श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेली रेल्वेगाडी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हरवलेली रेल्वेगाडी.

Strange and interesting thing — 

— भारताच्या आसाम मध्ये ४३ वर्षापुर्वी हरवलेल्या रेल्वेगाडीची सुरस कथा. 

5 डिसेंबर 2019…

आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणार्‍या  नासाच्या एका उपग्रहाने, भारताच्या आसाम मध्ये ईशान्येकडील एका घनदाट जंगलात काहीशी अस्पष्ट, धूसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात एक लांबलचक वस्तू दिसत होती.

हे एखादे लपवून ठेवलेले आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असावे असा प्रथमदर्शनी त्यांना संशय आला व त्यांनी ती छायाचित्रे पेंटागॉनला संरक्षण खात्याकडे पाठवली.

त्यानंतर या क्षेत्रावर अनेक उपग्रह घुटमळू लागले, ज्याची नोंद आपल्या इस्रो, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन विभाग आणि गुप्तचर संस्थांनी घेतली.

दरम्यान पेंटागॉनमधील रशियन आणि चीनी डबल एजंटांनी त्यांच्या देशांतील गुप्तचर संस्थेला, नासाने शोधलेल्या ‘ICBM ट्रेन’ बद्दल माहिती दिली आणि या देशांतील ‘रॉ’च्या एजंट्सकडून ही माहिती भारतात आली.

आता धोक्याची घंटा वाजू लागली. कोणी जाणीवपूर्वक तर हे कृत्य केले नसेल ना? देशाला बदनाम करण्यासाठी एखाद्या विदेशी सरकारचा तर यात हात नसेल ना?

भारतीय पातळीवर चौकशी सुरू झाली.

पंतप्रधान कार्यालय, संरक्षण गुप्तचर संस्था, राष्ट्रीय तपास संस्था, संरक्षण मंत्रालय आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी यात सहभागी झाले.

मिलिटरी स्पेस कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांनी त्या ठिकाणी अशी कोणतीही क्षेपणास्त्रे ठेवली नसल्याचे सांगितले.

पण त्यानंतरची हवाई पाहणी आणि आपले उपग्रह, इंडियन एअरफोर्स आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरने घेतलेले फोटो, या सर्वांनी पुष्टी केली की तेथे खरोखरच एक गाडी उभी आहे.

अखेर, राष्ट्रीय संरक्षण कमांडच्या कार्यालयातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यासह मार्कोस आणि गरुड पथकातील कमांडोंची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली.

जे दृश्य समोर आलं, ते अगदीच अविश्वसनीय होतं!

ईशान्य रेल्वेची, एक संपूर्ण  रेल्वेगाडीच तिथे उभी होती…

मागे जाऊन शोध घेतला, तेव्हा समजलं ते असं…

16 जून, 1976…

रेल्वेच्या कामकाजाचा नेहमीसारखाच एक दिवस…

आसाममधल्या ‘तिनसुखीया’ या छोट्याश्या रेल्वे स्थानकावर सकाळी एक रेल्वे मालगाडी आली. तिनसुखीया हे गुवाहाटीपासून 480 किमी पूर्वोत्तर आणि अरुणाचल सीमेपासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे.

प्लॅटफॉर्म तसा छोटाच, एकावेळी फक्त दोन रेल्वे गाड्या उभ्या राहतील, एवढाच!

रेल्वे गाडीतील सर्व माल उतरवल्यावर रेल्वे गाडी तिथून हटवणं भाग होतं, कारण पुढील अर्ध्या तासात त्याच रेल्वे ट्रॅकवरून गुवाहाटीला जाणारी एक्सप्रेस येणार होती.

रेल्वे इंजिन ड्रायव्हरला, रेल्वेगाडी सायडिंगला लावण्याचा आदेश दिला गेला.

पण सर्वात जवळचं सायडिंग होतं तिथून 3 किलोमीटर लांब. सायडिंग साठी ती रेल्वेगाडी तिथपर्यंत गेली. 16 जून 1976 रोजी सकाळी 11:08 वाजता गाडी तेथे पोहोचल्याचे रेल्वेच्या नोंदीवरून दिसून आले. 

डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक ड्रायव्हरने , सायडिंग ठिकाणी रेल्वेगाडी  पार्क केली,  व   तो परत चालत चालत चालत  पुन्हा  ‘तिनसुखीया रेल्वेस्थानकावर’  आला.

आणि..

त्याच दिवशी अर्ध्या तासातच  म्हणजे सकाळी 11:31 वाजता मुसळधार पाऊस आला आणि काहीच तासांत तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रेल्वे बोर्डाने केलेल्या चौकशीतून असे दिसून आले की, त्यावेळेस स्थानिक रेल्वे कर्मचारी वाहतूक सातत्य राखण्यात, ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आणि पुराच्या समस्येला तोंड देण्यात पूर्णपणे गुंतले होते. जवळपास संपूर्ण रेल्वेस्टेशन 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले होते.

येणाऱ्या  सर्व रेल्वेगाड्या  जागच्या जागी  ठप्प झाल्या होत्या.  गावकऱ्यांच्या मदतीने  रेल्वे प्रशासनाने  त्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले व वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची जाण्याची सोय केली.

या सर्व गडबडीत बरेच दिवस निघून गेले. रेल्वे स्टेशनमास्तरांची बदली झाली.  पुढील काही महिन्यांत बरेचसे रेल्वे कर्मचारीही बदलले.

आपली एक रेल्वेगाडी सायडिंगला उभी आहे, याचा सर्वांना विसर पडला.

सायडिंगची जागाही तशी निर्जन!

लोकांचं त्या बाजूला फारसं जाणं येणंही नव्हतं. हळूहळू झाडांनी संपूर्ण परिसर व्यापला. क्वचितच वापरल्या जाणार्‍या साइडिंगकडे जाणार्‍या रेल्वेट्रॅकचे अवशेष;  जे पुरात वाहून गेले  होते;  लवकरच झाडे झुडुपे आणि  तणांच्या जंगलात   रेल्वेगाडी  दिसेनासे झाले.  तेथील साप, पक्षी आणि वन्य प्राण्यांना आयतंच एक घर मिळाले होते,  त्यांचा मुक्त वावर तेथे रेल्वेगाडीत होता.

बराच काळ लोटला. तेथील उरले सुरले  जुने रेल्वे कर्मचारीदेखील निवृत्त झाले, तर काहींचे निधन झाले.  या  सायडिंग बाजुला डोंगरात लावलेल्या  रेल्वेगाडीची  आठवण   कोणालाच  नव्हती. 

डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक, तिनसुखीयाच्या घटनेनंतर, तीन महिन्यातच  सप्टेंबर 1976 मध्ये, भारतीय रेल्वे सोडून तो ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला.

नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या त्या चित्राने त्या  सायडिंग रेल्वेगाडीचा  तर शोध लागलाच, पण यासाठी कामाला लागलेल्या सर्व संरक्षण पथकांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला.

खरोखरच जर तिथे काही आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल सापडले असते तर,  साऱ्या जगाला तोंड द्यावे लागले असते.

सलग 43 वर्षे ह्या  सायडिंग लावलेल्या रेल्वेगाडीबद्दल भारतात कोणालाच काही माहीत नव्हते,  हे जगातले कितवे आश्चर्य?

आहे का नाही अजब कारभार !!!

लेखक :  सौरभ रत्नपारखी

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments