मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री पुरुष समानता… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ स्त्री पुरुष समानता? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

युगानु युगे चाललेला वाद स्त्रीला दिलेली कमीपणाची वागणूक चाकोरीबद्ध राहण्याची शिक्षा तिच्या क्षमतेबद्दलची गृहीते तिच्यावरच लादलेली काही कार्ये यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव युगानू युगे होत आलेला आहे.

पण आता शिक्षित झालेली स्त्री तिने सिद्ध केलेली तिची क्षमता सगळ्या क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी यामुळे स्त्री आणि पुरुष यांची समानता सिद्ध झालेली आहे आणि सगळीकडे 50% स्त्रियांना आरक्षण दिलेले आहे.

पण म्हणून स्त्री पुरुष समानता आली आहे असे म्हणता येईल का? मुळात समानता म्हणजे काय अभिप्रेत आहे? स्त्रियांनी बिनधास्त पणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे;पुरुष जी जी कामे करतात ती ती कार्यें स्त्रियांनी करून दाखवणे म्हणजे स्त्री पुरुष समानता झाली का?

अहो एका शरीराचे असलेले अवयव देखील आपण डावे उजवे भेद करून समान मानत नाही मग दोन भिन्न प्रकृतीच्या जीवांची बरोबरी असली पाहिजे हा आग्रह का?

नाण्याच्या दोन भिन्न बाजू कधी समान होतील का? एक प्रवाह असलेले नदीचे दोन काठ कधी एकत्र येतील का? लोहचुंबकाचे दोन ध्रुव आहेत तेच एकत्र येतात का नाही? समान ध्रुव एकत्र येऊच शकत नाहीत. मग अशा वेळी समाजातील दोन घटक स्त्री पुरुष यामधे समानता आणण्याचा अट्टाहास का? कितीही प्रयत्न केले तरी तशी समानता येईल का?

सृजनासाठी समाजातील या दोन घटकांची बरोबरीची भागीदारी असली तरी स्त्री ही जास्त सामर्थ्यशाली जास्त सहनशील असल्यामुळे कितीतरी हाडे एकत्र फ्रॅक्चर झाल्यावर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या प्रसव वेदना हसत झेलण्याची ताकद स्त्रीमध्येच बहाल केलेली असल्याने अपत्यांना जन्माला घालण्याचे काम स्त्रियांकडे दिलेले आहे ते त्यांचेच राहणार.

स्त्रिया जशी पुरुषांची कामे करतात तशी पुरुषही स्त्रियांची कामे करू लागले आहेत म्हणून हॉटेलमध्ये जेवण करायला आचारी पुरुष असतात. आई वडील दोघेही कमावते असल्याने मुलांकडे लक्ष पुरुषही देतात. मुलगी माहेरचे सर्व बंध सोडून सासरी येते तसें जबाबदारी मुळे मुलेही आई वडील व घरचे बंध सोडून दूर दूर कामानिमित्ते जातात हे एक प्रकारे सासरी जाण्यासारखेच आहे.

याचाच अर्थ काही कामे स्त्रिया करू लागल्या आहेत तर काही पुरुष. नेहमीच्या रूढी परंपरा सोडून वावरण्यात रहाण्यात स्त्री पुरुष समानता आलेली आहे.

पण अनादी काळापासून स्त्रीला लाभलेला मातृत्वाचा अधिकार कोणीच हिसकावून घेऊ शकत नसल्यामुळे स्त्री पुरुष समानता असे म्हणणे चुकीचेच ठरणार आहे. या बाबत स्त्री ही अग्रगण्याच राहणार.

जसे एक नमस्कार करायला दोन हात लागतात ;एक चाल चालायला दोन पाय लागतात तसेच समाज रचनेसाठी स्त्री पुरुष दोन्ही घटक आवश्यक असतात त्यात कमी जास्त महत्वाचा असे भेद होऊच शकत नाहीत. त्यामुळे स्त्री ही जास्त श्रेष्ठ असली तरी ती स्वतः तसे समजतं नाही हा श्रेष्ठ गुण तिच्याकडून घेऊन दोन्ही घटकांनी एकत्र काम केले तर नक्कीच विधायक कार्यें पार पडतील यात शंकाच नाही.  

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – २ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – २ – लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

१९८६ साली माझी बदली पुणे येथे झाली. पुणे येथे असतांनाच लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या आंतरराष्ट्रीय , इंग्रजी माध्यमाच्या योग शिक्षक प्रशिक्षण केंद्रात मला प्रशिक्षण घेण्याचा योग आला. अनेक देशांतील डोळस प्रशिक्षणार्थी असतांनाही मी तेथे उत्तम प्राविण्य संपादन केले. पुणे येथे असतांनाच समाजशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत एम्. ए. उत्तीर्ण झालो. पुणे महानगर पालिकेने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला प्रदान केला. 

१९९९ साली नाशिक येथील शासकीय अंध शाळेत माझी बदली झाली. येथील मुलांना संगीत शिकवले जात होते. माझ्या गीतांना संगीताची साथ मिळू लागली. त्यामुळे माझी नवनवीन देशभक्तीपर व सामाजिक गीते नावारूपाला आली. सौ. शारदा गायकवाड या स्वाध्यायी समाजसेविकेच्या पुढाकारामुळे ‘ज्योतीकलश’ हा माझा पहिला काव्यसंग्रह २००२ साली व ‘ चैतन्यचक्षू’ हा दुसरा काव्यसंग्रह २००४साली प्रकाशित झाला. नाशिक जिल्हा परिषदेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन माझा गौरव केला. समाजकल्याण खात्याच्या नाशिक विभागीय कार्यालयाने ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ मला दिला. राष्ट्रीय अंधजन मंडळाच्या महाराष्ट्र राज्य शाखेने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार मला प्रदान केला. याच काळात स्वाध्याय प्रणित तत्वज्ञान विद्यापीठाच्या चार परीक्षा मी उत्तीर्ण झालो. त्यातील ‘ विचक्षण’ परीक्षेत मला जागतिक मेरीट प्राप्त झाले. 

माझ्या जीवनात अभूतपूर्व असा योग चालून आला. आजवर कुठल्याही शासकीय अंध शाळेतील अंध शिक्षकाला अधिक्षकाचे पद प्राप्त झालेले नव्हते. परंतु मला ते मिळाले. शासकीय अंध शाळा कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अधिक्षक पदावर मी रूजू झालो. त्या काळात कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषदेशी मी जोडला गेलो. या परिषदेतील वृंदा कांबळी यांनी माझ्या निवडक १८ कवितांच्या आधारे ‘सहा टिंबातून’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबतची संकल्पना अशी की जिल्ह्यातील निवडक प्राध्यापक, गायक, आकाशवाणी निवेदक अशा सहा व्यक्तींना प्रत्येकी तीन कविता गायन किंवा वाचन करण्यास दिल्या. त्यासाठी योग्य असा निवेदन पट तयार केला. अनेक तालुक्यातून हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 

अधिक्षक पदाची कारकिर्द यशस्वी रित्या पार पाडून २०१४ साली मी सेवानिवृत्त झालो. 

सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु मला तो पडला नाही. नाशिक ही कवी लेखक नाटककार यांची साहित्य पंढरी आहे. या साहित्यिक मेळ्यात मी स्वतःला झोकून दिले. खऱ्या अर्थाने  माझ्या कवितांना जनाधार प्राप्त झाला.माझे अंधत्व गौण मानून माझ्या प्रतिभेचा आदर केला गेला. अनेक कविमंडळे नाशिकमध्ये आहेत. दर आठवड्याला कुठे ना कुठे कविसंमेलन होतेच. त्यात सहभाग घेऊ लागलो. २०१६ साली ‘दृष्टीपल्याड’ हा माझा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विशेष म्हणजे मी ज्या शासकीय विद्यानिकेतनात शिक्षण घेतले होते त्यातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 

अनेकांच्या आग्रहाखातर ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे माझे आत्मचरित्र २०१७ साली भव्य समारंभात प्रकाशित झाले. हा भव्य समारंभ म्हणजे शासकीय विद्यानिकेतनाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन होता. संपुर्ण महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास हजर होते. 

इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेने भगवत गीतेवर आधारित ‘गीताप्रज्ञा’ ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती.या परिक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या शुभहस्ते मला रू १५००० चा पुरस्कार एका भव्य समारंभात प्राप्त झाला.

सेवा निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुखाचा व अधिक कार्यमग्न होण्यासाठी बोलका कॉम्प्युटर व बोलका मोबाईल हाताळण्याची कला मी अवगत केली. अनेक साहित्यिक व्हाट्सऍप गृपवर माझ्या कविता प्रसारित होऊ लागल्या. १० व ११ जून २०१७ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मला मिळाला तसेच २०१७ साली लिमका बुक रेकॉर्ड्स साठी सलग २४ तास कविसंमेलन पुणे येथे   माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

राज्यभरात अनेकदा अंध अपंगांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद मी भूषविले.तसेच डोळस कवींच्या अनेक संमेलनात माझ्या कवितांना तसेच काव्यसंग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ऑनलाइन काव्यस्पर्धेत वारंवार पुरस्कार प्राप्त होत आहेत.गझल या काव्यप्रकारातही माझी यशस्वी वाटचाल चालू आहे.

माझ्या मराठी व अहिराणी कविता वृत्तबद्ध व छंदोबद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकजण त्या कवितांचे गायन करून ऑडिओ पाठवतात. काही यूट्यूब चानलवर त्या गायनाचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात.  

डिसेंबर २०२१ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दूरदृष्टी या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे व काळोखातली प्रकाशवाट या आत्मचरित्राच्या विस्तारीत आवृत्तीचे प्रकाशन

झाले.  जानेवारी २०२३ मध्ये प्रतिभेचे नंदनवन हा माझा पाचवा काव्यसंग्रह नाशिक येथे कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात प्रकाशित झाला. 

अशाप्रकारे माझा यशस्वी जीवनप्रवास चालूच आहे.अंधत्वाबद्दल मी कधीही देवाला दोष दिला नाही कारण सर्वसामान्य माणसाप्रमाणेच मी आयुष्य जगलो. माझा मुलगा उत्तम प्राथमिक शिक्षक असून मुलीचे एलएलबी झाले असून तिचे पती भारतीय लष्करात ‘मेजर’ पदावर आहेत. चार नातवंडांसह  आमचे परिवार सुखी आहेत. कथा संपावायच्या आधी मला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल की माझ्या जीवन प्रवासात माझी पत्नी सौ. रेखा हीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शेवटी जाता जाता एक स्वरचित कविता सादर करत आहे.

☆ चैतन्य-चक्षु ☆

(वृत्त आनंदकंद)

चैतन्य-चक्षु अपुले, जागे सदैव ठेवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

शिखरास उंच पाहू, पंखात जिद्द ठेवू  

ध्येयास गाठण्याला, उत्तुंग झेप घेऊ  

नैराश्य टाळण्याला, गाणे मधूर गाऊ  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

सृष्टी दिसे न काही, मज मान्य न्यूनता ही  

दैवास दोश द्यावा, ऐसे न यात काही  

जन्मास पाहण्याची, दृष्टी सकार ठेवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

नेत्रांध हो कुणी हा, प्रारब्ध जीवनाचा  

स्वार्थांध वासनाधिन, हा दोष मानवाचा  

टाळून या विकारा, गुणवान सर्व होऊ  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

काही असे करू की, दिपवू अखील विश्व  

म्हणतील अंध असुनी, झाला प्रकाश-पर्व  

अंधार आवसेचा, दीपावलीत भुषवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

— समाप्त — 

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आज योगासनांचा क्लास जरा लवकरच संपला.

थंडी मुळे सगळ्या गारठून गेल्या होत्या.

सकाळी सातच्या बॅचला सगळी young generationची गर्दी आणि दहाच्या बॅचला सिनियर सिटीझन मंडळी.या बॅचला येणा-या सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या.योगासने कमी आणि गप्पा टप्पा जास्त.

प्रत्येकीच्या काही ना काही शारीरिक तक्रारी. तरीही मानसीताई सगळ्यांना छान सांभाळून घेऊन प्रत्येकीकडून योगासने करवून घ्यायच्या.आज थंडी जरा जास्तच होती.त्यामुळे ब-याच जणींनी दांडी मारली.

नेहमीच्या सात आठ जणी हजर होत्या.

मानसी ताईंचे घर खालीच होते.

आज सगळ्यांना गरमागरम चहा आणि पॅटीस‌ ची मेजवानी मिळाली.आज गप्पांचा मूड होता.काणे काकू थोड्या अबोल वाटल्या.

“का हो काकू,आज अगदी गप्प गप्प?”मी विचारले.काणे काकू म्हणाल्या, “काय सांगू ?काल घरात पार्टी होती.रात्री जेवायला, झोपायला उशीर झाला.यजमानांना आताशा कलकल सहन होत नाही.तरीही मुलाने आणि सुनेने,आम्हाला कमीतकमी त्रास होईल याची खबरदारी घेतली होती. सगळेच जण बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. संजय स्मिताने आम्हाला आधीच सांगितले होते,’आई बाबा,तुमची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल’.यांचा स्वभाव तिरसट.मी इतकी वर्षे सहन केले.सगळ्या मित्रांसमोर यांनी संजयला विचारले, ‘तुमचा थिल्लरपणा कधी संपणार आहे?मला आवाजाचा त्रास होतोय.’

संजयने शांतपणे सांगितले,’बाबा,अजून एक तासभर.अकराच्या आत सगळे आपापल्या घरी जातील.’ यांची आत धुसफूस सुरूच होती.

मी लक्षच दिले नाही. मला माझ्या मैत्रिणीचे वाक्य आठवले. ती म्हणायची, ‘हे बघ असे प्रसंग येत राहतातच. आपण तोंडाला ‘फॉल-पिको’ करायचे. वादाचा प्रश्नच येत नाही.’

किती छान सांगितले तिने. मला तो शब्द फारच आवडला.

तिच्याही घरी हाच प्रकार आहे. सून चांगली आहे, सास-याचे त-हेवाईक वागणे सहन करते.

कधी तरी शब्दाला शब्द वाढतोच. पण ‘फॉल पिको’मुळे, सारं काही आलबेल आहे.”

काणे काकूंनी सांगिलेला फॉल-पिकोचा मंत्र सगळ्यांना जाम आवडला.

मानसी ताई म्हणाल्या, “हे बघा, घरोघरी कमी अधिक प्रमाणात हे असं असतेच,गोष्टी जेवढ्या ताणल्या जातील तेवढे ताण तणाव वाढत जातात.करोना काळापासून सर्व नोकरदार मंडळी चोवीस तास घरात आहेत,यापूर्वी याची सवय नव्हती.करोनाने प्रत्येकाला माणूसकी आणि नात्यांची किंमत दाखवून दिलीय.

तुझं माझं, हेवे दावे या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा अर्थ चांगलाच समजलाय आपल्याला.तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागा, प्रेम-माया यांची देवाण घेवाण एका रात्रीत होत नसते. तरूण पिढीला मानसिक ताण तणाव, त्यांची टार्गेटस्, बॉस लोकांची मर्जी, किंवा हाताखालील सहकाऱ्यांना, जिभेवर साखर ठेवून संभाळून घेणे इ. ब-याच गोष्टींना सामोरे जावे लागते. तुम्ही सगळ्या बॅचला येता. आपली सुख-दु:ख एकमेकींबरोबर शेअर करता,‌तासभर नवीन ऊर्जा घेऊन घरी जाता.

घरी देखील असंच खेळीमेळीचे वातावरण ठेवा.या आधीच्या बॅचच्या सगळ्यांना मी नेहमी हेच सांगते.त्यातल्या काही जणींना सुना/जावई येऊ घातल्या आहेत. पेराल तसे उगवते,म्हणतात ते अगदी बरोबर आहे.जीभेवर साखर ठेवा.योग्य वेळी संसारातून अलिप्त व्हा,पण वेळेला त्यांना समज,सल्ला अवश्य द्या.

आणि क्षमाचा फॉल-पिकोचा मंत्र, मला पण खूप आवडला.

तेव्हा काणे काकू,घरी गेल्यावर हा मंत्र जपा.” सगळ्यांनी मानसी ताईंच्या बोलण्याला खळखळून हसत दाद दिली.

लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कसं असतं ना!.. जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना!.. जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं!… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं.. असा माझा हट्टही असतो ना!.. पण कसं असतं नां!!

… शब्दांच्या भोवऱ्यात मी अडकून तुम्हाला कोड्यात टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही… चित्र जरी एक अल्लड बालिकेचे तुम्हास दिसत असले… तरी मी काही आता बालिका राहिली नाही..  हि बालिका  आता याच वयाच्या बालिकेची मातेच्या रूपात आहे… आणि आणि तिला आता तिचाच भुतकाळ सतत तिची आताची बालिका सारखी सारखी नजरेसमोर आणून दाखवत असते…

आता कळतयं आपण जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा असतो… आईचं तेव्हाचं आपल्याशी एकंदरीत वागणं किती बरोबर होतं ते.. बाई गं मुलीच्या जातीला असलं वागणं शोभायचं नाही बरं.. हे तिचं सतत  उपदेश पर  चौविसतास बोलणं मनाला मुरड घालायचं… आवडायचं तर मुळीच नाही.. भांडणाची  चकमक उडाली नाही असा एक दिवस कधीही सरला नाही… चंद्र सूर्य यांच्या झांंजावादनाने दिवस रात्र सरसर सरले… आईचं बरोबर होतं हे कळले आणि पटलेही.. आणि माझं …

… आणि माझं किती किती चुकीचं आहे हे आता माझीच मुलगी जेव्हा मला सांगू लागली तेव्हा… माझ्या आईचं म्हणणं मला सतत आठवतं राहिलं..कसं असतं नां.. आणि आता पुढे माझी मुलगी जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा येईल तेव्हा मी किती बरोबर होते हे तिला कळेल…. आणि  तिचं किती…

कसं असतं नां… जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना… जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं..पण पण.. कसं असतं नां….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट 🌹

तीन डिसेंबर ! जागतिक अपंग दिनानिमित्य माझ्या एका अविस्मरणीय भेटीचा अनुभव आपल्या समोर मांडते.

स्थळ- पुण्यनगरी नाशिक,

सरळ भेटण्याचा आणि पत्र व्यवहाराचा पत्ता-  श्री काशीनाथ देवराम महाजन, फ्लॅट नं १४, मधूसूदन अपार्टमेंट, त्रिवेणी पार्क, जेलरोड, नाशिक- पिनकोड – ४२२१०१, फोन नंबर – ८४५९३०००७६

माझी या स्थळी पोचण्याची सांजवेळ साधारण ५. मंडळी वरील नामनिर्देशित व्यक्ती प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी कैक जण त्यांना कविसंमेलनात भेटले असाल एक कवी, अध्यक्ष, निमंत्रित अन बरेच कांही. आमच्या भेटीचा योग्य मात्र अचानकच आला पण मी मात्र त्यांचे नाव आमचे मित्र महेंद्र महाजन (मुक्काम सटाणा) यांच्या स्वरातून ऐकले होते. पर्यावरण, सायकल, भाऊबीज अन अजून विषयांवर, स्वर महेंद्रचे अन कविता-गीत काशिनाथ महाजन. सटाणा येथे महेंद्रची भेट झाल्यावर मी   त्यांना माझी नुकतीच प्रकाशित पुस्तके भेट दिली आणि तसेच काशिनाथ सरांना देखील एक संच द्यायची विनंती केली. मात्र माझे भाग्य जोरावर नक्कीच होते. महेंद्रने मला नाशिकला त्यांना प्रत्यक्ष भेटून पुस्तके द्यावीत असा सल्ला दिला.

त्यानुसार मी   काशिनाथ सरांची भेटीकरता वेळ मागितली अन त्यांना भेटले. त्यांना अंध म्हणणे म्हणजे त्यांच्या दिव्यदृष्टीचा अपमानच होय असे जाणवले. त्यांच्या जीवनाच्या प्रखर जाणीवा त्यांच्या अनुभवातून आहेत की चैतन्यमय अनुभूतीतून आहेत हा मला पडलेला मूलभूत प्रश्न! त्यांनी मला भेटीची वेळ दिल्यावर त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख असलेला लेख मला अग्रेषित केला. तो माझ्या या या लेखासोबत अग्रेषित करीत आहे. त्यांनी अंधत्वामुळे आलेल्या अंधाराचे एक भव्य दिव्य प्रकाशज्योतीत रूपांतर कसे केले याचे मला नवल वाटते. लहानसहान अडचणींचा उदो उदो करणारे आपण वास्तविक परिस्थितील आशेच्या प्रकाशाच्या कवडश्याकडे कसे दुर्लक्ष करतो याचे प्रत्यंतर मला या भेटीत प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या सोबत घालवलेला अंदाजे दीड तास त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रकाशलेला होता. आपल्या दिव्य दृष्टीने माझ्याशी आनंदाने संपर्क साधत त्यांनी जणू संपूर्ण वातावरण भरून टाकले होते. ‘असा कुठलाच विषय नाही ज्यावर मी कविता रचली नाही’, हे मला तेव्हा अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटले, पण भेटीनंतरच्या त्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर मला सामील करून घेतल्यावर त्यांच्या कवितांचा जो ओघ सुरु आहे तो मला स्तिमित करून टाकणारा आहे. किंबहुना त्यांच्या संपूर्ण कविता वाचायचे म्हटले तरी आपले वाचन तसेच फास्ट हवे! या कवितांचे विषय विविध तर आहेतच, पण त्यांचे मन इतके संवेदनशील आहे की त्यातून उगम पावलेल्या आत्मानुभूतीच्या तीव्र आवेगातूनच त्यांच्या कविता उत्स्फूर्तपणे जन्मतात असे जाणवते. आपल्याला असलेल्या दृष्टी लाभामुळे आपले मन बऱ्याच ठिकाणी भरकटत असते, मात्र या दिव्यांग व्यक्तीचे मन भावानुभूतीत केंद्रित असते असे मला वाटते, म्हणूनच हा कवितांचा जलौघ सतत त्यांच्या दिव्यांग लेखणीतून प्रसवत असावा!

मंडळी त्यांच्या भेटीदरम्यान अनौपचारिक अन खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण अति लोभस होते. त्यांची काळजी घेणारा मुलगा, गोडगोजिरी नात, अन सर्वार्थाने त्यांची ‘पूर्णांगिनी’ शोभेल अशी सहचारिणी रेखा (त्यांची पूर्वाश्रमीची मामेबहीण) हिच्याविषयी मनात इतका आदर निर्माण झाला की, तो शब्दात मांडू शकत नाही. सौ रेखा ही काशिनाथ सरांची भाग्यरेखा म्हणून शोभत होती. रुचकर उपहारासोबत काशिनाथ सरांकडून त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीची माहिती देणे आणि जाणून घेणे सुरु होते. त्यांचा घरातील वावर आणि संवाद साधण्याचे कौशल्य बघून आणि ऐकून कुठेही भास होत नव्हता की त्यांना दिव्य चक्षूच मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच मी या महान कवीला नि:संकोचपणे एक कविता ऐकवण्याची विनंती केली. कसलेच आढेवेढे न घेता त्यांनी माझ्या विनंतीला लगेच मान्य करीत एक कविता ऐकवली. त्यासाठी ब्रेल लिपीच्या त्यांच्या संग्रहातून लगोलग स्वतः कविता शोधून, त्यांनी तालासुरात आणि भावपूर्ण स्वरात स्वतःची कविता ऐकवली. मंडळी त्यांच्या कविता अशाच गेय आहेत! महाराष्ट्रातील कैक व्यक्तींनी त्या कवितांना आवाज दिलाय. यू ट्यूब वर त्या उपलब्ध आहेत. सदर कविता होती ‘चैतन्य चक्षू’. अत्यंत प्रेरणादायी अशी ही कविता, तो अनुभव विडिओत रेकॉर्ड करून जपून ठेवलाय. या लेखासोबत सदर व्हिडिओची यू ट्यूब वरील लिंक शेअर करीत आहे. स्वतःचे जीवन समृद्ध असलेल्या या विलक्षण कवीचे कौटुंबिक जीवन देखील सुखमय आहे. मुले आयुष्यात स्थिरस्थावर झालेली, पत्नीची अखंड प्रेमपूर्ण साथ, हे सर्व मला या भेटीत अनुभवास येत होते या प्रेमळ कुटुंबासोबत फोटो काढणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती अन आठवणींचा खजिना देखील!

प्रसिद्ध लेखक विश्वास देशपांडे लिखित रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांचे मी हिंदी आणि इंग्रजीत केलेले अनुवाद त्यांना भेट दिले तेव्हा ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांनी मोठया अगत्याने मला भेट दिले. या भेटीतून मी किती अन कशी ऊर्जा घेतली याचा अनुभव शब्दातीत आहे. आयुष्यातील कैक वर्षे मागे गेल्याचा फील आला. जराजराश्या दुःखाने खचून जाणाऱ्या स्वतःच्या जीवनातील क्षण आठवून मनात अपराध बोध देखील जागृत झाला. या उलट दुःखाचे किंवा आपल्यातील न्यूनाचे भांडवल न करता सुखाने जगणाऱ्या या आनंदयात्री व्यक्तीला माझे या जागतिक अपंग दिनी कोटी कोटी प्रणाम! काशिनाथ सरांना अशीच अक्षय ऊर्जा मिळत राहो आणि त्यातून या सरस्वतीपुत्राच्या आधीच पाच कवितासंग्रहांनी समृद्ध असलेल्या साहित्यिक खजिन्यात दर दिवशी नवनवीन माणिक मोत्यांची भर पडो ही आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना!   

धन्यवाद!🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे गाव आहे, तेथे देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर राहत होते. नऊ जणांचे कुटुंब चालवणे त्यांना अतिशय अवघड जात होते. मी त्यांचा मुलगा म्हणजे काशिनाथ देवराम महाजन. माझे  प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. हुशार मुलगा म्हणून शाळेत व घरी माझे कौतुक व्हायचे. 

इयत्ता चौथीत असतांना शासकिय विद्यानिकेतन साठी स्पर्धा परीक्षा नव्यानेच सुरू झाली होती. ह्या परीक्षेचे वैशिष्ट्य असे कि त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी सहा-सात जिल्ह्यातून फक्त तीसच मुलांची निवड केली जात असे . त्यांना शासकीय विद्यानिकेतनात प्रवेश मिळायचा. अशी विद्यानिकेतने महाराष्ट्रात फक्त चारच होती. माझा जळगाव जिल्हा तत्कालीन मुंबई विभागात असल्याने या विभागासाठी नाशिक येथे शासकीय विद्यानिकेतन होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने मला नाशिकच्या विद्यानिकेतनात प्रवेश मिळाला. शाळेतील शिक्षण, निवास, भोजन उच्च प्रतीचे होते. कला ,क्रीडा, संगीत व विविध छंद आत्मसात करण्यास येथे वाव होता. 

शासकीय विद्यानिकेतनात आपल्या मुलाला प्रवेश मिळाला याबद्दल देवराम महाजन यांना फारच आनंद झाला होता.गावात व आजूबाजूच्या परिसरात माझा व वडिलांचा सत्कार करण्यात आला होता. 

मी नव्या शाळेत खूपच उत्साहाने अभ्यास करू लागलो. मला इयत्ता सहावीत असतांनाच पहिली कविता सुचली. तिच्या २ओळी प्रस्तुत करत आहे.

त्रिवार वंदन माझे, मधुकरराव चौधरींना

दगडांमधले रत्न शोधले ,त्या रत्नपारखींना

ती वाचून शाळेतील अध्यापकांना व प्राचार्यांना खूपच आनंद झाला. 

नियतीला मात्र माझे वैभव पाहवले नाही. माझी नजर हळूहळू कमी होऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी मला लिहिणे वाचणे अशक्य झाले. तरीही प्राचार्यांनी माझे नाव शाळेतून कमी केले नाही. मुलांनी व अध्यापकांनी मला सहकार्य करावे असे त्यांनी सुचवले. वाचक व लेखनिकाच्या मदतीने माझे शिक्षण सुरू राहीले. 

माझे वडील मात्र मुलगा अंध झाल्यामुळे फारच खचून गेले. त्यातच ते जिथे काम करत होते ती मील बंद पडली. कमाईचे काहीच साधन राहीले नाही. त्यांच्या जीवाची खूपच घालमेल झाली. मी नववीत असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संसार उघडा पडला. तरी आईने धीर सोडला नाही. शेतमजुरी करून ती कसेबसे दोन घास मुलांच्या मुखी घालू लागली. 

मी अंध झालो तरीही कविता करणे सोडले नाही. जो निसर्ग मनात साठला होता त्या आधारे निसर्ग कविता करणे सुरूच होते. त्याबरोबरच देशभक्तिपर, वैचारिक व सामाजिक कविताही करू लागलो. शाळेतील साप्ताहिकात व वार्षिक विशेष अंकात माझ्या कवितांना मानाचे पान मिळू लागले. मी मनाशी ठरवले कि –

जीवनात आला अंधार

तरी सोडणार नाही निर्धार

कविताच देतील मला आधार

आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार 

अध्यापक आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच प्राचार्यांच्या माझ्यावरील कृपादृष्टी मुळे माझे अंधत्व मला फारसे त्रासदायक वाटले नाही. अभ्यास उत्तरोत्तर उत्तम होत गेला. त्यामुळेच तत्कालीन अकरावी म्हणजेच मॅट्रिक च्या परिक्षेत मला नेत्रदीपक यश मिळाले. २४ जून १९७३च्या ‘साप्ताहिक गावकरी’ या नाशिकच्या वर्तमानपत्रात ‘अधुरी ही कहाणी’ या शीर्षकाखाली माझ्या विषयी प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. 

शासकीय विद्यानिकेतनाची सुविधा ११ वी पर्यंतच असल्याने मला गावी परत यावे लागले. 

दुर्दैवाची गोष्ट अशी कि ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. शेते ओसाड पडली होती. भारतातील अन्नसाठा संपला होता. अमेरिकेतून निकृष्ठ प्रकारची लाल ज्वारी आणि मका आयात करण्यात आला होता. जनतेच्या पोटाची जेमतेम व्यवस्था झाली होती. रोजगारासाठी पाझर तलावांचे खोदकाम सरकारने सुरू केले होते. 

मी अंध असूनही आईबरोबर पाझर तलावाच्या कामांना जात असे. मजूरी फक्त आठ आणे मिळायची. अनेकदा ठेच लागून पडायचो ;पण तसाच उठायचो . 

मला पुढे शिकायचे होते. गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या चाळीसगाव कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी मी धडपड सुरू केली. या कामात माझ्या काकांनी मला मदत केली. आजपावेतो त्या कॉलेजात कुणीही अंध शिकला नव्हता. अनेकदा विनंत्या करूनही तिथे प्रवेश मिळत नव्हता. मी मात्र प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर प्रवेश मिळाला. कॉलेजला जाण्यासाठी गाडी भाडे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी रोज ८ किलोमीटर पायीच जाऊ लागलो. दरम्यानच्या काळात चाळीसगावच्या अंध शाळेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यामुळे मला कॉलेजच्या नोट्स काढता येऊ लागल्या. खूप अभ्यास करू लागलो. १९७७ साली राज्यशास्त्र विषयात बी.ए . उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्या काळात अंधांना नोकरी मिळणे अवघड होते. मला कळले की पुण्याला अंधांसाठी एक शेल्टर वर्कशॉप आहे, तेथे अंध लोक खुर्च्या विणतात, खडू तयार करतात, ;त्यासाठी तेथे प्रशिक्षणाची सोय आहे, भोजन व निवास मोफत आहे, शिक्षणाची अट नाही. मी बी ए उत्तीर्ण असूनसुद्धा त्या वर्कशॉप मध्ये प्रवेश घेतला. 

१९७८ साली महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंधांसाठी एक योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातून दरवर्षी एका पदवीधर अंधास अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीने प्रवेश मिळणार होता. त्यावेळेस भारतात फक्त चारच प्रशिक्षण केंद्रे होती. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तीन राज्यांसाठी मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र होते. १९७८ साली अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. या प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या शुभहस्ते मला ‘ मृणालिनी पिंगळे अॅवॉर्ड’ देण्यात आले. 

१९७९ साली शासकीय बहुउद्देशीय संमिश्र केंद्र सोलापूर येथे माझी विशेष शिक्षक पदावर नियुक्ती झाली. माझे काव्यलेखन अखंड चालूच होते. अनेक ब्रेल व डोळस वर्तमानपत्रे, मासिके यातून माझ्या कविता प्रकाशित होत होत्या. त्या शाळेतील  अंध मूकबधिर व अपंग मुलांना पाहून माझ्या मनात आले कि यांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करावे. त्यासाठी छान छान गाणी रचावी. त्यांना सहज सोपी चाल लावावी. मुलांना माझी गाणी आवडली. 

‘नाते प्रगतीशी’ या माझ्या कवितेने सोलापूरमध्ये क्रांती घडवली.तिच्या दोन ओळी प्रस्तुत करत आहे.

विज्ञानाची संगत आम्हा, हेलन केलर पाठीशी

मनामनाला पटवून देऊ,नाते आमचे प्रगतीशी

अनेकवर्तमानपत्रांनी या कविते विषयी लेख लिहिले.सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी या कवितेचे कौतुक केले. १९८१ हे साल जागतिक अपंग वर्ष म्हणून जाहीर झाले होते. गायकवाड साहेबांनी त्यानिमित्त अनेक उपक्रमात मला सहभागी करून घेतले होते. तत्कालीन शिक्षक आमदार प्रकाश एलगुलवार यांनी माझ्या सहकार्याने सोलापूर येथे राष्ट्रीय अंधजन मंडळाची जिल्हा शाखा स्थापन करून माझी नियुक्ती सरचिटणीस पदावर केली. 

अंध व्यक्तीचा विवाह होणे हे त्या काळात जवळजवळ अशक्य होते. अंधही  शासकीय नोकरी करतो हे कुणीही मान्य करत नव्हते. फार खटपट केल्यानंतर मामाच्या मुलीशी माझा विवाह झाला. 

 – क्रमशः भाग पहिला

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆– क्रमशः भाग पहिला 

(तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.)  – इथून पुढे — 

पुढे भूमध्य समुद्राभोवती ग्रीकांची सत्ता कमी होऊन इटलीच्या बहुईश्वरवादी रोमन लोकांचे साम्राज्य प्रबल होऊ लागले. या रोमन साम्राज्यातील सीझर या महान योध्याचा समकालीन आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या पॉम्पे या महान रोमन सैन्य अधिकाऱ्याने 63BC ला पूर्वेला सम्राज्यविस्तार करताना जेरूसलाम जिंकून घेतले. ज्युंचे राज्य रोमन सम्राज्याचा एक भाग बनले. पुढे सातव्या शतकात मुस्लिम आक्रमण होईपर्यंत ज्युंची मायभूमी रोमन साम्राज्याच्या आधीपत्याखाली राहिली. विद्रोहाची थोडी जरी शंका आली तर रोमन अधिकारी ज्यु लोकांना सुळावर चढवत.  ज्यु लोकांचे येशू वा जीजस नावाचे अतिशय लोकप्रिय रबाय अर्थात धर्मगुरू होते. रोमन लोकांनी विद्रोहाच्या शंकेवरून येशूला सुळावर चढावले. याच येशूपासून इसाई अर्थात ख्रिश्चन धर्माची सुरुवात झाली. येशूच्या जन्मापासून सध्या वापरात असलेली कालगणना अस्तित्वात आली. त्याच्या जन्माआधीच्या काळाला BC तर नंतरच्या काळाला ईसवी सन वा AD असे म्हटले जाते. इसाच्या जन्मापासून सुरु झाले म्हणून ईसवी सन. ई. स. 33 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी येशूला सुळावर दिल्यामुळे ज्यु आणि रोमन संबंध बिघडत गेले. 66AD ला ज्यु लोकांनी उठाव केल्याने रोमन विरुद्ध ज्यु असे युद्ध पेटले. हा उठाव दडपन्यासाठी 70AD ला रोमन सम्राट टायटसला स्वतः यावे लागले. त्याने जेरूसलामला वेढा घालून शेवटी ते जिंकून घेतले. जेरूसलाम शहर तटबंदीसहित जमीनदोस्त करण्यात आले. सोलोमनचे दुसरे मंदिर नष्ट करण्यात आले. हजारो ज्युंची कत्तल केली गेली. बाकी 96 हजार ज्युंना गुलाम बनवून रोमला पाठवले गेले. ज्यु लोकांच्या नशिबी परत वनवास आला. पहिल्या ज्यु-रोमन युद्धामुळे जेरूसलाम मधील बहुतेक ज्यु लोकवस्ती घटली असली तरी ज्यु आपल्या मातृभूमीत परत येत राहिले. ज्यु लोकांनी आपल्या मातृभूमीत परत 50 मोठया वसाहती आणि जवळपास 985 मोठी खेडी वसवली. पण आता रोमन लोकांनी ज्यु लोकांना दडपून ठेवले होते. इतकेच नव्हे तर सोलोमनच्या भग्न मंदिराच्या जागी आता अपोलो या रोमन देवाचे मोठे मंदिर उभे केले गेले होते.

या धार्मिक दडपशाही विरुद्ध 132 AD मध्ये परत ज्यु लोकांनी रोमन सम्राज्याविरुद्ध उठाव केला. त्याला ‘बार कोखबा उठाव’ असे म्हणतात. रोमन सैन्याने सर्व ज्यु वस्त्या उध्वस्त केल्या. 5 लाख 80 हजार ज्युंची कत्तल केली गेली. उरलेले अनेक युद्धानंतर येणाऱ्या रोगाराई आणि दुष्काळात मारले गेले. जे वाचले ते गुलामगिरीत विकले गेले. ज्यु लोकांना जेरूसलाम मध्ये प्रवेश निश्चिद्ध केला गेला. रोमन सम्राट हेड्रीयन याने ज्युंच्या पवित्र मायाभूमीला मुद्दाम ज्युंच्या पारंपरिक शत्रूदेशाचे म्हणजे पॅलेस्टीनचे नाव दिले. हा भाग आता सिरिया-पॅलेस्टीना म्हणून ओळखला जाऊ लागला. हा उठाव ज्यु लोकांसाठी अतिशय विध्वंसक ठरला. तरी प्रकरण शांत झाल्यावर ज्यु परत मातृभूमीकडे परतू लागले. पुढे सातव्या शतकात रोमन जेरूसलामवर मुस्लिम आक्रमण झाले तेव्हा दीड लाख ज्यु तेथे राहत होते.

एकाच मुळातून उगवले असले आणि आधीचे सर्व प्रेषित सामान असले तरी जीजसला प्रेषित मानन्यावरून आणि धर्मपरिवर्तन प्रचाराच्या मुद्द्यावर हळूहळू इसाई धर्म ज्यु धर्मापासून वेगळा होत गेला. ज्यु लोकांमध्ये ‘प्रोसेलीटीझम’ अर्थात प्रयत्नपूर्वक धर्मपरिवर्तन निशिद्ध मानले जाते. याउलट ख्रिश्चन लोक धर्मप्रचार करण्याला कर्तव्य मानतात. या सतत होणाऱ्या प्रयत्नामुळे इसाई धर्म हळूहळू वाढत गेला.

इस 313 मध्ये रोमन सम्राट कोन्स्टंटीनने एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजारहित धर्माचे समाज संघटनातील महत्व ओळखले. एकेश्वरवादी धर्मामुळे प्रजा संघटित होते. अशी संघटित प्रजेचे नेतृत्व करणे हा सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा तसेच मिळालेले टिकवण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. अशी संघटित प्रजा शत्रूचा कडवा प्रतिकार करून आपल्या धर्माचे, राज्याचे आणि पर्यायाने राजसत्तेचे रक्षण करते. धर्मप्रसारचे निमित्त करून राज्यविस्तरही करता येतो. ग्रीक-रोमनांचे परंपरिक शत्रू असलेल्या पर्शीयाने सम्राट सायरस महान पासूनच एकेश्वरवादी झोरीयास्ट्रीयन म्हणजे सध्याच्या पारशी धर्माला सम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली होती. आधी ज्यु नंतर पारशी राजकारणी लोक जनतेची धार्मिक ओळख वापरून सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा हा खेळ आधीच शिकले होते. रोमन लोकांना हा खेळ उशिरा कळला. चाणाक्ष कोन्स्टंटीनने प्रथम हा खेळ ओळखला. आपल्या वाढवडिलांचा अनेक ईश्वरांना मानणारा धर्म सोडून त्याने वेगाने वाढणारा इसाई धर्म स्विकाराला. ख्रिश्चन या खेळत एक पाऊल पुढे गेले. पण ज्यु आणि पारशी लोकांमध्ये धर्माप्रचार करून धर्मांतर करणे निशिद्ध होते. ख्रिश्चनांनी धर्मांतर करणे निशिद्ध तर ठेवले नाहीच पण धर्मांतरासाठी चर्चची खास यंत्रणा कामाला लावली. इसाई धर्माला राजाश्रय मिळाल्याने आणि धर्मांतरासाठी प्रयत्न होऊ लागल्याने इसाई धर्माचा प्रसार अतिशय वेगाने होऊ लागला. तिकडे पर्शिया म्हणजे सध्याच्या इराण मध्ये एकेश्वरवादी पारशी धर्माने अनेक वर्षांपासून आपला जम बसवलेला होता. पर्शिया आणि ग्रीक-रोमन लोकांमध्ये वर्षानुवर्षे हाडवैर चालू होते. सध्याच्या सिरिया आणि इराक मधील सीमा या दोन महासत्तांच्या मधील सीमा होती. आता दोन्हीकडील महासत्तामध्ये राजकीय युद्धाऐवजी धर्मयुद्ध होऊ लागले. दोन्ही कडील कडवे सैनिक एकमेकांशी लढताना माघार घेण्यास तयार नसत. प्रचंड मनुष्यहानी होई. त्यामुळे दोन्ही महासत्ता हळूहळू कमजोर होऊ लागल्या. 

तिकडे दक्षिणेला अरबस्थानच्या वाळवंटात ई स 570 मध्ये मुहम्मद पैगंबर साहेबांचा जन्म झाला. वाळवंटातील अरब मूर्तिपूजक आणि अनेक ईश्वरांना मानणारे होते. व्यापारानिमित्र पैगंबर साहेबांचे सिरियाला वारंवार जाणे होई. समाजाला संघटित करुन सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी मूर्तिविरहित एकेश्वरवादी धर्माचा कसा उपयोग होतो हे मुहम्मद पैगंबरांच्या चाणक्ष्य बुद्धीने लवकरच ओळखले. मग त्यांनी अरबस्थानात आपल्या वेगळ्या एकेश्वरवादी संघटित धर्माचा प्रचार सुरु केला. आपल्या नव्या धर्माला इस्लाम असे नाव दिले. धर्म निर्माण करताना त्यांनी फारशी वेगळी मेहनत घेतली नाही. ज्यु आणि इसाई लोकांच्या एकेश्वरवादी धर्मग्रंथातील प्रेषित आणि पैगंबरांच्या गोष्टी त्यांनी इस्लाममध्ये जशाच्या तश्या घेतल्या. अगदी देवदूतही तेच ठेवले. फक्त ज्यु आणि इसाई लोकांच्या देवांच्या ऐवजी अरबी भाषेतील अल्लाह हा देवच एक खरा परमेश्वर आहे असे त्यांनी कुरानात म्हटले.अल्लाहने या आधी धाडलेल्या प्रेषितांनी दिलेला अल्लाचा संदेश लोकांनी भ्रष्ट केला आहे. आपल्याला कुरानाच्या रूपाने अल्लाने दिलेला संदेश हा कधीही भ्रष्ट न होणार अंतिम संदेश असेल असे त्यांनी जाहीर केले.

मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यू नंतर इस्लामच्या अनुयायांनी मौखिक कुराण एकत्रित करून लिहुन काढले. मी असे म्हटलो होतो किंवा नव्हतो असे म्हणायला त्या वेळी पैगंबर हजर नव्हते. लिखित कुरानात जुन्या एकेश्वरवादी धर्मात बदल करून सत्ता आणि संपत्तीचा हा खेळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला गेला..

1)  धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा प्रमुख एकच असल्याने दोन्ही सत्ता एकाच माणसाचे हित पाहू लागल्या. त्यामुळे दोन्ही सत्तांचे एकमेकांवर नियंत्रण ठेवणे बंद झाले आणि दोन्ही सत्ता निरंकुश झाल्या. राजसत्ता आता कुठल्याही राजकीय युद्धाला धर्मयुद्ध ठरवू शकत होती. 

2)  प्रत्येक मुसलमानासाठी धर्मप्रचाचारार्थ जिहाद करणे कर्तव्य ठरवले गेले. त्यामुळे प्रत्येक सामान्य मुसलमान इस्लामचा कडवा सैनिक झाला. 

3) इस्लामी राजवटीत इतर धर्मांचे सहअस्तित्व जवळपास अमान्य केले गेले. मूर्तिपूजाकांपुढे आणि बहुईश्वरवादी लोकांपुढे धर्मांतर वा मृत्यू हे दोनच पर्याय शिल्लक ठेवले. एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजक नसलेल्या लोकांनाही झिजिया दिला तरच इस्लामी राष्ट्रात राहता येणे शक्य होते.

4) पुरुषप्रधान संस्कृतीत धर्मांतरचा निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषांना असल्याने इस्लाम धर्मात पुरुषांना अनेक वाढीव अनैतिक प्रलोभने नैतिक करून दिली गेली. तसेच युद्धानंतर लोकांची संपत्ती लूट, निहत्या लोकांची हत्या, आणि युद्धात हाती लागलेल्या स्त्रियांना लैंगिक गुलाम बनवणे अशा युद्ध अपराधांना धार्मिक नैतिकतेची बैठक दिली गेली. या प्रलोभनांमुळे पटपट धर्मपरिवर्तन होऊ लागले. युद्धात मेले तर जन्नत मध्ये या पेक्षा जास्त मज्जा मिळेल याचे वचन इस्लाम देतो. मुसलमान पृथ्वीवर दुःख भोगायल आला आहे आणि खरे जीवन तर मेल्यावर तिकडे स्वर्गात सुरु होणार आहे अशी शिकवण इस्लाम देतो. त्यामुळे मुसलमान मनुष्याची युद्धात मृत्यूची भीती कमी होते. काहींना तर शाहिद होऊन पटकन स्वर्गात जाण्याची आत्मघाती ओढ लागते. या सर्वांमुळे मुस्लिम पुरुष सदा युद्धासाठी उतावळे राहू लागले. असे ब्रेन वॉश झालेले कडवे मूठभर मुस्लिम योद्धे जिहादच्या वेडात आपल्यापेक्षा संख्येने खूप जास्त असलेल्या शत्रू सैन्याला जाऊन भिडत आणि कटून मरत. पण मरण्याआधी ते शत्रूचे बरेच नुकसान करून मरत असत. त्यामुळे मुस्लिम सैन्याला त्यांच्यासारखा त्याग करण्यास प्रोत्साहन मिळे आणि शत्रूचे मनोधैर्य खचे. त्यांचा उपयोग मुस्लिम राजकर्त्यांनी साम्राज्य विस्तारासाठी मोठया प्रमाणात करून घेतला. साम्राज्य विस्ताराचे प्रत्येक युद्ध जिहाद म्हणून घोषित केले गेले.

ज्यु आणि इसाई लोकांनी हा नवा धर्म स्वीकारावा यांसाठी या जुन्या धर्मांमधील प्रेषित इस्लामात घेतले गेले. पण सोबत जुन्या धर्माला काळानुरूप भ्रष्ट झाल्याचे सांगून इस्लाम या आपल्या परमेश्वराशी इमानदार असलेल्या एकमेव धर्मात वेगळेपण निर्माण करून धर्मांतराला पर्याय शिल्लक ठेवला नाही. अब्रहम, इसाक, जेकब, मोजेस, डेव्हिड, सोलोमन या ज्यु पैगंबरांना कुराणकारांनी अनुक्रमे इब्राहिम, इसा, याकूब, मुसा, दाऊद, सुलेमान अशी अरबी नावे दिली. मुहम्मद पैगंबरांच्या काळी अरबस्थानात काही ज्यु कबिले आणि काही ख्रिश्चन लोक राहत होते. भविष्यात प्रेषित येणार आहे अशी त्यांची श्रद्धा होती. इस्लाम हे ज्यु आणि ख्रिश्चन धर्माचेच सुधारित रूप असल्याचा प्रचार करत असल्यामुळे मदिनेतील सधन आणि प्रतिष्ठीत ज्यु लोक आपल्याला पटकन पैगंबर मानतील अशी मुहम्मद पैगंबरांची अपेक्षा होती. त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘डेट विथ डॅड…’ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘डेट विथ डॅड…’ ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची आळसावलेली सकाळ. सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला.

“तुमचं होऊ द्या. मी नंतर वाचतो.” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले.

 

 मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेलं सिनेमे. सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप  बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे, सातवीपर्यन्त हा सिलसिला चालू होता परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळं झालं. वाद नव्हता, पण संवाद नक्कीच कमी झाला. आतातर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.

 

मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो.

शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं, की आज २ ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. 

“फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय.” नाना फक्त हसले.

“संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी  कार्यक्रमाला तू आणि रिया जा.” नाश्ता करताना मी म्हणालो, तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.

“आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस.”-मी 

“ठीकय. एंजॉय पार्टी. पण लिमीटमध्ये”

“डोन्ट वरी, थॅंक यू बायको.”

“दुपारी जेवायला गोड काय करायचं?” बायकोनं विचारलं

“राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो.

“मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवसंय.”

आठशे चाळीस व्हॉल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो.

“काय रे, काही पाहिजे का?”

“वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा!” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली, तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मीसुद्धा खूप भावुक झालो.

“दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो. ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली.

सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी? प्रचंड गिल्ट आला.

“आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना.”

“हो, स्वयंपाक करून जाते.”

“नको.”

“का?”

“आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!”

“आम्हांला !!” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या.

“नक्कीच! पण नंतर आज दोघंच जातो.प्लीज!” दोघींनी  समजुतीने घेतलं.

“उगीच खर्च कशाला? बाहेर नको.” सवयीने नानांनी नकार दिला. पण मी हट्ट सोडला नाही.

संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल, याची कल्पना आली.

पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता. आता मी.

काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा.

हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्याचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती.

“टेंशन घेऊ नका.रिलॅक्स.” 

“फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले.

“किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय.”

“तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यानंतर आजच..”

“बापरे!एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट!” नाना काहीच बोलले नाहीत.

“नाना, सॉरी!माफ करा.”

“अरे, होतं असं आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक!”

“वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”

“अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”

“आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात . स्वतःवर बंधनं घालून घेतलीत आणि तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये मात्र तुम्ही नव्हताच.”

“हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना

“तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं. ” मी हात जोडले.  एकदम आवाज कापरा झाला. तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण शांततेचे होते.

“उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकांचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतंच.”

“खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.

“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली.

“यापुढे काळजी घेईन”

“अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”

“तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं.”

 

 नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच.बॅकलॉग भरायचा होता. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.

“काय झालं? हसताय का?”

“इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही.” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं. 

“खरं सांगू? बोलायची खूप इच्छा व्हायची. पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते.”

“पर्याय नाही”

“मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचं,याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही, तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”

“नक्कीच.”

“आजचा दिवस कायम लक्षात राहील.”

“माझ्याही.”

“सर्वात महत्त्वाचं, आज माझा उपास नाहीये. ” नाना मिष्किलपणे म्हणाले.

बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती.

“आयला, हो की….” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले. तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली.

“चायनीज खाऊ,” नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून  डोळे भरून आले.

बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच  दोघांची नजर आभाळाकडे गेली.

घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व “बाप”माणसांना  समर्पित…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)

? विविधा ?

☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

बकुळ फुलांनो हळूच या,जुई माझी विसावलीय जरा!नका करू दंगा मस्ती,दुरूनच न्याहाळा तिच्या बंद पापण्यात विसावलेलं आकाश!  खरंच तिला तुम्ही अलवार जोजवा हं !थोडया विसाव्यानंतर ती नक्कीच टवटवीत होईल तिच्या नाजूक बहराला घेऊन,मादक सुगंधासह विहारण्यास वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आणि मग अवघा आसमंत एक होईल!तिच्या मादक गंधात दरवळून निघण्यासाठी!गंधात आत्ताच न्हाऊन आलीय ती! तिच्या मोहिनीने वेडावून तिमीर सुद्धा बघा कसा दाट होऊ पाहतोय…हवं तर खात्री करून घ्या,तिच्या गर्द कुंतलामधील मारव्याला हुंगुन!पण हळूच!स्पर्श केलाच आहे तिला तुम्ही

तर थोडं हितगूजही करून जा तिच्या गूढ भावनांशी,पण जरा सुद्धा धक्का लावू नका तिच्या हिरवाईने नटलेल्या स्वाभिमानरुपी देठाला कारण तिनं तिचा उभा जन्म साकारलाय तिच्या स्वप्नांना ओंजळीत सामावून घेण्यासाठी .मृदेतील प्रत्येक कणाशी मृदा बनून दोस्ती केलीय तिनं स्वतः फूल म्हणून जन्मण्यासाठी आणि ती जाणून ही आहे सूर्योदया पूर्वी पर्यंतच तिच्या क्षणभंगूर जगण्याच रहस्य.आणि बकुळफुलांनो तो बघा तो पवन कसा सावरत आहे तिच्या कुंतलाना हळुवार शीळ घालून, गात आहे अंगाई गीत, तिच्या निश्चिन्त निजेसाठी!कारण त्याला जाणीव आहे तिच्या निस्वार्थ जीवनप्रवासाची स्वतःला सिद्ध करणाऱ्या तिच्या अविरत कष्टाची!भाकरीचा चंद्र शोधून पिलांच्या ओढीन घरट्याकडे परतणारी पाखरे पण तिच्या जवळ येऊन पंखांची हलचाल स्थिरावून एक गिरकी घेऊन जात आहेत अंदाज घेऊन तिच्या निजेचा!

जरा धीर धरा बकुळ फुलांनो,तिच्याशी गप्पा मारायला. कारण सांजेला तिनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ती थोड्याच वेळात जागी होईल,नवा सुगंधी जन्म लेवून  आणि तिचा सगळा क्षिणवटा कुठल्या कुठे दूर पळून गेलेला असेल या छोट्या विसाव्याने!आणि गुंग होऊन जाईल ती मंद धुंद मारव्यासह गारव्याला साथीला घेऊन तुम्हा सख्यांशी हितगूज करण्यासाठी!

© सीमा ह. पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“मुखी रामनाम गाऊ, मुखी रामनाम!” हे ऐकतच लहानाची मोठी झाले .गोंदवलेकर महाराजांनी रामनामाची उपासना सांगितली होती, ती आमच्या घरात चालू होतीच.. त्यामुळे घरातील वातावरणाचा मनावर प्रभाव असल्याने ‘जेथे राम, तेथे नाम’ अशी श्रद्धायुक्त भावनेने उपासना चालू आहे.

सध्या अवघ्या पुण्याला या रामवस्त्राने ऊब पांघरली आहे  असे म्हणायला हरकत नाही! डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडला अनघा घैसास यांच्या “सौदामिनी” साडी सेंटर मध्ये राम वस्त्र विणण्याचे आयोजन केले आहे, असे कळल्यावर आपण तिथे जाऊन दोन धागे तरी विणू या असं मनानं ठरवलं होतं! दोन-तीन दिवस या विचारातच गेले. मग माझ्या दोन तरुण मैत्रिणी जान्हवी आणि योगिता यांच्याबरोबर मी ‘सौदामिनी’ दुकानात गेले. तेथील वातावरण पाहून मन भारावून गेले. त्या दिवशी फारशी गर्दी ही सकाळी नव्हती, त्यामुळे आम्हाला आरामात चार धागे विणण्याची, हात मागाजवळ स्वतःचा फोटो काढून घेण्याची, तसेच रामाच्या मूर्तीचा फोटो काढण्याची संधी मिळाली! मनाला खूप समाधान वाटले. त्यानंतर मात्र रोज राम धागा विणायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि त्या भाविक वातावरणाचे वस्त्र सर्वांच्या मनात विणले जाऊ लागले. ‘इतके काय आहे, तिथे बघूया तरी!’ या विचाराने माझ्या मिस्टरांनी मला तिथे जायचंय अशी इच्छा व्यक्त केली. मी काय एका पायावर तयार होते! रामसेवेत आणखी चार धागे विणायला मिळतील म्हणून! आम्ही सकाळी तिथे दहा वाजता पोहोचलो. आता पहिल्यापेक्षा गर्दी खूपच वाढली होती. रांग लावावी लागत होती.

तरीही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असल्यामुळे आम्ही दोघे लवकरच आत गेलो.रामनामाचे धागे पुन्हा एकदा विणताना मन भरून आले..हे विणलेले वस्त्र आता अयोध्येला जाणार या कल्पनेने!

श्रीराम हे आपल्या देशाचे उपास्य दैवत आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! राम आणि कृष्ण हे परमेश्वराची दोन्ही रूपे  आपल्यासाठी पूजनीय आहेत.ग. दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील वर्णनाने सुद्धा श्रीरामाची नगरी, अयोध्या आपल्या डोळ्यासमोर येते!” श्रीरामाच्या पूजेसाठी आज *अयोध्या सजली…..”हे गीत पुन्हा एकदा 22 जानेवारीला आपल्या ओठावर येणार आहे. श्रीरामांचा आदर्श कायमच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अयोध्याचा राजाराम, एक पत्नी व्रत असणारा राम, आपल्या माता-पित्याबद्दल आदर दाखवणारा राम, आपल्या बंधूंबद्दल प्रेम असणारा राम, सर्व प्रकारच्या  नात्यांना जोडणारा हा श्रीराम आपल्यासाठी आदर्श आहे!

रामभूमी मुक्त करून घेण्यासाठी खूप मोठा लढा हिंदूंना द्यावा लागला. पण आता खरोखरच ते रामराज्य थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसू लागले आहे.

दोन धागे रामासाठी विणायचे म्हंटल्यावर गेले काही दिवस हजारोंच्या संख्येने राम धागा विणण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. आपली रामा बद्दलची श्रद्धा येथे रामनामात गुंतली आहे. जी वस्त्रे अयोध्येला जाणार आहेत, त्याचा एक अंश भाग तरी आपल्या हातून विणला जावा , या श्रद्धेने येथे लोक येत आहेत. प्रत्येक जण दोन धागे विणतात, तिथं असणाऱ्या मूर्तीला श्रद्धेने नमस्कार करतात आणि कृतार्थ भावनेने परत जाताना म्हणतात,’ रामराया तुझ्या वस्त्राचे दोन धागे विणण्याचे भाग्य मला मिळाले, ही तुझी माझ्यावर तेवढी कृपा आहे! एका श्रध्देने  समाज एकत्र येतो. आपल्यातील एक विचार वाढीला लागतो, हे केवढे मोठे समाज मन जोडण्याचे काम या रामनामाच्या धाग्यांनी केले  आहे. या एकूणच संकल्पनेला माझा मनापासून नमस्कार ! *जय श्रीराम! 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares