? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनो,  मग त्यासाठी पहिलं टीव्ही/खेळ/छंद/टाईमपास सगळं बाजूला ठेऊन खूप खूप अभ्यास करून NEET टॉप करा,  मग MBBS ला ऍडमिशन मिळवा. ऍडमिशन झाल्यावर साडेचार वर्षे पुन्हा पंचवीसेक विषयांचा अभ्यास करा.. (पहिले सहा महिने तर सगळं डोक्यावरूनच् जातं, काय चाललंय काहीच कळत नाही)..

लेक्चर्स, LCD, प्रॅक्टिकल्स, क्लिनिक्स, केसेस, एकाच विषयाचे अनेक उपविषय, प्रत्येकाची पाच सहा ‘ऑथर्स’ची पुस्तके, बरेच रेफरन्स बुक्स, जर्नल्स, ट्युटोरियल्स, सबमिशन्स, सारख्या सारख्या इंटर्नल एक्झाम, त्यात Viva सारखा टॉक्सिक प्रकार.. मानसिक खच्चीकरण करणारी बोलणी अन झापाझापी… 

गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या हॉस्टेल्सची दयनीय अवस्था, मेसचं जेवण, आमटीच्या नावाखाली ‘सजा-ए-कालापाणी’.. मग महिनाभर चालणाऱ्या फायनल्स.. सतत जागरणं.. ऍसिडीटी..  आणि एवढं सगळं करून पण पासिंग पुरतेच मार्क्स..!! 

पूर्वी फायनल परीक्षा पास झालं की हुश्श वाटायचं.. पण आता तसं नाहीये.. PG Entrance exam ची टांगती तलवार डोक्यावर असते.. त्यात मध्येच इंटर्नशीप, त्यातली काही महिने खेड्यात..  मग दोन वर्षांचा बॉण्ड करायचा..  त्या दरम्यानच्या काळात PG Entrance चा अभ्यास (वय 25-26 वर्षे)..  पुन्हा साडेचार वर्षांची सगळी पुस्तके एकाच वर्षात वाचायची.. आणि लक्षात पण ठेवायची..  तुम्हाला कल्पना नसेल, पण ही जी एन्ट्रन्स असते, त्यात देखील पैकीच्या पैकी मार्क कोणाला पडू शकत नाहीत.. कारण, paper set करणाऱ्यांनी काढलेली गोल्ड स्टॅण्डर्ड answers ही कोणत्या रेफरन्स बुकमधून काढलेत, यावर बरंच अवलंबून असतं.. मेडिकलच्या विषयांमध्ये एकच टेक्स्टबुक असा प्रकार नसतो, म्हणून, एकाच प्रश्नाची दोन उत्तरे देखील बरोबर असू शकतात, आणि एखाद्या प्रश्नाचं ‘कुठलंच उत्तर नेमकं बरोबर नाही’ असं देखील असू शकतं..  वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच गोष्टी probability वर अवलंबून असतात.. म्हणून अमुक एक डॉक्टर चूकच, असं ठामपणे सांगता येत नाही.. सायन्सच्या इतर शाखांपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात ‘वैविध्य’ खूप आहे, त्यामुळे एकाच वेळी एकाच situation चे खूप Permutations – Combinations संभवत असतात..  असो..

पुन्हा PG ची तीन वर्षे.. संपूर्ण आयुष्यातला सगळ्यात भयानक काळ.. अक्षरशः सक्तमजुरी.. कामाचे तास, वेळा आणि स्वरूप या तीनही गोष्टी अजिबातच निश्चित नाहीत..  पुन्हा पेशंट्स, जागरणं, इमर्जन्सीज् , काम, काम आणि काम.. त्यातून वेळ मिळाला की झोप अन् जेवण..  अंघोळ बऱ्याचदा ऑप्शनला..! आणि अजूनच् अडचणीत पडायचं असेल तर लग्नाचा विचार.. (वय वर्षे 28-29)

PG संपली.. चला, आता ‘सरकारी बॉण्ड’ कंप्लिट करा.. का? तर सरकारने तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च केलेत..!  मग IIT , IIM किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात सरकारचं हे बंधन का नाही? असले प्रश्न पडू न देता बॉण्ड पूर्ण करायचा.. सुपर स्पेशालिस्ट व्हायचं असेल तर अजून एक entrance exam, आणि अजून तीन वर्षे, मग पुन्हा बॉण्ड, आणि वय पस्तीस वर्षे.. पण सध्यातरी आपण ते बाजूला ठेऊ..

स्पेशालिस्ट डॉक्टर झालात..! वा.. वा.. वा.. वय वर्षे 30-31 च्या आसपास, तेही तुम्ही पूर्ण curriculum सलग पास झालात आणि पहिल्याच attempt मध्ये तुमचा entrance ला नंबर लागत गेला तरच! असो..

मग आता कुठंतरी मोठ्या हॉस्पिटलला जॉईन व्हायचं? की स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं? की लग्न करायचं? की सगळंच करायचं? ..काही कळत नाही.. आधीच लग्न केलं असेल अन बायको डॉक्टरच असेल तर ती अजून दुसरीकडेच PG करत असते, अन मुलाला तिसरीकडेच (बहुधा तिच्या आईवडिलांकडे) ठेवलेलं असतं.. काहीही सेव्हिंग नसते, आणि मोठा डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांना तर वाटत असतं,  बघा आता हा भाराभर पैसे कमावणार बरं का..

मग लक्षात येतं की, हॉस्पिटलसाठीच्या जागेच्या किमती आपल्या आवाक्यातल्या नाहीत.. मोक्याच्या जागेवरच्या हॉस्पिटलसाठी भाडं देखील झेपेल की नाही शंका आहे..   हॉस्पिटल चालू करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या.. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या किमती.. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर सोयींच्या किमती.. हॉस्पिटल चालू झाल्यावर त्याची मॅनेजमेंट..  हाऊसमन, नर्सिंग स्टाफ, त्यांचे पगार, त्यांची भांडणं, त्यांच्या सुट्ट्या.. अटेंडन्ट, वार्डबॉय, गेटकीपर, सेक्युरिटी, फायर कंट्रोल, पोल्युशन कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट.. इ इ.. तुम्ही हॉस्पिटल नावाची एक ‘स्मॉल स्केल इंडस्ट्री’ चालवत असता, तेही मॅनेजमेंटचा कसलाही अनुभव नसताना..

पूर्वी दीड-दोन गुंठे जागेत देखील टुमदार दवाखाना चालू करता यायचा. दोनतीन हुशार सिस्टर्स आणि दोन सफाई कर्मचारी ठेवले तरी काम भागायचं.. पण आता मात्र तसं नाहीये.. असलं काही केलं तर बॉम्बे नर्सिंगची परमिशनच मिळत नाही.. NABH च्या नियमाप्रमाणे जर बांधायला गेलं तर दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी पाच गुंठ्याच्या आसपास जागा लागते,  GNM आणि ANM धरून चोवीस तासाच्या अकरा सिस्टर्स लागतात, एकतरी फुल टाइम OT असिस्टंट लागतो, सफाई/ कचरा विल्हेवाट यासाठी चोवीस तासाचे कमीतकमी सहा कर्मचारी लागतात. मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि अकाऊंटंट लागतात आणि तुमच्याकडे MPJAY (योजना) असेल तर ते सांभाळणारा वेगळा व्यक्ती लागतो. ह्या सगळ्यांचे पगार सरकारी नियमांनुसार द्यावे लागतात, त्यांचा PF काढावा लागतो. स्टाफचे कामाचे तास, आठवड्याच्या सुट्टया, आजारपणाच्या सुट्टया, बाळंतपणाच्या सुट्टया याचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचं ऑडिट करायला येणाऱ्यांना ‘व्यवस्थित’ सांभाळावं लागतं!  पालिकेतून विविध परवानग्या मिळविण्यासाठी हात सैल सोडावे लागतात.. (बरेच सैल सोडावे लागतात).. दरवर्षी किंवा ठराविक काळाने त्याचं नूतनीकरण करावं लागतं.. डाॅक्टरांसाठी सरकारी करात कोणतीही सवलत नाही, उपकरणं महाग, मशिनरींच्या किंमती लाखोंच्या घरात, सगळ्या mandatory मशीनरी घ्याव्याच् हे सरकारी नियमांचं बंधन..  तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन असेल तर ‘तुम्ही गुन्हेगार नाहीये’ हे आधी सिद्ध करण्यासाठी अनेक फॉर्म आणि रजिस्टरे भरायची, तेही खाडाखोड न करता एकदम बिनचूक भरावी लागतात.. रजिस्टर मधली एक चूक तुम्हाला डायरेक्ट अटक करू शकते.. असो..

मग दुनियादारीचा सिलसिला सुरू होतो.. टिनपाट सरपंच/नगरसेवक खुश करावे लागतात, उपद्रवी गावगुंड ‘फ्री’ तपासावे लागतात.. ‘डॉक्टर पैसे पुढच्यावेळी देतो’ म्हणणाऱ्यांना शक्य तितक्या मधाळ आवाजात ‘चालेल चालेल’ म्हणावं लागतं.  उत्सवांच्या, जयंती-पुण्यतिथीच्या वर्गण्या गपगुमान द्याव्या लागतात.. वर बत्तीस दात दाखवत तुपाळ हसावंही लागतं..  निवडणुकीसाठी खंडणी (त्याला ‘मदत’ म्हणतात) द्यावी लागते.. दादा, भाऊ, भैया यांच्या एका फोनवर पेशंट्सची बिलं कमी करावी लागतात.. बिलं सेटलमेंट करणारा कोणीही सोम्यागोम्या आला तर त्याला शक्य तितक्या नम्र भाषेत आपण बिल अवाजवी लावलेलं नाहीये, यापेक्षाही जास्त बिल होऊ शकतं आणि याची कल्पना नातेवाईकांना आधीच दिली होती, वगैरे पोटतिडकीने सांगावं लागतं, आणि तरीसुद्धा ‘मी म्हणतोय म्हणून कमी करा की डॉक्टर’ असल्या धमकीवजा विनंतीला मान द्यावा लागतो.. 

तुम्ही म्हणाल, ‘व्यवसाय करायचा म्हटलं की एवढी मगजमारी तर करावीच लागणार की!, समाजात प्रत्येक व्यवसायात असं असतंच की!’  ..  ते खरंय, पण लहानपणापासून खाली मान घालून अभ्यास एके अभ्यास केलेल्या ह्या नवख्या डॉक्टर मुलांना जड जातं हे..  आणि ‘समाजसेवा करायचीये’ वगैरे दिव्य स्वप्नं उराशी घेऊन आलेल्यांना तर पहिला शॉक इथंच बसतो.. अन कितीही संवेदनशील राहायचं ठरवलं तरी ‘पैसा’ हीच या जगाची भाषा आहे, हे लवकरच कळून येतं..

माझ्या दहावी बारावीच्या काळात, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी रेडिओवर ऐकायचो. बहुतांश मुलामुलींचं “डॉक्टर व्हायचंय” हे ठरलेलं असायचं..  कारण आजूबाजूला दिसायचं की एकतर  डॉक्टरला समाजात इज्जत असते.. पैसाही चांगला मिळतो.. आणि job satisfaction असते आणि वरून व्यवसायातूनच समाजसेवा करण्याचे पुण्य देखील मिळते वगैरे वगैरे..

पण आता मात्र हे चित्र बदललंय..आणि, ते दिवसेंदिवस खूपच बदलतही चाललंय.. डॉक्टरचं आत्ता ना समाजातील स्थान अबाधित आहे, ना लोकांच्या मनातली इज्जत खात्रीशीर आहे, ना खोऱ्यानं मिळणारा पैसा आहे.. ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments