मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शत्रुत्वाचा नायनाट… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

 शत्रूत्वाचा नायनाट… श्री मकरंद पिंपुटकर

मंदार एंटरप्राईझेसच्या रवी सरांना डायमंड मिल्समधून कोण्या बॅनर्जीचा फोन आला होता. “मैं डायमंडसे बॅनर्जी बोलता है. ये तुम लोगोंने क्या बकवास भेजा है इधर ?”

डायमंड मिल : भारतातील टेक्सटाइल जगतातले खूप मोठे नाव – अगदी रेमंड, बॉम्बे डाईंगसारख्या दिग्गज टेक्सटाइल कंपन्यांच्या तोडीचे. 

ऑर्डरनुसार customised मशिनरी बनवून देणे ही रवी सरांच्या मंदार एंटरप्राईझेसची खासियत. डायमंड मिल हे त्यांचे जुने कस्टमर. इतके जुने की करोडो रुपयांच्या डायमंड मिलचे मालक वीरेनभाई त्यांच्या वैयक्तिक परिचयाचे होते. 

डायमंड मिलला यावेळी टेक्सटाइल मशिनरीमधील एका मशीनचा एक भाग वेगळ्या पद्धतीने modify करून हवा होता. त्याप्रमाणे modify केलेले भाग रवी सरांनी डायमंड मिलमध्ये पाठवलेले होते. मोरे नावाच्या ज्या मॅनेजरांनी ऑर्डर फायनल केली होती, त्यांच्या कंपनी e mail account वर mail पाठवून हे भाग कसे जोडायचे (assemble करायचे) ते रवी सरांनी विस्ताराने कळवले होते. त्यांचा काही निरोप / प्रति उत्तर आलं नाही, त्यामुळे सगळं आलबेल आहे असं ते समजत होते आणि आत्ता अचानक हा फोन आला होता. 

दोन पाच मिनिटांनी बॅनर्जीचा पहिला आवेग आणि आवेश शांत झाल्यावर रवी सरांना अर्थबोध झाला तो असा की मोरे दोन महिन्यांपूर्वीच कंपनी सोडून गेले होते. त्यानंतर हे सुटे भाग व मेल पोचले होते. मोरे नोकरी सोडून गेले असल्याने, त्यांची मेल कोणी तपसलेलीच नव्हती.  

हा बॅनर्जीदेखील गेली अनेक वर्षे टेक्सटाइलमध्येच काम करत होता, बॉम्बे डाईंगमधून आता मोऱ्यांच्या जागेवर, डायमंडमध्ये आला होता. त्याच्या देखरेखीखाली त्याने ते भाग जोडून (assemble) घेतले होते व मशीन चालवायचा प्रयत्न केला होता. 

या मशीनमध्ये गिअर बॉक्स होता, एका बाजूला हे भाग गिअरमध्ये अडकवायचे व दुसरी बाजू लॉक करायची असायची. एकदा यंत्राची जोडणी झाली की त्यातील ऑईल ठराविक तापमानापर्यंत तापवावे लागायचे, याला तीन एक तास लागायचे. तेल तापलं की मगच यंत्र चालू करता यायचे. 

इथे अडचण अशी होत होती की लाहिरीने यंत्र जोडणी करून घेऊन तेल तापवले की गिअर बॉक्सवाली बाजू उष्णतेने प्रसरण पावायची, गिअर्स सटकायचे आणि त्यामुळे यंत्र चालू होत नव्हते.

बॅनर्जीने दोन तीनदा यंत्राची जोडणी करायचा प्रयत्न करून बघितला आणि दर वेळी तो असफल ठरला, इकडे दर वेळी वीरेनभाईंचा यंत्राबाबत चौकशी करणारा फोन यायचा, त्यांना नकारार्थी उत्तर द्यावं लागायचं, त्यामुळे बॅनर्जी वैतागला होता आणि त्याने भडकून रवी सरांना फोन केला होता.

“साला, कैसा काम करता है ? हर बार गिअर चार चार इंच मिसमॅच होता है ? वो मैं कुछ नहीं जानता. मेरे को कल सुबह तुम खुद इधर हमारे कंपनीमे मंगता, तुमने आने का, मशीन चालू कर के देने का, नहीं तो अपना सडा हूवा मटेरियल, अपने खर्चे से, वापस ले जाने का. बस, बात खतम,” म्हणत रवी सरांचे काही न ऐकून घेता त्याने फोन ठेवला देखील.

दुसऱ्या दिवशी रवी सर, त्यांच्या एका मदतनीसासोबत, डायमंड मिलमध्ये पोचले. काय घडल्याने चूक होत आहे याचा त्यांना प्राथमिक अंदाज आला होता. त्यानुसार, तिथल्या मुख्य फिटरकडून बॅनर्जी कोण आहे, कसा आहे, त्याच्या देखरेखीखाली हे मशीन कसे जोडले होते ही माहिती ते घेत होते. 

बॅनर्जी आला, आणि आल्याआल्या त्याने आदल्या दिवशीचा आक्रस्ताळेपणा पुन्हा सुरू केला. “मेरा कोई भी फिटर मैं तेरे को नहीं देगा. तेरी इनसे पुरानी जान पेहचान हैं, तू कोई temporary झोल कर के मशीन चालू हुवा ऐसा दिखायेगा, और तेरे जानेके बाद फिरसे सब ठप हो जाएगा,” असं म्हणत त्याने त्या मुख्य फिटरची तेथून उचलबांगडी केली, एका अक्षरश: गेल्याच आठवड्यात रुजू झालेल्या एका तद्दन नवशिक्या कामगाराला यांच्यासोबत दिले.

बॅनर्जीने त्याच्या एका खास माणसाला तिथे तळ ठोकून बसवलं आणि बजावलं, “अपने कंपनीसे और कोई भी इनको हेल्प करने के लिये आना नहीं चाहिए. मेरे को हर घंटे reporting चाहिए.”

“देखिये बॅनर्जीभाई, मुझे लगता हैं assembly करते वख्त आपसे कोई गलती हुई है. मैं आप को समझाता हूं …” काय चुकलं आहे आणि काय केले पाहिजे हे रवी सर बॅनर्जीला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण बॅनर्जी उलट आणखीनच गरम झाला.

“तू मेरा मिष्टेक निकालता हैं ? मैं क्या कल इस लाईन मे आया ? जा, जाकर बॉम्बे डाईंग मे पूछ. लोग आज भी मेरा तारीफ करता हैं उधर,” बॅनर्जी संतापाने लालपिवळा झालेला. “तेरा कोई नाटक नहीं चाहीये. मिश्टेक खुद करनेका और बिल मेरे नाम पर फाडनेका ! मैं खुद वीरेन भाई को फोन कर के बोलनेवाला है,” म्हणत बॅनर्जीने खरंच वीरेनभाईंना फोन लावला आणि आपली कैफियत सांगू लागला. 

“और आपसे मिस्टेक हुवा होगा तो ?” त्याचा फोन चालू असताना रवी सरांनी शांतपणे त्याला विचारलं. 

“तू ये मशीन चालू करके दिखायेगा, तो मैं on the spot resign करेगा, इस्तिफा दे देगा. वीरेन सर, आप भी सून लो, मैं इस्तिफा दे देगा. लेकीन इस से मशीन चालू नहीं हुवा, तो इसका punishment क्या, ये आप को तय करना होगा.”

प्रकरण भलतंच चिघळलं होतं. साधारण चार तासांनी बॅनर्जीच्या माणसाने त्याला फोन केला, “सर, वो मशीन चालू हो गया, सर.”

“इतने जलदी ? ऐसे कैसे हो सकता हैं ? रूक, मैं अभी आया,” म्हणत बॅनर्जी तेथे पोचला, “वो मेजरींग टेप ला इधर. गिअर कितना बाहर आया है देख ले.”

गिअर व्यवस्थित जोडले गेले होते, अजिबात mismatch नव्हते. 

बॅनर्जी बघतच राहिला. “ये अभी temporarily जैसेतैसे जगह पर अटका होगा. जरा दस मिनिट मशीन चलने दे, देख, वो गॅरंटीसे फस जायेगा. ये मशीन चालू करने के बाद जो नुकसान होगा, वो तेरे माथे पर,” रवी सरांकडे बोट दाखवत बॅनर्जीने मशीन चालू करायला लावले. 

तास होऊन गेला, मशीन सुरळीत चालू होते. 

“सर, आप मेरी बात सुनिये. मेरे खयाल से आपने assemble करते वख्त …” रवी सर सांगायचा प्रयत्न करत होते. 

“No, no, no, no. मेरे को ग्यान मत दे,” म्हणत बॅनर्जी तेथून निघून गेला.

रवी सरांनी वीरेन भाईंना फोन करून मशीन सुरू झाल्याचे सांगितले. Fitting करताना दुसरी बाजू मोकळी / फ्री ठेवून, गिअरची बाजू लॉक करायची होती, तापणाऱ्या तेलाने दुसरी बाजू प्रसरण पावणे अपेक्षित होतं. हे लक्षात न घेता, बॅनर्जीने दुसरी बाजू लॉक केली, गिअर मोकळे ठेवले, त्यामुळे उष्णतेने गिअर प्रसरण पावले आणि mismatch झाले. पण हे स्पष्टीकरण ऐकून घ्यायची त्याची तयारीच नव्हती.

“कोई बात नहीं, रवी, मैं बोलता हूं उसको. तू एक काम कर, बहुत रात हो गयी है. तू आज इधर कंपनी गेस्ट हाऊस मे ही रुक. Dinner वगैरा कर ले. कल सुबह ब्रेकफास्ट कर के आराम से निकल,” वीरेन भाई रवी सरांना आश्वस्त करत होते.

बॅनर्जीसुद्धा कंपनी गेस्ट हाऊसलाच उतरला होता. जेवताना दोघे एकमेकांसमोर आले. बॅनर्जी अजून घुश्श्यातच होता. रवी सरांनी पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, त्याने तो उडवून लावला.

“मेरे को तेरे साथ कुछभी बात नहीं करने का. वादे के मुताबिक मैं अपना इस्तीफा वीरेन भाईको सोप दिया हैं. खुश ? Happy ?” बॅनर्जी फणफणला. 

रात्र गेली. सकाळी चहा घेताना बॅनर्जी रवी सरांच्या समोर आला. त्याचा घुस्सा आता शांत झाला होता, वास्तवाची जाणीव बहुधा त्याला आता भेडसावत होती. पहिल्यांदाच तो रवी सरांशी नीट बोलत होता.

“Good morning, रवी साब. वो सॉरी, मैं बहोत गलत ढंग से पेश आया आपसे. आपका मशिन अभी भी अच्छे से चल रही हैं. मुझे मेरे असिस्टंटने बताया मैने क्या गलती किया वो. Actually, मेरे “एक्स”असिस्टंटने बताया – ऐसा कहना चाहिए. वो, गुस्से मे, कल मैने resignation दे दिया, और वीरेन भाईने उसे accept कर लिया. आप के पहचान मे कोई जॉब हैं तो बोलिये, रवी साब.” बॅनर्जी अगदीच मवाळ झाला होता. 

योगायोगाने, रवीच्या ओळखीतल्या एका कंपनीत एक तोलामोलाचा जॉब होता. रवीने शब्द टाकला, बॅनर्जीला इंटरव्ह्यूचे बोलावणे आले, आणि चार दिवसांत तो त्या नव्या कंपनीत रुजूदेखील झाला.

नंतर एकदा बोलताना वीरेन भाई रवी सरांना सांगत होते, “अरे, रवी, तू कैसा आदमी है ? वो बॅनर्जी बिना वजह से तेरा दुश्मन बन रहा था, और तू हैं के अपनी खुद की शिफारस देकर उसको जॉब लगवाया ?” 

मंद हसून रवी सर म्हणाले, “अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंकन म्हणाले होते – एखाद्या शत्रूला हरवायचे असेल, त्याला नेस्तनाबूत करायचे असेल, तर त्याला तुमचा मित्र करा. There is no better way to destroy your enemy, than making him your friend. (Abraham Lincoln). दोस्ती झाली, की दुश्मनी संपते. बस, मी एवढंच केलं. मी शत्रूला नाही संपवलं, सर. मी शत्रूत्व संपवलं.” मंद हसत रवी सर सांगत होते आणि वीरेन भाई गोंधळून त्यांच्याकडे पाहत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “समता सोसायटी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “समता सोसायटी …” ☆ श्री मंगेश मधुकर 

“साहेब,मला आपला फ्लॅट भाड्याने पाहिजे.” 

“चाचा,सकाळीच चेष्टा करताय की काय!!,भाडं  परवडणारं नाही आणि तुम्ही तर या सोसायटीमध्ये..”

“माझं काम आणि हा व्यवहार दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.आम्हांला भाड्याची अडचण नाही”

“चाचा,स्पष्टच सांगतो.राग मानू नका.तुम्हांला फ्लॅट देऊ शकत नाही.कारण विचारू नका.प्लीज …”

फोन कट झाला.

“बघितलं.हे दुतोंडी सभ्य, शिकलेले लोक.मोठमोठया गप्पा मारायच्या आणि स्वतःवर वेळ आली की…….” हताशपणे चाचा म्हणाले. 

दोन महिन्यांपासून सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी चाचांची धडपड चालू होती. तीन-चार ठिकाणी विचारणा केली पण सगळीकडून नकार आला. प्रश्न पैशाचा नव्हता तर चाचा करीत असलेल्या कामामुळे नकार मिळत होता. सोसायटीत इतकी वर्षे इमाने- इतबारे काम करून सुद्धा अशी वागणूक मिळत होती म्हणून चाचा दुखावले. या सोसायटीत फ्लॅट घेऊन रहायला यायचेच हे मनोमन ठरवले आणि प्रयत्न सुरु ठेवले. अपेक्षेप्रमाणे नकार मिळत होताच पण चाचांनी हार मानली नाही आणि एके दिवशी अनपेक्षितपणे होकार मिळाला. देशमुख फॅमिली नवीन घरात शिफ्ट होणार होती.चाचा देशमुखांना भेटले आणि कोणतेही आढेवेढे न घेता देशमुख तयार झाले. व्यवहार पक्का झाला. ना हरकत प्रमाण पत्रासाठी देशमुखांनी कमिटीकडे अर्ज केला आणि वादाला तोंड फुटले. देशमुखांच्या नवीन भाडेकरूविषयी संमिश्र प्रतीक्रिया आल्या.जास्त करून नकारात्मकच होत्या. अनेकांना हा निर्णय मान्य नव्हता.सभासदांच्या तीव्र भावनांचा विचार करून अध्यक्षांनी तातडीची मिटिंग बोलावली. 

ऐन थंडीच्या दिवसात सोसायटीच्या टेरेसवर मिटिंग सुरु झाली.एका बाजूला विरोध असणारे सभासद तर दुसऱ्या बाजूला देशमुख. काहीजण मात्र तटस्थ होते.

“देशमुख.पुन्हा एकदा सांगतो.विचार करा”एका चिडलेल्या सभासदाने डायरेक्ट विषयाला सुरवात केली. 

“आता पुन्हा कशाला विचार करायचा.निर्णय तर केव्हाच झाला.” देशमुख.

“सोसायटीची बाजूपण समजून घ्या.”

“फ्लॅट कोणाला भाड्याने द्यायचा हा तुमचा खाजगी प्रश्न आहे.सगळं नियमानुसार आहे तरीही…”

“पुन्हा तेच.नवीन भाडेकरू सर्वांना चांगलाच माहिती आहे.त्यांच्याकडून सोसायटीला काहीही त्रास होणार नाही.याची खात्री आहे”देशमुख.

“चाचांबद्दल प्रश्नच नाही. इतकी वर्षे झाली त्यांच्या कामाविषयी एकही तक्रार नाही” 

“तक्रार,अहो मागे एकदा चाचा आठवडाभर सुट्टीवर होते तेव्हा बदलीवर आलेल्या माणसामुळे किती त्रास झाला हे चांगलंच माहिती आहे. चाचा म्हणजे एकदम भला माणूस. कामाला एकदम चोख” 

“हो,ना कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण बरं की आपलं काम”

“बघा.माझ्या मनातलं सगळं तुम्हीच बोलून दाखवलं. साधा सरळ व्यवहार आहे. अपेक्षित भाडे द्यायला चाचांची तयारी आहे. त्यामुळे आमच्यातल्या व्यवहाराला काहीच अडचण नाही” देशमुखांनी पुन्हा एकदा निर्धार जाहीर केला.

“जगात फ्लॅट भाड्याने घेऊन राहणारे हजारो लोक आहेत. कोणालाही द्या पण चाचांना नको” 

“उलट मी म्हणतो अनोळखी माणसांना देण्यापेक्षा चाचांना द्यावा” देशमुख.

“अहो,त्यांच्या घरात भरपूर माणसे आहेत.जागा अपुरी पडेल” 

“तो त्यांचा प्रश्न आहे.आपण कशाला त्यात पडायचे”..  देशमुख 

“तुम्ही उगीच हट्ट करीत आहात.फायनल सोल्युशन सांगतो फ्लॅट मला भाड्याने द्या.जो व्यवहार ठरला आहे त्यापेक्षा पाचशे जास्त भाडे देतो”एक सभासद भडकले.

“अहो,काहीही काय बोलताय?आपल्याला कशाला हवाय फ्लॅट ??” भडकलेल्या सभासदांच्या सौ.ने त्यांना दटावले.

“या देशमुखांचे वागणं विचित्रच आहे.इथं गोंधळ घालून स्वतः चालले आहेत दुसरीकडे रहायला आणि सगळे  एवढं समजावत आहेत पण यांची गाडी चाचांच्या स्टेशनावर अडकली आहे.” सभासद आजी कुरकुरल्या.

थंडी असली तरी मिटिंगमधले वातावरण तापले होते.एकीकडे सभासदांचा पारा वाढत होता तर दुसरीकडे देशमुख नेहमीप्रमाणे शांत होते. कोणीच मागे हटायला तयार नव्हते.

“आपण लोकशाही पद्धतीने मतदान घेऊ” 

“नवीन पायंडा पाडू नका. माझा फ्लॅट कोणाला भाड्याने द्यायचा हा निर्णय सोसायटीने घेऊ नये.

सोसायटीचा संबंध फक्त ना हरकत प्रमाणपत्र देण्यापुरता आहे. तेव्हा प्लीज..” .. देशमुख.

“सर्व कमिटीचा विरोध असताना हा हट्ट बरोबर नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे.” 

“त्रास????मला वाटलं सोसायटी या निर्णयाचे कौतुक करेल. पण इथं भलतंच झालं आणि सगळ्याच सभासदांचा विरोध नाहीये.” .. देशमुख.

“ज्यांना त्रास नाही ते कशाला विरोध करतील. तुमचा फ्लॅट आमच्या मजल्यावर आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त त्रास तर आम्हांला होणार आहे.” 

“आणि आमचं काय हो !! चाचा तर शेजारीच रहायला येणार” 

“एक मिनिट. इतकावेळ चाललेली चर्चा ऐकली. कमिटीचा अध्यक्ष या नात्याने माझं मत सांगतो. देशमुखांच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे. सर्वांना विनंती आहे की माणुसकीच्या नात्याने विचार करा” 

“अहो,चाचा आपल्या सोसायटीत रात्री वॉचमनचे काम करतात आणि दिवसभर सगळ्या बिल्डींगचा कचरा उचलण्याचे व साफसफाईचे काम करतात.” 

‘जसं तुम्ही आयटीमध्ये, तुम्ही बँकेत आणि तुम्ही पेशंट तपासण्याचे काम करता तसंच चाचा काम करतात. त्यांचे काम आणि आमच्यात होणारा व्यवहार याचा परस्पर काहीही संबंध नाही” देशमुख.

“ते माहितीय हो, पण तरीही कचरेवाला सोबत राहायला येणार म्हणजे जरा ….” 

“अहो, कचरेवाले आपण आहोत. चाचा तर साफसफाई करतात. दिवसातले जवळपास पंधरा तास चाचा सोसायटीतच असतात. स्वतःच्या घराइतकीच सोसायटीची काळजी घेतात.”

“एकदम बरोबर बोललात, कुठल्या जगात आहात. स्वतःला मॉडर्न समजतो आणि स्मार्ट फोन,लॅपटॉप वापरतो आणि एवढा मागासलेला कद्दू विचार करतो. उलट चाचा आपल्या इथं राहायला येणार ही अभिमानाची गोष्ट आहे,” 

“चाचा अनेकवर्षे जवळच्या वस्तीत राहतात. मोठा मुलगा रिक्षा चालवतो तर धाकटा आयटीत आहे. घरात कमवणारे हात वाढल्यामुळेच नातवंडांच्या भवितव्याचा विचार करून चाचांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला.” .. देशमुख.

“चाचांची परिस्थिती आहे आणि नियमानुसार ते सोसायटीत रहाणार आहेत यात वावगं काहीच नाही. मला वाटतं इथं प्रोब्लेम चाचांचा नाहीये. खरा प्रोब्लेम आपलाच आहे” 

“म्हणजे ? ”.. अध्यक्ष 

“वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या मनोवृत्तीचा हा प्रोब्लेम आहे. काळानुसार रहाणीमान,कपडे,खाण-

पिणं सगळं बदललं, पण मनातले विचार, खोलवर रुजलेल्या समजुती त्या बदलल्या नाहीत. बोलण्यात असलेली समता कृतीमध्ये आणायची वेळ आली की मग असे वाद सुरु होतात.”

“प्रामाणिक आणि मेहनती माणूस म्हणून चाचांना अनेक वर्षापासून ओळखतो.कष्ट करून ते आपल्यासारखे आयुष्य जगत आहे अशा माणसाला विरोध कशासाठी???तर ते करीत असलेल्या कामामुळे?? हे योग्य नाही” .. देशमुख.  

“हे साफ चूक आहे.देशमुख. मी तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो. कामाचा निकष लावायचा तर सोसायटी मधील सगळ्याच बिल्डींगमध्ये बरेच बदल घडतील. तेव्हा त्याविषयी न बोललेलं बरं”

“आपल्या एरियातला भाई हा गुंड,उद्या जर त्याने सोसायटीत फ्लॅट विकत घेतला तर आपण विरोध करणार का?? कोणामध्ये हिंमत आहे??आपण सगळे मध्यमवर्गीय मनातल्या मनात चडफड करून निमुटपणे सहन करू. हे चाचा तर आपलेच आहेत.देशमुखांच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे” 

“मी काही फार मोठे आणि जगावेगळ काम करत नाहीये.आपण जसं मुलांच्या भवितव्याचा विचार करतो त्याचप्रमाणे चाचांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर ही आपल्यासाठी सुद्धा फार मोठी संधी आहे. जगाला दाखवून देऊ की सोसायटीतील लोक फक्त नावातच नाही तर वागण्यामधून सुद्धा समता पाळतात.” देशमुख बोलायचे थांबले. कोणीच प्रतिक्रिया दिली नाही.सगळे एकमेकांकडे पाहत होते. 

“देशमुख,आता चर्चा बस झाली.उद्या ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जा” अध्यक्षांनी जाहीर केले.

“एक मिनिट. चाचा आमच्या शेजारी रहायला येणार आहेत म्हणून…” पुन्हा एकदा तणावपूर्ण शांतता. 

“म्हणून काय????”  अध्यक्षांनी विचारलं.

“माझी एक अट आहे.ती सोसायटीला पूर्ण करावीच लागेल. फ्लॅट जरी देशमुखांचा असला तरी चाचांना किल्ली मी देणार आणि हे फायनल आहे. काय देशमुख” 

“मान्य. चाचा,अभिनंदन.

सगळे तयार झाले. “ आता चहा पाहिजे” देशमुखांनी मोबाईलवरून चाचांना माहिती दिली.

काही वेळाने साठीपार केलेले, पांढरा पायजमा, फुल बाह्यांचा ढगाळ शर्ट, गांधी टोपी घातलेले, गोल चेहरा आणि मोठाले डोळे, जाडजूड पांढरी मिशी, खुरटी पांढरट दाढी ,जेमतेम पाच फुट उंची आणि भक्कम शरीरयष्टीचे चाचा चहाची किटली हातात घेऊन टेरेसवर आले.

“वा,जियो चाचा, चहाचं नाव काढलं आणि तुम्ही चहा घेऊन आलात. या, माझ्याशेजारी बसा” .. अध्यक्ष.

चाचांना पाहिल्यावर सगळ्या सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

अनपेक्षितपणे झालेल्या स्वागतामुळे चाचा गडबडले.

“चाचा,वेल कम”सगळ्यांनी चहाचे कप उंचावले. तेव्हा

चाचांनी हात जोडून आभार मानले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -3 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -3 श्री संभाजी बबन गायके 

(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी) 

(“तू जा रे… एक एक शीख सव्वा लाखाला भारी पडतो… जा… वाहेगुरू तुला यश देवोत!” आणि तो एखाद्या भूतासारखा खंदकाच्या मागच्या बाजूने धावत सुटला.) – इथून पुढे —

मी दबक्या पावलांनी बाहेर आलो. ‘लपटनसाहेब’ खंदकाच्या भिंतीवर काही तरी चिकटवताना दिसले….. बॉम्ब! त्यांनी खंदकाच्या ओल्या भिंतीमध्ये तीन गोळे चिकटवले… त्या गोळ्यांना सुतळीसारखे काहीतरी एकमेकांना जोडून बांधले आणि त्या सुतळीची उरलेली गुंडाळी शेगडीपर्यंत आणून ठेवली.. खिशातून काडेपेटी काढली आणि शिलगावली…. सुतळीने आग पकडली असती तर सबंध खंदक हवेत उडाला असता आणि आम्हां दहा जणांच्या चिंधड्या उडाल्या असत्या…. आमच्यात बोधासिंगही होता… त्याच्या आईला, सरदारणीला मी शब्द दिला होता.. त्याला काही होऊ देणार नाही म्हणून.!…..

मी वीजेच्या चपळाईने नकली ‘लपटन’ साहेबाच्या दिशेने धाव घेतली. तो सुतळीला आग लावण्याच्या अगदी बेतात होता…. मी माझ्या दोन्ही हातांनी माझी रायफल वर उचलून तिच्या दस्त्याचा एक जोरदार फटका त्याच्या कोपरावर हाणला…. तो तीन ताड उडून पडला. त्याच्या हातातली काडेपेटी दूर पडली.

दुसरा प्रहार मी त्याच्या मानगुटीवर केला…. ‘अरे देवा!’ अशी किंकाळी मारत तो खाली पडला आणि त्याची शुद्ध हरपली. मी त्याने भिंतीवर चिकटवलेले तिन्ही गोळे काढून दरीत फेकून दिले. जर्मनाला ओढत आणून शेगडीपाशी उताणे झोपवले. त्याच्या खिशात तीन-चार लिफाफे, डायरी मिळाली… ती मी माझ्या खिशात टाकली. “वाह रे! नकली लपटनसाहेबा! तु भाषा तर थोडीफार शिकून आलास…. पण तुला हे माहित नाही की शीख सिगारेट ओढत नाहीत, आमच्या भागात नीलगायी आढळत नाहीत, मुसलमान नोकर हिंदुंच्या देवांना कशाला पाणी घालेल? तुला वाटले तू ह्या लहनासिंगला उल्लू बनवशील… अरे लपटन साहेबासोबत पाच वर्ष काढलीत मी… त्यांना ओळखण्यात मी चूक करीनच कशी?… 

तो जर्मन थोडा शुद्धीवर आला तेंव्हा मी त्याची मनोसोक्त मस्करी चालवली. पण… माझी चूक झाली होती.. त्या हरामखोराच्या पॅन्टच्या खिशाची तपासणी करायला मी विसरून गेलो.

त्याने जणू काही खूप थंडी वाजते आहे म्हणून आपले दोन्ही हात खिशात घातले आणि खिशातल्या पिस्तुलातून गोळी झाडली ती माझ्या मांडीत घुसली! मी माझ्या हेनरी मार्टिन रायफलीतून त्याच्या कपाळावर दोन गोळ्या धडाधड डागल्या…. त्याला कपाळमोक्ष प्राप्त झाला. आवाज ऐकून खंदकातले सात जण बाहेर धावले… ”काय झाले?” आजारी बोधाने आतूनच ओरडून विचारले…. मी म्हणालो… “तू झोप.. काही झालं नाही. एक भटकं कुत्रं घुसलं होतं आपल्या खंदकात….. त्याला पाठवून दिलं वर!” एवढं म्हणून मी माझ्या पटक्याच्या कापडानं माझी जखम घट्ट बांधून टाकली.. रक्त बाहेर येणं थांबलं.

एवढ्यात सत्तर जर्मनांनी अचानक दरीच्या बाजूने खंदकावर आक्रमण केले…. आम्ही आठ आणि ते सत्तर…. मी उभा… ते जमिनीलगत झोपून फायर करत होते…. आम्ही आठजणांनी त्यांचा पहिला हल्ला रोखला…. दुसरा रोखला… जबाबी फायरींग जोरात सुरू होते. जर्मन सैनिक त्यांच्याच सहकारी मृत सैनिकांच्या मुडद्यांवर पाय देऊन आमच्या खंदकाच्या दिशेने येत होते!

आता आम्ही संकटात होतो…. तेवढ्यात जर्मनांच्या पाठींवर गोळ्या बरसू लागल्या…. सुभेदार साहेब निरोप मिळताच अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरले होते. पुढून आम्ही संगिनी भोसकत होतो आणि मागून सुभेदार हजारासिंग साहेबांचे सैनिक त्यांना भाजून काढत होते. आम्ही जर्मनांना जणू फिरत्या जात्यातल्या जोंधळ्यासारखं दळायला सुरूवात केली… 

चकनाचूर! त्रेसष्ठ जर्मन प्राणांना मुकले होते आणि आमच्यातले एकूण पंधरा वाहेगुरूंच्या चरणी लीन झाले होते…. माझे जीवाभावाचे साथीदार मला सोडून गेले होते…. पण नकली लपटन मला दिसला नसता तर आमची खूप मोठी हानी झाली असती!

या संघर्षात सुभेदार साहेबांच्या उजव्या खांद्यातून एक गोळी आरपार निघून गेली होती…. आणि माझ्या बरगडीत एक गोळी रुतून बसली होती… खोलवर! 

मी खंदकातली माती माझ्या या जखमेत दाबून भरली…. कमरेला पटक्याची उरलेली पट्टी बांधली…. आणि माझी जखम कुणाच्याही लक्षात आली नाही… मी ही याकडे दुर्लक्ष केले! वजीरासिंगने जीवाच्या आंकाताने धावत जाऊन सुभेदारांना रोखले होते, इकडे मी नकली लपटन साहेबाचा डाव उधळून लावला होता….

सारी कहाणी ऐकून सुभेदार हजारासिंग अभिमानाने भरून गेले होते… “वाह रे पठ्ठे…” त्यांनी आम्हां दोघांना शाबासकी दिली!

अंधार होता अजूनही… उजाडायला वेळ होता. आमच्या गोळीबाराचा आवाज तिथून दोन-तीन मैलांवरील आमच्या तुकड्यांनी ऐकला… त्यांनी पाठीमागे कंट्रोलला खबर दिली… दोन डॉक्टर आणि दोन रूग्णवाहिका आमच्यासाठी निघाल्या आणि दीड तासांनी पोहोचल्या… आमच्यातले जखमी वेदनेने विव्हळत होते… माझी जखम ठणकत होती.

डॉक्टरांनी गाडीच्या प्रकाशात सर्वांवर तात्पुरती मलमपट्टी केली आणि जवळच्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये सर्वांना हलवण्याचा निर्णय घेतला… तिथे पोहोचेपर्यंत उजाडणार होते. एका गाडीत आपल्या जवानांची प्रेतं ठेवली… त्या गाडीत जागाच उरली नाही. 

दुस-या गाडीत जखमी भरले… त्यात फक्त आता दोनच लोकांची जागा होती. मी, सुभेदार आणि बोधा मागे उरलो होतो… बोधाला खूप ताप चढला होता…. ‘ताप मेंदूत जाऊ शकतो!’ मी विचार केला आणि सुभेदार साहेबांना बोधाला घेऊन गाडीत चढायला लावले… ते काही मला मागे सोडून जायला तयार नव्हते… उशीर होत होता… त्यांना माझी जखम दिसली असती तर ते माझ्याशिवाय पुढे गेले नसते. त्यांनी माझ्या मांडीत झालेली जखम पाहिली वाटतं… पट्टी तरी बांधून जातो म्हणाले… मी नको म्हटलं.. थोडीच आहे जखम! अंधार होता! मी उभा होतो..उभा राहू शकत होतो म्हणजे मी ठीक होतो! शिवाय गाडीत जागा तशीही नव्हतीच!

मी त्यांना सुभेदारणीची शपथ घातली… “हे बघा.. माझ्या जखमा फार नाहीत… .सुभेदारणीने मला काही सांगून ठेवले आहे.. एक महत्त्वाचे काम सोपवले आहे.. तुम्ही गाडीत चढा नाहीतर सुभेदारणी माझ्यावर नाराज होतील… तुम्हांला त्यांची शपथ आहे सुभेदारजी!…. बोधा गाडीत आलाय ना…. जा… निघा…” गाड्या निघाल्या!

“तुम्ही हॉस्पिटलला पोहोचल्यावर माझ्यासाठी गाडी पाठवालच की… आणि या जर्मनांचे मुदडे न्यायला गाड्या येतीलच…. आणि हो सुभेदारणीला पत्र लिहाल ना तेंव्हा त्यांना माझा नमस्कार सांगा…. म्हणावं लहानासिंगने त्यांनी सांगितलेले काम निभावले!”

सुभेदारजींनी जाता जाता माझा हात पकडला आणि म्हटलं “पत्र कशाला लिहू? आपण तिघेही आपल्या घरी जाऊ सोबत.. तू उद्या लवकर हॉस्पिटलला पोहोच. सुभेदारणीला तुच सांग तुझ्या तोंडाने… आणि काय रे? तुला काय सांगितलं होतं सुभेदारणीनं?”

मी म्हटलं, ”सुभेदार साहेब,.. जा, गाड्या निघाल्यात… मी जे सांगितलं तसं पत्रात लिहाच आणि घरी गेल्यावर सांगाही सुभेदारणीला… म्हणावं ‘लहनासिंगने शब्द पाळला!’

गाड्या निघाल्या… मी जमिनीवर कोसळलो…. पंचवीस वर्षांपूर्वीच्या सगळ्या स्मृती फेर धरून माझ्याभोवती नाचू लागल्या…. बाजारात भेटलेली ‘ती’ दिसू लागली…. आणि माझी शुद्ध हरपली… कायमची !

— समाप्त — 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -2 श्री संभाजी बबन गायके 

(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी) 

(सुभेदार साहेब म्हणाले, ”अजून फक्त दोन दिवस. दोन दिवसांनी ताज्या दमाची कुमक येईल, मग आपण मागे हटू.”) इथून पुढे.. 

अधून मधून एखाद-दुसरा तोफगोळा येऊन आदळायचा खंदकाच्या आसपास.आजूबाजूचं बर्फ आकाशात उंच उडायचं आणि त्याचा फवारा खंदकात दबकून बसलेल्या आम्हां शिपायांच्या अंगावर यायचा.

आधीच थंडीने हाडं गोठलेली. अंगावर कितीही कपडे चढवले तरी शरीरात गेलेली थंडी जणू तिथं मुक्कामालाच आल्यासारखी. नाही म्हणायला एक घासलेटची शेगडी होती शेकायला. पण तीही बिचारी थंडीने काकडत असायची. तिचा धूर मात्र नाकपुड्यांमध्ये आपसूक जाऊन बसायचा. खंदकात साचलेलं बर्फाळ पाणी बादली बादलीने गोळा करून बाहेर फेकण्याचं एक कामच होऊन बसलं होतं.

बोधासिंग थंडी तापाने फणफणला होता. मी जवळच्या दोन्ही कांबळी त्याच्या अंगावर पांघरल्या. शिवाय आपल्या अंगातला उबदार कोटही त्याला चढवायला दिला.

“आणि मग तुम्ही कसे राहणार या थंडीत?” बोधाने लहनाला विचारलं.

“अरे,बेटा! मला पुरे एवढं. आणि या देशातल्या गो-या मडमांनी उबदार कोट पाठवलेत आपल्यासाठी… आपण त्यांच्या देशाला वाचवण्यासाठी इतक्या दूरवरून इथं लढायला आलोय म्हणून! तसलाच एक कोट सकाळीच आलाय पलटणीत. तोच घालीन मी आता. आणि शेगडी आहेच की उबेला. तु झोप, बेटा.” असं म्हणत मी बोधासिंगची पहारा नाईट-ड्यूटी असताना त्याच्याऐवजी खंदकच्या तोंडापाशी माझी रायफल ताणून उभा राहिलो. माझी दिवसाची पहा-याची ड्यूटी तर मी आधीच पूर्ण केली होती.

बोधा आता गाढ झोपी गेला होता. रात्र अधिक गडद होत चालली होती आणि बर्फ पडतच होता…. शरीरातली ऊब शोषून घेत होता! गोऱ्या मॅडमनी पाठवलेल्या गरम कोटांची मी बोधाला सांगितलेली गोष्ट म्हणजे एक निव्वळ थाप होती.

मी या बोधाची जरा जास्तच काळजी घेतोय हे इतरांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. मी त्याला माझी कोरडी जागा झोपायला देतो आणि स्वतः मात्र चिखलात पडून राहतो थंडी सहन करीत, हे सर्वांनी पाहिलं होताच.

“त्या पोराला आपला गरम कोट देतोयेस खरा… पण इथं न्यूमोनियानं मरणा-यांची संख्या काही कमी नाही, लहानासिंग!” असं ते बजावत असत. यावर मी गप्प राहत असे…. काय बोलणार? सुभेदारणीनं सांगितलं होतं ना… बोधा आणि सुभेदार आता तुझ्या हवाली म्हणून!

मध्यरात्र हलकेच आत आली. खंदक एकदम शांत होता. दूरवर कुठंतरी एखादा गोळा फुटलेला ऐकू यायचा. या असल्या लढाईचा उबग आला होता सर्व जवानांना. लढाई म्हणजे कशी पाहिजे.. आर नाही तर पार. हातघाईची पाहिजे… आता तलवारी नसतात, पण संगिनी तर असतात. चालून आला कुणी अगदी जवळ आणि रायफल ताणायला सवड नाही सापडली तर सरळ घुसवायच्या त्याच्या छाताडात… काम तमाम!

माझ्या मनात लढाईच सुरू होती…. आणि इतक्यात दूरवरून कुणी ताडताड चालत येताना दिसलं… मी सावध झालो. आकृती जवळ जवळ आली. हे तर आपले कमांडरसाहेब… लपटन साहेब! तोच रूबाब, तोच दिमाख, तीच चाल. अंधारातही ओळखलं त्यांना. फक्त चेहरा स्पष्ट दिसत नव्हता साहेबाचा… अंधारच इतका होता!

साहेब जवळ येताच मी त्यांना कडक सलूट बजावला. “सुभेदार हजारासिंग!” त्यांचा आवाज ऐकूनच सुभेदार साहेब लगबगीने खंदकाच्या बाहेर आले… त्यांनीही या वरिष्ठ अधिका-याला सलूट ठोकला.

लपटनसाहेब ऊर्दूत बोलले, ”सुभेदार हजारासिंग, आपले इथले पन्नास पैकी निवडक चाळीस सैनिक घेऊन त्या दोन शेतांपलीकडच्या खाईकडे लगेच निघा. तिथे पन्नास जर्मन सैनिक लपून बसलेत. दारूगोळाही फारसा शिल्लक नाही त्यांच्याकडे असा माझा अंदाज आहे. मी तुमच्या मदतीला रस्त्यात एका वळणावर पंधरा जणांची एक शस्त्रसज्ज तुकडी ठेवलीये… त्यांना घेऊन जर्मनांवर हल्ला चढवा… रात्रीचा अंधार आपल्या बाजूने आहे आणि आपले सैनिक दुश्मनांचं रक्त प्राशन करायला उतावळे झालेत!… आपल्या खंदकाच्या मागील बाजूने अलगद बाहेर पडा… निघा! खंदकाचा ताबा घ्या… मी सकाळी उजाडताच आणखी कुमक पाठवतो…. गुड लक!” असे म्हणून त्या साहेबांनी खिशातली सिगारेट काड्याच्या पेटीतील काडीने शिलगावली आणि खंदकाकडे पाठ करून ते उभे राहिले…. शांतपणे!

पन्नासपैकी एकही जण मागे राहायला तयार नव्हता. बोधासिंगही निघाला. मी त्याला थांबवले. नको येऊस म्हणालो. मीही निघालो तर सुभेदारसाहेबांनी बोधाकडे फक्त बोट दाखवले…. मला समजलं… बोधाची काळजी घ्यायला साहेब मला थांबायला सांग्ताहेत. हुकूम मानावाच लागतो आणि बोधाला सोडून मी जायला मनातून तयारही नव्हतो म्हणा!

सुभेदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली चाळीस जणांची तुकडी अंधारात कूच करती झाली…. जर्मनांवर हल्ला करण्यासाठी!

बोधासिंग मात्र पडूनच होता. त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते उठायचे…. कोवळं पोर ते! सैनिकी जीवनात इतक्या लवकर अशा भयंकर लढाईला सामोरे जावे लागेल आणि तेही अशा परदेशी थंडीत? त्याने कल्पनाही केली नव्हती.

कसे बसे दहा जण मागे राहायला बाध्य झाले. मी, बोधा आणि बाकीचे आठ सरदार असे दहा जण!

पाच-दहा मिनिटांनी ‘लपटन’ साहेबांनी मला विचारले “सिगारेट पिणार?” आणि त्यांनी मागे वळून माझ्यापुढे सिगारेट धरली.

ती सिगारेट त्यांच्या हातून घेताना खंदकाच्या तोंडापाशी असलेल्या शेगडीच्या प्रकाशात मला साहेबाचा चेहरा ओझरता दिसला! लपटनसाहेबांचे लांब केस असे अचानक एखाद्या कैद्यासारखे कमी कसे कापले गेलेले दिसताहेत. आणि ऊर्दू भरभर बोलताहेत खरे पण हे तर पुस्तकी, छापील ऊर्दू! आपल्या लपटनसाहेबाला तर ऊर्दूची चार वाक्येही धड बोलता येत नाहीत…! गेली पाच वर्षे मी आणि लपटनसाहेब एकाच रेजिमेंटमध्ये तैनात आहोत. मी साहेबांना नाही ओळखणार? हे तर कुणी भलतेच दिसताहेत…. पण खात्री करून घ्यावी!

“साहेब, आपण भारतात कधी परतायचं? मी त्यांना विचारलं.

“लढाई संपेलच आता. मग लगेच निघू. पण का? हा देश आवडला नाही वाटतं?” त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यांचं छापील ऊर्दू मला आता जास्तच खटकू लागलं होतं.

“तसं नाही, साहेब!. पण तुमच्या सोबत शिकारीवर जाण्याची मजाच काही और! आठवतं साहेब, मागील वर्षी आपण शिकारीला गेलो होतो जगाधरी जिल्ह्यात, तुम्ही खेचरावर बसला होतात. नीलगायीची शिकार केली होती आपण. तुमचा खानसामा अब्दुल्ला सुद्धा होता बरोबर. तो बिचारा रस्त्यातल्या मंदीरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा… आठवतं? आणि साहेब, तुम्ही त्या नीलगायीची शिंगे शिमल्याला पाठवली होती ना? किती मोठमोठी शिंगे होती ना नीलगायीच्या त्या… चार चार फुटांची असतीलच ना?”

या सर्व प्रश्नांसाठी साहेबाचं एकच उत्तर होतं ”हो, आठवतंय तर! एक एक शिंग चार फुट चार इंचाचं.”

“तु सिगारेट पेटवत का नाहीस?” साहेबांनी मला मध्येच विचारलं.

“थांबा साहेब, खंदकातून काडेपेटी घेऊन येतो.” मी काडेपेटीचा बहाणा करून घाईतच खंदकात शिरलो. थांबलो असतो तर साहेबांनी मला त्यांच्या खिशातली काडेपेटी देऊ केली असती. अंधारात झोपलेल्या वजीरासिंगला मी ठेचकाळलो.

“काय आकाश बिकाश कोसळले की काय लहना? झोपू दे की थोडं.” त्यानं रागानेच म्हटलं.

मी म्हटलं, ”लपटनसाहेबांच्या पोशाखात मृत्यू आलाय खंदकात…. चल ऊठ. अरे, तो आलेला अधिकारी जर्मन आहे…. लपटनसाहेब बहुदा मरून गेले असावेत किंवा जर्मनांनी त्यांना कैद केले असेल. याने त्यांचा पोशाख घालून येऊन आपल्याला फसवलंय. वाटेत दबा धरून बसलेले जर्मन आता सुभेदार साहेबांच्या तुकडीचा खात्मा करणार हे निश्चित. तू खंदकातून बाहेर पडून वा-याच्या वेगाने त्यांना गाठ… फार दूर नसतील गेले ते अजून. त्यांना म्हणावं… मागे फिरा… पुढे धोका आहे!” मी एका दमात त्याला सांगितलं.

“पण लहनासिंग… तुम्ही इथे आठच जण उराल… इथं हल्ला झाला तर?”

मी दबक्या आवाजात पण निर्धाराने म्हणालो, “तू जा रे…. एक एक शीख सव्वा लाखाला भारी पडतो…. जा… वाहेगुरू तुला यश देवोत!” आणि तो एखाद्या भूतासारखा खंदकाच्या मागच्या बाजूने धावत सुटला.

– क्रमशः भाग दुसरा

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बैलपोळा- ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैलपोळा- ☆ डॉ. शैलजा करोडे 

तिन्ही सांजा झाल्या तरी गंगाराम अंगणालगतच्या गोठ्याजवळ शून्यात नजर लावून बसलेला. आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याला भानच नव्हतं. आपल्यावरच तो चिडला होता. आपल्या आर्थिक परिस्थितीने हतबल झाला होता. गोठ्यातला धोंड्याही त्याच्याकडे करूण नजरेने पाहात होता.

 तीन वर्षाचा सततचा दुष्काळ. जवळची होती नव्हती पूंजी तर संपलीच होती पण कर्जाचा डोंगरही वाढला होता. यावर्षी दुबार पेरणीही वाया गेली होती. विहिरी तळीही आटली होती. जनावरांना चारा मिळेनासा झाला होता. ऐन पावसाळ्यातही गावाला टँकरने पाणी पुरवठा होत होता. टँकरवर पाण्यासाठी ही झुंबड व्हायची. आपसात भांडणे व्हायची. रणांगणातील लढाईतील विजयी मुद्रेप्रमाणे टँकरवरून दोन/चार हंडे पाणी मिळण्यात धन्यता वाटायची.

 सायंकाळ झाली तशी रखमाने मडकी गाडगी पालथी घातली, जेमतेम तीन भाकरीएवढे पीठ निघाले. तिने भाकरी वळल्या, सासू सासरे व नवर्‍याला वाढलं.

 “आणि तू नाही जेवत ग रखमा.”

 “न्हाई, माझं पोटात गुबारा धरलाय. पोट डमारल्यासारखं झालंय. मला न्हाई जेवायचं.” 

 “रखमा, पोट गुबारा धरेल एवढं पोटभर अन्न तरी असतं काय घरात, मला समजत न्हाई व्हय. चल ही घे अर्धी भाकर. बैस जेवायला.” गंगारामनं आपल्या पुढ्यातील भाकरी तिच्या ताटात घातली.

 डोळ्यात अश्रूंची दाटी आणि मनाला गहिवर. रखमाचा घासही कंठातून खाली उतरत नव्हता. गंगारामच्या आश्वासक हातानं तिला आणखीनच भडभडून आलं.

 सावकारानं कर्जाचा तगादा लावलेला. गंगारामच्या गोठ्यातील धोंड्या व कोंड्याच्या खिल्लारी जोडीवर त्याची नजर पूर्वीपासूनच होती. कर्जाची परतफेड वेळेवर करू न शकल्यानं सावकारानं कर्जाचा हप्ता म्हणून गोठ्यातून कोंड्याला सोडवून घेऊन गेला होता. नेणार तर तो धोंड्यालाही होता, पण गंगारामने केलेल्या विनवणीनं त्यानं केवळ एक बैल नेला.

 धोंड्याच्या मदतीला दुसरा बैल भाड्याने घेऊन, तर कधी स्वतः जुंपून गंगाराम शेती करत राहिला. पण कधी दुष्काळ तर कधी अवर्षणानं गांजलं जाऊ लागला.

 गंगारामची दोन मुलं, सुरेश आणि नरेश. सुरेश घरातील परिस्थिती जाणून होता. “बाबा मी शिक्षण थांबवतो व शहरात जाऊन काही कामधंदा शोधतो.” 

 “आरं पोरा, पण तुझ्या शिक्सनाचं काय ? शिक्सन सोडू नकोस लेकरा. शिकशिन तर पुढं जाशीन.”

 “नाही बाबा, आता मी काम करणार, घरात एवढी अडचण असतांना मी शिक्षण करत बसू ? तुमचे हाल आता मी नाही पाहू शकत. आपण नरेशला मात्र शिकवू. नरेश खूप शिकेल, मोठा होईल व आपले दिवस बदलतील. मी जातो शहरात सुशीला मावशीकडे. शोधतो काम.”

सुरेश शहरात निघून गेला. छोटा नरेश वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता.

सावकाराचं कर्ज फेडू न शकल्यानं तो गंगारामचा दुसरा बैल धोंड्यालाही घेऊन जाणार होता. पुढच्या आठवड्यातच बैलपोळा होता आणि गंगारामच्या डोळ्यापुढे पोळ्याचं जणू चलचित्र सुरू झालं.

दरवर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांना हाळावर (हाळ =जनावरांना पाणी पिण्यासाठी केलेला पाण्याचा मोठा आयताकृती हौद) नेऊन स्वच्छ आंघोळ घालायचा. त्यांच्या गळ्यात कवड्यांची व घुंगरांची माळ, शिंगाची रंगरंगोटी, शिंगदोर/मोरकी, शिंगांना लावल्या जाणार्‍या गोंड्यांच्या पितळी शेंब्या, गुडघ्यांना बांधायला गंडे, नाकात वेसण व कपाळावर बाशिंग.

वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या आपल्या सहकार्‍यांचं ऋण गंगाराम यादिवशी त्यांची सेवा करुन जणू फेडायचा. 

रखमाही त्यांची यथासांग पूजा करुन आरतीने ओवाळायची. पुरणपोळ्या खायला घालायची. सायंकाळी गावाच्या वेशीवर सगळे बैल जमवून पोळा फुटायचा. वाजत गाजत बैलांची मिरवणूक निघायची.

सुरेश आणि नरेश सणासाठी घरी आलेले असायचे. बैलांना घेऊन गावभर हिंडायचे, आनंद लुटायचे.

पण यावर्षी हा आनंद त्यांना  मिळणार नव्हता. एक बैल तर पूर्वीच सावकार घेऊन गेलेला. यावर्षी दुसराही तो नेणार होता. पोळ्याच्या दिवशी गोठा सुना सुना राहणार होता. त्यांचं सर्वस्वचं जणू लुटले जाणार होतं.

गंगारामला खूप भडभडून आलं. तो उठला व गोठ्यात जावून धोंड्याच्या पाठीवरून हात फिरवू लागला, धाय मोकलून रडू लागला. “तू खूप सेवा केलीस रे आमची, पण मीच काही करू नाही शकलो तुझ्यासाठी, तुलाही सावकाराच्या दावणीला देऊन बसलो. माफ कर रे माझ्या मित्रा, पण तुझं घर, तुझं स्थान माझ्या काळजात आहे एवढंच सांगू शकतो. माफ कर रे मला, करशील ना माफ, करशील ना?” 

धोंड्याही मान हलवू लागला, करूण नजरेनं पाहू लागला. अंगणातून हे सगळं पाहणार्‍या रखमाचाही उर दाटून आला. पदराचा बोळा तोंडात कोंबत ती ही रडू लागली.

“रखमा”

“जी धनी” 

दोन दिवसांनी धोंड्या जाईल, आपण उद्याच पोळा साजरा करायचा काय ?” 

“विचार चांगला हाय जी. पन घरात पैसा बी न्हाई कि खाया काही दाणे बी न्हाई.” 

“करू काहीतरी जुगाड, पण करू साजरा, बडेजाव नाही छोटेखानी का व्हयना करू आपण पोळा.”

सावकार धोंड्याला घेवून गेला तशी गंगारामनं अन्नपाणीच सोडलं. रखमा धास्तावली, “आसं काय करताजी, म्हातारे आई बाबा हायती घरात, त्येंचा तर इचार करा जरा.”

आज बैलपोळा, पण गंगाराम मात्र उदास बसलेला. परिस्थितीने गांजलेला, क्षीण झालेला. 

अचानक धोंड्या कोंड्याच्या हंबरण्याचा आवाज त्याच्या कानी पडला आणि वीज चमकावी व डोळे दिपावे तसे गंगारामचे झाले. डोळ्यातील अश्रूंच्या जागी आनंदाची चमक दिसू लागली. ‘माझे धोंड्या कोंड्या’ म्हणत तो जागेवरून उठला व बैलांजवळ जाऊन त्यांना कुरवाळू लागला. हे सगळे पाहतांना सुरेशचा चेहरा आनंदाने फुलला.

“केव्हा आलास रे लेकरा?” 

“हा काय, आताच येतोय बाबा, धोंड्या कोंड्याला घेवून‌” 

“आरं पन, सावकाराच्या दावणीची बैलं का सोडून आणलीस तू. बैल चोरीचा आळ घेईल तो आपल्यावर.” 

“नाही घेणार बाबा. मी बैलं सोडवून आणलीत. सावकाराचं कर्ज फेडलंय मी.” 

“कर्ज फेडलं ? पण ही जादू तू केलीस कशी ?” 

“सांगतो बाबा, सगळं सांगतो.”

सुरेश शहरात तर आला पण अर्धवट शिक्षण व कामातील कौशल्य नसल्याने त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. छोटी मोठी कामं करून तो गुजराण करू लागला. गावाकडे फार मोठी रक्कम कशी काय पाठवणार, थोडे बहुत पाठवत राहिला. 

शिक्षणाचं महत्व समजल्याने रात्रशाळेत जाऊ लागला. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांशी दोस्ती वाढवू लागला, कामात कुशलता येण्याचेही प्रशिक्षण घेऊ लागला. सकाळी पेपरची लाईन टाकू लागला, एक वर्तमान पत्र स्वतःही घेऊन चालू घडामोडी जाणून घेऊ लागला आणि त्याच्या या passion मुळेच ‘कोण होईल करोडपती’ साठी प्रयत्न करू लागला. मेसेज पाठवणे, त्याची निवड होणे, त्यातून ग्राऊंड टेस्टसाठी सिलेक्शन व शेवटी Fastest Finger First साठी निवड होणे. या सगळ्या परीश्रमातून आज तो Hot sit वर होता व आपली मेहनत, परीश्रम व बुद्धीमत्तेच्या जोरावर तो पंचवीस लाख रुपये जिंकला होता.

आणि आज त्याने सावकाराचे कर्ज फेडले होते. शेतीसाठीही तो नवनवीन प्रयोग करणार होता. कमी पाण्यात अधिक उत्पादन व नवनवीन संशोधित बियाणांचा वापर करणार होता. 

घर आनंदानं न्हाऊन निघालं होतं. “रखमा, आजचा बैलपोळा दणक्यात झाला पाहिजे बरं का ?” 

“व्हयजी, आता तुमी बी लागा की कामाला.” 

“हा काय आताच लागतो बघ.”

धोंड्या कोंड्याच्या अंगावर थोपटत तो म्हणाला, “तुमचं घर माझ्या काळजात आहे सख्यांनो , तुम्ही घरी आलात, भरून पावलो मी.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वर्ल्ड टूर…” – लेखिका : दीपाली शेटे राव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “वर्ल्ड टूर…” – लेखिका : दीपाली शेटे राव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

” काय मेली कटकट आहे डोक्याला. आमच्या नशिबात हेच वाढून ठेवलंय. लग्न करून या घरात आले..तेव्हापासून सगळेच दिवस सारखेच. कुठे जाणं येणं नाही की कसली हौस मौज नाही. अजून किती वर्ष ‘राहणार’ आहेत …कोण जाणे….हे ही सुटत नाहीत आणि आमची ही सुटका नाही.” 

अनिता स्वतःशीच बडबडत, गेली चार वर्षे अंथरूणाला खिळून असलेल्या सासऱ्यांना स्पंजिंग करत होती… 

” पैसा असता गाठीला तर एखादा माणूस तरी ठेवला असता यांच्यासाठी..पण नाही..आमच्याकडे सगळ्याचीच ओढाताण. कमावतं माणूस एकच आणि त्यातलाही बराचसा भाग यांच्या औषधांवरच जातो…

मलाही कामासाठी बाहेर पडणं अशक्य यांच्यामुळे. नशीबच मेलं फुटकं त्याला कोण काय करणार. 

देवा ! काय रे ! यांच्या घराशीच गाठ घालायची होती? “…. कातावलेल्या अनिताची बडबड ऐकून सासरेबुवा विषण्ण हसले. 

“हो ग बाई !  तुझ्या नशिबात माझं करणं आणि माझ्या नशिबात हे असं जगत रहाणं… नकोसं तरीही जगावंच लागणारं.”  मनातल्या मनात बोलून त्यांनी डोळे मिटले तरीही त्यांचं असहाय्यपण डोळे मिटल्या बरोबर अलगद डोळ्याच्या कोपऱ्यातून निसटलंच. 

“देवा खरंच अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये. मला माझं दु:ख आहेच, पण माझ्यामुळे या दोघांनाही त्रास. माझ्या या अशा कटकटीमुळे  पाळणाही लांबवला यांनी. अजून किती दिवस करायचं त्यांनी तरी..कळतं मलाही..माझ्या अशा अवस्थेमुळे त्यांनाही कुठले आनंद साजरे करता येत नाहीत की मोकळेपणा मिळत नाही. सतत घरभर एक आजारी वातावरण भरून राहिलेलं असतं. खरंच देवा ! सोडव रे यातून.. सगळ्यांनाच. ” ……. 

ते विचार करत असतानाच अनिताचं लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे गेलं आणि अश्रूंच्या रूपाने ओघळलेलं  उदासपण तिच्या मनात कालवाकालव करून गेलं. न बोलताही बरंच काही बोलत होते ते डोळे. कसंतरीच झालं तिला. 

“आपण पण ना…कधीकधी फारच रिऍक्ट होतो. खरंच हे असं जगणं कोण स्वतःहून मागून घेईल..हे परावलंबित्व…  सासुबाई होत्या तोवर आपल्याला याची झळही  लागू दिली नाही. छोट्याशा आजाराचं निमित्त झालं……. जातानाही जीव अडकला होता त्यांचा. ‘ह्यांनी’ वचन दिलं बाबांना बघेन.. काळजी घेईन…आपणही शब्द दिला..तेव्हा कुठे  डोळे मिटले त्यांनी. 

तसंही घरी असतात तेव्हा ‘हे’ च तर बघतात बाबांचं. उगाच बोललो आपण. उगाच चिडचिड करतो. “

तिनं मायेनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला तसा तिचा हात हातात घेऊन ते म्हणाले, ” असा नव्हतो ग पूर्वी. खूप कष्ट केले आयुष्यात. आईवडिलांमागे बहिणींना सांभाळलं.. त्यांचे संसार मार्गी लावले. लग्न झालं तसं यमुनेनंही खूप साथ दिली. ओझं वाहून वाहून मी अधू झालो..एकटीनं मुलाला वाढवायचं..मोठं करायचं..शिकवायचं..यासाठी फार झटली ग. कुठल्याही कष्टाला मागेपुढे पाहिलं नाही तिनंही. 

अपार कष्ट केले.. भूक मारून जगलो..म्हणून मग आता हे असं अंथरुणाला खिळणं नशिबात आलंय . 

मला फिरायची तर फार हौस.. आवडायचं…. मित्रांनी कधी प्लॅन ठरवले, ते बाहेरगावी फिरायला गेले की मी त्यांच्या कडून आवर्जून माहिती घेत असे. एकच आशा….कधीतरी यमुनेला घेऊन मीही जाईन. .

कधी कुठे जाताच आलं नाही. विचार केला..मुलगा मोठा होईल, शिकेल, चांगला नोकरी करेल, मग आपल्या आरामाचे दिवस येतील, तेव्हा खूप फिरू, जग बघू , वर्ल्ड टूरला जायचं होतं..तिच्यासोबत देश बघायचे वेगवेगळे.. वाचलेलं, ऐकलेलं सारं सारं अनुभवायचे.. मनसोक्त हिंडायचं, विदेशी पदार्थ चाखून बघायचे. सगळ्या चिंता बाजूला सारून चैन करायची…… पण सगळाच प्रवास अधुरा…   स्वप्नच राहिलं सगळं. मरायच्या आधी मला कुठेतरी फिरायचय गं ! बाहेरचं… घराबाहेरचं… या गावाबाहेरचं  जग अनुभवायचंय.  या चार भिंती लांघून एकदा तरी पलिकडे भरारी मारायचीय. सुखानं डोळे मिटेन मग….. 

पण मी हा असा… लाचार..  तुमची ही जाणीव आहे मला, काय करू मी तरी … ” ते थकून शांत पडले. 

” थांबा मी तुमच्यासाठी गरम गरम पेज घेऊन येते खायला.”

झटकन आनिता उठली. डोळ्यातलं पाणी त्यांच्यासमोर दिसू नये म्हणून त्यानिमित्ताने स्वयंपाक घरात निघून आली.  गरमागरम पेज वाटीत घेऊन त्यांना  भरवता भरवता एक निराळीच कल्पना सुचली तिला. 

दुसरे दिवशी  नवरा ऑफिसला गेल्यावर ती  बाहेर पडली. चॉकलेट्स, आईस्क्रीम, वेफर्स, पॉपकॉर्न,  वेगवेगळी बिस्किटे, केक…असे काही तऱ्हेतऱ्हेचे जिन्नस थोडे थोडे खरेदी केले. दुकानात जाऊन तिला हवी ती सी.डी. खरेदी केली. घरी जाता जाता शेजारच्या नरेशकडून  सीडी प्लेअर मागितला आणि त्याच्या मदतीने टी. व्ही ला जोडला. संध्याकाळी नक्की परत देते असं सांगून त्याचे आभार मानले. 

मग दोघांसाठी थोडं खायला बनवून ती बाबांच्या जवळ आली. ते ही तिची धावपळ बघत होते. 

“चला बाबा आवरुया पटापट. आज बाहेर जायचंय आपल्याला. चला आज जरा चांगले कपडेही घालू.”

“अग पण मी असा… तू एकटी… कसं जाणार. नको अशी थट्टा करु ग. “

रया गेलेला, कधीकाळी भक्कम असलेला अन् आता आजारानं पार काडी झालेला जीव बघून गलबलली ती. आवरून त्यांना नरेशच्या मदतीने तिने उशीला टेकवून बसवलं. 

” चला बाबा ! विमान चालू झालंय…एवढ्यात उडेल आकाशात…”  म्हणत घरातला कमरेचा पट्टा त्यांच्या कमरेला लावत कॉटच्या बारमधे अडकवला. 

आता अचंबित होण्याची पाळी बाबांची होती. 

” अग काय करतियेस? कुठे नेणारेस मला असं कॉटला बांधून? चंदूला तर येऊ दे घरी. ” 

” नाही बाबा आज आपण दोघच जाणार फिरायला.. चला आटपा तयार आहात ना “

” पण..पण हे असं? ” अशुभाच्या कल्पनेनं घाबरले ते. 

तिनं ताडलं. पटकन त्यांना जवळ घेतलं, ” घाबरू नका बाबा. तुमचा जीव घेण्याइतकी कोत्या मनाची नाही मी. बस ! तुमची फिरायला जाण्याची इच्छा पुरी करण्याचा प्रयत्न करतीये. उरका आता…”

डोळ्यातले पाणी पुसत  तिने वर्ल्ड टूरची सी.डी. प्लेअर मधे सरकवली आणि बाबा आज वर्ल्ड टूर करायचीये आपल्याला..म्हणत त्यांच्या शेजारी बसली. 

कदाचित आता कधीही घराबाहेर पडणं अशक्य असलेल्या त्यांना, टीव्हीमधे का होईना विदेश वारीचा अनुभव ती  देत होती….कधी चॉकलेट, कधी वेफर्स तर कधी पॉपकॉर्न खायला घालत हौस पुरी करत होती.. 

पाण्याने भरून आलेले समाधानाने फुललेले दोन चकाकणारे डोळे उत्सुकतेने समोरच्या टीव्हीत गुंतून वर्ल्ड टूरला निघाले होते. 

त्या दोन उत्सुक नेत्रांतून ओघळणारे समाधान ती हरवल्यासारखी पहात राहिली. ते पुसायचे भानही तिला उरले नाही. 

लेखिका :  सुश्री दीपाली थेटे-राव

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुड टच बॅड टच… – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गुड टच बॅड टच… – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(मला अजून आठवतं, सकाळी मी जी लवकर उठून कामाला जुंपायची ती रात्रीच उशीरा पाठ टेकायची अंथरुणाला. जावा सतत  बाळंतिणी. मी बरी होते  हमाल फुकट राबणारा !) – इथून पुढे — 

“अशाच एकदा  मोठ्या जाऊबाई बाळंतीण होत्या. रात्र झाली की सगळ्यांच्या खोल्यांची दारं लागलेली आणि मी माझ्या अंथरुणावर तळमळत पडलेली ! माजघरात ! शेजारी  लहान मुलगा म्हणजे तुझा बाप!मला कुठली ग वेगळी खोली ! त्या रात्री मला  गाढ झोप लागली होती. अचानक माझ्या तोंडावर कोणीतरी हात दाबला आणि माझ्या लुगड्याशी कोणाचे तरी हात आले.मी जीव खाऊन त्या हाताला चावले.इतकी जोरात की रक्तच आलं. रात्रभर मी जागी राहिले.सकाळी उठून बघितलं तर मोठ्या भावजींच्या हाताला बँडेज बांधलेलं. मी हे सासूबाईंना सांगितलं. त्यांनी काय सांगितलं माहीत नाही पण दोन दिवसात भावजी आणि जाऊबाईंनी वेगळं बिऱ्हाड केलं. सासूबाईंनी मला वेगळी खोली दिली आणि म्हणाल्या लक्ष्मी,आतून कडी लावत जा हो!.उपकार हो त्या माऊलीचे! असे अनेक प्रसंग आले ग बाई. पण मी धीट आणि खमकी म्हणून निभावून गेले त्यातून ! शेवटी बाई ती बाईच ग मानू ! मग ती शिकलेली असो किंवा अडाणी ! तिनेच तिला जपायला नको का? मरताना सासूबाईंनी हा वाडा माझ्या नावावर केला म्हणून मी आज इथे सन्मानाने रहातेय. मला निदान पोटापुरतं भाडं येतं. मी विधवा झाले तेव्हा तुझा बाप 3 वर्षाचा होता. माझं वय असेल पंचवीस का तीस ! कसे काढले असतील दिवस सांग? “ आजीच्या डोळ्यात पाणी आलं. “ मी तुम्हाला फटकळ, बोलभांड वाटते पण त्यामुळेच मी पुरुष जातीला लांब ठेवू शकले. तुम्हीही धडे घ्या “. मानसीला हे सगळं आठवलं. 

आजी कालवश झाली आणि आता मानसी स्वतः आजी झाली. रात्री अक्षी झोपल्यावर अल्पना आणि मानसी  झोपाळ्यावर बसल्या.मानसी म्हणाली,  “अक्षीने ते पत्रक दाखवल्यावर काळजात चर्रर्र झालं बघ अल्पना.  शेवटी कोवळं मूल ग ते. आपण त्याला हे सांगायला हवं, घाणेरडे पुरुष स्पर्श, किळसवाणी जवळीक. इथे तर हा धोका आणखीच आहे. तुमची लांब लांब अंतरं, ही अजाण कोवळी मुलं बस मधून येणार ! ते  काळे गोरे बस ड्रायव्हर, आणि सगळे उतरून गेल्यावर एखादे मागे रहाणारे मूल ! काहीही होऊ शकतं इथं. म्हणून हल्ली भारतात पण बसमध्ये कोणीतरी पालकआई असतेच. नियम केला हा सगळ्या  शाळांनी! मुलांच्या आया हे काम व्हॉलंटरी करतात. म्हणजे मुलं सुरक्षित रहातात आपली. अशा घटना घडल्या असणार ग भारतातही ! तुला आठवतं का अल्पना, तू इंजिनिअरिंगला होतीस. किती तरी वेळा तू रात्री उशीरा घरी यायचीस. तुझे  प्रोजेक्टस असत किंवा काही इतर असेल. आपला बंगला तसा एकाकीच ! तू येऊन गेट बंद करेपर्यंत मला झोप नसायची. मी अनेक वेळा तुला खूप ओरडलेही आहे ना,की सांगून जात जा, फोन करत जा ग !आम्ही काय समजायचं तू कुठेआहेस? ते कॉलेजसुद्धा किती लांब ग घरापासून !

जीव थाऱ्यावर नसायचा माझा तू दिसेपर्यंत ! तुला कुठे त्याचं काय वाटायचं? ‘कोण काय करणारे आई मला? किती ग काळजी करतेस आणि बंधन  घालतेस माझ्यावर’ असं म्हणायचीस ! केल्यावर बोलून काय उपयोग ! पण त्या वेड्या वयात हे समजत नाही.तुलाही आईची कळकळ समजली नाही !आता समजलं का, स्वतःची मुलगी हे पत्रक घेऊन आल्यावर? “ मानसी हसली. अल्पनाला पण हसू आलं.तेवढयात तिथे आमोद येऊन बसला !

“येऊ का? काय चाललंय माय लेकीचं हितगूज?” आमोदला अल्पनाने अक्षीने आणलेल्या पत्रकाबद्दल सांगितलं. आमोद आपल्या लेकीबद्दल अतिशय हळवा होता. “अग अल्पना, तुला मी सांगायला विसरलो. आपली अक्षी बघ पूर्वी त्या  प्रीस्कूल कम डे  केअरला जात होती ना? आपल्याला ते फार लांब पडायला लागलं म्हणून आपण ते बंद केलं बघ ! “ “ अरे हो की ! त्याचं काय?” अल्पनाने विचारलं. “ अग ऑफिस मधल्या विवेकची छोटी मुलगी रिया तिकडे जात होती. मागच्या आठवड्यात सकाळी अचानक विवेकला फोन आला, डे  केअर बंद झालंय आणि तुमची मुलगी पाठवू नका.अचानक सकाळी हा फोन आल्यावर काय धावपळ झाली विवेक आणि त्याच्या बायकोची ! रजा घेऊन बसावं लागलं तिला घरी. मग दुसरं चांगलं डे  केअर मिळेपर्यंत हालच झाले दोघांचे ! आता मिळालं दुसरं.” “ हो का? पण काय झालं रे असं अचानक बंद  व्हायला? “ अल्पनाने विचारलं.  “ अग, तुला आठवतं का ? एक तरुण मुलगा होता बघ तिकडे.. मिस्टर जॅक?चांगला होता तो ! किती प्रेम करायचा मुलांवर! आपल्याला कधी  शंका तरी आली का तो असा असेल? त्याने तीनचार वेळा लहान मुलांना  ऍब्युज केलं म्हणे..त्या मुलांनी आपल्या पेरेन्ट्सकडे तक्रार केली आणि ताबडतोब ते डे केअर एका दिवसात बंद केलं.”  तरीच ऑफिसला जाताना मला तिथे पोलीस,  पोलीस व्हॅनस् दिसल्या. ही अमेरिका आहे बरं ! त्याला लगेच अटक झाली आणि तो जेलमध्ये गेला ! इकडे असल्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतात आणि ते चांगलंच आहे.त्याला कमीतकमी दहा वर्षाची शिक्षा होणार बघ.” आमोद म्हणाला. मानसी अल्पना म्हणाल्या,” कठीण आहे रे बाबा ! कसं व्हायचं आपल्या या कोवळ्या बाळाचं? समाज किती विकृत आहे ना ! “  “ हो आहेच !” मानसी म्हणाली,” मी मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते ना, तेव्हाही किती वाईट रुपं बघितली आहेत ग विकृत लोकांची ! लहान पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारे नराधम मी  बघितले. त्या बाळाला इतक्या वाईट रीतीने जखमा झाल्या होत्या की ते वाचू शकलेच नाही ग त्या अत्याचारातून ! मी लहान मुलांवर झालेले अत्याचार, बलात्कार बघितले आहेत.  एवढंच कशाला, कोणत्याही वयाच्या बाईवर अत्याचार करणारे लोक मी बघितले आहेत. इतके वाईट  असायचे ते दृश्य आणि त्या वाईट फाटलेल्या जखमा ! आम्हीही तेव्हा शिकत होतो, पण तेव्हापासून ही पाशवी वृत्ती आहे समाजात ! म्हणून तर आपल्या मुलीला मुलाला सावध करायचं आपणच ! उद्या आपल्या अक्षीला आपण  मानवी शरीराचा तक्ता दाखवू , सगळ्या ऑर्गन्सची चित्रं दाखवू आणि नीट सगळं समजावून सांगू. म्हणजे ती सावध राहील.” आमोद म्हणाला “ आई,हे काम तुम्हीच जास्त चांगलं कराल. मी आणि अल्पना तिथे थांबूच ! पण एक डॉक्टर म्हणून आणि अर्थात अक्षीची लाडकी आजी म्हणूनही हे काम तुम्हीच करायचं.” मानसीने मान डोलावली आणि आमोदला म्हणाली “ हो मी हे करीनच ! मला तेवढे मी सांगते ते चार्ट्स द्या गूगल वरून प्रिंट करून ! “ आमोद आणि  मानसी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि जिच्यासाठी हे सगळं करणार, ती अक्षी मात्र निरागसपणे गाढ झोपली होती.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुड टच बॅड टच… – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गुड टच बॅड टच… – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मानसी अमेरिकेला मुलीकडे गेली होती. तिची नात अक्षी चार वर्षांची. एकदा तिच्या प्री स्कूल मधून एक पत्रक घेऊन आली आणि ते फडफडवत म्हणाली ममा, “ व्हॉट इज गुड टच अँड बॅड टच? टीचर म्हणाल्या, आपल्या प्रायव्हेट पार्ट्सना कोणाला हात लावू द्यायचा नाही. लावला कोणी तर लगेच ममा किंवा टीचर ना सांगायचं ! व्हॉट आर  प्रायव्हेट पार्टस ममा? “ चार वर्षाचं ते निष्पाप मूल  आईला आणि आजीला विचारत होतं. मानसीच्या आणि अक्षीच्या आईच्या, अल्पनाच्या डोळ्यात पाणी आलं. “अक्षी,तू आत्ताच आलीस ना स्कूल मधून? मी रात्री नीट सांगते हं तुला ! “ 

मानसीला तिचं बालपणआठवलं.मानसी वाड्यात वाढलेली मुलगी.लहानपण सगळं एकत्र खेळण्यात, इतर बिऱ्हाडातील मुलांबरोबर वाड्यात खेळण्यात जात होतं. मानसी दिसायला अतिशय सुंदर. निरोगीपणाचं तेज होतं तिच्या सर्वांगावर. सगळी मुलं एकत्र खेळायची. त्यात मुलगा मुलगी असे भेदभाव नसत .ते वयच मुळी अल्लड आणि निष्पाप ! तरीही वरच्या गॅलरीतून एखाद्या काकू लक्ष ठेवून असायच्या.  वाड्यात बरीच बिऱ्हाडं. सगळे लोक कुटुंब वत्सल, सगळ्याना दोनतीन मुलं असलेले.

वाड्याच्या अगदी पुढच्या भागात एका खोलीत एक ब्रम्हचारी काका रहात.  अगदी सज्जन, देवभोळे, रोज पूजाअर्चा, नित्य नियमाने देवदर्शन.कधी मान वर करून बघायचे नाहीत कोणाकडे ! अडीअडचणीला धावून जातील, मुलांना खाऊ देतील, आवडते होते ते सगळ्यांचे. त्यांचं वय असेल पंचावन्न साठ तरी !  मानसीची आई आजी त्यांना दर सणावारी मुद्दाम जेवायला बोलावत. वाड्यातले इतर लोक सुद्धा त्यांना आवर्जून गोडधोड देत. त्या दिवशी त्यांना ताप आला होता म्हणून  मानसीच्या आजींनं मानसीला सांगितलं, 

“ मानू, त्या नानाकाकांना एवढं ताट नेऊन दे ग जाताना. मग मी जाऊन बघून येईन हं त्यांना ! “ उड्या मारत मानू ते ताट घेऊन नानांकडे गेली. नाना खुर्चीवर बसले होते. मानू म्हणाली “  इथे ठेवलंय ताट. जेवून घ्या हं नाना “ .नाना म्हणाले ,” मानू जरा  ये ग इकडे ! मानूचं वय आठ नऊ वर्षाचं. ती जवळ गेली त्यांच्या. त्यांनी तिला मांडीवर बसवलं आणि तिचे मुके घेऊ लागले. नको तिथे त्यांचा हात फिरू लागल्यावर मानूच्या लक्षात आलं, हा स्पर्श नेहमीसारखा नाही. काहीतरी वेगळा आहे. तिने कशीबशी सुटका करून घेतली आणि घरी येऊन मुसमुसून रडायला लागली. त्या रात्री  फणफणून  ताप भरला मानूला. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीला, शुभाला मानूनं हे चार दिवसांनी सांगितलं. शुभाही मानू एवढीच. शुभा म्हणाली,

“ मानू,मीही कोणाला सांगितलं नाही ग, पण मलाही नानांनी असंच केलं होतं. मला आत बोलावलं, दार लावून घेतलं आणि माझ्या चड्डीत हात घातला. मी चावले त्यांना आणि आले पळून. वाईट आहेत नाना. घाणेरडे.कद्धी जायचं नाही आपण तिकडे आता. मी हे आईला पण नाही सांगितलं “ .शुभा रडवेली होऊन मानूला सांगत होती. “ अग, चॉकलेट देतो म्हणतात आणि आमच्या छोट्या बिट्टूशीही असेच घाण चाळे करतात.मानू, हे आपण तुझ्या आजीला सांगूया.” मानूला आपल्याबरोबर शुभाही आहे म्हणून धीर आला. मग शुभाची आई दुसऱ्या दिवशी मानूच्या आजीकडे आली. “आजी, कसं सांगू समजत नाहीये पण…”त्या घाबरून गप्प झाल्या.” अहो बोला ना शुभाच्या आई, काय सांगायचंय? “ शुभाच्या आईनं शुभा बिट्टू आणि आता  मानूलाही नानांनी काय केलं ते सांगितलं. आजी संतापाने लाल झाली. “ बरं झालं सांगितलंत मला ते. काय हो ही विकृत माणसं तरी ! वेळेवर लग्न करत नाहीत आणि अशा वासना भागवायला बघतात. काय करू काही सुचत नाहीये बघा. पण आपण खबरदारी घेऊया. कोणीही लहान मुलं त्यांच्याकडे पाठवायची नाहीत. सगळ्याना सांगून ठेवा तुम्ही. शी: ! मनातून उतरून गेला बघा हा माणूस ! पण आपणच खबरदारी घेऊया, आणि कोणतेही मूल, एवढंच कशाला, एकटी तरुण मुलगी, बाई कोणी जायचं नाही त्यांच्याकडे !” 

बहुतेक हे नानांच्या लक्षात आलं असावं. त्या काळी भाड्याने जागा मिळणं इतकं अवघड नव्हतं. काहीच महिन्यात नाना ती जागा सोडून गेले. वाड्यात सगळ्यांना  हायसं झालं. मानूची आजी वाड्यात सगळ्यांचा आधारवड होती.  तीही विधवा आणि तरुणपणीच नवरा गेलेला ! किती भोगलं सोसलं असेल तिनं. तिनं मानू आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलावलं आणि सांगितलं, “ तुम्ही अजून लहान आहात.  पण कोणी असं भलतीकडे हात लावायला लागलं, मग ते शाळेतले शिपाई असोत, गुरुजी असोत किंवा कोणीही असो, लगेच मोठ्या माणसांना सांगायचं. भिऊन गप्प बसून सहन नाही करायचं .मुलींनो, तुम्हीच जपायचं स्वतःला! यातून कोवळे मुलगेही नाही सुटले. बिट्टू, तूही हे ऐकून ठेव आणि तुझ्या मित्रांना सांग. आत्ता कदाचित हे तुम्हाला समजणार नाही. तरीही लक्षात ठेवा.” 

किती हुशार, चतुर, आणि चाणाक्ष होती मानूची आजी ! मानसी मोठी झाली, मेडिकलला गेली. आजी ही तिची जिवाभावाची मैत्रीण झाली. आईपेक्षा मानसीचं आजीशी जास्त जमायचं. मानसीला असे अनुभव पुढेही येत गेले. पण ती सावध असायची. गाण्याच्या क्लासमधले सर जेव्हा तिला एकटीला क्लास झाल्यावर थांब म्हणायला लागले तेव्हा ती कधीही थांबली नाही. ती आणि शुभा कायम बरोबर असत. बिट्टूही आता मोठा झाला. ‘कोणी असं केलं तर मला सांगा, बघतोच त्याच्याकडे,’ असं म्हणून त्याचा आधार वाटावा इतका मोठा झाला. 

मानसीने आजीला विचारलं, “ आजी आपले आजोबा तर तू किती लहान असताना गेले असं तू सांगतेस. मग कशी ग राहिलीस त्या एकत्र कुटुंबात? तुझ्यावर नाही का आले असे वाईट प्रसंग ? तू तर पंचवीस-तीस वर्षाचीच होतीस ना? “ आजीने मानूला जवळ बसवलं. “ मानू, तूही आता लग्नाला आलीस, डॉक्टर झालीस, तुलाही हे सगळं विकृत जग बघायला मिळाले असेलच, म्हणून बोलते तुझ्याजवळ. बाळा, नाही आले कसे ग? तो काळ किती वेगळा होता. बाईने म्हणजे उंबऱ्याआडच रहायचं. काय हिम्मत होईल तिची पुढं होऊन बोलायची? आम्ही मिळवत्या नव्हतो ग बाळा ! घराबाहेर काढलं तर कुठे जाणार? त्याकाळी आईवडीलही मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत नसत ग. कठीण होता तो काळ ! मी सुंदरच होते, तरुण होते,आणि मला नवऱ्याचा आधार नाही. मग काय ग ! माझ्यावरही कमी नाही प्रसंग आले मानू. लोकांना वाटायचं ही विधवा बाई, आहे आपल्याला सहज उपलब्ध !  कुठे मागणार ही दाद ! कोण म्हणेल ही खरं बोलते ! आमचे तेव्हा एकत्र कुटुंब,आला गेला पै पाहुणा तर सतत ! मला अजून आठवतं ,सकाळी मी जी लवकर उठून कामाला जुंपायची ती रात्रीच उशीरा पाठ टेकायची अंथरुणाला.  जावा सतत  बाळंतिणी. मी बरी होते  हमाल फुकट राबणारा ! “ 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीब जीवनअंताचे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ नशीब जीवनअंताचे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

तात्यासाहेब… आमच्या भागातले एक सुपरिचित व्यक्तिमत्त्व … सतत माणसांच्या घोळक्यात असणारे … अल्पशा आजाराने काल रात्री त्यांचं निधन झालं … रात्री म्हणजे १२ च्या सुमारास. हां हां म्हणता ही बातमी वा-यासारखी पसरली, आणि लोक त्यांच्या घरासमोर जमा व्हायला लागले. आमच्या घरासमोरच त्यांचं घर, त्यामुळे आमचा चांगला घरोबा होता. त्यामुळे आम्हीही रात्री लगेचच त्यांच्या घरी गेलेलो होतो. बघता बघता गर्दी प्रचंड वाढली… तात्यासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी धक्काबुक्की व्हायची वेळ आली. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, आणि मग रांगेने दर्शन घेणे सुरु झाले… ते थांबेपर्यंत सकाळचे नऊ वाजत आले होते. अखेर फुलांनी शाकारलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा निघाली. तो ट्रक दिसेनासा होईपर्यंत आम्ही थांबलो, आणि मग घरी परतलो. या घटनेने अस्वस्थ झालेले मन मात्र एव्हाना शांत होण्याऐवजी जास्तच अस्वस्थ झालं होतं… कारण ….. 

कारण मला सारखे आठवत होते आमचे तात्यासाहेब… खरंतर या टोपणनावातलं साधर्म्य सोडल्यास या दोन तात्यासाहेबांमध्ये काडीचंही साधर्म्य नव्हतं. आमचे तात्यासाहेब… त्यांच्या एकूण सहा भावंडांमधलं शेंडेफळ… पण म्हणून त्यांचे विशेष लाड करण्याचा तो काळ नव्हता. लहानपणापासून त्यांना फीट्स येण्याचा त्रास सुरू झाला, आणि तो त्रास त्यांचं आयुष्य… त्यांचं व्यक्तिमत्त्व सगळंच व्यापून टाकायला लागला… ते अगदी शेवटपर्यंत. औषधोपचारांमुळे तरुण वयात येतांना तो त्रास थांबला खरा… पण स्वत:चे दूरगामी परिणाम मात्र तात्यांच्या सोबतीला ठेवून गेला. लहानपणापासूनच त्यांची जीभ जड झालेली असल्याने बोलण्यातही ते जडत्व आले होते. मोठे तिघे भाऊ उत्तमरित्या शिकून, चांगल्या नोक-या मिळवून आयुष्यात स्थिरावले होते… पण तात्यांच्या नशिबात तो योग नव्हता. आजारपणामुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य झाले नाही… त्यामुळे स्थिर स्वरुपाची नोकरी नाही. आणि अर्थातच् लग्न हा विषयही आपोआपच लांब राहिलेला… हळूहळू इतरांच्या विस्मरणात गेलेला…. आणि बहुतेक तात्यांनीही स्वतःच स्वतःची समजूत घालून तो संपवलेला असावा. थोडक्यात काय, तर त्यांच्या नावातला ‘ वसंत ‘ प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात कुठल्याच रूपात कधीच फुलला नव्हता.                

त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील गेले असल्याने आई शेवटपर्यंत थोरल्या भावाकडे राहिली, आणि तिच्याबरोबर तात्याही. दुस-या कुणावर आपला सगळा भार टाकायचा नाही ही समजही होती आणि संस्कारही. घरी वहिनीला लागेल ती सगळी मदत करायची… अगदी घरकामापासून ते बाजारहाट करण्यापर्यंत. आणि एका तपकिरीच्या कारखान्यातही माल आणणे, पोहोचवणे व मालक सांगतील ती इतर कामे मनापासून करणे… बस् एवढंच मर्यादित आयुष्य होतं त्यांचं. वहिनीच्या हाताखाली त्यांना काम करतांना पाहिलं की नकळत एकनाथ महाराजांच्या घरच्या ‘श्रीखंड्याची’ आठवण व्हायची. मोठ्या भावाला, म्हणजे आमच्या मोठ्या काकांना दोन मुलं होती. पण तात्यांमुळे त्यांच्यावर कुठल्याच कामाचा भार कधी पडायचा नाही. मोठा मुलगा खूप शिकला… खूप लांब, वेगळ्याच राज्यात उच्च पदाची नोकरी मिळवून तिकडेच स्थायिक झाला, त्यामुळे कधीही आला तरी पाहुणाच. आणि धाकटा मुलगा त्याच्या अगदी उलट… मंदबुध्दी… घरासाठी निरुपयोगी… पण त्यामुळे घरात काहीच फरक पडत नव्हता… कारण तात्या होते ना कायम हाताशी.

कालांतराने वहिनी गेली. भाऊ पक्षाघाताने कायमचा आजारी झाला. पण तात्यांनी श्रावणबाळ बनून त्यांची लागेल ती सगळी सेवा केली… अगदी शेवटपर्यंत. भाऊ गेला आणि मग मात्र तात्या ख-या अर्थाने एकाकी झाले… तसेही, ते एका कुटुंबात रहात असूनही, आत कुठेतरी कायम एकटेच होते, असं मला नेहेमी जाणवायचं.

नात्यातल्या… ओळखीच्या लोकांकडे ते अगदी नेमाने जायचे. थोडा वेळ थांबून परतायचे. पण तेवढ्या वेळात सगळ्या चौकश्या करायचे… अर्थात् त्यात भोचकपणा करणे हा हेतू मात्र जाणवायचा नाही. मनातून माणसांच्या आपुलकीची आस तेवढी जाणवायची त्यात… आपलं कुणीतरी आहे, जिथे आपण न सांगता, न विचारता जाऊ शकतो, हा एक अनामिक दिलासाही मिळत असावा कदाचित्… असा विचार मनात आला की माझं मन खूप अस्वस्थ व्हायचं… एक अपराधीपणाची जाणीव बोचायला लागायची. मोठे काका गेल्यावर तर तात्याच ख-या अर्थाने ‘पोरके’ झाले होते. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या मनातली उद्गिग्नता ते कधीच दाखवायचे नाहीत, आणि मला…आम्हा चुलत-आत्ये भावंडांना जास्तच अपराधीपणा जाणवायचा.

हळूहळू तात्याही थकले. पूर्वीसारखं काम होईनासं झालं. आता यांचं कसं होणार? हा विचार करण्यापलिकडे आम्ही कुणीच काही केलं नाही… करू शकत नव्हतो. कारण प्रत्येक जण आपापल्या मर्यादित संसाराच्या चक्रात गुरफटलेला… अखेर तात्यांना वृध्दाश्रमात ठेवायचे हाच एकमेव पर्याय असल्यासारखा… सगळ्यांनी निर्णय घेतला होता… आणि इथेच खूप खूप प्रकर्षाने पुन्हा एकदा जाणवलं, की तात्या आत… आत कुठेतरी सदैव एकटेच होते, आणि हे एकटेपण त्यांनी आयुष्यभर शांतपणे… मनापासून स्वीकारले होते. इतक्या वर्षात त्यांनी स्वत:साठी म्हणून कुठल्याच गोष्टीसाठी त्रागा केला नव्हता… आणि हा वृध्दाश्रमाचा निर्णय स्वीकारतांनाही नाही… मुळीचच नाही. ठरल्या दिवशी ते अतिशय शांतपणे त्या वृध्दाश्रमात रहायला गेले… त्यावेळी त्यांचे पाय त्यांना किती मागे ओढत असतील, या विचारानेही अपराधीपणाचं प्रचंड ओझं मनावर आलं होतं… जे शेवटपर्यंत वागवलं होतं आम्ही.

आणि माझी बहीण त्यांना नियमितपणे भेटायला जायचो. त्यांच्या आवश्यकतेच्या वस्तू त्यांच्यासाठी घेऊन जायचो… अगदी  मनापासून. पण तेव्हा जाणवणारी हतबलतेची भावना पुढचे दोन-तीन दिवस आमची पाठ सोडायची नाही. 

त्यांचे हात थरथरायचे. त्यामुळे एकदा त्यांच्या हातून कॉफीचा भरलेला कप खाली पडला… आणि त्यांची राहण्याची सोय जिथे केलेली होती, त्या वॉर्डमधल्या इतर ‘ निराधार ‘ वृद्धांनी त्यांना त्या खोलीतून हलवण्यासाठी व्यवस्थापकांचा पिच्छा धरला, आणि त्यांना नाईलाजाने दुस-या खोलीत हलवण्यात आले. आम्ही भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी स्वत:च आम्हाला हे सांगितले… शांतपणे…एखाद्या त्रयस्थांबद्दल सांगावं तसं. ‘अतीव नाईलाजाची परिणती अशा शांततेत होते का? ‘या विचाराने  मी पछाडल्यासारखी झाले होते… पण मग स्वत:च्या नावामागे जन्मभर जणू ‘नाईलाज’ या शब्दाची सावली घेऊन फिरणारे तात्या, कसे जगले असतील इतकी वर्षे… हा विचार मनात आला आणि मलाच माझा राग आला. मनात आलं… ‘या वृध्दाश्रमात माणसं रहात नाहीत… फक्त आणि फक्त ‘नाईलाज’च रहातो.

एक दोन वर्षं गेली, आणि तात्या आजारी पडले. ‘रूग्ण’ झाले आणि रूग्णांच्या वॉर्डमध्ये त्यांना हलवलं गेलं. वृध्दाश्रमाने केलेली जी औषधोपचारांची, डॉक्टरांची सोय होती, त्यानुसार उपचार चालू झाले. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. कसा मिळणार?… ‘कसा आहेस रे?… होशील हं लवकर बरा…’ या मनापासूनच्या, प्रेमाच्या, आपुलकीच्या शब्दांना जणू मज्जावच होता तिथे…

आणि एक दिवस फोन आला… तात्या गेल्याचा. आयुष्यभर एका अदृश्य कुंपणापर्यंतच धाव येत राहिलेला एक सरडा आज सगळ्यांचा डोळा चुकवून कुंपणाबाहेर पडला होता, असले काहीतरी विचित्र विचार माझं मन पोखरायला लागले होते ..आत्तापर्यंत कुंपणाबाहेर पडायचा प्रयत्न कधीच करता आला नसेल का त्यांना? केलाही असेल… मनातल्या मनात. पण… ‘नाईलाजच’ झाला असेल त्यांचा… पाचवीलाच पूजलेला तो… या असल्या विचारांनी मन फार भावूक झालं होतं. ‘हतबलता’ या शब्दाच्या अर्थाचा एक नवा पैलू समोर दिसत होता… पण आता तात्यांइतकीच ती हतबलता फक्त काळाचीच नाही, तर त्या विधात्याचीही  असावी… असले काही ना काही विचार करतच मी आणि मिस्टर तिथे पोहोचलो… पाठोपाठ बहीण-मेव्हणेही आले. आणखी कुणी येण्यासारखंच नव्हतं. त्यांना ठेवलेल्या खोलीत गेलो. मात्र… आणि एकदम पायच गळून गेले… अडगळीची वाटावी, अशा एका खोलीत, जमिनीवर स्ट्रेचर ठेवून त्यावर त्यांचा निष्प्राण देह ठेवला होता. त्याला मुंग्या लागू नयेत म्हणून भोवतीने मुंग्यांची पावडर पसरून ठेवली होती… देवा… बघवत नव्हतं ते दृश्य…

त्या आमच्या समोर राहाणाऱ्या तात्यासाहेबांच्यासारख्या so called लोकप्रिय माणसांची फुलांनी मढलेली ती तशी मृत्यूशय्या… आणि ही… आमच्या तात्यांची चहू बाजूंनी मुंग्यांची पावडर पसरून ठेवलेली मृत्यूशय्या… ‘शय्या’ या शब्दाचीच अवहेलना होती ती…

आमचीच वाट पहात थांबलेले आश्रमाचे व्यवस्थापक आम्ही पोहोचल्याचे पाहून लगबगीने दोन माणसांना घेऊन आत आले… स्मशानभूमी तिथून जवळच होती. तिथपर्यंत तात्यांना ऍम्ब्युलन्सने नेतील असं वाटलं होतं… पण नाही… इथेही उपेक्षाच… त्या माणसांनी ते स्ट्रेचर उचलल्यावर आम्हीही पाठोपाठ खोलीबाहेर गेलो… आणि पाहतो तर काय ….ते स्ट्रेचर मावेल एवढ्या आकाराची एक हातगाडी तिथे होती… भाजीवाल्यांची असते तशी… त्या माणसांनी पटकन् ते स्ट्रेचर त्यावर ठेवलं आणि गाडी ढकलायला सुरूवात केली… सहज… नेहेमीची सरावाचीच तर गोष्ट होती ती त्यांच्या… पण आम्ही चौघे… आम्ही अक्षरश: पाय ओढत मागे चाललो होतो… आयुष्यात पहिल्यांदाच… आणि कदाचित शेवटचंच्.

वृध्दाश्रमाच्या नियमांनुसार विद्युत-दाहिनीत थेट दहन… अंत्यसंस्कार तर सोडाच… एक हारही घालणं त्यांच्या नियमात नव्हतं… आणि अचानक एक कविता आठवली होती मला… “ एक तरी बागेतील फूल कौतुके देशील… बाळगली आशा फोल…” असंच आणि एवढंच होतं त्यांच्या भाळी लिहिलेलं … “आता पुष्पराशीमाजी बुडे मात्र ताटी…” ही पुढची ओळही केवळ त्या कवितेपुरतीच राहिली होती…. तात्यांच्या बाबतीत… आयुष्यभर अशा किती ओळी… जराशा सकारात्मक ओळी तात्यांनी जाणीवपूर्वक नजरेआड केल्या असतील, या विचाराने माझे डोळे वाहू लागले… मी पुन्हा एकदा तात्यांना नमस्कार केला… यावेळी फक्त मनातल्या मनात… कारण एव्हाना विद्युत-दाहिनी तिचे काम करून मोकळी झाली होती.    

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

(मुलगी आपल्या नातवालाच पसंत आहे म्हटल्यावर कमलताई काही बोलल्या नाहीत. रोहन आणि रश्मीचं लग्न थाटामाटात पार पडलं.) इथून पुढे —

रविवारी वीस ऑक्टोबरच्या दिवशीही सुहासिनी आणि कमलताई नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता चतु:शृंगी मंदिरात जाण्यासाठी निघाल्या. तिथून दशभुजा गणपतीचे दर्शन घेऊन घरी परत येईपर्यंत त्यांना साडेसात वाजले. पाहतो तर काय, प्रवेशद्वाराजवळच “राणीज किचन-सिल्वर ज्युबिली” असं भलं मोठं बॅनर लागलेलं होतं. कमलताईंचा फोटो असलेला “वुई लव्ह यू कमलाजी” बॅनर झळकत होता. लॉनवर मंडप बांधून तयार होता. रंगीबेरंगी दिवे झगमगत होते. स्टेजच्या समोर पन्नासेक निमंत्रित पाहुणे उत्सवमूर्तीची वाट पाहत बसलेले होते. चोहीकडे उत्साहाचं वातावरण होतं. आपल्या मुलानं, सुधीरनं हा कार्यक्रम आयोजित केला असावा असं त्यांना वाटलं. कमलताईंना हे सगळंच अनपेक्षित होतं पण ह्या सरप्राइजमुळे त्या मोहरून गेल्या.      

इतक्यात स्टेजवर सिल्क साडीत, कपाळावर टिकली, हातात चुडा आणि वेणी घातलेली रश्मी हातात माइक घेऊन प्रगट झाली आणि म्हणाली, “उपस्थित मान्यवरांना नमस्कार! पंचवीस वर्षापूर्वी आजच्या दिवशीच माझ्या आज्जेसासू कमलताईंनी ह्या ‘राणीज किचन’ची मुहूर्तमेढ रोवली. 

इवलेसे रोप लावियेले दारी। 

त्याचा वेलू गेला गगनावेरी । असा तो बहरत गेला. ‘राणीज किचन’च्या ऊर्जितावस्थेचे संपूर्ण श्रेय श्रीमती कमलताईंचेच आहे. अधिक वेळ न दवडता, आजच्या समारंभाच्या उत्सवमूर्ती श्रीमती कमलताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सुनेसोबत स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद.” 

टाळ्यांच्या कडकडाटात कमलताईं स्टेजवर आल्या. रश्मीनं त्यांना शाल आणि श्रीफळ दिलं. त्यांच्या हातात माईक दिला.  

कमलताई बोलायला उभे राहिल्या, “आज मला माझे पितृतुल्य सासरे बाळकृष्णपंत आणि माझे पती नरहरपंत ह्यांची प्रकर्षाने आठवण येतेय. माझे सासरे म्हणायचे की मुलांमुलींना सरस्वतीची उपासना करायला शिकवाल आणि सुनेला एखाद्या राणीसारखं, लक्ष्मीसारखं वागवाल तर तुमचं अख्खं कुटुंब आनंदात राहिल. 

माझ्या सासू-सासऱ्यांनी मला राणीसारखंच वागवलं. ‘कमल कुठलेही कार्यक्षेत्र उत्तमरीतीने सांभाळू शकेल’ हे त्यांचे शब्द माझ्या मनात वज्रलेपासारखे कोरले गेले आणि त्या दिवसापासून माझ्यातली नकारात्मकता संपून गेली. 

‘राणीज किचन’चं निमित्त झालं. नोकरदार मंडळीना स्वच्छ घरगुती जेवण पुरवता येईल आणि काही गरजू लोकांना रोजगार पुरवता येईल ह्या हेतूने मी ह्या व्यवसायात आले. बाहेरच्या ऑर्डरी येत राहिल्या. त्याच्या सोबतच नियमितपणे ऑफिसात दुपारचे डबे पाठवायचं सुरू झालं. पंचवीस डब्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दोनशे डब्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. ठरावीक संख्येनंतर दर्जा बिघडेल की काय, ह्या भीतीने लोकांची मागणी असतानादेखील आम्ही तिथेच थांबलो आहोत. 

हे सगळं कर्तृत्व माझं आहे असं मी अजिबात मानत नाही. माझ्या सासऱ्यांनी दाखवलेली सकारात्मकता, माझ्या पतीची अनमोल साथ आणि माझी सून सुहासिनी हिचा ह्यात फार मोठा वाटा आहे. आजवर माझ्या सुनेनं सगळी नाती सांभाळत हे कुटुंब आनंदाने पुढं नेलं आहे. तिच्या रूपानेच आमच्या कुटुंबात लक्ष्मी नांदतेय. 

माझे सासरे म्हणायचे, ‘उत्तर भारतीय लोक कन्येला ‘बिटियारानी’ आणि सुनेला ‘बहूरानी’ म्हणतात. मुलीला आणि सुनेला ते राणीचा मान देतात आणि आमच्या इथं काय होतं? माहेरी ‘बिटीयारानी’ असलेली कन्या सासरी आली की ‘नौकरानी’ होऊन जाते. माझी सून ह्या घरची राणी आहे ह्याचा विसर पडायला नको म्हणून मी तिला राणी म्हणूनच बोलावते.  

खरं तर, आपली आई आपलं पालनपोषण करून आपल्याला मोठं करते. वयात येताच सासरच्या घरी पाठवणी करते. तिथंही सासूच्या रूपात आपल्याला आई भेटते. सासू आपली काळजी घेते. 

कालांतराने आपली सून येते आणि सुनेच्या सहवासात आपण अधिक वेळ व्यतीत करतो. आपल्या वृद्धापकाळात सूनच आईसारखी आपली काळजी घेते, सेवा करते. आईवडिलांचं घर सोडून दुसऱ्या घरची एक ‘बिटियारानी’ आपल्याकडे येते, आपला वंश पुढे नेते तर मग आपणही तिला सुरूवातीपासूनच राणीसारखं वागवायला नको का? 

अर्थात ज्या राण्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपलं स्वत:चं असं वेगळं राज्य स्थापन केलंय मी त्यांच्याविषयी बोलत नाहीये. मी तशी खूप भाग्यवान आहे. देवानं मला खूप छान सून दिली आहे. 

उद्यापासून ‘राणीज किचन’चे व्यवस्थापन आमच्या घरची राणी म्हणजेच माझी सून सुहासिनीकडे सोपवतेय. मी ‘राणीज किचन’ पाहत असताना ती घर सांभाळायची पण आता माझी नातसून दुसरीकडे नोकरी करते आहे. बघू या, भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते. आमच्या पाठीशी तुम्हा सगळ्या तृप्त जीवांचे आशीर्वाद सदैव असू द्यावेत, एवढीच माझी प्रार्थना आहे. नमस्कार !”

कमलताई स्टेजवरच्या खुर्चीत स्थानापन्न होताच रश्मीने माईक घेतला. आज्जेसासूकडे पाहून हसत म्हणाली, “आज्जी ! मी नोकरी सोडून तुमच्या नातवासोबत इकडेच आलेय. जे काही करायचं ते आम्ही इथंच करू. मी तुमच्या सेवेला आणि माझ्या सासूबाईंच्या मदतीला असेन. कारेकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीचा मान माझाच आहे.”

त्यानंतर तिने विनम्रपणे आज्जेसासूंना नमस्कार केला. नातसुनेला तोंड भरून आशीर्वाद देताना कमलताई गहिवरल्या, त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. 

कमलताईंच्या जवळचे सगळेच नातेवाईक रौप्यमहोत्सवी सोहळ्याला जमले होते. हे सगळं कसं काय शक्य झालं ह्याचं गूढ त्यांना उकलेनासं झालं. तितक्यात कमलताईंच्या हातात पाकिट देत सुधीर म्हणाला, “आई, डिलीव्हरीसाठी ते लोक आले आहेत. हे ऑर्डरचे राहिलेले बाकीचे पैसे !”  

“सुधीर राजा, ऑर्डर कुणाची होती ते सांगितलं नाहीस!” पाकिट हातात घेत कमलताईंनी विचारलं. 

सुधीरनं हळूच त्यांच्या कानात सांगितलं, “आई, आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निमंत्रितांच्यासाठी दिलेली जेवणाची ही ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर कारेकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीसाहेब रश्मींची आहे. मी त्यात फक्त मदतनीसाचं काम केलं आहे.” 

कमलताई कातर आवाजात बोलल्या, “राणी, मानलं ग तुझ्या निवडीला. तुझी सून तर माझ्या सुनेपेक्षाही सरस निघाली आहे! मी तुझ्या सुनेचा विनाकारण दुस्वास केला पण तिनं मात्र ह्या आज्जेसासूचं मन प्रेमानेच जिंकून घेतलं हो..” 

कमलताईंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याचवेळी हॅट्स ऑफ टू कमलताई! हिप-हिप हुर्रे !! ह्या निनादात अख्खा मांडव दणाणून गेला होता.   

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print