मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर ☆ 

मनुष्याला ‛मी’ पण मिळवून देणारा सार्थ शब्द म्हणजे ‛अहंकार’! मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणूनच इतर पशु- पक्ष्यांपेक्षा तो वेगळा गणला जातो. आपल्या भावना तो आपल्या संवादातून , कृतीतून व्यक्त करु शकतो. म्हणूनच  जिथे सुख आहे तिथे दुःख, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि जिथे राग आहे तिथे लोभ हे हातात हात घालून असतात. त्यामुळेच जिथे स्वत्व आहे तिथे ‛अहम्’ असलाच पाहिजे असा अलिखित नियम आहे.

हा अहम् माणसाला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचवू शकतो याची शेकडो उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. या ‛अहम्’ नेच हिटलरचा बळी घेतला. जग जिंकणारा सिकंदर या ‛अहम्’ पुढेच नमला. आपल्या मुझद्दीपणाने अनेक लोकांचा बळी घेणारा औरंगजेबाचा  अहम् चा तोरा  संभाजीराजांसारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तीच्या देशभक्तीपुढे फिका पडला. मात्र अहम् ला जिंकणारे या जगात अजरामर झाले.स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा…… किती नावे घ्यावीत तेवढी थोडीच आहेत.

खरं तर मनुष्य जन्माला येताच त्याचा ‛को$हम्’ (मी कोण?) चा प्रवास सुरु होतो. परंतु ‛अहम् ब्रह्मा$स्मि’ (मी ब्रह्म आहे) पर्यंत सर्वांचा प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे हा अहम् च आपण कुरवाळू लागतो.

लहान असताना आपण पंचतंत्रात एक गोष्ट वाचली होती . त्यामध्ये बेडकीची पिल्ले गाय बघून येतात आणि आईकडे तिचे वर्णन करतात. ती केवढी मोठी होती हे समजण्यासाठी ती स्वतःचे शरीर फुगवून “ एवढी मोठ्ठी का?”असे विचारते. तेव्हा मुले म्हणतात,“नाही, त्यापेक्षा मोठ्ठी!” मग बेडकी आणखी अंग फुगवते. पुन्हा विचारते, मुले पुन्हा नकार देतात, पुन्हा ती फुगते व फुगत फुगत शेवटी मरुन जाते. त्याचप्रमाणे आपण या अहम् चा  फुगा फुगवू लागतो. आपल्याच कौतुकात आपण मग्न होऊन जातो. त्यामध्ये आपण इतरांचा बळी घेतो आहोत हे लक्षातच येत नाही.मात्र कधीतरी या भ्रमाचा भोपळा फुटतो व आपण जमिनीवर येतो. पण त्यावेळी हातात  बाकी शून्य राहिलेली असते.

पण अहंकार सोडणे म्हणजे स्वाभिमान सोडणे नव्हे. जिथे गर्वाची भावना येते तिथे अहम् वाढतो.मात्र आत्मसन्मान स्वाभिमान वाढवतो. आमचा ‛आयुर्वेद’ म्हणता म्हणता अमेरिकेसारखा देश आमच्या देशातील हळदीसारख्या औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवते. जगात क्रिकेटमध्ये  अव्वल नंबरवर असणारे आम्ही वर्ल्ड कप क्रिकेटमधून बाहेर पडतो किंवा एक अहवाल ओबामाना सांगतो की त्यांच्या देशातील बरीच ‛ टॅलेंट’ ही भारतीय आहे ज्याचा उपयोग ते त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी करुन घेतात. किंवा आमच्या सहिष्णुतेला दुर्बलता समजून पाकिस्तान किंवा चीनसारखे देश आम्हालाच आव्हान देत घुसखोरी करतात.  या सर्व घटना खरोखरच आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत. म्हणूनच आता केवळ अहम् कुरवाळण्यापेक्षा स्वाभिमानाची कास धरण्याची गरज आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नऊ दहा वर्षाची सुमन आज आजीबरोबर कामाला आली होती.

” कशी आहेस सुमन? शाळा चांगली चाललीय ना? आज कशी काय आलीस तू?”

“अहो वहिनी,आत्ता शाळेला आठवडाभर सुट्टी आहे.म्हणून आता सुट्टीत आजीच्या मदतीला येणार आहे मी.”

तिच्या बोलण्यात प्रौढत्वाची झलक डोकावत होती. मी बघत होते.कधी सुमन भांडी घासत होती तर कधी विसळत होती. आजी तिला भांडे कसे आणि कुठे जोर देऊन घासायचे,तर कसे चोळून विसळायचे हे काम करता करताच दाखवून देत होती. धुणे कसे धुवायचे, कसे पिळायचे, कसे झटकून वाळत घालायचे हे समजावून देत होती. आजीच्या हाताखाली हळूहळू तयार होणाऱ्या सुमनमधे मला उद्याची हुशार, चुणचुणीत, कामसू गृहिणी दिसत होती.

आमच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील वॉचमनबाईची सकाळी कामाची नुसती धांदल सुरू असायची. आज तिच्या मुलींचा दंगा ऐकू येत होता. म्हणून खिडकीतून डोकावले तर  वाॅचमनबाई धुणे धूत होती.होती जवळच तिची चार पाच वर्षांची मुलगी सावकाशपणे पुढ्यातली भांडी यथाशक्ति घासत, विसळत होती. तिला मधून मधून आईच्या सूचना सुरू होत्या. तर छोटी दीड दोन वर्षाची मुलगी पाण्यात खेळत होतीऋ अचानक तिने ओरडून रडून आईकडून हट्टाने अंगातला फ्रॉक काढून घेतला आणि तो ती पाण्यात बुडवून धूवू लागली. मधूनच ती तो फ्राॅक चोळत होती ,तर मधूनच उठून  आपटत होती. त्या नादात तिचा तोल जात होता. मला तिचे खूप कौतुक वाटले. आईचे अचूक निरीक्षण करून तिची प्रत्येक कृती सुरू होती.

मनात विचार आला आई एक’ चालतं बोलतं ‘विद्यापीठ असते.जगण्याचे शास्त्र आणि प्रात्यक्षिक यांचा असा एकत्र सुंदर मिलाफ कोणत्याच शाळेत नसतो आणि असा अंत:करणापासून शिकवणारा दुसरा प्रेमळ गुरूही  अन्य कोणीच नसतो.  आईची ही शाळा आयुष्यभर अशीच सुरु असते. फक्त अभ्यासाचे विषय बदलत असतात आणि आपल्या मुलांना उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी आई आयुष्यभर धडपडत असते.

अशा विचारात मी आत वळले तर माझी दोन्ही छोटी मुले खोलीच्या सफाईला लागली होती.

“अग रेवा, तुम्ही हे काय करताय ?”

“आई, काल शाळेत बाईंनी  आम्हाला ‘शामची आई’ धडा शिकवला. मला शामची गोष्ट खूप आवडली. छोटा शाम आईला किती मदत करायचा ना !आता सुट्टीत मी पण तुला मदत करणार आहे.

” मी पण”,  छोट्याने ताईची री ओढली. मला मुलांचे खूप कौतुक वाटले.

आज मुली उच्च शिक्षण घेऊन घराबाहेर पडत सर्वच क्षेत्रात उत्तम करिअर करीत आहेत. सर्वोत्तम स्थान मिळवत आहेत. त्याचवेळी त्या घरातली जबाबदारीही नीटनेटकी पार पाडतात.ही दुहेरी कसरत त्यांना जमते.मग मुलांना का नाही जमणार?शिक्षणासाठी,  नोकरीसाठी परदेशी किंवा घरापासून लांब राहताना मुलांनाही घरातली सर्व कामे व्यवस्थितपणे करता आली तरच निभाव लागतोय. नाहीतर खूप हाल होतात.मुलांची कामे आणि मुलींची कामे अशी विभागणी आजकाल राहिलेली नाही.

म्हणूनच आज काळाची गरज झाली आहे की फक्त मुलींकडूनच नव्हे तर मुलांकडून सुद्धा घरातल्या सर्व कामांचा गृहपाठ गिरवून घेतला पाहिजे.उद्याची कुशल ‘आदर्श गृहिणी’ कशी बनेल या संस्कारातच मुलगी लहानाची मोठी होत असते.मुलांवर सुद्धा बालपणापासूनच हे कामाचे संस्कार होणे आवश्यक आहे. उद्याचा समंजस जोडीदार बनण्यासाठी आणि घराच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा.

“अग रेवा, या इकडे. मी दाखवते तुम्हाला दोघांना सफाई कशी करायची ते.”  असे म्हणत मी हातात झाडू घेतला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दैवगती ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

शिक्षा- बी.कॉम

नोकरी- युनियन बॅक ऑफ इंडिया, अधिकारी  निवृत्त – 2017

अभिनयाची आवड,सिध्दार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड  इक्नोमिक्स  मध्ये मराठी एकांकीका ‘ सारे कसं शांत शांत.’ अभिनयाचे पारितोषिक

निवृत्तीनंतर पौरोहित्याचा अभ्यास चालू आहे. सुगम संगीताची आवड. जुनी नाती जपणे. नवीन माणसं जोडण्याची आवड.

 

☆ विविधा ☆ दैवगती ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

“आई,छानशी गोष्ट सांग ना, आजी झोपायच्या आधी रोज गोष्ट सांगायची. श्रावणांत तर तिच्या पुस्तकातली आटपाट नगर वाली कहाणी  सांगायची”. श्रुतीला गोष्ट सांगितल्याशिवाय माझी सुटका नव्हती. तसेच सगळं काम ठेवून तिला घेवून बेडरूम मध्ये आले.

चला चालू —- “आटपाट नगर—– तिकडे एक भाऊ आणि बहिण  भाऊ —— भावाकडं  पूजा  होती——–माझी गोष्ट चालूच होती. तात्पर्य काय? शेवटी दिवस कोणाचे  कधी बदलतील सांगता येत नाही म्हणून कोणी कोणाला हंसू नये, कमी लेखू नये.अरेच्चा पण हे ऐकायला आमचे बाळ  जागं कुठे आहे  ? ते तर केव्हाच झोपलं.

ती झोपली तरी आम्ही ऐकली ताई  तुमची गोष्ट. लगेच इकडून तिकडून एकदम आवाज आले. दांडीवरचा गाऊन सांगू लागला काल पर्यंत ती पैठणी,कांजीवरम् तो-यांत मिरवायच्या आणि मला हसायच्या .आज  पाच महिने झाले कश्या  गपगुमान कपाटात पडून  आहेत.

तेवढ्यात बेसिनवरचा डेटॉल हॅण्डवॉश ओरडला ,”एकदम बरोबर रोज बाहेर पडतांना दादा ,ताई सगळेजण फुस्. फुस  सेंट मारून जायचे.अगदी आजी आबांना  उग्र वासाचा त्रास झाला तरी. आणि ती  सेंट ची बाटली  माझ्या कडे तुच्छतेने बघायची.पण आता दिवस फिरले.आबांपासून ते छोट्या श्रुतीपर्यंत अगदी कामावाल्या मावशीं सुध्दा सकाळ संध्याकाळ मला हातावर घेऊन कुरवाळतात.

“हो रे बाबा सध्या तुम्हालाच चांगले दिवस आले आहेत. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत.”

तेवढ्यात जाऊबाई ने खणाचा शिवलेला  मास्क बोलू लागला कित्येक महिने मी वहिनीच्या कपाटात  पडून  होतो.परवा you tube वर वहिनी ने खणांचा मास्क बघितला आणि माझं नशीब फळफळलं.आता सगळे मला

त्यांच्या चेह-यावर विराजमान केल्याशिवाय बाहेर पाय टाकत नाही.शशांकदादांचा  बिच्चारा टाय. पाच महिने त्याला बाहेरचं दर्शन नाही.

हो ना . करोना ने तर सगळ्या सृष्टीचीच उलथापालथ  केली.

तेवढ्यात कोप-यातून हुंदका आला. माझी सुंदर लाल प्लॅस्टीकची पिशवी रडत  म्हणाली ,’ताई करोनाने  नाही काही त्याच्या आधीच आमचं नशीब  रुसलं.”

रद्दी तिला डावलून खुद्कन हसून म्हणाली ,”मारे हिणवत होतीस ना ,आमच्या शिवाय कुणाच काही  चालत नाही. कागदा, तुझा उपयोग काय ?  Xxपुसायला. पण तुझ्या हे लक्षात नाही आले आजपर्यंत जे शिकले सवरले ते आमच्यामुळेच.पण हे लक्षात यायला अक्कल  लागते ना.”

म्हणजे  थोडक्यात काय? चांगले  वाईट  दिवस सगळ्यानाच असतात. सजीव  असो वा निर्जीव .म्हणून कोणाला कमी लेखू नये .त्याची चेष्टा  करू नये.

ही साठा उत्तरांची कहाणी—

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेती संस्कृती मधील स्त्रियांचा सहभाग ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ विविधा ☆ शेती संस्कृती मधील स्त्रियांचा सहभाग ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

 

मानव प्रगत झाला. गुहेमधून घरात राहू लागला. त्याही आधी तो जेव्हा गुहेत राहत होता. शिकारीला जात होता. अनेक दिवस शिकरीहून परत येणं होत ही नसेल. तेव्हा बाई आपल्या चिल्या पिल्यांना घेऊन कसे जगत असेल, त्यांना काय खाऊ पिऊ घालत असेल ? हा प्रश्न पडतो. तेव्हा वाटते बाईने का केली असेल शेतीला सुरुवात? कशी सुचली असेल तिला ही किमया? कुठून मिळाली असेल ही प्रेरणा?

फळे कंदमुळे .अनेक मुलांमुळे शोधणे हेही शक्य नसेल तर तिला वाटलेही असेल की ही फले कंदमुळे आपल्या आसपास जवळच असावीत, त्याचे बी  लावावे… मनात आल्यावर कृती करायला काय वेळ लागणार… तिचेच राज्य. तिच्या मनात असं का आले असेल… ? बी लावल्यावर त्याचे झाड उगवून येते हे तिला कधी आणि कसे कळाले असेल? कसा असेल तो क्षण?

न्यूटन ला सफरचंद पडल्यावर अचानक लख्ख जाणवले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला…. लहानपणापासून तो पडलेलं सफरचंद बघत असेलच की…. पण असा जाणिवेचा क्षण नेनिवेतून यायला तशी वेळही यावी लागत असेल…

कुठे तरी वाचल्याचे आठवते, खार किंवा खारोटी हिला एक सवय असते, बिया गोळा करायच्या आणि कुठे ना कुठे पुरायच्या. तिच्या या सवयीने जंगलं वाढतात म्हणे.

हेही बाईने बघितले असेलच. तिला अशी प्रेरणा मिळू शकली असेल. आणि बिया पेरणी कळत नकळत सुरू झाली. ही बाईच्या मनातली आदिम प्रेरणा मुळीच कमी झालेली नाही, अजूनही!

आजही शेती मध्ये अनेक अवजड यंत्रे आली, नांगरणी पेरणी यंत्रे करू लागली तरी पेरणीच्या वेळी घरातल्या गृह लक्ष्मीच्या हाताने मुठभर धने पेरले जातातच. हा पिढ्यान् पिढ्या चालत आलेला शेती संस्कृती मधील संस्कार किंवा, रुढी परंपरा म्हणा अजूनही आहे. तिने शेतीला सुरावत केली याची आठवण म्हणून  , तिचा सन्मान म्हणून ही पद्धत अजूनही कायम आहे. पुरुष सत्ता क पद्धतीमध्ये अनेक बदल झाले असले तरी या सत्तेने स्त्रीच्या निर्मिती क्षमतेची जाणिव ठेवली आहे म्हणायचे.

आजही  मुख्य पीक पुरुष ठरवत असेल , पण बांधावर, मधल्या सरीत काय माळवं लावायचे हे बाईच ठरवते.

त्याची निगुतीने काळजी घेते. मिरच्या,  धने, लसूण काही ओली तरकारी म्हणजे, वांगी, गवार, दोडकी, घेवडा यावर फक्त तिचीच सत्ता असते. ते विकायचे की वाटायचे हे तीच ठरवते. त्या पैशावर हक्क नावापुरता तरी तिचाच असतो.( नंतर गोड बोलून काढून घेतले जातात ती गोष्ट वेगळी. )

पेरणी करणे आणि पाणी पाजणे एवढे पुरुष करतो. पण बाकीच्या उगनिगी बाईच करते. पीक पोत्यात भरेपर्यंत तिची कितीतरी कामे असतात. भांगलान, खुरपणी दोनतीन वेळा करावी लागते. हे घरातील स्त्रीच करून घेते. कापणी, खुडणी आहेच. तिच्याशिवाय कोण करणार …

मातेरे, सरवा , काशा वेचने या सर्वांना बाईचाच हात पाहिजे. ही हलकी कामे पुरुष थोडाच करतो. वाळवणं सारख्या गोष्टींना तर बाई शिवाय कुणाचा हात लागणार … भरलेली पोती उचलायला फक्त बाप्या येणार… धान्याला कीड लागतेय का कधी चाळायचे, वाळवायचे हे तीच बघणार… कडधान्यांचा भुंगा कीड लागू नये, बियांनासाठी टिकवून ठेवण्यासाठी ते राखेत ठेवायचे काम तिचेच. मग चुलीतली राख वर्षभर साठवायची. नंतर चालून त्यात कडधान्य मिसळून छोटी कणगी किंवा पत्र्याचे डबे मिळवून त्यात ठेवायचे. यासाठी खूप बारकावा लागतो, सायास लागतात. हे सगळे काम बाई बिनबोभाट, आनंदाने करत असते. एक ना दोन शेतकऱ्याची बाई आणि शेती वेगळी होऊ शकेल काय…

शेती बाई शिवाय शक्य तरी आहे का..

 

© सौ. सावित्री जगदाळे

१४/२/१९

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी 

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

स्वपरिचय 

मी एस्. एन्. कुलकर्णी. मुळचा सोलापूरचा. शालेय आणि काॅलेज शिक्षण सोलापुरातच पूर्ण झाले. बॅंक ऑफ़ महाराष्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. नौकरीनिमीत्त महाराष्टातील अनेक शहरात राहणे आले. तेथील समाजजीवन अनुभवता आले. लहानपणापासून वाचनाची आवड़ती  आजपर्यंत जोपासली आहे . आता पुणे येथे स्थिरावलो आहे.

☆ मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते  ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

जवळ जवळ ५३/५४ वर्षापूर्वीचा प्रसंग/घटना आहे ही. १९६७ मध्ये मी मॅट्रीकला शाळेत शिकत होतो. मार्च महीना होता. बोर्डाच्या परिक्षेचे दिवस होते. मॅट्रीकला आम्हाला त्यावेळी पुष्पा आगरकरबाई ह्या मराठी शिकवत होत्या. अतिशय छान मराठी शिकवावयाच्या. गद्य असो वा पद्य त्या अाम्हाला मन लावून शिकवायच्या. “मरणात खरोखर जग जगते” ही भा. रा. तांबेंची कविता त्यानी आम्हाला खुप छान प्रकारे शिकविली. या विषयावर बोर्डाच्या परिक्षेत निबंधसुध्दा येऊ शकेल अशी शक्यता बोलुन दाखविली. त्यामुळे त्यानी निबंधाचीपण तयारीपण करून घेतली.

बोर्डाची परिक्षा सुरू झाली. पहीलाच पेपर मराठीचा होता. पेपर सुरू झाला. ऊत्तरपत्रिका तसेच प्रश्र्नपत्रिकेचेही वाटप झाले. पहिलाच प्रश्र्न निबंधाचा होता.  चार पांच विषय होते आणि त्यामध्येच “विस्मरणात खरोखर जग जगते” हाही विषय होता. मुलांमध्ये चुळबुळ सुरू झाली. मी शेवटी वर्गावरच्या शिक्षकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली.  छपाईची चुक असावी असेही मी बोललो. त्यानीपण ही गोष्ट गांभीर्याने घेऊन मुख्याध्यापकांच्या नजरेस आणून दिली. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते.  एका शहारातून दुसर्‍या शहरात फोन लावायचा असेल तर फोन बुक करावा लागायचा. बराच वेळ लागायचा फोन लागायला. जवळ जवळ तासानी पुण्याला बोर्डाकडे फोन लागला. बोर्डाने स्पष्ट केले की निबंधाचे सर्व विषय बरोबर आहेत. त्यामध्ये छपाईची चुक नाही. हे समजताच विद्यार्थी नाराज झाले. आज  आठवत नाही पण कोणत्या तरी विषयावर निबंध लिहुन ऊत्तरपत्रिका शिक्षकांकडे दिली आणि मी बाहेर पडलो.

आज हा प्रसंग आठवला आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात आले. बरे झाले मी त्यावेळी “विस्मरणात खरोखर जग जगते” या विषयावर निबंध नाही लिहीला. या विषयाला मी न्याय देऊ शकलो नसतोच.  आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक कटु प्रसंग घडतात, दु:खद प्रसंग घडतात. प्रिय व्यक्तिंचा मृत्यु असो, अपघात असो, अपमानाचे प्रसंग असो अशा अनेक गोष्टी आपण जस जसा काळ सरत जातो तस तसे अशा गोष्टी आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. खर तर अशा गोष्टी विसरल्या तरच आपण वर्तमानकाळात जगु शकतो. अशा दु:खद गोष्टींचे आपल्याला विस्मरण झाले तरच आपण रोजचे आयुष्य जगु शकतो.  वाईट गोष्टींचे विस्मरण हेच तर आपल्या रोजच्या जगण्याला अतिशय आवश्यक बाब आहे. भुतकाळाचे विस्मरण हे रोजच्या आनंदी जगण्याचा पाया आहे.  भुतकाळातील वाईट गोष्टी, दु:खद प्रसंग आपण विसरले पाहीजेत.  आत्ता मी या विषयावर इतका विचार करू शकलो.  मॅट्रीकमधील विद्यार्थ्यानी इतका विचार केला असता कां आणि विषयाला न्याय देऊ शकला असता कां? नक्कीच नाही.

 

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

श्री उद्धव भयवाळ

संक्षिप्त परिचय 

सेवानिवृत्त बँक अधिकारी

  • विनोदी कथा, एकांकिका, बालकथा , बालकवितेपासून लावणी प्रकारापर्यंत लिखाण .
  • “इंद्रधनू” हा कवितासंग्रह आणि “हसरी फुले” हा बालकवितासंग्रह  “तारांबळ” हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
  • “हसरी फुले” या बालकवितासंग्रहास  “अंकुर वाड्मय पुरस्कार-२००८” प्राप्त.
  • “सुभद्रा प्रतिष्ठान” सेलू (जि. परभणी) यांचा कवितेसाठीचा प्रतिष्ठेचा “गौरव पुरस्कार” .
  • नाशिक येथील “कलाकुंज”  प्रकाशनाच्या वतीने साहित्यसेवेबद्दल नाशिक येथे सत्कार.
  • भारतीय नरहरी सेना {महाराष्ट्र प्रदेश} यांचा ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार.
  • ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे मी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या “साने गुरुजींच्या छान छान गोष्टी” या पुस्तकाचा समावेश.
  • अ.भा.सानेगुरुजी कथामाला,जालना यांच्या बालकुमार कविसंमेलन अध्यक्षपद.
  • “सलिला साहित्यरत्न सन्मान” प्रदान.”अहिंदी भाषी क्षेत्रामध्ये हिंदी भाषेतील साहित्य निर्मिती” यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान.

☆ विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

एका पाहणीनुसार भारतामध्ये साठ वर्षांवरील जनसंख्या आठ कोटी आहे. याचा अर्थ आज घडीला भारतातील सात टक्के लोक ‘ज्येष्ठ नागरिक’ या व्याख्येत येतात. आणि दरवर्षी वेगवेगळ्या आस्थापनांमधून साधारणपणे सात लाख लोक निवृत्त होत आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेदिवस वाढत जाणार हे निश्चित. यावरून कुणाचा असा समज होऊ शकतो की, या ज्येष्ठ नागरिकांपुढे जगण्यासाठीच्या खूप समस्या असणार आहेत. काही प्रमाणात ते खरे असेलही. पण निवृत्तीनंतरचे जीवन सुखी, आनंदी आणि चैतन्यमय कसे करायचे ते आपल्या हातात आहे.

निवृत्त जीवन आनंदाने जगण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१. आर्थिक स्थैर्य  २. आरोग्य   ३. प्रेमाची माणसं  (आप्तेष्ट, मित्र इत्यादि )

त्यापैकी आर्थिक स्थैर्य हवे असण्यासाठी निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी पाहिजे. दरमहा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त बँकेमधील ठेवीवर मिळणारे मासिक व्याज हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण कष्टाने कमावलेल्या पुंजीचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला उपयोग व्हावा म्हणून जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी पैसा गुंतवावा. मात्र त्या गुंतवणुकीत कमीत कमी जोखीम असावी. कारण जसजसे वय वाढत जाते, तसतशी जोखीम घेण्याची मानसिकता कमी होत जाते. त्याचप्रमाणे अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासारख्या गोष्टींसाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवावेत म्हणजे ऐनवेळी त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. ते चांगले राहण्यासाठी आपणास झेपेल तसा नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे आणि स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. जसे की, नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये आपले काही छंद जोपासायचे राहून गेले असतील तर आता ते आपण करू शकतो. कारण अशा गोष्टींमुळे आपला मेंदू तरतरीत राहतो. त्याचप्रमाणे स्वत:चा आणि जोडीदाराचा आरोग्यविमा आपण नोकरीमध्ये असतांनाच काढून ठेवणे हेसुद्धा आवश्यक आहे.

सुखी निवृत्त जीवनासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाची माणसे. यामध्ये ज्याप्रमाणे आपले कुटुंबीय आहेत, त्याचप्रमाणे नातेवाईक आणि मित्रही आहेत. या सर्वांना आपल्याविषयी प्रेम आणि काळजी वाटत असतेच. पण ते प्रेम वृद्धिंगत कसे होईल हे पाहणे आपल्याच हातात आहे. यासाठी आधी काही पथ्ये आपण पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे घरामध्ये कुणालाही अनाहूत सल्ला देण्याचे टाळावे. मुलांना त्यांचा संसार त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. त्यात अनावश्यक ढवळाढवळ नको. घरातील मुले, सुना, नोकरीस असतील तर नातवंडांची काळजी घेणे हे आपणास जमू शकते. त्याचप्रमाणे विजेचे किंवा टेलिफोनचे बील भरणे इत्यादी छोटी छोटी कामे आपण करू शकतो. त्यामुळे कुटुंबियांना आपली मदतच होते. दुसरे म्हणजे नोकरीमध्ये व्यस्त असतांना आपण जास्तीत जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी  घालवलेला असतो. कुटुंबियांना देण्यासाठी तेव्हा वेळच नसतो. आता निवृत्तीनंतर मात्र आपण जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसाठी द्यायला हवा. कुटुंबियांसोबत पर्यटनाला जाणे, सर्वांनी एकत्र बसून नाटक, सिनेमा पाहणे हे आपण करू शकतो. आपल्या जोडीदाराच्याही काही इच्छा, आकांक्षा आपल्या नोकरीच्या व्यग्रतेमुळे पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर आता त्या पूर्ण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढत असते ही गोष्ट सदैव ध्यानी असू द्यावी.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यासाठीसुद्धा थोडा वेळ आपल्या दिनक्रमातून काढला पाहिजे. कारण ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचेही आपण देणे लागत असतो. तसेच नवनवीन मित्र मिळविणे, एखाद्या सामाजिक संस्थेशी स्वत:ला जोडून घेणे, सदैव उत्साही राहण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी नक्कीच आपले निवृत्त जीवन सुखी बनवितील यात शंका नाही.

© श्री उद्धव भयवाळ

औरंगाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

 

“स्वत:साठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत असतो. ते पूर्णपणे खरं आहे. पण या वाक्याचा विपर्यास ही झालाय असं आपलं मला वाटतं.

आजूबाजूला काय दिसतं?

पूर्ण आयुष्य संसाराला, मुलांना वाहिलेली गृहिणी असते. तिचं समर्पण वंदनीय असतं. पण सतत दुसऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या, घरातल्या संदर्भात जगण्याची तिला सवय होते. मात्र एका वळणावर मुलं स्वयंपूर्ण होतात. त्यांचं आईवर खूप प्रेम असलं तरी दैनंदिन आयुष्यात आईची गरज कमी होते. घरही स्थिरस्थावर होतं. मग मिळालेल्या या एवढ्या मोठ्या वेळेचं करायचं काय हा प्रश्न पडतो. शरीराची दुखणी, मनाचा एकटेपणा यांचा संबंध मग जुन्या घटनांशी, व्यक्तींशी, अगदी ज्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकलं, त्या

मुलांशीही जोडला जातो.

पुरूषांचं  हेच होतं. नोकरी, व्यवसायातले कष्ट संपतात. घरात राहण्याचा वेळ वाढतो. मग घरातल्या अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्षे चालू होत्या पण जाणवलेल्या नव्हत्या , त्या अचानक जाणवायला  लागतात. बारिक सारिक गोष्टीत हस्तक्षेप सुरू होतो. समाजातल्या,  राजकारणातल्या समस्यांवर कृतीशून्य चर्चा मोठ्या उत्कटतेने सुरू होते. आणि समवयस्कांखेरीज इतरांना त्यातली निरर्थकता जाणवल्यामुळे ती निरस वाटू लागते.

या दोन्ही मागचं कारण मला वाटतं, आपण नेहमी”दुसऱ्यांच्या संदर्भात”जगतो. “दुसऱ्यांसाठी”असं मी म्हणणार नाही. कारण दुसऱ्यांसाठी आपण जे करतो त्याचा आपल्याला आनंद होतो म्हणून करतो हे खरं आहे. त्यामुळं तसं आपण दुसऱ्यांसाठी काहीच करत नाही. दुसऱ्यांच्या संदर्भात करतो. तर आपण मूलतः आपल्यासाठी जन्मलो आहोत आणि आपल्यासाठी जगतो आहोत हेच आपण विसरतो.

आपण सवड असली तरी व्यायाम करत नाही,  फिरायला जात नाही. स्वत:साठी योग्य ते खात नाही.

मनाला विकसित करण्यासाठी ध्यान, स्वसंवाद,  विवेकपूर्ण विचारप्रक्रियेची समज याकडे लक्ष देत नाही. (अर्थात या विवेकाची सवय लगेच होत नाही. बऱ्याचवेळा अविवेकानं वागून झाल्यावर “अरेरे. . . चुकलं आपलं”असं वाटतं. )पण तेही ठीक आहे. निदान यामुळे दुसऱ्यांवर रागवण्याचा क्षणिक उद्रेक झाला तरी नाराजीची पुटं चढत नाहीत मनावर.

स्वत:साठी काही पाठांतर करण्यात आपण वेळ देत नाही. कारण पाठांतर वगैरे लहान मुलांशी संबंधित. . . आता या वयात मला काय गरज? असं वाटतं. पण वाढत्या विस्मरणशक्तीवर काही श्र्लोकांच्या पाठांतरासारखे इतरही स्मरणशक्तीचे व्यायाम उपयुक्त असतात.

यातल्या कशालाही पैसे लागत नाहीत. २४तासात कमी होत चाललेल्या आणि कधीकधी वाढलेल्यासुध्दा जबाबदाऱ्या सांभाळून यातलं सगळं नाही पण थोडं काहीतरी आपण करू शकतोच. पण असं फक्त स्वत:साठी काही करायची आपल्याला सवय नसते. या अर्थानं स्वत:साठी जगणं हे फार महत्त्वाचे आहे. पैसा उडवणं आणि गुंतवणं यात फरक आहे. तोच फरक स्वत:पुरतं जगणं आणि स्वत: साठी जगणं यात आहे असं मला वाटतं. स्वत:पुरतं जगताना तुम्हाला दुसऱ्याचा विचार करायची,  दुसऱ्यासाठी झिजण्याची गरज नसते. पण स्वत:साठी जगण्यासाठी दुसऱ्यांसाठीचं जगणं सोडायची गरज नसते. गरज असते ती फक्त सतत दुसऱ्यांच्या संदर्भात जगणं सोडायची.

हेच तर “कैझान”आहे जे आपण कंपन्यांमध्ये राबवतो पण स्वत:च्या  आयुष्यात कैझानची गरज आणि ते अत्यंत छोट्या गोष्टीतून कसं इंम्प्लिमेंट करता येईल याचा विचार करतच नाही. माझ्या posts हे माझं loud thinking ही असतं हं. . . कारण मीही प्रवासीच आहे की कैझानची.

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

मोबाईल नं. ९८५०९३१४१७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखु  ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर

☆ जीवनरंग ☆ सखु  ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆

 

चांगल रुपया येवढ मोठ ठसठशीत कुंकू लावणारी, हातात कायम हिरवा चुडा असणारी, नीट नेटक स्वच्छ नऊवारी लुगड नेसणारी, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदा सर्वदा हसतमुख असणारी आमची सखु.

मध्यम बांध्याची, सावळ्या रंगाची, आणि स्वच्छ राहणारी सखु आमच्या कडे गेली कित्तेक वर्ष काम करत होती. कितीही दुःख, कष्ट असले तरी त्याचा लवलेश नाही चेहर्‍यावरती. सदा हसतमुख. पदरी तीन मुले आणि दारुडा नवरा. हिने रात्रंदिवस काम करायचे, मुलांना चार घास खाऊ घालायचे आणि रात्री नवऱ्याचा यथेच्छ मार खायचा. हा नित्य क्रम…. तरी ही माऊली हसतमुख चेहर्‍याने दुसरे दिवशी कामा वर येत होती.

एकेदिवशी तिच्या पाठीवरचे वळ खूप काही बोलून गेले. आणि तिला त्या दिवशी मी न राहून विचारले, काय झाले, मारले आहे काय काल नवऱ्याने ?? त्यावर हसत म्हणाली रोजचं हाय की. आम्ही राबायचे कष्ट करायचे, खायला घालायचे आणि वर मार खायचा. मला आधीच खूप राग आला होता तिचे वळ बघून म्हणून पोटतीडकीने, जरा रागातच म्हणाले मग सोडून का देत नाहीस त्याला?? नाही तरी स्वतः कमावतेस, तो काही तुला पोसत नाही मग हवाच कश्याला तो ? कधी नाही ते ती आज खूप त्रासलेली होती, म्हणाली स्वतः साठी नाही हो आज लढून आली आहे माझ्या हिरकणी साठी, हिरकणी म्हणजे तिची पंधरा वर्षाची वयात आलेली पोर. दिसायला गोरी पान, नाकी डोळी नीटस असलेली आईसारखीच हसतमुख. आज तिच्या बापाने चक्क पैश्यांसाठी विकायचा प्रयत्न केला होता. आज मात्र सखु भरभरून बोलत होती पहील्यांदा. नागाच्या शेपटी वर पाय दिल्यावर जसा नाग चवताळून फणा काढतो तसा. त्यावर मी परत तोच प्रश्न केला तिला, सोडून का देत नाहीस त्याला? आता मात्र ऐकुन घ्यायची वेळ माझी होती. म्हणाली कसा ही असला तरी कुंकू आहे माझं, आज त्याच कुंकवा मुळे घुबडासारख्या घाणेरड्या नजरा वर तोंड करून बघायची हिम्मत ठेवत नाहीत. हे काळे मणी गळ्यातले रक्षण करतात माझे ताई. आणी दारुडा असला तरी माझ्या वर लई प्रेम करतोय. आज कोणाच्या सांगण्यावरून पैश्यांसाठी खूप मोठी चूक करायला निघाला होता, पण आज मी पण हात उगारला बघा नाही सोडला आज त्याला, माझ्या पोटच्या गोळ्याचा सौदा करायला निघाला होता, जागेवर आणले टक्कुर त्याचे, कस काय मती फिरली त्याची काय माहीत, लई जीव आहे त्याचा पण हिरकणी वर, नशा उतरली तेव्हा ढसाढसा रडला,पोरीला कवटाळून.

आणि तिने नंतर जो मला प्रतिप्रश्न केला त्याने मात्र मी अंतरबाह्य हलले.

ती म्हणाली आमच्या सारखीअनाडी लोकं पिऊन रात्री नशेत असतात पण तुमच्या सारखी सुशिक्षित लोक दिवस रात्र नशेत असतात. फक्त पैसा मिळवणे एवढाच ध्येय. घर दार मुलं बाळ तुम्हा मोठ्या माणसांना पण आहेच की. ती म्हणाली, मी जिथे जिथे काम करते तिथे पाहिले आहे ताई घर तर तुम्ही बायकाच सांभाळता की. खर सांगु ताई तुमच्या सुशिक्षित लोकात पण पितात फक्त झाकून. हाणामारी तर तुमच्यात पण होते फक्त चार भिंतीत दडवून ठेवली जाते आणि आमची चवाट्यावर येते. ही सुशिक्षित लोकं जेव्हा त्यांची पायरी सोडतात तेव्हा जास्त त्रास होतोय ताई. फक्त पैशांचे खेळ आहेत. तुम्ही झाकून ठेवता, गरिबी काही झाकून देत नाही एवढेच. उलट आम्ही बोंबाबोंब करून अन्याय विरूद्ध आवाज उठवतो वेळ प्रसंगी हातही उगारतो, पण तुम्ही निमुटपणे सोसता आणि कुणाला कळायला नको म्हणून लपवून सहन करता.

खरच की, ती एवढ बोलून गेलीपण दुसर्‍या कामावर. आणि मी बधीर मनानी नुसते विचार करत होते. ती बोलून गेली ते अगदी खर होत. अशी कित्येक सुशिक्षित घर आहेत जिथे नवरा रोज पिऊन येतो मारहाण करतो, ज्याची बाहेर आपल्या एज्युकेटेड लोकांच्या भाषेत गर्लफ्रेंड असते, अशिक्षित त्याला रखेल म्हणतात. आपण थोबाडीत खाऊन चेहेरा लपवितो तर त्या एक घेऊन दोन ठेऊन द्यायची हिम्मत ठेवतात.

मग नक्की अबला कोण आपण की त्या? एक ना अनेक प्रश्न मला भेडसावत होते ज्याची उत्तरे माझ्या जवळ पण नव्हती.

सहज मनाच्या कोपऱ्यातून☺️

 

©  सुश्री श्रेया सुनील दिवेकर 

मो – 9423566278

30.8.2020

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ मी मला भेटले  ☆ सौ. मानसी काणे

सौ. मानसी काणे

संक्षिप्त परिचय  

शिक्षण –  एम ए.

दूरसंचारमधे ३० वर्षे नोकरी. अनेक मासिकात कथा लेखन. अनुवाद. वर्तमानपत्रात सदर लेखन.

☆ विविधा  ☆ मी मला भेटले  ☆ सौ. मानसी काणे ☆

आयुष्याच्या भर मध्यान्हीत मी स्वेच्छानिवृत्ती घेतली.  कितीही विचारपूर्वक घेतलेला निर्णय असला तरी एकदम आलेल रिकामपण अंगावर आल. मुल मार्गी लागलेली. घरापासून दूर रहाणारी,नवरा नोकरीत आणि मी अशी एकटी रिकामी घरात. मग घरात साफसफाई कर,पंखे पूस,खिडययांच्या जाळया साफ कर अशी सटरफटर काम काढली. वाचून वाचून वाचणार तरी किती? कथाकीर्तन आणि अध्यात्माचा ओढा मला कधीच नव्हता. सामाजिक कार्यात झोकून देण्याची वृत्ती नव्हती. मी ऐहिक सुखात रमणारी साधी बाई. मग करायच तरी काय? अशाच एका संध्याकाळी मावळतीच्या सोनेरी किरणासारखी ती मला भेटली. रिकामपण अंगावर घेऊन संथ बसलेल्या मला तिन हलवून जाग केल. म्हणाली,‘‘काय ग,चांगली आनंदी असायचीस की नेहमी. मग आता का अशी सैरभैर झालीस? चल ऊठ. शिवणकाम,भरतकाम किती सुंदर करायचीस. मला नातू झाला आहे. नव्यान सुरुवात कर छान झबली टोपडी शिवायला. भरतकाम करून दुपटी शीव.  पॅचवर्क कर. आणि लिहायच का बंद केलस ग? किती छान लिहायचीस तू कॅालेजमधे,ऑफिसच्या मॅगझिनमधे. कधी पेपरमधे. अस कर एक कथाच लिहून टाक झकासपैकी किंवा प्रवासवर्णन लिही  आणि दे दिवाळी अंकात आणि इतर मासिकात  पाठवून. दारात मस्त रांगोळी काढचांगली मोराची काढ. तुझी स्पेशालिटी होती ती. पानफुल आणि विविध प्रकारचे मोर. प्रत्येक मैत्रीणीच्या वाढदिवसाला छानशी पर्स किंवा पिशवी द्यायचीस भेट म्हणून स्वत: शिवलेली. त्यावर नाजुक मोर भरलेला असायचा. कुठ गेल ग ते सगळ? आणि पेंटिंग करायच का सोडलस?. ’’तुझ्या जुन्या घरातल्या बिंतींवर किती छान वेलबुट्टी काढलेली होती. आणि इथ साध स्वस्तीक नाही?

‘‘अग हो, हो किती बोलशील धबधब्यासारखी? कशी देवासारखी भेटलीस बघ.  मी हे सगळ विसरुनच गेले होते. ’’मी म्हणाले. ‘‘हे भेटीचे क्षण घट्ट पकडून ठेवायचे. आनंदी रहायच अन आनंद वाटायचा विसरू नकोस. विनोदी बोलून सर्वाना हसवणे हे तर तुझ शस्त्र होत. ते नको म्यान करूस. बर निघू मी? उशीर झाला. ’’आली तशी वार्‍याच्या झुळुकीसारखी ती निघून गेली. तिन सांगितलेल सगळच तर माझ्याकड होत. मग मी हा मिळालेला वेळ का बर वाया घालवते आहे.  मी झडझडून उठले. सुई , दोरा, रेशीम, कापड सगळ जमवल. शिवणाच मशीन स्वच्छ करून त्याला तेलपाणी केल आणि सुरु केल दणययात काम. सुंदर झबली टोपडी शिवली. जरीच्या कुंचीला मोती लावले. दुपट्यावर इटुकली पिटुकली कार्टून पॅच केली. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे जोडून मऊमऊ गोधडी शिवली. एक मस्त पिशवी शिवली. हे सगळ पहात असताना मला हे कपडे घालून दुडदुडणार गोंडस बाळ दिसू लागल.

मी हातात पेन घेतल आणि सुरू केल लिहायला. मनातल्या भावना शब्दरूप घेऊन झरझर कागदावर उतरू लागल्या. काय लिहू आणि किती लिहू अस मला झाल. सकाळी रांगोळी हातात घेतली आणि तुळशीसमोर एक मोर पिसारा फुलवून उभा राहिला. माझ्या मनात नाचू लागला. आता मला वेळ पुरेना. इतकी आनंदात तर मी यापूर्वीही नव्हते. मला अचानक भेटलेली कोण ही जादुगारीण? माझच आस्तित्व मला पुन्हा मिळवून देणारी कोण होती बर ती? आणि एका क्षणी मला लख्ख समजल की ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या आतली मीच होते. माझे माझ्याशीच ऋणानुबंध जुळले होते. जिवाशिवाची भेट झाली होती. ‘‘भेटीत तुष्टता मोठी’’ हे अगदी खर होत. मी नव्यान आनंदाला सामोरी जात होते. आनंद लुटत होते. नव्यान स्वत:ला भेटत होते.

© सौ. मानसी काणे

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये ☆

मराठी भाषेच्या शब्दसौंदर्याइतकाच तिचे शब्दसामर्थ्य हाही सखोल अभ्यासाचा विषय आहे. व्यूह हा शब्द याचीच प्रचिती देणारा वाटतो. चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ ल्यालेला हा शब्द!बेत, योजना, धोरण, युक्ति, हे जसे सकारात्मकता ध्वनीत करणारे अर्थ, तसेच कट, कारस्थान, डाव, डावपेच असे नकारात्मकतेच्या कृष्णछायाही याच शब्दाच्या. . ! युध्दात युध्दनीति, रणनीति ठरवताना शत्रुपक्षाच्या कसब/कुवतीचा अंदाज/अभ्यास जसा महत्वाचा तसाच त्यांच्या रणनीतिला छेद देण्यासाठी बुध्दीकौशल्यही तेवढेच आवश्यक. . ! हे बुध्दीकौशल्य अपरिहार्य ठरतं जेव्हा शत्रूपक्ष सर्वार्थाने प्रबळ असतो. ठाम निर्धार, खंबीर मन,  संघटन कौशल्यआणि उत्कट राष्ट्रप्रेम याच मुख्य भांडवलाला तीव्र बुध्दीमत्तेची जोड मिळाली आणि शिवाजीमहाराजांनी अतिशय प्रबळ मोगलसम्राटाशी लढताना युध्दनिती ठरवली ती स्वनिर्मित अशा ‘गनिमी कावा’या संकल्पनेनुसार. . !

व्यूह या शब्दाला रचनाकौशल्याची जोडही तेवढीच आवश्यक असते. विशेषत: बुद्धीबळासारख्या खेळात(लुटूपुटूच्या लढाईत)सुध्दा व्यूहरचनाकौशल्य अपरिहार्यच. . !

युध्दरचना, युध्दनीति यांची कसोटी लागते ती रणांगणावर हे कालपरवापर्यंतचं

वास्तव होतं. पण कालौघात व्यूहरचनेची गरज ही आज कुटुंबव्यवस्थेलाच खिळखिळी करु पहात आहे. सहजीवनातील अस्वस्थता, घटस्फोटांचं वाढत चाललेलं प्रमाण ही कौटुंबिक पातळीवरील छुप्या युध्दाचीच परिणती. या रणांगणावर व्यूह शब्दाचे नकारात्मक अर्थच ठळक होतात आणि ते सार्थ ठरवायला कट कारस्थानं प्रबळ होतात. टोकाचा आत्मकेंद्रीपणा नात्यातला गोडवा शोषून घेत स्वत; पुष्ट होत जातो आणि युध्दशस्त्रं परजली जातात. परस्पर सामंजस्य रणांगणावरील युध्दविरामासाठी अपरिहार्य असतं तसंच गृहकलहातही. देवाणघेवाण तिथल्यासारखी इथेही. पण इथे त्याची जाणिव  व्हायची तर ती उशीरा सुचलेल्या शहाणपणा सारखी नसावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण त्या युध्दांच्या बाबतीत रम्य वगैरे असणार्या ’ युध्दस्य कथा’ या प्रकारच्या युध्दात मात्र अतिशय क्लेशकारक असतात. . . !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली.

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print