मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा शनिवारवाड्याच्या उजव्या चौकाची… श्री बाजीराव सुधाकर जांभेकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ कथा शनिवारवाड्याच्या उजव्या चौकाची… श्री बाजीराव सुधाकर जांभेकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले…मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्‍या हिंदोस्तानात गाजत होता.अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला .दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली…नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे….भाऊंच्या हाताखाली होळकर,  शिंदे,पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते…

दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती.एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते.याचवेळी भाऊची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती…अशाच एका खलबतात जनकोजी शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला…तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला…बघताबघता १००००सैन्य गारद केले.पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले..पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्‍या जनकोजीला लांबून पहात होते…शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशीवभाऊंकडे परत आला.भाऊंनी त्याचा सत्कार केला.तसा जनकोजीनी भाऊंना प्रश्न विचारला माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता.?आणि बळवंतराव काय करत होते विचारा त्यांना..त्यावरुन शब्दाला शब्द झाला.दरबार संपला….सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले…पण बळवंतरावांच्या बायकोला घडला दरबारातील प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच….आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला…तीने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले..आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली..एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले…आर्यपत्नी म्हणाली ,”या पराक्रम करुन आलात ओवाळते पंचारतीने” आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात…..बळवंतरावांनी मान खाली घातली..तसा पत्नीच्या तोंडाचा सुटला…ती म्हणाली उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव?एका नामर्दाचा? की पळपुट्याचा?लाज कशी वाटली नाही तुम्हाला?

पत्नी ताडताड बोलत होती…आणि बोलता बोलता म्हणाली ,जा परत गिलच्यांना ठेचा त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका..जिंकून आलात ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन….

गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले….सरदशी हात तलवारीवर निघाला..बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकळी…बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले…हर हर महादेव ..जय भवानी..जय शिवाजी आरोळी घुमली….अफाट कापाकापी सूरु झाली….गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते..बळवंराव त्वेशाने दांडपट्टे फिरवत होते…त्यांचे कान फक्त आकडे एकत होते…हजार…पाचहजार…आठहजार….एकच कापाकापी…रक्ताचा चिखल अन प्रेतांचा ढीग…दिसू लागला…एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा हलगीचा नाद घुमला…फिरणारा दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल…साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात….बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले…प्रत्यक्ष स्वामी….फक्त माझ्यासाठी…खरच धन्य झालो मी आज…एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली…एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या…भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला….सदाशीवभाऊनी त्या  अचेतन देहाला मिठीच मारली…आदर्श प्रेमाच हे उदाहरण….

भाऊंनी तो देह मागे आणला.पानपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली..बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली…त्या सती जाणार्‍या पत्नीला सदाशीवराव भाऊ सांगत होते…बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको…पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली…तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की याचा सांभाळ आपण करा…आणि मोठा झाला की फक्त एव्हडच सांगा त्याला “”तुझे आई वडील का मेले”हीच आठवण द्या…बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल कारण तो वीराचा पुत्र आहे…..पुढे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचा रणसंग्राम झाला….मराठे तळहातावर शीर घेऊन लढले…देशासाठी ..धर्मासाठी….महाराष्ट्राची एक तरुण पीढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली …

पण, पानिपतात जय मिळवूनही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची…अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला….

पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा….राष्ट्रभक्तीचा आणि १७७५-७६च्या वर्षात मराठ्या पुन्हा दिल्लीला धडक दिली…पार सिंधूपर्यत भगवा रोवला….यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता…पानपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता…आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले….तो पोर म्हणजेच…लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा…आप्पा बळवंत मेहेंदळे….आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा…..

त्याच्या पराक्रमावर बेहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली उभी करुन दिली….आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नाव ठेवले गेले “आप्पा बळवंत चौक (ABC)…”

या चौकाच्या नावाच्या निम्मित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे, स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्‍या सदाशिवरांवांचे आणि आई वडीलांचा शब्द साकार करणार्‍या त्या आप्पा बळवंतांचे….राष्ट्रासाठी स्वतःची आहूती देणार्‍या या सार्‍या वीरपुरुषांना दंडवत

शब्दांकन : श्री बाजीराव सुधाकर जांभेकर

मु.पो.पोंभुर्ले,ता.देवगड जि.सिंधुदुर्ग

9405829669/9075385256

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण : गूढ गुरू… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ कृष्ण : गूढ गुरू…  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कृष्ण अंधारात जन्मला.त्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी त्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही.

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे, असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो

कौरवांत मी, पांडवांत मी,अणुरेणुत भरलो

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकृष्ण।।

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

निसर्गात ऋतूंचा रंगलेला बहारदार खेळ पाहिला कि अचंबित व्हायला होतं. तसेच बाराही महिने एकामेकात एखादा गोफ विणावा तसे ते अलगद एकत्र गुंफलेले असतात. एक महिना या निसर्गातून आपला निरोप घेण्यापूर्वीच नवीन  महिन्याला आमंत्रित करतो. खुलेआम त्याचे स्वागत करतो.

तसाच फाल्गुनही याला अपवाद कसा असेल? या महिन्यात उन्हाळ्याची तलखी असतेच पण मधूनच वाऱ्याच्या सुखदशा लहरी स्पर्शतात आणि मनाला आनंद देतात. या महिन्यात सृष्टीला प्रणयाची बाधा झालेली असते. पक्षीवर्गात ही प्रणयातूरता जाणवते. पक्ष्यांच्या स्वरातील माधुर्य अधिकच गहिरे होते. त्यांचे स्वर अधिक मंजूळ होतात. चिमण्या, कावळे, साळुंख्या अशा सर्व पक्ष्यांच्या सूरांत ही मधुरता असते. एक उत्कटता साऱ्या निसर्गात असते. मधूनच मृगजळांचे भास होतात. प्रणयार्त पक्षीही किती संयमी असतात. हा गुण घेण्यासारखा आहे मानवाने. शांत दुपार हे फाल्गुनाचे आणि एक वैशिष्ट्य आहे. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात.  बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असतो. पण बाहेर पक्ष्यांच्या मधुरवाने मनात आनंद निर्मिती होते. उन्हाचा ताव, मनी आठव पिंगा आणि पक्ष्यांचा मधुरव अशी ही सरमिसळ या फाल्गून दुपारी असते.

फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान निसर्गातील रंगपंचमी अगदी भराला आलेली असते. पळस तर फुलून लालकेशरी साज लेवून नटलेला आहे. त्यात मोहरी च्या फुलांचा गर्दपिवळा रंग, झाडावेलींवरील पालवीच्या अनेकविध छटा हा रंगोत्सवच ना? म्हणूनच श्रीहरी गोपगोपींसह, राधेसह होलिकोत्सव साजरा करून रंगांमध्ये न्हाऊन निघत असेल. साऱ्या जगताला समानतेची शिकवण अशाच कृतीतून भगवंत देत असतो. अथांग प्रेम देणारा हा फाल्गुन मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक विरह असा दुर्मिळ संगम फाल्गुन मासातअसतो. वातावरणात तरुवेलींची सुकलेली पाने गळतात. पानगळ हाच शिशिराचा स्थायीभाव असतो. पण फाल्गुनातच साऱ्या वृक्ष वेलींवर नाजूक पालवी फुटू लागते. असं वाटतं कि फाल्गुन मास आतुरतेने आपल्या चैत्र सख्याची वाट पहात असतो.

उन्हाने भाजणाऱ्या झाडा-वेलींना मायेने कुरवाळत हा हसरा फाल्गुन नवपालवीची शुभवार्ता सांगत असतो. फाल्गुन सख्याच्या अंतरीची हाक चैत्रसख्याला ऐकू येते. मग अलगद निसर्गात, इथेतिथे पानोपानी चैत्राच्या चाहूल खुणा खुणावू लागतात. वनराणी जणु आपल्या जवळील हिरव्या रंगाच्या हिरवट, पोपटी गर्द शेवाळी, पिवळसर सोनेरी राजवर्खी रंगाची मुक्तहस्ते उधळण करू लागते. मग तरु-लतांवर ही रंगल्याली नाजूक  पालवी वाऱ्यावर लवलव करु लागते. शिरीष, पिंपळ आदि वृक्ष ही नाजूक पालवीचे सजतात.       

फाल्गुन महिन्यात खऱ्या अर्थाने चैत्रही धरेवर अवतरतो. यावेळी फाल्गुन आणि चैत्र अगदी हातात हात घालून सज्ज असतात कारण ऋतूराजाच्या आगमनाची जय्यत तयारी त्यांना करायची असते. कळ्याफुलांना, तरुवेलींना, नभातील चंद्र तारकांना,अगदी वातलहरींना ही हा सांगावा द्यायचा असतो. आंब्याच्या मोहोराचा, कडुलिंबाच्या फुलोऱ्याचा मस्त गंध वातावरणात दरवळत असतो. पक्षीही पंख फडफडत आनंदाने गगनात उंच भऱ्याऱ्या घेतात आणि त्याबरोबरच नरपक्षी माद्यांना आमंत्रित करण्यात मशगुल असतात. फाल्गुनाचा चैत्रविलास असा रंगलेला असतो.

हळूहळू फाल्गुनाची निरोपाची घडी जवळ आलेली असते. पण आपला उत्साह, आपले चिरतारुण्य तो हसतमुखाने आपल्या चैत्रसख्याकडे सुपूर्द करतो. ह्या निरोपावेळी करुण वातावरणात सुध्दा फाल्गुनाचे निर्मळ हास्य मिसळते आणि चैत्रही आनंदी बनतो. दोघांच्या गळामिठीची साक्षीदार ही सारी सृष्टी असते. आता फाल्गुन तर निरोप घेतो पण चैत्र मास मन घट्ट करून निसर्गाशी एकरूप होऊन जातो. या मधुमासाचा गोडवा किती वर्णावा! चैत्रमास हा ‘वसंताचा आत्मा’च. त्यामुळे या महिन्यात कोकिळ  मदमस्त ताना घेतो. आम्रतरुवर आता मोहोरातून बाळकैऱ्या डोकावू लागतात. सोनचाफा, पांढरा चाफा, लाल चाफा फुलतात. त्यांच्या सुगंधात जाई, जुई, मोगरा, मदनबाण यांचे गंध मिसळून साऱ्या परिसरात गंधमळे फुलल्याची जाणीव वातलहरी करून देतात. कमलिनीच्या मिठीत भ्रमर मत्त होतात. पळसाबरोबर पांगारा, सावरी, फुलतात. वनराई पुष्पवैभव दिमाखात मिरवत असते. चैत्रपालवी नी फुले यांची रानभूल पडते. पक्षी मीलनोत्सुक असतात. कुठे घरटीही दिसू लागतात व लांबट, वाटोळी, चपटी … साऱ्या निसर्गात वासंतिक सोहळा रंगलला पाहून चैत्र खुलतो, गाली हसतो…

फाल्गुनाच्या रंगोत्सवी

चैत्रविलास हा रंगला

पानोपानी, पक्षांच्या कंठी

चैत्र  रुणझुण नादावला|

 

सांज क्षितीजावर असे

चित्रशिल्प भुलवितसे

अवनीवर वासंतिक

उत्सव गंधभरा सजलासे|

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराई… लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराईलेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले

महिलादिनाबद्दल लिहायला घेतलं आणि ती आठवली !!!!!

मी तिला सांगितलं,तुझ्याबद्दल लिहायचं आहे. तर अंगभूत स्थितप्रज्ञतेने म्हणाली …… 

“ इतकं कौतुक आवश्यक आहे का? आणि जर करायचंच असेल तर माझ्या कामात मी एकटी नाही.  माझ्यासोबत माझा नवरा,शेखर आहे आणि या कामात आम्हा उभयतांचे विचार आणि कृती आहेत.”

तर….तिची आणि त्याची गोष्ट ऐका………

ती किलबिलीने उठते… तिनेच जपून वाढवलेला, मोठ्या केलेल्या झाडांवरचे पक्षी तिला उठवतात

कमीतकमी पाणी वापरून ती आन्हिक उरकते .. संततधारी नळ चालू न ठेवता. ती नेमक्या वेळी नेमकेच पाणी वापरते.

आंघोळीच्या वेळी ती साबण लावत नाही. वर्षानुवर्ष ती पाण्याचे रासायनिक प्रदूषण टाळून फक्त हळद-चणापीठ-तांदूळपीठ-मीठ वापरते आहे.

भांडी घासायचे,कपडे धुवायचे साबणही ती रसायनविरहित वापरते.

ती तशीच आहे…. अस्सल आणि  निर्विष. तिच्या घरातून बाहेर जाणारे सांडपाणीसुद्धा तसेच आहे …. 

अस्सल आणि निर्विष. तिचे सांडपाणी मुठेला अशुद्ध करत नाही. 

ती प्लास्टिक वापरत नाही आणि जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर आवर्जून करते.

तिच्या घरच्या ओल्या कचऱ्याचं काळ सोनं होतं…. काही काळाने त्या काळ्याचं-हिरवं होतं.

म्हणून तर तिच्या गच्चीत आणि परसात जादुई-हिरवी उधळण आहे, आणि हिरव्याने परिधान केलेली लाल, गुलाबी, पिवळी, जांभळी, केशरी रंगबरसात आहे. 

तिथेच फुलपाखरांच्या जन्मकहाण्या लिहिल्या जातात. मधमाश्या,भुंगे,चतुर आणि असंख्य पक्षी प्रणयाराधन करतात .. आणि तिच्या ऋणमुक्तीसाठी सकाळी गीत गातात. तिच्या गच्चीत मधमाश्यांच्या पेट्या तर असतातच, पण क्वचित बागेत सापही सापडतात. आलाच एखादा आगंतुक साप घरात, तर ती अविचल राहून situation handle करते …. झुरळ पाहून किंचाळणाऱ्या मला ती क्षणोक्षणी प्रभावित करते. 

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तिच्या घरात उन्हाळ्यातही पंखा लागत नाही. प्रशस्त खिडक्या आणि भोवतालची झाडं हीच तिची वातानुकूलित यंत्रणा असते.

स्त्री-मुक्तीच्या दांभिक कल्पनांना, ही मुक्ताई फाटा देते. उन्हाळ्यात ती पारंपारिक वाळवणं घालते

आणि घरच्या गच्चीतून मिळालेल्या हळदीचं लोणचंही घालते. लोणच्यापासून ते थेट जिलबीपर्यंत सगळं घरी करते. जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवते….. बागेतल्या वाळलेल्या फूलपाकळ्यांनी रांगोळीचे रंग बनवते.

गणपती उत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळासुद्धा घेते…..  

… आणि हे सारे काही करताना ती स्थितप्रज्ञ असते. आपण काही विशेष करतोय असा तिचा अभिनिवेश नसतो. तिचे श्वास, तिचे उच्छ्वास, तिचे शब्द, तिचं वावरणं… हे सगळं एखाद्या सुखदुःखापल्याड पोचलेल्या अभोगी योगिनीसारखे असते. ज्या निसर्गाच्या घरी आपण साठ-सत्तर वर्षांसाठी पाहुणे म्हणून आलोय त्याला आपण माघारी जाताना काय काय देऊन जायचे ह्याचा तिचा सशक्त-विचार तयार आहे.

… म्हणून तर निवृत्तीपूर्वीच निवृत्त होऊन तिने च..क्क….चाळीस एकरांचं एक जंगल विकत घेतलं आहे..

जं..ग..ल….

त्या जंगलाला तिने प्राणपणाने जपलंय, वाढवलंय. तिथे आंबा-काजू अशी कोकण-स्पेशल लागवड नाही.

तिथे तिने निसर्गाला हवं-तसं,हवं-तेवढं वाढू दिलंय. छोट्या-मध्यम-महाकाय वेली, छोटी-मोठी झुडुपे,

छोटे-मध्यम-महाकाय वृक्ष …… 

सूक्ष्मकिड्यापासून ते फुलपाखरापर्यंत आणि  साळिंदरापासून ते गव्यापर्यंतचे सगळे प्राणी त्या जंगलाला आपलं-घर मानतात….. तो हिरवा-जंगल-सुगंध मी घेतलाय. तिथली ती शाश्वत शांतता.. तिथे साधलेला स्व-संवाद.. सृष्टीची खोल गाभ्यापर्यंत पोचलेली हाक मी ऐकली आहे.

तिने निसर्गाला घातलेल्या सादेला त्याने भरभरून दिलेलं हिरवगच्च प्रतीउत्तर मी त्या जंगलात पाहिलं आहे.

हे सगळं कल्पनेपलीकडचं आहे असं म्हणत आपण आपलंच खुजेपण कुरवाळत राहायचं का? ह्यातलं थोडतरी आपण करू शकतो का???

… शहरात राहणारी, उच्चविद्याविभूषित असलेली, कॉर्पोरेट महिला, एका जीवावर बेतलेल्या अपघातानंतर पुन्हा उभी राहून हे सगळ करत असेल तर आपण ‘आम्हाला नाही बुवा असलं काही जमणार’  हा मंत्र जपणार का? …. आपण तिच्यासारखा शाश्वत-वसा घेऊ शकतो का?? …. घ्यायची इच्छा तरी आहे का?? …. एखादी तरी कृती त्यादिशेने होईल का?…. 

… तिने चाळीस एकर जंगल जपलंय !!! मी दहा स्क्वेअरफुटात काही हिरवं लावेन का??

… मी प्लास्टिक वापरण सोडीन का??

… जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर करीन का??

…. पाणी कमीत कमी वापरून बघेन का???

… आठवड्यात दोन दिवस बिनासाबणाची आंघोळ नाक न मुरडता करेन का???

… मी निसर्गाचे देणे मानेन का???

… त्याची ऋणजाण पावलोपावली ठेवेन का???

… प्रश्नांची घुसळण मनात येते आणि… ते प्रश्न-काहूर माझ्या मनात आठ मार्च जवळ आला की जास्तच उधळतं. कारण तेव्हा मी शोधत असते…. ऑफिसच्या महिला-दिनाची पाहुणी.  पण ते कुठेही शोधायची गरज नसतेच.  

… कारण…ती जी कुणी आहे ना….  ती कायमच असते…….. माझ्या मनातल्या महिला-दिनाची पाहुणी..

जिचं नाव असतं …….. शिवांगी चंद्रशेखर दातार !!!!!!

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रेमाची अभिव्यक्ती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रेमाची अभिव्यक्ती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

परदेशी नोकरी करणाऱ्या माझ्या मुलाचा व्हॅाट्सॲप मेसेज :

‘प्रिय बाबा,

आज आम्ही दोघेही बाहेर जेवणार आहोत. त्यासाठी ह्या हॅाटेलात मी आम्हा दोघांसाठी टेबल बुक करुन ठेवलं आहे. मला इथं येऊन अर्धा तास झाला आहे, तरी अजूनही सुनीता आलेली नाही. बहुतेक तिला ॲाफिसमध्ये अचानक काम लागलं असेल. मला वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला मेसेज लिहित बसलोय…

बाबा, दरवर्षी आम्हाला ह्या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार,  कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का?  की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?

तुम्ही दरवर्षी गौरी गणपतीला, गौरीला नेसवायला दोन भारी साड्या घेऊन यायचे. आई त्याच साड्या पुढे वर्षभर वापरत असे. त्या साड्या आणल्यावर आई त्यावरुन हात फिरवत म्हणायची, ‘साडीचा पोत किती छान आहे, रंग किती खुलून दिसतोय.’ हीच तिची ‘थॅन्क्यू’ची भाषा होती का? की यातून ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ सूचित करीत होती, जे तुमच्यापर्यंत सहज पोहचत होते?

तुम्ही कधी आईसाठी ‘गिफ्ट’ आणल्याचं मला आठवत नाही. मात्र दरवर्षी अक्षय्य तृतीयेला जमेल तशी सोन्याची वेढणी न चुकता आणत होतात. खरंच ती मुहूर्ताची खरेदी होती की एक प्रकारची गुंतवणूक की आईवरील तुमचं ‘प्रेम’, हे मला कधीच कळलं नाही…

बाबा, मला सांगा..तुमच्या भावना न बोलताच आईला कशा कळायच्या? आज सुनीता, मला एक छानसा शर्ट भेट देणार आहे. तुम्हाला कधी आईनं भेट दिल्याचं मला आठवत नाही. मात्र गरम गरम पुरणपोळ्या खाऊन झाल्यावर तुम्हाला आलेला तृप्तीचा ढेकर, हीच तिच्याकडून छान भेट मिळाल्याची पोचपावती असायची का?

काहीच न बोलता, ‘स्पेशल’ काहीच न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात? की काही अपेक्षाच नव्हत्या कधी तुम्हाला एकमेकांकडून. की फक्त बघूनच सारं कळत होतं? बरोबर राहूनच न बोलता सर्व उमजत होतं?

बाबा, मला इथं येऊन एक तास होऊन गेला. अजूनही सुनीता आली नाही. तिची वाट पाहून मी देखील कंटाळून गेलो आहे. ॲाफिसच्या कामातून तिला बाहेर पडायला जमत नसावं, असं दिसतंय.

आज आमच्याकडे प्रेम आहे, पैसा आहे, मात्र वेळच नाहीये, ते प्रेम व्यक्त करायला…त्यामानानं तुम्ही खरंच भाग्यवान होता… आयुष्यभर आईवर अव्यक्त प्रेम करीत राहिलात आणि ती देखील तुम्हाला सावलीसारखी साथ देत राहिली…

बाबा, मी आता आटोपतं घेतो. मेसेज खूपच मोठा झालाय. वेळ आहे ना, तुम्हाला वाचायला?

तुमचाच,

अजय

मी मोबाईल बाजूला ठेवला व भाजी आणायला गेलेल्या हिची वाट पाहत बसलो. खरंच आम्ही आमच्या सहजीवनात कोणतेही ‘डे’ साजरे केले नाहीत, नव्हे तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही…

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ बाबू समझो ईशारे, हारन पुकारे पम पम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ बाबू समझो ईशारे, हारन पुकारे पम पम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… साठच्या दशकातील मुंबईचा हा ट्राम चा फोटो मला फेसबुकवर दिसला… मन भुतकाळात गेले… कितीतरी बालपणीच्या आठवणी त्या ट्रामशी निगडीत होत्या त्या एकेक मनचक्षूसमोर उभ्या राहत गेल्या…. मला आठवतंय ते किंग्ज सर्कल, आताचा माहेश्वरी उद्यान,ते काळा घोडा, आताचं जहांगीर आर्ट गॅलरीचा परिसर इतका तिचा प्रवासाचा पल्ला असे… हमरस्ताच्या मधोमध लोखंडी पट्ट्याच्या , रेल्वे लाईन सारख्या खाचा पडलेल्या मार्गिका होती. त्यात आठ चाकांची ट्राम खडखड करत येजा करत असे… ट्राम टर्मिनस (T.T.) म्हणून परेल टी. टी., दादर टी. टी. राणीबाग. टी. टी. सायन टी. टी. आणी फ्लोरा फाउंटन टी. टी. अशी मुख्य ठिकाणी ट्रामचा मोठा पसारा असे…ट्राम स्टेशनस होते… अधे मधे प्रत्येक नाका, चौकात, थिएटर जवळ, मार्केट जवळ स्टेशन असत…माळा असलेली, आणि नसलेली स्वरुपात ह्या ट्राम फिरत असत… दोन्ही टोकाकडे उतर दक्षिण चालक उभ्यानेच दोन्ही हातांने हॅंडल फिरवित असे.. बहुधा एक लिवरचा आणि दुसरा ब्रेकचा अशी ती हॅंडलची रचना असावी… शिवाय पायात एक नाॅब असे.. हॅन्ड गियर काम करत असे… चालक एकच आणि वाहक दोन असत… आताची लोकल आणि ट्राम जवळपास सारखी फक्त ट्राम ला डबे नव्हते… अगदी संथगतीने ट्राम धावत असे… चालत्या ट्राम मधून बऱ्याच वेळेला हवे तिथे धीराचे लोक चढ उतरतं करत असतं…मोठमोठाल्या खिडक्या, दारं, संपूर्ण लाकडाच्या बनावटीची अशी हि ट्राम एका लय पकडून धावत असे.. पाच पैसे तिकीट असताना मी प्रवास त्यातून केलेला मला चांगलाच आठवतो…रविवार सुट्टीच्या दिवशी तर दोन तास फेरफटका त्यातून केल्या शिवाय दिवस मावळत नसे.. खूप गंमतीशीर अनुभव येत असे.. हळूहळू मुंबईची वस्ती वाढू लागली आणि वाहतूकही वाढली.. रस्तावर गर्दी वाढत गेली.. रस्ते दुतर्फा वाढविण्यासाठी ट्रामची जागा बळकावली गेली आणि आणि सन 1966/67च्या आसपास ट्रामची घरघर बंद झाली…

आजही जुन्या हिंदी सिनेमात मुंबई दर्शन दिसताना ती धावणारी ट्रामची छबी पाहिली कि आठवणींची जिंगल बेल मनात कुठेतरी वाजत असते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कशाले काय म्हनू नये…

अशाच काहीशा नावाची आणि अर्थ असणारी बहिणाबाई यांची एक कविता शाळेत होती…

बिना कपाशीनं ऊले

त्याले बोंड म्हनू नये…..

               हरिनाम हि ना बोले

               त्याले तोंड म्हनू नये……

नाही वाऱ्याने हालंल

त्याले पान म्हनू नये…

असे बरेच कशाला काय म्हणू नये हे खास अहिराणी भाषेत पण सहज समजेल या शब्दांत त्यांनी सांगितले आहे. हे सगळे दोष आहेत. माणूस म्हणून कसे रहावे हेच सांगण्याचा हेतू त्यात होता. यात त्यांनी माणूसच नाही, तर वनस्पती, आणि निसर्ग यांच्यातील अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक गोष्टी सहज ओघावत्या शब्दात सांगितल्या.

पण आता काळ बदलला. जगण्याचे तंत्र (आम्ही आमचेच) बदलले. नवीन तंत्रज्ञानात आम्ही आमचे वागण्याचे ताळतंत्र काही प्रमाणात सोडले. कारण आता आला मोबाईलचा जमाना. आणि या मोबाईलच्या जमान्यात आम्ही माणूस म्हणून जगायचेच विसरलो. इतकेच नाही तर काही अपप्रवृत्तींचे दर्शन आम्ही राजरोसपणे दाखवायला, करायला लागलो. (अर्थात सगळेच नाही. पण संख्या कमी देखील नाही.) याचे वाईट वाटणारे आहेत तसेच समर्थक देखील आहेत. (तो खुपच ॲक्टिव्ह असतो, मोबाईल वर गाणं बघतच जेवतो, शाळेत जात नाही अजून, पण मोबाइल बरोब्बर हाताळतो इ…)

आता मोबाईल त्यातले फेसबुक, व्हॉटस्ॲप, गुगल, यू ट्यूब, इनस्टा. ट्विटर, गेम या बद्दलच तरुणाईचे ट्विट असते. असे आणि इतरही बरेच काही यातच आम्ही स्वतःला हरवले आहे. आम्ही या मोबाईलच्या अधीन झालो आहोत. आणि अप्रत्यक्ष पणे त्यांचे समर्थन देखील करतो.  आम्ही कामाव्यतिरिक्त बराचसा वेळ मोबाईल मध्येच घालवून वेळ घालवत असतो.

आज सहजपणे या मोबाईल बद्दल खालील प्रमाणे म्हणतील का?……. कारण सततचा त्याचा वापर. आणि तो वापरण्याची अधीरता.

        नाही केले अपडेट…..

        त्याला स्टेटस् म्हणू नये..

नाही बदलले चित्र…..

त्याला डी.पी. म्हणू नये.

         नाही आला मेसेज……

         त्याला गृप म्हणू नये.

नाही काढले फोटो…….

त्याला सोहळा म्हणू नये.

          ज्याने केले नाही फॉरवर्ड……

          त्याला ॲक्टिव्ह म्हणू नये.

जो जागेवरच थांबला…….

त्याला नेट म्हणू नये.

         जो वेळेवर संपला…..

          त्याला नेटपॅक म्हणू नये.

ज्याने नाही झाला संपर्क…….

त्याला रेंज म्हणू नये.

          ज्याने दाखविला नाही रस्ता…….

          त्याला मॅप म्हणू नये.

जी लवकर डिस्चार्ज झाली……

तिला बॅटरी म्हणू नये.

              ज्याचे दिले नाही उत्तर……..

               त्याला गुगल म्हणू नये.

जी भरते लवकर……

 त्याला मेमरी म्हणू नये.

                    ज्यात नाही नवे ॲप……

                    त्याला प्ले स्टोअर म्हणू नये. जो होतो सतत हॅंग…….

त्याला मोबाईल म्हणू नये.

 

शेवटी तर असे म्हणावे लागेल की……

 

        ज्यांच्याकडे नाही मोबाईल……..

        त्याला माणूस म्हणून नये.

जिथे नाही वाय फाय……..

त्याला घर म्हणू नये.

कारण आम्ही बराचवेळ काही कारणाने किंवा कारणाशिवाय मोबाईल सोबतच असतो.

सगळ्या नवीन गोष्टी वाईटच असतात असे नाही. पण चांगले काय आहे? हे आपणच समजून घेत ते आणि तेवढेच वापरले पाहिजे. नेमके, वेचक घेऊन  ठराविक काळात वापरला तर मोबाईल देखील चांगलाच आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

“साहेब गाडीची डिलिव्हरी घ्यायला किती वाजता  येणार?”

“मॅडम येतील. त्यांचा नंबर फॉरवर्ड करतो. त्यांच्या वेळेबद्दल त्यांच्याशी बोलून घ्या.”

“पण साहेब गाडी मोठी आहे.”

“मग काय झालं? घेऊन येतील त्या. तुम्ही बोला त्यांच्याशी”

नवी कोरी गाडी घरी आणण्यासाठी विश्वासाने (बायकांच्या गाडी चालवण्याबद्दल अनेक पोस्ट , अनेक जोक्स  सोशल मीडियावर फिरत असतात) नवऱ्याने माझा नंबर डीलरला दिला …त्यादिवशीच खरं माझा महिला दिन साजरा झाला.

**************

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दिरांनी सेल्समनला माझा नंबर लावून दिला आणि प्रॉडक्ट विषयी माहिती द्यायला सांगितले.

“या सगळ्या माहितीवरून तुच ठरव बाई कुठलं घ्यायचं ते आम्हाला त्यातलं काही कळत नाही.”

माझा त्या क्षेत्रातील शिक्षणाचा असाही सन्मान झाला…. त्याच वेळी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

एका कार्यक्रमासाठी नातेवाईक घरी जमले होते. खूप प्रयत्न करूनही ऑफिसच्या कामामुळे घरी जायला उशीर झालाच. सचिंत मनाने घरी पोहोचले आणि पटकन आवरायला घेतलं.

बाहेरून सासूबाईंचा आवाज ऐकू आला

“मनु आईला हा एवढा चहा नेऊन दे. दमून आलीये ती. खूप काम असतं आताशा तिला ऑफिसमध्ये.”

सगळ्या नातेवाईकांसमोर जेव्हा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या कर्तुत्वाचा आदर केला… त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“काही अडचण आली ना तर तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. आपोआप सोल्युशन्स मिळत जातात आणि सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतात.” जेव्हा  बहिणी, मित्र-मैत्रिणी अशी सुरुवात करून त्यांचा प्रॉब्लेम विश्वासाने सांगतात आणि माझ्यावर अवलंबून राहतात …त्याच दिवशी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

लेकीच्या कॉलेजमधील माझ्या आयुष्यातील हिरो या विषयावरील भाषण स्पर्धेत  हिरो म्हणून तिने माझं नाव घेतलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांनी सभागृह दणाणून सोडलं…

 खरंच सांगते त्या दिवशी माझा महिला दिन साजरा झाला

****************

“तुम्ही नक्की करू शकता हे काम. काहीच अवघड नाही. Pl. Go ahead. We believe in your capabilities” पुरुषांच्या बरोबरीने कामाची जबाबदारीही तितक्याच आश्वस्तपणे बॉसने खांद्यावर टाकली, आणि सफलेतही भागीदारी दिली.. त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“मुली आहेत म्हणून काय झालं? माझ्या मुली माझा आधार आहेत.. अभिमान आहेत” असं म्हणत वडिलांनी पुढे प्रॉपर्टीबरोबरच खांदा आणि अग्नी देण्याचा अधिकारही आम्हाला बहाल केला. त्यांचं हे मानस ऐकलं… आणि खरं सांगते त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

*****************

नेहमीप्रमाणे नवऱ्याने ऑफिसला जाताना जवळ घेऊन आज Love you न म्हणता ‘ आम्हाला तुझा अभिमान आहे ‘ असं म्हटलं आणि सकाळी सकाळीच खरं सांगते माझा महिला दिन साजरा झाला.

महिलादिन म्हणजे महिलांसाठी विविध कार्यक्रम… कुठेतरी सवलतीच्या दरात काहीतरी उपलब्ध करून देणे किंवा  वेगवेगळ्या  पुरस्कारांची लयलूट करणे नाही.   इतक्या क्षुल्लक गोष्टींतून कोणी स्त्रीच्या आयुष्यात आनंद आणू शकत नाही…

महिलांच्या सबलीकरणावर आतापर्यंत बऱ्याच महिलांनी तसेच त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकार्यांनी सुद्धा  विविध स्तरांवर अवलोकन केले आहे.

डॉ. शुभांगी कुलकर्णी यांची एक अतिशय सुंदर कविता वाचनात आली होती. 

“ती स्त्री आरशाला विचारते–  

कसा आहेस?

आरसा म्हणतो ठीकाय..

फक्त ती चौकट तेवढी काढून टाक.. गुदमरायला होतंय.

तिने चौकट काढली आणि तेव्हापासून तिचा उत्फुल्ल चेहरा आरशात कधी मावलाच नाही…”

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

ज्या काळी, म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी, ” महिला दिन ” साजरा करून त्या दिवशी खोटी … औपचारिक कणव दाखवून महिला वर्गाला शुभेच्छा देण्याची प्रथा नव्हती, त्या वेळी नामवंत कवी विंदा करंदीकर यांनी  ‘ झपताल ‘ या नावाची किती सुरेख कविता लिहून तत्कालीन  स्त्रीचे  जीवन  रेखाटले होते ते दर्शविण्यासाठी ती कविता  खाली देत आहे. आता सर्रास इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या तरुण पिढीला  हे  कोण विंदा ? असा प्रश्न पडणे साहजिकच  आहे . पण घरातील कोणा शिकलेल्या  आजी … आजोबा  , काका…काकू ,मामा… मावशी ,आई …बाबा  याजकडून ते माहीत करून घ्यावे … 

विंदांच्या या ‘झपताल’ कवितेचं वैशिष्ट्य हे की ती कविता कोणी स्त्रीने लिहिलेली तक्रारवजा कविता नाही, तर त्या जुन्या काळांतल्या एका पुरुषाने, एका संवेदनशील पतीने आपल्या पत्नीचं केलेलं कौतुक आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्रातल्या साधारणपणे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात सत्तरऐंशी वर्षांपूर्वी घरी चोवीस तास ‘आई’ किंवा ‘पत्नी’ म्हणून कामाच्या रगाड्यात भरडल्या जाणा-या आणि चाळीतल्या सव्वा-दीड खोलीत आयुष्य काढीत उभं आयुष्य फक्त सहन, सहन आणि सहन करीत करीत काढलेल्या महिलांची काय स्थिती होती, ते विंदांनी त्यांच्या ‘झपताल’ या कवितेत समर्पकपणे मांडलेलं आहे. 

आमच्या मागच्या पिढीतल्या नऊवारी लुगड्यातल्या कोणाही आजी, आई, मावशी, आत्या, काकू, मामी…. यांना स्वत:ची ‘मतं’ तर दूरच राहिली, स्वत:ची ‘पर्स’ही त्यांना माहीत नव्हती. तरी घटस्फोट न घेता, (ब्रेक-अप न करता) आणि कोणतंही ‘लोन’ न घेता, भांडततंडत का असेना, पटलं न पटलं तरी, पन्नास पन्नास, साठ साठ वर्ष चार, पाच, सहा मुलं वाढवून, पुढे त्यांना मार्गी लावून, ‘त्याचसाठी अट्टाहास करीत  ‘शेवटच्या दिसापर्यंत’ टुकीने संसार निभावले.   

विंदांची ही कविता हल्लीच्या तरुणींना समजेलच असं नाही, त्यात त्यांची चूकही नाही. कारण त्यांना हे मुळातच काही माहीतच नाही. त्यातल्या काही अस्सल ‘मराठी’ शब्दांचा अर्थही समजणार नाही, उदा. ओचें,  उभे नेसून,  पोतेरें,  मुतेली, बाळसे, चूल लाल होणे, मंमं, आणि संसाराची दहा फुटी खोली.. वगैरे. घरी एखादी आजी असलीच तर तिला त्यांनी या शब्दांचे अर्थ विचारावे. ते दिवस आणि तो काळ  ज्यांनी पाहिला आहे, भोगला आहे, त्यांनाच ही कविता चांगली समजेल, घरोघरच्या साठी-सत्तरी उलटून गेलेल्या केवळ महिलांनाच नव्हे तर घरोघरच्या संवेदनशील असलेल्या पुरूषांनाही समजेल. 

☆  झपताल

ओचें बांधून पहांटे उठते तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस

कुरकुरणा-या पाळण्यामधून दोन डोळे उमलूं लागतात 

आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते …… 

 

उभे नेसून वावरत असतेस.. तुझ्या पोते-याने म्हातारी चूल पुन्हां एकदां लाल होते

आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवूं लागतो 

म्हणून तो तुला हवा असतो…… 

 

मधून मधून तुझ्या पायांमध्यें माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात 

त्यांची मान चिमटीत धरून तूं त्यांना बाजूला करतेस, 

तरी पण चिऊकाऊच्या मंमं मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो …… 

 

तूं घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात 

स्वागतासाठी तूं ‘सुहासिनी’ असतेस..वाढतांना ‘यक्षिणी’ असतेस .. भरवतांना ‘पक्षिणी’ असतेस, 

सांठवतांना ‘संहिता’ असतेस .. भविष्याकरतां तूं ‘स्वप्नसती’ असतेस .. 

संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी …… 

 

… तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

कविवर्य – विंदा करंदीकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ताकद पुस्तकाची… लेखिका :सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ ताकद पुस्तकाची… लेखिका :सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

फेसबुकवर एका मित्राने प्रश्न विचारला होता, असं फक्त एक पुस्तक सांगा, ज्या पुस्तकामुळे तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

तो प्रश्न वाचला आणि माझं मन दहा वर्षं मागे धावलं.

मी गरोदर होते तेव्हाची गोष्ट. तिळी मुलं पोटात आहेत, हे कळल्यामुळे आधीच धाकधूक होत होती.

पहिले तीन महिने तर इस्पितळाच्या वाऱ्या करण्यातच निघून गेले होते.

 पाचव्या महिन्यात नुकतंच सगळं थोडं स्थिरस्थावर झालं होतं. सुटकेचा निःश्वास सोडते न सोडते तोच एका दुपारी अचानक पोटात खूप दुखायला लागलं.

डॉक्टरना फोन केला तर ते म्हणाले की लेबर पेन्स असू शकतात. ताबडतोब इस्पितळात भरती व्हा.

तसेच अंगावरच्या कपड्यानिशी इस्पितळात गेले. तपासणी करून डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने म्हणाले, “प्री-टर्म लेबर पेन्स आहेत. पुढच्या चोवीस तासात कधीही बाळंतपण होऊ शकतं!”

लगोलग पोटातल्या बाळांच्या फुफ्फुसांची वाढ होण्याकरता Steroidsची इंजेक्शन्स देण्यात आली आणि वेदना कमी करण्यासाठी मला एक औषध ड्रीपवर लावलं.

ते औषध शिरेतून शरीरात जाताना तापता लाव्हा नसानसांत ओतल्यासारखं सर्वांग जळजळत होतं.

ते औषध एक Muscle Relaxant होतं. गर्भाशय हा एक मोठा स्नायू आहे, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी दिलेलं. पण ते शरीरातले सगळेच स्नायू शिथिल पाडतं, अगदी हृदयाचे देखील. त्यामुळे सतत Heart Monitor वर राहावं लागायचं.

लघवीसाठी केथेटर. जेवण म्हणजे सलाईन आणि गळ्यापासून खाली जवळ जवळ Paralysis झाल्यासारखीच स्थिती. सगळ्या जाणीवा शाबूत, पण काहीही करता यायचं नाही स्वतःहून.

अशा परिस्थितीत असताना तिथल्या डॉक्टरनी तिथल्या कायद्याप्रमाणे दिलेली एकूण परिस्थितीची आकडेवारीसकट माहिती. ‘येत्या चोवीस तासात बाळं जन्माला आली तर त्यांची जिवंत राहण्याची शक्यता इतके टक्के, मतीमंद निपजण्याची इतके टक्के, रेटीनल आंधळेपणाची इतके टक्के, मेंदूला गंभीर इजा होण्याची इतके टक्के’.

हादरूनच गेलो होतो मी आणि नवरा दोघेही. आम्ही दोघंच इस्पितळात. मला तो आणि त्याला मी.

आई-बाबांना व्हिसा नाकारलेला. सासूबाई परत भारतात जाऊन आठवडा पण झाला नव्हता, त्यामुळे त्याही इतक्या लवकर परत येण्याची शक्यता नाही.

अशा वेळी धीर देणारं, पाठीवरून हात फिरवणारं एखादं वडिलधारं आपलं माणूस जवळ नाहीये, ही जाणीव किती भयानक असते, ते सांगून समजणार नाही.

त्यात औषधामुळे सुरु झालेल्या जबरदस्त हेल्यूसीनेशन्स!

बाहेर जर काही खुट्ट आवाज झाला की छातीत धडधडायला लागायचं.

टीव्ही बघायला लागले तर टीव्हीवरची बातम्या सांगणारी बाई आता बाहेर येऊन माझा गळा दाबणार, अशी अनावर भीती वाटायची.

नवरा दोन क्षण जरी खोलीबाहेर पडला, तरी सैरभैर व्हायचे मी. दहा-दहा मिलीग्रामच्या झोपेच्या गोळ्या घेऊनही जेमतेम तास-दोन तास झोप लागायची. बाळं इतक्या लवकर जन्माला आली तर त्यांचं काय होणार ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षण सतावणारी. विचार करून करून अक्षरशः वेडी झाले होते मी.

नवरा सतत बरोबर होता. आई-बाबा, मोठे दोघे भाऊ, इतर नातेवाईक, मैत्रिणी सगळे फोनवरून धीर द्यायचे, पण काही सुचत नव्हतं. जगण्याची ऊर्मीच संपलेली होती. एखाद्या विकल क्षणी वाटून जायचं, सगळं संपवून टाकावं एकदाचं, खूप झोपेच्या गोळ्या एकदम घेऊन. मोठ्या निकराने तो विचार मागे ढकलायचे. पण चांगले विचार यायचेच नाहीत मनात. सारखी मनाला ग्रासून बसलेली भीती. केसाळ, कुरूप, हिंस्त्र!

अशाच एका काळ्याकुट्ट क्षणी नवऱ्याने हातात पुस्तक ठेवलं. रणजीत देसाई यांचं श्रीमान योगी. घरून त्याने ते मुद्दाम आणलं होतं. ‘वाच’, तो म्हणाला.

मला तर पुस्तकाचं पानही उलटवता येत नव्हतं स्वतःहून. पण नवऱ्याने डॉक्टरला सांगून एका स्टॅन्डवर ते पुस्तक ठेवलं आणि मी वाचायला लागले. आधी श्रीमान योगीची पारायणं केली होती. पण त्या दिवसांत मला जिजाऊ जशी भेटली, तशी ती आधी कधीच कळली नव्हती.

मी वाचत गेले, पानं नवरा उलटायचा किंवा नर्स.

त्या पुस्तकात एक प्रसंग असा आहे, शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या तंबूत पंचहजारी मनसबदारी स्वीकारायला जातात आणि अपमानाने विद्ध होऊन परत राजगडावर येतात. ते कुणाशीच बोलू इच्छित नाहीत.

शेवटी जिजाऊ स्वतः त्यांच्या महालात जातात, महाराजांना समजवायला. महाराज एकदम निराशपणे बोलत असतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नाहीत. तेव्हा जिजाऊ एकदम संतापाने फुत्कारतात.

आता नेमके शब्द आठवत नाहीत, पण त्यांच्या संवादाचा साधारण आशय असा होता:

अपमानाच्या, कुणी वाली नसण्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका, राजे. परमुलखात, परक्याघरी, नवऱ्याने टाकलेल्या अवस्थेत मी तुम्हाला जन्म दिला. सासरमाहेरचा कुठलाच आधार नसताना. तुमच्या चिमण्या बोटाला धरून पुण्यात आले. ओसाड गावची जहागीरदारीण मी, नवरा हातातून सुटला, मोठा मुलगा कायमचा गमावला, तरी तुम्हाला कुठल्या बळावर मोठं केलं आम्ही?’

तो उतारा वाचला आणि अंगाला एकदम झिणझिण्याच आल्या! टेक्सास मधल्या इस्पितळातल्या त्या खिडकी नसलेल्या, तुरुंगासारख्या खोलीत, अंगात पाच-सहा नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मी तो उतारा कमीत कमी पंचवीस वेळा तरी वाचून काढला असेल.

एकदम स्वतःची लाज वाटली. वाटलं, त्या माउलीने इतकं सगळं सोसून जगाला शिवाजी दिला आणि मी माझ्या पोटातल्या, माझ्या रक्तामांसाच्या गोजिरवाण्या बाळांसाठी एवढंही सहन करू शकत नव्हते?

पुस्तकातल्या जिजाउंचा एकेक करारी शब्द एखाद्या आसूडासारखा माझ्या देहा-मनावर फुटत होता, मला धिक्कारत होता, फटकारत होता आणि त्याच वेळी आईच्या डोळस मायेने मला परत उभं राहण्यासाठी गोंजारतही होता.

कडयाच्या टोकावर उभी होते मी तेव्हा. सभोवताली सगळा अंधारच होता. कुठूनही कसलाही आशेचा किरण दिसत नव्हता. तीन जिवांची जबाबदारी

डोक्यावर होती. त्यांचं पुढे काय होईल ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षणी मनाला ग्रासून होती. त्या विलक्षण नाजुक मनःस्थितीत असताना श्रीमान योगीमधल्या त्या एका उताऱ्याने मला परत जगण्याची जिद्द दिली.

परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली. खऱ्या अर्थाने माझा स्वतःकडे, माझ्या परिस्थितीकडे, माझ्या देहांत वाढत असलेल्या त्या तीन जिवांकडे बघायचा दृष्टीकोन पार बदलून गेला.

डॉक्टरांचे सर्व निष्कर्ष धाब्यावर बसवत मी पुढे जवळ जवळ नऊ आठवडे त्या इस्पितळात काढले. त्याच शरपंजरी अवस्थेत. त्या दिवसांत मी श्रीमान योगी कमीतकमी पाचवेळा तरी वाचून काढलं असेल.

मुलं जन्माला आली ती सातवा महिना संपल्यावरच. त्या नऊ आठवड्यांमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने नवीन जीवन लाभलं होतं.

कदाचित गरोदर असताना श्रीमान योगी इतक्या वेळेला वाचल्यामुळे असेल, पण माझ्या मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टींचं, त्यांच्या एकूणच चरित्राचं, त्यांचे किल्ले पाहण्याचं अनावर आकर्षण आहे!

योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या लेखणीतून उतरलेले शब्द, एखाद्या डोंगराएवढ्या मोठ्या व्यक्तीचं चरित्र खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!

खूपवेळा जीवनात आपल्याला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. आपली अडचण किंवा व्यथा कुणाला सांगावी कळत नाही अशा वेळेला पुस्तके साथ देतात….एका गुरूची भूमिका बजावत….आज काल वाचन म्हणजे फेसबुक, व्हाट्सअप्प वरील पोस्ट किंवा न्युजपेपर मधील ब्रेकिंग न्यूज….. याव्यतिरिक्त वाचन करायची आज काळाची गरज आहेयातूनच आपण घडतोआपले विचार प्रगल्भ बनतात….म्हणतात ना की अजून वर्षांनी आपण कोठे असणार आहोत, हे दोनच गोष्टी ठरवतात….एक म्हणजे आपण कोणत्या व्यक्तीसोबत उठबस करतो आणि दुसरे म्हणजे आपण आज काय वाचन करत आहोत….. .!!.

लेखिका :सुश्री शेफाली वैद्य

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares