मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हॅलेंटाईन.. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

??

? व्हॅलेन्टाइन.. ? सौ राधिका भांडारकर ☆

एकदा आजीने मला माहेराहून परतताना तिच्या जुन्या लुगड्याच्या तुकड्यात एक वस्तु बांधून दिली होती. ती वस्तु माझ्याकडे नाहीय् पण आजीच्या लुगड्याचा तुकडा मात्र मी जपून ठेवलाय. छान घडी घालून. त्या तुकड्याचा वास, मऊ स्पर्श ,त्यावरचं ते चांदण्यांचं डीझाईन म्हणजे माझ्या ह्रदयातलं आजीचं वास्तव्य आहे.

प्रेम, माया, एक हवीशी वाटणारी, सदैव धीर देणारी अशी अनामिक उब आहे…

शंभर वर्षाचं लांबलचक आयुष्य जगून ती गेली तेव्हां जाणवलं, जीवनातला एक प्रेमाचा कोनाडा रिकामा झाला…

अवतीभवती अनेक प्रियजन आहेत…ज्यांना खरोखरच माझ्याविषयी  प्रेमभावना आहेत..आपुलकी आहे…पण आजीच्या प्रेमाचा रंग कुठेच नाही…तिनं जे माझ्यावर प्रेम केलं

त्याची जातच निराळी..ती गेल्यानंतर त्या प्रेमाला मी पूर्णपणे पारखी झाले…तसं प्रेम मला कुणीच दिलं नाही ..आणि देउही शकणार नाही…

ती तशी खूप हट्टी होती.तिचं ऐकावच लागायचं..

एकदा आठवतंय्..पावसाळा सरला होता..

छान उन पडलं होतं.. म्हणून काॅलेजात जाताना मी छत्री न घेताच निघाले.. जाताना  तिने अडवलं.. छत्री घेच म्हणाली.. पण मी ऐकलंच नाही… संध्याकाळी परतताना, आकाशात गच्च ढग.. विजांचा कडकडाट आणि धो धो पाउस..!!

पण काय सांगू..?बस स्टाॅपवर ही माझी वृद्ध आजी उभी..एक छत्री माथ्यावर अन एक माझ्यासाठी बगलेत…

घरी पोहचेपर्यंत अखंड बडबड..चीड राग..

सांगत होते तुला मी संध्याकाळी पाउस येईल ..छत्री असूदे..ऐकत नाहीस..किती भिजली आहेस..परीक्षा जवळ आली आहे..

घरात गेल्याबरोबर टाॅवेलने खसाखसा अंग पुसले ..अन् पटकन् गरम पाण्यात चमचाभर ब्रांडीही पाजली…

खरं सांगू तेव्हां तिचा राग यायचा..पण आता जेव्हां असा धुवाधार पाऊस पडतोना तेव्हां तिचीच आठवण येते..तिच्या अनेक मायेच्या छब्या आठवतात..तिच्या चेहर्‍यावरची रेष नि रेष दिसते..त्या रेषांची स्निग्ध लाट होते..आणि तो प्रेमाचा शीतल गारवा आजही जाणवतो..

मला कुणी काळी म्हणून हिणवलं तर ,पदरात लपेटून घ्यायची .. असंख्य पापे घ्यायची..

आणि सदैव मला काट्टे, पोट्टे, वानर म्हणणारी तेव्हां मात्र,

“अग!माझी विठू माऊली .. माझी रुक्मीणी ग तू..” म्हणून गोंजारायची..

तिच्या प्रेमानं मला बळ दिलं .. आत्मविश्वास दिला..आत्मसन्मान ठेवायला शिकवलं..

एक सुरक्षित भिंत होती ती आमच्यासाठी..

लग्नानंतर मी माहेरी यायची.. माझी गाडी पहाटेच पोहचायची.. पण त्या अंधार्‍या  पहाटे दार उघडून स्वागताला तीच उभी असायची..

तिच्या विझत चाललेल्या डोळ्यांत माझ्या भेटीसाठी किती आतुरता असायची…

तिने मारलेल्या घट्ट मिठीत प्रेमाचा धबधबा जाणवायचा…

त्याच दारावर त्यादिवशी आजीच्या अस्थींचे गाठोडे दिसले आणि खूप काही हरवल्याची जाणीव झाली…

मग जेव्हा मन पोकळते,उदास होते तेव्हां तिच्याच लुगड्याचा हा तुकडा मला हरवलेलं सगळं काही परत देतो…

व्हॅलेंटाईन डे ला मी पहिलं गुलाबाचं फुल माझ्या प्रेमळ  आजीच्या…जीजीच्या स्मृतींनांच अर्पण करते….???

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अमर लता ☆ श्री विकास जोशी

?विविधा ?

☆ अमर लता ☆ श्री विकास जोशी ☆

अमर लता

‘लता’ या अफाट कर्तृत्वाच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अस्तित्व ही आपली श्रीमंती होती, अभिमान होता. रसिकांच्या हृदयात स्थान हे केवळ लिहिण्याची गोष्ट नाही तर प्रत्येकासाठीचं आनंददायी वास्तव होत.

लता म्हणजे सच्चा सुरांचा सश्रद्ध साधक. कोमलतेसह आवाजातील ऋतुजा जपणारी, गाण्याला भावमाधुर्यानं  सजवणारी, नाद सौंदर्यानं आरासणारी, प्रभाव-परिणामकतेनं नटवणारी, स्वयंभू शैलीची गायिका!शब्दांना स्वरार्थ देणारी, चालीला भावार्थ देणारी, गाण्याला परिपूर्णता देणारी.  ऐकता ऐकता सहजतेनं काही शिकणं घडावं असा संवादी रसाविष्कार रसिकांच्या अभिरुचीला उन्नत करणारा.  गाण्यात सर्व इमान ओतण्याचा ध्यास घेतलेलं, संघर्षात संयम राखणारं, प्रसिद्धीत विनय सांभाळणारं, वैभवात औदार्य जपणारं, प्रतिष्ठेला आदराचं वलय लाभलेलं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. 

जणू साक्षात सरस्वतीनच धारण केलेली चैतन्याकृती. पहिल्या गाण्यापासून तीस हजाराचा गाण्यापर्यंत अभिजाततेशी बांधिलकी मानणारी. दिगंत कीर्ती मिळूनही देव, देश, धर्मापायी निष्ठा वाहणारी एकमेवाद्वितीय लता.

‘अमर लता’

© श्री विकास जोशी

गाणगापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शून्य.. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

??

☆ शून्य.. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

शून्याला हेटाळणार्‍या सगळ्या अंकांना शून्यानेच एकदा उत्तर दिले.प्रत्येक अंकाच्या शेजारी जाउन तो उभा राहिला.आणि मोठ्याने म्हणाला,बघा आता तुमची किंमत किती वाढली ते…केवळ माझ्यामुळे…

खरंच की ,शून्यामुळे एकाचे दहा ,दोनाचे वीस, …सत्तर ऐंशी नव्वद..लाख करोड अब्ज…

वा!!वा!! मग सगळे जणं शून्याला खूपच भाव देऊ लागले..

शून्य ही संकल्पना,गणितशास्त्रात एक संख्या, स्थानमूल्य दर्शक म्हणून वापरली जाते.शून्य आणि दशमान पद्धती ही भारतीयांनी ,जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.त्यापूर्वी,मोठ्या संख्या लिहीणे व त्यांची गणिते मांडणे फार किचकट असे.

पण त्यापलिकडेही जाऊन शून्याविषयी काही विचार मांडावेसे वाटतात.

अंकाला शून्याने गुणले ,भागले तरी उत्तर शून्यच येते. कोणत्याही अंकात शून्य मिळवा नाहीतर वजा करा अंक तोच राहतो …यामधे मला एक दडलेले आध्यात्मिक तत्वच दिसतं…कुठल्याही बाह्य परिस्थितीचा परिणाम न होणारा एक स्थितप्रज्ञच मला या शून्यात दिसतो…

शून्य म्हणजे गोल.पृथ्वी तारे ग्रह सूर्य चंद्र सारेच गोल…एक संपूर्ण अवकाश.एक पोकळी. ब्रह्मांड…

सार्‍या विश्वाचीच निर्मीती एका शून्यातून झाली…

शून्य म्हणजे काही नसणे.शून्य म्हणजे निराधार.

शून्य म्हणजे निर्बंध .मुक्त.कोरे. शांत…

म्हणूनच शून्य मला नेहमीच निर्मीतीचे भांडवल वाटते.आणि शून्यातून जे निर्माण होते ते स्वयंप्रकाशी  ,लखलखते असते.अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी असते….

जेव्हां तुमची पाटी कोरी असते तेव्हांच तिधे स्वच्छ अक्षरांची निर्मीती होते….

शून्यात जाणे ही एक मोठी प्रक्रिया आहे..

शून्य स्थिती ही एक सिद्धी आहे…

शंभरपैकी तुला किती गुण मिळाले.शून्य गुण मिळाले.याचा अर्थच तुला एक उद्देश्य मिळालं..

ध्येय गाठण्याची ईर्षा या  शून्यातूनच उत्पन्न होते….

म्हणूनच शून्य स्थिती,शून्यावस्था, शून्यांतर्गत यात नकारात्मकता नसून एक प्रकाश अवस्था आहे…पर्णभार गळून गेलेलं झाड शून्य दिसतं..

ओकं बोकं दिसतं…पण कालांतराने त्याच जागी नवी पालवी फुटून पुन्हा यौवन प्राप्त होते…

शून्य झालेल्या मनातच नवकल्पनांची निर्मीती होऊ शकते…

शून्य म्हणजे शेवट नाही. शून्य म्हणजे सुरवात…

 

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं

पूर्णात् पूर्ण मुदच्यते

पूर्णस्य पूर्णमादाय

पूर्ण मेवावशिष्यते।।

 

शून्य म्हणजेच पूर्ण..

आणि शून्यातून शून्याकडे हा निसर्गाचाच

नियम आहे,…

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक अज्ञ,अजाण माणूस ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक अज्ञ,अजाण माणूस ☆ श्री अरविंद लिमये ☆

एक अज्ञ,अजाण माणूस

कोणताही दुर्गुण वाईटच. पण त्यातही अहंकार अधिक बोचरा. काटेरी. अहंकारी व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या कुणालाच तो सुखावह नसतो. तो टोचणारा,अस्वस्थ करणाराच असतो. गंमत म्हणजे या अहंकाराचे काटे अहंकारी व्यक्तीला मात्र त्याचे मन बधीर केलेलं असावं तसे कधीच बोचत  नसतात.अर्थात या बधिरतेमुळे ती बोच जाणवली नसली, तरी त्या अहंकाराचे दुष्परिणाम मात्र त्याला सोसावे लागतातच.

‘हा अहंकार नेमका येतो कुठून?’ हा वरवर गहन वाटणारा प्रश्न. पण अहंकार मुळात बाहेरून कुठून येत नसतोच. कुणीतरी ओवाळून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं म्हणतात.ते अनवधानाने जर कुणी ओलांडलं, तर त्याला ‘लागीर’ होतं असा एक (गैर)समज आहे. यालाच ‘बाहेरचं’ लागीर असं म्हणतात.तसंच अहंकाराला ‘आतलं’ लागीर म्हणता येईल.

सद्गुण आणि षडरिपू दोन्हीही प्रत्येकाच्या मनोभूमीत बीजरूपाने अस्तित्वात असतातच. आजूबाजूची परिस्थिती, संस्कार, विचार करायची पद्धत, यावर त्यातील सद्गुण अंकुरणार की षड् रिपू हे अवलंबून असतं. सुसंगत, घरचं आणि आजूबाजूचं आनंदी वातावरण, परस्पर-सामंजस्य, यामुळे विचारांनाही एक चांगलं वळण लागतं, जे सद्गुणांच्या जोपासणीला पूरक ठरतं.ती सकारात्मकता अर्थातच  षड् रिपूंच्या वाढीला मारक ठरणारी असते.कुसंगत,आत्मकेंद्री विचार, स्वार्थ, संस्कारांचा अभाव, यासारख्या अनुकूल घटकांमुळे निर्माण होणारं वातावरण मात्र दुर्गूणांच्या वाढीस पोषक ठरतं.अशा वातावरणात षड् रिपूंपैकी  ‘मद’ म्हणजेच गर्व स्वतः अंकुरतानाच अहंकारालाही स्वतःसोबत मिरवीत वाढू लागतो.

अनपेक्षित यश आनंददायी असतंच. सूज्ञ माणसं त्या आनंदाची क्षणभंगुरता जाणून असल्याने ते त्यात फार काळ तरंगत रहात नाहीत. त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवरच टिकून रहातात. अहंकारी माणसाला मात्र एवढंसं यशही पचवता येत नाही. आनंदाने बेभान झालेल्या त्याला मग स्वर्ग फक्त दोन बोटेच उरतो.

अहंकार कशाचाही असू शकतो.स्वतःच्या देखण्या रूपाचा, वडिलोपार्जित धनसंपत्तीचा, कार्यकर्तृत्त्वाचा, यशाचा,पद आणि प्रतिष्ठेचा, त्यामुळे मिळत असणार्‍या मान-मरातबाचा, सत्तेचा.. अगदी कशाचाही.अहंकार त्या व्यक्तीच्या दृष्टीने मारकच. अहंकार असेल तिथे समाधान राहूच शकत नाही.

माणूस खरंतर समाजप्रिय प्राणी.एकटेपण त्याला कधीच रुचत नसतं. माणसाच्या जगण्याचा परीघ लहान असो वा मोठा तो सच्चे मित्र, हितचिंतक, नाती-गोती यांनी समृद्ध असावा असंच प्रत्येकालाच वाटत असतं. अहंकारी व्यक्तीलासुद्धा ही अभिलाषा असतेच. पण त्याच्याच अहंकारीवृत्तीमुळे माणसे त्याच्यापासून नकळत दुरावत जातात. त्याच्याभोवती गर्दी नसते असे नाही, पण ती असते फक्त त्याचा अहंकार कुरवाळणाऱ्या ‘होयबां’चीच! त्यामुळे मनात आकारू लागलेला अहंकाराचा कांटा योग्यवेळी उपटून फेकून देण्याऐवजी, तोंड देखल्या  स्तुतीने तो वाढतच जातो. आणि त्या क्षणापासूनच अहंकारी व्यक्तीची विनाशाकडे वाटचाल सुरु होते.

अहंकार म्हणजे अहंभाव नव्हे तर अहंभावाचा अतिरेक. अहंभाव भल्याबुऱ्या प्रत्येकाच्या मनात असतोच. आणि तो वाईट असण्याचा प्रश्नही नाही कारण तो ‘आपला’ चाॅईस नसतोच. ‘मी’ आणि ‘माझं’ याची जाण प्रत्येक माणसाला त्याच्या न कळत्या वयापासून नैसर्गिकरीत्याच असते.आपले आणि परके यातला फरक त्या वयापासूनच त्याला व्यक्त करता आला नाही तरी समजत असतोच. म्हणूनच आईला चिकटून बसलेल्या बाळाला जर गंमतीने कुणी ‘आई  माझीs’ असं म्हटलं तर ते बाळ लगेच कावरंबावरं होत आपल्या बोबड्या बोलांनी ‘नाईsआई माजीs’ असं म्हणत ओठ काढून रडवेलं होतं. आई,बाबा,ताई, दादा,खेळणी,ठराविक दुपटं,वय वाढेल तसे स्वतःचे कपडे,गोष्टींची पुस्तकं, पांघरूण,खेळणी, वाटणीचा खाऊ हे सगळं मनोमन ‘माझं माझं’ म्हणून जपतच ते लहानाचं मोठं होत असतं. ‘मी’पणा, अहंभाव हा असा न कळत्या वयापासून आपला प्रत्येकाचाच स्थायीभाव असतो. हा अहंभाव हेच अहंकाराचे बीज! ते अंकुरलं,वाढत गेलं,तरच त्याचं अहंकारात रूपांतर होतं.आणि अर्थातच ते हानिकारक ठरतं. 

ठराविक मर्यादेपर्यंतचा अहंभाव म्हणजे स्वाभिमान.तो मात्र व्यक्तिविशेष ठरणारा असतो. पण त्या पुढे होणारी अहंपणाची अतिरेकी वाढ स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात व्हायला कारणीभूत ठरते.

यापासून बचाव व्हावा म्हणूनच ‘अहंकाराचा वारा न लागो ‘ अशी प्रार्थना प्रत्येकानेच स्वत:साठी करायला हवी आणि त्यादिशेने प्रयत्नही !

अहंकाराची लागण न होण्यासाठी प्रत्येकाने जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. जगायचं का? कशासाठी?कसं? हा विचार करून प्रत्येकाने जगण्याचं प्रयोजन ठरवायला हवं.

जगणं म्हणजेच जीवन. मग ते येईल तसं, जमेल तसं जगायचं कि अट्टाहासाने फक्त स्वतःसाठी जगायचं ते व्यक्तिपरत्त्वेच ठरत असतं.

ज्याना जीवन खर्‍या अर्थाने कळलेले आहे ते आनंदासाठी जगत नसतात, तर आनंदाने जगत असतात. त्यांच्या प्रत्येक पावलावर, लहान-सहान गोष्टीतही त्यांना आनंद सापडत जातो. तो फार शोधावा लागतच नाही.न शोधताही सापडतो.

आनंद तर प्रत्येकाला हवाच असतो. पण प्रत्येकाच्या आनंदाची त्याच्या गुणात्मकते नुसार प्रतवारी मात्र ठरलेली असते.सगळ्यांचे सगळेच आनंद सारख्या प्रतीचे नसतात. आनंद क्षणभंगुरच असतात,पण त्या अत्यल्प काळातही ते मनाला रिझवून, समाधान पेरुन जातात. असे आनंद निर्भेळ असतात. कर्तव्यपूर्तीतून मिळणारा आनंद कृतार्थता देणार असतो. दुसर्‍याचं दुःख हलकं करून मिळणारा आनंद उदात्त असतो. दुसर्‍याच्या आनंदाने स्वतःही आनंदी होण्यातला आनंद दुसऱ्याचा आनंद द्विगुणित करणारा असतो.

आनंद कुठे कसा शोधायचा, मिळवायचा हे प्रत्येकाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. ज्यांना जीवन म्हणजे काय हे कळले आहे, ती वरवर सरळ साधी वाटणारी माणसंही जगताना स्वतःचा विचार करतात तसेच आपल्या सोबत असणाऱ्या इतरांचाही.

आत्मकेंद्री,अहंकारी माणसं मात्र फक्त स्वतःचाच विचार करीत आनंद मिळवायचा अट्टाहास करतात. त्यामुळे तो आनंद निर्भेळ नसतो.भेसळयुक्त असतो. वरवर पहाणार्‍याला जरी असा आत्मकेंद्री माणूस यशस्वी, श्रीमंत, सुखी-समाधानी वाटला तरी आतून तो एकलकोंडा, दुःखी,पोखरलेलाच असतो. 

अहंकारी माणूस ‘जीवन म्हणजे काय हे न कळलेला’ या अर्थाने मला अज्ञ,अजाण वाटतो. कारण त्याचा विचार स्वतःपलिकडे कधी जाऊच शकत नाही.

जीवन कळलेल्या माणसाचं नेमकं जगणं कवीवर्य बा.भ. बोरकर यांनी त्यांच्या एका कवितेत अतिशय सुंदर रीतीने शब्दबद्ध केलेले आहे.त्या कवितेतली या मोजक्याच ओळीही मी अहंकारी माणसाला ‘अज्ञ’, ‘अजाण’ कां म्हणतो ते अधोरेखित करणारी आहे.

‘जीवन त्यांना कळले हो

मीपण ज्यांचे पक्व फळापरी

सहजपणाने गळले हो

जीवन त्यांना कळले हो ‘

असं असताना ‘मी’पणालाच कवटाळून बसणाऱ्या अहंकारी माणसाला ‘अज्ञ’च म्हणायला हवं ना?

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! रामाची निर्मल सीता व लक्ष्मी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? रामाची निर्मल सीता व लक्ष्मी ! ? 

“काय पंत, आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून !”

“अरे मोऱ्या वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी !”

“काय केबल गेली की काय तुमची पंत ?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये मोऱ्या ?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स !”

“पंत, मग तुमचा खास सखा सोबती आज मुका कसा काय बुवा ?”

“अरे काय सांगू तुला मोऱ्या, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट.  दुसरा विषयच नाही या लेकांना.  नुसता उच्छाद आणलाय सगळ्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा एकमेव गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय ?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार ? “

“पंत सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार ?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी कुठूनही चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना ? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला बंद t v. आता कसं शांत शांत वाटतंय !”

“पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“माझे कसले बुवा त्यात नुकसान ? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय ?”

“अहो पंत, पण सरकारने कर सवलत किती दिली, काय स्वस्त होणार, काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल ?”

“कसे म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी लंपास करून तूच  वाचतोस, होय ना ?”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी.  बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते ? “

“नाही खरच माहीत नाही मला, कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे.”

“तुला सांगतो मोऱ्या, अरे ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करत असतं आणि या पिशवीला ते ‘बुजेत’ म्हणत.  बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे, बरं का मोऱ्या !”

“कोणता किस्सा पंत ?”

“मोऱ्या, १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री, सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले असतांना, त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला आणि तेव्हा पासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला बघ !”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास ! बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे मोऱ्या इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना ? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून ?”

“तसच काही नाही पंत, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या ! नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते !  You know,  public memory is very short.”

“हो, पण आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि…… “

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना ? अरे पण म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय ? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पंत पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या होम मिनिस्टरची काय हालत होते, हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का ?”

“हो बरोबर पंत, या बाबतीत सगळ्याच होम मिनिस्टरना माझा सलाम ! महागाईचा कितीही भडका उडाला, तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत ! पंत पटल तुमच म्हणण.”

“पटल ना मोऱ्या, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती !”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला नाही पटत पंत !”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे मोऱ्या ? सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत.  एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या मार्गाने दोन हातांनी वेगळ्याच नावाने काढून घ्यायच ! आता तो आकडयांचा खेळ नकोसा वाटायला लागलाय. अरे पूर्वी  लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे !  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना !”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस ! तुला आता शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांव ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसा करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियम आहे ! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

११-०२-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आजीचा मेकअप बॉक्स ☆ सुश्री गौरी गोरे दातार

? विविधा ?

? आजीचा मेकअप बॉक्स ? सुश्री गौरी दातार ☆

‘ए अग, मेकअप बॉक्स काय म्हणतेस ग,. माझं नाव ‘फणेरी’ किंवा ‘फणी  करंड्याची पेटी’ असं आहे. माझं वय अंदाजे ९५ वर्ष. ?‍♀️.  माझा जन्म गुहागर मधल्या एका खेड्यात झाला. खास फणसाच्या झाडापासून बनवलय हो मला ?आणि म्हणूनच इतकी वर्ष अडगळीत असूनही वाळवी शिवली सुद्धा नाही मला?. जुनं खोड ना मी?

एका कोकणकन्येच्या म्हणजे यमीच्या रुखवतावर ठेवण्यासाठी मी खास घडवले गेले हो…☺️

एक आयाताकृती भक्कम पेटी आहे मी. आतमध्ये दोन खण आहेत. एकात हस्तिदंती फणी, केस बांधायचे आगवळ ( म्हणजे रबर गो), आकडे, खोबरेल तेल असायचे अन दुसऱ्या खणात मेणाची डबी, पिंजर, आंबड्यावर लावायच मोत्याच फूल अन् अस काय काय असायचं बर..

पोरांनो आगवळ म्हणजे गोफ. अन् पूर्वी कपाळावर मेण लावून त्यावर गोलाकार पिंजर म्हणजे कुंकू लावायचे बर. तेव्हा ओल कुंकू अन् टिकली चा जन्म व्हायचा होता.

पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला छोटासा आरसा असायचा. झाकणाच्या खोबणीत बरोबर अडकवलेला होता तो.

तुम्हाला सांगते पूर्वीच्या बायका अहोरात्र काम करायच्या बरे. अगदी परकऱ्या पोरी देखील दिवसभर लुडबूडत काम शिकायच्या. भल्या पहाटे न्हाणीघरातून आल्या आल्या काय तो नट्टापट्टा. ते देखील काय तर भल्यामोठ्या केसांचा तेल लावून घट्ट अंबाडा बांधायचा अन् वर आवर्जून एक तरी फूल किवा वेणी माळायची. कपाळावर टप्पोर लाल कुंकू रेखायच अन् काय ते दागिने ल्यायचे. पावडरचा जन्म देखिल नव्हता हो झाला तेव्हा. तरी देखील माझी यमी साक्षात लक्ष्मी दिसायची हो.. मग तिची लेक आली, सून आली.

पण हो माझा वावर काय तो माजघरात होता बर. ओसरी, पडवी ठावूक नव्हती मला अन् यमीलाही.. ?

हळूहळू कालपरत्वे माजघरातील  पैजणाची किणकिण ओसरीवर ऐकू येऊ लागली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले अन् मोठा आरसा, माझा शत्रूच म्हणा की, भिंतीवर विराजमान झाला. झालं तेव्हा पासून माझ्या अस्तित्वाला जणू उतरती कळा लागली. ?

माझा वापर कमी कमी होत मी कशी अन् कधी अडगळीच्या खोलीत गेले कळलच नाही हो. ?

 गेल्या वर्षी अचानक माळ्यावर खूप गडबड चालू झाली. ? माझी यमी तर कधीच कालवश झाली होती. तिची सून, मुलगी पण वारल्या की पूर्वीच. मग कोण बर असेल. ?

अरे देवा भंगारवाला आलाय हो. ?   माझा अंत जवळ आलाय कळून चुकलं होतं मला. साक्षात यमदेव दिसायला लागला समोर. मी डोळे मिटून राम म्हणणार तोच तिने मला भंगारवाल्याच्या हातून खेचून घेतलं.

” माझ्या पणजी ची पेटी आहे ही.  ही नाही न्यायची, जुनं ते सोन,” असं म्हणून तिने मला जवळ घेतलं. तब्बल सहा दशकानंतर मला मानवी स्पर्श झाला आणि तोही माझ्या पणतीचा, गौरीचा.

गौराईने मला नाहू माखू घातले, रंगवले अन् नवा लूक दिला. मॉर्डन का काय म्हणतात ना तसा. अन् आश्चर्य म्हणजे आपल्या दिवाणखान्यात मानाचे स्थान दिले. ? आता मी तिच्या दिवाणखान्यात दिमाखात बसून  तिच्या घरच्या किल्ल्या सांभाळते ? आहे की नाही माझी ऐट?.

एवढेच नाही तर माझे सगळे सवंगडी म्हणजे फिरकीचा तांब्या, हांडे, घागरी अन् पाट वगैरे पण खुश आहेत आता.

आम्हाला नवा लूक अन् स्टेटस मिळालं. अजून काय पाहिजे महाराजा या मॉडर्न युगात.?

चला तर मी तुमची रजा घेते. ?

माझा एखादा सवंगडी येईलच आता त्याचं मनोगत मांडायला. ??

सायोनारा…?

लेखिका :. गौरी गोरे दातार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विदुषी अपाला… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ विदुषी अपाला… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

महर्षी अत्री ऋषी यांना एकच मुलगी होती तिचे नाव अपाला.ती अत्यंत सुंदर, बुद्धिमान व एकपाठी होती. अत्रि ऋषी आपल्या शिष्यांना शिकवत त्यावेळी ती त्यांच्याजवळ बसे व त्यांनी एकदा सांगितलेले ज्ञान लगेच अवगत करत असे. तिला चारही वेद आणि त्यांचे अर्थ मुखोद्गत होते. वेदांतील ऋचांच्या अर्थाविषयी आपल्या पित्याशी संवाद साधत असे. चर्चा करत असे. त्यावेळी तिची असामान्य प्रतिभा पाहून अत्रीऋषी सुद्धा अचंबित होत असत. अर्थातच ती त्यांची अत्यंत लाडकी होती. पण अपालाला त्वचारोग होता. तिच्या अंगावर कोडाचे डाग होते. अत्रीऋषींनी तिच्यावर खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे तिच्या लग्नाची त्यांना सतत चिंता वाटत होती.

एक दिवस त्यांच्या आश्रमात वृत्ताशव(यांना कृष्णस्व किंवा ब्रह्मवेत्ताऋषी असेही म्हणतात)ऋषी आले. अपालाने त्यांची खूप सेवा केली. तिच्या सौंदर्यावर भाळून त्यांनी तिला मागणी घातली. तिच्याशी विवाह करुन ते तिला घेऊन आपल्या आश्रमात गेले.

काही दिवसांनी वृत्ताशव ऋषींना तिच्या कोडाचा संशय आला व त्यांनी तिचा त्याग केला. अपमानित होऊन ती परत आपल्या पित्याकडे आली.

अत्री ऋषीना खूप वाईट वाटले. त्यांनी तिला आधार दिला व पूर्वीप्रमाणे अभ्यास, अध्यापन, योग, उपचार सुरू कर असे सांगितले व इंद्राची पूजा करण्यास

सांगितले. अपाला मनोभावे इंद्राची आराधना करू लागली. इंद्र देव प्रसन्न झाले. त्यांना सोमरस आवडतो म्हणून तिने शेजारचा सोमवेल तोडलापण त्याचा रस काढण्यासाठी तिच्याकडे काहीच साधन नव्हते मग तिने आपल्या दातांनी तो वेल चर्वण केला व एका भांड्यात रस काढून इंद्र देवांना प्यायला दिला. इंद्रदेव संतुष्ट झाले व त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने आपला रोग बरा व्हावा , सतेज कांती मिळावी व पित्याची आणि पतीची भरपूर सेवा करता यावी असे वरदान मागितले. इंद्र म्हणाले तथास्तु. त्यांनी आपले सर्व ज्ञान पणाला लावले आणि तिची त्वचा तीन वेळा स्वच्छ केली. अपाला पूर्णपणे रोगमुक्त झाली.

इकडे वृत्ताशव ऋषींना पण आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. माफी मागण्यासाठी ते अत्री ऋषींकडे आले.त्यांनी अपाला ची आणि तिच्या वडिलांची मनापासून माफी मागितली व तिला बरोबर येण्यास सांगितले.

अत्रीऋषींना खूप आनंद झाला  .खूप भेटवस्तू देऊन त्यांनी आपली मुलगी व जावई यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या घरी परत धाडले. अपाला पतीसह आनंदात राहू लागली.

अशी ही विद्वान, धर्मपरायण व सामर्थ्यशाली अपाला. तिला कोटी कोटी कोटी नमन

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ *औटघटकेची कलाकार* ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? विविधा ?

☆ *औटघटकेची कलाकार* ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

१९८२-ची घटना.जानेवारी महिना; दुपारची वेळ,. मध्यप्रदेशातील राजनांदगांव स्टेशन. एक साधारण ३५शीतली बाई, खांद्याला पर्स कम बॅग,. आणि दोन्ही हातात कशीबशी सांभाळलेली, म्हणजे जरा कसरत करतच धरलेली सतार — अगदी छान गवसणी घातलेली, घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या  रेल्वेची वाट बघत उभी होती. जरा कावरीबावरी, भिरभिरती नजर, चेहर्‍यावर  पुर्ण बावळटपणा.

तेवढ्या धाडधाड करत गाडी आली.

काही मिनिटांचा हॉल्ट म्हणुन सगळा जामानिमा सांभाळत, फारसा विचार न करता., शिरली समोर येऊन थांबलेल्या डब्यात.

“बहेनजी रिझर्वेशनका डिब्बा है, आप अंदर नही आ सकती”.अशा येणाऱ्या सूचनांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले.

ओळखलेत ना सख्यांनो, कोण होती ती महाभाग.अहो कोण काय? “अस्मादिक”. हो मीच.

अन् गाडी सुटली की हो लगेच.

चला. कुठला का डबा असेना,

गाडी तर मिळाली म्हणुन “हुश्श” केले.

हातातली सतार सांभाळत कसेबसे पुढे जाणार. डोळे वर केले तर समोर काळ्या कपड्यातला टी. सी. वाटले बाणासुर, भस्मासुर. भीमासुर, बकासुर कोणीही समोर उभा ठाकला असता तरी घाबरले नसते हो. कारण कृष्णसखा, भीम, अर्जुन यांचा धावा तरी करता आला असता मदतीसाठी.

पण आता कोणाचा धावा करु? चेहरा करता येईल तेवढा ओशाळवाणा केला.”चला आयते सावज समोर आले” या नजरेने टी.सी.महाराज माझ्याकडे नखशिखांत बघायला लागले.सीतामाईसारखी धरणी नसली तरी रेल्वे पोटात घेईल  तर बरे असे वाटु लागले.

पण–पण— हातातल्या सतारीकडे बघत डोळ्यावरच्या चष्म्यातून बघत 

“बहेनजी, programme से आयी हो बंबईतक जाना है?.टिकेट दिखाओ, ये स्लीपर कोच है.आपका सीट नंबर?”

मनातल्या मनात “”अरे देवा. मुंबई कुठली? नागपूरपर्यंतचे साधे तिकीट आहे बाबा माझ्याकडे”.

पण आवंढा गिळत, मनात जुळवाजुळव करत, माझ्या फर्मास हिंदीमध्ये, “भाईसाब, वो क्या हुआ की, जल्दीसे, चुकीसे, सॉरी गलतीसे मैं जो सामने आया वो डब्बे मे चढ गई.  मुझे नागपुरतकही जाना है. आप कहते हो तो अगले स्टेशनपर दुसरे डब्बे मे जाऊंगी”. माझा जरा सामोपचार.अगदी बिनशर्त.

टी.सी. “आप पहिली बार इस ट्रेनसे ट्रॅवल कर रही होंगी.नागपुरतक ये ट्रेन कोनसेही स्टेशनपे जादा देर  रुकती नही.आपको फाईन देना होगा”.

हरे रामा. पुर्ण जर्नीच्या दीडपट–म्हणजे कलकत्ता-मुंबई तिकिटाच्या दीडपट.डोळ्यातुन पाणी यायचे तेवढे बाकी होते.

तेवढ्यात, तिथल्याच कंपार्टमेंट बसलेले एक वयस्कर गृहस्थ,”बेटी आप खैरागड –संगीत युनिव्हर्सिटी से आयी हो?”

क्षणाचाही विलंब न लावता मी “हां, हां, वहीसे”

“आप सितार बजाती हो.आओ.नागपुरतकही जाना है ना.४,५घंटेका सवाल.यहॉं बैठ सकती हो.”

अन् टी.सी. ला नागपुरपर्यंतच प्रश्ण आहे. आणि आता ही बाई एकटी कुठे जाईल. वगैरे सांगून मला बसायला परवानगी देण्यास अगदी मधुर शब्दात.अस्सल हिंदीचा लहेजा सांभाळत सांगितले. टी.सी.

“पंडितजी, आप करह तो इसलिये मै मानता हुं. बहेनजी बैठ सकती हो. मैं भी सितार बजाता हुं. चेकिंग करके आता हुं. आपसे बातचीत करनेके लिये.”

परत, धर्मसंकट. कारण, सतार काय साधे तुणतुणे ही मला वाजवायला येत नव्हते.

झाले काय होते. माझी नणंद खैरागडला रहात होती. तिचे मिस्टर त्या युनिव्हर्सिटीत तबल्याचे प्रोफेसर होते. त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले होते. आणि तिला तिच्या मुलांना घेऊन लगेच कोल्हापुरला आणले होते. आणि तिथली क्वार्टर सोडायची म्हणुन तिचे सर्व सामान आणायला हे, मी आणि तिचे दीर गेलो होतो.

सर्व सामान २,३ दिवसात पॅक केले पण ट्रक वेळेवर न आल्याने त्या दोघांना सामान लोड करे पर्यंत तिथे थांबणे भाग होते. नागपुरला बहिणीकडे  माझ्या लहान मुलीला ठेवले होते म्हणुन मी मिळेल त्या गाडीने निघाले होते.नणंदेची सतार मला माझ्याबरोबर आणल्याशिवाय पर्याय नव्हता.

आणि माझ्या हातातील सतारीने मी कोणीतरी सतारवादक आहे असा गैरसमज झाला होता.आणि आता तो तसाच ठेवणे माझ्यादृष्टीने आवश्यकच होते.

कारण त्या सतारीमुळेच पंडितजींनी मला बसायला जागा दिली.

पण–पण बसल्याबसल्या पंडितजींनी गायन- वादन यावर माझे बौध्दिकच घेतले.शास्त्रीय संगीताचा माझा संबंध फक्त सा रे ग म —सरगमपुरताच.

बागेश्री, भीमपलास, मियाकी तोडी, जयजयवंती सगळे मला सारखेच.

काळी पाच, का काय ते ही मला माहित नाही. हिंदी बोलणे ही अगदी अफलातुन. पण पंडितजी खुप गप्पिष्ट. त्यात भर म्हणजे दिल्या शब्दाला जागुन टी. सी. महाशय ही

बातचीत करायला येऊन बसले. तेही संगीतातले दर्दी.

आणि मी ही तज्ञ(?) म्हणुन मलाही गप्पात सामिल करुन घेत होते.

कुठेतरी, काहीतरी जुजबी वाचलेले, ऐकलेले, आणि आठवणीत असलेले अधूनमधून बोलुन “हां भाईसाब, आप सही कहते हो.” “वा क्या बात है”

वगैरे वाक्ये फेकत, अस्तित्वात नसलेल्या गुरूचे, कधीही न केलेल्या मैफिलींचे – खोटे वाटणार नाही इतपत वर्णन करत – थापा मारत खिंड लढवत होते खरी. पण मनातल्या मनात कधी हसत , कधी घाबरत नागपुर लवकर येवो ही प्रार्थना करत होते.

कसाबसा प्रवास संपवला.

आणि घरी आल्यावर मात्र बहिण, मेहुणे, भाचे कंपनीला सर्वच किस्सा रंगवून सांगितला. आणि नंतरही जे भेटेल त्याला माझी कलाकारी सांगत होते,.

गायन -वादनातली नसेना का पण अभिनयातील औटघटकेची कलाकार म्हणुन यशस्वी ठरले.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माघी गणेश जयंती ☆ संग्राहक मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

माघी गणेश जयंती ☆ संग्राहक मंजुषा मुळे ☆ 

|| माघी गणेश जयंतीच्या ||

सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

श्रीगणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात.

या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत.

पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस

दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस

तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची जयंती  माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.

तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते.

पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.

दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.

तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.

 त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.

पूजा कशी कराल?

मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर, १६ उपचारांनी (षोडशोपचार) पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण फलदायी ठरते.

या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी ४ पर्यंत केव्हाही पूजा करावी. त्यातही माध्यान्हावेळी अर्थात दुपारी १२ वाजताची वेळ उत्तम.

माघी गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस की, त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वत:चा स्वत: घ्यावा. स्वत:च्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते. माघी गणपतीला २१ दूर्वा का वाहतात, कारण मातृदेवता २१ आहेत, असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे. त्यामुळे त्याला २१ दूर्वा वाहतात, असे म्हटले जाते. गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते.

ॐ गं गणपतये नमः

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाग ३  – बालमानस -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३  – बालमानस -१ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

लहान मुलांचे मानसशास्त्र हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. बाल वयात ते आपले आई वडील,    

घरातील लहान मोठे आणि संपर्कातील माणसे यांचे निरिक्षण करीत असतात. ते काय बोलतात ते   

नीट ऐकून मनात साठवत असतात. ते मूल जिज्ञासू असेल तर विचारायलाच नको. कारण या

बालवयात होणारे संस्कार त्याला आयुष्यभर पुरत असतात.

नरेंद्र असाच सर्वांपेक्षा वेगळा. त्याला प्रत्येक गोष्टींचे कुतूहल असे. दुपारच्या वेळी कुटुंबातल्या सर्व स्त्रिया एकत्र जमून रामायण महाभारताचे वाचन करीत असत. त्या कथा नरेंद्रला फार आवडत, रामायणाच्या तर विशेष आवडत. श्रीराम आणि सीता यांच्या विषयी तर नरेंद्रच्या मनात अपार श्रद्धा व भक्ति उत्पन्न झाली होती. एव्हढी की त्यांच्या मूर्ति आणून त्याने खोलीत ठेवल्या आणि त्याची रोज पुजा पण होऊ लागली. एकदा राम कथेच्या कीर्तनात त्याने ऐकले की हनुमंत केळीच्या वनात असतो. त्या बालबुद्धीला खरेच वाटले. कीर्तनकारांना त्याने विचारले, की मला हनुमंत त्या वनात भेटेल का ? कीर्तनकाराने  समजूत काढायची म्हणून, हो म्हटले. आणि नरेंद्र हनुमंताला भेटण्यासाठी  त्या केळीच्या वनात गेला,  खूप वेळ बसला तरी त्याची भेट झाली नाही. निराश होऊन तो परत आला आणि आईला संगितले .आईने “ प्रभु रामाचंद्राने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असणार अस सांगून बालमनाची समजूत काढली खरी. आणखी एकदा असाच अनुभव त्याला आला.

त्यांच्याकडे नोकर चाकर होते ते अदबीने वागत बोलत. प्रेमळ होते ते. त्यांच्या मुलांशी गप्पा ही होत असत. एकदा नरेंद्रशी बोलत असताना एका नोकराने म्हटले, “विवाह किती वाईट गोष्ट आहे” तर प्रपंचत किती कटू अनुभव येतात तेही त्याने नरेंद्रला संगितले. या बोलण्याचा नरेंद्रवर इतका खोलवर परिणाम झाला की त्याल वाटले, राम आणि सीता या देवतांना आपण मानतो. पण त्यांचा विवाह झाला आहे आणि त्या क्षणीच प्रभू रामचंद्र नरेंद्रच्या मनातून उतरले, त्याने आईकडे धावत जाऊन हे संगितले. पण ती माऊली या बालमानला काय समजवणार? भुवनेश्वरी देवी म्हणल्या. “तू असं कर, श्रीरामांच्या ऐवजी शिवाची पुजा कर. हे म्हणणे पटले. अर्थातच नरेंद्रला हे माहिती नसावे की शिव पार्वती यांचा ही विवाह झालेला आहे म्हणून. त्या बालबुद्धीने लगेच वर खोलीत जाऊन राम -सीतेच्या मूर्ति काढून टाकल्या आणि शिवाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली. मोठा होई पर्यन्त शिवाची पुजा चालू होती.

असे घडत असते बालमन. बालवयात मुलांना घडवताना त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल पूर्ण करताना आईवडिलांनी आणि मोठ्यांनी खूप विचार पूर्वक उत्तरे दिली पाहिजेत. आपण स्वताही वागताना नीट काळजी घेतली पाहिजे.

क्रमशः …

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print