मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥मनातला पाऊस॥ … श्री मयूरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ ॥मनातला पाऊस॥ … श्री मयूरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे

काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 

अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.

पहाटे साडेतीनच्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला) पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. 

वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे.

कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 

काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 

“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 

“मग?”

“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”

“मग आता?”

“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”

त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 

“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. 

मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 

ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”

“मग काय, पैसे कमवू नयेत का?”

“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”

“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 

“पण, ती फसवतीलच हे कशावरून?”

मी पुन्हा सपशेल आडवा. 

“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”

शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 

“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 

मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 

“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. “तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 

“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 

“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”

आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 

“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 

“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”

… त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !

— समाप्त — 

लेखक : श्री मयुरेश डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

प्रस्तुती : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ५ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ५ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पहिले – ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला. आता इथून पुढे) 

 सोमवार, ८ सप्टेंबर

आज बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार म्हणून हॉस्पिटलमध्ये पुन्हा सर्व तपासण्या झाल्या, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. औषधे, घ्यायची काळजी, आहार याबद्दल सर्व माहिती दिली गेली. सकाळ पासून बापटांचे नातेवाईक भेटून जात होते. शुभेच्छा देत होते. बाई पुन्हा पुन्हा या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्सना, नर्सेसना, वॉर्डबॉयना धन्यवाद देत होत्या. त्या सर्वांनी बाईंची खूपच काळजी घेतली होती. ऑपरेशन करणारे डॉक्टर पाच वाजता यायचे होते तेव्हा त्या त्यांचे आभार मानणार होत्या.

संध्याकाळचे पाच वाजले आणि हॉस्पिटलसमोर डॉक्टरांची गाडी उभी राहीली. डॉक्टरांची पत्नीपण समवेत होती. दोघ दुसर्‍या मजल्यावरील हार्ट डिपार्टमेंटमध्ये आली. डॉ. रानडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दोन मिनिटे बोलून डॉक्टर आणि त्यांची पत्नी डॉ. रानडेंसह बापट बाईंच्या रुममध्ये आली. रुममध्ये बापट साहेब, त्यांची बहिण, भाचा-भाची सर्वजण होते. डॉक्टर आत आले आणि त्यांनी हळूच खिशातून काहीतरी बाहेर काढले. सर्वजण डॉक्टरांकडे पाहत होते. एवढ्यात डॉक्टरांनी बासरी आडवी करत ओठाकडे नेली आणि बासरीतून मधुर सुर बाहेर पडू लागले. रुममधील सर्व मंडळी डॉ. रानडे, नर्स, वॉर्डबॉय सर्वजण हे काय नवीन डॉक्टरांचं बासरी वादन असं म्हणत असताना, बापट बाई डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी हात अर्धवट वर घेत असताना बासरी तोंडात घेतलेले डॉक्टर त्यांच्या समोर आले. बाईंच्या डोळ्यासमोर अचानक मालवण, फोकांड्याचा पिंपळ, बासरीसाठी हट्ट धरणारा कृष्णा आठवला आणि तीच बासरी, बासरी तोंडात धरण्याची तीच पध्दत, तसेच वाजवलेले ते सुर कानात पडताच बापट बाई ओरडल्या –

कृष्णा ! कृष्णा !!

रडत रडत डॉक्टर त्यांच्या पायावर कोसळत म्हणाले – होय बाई, मीच तुमचा कृष्णा.

गंगा-जमुना डोळ्यातून वाहणार्‍या बापट बाई त्यांचे तोंड हातात धरत म्हणाल्या, ‘‘कुठे होतास रे बाळा ? वेड्यासारखी आयुष्यभर शोधत राहिले रे कृष्णा ! काही न सांगता गेलास रे बाळा’’

गदगदलेल्या स्वरात डॉक्टर बोलू लागले – ‘‘होय बाई, तुमच्या कृष्णाला क्षमा करा किंवा तुम्ही क्षमा करावी म्हणूनच एवढ्या वर्षांनी तुम्ही याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलात. बाई सिनेमात असे योगायोग असतात, भाऊ-भाऊ अनेक वर्षांनी भेटतात, आई मुलाची ताटातुट होते, पुन्हा भेटतात आपण अशा सिनेमांची चेष्टा करतो, पण खरोखरच असा योगायोग माझ्या आयुष्यात येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, किती छान योगायोग हा !’’ डॉक्टर रडत रडत पुढे म्हणाले – डॉ. रानडे त्या दिवशी ऑपरेशन करताना पेशंटच्या चेहर्‍याकडे लक्ष गेले आणि मी दचकलोच. माझी आईच ऑपरेशन टेबलावर होती. ज्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम, वात्सल्य काठोकाठ भरलेलं आहे, तेच हृदय मला फाडायचं होतं. सुरुवातीला माझे हात थरथरु लागले. मी इमोशनल होत गेलो. पण डॉक्टर रानडे तुम्ही मला टोचलत आणि माझ्या लक्षात आलं समोर ऑपरेशन करायचं आहे ते माझ्या आईचं नव्हे पेशंटचं. पेशंट आपलं शरीर आम्हा डॉक्टरावर विसंबून स्वाधीन करतो, त्या पेशंटला मला बरं करायचयं, आणि मग मी सफाईने ऑपरेशन केलं.’’

      बापट बाई आणि त्यांच्या पायाकडे बसलेले शिंदे पाहून इतरांच्या काही लक्षात येत नव्हते. कोण आई ! कोण बाई ? एवढ्यात तिथे बसलेले बापट साहेब पुढे झाले. त्यांनी कृष्णाला ओळखले. ‘‘कृष्णा ! आम्ही किती शोधलं तुला. या तुझ्या बाईंना वेड लागायचं बाकी होतं, तू निदान एखादं कार्ड तरी पाठवायचं, कुठं होतास तू?’’

‘‘मी एक कार्ड पाठवलं होत काका, पण ते कार्ड पत्ता चुकीचा म्हणून परत आलं, मग मी बारावी पास होऊन मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळाली हे सांगायला मालवणला गेलो होतो तेव्हा तुम्ही मालवण सोडलं होतं.’’

बापट काकांनी बापट बाईंच्या पायाकडे बसलेल्या डॉ. शिंदेना वर उचलल आणि बाईंच्याच बाजूला बसवलं.

‘‘खूप आनंद झाला रे कृष्णा, अवि अमेरिकेला असतो. या पुण्यात हे आणि मी. गेली काही वर्षे मधुमेह आणि प्रेशरने मला त्रस्त केलं. मला कंटाळा येतो रे कृष्णा, एक सारखी मालवणची आठवण येते. आपली शाळा, ते मुख्याध्यापक सामंत, तो सहावीचा वर्ग आणि शेवटच्या बाकावर निश्चल डोळ्यांनी समोर पाहणारा कृष्णा.’’

डॉ. शिंदे बोलू लागले – ‘‘डॉ. रानडे, आज तुम्हाला हा प्रसिध्द हार्टसर्जन डॉ. शिंदे दिसतो तो या माऊलीमुळे. माझी आई मला लहानपणीच सोडून गेली तेव्हा मी सैरभैर झालो होतो. तेव्हा या माऊलीने आपल्या तोंडातला घास मला भरवला. आपल्या मुलासारखंच मला वाढवलं. पण मी एवढा कृतघ्न की यांना न सांगता बाबाबरोबर गावी गेलो. पण बाई, काका माझा नाईलाज झाला हो, मी होतो केवढा जेमतेम अकरा वर्षाचा॰ आमच्या गाववाल्यांनी माझ्या बापाच लग्न ठरवलं आणि माझा बाप हुळहुळला. काही विचार न करता मालवण सोडूया म्हणाला, मी नाही म्हटलं तेव्हा मला बेदम मारलं आणि चार पाच भांडी गोणत्यात घालून एसटी पकडली. या परिस्थितीत मी पोटाकडून दडवून ठेवली ती ही बासरी. फोकांड्याच्या पिंपळाकडे आलेल्या एका बासरी विक्याकडून माझ्या मनात भरलेली ही बासरी या मातेने मला घेऊन दिली. तशीच बासरी यांच्या मुलाला अवि ला पण हवी होती. पण त्या बासरी विक्याकडे अशी एकच बासरी होती, अवि हट्ट करु लागला तेव्हा स्वतःच्या मुलाला अविला दोन चापट्या देऊन ही बासरी मला देणारी ही माझी माता. मालवण सोडताना ती बासरी तेवढी मी बरोबर घेतली.

      आमच्या गावाकडे आल्यानंतर बाबाचे लग्न झाले आणि तो चेकाळलाच. माझ्या नवीन आईला मी नकोच होतो. पुन्हा एकदा दोन वेळच्या खाण्याची पंचाईत. पण बाबाने एक मोठी गोष्ट केली माझ्यासाठी॰ सातार्‍यात रयत शिक्षण संस्थेत नेऊन माझा दाखला दिला आणि आयुष्यात दुसर्‍यांदा मला आधार मिळाला. रयत संस्थेत वसतीगृहात राहिलो आणि शाळेत शिकलो. या संस्थेने मला घडवले. इथेही चांगला अभ्यास केला. शाळेत सतत पहिला येत राहिलो. या सातारा शाळेचे मुख्याध्यापक कदम साहेब यांनी प्रोत्साहन दिले. दहावी, बारावीत बोर्डात आलो आणि या कदम साहेबांमुळे मेडिकलला गेलो. या कदम साहेबांनी आपली मुलगी मला दिली आणि तीच माझी पत्नी डॉ. जयश्री. बाई ही तुमची सून जयश्री.

जयश्री येऊन बाईंच्या बाजूला बसली. बापट बाईंनी जयश्रीला जवळ घेतले. किती गोड सून माझी ! मी अविच्या मागे लागले आहे, लग्न कर लग्न कर, पण अजून तो मनावर घेत नाही. पण कृष्णा तू मला पहिली सून दिलीस.

बाई किती वर्षांनी तुम्ही दिसलात. आज खरं तर हवी तशी चांगली बासरी मी विकत घेऊ शकतो पण आजही रोज नियमितपणे हीच बासरी वाजवतो तुम्ही घेऊन दिलेली. ही बासरी माझ्यासाठी अमूल्य आहे आणि माझ्या आईने ती मला घेऊन दिली आहे.

डॉ. रानडे आणि हा हॉस्पिटल स्टाफ, तुम्हाला कदाचित हा फॅमिली ड्रामा वाटत असेल तर तसे नाही. माझ्या डोळ्यात आलेले हे अश्रू अस्सल आहेत. मोत्यासारखे.

‘‘होय रे कृष्णा, यात खोटेपणा कसा असेल. आणि कृष्णा मी तुझ्यासाठी फार केल असं समजू नकोस, मुख्याध्यापक सामंत म्हणाले होते, ‘‘बाई या पोरक्या पोराची आई होण्याचा प्रयत्न करा, तसा मी प्रयत्न केला.’’

‘‘प्रयत्न केला नाही, आईच झालात तुम्ही बाई.’’

‘‘होय रे कृष्णा, मी आईच तुझी.’’

‘‘तर मग बापट काका, आई तुम्ही आता माझ्या म्हणजे आपल्या घरी यायचं. तसं तुम्हाला या ऑपरेशननंतर डॉक्टरची गरज आहेच. आम्ही दोघंही तुमची काळजी घेऊ आणि आपल्या घरात मला आई बाबा हवेत. जयश्रीला पण सासू-सासरे हवेत. तेव्हा नाही म्हणू नका. आईबाबा आपल्या घरी चला.

‘‘कृष्णा आम्ही येतो तुझ्या बरोबर नाहीतरी आम्ही पुण्यात दोघंच राहून कंटाळलोय, आम्ही आपल्या घरी येऊ आणि कृष्णा, जयश्री माझी एक इच्छा आहे, आपण लवकरच मालवणला जाऊया. मला ती आपली शाळा, तो मालवणचा समुद्र, तो फोकांड्याचा पिंपळ, ते भरड आणि तू शाखेत जायचास ते नारायण मंदिर सर्व डोळे भरुन पहायचं आहे.’’

‘‘होय आई, मला पण मालवणला जायची केवढीतरी घाई झाली आहे. आणि आईबाबा नुसतं मालवणात जायचं नाही, मालवणात आपलं घर बांधायचं.’’

‘‘होय कृष्णा माझी पण इच्छा आहे, आयुष्याची अखेर त्या मालवणात व्हावी. त्या मालवणच्या मातीत माझ्या अस्थी विरघळाव्या.’’

‘‘होय आई, चला आपल्या घरी.’’ 

डॉ. शिंदेनी खूणा करताच बापट बाईंच्या बॅगा, औषधे वॉर्डबॉयने डॉक्टरांच्या गाडीत नेऊन ठेवले आणि डॉ. शिंदे आणि जयश्री शिंदे आई-बाबांना सांभाळत गाडीकडे घेऊन गेले. गाडी सुरु झाली आणि ड्रायव्हरने टेप चालू केली. बाबुजी सुधीर मोघेंचं गाण आळवत होते.  

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश….

दरी खोर्‍यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश….

एक प्रकाश प्रकाश…..

 –  समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

( मागील भागात आपण पहिले – बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या. आता इथून पुढे)

‘‘कांबळी, सातवीत कृष्णा शिंदे नावाचा मुलगा होता त्याचा दाखला कोणी नेला काय?’’‘‘हो बाई, कृष्णाचा बाबा आला होता स्वतः’’

‘‘कुठल्या शाळेत कृष्णाचे नाव घालणार, काही म्हणत होते ?’’

‘‘नाही, निश्चित सांगितले नाही. पण कराडच्या बाजूला त्यांच गाव आहे लहानस, तेथे तो शाळेत जाईल असं ते म्हणत होते.’’

‘‘हो का ? अहो मी नेमकी पुण्याला गेलेली दिड महिना पुण्यात होते. अविचे बाबा तिकडे असतात ना, बर मग येते मग, त्याच्याबद्दल काही कळलं, पत्र वगैरे काही आलं तर कळवा मला.’’

‘‘हो बाई’’ 

बाईंना कृष्णा नेमका कुठे गेला काही कळेना. त्यांनी नारायण मंदिराकडील शाखेच्या दादाकडे चौकशी केली. त्याला पण काहीच माहित नव्हत. कृष्णा त्यालापण न सांगता गेला होता.

मालवणात जोरदार पाऊस सुरु झाला आणि शाळा सुरु झाल्या. बापट बाई अविसमवेत शाळेत जाऊ लागल्या. रोज शाळा सुरु होण्यापूर्वी त्या अविसाठी नाश्ता आणत तशा अजून एक कृष्णासाठीपण. मग त्यांच्या लक्षात यायचं कृष्णा नाही येणार आता. शाळेत जाताना त्यांना नेहमी डाव्या उजव्या बाजूकडे पाहत जायची सवय. उजव्या बाजूला अवि असायचा डाव्या बाजूला कृष्णा. पण आता डाव्या बाजूला कोणीच नसायचं. फोकांड्याच्या पिंपळाकडे त्यांच लक्ष जायचं. येथेच तो बासरीवाला बासर्‍या विकायला आलेला आणि कृष्णाची नजर बासरीवर पडलेली. त्या आठवीच्या वर्गात जायच्या तेव्हा पुढील दुसर्‍या बेंचवर त्यांच लक्ष जायचं. तिथे दुसराच मुलगा बसलेला असायचा.

कृष्णा एखादं पोस्टकार्ड पाठवेल म्हणून बाई वाट पाहत असायच्या. पण कृष्णाचं कार्ड, पाकिट काही आलचं नाही. बाईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. मधुमेह कमी अधिक होणे, ब्लडप्रेशर सतत वर, चिडचीड सुरु झाली. शेवटी अविच्या बाबांनी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि दिवाळीच्या सुमारास बापट बाईंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अवि आणि त्या पुण्याला आल्या. पुण्यात आल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलमधून तपासणी करुन बाईंना थोड बरं वाटलं. आता बापट बाई सकाळीची योगासनं, हास्यक्लब, चालणं, दुपारचा आराम, संध्याकाळी नाटक, सिनेमा, गाण्याचा कार्यक्रम, महिला मंडळ यात रमू लागल्या.

वीस वर्षानंतर…. 

अविचे बाबा बँकेतून निवृत्त झाले. अविने अमेरिकेत एम.एस. केलं आणि आता तो तिकडेच नोकरी करतोय. अजून तो अविवाहित आहे. वर्षातून एकदा तो भारतात येतो. बापट बाई त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या पण तो हसण्यावरी नेतो. बापट बाईंची तब्येत मात्र फारशी चांगली नाही. तरुणपणी मधुमेह जडल्याने त्या एवढ्यात थकल्या. ब्लड प्रेशर सतत वर खाली होण, धाप लागणं, झोप न लागणं अशा सतत तक्रारी सुरु झाल्या. दिवसाला १५-१६ गोळ्या, श्वासासाठी इनहेलर सुरु होतं. त्यात त्यांना नैराश्याने पकडलं होतं. कशातही लक्ष लागत नव्हतं. अधून मधून त्यांना मालवण शाळेचे दिवस आठवत. आयुष्यात मनापासून रमेल ते मालवणातच असे त्यांना वाटे. असच एका संध्याकाळी बापट आणि बापट बाई बागेत फेर्‍या मारत होते. फेर्‍या मारता मारता बापट बाई खाली बसल्या आणि धापा घालू लागल्या. बापट बाईंना उठताच येईना. बापटांनी तिथल्या माळ्याला बोलावून बाईंना रिक्षात घातले आणि हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टरनी एन्जीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एन्जीओग्राफी नंतर लक्षात आले हृदयात नव्वद टक्के ब्लॉकेजीस आहेत त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.

बापट काळजीत पडले. मुलगा अमेरिकेत पण बापटांची बहिण पुण्यातच होती. भाचा भाची म्हणाले – मामा घाबरु नको. आम्ही येथेच आहोत, ऑपरेशन करुन घेऊया. हॉस्पिटलमधील डॉक्टरनी सर्व तयारी केली. ऑपरेशन करण्यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. त्या डॉक्टरना बाईंचे सर्व रिपोर्ट पाठवले गेले. एन्जीओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरनी ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली.

पंधरा ऑगस्ट हा ऑपरेशनचा दिवस ठरला. सकाळी सात वाजता ऑपरेशन सुरु होणार होते. आदल्या दिवशी पुन्हा एकदा बापट बाईंची सर्व तपासणी करुन रिपोर्ट ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरना पाठविले गेले. सकाळी सहा वाजता डॉक्टर आले. त्यांना या हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री रानडे मदत करणार होत्या. डॉक्टर आल्या आल्या डॉ. रानडे यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या बॅगमधून डॉक्टरनी एक लहानसा फोटो काढला आणि टेबलावर ठेवला. डॉ. रानडेंना माहित होते की, हे डॉक्टर जेव्हा जेव्हा ऑपरेशन करायला येतात तेव्हा हा फोटो नेहमी काढून टेबलावर ठेवतात, त्याला नमस्कार करता आणि मगच ऑपरेशन सुरु करतात.

सर्व तयारी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर, डॉ. रानडे आणि नर्स स्टाफ ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑपरेशन सुरु करण्याआधी डॉक्टरनी सहज बेशुध्द पेशन्टच्या चेहर्‍याकडे पाहिले आणि ते दचकले. त्यांनी पेशंटच्या रिपोर्टवरचे नाव पाहिले. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव भराभर बदलत गेले. डॉक्टरनी एक मिनिट डोळे मिटले. कसलेचे ध्यान केले आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. डॉ. रानडे सोबत होत्याच. त्यांनी पाहिले आज या डॉक्टरांचे हात थरथरत आहेत. डॉ. रानडेंनी या डॉक्टरांच्या हाताला हळूच टोचले. सावध केले. डॉ. रानडे विचार करायला लागल्या नेहमी सफाईने ऑपरेशनची सुरुवात करणारे हे डॉक्टर आज असे नर्व्हस का झाले ? पण लगेचच डॉक्टर सावरले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सफाईदार ऑपरेशन केले.

सुमारे पाच तासानंतर सर्व ऑपरेशन मनासारखे झाले. आणि अत्यंत समाधानाने सर्व डॉक्टर्स बाहेर आले. डॉ. रानडेंच्या केबिनमध्ये आल्यावर ऑपरेशन केलेल्या डॉक्टरनी छोटा फोटो बॅगेत ठेवला आणि ते पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला गेले. डॉ. रानडे पाहत होत्या. हे डॉक्टर स्वतः पेशन्टच्या नातेवाईकांना कधी भेटत नाहीत पण आज कसे काय? याचे आश्चर्य वाटत असताना डॉक्टर बापट काकांकडे गेले आणि त्यांच्या हातावर थोपटत थोपटत ऑपरेशन छान झाले कसलीच काळजी करु नका, पंधरा दिवस त्या फक्त हॉस्पिटलमध्ये राहतील असे सांगून त्यांची काळजी कमी केली.

आय.सी.यु.मधील उत्तम उपचार, फिजीओ उपचार, औषधे यांनी बापट बाईंना बरं वाटायला लागलं. आठ दिवसांनी आय.सी.यु. मधून बाहेर काढून त्यांना स्पेशल रुममध्ये घेतले. आता स्वतः बापट किंवा बापटांची बहिण, भाचरे सर्वजण बाईंना भेटू लागले. अमेरिकेहून अविचा रोज व्हिडीओ कॉल येत होता. ऑपरेशनला जवळ जवळ पंधरा दिवस झाले आणि बापट बाईंची तब्येत व्यवस्थित दिसू लागली. त्यांच्या छातीतील दुखणे कमी झाले. श्वासोश्वास व्यवस्थित चालू झाला. शुगर कंट्रोलमध्ये आली. ब्लडप्रेशर नॉर्मल झाले. बापट बाईंनी थोडा थोडा चालण्याचा व्यायाम सुरु केला आणि शेवटी बापट बाईंच्या डिस्चार्जचा दिवस उजाडला. सोमवार ८ सप्टेंबर रोजी बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार होता. ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला.

बासरी क्रमश: ४

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.)

कृष्णा घरी आला. शाळेची बॅग घरात टाकून नारायण मंदिराकडे आला. त्याठिकाणी दादाभोवती बरीच मुलं जमली होती. हात छातीजवळ घेऊन मुलं म्हणत होती –

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे 

कृष्णा पण त्या मुलांसमवेत छातीजवळ हात घेऊन प्रार्थना म्हणू लागला. त्या मुलांसमवेत कृष्णा तल्लीन होऊन दादाचे म्हणणे ऐकत होता. काळोख पडू लागला तशी मुलं आपआपल्या सायकली घेऊन घरी निघाली. दादापण आपली सायकल घेऊन घरी जाण्याच्या तयारीत असताना कृष्णा पुढे झाला. त्याने दादाला आज बाईंनी घेऊन दिलेली बासरी दाखवली.

‘‘दादा, ही बघ माझ्या बापट बाईंनी बासरी घेतली.’’

‘‘अरे व्वा कृष्णा ! छानच आहे.’’

‘‘पण दादा, मला बासरी वाजीवता येईना, तुला येत का ?’’

‘‘थोडी थोडी येते’’

‘‘मग मला शिकीव नां’’

दादाने बासरी हातात घेतली आणि बासरीचे सहा होल दाखवले. वरच्या तीन होलावर डाव्या हाताची बोट धरुन प्रत्येक होलावरील एक एक बोट कमी करत – सा रे ग म कसे वाजवावे हे त्याने दाखवले. बासरी फुंकावी कशी हे पण दाखवले आणि रोज बाकीची मंडळी घरी गेली की बासरी शिकवायचे मान्य केले. कृष्णा घरी गेला आणि दादाने दाखविल्या प्रमाणे बासरीवर सारेगम वाजवू लागला. बर्‍याच वेळा सराव केल्यानंतर त्याला थोडा थोडा सारेगम वाजवायला येऊ लागला. दुसर्‍या दिवशी दादाने खालचे तीन होल हळू हळू उघडून सारेगम उलट कसं वाजवाचं हे शिकवलं आणि कृष्णाचा हा रोजचा कार्यक्रम झाला. शाखेत जायचं, शाखा संपली की दादाकडून बासरी शिकायची.

एका महिन्यात कृष्णाने बापट बाईंना बासरी वाजवून दाखवली तेव्हा त्यांना कमाल वाटली. अविला काहीच वाजवता येत नव्हते. अविने बासरी आणली ती कपाटावर ठेवली ती परत हातातपण घेतली नाही. सहामाही परीक्षेत कृष्णा वर्गात तिसरा आला. बाईंना आनंद झाला. पाच महिन्यापूर्वी वर्गात तोंड न उघडणारा कृष्णा आता वर्गात सर्वांत मिसळू लागला.

दिवाळीत अवीचे बाबा पुण्याहून आले तेव्हा त्यांनी अविसाठी टीशर्ट, फुलपॅन्ट आणली तशीच कृष्णासाठी पण आणली. अर्थात बापट बाईंनी पत्राद्वारे आपल्या नवर्‍याला तसं कळवलं होत. बापट काकांनापण कृष्णा आवडला. त्याचा अभ्यास, त्याची बासरी याच्या ते प्रेमात पडले. शाळेच्या गॅदरींगमध्येपण कृष्णाने बासरी वाजवली. त्याची सर्वांनी प्रशंसा केली. वार्षिक परीक्षेत कृष्णा संपूर्ण वर्गात पहिला आला. रिझल्ट नंतर मुख्याध्यापक सामंत सरांनी बापट बाईंना बोलावून घेतले.

‘‘बापट बाई, तुम्ही कमाल केलीत, सात-आठ महिन्यापूर्वी ज्या मुलाची तुम्ही काळजी करत होतात तो मुलगा वर्गात पहिला आला.’’

‘‘हो सर, मी खूप आनंदात आहे. तुम्ही म्हणाला होतात – त्याच्या बाई नव्हे आई व्हा, मी आई होण्याचा प्रयत्न केला.’’

‘‘हो बाई, तुम्ही यशस्वी झालात, मी पाहतोय रोज शाळेत येताना जाताना तो तुमच्या बरोबर असतो. माझ्या माहिती प्रमाणे मधला डबा सुध्दा तुम्हीच देता, हे पुण्य आहे बाई.’’ 

थँक्यू सर म्हणत बापट बाई बाहेर पडल्या. आज सामंत सरांनी त्यांच कौतुक केलं याच त्यांना समाधान वाटलं. कृष्णा सातवीत गेला. अवि पाचवीत गेला. कृष्णाचे रोज लवकर बापटांकडे येणे, न्याहारी, मग बाई आणि अवि समवेत शाळेत जाणे, दुपारी बापट बाईंच्या घरचा डबा, सायंकाळी परत घरी गेल्यावर शाखेत जाणे आणि मग बासरीची प्रॅक्टीस. सातवीतपण कृष्णा पहिला आला. शाळाचा रिझल्ट लागला आणि बापट बाई अविसह पुण्याला गेल्या. पुण्यात अविच्या बाबांनी लहानसा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तूपूजा आणि बाईंची तब्येत तपासणीपण करायची होती. बाई कृष्णाला म्हणत होत्या – तू पण चल आमच्या बरोबर. पण कृष्णा म्हणाला – ‘‘बाबा येकटा आय इथं, मी इथं राहतो तुमी जावा’’

बापट बाईंना हल्ली लवकर थकवा येत होता. पुण्यात केलेल्या तपासणीत मधुमेह निघाला. बाईंच्या माहेरी आईलापण मधुमेह होता. डॉक्टरांनी खाण्यावर बंधने आणली आणि औषधे लिहून दिली. दिड महिना पुण्यात राहून बापट बाई आणि अवि पुणे मालवण एसटीने मालवणात आले. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. मालवणात थोडा थोडा पाऊस सुरु झाला होता. बापट बाई बसमधून उतरल्या, बाईंनी ब्रेड आणि दूध घेतले आणि दोघे भराडावर बिर्‍हाडी आले. दार उघडून आत आल्या आल्या बाई अविला म्हणाल्या – अवि आंघोळ कर आणि सायकल घेऊन कृष्णाकडे जा. कृष्णाला घेऊन ये. तो पर्यंत मी आंघोळ करते आणि तुमच्यासाठी खाणे करते. बाईंनी नळावरुन पाणी भरले आणि गॅसवर पाणी गरम करुन अविला दिले. अविने आंघोळ केली आणि सायकल घेऊन कृष्णाच्या घरी निघाला. बाहेर पावसाची भूरभूर सुरु होती. तसाच भिजत अवि गेला आणि सात-आठ मिनिटात परत आला. बाईंचे आत-बाहेर सुरु होते. कधी एकदा कृष्णाला पाहते असे झाले होते त्याला. अवि सायकल लावून घरात आला तो सांगत – ‘‘अगं आई त्या घरात दुसरेच कोणीतरी राहत आहेत. कृष्णा आणि त्याच्या बाबांनी हे घर सोडले आणि ते गावाला गेले.’’ बाई आश्चर्यचकित झाल्या.

‘‘काय ? पण कुठल्या गावाला ?’’

‘‘ते माहित नाही, पण त्या घरात आता माने म्हणून रहायला आलेत, ते म्हणाले शिंदेनी ही जागा सोडली आणि मग आम्ही इथे रहायला आलो.’’

बाईंना वाटले मालवणात दुसरीकडे रहायला गेले असतील किंवा आजूबाजूच्या गावात कुठेतरी गेले असतील. दोन वर्षापूर्वी देवबाग सोडून मालवणात कसे आले तसे. पण बाईंना चैन पडेना. थोडा पाऊस कमी झाला तसा त्या म्हणाल्या, ‘‘अवि चल मी येते तुझ्याबरोबर आपण परत एकदा कृष्णाच्या घरी जाऊया.’’ बाई आणि अवि छत्री घेऊन चालू लागले. नारायण मंदिराजवळ बाई आल्या. चाळीच्या खाली मालक भेटले. त्यांना विचारले – ‘‘ओ शिंदे कुठे गेले माहिती आहे का?’’

मालक म्हणाले – ‘‘शिंदे त्यांच्या गावाक गेले. शिंदे म्हणा होते तेंचा लगीन ठरला हा. त्यांच्या गावच्या लोकांनी हेंचा दुसर्‍यांदा लगीन ठरल्यानी. म्हणून ते झिलाक घेवन गेले. आता ते थयसरच रवतले. झिलाक थयल्याच शाळेत घालतले असा म्हणा होते.’’

‘‘क्काय ?’’ बापट बाई चित्कारल्या.

‘‘ पण कुठल्या शाळेत ?’’

‘‘ता म्हायत नाय ओ, कराड सातारा भागात आसा खयचा तरी खेडेगांव, आता येवचे नाय ते. हयला तेलयाकडचा कामपण सोडल्यानी तेनी’’

‘‘हो का, बरं बरं. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला कळवा हां ! मी येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे – बापट. बरे येते मी.’’ 

बापट बाई आणि अवि बाहेर पडल्या. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरु झाला. बाई नारायण मंदिरात येऊन बसल्या. अवि एकसारखा कृष्णा केव्हा येईल गं म्हणून विचारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत बापट बाई पावसाकडे पाहत विचार करत होत्या.

कुठं असेल हा पोरगा ? कुठल्या शाळेत, कुठल्या गावात ? शिंदेंनी परत लग्न केलयं तर ह्याला धड जेवणतरी मिळत असेल काय? शाळा सुरु असेल ना याची ? एवढा हुशार मुलगा वाया जायचा. विचार करता करता बाईंच्या छातीत थोड थोड दुखू लागलं. त्यांनी अविला एखादी रिक्षा मिळते का पहायला सांगितलं. रिक्षा मिळाली आणि बाई आणि अवि घरी आले. घरी आल्यावर सुध्दा बाईंना अस्वस्थ वाटायला लागले. त्या त्यांच्या घराजवळ असलेल्या झांटयेच्या दवाखान्याकडे गेल्या. डॉक्टरनी त्यांना तपासलं.

‘‘बाई ! ब्लडप्रेशर फार वाढलयं, बर झाल तुम्ही लगेच आलात. आता मी इंजेक्शन देतो आणि एका महिन्याच्या गोळ्या देतो. रोज सकाळी एक गोळी घ्यायची. कसला विचार करताय का?’’

‘‘तसं नाही, आज सकाळीच प्रवास करुन आले ना !’’

‘‘ठिक आहे, काळजी घ्या. दगदग करु नका. आठ दिवसांनी पुन्हा दाखवायला या.’’ 

बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या.

 क्रमश: भाग – ३

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – बाईंनी कृष्णाला दाखवले -‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’ आता इथून पुढे )

बापट बाईंनी पाहिलं कृष्णा जवळ पाण्याची बाटली नव्हती. बाईंनी आपली बाटली कृष्णाला दिली.

‘‘पी हे पाणी, भरपूर पाणी प्यायला हवं, आणि वर्गात नुसतं बसून रहायचं नाही. इतर मुलांबरोबर थोडं बाहेर जायचं, बाथरुमला जाऊन यायचं, कळलं का ?’’

अस म्हणत बाईंनी डबा आवरला आणि त्या अविच्या हाताला धरुन बाहेर गेल्या. कृष्णा विचार करु लागला.

‘‘माय व्हती तवा डबा दित होती, आज खूप दिसानी चांगलं चुंगलं खायाला मिळालं, सांच्याला बाबा दमून येतो नी भाकरी बडवतो. भाजी हाटेलातून आणतो. कवातरी भात शिजवतो. मग भात आणि भाजी खायची. अस जेवण मला रोज रोज कुट मिळाया ? पोटात अन्न गेलं तर मी शिक्षण घेईन. अभ्यास करेन. पण मला मायची लय आठवण येते. किनीची पण आठवण येते. मग काय करायचं फक्त रडायचं. माय कुठं नाहीशी झाली, किनी नाहीशी झाली.’’ कृष्णाला आईच्या आणि बहिणीच्या आठवणीने गदगदुन आलं.

पाच वाजता शाळा सुटली तसा कृष्णा वर्गाबाहेर पडला. गेटच्या बाहेर पडणार एवढ्यात बापट बाई अविचा हात धरुन जवळ आल्या.

‘‘कृष्णा थांब, सोबत जाऊ. कुठं राहतोस तू?’’

‘‘रामेश्वराच्या देवळापाशी, तिथं एक चाळ हाय, तिथं र्‍हातो आमी.’’

‘‘बरं बरं, आम्ही पण त्याच बाजूला रोज जातो. मी भरडावर राहते. तुला माझं घर दाखवते. शाळेत जाताना थोडा लवकर ये. मग आपण एकदमच शाळेत जाऊ.’’

‘‘व्हयं’’ असं कृष्णा म्हणाला. वाटेतील एका बेकरीकडे थांबून बाईंनी दोन बिस्किट पुडे विकत घेतले. कृष्णाच्या हातात ते पुडे ठेवत म्हणाल्या, ‘‘बाबा किती वाजता घरी येतात?’’

‘‘लई रात झाल्यावर येतो.’’

‘‘मग तोपर्यंत काय करतोस?’’

‘‘काय न्हाई, बसून र्‍हाहतो.’’

‘‘असं बसून राहू नये कृष्णा, या पुड्यातील बिस्किटे खा आणि तिथे मुलं खेळत असतील ना तेथे खेळायला जा. उद्या मी तुला सहावीची पुस्तके आणि वह्या घेऊन देणार. रोज शाळेत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पुरा करायचा आणि मला दाखवायचा.’’

भरडावर आल्यावर बाई एका चपलाच्या दुकानाकडे थांबून त्यांनी कृष्णासाठी चप्पल घेतले. कृष्णा मनात म्हणाला – वर्गातल्या सर्वांच्या पायत चप्पल हाई पण माझ्या पायात काही नाही. आता सहावीत गेल्यावर बाईंनी चप्पल घेतलं. आता शाळंत जाताना मजा येईल.’’

भरडावर गेल्यावर बाईंनी आपले घर दाखवले. बाई म्हणाल्या –

‘‘ही सरनाईकांची चाळ, पुढं त्यांच औषधं दुकान आहे. मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं मग आपण एकदम शाळेत जायचं, कळलं ?

‘‘व्हयं’’ म्हणत कृष्णा नवीन चप्पल घालून ऐटीत घरी गेला. घरी गेल्यावर कृष्णाने पिशवी खोलीत टाकली आणि बिस्किटाचा पुडा फोडला. बिस्किटे खात खात तो नारायणाच्या देवळाजवळ आला. तिथे एक झेंडा उभा करुन खाकी हाफ पॅन्ट घातलेली मुलं झेंड्याभोवती बसली होती. मोठा दादा त्यांना गोष्ट सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्यांनी वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हटलं. तो मोठा दादा कृष्णाकडे पाहत म्हणाला –

‘‘कुठ राहतोस रे तू ?’’

‘‘इथं देवळाच्या मागं’’

‘‘बरं, नाव काय तुझं?’’

‘‘कृष्णा, कृष्णा शिंदे’’

‘‘हा. तर कृष्णा उद्या शाळा सुटली की इथं देवळापाशी ये. आमची इथे शाखा असते. ही मुले आम्ही सर्व इथं जमतो. रोज इथं यायचं.’’

‘‘हूं, येतो साहेब’’

‘‘साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं….’’

‘‘हा दादा उद्या येतो.’’

कृष्णाला कोण आनंद झाला. आज दुपारी जेवण मिळालं, चप्पल मिळाली, बिस्किट पुडा मिळाला, आणि आता हे दादा आणि सवंगडी मिळाले. कृष्णाने घरी येऊन दिवा लागला. एकच बल्ब घरात होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आता आई गेली पण पांडुरंग आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत सांगितलेला अभ्यास तो वहीत उतरवू लागला.

सकाळी लवकर उठून विहीरीवर दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. कृष्णाच्या बाबाने काल येताना पाव आणला होता. चहात पाव बुडवून खाल्यावर बाबा कामावर गेला. आणि कृष्णा नवीन चपला घालून भरडाच्या दिशेने चालू लागला. बापट बाईंच्या घरी तो बाहेर उभा राहिला. अवि बाहेरच बसला होता. अभ्यास करत होता. त्याने आईला आत जाऊन कृष्णा आल्याचे सांगितले. बापट बाई बाहेर आल्या. कृष्णाला हात धरुन आत घेतलं. पटकन आत जाऊन दोन थाळीत दोन दोन चपात्या आणि दुधाचे दोन कप बाहेर आणले. आणि कृष्णासमोर चपाती दूध ठेवून खायला सुरुवात करा असं म्हणत आपली तयारी करायला आत गेल्या. कृष्णा भिरभिरत्या नजरेने बाईंचे घर पाहत होता. बाईंचा आणि बाईंच्या नवर्‍याचा एक फोटो दिसत होता. एक कपाट होतं. त्याच्यावर रेडिओ ठेवला होता. एक कॉट होती. त्यावर गादी गुंडाळलेली दिसत होती. दोन चटया गुंडाळलेल्या होत्या. कृष्णाने असं चटपटीत घर पाहिलं नव्हतं. कृष्णाने अविकडे पाहत चपाती दुधात बुडवून खाल्ली. अविप्रमाणेच अंगणात नळावर जाऊन ताटली कप धुतला आणि घरात नेऊन ठेवला. तो पर्यंत बाईंची शाळेत जायची तयारी झाली होती. बाई, अवि आणि कृष्णा तिघेही शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई नेवाळकरांच्या दुकानात गेल्या. दुकानातून कृष्णाच्या साईजच्या दोन पॅन्टी, बनियन, दोन शर्टस् दाखवायला सांगितले. कृष्णा भिरभिरत्या नजरेने एवढं मोठं कपड्याचं दुकान पाहत होता. बाईंनी कृष्णाला कपडे घेतले आणि पुढे खंडाळेकरांच्या दुकानातून सहावीची पुस्तके एक डझन वह्या, दोन पेन, पेन्सिल, कंपासबॉक्स आणि हे सर्व ठेवण्यासाठी स्कूलबॅग विकत घेतली. कृष्णाला खूपच आनंद झाला. आपल्या बाबाला एवढी वह्या पुस्तकं घ्यायला कधीच जमली नसती याची त्याला कल्पना होती.

आता कृष्णा सर्व तासांना व्यवस्थित लक्ष देऊ लागला. सर्व तासांचे शिक्षक त्याच्यावर खूश होते. त्याचा अभ्यास चांगलाच होता. शाळा सुटली की तो बापट बाई आणि अवि बरोबर घरी जात होता. कृष्णाचा बाबा कृष्णाला म्हणाला -‘‘आरं नव चप्पल, पुस्तकं, कापडं देतं तरी कोण ?’’

कृष्णाने शाळेत बापट बाई आहेत त्यांनीच हे सर्व दिलं असं सांगितलं.

तेव्हा कृष्णाचा बाप म्हणाला, – ‘‘आरं ही बाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी समज. ती सांगल तसं वागायचं, तिला कधी तरास द्यायचा न्हाई आणि अभ्यास करायचा.’’ 

असचं एकदा शाळेतून येताना फोकांड्याच्या पिंपळाजवळ एक बासरीवाला काखेतील पिशवीत भरपूर बासर्‍या घेऊन विकायला आला होता. एक बासरी ओठांत ठेवून मधुर वाजवत होता. पिंपळावर बसलेली माणसं, जाणारी येणारी माणसं, शाळेत जाणारी येणारी मुलं त्या बासरीवाल्याकडे पाहत होती. त्याचे ते मधुर बासरी वादन ऐकत होते. कृष्णाचे आणि अविचे लक्ष त्या बासरीवाल्याकडे गेलेच. बापट बाई बरोबर चालताना ते दोघं मान मागे मागे करत परत परत त्या बासरीवाल्याकडे पाहत होते. कृष्णाची पावलं रेंगाळत आहेत हे बापट बाईंच्या लक्षात आलं. बाईंच्या मनात आलं. पोराची आई असती तर त्याने हट्ट धरुन बासरी विकत घेतली असती. बाईंच्या काळजात कालवा कालव झाली. बाईंनी मागे येत त्या बासरीवाल्याला म्हटलं –

‘‘कशी दिलीस रे बासरी ?’’

तो बासरीवाला आपल्या पिशवीतील सर्व बासर्‍या दाखवू लागल्या. बाई कृष्णाला म्हणाल्या – ‘‘कृष्णा तुला बघ कुठली आवडते यातली?’’

कृष्णा पिशवीतल्या सर्व बासर्‍या चाळू लागला. एक अत्यंत आकर्षक बासरी त्याने निवडली. तसा बासरीवाला म्हणाला – अरे वाजीव की, कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मघा बासरीवाला वाजवत होता तसा वाजवू लागला. बाईंनी बासरीवाल्याला किंमत विचारली आणि त्यांनी त्याचे पैशे दिले. अवि पण तशीच बासरी मागू लागला. बाईंनी त्या बासरीवाल्याला आणखी एक तशीच बासरी द्यायला सांगितली. पण त्या बासरीवाल्याकडे त्या पध्दतीची एकच बासरी होती. बाईंनी वेगळ्या प्रकारची एक बासरी घेतली आणि अविला दिली. त्याने अवि हिरमुसला झाला. तो एक सारखा कृष्णाच्या हातातल्या बासरीकडे पाहत होता. बाईंनी अविला डोळे वटारले आणि त्याचा हात धरत, ओढत घराकडे निघाल्या. रडत रडत अवि आई बरोबर चालला होता. कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.

क्रमश: भाग – २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

झपझप चालत बापट बाई सहावीच्या वर्गात आल्या. मुलांनी गुड मॉर्निंग मॅडम म्हणत बाईंचे स्वागत केले. बाईंनी पण गुड मॉर्निंग म्हणत मुलांना बसायला सांगितले. बाईंनी डस्टर, खडू टेबलावर ठेवले आणि मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. हा वर्ग त्यांच्या विशेष आवडीचा. गेल्यावर्षी पण पाचवीत बापट बाईच या वर्गाच्या क्लास टीचर होत्या. तोच वर्ग पाचवी पास करत सहावीत आला. सर्व मुले त्यांच्या ओळखीची. फक्त एक सोडून….

बाईंच्या कपाळावर आठी आली. या मुलाचे काय करायचे ? यंदाच दुसर्‍या शाळेतून आलेला हा मुलगा इतर मुलांमध्ये मिसळत नव्हता. अभ्यास करत नव्हता. बोलत नव्हता. गप्प राहून फक्त बघत रहायचा. बापट बाईंना कळेना या मुलाला हसता खेळता कसे करावे ? आज बापट बाई डेस्कवरुन उतरुन खाली आल्या. त्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलाला म्हणाल्या,

‘‘अरे मुला, बोल काहीतरी, नाव काय तुझे ?’’

‘‘कृष्णा, कृष्णा सदाशिव शिंदे’’

‘‘ गेल्यावर्षी कुठल्या शाळेत होतास तू?’’

‘‘देवबाग हायस्कूल’’

‘‘मग यंदा मालवणला कसा काय आलास ?’’

‘‘वडलानी तिकडंच काम सोडलं, आत्ता हिथ काम धरलयां’’

‘‘कुठ काम करतात तुझे वडिल?’’

‘‘तेलींच्या गोडावूनमध्ये हमाल हाय.’’

‘‘बरं! तू आता पुढे बसशील का ?’’

आणि कृष्णा पुढून दुसर्‍या बेंचवर बसू लागला. बाईंनी गणित शिकवायला सुरुवात केली. अधून मधुन त्यांचं कृष्णाकडे लक्ष जात होतं. कृष्णा स्थिर नजरेने पाहत होता. बाकीची मुलं वहित लिहून घेत होती कृष्णाने वही उघडली नव्हती. मध्येच बाई थांबल्या. कृष्णाला म्हणाल्या –

      ‘‘कृष्णा ! बोर्डवरचं लिहून घेत नाहीस?’’

      हु नाही की चु नाही. बाईंनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. कृष्णा तसाच बघत राहिला. बापट बाईंचा वर्ग संपला तसा कृष्णा पुन्हा शेवटच्या बाकावर बसायला गेला. मधल्या सुट्टीत बापट बाई मुख्याध्यापक सामंत सरांना भेटायला गेल्या.

‘‘सर, सहावीतील एका मुलाबद्दल बोलायचं होतं.’’

‘‘हा, कुठला मुलगा ?’’

‘‘कृष्णा शिंदे, देवबाग हायस्कूलला पाचवीत होता. यंदा सहावीत आपल्या शाळेत आला. तो काही वेगळाच आहे. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत असतो. वही उघडत नाही की पुस्तक उघडत नाही. बोर्डावरचे काही लिहून घेत नाही. इतर मुलांमध्ये मिसळत नाही. खेळायला जात नाही. काय करायचं या मुलाचं ?’’

‘‘देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी वहिनी त्याच शाळेत नोकरी करते. एक दोन दिवसात मी वहिनीची भेट घेतो आणि कृष्णाची चौकशी करतो.’’

बापट बाई गेल्या. शाळा संपवून घरी गेल्या. बाई आणि बाईंचा मुलगा अवि दोघेच मालवणात रहायचे. बाईंचे मिस्टर पुण्याला बँकेत होते. रोज सारखी बाईंची घरकामे सुरु झाली. त्यांनी देवाला निरांजन लावले. चौथीत असलेल्या अवीचा स्कॉलरशीपचा अभ्यास घेतला. बाई सर्वकाही करत होत्या पण डोळ्यासमोर होता शेवटच्या बाकावर बसलेला आणि निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा.

दोन दिवसानंतर बाई शाळेत पोहोचल्या. तेवढ्यात प्युनने सामंत सर बोलवल्याचा बाईंना निरोप दिला. बाईंनी आपली पर्स लॉकर्समध्ये ठेवली आणि त्या मुख्याध्यापकांच्या रुममध्ये गेल्या.

‘‘या बापट बाई ! तुम्ही त्या कृष्णा शिंदेची चौकशी करायला सांगितलेली ना ? माझी वहिनी देवबाग हायस्कूलमध्ये शिकवते. तिच्याकडे चौकशी केली या कृष्णा बद्दल.’’

‘‘हो का ? मग ?’’

‘‘अहो, हा कृष्णा दोन वर्ष सतत पहिल्या नंबरावर होता. अत्यंत हुशार मुलगा पण…’’

‘‘पण काय ? ’’

‘‘फार वाईट वाटते सांगायला. हे शिंदे तिकडे सातारकडचे. मासे पकडायला समुद्रात बोटी जातात ना तशा बोटीवर शिंदे कामाला होता. या बोटीवरील खलाशांचे जेवण या शिंदेची बायको म्हणजे कृष्णाची आई करायची. जेव्हा बोट किनार्‍यावर असेल तेव्हा खलाशी घरी जेवायला येत किंवा बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एका मलबारी खलाशाबरोबर कृष्णाची आई पळून गेली.’’

‘‘काय?’’ बापट बाई किंचाळत बोलल्या.

‘‘होय बाई आणि या कृष्णाला एक लहान बहिण आहे चार वर्षाची. तिला ती बरोबर घेऊन गेली. याचा बाप बिचारा रडला, भेकला पण यांना कुठे शोधणार तो ? ती दोघ केरळच्या बाजूला गेल्याची बातमी होती. त्याने ७-८ दिवस वाट पाहिली आणि बोटीवरची नोकरी सोडली आणि इथे मालवणात तेलींच्या गोडाऊनमध्ये नोकरी पकडली. या कृष्णाला घेऊन तो मालवणात आला आणि आपल्या शाळेत त्याचं नाव घातलं.’’

‘‘अरे बाप रे ! काय सोसतोय हा पोरगा.’’ बाई कळवळून म्हणाल्या.

‘‘होय बाई, कोवळ्या वयात मोठा आघात बसलाय या कृष्णावर म्हणून तो निश्चल झालाय. रोज डोळ्यासमोर असणारी आई आणि छोटी बहिण नाहीशी होणे हे किती भयानक आहे ? बाई आपण या मुलाला पुन्हा हसता खेळता करायला हवा. आणि त्याकरिता तुम्हाला त्याच्या बाई नव्हे आई व्हायला लागेल.’’

‘‘हो सर, माझ्या लक्षात आलय ते, मी प्रयत्न करणारच. येते सर !’’

बापट बाई स्टाफरुममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीत बसल्या. त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा येत राहिला. काय निष्पाप पोर हे, या वयात काय काय सोसावं लागतयं या मुलाला. बाईंना आपला चौथीतला आपला मुलगा अवी आठवला. अवी पेक्षा हा फक्त दोन वर्षांनी मोठा. या मुलाला मायेची गरज आहे. आईची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बाईंनी रुमालाने तोंड पुसले आणि इतक्यात बेल झाली तशा त्या सहावीच्या वर्गात गेल्या. नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर त्यांचे कृष्णाकडे लक्ष गेले. गेले दोन दिवस कृष्णा त्यांच्या तासाला दोन नंबरच्या बेंचवर बसत होता. बाई कृष्णा जवळ आल्या. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. बाई म्हणाल्या –

‘‘कृष्णा दाखव तुझं दप्तर, पुस्तक, वही वगैरे काही आणलेस का?’’

कृष्णा खाली मान घालून गप्प बसून होता. बाईंनी त्याचे दप्तर पाहिले. दप्तरात पाचवीची एक वही होती आणि एक जुनं पेन होतं.

‘‘अरे आता तू सहावीत आहेस बाळा ! सहावीची पुस्तकं-वह्या घेतली नाहीस का ?’’

‘‘नाही.’’

‘‘ठिक आहे, तो पर्यंत या राहूलच्या पुस्तकात बघ, उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करुया.’’ अस म्हणत बाई पटकन स्टाफरुममध्ये गेल्या आणि एक वही आणि एक पेन घेऊन आल्या.

‘‘कृष्णा, ही वही घे आणि पेन. आता मी बोर्डवर लिहीते ते वहीमध्ये लिही मग मी तुझी वही तपासणार’’असं म्हणत बाई गणित शिकवू लागल्या. त्यांच लक्ष होतं. कृष्णा बोर्डावरचे लिहून घेत होता. शिकवता शिकवता बाई डायसवरुन खाली आल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीत लिहित होता. बाईंनी पाहिले कृष्णाचे अक्षर मोत्यासारखे होते. लिहिण्यात टापटिपी होती. भूमितीची पदे व्यवस्थित एकाखाली एक लिहिली होती. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सर्व मुलांना कौतुकाने दाखवली.

‘‘बघा मुलांनो, या कृष्णाची वही पहा. काय टापटिप आहे. अक्षर मोत्यासारखं आहे. बघा !’’

मुलं पाहू लागली. एवढ्या दिवसात हा बावळट वाटणार्‍या मुलाबद्दल त्यांनाही कौतुक वाटू लागलं. मुलांची कृष्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कृष्णापण खुश झाला. या नवीन शाळेत त्याच्या कोणी ओळखीचे नव्हते. वर्ग संपला तशा बापट बाई वर्गाबाहेर गेल्या. पण नवीन तास घेणार्‍या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत होत्या. अस करता करता सर्वच शिक्षकांमध्ये कृष्णाबद्दल चर्चा होत गेली आणि सर्वजण त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले.

मधल्या सुट्टीत वर्गातील सर्व मुले आपआपले डबे घेऊन बाहेर पडले. एकटा कृष्णा वर्गात बसून होता. एवढ्यात बापट बाई डबा आणि त्यांचा चौथीत शिकणारा मुलगा अवि याचा हात धरुन वर्गात आल्या. आणि एकट्या बसलेल्या कृष्णाकडे पाहून म्हणाल्या –

‘‘कृष्णा ! डब्यातून काही आणलसं का रे ?’’

कृष्णाने मान हलवली. बापट बाईंनी पाहिले कृष्णाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

‘‘हरकत नाही. हा बघ माझा मुलगा अवि. हा चौथीत आहे. चला आपण डबा खाऊ. कृष्णा या अविसोबत बाहेर जा. हातपाय धुवून या तो पर्यंत मी डबा उघडते. अविने कृष्णाचा हात पकडला आणि ते दोघे बाथरुममध्ये गेले. तो पर्यंत बाईंनी आपला आणि अविचा डबा उघडला आणि दोन डब्याचे तीन डबे केले. कृष्णाला जास्त जेवण ठेवलं. दोघेही येताच त्यांच्या हातात एक-एक डबा दिला आणि आपल्या हातात एक डबा घेतला. कृष्णा डब्यातले अन्न खायला संकोचू लागला तेव्हा बाई ओरडल्या.

‘‘कृष्णा आता मी रागवेन. झटपट डबा संपवायचा. मला पुन्हा पुढल्या तासाला जायचयं.’’तसा कृष्णा डब्यातली चपाती भाजी खाऊ लागला. अविला नेहमीची सवय होतीच. त्यामुळे त्याने झटपट डबा संपवला. बाईंनी कृष्णाला दाखवले –

‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’

क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… – भाग -२ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पाणी… – भाग -२ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहिले – त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं. – आता इथून पुढे)

“आबा पाणी” नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला

” दादू आता घोट घोट पाणी पी रे भाऊ.नंतर कुठंबी पाणी मिळायचं नाही”

नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली.घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली.त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली.देवबाने कपाळावर हात मारुन घेतला.खरं म्हणजे त्यांना पाणी पितांना पाहून त्यालासुध्दा पाणी प्यायची तिव्र इच्छा होत होती.पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.

शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला.”गरमागरम  कचोरी,दसमें तीन,दसमे तीन” त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला.पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चुप बसला.

” आबा मले कचोरी “नात म्हणाली.आता नातू चुप थोडीच बसणार होता.

“आबा मलेबी कचोरी”

कचोरीवाला आला तसं देवबाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या .तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या.तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.

“आबा कचोरी” तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं.त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.

” दादूला देजो बेटा.नाहीतर तुमी दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा” कचोरी परत करत देवबा म्हणाला.पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं.नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतांना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.

गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला.खुमगांव बुर्ती गेलं तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली.एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता.त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.

“देरे दादा थोडं पाणी,पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं.देरे दादा,देवं माय.लई पुण्य मिळेल दादा”

भिकारीण गयावया करत होती.लोकांसमोर हात पसरत होती.

देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं,कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना.उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते.आणि तेही चुकीचं नव्हतं.या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतांना कोणं त्या भिकारणीला पाणी देणार होतं?

” बाबा दे रे पाणी पोऱ्याले” ती भिकारीण देवबाकडे पहात म्हणाली.देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना.न रहावून त्याने पिशवीतली बाटली काढली.पण हाय रे दैवा.बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती.ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात “पानी बोतल”चा आवाज डब्यात घुमला.आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.

“कित्येकी है बोतल?”देवबाने विचारलं

” पच्चीसकी”

“बाहर तो बीस की मिलती”

” स्टेशनपे मिलती होगी,गाडीमें पच्चीसकी है.दू?”

देवबा अडखळला.पंचवीस रुपये जास्तच होते.लोकांना लुटणाऱ्या पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला.भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं.तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं.भिकारणीच्या उजव्या बाजुला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती.तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता.त्याने निर्णय घेतला.

” दो.एक दो”खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली.पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली.तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली.तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं.देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.

” आबा आपल्यालेबी बाटली घेजो” नात म्हणाली तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला

“और एक बोतल दे दो”

भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं.मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.

” अजून एक बोटल दे रे बाबा.मलेबी लई तहान लागलीये”

देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली

” बाबा कहाँ जा रहे हो”पाणीवाल्याने देवबाला विचारलं

“भुसावल”

“तो और एक ले लो ना.भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी.साथमे बच्चे है,एक बोतलसे थोडेही काम चलेगा!”

तो बरोबर म्हणतोय हे देवबाच्या लक्षात आलं पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं.पण पुढे पाणी नाही मिळालं तर?

“दे दू बाबा?”

देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.

” हां देऊन टाका”नात मध्येच म्हणाली तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला.देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले.फक्त नव्वद रुपये उरले होते.पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना.पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन त्रुप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली. 

मलकापूर गेलं.गाडीतली गर्दी आता कमी झाली होती.सहा वाजत आले होते.जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता.देवबा विचार करत होता.आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं.जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते.जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता.’ ठिक आहे मनाला पटत नसलं तरी मागू.आजपर्यंत कधी मागितले नव्हते आता मागू.पोरीला शरमल्यासारखं होईल.तिला समजावून सांगता येईल.आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत.घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे.पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं?’

“बाबा हे घे तुह्ये पैसे”

त्याने चमकून वर पाहिलं.मघाची भिकारीण समोर उभी होती.तिच्या समोर पसरलेल्या हातात एक,दोन,पाच रुपयाची नाणी होती.देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला.भिकाऱ्याने दिलेली भिक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.

” नको नको.राहू दे”

” बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये.घे.भीक मागून जमा केलेत”

देवबाला काय करावं सुचेना.पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते.पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते.त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला

” राहू दे बेटा.नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का?”

” लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू.देव भलं करो तुह्यं”

ती निघून गेली तसा देवबा हसला.भिकाऱ्याच्या आशिर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहित होतं.पण त्या आशिर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.

रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला.स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं.तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली.रिक्षावाल्याला पत्ता सांगितला

” चाळीस रुपये”रिक्षावाला म्हणाला.

देवबा हसला.थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता. पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञतेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरुन गेलं होतं.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… – भाग -१ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पाणी… – भाग – ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा तीन वाजून गेले होते.मे महिन्याची ती दुपार.हवेत भयंकर उष्मा होता.अंगाची लाहीलाही होत होती.प्लँटफाँर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं.गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते.पँसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच.चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

“दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी”

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा?”

नातवाने निरागसपणे मान डोलावली.त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले.आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली.देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला.त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता.ही तर लहान मुलं होती.बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता.त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता.देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो  प्लँटफाँर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला.पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं.त्याने समोरच्या प्लँटफाँर्मवर नजर टाकली.तिथल्या नळांना ही पाणी दिसत नव्हतं.स्टेशनमास्तरच्या आँफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

“बाबूजी पाणी हाये का कुठं?लेकरांसाठी पाहिजे हुतं”

कर्मचाऱ्याने त्याला वरुन खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का?”

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी?आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू?आमीबी बाहेरुन मागवतो.जाय त्या कँन्टीनमधी पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला.देवबा तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का?”

कँन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये?नाय.मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी…”

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी.बाहर जाओ,हाँटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला.रोडावरच्या हाँटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो.पानी नही मिलेगा.बोतल दे दू?बीस रुपयेकी है”

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाँटेलवर गेला.तिथून तिसऱ्या.चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत.पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला.पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं.देवबा म्हणजे शेतकरी माणूस.दोन एकरची कोरडवाहू शेती.शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा.मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले,नद्यानाल्यातलं,जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. अर्थात देवबाला हे नवीन नव्हतं.असं झालं की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा.त्यातून पदरी दोन मुली ,मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती.मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच.पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती.शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं.शहरात रहाणाऱ्या मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता.खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं.पाण्याचा प्रश्न बिकट झालेला.दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची.दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा.तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं.त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची.मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून पाणी आणायचा.पण आता त्याचं वय झालं होतं.तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला.तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता.नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाही मिळालं?दादू परत पाणीपाणी करतोय.मला पण तहान लागलीये”

नातवाचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला.तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली.साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला.पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला कळलं.कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत.त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना.ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं.सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस.समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं.त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता.आता हिंमत दाखवावीच लागणार होती.त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला.ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती.देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं.तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला.पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं.काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे?”कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं.लेकरं लय तहानलीयेत”

तो एका माणसाला म्हणाला.तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले.त्यांचंही बरोबरच होतं.अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात.तिथून घ्या ना” एक बाई म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे.उकळून थंड केलेलं.ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार?”

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा”

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता.देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का?आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं दुसरं पुण्य नाही. बाबा किती जण आहात तुम्ही?”

“तीन जण”तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला.त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा.बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला.मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने आणि आनंदाने हसला. देवबा नातवांकडे आला.थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली.त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली.देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

पँसेंजर आली.प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली.खिडकीतून उतरतीचं ऊन आता अंगावर येत होतं.त्यासोबत गरम हवेचे झोतही आत येत होते.छताचा पंखाही आवाज करत गरम हवा फेकत होता.

दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं.या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं.आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती.त्याने मनाला आवर घातला.असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं.आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता.त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

 क्रमश: भाग १

 © श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले –  सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?- आता इथूंपुढे )

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन कॉपने त्याला घरी आणले.  पण कॉपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लॉबद्दल खणखणीत सुनावलं. दंडाची रक्कम वसुल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षल च्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.   तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली,” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसीव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया ,तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो”

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम!”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला,”नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लॉ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली. आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो  अमिताच्या पायात घुटमळत होता.  अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनो बरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.  पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

येईल का ती कधी भरून? 

 – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गराजचं शटर रिमोटने  अलगद उघडलं.  आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं.  आयलँड वर बराच पसारा पडला होता.  सिंक मध्ये भांडी साचली होती.  काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे.  सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स  पडले होते.  ते तिने पाहिले आणि  क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला.  तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊच वर जाऊन ती बसली.  एसीचं  तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती.  खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं.  एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं.  काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.

मोबाईल व्हायब्रेटर वर होता.  तिने पाहिलं तर जॉर्ज चा फोन होता.

” हॅलो! जॉर्ज मी आज येत नाही.  ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”

” ओके. टेक केअर”  इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

अमिता डेक वर आली.  कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्स बर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता.  मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले  होते.  पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती.  पण अजून काही दिवसच.  नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे.  कोपऱ्यात साचून राहील.  वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील.  आणि संपूर्ण विंटर मध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील.  सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील.  अमिताला सहज वाटलं,” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.”

या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या  प्रवाहात जाणवते आहे.

हर्षल ला फोन करावा का? नको.  तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता,” बी ब्रेव्ह अमिता! खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं.  पण आज शक्य नाही.  आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”

पण अमिता  जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही.  त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. 

अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.”

आणि तिने छातीवर दगड ठेऊन  सारं काही पार पडलं होतं.

विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.  पण तो विचार तिने झटकला.  विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं.  तिला एकटीलाच राहायचं होतं.  निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता.  निदान आता तरी. 

संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन.  तान्या, रिया.  “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती.  सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर.

अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी  तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा.  एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा.  त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.  इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची. 

ब्रुनोची  आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं.  क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या  काय कमी झाल्या का?  झाल्याच की.  कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली.  काही दूर गेली.  काही तुटली.  त्या त्या वेळी खूप दुःख झाले पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच  होऊ शकत नाही.

घरात तसा कुठे कुठे ब्रूनो चा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेक वर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटर मध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर  घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला!  या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.

कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही.  मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा.  नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता.  तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं  की नेबर ने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू  का?”

नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा.  त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे.  उठ सुट  असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे  जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही.  पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशी चे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.

तसे  ब्रूनोचे  आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते?  अवघे दहा वर्षाचे असेल.  असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. 

शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची.  एकटीच असायची.  तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता.  पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं  हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं.  गंमत म्हणजे रिया,तान्या  येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे  फारच लाड करायच्या.  परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती.  हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला अॅडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.

रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स.  त्यांची तर मज्जाच झाली.  आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो  घरी आला आणि घरचाच झाला आणि सारे जीवन रंगच बदलले. 

चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले.  त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोस च्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग  या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली.  शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती  दिली. अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी  जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही.  पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. 

सुरुवातीला तो थोडा बिचकला.  गोल गोल फिरत राहायचा.  कदाचित होमसिक  झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला.  परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला.  त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.

‘ ब्रूनो जेवला का?”

“ब्रुनोला फिरवून आणलं का?”

“आज त्याला  आंघोळ घालायची का?”

” आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत का याचं?”

असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे.   हाच त्यांचा दिनक्रम बनला. 

सुरुवातीला चिनी बाईच्या  विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या.  तिलाही ब्रुनोची  ची आठवण यायची.  करमायचं नाही. रिया,तान्याला  तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?

पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला. सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?

क्रमश: भाग १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print