मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

कॉलेजमधील निरोप समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने चांगला रंगला …अचानक वक्त्याने प्रश्न विचारला,” मुलांनो तुमच्या जीवनात ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाला किती महत्त्व आहे? तुमचं ‘व्हॅलेंटाइन’ कोण आहे …. असा कधी विचार केलाय का?”… मुलांमध्ये खसखस पिकली .अरे हा काय प्रश्न झाला ?….आणि असेल कोणी व्हॅलेंटाईन …..तरी यांना सांगायचं की काय ?

……आणि तेही या व्यासपीठावर ?

एका वात्रट मुलाने मोठ्याने विचारले,” सर ,तुमचा व्हॅलेंटाइन कोण ?”

आता मात्र चांगलाच हशा पिकला… पाहुणे हसले…

“अगदी खरं सांगायच तर कोणीतरी मलाही विचारावं म्हणूनच मी हा प्रश्न विचारला होता …!”

पुन्हा जोरदार हशा….!

“आता सांगतो ,माझं जीवन हेच माझं ‘व्हॅलेंटाईन’ ज्यावर मी मनापासून प्रेम करतो….. नव्हेतर मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे ….!जी आपली ‘व्हॅलेंटाईन’ , तिला जर आपण गुणदोषांसहित स्वीकारले तरच जीवन सुंदर होतं …अन्यथा ‘अर्ध्यावरती डाव मोडला ‘हे ठरलेलंच ….!तसेच जीवनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी , घटना ,व्यक्ती ह्यांच्यासहित मी माझ्या जीवनाला स्वीकारलं आहे… मी जणू माझ्याच जीवनाच्या गळ्यात गळा घालुन गातो , नाचतो आणि रडतो देखील….!”

‘वाह क्या बात है….!

प्रत्येकाने मनापासून दाद दिली. व्हॅलेंटाईन म्हटले, की डोळ्यापुढे येते ती एखादी व्यक्ती …..जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो… विषेशतः प्रियकर… प्रेयसी किंवा पती-पत्नी… आयुष्याचा जोडीदार… वगैरे…! फारच विशाल मन असेल तर एखादी आदर्श व्यक्ती….

पण हे उत्तर मात्र अनपेक्षित होतं… विचार करायला लावणारं आणि तितकंच सुंदर होतं….!

खरंच आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो का ?किंवा असं म्हणूया की आपण आपल्या जीवनाच्या प्रेमात पडतो का?…. प्रेमात पडणं तर दूरच…! पण मला यापेक्षा कितीतरी जास्त मिळायला हवं होतं ,ते मी डिझर्व करतो….! पण नशिबापुढे काय ?..असं म्हणत जीवनाचं जणू एकओझं ओढत  असतो आपण….! ‘आयुष्य ओघळुनी मी रिक्त हस्त आहे …!’अशीच अनेकांची स्थिती….!

आपल्या जीवनाच्या प्रेमात पडणारे जीवनाला सुख दुःखा सहीत स्वीकारणारे किती जण असतील बरं….?

विचार करता करता  मला एक व्यक्ती आठवली ,ती म्हणजे लहानपणी आमच्या घरी झाडलोट करणारी आवडाबाई! ही आवडाबाई एक रस्ता झाडणारी बदली कामगार होती रोज पहाटे हजेरीला जायचं.कोणी रजा घेतली तर, तिला काम मिळायचं …!नाही तर पुन्हा घरी येऊन इतरांची धुणी-भांडी झाडलोट अशी काम करायची..! महिन्यात सहा -सात बदल्या मिळायच्या ..! पण त्यासाठी दररोज हजेरीला मात्र जावं लागायचं …तेही सहा किलोमीटर चालत..! नवरा दारुड्या ,त्यामुळे “पैसे दे” म्हणून बायकोला मारहाण वगैरे नित्याचंच झालेलं…!पण अशा परिस्थितीतही आवडाबाई खूपच आनंदी असायची. तिचं आणि माझ्या आईचं चांगलं जमायचं !आवडाबाईला तिच्या नोकरीचा फार अभिमान…! अभिमान म्हणण्यापेक्षा भारी कौतुक..!

तिची नोकरी आणि त्याचं वर्णन ऐकणारा एकमेव श्रोता म्हणजे माझी आई! ती सगळं वर्णन करून सांगायची ,”साहेबानी ‘आवडाबाई ‘म्हटलं, की आपण म्हणायचं ‘हाजिर साहेब’म्हणायचं अशी आमची हजेरी असते..!” सरकारकडून मिळणारं साबण,  झाडू ,पाटी वगैरे सगळं तपशिलासह आईला ऐकवायची ती….! पगाराच्या दिवशी नवरा मारहाण करायचा, पैसे मागायचा… पण तो दिवस संपला की दुसर्‍या दिवशी मारहाणीच्या खुणा अंगावर एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवत गाणं गुणगुणत कामावर हजर….!

एकदा असंच नवऱ्याने मारलं… बिचारी रडत रडत कामावर आली… मंगळसूत्र काढून टाकलं , पांढरं कपाळ…खूप शिव्या दिल्या नवऱ्याला….!खूप रडली..!

दुसऱ्या दिवशी आमच्या घरी हळदीकुंकू होतं …ही पठ्ठी सगळं विसरून हजर..! छान ठेवणीतलं लुगडं.. कपाळभर कुंकू…डोरलं…. असा थाट !उखाणाही घेतला तिने…’आजघरात माजघर माजघरात पलंग पलंगावर सुरी…सुरी गेली सरकुन…रंगरावच्या हाताखाली पाचशे कारकून…’

‘अरे बाप रे इतके…?’ आम्ही मुलं  फिदीफिदी हसायला लागलो…! आई डोळ्यानेच दटावलं. “कसाही असला तरी  कुंकवाचा धनी आहे माझ्या…!”ती गोड अशी लाजली….

असाच एक प्रसंग… आईबरोबर बाजारात जायचं होतं, बरंच सामान आणायचंअसल्याने आवडाबाई बरोबर होतीच .रिक्षातुन आमची वरात निघाली… नेमकी रिक्षा ज्या भागातून जात होती ,तो आवडाबाईचा झाडायचा प्रभाग होता ..!आवडाबाईला कोण आनंद…”अगं बया.. हा तर माझाच ‘वेरिया’ हे बघा वहिनी या झाडापासून माझी हद्द सुरू होते ..पार त्या शाळेपर्यंत माझीच हद्द …हा भाग पण  माझाच….!

एखाद्या राजाने  आपल्या राज्याच्या सीमा दाखवाव्या त्या थाटात आवडाबाई तिचा ‘वेरिया’अर्थात ‘एरिया’ दाखवत होती.आई पण कौतुकाने “अगोबाई ,हो का ?”म्हणत तिच्या आनंदात सहभागी झाली होती .मला भारी गंमत वाटत होती. घरी आल्यावर मी आईला चिडवत होते.., “काय म्हणते तुझी मैत्रीण? चांगलीच मैत्री आहे का तुझी आवडाबाईशी…”                       

तशी आई म्हणाली,” अगं त्या आवडाबाईकडून शिकण्यासारखी एक गोष्ट लक्षात ठेव… जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि  जीवनावर प्रेम करण्याची वृत्ती…! जीवनाच्या सारीपाटावर पडलेलं दान माझ्या मनासारखं नाही म्हणून जीवनाला नावं ठेवणारे बरेच असतात… पण जे दान पडलं तेच माझं आहे…असं म्हणून त्या चांगल्या वाईट दानासह   जीवनाला आनंदाने कवटाळणारे आवडाबाई सारखे थोडेच असतात…!

व्हॅलेंटाईन म्हणजे काय हे आवडाबाईला माहीत नव्हतं आणि आईलाही…!  पण जीवनाला व्हॅलेंटाईन कसं बनवायचं हे त्यांना माहीत होतं…! आपलं जीवन हेच आपलं व्हॅलेंटाईन हे  मला नव्याने प्रत्ययाला येत होतं…!

 

डॉ सुनिता दोशी✍️

संग्राहक — ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : माधवी

महाभारत वाचताना अनेक अनुकंपनीय दुर्दैवी स्त्रिया भेटल्या. पण माधवीच्या जीवनाचा संघर्ष, त्याग, आणि परवड पाहून हृदय हेलावून गेलं.

ययाती आणि देवयानी यांची अत्यंत सुस्वरूप आणि सद्गुणी कन्या माधवी. ही कथा महर्षी नारदांनी दुर्योधनाला सांगितलेली आहे.

विश्वामित्र ऋषींचा पट्टशिष्य गालव. त्याचे शिक्षण पूर्ण होताच गुरुदक्षिणा देण्याचा त्याने हट्ट धरला. विश्वामित्रांना गालव किती गरीब आहे हे माहीत होते म्हणून ते म्हणाले मला काही नको पण गालव आपला हट्ट सोडायला तयार नव्हता म्हणून विश्वामित्रांनी चिडून त्याला सांगितले की तुला द्यायचेच असेल तर मला श्यामकर्णी आणि शशिकिरणा सारखे आठशे घोडे दे. गालवाने आपला मित्र गरुड यांच्याकडे मदत मागितली. गरुड त्याला ययाती राजाकडे घेऊन गेला.

ययातिकडे तसे घोडे नव्हते पण आपल्या दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवणे त्याला योग्य वाटले नाही  म्हणून त्याने त्यावर तोडगा काढला की माझी अप्सरे सारखी सुंदर अशी उपवर कन्या आहे तिला हुंडा म्हणून कुणीही आठशे घोडे देऊ शकतो तू तिला घेऊन जा.

गालव अयोध्येचा राजा इश्वाकुकुलिन राजाकडे तिला घेऊन गेला. तो राजा  म्हणाला ही कन्या खुप सुंदर व सुलक्षणी आहे ती महापराक्रमी पुत्राला जन्म देईल. तिला माझ्याकडे एक वर्षे ठेव एक मुलगा झाला की दोनशे घोडे आणि ही मुलगी मी तुला परत देतो. असहाय माधवीने मान्य केले. तिला वसु मानस नावाचा पुत्र झाला 200 घोडे घेऊन ती परत ययातिकडे आली. त्यानंतर तिला काशीचा राजा दिवोदास यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानेही एक वर्ष तिला ठेवून घेतले प्रतार्दन नावाचा मुलगा त्याला तिच्यापासून झाला. आणि दोनशे घोडे देऊन त्याने  तिला परत पाठवले. नंतर तिला भोजराजा उशिनरकडे पाठवण्यात आले. त्याच्यापासून तिला सिवी नावाचा पुत्र झाला आणि त्याने ही दोनशे घोडे देऊन तिला परत पाठवले. सहाशे घोडे घेऊन माधवी सह गालव गरुडाकडे पुढील दोनशे घोड्यांसाठी आला. गरुडाने सांगितले आता तुला उरलेले 200 घोडे मिळणारच नाहीत कारण पूर्वी फक्त वरुणाकडे  एक हजार घोडे  होते.  वरूणाला गाधी राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा  होती. गांधी राजाने ऋचिक ऋषींना सांगितले तुम्ही मला ते 1000 घोडे मिळवून दिलेत तर मी माझ्या मुलीचे लग्न वरुणाशी लावून देईन. वरुणाच्या यज्ञाचे ऋचिक ऋषीनी पौरोहित्य केले. वरुणाने खूश होऊन 1000 घोडे त्यांना दान केले. गाधी  राजाने  वरील3 राजांना दोन दोनशे प्रमाणे सहाशे घोडे दान दिले आणि उरलेले 400 घोडे नदीत वाहून गेले. विश्वामित्र हे गाधीचे पुत्र आहेत. आत्तापर्यंत प्रत्येकाने तिची किंमत 200 घोडे केली तर तू विश्वामित्रांना तिला अर्पण कर म्हणजे त्यांना दोनशे  घोडे मिळाल्या सारखे आहेत. विश्वामित्रांनी ते मान्य केले व त्यांना माधवी पासून अष्टक नावाचा पुत्र झाला. त्यांनी ते सहाशे घोडे कुरणात चरायला सोडून दिले व माधवीला परत पाठवले. पुत्र जन्मानंतर परत कुमारिका होण्याचे वरदान माधवीला असल्यामुळे ती अजूनही कुमारिका म्हणूनच पित्याकडे परत आली.ययातिने गंगा यमुना संगमा वर तिचे स्वयंवर मांडले. पण स्वाभिमानी माधवीला वैराग्य आले. आपल्या देहाची झाली इतकी विटंबना पूर्ण झाली असे समजून ती वनवासात निघून गेली.अनेक वर्ष  वनात हिंडत होती.

माधवी चे चारी पुत्र मोठे झाले .वसु मानस अतिशय सच्छील व धर्माचा रक्षण कर्ता होता. सिवी अत्यंत दानशूर होता. प्रतार्दन महापराक्रमी झाला. आणि अष्टक अनेक यज्ञ करून पुण्यवान झाला.

इकडे ययाती स्वर्गवासी झाला पण त्याच्या अहंकारी स्वभावामुळे इंद्रादी देवांनी त्याला पृथ्वीतलावर ढकलून दिले .ययातिने त्यांना इच्छा सांगितली जिथे सच्छील माणसे जमली असतील तिथेच मला पडू द्या. त्याच वेळी नैमिषारण्यात माधवीचे चारी पुत्र यज्ञ करत होते .ययाती त्या पवित्र ठिकाणी पडला. नेमकी माधवी पण त्या ठिकाणी हजर होती. तिने आपल्या पित्यास ओळखले.  मुलांनी पण आईला ओळखले पण ययातीला त्यांनी ओळखले नाही. माधवीने आपली सर्व मानखंडना विसरून चारी पुत्रांना सांगितले की तुमचे व माझे पुण्य आपण माझ्या पित्याला अर्पण करून त्याला सन्मानाने स्वर्गात परत पाठवू या. त्या पुण्याईच्या जोरावर ययाती परत स्वर्गात गेला पण माधवी मात्र पुन्हा निर्विकारपणे तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. अशी ही पितृभक्त माधवी. डोकं सुन्न करणारी तिची कथा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी

एक रंगसंवेदना असते.आवडत्या रंगाला त्याच्या मनःपटलावर एक स्थान असतं. रंगीबेरंगी दुनियेतला तोच एक रंग त्या व्यक्तीला भावतो आणि आनंदही देतो.

‘रंग रंग के फुल खिले है भाए कोई रंग ना’ ह्या प्रेमिकेच्या ओळीतून तोच अर्थ प्रतीत होतो.’प्रेमरंगा’चा शोध घेत तिचे डोळे भिरभिरत असतात. नेमक्या परावर्तित होणाऱ्या किरणांच्या (प्रेमिकाच्या) शोधात ते असतात.आणि तसे एकदा झालं की मग,’ मुझे रंग दे, मुझे रंग दे’ असं म्हणत हर्षोल्हासात ती रंगून जाते.

लहानपणी इंद्रधनुष्यातले रंग ‘जातानाहीपानीपी’ असा ठेका धरून पाठ केलेले…..तेव्हाच मनांत आलं की या इंद्रधनुष्यात गोरा रंग कुठे आहे?धाडसानं तसं बाईंना विचारलं देखील होतं. विज्ञानाची शिडी धरून बाईंनी ‘सात रंग मिळून जो होतो तो गोरा म्हणजे पांढरा रंग.’  असही सांगितल्याचं आठवतंय. माझ्या बाल मनानं सोयिस्कर अर्थ असा लावला होता की सगळे रंग नसले की ‘अंधार’ म्हणजे काळा रंग…. मग या अंधाराला पारंब्या फुट्याव्यात तसा काळा रंग मला दिसू लागला आणि आठवली ती संत नामदेवांची गवळण… ‘रात्र काळी घागर काळी जमुना जळे ही काळी ओ माय’. … ‘देव माझा विठू सावळा’ या गाण्यातील सावळ्या रंगाचं सौख्यही विठूला पाहिल्यावर डोळ्यात भरलं. डोळे आणि मन सावळ्या रंगाचा शोध घेत घेत श्यामलसुंदर अजिंठा-वेरूळची लेण्या पर्यंत पोहोचलं. या स्त्रियांचं सौंदर्य सावळ्या रंगा व्यतिरिक्त आणखी कोणत्याही रंगानं खुललं नसतं हे मनोमन पटलं.

लोकसाहित्यात चंद्रकलेचा उल्लेख पैठणी पेक्षाही जास्त आढळतो. त्यातही तांबड्या चन्द्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा जास्ती रूढ…. त्या काळ्या चंद्रकळेतील नारी काळे मणी आणि काजळ यांनी खुलून दिसते. त्यात तिने काळी गरसोळ घातलेली असेल तर मग त्या श्यामलेचे वर्णन ते काय करावे?

विठ्ठलाला माउली म्हणत ज्ञानोबांनी’ रंगा येई वो’ अशी हाक मारली आहे. रंगांच्या यादीत काळ्यासावळ्या रंगाला अव्वल स्थान मिळालं ते त्यांच्या या हाकेनं…

‘निळा सावळा नाथ’ असे आपल्या पतीचे वर्णन करताना निळ्या रंगाच्या आडून सावळेपण दाखवताना नारीच्या भावनेतील शीतलता, घनता आणि गारवा जाणवतो. कृष्ण आणि विष्णू यांच्या सावळ्या रंगात निळसर रंगाची झाक आहे. निळ्या सावळ्या रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच अप्रूपही तितकंच आहे. लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून या रंगीबेरंगी दुनियेतील सर्व रंगांची उधळण केली आहे.

पद्मजा फेणाणी यांचं ‘शुभ्र ज्वाला’ या अल्बम मधील ‘पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हे गीत पांढऱ्या रंगाचं सौंदर्य खुलवतं. ‘पुस्तकातली खूण कराया दिले पण एकदा पीस पांढरे’ या त्यांच्याच गाण्यात त्यांच्या आवाजातून शुभ्र पांढऱ्या पिसार्याचं सौंदर्य झाकोळतं.

लावणीतील रंग बरसातही अनुभवण्यासारखी आहे. होळीच्या सणातली रंगांची उधळण करताना ‘खेळताना रंग बाई होळीचा म्हणत… तर ‘कळीदार कपूरी पान केशरी चुना रंगला कात’ म्हणत सुलोचना बाईंनी खाऊ घातलेलं पान लावणीचा ठसका देतं.’पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’म्हणत हिरव्याकंच शालूतील लावणीसम्राज्ञी मन जिंकते. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. हिरव्या मोराची थुईथुई थांबेना’ अशी लडिवाळ तक्रार करत लावणीसम्राज्ञी रंगात येते तेव्हा मन लावणीत रंगून जातं.

इंद्रधनुष्यातले रंग, काळा पांढरा रंग यांच्यासोबतच लिंबू, पारवा, श्रीखंडी, चिंतामणी  गुलबक्षी पोपटी, आकाशी, डाळिंबी, तपकिरी, शेवाळी, मोतिया, राखाडी, केतकी,  आमसुली याआ णखीन अशा अनेक रंगानी माझं आयुष्य रंगीबेरंगी करून टाकलं. लहानपणी एका रंगानं मात्र मला कोडयात टाकलं होतं. ‘गणराज रंगी नाचतो’ हा रंग कोणता? तो कलेचा रंग होता हे मोठे झाल्यावर लक्षात आलं.’अवघा रंग एक झाला’ असं म्हणत सोयराबाईंनी मानव जातीतील सारे भेद मिटवले. हा रंग देखील समजायला मोठं व्हावं लागलं….

अशा अनेकविध गाण्यांच्या लोलकातून गीतकारांच्या प्रतिभेचे किरण जाऊन माझ्या मनःपटलावर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उमटलं. या इंद्रधनुष्यात अगणित रंग होते. त्या रंगात मनानं  रंगून जायचं ठरवलं.रंग उडलेल्या मनाच्या पापुद्र्यांवर आता आगळे वेगळे रंग चढू लागले. आयुष्याचं चित्र रंगीबेरंगी रंगांनी रंगवून टाकायचं त्यानं ठरवलं…..

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 

?विविधा ?

☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काल मी कृष्णा काकांकडं गेले होते. काका काकू बाहेर जाण्याची तयारी करत होते. त्यांची लगबग बघून मी न राहवून चौकशी केलीच. काका काकू चिनूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथाश्रमात मुलांना लाडू वाटायला चालले होते.

नोकरी च्या निमित्तानं परदेशी राहणाऱ्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच किती अभिनव आहे, नाही का ? आमच्या काका काकूंनी मुलगा जवळ नसताना सुद्धा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर तो परावर्तित झालेला बघितला!

पुण्यातील एक सद्गृहस्थ आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख विसरून अनेक अनाथ मुलांना आपलं घर देतात, त्यांना आश्रय देतात. अशी माणसं मला सामान्य असूनही असामान्य वाटतात. या देवदूतांना प्रसिध्दी नको असते. हारतुरे नको असतात. पेपर मध्ये फोटो किंवा बातमी नको असते. त्यांना फक्त आनंद वाटायचा असतो. समाधान पेरायचं असते. स्वतः बरोबर आजूबाजूला सुख पसरवायचं असतं. प्रसिध्दी, पैसा, अहंकार मोठेपणा त्यांच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. या सगळ्या पलिकडं ते पोचलेले असतात. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे दिसतात.

असामान्य होण्यासाठी मोठं कार्यच करायला पाहिजे असं नसतं हं. मोठेपण अंगी बाणवायला यातना ही सोसाव्या लागतात. ती असामान्य व्यक्तिमत्वं लाभलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी असूनही वेगळी असतात.ते सगळ्यांना शक्य नसतं. परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कुणालातरी मदत करु शकतो. कुणाला तरी हसवू शकतो, उदास मनाला आनंद देऊ शकतो. बघा हं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या बहुतेकांच्या घरी खूपसा खाऊ असतो, नको असलेले जास्तीचे कपडे असतात. हेल्थ कॉन्शस असलेले आपण इतका खाऊ संपवू शकत नाही. काकूंच्या प्रमाणं मुद्दाम करुन नाही जमणार कदाचित, पण असा जास्तीचा खाऊ ; ताजा, चांगला असतानाच गरजूंना का वाटू नये बरं? जसं खाण्याच्या पदार्थांचं, तसंच कपड्यांचं! आजकाल कपाटात मावत नाहीत एवढे कपडे असतात नं बहुतेकांच्या जवळ! ते जुने होण्यापूर्वी, फाटण्यापूर्वी दिले गरजूंना तर? अगदी सुधा मूर्तीं इतका साधेपणा नाही जमला तरी , त्यांचं थोडंसं अनुकरण करायला काय हरकत आहे? बघा बरं, अशा वागण्यानं कसं समाधान मिळतं ते. आनंद, समाधान, या भावना संसर्गजन्य आहेत. त्या परावर्तीत होतात. आणि त्या परावर्तनाचा एक सूक्ष्मसा किरण आपल्याला होता आलं पाहिजे.

आनंदाचे डोही आनंद तरंग. अंतर्मनात जेंव्हा असा आनंद भरलेला असतो, मनाचा डोह आनंद गान गात असतो तेंव्हा अगदी सहजपणं आनंद तरंग उठत असतात. त्यांचा भवताल ही आनंदानं डोलत राहतो.

निर्व्याज समाधान मिळवण्यासाठी पैसे खर्च लागत नाहीत. असं सिद्ध करणारे अनेक सामान्य लोक या जगात आहेत. एक भांडी घासणाऱ्या बाई आपल्या झोपडीवजा घरात दहा बारा अनाथ मुलांच संगोपन करतात. त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. त्यांना एकवेळेला पोटभर खाऊपिऊ घालतात.मग ती साधी चटणी भाकरी का असेना. एवढा उदात्तपणा राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांच्या कडंही नसतो.अशी अनेक उदाहरणे आहेत जी सहजपणे समाजकार्य करतात. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळूही न देता अविरतपणे घेतला वसा सुरू ठेवतात. या सर्वांना माझे दंडवत. साने गुरूजींच्या या धर्माचे आचरण करण्याचा निदान एक लहानसा का होईना प्रयत्न अवश्य करुया. . . . . .

जगी जे दीन पद दलीत

जगी जे हीन अतीपतीत

तया जाऊन ऊठवावे

जगाला प्रेम अर्पावे

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

संगीत म्हणजे नेमके काय?

त्याचे उत्तर असे की निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना.राग,स्वर

आणि शब्द कोणत्या एका तालात बद्ध करून त्या तालाच्या खंडाप्रमाणे सम,इतर टाळ्या,काल किंवा खाली या आवर्तनात स्वररचना किंवा गीत रचना चपखलपणे बसविणे म्हणजे संगीत.

पाण्याची खळखळ,वार्‍याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकिळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एकप्रकारचा नाद,ताल,लय आहे,निबद्धता आहे.

भारतीय संगीताची परंपरा फार मोठी आणि प्राचीन आहे.नादयुक्त हुंकार ते सप्तस्वर असा संगीतातील स्वरांचाः विकासक्रम आहे.त्यामागे दीर्घ कालखंडाची परंपरा आहे जी  चार कालखंडातून दिसून येते.

१) वैदिक काल~इसवी सन पूर्व ५ ते ६ हजार पासून १हजार पर्यंत.

पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची स्तुती व प्रार्थना करणार्‍या  ऋचांचे गायन ऋषीमुनी करीत असत.ऋग्वेद,यजूर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांपैकी सामवेदाशी वेदकालीन संगीत संबंधीत आहे. सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे ऋचांचे स्वरबद्ध गेय स्वरूप.सामवेदात गायनाची एक निश्चित पद्धति तयार केली गेली आणि तीन स्वरांचे गायन सप्तसुरांपर्यंत विकसित झाले. यज्ञयागादि प्रसंगी जे गायन होत असे तेच तत्कालीन संगीत होते,ज्याला गंधर्वगान असे म्हटले जात होते.

२) प्राचीन काल~ ईसवी सन पूर्व १००० ते ई.स.८०० पर्यंत. ह्याला जातिगायनाचा कालखंड असेही समजतात.धृवा गायनही प्रचलीत होते.पुढे त्याचेच परिवर्तीत स्वरूप धृवपद किंवा धृपद गीत गायन अशी ओळख झाली.हा प्रकार भरतपूर्व काळापासून प्रचारात होता.जातिगायनाचे बदललेले स्वरूप हेच रागगायन होय.भरतमुनींच्या नाट्यशास्त्रांत ह्या जातिगायनाचा किंवा राग गायनाचा उल्लेख सांपडतो.

पुढील भागात आपण मध्ययुगीन कालखंडातील संगीत बघू.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मुलं अनुकरणप्रिय असतात. घरात आपले आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कपडे काय घालतात, नातेवाईकांशी कसे संबंध ठेवतात हे सर्व ते रोज बघत असतात. त्यांच्या सवयी काय आहेत ,कोणत्या आहेत? हे मनात साठवत असतात. मुली असतील तर त्या आईची नक्कल करतात,उदा. भातुकली च्या खेळात मुली आईची भूमिका नेहमी करत असतात. आजही. मुले वडिलांची नक्कल करतात. म्हणजे आई वडील या नात्याने आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले काही घडण्यासाठी ची आईवडिलांची जबाबदारी किती मोठी असते हे लक्षात येईल. घरात जसे वातावरण असेल तशी तशी मुलं घडत जातात. 

नरेंद्रही अशा वेगळ्या वातावरणात घडत होता. १८७७ मध्ये नरेंद्र विश्वनाथबाबूंच्या बरोबर रायपूर येथे राहत होता. तेथे शाळा नव्हती. त्यामुळे ते स्वत:च नरेंद्रला शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय इतिहास तत्वज्ञान, साहित्य विषय शिकवीत असत. शिवाय घरी अनेक विद्वान व्यक्तीं येत असत. त्यांच्या चर्चाही नरेंद्रला ऐकायल मिळत असत. त्याचं वाचन इतकं होतं कि, तो वादविवादात पण सहभागी होत असे. नरेंद्रची बुद्धी आणि प्रतिभा बघून ते वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणी मत मांडण्याची संधी नरेंद्रला देत असत.

नरेंद्रचही असच होत होतं. वडिलांचे गुण, दिलदारपणा, दुसर्‍याच्या दु:खाने द्रवून जाणं, संकटकाळी धीर न सोडता, उद्विग्न न होता, शांतपणे आपलं कर्तव्य बजावत राहणं अशी वैशिष्ठ्ये त्यानं आत्मसात केली होती. दुसर्‍यांची दुखे पाहू न शकल्याने दिलदार विश्वनाथांनी मुक्त हस्ताने आपली संपत्ती वाटून टाकली होती. तर ज्ञानसंपदा दोन्ही हातांनी मुलाला देऊन टाकली होती. एकदा कुणाच्या तरी सांगण्यावरून नरेंद्रनी आपल्या भविष्यकाळाबद्दल वडिलांना विचारले , “ बाबा तुम्ही आमच्या साठी  काय ठेवले आहे?”  हा प्रश्न ऐकताच विश्वनाथबाबूंनी भिंतीवरच्या टांगलेल्या मोठ्या आरशाकडे बोट दाखवून म्हटलं, “ जा, त्या आरशात एकदा आपला चेहरा बघून घे, म्हणजे कळेल तुला, मी तुला काय दिले आहे”.  बुद्धीमान नरेंद्र काय समजायचं ते समजून गेला. मुलांना शिकविताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून विश्वनाथबाबू त्यांना कधीही झिडकारत नसत, की त्यांना कधी शिव्याशाप ही देत नसत.

आपल्या घरी येणार्‍या आणि तळ ठोकणार्‍या ऐदी आणि व्यसनी लोकांना वडील विनाकारण, फाजील आश्रय देतात म्हणून नरेंद्रला आवडत नसे. तो तक्रार करे. त्यावर नरेंद्रला जवळ घेऊन वडील म्हणत, “ आयुष्य किती दुखाचे आहे हे तुला नाही समजणार आत्ता, मोठा झाला की कळेल. हृदय पिळवटून टाकणार्‍या दु:खाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, जीवनातला भकासपणा थोडा वेळ का होईना विसरण्यासाठी हे लोक नशा करत असतात. हे सारे तुला जेंव्हा कळेल, तेंव्हा तू पण माझ्यासारखाच त्यांच्यावर दया केल्याखेरीज राहणार नाहीस”. 

समोरच्याचा दु:खाचा विचार करणार्‍या वडिलांबद्दल गाढ श्रद्धा नरेंद्रच्या मनात निर्माण झाली होती. मित्रांमध्ये तो मोठ्या अभिमानाने वडिलांचे भूषण सांगत असे. त्यामुळे, उद्धटपणा नाही, अहंकार नाही, उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असा भाव कधीच त्याच्या मनात नसायचा. वडीलधार्‍या माणसांचा अवमान करणे नरेंद्रला आवडत नसे. अशा प्रकारे नरेंद्रला घरात वळण लागलं होतं.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ? 

☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ? (गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो……..

ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.

जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे……

ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.

अ. कापूर जाळणे — दृष्टी

ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे… स्पर्श

क. मुर्तीवर फुले वाहणे…फुलांच्या अरोमामुळे वास.

क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.

हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

ड. घंटानाद व मंत्रोच्चरण….ऐकणे.

अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.

मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..

पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..?

मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषेचे वैविध्य ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.

दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.

मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.

शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी  प्रचुर शब्द येतात.

काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.

आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.

परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले.  साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी  अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली.  हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील  मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी  या नावाने प्रसिद्ध झाली.  तीच त्यांची बोली भाषा बनली.

हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला,  अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

केवढी विशेषणे … कमाल आहे. आणि प्रत्येक गोष्ट पटते.   

 

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निर्गवी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडुची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !

 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सावरकरांची कविता…रसग्रहण

☆ वृषोक्ती ☆

गाडीला वृष जुंपिला धरित जो जू मानेवरी

आला ऊंच चढून घाट दमला गेला आवांका तरी

होता वाहून नेत वाहत तरी तो?! मंदचारी तया

कोणी हिंदु वदे सगर्व ह्रदये धिक्कारवाणीस या।।१।।

 

हा धिक् रे वृष,मान वाकवूनिया तू दाससा राबशी

मोठे जूं जड हे असह्य भार हा विश्रांतिही ना तशी

तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी हा तरी

वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वजन्म हा अंतरी ।।२।।

 

ऐके तू वृष शांतिने सकल हे उद्गार  त्याचे असे

दावोनि स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे.

बोले हिंदुसी त्या,अरे मज बहु निंदावचे ताडिले

दावि त्वस्थिति अल्पही न तुजला हे म्यां मनी ताडिले।।३।।

 

निंदाव्यंजक शब्द योजूनी बहु माझ्या धन्या निंदसी

कैसा वागवितो तुला तव धनी शोधूनी पाहे मनी।।४।।

 

ज्याते राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली

दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्ते ज्याला दिली

लोखंडी असताही कांचनमया केलीस यद् भू अरे

तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कधी सत्वरे।।५।।

 

किंवा तू म्हणशील की तव धनी आभार भारी वदे

राजे रावबहाद्दुरादिक तुला मोठ्या किताबांसी दे

ऐसे शुष्क किताब घेउनी तुवा स्वातंत्र्य संपत दिली।।६।।

 

दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती

तेव्हां येउनि मानवी तनुस बां तू साधिले काय ते

भूभारापरी गर्वभार अजुनु त्वचित्त का वाहते।।७।।

 

सोडी गर्व स्वदेशभार हरण्या यत्नांसी आधी करी

होई इशपदी सुलीन पुरवी सद्हेतुला श्रीहरी।।८।।…..

 

☆ रसग्रहण ☆

वृषोक्ती  ही  कविता सावरकरांनी १९०१ साली लिहीलेली आहे. एकदा जव्हार घाटातून बैलगाडीने प्रवास करत असताना त्यांना ती सुचली. या कवितेतली त्यांची कल्पकता आणि विचार दोन्हीही थक्क करणारे आहेत.

१९०१ सालचा काव्यकाळ हा वृत्तबद्ध ,

छंद काव्याचा होता.अलंकारिक भाषेचा होता.आजची मराठी आणि तेव्हांची मराठी यात खूप अंतर होते. त्यावेळची भाषा संस्कृतप्रचुर,नटलेली अवघड होती.पण अर्थातच रसाळ होती.वृषोक्ती या सावरकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना मला ते जाणवलं.शिवाय ,ने मजसी ने …किंवा जयोस्तुते ..या काव्यरचनांची संगीतबद्ध गाणी झाली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहचली पण सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत की त्यातून सावरकर एक संवेदनशील ,डोळस,कणखर व्यक्तीमत्व आपल्याला दिसतं..

वृष म्हणजे बैल आणि वृषोक्ती म्हणजे बैलाने ऊद्गारलेले…ही काव्यरचना शार्दुलविक्रीडित या वृत्तात बद्ध आहे.या वृत्तात चार चरण, १९वर्ण आणि प्रत्येक बारा वर्णानंतर यती असतो.या दृष्टीनेही ही कविता व्याकरण शुद्ध आहे.लयीत आहे म्हणून अर्थ उलगडता येतो.

या कवितेत एक काल्पनिक संवाद आहे.

बैलाचा आणि एका गर्विष्ठ माणसाचा..

तो पारतंत्र्याचा काळ होता.आणि स्वातंत्र्याचे वारे हळुहळु वाहत होते.

गाडीला जुंपलेल्या, हळुहळु घाट चढून पार दमलेल्या बैलाकडे पाहून एक स्वत:त रमलेला भारतीय माणूस त्याची  निर्भस्तना करतो.मानेवर  जू ठेवून धन्याची सेवा करणारा बैल म्हणून त्याचा धिक्कार करतो.

त्याचवेळी हा बैल मनोमन हसतो आणि त्याला एक चपखल, प्रखर उत्तर देतो.

“अरे! तू माझी आणि माझ्या धन्याची काय निंदा करतोस..तू कधी तुझा  विचार केला आहेस…आज तुझी काय स्थिती आहे हे कळलंय् का तुला..आर्यांची  तुझ्या कष्टाने उभारलेली ही  सुवर्णभूमी तू परकीयांच्या हवाली केलीस.स्वत:च्याच भूमीत तू त्यांची चाकरी करतोस. त्याचं वेतन तरी तुला कधी मिळतं का वेळेवर ? त्यांनी दिलेले राजे रावबहादुर या किताबातच तू खूष आहेस…त्यांच्या भाषेतला आभार हा बेगडी शब्द तुला भुलवतो…अरे त्या बदल्यात तुझं लाखमोलाचं स्वातंत्र्य हरण केलय् त्यांनी.. याची जाणीव आहे कां तुला..

त्यापेक्षा मी बैल बरा ..धन्याच्यात आणि माझ्यात परस्पर सांमजस्य आहे..प्रेम आहे.

तू माणसाच्या जन्माला येऊन काय मिळवलंस…? परकीयांची गुलामगिरी..

धिक्कार असो तुझा…माणूसपणाचा मला जो गर्व दाखवतोस ,तो सोड..स्वभूमीला पारतंत्र्यातून सोडव…

प्रयत्नांची पराकाष्ठा कर…या उदात्त कार्यात परमेश्वरही तुला मदत करेल…..

हा या कवितेचा सारांश! एक सुंदर रुपकात्मक संदेश देणारा…ही कविता वाचताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकर किती झपाटलेले होते हे जाणवतं.

लोकांमधे जागृती निर्माण करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.अरे परकीयांचं जोखड घेऊन जगण्यार्‍या तुझ्यापेक्षा तो बैल बरा…

अशा शब्दात ते त्याची कानउघाडणी करतात…

सावरकरांचा कणखरपणा ,विद्रोह  शब्दाशब्दात जाणवतो.ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी काव्य हे माध्यम प्रभावीपणे वापरलं.त्याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर नक्कीच झाला.

या काव्यात उद्विग्नतेबरोबर उपहासही जाणवतो…

शिवाय ही कविता, आता काळ ओलांडून गेली असेही वाटत नाही.ती कालातीत आहे.

जेव्हांजेव्हां माणसाच्या मनावर वैचारिक गंज चढतो तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलामच बनतो.आज देश स्वतंत्र असला तरीही एक बौद्धीक पांगळेपण समाजात जाणवतं. अशावेळी सावरकरांची ही वृषोक्ती नक्कीच परिणामकारक आहे..

२६फेब्रुवारी हा सावरकर   यांचा स्मृतीदिन!! त्या निमीत्ताने त्यांच्या कवितेतलं हे विचार मंथन…

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print