मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतले जसराज…. ☆ सुश्री आसावर केळकर-वाईकर

☆  मनमंजुषेतून : आठवणीतले जसराज…. – सुश्री आसावर केळकर-वाईकर

काहीवेळापूर्वी बातमी आली आणि मनानं खूप वर्षं मागं नेलं. अगदी शालेय वय होतं… नुकताच घरात टीव्ही आला होता आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम त्यावर लागला कि वडिलांची हाक यायचीच… हातातलं काय असेल ते सोडून हाकेला ओ देत धावायचं आणि ‘बैस इथं.. ऐक नीट’ असं त्यांनी म्हणताच टीव्हीला डोळे लावून पाहाताना काय सुरू असेल ते सगळं कानात साठवायचा प्रयत्न करायचा… एकदा असाच टीव्हीवर कार्यक्रम सुरू झाला आणि पपांनी मला हाकारलं… मी धावत आले तर कुणीतरी मैफिलीची अगदी नुकतीच सुंदर सुरांत खूप सुरेल सुरुवात करत होतं आणि कॅमेरा त्याचवेळी फिरून प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेल्या धोतर-झब्बा-खांद्यावर शेला अशी सुंदर वस्त्रं परिधान केलेल्या एका व्यक्तीवर स्थिरावला आणि वडिलांनी सांगितलं, ‘हे बघ… हे पंडित जसराज!’ ती त्यांच्या नावाची झालेली पहिली ओळख!

ते खुर्चीच्या हातावर कोपर टेकवून तर्जनी आणि मधलं बोट गालावर आणि उरलेली तीन बोटं हनुवटीवर ठेवून अतिशय कौतुकभरल्या नजरेनं एकाग्रपणे त्या गायकाकडं पाहात होते, त्याला ऐकत होते. पुन्हा कॅमेरा गायकाकडं वळला आणि जेमतेम वीस-बाविशीचा तो तरूण स्क्रीनवर दिसू लागला. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयातही एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्यात त्या गायकाचे सूर आणि जसराजजींच्या चेहऱ्यावरच्या त्या सुखद भावांचा खूप मोठा सहभाग असावा असं आज वाटतं. मी अजून हातावर ताल देत मात्रा मोजत आलापाचे सूर त्यात बसवण्याच्या पायरीवरच होते तेव्हां… मात्र एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तो शांतावणारा सूर आणि मैफिलीच्या सरत्या काही क्षणांमधे कॅमेऱ्यानं टिपलेला पं. जसराजजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडणारा क्षण ह्या गोष्टी तेव्हांपासून काळजात घर करून आहेत. नंतर कळलं कि तो युवा गायक म्हणजे ‘प्रतिजसराज’ म्हणून नावारुपाला येत असलेला त्यांचा पट्टशिष्य संजीव अभ्यंकर! आपण घडवलेलं सुंदर शिल्प आपल्या नजरेनं न्याहाळून त्याचा आनंद लुटण्यातलं सुख त्यादिवशी जसराजजींच्या डोळ्यांत दाटलं होतं. गुरू-शिष्याची जोडीही ‘त्यानं’ जमवावी लागते म्हणतात… ही जोडी अशा सर्वश्रेष्ठ जोड्यांपैकी एक म्हणायला हवी!

पुढं त्यांना ऐकताना तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली. पुढे काही दिवसांतच त्यांची ‘दिन की पूरिया’ ही कॅसेट आलेली आठवते. दुसऱ्या बाजूला ‘मुलतानी’ होता. ती कॅसेट कितीवेळा ऐकली असेल याची गणतीच नाही. अगदी शालेय वयात गाणं म्हणावं असं काही कळत नसताना, दिन की पुरिया आणि मुलतानीचे आरोह-अवरोहही माहीत नसताना किंबहुना रागांची ही नावंसुद्धा ऐकलेली नसताना फक्त सुरानं मोहून जाऊन कॅसेट पुन्हापुन्हा ऐकणं ही गोष्ट विलक्षणच म्हणायला हवी… ती ताकद त्या सुरांची होती, त्या लडिवाळ सुरानं मनावर घातलेल्या मोहिनीचा तो परिणाम होता!

त्यानंतर दोन-तीन वर्षांतच केव्हातरी आमच्या सांगलीच्या तरुणभारत ग्राउंडवर मोठा मंडप घातलेल्या भव्य स्टेजवरच्या मैफिलीत जसराजजींना तल्लीनतेनं गाताना डोळे भरून पाहिल्याचं आणि काना-मनात तो सूर खोलवर साठवून ठेवल्याचं आठवतं. सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! ही सगळी किमया म्हणजे दैवी देणगीला त्यांनी दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

विचार करता जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. आज काहीवेळेस स्टेजवर घडणाऱ्या काही गोष्टी मनास येत नाहीत तेव्हां त्याच्या मुळाशी कोणताच पूर्वग्रह, दुस्वास या गोष्टी नसून ह्या फक्त संगीताशी निष्ठावंत कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली आत्मसुखाची अनुभूती ल्यायलेली रत्नप्रभा असते. असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

आज स्वर्गाच्या द्वारी सुशोभन असेल आणि साक्षात कृष्णपरमात्मा, त्यांचा कृष्णलल्ला त्यांच्या स्वागताला हजर असेल… त्यानं त्यांना मिठीत घेऊन आपुलकीनं स्वर्गात पाचारण केलं असेल आणि त्यांच्या रसाळ, भावगर्भ सुरांत ‘ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय’ ऐकायला ‘तो’ आतुरला असेल! भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च जसराजजींना दिलेलं वरदान तो आत्ता अंतरी अनुभवत असेल…!

शाममुरारी.. त्यांच्या सुरांच्या रूपानं कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा आमच्याही आयुष्यात ठेवलास त्यासाठी तुझे अपार ऋण!

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

फोन : ०९००३२९०३२४

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुंबईस्पिरीट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : मुंबईस्पिरीट  – श्री अमोल केळकर

Running (Raining)  successfully since २६ जुलै २००५

१५ वर्ष होतील.  अनेक प्रसंग जातायत डोळ्यासमोरुन. त्यानंतरची एक ही २६ जुलै अशी नाही की २००५ ची आठवण आली नाही मुंबई वर अनेक संकटे आली. पण २६ जुलैच्या संकटाचा वय्यक्तिक अनुभव घेतल्याने ते मनावर कायम कोरले गेलंय म्हणूनच आज सगळ्या जगासमोर भयानक आपत्ती असताना, यापूर्वी असे भयानक संकट कुठले अनुभवले?  तर २६ जुलैचा प्रलय असे मी सांगेन

दुपारी ३ ते दुस-या दिवशी उजाडेपर्यत मुंबईची जीवन वाहिनी अर्थातच लोकलच्या कुशीत, कुर्ला स्थानकात ती काळ रात्र काढली. त्यावेळी स्थानकात दोन लोकल एक ठाण्याकडे जाणारी तर एक मुंबई कडे जाणारी ज्यात मी स्वतः होतो, माझ्यासारख्या  हजारो लेकरांचा सांभाळ करत या दोन माऊली भक्कम उभ्या होत्या.

मी कुर्ला स्थानकात लोकल मधे सुखरुप अडकलोय हा घरी साधारण रात्री ७ च्या सुमारास धाडलेला शेवटचा निरोप. नंतर केवळ प्रतिक्षा.

काही तासात लोकल सुरु होऊन कुर्ल्याहून पहिल्या लोकलने परतायचे भले  रात्रीचे ११/१२ वाजले तरी चालतील ही आशा संपुष्टात आली जेंव्हा रुळावरील पाणी फलाटाला समांतर आले आणि त्यानंतरच्या थोड्याचवेळात लाईट ही गेले.

मग लक्षात यायला लागले जे घडतय ते भयानक आहे.

नेहमीसारखा भुकेला स्टेशनवरचा “वडा -पावच” धाऊन आला.

आपत्तीत लुबाडणूक करायचा विषाणू त्यावेळी इतका पसरला नव्हता त्यामुळे योग्य भावातच मिळाला.

तो खाऊन परत जाग्यावर येऊन बसलो. खिडकीची जागा आणि वाट काढून आत टपकणारा पाऊस त्यामुळे ती जागा दुस-या कुणी घेणे शक्य नव्हते. कोसळणा-या पावसाच्या प्रचंड आवाजात थोड्या थोड्या अंतराने डुलक्या घेऊन,  झुंजमूंज झाल्यावर आता रस्त्याने जायचे ठरवले

कुर्ला ( पू) ला स्टेशनबाहेर कमरेपेक्षा जास्त पाण्यातून, आफीस बॅग सांभाळत देवनार डेपो पर्यत चालत जाऊन,  नंतर बसने वाशी आणि मग वाशी- बेलापूर रिक्षा असा प्रवास करत २७ जुलै मध्यान्ही ला सुखरूप घरी पोहोचलो आणि या भयानक अनुभवाचा सुखरूप शेवट झाला.

कुणी विसरु शकेल

ती काळी रात्र  ?

जणू सागरच बनले होते

मिठी नदीचे पात्र ……

.

.

तरीही आमचे सुरु

शहरीकरणाचे सत्र

शिकलो नाही आपण

यातून काडी मात्र

(अमोल)

२६ जुलैग्रस्त  नवीमुंबईकर

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारावून टाकणारे धैर्य !! ☆ संग्राहक – श्री मिलिंद वेर्लेकर

 ☆  इंद्रधनुष्य : भारावून टाकणारे धैर्य !! : – संग्राहक – श्री मिलिंद वेर्लेकर

धन्य ती लाईबी! आणि धन्य ते गुणग्राहक मुख्यमंत्री!!

कुठून आणतात, या साध्यासुध्या भारतीय महिला हे अदभूत धैर्य, कमालीचा कणखरपणा, अतुलनीय चिकाटी आणि स्वयंस्वीकृत काम सक्षमपणे निभावून नेण्यासाठी कंबर कसून घेतलेली पराकोटीची जिगरबाज मेहनत अंगात…….

लाईबी ओइनम, मणिपूर मधल्या इंफाळमधली एक साधीशीच, गरीब पण अफाट जिद्दी पन्नाशीतली भारतीय कर्तुत्ववान स्त्री….

३१ मे २०२० चे संध्याकाळचे पाच वाजलेले.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने आणि काही म्हणजे काहीच सुरु नसल्याने गिर्हाईकचं नसल्याने, दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असलेली लाईबी ही पाच सीटर ऑटो रिक्षाचालक रस्त्याच्या शेजारीच सुकवलेल्या खाऱ्या माश्यांचा छोटासा ढीग गोणपाटावर टाकून गिऱ्हाइकांची वाट बघत बसली होती.

गेली दहा वर्षे इंफाळमध्ये पहिली रिक्षाचालिका म्हणून कष्ट करून कुटुंबाचे कसेबसे उदरभरण करणारी लाईबी तिच्या दोन मुलं आणि डायबेटिक दारू पिणारा नवरा असलेल्या घरातली कमावणारी एकमेव सदस्य.

आणि त्यामुळेच लॉक डाऊन असल्याने आणि रिक्षा व्यवसाय बंदच असल्याने खारवलेले मासे विकत कशीबशी दोन वेळची चूल घरात पेटायची तिच्या.

तितक्यात एक वयस्कर आणि प्रचंड थकलेले म्हातारे गृहस्थ चिंताक्रांत चेहऱ्याने तिच्या जवळ त्याचं चौकात येऊन बराच वेळ काही शोधल्यासारखे करू लागले.

बराच वेळ त्या चौकात उभं राहून सुद्धा कुणाचीच काहीच हालचाल दिसेना म्हणून शेवटी त्या गृहस्थांनी रस्त्याकडेला मासे विकत बसलेल्या या लाईबीला विचारलं कि त्या वेळी तिथं एखादी कॅब मिळेल का जी तिघांना  तातडीने इंफाळपासून तब्बल १४० किलोमीटर लांब असलेल्या कामजोंग या पर्वतरांगांनी वेढलेल्या ठिकाणी नेऊन सोडेल.

“सगळं बंद आहे साहेब. आत्ता कॅब मिळणं अशक्य आहे आणि तुम्ही म्हणताय ते अंतर सुद्धा इथून खूप लांब, अशक्य अवघड पर्वतरांगांनी वेढलेलं आणि प्रचंड वाईट नागमोड्या रस्त्यांनी भरलेलं आहे आणि तातडीने म्हणत असाल तर आत्ता त्या ठिकाणी खाली उतरलेले खूप दाट ढग असणार आहेत त्यामुळे आत्ता इथे कुणी मिळालाच कॅबवाला जरी चुकूनमाकून तरी तो जीव धोक्यात घालून आत्ता तिथे पोचायला कॅब घालेल याची मला अजिबातच खात्री वाटत नाही साहेब.” लाईबी खरं ते म्हणाली.

म्हातारे गृहस्थ आता मात्र खचून रडकुंडीला आले.

“तुम्ही सांगताय ते सगळं मला ठाऊक आहे. गेले दोन तास मी सिव्हील हॉस्पिटलपासून इथे भटकत भटकत शोधत शोधतच आलोय कॅब मिळतेय का म्हणून पण मला सगळ्यांनी हेच सांगितलं आहे.

काही कॅंब चालक मला वाटेत भेटले पण कोणीच यायला तयार नाहीये पण आम्हांला तिघांना आत्ताच कामजोंगला जायचंच आहे. कॅंब चालकांनी स्पष्ट नकार दिलाय कारण माझ्यासोबत माझी कोलकात्यात नर्स असलेली आणि कोरोना वार्डात वैद्यकीय सेवा देताना कोरोना पोझीटीव्ह झालेली पण उपचारानंतर पूर्ण बरी झालेली आणि आता कोरोना निगेटिव्ह झालेली माझी मुलगी आहे.

त्यांच्या मते अवघड रस्त्यांसोबत कोरोना पेशंट हा देखील एक धोकाचं आहे आणि दुर्दैवाने कुणीच तो धोका पत्करू इच्छित नाहीयेत.

गेले पंधरा दिवस माझी मुलगी इथे उपचार घेतीये आणि कोरोनाशी दोन हात करताना प्रचंड थकून गेली आहे. बरी झाल्यावर आता डॉक्टरांनी तिला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलंय आणि म्हणून आता सक्तीचा डिस्चार्ज मिळाल्यावर आम्हांला तिला घेऊन तातडीने कामजोंगला आमच्या गावी पोचायचं आहे.

कारण कोरोना केस असल्याने इथं कुठलंच हॉटेल सुद्धा आम्हाला ठेवून घ्यायला तयार नाहीये ही प्रचंड अडचण आहे. आणि आता माझ्या मुलीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह झाल्याने आणि बेड्स कमी असल्याने हॉस्पिटलने आता माझ्या मुलीला कंपल्सरी डिस्चार्ज दिला आहे”

रडवेल्या आवाजात तो एक म्हातारा असह्हाय गांगरलेला गांजलेला गरीब बाप, शेजारीच एका टपरीत थकून बसलेल्या आपल्या अशक्त मुलीकडे हात दाखवत आपलं गाऱ्हाणं कळवळून सांगत होता.

आता मात्र त्या लोकांची ती प्रचंड अडचणीची परिस्थिती नीट जाणवलेली लाईबी आत्मविश्वासाने म्हणाली,” बाबा तुम्हाला चालणार असेल तर मी माझ्या पाच सीटर रिक्षातून तुम्हाला कामजोंगला सोडू शकते.”

आश्चर्यचकित झालेले ते म्हातारे गृहस्थ आणि त्यांचे भाऊ असे दोघेही रस्त्यावर खाली बसून अगदी थोडेसेच मासे विकणाऱ्या त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले.

आता मात्र त्यांचे शंकाग्रस्त चेहरे वाचून झटक्यात पन्नास वर्षीय लाईबी उभी राहिली आणि शेजारीच जरा अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या रिक्षाकडे हात करून तिनं आपल्या खिशातला रिक्षा चालक परवाना त्यांना काढून दाखवला.

“चिंता करू नका साहेब. माझी कॅब नाहीये पण ही पाच सीटर रिक्षा आहे आणि गेली दहा वर्षे मी या शहरात ही बऱ्यापैकी जड रिक्षा चालवते आहे. त्यामुळे कामजोंग पर्यंतच्या नागमोड्या डोंगराळ रस्त्यांवर जरा प्रयत्न करून ही रिक्षा मी नीट चालवू शकेन यावर तुम्ही विश्वास ठेवा.

पहिलं म्हणजे तुमच्या मुलीला कोरोना झालाय तो वैद्यकीय सेवा देताना झालाय.

दुसरं म्हणजे आत्ता इथे इम्फाळ मध्ये तुम्हाला कुणीच मदत करू शकणार नाही असा माझा इथला अनुभव आहे. त्यामुळे जर मी आत्ता तुम्हाला ही मदत नाही केली तर तुम्ही रात्रभर आणि कदाचित किती वेळ इथंच रस्त्यावर भयानक थंडीत पडून राहाल हे सांगणं सुद्धा अवघड आहे.

माणुसकीच्या दृष्टीकोनातून तिला आणि तुम्हाला मदत करणं हे मी माझ कर्तव्य समजते आहे.

माझा नवरा माझ्या सोबत येईल म्हणजे तुम्हाला सोडून रातोरात आम्हाला इथे परत यायला सोपे जाईल. तुम्हाला चालणार असेल तर मी हे करायला तयार आहे.” लाईबी प्रचंड आत्मविश्वासाने म्हणाली.

त्या संकटाच्या अडचणीच्या वेळी दुसरं काहीच करता येण्याजोगं नसल्याने म्हातारे गृहस्थ आणि काका इम्फाळ पासून कामजोंग पर्यंतचा अशक्य अवघड रस्ता माहित असताना देखील पोटच्या मुलीसाठी या अफाट दिव्याला तयार झाले.

रिक्षा स्वच्छ साफ करून, आवश्यक ती कागदपत्र घेऊन, डीझेल भरून, स्थानिक वेष बदलून शर्ट आणि पॅन्ट हा रिक्षा चालकाचा गणवेश घालून लाईबी आणि परतीच्या प्रवासात सोबत म्हणून तिचा नवरा असे दोघे थोड्याच वेळात तिथे दाखलं झाले.

जाऊन येऊन २८० किलोमीटरचे रिक्षाचे पाच हजार रुपयांचं भाडं ठरलं जे परिस्थितीने गरीब असलेल्या वडलांनी कामजोंगला एका स्वयंसेवी संस्थेशी फोनवर बोलून विनंती करून ठरवलं आणि सोमिचांग चीठून ही बावीस वर्षीय तरुण नर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाला देत असलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल आणि हे करत असतानाच तिला कोरोना संसर्ग झाल्याबद्दल तिच्या विषयी कृतज्ञता म्हणून ते भाडं देण्याचं त्या स्वयंसेवी संघटनेनं लगोलग मान्य केलं.

संध्याकाळी ठीक सहा वाजता लाईबीने रिक्षा सुरु करून बाहेर काढली आणि देवाचे नाव घेऊन ही पाच सीटर रिक्षा आता सोमिचांग चीठूनला, तिच्या वृद्ध वडील आणि काकांना आणि लाईबीच्या नवऱ्याला घेऊन आवश्यक त्या वेगाने एका अत्यंत अवघड आणि दाट धुक्याने वेढलेल्या नागमोड्या डोंगररस्त्यावरून दूरवरच्या कामजोंगकडे धावू लागली.

“माझ्या आयुष्यातला तो सर्वात भयावह प्रवास होता. मला ते रस्तेही अजिबात सवयीचे नसल्याने सोमिचांग मला तिच्या त्या अशक्त अवस्थेतही पुढील रस्त्यांबद्दल मार्गदर्शन करत होती आणि अत्यंत जबाबदारीने रिक्षा चालवत सोमिचांगला त्रास होणार नाही अश्या काळजीने मी रिक्षा चालवत होते.

दिवसासुद्धा ज्या रस्त्यावर कॅब चालक मोठी गाडी घालायला भितात अश्या अशक्य नागमोड्या खालीवर असलेल्या घाटरस्त्यांवर दाट धुक्यात लहानश्या रिक्षाच्या अंधुक दिव्यात एका अशक्त मुलीला आणि दोन म्हाताऱ्या माणसांना घेऊन जबाबदारीने रिक्षा चालवत नेणे आणि ते ही सतत न थांबता आठ तास हे माझ्यासाठी एक प्रचंड मोठे दिव्य होते.” लायबी सांगत होती.

प्रवासाला सुरुवात केल्यावर तासाभरातचं सातच्या सुमारास अंधारातच तो भयावह डोंगररस्ता सुरु झाल्याने खांद्यावर घेतलेले काम किती जोखमीचे आहे याची कल्पना लाईबीला येऊ लागली. तरीही नेटाने आणि जिद्दीने ते थोडंथोडकं नव्हे तर तब्बल १४० किलोमीटरचे ते अशक्य धोकादायक अंतर या जिगरबाज महिलेने पुढील सलग आठ तसं अजिबात न थांबता कापून पूर्ण केलं आणि पहाटे अडीच वाजता कामजोंगला पोचून या तिघांनाही तिने त्यांच्या घरात सुखरूप सोडलं.

घरात पोचल्यावर गदगदून आलेल्या अशक्त सोमिचांग चीठूनने, परिस्थितीचे गांभीर्य माणुसकीने समजून घेऊन स्वतःचा जीव शब्दशः धोक्यात घालून त्या सर्वांना कामजोंगला सुखरूप आणून सोडल्याबद्दल लाईबीचे अक्षरशः पाय धरत पुन्हा पुन्हा आभार मानले.

पण यावेळी लाईबी मात्र सोमिचांगला कोरोनामुळे अवघडलेलं वाटू नये म्हणून मुद्दामून त्याकडे लक्ष न देता इम्फाळचे हॉस्पिटल कसे आहे, कोरोना उपचार नेमके काय असतात, सोमिचांगने त्या सर्व काळात धैर्य कसे टिकवले आणि काय काय केले असले प्रश्न विचारत सोमिचांग चीठूनला पोटच्या मुलीप्रमाणे, आता ती पूर्ण बरी आहे हे जाणून कोरोनामुळे अजिबात घाबरून न जाता आईच्या मायेने जवळ घेतले.

खांद्यावर घेतलेलं काम पूर्ण केल्यावर आता मात्र दिवसाची घरची कामे लाईबीला समोर दिसायला लागली आणि त्यामुळे चहापाणी झाल्यावर सोमिचांग आणि कुटुंबीय तेव्हा तिथेच थांबून सकाळी निघाचा आग्रह करत असूनसुद्धा लाईबी आणि तिचा नवरा आता तडक रातोरातच इम्फाळकडे निघाले.

तोच सगळा अवघड रस्ता त्या पहाटेच्या बेफाम गारठ्यात संपवून पुन्हा दुपारी एकच्या सुमारास इंफाळला ते दोघं घरी पोचले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी सोमिचांगला प्रवासाचे पाच हजार रुपये देणाऱ्या स्वयंसेवी संघटनेमुळे मणिपूर राज्यात सर्वदूर पसरली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा पोचली.

लाईबी ओइनम या आपल्या राज्यातल्या या गरीब पण झुंझार महिलेचा तातडीने सत्कार करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी लाईबीला घरी आपल्या मुख्यालयात बोलावून राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी यथोचित गौरव करून शाल आणि १,१०,१००० रुपयांचे रोख पारितोषिक हातात ठेवले.

“अतुलनीय धैर्य, पराकोटीची माणुसकी आणि कोरोनासारख्या संकटाच्या काळात एका साध्या भारतीय स्त्रीने दाखवलेली ही जिद्द केवळ मणिपूरलाच नव्हे तर देशातल्या सर्वच महिलांना अनुकरणीय आहे आणि म्हणून मी श्रीमती लाईबी यांचा मी माझ्या राज्याच्या वतीने सन्मान करत आहे.” असे प्रशंसेचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

लाईबी ओइनमला कॉलेजात जाणारी दोन मुले आहेत. दहा वर्षांपूर्वी तोडकेमोडके पैसे साठवून नवऱ्याच्या साथीने तिने ही रिक्षा घेतली आणि जिथे गरीब स्त्रिया रोजगारावर शेतात काम करतात अश्या मणिपूरमध्ये स्थानिक लोकांच्या त्यावेळच्या रोषाची आणि टिंगलटवाळीची मुळीच पर्वा न करता योग्य तो परवाना काढून, रिक्षा चालवायला शिकून, चालवून आणि मणिपूर मधली पहिलीच रिक्षाचालक होवून, कुटुंबाचा चरितार्थ चालवायला लाईबीने सुरुवात केली.

२०१५ साली या जिद्दीच्या लाईबीवर ‘ऑटो ड्रायव्हर’ या नावाची एक छोटेखानी डॉक्युमेंटरी सुद्धा निघाली आहे जी त्यावेळी फार गाजली.

कष्ट करेन पण भिक मागणार नाही या जिद्दीतून समाजाच्या विरोधात जाऊन रिक्षा चालवून आणि वेळेला रस्त्याकडेला बसून खारे मासे विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या आणि तशीच आणीबाणीची वेळ आल्यावर माणुसकीने विचार करून एका कोरोना योद्धा नर्सलाच कोरोनाने गाठले असताना तिच्या मदतीला मागचापुढचा विचार अजिबात न करता आईच्या मायेने कंबर कसून उभ्या राहिलेल्या धीरोदात्त लाईबी ओइनमला टीम भारतीयन्स’चा मानाचा जय हिंद.

संग्राहक –मिलिंद वेर्लेकर

मूळ लेख – न्यु इंडियन एक्सप्रेस कडून साभार

‘टीम भारतीयन्स’,  ‘फील फ्री टू शेअर’

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी

☆ विविधा: तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी ☆

आज सकाळी एका मैत्रिणीने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला…”

तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा..’ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?

मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,

ह्यात  ‘तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर , ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?

तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.

आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल …पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण तिन्ही म्हणजे काय?

…आणि  मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले..त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं..

मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…!!

पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की-

तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर (भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.

पहाट आणि सायंकाळ  ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या….तिन्ही सांजा !!*

तिन्हीसांज’ प्रमाणे त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.

हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं..की रात्र सम्पून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..

दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..

व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..

दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच  सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच!!

त्यामुळे, “तिन्ही सांजा”  हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.

तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे ,तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून..असा भावार्थ जाणवतो.

दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती..अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे..माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता  म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..

झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.

हा मला समजलेला अर्थ आहे.

आज त्या मैत्रिणीने तिन्ही सांजा बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला.

संदर्भासाठी ‘तिन्ही सांजा ..’हे गीत दिले आहे..

तिन्ही सांजा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

 

कनकगोल हा मरीचिमाली

कनकगोल हा मरीचिमाली

जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र,

ये जी शांत गभीर निशा

त्रिलोकगामी मारुत,

तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करुनी हे तव

कर करी धरिला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या…

 

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत

पाणी जसे मोत्यांत

पाणी जसे मोत्यांत,

मनोहर वर्ण सुवर्णांत

मनोहर वर्ण सुवर्णांत

हृदयीं मी साठवीं तुज तसा

जीवित तो मजला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

-भा रा तांबे

© सुश्री अपर्णा कुलकर्णी

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ऋतुचक्र ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : ऋतुचक्र – श्रीमती उज्ज्वला केळकर

सकाळी चहा केला, की स्वैपाकघराला लागून असलेल्या गॅलरीत उभं राहून समोरच्या झाडा-पेडांकडे बघत बघत चहा घ्यायची माझी जुनीच सवय. सकाळचा थोडासा गारवा, समोरच्या झाडा-पेडांच्या हिरवाईमुळे डोळ्यांना मिळणारा थंडावा, थोडी का होईना, स्वच्छ हवा, या सार्‍या वातावरणामुळे देह-मन कसं प्रसन्न होतं. ही सारी प्रसन्नता मग दिवसभर पुरवायची.

मध्यंतरी मी आठ – दहा दिवस गावाला गेले होते. त्यावेळी झाडांची पानगळ अगदी भरात होती. त्यांच्या अंगा –खांद्यावर बागडणारे, विसावणारे पक्षी कसे स्पष्ट दिसत होते.

गावाहून परत आले. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे चहा घेऊन गॅलरीत उभी राहले, तर एक पक्षी चिर्रर्र करत आला आणि झाडांच्या पानांच्या हिरव्या छ्त्रीत छ्पून गेला. सगळीकडं शोध शोध शोधलं त्याला, पण कुठे म्हणून दिसेना. मनात आलं, जाताना ओकं- बोकं वाटणारं झाड बघता बघता नव्या नाजुक कोवळ्या, पोपटी पालवीनं कसं भरून गेलय. वार्‍याच्या मंद झुळुकीबरोबर नवी पालवी हिंदोळत होती. झुलत, डुलत होती.

एका खालच्या फांदीच्या डहाळीवर एका  कोवळ्या पानाशेजारी एक जीर्ण शीर्ण झालेलं जुनं पान होतं. त्याचं जून, जरबट देठ अजूनही डहाळीला धरून होतं. पण ते बोट आता कधीही सुटणार होतं. त्याच्या शेजारचं कोवळ, लहानगं पान कधी त्याला लडिवाळ स्पर्श करून जायचं, तर कधी क्षणभर त्याच्या छातीवर मान ठेवून पाहुडायचं. तिकडे बघता बघता वाटलं, जसं काही आजोबांच्या छातीवर डोकं ठेवून नातू पहुडलाय आणि गप्पा मारतोय आजोबांशी. मनाला मग चाळाच लागला, काय बर बोलत असतील ते?

त्या जुन्या पानाला आता लवकरच डहाळीपासून दूर जावं लागणार होतं. त्याने शेजारच्या नव्या कोवळ्या पानावरून हात फरवत त्याचा निरोप घेतला, तशी ते नवं पान रडवेलं होत म्हणालं, ‘आजोबा, जाऊ नका नं तुम्ही! मला खूप खूप वाईट वाटेल तुम्ही गेल्यावर!’

जुनं जून पान म्हणालं, ‘मला जायलाच हवं. आम्ही जुन्या पानांनी जागा करून दिल्याशिवाय या फांद्यांवर, डहाळ्यांवर नवी पानं, फुलं काशी येतील?’

‘कुठे जाशील तू इथून?’ नव्या पानाने विचारलं.

‘मी इथून झाडाच्या तळाशी जाईन. तळाच्या मातीवर पडेन. हळू हळू माझा चुरा होईल. त्यावर पाणी पडेल. मग मी हळू हळू जमिनीच्या आत आत जाईन. माझं खत होईल. मी आणखी आत जाईन. मुळापाशी जाईन. मुळं माझं सत्व शोषून घेतील. वर वर खोडातून फांद्यांपर्यंत , डहाळ्यांपर्यंत पोचवतील. तिथून पाना-फुलांपर्यंत पोचवतील आणि आशा तर्‍हेने मी तुझ्याकडे येईन नि तुझ्यात सामावून जाईन. आता नाही नं तू उदास होणार? रडणार?

‘आजोबा लवकर याल नं? मी वाट पाहीन.’

‘हो तर!’ असं म्हणता म्हणता जून जरबट देठाने आपलं डहाळीचं घर सोडलं. पिवळं पाडलेलं जून जरबट पान इवल्या पानाचा निरोप घेत खाली आलं आणि झाडाच्या तळाशी विसावलं. तळाशी असेलया इतर सोनेरी, तपकिरी पानात मिसळून गेलं. तिकडे पाहता पाहता एकदमच सुचलं –

पर्णरास सोनियाची तरुतळी विसावली वर हासतात फुले, रत्नझळाळी ल्यालेली

आज हासतात फुले, उद्या माती चुंबतील हसू शश्वताचं त्यांचं, रस फळांचा होईल.

पुन्हा झडतील पाने , फुले मातीत जातील. रस जोजवेल बीज बीज वृक्ष प्रसवेल.’

तर अशी ही कविता. समोरच्या झाडाची बदलती रुपे बघता बघता सहजपणे सुचलेली.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: पर्णसंभार ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

जीवन परिचय

नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.

☆ विविधा: ललित : पर्णसंभार  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

(१९ तारखेच्या ई-अभिव्यक्ती मराठीच्या अंकात सुश्री मीनाक्षी सरदेसाई यांचा ‘पर्णसंभार’ हा लेख  नजरचुकीने पूर्ण आला नव्हता. तो संपूर्ण लेख आता प्रकाशित करीत आहोत.-संपादक, ई-अभिव्यक्ती .)

झाडं झाडांसारखी दिसतात ती त्यांच्या गर्द पानांमुळे.जंगलं गडदगहन होतात ती हिरव्या पर्णराजीमुळे. शिशिरात पानं संप केल्या सारखी झाडांना सोडून जातात तेव्हा झाडं विरहगीत गातात. “रंग न उरला गाली ओठी,—–श्रुंगाराचा साज उतरला” अशी त्यांची अवस्था होते. पोपटी ,कोवळ्या पालवी पासून काळपट  हिरव्या राठपणापर्यत सर्व अवस्थांतील पर्णसंभार हे झाडांचं वैभव.ह्या श्रीमंतीचा उपभोग आपण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो.

मला आठवतंय, सकाळी उठल्यानंतर काही न बोलता आम्ही केळीशी जायचो.तिच्या पानांवरच दंव केसांना लावायचो. का?तर केस तिच्या सोपटासारखे लांब होतात असं आईने सांगितलेलं. त्यात काय औषध होतं माहीत नाही, पण केळीचा तो रसरशीत सहवास मनाला खूप आनंद द्यायचा. टवटवीत, हिरव्या पानावरच्या ब्रेललिपी सारख्या उठावदार, समांतर शिरा, हळूहळू  अरुंद होत जाणारी नि टोकाशी संपणारी कोरीव पन्हळ, काही गडद हिरवी तर काही गर्भरेशमी पोपटी विशाल पानं,केळीबाईचं हे रुपलाघव बघताना भान हरपायचं.

सणावारी अशा पांनांवरचं लाल,पिवळं,शूभ्र,रसभरीत जेवण, म्हणजे स्वर्गसुखच.देवाचा नैवेद्य, कावळ्याना घास, हे सगळं केळीच्या फाळक्यांवर.आमची पाच वर्षांची लली एकदा त्या प्रशस्त पानावर झोपली. “किती गाल वात्तय” म्हणाली. हिरव्या पानावरची, गोरी उघडी लली म्हणजे एक निसर्गचित्र होऊन बसललं.

वड, पळस, फणस यांच्या पानांच्या पत्रावळी म्हणजे  हिरव्या डिशेस. पानं जोडण्यासाठी नारळाच्या झावळ्यांच्या काड्या. झाडं इतकी परिपूर्ण असतात की दुसरीकडे जावच लागत नाही. गप्पा मारता मारता हात चालू. हा हिरवा कचरा पुन्हा झाडं सत्व म्हणून घेतात. वर्तूळ पुरं. घासापुसायचं कामच नाही.

सणासुदीला आंब्याची पानं तोरण होतात.पानांची एखादी फांदी दाराला शोभा आणतात. कर्दळी चौरंगावरच्या पूजेला आणखी मंगल शोभा आणते.कोकणातली मुलं अंगणातल्या फणसाच्या पानांचे बैल करतात. मळ्यात खर्ऱ्या बैलांची औत नि अंगणात मुलांची औतं फिरत भाताची लावणी लावतात. थंडीत ह्याच पानांची शेकोटी वत्सल ऊब देते.

पानांच्या साथीने साधीसुधी पक्वान्न किंवा न्याहरी बनते. हळदीच्या पानावर गुळपीठ सारवायचं.ती पान वाफवायची. लवंग वेलचीचं  कामच नाही. हळदीचा वासच पानग्याना खमंग करतो. चातुर्मासात कांदा लसूण वर्ज,पण ओव्याची पानं उणीव भरून काढतात. त्यांची भजी खमंग, चविष्ट होतात. पानांचा छाप भज्याच्या आत उमटलेला.

एक सुंदर सजावट.पूर्वी तान्हया बाळांच्या आया बाळाच्या टाळूवर कापसाच किंवा एरंडाचं पान टोपर्ऱ्याखाली सारून ठेवत.कडक उन्ह बाधू नये म्हणून. संध्याकाळपर्यंत पान कुरकुरीत व्हायच.बाळाच्या मेंदू पर्यंत उष्णता पोचायची नाही.

पान खाणारे आपल्या चंचीत विड्याच्या पानांच्या चळती नोटांसारख्या जपून ठेवतात. पानाच व्यसन असणाऱ्याना ती पानं पैशासारखी मौल्यवानच की. अशी  ही पानं.घर सजवतात, औषध करतात, खेळणी होतात, स्त्रियांच्या नटण्याथटण्यालाही मदत करतात. मेंदी नाही का स्त्रियांचे हात, पाय केस रंगवते. अंगणात श्रावण सजलाय.त्यामुळेच मनात रंगला हा हिरवा पानांचा उत्सव.

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चांदीचा पेला ☆ सौ अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून : चांदीचा पेला – सौ अंजली दिलीप गोखले ☆

अमेरिकेतील नेब्रास्का या छोट्या गावांमध्ये पाच सात वर्षाची मुले खेळत होती. जवळच एक खोल पाण्याचा हौद होता. खेळता खेळता मोठ्या भावाने डी कल्सन या आपल्या लहान भावाला पाण्यात ढकलले. तो गटांगळ्या खायला लागला. सगळेजण खूप घाबरून गेले. बुडता बुडता त्याचे लक्ष आकाशाकडे गेले, तेथे त्याला अनेक रंगांच्या प्रकाशाच्या झोताने सगळे व्यापले आहे असे जाणवले. त्या प्रकाशाच्या मध्यभागी एक छानसा चेहरा दिसला, त्याचे डोळे टपोरी पण शांत होते. तेवढ्यात एका मुलाने झाडाची एक लांबलचक काठी पाण्यामध्ये खोलवर बुडवली आणि त्याने हाताने गच्च पकडली. मुलांनी त्याला ओढून काठावर आणले. पुन्हा मुलांचे खेळणे सुरू झाले.

त्यानंतर बरोबर बारा वर्षांनी डिकन्स आई बरोबर शिकागोला गेला होता. अठराशे 93 चा तो सप्टेंबर महिना होता, तिथे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रेलिजनस अधिवेशन सुरू होते, अचानक त्या मुलाला पुन्हा हा प्रकाशाचा अजस्त्र झोत दिसला. एक व्यक्ती सभागृहामध्ये जाताना दिसली. तो मुलगा आईला म्हणाला,”आई, ज्यावेळी मी पाण्यामध्ये बुडत होतो, त्यावेळी हीच व्यक्ती आली होती.”ते दोघेही त्या इमारतीकडे धावले. ती व्यक्ती म्हणजे भारतातील प्रसिद्ध स्वामी विवेकानंद होते. दोघांनी त्यांचे आत्मिक शक्ती ला हलवून सोडणारे भाषण ऐकले आणि आणि त्यांना भेटायचे ठरवले. सतरा वर्षाच्या या मुलाच्या मनातले त्यांनी माझे गुरू व्हावे. पण आश्चर्य म्हणजे ही दोघे त्यांच्यासमोर गेल्यावर विवेकानंद म्हणाले,”नाही बेटा मी तुझा गुरु नव्हे, तुला तुझे गुरु नंतर भेटतील. ते तुला एक चांदीचा पेला भेट देतील. त्यांच्याकडून तुला ओंजळी भर आशीर्वाद मिळेल.”त्यानंतर पुन्हा त्या दोघांची कधीही गाठ पडली नाही.

विशेष गोष्ट म्हणजे पूर्वोत्तर भारतामध्ये गोरखपूर येथे 5 जानेवारी अठराशे 93 ला एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव मुकुंद लाल घोष. हा विवेकानंदांच्या प्रमाणेच अतिशय हुशार होता. 1935 मध्ये त्याने संन्यास धर्माची दीक्षा घेतली आणि त्याचे नाव गुरूंनी योगानंद असे ठेवले. गुरू नीच त्याला संन्यास धर्मातली वरची पदवी परमहंस ही बहाल केली. पुढे योगानंद अमेरिकेमध्ये आले. अचानक दिकिन्सन आणि योगानंद यांची गाठ पडली. ते योगानंद यांचे शिष्य बनले. अकरा वर्षे झाली, दिकिन्सन योगानंद यांचा क्रिया योगा चा शिष्य झाला. अधून मधून डिके यांना चांडीच्या कपाची आठवण होत असे, विवेकानंदांचे शब्द लक्षण आत्मक आहेत, अशी ते आपली समजूत करून घेत होते.

1936 च्या अध्यात्मिक ख्रिसमसच्या दिवशी योगानंद आपल्या सर्व शिष्यांना उपहार वाटत होते. भारतामधून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांसाठी भरपूर खरेदी केली होती, त्या भेट वस्तूंचे वाटप सुरू होते. दिकिन्सन ना बोलावून त्यांनी एक भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू पाहताच दिकिन्सन भावनावश होऊन गेले.

पाहतात तर काय, चांदीचा पेला! त्यांच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावार उरला नाही. योगानंद यांना नमस्कार करून ते म्हणाले,”जवळ जवळ गेली त्रेचाळीस वर्षे मी चांदीच्या कपाची वाट पहात आहे, चांदीचा पेला दिल्याबद्दल मला अपने मनापासून आभार मानू देत. या क्रिसमसच्या रात्री माझ्याकडे दुसरे शब्दच नाहीत.”आश्चर्य म्हणजे त्यान आताच्या रात्री ज्यावेळी योगानंद यांनी ती भेट त्यांच्या हातात दिली, त्यावेळी पुन्हा त्यांना तोच झगझगीत प्रकाश दिसला आणि क्षणातच गुरुदेवांनी दिलेली भेट पाहून ते आनंदित झाले. स्वामी विवेकानंदांनी 43 वर्षापूर्वी जे सांगितले होते, ते अशा तऱ्हेने दिकिन्सन ना साक्षात अनुभवायला मिळाले. आज तोच चांदीच्या पेला त्यांच्या हातात होता, जो त्यांच्या गुरुदेवांनी, परमहंस योगानंद यांनी फक्त आणि फक्त दिकिन्सन यांच्यासाठीच आणला होता. तो चांदीचा पेला!

 – सौ अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुरीनाम देश ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

☆ इंद्रधनुष्य : सुरीनाम देश – संग्राहक – श्री माधव केळकर ☆

सुरीनाम हा देश कुठे आहे हे अनेक जणांना माहिती नसेल. पण तिथे घडलेल्या सत्तांतरानंतर ह्या देशाबद्दल जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे.

सुरीनाम हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर, ब्राझील देशाच्या अगदी डोक्यावर आहे. इथे पूर्वी डचांची वसाहत होती. इंग्रज आणि डच यांच्यात झालेल्या करारानुसार हजारो भारतीयांना इंग्रजांनी सुरीनामला कामगार म्हणून पाठवले. त्यांची गरज संपल्यावर त्यांना २ पर्याय दिले गेले १. स्वखर्चावर मायदेशी परतणे २. मोबदला म्हणून जमीन/थोडे पैसे स्विकारुन सुरीनाम मध्येच स्थायिक होणे. बहुतांश मजुरांनी दुसरा पर्याय निवडला आणि ते कायमचेच सुरीनामीज झाले. आज तिथे एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३०% लोक भारतीय वंशाचे आहेत आणि हिंदुस्तानी ही प्रचलित भाषा आहे.

नुकत्याच आलेल्या निवडणूक निकालानंतर Chandrikapersad Santokhi यांनी सुरीनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. (भारतात अजून पर्यंत फक्त रिपब्लिक चॅनलने ह्या घटनेची दखल घेतली आहे.) कारण सांतोखी यांनी वेद ग्रंथांवर हात ठेवून संस्कृत मध्ये शपथ घेतली. हे खरंच interesting (किंवा विरोधाभासी) आहे. कारण, सुरीनाम मधील ह्या ऐतिहासिक घटनेच्या काही महिने अगोदर म्हणजे देशव्यापी Lockdown घोषित होण्याच्या एक आठवडा आधी भारतीय संसदेच्या वरच्या गृहात काँग्रेस, MDMK आणि इतर विरोधी पक्षांनी संस्कृत भाषेला “dead language” म्हणत सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला तीव्र विरोध केला होता. पहिली Central Sanskrit University स्थापन करण्यासाठी सरकारने २०१९ मध्ये एक विधेयक आणले होते. त्यावरील चर्चेत काँग्रेसने संस्कृत भाषेला “dead” घोषित केलं.

भारताच्या समृद्ध वारशाची जाण भारताला इतर राष्ट्रांनी करुन द्यावी लागते हेच भारतीयांचे (वैचारिक & otherwise) दारिद्र्य आहे.

बाकी, सुरीनाम मध्ये खनिज संपत्ती मुबलक आहे आणि ह्या क्षेत्रात भारतातून गुंतवणूक यावी अशी तेथील सरकारची इच्छा आहे. आपल्याला economic opportunities आहेत हे ह्यातून वेगळं सांगायलाच नको. एक बर्याच जणांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे सुरिनाम मधील ह्या पूर्वीचं सरकार सुद्धा भारताला अत्यंत अनुकूल होतं. एवढं की तिथले ह्या आधीचे उप-राष्ट्रप्रमुख अश्र्विन अधिन हे चक्क रा.स्वं.संघाचे स्वयंसेवक होते (किंवा आहेत). इतकंच नाही तर २०००-२०१० च्या दरम्यान त्यांनी संघाच्या शिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष पण पूर्ण केले आहे. २०१५ च्या प्रवासी भारतीय दिनाचे ते प्रमुख पाहुणे होते. मोदी आणि अधिन ह्यांच्या भेटी नंतर काही दिवसांतच PIO (Person of Indian Origin) आणि OCI (Overseas Citizen of India) चे नियम बदलण्यात आले होते ज्यामुळे फिजी, मॉरिशस, USA आणि सुरीनाम सारख्या बहुतांश भारतीय असणाऱ्या देशांशी भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यात मदत झाली आहे.

  • संग्राहक-माधव केळकर

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: चहा ☆ श्री अविनाश सगरे

☆ विविधा – ललित : ☕️ चहा ☕️ ☆ श्री अविनाश सगरे

कसं मस्तमस्त वाटतंय सकाळीसकाळी वाफाळलेला चहा हातात पडल्यावर,म्हणजे कप हातात घेतल्यांवर!घराच्या बाल्कनीतून ओसरीतून गच्चीतून पार्किंग जागेतून हवं तर अंगणातून म्हणा नाही तर सोफ्यातून म्हणा ना! समोरचा दिसणारा हिरवागार निसर्ग,निळाशुभ्र तर कधी मेघांनी हा  आक्रमिलेला नभ आसमंत! जगवणारी ऑक्सीजनची ही स्वच्छ हवा,आपण सोडलेला कार्बनडायऑक्साईडचा हा फवारा शोषून घेणारा तो लतावेलीं वृक्षराजींचा परिसर. हं सांगायचं म्हणजे अंगाखांद्यावर हवेहवेसेच असे वाटणारे खेळणारे सोनेरी सूर्यकिरणे आणि त्याचा तो प्रकाशझोत.

पाखरांचे मधुर सुगमसंगीत,त्यातच कोकिळेचा स्वरसाज. तन मन कसे प्रसन्न उत्तम उत्साही सळसळीत अन उभारी देवून जातं.या सर्वाबरोबरच वाफाळलेला चहा घेत असतां चहाची वाफ कशी गोलाई करत हळुवार वरवर जाते तसा उगवलेला दिवसही शांत शांत हळुवार जावा असे वाटते.

तो सर्व तयारीनिशी सज्ज आहे तुमच्यां भैरवी भूपाळीला, तुमच्या अणुरेणूंत उर्जा भरायला आणि धमन्यातलं रक्त सळसळावायला. आणि सूर्यास्तापर्यंतच्या कष्टाने व्याकूळ दमलेल्या मनाला शरीराला शांत समाधानी करत ती रात्र आहे तुम्हांला निद्रादेवीच्या आधीन करायला,सुखाच्या या आपल्यां झोपेसाठी मऊमुलायम चादरअंगावर ओढायला चहा निमित्तही आहे व हवासाही आहे दिवस आरंभाला!परंतु त्यांमूळे माणूस आत्मध्यानात  न राहता विश्वाच्या या उदार उदात्त कृपाळू अभय अमोघ अथांग असिमितआणि  बहुसहस्त्र पसारयांशी एकरुप होतो तद्रुप तादात्म्य पावतो अर्थात ते जाणले ओळखले मानले तर आणि तरच आहे!

पंचमहाभूतां देणगी मुक्तहस्ते। घे झोळी भरुन शुभकरांते.

 

©  श्री अविनाश सगरे

मूळ हिंगणगांव सध्या जयसिंगपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित : श्रावणमासी ☆ सुश्री सुनीता दामले

सुश्री सुनीता दामले 

 ☆ विविधा – ललित : श्रावणमासी ☆ सुश्री सुनीता दामले

आषाढातल्या पावसाच्या मुसळधारेनंतर लगेचच येतो ‘हासरा नाचरा, सुंदर साजिरा’ श्रावण महिना.. पेरणी-लावणी ची लगबग-धांदल आटोपून बळीराजा म्हणजे शेतकरी राजा आता जरा निवांत झालेला असतो. रोपांची छान उगवण होऊन ती माना वर उंचावून उभी असतात शेतात, आणखी काहीच दिवसांनी येणाऱ्या सुगीची-सुखसमृद्धीची चाहूल देत..

हिरवागार शेला पांघरलेली धरती, डोंगरांच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत खाली येत आनंद-तुषार पसरवणारे निर्झर, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी नटलेले आकाश.. आहाहा, काय सुंदर रूप श्रावणातील या निसर्गाचे.. हा निसर्गोत्सव हलकेच माणसांच्या मनामनातही झिरपतो आणि मग तो साजरा करण्यासाठी येतात श्रावणातले विविध सणवार..

हा पाऊस, सृजनाचा म्हणजेच नवीन काहीतरी निर्माण होण्याचा एक उत्सवच घेऊन येतो नाही? म्हणजे बघा ना, मातीच्या कुशीत रुजलेले एक चांगले बी रोप बनून शेकडो-हजारो दाण्यांना जन्म देते, अनेकांच्या तोंडचा घास बनण्यासाठी.. विचारांचंही तसंच आहे. मनात रुजलेला एक चांगला विचार शेकडो चांगली कामे हातून घडवतो आणि जीवन सुंदर बनवतो.

श्रावणातले सणवारही मला वाटतं असंच मनामध्ये चांगल्या विचारांचं शिंपण आणि रोपण करत असतात. नारळी पौर्णिमेला केली जाणारी समुद्राची पूजा किंवा बैलपोळ्याला केले जाणारे बैलांचे पूजन, यामागे कृतज्ञतेचा सुंदर विचार असतो. एरवी भीतीदायक वाटणाऱ्या नाग-सापांची उपयुक्तता व त्यांचा गौरव नागपंचमीच्या पूजेतून व्यक्त होते.. मंगळागौर, गोकुळाष्टमी यासारखे सण उत्सव स्त्री-पुरुष-बालांना सर्व काळज्या-विवंचना विसरायला लावून आनंदात न्हाऊ घालतात.

या महिन्यातली आणखी एक विशेष गोष्ट मला आठवते.. श्रावण महिना म्हटला की आमच्या घरातल्या  देवांमध्ये अजून एक भर पडायची; जिवतीचा कागद आणला जायचा, पुठ्ठ्यावर चिकटवून देवांच्या फोटो शेजारी टांगला जायचा. नागोबा, श्रीकृष्ण, नरसिंह, बुध-बृहस्पति आणि जिवत्या म्हणजे दोन लेकुरवाळ्या स्त्रिया अशी चित्रं असायची त्यावर. त्यापैकी प्रत्येकाची वेगवेगळ्या वारी पूजा व्हायचीआणि मग त्या त्या देवाची कहाणी आई वाचायची.कहाणी म्हणजे गोष्ट.. ‘ऐका परमेश्वरा तुमची कहाणी’ असं म्हणत कहाणीला सुरुवात व्हायची आणि ‘ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ म्हणून सांगता व्हायची.

या श्रावणातल्या शुक्रवारची एक हळवी आठवण माझ्या मनात आहे. शुक्रवारी माझी आई जिवतीची पूजा करायची. जिवतीची पूजा आईने आपल्या लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी आणि सुखरूपते साठी करायची असते. माझी आई पूजा आणि कहाणी वाचून झाली की मला पाटावर बसून ओवाळायची आणि मग एकाग्रतेने नमस्कार करून म्हणायची “जिवतीबाई, सगळ्यांच्या लेकरांना सुखी ठेव”.. मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी, तिला लग्नानंतर सोळा वर्षांनी झालेली! थोडी मोठी झाल्यावर एकदा मी आईला विचारलं,” आई, तू ही पूजा माझ्यासाठी करतेस ना? मग ‘माझ्या मुलीला सुखी ठेव’ असं का नाही म्हणत?” त्यावर आई म्हणाली,” अगं, आपण देवाकडे मागतोय. केवढा मोठा दाता तो! मग त्याच्याकडे कंजुषपणानं फक्त आपल्यासाठीच मागायचं? सगळ्यांसाठी मागितलं तर कुठं बिघडलं ? मन मोठं ठेवावं माणसानं, आपल्या पुरतंच नै बघू… आणखी एक गोष्ट लक्षात ठेव,’जे चिंती परा ते येई घरा’ दुसर्याचं वाईट चिंतलं तर आपल्या पदरी तेच येणार हे नक्की, आणि दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलंही चांगलंच होणार.” आज जेव्हा मी ‘सगळ्यांच्या लेकरांना सुखी ठेव’ अशी प्रार्थना श्रावण शुक्रवारी जिवतीकडे करते तेव्हा मला हा प्रसंग आणि आईचे हे शब्द आठवतात. वाटते, अरे हा तर उपनिषदातील ‘सर्वेपि सुखिन: संतु, सर्वे संतु निरामया:, सर्वे भद्राणि पश्यन्तु,मा कश्चिद दु:खमाप्नुयात्’ या ऋषिविचारांचाच आईच्या तोंडून झालेला उद्घोष!!!

आज माझी आई या जगात नाही पण या संस्कारांच्या रुपाने ती माझ्या मनात कायम जिवंत आहे.

 

© सुश्री सुनीता दामले 

Please share your Post !

Shares
image_print