिक उंचावतो.

या संग्रहातील शुभदाताईंच्या  कथा या कसोटीवर पुरेपुर उतरल्या आहेत हे आवर्जुन नमुद करावेसे वाटते ..अनेक कथा बक्षीसपात्र ठरल्या आहेत हाच त्याचा पुरावा म्हणता येईल.तरीही पुष्ट्यर्थ काही दाखले निश्चितच  देता येतील.

“स्वप्नांचे पंख”ही पहिलीच शिर्षक कथा आहे.,”एक कळी– फुलतांना”,सुवर्णमध्य”,सुखदुःख”,

“सोनेरी वळण”,”फुललेले चांदणे”

“स्मृतीगंध””,”ऊषःकाल”

अशी ही कथांची नांवे नुसतीच आकर्षक नाहीत तर कथेचा आशय -विषय प्रतित करणारी—जणु काही कथांचे आरसेच आहेत.

कथांचे प्रसंगही तसे साधेसुधे, अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातले.

जसे—तारुण्यसुलभ प्रेम, लग्न, मुलांचे शिक्षण, पुढील  शिक्षणासाठी परदेशगमन, प्रवास, मुलींची छेड, मृत्यु, ई. पण शुभदाताईंनी कथेतुन ते वेगवेगळ्याप्रकारे मांडले आहेत.

त्यातुन  त्यांची चिकित्सक दृष्टी दिसते.

शांता, ईंदिरा, रमा, मुक्ता, माया, चारु, दीपा, राजश्री, मीता, श्रीराम, श्रीकांत, महेश, अनंत, आनंद, सुमित, अमित अशी नवीजुनी नावे असलेल्या वेगवेगळ्या कथेतील अनेक नव्हे सर्वच व्यक्तिरेखा आपल्याभोवती वावरणाऱ्या आहेत.असेच वाचतांना वाटते.

नव्हे आपणही त्यातलेच आहोत असेही वाटते.”स्वप्नांचे पंखमधील” –आई–मानसीचा मनातील धास्ती आपणही अनुभवलेली जाणवते. तर “गोफ–आयुष्याचा” मधील “मुलांकडे जावे की इथेच रहावे” हा निर्णय घेतांना गोंधळलेल्या आईच्या जागी कितीतरी जणी स्वतःलाच पहातील.”

“रंगबावरी” सारखी प्रेमकथा मनाला स्पर्श करुन जाते.

काही कथातुन आलेल्या, मामंजी, सासुबाई, माई, दी, आत्या अशा संबोधनांमुळे आपुलकीचे नाते निर्माण होते.

कथांची पार्श्वभुमी वेगवेगळ्या काळातील आहे. लाल आलवणाचा पदराचा बोळा तोंडात कोंबून हुंदका देणारी आत्या “स्मृतीगंध” मध्ये आपल्या डोळ्यातुन पाणी आणते. तर “सुवर्णमध्य”मधे लग्नाला ठामपणे नकार देणारी, नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतली  मीता सुखावून जाते. काही कथातुन शुभदाताईंनी. आजीआजोबा.

आईबाबा, नातवंडे अशा तीन पिढ्यांची, केलेली गुंफण मनाला भावते. पण त्याचबरोबर झालेले बदल ही  योग्य प्रकारे टिपले आहेत. “घराचे जुने चिरे एक एक करुन ढासळले पण नव्याने नविन उभे राहिले.” अशा शब्दात केलेले बदलांचे समर्थन मनाला पटते. शुभदाताईंचा समृध्द अनुभवही यातुन दिसतो.

शहरातील कथा नेमक्या पध्दतीने सांगणारी शुभदाताईंची लेखणी गावाकडचे —तिथल्या स्थळांचे वर्णन करतांना जास्त खुलते. शिंगणापूर, बेलापूर अशी गावे. तिथली हिरवीगार शेती, तिथले पाण्याचे तळे, थंडगार पाण्याचा पाट, घुंगरांची गाडी, एस.टी. स्टँड, गणपती, शंभु-महादेवाची देवळे, चौसोपी वाडा, दिंडी दरवाजा, दगडी चौथरा, दारावरची पितळी फुले आणि इतके बारीकसारीक वर्णन वाचतांना ती स्थळे, दृश्य डोळ्यापुढे उभे रहातात. शुभदाताईंचे सुक्ष्म निरीक्षण आणि समर्पक शब्दांतून केलेले वर्णन —दाद देण्यासारखेच आहे.

कथांची एकंदरित बैठक घरगुती असल्यामुळे साध्या सोप्या बोली भाषेचा वापर संयुक्तिक आहे. तरीही अनेक ठिकाणी शब्दसामर्थ्य दाखवणारी वाक्येही आहेत.

“आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्तच रुजलाय हा मनात, -अन् मनाच्या गाभाऱ्यातुन हुंकार आला.” -सुवर्णमध्य.

“आयुष्याचे एक एक पदर सांभाळता ,सांभाळता हा एक धागा हातातुन निसटला”.

मध्यमवर्गीयांच्या जीवनात नित्य येणाऱ्या काही अडचणी, समस्या —कथांचा केंद्रबिंदू असल्याने काही कथा नकळत का होईना  थोडाफार संदेश देतात. “संपलं, —संपलं म्हणायच नाही”.

“आपल्या जगण्याचे निर्णय आपण इतरांमार्फत का घ्यायचे?”.

एक खास वैशिष्ठ्य म्हणुन सांगता येईल —

“सकारात्मकता हा सर्वच कथांचा स्थायीभाव आहे. मतभेद, विचारात फरक आहेत, जरुर आहेत. पण वैमनस्य, विरोधामुळे टोकाच्या भुमिका नाहीत, सामंजस्य, आणि परिस्थिती स्विकारुन पुढे आयुष्य जगणे हा महत्वाचा संदेश मिळतो.. आणि तोच सद्यपरिस्थितीत ऊपयुक्त आहे.

कौटुंबिक, सामाजिक, –सर्वच ठिकाणी अनुभवाला येणारी अस्थिरता, असमाधान, यामुळे नैराश्य आणि नकारात्मक भावना. अशावेळी सकारात्मक कथा निश्चितच भावतात. मनाला आनंदित करतात. जगण्याचा दृष्टीकोन बदलतात. म्हणुनच वाचकांच्या पसंतीस उतरेल. 

असा सुंदर कथासंग्रह वाचकांच्या हाती दिल्याबद्दल —-लेखिकेचे मनःपुर्वक अभिनंदन—

एकुण १८ कथा असलेल्या या कथासंग्रहाची पृष्ठसंख्या १९२ असुन किंमत २९०रु.आहे.अरिहंत पब्लिकेशन,*पुणे * यांनी हे पुस्तक जानेवारी २०२२ मध्ये प्रकाशित केले.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे – 411038 

दुरध्वनी – 9403862565, 9209301430 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

Image result for पुत्रकामेष्टि अनिल बर्वे

पुस्तकाचे नाव – पुत्रकामेष्टी (नाटक)

लेखक – श्री अनिल बर्वे

पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठे – ८०

मूल्य – १२ रुपये

अमेज़न लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

फ्लिपकार्ट लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

 

पुत्रकामेष्टी (नाटक) – (एक आस्वादन)

पुत्रकामेष्टी हे अनिल बर्वे यांचं भन्नाट नाटक. मर्मस्पर्शी. मर्मस्पर्शी की मर्मभेदी ? बी.के. मोठ्या इंडस्ट्रीचा मालक. आहे. त्याचं आपल्या पत्नीवर, उर्मिलावर निरातीशय प्रेम आहे. पैशाने विकत घेता येणारी सारी सुखे त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहेत. पैशाने विकत घेता न येणारे सुख म्हणजे आपत्यप्राप्ती. ते मात्र त्यांच्याकडे नाही. त्यासाठी उर्मिला वेडी-पिशी झालेली आहे. मूल न होण्याचं कारण? हनीमूनच्या वेळी त्यांच्या गाडीला झालेला अपघात आणि त्याचा परिणाम म्हणजे उर्मिलाचं गर्भाशय काढावं लागणं. ती बी.के.च्या मागे लागते की त्याने घटस्फोट घ्यावा आणि दुसरं लग्नं करावं. बी.के.ला ते मान्य नाही. तो उपाय सुचवतो, आंनाथश्रमातून मूल दत्तक घ्यावं, पण ते उर्मिलाला मान्य नाही. तिला बी.के.चं स्वत:चं मूल हवय. त्यासाठी उर्मिला उपाय सुचवते, एखाद्या वेश्येचा उपयोग करायचा. म्हणजे आपत्यप्राप्ती  हेही सुख पैशाने मिळवता येईल, याबद्दल तिला खात्री आहे. ती म्हणते, ‘थोड्याशा पैशासाठी वेश्या रात्रीपुरतं शरीर भाड्याने देते. आपण दीड-दोन वर्षांसाठी तिला भाड्याने घ्यायचं. ह्युमन इनक्युबेटर. तिच्या गर्भाशयात आपलं मूल वाढवायचं.’ ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायचे. हा सौदा झाला. आपल्या इच्छेने ते तिच्या गर्भाशयात वाढेल.

बी. के. ला अर्थातच हे मान्य नाही. पण राजा युक्तिवाद करत, बी. के. ला हे मान्य करायला लावतो. राजा हा बी. के. इंडस्ट्रीचा लीगल अॅकडव्हायझर. त्या दोघांचा मित्र. उर्मिलाचा मानलेला भाऊ. तो एखाद्या अस्तरासारखा त्यांच्या आयुष्याला चिकटून आहे. नाटकात त्याची भूमिका बी. के.च्या पर्सनल अॅथडव्हायझरची. राजा आणि बी. के. अशा वेश्येचा शोध घेतात. तिथे त्यांची गाठ पडते. छंदिता… छंदाशी आणि इथे त्रिकोणाचा तिसरा बिंदू अवतीर्ण होतो.

छंदिताशी बोलण्यातून पुढे कळत जातं, ती मुरळी आहे. दहाव्या वर्षीच तिच्या आई-वडलांनी तिचे खंडोबाशी लग्नं लावून दिले आहे आणि तेव्हापासून तिला धंद्याला लावले आहे. बी. के. तिला स्पष्टच सांगतो, त्याला तिच्यापासून मूल हवे आहे. त्यासाठी तो वाटेल तितके पैसे तिला द्यायला तयार आहे, पण तिने मुलावर कोणताच हक्क सांगता कामा नये. दोन लाख रुपयांच्या बदल्यात ती हे काम करायला खुशीने तयार होते.

बी.के.आणि राजा छंदिताला घेऊन पाचगणीला येतात. इथे पाहुणीच्या सोबतीसाठी आणि लक्ष ठेवायला बहाद्दूर आणि माळीण आहे. उर्मीलाही इथेच येऊन रहाते. बी.के. ला झालेलं मूल उर्मिलाचं आहे, असं जगाला भासवायचय म्हणून तो तिचं  बाळंतपण स्वित्झर्लंडला करायचं ठरवतो. छंदाला सहा महीने होतात. बाळ पोटात गडबड करू लागतं आणि छंदाचं ममत्व एकदम जागं होतं. तिच्या स्वभावात , विचारात बदल होतो. बी. के. च्या इच्छेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे ती केवळ मानवी इनक्युबेटर रहात नाही. तिच्या भावना, तिचं वात्सल्य जागृत होतं. बाळ दोन माहिन्याचं होतं. बी.के. तिला हाकलून देतो. बाळाचा ताबा मिळवण्यासाठी ती कोर्टात जाते. एरवी बी.के.ची सतत पाठराखण करणारा राजा इथे मात्र वकील म्हणून छंदीताच्या बाजूने उभा आहे. प्रेक्षकच न्यायाधीश आहेत. निकाल छंदाच्या बाजूने लागतो. ती मुलाला घेऊन जाऊ लागते. म्हातार्यान माळिणीला मात्र वाटतं, असे गुंते कोर्टात सुटत नाहीत. एका झाडाचं कलम दुसर्याा झाडावर करायचं, तर ते हलक्या हाताने, मायेने करायला हवं. ती छंदिताशी बोलते. तिच्या बोलण्यातून छंदिताला जाणवतं, बाळाला चांगल्या रीतीने वाढवणं, त्याचं नीट पालन-पोषण करणं कसं अवघड आहे, नव्हे अशक्य आहे. ती बाळाला ठेवून जाते. उर्मिलाने दिलेले दोन लाख रुपयेही ठेवून जाते. बी.के. शक्तिपात झाल्यासारखा कोचावर बसतो आणि ओक्साबोक्षी रडू लागतो. नाटक संपते.

नाटक शोकांत आहे, पण यात रूढार्थाने कुणी खलनायक वा खलनायिका नाही. असलीच तर नियती खलनायिका आहे. सार्या  शोकांतिकेचे मूळ उर्मिलेच्या मुलाविषयीच्या असोशीतव आहे. तिला मूल हवाय, पण ते अनाथाश्रमातलं नकोय. त्याचे कारणही तिच्या बालपणीच्या आठवणीत आहे. राजा तिला सख्खा भाऊ वाटत असतो, पीएन राजाला जेव्हा कळतं की तो आश्रित आहे. तेव्हा त्याचं वागणं एकदम बदलतं आणि तो ‘मानलेला’ भाऊ होतो. तिला वाटतं दत्तक मुलाला मोठा झाल्यावर वस्तूशिती कळली आणि तोही असाच बदलला तर? म्हणून तिला ते नकोय. ती आग्रह धरते, कुणा वेश्येचा यासाठी वापर करावा. ह्युमन इनक्यूबेटर. त्याप्रमाणे छंदीता ही वेश्या दोन लाख रुपयाच्या मोबदल्यातत्या घराण्याला वारस द्यायचं कबूल करते. पुढे तिला दिवस रहातात.

एकदा घरातली वयस्क माळीण, उर्मिला आणि छंदीता बोलत असतात. बोलता बोलता माळीण म्हणते,’ निपुत्रिक होता म्हणून राजा दशरथाने ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ केला… तुम्हीदेखील असाच यज्ञ करताय ग… अग यज्ञ करायचा झाला, म्हणजे हवन करावं लागतं. बळी द्यावा लागतो. … तुम्ही तिघंही गुणी लेकरं ग. … तुमच्यापैकी कुणाचा बळी जाणार, काळजी वाटते. भीती वाटते मनाला.’ तिचं बोलणं म्हणजे भविष्यातील घटनेचं सूचनाच आहे.

यातील व्यक्तिरेखा लेखकाने अतिशय कुशलतेने विकसित केल्या आहेत. बी. के. मोठा उद्योगपती. धांनवंत. यशवंत. त्याचे उर्मिलेवर हिरातीशय प्रेमाहे. तो व्यवहारीही आहे. उर्मिला मुलासाठी वेदी-पिशी झालेली आहे. ती वेद लागण्याची सीमा गाठू शकते, हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो तिचा अव्यवहार्य हट्ट पुरवतो. छंदिताला तो मानवी इनक्यूबेटर मानतो. त्याला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, कणव आहे, हे त्याच्या वेळोवेळी बोलण्यातून जाणवतं, पण त्याला तिची भावनिक गुंतवणूक नकोय. ती मुलाचा ताबा द्यायला नकार देते, तेव्हा तो तिच्याबद्दल अतिशय जहरी उद्गार काढतो. रांड, बाजारबसवी, हरामजाडी… वगैरे.. वगैरे… जेव्हा त्याला कळतं, ती मुलाला ठेवून गेलीय, पैसेही न घेता गेलीय, तेव्हा तो पराभूत होतो. कोचावर बसतो आणि ओक्साबोक्शी रडू लागतो.

उर्मिलेचे बी. के. वर अतिशय प्रेम आहे. ती सरळ स्वभावाची आहे. छंदिताशी ती माणुसकीने, मायेने वागते. राजा कंपनीचा लीगल अॅहडव्हायजर. तो बी.के. आणि उर्मिलेच्या जीवनाला अस्तरासारखा चिकटलेला आहे. वृद्धा माळीणीने जग पाहिलाय. ती शहाणपणाचं बोलते.

नाटकातले संवाद मोठे रेखीव आणि नेटके आहे. जी ती पात्रे आपापल्या भाषेत बोलतात, लेखकाच्या भाषेत नाही.   छंदिताला मुलाचा ताबा मिळालाय आणि ती घर सोडून निघालीय.  आता माळीणाबाई आणि तिच्यातला संवाद बघा-

माळीण- छंदा पोरी, चांगलं झाला हो…तुला तुझं बाळ मिळालं. पण बाळाचं घर गेलं ग…   बाळाचं घर गेलं. कुठं जाणार तू आता? … पुन्हा कोठयात?

छंदा- नाय

माळीण- नकोच जाऊस हो. नकोच जाऊस. कोणत्याही पोराला ‘रांडेचा’ म्हटलेलं आवडायचं नाही. … मग जाणार कुठे तू आता?

छंदा – देवाच्या जगात कुठेही.

माळीण- जग देवाचंच ग .. पण देव दगडाचा … उखाण्यात सांगायला गोड वाटतं… आभाळाचं  छ्प्पर! पण त्याच्याखाली राहाता येत नाही हो. राहाता येत असतं, तर टिनाची छपरं कशाला बांधली असती माणसांनी? ( छंदा निरुत्तर ) कामधंदा काय करणार?

छंदा – कुठं तरी मोलमजुरी

माळीण- चांगली हो. घामाची कष्टाची भाकरी खूप चांगली. पण छंदा पोरी… घाम गाळून  पोटापुरती भाकरी भाकरी मिळेल, बाळापुरतं दूध नाही मिळणार. … दूध खूप महाग असतं. तू असं कर. … भाताची पेज देत जा त्याला….

छंदा – अं?

माळीण- आता भाताच्या पेजेत दुधाचं बाळसं कुठलं असायला? बाळ हडकेल जरासा. .. पण जीवंत राहील हो. जीवंत राहील.

राजाने कोर्टात केलेले भाषण म्हणजे तर मास्टर पीस म्हणावा लागेल. भावी काळात निर्माण होऊ शकणार्यान समस्येकडे तो संकेत करतो. छंदीताने 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात मानवी टेस्ट ट्यूब म्हणून काम कारायचे, बी. के. च्या मुलाला जन्म द्यायचे कबूल केलेले असते. पण नंतर ती त्या मुळावर हक्क सांगते. राजा म्हणतो, ‘भावी काळात टेस्ट ट्यूबचा प्रयोग यशस्वी झाला, तर निर्जीव टेस्टट्यूबज तुमच्यापुढे तुमच्यापुढे येणार नाहीत. मग?

मग न्यायाधीश महाराज त्या टेस्टट्यूबजचा वापर फक्त बी.के. ऊर्मिला सारखी निपुत्रिक जोडपीच वात्सल्यपूर्तीसाथी करणार नाहीत…. तर प्रत्येक चांगल्या शोधाचा स्वार्थासाठी दुरुपयोग करणार्याा दुष्टशक्तींचाही वापर करतील स्मगलर, गुंड, व्यापारी, सावकार, जमीनदार… तरुण मुला-मुलींकडून रक्त विकत घेतल्याप्रमाणे त्यांची बीजं विकत घेतील. टेस्टट्यूबमधून मुलं काढतील… ज्या मुलांना नसेल आई.. नसेल बाप… असेल फक्त मालक! गुलामांच्या पिढ्यांच्या पिढ्या तयार होतील.’

भावी अनर्थाचे अंगावर शहारा उमटवणारे भीषण चित्र तो पुढे उभे करतो.

तो म्हणतो, ‘मूल विकत घेतलं काय आणि मुलाला जन्म देणारी आई भाड्याने घेतली काय, या व्यवहारात खरदी-विक्री अंतर्भूत आहेच.’

न्यायाधीशाने कोणताही निर्णय दिला तरी तो क्रूरच असणार आहे. राजा म्हणतो, ‘तरीपण असा क्रूर निर्णय द्या – फक्त यांच्याताला कोणीही बळी जावो… पुढल्या पिढ्या बळी जाणार नाहीत…. समाजाचं भवितव्य धोक्यात येणार नाही.’

निर्णय होतो. मुलाचा ताबा छंदाला मिळतो. वैयक्तिक समस्येपासून सुरू झालेलं नाटक एका अनर्थ करू शकणार्यार विलक्षण आशा सामाजिक समस्येचं सूचन करतं. प्रेक्षक – वाचक यात गुंतत जातो. 

अगदी आवर्जून बघावं निदान वाचावं असं आहे ‘पुत्रकामेष्टी’ नाटक.

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

Deha Jhala Chandanacha (देह झाला चंदनाचा : स्वाध्यायाप्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित काद

लेखक -राजेंद्र खेर

प्रकाशक- विहंग प्रकाशन, पुणे  

पृष्ठ संख्या – 501

स्वाध्याय प्रणेते पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील ही सत्याधिष्ठीत कादंबरी…

पांडुरंग शास्त्री आठवले यांची ओळख “ स्वाध्याय “ या त्यांच्या कामामुळे माहीत होती. परंतू त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. ही कादंबरी जेव्हा वाचली तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला.

कादंबरीची सुरुवात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या, ते जपान भेटीला गेले असताना टोकियो विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या झालेल्या प्रतिक्रियेने होते.

जपानी लोकांची जलद हालचाल, आदर्श वागणं, आणि सतत कामात असणं, त्यांना भावलं होतं ! पुढे पांडुरंगशास्त्रींच्या जीवनाचा आलेख उलगडत जातो.

रोह्यासारख्या लहान गावात त्यांचे बालपणीचे दिवस गेले. आजोबांच्या सहवासात हिंदू धर्माचे प्रेम वाढीस लागले. परदेशात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. प्रभू-कार्यालाच वाहून घेण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. श्रीकृष्ण हा त्यांचा आदर्श होता. दीनदुबळ्यांना मदत करण्याची इच्छा होती. आजोळचे लक्ष्मणशास्त्री आठवले हे त्यांचे आजोबा. त्यांचा प्रभाव पांडुरंगशास्त्रींवर होता.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिष्यगण वसई, गुजरात बॉर्डर, या भागात अधिक होते. त्यांच्या सकाळच्या फेरीमध्ये त्यांचे शिष्यगण लोकांना ईश्वराचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत. कोळी समाजातील लोकांत त्यांचा वावर अधिक होता. खालच्या समाजातील बरेच लोक दारूच्या आहारी जातात. त्या दारूच्या आकर्षणापासून त्यांना मुक्त करण्याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी या समाजातील लोकांच्या वस्तीत त्यांचे लोक भक्ती-फेरी काढत असत. श्रीकृष्ण हा सर्वांसाठी आदर्श देव आहे असे ते मानत. आपल्या आश्रमाच्या जागेवर त्यांनी कृष्ण मंदिर उभारले होते. तिथे लोक एकत्र येत असत. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. जेव्हा लोक एकत्र येत असत तेव्हा ते त्यांना देवपूजेबरोबरच कामाचे महत्त्व पटवून देत असत. पांडुरंगशास्त्री यांच्या अनुयायांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता. विशेष करून आगरी, कोळी लोकांच्या समाजात त्यांनी कार्य केले.

या कादंबरीतून पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनाचा चांगला परिचय होतो. एक सच्चा हिंदू धर्माचा प्रेमी, सर्व जगात आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देणारी व्यक्ती, म्हणून त्यांचा गौरव होतो. समाजातील सर्व स्तरात त्यांचा वावर होता. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत….. परंतू त्यांनी स्वतःच्या आश्रमासाठी श्रीमंतांकडून अजिबात पैसा घेतला नाही. अतिशय निरपेक्षपणे काम केले आणि लोकांमध्ये जागृती केली. त्यांच्या या सर्व कामात त्यांच्या पत्नीची तसेच त्यांच्या मुलीची त्यांना चांगली साथ मिळाली. आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक चांगल्या व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांच्यामुळे हिंदू धर्माची व्याप्ती आणि महत्त्व सर्वांना समजले.

ही कादंबरी मला आवडली कारण साधी, सोपी ओघवती भाषा, आणि आवडीचा विषय ‘ हिंदू धर्म! ’. आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक, तसेच सनातन असा आहे. हिंदू धर्मात सर्वांचा आदर केला जातो.  हिंदू धर्माची शिकवण या कादंबरीत चांगल्या प्रकारे विशद केली आहे. तसेच पांडुरंगशास्त्री यांचे व्यक्तिमत्त्वही  या कादंबरीतून चांगले कळून येते..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सरमिसळ… श्री प्रमोद वामन वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ सरमिसळ… श्री प्रमोद वामन वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

पुस्तकाचे नाव—– सरमिसळ

लेखक—- प्रमोद वामन वर्तक

मुद्रक— सुविधा एंटरप्राइजेस ठाणे

मूल्य—- सप्रेम भेट

प्रकाशन – ग्रंथाली

श्री प्रमोद वर्तक यांच्या ‘सरमिसळ’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ठाणे येथे संपन्न झाले. रिझर्व बँकेचे हाऊस मॅगझिन ‘विदाऊट रिझर्व’ मधून त्यांचा साहित्य प्रवास सुरू झाला.  तेथील मराठी साहित्य मंडळाच्या भित्ती पत्रकात लिहिलेले त्यांचे ताज्या घडामोडींवरील  खुसखुशीत लेख वाचकांच्या पसंतीला उतरू लागले. तसेच त्यांनी बँकेच्या स्पोर्ट्स क्लबने आयोजिलेल्या एकांकिका स्पर्धेत दुसरे बक्षीसही पटकावले.

सातत्य हा प्रमोद वर्तक यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. सिंगापूर मुक्कामी त्यांच्या साहित्यकलेला बहर आला. कविता, चारोळ्या, ललित लेखन, विनोदी प्रहसने अशा वाङ्मयाच्या अनेक शाखांमधून त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. सिंगापूरच्या मराठी मंडळातही बाजी मारली. मंडळांने आयोजिलेल्या कविता स्पर्धेत मधुराणी प्रभुलकर यांनी प्रमोद यांच्या  कवितेची निवड केली आणि सिंगापूर मराठी मंडळाच्या वेब सिरीज मध्ये ती कविता सादर करून प्रमोद यांनी मानाचे पान पटकावले.

आपल्या समूहावरील लेखनामधून त्यांच्या सर्वस्पर्शी लिखाणाचा परिचय आपल्याला झाला आहे. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कथा, कविता, ललित लेख आपल्याला भेटतात आणि दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतात.

‘सरमिसळ’ पुस्तकाच्या तीन भागांपैकी पहिल्या भागात त्यांनी सर्वसाधारणपणे एक शब्द घेऊन त्याचा विस्तार केला आहे. हे वाचताना आपण आपलेच अनुभव वाचीत आहोत असे वाटते.  जेव्हा लेखकाच्या लेखणीतून आपल्यापर्यंत ते अनुभव पोहोचतात तेव्हा वेगळीच गंमत आणतात. या दृष्टीने यातील चिमटा, वजन ,पायरी, प्रश्न असे अनेक लेख वाचण्यासारखे आहेत.

श्री प्रमोद वामन वर्तक

सिंगापूरच्या वास्तव्यामध्ये त्यांच्या लेखणीला अधिक बहर आला. मोरू आणि पंत यांच्यातील चाळीच्या पार्श्वभूमीवरील खुसखुशीत संवाद, त्यांची मजेशीर प्रश्नोत्तरे  आपल्याला अगदी जवळची वाटतात. तसेच पती- पत्नीमधील कौटुंबिक रुसवे फुगवे, खटकेबाज संवाद आणि गोड शेवट  संवाद रूपाने आपल्या मनात रेंगाळत राहतात. पुस्तकाचा  तिसरा भाग कवितांचा आहे. कविता म्हणजे काय? ती कशी सुचते? कशी व्यक्त होते? मनातल्या आणि जगातल्या अनेक विषयांवर त्यांची कविता सहज शब्द रूपाने भेटते. या दृष्टीने पाठमोरी, राधेचा शेला, आभाळाची तीट, रंग महाल, मन पाखरू पाखरू अशा कविता आवर्जून वाचण्यासारख्या आहेत. विविध दिवाळी अंकातून त्यांचे लेख ,कविता आपल्याला भेटतात आणि दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतात.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. मुंबईला दादरच्या ‘अहमद सेलर’  बिल्डिंगमध्ये त्यांच्या आयुष्याचा बराच काळ गेला. त्या चाळीच्या  चित्राची झलक मुखपृष्ठावर आहे. ही चाळीची पार्श्वभूमी त्यांच्या लेखांमधूनही आपल्याला दिसते. एक चित्र अर्थातच रिझर्व बँकेचे! जिथे त्यांच्या आयुष्याला स्थैर्य मिळाले आणि लेखन प्रवास सुरू झाला ती आदरणीय रिझर्व बँक! तिसरे  लेकीकडील सिंगापूरचे वास्तव्य दर्शविणारे. तेथील  वेगळ्या वातावरणात निवांतपणे त्यांना अनेक अनुभवांना शब्दरूप  देता आले आणि मुखपृष्ठावरील चौथे गावाकडचं घर दिसते ते आवास-अलिबाग येतील बहिणीचे घर. या साऱ्यांनी त्यांचे जीवन व्यापलेले आहे. त्यामुळे कस्तुरी सप्रे यांनी कल्पकतेने काढलेले हे मुखपृष्ठ आपल्याला आवडते.  पुस्तकाची छपाई बरीचशी निर्दोष आहे. ‘सरमिसळ’  मधील सर म्हणजे उच्च  प्रतीचे तर मिसळ ही नेहमीच चविष्ट असते पण आपल्याला मिसळीची एक डिश अपुरीच वाटते आणि आपण दुसऱ्या डिशची प्रतीक्षा करतो. प्रमोद वर्तक यांच्या अशाच खमंग ,चविष्ट, रसदार मिसळीच्या दुसऱ्या डिशची आपण सर्वजण  वाट बघूया.

पुस्तक परिचय –  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अल्याड-पल्याड’ —अलक संग्रह… म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे) ☆ परिचय – परिचयकर्ता — प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘अल्याड-पल्याड’ —अलक संग्रह… म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे) ☆ परिचय – परिचयकर्ता — प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ ☆

पुस्तकाचे नाव —अलक -संग्रह ” अल्याड- पल्याड ” 

लेखक –- म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे )

प्रकाशक –-परीस पब्लिकेशन – सासवड , जि. पुणे.

पृष्ठ संख्या– ११२.

मूल्य- रु.८०/-,

मयुरेश देशपांडे यांनी लिहिलेला ‘अल्याड पल्याड’ हा अलक कथासंग्रह आज वाचून संपवला. एका बैठकीत नाही. कारण त्यातील प्रत्येक कथा आकाराने लहान असली तरी मानवी जीवनातील काही विदारक तर काही सुखांत सत्त्ये  पानोपानी आढळून येतात. म्हणून बारकाईने सगळ्या अलक वाचल्यावर माझी मतं लिहितो.

‘ आजकाल वाचन कमी होत आहे,वाचनसंस्कृती वाढायला पाहिजे,वाचणं हीच माणसाची खरी ओळख आहे…’ वगैरे वगैरे कितीही म्हटलं तरी एक सत्य आहे -आज माणसांना मिळणारा फावला वेळ कमी असतो, त्यातही आपले प्राधान्यक्रम हेही या तक्रारीमागचं एक मोठं कारण आहे. मला आठवतं, पूर्वी गावात वर्तमानपत्रं फक्त ग्रामपंचायतीत येत. तेही सायंकाळी ती वाचणं हा माझा रोजचा काही तासांचा दैनंदिन उपक्रम असायचा. क्वचित मिळणारी नियतकालिकंही पुरवून पुरवून म्हणजे एकच मजकूर मी अनेकदा वाचून काढी. पुस्तकातल्या कविताच नव्हे तर  काहो धडेही  माझे पाठ होते. आज हे थांबलं ही शोकांतिका असली तरी खरं आहे. आज भेट मिळालेलीच काय अगदी विकत घेतलेली पुस्तकं, अगदी नामवंत लेखकांचीही असली तरी आपण पूर्ण वाचत नाही. समाजमाध्यमं इतकं साहित्य उपलब्ध करून देतात की, काय वाचू आणि कधी हेच ठरवता येत नाही. या पार्श्वभूमीवर  ‘अल्याड पल्याड’  हे पुस्तक अपवाद ठरते. यातील पहिलीच अलक लेखकाने भारतीय समाजात  वंचितांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  यांच्याविषयी लिहून औचित्य साधले आहे. सगळ्याच अलक कथा या  अर्थपूर्ण आहेत. अनेक लेखक मराठीच्या आत्यंतिक प्रेमापोटी अनाकलनीय मराठी शब्दांचा प्रयोग करून लिखाण हे बोजड करतात. इथे लेखकाने ते जाणीवपूर्वक टाळले आहे. लेटमार्क,बेस कॅम्प असे शब्द हे दर्शवतात. अनेक अलकमधून  स्थानिक बोलीभाषेची योग्य रचनाही दिसते. समाजातील विदारक सत्ये दाखवताना अनेक विसंगत बाबीही परिणामकारकपणे मांडल्या आहेत.  ‘ वडापाव ‘ या आशयाच्या कथेतून स्त्री सक्षमीकरण, पत्नीची कुटुंबातील महत्त्वाची भूमिका जाणवते. वैद्यकीय उपचारांसाठी घरातल्या बायकोच्या राहिलेल्या मंगळसूत्राकडे पहाणा-या नवऱ्याची अगतिकता प्रभावीपणे एका अलकमधून  उलगडते. भंगार गोळा करणारी स्त्रीही आपले सौंदर्य फुटक्या आरशात पहाते, ही अलक आपल्या समाजातील आजचे एक सत्त्य सांगते. मात्र केवळ दु:ख उगाळत बसणारा हा लेखक नाही, तर ‘ दु:ख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही ‘ हा बाबा आमटे यांचा  आशावादही इथे ठायीठायी दिसून येतो. सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. 

माणूस हा श्रेष्ठ आहे याच भूमिकेतून लिहीत असलेले साहित्यिक मयुरेश देशपांडे यांच्या साहित्यप्रवासाला मनापासून शुभेच्छा.

परिचय – प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

मो ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दुसरं वादळ… श्री शरद पोंक्षे – परिचय सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ दुसरं वादळ… श्री शरद पोंक्षे – परिचय – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर ☆

एखादा दुर्धर रोग अचानक उद्भवल्यानंतर, जीवनाची आता काही शाश्वती नाही हे दाहक सत्य अगदी एका क्षणात अंगावर आल्यानंतरची माणसांची प्रतिक्रिया ही त्या त्या व्यक्तीच्या मनःशक्तीवर अवलंबून असते. धक्का सगळ्यांनाच बसतो, पण काही माणसे त्या धक्क्यामुळे कोलमडून जातात तर काही व्यक्ती जिद्दीने जमिनीत पाय गाडून उभे राहतात आणि त्या रोगावर मात करून दाखवतात. प्रसिद्ध अभिनेते, सावरकर भक्त आणि विचारांनी प्रखर  हिंदुत्ववादी असलेले शरद माधव पोंक्षे शरद माधव पोंक्षे हे ह्यांपैकी दुसऱ्या गटात मोडणारे.

Hodgkins Lymphoma हा कर्करोगाचा एक प्रकार समजला जाणारा दुर्धर रोग शरद पोंक्षेंना झाला आणि एकाच दिवसात त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचंही आयुष्य बदलून गेलं. एक वर्ष सर्व कामधंदा सोडुन पोंक्षेंना घरी बसावं लागलं, १२ किमो साईकल्स आणि त्यांचे शरीरावर होणारे भयानक दुष्परिणाम, वर्षभर काम बंद असल्यामुळे येणारी आर्थिक असुरक्षिता आणि त्यामुळे भेडसावणारी अनिश्चितता, कुटुंबाला सतावणारी भीती आणि जीवघेणी वेदना ह्या सर्वांवर मात करून शरद पोंक्षे यशस्वीपणे या वादळातून बाहेर पडले. त्या अनुभवाची गोष्ट म्हणजेच ‘दुसरे वादळ.’ साध्या, सोप्या, ‘बोलले तसे लिहिले’ ह्या भाषेत लिहिलेले पुस्तक मी काल एका बैठकीत वाचून संपवले आणि शरद पोंक्षे ह्यांच्याबद्दल असलेला माझा आदर अजूनच वाढला.

कर्करोग, किडनी विकार किंवा हृदयविकार ह्यासारख्या दुर्धर रोगांशी लढा दिलेल्या लोकांची आत्मकथने ह्यापूर्वीही मराठीत पुस्तकरूपाने आलेली आहेत. अभय बंग ह्यांचे ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’, पद्मजा फाटक यांचे ‘हसरी किडनी’ ह्यांसारखी पुस्तके तर व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी झालेली आहेत, मग ह्या पुस्तकात नवीन काय आहे? ह्या पुस्तकात नवीन आहे ती शरद पोंक्षेंची रोगाकडे बघायची दृष्टी, आणि त्यांची सावरकर विचारांवर असलेली अपार डोळस श्रद्धा, ज्या श्रद्धेने त्यांना ह्या रोगाकडे झगडण्याचे बळ दिले.

ह्याबद्दल लिहिताना पोंक्षे म्हणतात, ‘मानसिक धैर्य सुदृढ कसं करायचं हा प्रश्न पडला. त्यावर एकच उपाय. सावरकर. विचार मनात येताक्षणी कपाट उघडलं आणि माझी जन्मठेप चौथ्यांदा वाचायला सुरवात केली. ११ वर्षे ७ बाय ११ च्या खोलीत कसे राहिले असतील तात्याराव? गळ्यात, पायात साखळदंड, अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न, तात्याराव कसे राहिला असाल तुम्ही? ते देशासाठी ११ वर्षे राहू शकतात, मला अकराच महिने काढायचे आहेत, तेही स्वतःसाठी! हा विचार मनात आला आणि सगळी मरगळ निघून गेली’.

पोंक्षेनी ह्या पुस्तकात अतिशय प्रांजळपणे आपल्याला आलेले अनुभव मांडलेले आहेत. त्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली, मग ते शिवसेनेचे आदेश बांदेकर असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, त्या लोकांचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. त्यांच्यासाठी म्हणून जे लोक कामासाठी थांबले त्यांचाही उल्लेख योग्य रीतीने पुस्तकात झालेला आहे. त्यांना काही डॉक्टरांचे आलेले वाईट अनुभवही पोंक्षेनी तितक्याच स्पष्टपणे लिहिलेले आहेत तसेच आयुर्वेद, होमियोपथी आदी उपचार पद्धतींचाही त्यांना चांगला फायदा कसा झाला हेही त्यांनी लिहिलेले आहे.

पुस्तक खरोखरच वाचनीय आहे. सर्व वयाच्या लोकांना सहजपणे वाचता यावे म्हणून अक्षरे जाणून बुजून मोठी ठेवलेली आहेत. एखाद्या दुर्धर रोगाशी लढणाऱ्या कुणालाही बळ देईल असेच हे पुस्तक आहे. नथुरामची व्यक्तिरेखा साकारताना पोंक्षेना सोसावा लागलेला विरोध हे शरद पोंक्षेंच्या आयुष्यातले पहिले वादळ आणि कर्करोगाशी दिलेला लढा हे दुसरे वादळ. मला विशेष आवडले ते हे की ह्या दोन्ही वादळांशी लढताना शरद पोंक्षेनी आपल्या तत्वांशी कसलीच तडजोड कुठेही केलेली नाही.

एक अभिनेते म्हणून शरद पोंक्षे मोठे आहेतच पण एक माणूस म्हणून ते किती जेन्यूईन आहेत हे ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणवतं. अभिनयासारख्या बेभरवश्याच्या क्षेत्रात वावरताना व्यावसायिक हितसंबंध जपायचे म्हणून माणसं क्वचितच रोखठोक, प्रांजळ व्यक्त होतात. पण शरद पोंक्षे ह्याला अपवाद आहेत. एका सच्च्या माणसाने लिहिलेले हे एक सच्चे पुस्तक आहे. अवघड परिस्थितीशी झगडावे कसे हे ह्या पुस्तकातून शिकण्यासारखे आहे. पार्थ बावस्करच्या शब्दामृत प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. Parth Bawaskar – पार्थ बावस्कर

– श्री शरद पोंक्षे

परिचय – सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print