मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 2  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 2  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

(ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..) इथून पुढे —–

सगळ्या डॉक्टरांनी खोऱ्यानं पैसा ओढण्याचा जमाना गेलाय.. खोऱ्या घेऊन बसलेले फक्त पाच-दहा टक्के डॉक्टर उरलेत, आणि समाजाला तेवढेच दिसतात..  अलीकडं नवीन बाहेर पडलेल्या बहुतांश डॉक्टर्ससाठी खोऱ्या तर नाहीच आहे, उलट पेशंट्स मिळणं मुश्किल झालंय.. त्यात तुम्ही स्पेशालिस्ट / सुपर स्पेशालिस्ट असाल तर आणखी अवघड आहे.  पिताजींचा पैसा असेल तरच निभावून नेता येतं, नाहीतर मग कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन होण्याशिवाय पर्याय नाही.. 

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सना तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन व्हावंच लागतं, कारण त्यांना लागणाऱ्या मशिनरीज ची कोटीतली इन्व्हेस्टमेंट ते सुरुवातीला करूच शकत नाहीत..  मग हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन खोऱ्यानं ओढताहेत..  खोऱ्या आता तिकडे शिफ्ट झालाय, असं आपण म्हणू शकतो.. म्हणून तर बडे उद्योगपती आणि उद्योगसमूह आता हेल्थकेअर सेक्टर मध्ये उतरू लागलेत. फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांची चलती सुरू आहे..  गेल्या दहा वर्षात हा बदल इतक्या झपाट्यानं झालाय की पुढच्या दहा वर्षात परिस्थिती काय असू शकते हे आपण इमॅजिनच नाही करू शकत !!

ह्या व्यवसायातून मिळणाऱ्या Job satisfaction चं गणित देखील बिघडलंय..  ‘डॉक्टर तुमच्या हातात आमचा पेशन्ट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा, बाकीचं आमचं नशीब ‘ असं म्हणणारे नातेवाईक आता उरले नाहीत..  एखादी केस हँडल करत असताना तुम्हाला होणारा स्ट्रेस, आणि तो पेशन्ट बरा झाल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान, याचं गुणोत्तर व्यस्त झालंय.  त्यातच  ‘ मग डॉक्टरनं काय फुकट केलं काय? ‘ अशा पद्धतीची सर्टिफिकेटस् तुमचा सगळा उत्साह पहिल्या एक दोन वर्षातच घालवतात..

आता, जरी वैद्यकीय तपासण्या आणि उपकरणं अद्ययावत झाली असली तरी प्रत्येक केसमधली “सोशल रिस्क” खूपच वाढलीये.. त्यामुळं कितीतरी डॉक्टर्सना कमी वयातच ब्लड प्रेशर , डायबेटीस, हृदयरोग, arthritis, spondylosis अशा आजारांचा सामना करावा लागतोय. Quality of life आणि सरासरी आयुर्मान घटतेय.. क्रिटिकल केअर मधल्या डॉक्टर्सचं morbidity आणि mortality चं प्रमाण तर लक्षणीयरित्या वाढलंय..  हे इमर्जन्सी हँडल करणारे डॉक्टर्स तर रोज खूप मानसिक थकतात.. किंवा मग लवकर त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, किंवा काही दिवसांनी क्रिटिकल पेशंट्स घेणे बंद करतात, किंवा खूप साऱ्या व्याधी स्वतःला घेऊन लवकर मरतात.. “प्रोफेशनल हझार्ड” आहे हा.. सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येणं शक्यच नाही..  खूप प्रयत्न चालू असलेल्या पेशंटच्या साधं लॅब टेस्टस जरी आपल्या मनासारख्या आल्या नाहीत तरी मन बेचैन होतं..  बेडवर शांत झोपलेल्या पेशंटची दोन सेकंद पल्स जरी लागली नाही , तर अंगात जी भयाची वीज चमकून जाते त्याची काय किंमत पैशात होईल का? साईडरूम मध्ये गाढ झोपलेलं असतानाही मॉनिटरच्या अगदी छोट्याश्या अलार्मने पण जाग येते, आणि दिवसभरात जो थोडा थोडा “ऍड्रेनॅलीन सर्ज” होत राहतो, आणि शरीरावर विपरीत परिणाम करत राहतो, त्याची भरपाई पैशांत होऊच शकत नाही..

डॉक्टर स्त्रिया तर जास्तच भावनिक असतात. नवरा पण डॉक्टर असेल तर तो तिचे ताण समजू तरी शकतो, पण नॉनमेडीको व्यक्तीला तिचे ऑन-कॉल त्रास देतात, इमर्जन्सीज नकोसे वाटतात, मूड स्विंगज् टॉलरेट होत नाहीत.. हॉस्पिटल मधून एक फोन आला अन हिचा मूड एवढा का गेला, हे सांगितलं तरी कळू शकत नाही.. आपली जवळची नॉनमेडीको व्यक्तीच सर्वकाळ समजून घेऊ शकत नाही, तर मग परक्या समाजाकडून तर अपेक्षाच नाही..  

तुम्हाला वाटेल , ‘काय हा सगळं निगेटिव्हच बोलतोय’, पण बाहेरच्या अनेक देशांत देखील  मेडिकल फिल्ड हे least preferred क्षेत्र आहे.. युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई सगळीकडे MBBS करण्यापेक्षा इतर कोर्सेस निवडण्याला जास्त प्राधान्य आहे.. तरी तिथं डॉक्टरला मारहाण शिवीगाळ हा भाग अजिबातच नाहीये!.. पण जिथं ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ला खूपच जपलं जातं, तिथं हे असं अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम शिकण्यात आयुष्याची बारा पंधरा वर्षे घालवायची, प्रत्येक पेशन्ट ट्रीट करताना अथवा ऑपरेशन करताना मरणाचा स्ट्रेस घ्यायचा, ऑन कॉल्स इमर्जन्सीज ह्यात स्वतःचं आयुष्य बेभरवशाचं करून घ्यायचं, कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची वाताहत करायची, आणि personal happiness बाजूला ठेवून मन मारून जगायचं, हे असलं आयुष्य कोणाला आवडणार आहे बरं?  त्यामुळं बऱ्याच प्रगत देशातली मुलं MBBS घेतच नसल्यामुळं भारतातून डॉक्टर्स आणि नर्सेसना अशा ठिकाणी मागणी आहे..

असो..

हॉस्पिटलमधल्या दुःखमय आणि निगेटिव्ह वातावरणात दिवसभर वावरून देखील तिथल्या कुठल्याच स्ट्रेसचं प्रतिबिंब घरात पडू न देणं, आणि घरच्या प्रापंचिक गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊ न देणं यासाठी प्रत्येक डॉक्टर झगडत असतो… डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच आहे.. एक बटन दाबलं आणि ‘मूड चेंज’ केला, असं होत नाही.. आणि ते सोपंही नाही.. मग ‘भावनिक फरफट’ होत राहते.. त्यामुळं हळव्या स्वभावाच्या माणसाचे तर अजूनच हाल होतात.. स्थितप्रज्ञता ही गोष्ट प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि ती प्रत्येकवेळी जमेल असंही नाही.. 

असो..

समाजात ‘रिस्की जॉब्ज’ बरेच आहेत, जसं की वैमानिक, सैनिक, फायर फायटर, वगैरे.. पण आता ते बऱ्यापैकी Predictable आणि safe आहेत, आणि समाजातही त्यांच्याबद्दल इज्जत आहे.. पण डॉक्टरच्या हातात कोणाच्यातरी जीवन-मरणाचा प्रश्न रोजच असतो.. एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे ‘नोबल’ काम आणि त्यातून मिळणारा आनंद कुठलाच नाही.. पण कॉम्प्लिकेशन्स झाले तर मात्र तुमचं काही खरं नाही, अशी परिस्थिती असेल, तर यासारखं discouraging ही काही नाही.. तुम्हाला भयमुक्त वातावरणात काम करता येत नसेल, तर त्या job satisfaction ला ही काहीच अर्थ उरत नाही..  फुटबॉल मॅचमध्ये जसं गोलकीपरने किती गोल वाचवले ह्यापेक्षा त्या मॅचमध्ये किती गोल झाले हेच लक्षात राहतं, तसंच एखाद्या डॉक्टरच्या हातून किती लोक मरणाच्या दारातून बरे होऊन गेले यापेक्षा, दगवलेला एखादा रुग्ण डॉक्टरची आतापर्यंतची सगळी प्रॅक्टिस, मेहनत आणि नाव पाण्यात घालवू शकते.. आणि तेही, ज्या गोष्टी डॉक्टरच्या हातात नाहीत त्यासाठी!! 

कॉम्प्लिकेशन्स हे कधीही होऊ शकतात, बऱ्याचदा ते डॉक्टरच्याही हातात नसते. फारतर त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे एवढंच ते करू शकतात.. याची समज हळूहळू कमी होत चालली आहे.. कितीही मेहनत घेऊन देखील रुग्णाला काही कमीजास्त झालं तर, डॉक्टरांना बोलणी ऐकून घ्यावी लागतात, बदनामी सहन करावी लागते, प्रसंगी तोडफोड आणि मारहाणीलाही सामोरं जावं लागतं.. आणि कुठल्याही डॉक्टरसाठी ते खूपच humiliating आहे.. असो..

एकीकडे हॉस्पिटल टाकण्यासाठी लागणारी प्रचंड इन्व्हेस्टमेंट, सरकारी परवानग्या व अटी, इन्श्युरन्स कंपन्यांचे Eligibility criteria, ग्राहक सुरक्षा कायद्याचा (CPA चा) जाच, हे असतानाच वर समाजात वाढत असलेली असुरक्षा, सरकारी अनास्था,  मारहाणीची किंवा बदनामीची सतत टांगती तलवार, रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष, समाजाचा असंतोष, त्यात पुढाऱ्यांचा अन् गुंडांचा उपद्रव.. आणि वर हॉस्पिटलमधले वाढते ताणतणाव, यातून स्वतःच्या कौटुंबिक सुखाची वाताहत, अशा निराशाजनक वातावरणात आयुष्याची ऐन तारुण्यातली बारा पंधरा वर्षे होळी करून डॉक्टर नेमकं कशासाठी व्हायचंय? याचा विचार इथून पुढे MBBS ला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नक्कीच करावा..  सध्याची परिस्थिती थोडीतरी बरी आहे, आणि अजूनही हे क्षेत्र डिमांड मध्ये आहे.. आणि आमच्या पिढीपर्यंत तरी आम्हाला नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून डॉक्टर असल्याचा ‘Proud’ वाटावा अशी परिस्थिती होती.. पण पंधरा वीस वर्षांनंतरचा काळ देखील असाच ‘Proud’ वाटावा असा असेल, की हे क्षेत्र फक्त कॉर्पोरेट जॉबसारखंच फक्त एक प्रोफेशन उरलेलं असेल, ते सांगता येत नाही.. टिकून राहण्यासाठीचा संघर्ष तर समाजात सगळ्यांनाच करावा लागतोय, मग तो शेतकरी असो की इंजिनिअर.. मला तेच म्हणायचंय की डॉक्टर झाल्यावर आपलं लाईफ सेट होईल, पैशांचा पाऊस वगैरे पडेल अशा विचारातून जर कोणी इकडं येणार असेल तर मात्र परिस्थिती आता पूर्वीइतकी गालिचामय उरलेली नाहीये..  बाहेरून कदाचित लक्षात नाही येणार, पण इथंही तुम्हाला संघर्ष अटळ आहे..

कोणीही एखादा जर Highly educated आणि Well qualified असून देखील एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकणारच नसेल, तर त्याला, “हा एवढा अट्टाहास आपण कशासाठी केला?”, हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा सुरुवातीलाच त्याचा विचार केलेला बरा!

शेवटी एकच सांगतो, मुलं खूप संघर्ष करून डॉक्टर होतात खरं.. पण नंतर त्यांना कळतं की खरा संघर्ष तर डॉक्टर झाल्यावरच करावा लागतोय..

— समाप्त  —

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृतज्ञ रहा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कृतज्ञ रहा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा .

या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , नाहीत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो . कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . ” मिळतं तेच, जे आपण पेरलेलं असतं . ” आपल्याशी कोणी  कसंही का वागेना, आपण सगळयांशी चांगलंच वागायचं . इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे .

आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते .आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका . फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा— आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे . ” जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत . ” 

जगणं कोणाचंही सोपं नसतं . आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं . ” सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. ” म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ” कृतज्ञ ” रहा .

पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही . म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे . दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून, त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तव्य कधीच सिद्ध होत नसते .

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये . कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात . कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते , ज्याचं नाव आहे , ” आत्मविश्वास ” 

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.

समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा —- ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून .

या भावना नक्की आचरणात आणाव्यात असे सर्वांना सांगणे आहे .

 

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ लाडकी बाहुली… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लहानमोठ्या सगळ्या माणसांना खेळायला आवडतं. खेळ म्हणजे मनोरंजन किंवा शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा, कोणतीही ऍक्टव्हिटी. खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.खेळ आपल्याला व्यथा, चिंता विसरायला लावतात. खेळांमुळे विरंगुळा मिळतो. शरीर आणि मन ताजेतवाने होते. मैदानी खेळांचे फायदे तर पुष्कळ आहेत. कब्बडी, खो खो सारख्या खेळांमुळे भरपूर व्यायाम होतो, शरीर बळकट,काटक बनते. चिकाटी, दमदारपणा, खिलाडूवृत्ती असे अनेक गुण वाढीस लागतात.

आजच्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या लहानपणी भरपूर खेळायला मिळालं. अभ्यास कमी आणि खेळ दंगा जास्त. खरंखुरं निरागस, बिनधास्त बालपण या पिढीनं अनुभवलं. आधुनिक खेळ, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या पासून अनभिज्ञ राहिलेली ही मुलं छोट्या छोट्या गोष्टीत रममाण होत असत. गोट्या, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे,लगोऱ्या असे खेळ खेळत ही मुलं मोठी झाली. सूरपारंब्या, मामाचं पत्र हरवलं, लपंडाव अशा खेळांना वेगळं साहित्य लागत नसे. पैसे तर बिल्कुल लागत नसत. लागत असे फक्त खेळण्याची, सवंगड्यांची ओढ. या खेळांनी ही पिढी शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झाली. हातात महागडे खेळ नसतानाही आनंद लुटायला शिकली. या पिढीला बडबडगीतांनी, बालकथा, बालगाणी यांनीही समृद्ध केलं. राजाराणीच्या गोष्टीत रमली. ऐतिहासिक, पौराणिक कथा, इसापनीतीच्या बोधकथांनी संस्कारित झाली. आजी आजोबांचं बोट धरून, प्रवचन किर्तनातून, ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी शिकली. घरात बोलायला इतकी माणसं असत की टॉकिंग टॉमची गरज भासत नसे. या मुलींच्या बाहुल्या अबोल होत्या.तरीही भावला भावलींचं लुटूपुटूच्या लग्नात अख्खं घरदार खेळे . चिंध्यांची बाहुली, चिंध्यांचाच बाहुला, पण त्यांना नटवण्यात कल्पकता वापरली जाई. हलू न शकणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या या बाहुल्या, या ठका, ठकी सगळ्या आळीला बोलकं करत.

‘लाडकी बाहुली होती माझी एक ‘ या कवितेत कवयित्री इंदिरा संतांनी बाहुली हरवली म्हणून झुरणाऱ्या मुलीचं केलेलं वर्णन अविस्मरणीय आहे. खेळायला दिलेली  लाडकी बाहुली  . . .  . बाहुली हरवली म्हणून हिरमुसलेली बालिका, दुसऱ्या कितीही बाहुल्या जवळ असल्या तरी तीच बाहुली हवी , यासाठी झुरणारी बालिका डोळ्यासमोर येते.. माळावर खेळणाऱ्या मैत्रिणी, गवत, पाऊस हे सगळं आज दुर्लभ झालंय. पावसात भिजून खराब झालेली, गायीनं तुडवल्यामुळं आकार बिघडलेली, केसांच्या झिपऱ्या झालेली तीच बाहुली त्या बालिकेला प्रिय आहे हे सांगणारी. .

‘परी आवडली ती तशीच मजला राणी ‘

ही ओळ खूप काही सांगून जाते. आजकालच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात रोज नवा हट्ट, नवा खाऊ, नवं खेळणं, नवे कपडे असा बालहट्ट सहज पुरवला जातो.  मोकळ्या मनानं, मोकळ्या मैदानात, मनसोक्त दंगामस्ती करायच्या वयात आजचे किड्स एसीत बसून फक्त अंगठ्याचा व्यायाम करताना दिसतात.ही पिढी उत्क्रांतीच्या नियमानुसार आधीच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त हुशार आहे, कुशल आहे. पण टेक्नॉलॉजीच्या जटील जाळ्यात अडकली आहे. टेक्नॉलॉजी वाईट नक्कीच नाही. पण तिचा उपयोग गरजे पुरताच, मर्यादीत स्वरूपातच केला पाहिजे,हे सांगायला जुन्या पिढीनं सरसावलं पाहिजे, गदिमांच्या नाचणाऱ्या मोराला घेऊन, इंदिरा संतांच्या लाडक्या भावलीला घेऊन, गवतफुला बरोबर वाऱ्यावर डोलत, माळावर पतंग उडवत, झुकझुक गाडीत बसून खंडाळ्याच्या घाटातून, निसर्गाच्या कुशीत नव्या पिढीला हळूच घेऊन जायला हवं.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “छोटीशी मदत…” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “छोटीशी मदत…” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

एकदा मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीईने (ट्रेन तिकीट परीक्षक) सीटखाली लपलेल्या एका मुलीला पकडले.  ती सुमारे 13 किंवा 14 वर्षांची होती. टीटीईने मुलीला तिकीट काढण्यास सांगितले.  तिच्याकडे तिकीट नसल्याचे उत्तर मुलीने संकोचून दिले. टीटीईने तरुणीला ताबडतोब ट्रेनमधून उतरण्यास सांगितले.

तेवढ्यात मागून आवाज आला “मी तिच्यासाठी पैसे देईन”.  पेशाने कॉलेज लेक्चरर असलेल्या श्रीमती उषा भट्टाचार्य यांचा तो आवाज होता. श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीच्या तिकिटाचे पैसे दिले आणि तिला तिच्याजवळ बसण्याची विनंती केली. तिने तिला तिचे नाव काय विचारले.

“चित्रा”, मुलीने उत्तर दिले.

“तू कुठे जात आहेस?”

“मला कुठेही जायला नाही.”  मुलगी म्हणाली..

“मग चल माझ्यासोबत.”  श्रीमती भट्टाचार्य यांनी तिला सांगितले.  बंगळुरूला पोहोचल्यानंतर श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीला एका एनजीओकडे सोपवले.  नंतर श्रीमती भट्टाचार्य दिल्लीला स्थलांतरित झाल्या आणि दोघींचा एकमेकांशी संपर्क तुटला.

सुमारे 20 वर्षांनंतर श्रीमती भट्टाचार्य यांना सॅन फ्रान्सिस्को (यूएसए) येथे एका महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ती एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होती. ते संपल्यानंतर तिने बिल मागितले, परंतु तिला सांगण्यात आले की बिल आधीच भरले आहे. जेव्हा ती मागे वळली तेव्हा तिला एक स्त्री तिच्या पतीसह तिच्याकडे पाहून हसताना दिसली.  श्रीमती भट्टाचार्य यांनी जोडप्याला विचारले, ” तुम्ही माझे बिल का भरले? “

त्या तरुणीने उत्तर दिले, ” मॅडम, मुंबई ते बंगळुरू या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही माझ्यासाठी जे भाडे दिले होते, त्या तुलनेत मी भरलेले बिल खूपच कमी आहे…… दोन्ही महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

“अरे चित्रा… ती तूच आहेस..!! ”  सौ. भट्टाचार्य आनंदाने आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. 

एकमेकींना मिठी मारताना ती तरुणी म्हणाली, ” मॅडम माझे नाव आता चित्रा नाही. मी सुधा मूर्ती आहे. आणि हा माझा नवरा आहे… नारायण मूर्ती “.

— अचंबित होऊ नका. इन्फोसिस लिमिटेडच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती आणि लाखो कोटींची इन्फोसिस सॉफ्ट वेअर कंपनी स्थापन करणारे श्री नारायण मूर्ती यांची सत्यकथा तुम्ही वाचत आहात.

— होय, तुम्ही इतरांना दिलेली छोटीशी मदत त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते !

” कृपया संकटात असलेल्यांचे चांगले करणे थांबवू नका, विशेषत: जेव्हा ते करण्याचे सामर्थ्य  तुमच्यात  असते.” 

—अक्षता मूर्ती या जोडप्याची मुलगी आहे आणि ऋषी सुनक यांच्याशी तिने लग्न केले आहे, जे यूकेचे पंतप्रधान बनले आहेत…!!

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनो,  मग त्यासाठी पहिलं टीव्ही/खेळ/छंद/टाईमपास सगळं बाजूला ठेऊन खूप खूप अभ्यास करून NEET टॉप करा,  मग MBBS ला ऍडमिशन मिळवा. ऍडमिशन झाल्यावर साडेचार वर्षे पुन्हा पंचवीसेक विषयांचा अभ्यास करा.. (पहिले सहा महिने तर सगळं डोक्यावरूनच् जातं, काय चाललंय काहीच कळत नाही)..

लेक्चर्स, LCD, प्रॅक्टिकल्स, क्लिनिक्स, केसेस, एकाच विषयाचे अनेक उपविषय, प्रत्येकाची पाच सहा ‘ऑथर्स’ची पुस्तके, बरेच रेफरन्स बुक्स, जर्नल्स, ट्युटोरियल्स, सबमिशन्स, सारख्या सारख्या इंटर्नल एक्झाम, त्यात Viva सारखा टॉक्सिक प्रकार.. मानसिक खच्चीकरण करणारी बोलणी अन झापाझापी… 

गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या हॉस्टेल्सची दयनीय अवस्था, मेसचं जेवण, आमटीच्या नावाखाली ‘सजा-ए-कालापाणी’.. मग महिनाभर चालणाऱ्या फायनल्स.. सतत जागरणं.. ऍसिडीटी..  आणि एवढं सगळं करून पण पासिंग पुरतेच मार्क्स..!! 

पूर्वी फायनल परीक्षा पास झालं की हुश्श वाटायचं.. पण आता तसं नाहीये.. PG Entrance exam ची टांगती तलवार डोक्यावर असते.. त्यात मध्येच इंटर्नशीप, त्यातली काही महिने खेड्यात..  मग दोन वर्षांचा बॉण्ड करायचा..  त्या दरम्यानच्या काळात PG Entrance चा अभ्यास (वय 25-26 वर्षे)..  पुन्हा साडेचार वर्षांची सगळी पुस्तके एकाच वर्षात वाचायची.. आणि लक्षात पण ठेवायची..  तुम्हाला कल्पना नसेल, पण ही जी एन्ट्रन्स असते, त्यात देखील पैकीच्या पैकी मार्क कोणाला पडू शकत नाहीत.. कारण, paper set करणाऱ्यांनी काढलेली गोल्ड स्टॅण्डर्ड answers ही कोणत्या रेफरन्स बुकमधून काढलेत, यावर बरंच अवलंबून असतं.. मेडिकलच्या विषयांमध्ये एकच टेक्स्टबुक असा प्रकार नसतो, म्हणून, एकाच प्रश्नाची दोन उत्तरे देखील बरोबर असू शकतात, आणि एखाद्या प्रश्नाचं ‘कुठलंच उत्तर नेमकं बरोबर नाही’ असं देखील असू शकतं..  वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच गोष्टी probability वर अवलंबून असतात.. म्हणून अमुक एक डॉक्टर चूकच, असं ठामपणे सांगता येत नाही.. सायन्सच्या इतर शाखांपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात ‘वैविध्य’ खूप आहे, त्यामुळे एकाच वेळी एकाच situation चे खूप Permutations – Combinations संभवत असतात..  असो..

पुन्हा PG ची तीन वर्षे.. संपूर्ण आयुष्यातला सगळ्यात भयानक काळ.. अक्षरशः सक्तमजुरी.. कामाचे तास, वेळा आणि स्वरूप या तीनही गोष्टी अजिबातच निश्चित नाहीत..  पुन्हा पेशंट्स, जागरणं, इमर्जन्सीज् , काम, काम आणि काम.. त्यातून वेळ मिळाला की झोप अन् जेवण..  अंघोळ बऱ्याचदा ऑप्शनला..! आणि अजूनच् अडचणीत पडायचं असेल तर लग्नाचा विचार.. (वय वर्षे 28-29)

PG संपली.. चला, आता ‘सरकारी बॉण्ड’ कंप्लिट करा.. का? तर सरकारने तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च केलेत..!  मग IIT , IIM किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात सरकारचं हे बंधन का नाही? असले प्रश्न पडू न देता बॉण्ड पूर्ण करायचा.. सुपर स्पेशालिस्ट व्हायचं असेल तर अजून एक entrance exam, आणि अजून तीन वर्षे, मग पुन्हा बॉण्ड, आणि वय पस्तीस वर्षे.. पण सध्यातरी आपण ते बाजूला ठेऊ..

स्पेशालिस्ट डॉक्टर झालात..! वा.. वा.. वा.. वय वर्षे 30-31 च्या आसपास, तेही तुम्ही पूर्ण curriculum सलग पास झालात आणि पहिल्याच attempt मध्ये तुमचा entrance ला नंबर लागत गेला तरच! असो..

मग आता कुठंतरी मोठ्या हॉस्पिटलला जॉईन व्हायचं? की स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं? की लग्न करायचं? की सगळंच करायचं? ..काही कळत नाही.. आधीच लग्न केलं असेल अन बायको डॉक्टरच असेल तर ती अजून दुसरीकडेच PG करत असते, अन मुलाला तिसरीकडेच (बहुधा तिच्या आईवडिलांकडे) ठेवलेलं असतं.. काहीही सेव्हिंग नसते, आणि मोठा डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांना तर वाटत असतं,  बघा आता हा भाराभर पैसे कमावणार बरं का..

मग लक्षात येतं की, हॉस्पिटलसाठीच्या जागेच्या किमती आपल्या आवाक्यातल्या नाहीत.. मोक्याच्या जागेवरच्या हॉस्पिटलसाठी भाडं देखील झेपेल की नाही शंका आहे..   हॉस्पिटल चालू करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या.. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या किमती.. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर सोयींच्या किमती.. हॉस्पिटल चालू झाल्यावर त्याची मॅनेजमेंट..  हाऊसमन, नर्सिंग स्टाफ, त्यांचे पगार, त्यांची भांडणं, त्यांच्या सुट्ट्या.. अटेंडन्ट, वार्डबॉय, गेटकीपर, सेक्युरिटी, फायर कंट्रोल, पोल्युशन कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट.. इ इ.. तुम्ही हॉस्पिटल नावाची एक ‘स्मॉल स्केल इंडस्ट्री’ चालवत असता, तेही मॅनेजमेंटचा कसलाही अनुभव नसताना..

पूर्वी दीड-दोन गुंठे जागेत देखील टुमदार दवाखाना चालू करता यायचा. दोनतीन हुशार सिस्टर्स आणि दोन सफाई कर्मचारी ठेवले तरी काम भागायचं.. पण आता मात्र तसं नाहीये.. असलं काही केलं तर बॉम्बे नर्सिंगची परमिशनच मिळत नाही.. NABH च्या नियमाप्रमाणे जर बांधायला गेलं तर दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी पाच गुंठ्याच्या आसपास जागा लागते,  GNM आणि ANM धरून चोवीस तासाच्या अकरा सिस्टर्स लागतात, एकतरी फुल टाइम OT असिस्टंट लागतो, सफाई/ कचरा विल्हेवाट यासाठी चोवीस तासाचे कमीतकमी सहा कर्मचारी लागतात. मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि अकाऊंटंट लागतात आणि तुमच्याकडे MPJAY (योजना) असेल तर ते सांभाळणारा वेगळा व्यक्ती लागतो. ह्या सगळ्यांचे पगार सरकारी नियमांनुसार द्यावे लागतात, त्यांचा PF काढावा लागतो. स्टाफचे कामाचे तास, आठवड्याच्या सुट्टया, आजारपणाच्या सुट्टया, बाळंतपणाच्या सुट्टया याचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचं ऑडिट करायला येणाऱ्यांना ‘व्यवस्थित’ सांभाळावं लागतं!  पालिकेतून विविध परवानग्या मिळविण्यासाठी हात सैल सोडावे लागतात.. (बरेच सैल सोडावे लागतात).. दरवर्षी किंवा ठराविक काळाने त्याचं नूतनीकरण करावं लागतं.. डाॅक्टरांसाठी सरकारी करात कोणतीही सवलत नाही, उपकरणं महाग, मशिनरींच्या किंमती लाखोंच्या घरात, सगळ्या mandatory मशीनरी घ्याव्याच् हे सरकारी नियमांचं बंधन..  तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन असेल तर ‘तुम्ही गुन्हेगार नाहीये’ हे आधी सिद्ध करण्यासाठी अनेक फॉर्म आणि रजिस्टरे भरायची, तेही खाडाखोड न करता एकदम बिनचूक भरावी लागतात.. रजिस्टर मधली एक चूक तुम्हाला डायरेक्ट अटक करू शकते.. असो..

मग दुनियादारीचा सिलसिला सुरू होतो.. टिनपाट सरपंच/नगरसेवक खुश करावे लागतात, उपद्रवी गावगुंड ‘फ्री’ तपासावे लागतात.. ‘डॉक्टर पैसे पुढच्यावेळी देतो’ म्हणणाऱ्यांना शक्य तितक्या मधाळ आवाजात ‘चालेल चालेल’ म्हणावं लागतं.  उत्सवांच्या, जयंती-पुण्यतिथीच्या वर्गण्या गपगुमान द्याव्या लागतात.. वर बत्तीस दात दाखवत तुपाळ हसावंही लागतं..  निवडणुकीसाठी खंडणी (त्याला ‘मदत’ म्हणतात) द्यावी लागते.. दादा, भाऊ, भैया यांच्या एका फोनवर पेशंट्सची बिलं कमी करावी लागतात.. बिलं सेटलमेंट करणारा कोणीही सोम्यागोम्या आला तर त्याला शक्य तितक्या नम्र भाषेत आपण बिल अवाजवी लावलेलं नाहीये, यापेक्षाही जास्त बिल होऊ शकतं आणि याची कल्पना नातेवाईकांना आधीच दिली होती, वगैरे पोटतिडकीने सांगावं लागतं, आणि तरीसुद्धा ‘मी म्हणतोय म्हणून कमी करा की डॉक्टर’ असल्या धमकीवजा विनंतीला मान द्यावा लागतो.. 

तुम्ही म्हणाल, ‘व्यवसाय करायचा म्हटलं की एवढी मगजमारी तर करावीच लागणार की!, समाजात प्रत्येक व्यवसायात असं असतंच की!’  ..  ते खरंय, पण लहानपणापासून खाली मान घालून अभ्यास एके अभ्यास केलेल्या ह्या नवख्या डॉक्टर मुलांना जड जातं हे..  आणि ‘समाजसेवा करायचीये’ वगैरे दिव्य स्वप्नं उराशी घेऊन आलेल्यांना तर पहिला शॉक इथंच बसतो.. अन कितीही संवेदनशील राहायचं ठरवलं तरी ‘पैसा’ हीच या जगाची भाषा आहे, हे लवकरच कळून येतं..

माझ्या दहावी बारावीच्या काळात, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी रेडिओवर ऐकायचो. बहुतांश मुलामुलींचं “डॉक्टर व्हायचंय” हे ठरलेलं असायचं..  कारण आजूबाजूला दिसायचं की एकतर  डॉक्टरला समाजात इज्जत असते.. पैसाही चांगला मिळतो.. आणि job satisfaction असते आणि वरून व्यवसायातूनच समाजसेवा करण्याचे पुण्य देखील मिळते वगैरे वगैरे..

पण आता मात्र हे चित्र बदललंय..आणि, ते दिवसेंदिवस खूपच बदलतही चाललंय.. डॉक्टरचं आत्ता ना समाजातील स्थान अबाधित आहे, ना लोकांच्या मनातली इज्जत खात्रीशीर आहे, ना खोऱ्यानं मिळणारा पैसा आहे.. ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ रफू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

एक मित्र भेटला परवा… खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर… 

म्हणाला, ” मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही… क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं मी ठरवलंय.”_

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजूला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला…… विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव ‘आलासच ना अखेरीस ‘_ हा माज ठेऊन. 

तो मला म्हणाला, ” दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली….. काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…… ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं….. आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता….. वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…… त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच…..  

मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षून…… तू त्यावेळी मला म्हणाला होतास, “ देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो “…….  ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपुर्वी……  नाही शिवू शकलो मी ते भोक… 

नाही करु शकलो रफू…..  नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र…… . 

माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं…! _ गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दूषणं देत…..  ‘ कसला बाप तू? ‘ अशी खिल्ली उडवत..  बहुदा मनातल्या मनात……   म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे… आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला… यावेळी तू आपलं नातं ‘ रफू ‘ केलेलं पहायला… 

त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला लागलो…. “

सुन्न होऊन ऐकत होतो मी……. 

संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला… 

_’ देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो ‘,चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता…. 

घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे….. 

‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘ पापातून ‘ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘ शापातून ‘ उतराई होऊ बघत होतो… 

मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो……  

दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘ रफू ‘ करू पहात होतो ! ….. 

तात्पर्य:….

सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो.  मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक,शेजारी,सहकारी,आपले नोकर चाकर, हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही. आपल्या आचरणाने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधानाने कुणी दुखावलेच, तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….

पहा विचार करुन…

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया… 7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

भारतीय इतिहासात ‛विजयनगर साम्राज्य’ असे म्हटले की साहित्य- कला- संस्कृती- पराक्रम अशा वेगवेगळ्या आयामानी परिपूर्ण संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. विजयनगरची राजसत्ता मुस्लिम आक्रमणे रोखून धरण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे या काळात हिंदू संस्कृतीचा सर्वांगीण विकास झाला. म्हणूनच भारतीय संस्कृती व कलांचा हा भरभराटीचा काळ मानला जातो. साहित्याच्या विशेषतः संस्कृत भाषेच्या  दृष्टीनेही हा सुवर्णकाळ मानला जातो. स्त्री- पुरुषांना शिक्षणाच्या पण समान संधी होत्या. त्यामुळे पुरुषलेखकांच्या बरोबरीनेच या काळात स्त्री लेखिकांनीही साहित्यक्षेत्रात आपले उत्तम योगदान दिलेले दिसून येते. चौदाव्या शतकातील कम्परायण याची पत्नी गंगादेवी, सोळाव्या शतकात अच्युतराय याची पत्नी तिरुमलांबा यांची नावे प्रामुख्याने यात घ्यावी लागतील. यातील गंगादेवीचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत.

गंगादेवीच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु  ती सामान्य परिवारात जन्मली असे काही इतिहासकार सांगतात. ती धर्मशास्त्र, पुराण, न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि संगीतशास्त्रात प्रवीण होती. तिच्या या पांडीत्यावरच खुश होऊन  राजा कम्परायण यांनी तिच्याशी विवाह केला. एकदा पतीबरोबर ती युद्धासाठी दक्षिणेकडे गेली. त्या युद्धाचे आणि विजयाचे वर्णन करणारे  ‘मधुराविजयम् ‘ हे काव्य गंगादेवीने संस्कृत भाषेत लिहिले.

या काव्याचा अभ्यास करतानाच आपोआप गंगादेवीचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता लक्षात येते. या काव्यात एकूण नऊ सर्ग आहेत. त्यात तिने कवी वाल्मिकी, कवी कालिदास अशा कवींना वंदन करून काव्याची सुरुवात केली आहे. त्यातून तिचा या सर्व कवींच्या साहित्याचा अभ्यास होता असे लक्षात येते.

संस्कृत भाषेत काव्यशैलीचे प्रकार आहेत. त्यातील वैदर्भीय या प्रकारात तिचे काव्य मोडते. शिवाय उपमा, अलंकार यांनी नटलेले पण सुबोध, सरल पदानी युक्त अशी तिची रचना आहे. त्यामुळे तिचा व्याकरणाचा अभ्यासही परिपूर्ण होता.

सूर्योदय, चंद्रोदय, जलचक्र, सहा ऋतूंचे वर्णन, तुंगभद्रा नदीचे वर्णन यातून तिचा भूगोलाचा अभ्यास दिसून येतो आणि कवी कालिदासाचाही थोडाफार प्रभाव तिच्यावर असावा असे वाटते.

पहिल्या काही अध्यायात गंगादेवी विजयनगर साम्राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजा बुक्क याचे उत्कृष्ट राज्यशासन, कुमार कंपन्नाचे बालपण आणि प्रारंभिक जीवनाचे वर्णन केले आहे. पुढच्या काही अध्यायात त्याच्या दक्षिणेकडील आक्रमणाचे आणि कांचीपुरम् च्या विजयाचे वर्णन आहे. आपले काव्य हे एक ऐतिहासिक पुरावा असेल याची जाणीव असल्यामुळे गंगादेवीने विस्ताराने येथे इतिहास मांडलेला दिसून येतो.

तिच्या काव्यातून त्या काळातील राजकीय परिस्थिती, समाजाची मानसिकता, त्या लोकांची आर्थिक – सामाजिक- शैक्षणिक स्थिती, युद्धनीती याचे वर्णन येते. त्यातून तिची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते.

आजपर्यंत आपण संस्कृत साहित्यातील लेखक- कवींनी वेद- पुराण याचा संदर्भ घेऊन किंवा काहीवेळा स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या स्त्रीपात्रांचा परिचय करून घेतला. पण आजच्या शेवटच्या भागात मुद्दाम एका अशा स्त्रीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे की जी कोणत्याही साहित्यकृतीतील पात्र नसून स्वतःच लेखिका होती. तिच्या एकाच काव्यातून ती आजपर्यंत जनमानसात आणि संस्कृत साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली आहे. गंगा नदी ही भारताची मानबिंदू आहे तशीच गंगादेवी ही साहित्यातील स्त्रीलेखकांसाठी मानबिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तिच्यातील या प्रतिभाशक्तीला सलाम!

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

” हे बघा आई , मी बिझी आहे , उद्या मला मिटींग्स आहेत . एवढा काही वेळ नाही मला , मी कुमारिकेच्या घरी 

अथर्वबरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईल ” सायली म्हणाली .

“अगं संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला . नीट पूजा करू , तुझ्या वेळेनुसार बोलवू ” सासूबाई म्हणाल्या .

“आई , अहो भाव महत्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय….संध्याकाळी कंटाळा येतो खूप ” सायलीने चप्पल घालता घालता म्हंटलं .

“सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता ? ” 

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला . सासूबाई म्हणाल्या , ” शिरीष तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव भाव ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य विसरतोय असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही , शिरिषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही. पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हंटलं की तुम्हाला वेळ नसतो, थकलेले असतात . घरच्या आरतीलाही चार वेळा या रे म्हणावं लागतं . कुठलाही उपास म्हंटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही असं म्हणून मोकळे होता, पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…” 

 सायली म्हणाली , ” आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय “

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे उपास तापास, देव धर्म म्हणजे स्वतःच्या मनाला, शरीराला लावून घेतलेलं बंधन. हे unproductive आहे असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय. आहेत, बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली तुला म्हंटलं आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल, तू म्हणालीस भाव महत्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन. अगं दे ना तू दान, पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील आजोबांना नमस्कार कर, तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील, तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत , त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला ‘भाव महत्वाचा’ ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो. उद्या अथर्व तुला, मला, शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला. परवाचंच घे, घरी भजन आहे म्हंटल्यावर तू नाक मुरडलं , वेळ नाही म्हणालीस. पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं त्यात रंगून गेलीस . फेरदेखील धरलास आमच्याबरोबर , हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो, हे मात्र खरं आई . इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच ! ” सायली म्हणाली .

” हो ना ? तू रे शिरीष, नाही सोवळं पण निदान आंघोळ करून आरती कर म्हंटलं की हेच– भाव महत्वाचा. अरे त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते, आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं. एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही, मग गोंधळ घालायचा का विचारलं की आई, ‘भाव महत्वाचा’ , ‘देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला. अरे देव-देवी काहीच म्हणत नाही, हे सगळं आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आहे. एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना प्रथा जपा रे . हे बघ नेहेमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या तेवढं नाही करू शकले आणि सायली तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे. तरीही सारासार विचार करून जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्वाचा– पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते . हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात. मनाचे डाएट म्हणा ना. ते किती जास्त प्रमाणात करायचं ते ज्याचं त्याने ठरवावं पण करावं असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं . आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो, पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून, मेकप करून आपण जातो. दांडिया खेळू नये असं नाही. पण आपलीही संस्कृती , परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्वाचं, तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना? मग श्रद्धा, अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू. सारखं ‘भाव महत्वाचा’ म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी…. उद्या असेन मी, नसेन मी …..” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते. असे शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

—— असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…6 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत नाटककार ‛भास’ याने एकूण तेरा नाटके लिहिली. त्याला संस्कृत साहित्यात ‛भासनाटकचक्राणि’ असे म्हणतात. त्यातील ‛प्रतिज्ञायौगंधरायणम्’ आणि ‛स्वप्नवासवदत्तम्’ ही दोन नाटके राजा उदयन आणि अवंतीराजकुमारी वासवदत्ता यांच्या जीवनावर आधारित आहेत.

वासवदत्ता उज्जैनचा राजा प्रद्योत याची कन्या असते. उदयन एका छोट्या राज्याचा राजा असतो. त्याच्याकडे ‛घोषवती’ नावाची एक अद्भुत वीणा असते आणि तो उत्तम वीणावादन करत असतो. त्याची ती ख्याती ऐकून वासवदत्ताला त्याच्याकडून वीणा शिकण्याची इच्छा उत्पन्न होते. ती वडिलांजवळ तसा हट्ट करते. राजा उदयन हे सहज मान्य करणार नाही हे प्रद्योतला माहीत असल्याने तो कपटाने उदयनाला कैद करतो आणि आपल्या वाड्यात आणून ठेवतो आणि त्याला आपल्या कन्येला वीणा शिकवण्यास सांगतो.

उदयन आणि वासवदत्ता त्या निमित्ताने एकमेकांना भेटत राहतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचे लग्न होते. त्याचवेळी उदयनाचा मंत्री यौगंधरायण आपल्या राजाला सोडवून आणण्यासाठी एक उपाययोजना करतो आणि उदयन- वासवदत्ताना सोडवून आणतो. पुन्हा आपल्या राज्यात परत आला तरी उदयन आपल्या पत्नीच्या प्रेमापुढे राज्याकडे दुर्लक्ष करू लागतो. त्यामुळे अरुणी नावाचा राजा त्याचे राज्य हस्तगत करतो. ते परत मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या राजाच्या मदतीची गरज असते. मगध राजाची बहीण पद्मावतीशी उदयनाने विवाह केला तर हे शक्य होणार असते. म्हणून यौगंधरायण वासवदत्ताशी सल्लामसलत करून एक योजना आखतो. त्यामध्ये उदयनाला वासवदत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मेली असे भासवण्यात येते व तिला पद्मावतीची दासी म्हणून ठेवण्यात येते. अशाप्रकारे अनेक नाट्यमय वळणे घेत या नाटकांचा सुखांत होतो.

ही एक दंतकथा असली तरी एक प्रकारे त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब या नाटकांमधून निदर्शनास येते असे मला वाटते.

पहिल्या भागात वडिलांकडे वीणावादन शिकण्यासाठी हट्ट करणारी अल्लड वासवदत्ता चित्रित केली गेली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उदयन भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडलेली प्रेमिका दिसते. आपल्याला अशी तिची दोन्ही रूपे भावून जातात. याशिवाय संगीत- चित्रकला अशा कलांमध्ये स्त्रियांना प्राविण्य मिळवण्याची मुभा होती हेही लक्षात येते.

त्यानंतर पतीच्या घरी गेल्यावर जेव्हा उदयन पत्नीच्या प्रेमात रममाण होऊन राज्य गमावून बसतो आणि त्याचे मंत्री जेव्हा वासवदत्तेला याची जाणीव करून देतात तेव्हा तिच्यातील कर्तव्यदक्ष पत्नी जागी होते. तीसुद्धा एका राजाची मुलगी असते आणि राज्य टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागते याची तिला पूर्ण कल्पना असते. म्हणूनच आपल्या पतीच्या व प्रजेच्या हितासाठी ती यौगंधरायणाच्या योजनेला पूर्ण मान्यता देते आणि राजाचा विवाह पद्मावतीशी करून देण्यासाठी राजी होते. त्या काळी राजांनी अशा पद्धतीने विवाह करण्याची सर्रास प्रथा होती. शिवाजीमहाराजांनीही राज्यविस्ताराच्या दृष्टकोनातूनच आठ विवाह केले होते असे इतिहास सांगतो. म्हणूनच इथेही वासवदत्तामधील चाणाक्ष राजकारणी दिसून येते.

वासवदत्ता इतकेच करत नाही. तर राजाचे आपल्यावर किती प्रेम आहे हे माहीत असल्याने तिच्या मृत्यूची खोटी कहाणी रचल्याशिवाय राजा दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही हे लक्षात येते तेव्हा ती सहजपणे ही योजना स्वीकारते. वास्तविक आपल्याच मृत्यूची बतावणी करणे कितीही अवघड असले तरी ते स्वीकारणारी वासवदत्ता एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष स्त्रीच्या रुपात समोर येते.

जेव्हा ती पद्मावतीची दासी म्हणून राहू लागते त्यावेळी सर्व सुखासीन आयुष्य सोडून देते. वास्तविक असे जीवन जगणे एखाद्या राजघराण्यातील स्त्रीला किती अवघड जात असेल याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळे आपल्या ध्येयासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारी वासवदत्ता ही त्यागमूर्ती होती असे म्हणावे लागेल.

पद्मावतीशी उदयनाचा विवाह होतो आणि तिला वारंवार आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहावे लागत असले तरी आपल्या पतीच्या व राज्याच्या हितासाठी ते सर्व सहन करत असते. यातून तिच्यातील सहनशील नारी प्रत्ययास येते.

असे सर्व असले तरी शेवटी ती एक स्त्री असल्यामुळे साहजिकच कुठे तरी तिला आपल्या पतीकडून प्रेमाची अपेक्षा असतेच. त्यामुळे एका प्रसंगात विदूषक राजाला विचारतो की त्याचे “सर्वात जास्त कोणावर प्रेम आहे?” तेव्हा तो वासवदत्तेचेच नाव घेतो. हा संवाद नकळत वासवदत्तेच्या कानावर पडतो आणि ती अतिशय आनंदित होते. कारण शेवटी तिचेसुद्धा आपल्या पतीवर तितकेच उत्कट प्रेम असते. शिवाय एकदा नकळत झोपेत राजाला स्वप्न पडते आणि तो वासवदत्तेलाच हाक मारत असतो. त्यावेळी पण वासवदत्ता तिथेच असते.

या दोन्ही प्रसंगातून वासवदत्तामधील पत्नी अतिशय सुखावते. कारण जरी आपल्या राज्यासाठी तिने एकप्रकारे हे व्रत स्वीकारलेले असले तरी तीसुद्धा एक माणूसच असते. 

अशाप्रकारे प्रेमिका, पत्नी, उत्तम कलाकार, कर्तव्यदक्ष राणी अशा वेगवेगळ्या रुपात भेटणारी ही वासवदत्ता काल्पनिक असली तरी त्या काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीचे एक आगळेच रूप होती.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुसरी आई….अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दुसरी आई….अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले:- 

“आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी–तुम्हाला काय वाटतं ?”

त्यावर पती म्हणाला:- ” जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला, पळायला पण जाईन, पोहायला शिकवीन– अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन “

हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला:- “आणि मुलगी झाली तर?”

यावर पतीने खूप छान उत्तर दिले.! ” जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही “

पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले:-  “का असे का.?” 

पती म्हणाला, ” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. थोडक्यात जणू ती माझी ” दुसरी आई ” होऊन माझी काळजी घेईल. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन. एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तो ही आनंदाने समजून घेईल.”

पति पुढे म्हणाला.! ” तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे. माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले: ” म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल, आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:- “अगं तसं नव्हे गं, कदाचित हे सगळं माझा  मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं शिकावं लागेल. मुलींचं तसं नाही. मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात. एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल . “

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली, ” पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे.? “

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणला:- ” हो तू म्हणतीयेस ते खरंय, ती आपल्या सोबत नसेल. पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही, कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू, ” तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे !! अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण,  मुली ह्या परीसारख्या असतात. त्या जन्मभरासाठी आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !! !” 

खरोखर मुली ह्या परीसारख्याच असतात !

ज्यांना मुलगी आहे…  अशा माझ्या सर्व मित्रांना व मैत्रिणींना, बहिणींना व भावांना, समर्पित !!

लेखक : अज्ञात

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares