मराठी साहित्य – विविधा ☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

इतरांसह एकत्रितपणे काहीतरी  वस्तू वापरणं किंवा त्याचा आनंद घेणं म्हणजेच आजकालच्या भाषेत शेअरिंग. शेअरिंग ही एक प्रोसेस आहे. शेअर करणं म्हणजेच थोडक्यात एखाद्याला सरळ सरळ गिफ्ट देणं. हे शेअरिंग जागा, वेळ, पुस्तक, खेळ, खाऊ अशा कोणत्याही गोष्टींचं असू शकतं. तसं पाहिलं तर हा आजकलचा की- वर्ड झाला आहे. फाईल शेअरिंग, स्क्रीन शेअरिंग, मेसेजेस, फोटोज्, माहिती, व्हिडिओज् इ. इ. . . आजच्या न्यू ऑप्टिक युगात किंबहुना इंटरनेट कल्चर मध्ये हा एक अनेक कामं सुसंगत पणे पार पाडण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेले आपण शेअरिंग शिवाय काम करूच शकत नाही. लॉकडाऊन च्या काळात; वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना तर  आंतरजालाच्या गुहेत संचार करण्यासाठी शेअरिंग खूपच महत्त्वाचं असतं. एवढंच नव्हे तर इंटरनेटचा वापर फारसा न करणारेही या आंतरजालात गुरफटलेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर. . बघा हं. . .  काशी विश्वेश्वराचं जिर्णोद्धारामुळे बदललेलं भक्तीरस जागृत करणारं  रुप आपल्याला घरात बसून बघता येतं. . . . त्याचं नेत्रसुख मिळवता येतं, भाविकांना काशी दर्शनाचा लाभ मिळतो. हे शक्य होतं ते काशी विश्वेश्वराचा व्हिडिओ सोशल मेडियावर शेअर केल्यामुळेच ना!

इंटरनेट वर माहिती शेअर करणं हे आता फारच सामान्य झालं आहे. पण मुळात शेअरिंग करणं, एकमेकांना देणं, या आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग असलेल्या संकल्पनेला विसरत चाललो आहोत. आपल्या मागच्या पिढ्या शेअरिंग च्या बळावर वाढल्या, मोठ्या झाल्या. घरात बहिण भावंडांच्या बरोबर वह्या- पुस्तकं, रंगपेट्या, पोस्टर कलर्स, कंपास बॉक्स इतकंच काय कपडे देखील शेअर करुन वाढल्या या पिढ्या! आठवीत शिकणाऱ्या भावाचा भूमितीचा तास झाला की तो कंपास बॉक्स सहावीतल्या बहिणीकडं सुपूर्द केला जाई. केवढी सोय! केवढी बचत!! मोठ्या बहिणीचे कपडे घालण्यात लहान बहिणीला अपमान वाटत नसे.

मधल्या सुट्टीत डबा खाताना डब्यातील भाजी एकमेकांना दिली जाई. खिशातून आणलेल्या शेंगदाणे, फुटाणे, गोळ्या बिस्कीटं यांची देवाणघेवाण  नेहमीच होई. चिमणीच्या दातांनी रावळगाव आणि लिमलेटच्या गोळ्यांचा गोडवा वाढवला जाई.

आजच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात  मुलांना शेअरिंग शिकवावं लागतं. तेही जाणीवपूर्वक. न्युक्लिअर फॅमिलीच्या प्रॉब्लेम्सना तोंड देत वाढणारी ही पिढी, कोरोना व्हायरसनं त्रस्त झाली आहे. रंग रुप बदलतं, जगभर संचार करणाऱ्या या व्हायरसचं सोवळं पाळायलाच पाहिजे. ऑनलाईन शाळेमुळं एकत्र एका वर्गात, एका बाकावर बसून शिकणं जिथं नाही तिथं आपल्या दप्तरातल्या वस्तूंचं, डब्यातल्या खाऊचं शेअरिंग  केवळ अशक्य. चूकुन ही चूक झालीच तर . .बापरे. . शांतम् पापम्!!. किंबहुना मुलांना सुरक्षिततेसाठी शेअरिंग नको हेच नाईलाजानं शिकवावं लागतं. अर्थात सगळं माझंच आहे, एकट्याचंच आहे ही वृत्ती बळावली तर नवल नाही. एक तीळ सात जणांनी राहू दे, पण दोघांनी वाटून खाणं देखील दुरापास्त होऊन बसलंय. शेअरिंगमुळं केअरिंग वाढतं. असं जरी असलं तरी सध्या शेअरिंगचं फारसं केअरिंग न करणंच योग्य ठरेल.

कोरोना लवकरच गोठून जाऊ दे,  ‘केअरिंग’ करणारं माणसातलं खरंखुरं ‘शेअरिंग’ शेअर करता येऊ दे. . . तोपर्यंत टेक केअर.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! फेरा एकवीसचा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

💃 फेरा एकवीसचा ! 😅

“पंत हे तुम्ही काय चालवलंय ? “

“मोऱ्या अरे आज तुला झालंय तरी काय, नेहमी सारखा नमस्कार वगैरे करशील का नाही ?”

“नाही आणि करणार पण नाही,  कारण मी रागावलोय तुमच्यावर, म्हणून आज नमस्कार वगैरे विसरा !”

“ही तुला काही बोलली का मोऱ्या ?”

“काकू कशाला बोलतील मला?  मी तुमच्यावर रागावलो आहे म्हटलं ना !”

“अरे हो, पण मी पडलो साधा पेन्शनर, कुणाच्या अध्यात ना मध्यात, मग माझ्यावर रागावण्या सारखं मी केलय तरी काय, ते तरी सांग!”

“काय म्हणजे, परवा आपल्या वरच्या मजल्यावरच्या नितीनच्या मुलाचं बारस होत, तर…. “

“हो मस्त दणक्यात केलंन हो, आम्ही दोघे गेलो…. “

“ते बोलला मला नितीन, पण बाळासाठी अहेराच पाकीट… “

“न्यायला अजिबात विसरलो नव्हतो मोऱ्या, खरं सांगतो !”

“हो ते खरंय, पण पाकिटात पैसे… “

“सुद्धा आठवणीने एकवीस रुपये टाकले होते, पाहिजे तर विचार नितीनला !”

“बोलला मला नितीन त्याबद्दल.. “

“मग झालं तर !”

“तसच आठ दिवसापूर्वी केळकरांच्या मुलाची मुंज होती, तेव्हा पण….. “

“आम्ही दोघे जोडीने आवर्जून गेलो होतो बटूला आशीर्वाद द्यायला !त्याच्या लग्नाला आम्ही असू, नसू ! त्याला पण चांगला एकवीस रुपयांचा अहेर… “

“केळकर काका म्हणाले मला.”

“मग झालं तर, उगाच इतर काही लोकांसारखी रिकामी पाकीट द्यायची सवय नाही मला, कळलं ना मोऱ्या ?”

“ते ठाऊक आहे मला पंत, काही झालं तरी तुम्ही रिकामं पाकीट देणार नही ते. पण आता मला सांगा, गेल्या महिन्यात कर्णिकांच्या मंदाच लग्न होत, तर तिला सुद्धा….. “

“एकवीस रुपयाचाच आहेर केला होता आठवण ठेवून ! अरे लहान असतांना आमच्या राणी बरोबर खेळायला यायची आमच्या घरी. “

“पंत, मंदा लहानपणी तुमच्याकडे खेळायला यायची वगैरे वगैरे, ते सगळे ठीक आहे, पण तुम्ही बारस, मुंज आणि लग्न यात काही फरक करणार आहात की नाही ?”

“अरे मोऱ्या हे तिन्ही वेगवेगळे विधी आणि समारंभ आहेत, पूर्वी पासून चालत आलेले, त्यात मी फरक करण्या एव्हढा, कोणी थोर समाज सेवक थोडाच आहे ? हां, आता लहानपणी कुणाची मुंज राहिली असेल तर ती लग्नात लावता येते, पण बारस बाळ जन्मल्यावर बाराव्या दिवशी केल तर त्याला मुहूर्त बघायला लागत नाही असं म्हणतात, म्हणून लोक…. “

“पंत, मी त्याबद्दल बोलतच नाहीये !”

“मग कशा बद्दल बोलतोयस बाबा तू ?”

“अहो मी तुमच्या आहेराच्या रकमे बद्दल बोलतोय !”

“त्या बद्दल काय मोऱ्या ?”

“सांगतो ना पंत, तुमच्या दृष्टीने बारस, मुंज आणि लग्न यात  काही फरक आहे का नाही ? मग प्रत्येक वेळेस एकवीस रुपयाचाच आहेर, याच काय लॉजिक आहे तुमच, ते मला समजेल का ?”

“ते होय, त्यात कसलं आलंय लॉजिक ? त्याच काय आहे ना, अरे हल्ली, आपले आशीर्वाद हाच खरा आहेर, कृपया पुष्प गुच्छ आणू नयेत, अशा छापाच्या तळटीप प्रत्येक निमंत्रण पत्रिकेत असतात, तरी सुद्धा मी आठवणीने….. “

“सगळ्यांना एकवीस रुपयाच्याच आहेराची पाकीट का देता, हेच मला जणून घ्यायच आहे पंत आज !”

“मोऱ्या असं बघ, एकवीस या आकड्याच महत्व माझ्या दृष्टीनं फार म्हणजे फारच वाढलेलं आहे सध्या ! म्हणून मी सगळ्यांना एकवीस रुपयाचाच आहेर करतो हल्ली !”

“ते कसं काय बुवा पंत ?”

“सांगतो ना तुला. आपण या समारंभातून मिळणाऱ्या भोजनावर यथेच्छ ताव मारतो की नाही?”

“तसच काही नाही पंत, पण अशा समारंभात मी नेहमी पेक्षा थोडं जास्त जेवतो इतकंच !”

” बरोबर, तर त्याची अल्पशी परत फेड म्हणून…. “

“काय बोलताय काय पंत तुम्ही ? एकवीस रुपयाच्या पाकिटात कसली आल्ये परतफेड ? हल्ली अशा समारंभात माणशी जेवणाचे दर तुम्हाला…..”

“चांगलेच माहिती आहेत मोऱ्या ! हल्ली सातशे आठशेच्या खाली ताट नसतं ठाऊक आहे मला, पण म्हणून मी अल्पशी…. “

“पंत अहो तुमच्या अल्पला थोडा तरी अल्पार्थ आहे का सांगा बघू ?”

“आहे, नक्कीच आहे मोऱ्या !”

“हो का, मग म्या पामराला जरा तो समजावता का पंत ? “

“सांगतो ना मोऱ्या. आता असं बघ, सध्या शिवथाळी कितीला मिळते सांग बर मला ?”

“दहा रुपयाला !”

“बरोबर, म्हणजे सकाळी एक शिवथाळी आणि संध्याकाळी एक शिवथाळी या एकवीस रुपयात येवू शकते की नाही ?”

“हो पंत, म्हणजे एका माणसाचा एका दिवसाचा दोन वेळचा जेवणाचा प्रश्न सुटेल वीस रुपयात ! पण तुमच्या एकवीसच्या पाकिटातला एक रुपया शिल्लक राहतोच ना पंत ? त्याचे हल्लीच्या महागाईत खायचे पान सोडा, आपट्याचे एक पान पण येणार नाही पंत !”

“अरे पण माझ्या एकवीस रुपयाच्या आहेरातला तो उरलेला रुपया, पानासाठी वापरायचा नाहीच मुळी!”

“मग, त्या राहिलेल्या एक रुपयाचं करायच काय पंत ? पिगी बँकेत टाकायचा का ?”

“अरे नाही रे बाबा, पण जर का   शिवथाळी खाऊन तब्येत बिघडली, तर राहिलेल्या एका रुपयात सरकारच्या नवीन योजने प्रमाणे ‘आपल्या दारात आरोग्यचाचणी एक रुपयांत’ नाही का करता येणार ? म्हणजे लागला ना एकवीस रुपयाचा हिशोब !”

“धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य माझी मोऱ्या, मग कधी करतोयस लग्न बोल? म्हणजे

तुझ्यासाठी पण एक, एकवीसाचे अहेराचे पाकीट तयार करायला मी मोकळा !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०३-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

एकदा श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो… मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे. त्यासाठी तू माझी मदत कर. 

श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो. तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकच धोशा लावतो की मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

श्रीकृष्ण म्हणतो ठिक आहे.. मी तुला एक संधी देतो. पण माझी पण एक अट आहे… मी तुला जी संधी देईन, तीच संधी कर्णाला सुद्धा देईन आणि ह्या परीक्षेत तु कर्णापेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन श्रीकृष्णाची ही अट मान्य करतो.

श्रीकृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो.. आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक.. अट एकच एकूण एक सोने तु दान केले पाहिजेस.

लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की… मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने श्रीकृष्णाला सांगितले की बास….!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की…. या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तु लोकांना दान करून टाकायच्या…..

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की… या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

अर्जुन चकित होऊन पहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही… या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.

श्रीकृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला… अनावधानाने का होईना तु सोन्याकडे आकर्षित झालास…..! तु गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तु दान करत होतास…..! 

कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय… गुणगान गातंय… हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे… शुभेच्छा द्याव्यात… धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे… म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे… कार्य करावे…                                                  *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार. कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगलं द्या पदरी चांगलंच मिळेल.

‘आपलं काय चुकलं’ हे शोधायला हवं…. पण आपण मात्र ‘कुणाचं चुकलं’ हेच शोधत राहतो. …

लेखक –  अज्ञात

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपलं आयुष्य घडवत तरी असतो नाहीतर बिघडवत तरी ! वाचताना थोडं अतिशयोक्तीचं वाटेल पण हेच सत्य आहे.

रोजच्या धावपळीत आपण प्रत्येक क्षणी असणारी आपली मनोवस्था, आपली विचार करण्याची पद्धत आणि आपले स्वयंकेंद्री विचार यानुसारच येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सामोरे जात असतो व त्यामुळे प्रत्येक क्षण समतोल मनाने येईल तसा स्वीकारायचं भान सहसा आपल्याला रहात नाही. त्यामुळे त्या त्या वेळी आपल्या उमटणार्‍या प्रतिक्रिया नेहमीच अस्वस्थता, नाराजी, रुखरुख निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. कुणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकेल अशा एका अगदी साध्या प्रसंगाचं एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊ.

एका सकाळी थोडं लवकरच मी स्कूटरवरून रेल्वे-स्टेशनवर पाहुण्यांना रिसीव्ह करायला निघालोय.रस्त्यावरची नेहमीची वर्दळ अद्याप सुरु व्हायचीय. माझी स्कुटर बर्‍यापैकी वेगात आहे. गाडीची वेळ चुकू नये, आपण वेळेत पोचायला हवं हा एकच विचार मनात.आणि अगदी अचानक एका वळणावरून आत जाताना  समोरून सायकलवरून येणारा  आठ-नऊ वर्षाचा एक मुलगा माझ्या स्कूटरला धडकतो. पडतो. मी स्कूटर कशीबशी कंट्रोल करीत थांबतो.

त्या क्षणी येणाऱ्या माझ्या प्रतिक्रिया अर्थातच तो क्षण मी कसा स्वीकारलाय यावरच अवलंबून असणाराय हे ओघानं आलंच.

मी चिडून त्या मुलाकडे पहातो. तो दफ्तरातून बाहेर पडलेली आपली नोटबुक्स् गडबडीने गोळा करतो. दप्तरात ठेवतो.चोरट्या नजरेने माझ्याकडे पहातो.आपल्याला स्टेशनवर पोचायला उशीर होणार या विचाराने मला त्याचा प्रचंड राग येतो.माझं कपाळ आठ्यांनी भरुन जातं. आपण वेळेत पोचलो नाही तर पाहुण्यांना काय वाटेल हा विचार मन अस्वस्थ करीत असतो. तोवर कपड्यांवरची धूळ झटकून, आडवी झालेली सायकल कशीबशी उभी करुन तो मुलगा सायकल ढकलत चालत निघून जातो. त्या अस्वस्थ मनस्थितीत मी स्कूटर सुरू करतो. तरीही मनातला त्या मुलाबद्दलचा संताप काट्यासारखा सलतच असतो.  स्टेशनबाहेर घाईघाईने स्कूटर पार्क करून मी धावत आत जातो. ट्रेन आलेली नसते. घाईघाईने मी इंडिकेटरकडे धाव घेतो. पहातो तर ट्रेन थोडी लेट असल्याने ती यायला अद्याप दहा मिनिटे अवकाश असतो. मी थोडा निश्चिंत होतो.मनातला राग मग हळूहळू नाहीसा होतो.

मन थोडं स्थिर होताच जाणवतं की त्या प्रसंगात अचानक कांहीही घडू शकलं असतं हे खरं,पण जे घडलं त्यात तरी चूक त्या निष्पाप मुलाची होती की माझीच ? त्याच्या सायकलचा वेग तसा फार नव्हताच.पण स्कुटर वेगात असूनही लवकर स्टेशन गाठायच्या नादात मी वळणावर हाॅर्न न वाजवता स्कुटर तशीच रेटलेली असते.

अचानक समोर येऊन ठेपलेला तो क्षण आला तसा मी स्विकारलाच नव्हता.त्यामुळेच त्याक्षणी मी नेमकं काय करायला हवं ते मला सुचलंच नव्हतं. म्हणूनच स्टेशनवर वेळेत पोचण्याची निकड हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्नच बनला होता जसा कांही.त्यामुळेच ‘त्या मुलाच्या जागी आपला मुलगा असता तर?’ हा प्रश्न मनात उभारलाच नव्हता.आपण त्याला ‘तुला लागलं कां रे?’ एवढंतरी विचारायला हवं होतं खरंतर.पण तेही त्यावेळी सुचलंच नव्हतं.

तो क्षण आठवला न् त्या लहान मुलाची चोरट्या नजरेने माझ्याकडे पहाणारी नजर मला त्रास देत राहिली.

अनपेक्षितपणे समोर येऊन ठेपलेला ‘तो क्षण’ आहे तसा न स्विकारल्याने माझ्या मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला, माझ्या चुकलेल्या प्राधान्यक्रमांना, माझ्या चुकीच्या प्रतिक्रियांना मीच जबाबदार होतो.

तो क्षण समोर आला तसा स्विकारला असता तर परिस्थितीतलं गांभीर्य मला तत्काळ जाणवलं असतं.मी पटकन् स्कुटर स्टॅंडला लावून त्या मुलाकडे धाव घेतली असती. त्याला उठवून त्याला कांही दुखापत झालीय का हे पाहिलं असतं.त्याची सायकल उचलून उभी केली असती.त्या क्षणी कुणीही जे करणं अपेक्षित असतं तेच मी केलं असतं.

हा एक साधा प्रसंग.पण यापेक्षा कितीतरी विविध प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत येतच असतात. यश, अपयश, संधी,संकटं कांहीही सोबत घेऊन येत असणारे क्षण असतात ते.ते येतील तसे स्विकारले तरच स्थिर मनाने त्या क्षणी आपण योग्य असे निर्णय घेऊ शकतो. अपयशाने खचून न जाता त्यामागची कारणं शोधून आपण त्यांचं निराकरण करु शकतो. यशाने बेभान न झाल्याने आपले पाय जमीनीवरच ठेवून आपल्याला त्या यशाचा आनंद घेणे शक्य होत असतं.संकट असेल तर त्यावेळी नेमकं काय करायला हवं याचा शांतपणे विचार करता येतो.संधी असेल तर ती हातून निसटण्यापूर्वी त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार आपण करु शकतो.

आपल्या आयुष्यातल्या निसटून गेलेल्या अशा असंख्य क्षणांचं आज स्थिरचित्ताने विश्लेषण केलं तर क्षण कसा स्विकारावा याचं प्रतिनिधीत्व करणारे क्षण अपवादात्मकच आढळतील हे खरं,पण ते यापुढील आयुष्यासाठीतरी नक्कीच दिशादर्शक ठरतील !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : सत्यवती

सत्यवती ही महाभारताची मूळ स्त्री. ती राजा शंतनूची पत्नी, धृतराष्ट्र, पांडू विदुर आणि शुकदेव यांची आजी व कौरव-पांडवांची पणजी होती. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती भगवान वेदव्यास यांची आई होती. तिची जन्मकथा सुद्धा विलक्षण आहे.

पूर्वी सुधन्वा नावाचा एक राजा होता. तो शिकारीसाठी वनात गेला. इकडे त्याची पत्नी रजस्वला झाली. तिने गरुडा कडून ही वार्ता पतीला कळवली. त्याने आपले वीर्य एका द्रोणात भरून तिच्या साठी त्या पक्षाकडून पाठवले. वाटेत एका पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. द्रोणा तले वीर्य यमुनेत पडले. तिथे ब्रम्हा च्या शापामुळे मछली च्या रूपाने अद्रिका नावाची एक मछली होती. पाण्याबरोबर तिने ते वीर्य गिळले. ती गर्भवती झाली. दाशराज नावाच्या निषादाने तिला पकडले व तिचे पोट चिरले. त्यातून एक कन्या बाहेर आली. दाशराजाने ती सुधन्वा कडे नेली. पण तिच्या अंगाला फार घाण वास येत होता म्हणून राजाने स्वीकार केला नाही. दाशराजानेच तिचा सांभाळ केला. त्याने नाव ठेवले सत्यवती. तिच्या अंगाला माशांचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा हे नाव पडले. ती मोठी झाल्यावर होडी चालवण्यास शिकली.

एकदा परशुरामपुत्र पराशर ऋषी यमुनेकाठी आले. मत्स्यगंधाला पाहून ते तिच्या प्रेमात पडले. पण हुशार सत्यवती ने त्यांना नकार दिला. ती म्हणाली तुम्ही ब्रह्मज्ञानी आणि मी निषाद कन्या आपले कसे जमणार? पण पराशर ऋषी ऐकेनात तेव्हा तिने त्यांना तीन अडचणी सांगितल्या.

1) माझ्या अंगाला घाण वास येतो. पराशर ऋषीनी तो नाहीसा करून तिथे सुगंध निर्माण केला. आणि ती योजन गंधा म्हणून प्रसिद्ध पावली.

2) माझा कौमार्यभंग झाल्यावर माझे लग्न कसे होणार?

ऋषीनी  तिला वर दिला मुलाच्या जन्मानंतर तू अक्षत योनी होशील. कुमारिका होऊन तुझे दुसरे लग्न होईल.

3) आपले मीलन दोन्ही किनाऱ्यावरचे लोक बघतील.

ऋषीने दोघाभोवती संपूर्ण होडीवर दाट धुके निर्माण केले.

ते दोघे एका द्वीपा वर गेले. तिथे त्यांचा पुत्र व्यास जन्माला आला.

तो जन्मताच उभा राहिला व बोलू लागला “माते मी तपश्चर्या करण्यासाठी दूर निघून जाणार आहे पण तुला वचन देतो की तू जेव्हा संकटात सापडशील तेव्हा माझे स्मरण कर मी तुझ्यासाठी धावत येईन.”

पराशर ऋषींच्या वरदानामुळे सत्यवती हे सारे विसरून गेली व कुमारिका म्हणून जगू लागली.

एकदा शंतनू राजा तिथे आला. त्याला ती आवडली व त्याने दाश राज कडे लग्नासाठी मागणी घातली. तो म्हणाला तिचीच मुले राज्यावर बसतील व ती राजमाता होईल असे वचन द्या. शंतनू ला देवव्रत नावाचा मुलगा होता. त्यालाच तो राज्यावर बसवणार होता. पण सत्यवतीच्या प्रेमामुळे तो खंगायला लागला. देवव्रताने दाश राजाच्या अटी मान्य करून ब्रह्मचर्य पा पाळण्याचा निर्णय घेतला.

सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन मुलगे झाले. शंतनु च्या मृत्यूनंतर चित्रांगद गादीवर बसला पण एकदा गंधर्वाबरोबर युद्ध सुरू असताना तो मरण पावला. विचित्रवीर्य गादीवर बसला. सत्य वतीने त्याचे लग्न काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी लावून दिले. पण त्याला क्षयरोग झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. सत्यवती ला खूप दुःख झाले पण वंश पुढे चालू ठेवण्यासाठी तिने देव व्रताला लग्न कर असे म्हटले. पण तो म्हणाला माते तुझाच मुलगा राज्यावर बसेल असे मी कबूल केले आहे. तू तुझ्या मुलाला हाक मार. आणि एकाएकी सत्यवतीला पूर्वायुष्य आठवले. तिने व्याकुळ होऊन साद घातली आणि व्यासमुनी धावत आले. वंशवृद्धी साठी व आईची आज्ञा म्हणून त्यांनी नियोग पद्धतीने अंबिके शी संग केला. पण त्यांच्या तेजाने अंबिका खूप घाबरली व तिने डोळे मिटून घेतले. त्यामुळे तिला अंध पुत्र मिळाला. त्याचे नाव धृतराष्ट्र. अंध मुलाला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही असे सांगून सत्य वतीने अंबालिकाशी संग करण्यास सांगितला. पण व्यासांना पाहताच ती पांढरीफटक पडली. अशक्त पांडू जन्माला आला. सत्यवतीने पुन्हा अंबालिका ला गळ घातली. पण तिने आपल्या ऐवजी आपल्या दासीला पाठवले. विदुर जन्माला आला.

सत्यवती हताश झाली. तिने धृतराष्ट्राचे लग्न गांधारी शी लावून दिले. पांडू चे लग्न कुंती आणि माद्री यांच्याशी लावून दिले. शंभर कौरव आणि पाच पांडव यांची ती आजी झाली.

पांडूच्या मृत्यू नंतर ही फारच निराश झाली. व्यास त्रिकालज्ञानी होते. त्यांनी तिला वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात जाण्यास सांगितले. ती अरण्यात गेली. तिने अन्नत्याग केला. त्यातच तिचा मृत्यू झाला. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व सत्यवती उर्फ योजनगंधा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

सजगतेने निसर्ग पाहू.

निसर्गाचे आस्वादक होऊ.

एका बाजूला उन्हाळ्याचा दाह वाढत आहे आणि दुसरीकडे याच कालावधीत निसर्गात सुंदर अशी फुले फुलली आहेत. आपण आपल्या माना वर करून सजगतेने इकडे तिकडे पहायला हवे बस्स.

सुरुवातीला दिसू लागला तो निलमोहोर . सुंदर गडद निळसर असे झुबके संपूर्ण झाडावर पसरलेले आपणाला पहायला मिळतात. निलमोहराची मोहिनीच आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पाहातच रहावे असे वाटते.

त्यानंतर दिसू लागला तो पळस . आहाहा…

हाताची बोटे एकत्र करून वरती केल्याप्रमाणे याचा आकार. तशी जाडसर पाने असलेली भरपूर फुले. पानच नसतं या कालावधीत पळसाला. इतरवेळी उघडा बोडका वाटणारा पळस उन्हाळ्याची चाहूल लागताच आग लागावी तसा बहरतो. जंगलात पळसाची अगदीच कुठेकुठे झाडे असतील तर संपूर्ण झाडाला आग लागल्यासारखा भास होतो. म्हणून याला Flame of the Forest संबोधले जाते. पळसात पण विविधता आढळते. पळसाला पाने तीनच. असे म्हंटले जाते. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्या केल्या जातात. काही ठिकाणी पळस गर्द लाल चुटुक, तर काही अबोली, फिकट लालसर, तर पिवळाही काही ठिकाणी. पळस फुलल्यावर पक्ष्यांना एक छान मेजवानीच असते. पळसावर विविध प्रकारचे पक्षी मधुपानासाठी आलेली आपणाला पहायला मिळतात. त्यातल्या त्यात सूर्यपक्षी, साळुंखी,मैना आणि बुलबुल जास्तीत जास्त काळ पळसाचा आस्वाद घेताना आढळतात. पळसही दिसायला देखणा दिसतो. झाडाखाली पळस फुलांचा सडा पडलेला पहायला मिळतो.

याच कालावधीत काटेसावर ही फुलते. पळसासारखेच इतर मोसमात रुक्ष असणारे हे झाड उन्हाळा जवळ येताच सुंदर फिकट लाल वा गुलाबी वा केशरी फुलांनी बहरते. याला कमी पण सुंदर फुले लागतात. हाताची बोटे वर करून पसरल्याप्रमाणे याचा आकार असतो. यातही विविधता आढळते. ही फुलेही सुंदर, डोळ्यांना आनंद देणारी वाटतात. काटेसावर फुलांच्या मकरंदाचा आस्वादही अनेक पक्षी घेतात.

यानंतर वर्षातून दोनवेळा बहरणारा सोनमोहोर ही आपले लक्ष वेधून घेतोच. याचे झाड मात्र मोठे असते आणि भरपूर पिवळाई या कालावधीत या झाडाला आलेली असते. या कालावधीत झाडाखाली पिवळा सडाच पडलेला असतो. हेही झाड रखरखत्या उन्हात डोळ्याना छान आनंद देणारे असते.

जरा उशिरा फुलणारा गुलमोहर . यातही विविध प्रकार पहायला मिळतात. काही गुलमोहोर लालभडक, तर काही फिकट लालसर, तर काही फिकट गुलाबी. तर काही अबोलीच्या जवळ जाणारी रंगसंगती असते. काही गुलमोहर वर्षभर उघडे बोडके असतात, काही वर्षभर हिरवळ धारण करतात. पण जसा उन्हाळा जवळ येईल तसे झाडाला शेंगा लागायला सुरुवात होते. नंतर हळूहळू शेंगा फुटून लाल फुलांचा बहर झाडभर पसरतो. काही पूर्ण झाडे लाल भडक दिसायला लागतात, तर काहींवर थोडी हिरवी पालवी आणि गुलमोहराची लालिमा पसरलेली दिसते. खरच विविध प्रकारचा गुलमोहोर अबालवृद्धांचे मन मोहून टाकतो.

याच कालावधीत उशीरा फुलणारे आणखी एक सुंदर झाड म्हणजे बहावा ( गोल्डन शाँवर ). याही झाडाला कुसुमसंभार येण्यापूर्वी लांबुळक्या शेंगा लागतात आणि काही कालावधी नंतर शुभ्र पिवळी फुले लागायला सुरुवात होते. पाहतापाहता काही दिवसातच शुभ्र पिवळ्या फुलांनी संपूर्ण झाड लगडते. याचे गोल्डन शाँवर हे नाव समर्पक आहे. कारण, झाडभर शुभ्र पिवळे झुबके लोंबत असतात. या झाडावरही भरपूर पक्षी मधुपानासाठी येतात. विशेषकरून भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे भुंगे मधुपानाचा आस्वाद घेताना दिसतात. काय अप्रतिम नजारा असतो. आहाहा…

पाहतच रहावे असे वाटते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडावे आणि कोठूनतरी रातराणी चा सुगंध दरवळावा. सुगंध नाकात शिरताच एक क्षणभर समाधीच लागते. काय तो मोहक मंद सुगंध.     वाSSह.

 

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उबुंटू….अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?  विविधा ?

उबुंटू….अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

उबुंटू ही आफ्रिका देशातील एक सुंदर गोष्ट आहे.

उबुंटू हे प्रेरणादायी मानवतावादी तत्त्वज्ञान आहे.  

आफ्रिकेतील आदिवासी लहान मुलांचा एका तत्त्ववेत्याने एक खेळ घेतला.  त्या खेळामध्ये एका झाडाखाली एक मिठाई चे बास्केट ठेवले. सर्व मुलांना त्या झाडापासून 100 मीटर अंतरावर उभे केले. तिथून धावत जाऊन ते मिठाई चे बास्केट घ्यायचे, जो आधी पोहोचेल त्यास ती मिठाई मिळेल असे सांगण्यात आले. आता त्या व्यक्तीने खेळ सुरू करण्याची सूचना केली. परंतु त्या नन्तर जे घडले ते आश्चर्य वाटणारे होते. त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि सर्वच्या सर्वजण एकत्रितपणे झाडाखाली ठेवलेल्या मिठाई च्या बास्केट कडे धावत सुटले. एकाचवेळी तिथे पोहोचले. ती मिठाई सर्वानी समान वाटून घेतली व सर्वानी मिळून त्याचा आस्वाद घेतला.

यावर त्या तत्त्वज्ञाने मुलांना असे करण्याचे कारण विचारले असता, उत्तर मिळाले…..उबुंटू.

उबुंटू चा अर्थ आहे… ‘I am because We are.’

म्हणजेच ‘मी आहे कारण आपण सर्व आहोत’.

इतर दुःखात असताना मी एकटा कसा सुखी होऊ शकतो ?? या प्रश्नाचे उत्तर उबुंटू आहे.

‘सर्वांचे सुखी असणे हेच मला सुखी बनविणारे आहे’

हा फार मोठा माणुसकीचा, समतेचा, एकीचा संदेश, सर्व च पिढ्यांना उबुंटू देत आहे.

चला तर मग आपण सर्वजण उबुंटू  जगूया अणि जिथे जाऊ तिथे सगळीकडे आनंद पसरवुया.

I am Because We are.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-३ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग – ३ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

४) आधुनिक कालखंड ~ इ.स. १८०० पासून

ख्याल गायनाचा भरपूर प्रसार व त्याचबरोबर वाद्यसंगीताची विलक्षण क्रान्ती या कालखंडांत दिसून येते.

संगीताचे स्वरलेखन, संगीत संस्थांच्या निरनिराळ्या परीक्षा, संगीतावरची पुस्तके आणि व्याख्याने यामुळे संगीत शास्त्राचा प्रचंड प्रसार झाला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, भातखंडेबुवा, विनायकराव पटवर्धन वगैरे संगीतज्ञांनी तर भारतीय संगीत प्रसाराचे व्रतच घेतले होते.

संगीताचा सतत अभ्यास व रियाज करून कलावंत वैयक्तिक विचाराने स्वतःची विशिष्ट गायनशैली तयार करतो.प्राचीन काळापासून ते अगदी आधुनिक काळांत एकोणीसाव्या शतकापर्यंत गुरूगृही राहून, गुरूची मनोभावे सेवा करीत संगीत साधना करण्याची प्रथा होती. गुरू त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. यालाच त्या गायन शैलीचे घराणे म्हटले जाऊ लागले. अशा रीतीने काही प्रतिभावंत कलाकारांनी त्यांची स्वतंत्र गायनशैली शिष्यांकरवी

जतन करण्याचा प्रयत्न केला. ह्यातूनच आज प्रचलित असलेली किराणा, जयपूर, मेवाती, ग्वाल्हेर, आग्रा वगैरे एकूण १६ घराणी तयार झाली.

अब्दूलकरीमखाॅं साहेब हे किराणा घराण्याचे पट्टीचे गायक.

आपल्या सर्वांचे लाडके कै.भीमसेन जोशी (अण्णा, सवाई गंधर्व यांचे शिष्य), आघाडीच्या गायिका प्रभा अत्रे हे किराणा घराण्याचे गायक. अल्लादिया खाॅं यांचे जयपूर घराणे स्व.किशोरीताई अमोणकर यांनी त्यांच्या गायन कौश्यल्याने लोकप्रिय केले व आज अश्विनी भिडे देशपांडे या ते पुढे नेत आहेत. स्व.विनायकबुवा पटवर्धन, शरद्चंद्र आरोलकर, गोविंदराव राजूरकर हे ग्वाल्हेर घराण्याचे आघाडीचे गायक.

आधुनिक काळांत काही कलावंतांची मात्र कोणा एका घराण्याला चिकटून न राहता अनेक घराण्यांची वैशिष्ठ्ये लक्षात घेऊन स्वतःची शैली तयार करण्याची धडपड चालू असते.याचे एक उत्तम उदाहरण म्हणून कै.पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांचा उल्लेख करणे  योग्य होईल. त्यांनी ग्वाल्हेर,आग्रा,अत्रौली अशा विविध घराण्यांची गायकी आत्मसात केली. आणि बुद्धीचातूर्याने स्वतःच्या गाण्याचा वेगळा ठसा उमटविला.जसे जयपूर घराण्यांतील एकारातील स्वरलगाव,आग्रा घराण्याची आकारयुक्त आलापी,किराणा घराण्याची मेरखंड पद्धतीने केलेली आलापी.उस्ताद बडे गुलाम अलीखाॅं यांच्या गायनांतील चपलता,मृदुता,भावुकता इत्यादी गुणविशेष त्यांनी उचलले तर ठुमरी पेश करताना पतियाळा घराण्याची पद्धत जवळ केली.

पं.उल्हास कशाळकरांचाही स्वतंत्र शैलीचे गायक म्हणून उल्लेख करावा लागेल.त्यांनी गजाननबुवा जोशी यांजकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली,त्याचबरोबर जयपूर गायकीचे निवृत्तीबुवा सरनाईक, डी.व्ही.पलुस्कर, मास्टर कृष्णराव, कुमार गंधर्व  इत्यादी नामवंतांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या गायकीवर आहे.

मध्ययुगीन काळांत राजाश्रय असलेले संगीत नाटके, चित्रपट, आकाशवाणी, मागील पन्नास वर्षांत लोकप्रिय झालेले दूरदर्शन या प्रसारमाध्यमांमुळे  घरोघरी पोहोचले. रसिकांची नाट्यसंगीत, भक्तीगीते, अभंग गायन, भावगीते तसेच गझल, ठुमरी दादरा अशा उपशास्त्रीय संगीतात अधिकाधिक रुची उत्पन्न झाली. त्यामुळे ख्यालगायकीची मैफल असली तरी एखाद दोन राग पेश झाल्यानंतर प्रेक्षकांची भजन, नाट्यपद किंवा ठुमरी कलावंताने सादर करावी अशी फरमाईश असतेच.

भीमसेन जोशींनी “चलो सखी सौतनके घर जईये” ही गुजरी तोडीतील दृत बंदीश किंवा “रंग रलिया करत सौतनके संग” ही मालकंसमधील दृतबंदीश संपविल्यानंतर अण्णांचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, इंद्रायणी काठी हे अभंग ऐकल्याशिवाय मैफल पूर्ण झाल्याचे समाधान होतच नव्हते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता जग जवळ आले आहे. संगीतांत अनेकविध नवेनवे प्रयोग होऊ लागले. फ्यूजन,रिमिक्स वगैरे. चित्रपट संगीताने तर संगीतविश्व पारच बदलून टाकले. भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा मेळ पहावयास मिळतो. काही ठिकाणी तो चांगलाही वाटतो पण कधी कधी संगीतातील माधूर्य हरपून त्याची जागा गजराने घेतली आहे असे वाटते.

गुरूकूल पद्धतीने संगीत साधना करणे आज लुप्त झाले आहे.केवळ संगीतावरच लक्ष्य केंद्रीत करणे आजच्या काळांत अवघडच आहे.ज्ञानार्जन किती झाले यापेक्षा प्रसिद्धि केव्हा मिळेल याकडे अधिक लक्ष आहे.त्याचबरोबर मात्र शास्त्रीय संगीताचा अभ्यास व साधना करणारी युवा मंडळीही भरपूर आहेत.त्यामुळे वेदकाळी रोपण केलेला शास्त्रीय संगीताचा हा डेरेदार वृक्ष नवोदीत कलाकारांच्या खत~पाण्याने सतत बहरतच राहील यांत संशय नाही.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 2☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 2 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
“मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”

२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची.”

३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं,” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.

४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला. म्हणाला, “वेडा रे वेडा !!”

५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 8 – आई ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 8 – आई ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्या जीवनात आईचं अत्यंत महत्वच स्थान आहे. अनन्यसाधारण महत्व आहे.सोन्याच्या लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षाही  माझी जन्मभूमी अयोध्याच श्रेष्ठ आहे असे श्रीरामचंद्र सांगतात. जन्मभूमीची तुलना ते आपल्या आईशी करतात.

आपल्या मुलाचं/मुलीचं भवितव्य घडविणारे आई आणि वडील दोघेही असतात. पण प्रत्येक व्यक्तिचं चारित्र्य घडविणारी आई असते.तिची भूमिका जास्त महत्वाची असते. जन्मल्यापासून त्याला भाषा शिकविणारी, पहिला घास भरवताना चिऊ काऊ सारख्या पक्ष्यांची ओळख करून देणारी, पहिलं पाऊल टाकताना नीट चालायला  शिकविणारी, शाळेत डबा खाताना सर्वांबरोबर वाटणी करून खाण्याचा, सामूहिक समानता मूल्यांचा संस्कार करणारी, भावंडांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचे बीज पेरणारी, कुटुंबातली नाती सांभाळण्याचे आणि ती टिकविण्याचे ही संस्कार कळत्या वयात देणारी इथ पासून पुढील आयुष्यात येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड द्यायला शिकविणारी आणि मुलाला घडवताना त्याच्यात साहित्य, कला, तत्वज्ञान, इतिहास यासाठी योग्य ते कष्ट घेणारी अशी आई असते.

आपला मुलगा ‘यथार्थ’ मनुष्य निपजावा असं प्रत्येक आईलाच वाटत असतं. पण असा माणूस घडवण्याची कला सर्वच मातांजवळ नसते, म्हणूनच स्वामी विवेकानंद यांच्यासारखे चारित्र्यवान व्यक्तिमत्व एखादेच घडत असते. कारण सुसंस्कृत आणि अभिजात माता भुवनेश्वरी देवी पण एखादिच असते.

नरेंद्रनाथांच्या  चारित्र्यात जे जे महान, जे जे सुंदर होतं ते ते सर्व त्यांच्या सुसंस्कृत मातेच्या सुशिक्षणाचं  फळ होतं  असंच म्हणावं लागेल. त्यांनी नरेंद्र ची योग्य ती जोपासना केली. आपल्या मुलांच्या चारित्र्यात कोणत्याही प्रकारचा हिणकसपणा येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यात तेल घालून जपले होते. मातृभक्त नरेन्द्रनेही आपल्या आईची आज्ञा कधीही मोडली नव्हती. स्त्री सुलभ गुणांपेक्षाही धैर्य, खंबीरता, असत्य आणि अविचाराचा प्रतिकार करण्याचा बेडरपणा भुवनेश्वरी देवींकडे होता. आपल्या मुलांना उच्च ध्येयं आणि व्रतं अंगिकारण्यासाठी त्या स्फूर्ति आणि उत्तेजन देत असत.

स्वामी विवेकानंदांच्या देहत्यागा नंतर सुद्धा ही माता पुढील नऊ वर्ष हयात होती. तिनं आपल्या लाडक्या नरेंद्रनाथाचे जगप्रसिद्ध ‘स्वामी विवेकानंद’ होताना पाहिले होते. भागीरथीच्या पवित्र तीरावर पुत्राच्या धडधडत्या  चितेजवळ अंतिम प्रार्थनेत सहभागी झालेल्या या दु:खी मातेच्या मनात आले की जर, ‘विवेकानंद आणखी काही दिवस इहलोकी राहिले असते तर, अखिल मानवजातीचे केव्हढे तरी कल्याण झाले असते’.  पुत्रवियोगपेक्षा मानवजातीचे कल्याण हीच भावना तिच्या मनात यावेळी होती.

ती विवेकानंन्दाची आई होती या गौरवाचा सात्विक गर्व तिच्या संयमित,गंभीर आणि शांत चेहर्‍यावर दिसत होता.

खाण तशी माती अशी म्हण आहे. आजकाल मुलांच्या आया म्हणजे माता घरगुती कलागतीत नको ते संस्कार करत असतात. अजाणतेपणी का असेना नको ते मुलांना शिकवीत असतात. (आज मालिका/माध्यमे  सुद्धा असे आदर्श घालून देण्यात अग्रेसर आहेत.)मूल घडविण्याच्या काळात, त्या मुलांमध्ये द्वेष, मत्सर, लोभ पेरत असतात. कौटुंबिक नाती तोडतात. त्यामुळे मोठे होऊन ती मुले दुसर्‍याच्या प्रगतीमुळे जळफळणारी, हलक्या मनाची व कानाची अवलक्षणीच निघातील याची त्यांना कल्पना नसते. त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्या भविष्यावर होणार असतो. म्हणून मुलांच्या आई /मातांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे फार आवश्यक आहे. चारित्र्यवान मुलं घडवणं सोप्पं नाहीच मुळी !

क्रमशः ….

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print