मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सौन्दर्य वैशाखाचे…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “सौन्दर्य वैशाखाचे…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. सध्या वैशाख महिना सुरू आहे. या महिन्यात त्रेता युग प्रारंभ झाले. याच महिन्यात विष्णूंचे भगवान परशुराम, नरसिंह आणि कुर्म अवतार झाले. या महिन्यात वेद प्रकटले. या महिन्यात सीता नवमी, नारद जयंती, भगवान बुद्ध जयंती.. आद्य शंकराचार्य जयंती असते. असे महत्त्वाचे सण असलेला हा पवित्र मास.

या वैशाखात वाढणारा उष्मा मात्र त्रास देतो. पण जीवनात प्रत्येकाला वैशाख वणवा सोसावाच लागतो. जणू सहनशक्तीची ती परीक्षाच. पण परमेश्वर या रुक्षतेतही जो दिलासा देतो त्यासाठी कृतज्ञ राहायलाच हवे.

हा दिलासा मिळतोय तो बहरलेल्या निसर्गातून. हे बघण्याची दृष्टी लाभली होती अण्णासाहेब किर्लोस्करांना. त्यांचे ‘संगीत सौभद्र’ हे सन १८८२ चे अजरामर नाटक. त्यात त्यांनी वैशाखाचे असे काही अप्रतिम वर्णन केले आहे की हा ‘सौंदर्य मास’ ठरलाय.

या महिन्यात बहरलेल्या गुलमोहराने आकाश व्यापलेय. मोगरा.. जाई जुई.. अनंत.. गुलाब सगळ्याच फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. मनुष्यच आम्ररसाने संतृप्त झालाय असे नाही तर आम्रवृक्षावर आम्ररस मनसोक्त पिऊन कोकिळ आनंदाने गात आहेत. फुलांभोवती गुंजारव ऐकू येतोय.

लग्नासाठी आतुर वर वधूंना पावणारा.. स्वप्नपूर्तीचा हा काळ. जाईच्या सुगंधी फुलांचे हार एकमेकांना घालून नवजीवनाचा प्रारंभ केलाय. लग्न मंडपात गर्दी जमलीय. वाद्याचा गजर सुरू आहे. एकुण काय तर हा सौंदर्य मास. सध्या झाडावरच्या फुलांचे फळात रूपांतर करण्यासाठी धडपडणारा, जीवन सुगंधी करणारा हा माधव.. वैशाख मास.

 वैशाखमासी वासंतिक 

 समय शोभला ।

 आम्रासव पिऊनि

 गान करिती कोकीला ॥धृ॥

*

 या जाईजुई मोगरिला

 बहर तो अला ।

 गुंजारव करण्यात 

 गुंग मधुप जाहला ।

 नव पल्लव ते फुटति

 सकल वृक्षगणाला ।

 कुसुमगंधयुक्त मंद

 वात सुटला ॥१॥

*

 अति थंडगार चंदनाचि

 उटी लावुनी ।

 वर जातिपुष्प-धवल हार

 कंठि घालुनी

 रमतात युवति चांदण्यात

 पतिस घेउनी ।

 लोका शीतोपचार

 इष्ट वाटला ॥२॥

*

 नगरांत लग्नमंडपाचि

 दाटि जाहली ।

 नरनारि नटुनि वीर्थित 

 मिरवित चालली ।

 बहु वाद्यगजर दुमदुमुनी

 गर्दि उसळली ।

 दक्षिणार्थ भिक्षुकगण 

 पळत सुटला ॥३॥

*

(गीत : अण्णासाहेब किर्लोस्कर.)

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शुभंकरोती…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ शुभंकरोती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शुभंकरोती म्हणता स्मरते

ओसरी अंगण माहेराचे

कानामध्ये घुमू लागती

बाबांचे स्वर मांगल्याचे ||

*

शुभ करणारी दीपज्योती

प्रकाशते घराघरास

अज्ञानाचा तम संपवून

उजळते मनामनास ||

*

पाढे पर्वचा घोकंपट्टी

सूत्र शिकविति अभ्यासाचे

सराव त्यांचा करून गेला

गणित पक्के आयुष्याचे ||

*

ध्यान करता शुभंकराचे

सूर ऐकता आरतीचे

दान मिळते सद्बुद्धीचे

संस्कार घडती शुभंकरोतिचे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दहशतवादी माणूस होतो… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ दहशतवादी माणूस होतो… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(पादाकुलक वृत्त – मात्रा:8+8=16)

उंच उंच देवदार होते

नयनरम्य त्या मोहकस्थानी

हिमनग सारे अंथरलेले

किती देखणे आरस्पानी

*

कसे अचानक तिथे पातले

दानव सारे दुराभिमानी

काळ पातला वेळ घेउनी

विरून गेली अशी कहाणी

*

सौंदर्यातच क्रौर्य उतरले

स्वर्ग नरक ना भेद राहिला

यमदेवाचा घाव अचानक

या जागेने पुन्हा पाहिला

*

स्वप्न घेउनी आले होते

जीवन सारे करण्या सुंदर

पहेलगामने दिले असे की

संपत गेली रम्य धरोहर

*

दहशतादी माणूस होतो

विचार सारे विकृत ज्याचे

मरणाची ना भितीच कुठली

जगण्याशी ना नाते त्याचे

*

सौंदर्याने निसर्ग नटला

निष्पाप रक्त सांडले तिथे

सावित्रीचे श्वास थांबले

तो सत्यवान संपला जिथे

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोकीळ… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कोकीळ ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पानांच्या घुंघटात लपेटून,

 कोकिळ गाई मंजुळ गाणे!

साद कोकिळेस दे आनंदाने,

 सूर सप्तकातील मधुर तराणे!..

*

 चाहूल देईल वसंताची,

 वास पसरील मोहोराचा!

 धुंद फुंद होऊनी परिसर,

 नाचू लागे मोर अंतरीचा!

*

 वसंत राजा सहा ऋतूंचा,

 आंबा राजा जसा फळांचा!

 कोकिळ गाई सुंदर गाणे,

 गान तपस्वी असे निसर्गाचा!

*

 जसा बहावा शोभून दिसतो,

 ऊनझळांच्या सोन संगती!

 प्रत्येकाची वेगळीच महती,

 उमजून येई निसर्गात ती !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कचऱ्याचे मनोगत… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ कचऱ्याचे मनोगत… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नका घेऊ मला हलक्यात 

माझी किंमत फारच मोठी 

असलो जरी आज कचरा 

सफाईसाठी कोटीच्या कोटी

*

शंभर वर्षाचे आयुष्य माझे 

तीन वर्षात म्हणे पुसणार 

आणि त्या जागेवर पुनःश्च

नवीनच धारावी वसवणार

*

माझा सदुपयोग माणूस 

कोण जाणे कधी शिकणार 

डोकं चालवून माझ्यापासून 

रस्ते आणि वीज बनवणार ?

*

मुळातच लावली असती 

मानवाने माझी विल्हेवाट 

आज त्याचे वाचले असते

नगद अडीच हजार कोट

नगद अडीच हजार कोट

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कर काही स्वानंदासाठी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कर काही स्वानंदासाठी... ? सौ शालिनी जोशी 

अशी का सखे तू उदास 

 एकटीच पायरीवर बैसलीस

*

 घर दिसे शोभिवंत टूमदार 

 बाजूला झाडे वेलीही सुंदर 

*

 समोर हा झुला निवांत 

 चहू बाजूला सारा शुकशुकाट

*

 मुले बाळे नातेवाईक दूर 

 म्हणून का दिसे ही हुरहुर 

*

अगं कर्तव्य आपले करावे

 परी अपेक्षात गुंतू नये ग

*

 जग सारे आपलेच जाणतेस

 पुरव आता तुझा छंद हौस 

*

इतके दिवस गेले दुसऱ्यासाठी

आता कर काही स्वानंदासाठी

*

उठ सखे आता सत्वर ….

 घे झोका गा गाणे सुंदर ….

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 272 ☆ अर्थ नाही… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 272 ?

☆ अर्थ नाही… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 

त्यागुन इथे सुखाला जगण्यात अर्थ नाही

मारुन मना विरक्ती धरण्यात अर्थ नाही

 *

माझी मला कळाली गलतीलगेच येथे

तक्रार तू नव्याने करण्यात अर्थ नाही

 *

आता नका तुम्ही त्या सांगू जुन्याच गप्पा

भातासवे कढी तीचरण्यात अर्थ नाही

 *

“झाली बुलंद शेते” गावात बोलबाला

कोणी उगाच आता कसण्यात अर्थ नाही

 *

जो तो इथे शहाणा पंडीत जाहला की

गझला पुन्हा नव्याने रचण्यात अर्थ नाही

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन प्रवास… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन प्रवास… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

व्यथा व्यथेतून जन्म आपला

कथे कथेतून गाणी

सर सर सरते येथे

जीवन संपते जीवन कहाणी

*

युगे युगे युगुलांचे जीवन

प्रेमरसाने येथे नांदती

दिल्याघेतल्या शपथेचे

शब्द पूर्ण गाणी गाती

*

कैक क्षणाचे भारलेले

अनेक जणांची नाती

ऋणानुबंध नष्ट जिवा

नंन्तर होते माती

*

अनेक रंगी अनेक पक्षी

जमता नाती गोती

सृष्टी मध्ये विहार करुनी

परततात आपल्या घरटी

*

आपण सारे होत प्रवासी

अमर नाही कोणी

जीवनाचा कागद कोरा

स्तब्ध होते वाणी.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साथ सोबत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ साथ सोबत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

उंबरठा ओलांडून घरात येणं,

तुला सोप नव्हतं.

जसं,

उंबरठा तोडून घर सोडणं

मलाही अवघडच.

तुझं सोप अवघड झालं.

माझं अवघड सोप झालं.

जेंव्हा आपले अशक्त हात,

आपण हातात घेतले.

काळ समजून घेण्यासाठी,

एक नाळ तोडावी लागतेच नं अं.

दहा बाय आठच्या खोलीलाही

एक छोटी खिडकी होती.

भाड्याच्या घरातही,

चंद्राची मालकी होती.

तेंव्हा पाऊस कोसळायचा,

पाणी गळायचं..

भिंतीतून मनापर्यंत,

ओल झिरपायची.

जीवनकलहाची झळ होती,

तुटलेपणाची कळ होती.

थोडीथोडी गरिबी होती.

गरिबीतही श्रीमंती होती.

तुझी साथ समर्थ होती.

तुझी सोबत संपन्न होती.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईचं प्रेम.. तिचा स्पर्श” – लेखक : श्री दिलीप कुंभोजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईचं प्रेम.. तिचा स्पर्श” – लेखक : श्री दिलीप कुंभोजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

कवी माधव ज्यूलियन

कविता : प्रेमस्वरूप आई (माधव ज्यूलियन)

कवी माधव ज्यूलियन म्हणजेच डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन यांची प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई! ही लोकप्रिय कविता. संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही कविता ऐकताना रसिकांचे मन गलबलते.

 पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहास कवी डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला गेला आहे. माधव ज्यूलियन यांचा जन्म बडोदे येथे झाला तर प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आवळस येथे झाले. पण परत बडोदे येथे मामाकडे जाऊन त्यांनी बी. ए. केले.

नंतर मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून फारसी व इंग्रजीत एम. ए. केले. प्रथम फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते पण नंतर अमळनेर, कोल्हापूर येथे फारसीचे प्राध्यापक म्हणून काम केले. वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात त्यांना खूप तडजोड करावी लागली.

‘गॉड्ज गुड मेन’ या मेरी कोरलेली यांच्या कादंबरीतील एका व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्यूलियन हे नाव घेतले असे सांगितले जाते. ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होत. त्यांच्या ठिकाणी विद्वत्ता आणि कवित्व यांचा अपूर्व असा मिलाफ झालेला बघायला मिळतो.

जरी ते वृत्तीने झुंजार कवी जाणवले, तरी त्यांच्या साहित्यातून कणखरपणा बरोबर वात्सल्याची कोमल भावना अनुभवास मिळते. त्यांच्या ”गज्जलांजली” या निर्मितीमधून यौवनातील प्रेम व्यक्त झाले आहे पण त्या वेळेच्या समाजास हे मान्य झाले नाही, त्यांना ‘प्रणयपंढरीचा वारकरी’ ही पदवी देऊन हिणवले.

छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारतातली पहिली डी. लिट. प्रदान केली गेली. ते १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात अध्यक्ष होते. मराठीत त्यांनी उमर खय्याम यांचा रुबाया तसेच गझल, सुनीत हे काव्यप्रकार समर्थपणे आणले. ‘फारसी – मराठी शब्दकोश’ ही त्यांनी महत्त्वपूर्ण देणगी मराठी सारस्वताला दिली आहे.

‘ प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई! बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी? ’ 

ही कविता म्हणजे एक पोरका मुलगा जो आईच्या प्रेमाला लहानपणीच पारखा झाला आहे, त्याचे मनोगत आहे. त्याच्या मनोव्यापाराचे विश्लेषण आहे, त्याच्या भावनांचा हृदयस्पर्शी आविष्कार आहे. आजही आईच्या प्रेमाला लहानपणीच मुकले आहेत त्यांना ही कविता आणि लतादीदींचा स्वर गलबलून सोडतो. प्रेम ही भावना ही दोन जीवांना अंतःकरणापासून जोडणारा अदृश्य धागा आहे किंवा आत्ताच्या भाषेत Cordless Bluetooth आहे.

त्यातही आई आणि मुलगा / मुलगी यांचे प्रेम म्हणजे अत्युच्च आणि निरपेक्ष असा ऋणानुबंध आहे. कधी कधी वास्तव इतके भयानक असते की मन स्वीकारत नाही. आई आता परत येणार नाही हे माहीत आहे. तरीही मनात आठवणींच्या पलीकडील डोंब पेटल्यावर तो वात्सल्य सिंधूला म्हणजेच प्रेमाच्या सागराला विचारत आहे – ‘ बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी?  

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,

तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना कांहीच रूपरेखा,

आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका॥१॥

आईविना वाढलेला, समजूतदार पोरका पोरगा प्रामाणिकपणे कबूल करीत आहे की माझी आबाळ झाली नाही, माझ्याकडे कोणी दुर्लक्ष केले नाही. तरीसुद्धा… “आई तुझी उणीव माझ्या अंतःकरणात कायम आहे. तुझा चेहरामोहरा मला आठवत नाही पण माझा जीव हे ऐकत नाही, माझ्या मनाला तुझा स्पर्श हवा आहे. ” ही वेदनेची संवेदना आहे. ”ज्याचे जळते त्याला कळते, ” या उक्तीनुसार कवी येथे व्यक्त होत आहे.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई

पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांहीं

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे

नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे॥२॥

वात्सल्य म्हटले की गाय आणि वासरू आपल्या डोळ्यासमोर नकळत येतात. वात्सल्य हा एक निरपेक्ष प्रेमाचा आदर्श आहे. मुल रडले की आई त्याला पदराखाली घेते. तिच्या दोन हातांचा स्पर्शही तिच्या दुधाएवढाच महत्त्वाचा आहे, तिची मांडी हा त्या बालकांचा विश्वास आहे, कवच आहे.

कवी आर्तपणे आईला सांगतो आहे, की माझी शारीरिक भूक ही वरचे दूध भागवेल पण माझी मानसिक भूक हा तुझा स्पर्शच आहे. दुसऱ्यांचे असे प्रेम पाहून मी जास्तच अस्वस्थ होतो, वाटते की आत्ताच्या आत्ता निघावे आणि तू जिथे असशील तेथे येऊन तुझ्या जवळ निजावे, तुला भरभरून पाहावे, आतून हसावे आणि तुझ्या हृदयात, मनात, अंतःकरणात विसावे. कवीची ही हृदयस्पर्शी आळवणी ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येते.

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,

देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?

घे जन्म तू फिरुनी, येईन मीहि पोटी,

खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी॥३॥

या कवितेचा अभ्यास करताना मनात सहज विचार आला, की शेक्सपियरच्या हॅम्लेटची प्रत्यक्ष आई कुठे आणि माधव ज्यूलियन यांनी या कवितेत उभी केलेली अप्रत्यक्ष आई कुठे आहे? भावना दोन्हीकडे आहेत पण संस्कृतीच्या संस्काराचा आविष्कार वेगळा आहे. लहान बालकाचा अस्वस्थपणा आईने त्याला छातीपाशी जवळ घेतले की कमी होतो, हृदयाचे वाढलेले ठोके आपोआप मंद होतात.

आई मला माहीत आहे, की तू या जन्मी मला भेटणार नाही तरी तुला भेटण्याची मनातील आस कमी होत नाही. तू परत जन्म घे, मी परत तुझ्याच पोटी जन्म घेतो. ही माझी इच्छा देव नक्की पुरी करेल. आद्य शंकराचार्य यांच्या पंक्तींमधून आपली पुनर्जन्मावरील श्रद्धा म्हणते, “पुनरपि जननं, पुनरपि मरणं पुनरपि जननी, जठरं शयनं”॥ माधव ज्यूलियन या वरील ओळीत हेच सांगताहेत.

तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;

ताटातुटी जहाली, आता कसे करु मी?

गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,

अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? ॥४॥

विविध उदाहरणांतून कवी माधव ज्यूलियन आपल्या भावना या पोरक्या मुलाच्या द्वारे रसिकांपर्यंत पोचवत आहेत. गायवासरू असू दे नाहीतर मायलेकरू… ताटातूट सहन होत नाही. देवकीने जन्म दिला तरी यशोदेचे प्रेम तितकेच खरे आहे. कान्हा, पान्हा आणि तान्हा यांचे नाते अतूट आहे.

तान्ह्यास दूर ठेवी – पान्हा तरीहि वाहे –

जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते,

अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते॥५॥

तान्ह्या बाळाला, बालकाला सोडून आई जरी दूर दूर गेली तरी प्रेमाचा पान्हा फुटतोच ना? (“घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी” संत जनाबाई). सतीच्या निष्ठुर प्रथेवर १८२९ मध्ये बंगालमध्ये प्रथम बंदी आली, तरी संपूर्ण देशातील जनमानसात हा नियम रुजायला बराच काळ गेला. काही परिस्थितीचे बळी गेले, तरी आज सतीप्रथेचे कोणीच समर्थन करणार नाही. आज मथितार्थ एकच घ्यायचा की हा पोरका अनाथ मुलगा आईची उणीव जाणून आक्रोश करीत आहे.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,

आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे,

तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ॥६॥

आईविना वाढलेला हा मुलगा म्हणत आहे, की जरी आज मी शिकलो आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे, मानसन्मान मिळाला तरी मी ”पोरका”च आहे. सगळं ऐश्वर्य मिळाले तरी आईचे प्रेम माझ्या नशिबात नाही. ही भावना माझ्या पोटात कायम पेटलेली आहे, ती मध्येच प्रसंगाने माझ्या मनावर अधिकार गाजवते.

आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे!

कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,

अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ॥७॥

‘आई… ‘ लतादीदींचा आर्त स्वर अंतःकरणात घुसतो, तेव्हा कवीचे शब्द त्या आवाजात विरघळून जातात. आई तुझा वियोग, दुरावा, त्याच दु:ख कमी करण्यासाठी मला अख्ख ब्रह्मांड शोधले तरी तू सापडली नाही. आकाशातील सुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे उल्का रूप धारण करून तू परत ये! तुझा आत्मा शरीररूपात नसला, तो विदेह असला तरी माझ्या सभोवती आहे. तुझ्या अव्यक्त भावना मला अश्रूरूपात दिसल्या तरी मला आशीर्वादाचे ते तीर्थ जाणवते.

आपल्याकडे एक अशी म्हण आहे, की अशी दु:खद वेळ आपल्या शत्रूवर सुद्धा येऊ नये. ज्यांना आईचे प्रेम आणि सहवास लाभला त्यांना या पोरक्या मुलांची व्यथा कदाचित जाणवणार नाही पण कोणत्याही सहृदयी माणसाला समजल्याशिवाय राहणार नाही. माधव ज्यूलियन आणि त्यांच्या “प्रेमस्वरूप आई”च्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!


लेखक : श्री दिलीप कुंभोजकर

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares