मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 219 ☆ माझी मराठी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 219 ?

☆ माझी मराठी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(अष्टाक्षरी)

 माय माऊली मराठी

अभिमान माझ्या साठी

डामडौल जगण्याचा

मुळामुठेच्या गं काठी….१

*

भाषा पुण्याची प्रमाण

शुद्ध, सुंदर सात्विक

मराठीचे आराधक

आम्ही आहोत भाविक ….२

*

बोल प्रेमाचे बोलतो

सारे भाषेत तोलतो

असा मनाचा दर्पण

खरे खुरेच सांगतो…..३

*

भाषा सदाशिव पेठी

मला खरंच भावते

माझी शाळा “सरस्वती”

मार्ग मराठी दावते…..४

*

बाजीराव रस्त्यावर

शाळा भक्कम, चांगली

सरस्वती मंदिरात

बाराखडी ती घोकली…..५

*

 मला अभिमान आहे

माझ्या मृदू मराठीचा

मर्द मावळ्या रक्ताचा

आणि पुण्यनगरीचा…..६

© प्रभा सोनवणे

२१ फेब्रुवारी २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ माय मराठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

जन्म कुसुमाग्रजांचा,

अस्मिता महाराष्ट्राची !

भाग्यवंत आम्ही येथे,

जन्मलो महाराष्ट्र देशी !….१

*

माय मराठी रुजली ,

आमच्या तनामनात !

दूध माय माऊलीचे,

प्राशिले कृतज्ञतेत !…२

*

साहित्य अंकी खेळले,

लेख,कथा अन् काव्य !

मराठीने तेवला तो,

ज्ञानदीप भव्य दिव्य !….३

*

घेतली मशाल हाती,

स्फुरे महाराष्ट्र गान !

साधुसंत  न्  शौर्याचे,

राखले जनी हे भान!….४

*

लाडकी मराठी भाषा,

कौतुक तिचे करू या!

मी मराठी आहे याचा,

अभिमान बाळगू या!….५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ प्रेम…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकताच म्हणजे १४ फेब्रुवारीला प्रेम दिवस सगळ्या जगभर साजरा झाला. कोणाची संस्कृती असो किंवा नसो पण त्या दिवसाची संकल्पना आवडली असावी म्हणून प्रत्येक देशात हा दिवस साजरा केला नव्हे साजरा केला जातो.

पण प्रेम ही संकल्पना एवढी संकुचित आहे का हो? फक्त प्रियकर प्रेयसी या मधे असलेले नाते किंवा भावना म्हणजे प्रेम? मग आई, वडील -मुले, आजी, आजोबा -नातवंडे, पाळीव प्राणी – घरातील सदस्य, बहीण – भाऊ, मित्र – मित्र /मैत्रीण, किंवा इतर काही कारणाने निर्माण झालेले नातेसंबंध, उदा. मालक -कामगार, ज्येष्ठ -कनिष्ठ, स्त्री -पुरुष ई….

या सगळ्यांमध्ये असणारी भावना त्याने निर्माण झालेले नाते म्हणजे काय? हे प्रेम नाही?

मग कोणी म्हणेल आई, वडील – मुले म्हणजे मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य

आजी, आजोबा – नातवंड म्हणजे जिव्हाळा,

पाळीव प्राणी – घरातील सदस्य म्हणजे लळा

बहीण – भाऊ म्हणजे बंधुत्व,

मित्र – मित्र /मैत्रीण, म्हणजे मैत्री

मालक – कामगार म्हणजे जबाबदारी

ज्येष्ठ -कनिष्ठ म्हणजे कुठे तरी समानत्व मान्य करून फक्त आधी -नंतर केलेला भेद

इतर कोणीही ओळखीचे अनोळखीचे आपल्याला भेटल्यावर त्यांच्याशी केलेला व्यवहार म्हणजे आपुलकी

स्त्री – पुरुष यामधे असलेल्या भावना म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण? व्याभिचार?

जरा नीट विचार केला तर समजेल की मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य,जिव्हाळा,लळा,बंधुत्व,मैत्री ,जबाबदारी,आपुलकी, दया, उपकार काळजी धाक या सगळ्या नावांच्या इमारती या प्रेमाच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत नावे वेगळी असली तरी हेच प्रेम आहे.

मग या सगळ्यासाठी एक दिवस? नाही नाही या सगळ्या साठी वेगवेगळे दिवस आहेत की असे पटकन सगळे म्हणतील. पण तरी सगळे दिवस जरी साजरे केले तरी फक्त एक एक दिवसच?

दुसरे असे की सगळे म्हणतात ईश्वर एक आहे पण मानवाने त्याच्या सोयीनुसार स्वरूप बदलून अनेक देवांची निर्मिती केली. गम्मत आहे ना ज्या देवाने निर्माण केले त्याच देवांना वेगवेगळे रूप देऊन त्याचे क्रेडिट आपण घेतो. असो तो विषय मोठा आहे.

पण हे जसे घडले ना अगदी तसेच प्रेम ही एकच भावना असताना त्याला वेगवेगळी नावे देऊन त्याला वेगवेगळ्या दिवसात विभागले जात आहे. स्त्री – पुरुष हे विवाहा नंतर दुसऱ्या बरोबर दिसलें तर ते लफडे, व्याभिचर… का ते प्रेम नाही होऊ शकत?

वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या नावाने केले तरी फक्त त्या एका दिवसापुरतेच त्याचे महत्व? बाकी ३६४ दिवसांचे काय? तेव्हा पण या भावना जागृत असल्याच पाहिजेत ना?

प्रेम हे  त्रैलोक्यातील त्रिकालाबाधित सत्य आहे. ते सर्वत्र सारखेच आहे त्याला वेगवेगळे नाव देऊन विभागून त्याचा अपमान करू नका. प्रेमाला प्रेमच राहू द्या वेगळे नाव नको. आणि सगळ्याच संतांनी सांगितल्या प्रमाणे फक्त आणि फक्त प्रेमकी गंगा बहाते रहो……

एवढेच प्रेमाच्या माणसांना प्रेमाचे सांगणे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुलूप… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ कुलूप… ☆ सौ.प्रभा हर्षे

आज नाना अगदी खुशीत होते. सकाळच्या प्रसन्न हवेत मित्रांसोबत छान चालणं झालं,  अण्णाकडे इडली चटणीच्या नाष्ट्याबरोबर चहा  झाला, रोजच्या सारखा सुहास ही भेटला आणि आता नाना घरी यायला निघाले .. …. नाही, जरा चुकलंच ..  नाना मेधाच्या घराकडे निघाले.

आपल्या घराकडे बघत बघतच नाना पुढच्या बिल्डिंगमध्ये शिरले. खरं तर स्वतःचं घर सोडून मुलीच्या घरी रहायला येताना नानांना अगदी कसनुसं झालं होतं .. अपरध्यासारखं वाटत होतं.  पण केतनने आपल्या समंजस वागण्याने त्यांचा संकोच दूर केला. केतन म्हणजे नानांचा लाडका जावई. 

नाना फिरून परत आले तेव्हा केतन दारातच उभा होता

“ बरं  झालं नाना आलात ते, मी आता कुलूपच लावत होतो, तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. बरं .. विजूताई येऊन गेल्या आहेत. सगळा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही वेळेवर जेवून घ्या काय ! मला परत यायला नऊ  तरी नक्की वाजतील, तसं मेधाला सांगा प्लीज ..” ..  केतन भराभरा सर्व गोष्टी सांगत होता.

“ हो, नक्की सांगतो. आणि तू सावकाश जा, पळू नको ! “  नाना हसतच म्हणाले व जवळच्याच खुर्चीवर विसावले. आता तासभर पेपर वाचन, जमलं तर एक डुलकी ! आणि  मगच अंघोळ व देवपूजा  !

का कोण जाणे पण आज अचानक नानांना नानींची फार आठवण येत होती.. पुढच्या महिन्यात  नानींना जाऊन चार वर्षे होतील. सुहासचे, नानांच्या मुलाचे लग्न त्या असतांनाच झाले होते. एक गोड नातही झाली होती या आजी-आबांना. तिच्या लडिवाळ सहवासात दोघांचे निवृत्त आयुष्य छान रमले होते. पण …. पण तिच्या दुसऱ्या  वाढदिवसाच्यानंतर नानी अचानक हार्ट फेलने गेल्या.  नाना फार फार एकटे पडले. 

मुलगा सुहास आणि सून प्रिया .. दोघांचेही रुटीन लवकरच पूर्ववत झाले… पण नाना ? …. नानी गेल्या होत्या त्यांना एकटं सोडून. बाकी सगळं तसंच होतं, पण प्रेमाचा ओलावा मात्र बघता बघता सुकून गेला होता. त्यांची सून -प्रिया फार तापट होती. तिला राग अजिबात आवरत नसे.. आणि रागाच्या भरात  एकदा बोलायला लागली की समोरच्याचा मुळी विचारच करत नसे. नानी होत्या तेव्हा न बोलता सगळं सावरून घेत होत्या .. आणि आता त्या नव्हत्या.  बारीक सारीक गोष्टीवरून घरात कूरकूर सुरु झाली . 

एक दिवस अशीच तिची विनाकारण चाललेली चिडचिड मेधाच्या कानावर पडली.                 

“का आणि कुणावर इतकी रागवली आहेस प्रिया ?”  नानांना भेटायला आलेल्या मेधाने प्रेमाने विचारले.

“काय सांगू आता ? माझं नशीबच असं. सगळा त्रास फक्त मला एकटीला होतो, चिडू नको तर काय करु ?? “ एवढंच बोलून तणतणत प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेली.  

प्रियाचं ते तिरकस बोलणं ऐकून नाना बेचैन झालेले मेधाच्या लक्षात आले . काहीतरी निश्चित विचार करून समजुतीच्या स्वरात ती नानांना म्हणाली, “ नाना, लहानपणी तुम्ही नेहेमी अगदी अभिमानाने म्हणायचात ना की माझ्यासाठी माझा मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही म्हणून… मग आता ते आचरणात आणून दाखवा बघू .. “ — काही न कळून नाना तिच्याकडे बघायला लागले.

“मी काय म्हणते नाना, तुम्ही आमच्याकडे रहायला चला. खरं सांगू का .. तुमचा नातू होस्टेलवर गेल्यापासून आमचं घर अगदी रिकामं रिकामं वाटायला लागलंय.. कंटाळवाणं वाटायला लागलं आहे. केतन तर गप्प गप्पच असतो बऱ्याचदा. तुम्ही आमच्याकडे राहायला आलात ना तर घरात जरा जान येईल. आमच्या. आणि हो, मलाही तुमचा सहवास लाभेल .. जरा सोबत होईल. चला ना नाना ! इतका विचार करण्यासारखं काय आहे यात ? “  

नानांनाही थोडा बदल हवा होता. सुनेची सततची चिडचिड नकोशी वाटत होती. पण म्हणून असं मुलीकडे रहायला जायचं ? नानांचा पाय घरातून निघत नव्हता.. काही झालं तरी नानीच्या असंख्य आठवणी होत्या त्या घरात .. काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. पण मेधाचा तो अगदी मनापासूनचा आग्रहही त्यांना मोडावासा वाटत नव्हता. मनाला नकळत दिलासा वाटायला लागला होता. 

पण मेधा तिच्या प्रस्तावावर ठाम होती. तिने त्यासाठी प्रियाची मूक संमती मिळवली व लगेच नानांची बॅग भरली.  केतन .. तिचा नवरा .. तो तर आधीपासूनच नानांचा लाडका विद्यार्थी होता ! अत्यंत हुषार, नम्र, आणि महत्वाचं म्हणजे माणसं जपणारा ! नाना आपल्या घरी रहायला येणार या विचारानेच  त्यालाही फार आनंद झाला.

मेधा आणि सुहास दोघांचेही फ्लॅट्स शेजारशेजारच्या बिल्डिंगमध्ये होते. त्यामुळे नानांच्या रोजच्या सकाळ संध्याकाळ मित्रांच्या कट्ट्यावर जाऊन गप्पा मारणे या कार्यक्रमातही  काही बदल झाला नाही. सकाळी फिरायला व संध्याकाळी बागेत नानांचा वेळ छान जात असे.

आता त्यांचे आयुष्य बरेच स्थिरावले होते. दिवस आनंदात .. निवांतपणे जात होते.  पण एक दिवस अचानक संध्याकाळी घाबऱ्या घाबऱ्या सुहास मेधाकडे आला आणि घाईघाईने त्यांना म्हणायला लागला ..

“ नाना, आत्ताच्या आत्ता घरी चला ! “

“ अरे हो , पण झाले काय ? आधी इथे बस बघू जरा.. आणि प्रिया ..  छकुली .. त्या दोघी कुठे आहेत ? “

सुहासचा आवाज ऐकून मेधाही लगेच बाहेर आली.

“ ताई, अगं बघ ना हे काय झालंय ! “

सुहास अगदी रडवेला झाला होता. तितक्यात प्रिया व छकुलीही तिथे आल्या. मेधाच्या गळ्यात पडून प्रिया एकदम रडायलाच लागली. नानांना पाहून छकुलीने धावत जाऊन त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.

नाना दिग्मूढ होऊन पहात राहिले होते. सुहास खाली मान घालून  गप्प बसला होता. नेमकं काय झालं होतं  हे कळतच नव्हतं त्यांना. काही क्षण असेच असह्य शांततेत गेले.

मग आधी हळूहळू प्रिया शांत झाली.  नानांच्या जवळ जाऊन बसली .. रडवेल्या आवाजात त्यांना म्हणाली .. “ नाना, मला माफ करा. मी चुकले. त्यादिवशी मी खूप रागावले. फक्त त्यादिवशीच नाही – बरेचदा अशीच वागते मी. पण काय करू? राग आला की माझ्या मेंदूचे आणि जिभेचे कनेक्शन सुटूनच जाते, मी तोंडाला येईल ते वाट्टेल तसे बोलते. त्या दिवशी मी तुम्हाला उद्देशूनच म्हणाले होते की ‘ जिवंत कुलूप आहेत नुसते, फक्त दाराला लटकत राहायचं , बाकी काही काम करायचं नाही.’ .पण नाना माझं फार फार चुकत होतं. मी हे विसरले होते की बाकी काही नाही तरी आहे ते राखण्याचे काम हे जिवंत कुलूप उत्तम तऱ्हेने करत असते.. म्हणजे …. म्हणजे  इतके दिवस छकुलीला तुमच्यावर सोडून मी निर्धास्त फिरत होते.  मला असंच वाटायचं की मलाच एकटीला सगळं काम पडतं. कुणीच मला जरासाही हातभार लावत नाही. पण माझ्या हे लक्षात येत नव्हतं की तुम्ही घरातले काम केले नाहीत तरी छकुलीला संभाळण्याचे मोठे काम करत होतात ! आणि तेही अत्यंत मनापासून आणि प्रेमाने ! हे मी कधी लक्षातच घेतले नाही. तुमच्या या मोलाच्या मदतीचे महत्व कधीच माझ्या लक्षात आले नाही नाना. पण त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागते. तुम्ही परत आपल्या घरी चला. पुन्हा मी कधीच अशी चिडचिड करणार नाही . मी माझा स्वभाव बदलायचा प्रयत्न करीन .. अगदी नक्की आणि मनापासून. परत मी अशी इतकी चिडले तर तुम्ही माझा कान धरा, पण असं घर सोडून जाऊ नका ना नाना “ ..  प्रिया खरंच अगदी काकुळतीला येऊन बोलत होती.

“अग ,पण झालंय काय , ते तर सांगशील ? “

“तसं झालं नाही काही, पण होऊ शकलं असतं.. अगदी होता होता बचावली छकुली आणि आम्हीही . “   

“अगं आधी शांत हो आणि नीट सांग बघू .. काय झालंय ते “

“काय झालं, मी नेहेमीसारखी खाली भाजी आणायला गेले होते. छकुली घराच्या दारापाशी बसून खेळत होती. दार उघडंच होतं…  मी लगेचच परत येणार होते ना. पण दार उघडं आणि घरात छकुली एकटी .. हे बघून शेजाऱ्यांचा पेपरचे बिल मागायला आलेला मुलगा आपल्या घरात शिरला व त्याने दार लावून घेतले.
छकुलीला उचलून पलंगावर ठेवतच होता तो.. पण तितक्यात मी दार उघडून आत गेले. नशिबाने मी ल्याचची किल्ली घेऊन गेले होते..  दार उघडून मी आत शिरले..  पाहिले तर हा प्रकार ! मी छकुलीकडे धाव घेतली, पण तेवढ्यात तो पळून गेला. मी त्याला ओळखते. पण नाना, छकुली खूप घाबरली आहे ! ‘ आई, त्या काकाने असं का केलं मला ‘  असं सारखे विचारते आहे ! आता मी तिला काय सांगू ? “

प्रिया परत रडायला लागली . मेधाने तिला जरा शांत केले आणि म्हणाली .. “ अगं प्रिया, नानांना घरातल्या कामाची सवय नाहीये. शाळेची नोकरी, ट्युशनस् आणि त्यांचे सोशल वर्क यामुळे ते सतत बाहेर असत. घरातले सगळे काम आईच करायची, आम्ही पण मदत करायचो. पण आता आई नाहीये.  तू जर नानांना सांगितलस ना की ‘ नाना जरा हे काम करता का ? ‘  तर ते नाही म्हणणार नाहीत. त्यांना आपणहून काही सुचत नाही गं. हे लक्षात घे, त्यांना  थोडे संभाळून घे, बघ मग .. सगळं व्यवस्थित होईल. नको रडूस. “

नानांनी काहीच न बोलता आपली बॅग भरली व छकुलीचा हात धरून नाना त्यांच्या घरी परत निघाले…   पण नानांच्या मनातून या चार महिन्यांमधल्या आठवणी काही जात नव्हत्या. राहून राहून ते विचार करत होते  ‘ तेव्हा आपलं काय चुकलं होतं — आणि आज आपण परत त्या घरी चाललो आहोत हे तरी नक्की बरोबर आहे का ? त्या घरात आता आपलं नक्की स्थान काय असणार आहे ?  खरोखरच आपण फक्त एक कुलूप असणार आहोत का ? लोखंडासारखं निपचित लटकत रहाणारं एक जिवंत कुलुप?‘ 

सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

“अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता, इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.

‘एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?’

‘ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे.’

‘पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं’ फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.

रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,

‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण “3G”मध्ये रमून जाते.’

‘आज्जी,”हे” म्हणायला यू आल्सो नीड “3G”?’

रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,

‘अरे,दत्तात्रय म्हणजे ‘ब्रम्हा -विष्णु -महेश” टुगेदर, म्हणजे “3G”च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची ‘नीड’ असलेल्या “3G” मध्ये एक मेजर फरक आहे.’

‘फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?’ रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.

‘सांगते! सगळे ज्याचे फॅन झालेत ‘ते “3G” मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं. पण मी नुसतं “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असं म्हटलं तरी इनफ आहे.’

 ‘का ?असं का ?आणि “दिगंबरा” म्हणजे ?’ रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.

‘अरे,”दिगंबरा”चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला.”दिगंबरा”

हे दत्ताचं अजून एक नाव आहे.’

या अशा संवादानंतर “3G” ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.

‘So श्रीदत्त  म्हणजे 3 in one देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ‘ गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.

‘दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच “श्रीदत्तात्रय”!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी “ब्रम्हा-विष्णु-महेश” या देवांची कठोर आराधना केली.’

‘कठोर आराधना म्हणजे?’ मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.

‘म्हणजे “hard worship” ! त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला “गोष्ट” हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.

‘म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं continuous hard try करायला लागतं….’त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरुवात केली.

‘अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला “त्रिदेव पुत्रप्राप्ती” झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तजयंतीच्या दिवशी ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा….” ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?’ 

मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली, ‘आरतीमध्ये “त्रैमूर्ति” का म्हटलंय ते आता मला करेक्ट समजलंय आजी. पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय, कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी ?’

खरंतर त्याच्या तोंडून ‘तसबीर’ हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं. माझे ‘मराठी प्रयत्न’ रूजतांना पाहून छान वाटतं होतं. पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,

‘पृथ्वी – म्हणजे “मदर अर्थ” कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं “प्रतिक” आहे.”प्रतिक” म्हणजे symbol. आता पहा, ते “3G” symbol दिसत असलं की सगळे कसे खूश असतात. त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं ! ४ कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे– “ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद” !’

‘वेद म्हणजे काय आजी ?’ रोहिननं अधीरपणे विचारलं.

खरं तर “वेद” म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.तरीही मी म्हटलं,

‘काही माहिती हवी असेल, काही क्वेरी असेल, काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण विकिपिडिया रिफर करतात,राइट ? ‘वेद’ म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं “ज्ञानाचं भांडार” आहे.’   त्याला  चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.

‘व्हेरी इंटरेस्टींग. आज्जी अजून सांग नं ‘आता रोहिनला राहवेना.

‘शंख-चक्र हे श्रीविष्णूचे तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे. मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?’

‘अगदी बरोबर आज्जी,” ब्लूटूथसाठी डमरू आणि जनरल सेटिंग्ज ला चक्र “अशा साइन्स असतात. आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे ?’

‘अरे त्याला कमंडलू म्हणतात. कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.’

व्हाॅटस्अॅपच्या सिम्बाॅलशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं. माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.

‘पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू “अवधूत चिंतन …..”असं का म्हणतेस ?अवधूत म्हणजे ?’

‘अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे. ह्या नावाचं मिनिंग आहे ” नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा “.

म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे, नेहमी आनंदात ठेवणारी. पहा, आजकाल “3G” चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?

काय?’

रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही ! खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली, एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.

सध्याच्या “4 G” च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या “3G” शी कनेक्ट करू शकले… आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?

लेखिका : सुश्री अनुजा बर्वे

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’… ☆ माहिती-प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ ☆ माहिती-प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर ☆

अवघ्या ६५ वर्षांची विद्यार्थिनी — श्रीमती विनया नागराज 

2018 च्या सप्टेंबर महिन्यात पुण्यातल्या सहकारनगर जवळच्या ICWA चॅप्टर क्लासमध्ये 64 वर्षांच्या एक आज्जीबाई एका वर्गात शिरल्या. तेव्हा वर्ग सुरू झाला होता. आणि समोर 20-21 वर्षांची मुलं त्यांच्या शिक्षिका आणि फळ्याकडे बघत होती. अचानक आज्जी दिसल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या मुलीला वाटलं, शिक्षिकेची आई किंवा नातेवाईक आली आहे. त्यांनी शिकवण्यात गुंग झालेल्या शिक्षिकेला तसं सांगितलंही. पण, आज्जीबाई उडालेली गंमत बघत शांतपणे त्या मुलीच्या शेजारी रिक्त असलेल्या बाकावर बसल्या. जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.

आता 65 वर्षांच्या झालेल्या त्या आजी श्रीमती विनया नागराज यांनी काही तासांपूर्वीच मला तो सांगितला. विशेष म्हणजे या आजीनी गेल्याच आठवड्यात ICWAचा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णही करून दाखवला आहे.

या अभ्यासक्रमाची यशस्वीतेची टक्केवारी 15 ते 20 इतकी असते. म्हणजे शंभरामध्ये फक्त 15 ते 20 मुलं परीक्षा पास होतात. सीएच्या खालोखाल कठीण अभ्यासक्रम तो मानला जातो. आणि त्यात विनया नागराज यांनी 59% गुण मिळवून बाजी मारली आहे.

‘मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. नातू आता समजदार झाला आहे. मग अशावेळी फक्त टीव्ही बघत का वेळ घालवायचा. त्यापेक्षा कॉलेजनंतर जे करता आलं नाही ते स्वप्न का पूर्ण करू नये,’ असं म्हणत विनया यांनी आपला मागच्या दोन वर्षांचा काळ सत्कारणी लावला आहे.

‘मुलगी सीए असेल तर मुलगा मिळणार नाही’

विनया यांचं बालपण आधी कोल्हापूर आणि पुढे मुंबईत विले पार्ल्याला गेलं आहे. माध्यमिक शिक्षणक्रम म्हणजे तेव्हाची अकरावी त्यांनी उपजत हुशारीमुळे 14व्या वर्षीच पूर्ण केली. त्यानंतर बीकॉमही त्या मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमधून 18 व्या वर्षी झाल्या.

— पण, ते वर्षं होतं 1974 मुंबई सारख्या ठिकाणीही मुली फारशा बाहेर दिसायच्या नाहीत. आणि कॉलेजमध्ये सुद्धा एखादी मुलींची रांग सोडली तर बाकी अख्खा वर्ग मुलांनीच भरलेला असायचा, असं विनया सांगतात. अशा परिस्थितीत मुलीला सीए व्हायचंय ही गोष्ट वडिलांना आणि घरी रुचणारी नव्हती. सीएच नाही तर मुलीने नोकरी करण्यालाही घरून विरोध होता. त्यामुळे विनया यांचं हे स्वप्न तेव्हा अपूर्णच राहिलं. पुढे काही कारणांनी एमकॉमची परीक्षाही त्यांना देता आली नाही.

तेवढ्यात लग्न झालं आणि दोन मुलांबरोबर प्रापंचिक जबाबदाऱ्याही वाढल्या. या धबडग्यात सीए व्हायचंय हे ही विनया विसरून गेल्या. त्यांची त्याबद्दल तक्रारही नव्हती. सासरच्या सहकार्याने त्यांनी बँक ऑफ बडोद्यात नोकरी मात्र मिळवली. आणि घर-संसार सांभाळत स्केल-टू ऑफिसर पर्यंत बढती मिळवली. अर्थात, या सगळ्यांत घरच्या ज्या जबाबदाऱ्या येत होत्या – घरची आजारपणं, कुणाचं दुखणं-खुपणं हीच त्यांच्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. अगदी घरातली गरज पाहून 2001 मध्ये त्यांनी या नोकरीतूनही स्वेच्छा निवृत्ती घेतली. बँकेत आणि घरातंही त्यांचं काम चोख होतं. करत असलेल्या कामात त्याही समाधानी होत्या.

पण, 2017 मध्ये त्यांचे पती वारले. दोन्ही मुलं सुमेध आणि सुकृत त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आणि संसारात रमली होती. नातू नऊ वर्षांचा म्हणजे जाणत्या वयाचा होता. अशा वेळी निवृत्त माणसाने काय करावं? — असा विचार जेव्हा विनया यांनी केला तेव्हा त्यांना आठवलं, त्यांचं एकेकाळचं स्वप्न सीए होण्याचं. त्यांनी चौकशी केली वयोमर्यादा आणि आणि आताच्या अभ्यासक्रमाची. मग कळलं इतक्या वर्षांनी आर्टिकलशिप शिवाय सीए शक्य होणार नाही. पण, आयसीडब्ल्यूए म्हणजे सीएमए शक्य होईल आणि ते झाल्यावर सीए साठीही अर्ज करता येईल.

…. झालं. 64 व्या वर्षी विनया नागराज यांचं ध्येय निश्चित झालं. सीएमए करायचं.

…. 65 व्या वर्षी अभ्यास आणि ऑनलाईन परीक्षा

अभ्यास आणि त्यासाठी लागणारं व्यवस्थापन हे विनया यांच्या अंगातच आहे. मानसिक तयारीही होती. पण, 1974 मध्ये सोडलेलं शिक्षण 2018मध्ये पुन्हा सुरू करायचं हे थोडीच सोपं होतं. काळ बदलला होता, अभ्यासक्रम बदलला होता, अभ्यासाची तंत्रं बदलली होती बरोबरचे विद्यार्थी बदललेले होते. सगळं नवंच होतं. पण, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, ही काही फक्त म्हण नाही आहे. ती प्रत्यक्षातही उतरवता येते, असा विश्वास त्यांनी बाळगला.

नवीन अभ्यासक्रमात संगणकाविषयी ज्ञान अत्यावश्यक होतं. एक अख्खा पेपरच त्यावर होता. विनया यांनी बँकेच्या नोकरीतही कधी फारसा संगणक वापरला नव्हता. जो वापरला तो लॅन नेटवर्कवर… लेजर बुकशी त्यांची दोस्ती. म्हणजे आता संगणक शिकणं आलं. आणि मग त्या बरोबरी सगळेच नवीन असलेले विषय प्रत्येक कोर्सला चार याप्रमाणे..

नवीन जगात तरुण मुलं अभ्यासासाठी कुठली साधनं वापरतात, कोणती नवीन पुस्तकं उपलब्ध आहेत, क्लासेस नेमके कसे भरतात, यातल्या कशाचाही गंध नव्हता. पण, प्रयत्न सोडायचे नव्हते.

अभ्यास सुरू केला. आणि आयसीडब्ल्यूए संस्थेकडून पुस्तकंही आली, त्यांच्याकडूनही एक एक माहिती कळत गेली. संगणक कोर्सचं प्रशिक्षणही संस्थेकडूनच आयोजित केलं जातं हे कळलं. अभ्यासक्रमाचे क्लासेस भरतात ही माहिती मिळाली. त्याप्रमाणे संगणक आणि चॅप्टर क्लास दोन्हीची सुरुवात झाली.

सुरुवातीला सांगितलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या या सीएमए चॅप्टर क्लासचा पहिला दिवस.

क्लासची चौकशी करण्यासाठी त्या आपल्या सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेल्या होत्या.

कारण, आताही सीएमए करतोय म्हणजे घर चालवण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतोय, अशा अभिनिवेश नव्हताच त्यांचा. घर सांभाळून अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळणं जमेल एवढाच त्यांचा आत्मविश्वास होता.

बँकेच्या नोकरीत आणि एरवी चार-चौघात वावरतानाही फारशा न बोलणाऱ्या विनया आता मात्र क्लासमधल्या लहान मुलं आणि शिक्षकांमध्ये चांगल्या बोलू लागल्या होत्या. शंका विचारत होत्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही देत होत्या. मुलं जी गणितं कुलकुलेटर करत तीच त्यांच्याही आधी या तोंडी सोडवत. अभ्यासातही क्लासमधील 20 वर्षांच्या मुलांपेक्षा त्या काकणभर सरसच आहेत ही गोष्ट हळुहळू इतरांच्या लक्षात आली. आणि क्लासमधली सगळी मुलं त्यांची मित्र झाली. संगणक शिकवायला या मुलांची आणि घरी सून दिशा यांची मदत झाली.

सुरुवातीला दर सहामाहीला एकच कोर्स घेणाऱ्या विनया यांनी जानेवारी 2021 मध्ये उर्वरित दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्रच दिली. कोव्हिडमुळे 2020 साली परीक्षाच होऊ शकली नव्हती. परीक्षा एकत्र देण्याचा विश्वास त्यांना त्यांचे पुणे चॅप्टर क्लासचे शिक्षक आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे सुरुवातील संगणकावर बसायला घाबरणाऱ्या विनया यांनी शेवटची परीक्षा कोव्हिड मुळे ऑनलाईन म्हणजे पूर्णपणे संगणकावर दिली. आणि फायनलला त्यांना 59% गुण मिळाले.

आता त्यांनी सीए साठीही प्रवेश घेतला आहे.

‘अनंत अमुची ध्येयासक्ती’.. 

मानसोपचारतज्ज्ञ शैलेश उमाटे यांना विनया नागराज यांचं उदाहरण समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करणारं वाटतं. “अनेकदा आयुष्याच्या पूर्वार्धात अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे मनुष्य उत्तरार्धात आसवं तरी गाळतो. किंवा आपलं स्वप्न मुलं पूर्ण करतील असं म्हणत स्वप्न दुसऱ्यांवर लादतो. पण, विनया यांनी निवडलेला मार्ग आगळा वेगळा आहे,” शैलेश उमाटे यांनी सांगितलं.

त्यांनी निवडलेल्या स्वकर्तृत्वाच्या मार्गामुळे विनया यांचं जगणं मानसशास्त्रातल्या परिपूर्णता (MATURITY) किंवा ज्ञानदायी (WISDOM) अवस्थेकडे जातं. आणि या जगण्यातून त्यांना आणि कुटुंबीयांनाही समाधान मिळतं, असं वर्णन उमाटे यांनी केलं आहे.

शिवाय 65व्या वर्षी शिक्षण घेतल्यानंतर आपलं ज्ञान इतरांमध्ये वाटण्याची उर्मीही विनया यांच्याकडे आहे याविषयीही शैलेश उमाटे यांनी बोट दाखवलं आहे.

“स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं. ते पूर्ण केलं. पण, त्याच बरोबरीने इतरांना शिकवण्याची तयारी दाखवून त्यांनी आपलं ध्येयही व्यापक केलं आहे. त्यामुळे त्यांना मिळणारी सकारात्मक उर्जा खूप वरची आहे,” असं उमाटे यांनी बोलून दाखवलं.

माहिती प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वांग्याचं भरीत’… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वांग्याचं भरीत‘… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

माझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, “आई, मधूमावशीचा फोन आलाय”.

मी कणीक मळत होते, लेकीला म्हणाले,” टाक स्पिकरवर.” कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली. “आज स्वयंपाक काय केलास?”

मी म्हणाले, “भरीत.”

मैत्रीण म्हणाली, “मी पण आज भरीतच केलंय आणि श्रुतीकडेपण आज भरीत.”  यावर आम्ही दणदणीत हसलो.

इतका वेळ मुलगी माझा स्पिकरवर टाकलेला फोन हातात घेऊन उभी होती. ती, काय विचित्र बायका आहेत, कशावर पण हसतात, अशा अर्थी चेहरा करून बघत होती. “टाटा, बाय बाय, भेटू, चल ठेवते, चल ठेऊ आता,” असं साडेनऊ वेळा एकमेकींना म्हणून मग तिने फोन ठेवला.

फोन ठेवल्यावर मुलीने अपेक्षित असा चेहरा करून विचारलंच, “आई, तुम्ही कशावर पण हसता का ग? भरीत केलंय, यावर काय इतकं हसायचं?”

“आमचं सिक्रेट आहे ते…”

सिक्रेट म्हणाल्यावर मुलीचे कान  सशाइतके लांब झाले. “सांग, सांग” असा तिचा मंत्र दहा वेळा म्हणून झाल्यावर, “भांडी लाव. मग सांगते”, “जरा कोथिंबीर निवड. मग सांगते” असा तिचा जरा अंत पाहिला.

आता ती माझी मुलगी असली तरी तिच्यात सहन शक्ती कमीच. “नको मला ते सिक्रेट, उगाच सगळी काम करून घेत आहेस माझ्याकडून.” ती सटकून जायला लागली. म्हणून मी पण जरा सबुरीने घेतलं.

“ऐक  ग बायडे, माझी सासू म्हणजे तुझी आज्जी एकदम कमाल बाई. खूप शांत, समजूतदार आणि शांतपणे विचार करणं तर त्यांच्या कडून शिकावं . पण या गुणांच क्रेडिट त्या त्यांच्या सासरे बुवांना देत.

अनेक आघात आजीनी लहान वयात सोसले होते. आई खूप लहान वयात गेली. त्यामुळे मुळात त्या खूप हळव्या होत्या. मग एकत्र कुटुंबात लग्न झालं. घरात वयाने सगळ्यात लहान. त्यामुळे सतत सगळ्यांचे सल्ले ऐकावे लागायचे. घरात मोठ्या जावा, आत्तेसासूबाई, आजेसासूबाई काहीतरी चुका काढून कान उपटायला तयार असायच्या. या वयाने आणि मानाने लहान. त्यामुळे आजकाल तुम्ही मुलं जसं फटाफट बोलता तसं दुरुत्तर करायच्या नाहीत.

मग सगळी कामं झाली की त्या मागच्या अंगणात तुळशीपाशी रडत बसायच्या.

सासरेबुवांनी दोन तीन वेळा हे पाहिलं. एक दिवस त्यांना सासरेबुवांनी खोलीत बोलवून विचारलं, “काही होतंय का? तुम्ही का रडत असता. घरची आठवण येते का… कुणी काही बोलतं का… आमचे चिरंजीव त्रास देतात का?”

पण आज्जी मान खाली घालून उभ्या.सासरे बुवांनी वडिलांच्या मायेने डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा आजींना एकदम रडू कोसळलं .

“मग आत्तेसासूबाई, मोठ्या जाऊबाई कशा ओरडतात! त्या पण कधी कधी चुका करतात, पण मलाच बोलतात.” हे बालसुलभ भावनेने सांगून टाकलं.

सासरेबुवा हसले आणि म्हणाले, “आज मी सांगतो ते मनापासून ऐका. जपा. खूण गाठ बांधून घ्या. आयुष्यात आनंदी रहाल.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला सगळं कळतं, सगळ येतं, आपण शहाणे, बाकी सगळे पौडावरचे वेडे असाच समज असणारी अनेक माणसे असतात. बरं.ही माणसं वयाने मोठी असतात. जवळच्या नात्याची असतात.त्यामुळे काही बोलायची सोय नसते. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. पण अशा अतिशहाण्या लोकांना वाटतं, आपण म्हणजे सर्वगुणसंपन्नतेचा महामेरू आहोत. बरं. ही माणसं चुकली, तर यावर ते स्पष्टीकरण देऊन आपण कसे बरोबरच होतो, समोरचाच चुकला हे पटवून देतात. पण हे स्वारस्य वयाने लहान माणसाला नसते. पण यामुळे नात्यात ताण येतो, मोकळेपणा जाऊन, एक प्रकारे दबून जाऊन नात्यात, वागण्यात अलिप्तता येऊ लागते. ज्याला सतत सल्ले ही माणसं देत असतात, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. मन हळवं होऊन जातं. भीती वाटत राहते – आपण चुकलो तर? आपल्याला जमले नाही तर?

काय?असंच होतंय का ?” आजीला सासरे बुवांनी विचारलं.

सासूबाईंच्या अगदी मनातलं त्यांच्या सासरेबुवांनी ओळखलं होतं.

“पण मग वागायचं कसं अशावेळी?” तुझ्या आजींनी घाबरत विचारलं.

“हे बघा, खूप त्रास करून घ्यायचा नाही. त्या दिवशी जेवणात सरळ भरीत करायचं.”

आजीला काही उमगलं नाही.

“म्हणजे?… “

“कुणी तरी आपल्याला दुखावलं, आपल्याशी वाईट, चुकीचं वागलं की आपल्या मनाला त्रास होतो.. मनात विचारांचे द्वंद्व सुरू होतं… हे विचार कुणाशी बोलून मन शांत होणार असेल तर ठीक, पण काही वेळा या गोष्टी ऐकतील असे उत्तम कान आणि सुदृढ मन आपल्यापाशी नसतं. या अस्वस्थ विचारांचा निचरा तर व्हायला हवा. हो ना? नाहीतर त्याची मोठी जखम मन सांभाळून ठेवतं .”

आजीचं वय लहान. मग तिला समजेल, असं त्यांना समजवायचं होतं.

“ऐका सूनबाई, हे आपल्या दोघांचं गुपित असेल हा. कुणाला बोलायचं नाही.

एक मोठं वांगं घ्यायचं. ते वांगे म्हणजे असं समजायचं, ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलं आहे, ती व्यक्ती.त्याला भाजायला ठेवण्याआधी हळुवार तेल लावायचं.हे हळुवार तेल लावणं म्हणजे तुम्ही त्यांची काढलेली समजूत किंवा तुम्ही तुमच्या वागण्याची दिलेली सफाई असं म्हणू.वांग्याचं चुलीवर भाजणं म्हणजे तुम्ही सफाई दिली म्हणून उठलेला फुगाटा (म्हणजे आलेला राग). आता हे भाजलेलं वांग घ्यायचं आणि त्याला सोलून चांगलं रगडून घ्यायचं. मनात आलेला सगळा राग ते वांगे रगडताना काढायचा. बघा. मन आपोआप शांत वाटेल. आणि मग, निर्मळ मनाने भरीत करायचं.कारण जेवणात आपल्या चांगल्या वाईट भावना उतरत असतात. त्यामुळे  भरीत करताना मन शांत, आनंदी ठेवूनच करायचं.”

आजींना ही कल्पना खूप आवडली होती.  पुढे हे सासरेबुवांचं गणित योग्य वेळी वापरलं. त्याचा अतिरेक होऊ दिला नाही.

जेवणात भरीत झालं की सासरेबुवा हळूच हसायचे आज्जी कडे बघून. दोघांचं सिक्रेट होतं ते.

 “एकदा माझ्या सगळ्या  मैत्रिणी आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा श्रुती मावशी तिच्या सासूबाईंच्या वागण्यामुळे दुखावली गेली होती. त्या सतत तिच्या चुका काढून तिला बोलायच्या… हे ती आम्हाला सांगताना तुझ्या आजींनी ऐकलं आणि आम्हाला ही भरीत कथा सांगितली.”

आजी लहान होत्या. त्यांचं मन दुखवायचं नव्हतं , घरातलं वातावरण बिघडवायचं नव्हतं आणि आजींच्या मनावर फुंकर पण घालायची होती. हे सगळं आजींच्या सासरेबुवांनी खूप छान समजावलं. त्याला रोजच्या व्यवहारातील गोष्टीची उपमा दिली.

आजींनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्हीसुद्धा भरीत थेरपीचे फॉलोअर्स झालो.”

“Wow.. हे भारी आहे की”, लेक किंचाळली..

“आई, म्हणजे आत्ता गॅसवर जे वांगे भाजायला ठेवलं आहेस तो बाबांवरचा राग आहे वाटतं? त्याला आता रगडून बाहेर काढायचा आहे?”

“गप ग. पळ तू आता इथून.”

मी मस्त शांत मनाने भरीत केले.. जेवायला वाढले.. तेव्हा लेक आणि तिचा बाबा.. गालातल्या गालात हसत होते.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मायमराठी…” – कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मायमराठी…” – कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

(वृत्त – भुजंगप्रयात)

नसे घेतला मी तिच्या जन्म पोटी,

नसे देवकी माय माझी जरी ती,

जिचे स्तन्य सांभाळते भान माझे,

यशोदाच ती माय माझी मराठी ॥

*

तिचा ‘छंद’ माझ्या नसांतून वाहे,

तिचे ‘वृत्त’ श्वासांतुनी खेळताहे,

जरी भंगण्याचा असे शाप देहा,

‘अभंगातुनी’ ती चिरंजीव आहे ॥

*

तिची एक ‛ओवी’ मलाही स्फुरावी,

कधी ‛शाहिरी’ लेखणीही स्रवावी ,

तिचे ओज शब्दांत ऐसे भरावे,

सुबुद्धी जनां ‛भारुडातून’ व्हावी ॥

*

दिसे बाण ‛मात्रेत’ तो राघवाचा,

निळा सूर ‛कान्यातला’ बासरीचा, 

‛उकारात’ डोले तुझी सोंड बाप्पा,

‛अनुस्वार’ भाळी टिळा विठ्ठलाचा ॥

*

तिची ‛अक्षरे’ ईश्वरी मांदियाळी,

अरूपास साकारती भोवताली,

तिचा स्पर्श तेजाळता ‛वैखरीला’,

युगांची मिटे काजळी घोर काळी ॥

कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘द अल्केमिस्ट’ – लेखक – पाउलो कोएलो अनुवाद – श्री नितिन कोत्तापल्ले ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘द अल्केमिस्ट’ – लेखक – पाउलो कोएलो अनुवाद – श्री नितिन कोत्तापल्ले ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तकाचे नाव – द अल्केमिस्ट

लेखक – पाउलो कोएलो

अनुवाद – नितिन कोत्तापल्ले

पद्मगंधा प्रकाशन

पृष्ठसंख्या-160

अल्केमिस्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे धातु परिवर्तन विद्या प्राप्त झालेला माणूस, किमयागार सिद्धपुरुष इत्यादी.या पुस्तकामध्ये या शब्दाचा अर्थ इतर धातू चे रूपांतर सोन्यामध्ये करणारा किमयागार असा अभिप्रेत आहे.

माणसामध्ये असणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही मिळू शकतो हा या पुस्तकाचा गाभा आहे.संपूर्ण पुस्तकाची कथा सॅन्तियागो नावाच्या मुलाच्या स्वप्न आणि स्वप्नपूर्ती भोवती फिरते. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो त्याच्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतो, त्यात त्याला काय आणि किती अनंत अडचणी येतात, तरी तो त्याची स्वप्नपूर्ती कशाप्रकारे करतो याचे खूपच रोमांचकारी वर्णन या पुस्तकात केलेले आहे

पुस्तक तर सुंदर आहेच पण अनुवादकार नितीन कोत्तापल्ले यांनी लेखकाचा परिचय दिलेला आहे तो पण मला येथे नमूद करावासा वाटतो. पाउलो कोएलो यांचा जन्म 1947 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याने लेखक व्हायचा निश्चय केलेला होता. मात्र वडिलांसारखे असल्याने इंजिनियर व्हावे असे त्याच्या आई-वडिलांचे मनसुबे होते. त्याचे वाङ्ग्मया वरील प्रेम त्याच्या आई-वडिलांना अतिरेकी वाटत होते. ते त्याला वेडा ठरवत होते. या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या मधला बंडखोर जागा झाला व बेताल वागू लागला. त्याकरिता त्याला मनोरुग्णालयातील विजेचे झटके देऊन उपचार करण्यात आले होते. पण त्याने त्याचे साहित्यावरील प्रेम अबाधित ठेवले होते. पुढे 1976 पर्यंत 65 गाणी लिहून ब्राझीलचा रॉक संगीताला त्याने नवीन चेहरा दिला होता. कालांतराने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यामुळे राजसत्तेने त्याला तुरुंगात डांबून त्रास दिला. सुटकेनंतरही  दोन दिवसांनी छळ छावणीमध्ये मरणप्राय वेदनांचा सामना त्यांनी केला. शेवटी मनोरुग्ण असल्याचं नाटक करून त्याने छळ छावणीतून सुटका करून घेतली होती. ही सारी त्यांच्या वयाच्या 26 व्या वर्षाच्या आधीची कहाणी. नंतर कालांतराने त्यांनी 41 व्या वर्षी ही अतिशय वेगळी कादंबरी लिहिली. ती म्हणजे द अल्केमिस्ट. सुरुवातीला फारशी कोणाच्या लक्षात न आलेली ही कादंबरी. पण नंतर जनतेने या कादंबरीला अक्षरशः डोक्यावर घेतले. या कादंबरीचा 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे व कोट्यवधी प्रतींच्या विक्रीचा उच्चांक नोंदवला आहे.

अगदी भारावून जाण्यासारखे कथानक असल्याने वाचताना खंड पडू नये असे सतत वाटत राहते. सुप्रसिद्ध गायिका मॅडोना म्हणते इतरत्र ज्या खजिन्याचा आपण शोध घेतो ते आपल्याच जवळ असतात हे सांगणारी ही परी कथा आहे.

“का उगाच शोधत बसशी ? तुझे असे तुझे तुज पाशी”याचा  प्रत्यंतर हे पुस्तक करून देते

ही कथा आहे सँतीयागो नामक एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या मुलाची. त्याच्या घरच्यांना तो धर्मगुरू व्हावा असं वाटत होतं पण केवळ वेगवेगळे प्रदेश पाहण्यासाठी, प्रवास करण्यासाठी हा मुलगा मेंढपाळ बनतो त्याला एक स्वप्न पडतं की एक लहान मुलगी त्याच्या मेंढ्या बरोबर खेळत आहे. ती चिमुकली त्याचा हात हातात धरून त्याला इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये आणते व सांगते ह्या पिरॅमिडमध्ये तुला खजिना सापडेल. असे स्वप्न त्याला दोनदा पडते. सँतीयागोला मेंढपाळाचे काम करत असताना बरीचशी मोठी मोठी पुस्तके वाचायची आवड होती. अशा या स्वप्न वेड्या सँतीयागोला स्वप्नाचा पाठलाग करत असताना काय काय अडचणी येतात, कोण कोण त्याला मदत करतं याच रोमहर्षक वर्णन अगदी शेवटपर्यंत केलेले आहे. त्याच्या या अद्भूत प्रवासात त्याला खूप जण भेटतात कुणी मदत करणारे, कुणी त्रास देणारे, त्याची सुंदर प्रेयसी आणि खास करून किमयागार. हा किमयागार वारंवार प्रोत्साहन देऊन त्याला स्वप्नपूर्ती कडे कसा नेतो हे वाचणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. सर्व अडी अडचणीतून शेवटी त्याला खजिना सापडतोच ते फक्त आणि फक्त तो त्याच्या हृदयाचे ऐकत असतो यामुळेच.

एकंदरीतच आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला पाहिजे ते मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा असा संदेश हे पुस्तक देते. आपल्यामध्ये जर आशावाद असेल तर कोठेही आणि केव्हाही एक किमयागार म्हणजेच आपला आंतरिक आवाज हा आपल्यासाठी हजर असतो. जो आपल्यातील अफाट शक्तीचा वेळोवेळी आपल्याला साक्षात्कार करून देतो. हेच या पुस्तकाचे सार आहे.

या पुस्तकात खूप सुंदर वाक्य वाचनात आली ती अशी

हृदयाचे नेहमी ऐक. हृदयाला सर्व गोष्टी कळतात कारण हृदय हे विश्वातम्याचाच  एक भाग असतं. एक दिवस ते तिथेच परत जाणार असतं.

मृत्यूची धमकी नेहमीच माणसाला जीवनाविषयी सजग बनवते.

आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो.

तुझ्या हृदयाला सांग प्रत्यक्ष दुःखापेक्षा दुःखाची भीती ही अधिक वाईट असते.

तर असे हे पुस्तक सर्वांनीच वाचावे पण किशोरवयीन युवक युवतींनी आवर्जून वाचावे असे आहे. आपला आंतरिक आवाज ओळखून सकारात्मक विचारसरणीने भारावून जाण्यासाठी नक्कीच वाचा हे खूप सुंदर पुस्तक.

धन्यवाद

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 42 – जिसने देखा तेरा जलवा… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – जिसने देखा तेरा जलवा।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 42 – जिसने देखा तेरा जलवा… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

जितना चाहा, तुम्हें भुलाना, ध्यान तुम्हीं पर जाता है

मेरा यह शीशा दिल, जाने क्यों पत्थर पर जाता है

*

सहरा में जाकर के, कितनी नदियाँ सूख गईं 

उसकी प्यास बुझाने वाला, खुद प्यासा मर जाता है

*

जिसने देखा एक बार, हो गया तुम्हारा दीवाना 

इस ही कातिल एक अदा पर, हर कोई मर जाता है

*

जिसने देखा तेरा जलवा, उसको होश नहीं रहता 

तू तो परदे में रहकर भी, यह जादू कर जाता है

*

तेरी शोहरत का दीवाना, एक अकेला मैं हूँ क्या 

हर कोई लेकर मुराद, तेरे ही दर पर जाता है

*

यमुना तट की रेत सुबह मिलती है मेरी मुट्ठी में 

तेरी यादों में, वृन्दावन जैसा, घर हो जाता है

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print