रुप म्हणा वा सौंदर्य, हे आपल्या हातात नसतं.शिवाय कुठल्याही अमुक एखाद्या गोष्टीतच सौंदर्य दडलेलं असतं असं ही नव्हे. कधी ते कुणाच्या गुलाबी गोरेपणात असतं तर कधी कुणाच्या तजेलदार सावळेपणात.कधी कुणाच्या कुरळ्या डौलदार शोल्डरकट मध्ये तर कधी कुणाच्या लांबसडक शेपट्यात गुंडाळलेलं असतं.कधी कुणाच्या चाफेकळी नाकात तर कधी कुणाच्या नकट्या अप-या नाकातही. कधी कुणाच्या पाणीदार टपोऱ्या भावूक डोळ्यांत असतं तर कधीकधी ते मादक,गहि-या,खोल डोळ्यांत पण गावतं.कधीकधी ते खात्यापित्या सणसणीत बांध्यात दिसतं तर कधी ते लवलवत्या चवळीच्या शेंगेगत बांध्यात दिसतं. कधी कुणाच्या मोत्यासारख्या दातात असतं तर कधी ते मौसमीसारख्या खालीवर तिरप्या दातातही असतं. खरसांगू ? हे सौंदर्य नं बघणा-या च्या नजरेत असलं नं तर कधीही, कुठेही, कोणातही ते हमखास दिसतच दिसतं.
हे झालं रुपाचं सौंदर्य. सौंदर्य हे कर्तृत्वात, पराक्रमात,आदर्शवत व्यक्तीमत्वात असतं. ते निर्मळ, अल्लड,निरागसतेतं पण वसतं. अफाट कर्तृत्वाने संपूर्ण व्यक्तीमत्वच झळाळून निघतं, उजळून निघतं.आणि मग कदाचित रुपाच्या नाही तर अशा गुणी,कर्तृत्ववान, कर्तबगार व्यक्ती आपोआप आपल्या नजरेत भरते आणि अलगद, अलवार, आपसूकच तिच्याबद्दल चार कौतुकाचे शब्द आपल्या मनातून, वाचेतून निघतात. आपली पारखी नजर असली तर सौंदर्य काय आपल्याला ठायीठायी दिसतं.
अशाच काही व्यक्तीरेखा ह्या आपल्याला खूप आवडतात. कदाचित आपण त्यांना कधीच भेटलो नसतो,प्रत्यक्ष बघितलही नसतं. स्वभाव बघितला तर काही वेळा एखादी व्यक्ती तिच्या डँशिंग,सडेतोड,धडाडीच्या घणघणाती स्वभावाने भावते तर कधी कुणी तिच्या स्वतःच्या मृदू, शांत,सोशिक, मनमिळाऊ स्वभावाने मनाच्या कप्प्यात कायमची विराजमान होते. अशीच एक स्वभावाने अतिशय निर्मळ, शांत,समाधानी,हसतमुख, निरागस आणि रुपाच्या बाबतीत सुंदर ,सात्विक
व्यक्ती म्हणजे अभिनेत्री नूतन समर्थ बहल ही माझी अतिशय आवडती अभिनेत्री.
नुकत्याच झालेल्या नूतनच्या स्मृतिदिनानिमित्त थोडसं तिच्याविषयी.
अभिनेत्री शोभना समर्थ ह्यांची ही लेक.त्यामुळे सौंदर्य आणि अभिनय दोन्हींचा संगम वारसाहक्कानेच घेऊन आलेली. पुढे त्या सौंदर्याला सात्विकतेची आणि उच्चप्रतिच्या अभिनयाची जोड मिळाली आणि तिच्या रुपाला अभिनयाला एक वेगळीच झळाळी आली.
नूतनची नात्याने ओळख द्यायची तर अभिनेत्री शोधना समर्थ ह्यांची मुलगी,अभिनेत्री तनुजा हिची बहीण, मोहनीश बहल हिचा लेक,अभिनेत्री काजोल हिची भाची आणि लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल हीचे “अहो”.
नूतनने आपल्या करीयरची सुरुवात 1950 पासून केली. नितळ,सात्विक,खानदानी आणि आरसपानी सौंदर्य घेऊन आलेली नूतन ही अभिनयाच्याही बाबतीत अग्रेसर होती. “मिस इंडिया” पुरस्कार प्राप्त करणारी नूतन ही बहुतेक पहिलीच महिला होती.सर्वाधिक फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे नूतन आणि दुसरी ह्यांचीच भाची काजोल. ह्यांना मानाचा “पद्मश्री”पुरस्कार देखील मिळाला होता.
“मै तुलसी तेरी आँगनकी”,”बंदिनी”,”सीमा”, “सुजाता”,”सरस्वतीचंद्र” हे त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांपैकी काही. बंदिनी चित्रपटातील अभिनयाबद्दल तर असं बोललं जातं की ह्या चित्रपटात फक्त नूतन ह्यांचा चेहराच बोलका अभिनय करीत होता असे नाही तर त्यांचे अक्षरशः हात,पाय,बोटं ही सुद्धा अप्रतिम अभिनय करीत होती.त्यांचा सौदागर हि अमिताभ बच्चन ह्यांच्या बरोबरचा एक वेगळाच चित्रपट. मेरी जंग मध्येही त्यांचा सहजसुंदर अभिनय बघायला मिळाला.
त्यांच्या साधेपणाबद्दल बोलायचं तर त्यांच घरं अतिशय साध्यापद्धतीचे होते.आणि घरी गाड्या घोड्या असतानांही बरेचदा नूतन स्वतः चौकात पायी जाऊन कित्येकदा भाजी आणणे,ईस्त्रीचे कपडे आणणे ही कामे करीत.
त्यांचा मला आवडलेला चित्रपट मःहणजे सरस्वतीचंद्र. त्यामधील अप्रतिम गीताने आजच्या पोस्ट ची सांगता करते.
“चंदनसा बदन,चंचल चितवन,
धिरेसे तेरा ये मुसकाना,
मुझे दोष ना देना जगवालो,
हो जाऊँ अगर मै दिवाना…
आपण ह्या ओळींच्या जास्त प्रेमात पडतो की नूतन ह्यांच्या हे आपल्यालाच नक्की ठरवता येत नाही. तर अशा ह्या प्रेक्षकांच्या मनात अजूनही रुंजी घालणा-या, नूतनजींना भावपूर्ण श्रध्दांजली.
नकार ही एक प्रतिक्रिया आहे. ‘हो’ म्हणजे होकार आणि ‘नाही’ म्हणजे नकार इतकी साधी या शब्दांची व्याख्या असली तरी या एका शब्दाने होणारे परिणाम हे खूप व्यापक आहेत. नाही, नको म्हणण्याने कदाचित संपूर्ण जीवनाच्या वाटाही बदलू शकतात. कधी त्या सकारात्मक असू शकतात तर कधी कडवट, बोचऱ्या, दुःखदही असू शकतात.
काही वेळा नाही म्हणणं फारसं कठीण नसतं पण आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरे जावं लागतं की त्यावेळी नकार देण्यासाठी हवं असतं बळ, एक ठामपणा, निश्चित भूमिका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामासाठी लागणारी जबरदस्त सहनशीलता, खंबीरपणा आणि तितकाच तटस्थपणाही. विचलित होणारं मन अथवा द्विधा मनस्थितीत घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती ‘आपण चुकलो, आपण उगीच नाही म्हणालो’ या मानसिकतेतही घेऊन जाऊ शकते. म्हणूनच नकार द्यायला बळ लागतं.
नकार द्यायची वेळ वेगवेगळ्या आघाड्यांवर येऊ शकते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. आपल्या भोवताली वावरणाऱ्या जवळच्या, दूरच्या नात्यांतल्या, मैत्रीतल्या माणसांच्या बाबतीतही ही वेळ येऊ शकते.
सर्वप्रथम ‘नकार’ हा शब्द उच्चारल्यावर मनात येते ते म्हणजे विवाह ठरण्यापूर्वी मुलीने मुलाला अथवा मुलाने मुलीला दिलेला नकार. बऱ्याच वेळा नापसंतीचे खरे कारण देणं अवघड असतं. अशावेळी पत्रिका जमत नाही किंवा आपण एकमेकांना कंपॅटीबल नाही होऊ शकत, थोडक्यात आपली क्षेत्र वेगळी आहेत, स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत वगैरे वगैरे पण आडवळणाने दिलेला,समोरच्या व्यक्तीला न दुखावता दिलेला हा नकारच असतो. या ठिकाणी दिलेला नकार म्हणजे वेळीच घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. नाहीतर आई-वडिलांच्या, इतरांच्या दबावाखाली येऊन जर कुठला निर्णय घेतला गेला तर “आयुष्यात दुःखाचे दार उघडले” असेच होऊ शकते.
माझ्या एका मैत्रिणीचं लग्न जमत नव्हतं. पाच मुलींचे आई वडील फार चिंतेत होते. धाकट्या बहिणीही रांगेत होत्या. त्यामुळे आई-वडिलांना हीचं लग्न जमवण्याची अत्यंत घाई झाली होती. अखेर एका मुलासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी माझ्या मैत्रिणीकडून होकार मिळवला. पण मनातून माझी मैत्रीण नाराज होती.
पहिल्याच भेटीत त्या मुलाने तिला विचारले होते,” तुला मच्छरदाणीत झोपायला आवडते का?”
हा काय प्रश्न झाला? तोही एकमेकांशी अजिबात ओळख नसताना… माझ्या मैत्रिणीजवळ लग्नाळू भांडवल नसेल कदाचित पण तिची योग्यता सर्वसाधारण पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त होती. तिने जेव्हां मला हे सांगितले तेव्हा मी तिला म्हणाले,” तू ठाम रहा. कुठल्याच दबावाखाली मुळीच येऊ नकोस. फार तर काय होईल थोडे दिवस तुझ्या कुटुंबात अशांती राहील पण तू या मुलाला नकारच दे. तुझं आयुष्य तू असं पणाला लावू नकोस.”
आणि शेवटी तिने त्या मुलाला नकार दिला. वादळ झाले. त्या वादळात मी तिची मैत्रीण म्हणूनही भरडले गेले पण कालांतराने झाले सारे शांत. आज माझी मैत्रीण एक सन्मानित सुखी जीवन जगत आहे याचा मला अभिमान आहे.
बँक गॅरंटी हा एक अत्यंत धोक्याचा प्रकार आहे. मी ४० वर्षे बँकेत नोकरी केली. कर्ज खात्यात काम करत असताना मला अनेक अनुभव आले. कित्येक गॅरंटीयरना मी उध्वस्त झालेले पाहिले आहे. त्यामुळे कर्जाचे फॉर्म भरून घेताना मी कर्जासाठी गॅरंटी देणाऱ्या प्रत्येकाला सावध करत असे.
“ही व्यक्ती कोण लागते तुमची? तुम्हाला खरोखरच भरवसा आहे का यांच्याविषयी? कुठल्याही कारणाने ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर कायद्याने बँक तुमच्याकडून कर्जाची वसुली करून घेऊ शकते. तेव्हा विचार करा. नकार द्यायला मुळीच घाबरू नका.”
माझ्या या चांगुलपणाचे बक्षीस म्हणून काही दिवसांनी माझी या खात्यातून हकालपट्टी झाली. मुळातच कर्ज वाटपामध्ये अनेक राजकीय संबंध गुंतलेले असतात. माझ्या या,आणि इतर गैरवर्तणुकीच्या नकारात्मक भूमिकेमुळे मला डावलण्यात आले अर्थात त्याचे मला अजिबात दुःख नाही.
नकार आणि व्यवहार याचा खूप जवळचा संबंध आहे.” ताट द्यावे पण पाट देऊ नये” असे म्हणतात. बाप आणि मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होतात. मुलांवरील प्रेमासाठी आई-बाप मुलांना सर्वस्व देऊन टाकतात. सगळीच मुले वाईट नसतात पण बहुतांशी अशा आई-वडिलांची झालेली दुर्दशा आपण पाहतोच की. वेळीच नाही म्हणणे हे म्हणून गरजेचे असते.
“नाही कशी म्हणू तुला” या भावनेपायी अनेकांना खूप सोसावं लागलंय. फार जवळचं नातं असतं. केवळ एका नकारापायी मैत्रीचं अगदी रक्ताचं नातंही तुटण्याचा संभव असतो.
कधी कधी समोरचा माणूस इतका लाचार असतो की दयेपोटी किंवा एक संधी याला देऊन बघूया या भावनेने “नाही” म्हणायला मन धजावत नाही पण अशावेळी भविष्यात “उगीच मदत केली” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जसे पूजेत आपण जे अर्पण करतो त्यावर पाणी सोडतो तद्वत, केलेल्या शारीरिक, आर्थिक कुठल्याही मदतीवर पाणी सोडण्याची वृत्ती जरूर बाळगावी. जेणेकरून नंतरचे मन:स्ताप टळू शकतात.
दान देणं, देणाऱ्याचे हातच घ्यावेत, अडचणीत सापडलेल्यास सहकार्य करावे,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले” ही आपली संस्कृती आहे. आपला धर्म. आहे तो पाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे नेहमीच नकार देणं हे योग्य नाही. तो आत्मकेंद्रीपणा ठरू शकतो. स्वतःपुरतं जगणं,” बाकी जगाचं काहीही होऊ दे’ ही भावना मात्र जोपासली जाऊ नये. कधीकधी आपलं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते अशावेळी माघार घेणं हा मात्र पुरुषार्थ नाही.
मात्र आपली शेजारीण, जिच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, मैत्रीचे आहेत पण रोज रोज ती हातात वाटी घेऊन काही ना काही मागायला आपल्या दारी येते. कधी साखर, कधी चहा पावडर, कधी कोथिंबीर आणि असेच काही बाही.. पण कधीतरी आपण तिला नाही म्हणावे ते याकरिता की त्यातूनच तिला तिचा स्वाभिमान टिकवण्याची शिकवण मिळावी अथवा स्वावलंबनाचा धडा मिळावा.
मला एक प्रसंग आठवतो. माझ्या एका जिवलग मैत्रिणीने माझ्याकडे एक दिवस माझ्या सासूने मला दिलेली सोन्याची बोरमाळ मागितली. त्याचे कारण तिने असे सांगितले की,” या लग्नात मला सर्वांसमोर चांगलेच नाकावर टिच्चून मिरवायचे आहे”
ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की तिला मी नाही म्हणणं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होण्यासारखं होतं. तिच्यापेक्षा जास्त मीच निर्णय न घेऊ शकल्यामुळे बेचैन झाले होते. तेव्हा मला माझ्या नवऱ्याने मदत केली. तो म्हणाला,” तुला नक्की कशाची भीती वाटत आहे? तुझी आणि तिची तू नाही म्हटल्यामुळे मैत्री तुटेल की इतकी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचे भय तुला वाटत आहे? कारणं काहीही असू दे पण तू यावेळी ठामपणे नकारच द्यायला हवा आहेस. तू तिला फार तर अशा बेगडी देखाव्यापासून परावृत्त करण्याचा मैत्रीच्या माध्यमातून समंजसपणे प्रयत्न करावास म्हणजे ती ही दुखावली जाणार नाही.”
थोडक्यात नकार देऊ नये आणि नकार देता आला पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र केव्हां नकार द्यावा आणि केव्हां देऊ नये हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ भिडस्तपणा, मुखदुर्बलपणा अथवा संकोचाने चुकीचा निर्णय कधीही घेऊ नये. योग्य वेळी नकार देण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरतो असे म्हणण्यापेक्षा तो बरोबर असतो असे मी म्हणेन.
माझ्या मनात नेहमी येतं युधिष्ठराने त्याच वेळी द्युत खेळण्यास प्रतिस्पर्ध्याला नकार दिला असता तर …
कैकयीने मंथरेचा कपटी उपदेश डावलला असता तर…
सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडण्यास नकार दिला असता तर….
तर कितीतरी अनर्थ टळले असते ना. आपली पुराणे, आपला इतिहास वाचताना वेळोवेळी हा प्रश्न मनात येतो. त्यावेळी मात्र आपण म्हणतो जे व्हायचे ते होतेच. या ईश्वरी योजना असतात, विधीलिखित असते. पण तरीही एक संधी आपल्याजवळ असते. डावलण्याची, वेळीच नकार देण्याची. आणि तो देता आला पाहिजे इतकं मात्र मनापासून वाटतं…
काय करायला हवं होतं?…. काय केलं नाही?…… कोणासाठी केलं?…… असे आणि यांसारखे कितीतरी प्रश्न कानावर आले असतील. नसतील तर या सारखी आनंदाची गोष्ट नाही.
वरच्या अनेक प्रश्नात कधी आपण असे प्रश्न विचारण्याऱ्यांमध्ये असतो. तर कधी ज्यांना प्रश्न विचारले जातात त्यांच्यामध्ये असतो. पण आपण असतोच.
अशा वेळी प्रश्न विचारणारा बऱ्याचदा रागातच असतो. किंवा राग आल्यावरच अशी प्रश्नावली सुरू होते. ज्याला असे प्रश्न विचारले जातात तो देखील रागात असेल तर तिथे सगळं संपतं. आणि सुरू होते ती एक मन अस्वस्थ करणारी शांतता…….. यात कोण चूक कोण बरोबर हा आणखीन एक प्रश्न नंतर असतोच.
पण त्याचवेळी सुरू होतो तो बेरीज वजाबाकीचा खेळ. या खेळात होते ती फक्त चुकांची बेरीज आणि चांगल्या कामाची, वागण्याची नकळत वजाबाकी.
यावेळी उजाळा मिळतो तो फक्त झालेल्या चुकीच्या गोष्टींना. आणि अगदी मागच्या ते अलिकडच्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचला जातो. आणि सगळ्या चुकांची फक्त बेरीज आणि बेरीजच मांडली जाते. हा चुकांच्या बेरजेचा आकडा थोडक्यात उत्तर वाढतच जातं.
आणि चांगल्या गोष्टींची वजाबाकी होते आहे किंवा आपण ती करतोय याची जाणीव रहात नाही. शेवटी चांगल्या कामाचे शून्य फक्त शिल्लक रहात. अगदी काल परवा पर्यंत केलेली चांगली कामं यात मातीमोल ठरतात, किंवा ठरवली जातात.
किंवा त्या चांगल्या कामाची आठवण करून दिली तर……… त्यात काय?…… सगळेच करतात…….. करायलाच पाहिजे…. कर्तव्य आहे ते…… जमत नसेल तरीही जमवाव लागेल…… या प्रकारचीच उत्तर येतात.
असे प्रश्न जिथे जिथे संबंध आहेत, मग ते नात्यातले, मित्रांचे, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्यांचे, शेजारी अशा सगळ्या ठिकाणी होतात. काही वेळा ते योग्य असतील. पण प्रत्येकवेळी ते रास्तच असतील अस नाही. पण त्याचा विचार होत नाही.
या बेरीज वजाबाकीत बऱ्याचदा चुकीच्या कामांच्या बेरीज मध्ये, किंवा चांगल्या कामांच्या वजाबाकीत संबंध दुरावतात. आणि परत एका नात्याची वजाबाकी होते.
अशा प्रसंगी शांतपणे विचार केल्यास खरच लक्षात येइल की आपण चांगल्या कामांची बेरीज आणि चूकांची वजाबाकी केली तर सगळेच नाही पण काही प्रश्न हे प्रश्न न करता सुटतील.
बेरीज आणि वजाबाकी करायचं चिन्ह आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की बेरजेच्या चिन्हासाठी + दोन रेषा लागतात. ज्या परस्परांना मध्यभागी मिळतात. पण वजाबाकीच्या चिन्हात – ती एकटीच असते. त्यामुळे आपण आपसात भेटाव असं वाटलं तर बेरीज करा. आणि एकटच रहायच असेल तर वजाबाकी आहेच.
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरुवातीला मला तिच्या या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटा वळणे शरीराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले. काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा. पण एकंदरीने तेव्हा बाबा, वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा. बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं. जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ, प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या. हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी ‘बाजुला व्हा रे, किती अंगचटीला येता? जरा मोकळी राहू द्या ना मला ! ” असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर, मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता. तो घरी आला की मला भरतं यायचं. मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते, गळामिठी घालते. अशावेळी स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील, मोकळेपणे बोलतील, जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत. त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मीहून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत, मला त्यांचे लाड करू देतात पण…. जाणवतंच काहीतरी..आतल्या आत…!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली, ”किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं ! ”
तिच्या त्या उद्गारात अर्थांचे डोंगर सामावले होते. मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्रदिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ, वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे, मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते. तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया (ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी, मित्र यांनीही भरभरून दाद दिली. हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले, सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता. एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की, माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला, कोणाला लाड करणारा मामा आठवला. कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला. जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरुषांची संख्या जास्त होती.
हेही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण… अजून…
आज सकाळी पावणेआठचा सुमार. बेल वाजली म्हणून दार उघडलं. तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमला घामेजलेला. श्वास फुललेला.
”तुम्ही वैशाली पंडित का?” तिने विचारलं.
”हो. आपण? या ना.. ” मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
” प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ”
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं. एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना, हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
” बाई गं, माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे. कोण तू? का रडतेस?”
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाक डोळे पुसले.
” मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले, मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो, नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्याजवळ थांबत नव्हतो. तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची. सतत पाणी वहायचं. हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो. एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली, या गं जवळ बसा. मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळे पण उघडेना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं. तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते. शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती. आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग केला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो. भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ”
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई, माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवा गाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.— ‘ मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.’
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला, काय बोलले नाही आठवत. इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही, एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही. खरंच कुठे ठेवू तरी मी हे संचित ?
लेखिका : सुश्री वैशाली पंडित
संग्राहिका आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हरवलेली रेल्वेगाडी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
हरवलेली रेल्वेगाडी.
Strange and interesting thing —
— भारताच्या आसाम मध्ये ४३ वर्षापुर्वी हरवलेल्या रेल्वेगाडीची सुरस कथा.
5 डिसेंबर 2019…
आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणार्या नासाच्या एका उपग्रहाने, भारताच्या आसाम मध्ये ईशान्येकडील एका घनदाट जंगलात काहीशी अस्पष्ट, धूसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात एक लांबलचक वस्तू दिसत होती.
हे एखादे लपवून ठेवलेले आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असावे असा प्रथमदर्शनी त्यांना संशय आला व त्यांनी ती छायाचित्रे पेंटागॉनला संरक्षण खात्याकडे पाठवली.
त्यानंतर या क्षेत्रावर अनेक उपग्रह घुटमळू लागले, ज्याची नोंद आपल्या इस्रो, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन विभाग आणि गुप्तचर संस्थांनी घेतली.
दरम्यान पेंटागॉनमधील रशियन आणि चीनी डबल एजंटांनी त्यांच्या देशांतील गुप्तचर संस्थेला, नासाने शोधलेल्या ‘ICBM ट्रेन’ बद्दल माहिती दिली आणि या देशांतील ‘रॉ’च्या एजंट्सकडून ही माहिती भारतात आली.
आता धोक्याची घंटा वाजू लागली. कोणी जाणीवपूर्वक तर हे कृत्य केले नसेल ना? देशाला बदनाम करण्यासाठी एखाद्या विदेशी सरकारचा तर यात हात नसेल ना?
भारतीय पातळीवर चौकशी सुरू झाली.
पंतप्रधान कार्यालय, संरक्षण गुप्तचर संस्था, राष्ट्रीय तपास संस्था, संरक्षण मंत्रालय आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी यात सहभागी झाले.
मिलिटरी स्पेस कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांनी त्या ठिकाणी अशी कोणतीही क्षेपणास्त्रे ठेवली नसल्याचे सांगितले.
पण त्यानंतरची हवाई पाहणी आणि आपले उपग्रह, इंडियन एअरफोर्स आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरने घेतलेले फोटो, या सर्वांनी पुष्टी केली की तेथे खरोखरच एक गाडी उभी आहे.
अखेर, राष्ट्रीय संरक्षण कमांडच्या कार्यालयातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यासह मार्कोस आणि गरुड पथकातील कमांडोंची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली.
जे दृश्य समोर आलं, ते अगदीच अविश्वसनीय होतं!
ईशान्य रेल्वेची, एक संपूर्ण रेल्वेगाडीच तिथे उभी होती…
मागे जाऊन शोध घेतला, तेव्हा समजलं ते असं…
16 जून, 1976…
रेल्वेच्या कामकाजाचा नेहमीसारखाच एक दिवस…
आसाममधल्या ‘तिनसुखीया’ या छोट्याश्या रेल्वे स्थानकावर सकाळी एक रेल्वे मालगाडी आली. तिनसुखीया हे गुवाहाटीपासून 480 किमी पूर्वोत्तर आणि अरुणाचल सीमेपासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे.
प्लॅटफॉर्म तसा छोटाच, एकावेळी फक्त दोन रेल्वे गाड्या उभ्या राहतील, एवढाच!
रेल्वे गाडीतील सर्व माल उतरवल्यावर रेल्वे गाडी तिथून हटवणं भाग होतं, कारण पुढील अर्ध्या तासात त्याच रेल्वे ट्रॅकवरून गुवाहाटीला जाणारी एक्सप्रेस येणार होती.
रेल्वे इंजिन ड्रायव्हरला, रेल्वेगाडी सायडिंगला लावण्याचा आदेश दिला गेला.
पण सर्वात जवळचं सायडिंग होतं तिथून 3 किलोमीटर लांब. सायडिंग साठी ती रेल्वेगाडी तिथपर्यंत गेली. 16 जून 1976 रोजी सकाळी 11:08 वाजता गाडी तेथे पोहोचल्याचे रेल्वेच्या नोंदीवरून दिसून आले.
डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक ड्रायव्हरने , सायडिंग ठिकाणी रेल्वेगाडी पार्क केली, व तो परत चालत चालत चालत पुन्हा ‘तिनसुखीया रेल्वेस्थानकावर’ आला.
आणि..
त्याच दिवशी अर्ध्या तासातच म्हणजे सकाळी 11:31 वाजता मुसळधार पाऊस आला आणि काहीच तासांत तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रेल्वे बोर्डाने केलेल्या चौकशीतून असे दिसून आले की, त्यावेळेस स्थानिक रेल्वे कर्मचारी वाहतूक सातत्य राखण्यात, ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आणि पुराच्या समस्येला तोंड देण्यात पूर्णपणे गुंतले होते. जवळपास संपूर्ण रेल्वेस्टेशन 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले होते.
येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या जागच्या जागी ठप्प झाल्या होत्या. गावकऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रशासनाने त्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले व वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची जाण्याची सोय केली.
या सर्व गडबडीत बरेच दिवस निघून गेले. रेल्वे स्टेशनमास्तरांची बदली झाली. पुढील काही महिन्यांत बरेचसे रेल्वे कर्मचारीही बदलले.
आपली एक रेल्वेगाडी सायडिंगला उभी आहे, याचा सर्वांना विसर पडला.
सायडिंगची जागाही तशी निर्जन!
लोकांचं त्या बाजूला फारसं जाणं येणंही नव्हतं. हळूहळू झाडांनी संपूर्ण परिसर व्यापला. क्वचितच वापरल्या जाणार्या साइडिंगकडे जाणार्या रेल्वेट्रॅकचे अवशेष; जे पुरात वाहून गेले होते; लवकरच झाडे झुडुपे आणि तणांच्या जंगलात रेल्वेगाडी दिसेनासे झाले. तेथील साप, पक्षी आणि वन्य प्राण्यांना आयतंच एक घर मिळाले होते, त्यांचा मुक्त वावर तेथे रेल्वेगाडीत होता.
बराच काळ लोटला. तेथील उरले सुरले जुने रेल्वे कर्मचारीदेखील निवृत्त झाले, तर काहींचे निधन झाले. या सायडिंग बाजुला डोंगरात लावलेल्या रेल्वेगाडीची आठवण कोणालाच नव्हती.
डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक, तिनसुखीयाच्या घटनेनंतर, तीन महिन्यातच सप्टेंबर 1976 मध्ये, भारतीय रेल्वे सोडून तो ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला.
नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या त्या चित्राने त्या सायडिंग रेल्वेगाडीचा तर शोध लागलाच, पण यासाठी कामाला लागलेल्या सर्व संरक्षण पथकांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला.
खरोखरच जर तिथे काही आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल सापडले असते तर, साऱ्या जगाला तोंड द्यावे लागले असते.
सलग 43 वर्षे ह्या सायडिंग लावलेल्या रेल्वेगाडीबद्दल भारतात कोणालाच काही माहीत नव्हते, हे जगातले कितवे आश्चर्य?
☆ आदिशक्ती परमेश्वर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
एकदा एका अत्यंत श्रीमंत इस्रायली माणसाची टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली.
मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की, “त्यांच्या आयुष्यात अशी कोणती घटना घडली, की ज्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले?”
ते म्हणाले, “एकदा मी रस्त्यावर फिरत असताना अचानक मला एका इस्पितळाच्या बाहेर झाडाखाली बसलेला एक माणूस दिसला. त्याने हात जोडून डोळे मिटले होते. पण त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि तो प्रार्थनेत पूर्णपणे गढून गेला होता.
त्याची प्रार्थना पूर्ण होण्याची मी धीराने वाट पाहत राहिलो. मग मी त्याला विचारले की “तुम्ही इतके अस्वस्थ आणि दुःखी का आहात?”
त्याने सांगितले, ” मला पत्नीच्या ऑपरेशनसाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज आहे, अन्यथा ती मरेल.”
मी विचारले, “तुम्ही देवाकडे मदत मागत होतात का?”
तो म्हणाला, “हो.मी फक्त माझ्या देवाची प्रार्थना करत होतो.”
योगायोगाने माझ्याकडे त्यावेळी खूप पैसा होता. म्हणून मी त्याला एक लाख रुपये दिले.
त्याने लगेच डोळे मिटले आणि मान वाकवून देवाचे आभार मानले आणि मी केलेल्या मदतीबद्दल माझेही आभार मानले.
त्याच्या हावभावाने मी खूप प्रभावित झालो आणि मी त्याला माझे कार्ड दिले, ज्यावर माझा वैयक्तिक फोन नंबर आणि वैयक्तिक ईमेल लिहिलेला होता.
मी त्याला म्हणालो, ‘कधीही तुला आणखी कशाची गरज असेल, तू फक्त मला फोन कर. तुझ्याकडे मदत येईल.’
पण त्याने माझे कार्ड आणि प्रस्ताव दोन्ही नाकारले.”
अब्जाधीश पुढे म्हणाले, “त्याने सांगितलेले कारण ऐकून माझे आयुष्य बदलले.तो म्हणाला, ‘मला तुमचा वैयक्तिक फोन नंबर आणि ईमेल पत्ता दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण जेव्हा जेव्हा मला कशाचीही गरज असेल तेव्हा मी तुम्हाला बोलावणार नाही तर माझ्या हृदयात बसलेल्या माझ्या रामाला, ज्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला बोलवीन.’
त्याच्या रामावरच्या गाढ श्रद्धेने क्षणात माझ्या अहंकाराचे तुकडे केले.
कोणत्यातरी शक्तीने मला तिथं आणलं, असा विचार करायला भाग पाडलं आणि त्याला मदत करून मला खूप आनंद झाला. तेव्हापासून जेव्हा मी कोणाला मदत करतो, तेव्हा मी लगेच त्या देवाचे आभार मानतो ज्याने मला यासाठी पात्र मानले.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्येष्ठ कवयित्रीबहिणाबाई चौधरी यांच्या या काव्य ओळी किती अर्थ पूर्ण आहेत. सुगरण पक्ष्यांच्या घरट्याचं वर्णन वरील काव्यपंक्तीत बहिणाबाई यांनी केलं आहे. या निसर्गात इवले इवले पक्षी काडी-काडी जोडून,वनस्पतींचेधागे, कापूस असं काही -बाही साहित्य वापरून ही घरटीबांधतात. ही घरटी तर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असंतात असं म्हणावं लागेल. पक्षां पासून प्राण्यांपर्यंत सर्व आपापल्या ताकदीनुसार निवारा निवडतात. माणूस तरी त्याला कसा अपवाद असेल.
माणसे कष्टातून,पै पै साठवून घर बांधतात. अर्थात आपल्या ऐपती प्रमाणे.ज्या घरात आपले मातापिता,भावंडे आजी आजोबा,नातेवाईक असतील ते घर आपले असते. अगदी हक्काचे. कारण या घरात प्रेम आपुलकी, माया,मिळते. घर झोपडी असो वा बंगला….. पण तिथं जर आपलेपणा असेल तरच ते हवंहवंसं वाटतं.
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम, जिव्हाळा
नकोत नुसती नाती
या काव्यपंक्ती किती अर्थपूर्णआहेत. नाती सुध्दा प्रेमानं, मायेनं फुलतात. अशा घरांत आपुलकी असते.
पण सध्या एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते,प्रत्येक जणआपापल्या विश्वात दंगअसतो.इंटरनेटच्या महाजालानं सारं जग आप ल्या मुठीत आलं आहे.पण मनात, नात्यांत दऱ्या निर्माण होत आहेत.
ही आभासी दुनियाच वास्तव आहे असं वाटू लागलंआहे. मुलंआपल्या घरातील आईबाबा आजी आजोबा यांच्यासह वेळ घालवताना दिसतच नाहीत. हातातल्या छोट्या स्क्रीन मध्ये प्रत्येक जण डोकं घालून बसलेला दिसतो.व्हाँटस्अप च्या मेसेज मधूनच हल्ली तिळगुळ, दसऱ्याला सोन्याची देवाणघेवाण होते. कुणाला कुणाशी बोला यला वेळच नाही. आपसा तील संवादच हरपत चालले आहेत. मोबाईल, लँपटाँप वापरणंही गरजे चं आहे ही गोष्ट खरी असली तरी दिवसातील थोडा वेळ जेवण,नाश्ता, सकाळचा चहा यावेळी तरी एकमेकांशी मोकळे पणानं बोललं पाहिजे.
तरच नात्यांची जपणूक होईल आणि भावबंध दृढ होतील. मग आपलं घर *रेशमीघरटं*नक्कीच बनेल.
साडीचे टेक्श्चर थोडं कडकच होतं…निऱ्या नीट बसेनात, माझी आपली कसरत चालूच…खाली मान घालून मोडायची वेळ आली तरी साडी काही मनासारखी नेसली जाईना. कॉलमध्ये व्यग्र असलेली लेक…कानात हेडफोन्स् घालून धावत आली..हाताने खूण करत तिने पटकन निऱ्यांच्या चुण्या हातात घेतल्या आणि मांडी घालून मस्तपैकी खाली बसली. एक एक चुणी दोन बोटांच्या चिमटीत धरुन एकसारखी निरीवर निरी घालत तिने सगळ्या निऱ्या सेफ्टीपिनेत अडकवून दोन मिनिटांत नेटकी साडी नेसायला मला मदत केली.
हुश्श…मी एकदम रिलॅक्स झाले. क्षणभर या आवडलेल्या साडीऐवजी दुसरी साडी नेसून मोकळं व्हावं असंही वाटून गेलं. पण शेवटी लेकच ती…मनातलं सगळं जाणणारी… अगदी ऐनवेळी मदत करुन नामानिराळी होणारी…
तिचा कॉल म्यूट करत तिने, मी बांधलेल्या पोनीवर ही आक्षेप घेतला. “ इतकी छान साडी नेसलीस तर ते केस का आवळून बांधतेस…सोड जरा मोकळे….मी छानपैकी क्लचर लावून देते.” तिने डोक्याचा देखील ताबा घेतला. मी अगदी दहा वर्षाच्या पोरीसारखी तिच्यापुढं उभी राहिले, “ कर बाई तुला माझं काय करायचं आहे ते. ऑफिस चालू आहे हे मात्र विसरु नकोस,म्हणजे झालं !”
तिने मॅचिंग क्लचर मध्ये केस सैलसर अडकवून दिले…हलकीशी लिपस्टिक ओठावर ओढली…आणि माझी हनुवटी दोन बाजूस फिरवून…’ हं नाऊ ओके…जा आता…’ चा इशारा दिला.
तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून गेलं.आणि ती … “ मोठी गबाळी पर्स खांद्यावर टांगून जाऊ नकोस, एखादी वन साईड नाजुक पर्स घे, पैसे मोबाईल बसतील अशी.. तू म्हणजे ना कशावर काहीही करत असतेस.”
कोण कुणाची आई आहे हेच क्षणभर मला विसरायला झालं. “ आई छान रहावं ग…तू अशी छान असलीस की मलाही छान वाटतं…”
“अग गधडे…हेच लहानपणी मला तुमच्याकडून अपेक्षित असायचं..पण आम्हाला धुडकावून तुम्ही कधी ऐकलंत का आमचं?”
मला एकदम लहानपणीची हीच ती लेक आठवून गेली. खेळ,शाळा, अभ्यासातून वेळ मिळत नसताना, तिला असं आवरून देताना, माझ्या आईपणाला असंच भरतं येत असे. ती वैतागायची…बाहेर मैत्रिणी उभ्या असायच्या…” तू बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस ना आई… “ तिचा सूर चिडका व्हायचा. “ नीट आवरून सावरून जावं ग बाहेर पडताना…” मी आपली सूचनावजा एखादं वाक्य टाकायची.पण त्या फटकुऱ्या जुनाट जीन्स् अन् वर ते टिचभर झबलं अडकवून, त्यांना धावायची कोण घाई असायची.
“ नको ग घालूस त्या रंग उडालेल्या जीन्स ,कसं दिसतं ते जुन्या बाजारातून आल्यासारखं….!”
“ आई हीच फॅशन आहे…आणि कंफर्टेबल पण असतात. तुमचा आणि आमचा फॅशन सेन्स फार वेगळा आहे… “ आपली बोलती बंदच !
सवयीने जुनीच, समोर असलेली चप्पल पायात अडकवली…तिचं लक्ष होतंच ….
“ नवीन घेतलेल्या मोजड्या घाल पायात…ते जुनं पादत्राण फेकून दे आता…!”
जाता जाता…एक बाण आलाच.
मी बाहेर पडताना…हळूच तिच्या कानाशी कुजबुजले… “ समजलं…कसं वाटतं ते ! माझीही अशीच चिडचिड होते, तुझा जीन्समधला अवतार बघून….कर्मा रिटर्न्स हं !”
ती मनापासून हसली…” आई तू पण ना….. “
लेखिका : सुश्री सौ विदुला जोगळेकर
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “एक अद्भुत अनुभव – नामस्मरणाच्या शक्तीचा…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
— अनेस्थेशियाशिवाय शस्त्रक्रिया
“We dare.. we care“
हे वाक्य खरेतर सर्व डॉक्टरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आम्ही सर्वजण रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीच नेहमी प्रयत्न करीत असतो. परंतु पेशंटच्या आग्रहाखातर काही वेळेस आम्हाला अधिकच धैर्य दाखवून उपचार करावे लागतात. असाच एक मला आलेला अनुभव येथे आपणास कथन करीत आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल आमच्या गुरुदेव रानडे संप्रदायातील एक निष्ठेने नामसाधना करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक श्री दादा तेंडुलकर मानेवर एक मोठे काळं पुडीबेंड (Carbuncle with Abscess) झाल्यामुळे सुश्रुत हॉस्पिटल चिंचवड येथे डॉक्टर कानिटकरांकडे ऍडमिट होते. डॉक्टर कानिटकर यांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून मला सर्जन म्हणून त्यांचे ऑपरेशन करण्यासाठी बोलावले होते. मी त्यांना तपासले व बेंण्ड अर्थातच खूप मोठे असल्यामुळे त्यांना शस्त्रक्रियाही पूर्ण भूल ((General Anaesthesia) देऊन करावी लागेल असे सांगितले. मानेचा बराच भाग खराब झाल्याने व त्यामध्ये पू (pus) झाल्याने लोकल अनेस्थेशिया देणे सुद्धा शक्य नव्हते. 80 वर्ष वय,आटोक्यात नसलेला मधुमेह, ब्लड प्रेशर,वगैरे सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास भूलेमध्ये व शस्त्रक्रियेत असलेला सर्व धोका त्यांना व नातेवाइकांना समजावला. जखम भरण्यास वेळ लागेल हे देखील सांगितले होते.
“डॉक्टर तुम्ही माझे ऑपरेशन भूलेशिवाय निर्धास्तपणे करावं .. मला काही होणार नाही, मी मान देखील हलवणार नाही. मला भूलही नको आणि वेदनाशामक इंजेक्शनही नको. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी मात्र तुम्ही मला ‘ आता मी सुरु करणार आहे ‘ असे सांगा. मग मी अगदी स्तब्ध राहीन आणि माझे नामस्मरण चालू ठेवीन “ असे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितले.
डॉक्टर अस्तिक कानिटकर यांसारख्या अत्यंत अनुभवी भूलतज्ञ डॉक्टरांकडूनही भूल घेण्यास ते अजिबात तयार नव्हते अथवा कोणतेही इंजेक्शन घेण्यास तयार नव्हते. बेंड खूप मोठे होते व त्यांना दुखल्यास आणि त्यांनी मान हलवल्यास जवळपासच्या मानेच्या महत्वाच्या नसा, रक्तवाहिन्यांना इजा होण्याचा धोका होता. कितीही समजावून सांगितले तरी दादा अनेस्थेशियासाठी तयार होईनात. तेव्हा सर्व धोका पत्करून High risk consent घेऊन इमर्जन्सी सर्व इंजेक्शन वगैरे तयार ठेवून त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेतले. एका कुशीवर त्यांना झोपवले. पेंटिंग, ड्रेपिंग, वगैरे सर्व तयारी करून ‘ दादा मी आता ऑपरेशन सुरू करतो ‘असे सांगितले.
“ ठीक आहे. तुम्ही सर्व ऑपरेशन निर्धास्तपणे व्यवस्थित करा व संपले की मला सांगा. तोपर्यंत मी मान हालवणार नाही “ असे म्हणून त्यानी डोळे मिटून त्यांचे नामसाधन शांतपणे चालू ठेवले. त्यांचे बेंड कापून त्यातील सर्व पू व खराब भाग काढून टाकून नंतर औषधांची पट्टी भरेपर्यंत जवळपास अर्ध्या तासाने आता त्यांना ऑपरेशन संपले आहे असे सांगितले. संपूर्ण ऑपरेशन संपेपर्यंत डॉक्टर कानेटकर मॉनिटरवर त्यांचे parameters पहात होते, एकदाही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. तसेच पेशंटला कोणतेही वेदनाशामक अथवा भुलीचे इंजेक्शन द्यावे लागले नाही.
“ संपले का ऑपरेशन ? हरकत नाही “ असे सांगताना त्यांच्या डोळ्यात ना अश्रू होते ना चेहऱ्यावर दुःखी भाव होते. ते सर्व पाहून आम्ही दोघेही नतमस्तक झालो. नंतरच्या ड्रेसिंगच्या वेळेस देखील त्यांनी कधीही हू का चू केली नाही.
सद्गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामाचे अत्यंत निष्ठेने, चिकाटीने, सातत्याने अंतकरणापासून साधन केल्यास गुरुकृपेने विज्ञानाला देखील अगम्य असलेल्या सुप्त शक्ती साधकाला प्राप्त होतात व ईश्वर साक्षात्कारही होतो असे श्री गुरुदेवांनी व आपल्या संतांनी अनुभवातून सांगितलेल्या गोष्टींची अशी त्यांच्या शिष्यांकडून प्रचिती मिळते तेव्हा आपली श्रद्धा नक्कीच द्विगुणित होते. संत रामदासांनी दासबोधात नामस्मरण भक्ती समासात म्हटलेच आहे —
नामे विघ्ने निवारती , नामे संकटे नासती,
नामे होय उत्तम गती अंतकाळी.
……I feel that we doctors should accept —–
— We dare..We care & HE (God) CURES..
लेखक : डॉक्टर संजीव दात्ये
जनरल सर्जन, चिंचवड.
लेखक : डॉ. डी. जी. लवेकर
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दृष्टांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत.
यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले.
त्या वेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते, ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करीत राहिले.
म्हणून रामायण वाचताना शत्रुघ्नाच्या निस्सीम कार्याकडे आपण आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे.
कल्पना करा की,
राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ वनात आहेत.
बंधू भरत नंदिग्रामात आहे.
चौदा वर्षेपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे.
ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे.
तुम्ही राजनीतिशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतिशास्त्रामधे राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते.
राजनीतीप्रमाणे -असा एकही दिवस नसावा, ज्या दिवशी राजा नाही.
अयोध्येला चौदा वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदिग्रामात बसलेले होते .
दोघे भाऊ वनात होते .
वडील स्वर्गाला गेले.
मग अयोध्येचे राज्य चौदा वर्षे कोणी सांभाळले?
ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते.
काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल.
शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायचे होते .
प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न होती . कौसल्यामाता रात्रंदिवस अश्रुपात करत होती.
कैकयीमाता अंत:करणातून दग्ध होती. तिला आपल्या कर्माचा पश्चात्ताप होत होता .
ऊर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नव्हता .
मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदिग्रामात होता . पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नव्हती .
थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे.
अयोध्येचे संपूर्ण कुटुंब, राज्य आणि सेना त्याने चौदा वर्षं सांभाळली.
आणि एवढे करूनही चौदा वर्षांनंतर रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वांत पुढे नाही.
पुढे गुरुदेव वसिष्ठ गेले .
नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत गेला .
भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम-भरत-भेटीचे वर्णन करतात.
पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही.
ही मंडळी फोटोकरता नाहीतच.
पण ते फोटोत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी काही काम केले नाही, असे म्हणणे कृतघ्नपणा आहे.
एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात. भिंतीकडे पाहतात. सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही.
हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही. फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभे राहील?
इतके सुंदर मंदिर उभे आहे, कारण पायातले दगड स्वत:ला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत.
म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो. त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे.कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले आहे.
आपल्या व्रताचे पालन करताना १४ वर्षात बेसावध क्षणी देखील सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही.
वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे.
नंदिग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे.
पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंत:करणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे.
आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही.
जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा.
त्या पायाखालच्या दगडाला आठवा. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल.
मी सगळी कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन. पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का?
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर