☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कुसुमाग्रजांची एक कविता आहे,
‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरली जणु तारकादळे नगरात,
परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हां,
त्या माजघरातील मंद दिव्याची वात.’
आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणार्या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरात रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणार्या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो, “मन एव मनुष्यः”, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.
(पुलंनी अमेरिकेत केलेल्या एका भाषणातून)
संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘सॉरी’ हा इंग्रजी शब्द खूपच कॉमन आहे. सरसकट तो सगळीकडं वापरलेला दिसतो. गंमत म्हणजे तान्हुल्या बाळालाही आई साॅरी म्हणताना आढळते. विनोदाचा भाग सोडला तरी हा खरोखरच एक जादुई शब्द आहे हे मात्र नक्की. सॉरी जितक्या सहजपणानं तोंडी येतं तितकं सहज; ‘ माफ करा हं!’,म्हंटलं जात नाही. तसं पाहिलं तर हे दोन्ही शब्द कानावर पडताच रागाचा पारा खाली जातोच.
आपल्या नकळत जेव्हा काही चूक घडते तेव्हा सॉरी म्हणताच वातावरण निवळते. उदा. एखाद्याला चुकून धक्का लागला तर सॉरी म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर इट्स ओके ची स्मितरेषा उमटतेच. पण खरच चूक होते तेव्हा? ज्या व्यक्तीची चूक असते तीनं सॉरी म्हणणं अपेक्षित असतं. परंतु मीच का सॉरी म्हणू अशी आढ्यता बाळगणारे अधिक असतात.
हा शब्द नाती जपतो. मान, अपमान, अहंकार यापेक्षा नाती ज्याला महत्त्वाची वाटतात तो सहजपणानं माफी मागून रिकामा होतो. तर ज्याला अहंकार , मी पणा महत्त्वाचा वाटतो, तो दुसऱ्याला नाक कसं खाली घालायला लावलं यातच समाधानी राहतो. अशी अहंकाराची वाळवी लागलेली नाती टिकणं दुरापास्त असतं. गंमत म्हणजे असे लोक जिथं गरज नाही तिथं साॅरी म्हणताना दिसतात.
सॉरी योग्य वेळी म्हणणं ही तितकंच गरजेचं असतं बरं. समजा एखाद्या ची काही वस्तू हरवली किंवा आपल्याकडून कोणाचं काही नुकसान झालं तर लगेचच सॉरी म्हणावं. नुकसानभरपाईचा प्रयत्न ही जरुर करावा. परंतु बघू, म्हणू केंव्हातरी किंवा त्यात काय एवढं असा विचार केला , माफी मागायला वेळ झाला तर नात्यातील तणाव वाढत गेलेला दिसतो. बऱ्याचदा अशा नात्यातून बदसूरच उमटतो.
सॉरी वेळेवर म्हणणं जसं महत्त्वाचं तसंच माफी मागण्याची पद्धत ही महत्त्वाची! रागारागानं, आदळ आपट करत सॉरी म्हणताना माफी मागणाऱ्याची नाराजी व्यक्त होते. आक्रस्ताळेपणानं चिडचिड करत माफी मागणं अयोग्यच. तर गोड लडिवाळ आवाजात सॉरी म्हणणारी व्यक्ती मनापासून माफी मागतेय हे जाणवतं. हात जोडून किंवा कान हातात पकडून माफी मागितली की समोरच्याचा पारा एकदम उतरतो.
एखादी जादूची कांडी फिरवावी तसा हा शब्द काम करतो. समोरच्या माणसाला हसवतो. त्याच्या चेहऱ्यावरील शंका दूर करतो. पुन्हा नव्यानं संवाद साधायला मदत करतो. रागाला पळवून लावतो. जाने दो म्हणत पुन:श्च हातात हात गुंफले जातात. खांद्याला खांदा लावून कामं केली जातात. माणसा माणसांमधील सहकार्य वाढतं. खेळीमेळीचं वातावरण निर्माण होते. हा शब्द मैत्री टिकवायला, मैत्री निभावून न्यायला, मैत्री निर्माण करायला देखील धावून येतो.
हा शब्द आपल्या शब्द कोशातला नाही आहे. तसा तो परकीय आहे. तरीही तो आपला मित्र आहे. कितीतरी गोष्टींसाठी सीमा, प्रांत, देशाच्या सीमा आपण ओलांडल्या आहेत. रितीरिवाज, परंपरा, वेषभूषा, खाद्यसंस्कृती अशा खूपशा बाबतीत आपण बदल करतो.गरजेपेक्षा सोयीचा विचार करुन वेषांतर किती सहज केले ना आपण? धोतरा ऐवजी शर्ट पॅंट आले, साडी ऐवजी देखील ट्राऊझर्स- टॉप्स आले. हे बदल जितके आवश्यक तितकेच चांगलेही आहेत. मग शिष्टाचाराचे नियम तितक्याच प्रमाणात वापरायला काहीच हरकत नसावी.
ग्लोबल च्या नावाखाली लोकल विसरतो. अगदी रोज बोलताना देखील कितीतरी इतर भाषेतील शब्द वापरतो.पण सॉरी म्हणण्यात बहुतेक वेळा कमीपणा समजतो. या लहानशा शब्दाला ओठांवर आणायचे टाळतो.
तसंही नकळतपणे का होईना, दुसऱ्याचं मन दुखावलं गेलं की आपणही थोडे उदास होतो. खरं ना? मग काय हरकत आहे या जादूवाल्या शब्दाशी दोस्ती करायला?
माणूस हा सोशल प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. समाजात, नातेवाईंकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तो करतो ते व्यवहार भावनांनी युक्त असतात. कोरडेपणानं होत नाहीत. एकूण काय , नात्यातील, व्यवहारातील, सकारात्मकता वाढवण्यासाठी, नाती अधिक सुदृढ करण्यासाठी थॅंक्यू इतकंच सॉरी म्हणणं महत्त्वाचं.
आज 25 फेब्रुवारी अनुजाचा वाढदिवस. या दिवशी 2003 साली मी दूसऱ्यांदा आई झाले. पहिल्यांदा 1998 साली डॉ.प्रेरणाचा जन्म झाला तेव्हा. आईपण हे काय रसायन आहे हे मी गेली 25 वर्षे अनुभवती आहे. पण आईपण सुरु झाल्यापासून मी मला शोधण्याचा प्रयत्न करते. मी मला कायम आई म्हणूनच सापडते. मी माला दवाखान्यात काम करताना शोधले. मी मला माझ्या नात्यात शोधले. मी मला घरात, घरा बाहेर शोधले पण मी मला नेहमी आई म्हणूनच सापडले. आईपण खूप पछाडून टाकतं हे मला इतकं माहितच नव्हतं. आणि आज मुली मोठ्या झाल्या तरीही आईपण थोडं सोडवू पाहते पण अजिबात सुटत नाही.
माझ्या जीवनाला कलाटणी म्हणजे आईपण. माझ्या जगण्यातला सर्वोच्च अविष्कार म्हणजे आईपण. माझ्या जीवनाचं अतिम सत्य म्हणजे आईपण. माझ्या माणूसपणातील सर्वात रोमांचकारी, अनाकलनीय, सर्वोत्कृष्ट निर्मितीचा आनंद म्हणजे आईपण. प्रेम, विश्वास, जिव्हाळा, निष्ठा, कर्तव्यतत्परता, जबाबदारी, काळजी, समर्पण म्हणजे आई. आईपणात वेदना आणि दुःख अमाप आहे. आई त्या वेदनांचा, दुःखाचा सोहळा उत्सव करते. ही आईपणाला गवसलेली अनोखी शक्ती आणि युक्ती म्हणायला हरकत नाही.
मी अजूनही स्वतःला शोधत राहते पण आई म्हणूनच सापडते. माझ्या दवाखान्यात, माझ्या कवितेच्या ओळीतही मी आई म्हणूनच सापडते…!
नाही उमगत मी मला अजूनही…!
मला आईपण बहाल केल्याबद्दल मी माझ्या दोन्ही मुलींची ऋणी आहे. माझा जोडीदार या दोघींच्या बाबांचे नामदेवचे धन्यवाद मानालाच हवेत !
सर्व आईंना मनापासून सलाम ! 🙏🏻
– डॉ.सोनिया कस्तुरे
9326818354
25/02/2022
संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग 2 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
‘कशी आहे ती?’ शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!
आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोषाख ही बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना ही बदलल्या. लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ कमी मिळू लागला. त्यामुळे तिथेही शॉर्टकट शोधण्यात आले. आताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक दागिने बाजारात आले. अर्थात सोन्याच्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या तासाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील तर असे नटून-थटून जाणे स्त्री ला आवडत तर नाहीच पण सोयीचेही नसते!
त्यामुळे स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा गेल्या दहा-वीस वर्षात आपल्या डोळ्यासमोर उभी झाली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला आहे. तरीही स्त्रीची नटण्याची हौस ही संपलेली नसते. ती स्वतःला सोयीनुसार सजवून आकर्षक ठेवते.यातून तिची जगण्याची उर्मी दिसते. लोकल मधून जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या स्त्रिया लोकल मध्येच सण उत्सव साजरे करतात. अगदी केळवण, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम सुध्दा हौसेने करतात. स्त्री अशी उत्सवप्रिय आहे. ती मायाळू आहे. आयुष्य जगण्याची तिला आस आहे. स्त्रीचे सारे जगणे एक उत्सव आहे. लहानपणापासूनच मुलगी म्हणून स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. संसार मांडण्याची तिला आतून ओढ असते. पूर्वीच्या काळी छोट्या मुली चूल,बोळकी घेऊन खेळत असत. आत्ताच्या मुलींच्या खेळात मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस या सारख्या उपकरणांची खेळण्यात भर पडली आहे. परकर पोलकं घालणारी आणि आईला साडीत पाहणारी मुलगी आता लहानपणापासून च ड्रेस,मिडी,मॅक्सी यामध्ये सहजतेने वावरते. हे बदल आपल्याला आता दिसतात.
स्त्रीचे पोषाखा बरोबरच व्यक्तीमत्व ही बदलत गेले आहे.
काळ बदलला, आता स्त्री ही पायपुसण्यासारखी नसून ती समाजात स्वतंत्रपणे वावरणारे व्यक्तिमत्व आहे! शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा ती उमटवत असते. अजूनही खेड्यापाड्यातल्या स्त्रीला अजूनही हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग नक्कीच वाढला आहे. नजीकच्या काळात असे भाग्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
“मोऱ्या रोज गपचूप पेपर ठेवून गुल होतोस, आज वेळ आहे वाटत बोलायला ?”
“थोडा वेळ आहे खरा पंत आणि तुमचा सल्ला सुद्धा हवा होता, म्हणून हाक मारली !”
“म्हणजे कामा पुरता पंत आणि चहा पुरती काकू ! काय बरोबर नां ?”
“पंत कसं आहे नां सध्या कामाच्या गडबडीत, बरेच दिवसात काकूंच्या हातचा आल्याचा चहा पोटात गेला नाही त्यामुळे पोट जरा कुरकुर करतच होतं, म्हणून म्हटलं एकात एक दोन कामं उरकून टाकू !”
“बरं, बरं, कसा काय चालला आहे तुझा नवीन लघुउद्योग ?”
“एकदम मस्त ! तुम्हीच तर गेल्या वेळेस बोलणाऱ्या कुकरची आयडिया दिलीत आणि त्याला भरपूर रिस्पॉन्स मिळतोय समस्त भगिनीवर्गाचा !”
“चांगलं आहे ! आज काय कामं काढलं आहेस मोऱ्या, कुठल्या बाबतीत सल्ला हवा आहे तुला ?”
“पंत, आता बोलणाऱ्या कुकरची प्रॉडकशन लाईन सेट झाली आहे माझी ! आता लोकांना आवडणार, उपयोगी पडणार तसंच दुसरं कुठलं तरी नवीन प्रॉडक्ट काढायचा विचार मनांत येतोय, पण काय प्रॉडक्ट काढावं तेच कळत नाही ! म्हणून म्हटलं तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया वगैरे आहे का हे विचारावं, म्हणून आलोय !”
“आहे नां, नसायला काय झालंय ? उगाच का डोक्यावरचे गेले ?”
“काय सांगता काय पंत, नवीन प्रॉडक्टची आयडिया….”
“अरे आज सकाळीच माझ्या या सुपीक डोक्यात आली आणि आज तू जर का भेटला नसतास ना, तर मीच तुला बोलावून घेवून सांगणार होतो ती नवीन आयडिया !”
“पंत आता मला धीर धरवत नाहीये, लवकर, लवकर सांगा तुमच्या डोक्यातली नवीन आयडिया !”
“अरे मोऱ्या, आमच्या सगळ्या सिनियर सिटीझनचा हल्ली एक हक्काचा आजार झालाय, त्यावर एखाद औषधं…..”
“काय पंत ? आजारावर औषधं द्यायला मी डॉक्टर थोडाच आहे ?”
“अरे गाढवा, आधी माझं बोलणं तरी नीट ऐकून घे, मग बोल !”
“सॉरी पंत, बोला !”
“अरे, आजकाल स्मरणशक्ती दगा देते आम्हां सिनियर सिटीझन लोकांना आणि साधा डोळ्यावरचा चष्मा कुठे काढून ठेवलाय तेच वेळेवर आठवत नाही बघ !”
“बरं मग ?”
“मला एक सांग मोऱ्या, तुम्हां हल्लीच्या तरुण पोरांना सुद्धा, तुमचा मोबाईल तुम्हीच तुमच्या हातांनी, कुठे ठेवला आहे ते पण कधी कधी आठवत नाही, काय खरं की नाही ?”
“हॊ पंत, मग आम्ही लगेच…..”
“दुसऱ्या मोबाईल वरून कॉल करतो आणि रिंग वाजली की मोबाईल कुठे आहे ते तुम्हाला बरोब्बर कळतं, होय नां ?”
“बरोबर पंत ! पण त्याचा इथे काय संबंध ?”
“सांगतो नां ! आता तू काय कर, चष्म्याला GPS tracker लावून द्यायचा नवीन उद्योग सुरु कर ! म्हणजे काय होईल अरे माझ्या सारखी सिनियर सिटीझन मंडळी कुठे चष्मा विसरली, तर मग तो शोधायला प्रॉब्लेम यायला नको, काय कशी आहे नवीन उद्योगाची आयडिया ?”
☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते!
पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे.
श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो.
काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!
थोडी पुढच्या वर्गात होती समिधा अगदी निम्न मध्यम वर्गातलीच म्हणा ना.
समिधा फार हुशार परिस्थितिची जाणीव असलेली आणि समजूतदार होती.
दिसायला तर ती छान होतीच,पण खूप हुशारही होती समिधा.
समिधाला लहान भाऊही होता, अगदी पाठोपाठचा तोही हुशार होता.
समिधाच्या आईने आम्हाला एकदा हळदीकुंकवाला बोलावले होते.
अगदी साधेसुधे, 3 खोल्यांचे पण नीटनेटके ठेवलेले घर.
त्या स्वत:ही शिकलेल्या होत्या पण घरीच असायच्या.
समिधा बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये झळकली. .समिधाला खूप बक्षिसेमिळाली.
तिचे आईवडील पेढे घेऊन आले आमच्या घरी.
समिधा ला इंजिनिअर व्हायचे होते.
बारावीला तिने कसून अभ्यास केला.
तिला सुंदरच मार्क मिळाले आणि तिला चांगल्या कॉलेज मध्ये सहज मिळाली ऍडमिशन.
लागोपाठ ,तिचा भाऊ समीर ही होताच.
तिच्या वडिलांची, ओढाताण होत होती दोन्ही मुलांच्या फी, पुस्तके,क्लास ची फी भरताना. पण मुले हुशार होतीच.
समिधा च्या पाठोपाठ समीरही इंजिनीरिंग ला गेला.
समिधाच्या अंगावर अगदी साधे तेच तेच ड्रेस असत. पण तिने कधीही तक्रार नाही केली. ज्या कॉलेज मध्ये मुली नुसत्या फुलपाखरा सारखे स्वच्छंदी जीवन जगतात, मौजमजा करतात, त्याच ठिकाणी समिधा अतिशय साधी कोणत्याही मोहाला बळी न पडणारी होती.
मला फार कौतुक वाटायचे त्या कुटुंबाचे बघता बघता समिधा इंजिनिअर झाली तिला कॅम्पस interview होऊन लगेचच जॉब ही मिळाला.
किती आनंदात पेढे घेऊन आली समिधा.
त्या कुटुंबाची मी फॅमिली डॉक्टरही होते.
समिधा जॉईन झाली कंपनीत.
खूप चांगले पॅकेज मिळाले तिला.
पण ती होती तशीच साधी राहिली.
पण हळूहळू,तिच्यात चांगला बदल झालेला दिसू लागला.
छान कपडे,थोडा मेकअप तिचे रूप खुलवू लागला.
पूर्वी जरा गंभीरच असलेली समिधा आता हसरी खेळकर दिसू लागली.
मला तिच्या आजीला बरे नव्हते म्हणून घरी visit ला बोलावले होते मी घरात पाउल ठेवले मात्र.
मला घरात लक्षणीय बदल जाणवला घर तेच होते, पण आता उत्तम महाग रंग लावलेला, ज्या घरात फ्रीझही नव्हता तिथे मोठा फ्रीज,भारी सोफासेट.
घर खूप सुंदर आकर्षक दिसत होते.
भारी कपबशीत मला समिधाच्या आईने चहा दिला पूर्वीचा,जाड कपबशीतला, चहा आठवलाच मला.
लक्षात येण्यासारखे घर बदलले होते।छानच वाटले मला.
पण ही किमया घरात येणाऱ्या समिधाच्या पगाराची होती,हे माझ्या चाणाक्ष नजरेला समजलेच.
समिधाच्या आईला मीम्हटले, आता छानसा जावई आणा.
हसत हसत हो म्हणेल हिला कोणीही.
कायग, जमवलं आहेस का कुठे नाही हो काकू. मी सध्या ऑफिस झाले की क्लास लावलाय जावा चा.
बाबा म्हणाले,मग तुला प्रमोशन मिळेल.
मला हे कुठेतरी खटकलेच.
बाबा बेरकी पणे,माझ्याकडे बघत होते.
मी घरी आले पण समिधा चा विचार जाईना मनातून.
तिच्या पेक्षा थोडीच लहान असलेली माझी इंजिनीअर मुलगी, किती मस्त मजेत होती.
तिच्या मित्र मैत्रिणींचा घोळका घरी येतअ सायचा. तिलाही खूप पगार होताच पण आम्ही कधीही तिला विचारले नाही तीच सांगायची,आई,मी अमुकअमुक इन्व्हेस्टमेंट्स केल्यात समिधा मला या ना त्या कारणाने भेटत राहिली.
माझा जनसम्पर्क तर खूपच असतो समिधा आली होती, त्याचदिवशी एक बाई औषधासाठी आल्या होत्या छान आहे हो मुलगी डॉक्टर.
करतेय का लग्न.
माझा भाचा आहे लग्नाचा. बघा, त्यांनी त्या मुलाची माहिती,पत्ता मला दिला.
मी उत्साहाने समिधाच्या आईला ती माहिती दिली.
मग बरेच दिवस काही समजले नाही म्हणून मीच त्या बाईना विचारले त्या म्हणाल्या,अहो,त्या समिधाच्या आईकडून काहीच नाही आले उत्तर मला आश्चर्य वाटले.
नेमक्या समिधाच्या आईच दवाखान्यात त्या दिवशी आल्या मी त्यांना विचारले,तरमाझी नजर चुकवत म्हणाल्या,हं हं,ते होय.
अहो पत्रिका नव्हती जमत, मग नाही गेले बाई मी.
एक दिवस समिधा एका मुलाला घेऊन माझ्या दवाखान्यात आली.
काकू,हा माझा टीम लीडर आहे, संदीप याला तुम्ही मेडिकल certificate द्याल का .
मुलगा छानच होता .मी लगेच त्याला हवे ते certificateदिले दुसऱ्यादिवशी समिधा आली थँक्स हं काकू.
मी म्हटले,ते जाऊं दे ग,
छान आहे की ग मुलगा.
नुसताच मित्र आहे का आणखी काही.
समिधा हसली, म्हणाली काकू कित्ती चांगला मित्र आहे माझा तो.
त्याला कशाला नवऱ्यात बदलायचे.
काल गेला चीन ला, आता 3 महिने नाही येणार मी म्हटले,समिधा, चांगला मित्र, चांगला नवराही होऊ शकतो.बघ.
सगळ्या दृष्टीने मला आवडला हा तुझा मित्र.
असेच दिवस पुढे जात होते अचानक एक दिवस,संदीप दवाखान्यात आला म्हणाला,काकू ,थोडे बोलू का. अरे बोल की म्हणाला,मी चीन ला गेलो,तो पर्यंत मला समिधा बद्दल तसे काहीही वाटत नव्हते पण मला समजले की मी तिला खूपच मिस करतोय काकू,मला लग्न करायचंय तिच्याशी
तुम्ही बोलाल का तिच्याशी
अरे, मी कशाला, तू तिला जा घेऊन तुमच्या ccd मध्ये आणि बिनधास्त विचार
ती नाही म्हणणार नाही बघ
तो म्हणाला, करू असं मी?
अरे करच. ती नक्की हो म्हणेल
दुसऱ्याच दिवशी दोघेही हसत हसत आले दवाखान्यात.
काय रे मुलांनो, काय म्हणता
समिधा लाजली आणि म्हणाली
काकू, तुम्ही कित्ती बरोबर ओळखलंत
मलाही चैन पडेना, हा 3 महिने नव्हता तेव्हा .
आम्ही लग्न करायचे ठरवलेय.
ती म्हणाली, आई बाबांना आवडले नाही
मी परस्पर लग्न ठरवलेले.
म्हणाली इतकी घाई का करतेस
याहूनही चांगला मुलगा मिळेल की तुला
काकू,मी इतकी अडाणी राहिले नाहीये हो
मलाही माहीत आहे, खूप मुले आईने
माझ्या पर्यंत येऊच दिली नाहीत
पण मी तिला दोष नाही देणार
पण मी आता 27 वर्षाची आहे,
यापुढे
कधी मी लग्न करणार .
मला खात्री आहे, आम्ही या लग्नाने सुखी होऊ
समिधाच्या लग्नाला अर्थातच मी हजर होते
संदीप च्या आईने मला सुंदर साडी दिली
म्हणाली, तुमच्या मुळे छान सून मिळाली हो आम्हाला
सगळे सांगितलंय आम्हाला संदीप ने
वधुवेशातली सुंदर समिधा आणि तिला शोभणारा जोडीदार बघून मला अतिशय समाधान वाटले.
काल आणि आजही जगात सगळीकडेच महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन, मेजवान्या, कौतुकाचा वर्षाव, सुभाषिते, कविता, सुंदर लेख, भाषणे, नृत्य-गायन व लघुनाटीकांचे आयोजन होत आहे. सजून सवरून महिला ही या सर्वांचा आनंद लुटत आनंदी होत आहेत. पण हा उत्सव फक्त या एक दोन दिवसांचा नसावा. तर त्यांचे महत्व सदोदित जाणून तसे त्यांचेशी वर्तन असावे व त्यांनीही आपला मुळ प्रेमळ काळजीवाहू स्वभाव टिकवून ठेवत कौतुकास्पद होऊन रहावे.
अशाच एक कर्तबगार महिला, सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे या समुपदेशक असून त्यांना महिलांशी संबंधित व नातेसंबंधातील इतरही प्रश्न हाताळत असतांना निरनिराळे अनुभव व स्वभावछटा जाणवत असतात. विविध वृत्तपत्रांत त्यांचे मार्गदर्शक लेख ही येत असतात. या आधिही त्यांचे लेख सामायिक केलेले आहेतच. आलेल्या अनुभवांवरून त्यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा.
– मेघःशाम सोनवणे
– 🌼 –
महिला दिनाचा संकल्प करूयात,
घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात !!!!
आठ मार्च, जागतिक महिला दिन !!! विविध स्वरूपात कार्य, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवलं जाईल, त्यांचा आदर, सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्री ला देवी चे रुप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्री ला बहाल करुन तिच्या शिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाच्या उत्कंठ भावना दाटून येतील यात शंकाच नाही !
महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करुन घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही.
पण खरंच प्रत्येक महिलेला, जिला समाजात नावाजलं जातं, तिच्या कार्य क्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जातं, जिच्या कार्याची, कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्या साठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिक पणे आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर “नाही !!!!” असंच येईल, आणि येते आहे.
समुपदेशनाला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील असे स्थान नाहीये.
आपल्याला अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणी नुसार स्त्री ही घरची लक्ष्मी आहे !! घरातील माता, पत्नी, सून ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं, हे पातक आहे !!
घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी, समाधानी हवी ! असं असलं की संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अश्या घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात, हिच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.
आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारतांना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.
समुपदेशन मधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करुन करुन प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उध्वस्त झालेली आहे, मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थिती शी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं देणं नाहीये !
तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.
हिच घरा घरातील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले? माझे आईबाबा कुठे चुकले? माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केलं? मी कोणाशी वाईट वागले? मी च का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना??? कधी महत्व कळेल यांना माझं?
अश्या असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहाते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहाते.
समुपदेशनला आलेल्या अनेक महिला, ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत, त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण तणाव, दररोज चे वाद विवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवेदावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी??? अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय?? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृह लक्ष्मी का?? ही आपली पौराणिक, अध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही…… आणि कधीही नव्हती !!
सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून थटून, भरजरी साडया नेसून, नट्टा पट्टा करुन, दाग दागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय?? यावर विचार होणे आवश्यक आहे.
या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणीतरी समजावून घ्यावं ऐकून घ्यावं म्हणून!!!
या महिला दिनाला एकच करूयात. इथून पुढे घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात… जी आपल्या घरात लग्न लावून आली, तिला शेवटच्या श्वासापर्यंत न्याय देऊयात !!! तिला समजूयात, तिला सामावून घेऊयात, तिला स्वीकारुयात आणि तिला नाही तर तिच्या अंतःकरणाला हसताना, तिच्या मनाला मोहरताना पाहुयात. ज्याला हे जमलं त्यानं जग जिंकलं… ज्यानं हे केल त्यानं सर्व काही कमावलं!
(हा लघुलेख आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती. -मेघःशाम सोनवणे. दररोज अशा सकारात्मक कथा व लेखांसाठी 9325927222 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा.)
स्वतः लेखिका सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे यांच्या सौजन्याने.
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : ब्रह्मवादिनी सुलभा
वदिक काळात स्त्रियांना खूप मान होता. मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण पण त्यांना मिळत असे. त्यांचे उपनयन सुद्धा होत असे. ब्रह्मवादिनी स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळत. विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करत. सुलभा कुमारी संन्यासिनी होती. ती अत्यंत चतुर विद्वान आणि बुद्धिमान होती. प्रधान नावाच्या राजाची ती कन्या. तिने आजन्म ब्रह्मचारी राहून वेद विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास व स्वतंत्र लेखनही केलं. ब्रम्हा यज्ञाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तर्प णात गार्गी ,मैत्रेयी, वाचक्नवी यांच्याबरोबरच सुलभा चे नाव घेतले जाते. ती आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तपअर्जिता, ओजस्वी आणि तेजस्वी स्त्री होती. तिने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक स्वतंत्र आश्रम उभे केले. परकायाप्रवेश याचे ज्ञान तिने मिळवले होते. त्याआधारे ती राजा जनकाच्या शरीरात प्रवेश करून विद्वानांच्या बरोबर शास्त्रशुद्ध चर्चा करत असे. ती सतत प्रवास करून धर्माचा उपदेश आणि प्रसार करत असे. तिला तिच्या योग्यतेचा वर मिळाला नाही म्हणून तिने लग्न केले नाही.
महाभारताच्या शांतिपर्वामध्ये जनक राजा आणि सुलभा यांचा संवाद विस्तारपूर्वक वाचायला मिळतो. तिने आपल्या वाणीचे आठ गुण आणि आठ दोष यावर विशेष अभ्यास केलेला आहे.
तिला एकदा कळले की राजा जनक अहंकारी झाला आहे. तिने त्याला भेट देण्याचे ठरवले. त्याला भेटण्यासाठी तिने आपल्या योगाच्या बळावर मूळ शरीर टाकून देऊन सुंदर रूप धारण केले. आणि मिथिला नगरीत आली. भिक्षा मागण्याचा बहाणा करून राजा जनकाच्या समोर आली. राजा जनक तिच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाला त्याने तिचे स्वागत केले. पाय धुवून यथोचित पूजा करून उत्तम जेवण दिले. जनक राजाने विचारले.,”तू ब्राम्हणी संन्यासिनी आहेस का?”सुलभ उत्तरली” मी क्षत्रिय कन्या .योग्य पती न मिळाल्यामुळे मी लग्न केले नाही. व्रतस्थ राहते”. राजाने विचारले
“खरे शहाणे कोण?” सुलभा उत्तरली “ज्ञानी माणूस कधीही स्वतःची स्तुती करत नाही तो कमी बोलतो आणि मौनात राहतो.मग तो राजा असो ,ग्रहस्थ असो अथवा संन्यासी असो.” जनक राजाला आपली चूक समजली. तो म्हणाला ,,”सुलभा ,तू माझे डोळे उघडलेस. तू खरी ज्ञानी आहेस. मी तुझे बोलणे लक्षात ठेवून यापुढे वाणीवर संयम ठेवीन.”
अशाप्रकारे महाज्ञानी जनकराजाला वठणीवर आणणारी ब्रह्मवादिनी सुलभा. तिला कोटी कोटी प्रणाम.