मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पनीर रोटी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

पनीर रोटी !! ☆ श्री संभाजी बबन गायके 

“भाईसाब, मुझे थोडा बाथरूम तक लेके जायेंगे?”

पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेल सर्जीकल वॉर्ड मधील एका बेडवरून एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं! वयाच्या सुमारे पन्नाशीत असलेला एक गृहस्थ बेडवरून उठण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या सोबत कुणी नव्हतं. त्याच्या डोक्यावरची पगडी तशी सैल पडली होती. अंगावरच्या शर्टची वरची बटणे तुटलेली, पँट गुडघ्यावर फाटलेली होती. एका हाताच्या मनगटावर स्टीलचं कडं होतं, त्याच्या वरच्या भागावर खरचटल्याच्या जखमा होत्या अगदी ताज्या. कोणत्याही शीख बांधवास साजेशी भक्कम देहयष्टी, पण डोळ्यांत खूप आर्जव आणि आवाजात कंप.

मी त्याला धरून स्वच्छतागृहापर्यंत नेले. . . “शर्माईगा नहीं!” मी त्याला सांगितले, त्याने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी एकदा पाहिलं. त्याला तिथून परत आणताना त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव दाटून आले होते!

नाव विचारलं. . अडखळत उत्तर आलं. . “जी, गुरमित. . . गुरमित सिंग!”

सकाळी एका टेंपोवाल्याने त्याला वायसीएम मध्ये आणून इमर्जंसी मध्ये भरती केलं होतं. . . आणि तो भला माणूस निघून गेला होता.

गुरमितचं जवळचं असं कुणी नव्हतं इथं. पुण्याजवळच्या एका औद्योगिक वसाहतीत पोटासाठी कमवायला गुरमित आला होता, काही वर्षांपूर्वी. मराठी समजत होतं, पण बोलता येत नव्हतं. कारखान्यातील काम अंदाजे शिकला आणि आता सीएनसी मशीन व्यवस्थित ऑपरेट करू शकत होता. पंजाबातील एका शहरात जन्मलेल्या या साध्या शेतमजूर माणसाचं लग्न झालेलं होतं, पण पत्नी अकाली निवर्तली होती आणि मूल झालेलं नव्हतं. . . पुन्हा लग्न करायचं त्याच्या मनात कधी आलं नाही. पोटासाठी दिल्ली गाठली, भावाला बोलावून घेतलं, त्याला रोजगाराला लावून दिलं, उपनगरातल्या एका गरिबांच्या वस्तीत जागा मिळवून घर बांधून दिलं पण भावजय आली आणि याला दिल्ली सोडावी लागली. कारण गुरमित आजारी झाला. . . एका वाहनाने धडक दिल्याने पायात रॉड टाकला होता. . . त्याने सगळं आपलं आपण केलं. भावाला उपद्रव नको म्हणून खरडत, रखडत दूर मैदानात शरीरधर्मासाठी जाई. कमाई थांबली होती पण खाण्या पिण्याचे नखरे अजिबात नव्हते. बरे झाल्यावर मजुरीला जाण्याची वाट पाहत होताच. . . पण भावाला जड झाला थोड्याच दिवसांत.

आयुष्याला काही दिशा नव्हती. भावाच्या संसारात मन गुंतवत आयुष्य काढायचं मनात होतं. . आईबाप आधीच देवाघरी गेले होते. गावची शेती अगदी नगण्य. एका ट्रकमध्ये क्लिनर बनून पुण्यात आला. आरंभी मिळेल ते काम केलं आणि नंतर उपनगरात कुणाच्या तरी ओळखीने कारखान्यात हेल्पर झाला. कारखान्यात इतर राज्यातून मजुरीसाठी आलेल्या कामगार मुलांसोबत नाईलाजाने राहावे लागले छोट्या भाड्याच्या खोलीत. हा शीख, ते इतर कुणी. याचा स्वभाव तसा अबोल. व्यसन नाही त्यामुळे कुणाशी देणे घेणे व्यवहार नाही.

कोरोना आला आणि खोली रिकामी झाली. . . गुरमित कुठे जाणार? कारखान्याच्या शेड मध्येच मुक्काम आणि काम. नंतर जवळ एक खोली भाड्याने मिळाली. पैसे शिल्लक पडलेले होते थोडे. अडीअडचणीमध्ये उपयोगी पडावेत म्हणून बँकेत जपून ठेवले होते.

गुरमित टायफॉइडने आजारी झाला. असाच एका संध्याकाळी गोळ्या औषधं आणायला म्हणून गावात निघाला होता. . . रस्त्यावरच्या दगडाला पाय अडखळून पडला. . . तो नेमका उताणा. कमरेला मार बसला आणि त्याचं अंग, विशेषतः संपूर्ण उजवा भाग बधिर झाला आणि सतत थरथरू लागला!

आज गुरमित थरथरत्या देहाने बेडवर पडून होता. रुग्णालयातील सेवाभावी संस्थेच्या लोकांनी गुरमितला मदतीचा हात दिला. त्यावेळी ycm मध्ये सहा बेवारस रुग्ण होते!

संस्थेने गुरमित ची जेवणाची व्यवस्था केली, जेवणाचे पार्सल आणून ठेवले. गुरमितची अवस्था तशी बरी वाटत नव्हती. विविध तपासण्या झाल्या. . रिपोर्ट यायचे होते.

गुरमितने डाव्या हाताने जेवणाच्या प्लास्टिक पिशवीची गाठ कशीबशी सोडवली, भाजी प्लेटमध्ये ओतली. . . उजवा हात आणि आता पायही थरथरू लागले होते. कसाबसा एक घास त्याने तोंडपर्यंत नेला. . . पण त्याला वेळ लागत होता. मी त्याच्या पोळीचा एक तुकडा तोडला, भाजीत बुडविला आणि त्याच्या मुखात घातला. . . . त्याने माझ्याकडे पाहिले. . . “मैं खा लूंगा प्राजी!” तो म्हणाला. . . मी म्हणालो” रहने दो. . . आराम से खाना”

 आणखी तीन घास तोंडात घातल्यावर मात्र त्याने मला थांबायला सांगितले. . . संकोच होत होता त्याला. . . एवढा मोठा माणूस लहान मुलासारखा दुसऱ्याच्या हातून जेवतो आहे. . . त्याला कसं तरी वाटत असावं!

वॉर्डातील इतर रुग्णांचे नातेवाईक आणि नर्स आणि वॉर्डबॉय, मामा सुद्धा गुरमितला पाहून हळहळत होते! 

दुपारी गुरमित सीरियस झाला! त्याला श्वास घेता येईना! डॉक्टरांनी धावपळ करून त्याला ऑक्सीजन लावला तिथेच. आय सी यू मध्ये बेड उपलब्ध नव्हता त्यावेळी. मग सर्व यंत्रे तिथेच आणून लावली. गुरमित घामाघूम झाला होता. . . . चार तास त्याने दम काढला. . . “लकवा मार गया क्या मुझे?” तो विचारू लागला. एकटा माणूस, अर्धांगवायू म्हणजे काय ते त्याला ठाऊक होते. . . आयुष्यभर परावलंबित्व! 

मी त्याचा मोबाईल मागितला. . त्यात अगदी मोजकेच नंबर. छोटू म्हणून एक नंबर सेव्ह होता. . . “वो हमारे लिये मर गया”. . . . त्या भावाने मला उत्तर दिले. . फोन बंद!

एका सेवाभावी संस्थेविषयी गुरमितला वरवर माहिती होती, त्याने सांगितलेल्या गोष्टींवरून मी इंटरनेटवर अंदाजे शोध घेतला. दिल्लीतील एका संस्थेचे नाव, फोटो दिसले. गुरमितने त्या व्यक्तीला ओळखले. . . “उनसे बात करावो”. . . त्याने विनंती केली! पुढे पंजाबी भाषेत झालेल्या संवादात एवढेच समजले की. . ती संस्था फक्त रस्त्यावर बेवारस सापडलेल्या मानसिक रुग्णांवर मोफत उपचार करते!

“ऐसी हालत में जी के मैं क्या करुंगा?” गुरमित त्यांना विचारत राहिला. “प्राजी. . . . मेरी कुछ मदद करो. . बडी मेहरबानी होग्गी”. . . पण पलीकडून सोरी जी. . . एवढंच ऐकू आलं. “आप पुना में ही किसी से बात करो!”

काहीवेळाने गुरमित ची अवस्था आणखी बिघडली. पण तेवढ्यात आय सी यू मध्ये एक बेड उपलब्ध झाला. . . सर्वांनी मिळून गुरमितला स्ट्रेचरवर चढवले आणि त्या वॉर्ड मध्ये नेले!

थोड्यावेळाने समजले. . . सरदारजी सीरियस झाला आणखी. अंतर्गत रक्तस्राव झालाय. . . अवघड आहे! वॉर्डातील लोक हे ऐकून चुकचुकले!

आय सी यू मधील अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ गुरमित पहात होता. . . त्याला त्याचा एकाकीपणा अधिकच टोचू लागला असावा. . . रुग्णाची जगण्याची इच्छा संपली की औषधे उपयोगाची नसतात!

रात्री गुरमित गेला! अशी अफवा पसरली. . . पण लगेच विरून गेली! कोणतेही रक्ताचे नाते नसलेले लोक क्षणभर मनातून हलले होते. . . सिस्टर आणि कर्मचारी त्यांना अशा बाबींची सवय असली तरी त्यांचे चेहरे बदलून गेले होते. . . . पण सरदार अभी जिंदा है! अशी पक्की बातमी आली आणि सर्वांनी दीर्घ निःश्वास टाकले. . . चला, या मरणाच्या खोट्या बातमीने बिचाऱ्याचे आयुष्य वाढू दे. . . एका मावशींनी देवाला हात जोडून म्हटले!

तीन आठवडे झाले. . . आज अचानक गुरमित जनरल वॉर्ड मध्ये पाय मोकळे करण्यासाठी हळूहळू फिरताना दिसला! अर्धांगवायूने त्याला बरीच सवलत दिली होती. . . उजवा हात  अजुनही काहीसा बधीर होता, नीट चालता येत नव्हते. . . पण चालता येत होते हे महत्वाचे!   डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, मामा, मावश्या सगळे या तगड्या पण निरागस माणसाला काही कमी पडू देत नव्हते!

गुरमितने मला पाहिले आणि त्याचा चेहरा उजळला. . . त्याने नुकतेच त्याचे लांब केस धुतले होते आणि तो पगडी बांधण्याच्या तयारीत होता! त्याने मला मिठी मारली!

“कुछ खावोगे?” मी विचारले. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. ” नहीं, भाईसाब! खाना आताही होगा! ” तो संकोचून म्हणाला!

“पनीर रोटी?” मी म्हणालो तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. . . गावाकडे असताना आईच्या हातची रोटी त्याला आठवली असावी. . . ट्रक वर असताना ढाब्यावर बाजेवर बसून खाल्लेली पनीर रोटी, दाल तडका त्याला नजरेसमोर दिसला असावा!

“पंजाबी हो. . . पनीर रोटी बिना खाना फिका फिका लगा होगा पिछले महिनाभर!”

मी पार्सलची पिशवी त्याच्या हातात दिली. . . . गुरमित ने माझा हात हाती घेतला. . . . आणि त्याच्या चेहऱ्यावर मला सारा पंजाब हसताना दिसला!

मी म्हणालो. . . सत् श्री अकाल. . . गुरमित म्हणाला. . जय महाराष्ट्र!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ या प्रकारची औषधे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

या प्रकारची औषधे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

या प्रकारची औषधे जगातील कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीत आणि भविष्यातही मिळणार नाहीत. जर तुम्ही ही औषधे नीट वाचून समजून घेतलीत आणि तुमच्या जीवनात अंमलात आणलीत, तर तुम्हाला बाकीसाठी कोणत्याही गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.

  1. लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे.
  2. ॐ कारचा आवाज हे औषध आहे.
  3. योग प्राणायाम आणि व्यायाम हे औषध आहेत.
  4. सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे.
  5. उपवास हा सर्व रोगांवर उपाय आहे.
  6. सूर्यप्रकाशदेखील औषध आहे.
  7. माठातील पाणी पिणे हेदेखील औषध आहे.
  8. शिस्तबद्ध टाळ्या वाजवणे हेदेखील औषध आहे.
  9. अन्न भरपूर चघळणे हे औषध आहे.
  10. अन्नाप्रमाणे पाणी चघळणे आणि पिणे हे देखील औषध आहे.
  11. जेवल्यानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे.
  12. आनंदी राहण्याचा निर्णयदेखील औषध आहे.
  13. कधीकधी मौन हे औषध असते.
  14. हास्य आणि विनोद हे औषध आहेत.
  15. समाधान हेदेखील औषध आहे.
  16. मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे.
  17. मनातील सकारात्मकता हे औषध आहे.
  18. निस्वार्थी प्रेम, भावनादेखील औषध आहे.
  19. सर्वांचे भले करणे हेदेखील औषध आहे.
  20. कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे करणे हे औषध आहे.
  21. सर्वांसोबत राहणे हे औषध आहे.
  22. कुटुंबासोबत खाणे आणि जोडले जाणे हे देखील औषध आहे.
  23. तुमचा प्रत्येक सच्चा आणि चांगला मित्रसुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.
  24. मस्त राहा, व्यस्त राहा, निरोगी राहा आणि आनंदी राहा. हेदेखील एक औषध आहे.
  25. प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या. हेदेखील एक औषध आहे.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे अगदी मोफत उपलब्ध आहेत आणि ती सर्व कशी आणि कुठे मिळतील याची कल्पना आली की, त्याची अंमलबजावणी करणे हेदेखील औषधासारखेच असते!

निसर्गावर विश्वास ठेवा.

निसर्ग हा सर्वोत्तम उपचार करणारा आहे.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती:सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! वसुबारस !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! वसुबारस !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आजपासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’

दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव, विजयाचा उत्सव असे अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’. यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते. लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे ” सुरभि “. हीच गोमातांची अधिदेवता आहे. दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘ गो-ग्रास ‘ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो. वसुबारस तर काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.

यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण व्यक्त करणे हा मुख्य संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो, त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात. मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे, शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.

कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही. ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम, वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे. ” निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊया. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करूया. दिवाळीची सुरुवात आनंदाची करूया.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चांदण्या रात्रीतले ते स्वप्न… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ चांदण्या रात्रीतले ते स्वप्न… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

कवितेतून, गाण्यांतून नेहमी भेटणाऱ्या चांदण्यांची स्वप्नसृष्टी हलकेच कधी मावळली, ते कळलेच नाही. इतक्या वर्षांत जी स्थलांतरे झाली, स्थित्यंतरे झाली; त्यात तारकांकित आभाळाचे छत्र माथ्यावरून ढळल्याचे समजलेच नाही…..

‘निळ्या नभातून नील चांदणे निथळे मार्गावरी,

स्वप्नरथातून तुज भेटाया आले तव मंदिरी।’

… माणिक वर्मांच्या गाण्यातल्या नील चांदण्याने मन कसे भरून जाई. तर, ‘नक्षत्रांचे देणे’ देणाऱ्या आरती प्रभूंची जीवघेणी भाषा ओढ लावत असे……

‘नक्षत्रांनी गोंधळलेल्या 

काळोखातून सौम्य आभाळी

तिचे डोळे.

ती स्वतःच त्या डोळ्यांतील,

किंचित ओले निसर्गचित्र… ‘

तर, साहिरच्या ‘परछाईयाँ’ मध्ये –

‘ जवान रात के सीनेपे दूधिया आँचल ‘ अशी ओळ वाचून वेड लागत असे.

भा. रा. तांब्यांच्या कवितेत तर ‘ रमणिसंगमा हृदयी उत्सुक, जाई अष्टमीकुमुदनायक ‘ अशा अद्भुत नावाची ऐट घेऊन चंद्र येत असे.

ना. धों महानोरांच्या कवितेत-….

‘ये गं ये गं सये, अशी नजिक पहा ना,

आभाळीचा चंद्र घरी येणार पाहुणा… ‘

किंवा … ‘ क्षितिज वाटेत सांडल्या चांदण्या होऊन सोनफुलोरा ‘ अशा कल्पनेने चांदण्यांचे मोहिनीजाल मनावर पसरत असे.

‘चाँदनी रातें, प्यार की बातें’….. चित्रपटांच्या अशा गाण्यांतून चंद्र-चांदणे तर अक्षरशः बरसत असे; मग चांदण्यांची ही ओढणी आपल्यावरून कुणी ओढून घेतली ?

शांत, सुशीतल हवा, शरद ऋतूमधली पूर्ण चंद्राची रात्र असे काही अनेक निरीक्षणांतून, ऋतुचक्रातून शोधून चांदण्यांचा उत्सव, उपवनातून, प्रमोद उद्यानातून, घराच्या अंगणात, गच्चीवर एकत्र जमून करणाऱ्या पूर्वजांच्या काही खुणा तर आपण जपत होतो. साहित्यातून, कलेतून, काव्यातून त्यांची प्रतिबिंबे न्याहाळत होतो. थोडे कवडसे शोधीत होतो.

ज्या ऐसपैस अंगणात खेळायला यायचे; ती गच्ची, अंगण आपणच तर मोडले ना… ? 

ज्या तळ्यात चांदणे पसरत असे, त्या तळ्याच्या जलस्रोतांवर इमले उभे केले ना ! 

ज्या बागांतून, उपवन-उद्यानांतून चंद्रफुले टपटपत ती बागच सुकली ना देखभालीशिवाय? 

चांदण्याला, पाण्याला, वाऱ्याला खेळण्यासाठी दुसरी जागा ठेवली का? 

मग चांदण्याची रात्रीची स्वप्ने विझणार नाहीत, तर काय होईल……. असा विचार छळत असतो.

कालक्रमाने हे मोडणे, पुन्हा मांडणे सुरू असतेच; पण या परिवर्तनचक्रात निसर्गाशी नाते तोडून टाकण्याचा अविचार कशासाठी? 

सुप्रसिद्ध निसर्गलेखक मारुती चितमपल्लींच्या ‘ रानवाटा ‘ पुस्तकात ‘ रानातील घरं ‘ या एका अप्रतिम लेखात ते लिहितात— “ एकदा लिंबाच्या पानोळ्यातून घरट्यावर शुक्राचा तारा चमकताना दिसला. तिकडे मी पाहत होतो, स्वतःचे देहभान हरपून. कुठल्या तरी अज्ञात शक्तीने सारे हृदय हेलावून निघाले. त्या सौंदर्याच्या बोधाने मी पुलकित झालो…” —- किंवा —- “ रात्री इतर झाडांखाली आपल्याला थांबावेसे वाटणार नाही; पण लिंबाची झाडे त्याला अपवाद आहेत. चांदण्या रात्री तर त्या झाडांना अभूतपूर्व सौंदर्य प्राप्त होते, ते देखील नवीन असते. त्या झाडाखाली मला सदैव प्रसन्न वाटते. पानांमधून जमिनीवर पडलेल्या चांदण्यांच्या कवडशांची चंद्रफुले गोळा करायचा खेळ आम्ही मुले खेळत असू…” 

चांदण्यांचे साहित्यात पडलेले असे प्रतिबिंब न्याहाळताना तनामनावर सुखाची शिरशिरी येते. देहभान हरपून जावे, असा शुक्रतारा आता मूठभर आकाशात कुठे पाहायचा… ? शहरात नित्य असणारी दिवाळी, पौर्णिमेच्या दिवसाचा विसर पाडते. शहरातले दिवे तर अंधाराची कहाणी सांगतात; बकालपणाची, अस्वच्छपणाची, न संपणारी कहाणी.

पूर्वी पदोपदी भेटणाऱ्या गाण्यांतल्या चांदण्याला कशी नीज आलेली असते ! 

‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ‘.. किंवा.. ‘ दूरदूर तारकांत बैसली पहाट न्हात ‘ या ओळीने चांदणे आळसावून उठते.

‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा

मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा… ‘

आता तर चांदण्यांना जाग येते. अंगण, गच्ची, तळे, बाग नसले; तरी मनात ते हलकेच उतरते. ज्ञानदेवांची शारदीय चंद्रकला प्रकटते. चांदण्यांच्या चाहुलीने ती चंद्रकला कविता लपेटून घेते. त्याच्या आठवाने मनात अतीव सुख दाटून येते…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृत्रिमतेची स्टिरॉइड्स घेताय ? ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ कृत्रिमतेची स्टिरॉइड्स घेताय ? ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“सर, तुमच्याकडे जरा काम होतं. घरी कधी भेटता येईल?” माझ्या चांगल्या परिचयाचे एक इंटिरियर डिझायनर आहेत. आमच्या घरची पुस्तकांची कपाटं त्यांनीच डिझाईन केली आहेत. त्यांचा फोन आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी भेटलो. ते म्हणाले, “सर, मला तुमची मदत पाहिजे. माझे एक क्लायंट आहेत. त्यांना तुमची पर्सनल लायब्ररी दाखवायची आहे. तुम्हाला चालेल का?” 

“पुस्तकं उसनी मागणार नसतील तर चालेल. ” मी सांगून टाकलं.

पुस्तकांच्या बाबतीतला मुखदुर्बळपणा किंवा भिडस्तपणा मी आता आवरता घेतला आहे. “जरा वाचायला नेतो आणि परत आणून देतो” असं शपथेवर सांगणारे लोकसुध्दा नंतर पुन्हा उगवत नाहीत, हा अनुभव मी शेकडो वेळा घेतला, अनेक उत्तमोत्तम दुर्मिळ पुस्तकं गमावली आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं आहे. त्यामुळं, कुणी पुस्तक मागितलं की मी स्पष्ट नकार देतो.

दोन दिवसांनी एका चौकोनी कुटुंबाला घेऊन ते घरी आले. त्यांनी सगळी लायब्ररी पाहिली आणि मला विचारलं, “सर, एखाद्या चांगल्या मराठी घरात कोणकोणती पुस्तकं असावीत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आम्ही यादी लिहून घेतो. ” ते क्लायंट गृहस्थ म्हणाले.

“माझं घर हे सुध्दा एक चांगलं मराठी घरच आहे. माणसानं अवश्य वाचावीत अशी हजारों पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. त्यांची आम्हीं वयोगटानुसार यादी केली आहे. ती दाखवतो. ” असं सांगत मी त्यांना यादी दाखवली. त्यांनी फोटो काढून घेतले. आणि चमत्कारिक प्रश्न सुरु झाले – 

“फास्टर फेणे की हॅरी पॉटर? तुम्ही काय सजेस्ट कराल?” 

“तरला दलाल, संजीव कपूर की रुचिरा?” 

“मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी यांच्याशिवाय आणखी ऐतिहासिक पुस्तकं कोणती असावीत?”

“पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे संपूर्ण सेट घेतले तर स्वस्त पडतात का? असे अजून कुणाकुणाचे सेट्स आहेत?”

मी चक्रावून गेलो. त्यांचा मुलगा आणि मुलगी माझ्या लिस्ट मधून “फेमस बुक्स” शोधत होते आणि नावं सापडली की त्या पुस्तकांचे फोटो काढून घेण्यात गुंतले होते. काहीच उमगत नव्हतं. दोन अडीच तासांनी ते सगळे गेले.

साधारण दीड महिन्याने पुन्हा त्यांचा फोन आला. “सर, आम्हीं मागच्या आठवड्यात तुमच्याकडे लायब्ररी बघायला आलो होतो. ” 

“बोला” 

“तुम्ही आमची लायब्ररी बघायला आमच्या घरी याल का?” त्यांनी विचारलं.

“म्हणजे?”

“म्हणजे तुमची लायब्ररी बघितल्यानंतर आम्हीं आमची पण तशीच लायब्ररी तयार केली आहे. तुम्ही एकदा पाहायला आलात तर फार बरं होईल. ” 

“बघतो, प्रयत्न करतो” असं म्हणून मी वेळ मारुन नेली खरी. पण चार पाच दिवस त्यांचें वेळीअवेळी सारखेच फोन यायला लागले. शेवटी रविवारी त्यांच्याकडे गेलो.

प्रशस्त मोठा फ्लॅट होता. अगदी नवा कोरा. बहुतेक ते राहतं घर नव्हतं. काम सुरु होतं. त्यांनी हॉल दाखवला. सेम टू सेम बुक केस, आणि त्यात सेम पुस्तकं.. जवळपास दीड-दोनशे पुस्तकं असतील.

“सर, आतमधून एलईडी लायटिंग केलं आहे, त्याला डीमर बसवला आहे. खास टफन ग्लासचे शेल्फ बसवले आहेत. आणि लाकूड सगळं सागवानच वापरलं आहे. तुम्ही वेगळ्या अर्थानं घेऊ नका, पण तुमच्यापेक्षा भारी मटेरियल वापरलं आहे. ” ते भडाभडा सांगत होते. मी ऐकत होतो.

पाडगावकरांची बोलगाणी स्टीलच्या कपाटात ठेवली काय किंवा उंची फर्निचरमध्ये ठेवली काय, त्यातला आस्वाद बदलणार आहे का? शो केसमध्ये पॉश पोझिशनमध्ये लावल्याशिवाय पु. लं च्या पुस्तकांतून विनोदच खुलत नाही, असं कुठं असतं? पुस्तकं आपल्याला त्यांच्या अंतरंगात रमवण्यासाठी असतात. आपण त्यातून शिकतो, अंतर्मुख होतो, त्यांच्याशी जोडले जातो, प्रभावित होतो. कधी ती हसवतात, कधी रडवतात, कधी प्रेरणा देतात, कधी शहाणपण शिकवतात. पण हे सगळं त्या पुस्तकातल्या आशयावर अवलंबून असतं, पुस्तकं जिथं ठेवतो त्या फर्निचरवर अवलंबून नसतं.

“सर, हा डेस्क बघा. ह्यात काय केलंय, ते आत एक गोल खाच पाडली आहे. त्या खाचेत एक कॉफीमग बरोबर बसतो. म्हणजे वाचताना कॉफी घेऊन बसलं तरी प्रॉब्लेम नाही. कप हिंदकळण्याचा प्रश्नच नाही. ” त्यांनी ते छोटं डेस्क दाखवलं.

तेवढ्यात त्यांच्या मुलीनं दाखवलं, “सर, या अँगलनं इथं खुर्चीत पुस्तक घेऊन बसलं की, फोटो पण परफेक्ट येतो. पुस्तक वाचतानाच्या फोटोंना सोशल मीडियावर ऑल टाईम डिमांड.. “

मी त्या इंटिरियर डिझायनरकडं पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरून अभिमान अगदी ओसंडून वाहत होता.

थोड्या वेळानं मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो, घरी आलो. संध्याकाळी ते इंटिरियर डिझायनर माझ्या घरी पुन्हा हजर..

“सर, तुम्ही पुस्तकांविषयी एवढं गाईड केलं, वेळ दिला, स्वतः साईट व्हिजिट केली. तुमची फी सांगा ना. ” 

“कसली फी? कुठली साईट व्हिजिट ?”

“सर, पुढच्या महिन्यात त्या घराचा गृहप्रवेश आहे. ‘एकदम सुसंस्कृत घर’ अशी थीम धरुनच इंटिरियर केलं आहे. त्यांच्यातले कुणीही ही पुस्तकं वाचणारच नाहियत. घरातली माणसं पुस्तकं वाचतात, असा फील देण्यासाठी मोठी बुक केस आणि त्यात ठेवलेली पुस्तकं हा डिझाईन चा भाग आहे. म्हणून तर तुमचा स्पेशल गायडन्स घेतला आणि त्याचे स्पेशल चार्जेस सुद्धा मी क्लायंटच्या बिलात लावलेत. तुम्ही सांगितलेली पुस्तकं मीच खरेदी केली आणि आणून लावली. आता गृहप्रवेशाच्या वेळी सगळ्यांना बघायला मिळेल ना, म्हणून साईट कंप्लीट करुन दिली. ” त्यांनी सरळ सांगून टाकलं.

“सर, घरात पुस्तकं असणं चांगलं असतं, येणाऱ्या लोकांवर इम्प्रेशन पडतं, असं क्लायंटचं म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘उत्तम बुक केस डिझाईन करा आणि पुस्तकं पण तुम्हीच आणून फिट करा’, त्यानुसार मी तुमचं गायडन्स घेऊन काम केलं. ” 

आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नोकरीसाठी बायोडेटा किंवा लग्नाळू मुलामुलींची प्रोफाईल्स वाचताना ‘आवडी निवडी’ असं शीर्षक दिसलं की, हमखास दिसणारी पहिली आवड म्हणजे वाचन.. खरोखरच आवड असो किंवा नसो, सहज खपून जाण्याजोगं एकमेव उत्तर म्हणजे वाचन.. ! त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण मी आत्ता प्रत्यक्ष अनुभवत होतो.

मग त्या घरमालकांच्या संवादातली एकेक गोष्ट उलगडायला लागली. उंची सागवान, एलईडी दिवे, टफन ग्लास, प्रोफाईल डोअर्स, फोटो येईल अशी चेअर सेटिंग… या सगळ्या गोष्टींची लिंक लागली.

आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि खरं सांगायचं तर कीव आली. पैसा ओतून सुसंस्कृत किंवा अभ्यासू असण्याचा आभास निर्माण करण्याचा जो रोग माणसाला जडतोय ना, त्याचं वर्णन चोखोबांनी शेकडो वर्षांपूर्वीच करुन ठेवलंय. “काय भुललासी वरलिया रंगा” असा त्यांचा अभंग जगद्विख्यात आहे.

पूर्वी “तो मी नव्हेच” असं दाखवण्यासाठी माणसं धडपड करायची. आता “असा मी असामी” असा आभास निर्माण करण्यासाठी धडपडतायत, याचं हे एक नवं उदाहरण अनुभवायला मिळालं. आपलं बाह्य रूप विकत घेता येतं, तशी आपली प्रतिमासुध्दा विकत घेण्याचा उद्योग कुठल्या स्तरावर गेला आहे, हे पाहिल्यावर मन ढवळून निघालं. रोज एक पुस्तक धरुन त्या बुक केससमोर खुर्चीत बसायचं आणि फोटो काढून सोशल मीडियावर पोष्टायचा, म्हणजे इमेज क्रिएट होईल ? वा रे लॉजिक.. !

“थ्री इडियट्स” मधला श्यामलदास छांछड आठवतो का? “वाट्टेल ते करा, पण या पोराला माझ्या मुलाच्या नावानं इंजिनियर करा. माझ्या मुलाच्या नावाची इंजिनिअरिंगची डिग्री या भिंतीवर लागली पाहिजे” असा दम देणारा श्रीमंत माणूस आठवला? तीन तासांच्या संपूर्ण सिनेमात हा तीस सेकंदांचा सीन आपण विसरुन जातो. पण वाट्टेल ते करुन स्वतःची प्रतिमा विकत घेण्याच्या मागं लागलेली माणसं सोशल मीडियाचं प्रस्थ वाढायला लागलं, तशी वाढतच चालली आहेत.

लोकांमध्ये, समाजात आपली ईमेज भव्यदिव्य दिसावी म्हणून लोकं काय काय करतात, याचे काही विचित्र नमुने पाहिले तर, कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते. “मी अमुक अमुक दुकानातूनच भाजी घेते, अमुक अमुक ठिकाणाहूनच आंबे घेते”, इथपासून ते “अमुक अमुक देवालाच मी दर चतुर्थीला जातो” इथपर्यंत सगळ्या जगाला अभिमानानं सांगणारे कितीतरी लोक तुम्हाला दिसतील. “एकवीस हजार रुपये भरुन तिकीट काढून तिरुपतीचं स्पेशल दर्शन घेऊन आलो” असंही सांगणारे लोक आहेत आणि “दरवर्षी काहीही न खाता पिता एकवीस तास रांगेत उभारुन दर्शन घेतो” असंही सांगणारे लोक आहेत.

“आम्हीं अमुक ठिकाणचाच वडापाव खातो”, “मला तर दुसरी कुठली भेळ आवडतच नाही”, “मी एसी शिवाय तर प्रवासच करत नाही”, “मी आणि लाल डब्यातनं प्रवास? बापजन्मात शक्य नाही”, ” रेग्युलर ब्लड शुगर लेव्हल चेक करायला सुद्धा मी तिथं जात नाही, माणूसच घरी बोलावतो. त्याला सांगतो, शंभर रुपये जास्त घे पण तिथं बोलावू नकोस, मला जमणार नाही” असले अनेक तोरे मिरवणारे कितीतरी जण आहेत.

आपल्या गळ्यातली सोनसाखळी मुद्दाम दिसावी असा शर्ट घालणारी जशी माणसं आहेत, तशीच अमुक एखाद्या ग्रंथालयाची मेंबरशिप नुसतीच घेऊन ठेवणारीसुद्धा माणसं आहेत. त्यांना वाचनाचा छंद नसतो पण आपल्या गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेचा मी सभासद आहे, हे सगळ्यांना सांगण्यातच त्यांना खरा रस असतो.

मध्यंतरी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचे पाय धुवायचे आणि पाय धुताना, फुलं वाहताना ढसाढसा रडतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर फिरवायचे, ही एक जबरदस्त ‘तथाकथित इमोशनल’ क्रेझ निर्माण झाली होती. अशी गुरुपूजनं गल्लोगल्लीचे फ्लेक्सजिवी करत सुटले होते. आनंदाच्या क्षणी ओक्साबोक्शी का रडायचं? याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.

मी जसा आहे तसं दाखवणं कठीणच आहे, माझी ईमेज बिघडेल. म्हणून मग खोटी बेगडी ईमेज पैशाच्या जोरावर विकत घ्यायची, हा रोग बळावतोय. मग ते कपडे असोत, महागड्या वस्तू असोत किंवा मोठाली कर्जं काढून घेतलेल्या गोष्टी असोत.. पण आता छंद आणि आवडी निवडीसुध्दा विकत घेण्यापर्यंत माणसं पोचली ? आणि त्या ईमेज बिल्डिंग साठीसुध्दा स्पेशल कन्सल्टिंग सुरु झालंय? हे लोकांना आणखी खड्ड्यात घालणारं ठरेल.

छंद आणि व्यासंग हे आपल्या व्यक्तीमत्वाच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी असतात. आपलं व्यक्तिमत्त्व उत्तम व्हावं, चांगल्या गुणांचा विकास व्हावा, समाजात आपलं चांगलं स्थान निर्माण व्हावं, अशी इच्छा असणं मुळीच गैर नाही. पण त्यासाठी स्वतःला घडवावं लागतं आणि तसं घडण्यासाठी फार मनापासून, सातत्यानं कष्ट घ्यावे लागतात. ते विकत घेता येत नाही.

स्वतःची ईमेज बिल्ड व्हावी म्हणून कोणत्याही संतवर्यांनी साहित्य निर्मिती केली नाही. जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी काही केलं नाही. अतिशय साधं, संतुलित, प्रामाणिक आणि समाज प्रबोधनाला वाहिलेलं आयुष्य अशीच त्यांची जीवनपद्धती होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा त्यापासून सतत दूर राहणारी कित्येक माणसं असतात. वास्तविक त्यांच्याकडं ज्ञान असतं, वकूब असतो, यश असतं, कौशल्य असतं, पण तरीही ते त्याचं भांडवल करत नाहीत. स्वतःच्या यशाविषयी स्वतःहून एक अक्षर सांगत नाहीत, पुढं पुढं करत नाहीत, स्वतःचं प्रस्थ तयार करत नाहीत आणि लोकांनाही स्वतःविषयी असलं काही करु देत नाहीत. हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा आणि त्यांच्याकडून आवर्जून घेण्यासारखा सद्गुण असतो.

डॉ. कलाम, स्व. बाबा आमटे, स्व. दाजीकाका गाडगीळ, स्व. श्रीनिवास खळे, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, अत्यंत साधी राहणी असणारे स्व. मनोहर पर्रीकर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. ही माणसं त्यांच्या अंगच्या गुणांमुळेच लोकांसाठी प्रेरणास्थान बनली, आदर्श बनली. आदर्श होण्यासाठी म्हणून त्यांनी हेतुपूर्वक काही केलं नाही. स्वतःचं प्रस्थ तयार करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला.

जसजशी आपली सोशल अकाउंट्स तयार झाली, तसतशी आपली इतरांना दाखवण्याची धडपड सुरू झाली. राहणीमान जगाला दाखवण्याचा पायंडा पडला. खरंखुरं जगण्यापेक्षा नसलेलं दाखवण्याची इच्छा मनात कायमची मुक्कामालाच येऊन राहिली. आणि तीच कृत्रिमता आता गळ्यापर्यंत आली आहे.

लोकांचे डोळे दिपवून टाकून मिळवलेला आनंद किंवा प्रतिष्ठा कशी आणि कितपत टिकेल ? आणि त्यासाठीच सतत जगत राहिलो तर खरं समाधान तरी कुठून मिळणार? खरं समाधान प्रत्यक्ष जगण्यातूनच मिळवायचं की केवळ त्याच्या आभासातच जगत राहायचं, हे आता आपणच ठरवायला हवं.

लोकांवर सतत इम्प्रेशन मारत बसण्याचा शौक कितीही गोड वाटत असला तरीही नंतर त्याची ओझी झेपण्यापलीकडं जातात. आणि ते नाटक फसलं की, खोटेपणा उघडा पडतोच. म्हणूनच, कृत्रिमतेच्या स्टिरॉइड्सचे न परवडणारे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील तर, जगण्याचं हे शहाणपण जितक्या लवकर आत्मसात होईल, तितकं उत्तम.

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शौर्यसूर्यावरील डाग!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शौर्यसूर्यांवरील डाग ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर शैतान सिंग 

ही तर आपली खरी पितरे !!!!!!

अगदीच विपरीत परिस्थिती होती. इथले हवामान अगदीच नवीन. या हवामानाशी जुळवून घ्यायला कित्येक महिने लागू शकतात.. आणि या १२४ बहादूर जवानांना इथे पाठवले जाऊन केवळ काहीच दिवस झालेले आहेत. उभ्या आयुष्यात कधी बर्फाचे डोंगर पाहिलेले नाहीत, पावसासारखा बर्फ पडताना पाहिला आणि अनुभवलेला नाही. थंडी या शब्दाचा अर्थ या आधी कधी समजला नव्हता तो आता समजू लागलेला आहे. कपभर पाणी उकळायला काही तास लागताहेत. पायांतले बूट सर्वसाधारण हवामानासाठी बनवलेले. बोटे उघडी राहिली तर गळून जाण्याची शक्यता. तंबूही तसेच…. अगदी साधे.

.३०३ (point three-not-three) रायफली.. एक गोळी झाडल्यावर दुसरी गोळी झाडण्याआधी ती रायफल परत कॉक करावी लागे…. म्हणजे पुढची गोळी झाडायला रायफल तयार करावी लागे…. मिनिटाला फार तर वीस-तीस गोळ्या या रायफलमधून बाहेर पडणार! थंडीपासून बचाव करण्यासाठी हातात हातमोजे घालावेच लागतात.. पण मग या मोज्यामुळे रायफल फायर करण्यासाठी असणारा ट्रिगर (खटका, घोडा) ज्या धातूच्या गोलाकार रिंगमध्ये असतो, त्या रिंगमध्ये बोट नीट आत जात नाही… रायफल तर फायर करायचीच आहे… मग उजव्या हातातील मोजा काढावाच लागतो… आणि भयावह थंडीत उघड्या राहिलेल्या बोटाला हिमदंश होतोच… बोट मृत होऊन गळूनही पडू शकते! एका जवानाकडे फारतर सहाशे गोळ्या. पलटणीकडे असलेली अग्निशस्त्रे अगदीच सामान्य. आणि समोर…. अमर्याद संख्या असलेला लबाड शत्रू ! संख्या किती… तर आपल्यापेक्षा किमान वीसपट. आणि त्यांची हत्यारे आपल्यापेक्षा उजवी…. मिनिटाला पाचशे गोळ्या झाडणारी…. शिवाय ते तोफगोळेही झाडू शकत होते… आपल्या जवानांना आपला तोफखाना साहाय्य करण्याच्या भौगोलिक स्थितीत नाही… कारण तोफखाना आणि आपली युद्धभूमी यांमध्ये उंच डोंगर. आणि तरीही आपली अत्यंत महत्वाची हवाई धावपट्टी राखायची आहे…. अन्यथा शत्रू पुढे सरकरणार… आणि आपला मोठा भूप्रदेश ताब्यात घेणार अशी स्थिती. त्यांची मोठी टोळधाड येणार हे निश्चित होते… आणि त्यांची संख्या पाहता माघार घ्यावीच लागणार हे (तिथे क्वचितच दिसणा-या) सूर्यप्रकाशाएवढे लख्ख होते. दलनायक नावाने शैतान ! पण वृत्तीने देवासारखा… लढाऊ आणि सत्याची बाजू न सोडणारा…. जणू पांडवांचा सारथी… श्रीकृष्ण… मूळचा यादवच. तुम्ही माघारी निघून या… अशी सूचना वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी दिलेली असताना दलनायक आपल्या जागी ठाम उभा. एकशे चोवीस वीर…. शत्रूला घाबरून माघारी पळून जाणे हे रक्तात नव्हतेच कधी… आताही नाही… कोई भी जवान पीछे न हटेगा !… ठरले ! हे एकशे चोवीस… ते हजारोंच्या संख्येने चालून आले… शत्रूकडे माणसांची कमतरता नव्हती….. आणि शस्त्रांची सुद्धा. आपल्या या १२४ जवानांची शत्रूस मारता मारता मरेतो झुंज सुरु झाली आणि चार तासांत संपली सुद्धा. आपल्या शूरांनी त्या हजारो शत्रूसंख्येतील किमान हजारभर तरी आपल्या. ३०३ रायफली, संगीनी आणि नुसत्या हातांनी यमसदनी धाडले होते. शत्रूने ती लढाई तांत्रिकदृष्ट्या जिंकलेली असली तरी त्यांची हृदयं भारतीय सैन्याच्या मृत्युंजयी पराक्रमाने काळवंडून गेली… ते माघारी निघून गेले… त्यांनी आणखी पुढे येण्याची हिंमत दाखवलीच नाही असे म्हटले जाते… आणि दोनच दिवसांत त्यांच्या बाजूने युद्धविराम जाहीर केला ! या युद्धात इतर कोणत्याही आघाडीवर चीनला एवढ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले नव्हते… It was a real Last Stand of Indian soldiers!

११४ सैनिक सहकारी त्यांच्या प्रिय अधिका-यासह.. मेजर शैतान सिंग साहेबांसह, देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ प्राणांचे बलिदान देऊन बर्फाच्या कड्यांच्या आड, बर्फात, खंदकांमध्ये निपचित पडलेले होते. सर्वांनी छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. एकाने तर तब्बल सत्तेचाळीस गोळ्या उरात सामावून घेतल्या होत्या.. ३०३ रायफल फायर करता यावी म्हणून सर्वांनी हातातले मोजे काढून फेकून दिले होते… एकाच्या हातातील हातागोळा तसाच त्याच्या हातात होता… उभ्या स्थितीतच प्राण गेला होता! वैद्यकीय सहायकाच्या हातात इंजेक्शनची सिरीन्ज तशीच होती… त्याला डोक्यात गोळ्या लागल्या होत्या… तब्बल ११४ देह बर्फात बर्फ होऊन थिजून गेलेले… पण पुन्हा कधीही जिवंत होतील आणि शत्रूवर तुटून पडतील असे वाटावे!

या दिवशी लढाईत उतरलेल्या आठ-दहा जवानांच्या प्राणांवर त्यादिवशी यमदूतांची नजर पडली नसावी… ते बचावले… त्यातील एकाने, रामचंद्र यादव यांनी जबर जखमी झालेल्या मेजर शैतान सिंग साहेबांना स्वत:च्या अंगावर बांधून घेऊन काही अंतरावर वाहून नेले… तशाही स्थितीत मेजर साहेबांनी “छावणीत पोहोचा… आपले जवान कसे शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते त्यांना सांगा!” असे बजावले. पण साहेबांना असे टाकून माघारी येण्यास त्याने नकार दिला. रात्रीचे सव्वा आठ वाजले होते मेजर साहेबांच्या मनगटी घड्याळात…. काळजाच्या धडधडीवर चालणारे ते पल्स घड्याळ… बंद पडले… साहेबांच्या हृदयाची धडधड बंद पडल्यावर!…. मेजर शैतानसिंग साहेब देवतुल्य कामगिरी बजावून निजधामाला निघून गेले. रामचंद्र यादव यांनी मेजर साहेबांचा देह शत्रूच्या हाती लागू नये असा लपवून ठेवला! जिवंत सापडलेल्या सहा जणांना चीनी सैनिकांनी युद्धकैदी म्हणून पकडून नेले… याट रामचंद्र यादव सुद्धा होते…. रामचंद्र यादव साहेब अंधारात शत्रूची नजर आणि पहारे चुकवून निसटले आणि भारतीय हद्दीत आले… त्यांनी छावणीतल्या मुक्कामात खायला घालून सांभाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्यांना आपल्या लष्करी छावणीपर्यंत वाट दाखवली! हा जखमी जवान भारतीय लष्कराच्या ताब्यात आला, त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. दरम्यान २१ नोव्हेंबर, १९६२ रोजी म्हणजे रेझांग ला (चुशुल) येथे झालेल्या प्रचंड लढाईनंतर चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला गेला होता….. चीनी जरी जिंकले असले तरी त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले होते….. कदाचित त्यामुळेच त्यांनी युद्धविराम जाहीर केलेला असावा.. असे अनेकांना वाटते. सुमारे १८००० फूट उंचीवर झालेले हे रणकंदन प्रत्यक्षात पाहणारे आणि त्याची कहाणी सांगण्यासाठी जिवंत राहिलेले केवळ सहाजणच होते.. त्यातील चार चीनच्या ताब्यात… त्यातील एक तिथेच मृत्यू पावला. एक जण तिथून निसटला होता.

जो जिवंत परतला होता तो सांगत असलेली युद्धकथा इतकी अविश्वसनीय होती की मोठमोठ्या लष्करी अधिका-यांना ही भाकड कथा भासली… एकशे चोवीस जवान हजारो चिन्यांचा खात्मा करू शकले, हे त्यांच्या पचनी न पडणे साहजिकच होते…. कारण अत्यंत अपु-या साधन सामुग्रीच्या जोरावर अगदी ऐनवेळी अनेक सैनिक तिथे पाठवले गेले होते. जो सैनिक हे सांगत होता त्याला दिल्लीत बोलावले गेले… चुकीचे, खोटे सांगितले तर अगदी कोर्ट मार्शल होईल अशी तंबीही दिली गेली… जवान म्हणाला… ”साहेब, आपण प्रत्यक्ष येऊन बघा… तिथली परिस्थिती समजावून घ्या. मेजर साहेब अजूनही तिथेच बसून आहेत.. त्यांचे रक्ताळलेले हातमोजे त्यांच्या देहाशेजारीच ठेवलेत मी… साहेब तिथेच आहेत… निश्चेष्ट !”

अधिक माहिती घेतली गेली… दरम्यान काही युद्धकैदी भारताच्या ताब्यात मिळाले.. त्यांनी या गौरवशाली लढ्याच्या हकीकतीला दुजोरा दिला ! पण तरीही शंका होतीच…. प्रत्यक्ष डोळ्यांना पुरावा दिसत नव्हता…. प्रत्यक्ष जिथे लढाई झाली तिथपर्यंत जाणे युद्धाच्या वातावरणात शक्य नव्हते ! 

चिन्यांच्या तावडीतून सुटलेले हे वीर आपल्या मूळ गावी परतले…. आणि सामाजिक बहिष्काराचे बळी ठरले ! जिथे मुळात युद्धाची हकीकतच लष्करी अधिकारी मान्य करायला तयार नव्हते तिथे सामान्य गावकरी का वेगळा विचार करतील? कारण त्यांच्या समाजात युद्धात लढता लढता मरण्याची परंपरा…. हे पाच सहा जणच माघारी आले म्हणजे हे शत्रूला पाठ दाखवून माघारी पळाले असतील ! गावाने यांना वाळीत टाकले.. यांच्या मुलांच्या शाळा बंद केल्या…. भगोडे (पळपुटे) म्हणू लागले सारे यांना ! हे आपेश मात्र मरणाहुनी ओखटे होते…. प्रश्न जवानांच्या हौतात्म्याचा होता… त्यांचा पराक्रम असा संशयाच्या भोव-यात सापडणे किती दुर्दैवाचे होते!

१३, कुमाऊ रेजीमेंट होती ती. कुमाऊ हा उत्तराखंडमधील एक प्रदेश आहे. त्यावरून या रेजिमेंटचे नाव ठेवण्यात आले. राजस्थानात एका लष्करी अधिका-याच्या पोटी जन्मलेले मेजर शैतानसिंग भाटी या सेनेचे नायक होते. त्यांच्या नेतृत्वात ‘आभीर’ (अभिर) अर्थात नीडर, लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहण्यात जीवनाचे सार्थक मानणारे ‘अहीर’ या लढाऊ हरयाणा भागातून आलेल्या समाजाचे कित्येक सैनिक होते… हिंदुस्तानात अगणित लढाऊ समाजघटक आहेत… ते सर्व सैन्यात एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून लढत आहेत…. म्हणून आज देश उभा आहे !

फेब्रुवारी, १९६२. युद्धाविराम होऊन तीन महिने उलटून गेले होते. एक गुराखी आपले याक प्राणी हाकत हाकत तसा चुकूनच रेझांगला (चुशूल) नावाच्या परिसरातल्या त्या बर्फाच्या पहाडावर पोहोचला…. लढाख मधले हे 2. 7 किलोमीटर्स लांब आणि 1. 8 किलोमीटर्स रुंदी असलेले हे पठार ! तेथील दृश्य पाहताच त्याचे डोळे प्रचंड विस्फारले असतील ! तिथे भारतीय सेनेची एक सबंध तुकडी शत्रूच्या प्रतिकारासाठी बर्फात पाय रोवून उभी होती… सर्वांच्या रायफली लोड केलेल्या आणि शत्रूच्या दिशेने तोंड केलेल्या होत्या… शत्रू टप्प्यात येताच… रायफली फायर होणार होत्या… हातातल्या हातबॉम्बची फक्त पिन उपसायची बाकी होती… काहींच्या हातात रायफलच्या संगीनी होत्या… शत्रूच्या छातीत भोसकण्यासाठी सज्ज… फक्त या सेनेतील प्रत्येकाचे डोळे मिटलेले होते… कुडीतून प्राण निघून गेले होते… एका महाप्रचंड युद्धाचे एक शिल्पचित्रच जणू निसर्गाने तिथल्या बर्फात कोरले होते…. त्यात मेजर शैतान सिंग साहेबही होते… प्रचंड जखमी अवस्थेत एका खडकाला टेकून बसलेले…. शांत, क्लांत!… त्या देहात एका क्षणासाठी जरी देवाने पुन्हा चेतना निर्माण केली असती तरी ते म्हणाले असते…. ”.. पीछे न हटना… फायर !” 

त्या गुराख्याकडून ही खबर पहाडाखाली आणि तिथून वायुवेगाने दिल्लीपर्यंत पोहोचली…. योजना झाली… पाहणी पथक युद्धभूमीवर पोहोचले…. पाहणा-या प्रत्येकाच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली…. देशासाठी प्राणांचे बलिदान म्हणजे काय याचा बर्फात थिजलेला वस्तुपाठ त्यांच्या समोर होता… आता त्यांच्या हौताम्याबद्दल कसलीही शंका उरली नव्हती….. देहांची मोजदाद झाली… ओळख पटवली गेली…. कित्येक देह सापडलेच नाहीत…. आहेत त्या देहांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले ! मेजर शैतान सिंग साहेबांचा देह त्यांच्या जन्मगावी पाठवण्यात आला ! ते जिवंतपणी परमवीर म्हणून लढले.. ते मरणोपरांत परमवीरचक्र विजेते ठरले. त्यांच्या हुतात्मा सहकारी सैनिकांचाही यथोचित गौरव करण्यात आला ! बचावल्या गेलेल्या बहादूर सैनिकांना मानाची पदे बहाल केली गेली. १९४ शौर्य सूर्य आता उजळून निघाले होते… त्यांच्यावरील डाग पुसले गेले होते ! पळपुटे म्हणून हिणवल्या गेलेल्या सैनिकांना देशाने आता वीर म्हणून स्वीकारले….. युद्धभूमीत स्मारक उभारले गेले… १९४ आत्मे शांततेत परलोकीच्या प्रवासास निघून गेले असतील…. ताठ मानेने !

१८ नोव्हेंबर, १९६२.. या दिवशी कृष्ण शुद्ध सप्तमी तिथी होती. या दिवशी आपल्या या पितरांनी हे जग त्यागले होते…. आज पितृपंधरवड्याचा अखेरचा दिवस… सर्वपित्री अमावास्या ! या सर्वपितरांसाठी आज एक घास बाजूला काढून ठेवू !

(काल परवाच भारतीय रेल्वेने आपल्या नव्या इंजिनला ‘ १३, कुमाउ ‘ हे नाव देऊन एक चांगले पाऊल उचलले. त्यावरून हा लेख लिहावासा वाटला. आपल्यासाठी जीवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे स्मरण सतत व्हायला पाहिजे हा ह्या कथा सांगण्यामागील उद्देश ध्यानात घ्यावा. मी काही अभ्यासू लेखक नाही… पण तरीही लिहितो…जय हिंद! 🇮🇳)

(पहिले छायाचित्र परमवीर मेजर शैतान सिंग साहेब यांचे. दुस-या छायाचित्रात युद्धभूमीवर मृत सैनिकांच्या देहांवर अंत्यसंस्कार केले गेले ते दृश्य.. )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ नाते स्वतःशी – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ नाते स्वतःशी – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

समाजात वावरत असताना कधी कधी आपणही नकळत एक मुखवटा चढवलेला असतो. अनेकांच्या मुखवट्यासोबत तोही वावरत असतो. आपल्या मनात नक्की काय चाललं आहे हे इतरांना कळू नये म्हणूनही असेल कदाचित ही यातायात पण कधीतरी हा बुडबुडा फुटतो आणि अजाणता आपलाच आपल्या मनाशी संवाद घडतो. मनात अनेक प्रश्न उभे राहतात. का? कशाला? का मी या सगळ्यातून स्वतःला सोडवू शकत नाही आणि त्या क्षणापासून सुरू होतं एक सूक्ष्म मानसिक परिवर्तन, बदल, एक ठाम निर्णय, ठोस भूमिका.

अशाच अर्थाची माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची नाते स्वतःशी ही गझल वाचण्यात आली आणि रसिक काव्यप्रेमींपुढे त्याची रसात्मकता मांडावी असे तीव्रतेने वाटले म्हणून हा लेखनाचा अट्टाहास…

सुश्री अरुणा मुल्हेरकर

 नाते स्वतःशी ☆

मी बोलते स्वतःशी समजावते मनाला

सारेच हे मुखवटे पाठी पळू कशाला

*

वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी

हे डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला

*

नात्यात नाही उरले काहीच बंध आता

माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला

*

हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे

पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला

*

स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही

घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला

*

सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता

पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला

*

संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी

कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला

*

— गझलकारा अरुणा मुल्हेरकर, मिशिगन

ही गझल प्रातिनिधिक स्वरूपात आहे असे म्हटले तर काहीच गैर ठरू नये. सारं काही जणू आपल्याच मनातलं आहे अशी भावना वाचकाच्या मनात ही गझल वाचताना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि इथेच, याच क्षणी गझलेतला अस्सलपणा जाणवतो.

मी बोलते स्वतःशी समजावते मनाला

सारेच मुखवटे मी पाठी पळू कशाला

मतल्याची सुरुवातच फार परिणामकारक झालेली आहे. जगता जगता एक क्षण असा काही येतो की साऱ्यांचाच उबग येतो. अवतीभवती वावरण्यार्‍यां विषयी शंका निर्माण होतात. काहीतरी चुकतंय, नको असलेलं पुन्हा पुन्हा आपल्यापाशी येऊन ठेपतंय आणि “पुरे झाले आता” अशी भावना निर्माण होऊन आपल्याच मनाला समजवावं लागतंय. “अरे! हे सारं किती फोल आहे, पोकळ आहे! यांच्या मुखवट्यामागची अव्यक्त गढूळ वृत्ती जाणल्यानंतरही मी त्यांच्यात का गुंतून पडू? कशासाठी मी या फसव्या लोकांच्या पाठीमागे पळत राहू?

वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी

डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला 

अधरावर अमृत आणि उदरात मात्र जहर. यांच्या गोड बोलण्याला मी का खरं समजावं? जरी त्यांची वाणी मधुर असली तरी ती खोटी आहे, कावेबाज आहे हे मी जाणलंय. हे सारेच गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. हे सारे गोड बोलून माझा फायदा घेणारे आहेत. यांना माझ्याविषयी जराही आत्मीयता नाही. सारेच मतलबापुरते माझ्या भोवती आहेत. “गरज सरो ना वैद्य मरो” हेच यांच्या मनातलं कडवट वास्तव मला माहीत आहे आणि हे मी पूर्णपणे जाणल्यानंतरही मी माझी फसवणूक का करून घेऊ? 

या शेरात गझलकाराने वापरलेला डोंगळे गुळावर हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे. खरंच यालाच दुनियादारी म्हणतात. जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत प्रधान आहे. राज्य गेलं की सगळ्यांची पाठ फिरते. स्वार्थापुरते सारेच जवळ येतात. अशा लोकांची साथ नेहमीच अशाश्वत असते. डोंगळे गुळावर या दोनच शब्दातून कवयित्रीने हेरलेला जगाचा स्वभाव स्पष्टपणे व्यक्त होतो.

नात्यात नाही उरले काहीच बंध आता

माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला

गणगोत, नातीगोती, त्यातले भावबंध जणू काही आता संपलेत. जो तो स्वतःत मशगुल आहे. प्रेम, आपुलकी, आस्था, माया, उपकृतता, कर्तव्य काही काही उरले नाही. जो तो स्वतःत मग्न आहे. इतरांचा विचारही करण्याची त्याला गरज वाटत नाही. नात्यातून जाणवत असलेला हा कोरडेपणा कवयित्रीला अक्षरशः व्यथित करत आहे. हा बदल अनपेक्षित आहे. धक्का देणारा आहे पण तरीही हे वास्तव आहे आणि या वास्तविकतेने मन विदीर्ण झाले असतानाच कवयित्रीच्या मनात सहज येते…

हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे

पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला

पाण्यात मुक्तपणे पोहणाऱ्या राजहंसाचे चित्र कवियत्रीच्या मनात साकारते. त्याच्याशी नकळत तुलना केली जाते.

“पहा! कसा हा राजहंस पक्षी स्वतःच्या धुंदीत स्वैरपणे विहरत आहे. त्याचं नातं फक्त भोवतालच्या अथांग, निर्मळ, पवित्र जलाशयाशी आहे आणि पाण्याचा निर्मळ, निरपेक्ष स्पर्श म्हणजेच त्याच्यासाठी जणू काही स्वर्गीय आनंद आहे. ”

संपूर्ण गझलेवर कळस चढवणारा हा शेर आहे. या शेरात राजहंस— पाणी हे रूपकात्मकतेने वापरलेले आहे. पाणी म्हणजे जीवन. माणूस आणि जीवन यांचा संबंध उलगडणारं हे रूपक अतिशय प्रभावी वाटतं. “जगावं तर राजहंसासारखं! जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जीवनात वेचावा. ” हा अत्यंत मोलाचा संदेश या शेरातून मा. अरुणाताईंनी किती सहजपणे दिला आहे! 

स्वत:शी संवाद साधता साधता आता कवयित्रीच्या मनात काही निर्णयात्मक विचार येऊ लागले आहेत. त्या आता स्वतःला सांगत आहेत,

स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही 

घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला

आता जगायचं ते मुक्त, स्वच्छंद, स्वैर बंधन मुक्त, नको बेड्या, नको शृंखला. कशाला ज्यातत्यात अडकून नैराश्य येऊ द्यायचे आणि उरी जखमा करून घ्यायच्या? या संकुचित, आक्रसलेल्या, गढूळलेल्या, जीवनरुपी डबक्याचा त्याग करून उंच, मोकळ्या, अथांग, गगनी मुक्त झेप का न घ्यावी? खरोखर अशा या भरारीतल्या अनमोल सुखालाच मला आता कवटाळायचं आहे.

किती सुंदर शेर! किती लयबद्ध आणि अर्थपूर्ण! हा शेर वाचताना मला सहज गदिमांच्या ओळी आठवल्या.

जोड झणी कार्मुका 

सोड रे सायका 

मारही त्रटिका रामचंद्रा..

प्रस्तुत गझलेतल्या ओळी आणि गदिमांच्या या ओळीतले अर्थ, प्रसंग, वातावरण निराळे असले तरी आवेश तोच आहे. काहीतरी सोडताना, तोडताना मग ती जगण्यातली बंधने का असेनात पण त्यासाठी एक आवेश लागतो, जोश लागतो आणि तो व्यक्त व्हावा लागतो आणि वरील शेरात तो याच ताकदीने व्यक्त झालेला मला जाणवला.

आता अरुणाताईंची गझल पुढे सरकते..

सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता

पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला

वा क्या बात है!

हा शेरही रूपकात्मक आहे. सूर्यास्त, मावळता दिन, पानगळ हे शब्द संपत आलेल्या जीवनाविषयी सांगत आहेत. “एक दिवस हे जग सोडून जायचंय. सूर्य मावळण्याची चिन्हं क्षितिजावर उमटत आहेत, या जीवनरुपी वृक्षांची पानं गळून जात आहेत, हळूहळू हा वृक्ष निष्पर्ण होईल, गात्रे थकली.. ती आता केव्हाही निस्त्राण होऊ शकतात. ”

या शेरामध्ये कवयित्रीची जीवनाच्या अंताविषयीची एक स्वीकृती तर जाणवतेच पण शब्दांच्या पलीकडचं, त्यांच्या मनातलं काहीतरी सहजपणे वाचता येतं. आता कशाला? हा एक सूर त्यात जाणवतो. संपतच आलं की सारं आता! जे काही शेवटचे क्षण उरलेत ते तरी मुक्तपणे मनासारखे का जगू नयेत? याच भावनेतून त्या त्यापुढे म्हणतात..

संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला या क्षणी, या सांजवेळी, आयुष्याच्या या किनारी मी माझ्याच मनाशी साधलेला हा संवाद आहे. माझ्या मनाशी जुळवलेले माझे हे निखळ नाते आहे. माझ्या भोवती मीच विणलेल्या या कोषातून मुक्त होऊन मी माझ्या मनातले काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ”

जणू काही या ओळीतून अरुणाताई काहीतरी निर्वाणीचं सांगत आहेत. ते जरी निर्वाणीचं वाटत असलं तरी ते निर्णयात्मक आहे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला असा भाव कुठेतरी या ओळीतून उलगडतो.

अप्रतिम गझल.

मी दूरस्थपणे गझलकाराची मानसिकता टिपण्याचा फक्त प्रयत्न केला आहे. या गझलेला असलेली एक तात्त्विक बैठक शोधण्याची धडपड केली आहे. सुरुवातीला ही गझल काहीशी नकारात्मक भासत असली तरी हळूहळू ती सकारात्मकतेकडे झुकत जाते. जीवनातले अस्सल अर्थ उलगडत जाते. आनंदकंद वृत्तातील ही मुसलसल गझल मनाला भिडते ती त्यातल्या सहज, सोप्या पण अर्थपूर्ण शब्दांमुळे. प्रत्येक शेरातला उला आणि सानी यात अर्थाची सुरेख सरमिसळ झालेली जाणवतते. स्पष्ट राबता आणि सुरेख खयालत यामुळे ही गझल फारच परिणामकारक झाली आहे. रदीफ विरहित आणि मनाला कशाला स्वतःला कुणाला त्याला सुखाला झाला जगाला या काफियांनी गझलेची रुची आणि उंची अधिक वाढलेली आहे.

या गझलेचा आनंद आपण सर्वांनी जरूर घ्यावा हीच अपेक्षा..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

मी वनिता आणि ही माझी रोजनिशी… रोजनिशी म्हणते कारण मला दुसरं नाव आठवत नाही. ही तारीखवार लिहिलेली रोजनिशी नाही. ज्या दिवशी लिहिण्यासारखं घडेल किंवा लिहावं असं मनात येईल त्या दिवशी लिहिलेली ही डायरी आहे.

वयाची पंचाहत्तरी जवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता वानप्रस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमाकडे वाटचाल सुरु करायला हवी. ह्याची पहिली जाणीव त्या दिवशी झाली.

दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात सामान घेऊन वाणी उभा. मी म्हटलं, अरे, आम्ही तर यादी दिली नव्हती. तो म्हणाला, सकाळीच तर वहिनीसाहेब यादी देऊन गेल्या. तो सामान ठेवून निघून गेला. ही पहिली वेळ होती जेव्हा सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी दिली होती. सामानातही खूप बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार आट्याची पाकिटं आली होती. तेलही बदललं होतं. तुकडा बासमतीऐवजी अख्खा बासमती आला होता. त्या दिवशी ठरवलं, आता स्वयंपाकघराचा मोह सोडून तिथून बाहेर पडायचं. त्यात लुडबुड करायची नाही. बाहेर बसून भाजी निवडणं वगैरे एवढीच मदत करायची.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई, उद्या आम्ही सर्व जण सिनेमाला जातो आहोत. तुझं पण तिकीट काढणार होतो, पण त्या थिएटरला पायऱ्या खूप आहेत. तुला त्रास होईल म्हणून तिकीट काढलं नाही. तो म्हणाला ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. त्या दिवसापासून जाणवलं, आता नाटक, सिनेमा ही मनोरंजनं बंद करायला हवीत. घरातच टीवी, फोन, वाचन ह्यात मन रमवायला हवं.

नात पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. एक वाजत आला होता. माझा डोळ्याला डोळा लागेना. तिची काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. ती आल्या आल्या मी म्हटलं, अगं, किती उशीर! पण माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती म्हणाली, अगं आजी, मी आईबाबांना सांगून गेले होते मला उशीर होईल म्हणून. तू कशाला एवढी काळजी करतेस? तिच्या त्या ‘तू कशाला एवढी काळजी करतेस?’ ह्या वाक्याने मला जागं केलं. खरंच, तिची काळजी करायला तिचे आईवडील समर्थ आहेत. मी कोण तिची काळजी करणारी? माझा काय संबंध? त्या दिवसापासून ठरवलं, भावनांना आवर घालायचा. कशातच गुंतायचं नाही.

तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।

घरच्या आघाडीवर अशी हळूहळू निवृत्त होत असताना शरीरानेही वृद्धत्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. पहिला नंबर लावला पायांनी. जरा जास्त वेळ उभं राहिलं की पाय भरून यायला लागले. चालताना किंवा बसल्यावर एवढं जाणवत नव्हतं, पण उभं राहिलं की त्रास होत होता. शॉपिंगला किंवा कुठे समारंभाला गेलं तर चटकन कुठे बसायला जागा मिळते का ते बघायला लागले. हळूहळू शॉपिंग, समारंभ हे बंदच केलं. रस्त्यावरून चालण्याचा आत्मविश्वास कमीकमीच होत गेला. कोणीतरी बरोबर असावं असं वाटायला लागलं. आणि मग बाहेर जाण्यावर बंधनंच आली.

नंतर जाणीव करून दिली दातांनी. दात दुखत नव्हते, पण त्यांचे तुकडेच पडत होते. म्हणून डेंटिस्टकडे गेले. त्यांनी खालचे सर्व दात काढायला सांगितले. ते दात काढून नवीन बसवण्यात दोन महिने निघून गेले. हे दोन महिने खाण्याचे फार हाल झाले. अगदी खूप शिजवलेलं किंवा पातळ खाणंच खाता येत असे. त्याचा तब्येतीवरही परिणाम होत होता. कवळी बसवल्यानंतरही ती सेट होईपर्यंत खूप त्रास झाला. कवळी घातली की हिरड्या सोलवटायच्या. शेवटी एकदाची ती कवळी सेट झाली पण तेव्हापासून अन्नाची चवच गेली.

जास्त वेळ बसलं की पाठ आणि कंबर दुखायला लागली. ह्या साऱ्यामुळे माझं जगच आक्रसून गेलं. एरवी सगळीकडे बेधडक वावरणारी मी, पायाच्या दुखण्यामुळे शॉपिंग, समारंभ बंद झाले. एकटी जाण्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे रस्त्यावर जाणंच बंद झालं. मी आता कॉलनीतच फेऱ्या घालू लागले. पण तिथेही एक दिवस चालताना ठेच लागली आणि पडता पडता वाचले. त्यामुळे तोही आत्मविश्वास गमावला. खाली जायची भीती वाटायला लागली. शेवटी माझी खोली, माझा पलंग आणि मदतनीस ठेवलेली बाई एवढंच माझं संकुचित जग झालं. बाहेर कुठे जायची दगदग नकोशी वाटू लागली.

वृद्धत्व जवळ जवळ येत होतं पण त्यातही काही सोनेरी क्षण येतात जे मनाला उभारी देऊन जातात. मुलगा ऑफिसमधून लवकर घरी येतो. आल्यावर माझ्या खोलीत येतो. पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतो आणि माझी चौकशी करतो. आई तू बरी आहेस ना? गोळ्या नीट वेळेवर घेतेस ना? वेळच्या वेळी जेवत जा. व्यायाम कर. त्याचे हे प्रश्न अगदी साधे असतात पण त्यातल्या आपुलकीच्या स्पर्शाने माझं मन आनंदाने भरून येतं.

एक दिवस रात्री जेवताना सून म्हणते, आई, तुम्हाला पोळी चावताना त्रास होतो ना? मी रात्री तुमच्यासाठी घावन करत जाईन. चावायला सोपं आणि पचायलाही हलकं. तिची ही काळजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते.

चष्मा लावून गोळ्यांची नावं वाचताना नात तिथे येते आणि म्हणते, आजी तुला गोळ्या रोज शोधाव्या लागतात ना? दर रविवारी मी आठवड्याच्या गोळ्यांच्या पुड्या करून ठेवत जाईन. हिरव्या पुडीतल्या गोळ्या सकाळी लाल पुडीतल्या रात्री घ्यायच्या. ते तुला सोपं होऊन जाईल. गोष्ट साधीशीच पण मन भरून येणारी.

नातवाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असतो. तो म्हणतो, आजी! तुझा शिरा खूप सुंदर होतो. उद्या माझे मित्र येणार आहेत. तू शिरा करशील? दुसऱ्या दिवशी जास्त वेळ उभं न राहता येणाऱ्या माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं आणि मी शिरा करते. तो कसा झाला ह्यापेक्षा नातवाने करायला सांगितलं ह्याचाच आनंद फार मोठा असतो.

मार्केटमधून येताना सून तीन गाऊन्स घेऊन येते. म्हणाते आता घरात साडी नका नेसत जाऊ. पायात येते. पडायला होईल. घरात हे गाऊन्स घालत जा. घालायला सोपे आणि सुटसुटीत. तिने दाखवलेली काळजी मनाला भिडते.

एका रविवारी मुलगा म्हणतो, आई तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस. आज आपण लॉंग ड्राईवला जाऊ या. तुलाही बाहेर पडल्यावर बरं वाटेल. आम्ही सगळेच बाहेर पडतो. खूप दिवसांनी भेटलेला बाहेरचा निसर्ग मनात भरून घ्यावासा वाटतो.

अश्या आंबटगोड आठवणी जागवताना मनात येतं, खरंच आता किती थोड्या अपेक्षा उरल्या आहेत. घरातल्या कोणीतरी रोज खोलीत येऊन आपुलकीने फक्त कशी आहेस असं विचारावं. सुनेने रोजचं जेवणाचं ताट मदतनीस बाईबरोबर न पाठवता एखाद दिवशी स्वतः घेऊन यावं. जवळ बसावं. चार गोष्टी बोलाव्यात. नातवंडानी वेळ मिळेल तेव्हा जवळ बसून तुटलेल्या बाहेरच्या जगातल्या चार गोष्टी सांगाव्यात. आजारी पडल्यावर कोणी तरी येऊन कपाळावर नुसता हात ठेवावा.

सांजवेळ ही हुरहूर लावणारी असते. आयुष्याची सांजवेळही अशीच हुरहूर लावते. गतायुष्यात केलेल्या चुका आठवून देणारी, छोट्याश्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटायला लावणारी…

… अशी ही सांजवेळ.

लेखिका : शैलजा दांडेकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ  

मित्रहो, माझे गाव बदनापूर. आता जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असले तरी पन्नास साठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि जालना तालुक्यातील एक छोटेसे खेडे होते. मी बदनापूरच्या शाळेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतांना आम्हाला बहुदा भूगोलाच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात बदनापूर हे कृषी संशोधन केंद्र असलेले महत्त्वाचे गाव असल्याचा उल्लेख होता. तसेच जालना हे मोठे व्यापारी शहर असल्याचाही उल्लेख होता. बदनापूर आणि जालन्यामध्ये केवळ एकोणीस किलोमीटरचे अंतर. जणू घर अंगणच.

मी मार्च १९६६ मध्ये बदनापूरच्या जि. प. प्रशालेतून पहिल्या श्रेणीत एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर जालन्याच्या जे. ई. एस महाविद्यालयात पी. यू. सी. सायन्सला प्रवेश घेतला आणि माझा आणि आगगाडीचा संबंध सुरु झाला. पी. यु. सी. पासून बी एस्सी {स्पेशल फिजिक्स } ची पदवी मिळेपर्यंत सलग चार वर्षे बदनापूर ते जालना नियमितपणे रेल्वेने जाणे येणे केले. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बदनापूरच्या स्टेशनवर येण्याची पॅसेंजर ट्रेनची वेळ असे. बहुदा ती वेळेवरच येत असे. तसेच सायंकाळी ५. २०ला जालन्याहून परतीची गाडी {पूर्णा ते मनमाड पॅसेंजर} होती. तीसुद्धा वेळेवरच येत असे. त्या चार वर्षांच्या काळातील रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या फक्त दोन आठवणी इथे सांगतो.

बदनापूर ते जालना विद्यार्थ्यांसाठीचा सवलतीच्या दरातील मासिक पास चार रुपये तर त्रैमासिक पास दहा रुपये होता. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्रांचे पुस्तक दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयाकडून 

कॉलेजला येत असे. कॉलेजकडून प्रमाणपत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर दिले की सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असे. बहुतेक मी बी. एस्सी प्रथम वर्षाला असतांना रेल्वेने भाडेवाढ केली होती. ती बातमी त्या काळातील ‘अजिंठा’ आणि ‘मराठवाडा’ या लोकप्रिय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत स्पष्ट लिहिलेले होते की, रेल्वेची भाडेवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. परन्तु नंतरच्या आठवड्यात माझा पास संपला म्हणून मी कॉलेजमधून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिकीट खिडकीपाशी जाऊन दहा रुपये आणि कॉलेजचे प्रमाणपत्र देऊन त्रैमासिक पास मागितला. तर तिथल्या बुकिंग क्लार्कने बारा रुपये मागितले. मी म्हटलं, “ बारा रुपये कसे? दहा बरोबर आहेत. “.. तर तो म्हणाला, “पेपर पढते नही क्या? अभी रेल्वे फेअर बढ गया है. ” 

मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, विद्यार्थ्यांच्या कन्सेशनमध्ये फरक पडलेला नाही. तरी तो ऐकेना. शेवटी अनिच्छेने मी बारा रुपये देऊन पास घेतला. पण मन बेचैन होते. बदनापूरला आल्यावर लगेच “वाचकाचे मनोगत” या सदरासाठी अजिंठा या वर्तमानपत्राला पत्र लिहिले. त्यात रेल्वेच्या भाडेवाढीसंबंधी मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच माझ्याकडून जालन्याच्या बुकिंग क्लार्कने दोन रुपये जास्त घेतल्याचाही उल्लेख केला आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत नेऊन टाकले.

दोन दिवसांनी रविवार होता. त्या रविवारी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयास पत्र लिहून वस्तुस्थिती कथन केली आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले.

आश्चर्य म्हणजे ‘दैनिक अजिंठा या वर्तमानपत्रास पाठवलेले माझे पत्र तीन चार दिवसांनी अजिंठा पेपरमध्ये छापून आले. विशेष म्हणजे माझ्या पत्राखाली संपादकांनी टीप लिहून स्पष्ट केले की, ” विद्यार्थ्यांच्या पासच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही, याची आम्ही औरंगाबादच्या स्टेशनमास्तरकडून पुष्टी करून घेतली. ” मला ते माझे प्रसिद्ध झालेले पत्र वाचून खूप आनंद झाला.

पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे, दोन दिवसांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे पत्र ‘अजिंठा’मध्ये त्याच कॉलममध्ये प्रसिद्ध झाले. त्या पत्राचा आशय असा. ” गैरसमजुतीतून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरील क्लार्कने दोन रुपये जास्त घेतलेले आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्याने स्टेशनवर जाऊन दोन रुपये परत घ्यावेत. ” 

मग मी तो पेपर दाखवून जालन्याच्या स्टेशनवरच्या बुकिंग क्लार्ककडून दोन रुपये परत घेतले. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात “रेल निलायम सिकंदराबाद”कडून माझ्या बदनापूरच्या पत्त्यावर तशाच आशयाचे इंग्रजी पत्र आले, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना….. आज दोन रुपयांचे इतके महत्त्व वाटत नसले तरी पंचावन्न वर्षांपूर्वी त्या दोन रुपयांचे काय महत्त्व असेल हे आपण समजू शकतो.

रेल्वेसंबंधीची दुसरी आठवण म्हणजे, एक दिवस कॉलेजमध्ये जास्त वेळ थांबावे लागल्यामुळे सायंकाळी सहा वाजता जालना स्टेशनवर आलो. ५. २० ची गाडी अर्थातच गेलेली होती. आता यानंतरची पॅसेंजर ट्रेन रात्री साडेआठ वाजता होती. ती काचीगुड्याहून यायची. पण तिचा लौकिक असा होता की, ती नेहमी दोन तासांपेक्षा जास्त लेट असायची. त्या दिवशी ती तीन तास लेट होती. म्हणजे गाडी रात्री साडेअकरा वाजता येण्याची शक्यता होती. मी स्टेशनवर तिकीट खिडकीच्या समोर बाकावर बसून राहिलो. पोटात काही नव्हते. रात्री नऊ वाजेनंतर झोप येऊ लागली. कारण रोज सकाळी जालन्याला येण्यासाठी पाच वाजताच उठावे लागे. {आई मात्र मला डबा तयार करून देण्यासाठी चार वाजताच उठायची.}

एव्हाना स्टेशनवरची गर्दी बरीच कमी झाली होती. कारण त्यादरम्यान कुठलीच गाडी येणार नव्हती. मी मनात विचार केला, “आपली गाडी साडेअकरा वाजता येईल. तोपर्यंत थोडी झोप होईल. “

म्हणून मी तिथेच बाकावर आडवा झालो. जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पोटात धस्स झाले. आई घरी वाट पहात असेल या विचाराने आणखी त्रस्त झालो. आता काय करायचे? हा विचार करीत असतांना लक्षात आले की, स्टेशनजवळच अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर बस डेपो आहे. तिथून पहाटे साडेपाच वाजता जालना ते मालेगाव बस निघते. मी पटकन तिथे चालत गेलो. तर बस उभीच होती. पण निघायला वेळ असल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच नव्हते. दोन तीन लोक बसमध्ये बसलेले होते. मीसुद्धा आत जाऊन बसलो. कंडक्टर आल्यावर तिकिटाचा सव्वा रुपया देऊन बदनापूरचे तिकीट घेतले. थोड्या वेळेत बस सुटली आणि बदनापूरला सकाळी सहा वाजता पोचलो. आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठलेली होती आणि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मला बघताच आईने आधी माझ्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि नंतर विचारपूस केली.

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆ |

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर

एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्‍याचा जन्म मुस्लिम घराण्यातला.

पण अखेर आपापल्या उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले ते मात्र एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्‍याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला आद्य ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्‍याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्‍याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत.

अर्थातच एक गेला, ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच… आणि त्या दुसर्‍याने माझ्याही पिढीची, तरुणाई धुंद करून सोडली. म्हणजे बघा ना… ‘पहेला नशा पहेला खुमार.. नया प्यार है नया इंतेजार’ लिहितेवेळी, हे जुनं खोड पंच्याहत्तरच्या आसपास होतं.

तर… एका प्रतिभावानाने लिहिलं होतं…

‘तुझ्यावाचूनीही रात जात नाही

जवळी जरा ये हळू बोल काही

हात चांदण्यांचा घेई उशाला

अपराध माझा असा काय झाला’

आणि दुसर्‍याने लिहिलं होतं…

‘रातकली एक ख्वाब में आई

और गले का हार हुई

सुबह को जब हम नींद सें जागे

आँख तुम्ही सें चार हुई’

म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. आणि असे अगणीत चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या सिद्धहस्त लेखणीतून, स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.

हेच बघा वानगीदाखल…

‘सुटली वेणी, केस मोकळे

धूळ उडाली, भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे

या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा

झुलवू नको हिंदोळा’

आणि…

‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा 

न घबराइए

जहाँ तक महक है मेरे गेसुओं की 

चले आइये’

आहाहा ! रोमान्सनी काठोकाठ भरलीयेत ही दोन्ही गाणी. पण तरीही अगदी कणभरानेही व्हल्गर नसल्यामुळेच, एका स्त्रीच्या तोंडीही खुलून येतांना दिसतात.

बरं नायिकाच नाही… तर ह्या दोघांच्याही शब्दांच्या पायघडीवरुन चालणारा नायकही, अगदी ओतप्रोत भरलेला आहे प्रेमभावनेनी. आणि तरीही… ती आत्यंतिक संयतपणे व्यक्त करणाराही आहे तो.

एकाचा नायक म्हणतो…

‘अनादी चंद्र अंबरी, अनादी धुंद यामिनी

यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी

घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

नविन आज चंद्रमा’

दुसर्‍याचा नायक म्हणतो…

‘जब तलक ना ये तेरे रसके भरे होठों से मिलें

यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले

गाए जाऊँगा वही गीत मैं तेरे लिए

जलते हैं जिसके लिये’

तर… १ ऑक्टोबर, ह्या दोघांचा जन्मदिन. आणि दोघांचं जन्मवर्षही एकच… १९१९. काय म्हणावा हा दैवी योगायोग……

#ग_दि_माडगुळकर

#मजरुह_सुलतानपुरी

… आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, मनःपूर्वक अभिवादनाचं ओंजळभर अर्ध्य.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares