मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

एका सीमावासीय “आलूर” गावातील माझी स्वतःचीच कथा तुम्हाला सांगत आहे. आता सीमावासीय म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमा ही झाली राज्याची , सोलापूर उस्मानाबाद – कलबुर्गी या झाल्या जिल्ह्याच्या सीमा. तर अक्कलकोट – तुळजापूर – आळंद या तालुक्याच्या सीमेवर वसलेले उमरगा तालुका,उस्मानाबाद जिल्ह्यातील आलूर माझं गाव .

आता एवढ्या सीमा म्हटल्यावर १९७५ सालच्या काळात विविध संस्कृती व जातीभेद होताच. आमचा पारंपरिक व्यवसाय कातडी कमावणे. परंतू आमचे आजोबा हे शेती व्यवसायिक होते, तर माझे वडील एकुलते एक होते. त्यांचे शिक्षण त्याकाळी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांना शिक्षकाची नोकरी आली होती म्हणे. पण ते नोकरी नाकारून   घरची शेती पाहात असत.  त्यामुळे आमचे कुटुंब शेतकरी म्हणूनच ओळखले जायचे.

वडीलांची उठक-बैठक गावातील पोलीस पाटील शंकरराव पाटील, मलप्पा व्हट्टे सावकार, भारसिंग दादा रजपूत, दत्तोपंत कुलकर्णी, स्वातंत्र सैनिक बोळदे काका, तुक्कण्णा वाकडे सावकार  यांच्याबरोबर असायची.

आमचे वडील एकुलते एक असले तरी आम्ही मात्र पाच भाऊ दोन बहीण असे सात जण होतो. मी सर्वात लहान.  मला कळायच्या आतच मोठे भाऊ सोलापूरला नोकरी निमित्ताने राहायला गेलेले व मोठ्या बहीणीचे लग्न झालेले. ते पण सोलापूरला स्थाईक झालेले. एक भाऊ वरच्या वर्गात शाळेत आणि दोन भाऊ समवयस्क असल्याने ते एकाच वर्गात शाळेत शिकत असत. आई व एक बहीण शेतावर कामाला जात असत. त्यामुळे माझ्याकडे लक्ष देण्यास घरी कुणी नसत. त्यावेळी आमच्या घरात गावातल्या शाळेतले कांबळे गुरुजी आमच्या दोन खोल्यात सहपरिवार रहात असत . मी एकटा घरात बसलेले पाहून न राहवून त्यांनी मला माझा जन्म १९६५ चा असताना १९६२ करून पहिलीमध्ये माझे नाव दाखल केले व त्यानीच माझ्या शाळेच्या जीवनाचा प्रवास सुरू केला. तेच मला शाळेत घेऊन जात व घरी घेऊन येत.

त्यावेळी पहिली ते  चौथीपर्यंतची शाळा गावाच्या मध्यभागी होती. एका बाजूला भीमराव कुलकर्णी(गुरुजी) व नारायणराव कुलकर्णी(गुरुजी) यांचे घर तर दुस-या बाजूला अल्लाउद्दीन यांचा भलामोठा दगडी वाडा व समोर कल्लय्या स्वामी (आमच्या घरचे ) गुरु यांचे घर. आमच्या घरचे गुरु म्हणजे त्या वेळी अशी पध्दत होती की घरी कुठलेही कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नसत व शेतामध्ये  मुगाच्या शेंगा, हरब-याचा ढाळा,  ज्वारीचा  हुरडा अथवा इतर कुठलेही पीक आल्यावर त्यांना दिल्याशिवाय वडील आम्हाला धाटालाही हात लाऊ देत नसत.

पुढे कांबळे गुरुजी यांची बदली आमच्या गावावरून दुसरीकडे झाली व आता मी ही चौथीतून पाचवीत आलो.  दिवस जात होते. चौथी इयत्तेपर्यंत शाळा गावातच होती. पुढे मात्र पाचवी ते दहावी गावापासून दीड दोन किलोमीटर लांब होती. 

तसा मी लहान असताना जरा बरा दिसायचो.  हळूहळू गावातील मुलांशी मैत्री जमू लागली . राजकुमार खद्दे, रघुनाथ भांडेकर, परशुराम धोत्रे , मुकुंद क्षिरसागर , सुहास पारडे, आप्पशा मलंग,  सारंग कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अशोक पाटील, विठ्ल चौधरी, नेपालसिंग रजपूत, अशोक बब्बे,  गुंडू बि-हाडे, श्रिशैल गुंडगे, मल्लु जिरोळे, अशोक बोळदे, गुर्लींग पालापूरे, अशोक कुलकर्णी, मोतीराम राठोड, राम राठोड, एम. एच. शेख हे गावातील मित्र. तर दत्तु ,अंबादास , भीम, सुभाष, सुरेश ,राजू ,नवनाथ इंगळे हे भावकी (गल्लीतील) मित्र होते. तरी प्राथमिक शाळेच्या शेजारील घरातील प्रविण कुलकर्णी व माझी चांगलीच गट्टी जमली व मी आता शाळा नसतानाही त्यांच्याच घरी राहायला लागलो . त्या काळी ब्राम्हणाच्या घरी राहणे वगैरे शिवता शिवत मानली जात असे, पण मला कोणीही कधी काही म्हणालेले आठवत नाही. कधी कधी अभ्यासाच्या निमित्ताने मुक्कामही करत होतो.

त्या काळी गावात बाराबलुतेदारी होती. शेतीच्या अवजाराची कामे लोहार ,सुतार करत असत .हणमन्त काकाच्या दुकानात बसून आम्ही हक्काने चप्पल बनवून घेत असू .

गावामधे कटींग करणारे तर होते, पण आम्हाला मात्र त्यांच्याकडे घरचे जाऊ देत नसत. त्या वेळी आमची हजामत (कटींग ) घरीच व्हायची. त्यामुळे डोक्यावर केस असूनसुध्दा व्यवस्थित नाहीत असे नेहमी वाटायचे पण इलाज नव्हता. गावातील मुले छान कटींग करुन केस विंचरुन रुबाबात फिरत असत .मला नेहमी वाटायचे की आपणही गावात कटींग करुन घ्यावी. पण मनात असूनही शक्य होत नसे. त्या काळी घरी पाहुणे आले की जाताना ते काही पैसे लहान मुलाच्या हातावर ठेवत. असे काही पैसे मी जमवले होते. मग मी विचार केला की हे पैसे देऊन आपण कटींग करुन घ्यायची.

त्यादिवशी मी घरी न सांगताच मनाचा हिय्या करुन कटींग करणाऱ्या हडपे  काकाच्याकडे गेलो . त्यावेळी त्यांच्याकडे आधीपासूनच एक गिऱ्हाइकाचे काम चालू होते. त्यांनी मला बसायला सांगितले. त्याकाळी बसण्यासाठी सोय म्हणजे एखादा दगड शोधून बसायचे  व हजामत करणा-यांचा बसायचा दगड आपल्यापेक्षा थोडा उंच असायचा. एखादी कात्री , वस्तारा , व हातमशीन, आणि पाचशे एक बारचा साबण, तांब्यात पाणी एवढी सामग्री असे .

हातातले काम संपल्यावर तोंडातली तंबाखुची पिचकारी मारत हडपेकाकांनी मला हजामतीसाठी बोलावले.

मी मान खाली घालून त्यांच्यासमोर बसलो . आधी त्यानी माझ्या डोक्याला भरुन पाणी लावले व केसावर कात्री चालवायला सुरु केली. एका बाजूचे अर्धे केस कापायचे संपत आले असतील तोच माझ्या वर्गात शिकणारा हडपे काकाचा मुलगा तिथे आला व त्याने वडलांना कानडीत विचारले, ” इंवदू याक त्यली माडलूतीरी ” (याची का कटींग करत   आहात.) व त्याने त्यांच्या कानात माझी जात सांगितली. तसे त्यांनी माझ्या अंगावर खेकसत हातातली कात्री फेकून दिली व अर्धवट झालेल्या कटींगसह मला हाकलून दिले . भिजवलेले डोके व एकीकडचे कापलेले अर्धवट केस अशातच मी रडत रडत घर गाठले . माझा हा असा अवतार बघून वडीलानी विचारपूस करुन मला शांत बसवले व माझी राहलेली अर्धी कटींग केली व पुन्हा असे न करण्याची समज दिली. मी असे काय केले की त्यानी माझी कटींग अर्धवट सोडली असेल बरे? प्रश्नाचे उत्तर कळत असूनही  माझ्या बालमनाला पटत नव्हते.

पुढे गावामध्ये कुणीतरी गायकवाड नावाचे तलाठी यांची नेमणूक झाली होती . त्यांना हा विषय समजला. मग त्यांनी गावातील नाभिक समाजाला समज दिली, की त्यांनी जातीभेद न मानता सर्वांचीच दाढी हजामत करावी . अन्यथा शेतीचे सात बारे मिळणार नाहीत . तेंव्हा कुठे आमच्या गावात सर्व समाजाची कामे सुरळीत सुरु झाली.

पण मी अर्ध्या कटींगचा एवढा धसका घेतला होता, की पुढे कटींग करण्यासाठी आमच्या गावापासून तेरा किलोमीटर चालत मुरुम येथे जाउन कटींग करुन येत असे .

लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर.

 सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असे म्हटले जाते.  

 मिलेटसचा इतिहास 5000 ते 6000 वर्षे पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की, लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती, त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे, तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले. वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये, तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबडग्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच ही भरडधान्ये म्हणजे डोंगर, कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्यासारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती, पोळीने, मैदा पाव, बिस्कुटाने, तांदळाच्या भाताने, अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती.

आता आपले डोळे उघडले आहेत. आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीप्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे.

मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन्  जैवसाखळी/Biodiversity पुनर्स्थापना, पर्यावरण, अर्थकारण यामध्ये मिलेटसची भूमिका काय, हे समजून घेऊया.

–  संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्ये पीक कुठेही येऊ शकते. अगदी एक-दोन पाण्यामध्ये, वा फक्त पावसाच्या पाण्यावरसुद्धा. खते, औषधे, कीटकनाशक रसायने लागत नाहीत, म्हणजे पर्यावरणप्रिय शेती असे समजूया. मिलेटस् /भरडधान्ये शेती म्हणजे जंगल फार्मिंग/naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीनचार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. म्हणजे अल्प भांडवल, उत्तम आरोग्यदायी अन्न, जनावरांना चारा, असा चौफेर फायदा.

1 किलो गहू तयार करण्यासाठी 10.00 लिटर पाणी लागते. 1 किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी 8000 ते 9000 लिटर पाणी लागते. परंतु 1 किलो मिलेटस् /भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त 200 लिटर पाणी लागते. म्हणजे मिलेटसच्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी लागते. तसेच 1 किलो गहू, तांदुळामध्ये चार लोक पोट भरू शकतात. परंतु 1 किलो भरडधान्ये/मिलेट मध्ये बारा लोक पोट भरू शकतात. म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी फूड सेक्युरीटी आपण निर्माण करू शकतो. 

आता या मागील अर्थकारण पाहूया. साधारणपणे 80 ते 150 रूपये किलो ह्या दराने बाजारात मिलेट/भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे.

वेगवेगळी मिलेटस्/भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी फायदे :-

गहू आणि तांदूळ (paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा, वा इतर आजार बळावले जातात. 

आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची? :- कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते. हे गहू, तांदुळामध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना, रोगांना आमंत्रण देते. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हे आहे. परिणामी डायबिटीस, लठ्ठपणा, रक्तदाब, कॅन्सर, सांधेदुखी, वा इतर विविध शारीरिक विकार!  हे आजार, विकार दूर करण्यासाठी मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.

 मिलेटस् ग्लुटेन फ्री फूड आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ना ते हेच! म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार, विकार, रोग आपण सहज टाळू शकतो. ‘Industrial food काय कामाचे?’ हे आपण स्वतःला विचारणार आहोत का नाही? 

— क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू… 

एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्योंकि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। ’

—- फार छान ओळी आहेत या की, ‘ मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’ 

आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?

आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो. जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.

पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. 

दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? 

— सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. 

— स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

— तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. 

— तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. 

— तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. 

— तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.

सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे….. 

— प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, 

— आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.

— नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. 

— दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.

आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे. 

आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. 

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया. 

तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. 

जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. 

आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. 

…… म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल.

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रोझ डे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 रोझ डे 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

ह्या निमीत्ताने तीन पिढ्यांमधील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो.आपल्या आधीची पिढी  स्पष्टवक्ती आणि जरा फटकळच. त्या पिढीतील लोकं तोंडावर सांगून मोकळे होतात त्यामुळे त्यांच्या पचनी हा “रोझडे”.वगैरे अजीबातच पडत नाही. आमची पिढी ही तळ्यातमळ्यात करणारी पिढी, ना घरका न घाटका म्हणू शकता. संपूर्णपणे विरोधही नाही ह्याला आणि सरसावून साजरा करण्याइतकं धैर्य, स्वतः चे भ मत झडझडून सांगण्याइतका मोकळेपणाही नाही. आणि ह्या उलट आत्ताची पिढी हा उत्सव साजरा करतांना आधीच्या दोन पिढ्यांच्या मतांशी काहीच देणंघेणं नसलेली पिढी.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

अर्थातच हा आठवडा समारंभ म्हणून साजरा करण्याबाबत दुमत हे असतंच. काही मंडळी अगदी ह्याच्या विरुद्ध असतात तर काही मंडळी हा उत्सव  साजरा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी. अर्थातच प्रेमाला कुणाचाच विरोध नसतो, विरोध असतो तो साजरा करण्याच्या पद्धतीबाबत.थोडक्यात हा उत्सव म्हणजे इंग्रजी वा विलायती वासंतिक उत्सव.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोजचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावर पाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा कुणी झाडावरचे फूल तोडून नेईल म्हणून वा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी आणि तो बुके बेधडक देणारी आणि घेणारी सुद्धा हल्लीची ही बिनधास्त, धीट आजची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच”रोझ डे”फुलावा ही सदिच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

आमच्या घराजवळ एक शाळा आहे. शाळेच्या बाहेर २-३ बाकं आहेत. परवा दुपारी एका मित्राची वाट बघत तिथे बसलो होतो. प्राथमिक शाळा सुटली. पालकांची, व्हॅन काकांची, रिक्षावाल्यांची, मुलांची गर्दी उसळली. निम्मे पालक पुढे ५० मीटरचा वळसा नको म्हणून माझ्या समोरून रॉंग साईडने गाड्या घालून मुलांना घेऊन गेले. झेब्रा क्रॉसिंगला कोणीच थांबत नव्हतं. ‘शाळेसमोर हॉर्न वाजवू नये’, या ऐवजी, ‘हॉर्न वाजवणं कंपल्सरी आहे’, असं वाटत होतं. १० मिनिटात परत शांतता झाली. मी बसलो होतो त्या बाकामागे ४-६ मुलं ज्यांच्या व्हॅन/पालक यायचे होते, ते शिल्लक होते. मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं.                                                  *                                               

एक म्हणाला, 

“आमचे व्हॅनकाका इतके भारी आहेत की, आज सकाळी उशीर होत होता, तर त्यांनी सरळ सिग्नल तोडला.”

दुसरा : “हे तर काहीच नाही.. आमचे व्हॅनकाका तर रोजच सगळे सिग्नल तोडतात.”

तिसरा : “आणि कसले भारी शिव्या देतात ना!”

चौथा : “अरे, माझे बाबा तर उशीर झाला ना, तर सरळ नो एन्ट्रीमधून बाईक घालतात.”

पहिला : ” माझ्या बाबांचं तर ठरलेलं आहे.. जर पोलिसांनी थांबवलं तर बाबा त्यांचं पाकीट गाडीतच ठेवतात. आईकडून एक ५०० ची नोट चुरगळून मुठीत कोंबतात आणि पाच मिनिटात पोलिसाला भेटून परत येतात.. कुठे पण पकडू देत आम्हाला.”

यापुढे मात्र मला राहवलं नाही. माझ्यातला सुज्ञ का कोण तो नागरिक जागा झाला. तसं हल्ली मी कोणालाच काही समजवायला जात नाही, तरी पण मुलांना समजवावं असं वाटतं, कारण तीच उद्याची पिढी असते… काही बदल घडवू शकणारी.                                                           

 मी मुलांकडे गेलो. आपण कुठल्यातरी चुकीच्या गोष्टी प्रमोट करत आहोत, याचा जरासुद्धा अपराधी भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यांनी ‘आता कोण हे काका लेक्चर द्यायला आले?’ असा लूक दिला. 

मी त्यांना म्हणालो, 

“आता गव्हर्मेंट एक नवीन रूल आणणार आहे… व्हॅनचे नंबर्स आणि जे आई/बाबांबरोबर येणाऱ्यांसाठी त्यांच्या गाड्यांचे नंबर्स मुलांच्या रोल नंबर्स बरोबर लिहून घेणार आहेत. आता सगळीकडे चौकाचौकात CCTV आहेत. त्यात रूल मोडला तर गाडीचा नंबर कॅप्चर होतोच. त्यावरून कुठल्या मुलाच्या आई/बाबांनी किंवा व्हॅनकाकांनी रूल मोडला ते रेकॉर्ड होईल. एकदा रूल मोडला की ५ मार्क्स कमी. वर्षाच्या शेवटी तुम्हाला जितके मार्क्स मिळाले त्यातून जेवढ्या वेळा तुम्हाला शाळेत सोडताना/परत नेताना रूल मोडला ते इंटू  (*) ५ इतके मार्क्स कमी आणि ते तुमचे फायनल मार्क्स! “

भीषण शांतता पसरली. सगळी मुले विचारात पडली. मला माझेच कौतुक वाटले आणि स्वतःचीच आयडिया खूप आवडली (खरं तर मला हे पटत नाही.. सगळ्याच गोष्टी कशाला मोजायला पाहिजेत.. चांगुलपणा / नियम पाळणे / देशभक्ती या काय मोजायच्या गोष्टी आहेत. पण हल्ली डेटा आणि क्वांटिटेटिव्ह या शिवाय आपण जगूच शकत नाही.. असो तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे). मी परत येऊन बाकावर बसलो. दोन मिनिटेच गेली असतील आणि ती यंग ब्रिगेड माझ्याकडे आली…  

एक : “काका, याच्याकडे भन्नाट आयडिया आहे, तो म्हणतो मी बाबांना सांगीन की, काकांच्या गाडीवरून सोडत जा म्हणजे त्याच्या चुलत भावाचेच मार्क कमी होतील.. नाही तरी फार शायनींग खातो.” 

दुसरा : “येड्या, त्यापेक्षा डुप्लिकेट नंबर प्लेट लावायची.”

तिसरा : “काका.. त्या दुसऱ्या शाळेची आमच्या शाळेशी खूप खुन्नस आहे.. समजा, त्यांच्या प्रिन्सिपॉलनी आमच्या व्हॅनकाकांना पैसे दिले आणि मुद्दाम सिग्नल तोडायला सांगितले तर म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना कमी मार्क्स पडतील आणि आमची बदनामी होईल… तर?”

माझ्या शेजारच्या बाकावर बसलेला बोलला, “आजकालची मुलं इतकी स्मार्ट आहेत ना..”

तेवढ्यात पी-पी करत रॉंग साईडने त्यांच्या व्हॅन आल्या आणि मुले गेली. मी वाचलो. कारण त्या मुलाच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. पण हा स्मार्टपणा नक्की नाही. ८-१० वर्षांच्या त्या मुलांमध्ये हे असले विचार येतात कुठून? सगळ्यात पळवाटा शोधायच्या, फाटे फोडायचे, सारखी कुरघोडी करायची, चूक मान्य करण्याऐवजी तिचे उदात्तीकरण करायचे, इतके नकारात्मक विचार एवढ्याश्या मेंदूत येतात कुठून? आणि तेही इतक्या लगेच? मुलांची काहीच चूक नाही. ते आजूबाजूला जे ऐकतात, बघतात, वाचतात, त्यातून तर शिकतात. का त्याही पलीकडे, ही अशी नकारात्मक वृत्ती हल्ली अनुवंशिकतेतूनच त्यांच्याकडे जाते की काय कोण जाणे?

एक वेळ मार्क्स कमी करून त्यांना नियम पाळायची जबरदस्ती करता येईलही. पण त्यांच्या मनातल्या नकारात्मक, फाटेफोडू विचारांचे ट्रॅफिक कसं रुळावर आणायचं? मुलांची ही मानसिकता, नकारात्मक वृत्ती, पळवाटा काढायची सवय हे जास्ती भीतिदायक आणि काळजी करायला लावणारं आहे…. 

बाकी काही नाही जमलं, तरी याला “स्मार्टनेस” म्हणू नका आणि त्याचं कौतुकही करू नका, उदात्तीकरण करू नका. (असले मेसेजेस, रील्स, स्टोऱ्या फॉरवर्ड आणि शेअर नाही केलं तरी खूप आहे).. “चूक हे चूकच आहे” हे मान्य करा, ठणकावून सांगा, परत परत सांगा आणि उगाच चूक क्वांटिफाय करत बसू नका. कदाचित हीच बदलाची सुरूवात असेल. प्रजासत्ताक दिन येतोय, चला आपापल्यापुरती तरी सुरूवात करूया.  

✍️

योगिया

ता.क :

हा लेख लिहिला. FB वरही टाकला. कौतुकाने माझ्या बाबांना वाचून दाखवला. हसले. मी विचारलं, “कसा झालाय?” म्हणाले “छान झालाय.” 

“मग हसलात का?”

“सहजच.”

आता मी त्यांना गेली ५० वर्षे ओळखतो…

ते सहज हसणं नव्हतं. त्याला खेदाची किनार नक्कीच होती.

मी परत विचारलं, “का, काय झालं?”

ते म्हणाले, “असंही लिहू शकला असतास की, ज्या मुलांचे आई /बाबा , व्हॅनकाका नियम पाळतील त्यांना २ टक्के जास्त मार्क्स देण्यात येतील, ते कटच कशाला करायला पाहिजेत?”

खजील व्हायला झालं…! 

खरंच आमच्याच पिढीपासून हा प्रॉब्लेम झालाय…! नकारात्मक वागण्याचा/लिहिण्याचा/विचार करण्याचा!

मुद्दाम लेख एडिट करत नाहीये.. राहूदे ही बोच मनाला…! 

पण तुम्ही जर पुढे शेअर कराल, कोणाला सांगाल तर मात्र हा बदल जरूर करा.

लेखक : श्री योगिया  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

 ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याच्या जन्माची रंजक गोष्ट काय आहे? महाराष्ट्र गीत कसं जन्माला आलं?

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शाहीर साबळे यांचा पहाडी आवाज. त्यानंतर महाराष्ट्राचं यथार्थ वर्णन करणारे शब्द आणि उत्कृष्ट असं संगीत या सगळ्याचा मिलाफ म्हणजे हा पोवाडा किंवा हे महाराष्ट्र गीत. आजच या गीताविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ

स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी रक्त सांडलं. या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्तामुळे आणि चळवळीसाठी उभ्या केलेल्या कष्टामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. साहित्यिक, विचावंत, राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते अशा सगळ्यांचाच या चळवळीत मोलाचा सहभाग होता. ब्रिटिश काळात राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली गेली होती. मात्र भाषावार प्रांतरचना झाली नव्हती. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईसह महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे, डॉ. आर. डी भंडारे यांनी मांडला होता. प्रांतरचनेसाठी नेमलेल्या समितीने मात्र ही मागणी फेटाळली होती.

डिसेंबर १९५३ मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळांसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ.स.१९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. त्यानंतर या आयोगाविरोधात चळवळ उभी राहिली. या सगळ्या चळवळीनंतर आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली होती. याच दिवशी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणं सर्वात आधी सादर झालं. राजा बढे यांचे शब्द, शाहीर साबळे यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत असा त्रिवेणी संगम या गाण्यासाठी जुळून आला. हे गाणं सादर झालं. ते लोकांच्या पसंतीस पडलं. त्यानंतर हे गाणं घराघरात पोहोचलं. महाराष्ट्र गीत म्हटलं की जय जय महाराष्ट्र माझा, हाच पोवाडा प्रत्येकाच्या ओठावर आला. मनात घर करून राहिला. आज त्याच गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. १९फेब्रुवारी २०२३ पासून म्हणजे शिवजयंतीपासून हे गीत महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जाईल. 

शाहीर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी काय आठवण सांगितली?

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा पोवाडा आणि ‘महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान’ दोन गीतं होती. त्यातलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं लोकांना प्रचंड भावलं. कवी राजा बढे यांनी अवघ्या दीड दिवसात हे गाणं लिहिलं होतं. महाराष्ट्र गीत गाण्याचा प्रस्ताव आला तेव्हा बाबांना (शाहीर साबळे) यांना सुरुवातीला तो मंजूर नव्हता. कारण त्यावेळी त्यांच्या नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू होते. आपल्याऐवजी हे गाणं शाहीर अमर शेख यांनी गावं असं बाबांना वाटत होतं. कारण अण्णाभाऊ साठे, तसंच शाहीर अमर शेख यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान होतं. मात्र त्यावेळी जी राजकीय परिस्थिती होती त्यात बाबांना आग्रह करण्यात आला की, हे गाणं तुम्हीच गावं. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांची तालीम करून बाबांनी (शाहीर साबळे यांनी) हे गाणं बसवलं. १ मे १९६० ला हे गाणं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गायलं होतं. ६३ वर्षांपासून हे गीत मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलं आहे.

लेखक – श्री समीर जावळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या.

एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी.! 

म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं.

म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया.!

टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली.

ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला.! 

मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं.

आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.

चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला.

तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली  रिकामी पडलेली दिसली. 

तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता.

मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली.!

लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.

मी बागेला पाणी घातलं नाही,

कार धुतली नाही,

डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही,

बिलांचे चेक टाकले नाहीत,

वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत,

कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही.!

माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.?

अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.

२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा. 

३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.

४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.

५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.

६. स्वयंशिस्त बाळगावी.

७. वय वाढते तसे ‘मन धावते,  पण शरीर धावू शकत नाही’ याचेही भान ठेवावे. शारीरिक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या. 

८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी. 

९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल. 

ध्यानधारणेचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

? विविधा ?

☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नवीन आलेले फोन, आणि त्यातले संदेश, फोटो, आणि ध्वनीचित्रफीत पाठवण्याचे तंत्र याला सलाम. तत्परता म्हणजे काय? हे फोन आणि WhatsApp मुळे समजते‌‌.

या फोनमुळे व WhatsApp मुळे आम्ही आमचे तारतम्य काही प्रमाणात सोडले असा आरडाओरडा सगळ्या घरांमध्ये, सगळ्या स्तरावर, (मजल्यावर) सगळ्या खोल्यातून, सगळ्या वेळी होत असला तरी आम्ही यांचे वापरणे  सोडलेले नाही.

घरात आणि बाहेर नम्रता (मान खाली ठेवणे) आज याच मुळे आहे. त्यामुळे आम्ही (बहुतेक वेळा) खालमानेनेच वावरतो. बऱ्याचदा आता मान वर करून बोलावे लागते, त्यासाठी पूर्वी (मान वर करून बोलण्याबद्दल) खूप वेळा काही ऐकावे लागत होते. आता अगोदर मान वर कर… असे सांगावे लागते.

अगदी म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात सुध्दा आमचे अंगठे सतत या फोनमुळे व्यस्त असतात. आजवर दाखवण्या व्यतिरीक्त इतर कामाला क्वचितच आलेला अंगठा आता बराच वेळ बिझी असतो. मी तर तो दाखवण्यापेक्षा जास्त वेळ बघितला असेल.

अहो तत्परता तत्परता तरी किती? म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात आम्ही जागा दिसेल तिथून व काढता येतील तसे फोटो आणि ध्वनीचित्रफीत काढून काही सेकंदाच्या अवधीत ते पाठवून आम्ही त्या कार्यक्रमात शरीराने हजर असल्याचे पुरावे देतो. (फक्त नेटवर्क का काय म्हणतात ते नीट वर्क करायला हवे.)

परवा एका कार्यक्रमात मी बसल्याजागी (उगाचच कार्यक्रम करणाऱ्यांना अडथळा नको) चोरुन काही फोटो काढले, आणि अवघ्या काही सेकंदाची ध्वनीचीत्रफीत करून बसल्या जागेवरुनच पाठवली. (खरे सांगायचे तर रंगमंचावरील लाईट आणि कलाकाराचा नीळा झब्बा इतकेच काय ते त्यात समजेल असे दिसत होते. चेहरा कोणाचा आहे हे सांगावे लागणार होते.) पण अवघ्या काही मिनिटांतच उत्तर म्हणून पाच सहा अंगठे, दोन चार टाळ्या वाजवणाऱ्या हाताची चित्र, पाच सहा वेगवेगळे चेहरे (यांना स्माईली म्हणतात), आणि एक दोन छान दिसतंय असा आशय दाखवणारी बोटं उत्तरात परत आली.

(छान दिसतंय असा आशय दाखवणाऱ्या बोटांच्या चित्राच आणि ते पाठवणाऱ्यांच मला विशेष कौतुक वाटते. कारण त्यांना छान म्हणायचे आहे का ध्यान म्हणायचे आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागते. महाभारतातील नरो वा कुंजरो वा या नंतर याच बोटांच्या खुणेचा अर्थ गहन असेल… छान की ध्यान…असो.) किती ही तत्परता… पण त्यांचा रंगमंचावर आणि आमचा फोनवर कार्यक्रम सुरू होता.

अमेरिकेवर फिरणारा तो फुगा चीनचा आहे हे समजून घेऊन त्या बद्दल अमेरिकेने चीनला विचारुन चीनने उत्तर देण्याआधीच दुरदर्शन वरुन आमच्या मोबाईल मध्ये त्यांचे फोटो आणि ध्वनीचित्रफीत पाठवून झालेली असते, आणि आम्ही आता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची वाट पहात असतो. (अमेरिका आणि चीन सोडून) आता तो फुगा फुटला, किंवा फोडला, पाडला. तर आम्ही फुटलेल्या फुग्याचे फोटो पाठवले.

लग्न समारंभात वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर (खरे तर त्यांनी हार पत्करल्यानंतर किंवा स्विकारल्यानंतर असे म्हणायचे होते.)  ते सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी मंचावर येण्या अगोदर त्यांचेच फोटो त्यांच्या मोबाईलवर आलेले असतात. (फक्त त्यावेळी त्यांना तेवढा वेळ नसल्याने ते बघत नाहीत. पण इतरांनी ते तत्परतेने पाठवलेले असतात.)

जन्मलेल्या बाळाचे आणि अखेरीस दिलेल्या गंगाजळाचे, वाढदिवसाच्या औक्षणाचे, काही गोड क्षणांचे, काढलेल्या जावळाचे, आणि पडलेल्या टक्कलाचे, आलेल्या दातांचे, आणि लावलेल्या कवळीचे, पदार्थांनी भरगच्च वाढलेल्या पानाचे, समुद्रातील स्नानाचे, झाडांचे, फुलांचे, खेळण्यात गुंग असलेल्या मुलांचे, अशा कोणत्याही प्रसंगाचे फोटो, चित्रण तत्परतेने पाठवायचे साधन.

पण यामुळे चांगले देखील बघायला, वाचायला, ऐकायला मिळते हे पण खरं आहे.

फक्त ते बघायची आणि इच्छा असल्यास पाठवायची तत्परता तुम्ही दाखवली पाहिजे…… बाकी उरलेलं तो तत्परतेने करतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जे गरीब आणि निराधार रूग्ण दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि त्यांना जेवण आणून देणारे कोणीही नाही…. या जगात ज्यांचं आपलं म्हणावं, असं कोणीही नाही….. अशा सर्व गरीब रुग्णांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पामधून” आपण रोज डबे पुरवित आहोत. ….. श्री अमोल शेरेकर, या कष्टाळू दिव्यांग कुटुंबाकडून आपण डबे तयार करून घेत आहोत , आणि जिथे खरंच गरीब आणि गरजू रुग्ण आहे, अशांनाच आपण हे मोफत जेवणाचे डबे देत आहोत.  (सरसकट दिसेल त्याला आपण जेवण देत नाही) …. याचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ मनीषा पाहत आहे. 

यांनाही आयुष्यात उभं करायचं आहे ….परंतु, भरल्या पोटाने दिलेला सल्ला, उपाशी पोटाला पचत नाही…!

… बघू प्रयत्न सुरू आहेत…! 

  • ज्यांच्याकडे चुली आहेत, परंतु शिधा नाही, अशा गोरगरीब आणि रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांना आपण शिधा पुरवित आहोत.  या महिन्यात जवळपास ३०० लोकांना दोन महिने पुरेल इतका शिधा आपण दिला आहे. 

यांना चिंता आहे ती भविष्याची… त्यांच्या मुलांची… ! 

मेल्यावर जाळते ती “चिता” आणि मरण्याअगोदर जाळते ती चिंता…! 

फरक फक्त एका टिंबाचा….!

  • जवळपास ६०० लोकांच्या रक्त, लघवी आणि इतर सर्व शारीरिक तपासण्या आपण रस्त्यावर आणि रेड क्रॉस हॉस्पिटल येथून करून घेतल्या आहेत. तपासण्याचे रिपोर्ट पाहून त्यांना त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा रस्त्यावरच दिली आहे. .. मी त्यांना रस्त्यावर  “मोफत” दवा देतो…. ते मला “अनमोल” दुवा देतात… ! 

… इथेही फरक फक्त… उकाराचा…!  मी हा उकार घेवून मस्त जगतोय…. शप्पथ घेऊन सांगतो… मनशांती मिळवायची तर फक्त हा उकार महत्वाचा ! 

आपण आपल्या विचारात त्रस्त असतो तेव्हा असते ती “मनःस्थिती”…. दुसऱ्यांचा विचार करायला लागतो तेव्हा होते ती “नमःस्थिती ” …! 

… फक्त शब्दांची अदलाबदल करायची…? की विचारांची आणि वागण्याची??  हे ज्यानं त्यानं ठरवायचं ! 

  • रस्त्यावर पडलेले… एक्सीडेंट होऊन हात पाय मोडलेले… डोके फुटलेले…. दहा रुपयांसाठी मारामारी होऊन, भोसकाभोसकी झालेले, कॅन्सर, कावीळ झालेले असे बारा रुग्ण आपण या महिन्यात मॉडर्न हॉस्पिटल येथे ऍडमिट केले आणि या सर्वांचे जीव वाचले आहेत. 

… हे पुन्हा उठून उभे राहतील अशी आशा आहे…! 

सूर्यापासून एक शिकायचं असतं ….संध्याकाळी मावळलं तरी रोज सकाळी पुन्हा उगवायचं असतं ! 

  • कडाक्याच्या थंडीत जे गारठले आहेत, अशा रस्त्यावरच्या सर्वांना…. कान टोपी, स्वेटर, ब्लॅंकेट, घोंगडी देऊन झालं आहे. सौजन्य : डॉ राजेश केणी, गोवा.
  • आयुष्याच्या अंताला जे लागले आहेत… रस्त्यावर पडून आहेत…. असे आजी आजोबा, जग सोडून गेले तर बेवारस म्हणून नोंद होऊन ते जातील…. ना कुणाला खंत, ना कोणाला खेद ! मला हे मंजूर नाही !  आणि म्हणून, अशा अनेकांना या महिन्यात वेगवेगळ्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं आहे. जेव्हा ते जातील, तेव्हा किमान वृद्धाश्रमातून मला फोन येईल आणि आम्ही त्यांचे मुलगा / नातू / सून म्हणून अंतिम संस्कार करू… 

… त्यांच्या आयुष्यात जगण्याची ठिणगी पेटवू शकलो नाही …  पण…. जाताना किमान अग्नी तरी देऊ…!

मनातलं काही…

भीक मागणाऱ्या / याचना करणाऱ्या अनेक लोकांच्या अंगात अनेक कला असतात, परंतु अनेक लोकांच्या अंगात कोणतीही कला आणि कौशल्य नसते…. !  ज्यांच्या अंगात कोणतेही कला आणि कौशल्य नाही अशा लोकांना हे कौशल्य शिकवावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

उदा. गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण, परफ्युम तयार करण्याचे प्रशिक्षण, साडीला फॉल पिको करण्याचे प्रशिक्षण, किंवा गिफ्ट आर्टिकल तयार करण्याचे प्रशिक्षण इ… इ…

प्रशिक्षण झाल्यानंतर त्या प्रकारचा ते व्यवसाय करू शकतील. पण अशा प्रशिक्षणासाठी जागा लागते.

याचना करणाऱ्या लोकांसाठी असे प्रशिक्षण केंद्र उभारणे हे माझे अंतिम स्वप्नं आहे…. यासाठी मी पुणे किंवा पुण्याजवळ पाच गुंठे जागा शोधत आहे. 

अगदीच नाही तर ८०० ते १००० स्क्वेअर फुटाचा बांधीव हॉल भाड्याने घेण्यासाठी पहात आहोत . 

महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडे गेल्या पाच वर्षापासून यासाठी मागणी / विनंती / अर्ज करून मी आता थकलो आहे…. पूर्णतः हरलो आहे…! 

… असो, त्यांच्याही काहीतरी अडचणी असतीलच !

तर, कोणाच्या पाहण्यात अशी जागा अथवा हॉल असेल तर कळवावे… जेणेकरून, याचना करणाऱ्या माझ्या लोकांसाठी मला “कौशल्य विकास केंद्र” निर्माण करून, या समाजाला स्वतःच्या पायावर उभे करता येईल. 

एखाद्याला ढकलून पाडायला ताकद लागत नाही… हात धरून उठवायला ताकद लागते…! 

आपणच माझी ही ताकद आहात…! 

ज्या कामाचा मी फक्त नोव्हेंबर महिन्याचा लेखा जोखा वर सादर केला आहे, त्याला अवाढव्य आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मदत लागते. 

… वरील सर्व मदत समाजाकडून मला मिळत आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे….! 

तरीही, माझ्यासमोर असलेले खर्च आणि माझ्याकडे उपलब्ध असलेला निधी यांची सांगड कधीच बसत नाही…! 

‘तुमचे बिल पुढील महिन्यात भागवतो साहेब,’ हे हात जोडून समोरच्या व्यक्तीला सांगण्याची नामुष्की दरवेळी माझ्यावर येतेच…!

हरकत नाही, घरोघरी मातीच्या चुली…! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे… उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं …! 

मी पडल्यानंतर, उठून उभे करण्यासाठी तुम्हा सर्वांचेच हात पुढे येतात… आणि दरवेळी मी उभा राहतो…

पुन्हा नव्याने… नव्या जोमाने ! 

… मी नतमस्तक आहे आपणासमोर…! 

माझा प्रणाम स्वीकार करावा जी… 

— समाप्त —

(मी करत असलेल्या कामाचे सर्व फोटो आपणास दाखविण्याचा मला खूप मोह होतो… परंतु असे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया स्वीकारत नाही हा भाग एक …आणि दुसरा म्हणजे, असे फोटो {पायात अळ्या पडलेले, झोपेत कुत्र्याने पाय खाल्लेले, एक्सीडेंटमध्ये डोकं फुटलेले, हाडांचे तुकडे झालेले, ब्लेडने पोट फाडलेले, दगडाने बोट ठेचलेले इ.. इ… वाचूनच कसंसं  झालं ना ? } अनेक व्यक्तींना असे फोटो बीभत्स, ओंगळवाणे, किळसवाणे वाटतात. अनेक लोक हे फोटो पाहून कित्येक दिवस जेवू शकणार नाहीत किंवा झोपू शकणार नाहीत, याची जाणीव आहे, आणि म्हणून या कारणास्तव मी असे फोटो दाखवणे टाळत आहे.)

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(Glory of Indian Architecture…) 

ऐहोळे, दख्खनचं पठार, कर्नाटक…

Khalil Gibran says ….  “And let to-day embrace the past with remembrance and the future with longing. Art arises when the secret vision of the artist and the manifestation of nature agree to find new shapes.“ 

पाषाणातली अथांग मृदुता ….

ही अद्वितीय निर्मिती सातव्या शतकातली आहे. म्हणजे आजमितीला बाराशे तेराशे वर्ष एवढा कल्पनेपलीकडचा काळ या मूर्तीने वादळं, उन्हाळे, पावसाळे झेलले आहेत. दख्खनच्या पठारावरचा अविरत वाहणारा वेडापिसा वारा झेललाय. तरीही ही कला दिमाखात उभी आहे. हे पाषाण चिरंजीव आहेत.

थोडंसं नीट बघा. मन देऊन बघा. तो किती आर्जव करतोय. आणि ती लटक्या रागाने हे सगळं सुख उपभोगत्येय. त्या दोघांचं हे प्रेम कालातीत आहे, हेच ही मूर्ती सांगत्येय. त्या शिल्पीनी … कलाकारांनी पराकोटीची कमाल केल्येय. महाकठीण पाषाणाला जुईच्या फुलासारखं नाजूक, मृदू केलंय. दोघांच्या शरीरातला कण न कण ती मृदुता … त्यांचं प्रेम, भावना दर्शवतोय. कलेची आपली परंपरा किती दिव्य आहे, हे आपल्याला सांगतोय. नीट बघा …कलाकारांच्या छिन्नी हातोडयाची अगाध किमया. त्यात त्यांनी प्राण ओतला. भावना, घाट, पोत, प्रमाणबद्धता, बारीक कलाकुसर यांची अजोड घडण सामान्य मनाला देखील जाणवत्येय. 

…… खरंच  पाषाणातली मृदुता अथांग आहे. 

चित्र साभार – श्री प्रकाश पिटकर 

लेखक – श्री प्रकाश पिटकर 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares