श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पाणी… – भाग – ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा तीन वाजून गेले होते.मे महिन्याची ती दुपार.हवेत भयंकर उष्मा होता.अंगाची लाहीलाही होत होती.प्लँटफाँर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं.गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते.पँसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच.चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

“दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी”

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा?”

नातवाने निरागसपणे मान डोलावली.त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले.आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली.देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला.त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता.ही तर लहान मुलं होती.बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता.त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता.देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो  प्लँटफाँर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला.पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं.त्याने समोरच्या प्लँटफाँर्मवर नजर टाकली.तिथल्या नळांना ही पाणी दिसत नव्हतं.स्टेशनमास्तरच्या आँफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

“बाबूजी पाणी हाये का कुठं?लेकरांसाठी पाहिजे हुतं”

कर्मचाऱ्याने त्याला वरुन खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का?”

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी?आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू?आमीबी बाहेरुन मागवतो.जाय त्या कँन्टीनमधी पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला.देवबा तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का?”

कँन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये?नाय.मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी…”

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी.बाहर जाओ,हाँटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला.रोडावरच्या हाँटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो.पानी नही मिलेगा.बोतल दे दू?बीस रुपयेकी है”

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाँटेलवर गेला.तिथून तिसऱ्या.चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत.पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला.पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं.देवबा म्हणजे शेतकरी माणूस.दोन एकरची कोरडवाहू शेती.शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा.मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले,नद्यानाल्यातलं,जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. अर्थात देवबाला हे नवीन नव्हतं.असं झालं की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा.त्यातून पदरी दोन मुली ,मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती.मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच.पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती.शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं.शहरात रहाणाऱ्या मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता.खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं.पाण्याचा प्रश्न बिकट झालेला.दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची.दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा.तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं.त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची.मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून पाणी आणायचा.पण आता त्याचं वय झालं होतं.तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला.तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता.नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाही मिळालं?दादू परत पाणीपाणी करतोय.मला पण तहान लागलीये”

नातवाचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला.तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली.साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला.पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला कळलं.कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत.त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना.ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं.सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस.समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं.त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता.आता हिंमत दाखवावीच लागणार होती.त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला.ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती.देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं.तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला.पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं.काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे?”कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं.लेकरं लय तहानलीयेत”

तो एका माणसाला म्हणाला.तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले.त्यांचंही बरोबरच होतं.अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात.तिथून घ्या ना” एक बाई म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे.उकळून थंड केलेलं.ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार?”

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा”

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता.देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का?आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं दुसरं पुण्य नाही. बाबा किती जण आहात तुम्ही?”

“तीन जण”तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला.त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा.बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला.मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने आणि आनंदाने हसला. देवबा नातवांकडे आला.थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली.त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली.देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

पँसेंजर आली.प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली.खिडकीतून उतरतीचं ऊन आता अंगावर येत होतं.त्यासोबत गरम हवेचे झोतही आत येत होते.छताचा पंखाही आवाज करत गरम हवा फेकत होता.

दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं.या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं.आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती.त्याने मनाला आवर घातला.असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं.आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता.त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

 क्रमश: भाग १

 © श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments