मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रंगांची उधळण! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ?  रंगांची उधळण! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

☆ 

सांजवेळी नभांगणी

होई रंगांची उधळण,

पाहून मज प्रश्न पडे

रंग त्यात भरी कोण ?

बघून स्वर्गीय नजारा

गुंग होऊन जाई मती,

नाना रंगांची वेशभूषा

वाटे मग ल्याली धरती !

पाहून न्यारी रंगसंगती

मन मोहरून जाई,

कुठला त्याचा कुंचला,

कुठली असेल शाई ?

अदृश्य अशा त्या हाती

असावा अनोखा कुंचला,

आपण फक्त हात जोडावे

त्या वरच्या रंगाऱ्याला !

फोटोग्राफर –  अस्मादिक

© प्रमोद वामन वर्तक

२५-११-२०२२

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ राधा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

एकटी तुझ्याविण, राहू कृष्णा, कशी मी वृंदावनी !

राधा करिते, मनी खंत ती, विरहाच्या त्या क्षणी!

 

गोकुळ सोडून, कान्हा जाई ,

दूर राहिली राधा!

जाळीत राही, राधेला त्या,

कृष्ण विरहाची बाधा !

 

कृष्ण बासरी, ऐकू येई

राधेला अंतरी !

बासरीत त्या, सूक्ष्म होऊनी,

राधा गाई उरी !

 

मोरपीस राधेने दिधले,

 कृष्ण वागवे शिरी !

तुझीच साथ, सोबत कायम, ठेवील हो श्रीहरी!

 

अखंड दिसतो, कृष्ण तिला,

मन वृंदावन होते !

राधाकृष्ण एकरूप होता

मन तृप्त तिचे होते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 159 ☆ नातं ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 159 ?

☆ नातं ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

“अकारणच जवळीक दाखवली!”

असे वाटून जाते,

आजकाल!

 

निष्कारणच Attitude दाखवत,

निघून गेलेली ती…..

रिक्षात बसल्यावर ,

कसा करेल इतक्या प्रेमाने आपल्याला हात??

हे लक्षात यायला हवं होतं !

पण प्रतिक्षिप्त क्रियेसारखा….

उंचावला जातो हात…

पण तिचं पुढचं वाक्य ऐकून जाणवतं,

अरे, ती इतर कुणाशी बोलतेय,

 आपल्या पाठीमागे असलेल्या !

 

किती फसवी असतात ना,

ही नाती??

काल परवाच सांगितले,

गूज मनीचे,

पाश असतात कुठले, कुठले !

शेअर केल्या काही गोष्टी,

की , शांत होते मन!

आणि गळामिठी घातलीच जाते,

त्या “हमराज” मैत्रीणीला !

 

 पण नाती रहात नाहीत

आता इतकी निखळ,

पूर्वीही व्हायच्याच कुरबुरी…भांडणं

रूसवेफुगवे!

…..पण आजकाल दर्प येतात,

अहंकाराचे!

याच प्रांगणात खेळ सुरू झाले होते…

पण “जो जिता वही सिकंदर”

म्हणत पहात रहायची लढाई,

बेगुमान!

या युद्धात सहभागी व्हायचेच

नसतेच खरेतर!

पण युद्ध अटळ मैत्रीतही !

जो तो समजत असतो,

 स्वतःला रथी महारथी ! ….नसतानाही !

आपण सांगून टाकतो

आपले अर्धवट ज्ञान…

म्हणूनच आपला होतोच,

अभिमन्यू!

मैत्रीच्या नात्यातही !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखे🍃… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे🍃 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

शब्द मूक जाहले, तू शांत शांत का

भेटू ग सांजवेळी, मनी आकांत का ?

 

ओळख मनातले तू

हवा शब्दांचा उच्चार का

भावस्वप्न पाहताना

सखे अशी क्लांत का?

 

सांजसंध्या बहरली अन्

छळतो  एकांत का?

क्षितीजावरील सांजरंग

तव मुखी विश्रांत का ?

 

नभी उधळे चांदण्याचा

चुरा निशेचा कांत का?

खुलून ये जवळी, अता

सुखाची सखे भ्रांत का?

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 107 ☆ हे विश्वची माझे घर…. ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 107 ? 

☆ हे विश्वची माझे घर… ☆

हे विश्वची माझे घर

सुबुद्धी ऐसी यावी 

मनाची बांधिलकी जपावी.. १

 

हे विश्वची माझे घर

औदार्य दाखवावे 

शुद्ध कर्म आचरावे.. २

 

हे विश्वची माझे घर

जातपात नष्ट व्हावी 

नदी सागरा जैसी मिळावी.. ३

 

हे विश्वची माझे घर

थोरांचा विचार आचरावा 

मनाचा व्यास वाढवावा.. ४

 

हे विश्वची माझे घर

गुण्यगोविंदाने रहावे 

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे.. ५

 

हे विश्वची माझे घर

नारे देणे खूप झाले 

आपले परके का झाले.. ६

 

हे विश्वची माझे घर

वसा घ्या संतांचा 

त्यांच्या शुद्ध विचारांचा.. ७

 

हे विश्वची माझे घर

`सोहळा साजरा करावा 

दिस एक, मोकळा श्वास घ्यावा.. ८

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 38 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 38 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५९.

पानांपानांवर नाचणारा हा सोनेरी प्रकाश,

आकाशात तरंगणारे हे ढग,

माझ्या मस्तकाला थंडावा देत जाणारा हा वारा

हा सारा तुझ्या प्रेमाचा स्पर्श आहे.

 

प्रभात समयीचा हा प्रकाश

माझे डोळे काठोकाठ भरून टाकतो

आणि तुझा संदेश ऱ्हदयात भरून जातो.

 

माझ्या चेहऱ्यावर तुझा चेहरा

वाकलेला आहे,

तुझे डोळे; माझे डोळे निरखताहेत,

माझं ऱ्हदय तुझ्या चरणांवर वाहिलं आहे.

 

६०.

अंतहीन जगाच्या समुद्रकिनाऱ्यावर मुलं भेटतात.

 

त्यांच्या मस्तकावर स्तब्ध अफाट आकाश आहे.

खळखळणारं चंचल पाणी आहे.

अंतहीन जगाच्या समुद्रकिनाऱ्यावर

आरडाओरडा करत पोरं नाचतात.

वाळूची घरं बांधतात,शिंपल्यानं खेळतात.

वाळलेल्या पानांच्या नावा बांधून

हसत हसत खोल समुद्रात सोडतात.

जगाच्या किनाऱ्यावर पोरं खेळतात.

 

पोहायला,जाळी फेकायला त्यांना येत नाही.

मोती शोधणारे समुद्रात मोत्यासाठी बुडी मारतात.

व्यापारी त्यांच्या गलबतातून सागर सफर करतात.

पोरं शिंपले गोळा करतात, उधळतात.

समुद्रातील धन- दौलत त्यांना नको,

जाळी पसरणं त्यांना माहीत नाही.

सागर खळाळून हसतो, किनारा अंधुकसा हसतो.

 

पाळण्याच्या लहानग्याला

अंगाई गाणाऱ्या मातेप्रमाणं

लाटा निरर्थक व जीवघेणी कवनं गातात.

सागर मुलांशी खेळतो आणि

किनाऱ्याच्या अस्फुट हास्यात

प्रकाशकिरण चमकतो.

 

अंतहीन जगाच्या सागरकिनाऱ्यावर

मुलं खेळतात.

पंथहीन आकाशात वादळ घोंगावतं,

मार्गहीन सागरात जहाजं फुटतात, बुडतात.

दूरवर मृत्यूचं थैमान चाललंय.

 

किनाऱ्यावर पोरांची भव्य सभा भरलीय.

अंतहीन सागरावर पोरं खेळतात.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(षडाक्षरी)

          कढ अंतरीचे

          आटलेले सारे

          निचऱ्यात आता

          साठलेले सारे

 

          शमलेले सारे

          व्यथांचे क्रंदन

          ह्रदी शिणलेले

          मौनाचे स्पंदन

 

          दाह लौकिकाचे

          शांत शांत आता

          उरे काळजात

          स्मशानशांतता

 

          कधीमधी जागी

          आठवांची भूते

          अर्थशून्य भास

          तेवढ्यापूरते….

 

          काल होतो तसा

          आज झालो असा

          दावितो वाकुल्या

          चक्क हा आरसा

 

          होतो जेव्हा माझा

          माझ्याशीच द्रोह

          कवेत घ्यावया

          साद घाली डोह

 

          जमा इतिहासी

          आयुष्याचे टप्पे

          सुने  हळूहळू

          काळजाचे कप्पे

 

          स्मृतिभ्रष्ट कोणी

          निनावी गर्दीत

          आपुलाच पत्ता

          हिंडतो शोधित !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे

मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे  ||ध्रु||

 

स्थावर-जंगम तेही सोडा देह नसे आपुला

क्षणभंगुर तो मिथ्या तरीही मोह उगा ठेविला

आत्म्याचे अस्तित्व चिरंतन अंतरी जाणावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे   ||१||

 

आयुष्यातिल खस्ता आणिक कष्टा ज्या भोगले

फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले

सेवा हाची धर्म जाणुनी माझे नाही म्हणावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे  ||२||

 

काय अपुले काय नसे हे अता तरी उमगावे

मोह वासना त्यात गुंतुनी घुटमळुनी का ऱ्हावे

मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारुनी द्यावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||३||

 

सहा रिपूंच्या फेऱ्यामध्ये सदैव भिरभिरणे

नसणे अन् नाहीसे होणे यात चिमटुनी जगणे

आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे  ||४||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

[email protected]

☆ निरोप – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

निरोप :  विरक्तिपर विचारांची भावमधुर कविता – अमिता कर्णिक-पाटणकर

सिद्धहस्त साहित्यिक-कवी डॉक्टर निशिकांत श्रोत्री  यांची ‘ निरोप ‘ ही कविता वाचली व प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकलीही. तेव्हापासून एका नितांतसुंदर काव्याचा आनंद अनुभवते आहे.

कवितेची सुरुवातच ” कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे,  मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे” ह्या निरोपाच्या ओळींनी होते. हा निरोप इहलोकाचा आहे हे लख्खपणे सामोरे येते आणि थोडी उदासी, थोडी विषण्णता जाणवण्याच्या अपेक्षेने आपण पुढे वाचू लागतो. कविता सहजपणे उलगडत जाते ती अशाच निवृत्तिपर शब्दांनी. या जगातून निघून जाण्याआधीची नितळ आणि निखळ मनोऽवस्था पारदर्शी दिसते.

स्थावर- जंगम संपत्ती तर सोडाच,  हा देहही आपल्या मालकीचा नाही; मग त्याचा मोह कशासाठी धरावा हा मूलभूत प्रश्नच कवी विचारतो. ” फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले ” ही ओळ तर गीतेच्या निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञानच! आयुष्य जसे समोर आले तसे जगण्याचे,  कष्ट-हालअपेष्टा सहन करण्याचे बळच ह्या मनोवृत्तीतून मिळाले असणार.  म्हणूनच ‘ इदं न मम ‘ – ” माझे ‘नाही’ म्हणावे ” असे कवी सहजगत्या म्हणतो. जीवन क्षणभंगुर आहे हे एकदा आकळले की मग त्यातील भावभावना, कामनावासना व्यर्थ वाटू लागतात. मग ” मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारून द्यावे ” अशी जणू जीवाला ओढ लागते. अंतिम चरणातही बंदिस्त आयुष्याची घुसमट कवी मांडतो पण शेवटच्या ओळीत मात्र कविता वळण घेते – “आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे ” असे म्हणत एक वेगळीच उंची गाठते.  आणि हेच या कवितेचे सार आहे.

जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांना जोडणारा पथ म्हणजे जीवन. या पथावर अनेक खाचाखळगे असतात तसेच सुखद थांबेही असतात. हे सर्व भोगत आणि उपभोगत मार्गक्रमण करायचे असते. हा मार्ग शेवटच्या मुक्कामाकडेच जातो हे अटळ सत्य सर्वांनाच पचवता येत नाही. मृत्यू हा दुःखद अंत आहे हीच भावना प्रायशः असते. इथेच डॉ. श्रोत्रींचं वेगळेपण जाणवतं. कवितेत कुठेच भय दिसत नाही, संध्याछाया ह्रदयाला भिववत नाहीत,  दुःखाचे उमाळे फुटत नाहीत.  उलट, विरागी योग्यांची अनासक्ती, तृप्तीच जाणवते. हे अजिबात सोपं नाही.  वास्तविक साधूसंतांची हीच शिकवण आहे, पण सर्वसामान्य जनांना आचरणात आणणं अवघड वाटतं. डॉ. श्रोत्रींनी मात्र हे सहज अंगीकारलं आहे असं  कवितेत ठायी ठायी दिसून येतं.

आयुष्यात सुखदुःखांना सोबत घेऊनच मार्ग चालावा लागतो. पण या मार्गावर एक एक ओझं उतरवत, विरक्त होत होत पुढे चालत राहिलं तर पैलतीर दिसू लागल्यावर आपण मुक्त,  निर्विकल्प होऊन ‘निरोपा’साठी मनोमन तयार असतो. आपला नश्वर देह मागे सोडावा लागला तरी खरा साथी ‘ आत्मा ‘ चिरंतन आहे,  अमर्त्य आहे हा दिलासा मिळाल्यावर भीतीला वावच उरत नाही. अविनाशी आत्म्याचा हा अनंताचा प्रवास निरंतर चालूच राहतो. तो संपत आल्यासारखा वाटला तरी खऱ्या अर्थाने कधी संपणार नसतोच….तो केवळ एक निरोप असतो – पुन्हा भेटण्यासाठी घेतलेला निरोप!

ऐहिक जीवनाचं वैय्यर्थ दाखवूनही सकारात्मक विचार मांडणारी ‘निरोप’ ही  कविवर्य डॉ. निशिकांत श्रोत्री  यांची कविता  म्हणूनच मला अतिशय उदात्त आणि उत्कट वाटली!

© सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर

[email protected]

९९२०४३३२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मित्रलक्षणे….समर्थ रामदासस्वामी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मित्रलक्षणे….समर्थ रामदासस्वामी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

आपल्या परंपरेत पूर्वी वेगळे दिन वगैरे साजरे केले जात नसत …. परंतू तरीही खूप पूर्वी श्री रामदास स्वामींनी आवर्जून सांगितलेली मित्र लक्षणे मात्र, आज “फ्रेंडशिप डे“ आवर्जून साजरा करतानाही नक्कीच ध्यानात ठेवावीत अशी आहेत ——

 

मित्र तो पाहिजे ज्ञानी। विवेकी जाणता भला।

                             श्लाघ्यता पाहिजे तेथे। येहलोक परत्रहि॥

 

उगाचि वेळ घालाया। नासके मित्र पाहिले ।

                             कुबुद्धि कुकर्मी दोषी। त्यांचे फळ भोगावया॥

 

सारीचे मित्र नारीचे। चोरीचे चोरटे खवी।

                             मस्तीचे चोरगस्तीचे। कोटके लत पावती॥

 

संगदोषे महादुःखे। संगदोषे दरिद्रता।

                             संगतीने महद्भाग्य। प्राणी प्रत्यक्ष पावती॥

 

संग तो श्रेष्ठ शोधावा। नीच सांगात कामा नये।

                              न्यायवंत गुणग्राही। येत्नाचा संग तो बरा॥

 

रचना : श्री समर्थ रामदासस्वामी महाराज

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ती आयुधं… !  ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? ती आयुधं… ! ? ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

कधी

बसवलेस घट

कधी

फिरलीस अनवाणी ,

कधी

केलास उपवास

कधी

गरब्यातली गाणी.

कधी

केलास हरजागर

कधी

भक्तीत भिजलीस ,

कधी

केलास उदो उदो

कधी

रंगात सजलीस.

कधी

मातीत रुजलीस

कधी

हत्यारं पुजलीस.

पण…

बाई म्हणून सहन करताना

आता

तुझ्यातली दुर्गा होऊन जग,

आणि

तुझ्याच रक्षणासाठी

ती आयुधं ;

आता तरी चालवून बघ.

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares